विज्ञानदिनाच्या निमित्ताने

यनावाला काथ्याकूट
विज्ञानदिनाच्या निमित्ताने ..... विज्ञान हे माणसाने संशोधित केलेल्या निसर्गनियमांचे, सत्यज्ञानाचे भांडार आहे. त्यात आपल्याला अचंबित करणार्‍या अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेतच. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही विषयावर, निरीक्षणांवर, सुसंगत विचार करून तर्कशुद्ध निष्कर्ष काढण्याची आणि ते शक्यतो प्रयोगाने सिद्ध करण्याची ती एक विचारसरणी आहे. वैज्ञानिकांनी ती विकसित केली आहे. या पद्धतीत कोणत्याही पूर्वग्रहाला थारा नाही. भावनेच्या गुंतवणुकीला स्थान नाही. कुणाच्याही अधिकारवाणीला मान्यता नाही. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, यांची स्वीकृती नाही. शंका घ्यायच्या, त्यांची उत्तरे शोधायची, जे पटेल तेच तत्त्वत: सत्य मानायचे. तर्कशुद्ध निष्कर्ष काढायचे. मग ते आपल्याला आवडोत वा न आवडोत. कदाचित् ते आपल्या पूर्वानुभवांशी विसंगतही असतील. अशा परिस्थितीत आपल्या अनुभवांचे पुनरावलोकन करायचे. चिकित्सा करायची. आपण दोन उदाहरणे पाहू:- १)एकदा गॅलीलिओ आपल्या शिष्यांना म्हणाला, " झुकत्या मनोर्‍याच्या (टॉवर ऑफ पिसा) माथ्यावरून १किलो वस्तुमानाची वीट खाली सोडली तर पायथ्याशी यायला तिला जितका वेळ लागेल तितकाच वेळ २ किलोच्या विटेला लागेल." " ते कसे? अधिक जड वीट अधिक वेगाने कमी वेळात खाली येईल असे वाटते." शिष्य म्हणाले. " समजा मी मनोर्‍यावर उभा आहे. माझ्या डाव्या हातात १ किलोची वीट आहे.उजव्या हातातही १ किलोचीच वीट आहे. प्रथम ही वीट मी सोडली. ती तीन सेकंदांत खाली आली. आता डाव्या हातातील सोडली. तिला किती वेळ लागेल? " "तीन सेकंदच. ती १ किलोचीच आहे ना? " "ठीक. आता दोन हात जवळ आणतो. दोन विटांत चार बोटें अंतर ठेवून दोन्ही एकाच वेळी अशा उभ्या खाली सोडतो. आता काय होईल?" "दोन्ही विटा एकाच वेळी खाली येतील. त्यांच्यात चार बोटे अंतर ठेवा की अर्धे बोट ठेवा, वेळ बदलणार नाही." " छान! आता दोन विटा एकमेकींना चिकटूनच एकदम खाली सोडतो. काय होईल?" "दोन्ही एकाच वेळीं म्हणजे ३ सेकंदांतच खाली येतील." सगळे शिष्य एका सुरात म्हणाले. "हो ना? अरे एकमेकींना चिकटून ठेवलेल्या एक-एक किलोच्या दोन विटा म्हणजे म्हणजे २ किलोची एक वीट नव्हे काय? म्हणजे २ किलोची वीटसुद्धा तीन सेकंदांतच खाली येईल हे सिद्ध होत नाही का? विचार करा. " "अरेच्चा! खरेच की! ! पण तसे बुद्धीला पटत नाही." " तर आता मनोर्‍यावर जा आणि दक्षतापूर्वक प्रयोग करा.मी सांगितलेले तत्त्व खरे आहे की नाही ते ठरवा. माझी तर्कबुद्धी सांगते की ते खरे आहे. पण ते चुकीचे असूं शकेल." आपण जाणतो की गॅलीलिओचे तत्त्व अबाधित आहे. तर्कसुसंगत विचार करण्याची वैज्ञानिक पद्धती अशी असते. विज्ञानाचे अभूतपूर्व यश आणि अल्पकाळातील आश्चर्यजनक प्रगती यांच्या मुळाशी ही वैज्ञानिक पद्धत आहे. २) गंगाजल आणि यमुनाजल " हे पाहा इथे ठेवले आहे काचपात्र "अ", धारकता ३०० मिली. यात २५० मिली शुद्ध गंगाजल आहे." " कळले. ते दुसरे तसेच दिसणारे काचपात्र "ब" का? " " हो. त्यात २५० मिली शुद्ध यमुनाजल आहे." "ठीक. आता पुढे ?" " एका मोजपात्रात "ब" तील २० मिली य.