मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दन दन दनाट झिंगाट सैराट..

सस्नेह · · जनातलं, मनातलं
मराठी चित्रपटांच्या वाटेला मी मुळीच जात नाही याची एक नाही अनेक कारणं. वास्तवाशी फारकत घेतलेलं टेलरमेड कथानक. स्टुडीओतलेच नव्हे तर कित्येकदा चक्क स्टेजवर मागे पडदे रंगवलेले सीन. आउटटेकिंग मधले दारिद्र्य. सेटिंगचे दारिद्र्य. कृत्रिम ढंगाचे लाडिक संवाद आणि अतिशय बोल्ड, नको इतका ठसठशीत अभिनय, ओव्हरअ‍ॅक्टिंग. प्रेक्षक हा जणू एक मठ्ठ धोंडा आहे अशा थाटात सर्व पात्रे आपले अभिनय-पियुष त्याच्यावर संततधारेने ओतत असतात. यामुळे मराठी चित्रपट बघण्यापेक्षा एखादा अ‍ॅनिमेशन चित्रपट बघितलेला बरा. पण इथे ‘सैराट’ ची लैच चर्चा चालली तसं कुतूहल उड्या मारू लागलं. मराठी चित्रपटांचे वर दिलेले सगळे पैलू सहन करून हा चित्रपट बघणेबल असेल का याचा साधक बाधक विचार करून अखेर ठरवले, चित्रपट बघायचा. पण चित्रपट बघितला आणि अहो आश्चर्यम ! यापैकी एकही पैलू टोचला नाही. ना नाटकी कथानक, ना रंगवलेले पडदे, ना पुस्तकी थाटाचे संवाद. आणि अभिनयाबद्दल काय बोलावं ? पडद्यावरची ष्टोरी आपण बघत नसून तुमच्या आमच्या आजूबाजूला घडणारा रोजच्या बघण्यातलाच किस्सा वाटून गेला राव. तर, ‘सैराट’ भन्नाट आवडला. आता का आणि कसा याचा पंचनामा करायचा म्हणजे त्यातली मज्जा घालवण्यासारखंच. पण तरीसुद्धा काही प्लस मायनस इथे मांडल्याशिवाय राहवत नाही. विशेषत: ‘सैराट’ फ्यान क्लबसाठी  पाटलाची लाडकी लेक अर्ची आणि कोळ्याचा झिंगाट पोर परशा यांची ही जमिनीवरचीच प्रेमकथा. पाटलाची दहशत अतिशय सूचकपणे दाखवली आहे. त्या दहशतीची जाणीव नायक आणि नायिका दोघेही बाळगून आहेत. कोवळ्या वयात फुलणारे प्रेम त्या दहशतीने कोमेजून न जाता त्यातूनच वाट शोधत जाते. दोघांमधली सामाजिक आणि आर्थिक विषमता पावलोपावली प्रेक्षकांच्या समोर येत राहते आणि तरीही प्रसंगांचे वळण कुठे खटकत नाही. अखेरीस अर्ची आणि परशा ठेचा खात खात पळून जाण्यात यशस्वी होतात. हा पूर्वार्ध अतिशय रोचक झाला आहे. उत्तरार्ध बऱ्याच जणांना भावला नाही. पण तोसुद्धा पूर्वार्धाप्रमाणेच वास्तवाशी इमान राखून आहे. एकीकडे कुटुंबाबद्दलची घराबद्दलची ओढ आणि परशाबद्दलचे नैसर्गिक आकर्षण यात होणारी रस्सीखेच रिंकू राजगुरू या नवोदित मुलीने अतिशय प्रगल्भपणे दाखवली आहे. संपन्न घरात वाढलेली असल्याने विपन्न्तेचा, बकालतेचा सामना करताना हरणारी हिम्मत शर्थीने सावरून धरणारी अर्ची रिंकूने अगदी समर्थपणे उभी केली आहे. त्यामानाने उत्तरार्धात आकाशचा अभिनय तिच्यापुढे काहीसा फिका पडलासा वाटते. पडत झाडत, ठेचा ठोकरा खात अखेर त्या दोघांचे प्रेम सगळ्या कसोट्यांना पुरून उरते हा भाग खरोखर बघण्यालायक झाला आहे. आणि शेवट मात्र पूर्ण कलाटणी देणारा. केवळ सुन्न ! हा शेवट म्हणजे रुढीप्रियतेच्या मानसिकतेवर आणि ती सहन करणाऱ्या समाजमनावर सन्नकन मारलेली चपराक आहे ! ! ! ग्रामीण ष्टुरी असूनसुद्धा सैराट मध्ये ‘ग्राम्य’पणा अधोरेखित केलेला नाही. शहरी लोकांच्या कल्पनेतले ‘ग्राम्य’ वातावरण मुद्दाम निर्माण केलेले नसून खरोखरच्या ग्रामजीवनातले सरळ चित्रण आहे. कथानक सहज पुढे जात राहते. कुठेही कृत्रिम चढ-उतार, नाट्यमय झटके दिलेले नाहीत. पात्रे कृत्रिम वाटत नाहीत. तरीही प्रेक्षकांच्या मनातली उत्कंठा सातत्याने राखून ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत. नायिका अर्चना उर्फ अर्ची ही सरासरी मराठी चित्रपट नायिकेच्या परंपरेला धक्के देणारी आहे. तरीही बोल्ड वाटत नाही. ओढूनताणून आणलेला शहरी सुधारकपणा तिच्यात नाही. पण तरीही कुठल्याही हिंदी चित्रपटाच्या नायिकेपेक्षासुद्धा ती मॉड आहे. तिचा बिनधास्तपणा कसल्याही सो कॉल्ड मॉडर्नपणा पेक्षा आकर्षक आहे. सौंदर्याचे कुठलेही पारंपारिक निकष तिला लागू होत नसूनही ती सुंदर वाटते यात निवळ कॅमेर्‍याचे यश नसून तिची अदा, अंदाज आणि दिग्दर्शकाचे कौशल्य यांचाही मोठा वाटा आहे. नायक परशा हासुद्धा पारंपारिक नायकाच्या चौकटीत बसत नाही. धाडसी असूनही काहीसा बुजरा. त्याच्या वावरण्यात ष्टाईल आहे पण ‘अ‍ॅक्शन’ नाही. धीटपणा आहे पण कसलेही ग्लॅमर नाही. आणि तरीसुद्धा अर्चीचे त्याच्याकडे आकर्षित होणे अगदी नैसर्गिक वाटते. आकाश ठोसरने परशा अगदी यथार्थ उतरवला आहे. एकूणच मांडणीमध्ये कुठेही भडकपणा नाही इतकेच नाही तर साधेपणासुद्धा कुठेच ‘अधोरेखित’ केलेला नाही. चित्रपट मांडण्याचा हा सहजपणाच मला भावून गेला. आणखी एक अतिशय उल्लेखनीय विशेष म्हणजे व्हायोलन्सच्या सर्व प्रसंगात पार्श्वसंगीत शून्य आहे ! ना कर्णकर्कश्श वाद्यमेळ ना तारस्वरातील किंचाळ्या ना ड्रम्सचा टिपेचा धडधडाट. पण कोणताही बटबटीत म्युझिक इफेक्ट न देताही त्यातली हिंसा जाणिवांना हादरवून जाते. अजय अतुल यांचे सुश्राव्य आणि मधुर संगीत ‘याड’ लावून जातं. सर्वच गीते अतिशय मेलोडियस आणि हार्मनीयुक्त आहेत. एक ‘झिंगाट’ सोडलं तर इतर कुठलेही गीत प्रत्यक्षपणे नायक नायिकेच्या मुखी उमटलेले नाही. पण त्या त्या प्रसंगातील नायक नायिकेच्या भावना संगीत आणि दृश्य माध्यमातून अगदी चपखलपणे उतरल्या आहेत. मात्र एक विसंगती मला खटकली. चित्रपटातून वेगळी काढून डोळे मिटून ही गाणी इन्स्ट्रुमेन्ट्ल मोडमध्ये ऐकली तर ती खरंच अवीट गोडी देतात. पण संगीताचा पाश्चात्य धर्तीचा बाज आणि वाद्यमेळ यांच्यामुळे ग्रामीण मराठी शब्द त्यात ‘फिट्ट’ होत नाहीत. खऱ्या अर्थानं ही ‘गावाकडची गाणी’ वाटतच नाहीत. सुमधुर असूनही ही गाणी चित्रपटात वरून दिलेल्या देखण्या पॅचेससारखी वाटतात. तसेच अर्चीच्या घराचे वातावरण प्रतिगामी असूनही एकट्या अर्चीलाच बुलेट, ट्रॅक्टर चालवणे, कधीही कुठेही भटकणे हे स्वातंत्र्य दिलेले आहे. तसेच परशा आणि अर्ची यांची प्रेमकहाणी आख्ख्या गावाला दिसत असूनही अर्चीच्या घराच्या लोकांना समक्ष दिसेपर्यंत समजत नाही. या किरकोळ चित्रपटीय विसंगती सोडल्या तर बाकी सर्व चित्रपट जवळ जवळ वास्तवाला धरून आहे. एकूण, सगळी बेरीज-वजाबाकी करूनही मला ‘सैराट’ भन्नाट आवडला आहे. आणि सैराट फ्यान क्लबच्या आग्रहास्तव इथे माझंबी मत लिवलं आहे. :)

