मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उपनिषदे (२)

शरद · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
=================================================================== उपनिषदे : (१)... (२)... (३)... (४)... (५)... (६)... (७) उपनिषदांनी आम्हाला काय दिले ?... (८) ईशावास्योपनिषद... (९) केनोपनिषद... (१०) अविद्या... (११) मुंडकोपनिषद... (१२) प्रश्नोपनिषद-१... (१३) प्रश्नोपनिषद-२... (१४) कठोपनिषद-१... (१५) कठोपनिषद-२... (१६) ऊर्ध्वमूलमध:शाखमश्वत्थं... =================================================================== उपनिषदे (२) अंतरंग भाग-१ वैदिक समाज सुखसमाधानी, आरोग्यसंपन्न, उत्साही होता.. इहलोकातील सुखे मिळत होती व यज्ञ करून परलोकातील सुखांची सोय करून ठेवावयाची खात्री होती. पण या समाजातील काही विचारवंतांना हे पुरेसे नव्हते. सुखे क्षणभंगुर आहेत, समोर दिसणारे जगही नश्वर दिसत होते. आणि जगाची सुरवात कशी झाली असावी, कुणी निर्माण केले हे जग, तो निर्माता, असा कोणी असलाच तर, कसा असेल, असल्या प्रश्नांना यज्ञसंस्थेत उत्तर नव्हते. ऋग्वेदातील नासदीय सूक्त, "पुरुष" या कल्पनेत वरील प्रश्नांना स्पर्श केलेला आढळून येतो. या विषयांचा पा॒या घेऊन उपनिषत्कालिन ऋषींनी आपल्या तत्वज्ञानाची भव्य इमारत उभी केली. वेदातील ह्या कल्पनांचा विकास पुढे उपनिषदांनी केला असला तरी यज्ञसंस्थेबद्दल मात्र त्यांना अजिबात आदर नव्हता. त्या काळाला अनुसरून, कटकटी नकोत, म्हणून त्यांनी बोलावयाचे टाळले. पण सगळ्यांनी नव्हे, एखादा कोपर्निकस निघतोच. उपनिषदात "यज्ञ म्हणजे फुटक्या नौका" इतक्या कडक शब्दात यज्ञकर्माबद्दल तुच्छता दाखविली आहे. सृष्टी, धर्म आणि नीति या तीन गोष्टींवर ऋषींचे लक्ष केंद्रित झालेले होते. यावर विचार करतांना जड जग कामाचे नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आपली दृष्टी आंत, मनाकडे वळवली. धर्म व नीति यांबद्दल हे ठीक दिसते पण सृष्टी...... नाही पटत ? मग सांगा; आज Big Bang सिद्धांताने शास्त्रीय जगात खळबळ माजवली, पण त्या सिद्धाताचा उगम कोण्य़ा वर्तमानकालिन ऋषीच्या मनांत जागृत झालेल्या स्फुल्लिंगातच आहे तीन हजार वर्षांपूर्वी "नासदीय सूक्त" लिहणार्‍या, अरण्यात राहणार्‍या. अनामिक ऋषीलाही तसेच काही स्फुरले. आज आपण Big Bang आधी काय होते त्याचे पटणारे उत्तर देऊ शकत नाही. पण त्या अनामिकाने त्या॒चाही विचार केला, त्याच्या मनांत डोंगराआडून उगवणार्‍या सूर्याप्रमाणे, संपूर्ण विश्व उत्पन्न करणारे "ब्रह्म" हा विचार जन्मास आला. या विश्वनिर्मीतीच्या गूढ प्रक्रीयेबद्दल ऋषी इतका साशंक होता की तो म्हणतो " हे जे काही होते ते त्या "ब्रह्मा"लाच माहीत असेल किंवा... त्यालाही माहीत नसेल " सर्वात्मक "ब्रह्मा"लाही माहीत नसेल म्हणण्यात विचाराची झेप कुठे पोचली आहे हे लवकर लक्षात येत नाही. पण पुढील विचारवंतांना, पार ज्ञानेश्वरांना, त्याची भुरळ पडली आहे. आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान हा उपनिषदांचा प्रधान प्रतिपाद्य विषय आहे. जरा ह्या आत्मा व ब्रह्म यांच्याबद्दल थोडेसे जाणून घ्यावयाचा प्रयत्न करू. निसर्गातील कोणतीही प्रचंड वस्तू सजीव मानण्याची वृत्ती नाहीशी होऊन प्रत्येक गोष्टीचा तात्विक भूमिकेवरून विचार करण्याची पद्धत उपनिषदांनी स्विकारली. त्यामुळे " ज्याचे ज्ञान झाले असता बाकी सर्वाचे ज्ञान होते असे तत्व कोणते" असा प्रश्न मुंडक उपनिषदात विचारला गेला व सर्व उपनिषदांत त्याचा पाठपुरावा केला गेला. उदाहराणार्थ "सोन्याचे ज्ञान झाले तर सर्व अलंकारांचे ज्ञान होते" वा "सर्व लोखंडी अवजारांचे ज्ञान प्राप्त करून घ्यावयाचे असेल तर लोखंडाचे ज्ञान प्राप्त करून घ्या" हे मूलज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आता ईश्वरप्राप्तीपेक्षा आत्मज्ञानाची ओढ लागली."