ज. घेतले. ते "अ" तील गं.ज.मधे मिसळले. नंतर "अ" मधून नेमके २० मिली मिश्रण मोजपात्रात घेऊन "ब" मध्ये मिसळले." " समजले सगळे. आता दोन्ही पात्रांत मिश्रणे आहेत." " छान ! पण "अ" भांड्यात थोडे यमुनाजल आले आहे. तर "ब" त कांही गंगाजल गेले आहे. प्रश्न असा आहे की "अ" मधील य.ज. अधिक की "ब" मधील गं.ज. अधिक? की दोन्ही समान?" "समान नसावीत. कारण "अ" मध्ये २० मिली. शुद्ध यमुनाजल घातले, तर "ब" त २० मिली मिश्रण टाकले. या दोन कृती एकरूप नाहीत. त्यामुळे "अ" पात्रात आलेले यमुना जल हे "ब" पात्रात गेलेल्या गंगाजलाहून अधिक असावे असे मला वाटते. तरीपण निश्चितीसाठी काही अंकमोड करावी हे बरे." " असे म्हणता ? आता माझ्या प्रश्नांची विचारपूर्वक उत्तरे द्या. प्रारंभी आणि आता "अ" मधील द्रवाची पातळी तीच आहे ना? " "निश्चितच . २० मिली पाणी आले. २० मिली पाणी गेले." " प्रथम अ मध्ये य.ज. नव्हते. आता आहे. पातळी न बदलता ते "अ" पात्रात कसे मावले?" "अहो, अ पात्रातील काही गं.ज. गेले नाही का? त्यामुळे जागा झाली. त्यात य.ज. बसले." " वा ! छान. गेलेल्या गं.ज.पेक्षा आलेले य.ज. कमी किंवा अधिक असते तर द्रवाची पातळी बदलली असती ना? ती बदलली नाही. यावरून काय निष्कर्ष निघतो?" " जेवढे यमुनाजल आले तेवढेच गंगाजल गेले." " ते कुठे गेले? "ब" पात्रात ना? म्हणजे आता "अ" पात्रात जेवढे यमुनाजल आहे तेवढेच गंगाजल "ब" पात्रात आहे असे सिद्ध झाले. हो ना? " "हो. तसे पटते. पण ..." " अजून पण? बरे, बरे. अधिक सोपे करूया. ’अ" पात्रात २५० मिली शुद्ध गंगाजल,"ब" त तेवढेच यमुनाजल इथून परत विचार करू. समजा "अ" मधील पाण्याचे बिंदू गोठले. त्यांचे निळ्या रंगाचे छोटे छोटे एकाच आकाराचे १०,००० गं.ज.मणी झाले. तसेच "ब" मधील पाण्याचे पांढर्‍या रंगाचे १०,हजार य.ज. मणी झाले." " आता ही काय भानगड ? " " काही नाही. समजण्यासाठी केवळ कल्पना करायची." " हं ! कल्पना केली." " आता "ब" मधील २०० शुभ्र मणी काढून ते "अ" मधील मण्यांत मिसळले.पात्र हालवले. मग "अ" तील २००मिश्रमणी काढून ते "ब" पात्रात टाकले. आता दोन्ही पात्रांत प्रत्येकी १०,००० मणी आहेत." "कळले. कळले. "अ" पात्रात जितके य.ज.मणी आहेत तितकेच गं.ज. मणी "ब" भांड्यात आहेत. म्हणजे असलेच पाहिजेत." "समजले ना ?" "न समजायला काय झाले? सोपे तर आहे. पण ते भांडे हालवणे आवश्यक आहे का?" "शाबास ! कळलेच म्हणायचे सगळे." ** हे जग आहे तसे समजून घेणे , निसर्गाचे नियम शोधणे, निसर्गाच्या शक्तींचे आकलन करून घेणे, नैसर्गिक आपत्तींचे संभाव्य धोके ओळखून त्यांपासून मानवी जीवनाला सुरक्षित ठेवणे असा विज्ञानाचा प्रयत्‍न असतो. हे वैज्ञानिकांचे निसर्गाशी युद्ध नाही. निसर्गाला जाणून त्याच्याशी जुळवून घेत जीवन सुरक्षित ठेवण्याची