वाचने 42376 वाचनखूण प्रतिक्रिया 158

In reply to by चांदणे संदीप

समीरसूर Tue, 05/17/2016 - 14:56
अहो सैराटने मे महिना सुसह्य केला आपला हे मी म्हटलं ते उगाच नाही. ;-) तुम्ही बघाच. मग तुम्हाला पण लिहावसं वाटेल. एकदा अर्चीला पाहून याल तर सहा महिने कुठली दुसरी हिरोईन नाही आवडणार तुम्हाला...

In reply to by समीरसूर

चांदणे संदीप Tue, 05/17/2016 - 15:06
नक्कीच बघणार आहे...आणि बघून आल्यावर लिहिणारही आहे... आवडो अथवा न आवडो! स्टे ट्यून्ड! ;)
एकदा अर्चीला पाहून याल तर सहा महिने कुठली दुसरी हिरोईन नाही आवडणार तुम्हाला...
आपली आहे ऑलरेडी.... आर्ची....बिर्ची सगळ्या घालतील तोंडात मिर्ची! ;) Sandy

In reply to by चांदणे संदीप

समीरसूर Tue, 05/17/2016 - 15:10
बेष्ट! होऊन जाऊ द्या मग एक धमाकेदार सैराट लेख...मिपा स्टिल हेज इनफ़ रूम फॉर फ्रेश पर्स्पेक्तीवज.

In reply to by चांदणे संदीप

पियुशा Wed, 05/18/2016 - 10:55
कवळ्या पानात ह्या सावल्या उन्हात ह्या पवळ्या मनात ह्या भरलं... भरलं तुझ वामानामंदी घुमतय वाऱ्यामंदी सूर सनईचा राया सजल सजल उन वार नाभाताना सजल रंगल मन हळदीन राणी रंगल सरल हे जगण्याचं झुरणं सरल भिनल नजरेन आग धडाडल ह्या नभामंदी अन ढोलासंग गात आल जी सैराट झालं जी... सैराट झालं जी... सैराट झालं जी...

समीरसूर Tue, 05/17/2016 - 14:53
आपली निरीक्षणे पटली. पूर्वीचे मराठी चित्रपट (म्हणजे अजूनही तसे मराठी चित्रपट निघतातच म्हणा) आपण वर्णन केले तसेच असायचे. अतिशय भडक अभिनय, अतिशय कृत्रिम गावरान भाषा, पाचकळ विनोद, जान नसलेले प्रसंग, सुमार आणि शंभर चित्रपटात वापरलेले पार्श्वसंगीत, अस्ताव्यस्त पटकथा, टुकार गाणी, पडद्यावर असंख्य काळ्या रेघा आणि हलणाऱ्या फ्रेम्स, बाळबोध दिग्दर्शन...अगदी असेच असायचे मराठी चित्रपट! अर्थात आता चित्र बरेच बदललेले आहे. तांत्रिक आघाडीवर आता मराठी सिनेमा चकचकीत झाला आहे. आपलं 'सैराट'विषयीचं मत पटलं. छान लेख! 'झिंगाट' गाणं मला तितकसं भारी नाही वाटलं...