शरीरातील चैतन्य नष्ट झाल्यावर काय कायम राहते तसेच गाढ निद्रावश झाले असता कोणते तत्व जागृत राहून स्वप्नसृष्टी निर्माण करते "(कठ उपनिषद) असला विचार आता करू लागले. दुसरा असाच एक प्रश्न (बृहदारण्यक उपनिषद)काव्यात्मक भाषेत विचारला आहे ."मृत्युरूपी काळ्या लाकुडतोड्याने तोडला असता पुन:पुन्हा जोराने वाढणार्‍या या जीववृक्षाचे खरे मूळ कोणते ?" याज्ञवल्क्यांनी ठाम उत्तर दिले "देहाच्या मृत्यूनंतर केवळ "आत्मा" जीवित राहतो " हे झाले जडातील अध्यात्मिक्त तत्वज्ञान.. कवितेच्या रसग्रहणात आपण पाहिले कीं अनोळखी शब्दांचे अर्थ आधी समजावून घेतले तर मग पुढचे काम सोपे होते. आधी आत्मा, ब्रह्म, प्राण, प्रणव, सत्-असत्, यांच्याबद्दल माहिती घेऊ. आत्मन् ; हा शब्द वेदांत येतो पण बव्हंशी त्याचा अर्थ "अहम्" असा आहे.तसेच आत्मन् म्हणजे चैतन्य, जीवनशक्ती, प्राण, जीव असेही म्हटले आहे. या सगळ्यांचा उपयोग उपनिषत्साहित्याने केला आहे. वेदांत अंतिम सत्याचा उल्लेख "पुरुष" किंवा ब्रह्म या संज्ञेने केला आहे. विश्वशक्तीला "देव" म्हणून भजू लागल्यावर त्याच्याशी आपले अभेद नाते आहे असे मनुष्य मानू लागला. बघा ना, बरेच लोक आमचे पूर्वज कृष्ण वंशातले, राम वंशातले असे म्हणतातच ना ? तसेच आत्मन् चे म्हणजे स्वत:चे या विश्वशक्तीशी म्हणजे "ब्रह्म"शी अभेदत्व आहे अशी एकदा कल्पना केली की आत्मा-ब्रह्म एकच झाले. बृहदारण्यकोपनिषदात "ब्रह्मभावश्चाहमात्मा ब्रह्म" (आत्मा ब्रह्म आहे) असा स्पष्ट उल्लेख केला आहे. सर्वव्यापी ब्रह्म जेव्हा व्यक्तीत असते तेव्हा त्याला आत्मा म्हणावयाचे. असा हा आत्मा शरीरात वास करतो त्याला काही मानसिक अवस्थांचा अनुभव येत असावा..मांडुक्य उपनिषदात जागरत्, स्वप्न्, सुषुप्ती व चौथी स्वसंवेद्य अश चार अवस्था वर्णिल्या आहेत. स्वसंवेद्य म्हणजेच तुरीय. या अवस्थेतील आत्म्याला अदृष्ट, अग्राह्य, अचिंतनीय, शिव, अद्वैत अशी अनेक विशेषणे दिली आहेत. ऐतरेयोपनिषदात आत्मा हे जगाचे आदिकारण अथवा मूलतत्व असून त्याच्यापासूनच सृष्टीची उत्पत्ती झाली असे सांगितले आहे. प्रथम " ब्रह्म" व नंतर आत्मा असे म्हणून दोघांना एकच काम, आदिकारण, दिले की दोघेही एकच झाले.निरनिराळ्या ठिकाणी हा विचार मांडला आहे. "तत् त्वमसि " (छांदोग्योपनिषद) वा "सोsहमस्मि" यातही हेच सांगितले आहे, थोडक्यात (१) देहातील अविनाशी तत्च =आत्मा; (२) विश्वातील अविनाशी तत्व =ब्रह्म; (३) आत्मा-ब्रह्म यांच्यात भेद नाही. हे ब्रह्म-आत्मा यांच्यातील अद्वैत, द्वैतवादी लोकांना आवडले नाही. त्यांनी प्रत्यगात्म्याला. "जीवात्मा" व ब्रह्माला "परमात्मा" अशा दोन संज्ञा दिल्या. वरील पन्नास ओळीतील सार चार वाक्यात असे: (१) देहातील अविनाशी तत्वाला म्हणावयाचे आत्मा, (२) ब्रह्म आणि आत्मा याच्यात अभेद , (३) तूच आत्मा आहेस (४) आत्मसाक्षात्कार हे परमलक्ष. आत्म्यालाच जाणून मनुष्य मृत्यूच्या पलिकडे जातो. मोक्षप्राप्तीसाठी यापेक्षा निराळा मार्ग नाही. (श्वेताश्वतर उपनिषद ) (जरा मदत पाहिजे. जर एका आत्मा या विषयावर एवढे घडाभर तेल जाळले तर पुढील लेख उगीचच वाढत जातील. ब्रह्म, प्राण, प्रणव, सत-असत,... तर काय म्हणतोय, संक्षेपात लिहावे का ? तसा विषय अवघड असल्याने उदाहरणे देऊन सागावा लागतो. जर लेख लहान करावा असे सांगितलेत तर सूत्रमय लिहता येईल. काय करावे ?) शरद

वाचन 6942 प्रतिक्रिया 0