धडपड आहे. अशा संकटातून आपल्याला वाचवणारा कोणी परमेश्वर असित्वात नाही. कितीही आळवणी करा, "धाव रे धाव आता" ! असे म्हणत कितीही काकुळतीला या, काहीही उपयोग होत नाही. संकटात धावून येणारा देव केवळ धर्मग्रंथातील काल्पनिक कथेत असतो. वास्तवात नसतो. माणसाने संशोधित केलेले विज्ञानच कामी येते. हे स्पष्ट झाले आहे. या प्रयत्‍नांत विज्ञान बर्‍याच अंशी यशस्वी ठरत आहे. आंध्रप्रदेशात आलेल्या पायलीन महावादळाच्या वेळी याची प्रचीती आली. संभाव्य वादळाचा अभ्यास, निरीक्षणे आणि गणिते करून वैज्ञानिकांनी तीन दिवस आधी शासनाला वादळाची पूर्वकल्पना दिली. त्यामुळे सहस्रावधी माणसांचे आणि गाई-गुरांचे प्राण वाचू शकले हा (२०१३)चा अनुभव आहे. ज्ञानप्राप्तीचा सध्या ज्ञात असलेला एकमेव विश्वासार्ह मार्ग म्हणजे ही वैज्ञानिक पद्धत. अन्य कोणत्याही मार्गाने सत्यज्ञान प्राप्त होत नाही. साक्षात्कार, आत्मानुभूती, समाधी, सद्गुरूने साधकाच्या डोक्यावर हात ठेवून तोंडाने मंत्र पुटपुटल्याने होणारे ज्ञानसंक्रमण (शक्तिपात) या सर्व भ्रामक गोष्टी आहेत. ज्याचा-त्याचा व्यक्तिनिष्ठ अनुभव म्हणजे सत्यज्ञान नव्हे. ते वस्तुनिष्ठ,सार्वत्रिक आणि स्थल-काल-व्यक्ति निरपेक्ष असावे लागते. वैज्ञानिक पद्धती परिपूर्ण नसेल पण गेल्या कांही शतकांत ती अधिकाधिक विकसित होत गेली आहे. विज्ञानाने अनेक सत्ये शोधून काढली आहेत. त्यांमुळे माणसाचे जीवन सुखी, सुविधापूर्ण आणि सुरक्षित झाले आहे. पण विज्ञानाने "अंतिम सत्य" शोधले आहे असा दावा कोणी करीत नाही. " माणूस परिपूर्ण नाही. म्हणून त्याचे संशोधन परिपूर्ण नाही. अंतिम नाही. त्यात सतत सुधारणा होत राहील. " असे वैज्ञानिक सांगतात. तर आमच्या धर्माला अंतिम सत्य गवसले आहे. (काय बरे असते हे अंतिम सत्य?) तो आकाशातील प्रभूचा संदेश आहे. तो अल्लाचा पैगाम आहे. तो प्रत्यक्ष भगवंताचा शब्द आहे. असे आध्यात्मिक लोक म्हणतात. विज्ञानाचा निसर्गाशी सतत संबंध येतो. निसर्गाच्या आश्चर्यकारक वैविध्याविषयीं विज्ञान आदर व्यक्त करते. निसर्गाच्या अभ्यासातून एखाद्या तत्त्वाचे, निसर्गनियमाचे आकलन झाले की वैज्ञानिकांना, निसर्गाच्या विराट रूपाशी एकरूप झाल्याचा प्रत्यय येतो. आणि ते आनंद व्यक्त करतात. या संदर्भात "हीरो राजाचा सुवर्ण मुकुट आणि आर्किमेडीज " ही सुपरिचित गोष्ट आठवते. पाण्याच्या टबात स्नान करताना आर्किमेडीजला एका निसर्गनियमचा साक्षात्कार झाला. त्यासरशी तो, "युरेका ! युरेका ! !" असे आनंदोद्गार काढीत निसर्गाला भेटण्यासाठी नैसर्गिक अवस्थेत बाहेर पडला. एका वैज्ञानिकाचा हा आनंदसोहळा होता. आपण ही गोष्ट शालेय पुस्तकात वाचतो. वर्गात शिकतो. पण आर्किमिडीजपुढे नेमकी कोणती समस्या होती ? त्याने ती कशी सोडविली? सुवर्णकाराने मुकुटातील सोन्यात हिणकस धातू मिसळला आहे हे राजदरबारातील विद्वानांना सप्रयोग कसे पटवून दिले ? या प्रश्नांचा विचार क्वचितच कोणी केला असेल. प्रत्येकाने स्वत:च्या मनाशी विचार