रंगासेठ Tue, 05/17/2016 - 15:06
तुमचही सैराटामय लिखाण आवडलं. या वाक्याशी सहमत.--> ग्रामीण ष्टुरी असूनसुद्धा सैराट मध्ये ‘ग्राम्य’पणा अधोरेखित केलेला नाही. शहरी लोकांच्या कल्पनेतले ‘ग्राम्य’ वातावरण मुद्दाम निर्माण केलेले नसून खरोखरच्या ग्रामजीवनातले सरळ चित्रण आहे.

सैराटच्या लाटेमधला अजुन एक लेख.....कितवा माहित नाही.... पण वर संदीप म्हणतोय तसे "आता सैराट बघावा की नाही?" लैच ऐकलय राव या शिणीमा बद्दल. आणि सैराट फॅनक्लबचे मेंबर तर एलयासी एजंट पेक्षा जास्त मागे लागले आहेत. सैराट बघाच म्हणुन. हापिसातला एकजण तर हल्ली "गुड मॉर्निंग" ऐवजी "पाहिला का काल?" असेच विचारतो. बाकी अभिनय-पियुष हा शब्द लै म्हणजे लैच आवडला. याच अनुशंगाने विचारतो की सैराट मधे काय "अभिनय-तांबडा रस्सा" ओतलाय का अंगावर? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

चांदणे संदीप Tue, 05/17/2016 - 15:12
सैराटच्या लाटेमधला अजुन एक लेख.....कितवा माहित नाही....
मिपाचे नाव बदलून काही दिवस "सैराट" ठेवावे काय?? 'सैराट'ची 'लाट' अशी एक कविता पण सुचतेय......पण होल्ड करतो... जोपर्यंत मी चित्रपट पाहून घेत नाही तोपर्यंत! ;) Sandy

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

समीरसूर Tue, 05/17/2016 - 15:14
मी पण प्रत्येकाला विचारतो हल्ली "काय मग? सैराट पाहिला की नाही?" मोस्टली मी ज्यांना विचारतो त्यांनी पाहिलेला असतो पण ज्यांनी पाहिलेला नसतो ते ओशाळतात. "नाही" "काय? अजून नाही पाहिला? काय राव तुम्ही...आजचं तिकिट बुक करा बुकमायशोवर आणि पाहून टाका लवकर..." "हो हो, बघतो कसं जमतंय ते..." हेहेहेहे... ;-)

मराठी कथालेखक Tue, 05/17/2016 - 15:21
वास्तवाशी फारकत घेतलेलं टेलरमेड कथानक. स्टुडीओतलेच नव्हे तर कित्येकदा चक्क स्टेजवर मागे पडदे रंगवलेले सीन. आउटटेकिंग मधले दारिद्र्य. सेटिंगचे दारिद्र्य. कृत्रिम ढंगाचे लाडिक संवाद आणि अतिशय बोल्ड, नको इतका ठसठशीत अभिनय, ओव्हरअ‍ॅक्टिंग. प्रेक्षक हा जणू एक मठ्ठ धोंडा आहे अशा थाटात सर्व पात्रे आपले अभिनय-पियुष त्याच्यावर संततधारेने ओतत असतात.
मला सैराटबद्दल काही म्हणायचं नाही (कारण मी अजून पाहिला नाही) पण तुम्ही म्हणता अस तितकंसं पारंपारिक फारसं काही राहिलं नाही. अनेक वेगवेगळ्या विषयावरचे चित्रपट मराठीत बनत आहेत. तुम्ही 'परंपरेला धक्का देणारी नायिका' , 'पारंपारिक नायकाच्या चौकटीत न बसणारा नायक' वगैरे म्हंटलं आहे, पण आता अशी परंपरा वगैरे फारशी राहिलेली नाही. मराठी सिनेमाची आज जी घौडदौड चालू आहे त्या नव्या युगाची सुरवात (किंवा जुन्या प्रवासाला कलाटणी म्हणू हवं तर) देणारा चित्रपट माझ्यामते तरी श्वास हा होता. त्यात काहीच पारंपारिक नव्हतं. मग अहिरेंचे सरीवर सरी, नॉट ओन्ली मिसेस राऊत वगैरें काही प्रमाणात गाजलेत. 'वळू' मध्ये पारंपारिक काही नव्ह्तं , सामाजिक भाष्य वगैरे नसलं तरी धमाल करमणूक होती. 'देऊळ' पण असाच एक मस्त होता, काय चूक काय बरोबर यावर भाष्य न करताही एक त्यात कथा-व्यथा मांडली होती. 'गजर' पण असाच वेगळ्या वाटेचा. माणसाच्या मनातील वर्णाचा अभिमान-गर्व यांवर 'अडगुल-मडगुलं' नामक एक खुसखुशीत चित्रपट आला होता. 'बिनधास्त' तर श्वासच्या आधीचा, पण त्यातही पारंपारिक काही नव्हतं. बाकी या वेगळेपणाबद्दल जितकी नाव घेवू तितकी कमीच (डॉ प्रकाश आमटे, हरिश्चंद्राची फॅक्टरी, पांगिरा , बालक-पालक, अगदी टाईमपास सुद्धा...सगळि एकदम आठवणार पण नाहीत). पण तुम्ही म्हणता तसे "रंगवलेले सीन" , "कृत्रिम ढंगाचे लाडिक संवाद" , "आउटटेकिंग मधले दारिद्र्य" असं काही नव्ह्तं यांत. बहूतेक चित्रपटांची निर्मितीमुल्ये उत्कृष्ट होती. वळू वा देऊळ मधले गाव, गावातील लोक प्रसंग कृत्रिम वाटत नाहीतच. हे झाले वेगळेपणाबद्दल...व्यावसायिक यशाची पण अशीच चढती भाजणी बघता येईल. दे धक्का, दूनियादारी, लई भारी, नटसम्राट, कट्यार.. अशा अनेक चित्रपटांनी चांगले यश मिळवले. सैराटची मार्केटिंगची गणिते चांगली जुळून आलीत, सैराटचे यश नाकारायचे नाहीये मला पण त्याची पायाभरणी अनेक वर्षांपासून होत होती असे मला वाटते.