करावा. आपल्याला तेव्हा समजले होते का? शिक्षकांनी कधी समजावून सांगितले होते का? तर्ककठोर विचार करणारे वैज्ञानिक भावनाशून्य असतात, असे काही जणांना वाटते. पण तसे नसते. किंबहुना प्रत्येक वैज्ञानिक हा संवदनशील असतोच. मात्र आपल्या भावनांवर तो बुद्धीचे नियंत्रण ठेवतो. भावनांच्या आहारी जात नाही. त्या अस्थानीं प्रकट करीत नाही. विज्ञान समजून घेणे अवघड असेल. अनेक वर्षे मनात जोपासलेल्या आपल्या आवडीच्या संकल्पना वैज्ञानिक शोधांमुळे खोट्या ठरल्या असतील .विज्ञानातून विकसित झालेल्या तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या वस्तू राज्यकर्त्यांना आणि उद्योजकांना उपलब्ध झाल्यावर त्या वस्तूंचा समाजविघातक असा दुरुपयोग होत असेल. पण विज्ञान जे सांगते ते करून दाखविते . प्रत्यक्षात आणते. हे कोणालाही मान्य करावेच लागेल. धर्ममार्तंड, योगगुरू, आध्यात्मिक गुरू असे लोक अनेक दावे करत असतात. अग्निहोत्र केल्याने वातावरण शुद्ध होते, हठयोगाने अष्टसिद्धी प्राप्त होतात, सूक्ष्म देह धारण करून अदृश्य होता येते. मंत्रजपाने अतींद्रिय शक्ती प्राप्त होते. दुसर्‍याच्या मनातील विचार जाणता येतात. मनसामर्थ्याने आपले विचार दूरस्थ व्यक्तीच्या मनात प्रकट करता येतात. ॐ काराच्या गुंजनाने प्रचंड ऊर्जा निर्माण होते. गायत्री मंत्राच्या जपाने अलौकिक शक्ती प्राप्त होते. अशा अनेक गोष्टी सांगतात. पण प्रत्यक्ष प्रयोग करून यांतील एकाची तरी प्रचीती दाखवा असे आव्हान दिल्यावर ,"हे धर्मग्रंथात लिहिले आहे, भगवंतांनी स्वमुखे वर्णिले आहे, त्रिकालज्ञ ऋषिमुनींनी सांगितले आहे," असे म्हणून गप्प बसतात. धर्ममार्तंड जे सांगतात , ग्रंथांत जे काही लिहिले आहे त्याचा कोणाला कधी अनुभव आल्याची विश्वासार्ह अशी एकही ऐतिहासिक नोंद नाही. आपल्या देशावर अनेक इस्लामी आक्रमणे झाली. त्यावेळी मंदिरांतील कैक मूर्ती आक्रमकांनी फोडल्या. पण कोण्या धर्माभिमान्याने योगसिद्धीचा, मंत्रजपाचा अथवा अन्य कोणत्या कर्मकांडाचा प्रयोग करून मूर्ती वाचविल्याचे अथवा भंग झालेली मूर्ती पुन: जोडल्याचे एकही उदाहरण नाही. विज्ञान आपला प्रत्येक नियम, प्रत्येक तत्त्व सिद्ध करून दाखविते. किंबहुना जे सिद्ध होऊ शकत नाही त्याला विज्ञानात स्थानच नसते. विज्ञानाला इतकी सफलता कशी मिळते? वैज्ञानिक ज्ञान इतके विश्वासार्ह का ठरते ? याचे प्रमुख कारण म्हणजे विज्ञानात अंगभूत असलेली स्वयं दोषनिवारण यंत्रणा. तसेच विज्ञानात सर्व प्रकारच्या शंकांचे, प्रश्नांचे स्वागत होते. विज्ञानात पवित्र ,पूजनीय, अपरिवर्तनीय असे काही नसते. नवनवीन कल्पनांना तिथे मुक्तद्वार असते. त्याच बरोबर प्रत्येक कल्पनेचे कठोर परीक्षणही होते. या सर्वांचा सुपरिणाम म्हणून विज्ञान अधिकाधिक विश्वासार्ह बनते. बहुसंख्य माणसांनी पवित्र मानलेल्या पिढ्यानुपिढ्या उराशी बाळगलेल्या श्रद्धा जेव्हा विज्ञाननिष्ठ विचारसरणीपुढे खोट्या ठरतात, माणसाच्या ऐहिक प्रगतीला बाधक ठरतात तेव्हा विज्ञानप्रेमी