In reply to by मराठी कथालेखक

डोमकावळा Wed, 05/18/2016 - 11:24
गेल्या काही वर्षातले काही मराठी चित्रपट पहाता ते पारंपारिक नव्हते हे नक्कीच. माझ्या मते 'बिनधास्त'पासून वेगळेपणाला सुरूवात झाली.

In reply to by डोमकावळा

सस्नेह Wed, 05/18/2016 - 11:29
'दे धक्का' आणि 'नटसम्राट' नाही पाहिले. पण 'बिनधास्त' हा काही वास्तवाशी रिलेट होती असं वाटलं नाही. मध्यमच काय उच्चवर्गातल्या मुलीसुद्धा आशा रीतीने वावरताना कधी दिसल्या नाहीत. अर्थात चित्रपटाने वास्तवाचे भान राखावेच असे काही नाही. पण मला आपले खरेखुरे वाटणारे चित्रपट पहायला आवडतात :)

In reply to by सस्नेह

डोमकावळा गुरुवार, 05/19/2016 - 12:48
पण 'बिनधास्त' हा काही वास्तवाशी रिलेट होती असं वाटलं नाही.
मान्य. पण वेगळा होता.
अर्थात चित्रपटाने वास्तवाचे भान राखावेच असे काही नाही.
नक्कीच. तसा माझाही आग्रह नाही.

संजय पाटिल Tue, 05/17/2016 - 15:38
छ्हान परिक्षण.. आवडले! शेवटच्या परिच्छेदात पडलेले प्रश्न मला पण पडलेले.. पण मग पाटलाची त्यात पण भावी आमदाराची मुलगी म्हणून एवढी लिबर्टी असावी बहूतेक. त्यात पण प्रीन्स एकदा वर्गात येऊन बसलेला बहुतेक त्यासठीच असावा..

सतिश गावडे Tue, 05/17/2016 - 15:55
जरा वेगळे परीक्षण आवडले. पुर्वार्ध गोड गोड प्रेमकथा आहे. उत्तरार्ध मात्र अगदी वास्तववादी आहे. पळून जाऊन लग्न करण्याचा विचार असणारे या उत्तरार्धाची उजळणी करावी इतका वास्तवाच्या जवळ जातो. चित्रपटात शेवटच्या प्रसंगात आर्ची आणि परशाचं बाळ समोरचं दृश्य पाहून रडतं आणि माघारी शेजारणीच्या दिशेने जातं. त्या बाळाचा विचार करता काय झालं आहे हे न कळण्याच्या वयाचे आहे. असे बाळ (मृत) आई वडीलांना मिठी मारन्याची शक्यता जास्त आहे.

In reply to by सस्नेह

नाखु Tue, 05/17/2016 - 16:13
ते बाहेरून आल्याने तर नक्कीच नैसर्गीक प्रेरणेने त्याने आईला मिठी मारून मग घरभर फिरताना (जसे अता बाहेर रक्त-पाऊलखुणा दाखविल्या तश्या घरातही दाखविता आल्या असत्या) त्याच्या वयाच्या मानाने त्याला अभिनय करायला लावला आहे असे दिसते,कींवा सिनेमा तडजोड असावी. हे फक्त मत आहे अनिवार्य नाही,सै.फॅ.क्लबने अंगावर येऊ नये पिटातला नाखु

In reply to by सतिश गावडे

पिलीयन रायडर Tue, 05/17/2016 - 16:23
सहमत.. मुल आधी आईकडे जाईल. मलाही हेच खटकलं. पण चित्रपटात त्या बाळाकडुन हे दृश्य करुन घेणे अवघड असल्याने अर्थात केवळ त्याने पाहिले न तो बाहेर गेला असे दाखवले आहे. ह्यासाठी म्हणे रिमोट कंट्रोल्ड कार वापरुन बाळाला तिथवर नेले आणि परत आणले.

In reply to by सतिश गावडे

शब्दबम्बाळ Tue, 05/17/2016 - 19:23
माफ करा, पण आता पर्यंत येणाऱ्या परीक्षण किंवा त्या खाली येणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये चित्रपटाचा अत्यंत महत्वाचा भाग सर्वानासमोर खुला केला गेला... चित्रपट न पाहिलेल्या लोकांनी आता तो पहिला तर त्यांना जो धक्का बसणार होता तो आता तितक्या परिणामकारक बसूच शकत नाही आणि त्यामुळे चित्रपटाची परिणामकारकता खूपच कमी होते! माझ्याबाबतीत पण हेच झाले त्यामुळे एका चांगल्या चित्रपटाचा पुरेसा आस्वाद घेत आला नाही (आस्वाद हा शब्द योग्य होईल का माहित नाही पण असो!) त्यामुळे कृपया चित्रपटाच्या कथेवर प्रतिक्रिया देताना इतरांचा रसभंग होणार नाही याची काळजी घ्यावी असे वाटते...

In reply to by सतिश गावडे

अर्धवटराव Wed, 05/18/2016 - 01:40
रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आई-वडील आणि एकुणच वाताररण त्या बाळाला फार अपरिचीत आणि अन्कफर्टेबल वाटतं. बाळाचा दुसरा ओळखीचा कंफर्ट झोन म्हणजे शेजारची मुलगी. म्हणुन ते बाहेर पडतं.