व्यक्ती त्या श्रद्धांवर टीका करतात. त्या अज्ञानातून जन्माला आलेल्या आहेत, माणसाने त्या सोडून द्यायला हव्या असे सांगतात. त्याने श्रद्धावंतांच्या भावना दुखावतात. खरे तर त्यांच्या श्रद्धा जर दृढ असतील,अतूट असतील तर त्यांना वैज्ञानिकांची टीका हास्यास्पद वाटायला हवी. त्यांनी त्या टीकेकडे दुर्लक्ष करायला हवे अथवा तिचा प्रतिवाद करायला हवा. पण तसे न होता त्यांच्या भावना दुखावतात. कारण वैज्ञानिकांचे तर्कशुद्ध म्हणणे त्यांच्या बुद्धीला पटते. पण पूर्वसंस्कारांमुळे त्यांची भावना ते मानत नाही. परिणामी हे खरे की ते खरे अशा द्विविधेत ते पडतात. त्यामुळे विज्ञान अहंकारी आहे, उद्दाम आहे आमच्या धार्मिक भावनांचा आदर ठेवीत नाही असे म्हणतात. खरे तर विज्ञान हे मानवतेचा एक अविभाज्य भाग आहे. आजचे तसेच भावी पिढ्यांचे जीवन अधिकाधिक सुविधापूर्ण , सुखी, समाधानी, आनंदी आणि सुरक्षित व्हावे, संस्कृती समृद्ध व्हावी, सर्वांची ऐहिक प्रगती व्हावी, अन्न-वस्त्र-निवारा-शिक्षण-आरोग्य या अत्यावश्यक प्राथमिक सुविधांपासून कुणीही वंचित राहू नये, निसर्गाचे संवर्धन करावे, पर्यावरणाचे संतुलन राखावे, ही विज्ञानाची प्राथमिक उद्दिष्टे आहेत. मात्र त्यासाठी भ्रामक, अज्ञानमूलक, गोष्टींच्या मागे न लागता विज्ञानसिद्ध, व्यावहारिक, उपयुक्त मार्गांचा अवलंब करावा असे विज्ञानाचे सांगणे असते. त्यांत अहंकार, उद्दामपणा नसतो. विज्ञान सांगते ते सत्यकथन असते. स्वातंत्र्य-समता-बंधुता-प्रेम या मूलभूत मानवी मूल्यांचा विज्ञान आदर करते. आपले विचार दुसर्‍यांवर लादावे असे विज्ञानाला कधीही वाटत नाही. मात्र इतरांना वैज्ञानिक विचार पटावे, त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करावा असे वैज्ञानिकांना अवश्य वाटते. माणूस परिपूर्ण नाही, त्याच्या हातून चुका होण्याचा संभव असतो याची जाणीव विज्ञानाला सदैव असते. प्रत्येक निसर्ग नियम माणसानेच शोधून काढला आहे. तो अंतिम नाही. अपरिवर्तनीय नाही. त्यात सुधारणा संभवतात. असेच विज्ञान मानते. प्रस्थापित विज्ञान नियमातील त्रुटी, मर्यादा निदर्शनाला आणणार्‍या, त्यांत सुधारणा घडवून आणणार्‍या वैज्ञानिकाचा विज्ञान स्वागत करते. सत्कार करते. याचे एक उदाहरण असे: न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत म्हणजे मानवी प्रजातीच्या प्रज्ञेची उत्तुंग झेप, अपूर्व उपलब्धी होय असे सार्थपणे मानले जाते. सूर्य-चंद्र ग्रहणे, कोणत्या दिवशी, नेमक्या कोणत्या वेळी, जगात कुठे, कशी दिसतील याची अचूक गणिते या सिद्धांताच्या आधारे आपण गेली तीनशे वर्षे करीत आहोत. याच नियमाच्या आधारे प्रक्षेपित केलेली आपली अंतराळयाने कित्येक महिने लक्षावधी किलोमिटरचा प्रवास करून ठराविक दिवशी, अवकाशातील नियोजित जागी पूर्व नियोजित कक्षेत , नेमक्या स्थानी पोहोचतात. यातील अचूकता आश्चर्यकारक, अचंबित करणारी आहे. आपण कोणता सिद्धांत मांडतो आहोत याची न्यूटनला पूर्ण कल्पना होती असेच म्हणावे