मिपावर सैराट वरील हे १३ वं परीक्षण. स्नेहांकिता, आपलं मिपा सैराट मित्र मंडळात स्वागत. चित्रपटाविषयीचं मत पटलं. पारंपरिक आणि त्याच त्याच पठडीतल्या मराठी चित्रपटांपेक्षा हा वेगळा चित्रपट आहे, या आपल्या मताशी सहमत. आर्चीच्या आणि तिच्या अभीनयाभोवतीच चित्रपट फिरतो यात काही वाद नाही. मिपा सैराट फ्यान क्लबच्या विनंतीला मान देऊन चित्रपट परीक्षण केल्याबद्दल आभारी. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सप्तरंगी Tue, 05/17/2016 - 16:38
१३ वे परीक्षण? सगळेच सैराट च्या favor मध्ये दिसतायेत ! मीच एक against मध्ये तुमच्या fan क्लब मध्ये नसलेली आहे वाटते:)

In reply to by सप्तरंगी

बाजूने असो वा विरोधात ? सैराट वर लिहिणारे, आपल्या फ्यान क्लब मधे आहेतच, तुम्ही पण मेंबर आहात सैराट फ्यान क्लबचे. आर्चे लसुन सोलता येत नसेल तर राहु दे, पण सप्तरंगी यांना चा पान्याचं बघ ? येतो ना पण चा ! :) -परशा बिरुटे :)

In reply to by नाखु

सप्तरंगी Tue, 05/17/2016 - 17:12
नाखु तर मी पण, पण विरोधात बोलले तर सगळे तुटून पडतील म्हणून हिम्मत करत नाहीये जे वाटते ते इथे share करायची. खूप सगळे एका प्रकारे विचार करत असताना काही वेगळे मांडले तर पचायला अवघड जावू शकते..

In reply to by सप्तरंगी

अभ्या.. Tue, 05/17/2016 - 17:18
अरे लिवायचं बिन्दास. पचायला अवघड एवढं काय गंभीर हाय राव तुम्च्या डोक्यात. कळू तर द्या जरा. वाटल्यास मीच सुरुवात देतो करुन. वाटल्यास क्रमाक्रमाने डिटेल देईन, पण तुम्ही लिहाच. "अ‍ॅव्हरेज पिक्चर हाय हो. एवढं काय नाय त्यात. लई विसंगत्या पण हायत."

In reply to by सप्तरंगी

समीरसूर Tue, 05/17/2016 - 17:20
तसं काही नाही हो; बिनधास्त मांडा तुमचं मत. कलाकृतीचा आस्वाद सापेक्ष असतो. नाही आवडला तर नाही आवडला...डरनेका नय. मी छातीठोकपणे सगळीकडे सांगतो की मला ए आर रहमान अजिबात आवडत नाही. टाईमलेस नाही त्याचं गाणं. सगळी गाणी कृत्रिम वाटतात. रोबोटने म्हटल्यासारखी..

In reply to by समीरसूर

सप्तरंगी Tue, 05/17/2016 - 17:59
तसे काही नाही हो , त्या movie पेक्षा गंभीर असे काय असणार , movie आणि तुम्हा सगळ्यांचे reviews उत्तमच आहेत. Anyways लिहेन तुमच्यापैकीच एकाच्या धाग्यात. Thanks बाकी रेहमानची गाणी मलाही एकसुरी वाटतात.

In reply to by रमेश भिडे

समीरसूर Tue, 05/17/2016 - 19:23
ए आर रहमान नाही आवडत मला. :-( खूप टेक्निकल वाटतात त्याची गाणी. फक्त "चुपके से चुपके से रात की चादर तले..." हे 'साथिया' मधले गाणे आवडते मला. बाकी एवढी विशेष आवडत नाही. माझ्या मोबाईलवर ए आर चे हे एकमेव गाणे आहे. त्याची गाणी अशी सहज ओठांवर येत नाहीत. गुणगुणता येत नाहीत. चाली क्लिष्ट आणि गद्यात्मक वाटतात. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. :-)

रेवती Tue, 05/17/2016 - 18:50
परिक्षण आवडलं. सिनेमा जेवढा तुकड्यातुकड्यात जालावर आणि मिपावरील परिक्षणातून दिसतोय, गाण्यातून दिसतोय तो आवडलाय. वास्तववादी आहे. शेवटापेक्षा पळून जाताना जे हाल होतात ते झेपणेबल नाही कारण ते सगळे अंगावर येते. एकंदरीतच शारिरिक व मानसिक हिंसा दाखवलिये जिचा त्रास होतो. गाण्यांबद्दल वेगळा धागा निघाला तर त्यावर बोलू शकीन किंवा नंतर इथे येऊन लिहीन.

In reply to by रेवती

समीरसूर Tue, 05/17/2016 - 19:27
पण ते देखील १००% वास्तववादी आहे (दुर्दैवाने). :-( शेवट तर मनीषा पाटील आणि इंद्रजित कुलकर्णी या दोघांच्या बाबतीत घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. डिसेंबर २०१५ मध्ये कोल्हापुरात ही करुण घटना घडली होती. :-(

पुणेकर भामटा Tue, 05/17/2016 - 22:29
चित्रपट मलाही आवडला! एक प्रश्न, पाटिल आणि पाटलिन दोघेही चांगले गौरवर्णी, तरीपण आर्ची सावळी आणि प्रीन्स भाऊ पार गडद काळा. असे कसे बरे? ... पुणेकर।

In reply to by पुणेकर भामटा

अभ्या.. Tue, 05/17/2016 - 22:39
त्येना फेरेनलवलीची लस टोचलेली नव्हती. काय राव, एवढे ऍडजस्ट करायचे की. आपल्या अमरापूरकरांना किती गोऱ्या घाऱ्या हिरवीनीचा डॅड म्हणून उभे केलेले, तवा चाललं का ?