लागते. न्यूटनची महानता शब्दातीत आहे. न्यूटनच्या या नियमापुढे वैज्ञानिक नतमस्तक झाले. पण त्यांनी त्याला तसे सोडले नाही. या नियमात कुठेतरी बारीक फट असेल का? त्रुटी असेल का? हा वैश्विक नियम सर्वकाळी, सर्वस्थळी, कोणत्याही परिस्थितीत अबाधित राहील का? याविषयी ते विचार करू लागले. वस्तूचा वेग अति प्रचंड असेल, गुरुत्वाकर्षण बल कित्येक पटीनी अधिक असेल तर न्यूटनचा नियम पूर्णांशाने खरा ठरणार नाही असे गणिते करून लक्षात आले. अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांत आणि विशेष सापेक्षता सिद्धांत यांचा जन्म या संशोधनातून झाला. प्रत्यक्ष खगोलीय निरीक्षणांतून या दोन नवीन सिद्धांतांना पुष्टी मिळाली. अंतराळ संशोधनाच्या गणितात न्यूटनचा नियम आजही उपयोगी पडतो. तोच वापरतात. पण असामान्य वेग आणि अतिबलवान गुरुत्वाकर्षण अशा क्वचित् आढळणार्‍या परिस्थितीत तो अपुरा पडतो. आईन्स्टाइनच्या सिद्धांतानुसार न्यूटनच्या गणितात सुधारणा करावी लागते. न्यूटनच्या महान सिद्धांतातील त्रुटी आणि त्याच्या मर्यादा आईन्स्टाइनने स्पष्ट केल्या. विज्ञान क्षेत्रात त्याचे केवढे तरी मोठे स्वागत झाले. आईनस्टाइनचे नाव अजरामर झाले. पण त्याचे हे सापेक्षतेचे सिद्धांत तरी त्रिकालाबाधित असतील का? वैज्ञानिक तसे मानत नाहीत. संशोधन चालू आहे. आता पुंज यामिकीच्या (क्वांटम मेकॅनिक्स) गणिताने पुढे काय नवीन आढळेल न कळे. "आमच्या धर्मग्रंथात काही चुका असू शकतील. त्रुटी आढळू शकतील." असे जगातील एकतरी धर्मगुरू कधी म्हणेल काय? कुठल्याही धार्मिकाला असे कधी वाटेल काय? "आम्ही अज्ञ बालके आहोत. हीन-दीन-पतित आहोत. दुर्बळ आहोत." असे देवापुढे म्हणायचे. जे श्रुति-स्मृति-पुराणोक्त आहे ते सगळे त्रिकालाबाधित सत्य मानायचे. आपण चिकित्सा करायचीच नाही. कोणी केली आणि श्रद्धेतील निरर्थकता सप्रमाण दाखवून दिली की आमच्या भावना दुखावल्या म्हणून चवताळून उठायचे आणि सत्य सांगणार्‍याचा जीव घ्यायला धावायचे. अशाने धर्मात सुधारणा होऊ शकेल काय? आजवर ज्या धार्मिक सुधारणा झाल्या त्या धर्म न मानणार्‍या समाजसुधारकांनी राज्यकर्त्यांकडून करवून घेतल्या. त्या सुधारणांना धर्मिकांनी कायम विरोध केला. अगदी सतीबंदी कायद्याला सुद्धा. आज विज्ञान हेच माणसाचे आशास्थान आहे. विकसनशील देशांना अंधश्रद्धा, दारिद्र्य, अज्ञान, मागासलेपणा, यांच्या विळख्यातून बाहेर बाहेर पडण्यासाठी विज्ञानाचा प्रसार,वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार , हाच एक विश्वसनीय मार्ग आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि नागरीकरणाला चालना मिळू शकेल. ज्या देशांत विज्ञानाचा अव्हेर करून देव-धर्माचे ,अंधश्रद्धांचे स्तोम माजते ते देश आर्थिकदृष्ट्या मागासलेले राहातात. भारतात हा धोका आज वाढत आहे. ................................................................................................................................
वर्गीकरण
वर्गीकरण