अभिदेश Wed, 05/18/2016 - 06:13
पहिला परिच्छेद वाचला आणि वाटले की लेखिका परग्रहावर Sorry परदेशात राहतात की काय ? पण नाही ह्या तर महाराष्ट्रातच राहणाऱ्या निघाल्या . असं वाटण्याचं कारण , ज्या प्रकारे त्यांनी लिहिलंय त्यावरून त्यांना एकूण आजुबाजूला काय घडतंय ह्या बद्दल काही माहिती आहे असं वाटलं नाही . मराठी चित्रपट जरी बघत नसला तरी गेल्या १५ वर्षांत मराठी चित्रपट एवढे गाजातायात त्याबद्दल थोडी तरी माहिती आपण किमान वर्तमानपत्रे वाचून , T.V. बघितला तरी समजली असती . आपण तर आंतरजाल हि भरपूर वापरता असं दिसतंय तरी तुम्हांला काहीच माहिती नाही हे बघून आश्चर्य वाटलं . माझा आपण मराठी चित्रपट बघा असा मुळीच आग्रह नाही आणि आपण बघत नसाल तरी काही आक्षेप नाही . आक्षेप आहे तो तुमच्या चुकीच्या गृहितकांना. आजकाल कोणताही अगदी टुकार मराठी चित्रपट जरी असला तरी स्टेजवर मागे पडदे रंगवलेले सीन , आउटटेकिंग मधले दारिद्र्य. सेटिंगचे दारिद्र्य आढळत नाही. तुम्ही अजून सुर्यकांत , चंद्रकांत (I hope you know them , कारण तुम्ही मराठी चित्रपट बघत नाहीत ना .....रच्याने दोघेही तुमच्या गावाचे ) च्या जमान्यांत आहात वाटत . गेल्या १०-१५ वर्षांच्या राष्ट्रीय पुरस्कारांवर नुसती नजर जरी टाकली तरी हे सिद्ध होईल कि मराठी चित्रपट आता कुठे पोहोचलाय ते . मला वाटते कि एवढे सगळे सैराटवर लेख आल्यावर आपणही एक लिहिलाच पाहिजे ह्या भावनेतुन हा लेख लिहिला गेला आहे आणि सुरुवातीलाच असं काहीतरी लिहून आपली हुच्च अभिरुची कशी आहे हे दाखवण्यापाई आपण असं लिहिलं असावं पण ते हास्यास्पद झालं आहे . मी बरर्याच वर्षांत मराठी चित्रपट बघितला नाही … असे जरी लिहिले असते तरी चालले असते. गेली कित्येक वर्षे परदेशी राहूनही मराठी चित्रपट बघणारा आणि आवडणारा …… अभिदेश

In reply to by अभिदेश

सस्नेह Wed, 05/18/2016 - 10:45
तुमचे मत तुमच्या परीने खरे आहे आणि माझे माझ्या परीने. अखेरीस प्रत्येकाची अभिरुची वेगवेगळी असते. एक लिहायचे राहिले की, लेखात लिहिलेले माझे मत सरसकट सर्व मराठी चित्रपटांबद्दल नसून किंवा कलात्मक मराठी चित्रपटांबद्दल नसून केवळ व्यावसायिक चित्रपटांबद्दल आहे. अर्थात सर्वच मी पाहिले आहेत असा दावा नाही. पण गाजलेले नक्कीच पाहिले आहेत. अगदी अलीकडचेसुद्धा. गेल्या पंधरा नव्हे, पस्तीस वर्षांपासून आजअखेर मी मराठी चित्रपट पहात आले आहे. शिरीष कणेकरांच्या लेखणीतून उतरलेल्या मराठी चित्रपटांच्या परीक्षणांमधून माझी चित्रपटविषयक अभिरुची बनत गेली आहे. त्याकाळीसुद्धा ‘पिंजरा’ आणि शांतारामांचे अनेक चित्रपट वास्तवाशी रिलेट होत होते. नाट्यमयता आणि इनडोर टेकिंग असूनसुद्धा ! नंतर दादा कोंडकेंच्या सुरुवातीच्या चित्रपटांनीही चांगली दर्जात्मक अभिव्यक्ती दिली. उदा. पांडू हवालदार. लोकप्रियता मिळाली तसा कोंडके यांच्या चित्रपटांचा दर्जा घसरला. यानंतर अशोक सराफ, महेश कोठारे इ.चा काल. त्यांच्या चित्रपटांनी करमणूक दिली, धंदा चांगला केला. पण सहज मांडणी, नैसर्गिक अभिनय आणि वास्तवाशी नाते या तिन्ही बाबतीत ते पुअर होते. त्यानंतर जब्बार पटेल यांच्या दिग्दर्शनाने आणि स्मिता पाटील यांच्या अलौकिक अभिनयाने मराठी चित्रपटांच्या दर्जाला उर्जितावस्था दिली. पण एक ‘उंबरठा’चा अपवाद सोडला तर हा भाग केवळ कलात्मक मराठी (आणि हिंदी ) चित्रपटांपुरता मर्यादित राहिला. आपण कोणत्या पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपटांबद्दल लिहिता आहात ते कळले तर बरे होईल. अगदी अलीकडचे ‘ फँड्री’ आणि ‘श्वास’ सारखे कलात्मक चित्रपट मी पहिले नाहीत हे खरे आहे. पण 'देऊळ', 'कट्यार काळजात घुसली', 'दुनियादारी' यासारखे काही व्यावसायिक चित्रपट मी पाहिले आहेत आणि त्यांच्याबद्दलही माझे मत फारसे वेगळे नाही. ‘देउळ’मध्ये चित्रपटीय मसाला भरपूर आहे, टेकिंगही चांगले आहे पण अजूनही तो वास्तवाशी रीलेट होतोय असे मला वाटत नाही. तसेच जवळजवळ सर्व पात्रांचे अभिनय अभिनिवेशयुक्त आणि बोल्ड आहेत. ‘कट्यार’ कथानक भावुक असले तरी चित्रपटावरील आणि एकूण प्रसंगाच्या चित्रणातील नाटकाची छाप लपत नाही. चित्रपटात घेता येणारे स्वातंत्र्य घेण्यात कुचराई झालेली आहे. ‘दुनियादारी’ तर केवळ काचेच्या कुंडीतील कॅक्टस हे माझे सुरुवातीपासूनचे इंटरप्रिटेशन झाले. नायक आणि नायिका यांचे अभिनय एकूण प्रसंगांचा प्रवाह, यात कुठे सहजता, नैसर्गिकता नाही. अगदी ‘थ्री इडियट्स’सुद्धा वास्तवाशी चांगल्यापैकी नाते राखून आहे, पण ‘दुनियादारी’ तिथे फेल गेला आहे. यासाठीच मी अलीकडे मराठी चित्रपट पहायचे बंद केले आहे. आणि याचा अर्थ सर्व हिंदी चित्रपट पाहते असेही नाही. माझ्या अभिरुचीला मानवतील तेच पाहते. या पार्श्वभूमीवर मला ‘सैराट’ या सर्व कसोट्यांना उतरणारा वाटला, माझ्या अभिरुचीला मानवला. अर्थात हे माझे मत आहे. आणि मला त्याच्याबद्दल काहीही शंका नाही. प्रतिसादासाठी धन्यवाद.

In reply to by सस्नेह

रमेश भिडे Wed, 05/18/2016 - 11:31
>>>>शिरीष कणेकरांच्या लेखणीतून उतरलेल्या मराठी चित्रपटांच्या परीक्षणांमधून माझी चित्रपटविषयक अभिरुची बनत गेली आहे. भावना पोचल्या.

In reply to by सस्नेह

मराठी कथालेखक Wed, 05/18/2016 - 14:42
शिरीष कणेकरांच्या लेखणीतून उतरलेल्या मराठी चित्रपटांच्या परीक्षणांमधून माझी चित्रपटविषयक अभिरुची बनत गेली आहे.
हसावे की रडावे हेच कळत नाही. कणेकर हे मुख्यतः विनोदी लेखक आहेत आणि त्यांच्या क्रिकेट वा चित्रपटाच्या परीक्षणांना विनोदाचा भरपूर तडका दिल्याशिवाय त्यांना राहवत नाही. एकीकडे तुम्हाला 'चित्रपट वास्तववादी' आवडतात आणि दुसरीकडे परीक्षण मात्र अतिरंजित चालतात (की आवडतात ?) .. धन्य आहे. बाकी तुम्हाला वास्तवाशी रिलेट होणारे चित्रपट आवडतात तरी तुम्ही श्वास पाहिला नाही म्हणजे आश्चर्य आहे...(कोर्ट पाहिला का ?) देऊळ तुम्हाला वास्तवाशी रिलेट न होणारा वाटला !! माझ्या मते तरी तो वास्तवाशी चांगल्यापैकी रिलेट होणारा पण चित्रपटाच्या भाषेत मांडलेला सुंदर चित्रपट आहे (जसे क्राईम प्रेट्रोल हे वास्तविक घटनांचे नाट्यरुपांतर आहे) झालेच तर चित्रपटाची कथा वास्तववादी असणे/नसणे वेगळं आणि चित्रपटाचं सादरीकरण तद्दन फिल्मी/नाटकी असणं ही गोष्ट वेगळी. दूनियादारी, दे धक्का, दगडीचाळ यांच्या कथा वास्तवपूर्ण नाहीतच पण त्यांचे सादरीकरण अतिरंजित फिल्मी आहे असं नाही.
अगदी ‘थ्री इडियट्स’सुद्धा वास्तवाशी चांगल्यापैकी नाते राखून आहे
हा तर आश्चर्याचा धक्का आहे.. यात वास्तवाशी काय नात राखलंय ? शर्मन जोशीने हृदयाचा त्रास होत असल्याचे भासवून विमान थांबवणे, त्या चतुरने बदललेल्या शब्दांसकट भाषण वाचणे आणि इतरांनी ते वाचू देणे, अमिर खानने खोट्या नावाने इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवणे, मेडिकलचा गंध नसणार्‍या मुलांनी व्ह्यक्युम क्लिनरची मदत घेत एका स्त्रीची प्रसुती करणे ...सांगा यातलं काय काय वास्तवाच्या जवळ जाणारं आहे ?

In reply to by मराठी कथालेखक

चांदणे संदीप Wed, 05/18/2016 - 15:00
हा तर आश्चर्याचा धक्का आहे.. यात वास्तवाशी काय नात राखलंय ? शर्मन जोशीने हृदयाचा त्रास होत असल्याचे भासवून विमान थांबवणे, त्या चतुरने बदललेल्या शब्दांसकट भाषण वाचणे आणि इतरांनी ते वाचू देणे, अमिर खानने खोट्या नावाने इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवणे, मेडिकलचा गंध नसणार्‍या मुलांनी व्ह्यक्युम क्लिनरची मदत घेत एका स्त्रीची प्रसुती करणे ...सांगा यातलं काय काय वास्तवाच्या जवळ जाणारं आहे ?
अगदी सहमत आहे..... एक चित्रकृती म्हणून 3 Idiots भन्नाट वाटतो! 'सैराट' लाटेत काहीही वाहून यायला लागलंय! :) Sandy

In reply to by सस्नेह

यशोधरा Wed, 05/18/2016 - 15:22
हायला! अस्तु वगळता तीनही सिनेमे टीव्हीवर पण दाखवले की कितीदा! हां, आता तुमास्नी टीव्हीचा पडदा चालत नसल तर मंग कसं वो? :)

In reply to by सस्नेह

रेवती Wed, 05/18/2016 - 17:34
अस्तू कुठे पहायचा? आमच्याकडे आला नाही व जालावरही मिळाला नाही. किल्ला पहावासा वाटला नाही पण स्नेहा, नितळ व देवराई पाहण्याची संधी सोडू नकोस. नितळ हा शिनेमा किमान आठवेळा पाहिलाय दरवेळी काहीतरी वेगळं दिसतं. दिग्दर्शक चांगला असणं म्हणजे काय? किती अवघड काम आहे, किती लहानसान गोष्टींचे भान ठेवावे लागते वगैरे कळून येते.

In reply to by यशोधरा

समीरसूर Wed, 05/18/2016 - 15:28
अशी ही बनवाबनवी जबरदस्त! माझा ऑल टाईम फ़ेवरेट...कुठूनही बघा, कितीही वेळा बघा, कंटाळा येणारच नाही. धूमधडाका पण असाच एवरग्रीन! अशोक सराफ, शरद तळवलकर यांची जुगलबंदी एक नंबर! गंमत जंमत पण भारी!

In reply to by समीरसूर

मराठी कथालेखक Wed, 05/18/2016 - 15:44
वळू खुसखुशीत तर एक डाव धोबी पछाड हे खास मनोरंजक हसून हसून पुरेवाट.. मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, अशोक सराफ सगळ्यांची जुगलबंदी केवळ भन्नाट.. हा ओरिजिनल आहे की नाही माहीत नाहि. पण आहे मस्त...