122 टिप्पण्या 34,680 दृश्ये

Comments

DEADPOOL नवीन

आपला मान ठेऊन!!!! लेखणीला आवर घाला. हिंदूधर्म म्हणजे जगातील सर्व समस्यांचे आगार नव्हे. जरा विचाराने मोठे व्हा. डोळे उघडा आणि आपल्या धर्मातली बलस्थाने शोधा!

एस नवीन

बहुसंख्य माणसांनी पवित्र मानलेल्या पिढ्यानुपिढ्या उराशी बाळगलेल्या श्रद्धा जेव्हा विज्ञाननिष्ठ विचारसरणीपुढे खोट्या ठरतात, माणसाच्या ऐहिक प्रगतीला बाधक ठरतात तेव्हा विज्ञानप्रेमी व्यक्ती त्या श्रद्धांवर टीका करतात. त्या अज्ञानातून जन्माला आलेल्या आहेत, माणसाने त्या सोडून द्यायला हव्या असे सांगतात. त्याने श्रद्धावंतांच्या भावना दुखावतात. खरे तर त्यांच्या श्रद्धा जर दृढ असतील,अतूट असतील तर त्यांना वैज्ञानिकांची टीका हास्यास्पद वाटायला हवी. त्यांनी त्या टीकेकडे दुर्लक्ष करायला हवे अथवा तिचा प्रतिवाद करायला हवा. पण तसे न होता त्यांच्या भावना दुखावतात. कारण वैज्ञानिकांचे तर्कशुद्ध म्हणणे त्यांच्या बुद्धीला पटते. पण पूर्वसंस्कारांमुळे त्यांची भावना ते मानत नाही. परिणामी हे खरे की ते खरे अशा द्विविधेत ते पडतात. त्यामुळे विज्ञान अहंकारी आहे, उद्दाम आहे आमच्या धार्मिक भावनांचा आदर ठेवीत नाही असे म्हणतात.
सहमत. त्याचबरोबर विज्ञान कसे स्वमर्यादा ओळखून आणि परिवर्तनीय असते हेही स्पष्ट केले असल्याने लेख संतुलित झाएला आहे.