In reply to by चांदणे संदीप

सतिश गावडे Wed, 05/18/2016 - 20:05
माझ्या एका भडजी मित्राने मला मंगलाला "टपाल" सिनेमा दाखवला. आवडला. मित्राच्या पैशाने पाहिला म्हणून नव्हे, मनापासून आवडला.

In reply to by सतिश गावडे

पुंबा गुरुवार, 05/19/2016 - 13:38
खरंच आवडला काय? अहो काय भिकार पिक्चर आहे तो. नाग्रीक नावचा असाच एक तद्दन फालतु आणि overrated पिक्चर. हे दोन्हीही टॉकीजला जाउन पाहीले याचं दु:ख अजुन जात नाही.. अर्थात प्रत्येकाची आवड वेगळी..

In reply to by सस्नेह

अभिदेश गुरुवार, 05/19/2016 - 04:08
एकीकडे तुम्ही म्हणता " लेखात लिहिलेले माझे मत सरसकट सर्व मराठी चित्रपटांबद्दल नसून किंवा कलात्मक मराठी चित्रपटांबद्दल नसून केवळ व्यावसायिक चित्रपटांबद्दल आहे." आणि दुसरीकडे तुम्ही असंही म्हणता "अगदी अलीकडचे ‘ फँड्री’ आणि ‘श्वास’ सारखे कलात्मक चित्रपट मी पहिले नाहीत हे खरे आहे. " तसंच तुमचं लेखाचं पाहिलंच वाक्य असं आहे "मराठी चित्रपटांच्या वाटेला मी मुळीच जात नाही याची एक नाही अनेक कारणं" ह्याचा अर्थ तुम्ही मराठी चित्रपट बघतच नाही . पण प्रतिसादात मात्र असं म्हणता "गेल्या पंधरा नव्हे, पस्तीस वर्षांपासून आजअखेर मी मराठी चित्रपट पहात आले आहे." सगळाच गडबडगुंडा ..... हे वाचून मला म्हणावसं वाटत , तुमच्याच मते वास्तवाशी चांगल्यापैकी नाते राखून असलेल्या ‘थ्री इडियट्स' मधला डायलॉग ….. "आखिर कहेना क्या चाहते हो ……. " बाकी तुमच्या बाकीच्या प्रतिसादाला अनेक लोकांनी योग्य उत्तर दिलेलं आहेच , त्यामुळे अधिक लिहित नाही.

In reply to by अभिदेश

सस्नेह गुरुवार, 05/19/2016 - 10:33
अहो, मराठी चित्रपट अलीकडे पहायचे बंद केले त्याची कारणे सांगितलीयेत मी. तसं तर मग लेखाची पहिली दोन वाक्येच बाद ठरतात. कारण चित्रपट पाहिल्याशिवाय त्यातल्या तंत्राबद्दल कसे लिहिता येईल, नाही का ? शब्दच्छल नका करू बॉ ! भावनाओंको समझो भई !

In reply to by अभिदेश

शब्दबम्बाळ Wed, 05/18/2016 - 10:54
सहमत! :) पहिला परिच्छेद झेपलाच नव्हता वाचल्यावर! :) कमी budget असणारे चित्रपट हि अत्यंत सुंदर बनू शकतात हे गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांकडे पाहून कळून येत! "टपाल" हा सिनेमादेखील असाच साधा सरळ होता पण तो पाहताना माझ्या मराठी न कळणाऱ्या मित्राला देखील गहिवरून आल होत... आणि अभिनयाच म्हणाल तर सुदैवाने बरेच मराठी अभिनेते हे उत्तम अभिनय करतात! जर कोणी फक्त भरत जाधव किंवा मकरंद चे चित्रपट पहात असेल तर मात्र काही सांगू शकत नाही! :)

In reply to by शब्दबम्बाळ

सतिश गावडे गुरुवार, 05/19/2016 - 23:08
"टपाल" हा सिनेमादेखील असाच साधा सरळ होता पण तो पाहताना माझ्या मराठी न कळणाऱ्या मित्राला देखील गहिवरून आल होत...
मी हा चित्रपट पाहताना चित्रपटगृहात रडलो होतो. अगदी आत जाऊन भिडतो हा चित्रपट.

पूर्वाविवेक Wed, 05/18/2016 - 11:06
परीक्षण पेक्षा रसग्रहण म्हणणे योग्य ठरेल.... मला आवडले. तंत्रशुद्धता आणि वास्तव ग्रामीण वातावरण दाखवण्यात 'सैराट' यशस्वी झालाय. अगदी बॉलीवूड प्रमाणे चकचकीत आणि प्रेझेंटेबल. कथा, गाणी, सादरीकरण सगळाच अप्रतिम. काही मोजके सन्मानीय अपवाद वगळता मराठी चित्रपट हे सगळ्याच आघाड्यावर मागास असतात/होते. हल्ली त्या मानाने बरेच नवीन प्रयोग व्हायला लागले आहेत. चांगले आशादायक बदल घडू लागले आहेत. जुन्या तमाशापटांतले ग्रामीण वातावरण खरे वाटायचे. पण नंतर लक्ष्या, कोठारे, सुषमा शिरोमणी वै. च्या चित्रपटातील ग्रामीण वातावरण तद्दन खोटे, भंपक होते. तू म्हणतेस तसं पडदे-बीडदे लावून केलेले सीन, अतिशय वाईट चित्रीकरण आणि सादरीकरण, टुकार गाणी, पांचट- द्विअर्थी विनोद. 'ओ पावन' अश्या हाका मारत फिरणारी स्कर्ट सारखा तोकडा परकर आणि पोलका अशी वेशभूषा, बकवास केशभूषा आणि भडक मेकप मधील सतत किलकिलाट करणारी नायिका. असह्य......! 'सासू-सून-हळद-कुंकू-चुडा' सारखे रडके चित्रपट घेवून अलका ताई आणि कं. आल्या. काय काय सहन कराव लागल ग या मराठी माय-बाप प्रेक्षकाला. 'मुंबई-पुणे-मुबई' मध्ये स्वप्नील जोशी चांगला वाटला तर नंतर सगळ्या चित्रपटात तोच. हे देवा, किती सहन कराव त्याला.