जानु नवीन

आपण म्हणता त्यानुसार ईतका तर्कसंगत आणि कठोर चिकित्सामक दृष्टीकोन ठेवला तर मला तरी माझे सामाजिक जीवन आणि पर्यायाने वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक असे सर्व संबंध पणाला लावावे लागतील असे मला वाटते. त्यामु़ळे आपला धागा हा फक्त वाचण्यासाठी योग्य असे मला तरी वाटते.(हे मत आपल्या समस्त लेखनास आहे.)
म्हणजे पुराणातील वांगी पुराणात. (या उदाहरणाबाबत क्षमस्व मला वैज्ञानिक उदाहरण सापडले नाही.)

अर्धवटराव नवीन

विज्ञानदिनाच्या निमीत्ताने लिहीताना सुद्धा करपट ढेकरा का सुचतात कळत नाहि. असो. "एका नवसंप्रदायाची फिजुल पायाभरणी" यापलिकडे लेखाला काहिही किंमत नाहि.

गामा पैलवान नवीन

यनावाला, लेखातलं हे विधान आजिबात म्हणजे आज्जिब्बात पटलं नाही : >> जे श्रुति-स्मृति-पुराणोक्त आहे ते सगळे त्रिकालाबाधित सत्य मानायचे. आपण चिकित्सा करायचीच नाही. अहो, बुद्धीप्रामाण्य हे तर हिंदू धर्माचं प्रमुख अंग आहे. बघा आदिशंकराचार्य काय म्हणताहेत. ते सांगतात की शेकडो श्रुतींनी म्हंटलं की अग्नी थंड आणि अप्रकाशित असतो, तरी मी फक्त माझ्या अनुभवावरच विश्वास ठेवेन. सांगायचा मुद्दा काये की जिथवर इंद्रिये पाहू शकतात तिथवर बुद्धीप्रामाण्य ग्राह्य आहे. मात्र या बुद्धीप्रमाण्याचा सरसकट बुद्धीप्रामाण्यवाद बनवणे हिंदूंना आवडत नाही. आ.न., -गा.पै.

गामा पैलवान नवीन

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रघा, दाभोलकरांच्या लेखाबद्दल धन्यवाद. वाचला. पटला. पण दाभोलकर स्वत: आर्थिक अफरातफर करणारे असल्यामुळे त्यांच्या कथनास वजन प्राप्त होत नाही. आ.न., -गा.पै.

तर्राट जोकर नवीन

In reply to by गामा पैलवान

स्वत: आर्थिक अफरातफर करणारे असल्यामुळे त्यांच्या कथनास वजन प्राप्त होत नाही. >> विण्टरेस्टींग. अफलातून लॉजिक आहे. आय होप तुम्ही हे लॉजिक सर्व बाबतीत पाळता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

In reply to by प्रचेतस

पुरावे दिले पाहिजेत. -दिलीप बिरुटे

प्रकाश घाटपांडे नवीन

In reply to by गामा पैलवान

आपण सोयी साठी दाभोलकरांचे लेखन व दाभोलकर ही व्यक्ती वेगळ्या करु. आपणाला वरील लेखातील लेखन पटण्यासारखे वाटले. परंतु व्यक्तीविषयी आक्शेप आहेत. जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत ती व्यक्ती निर्दोष आहे असे मानले जाते.अफरातफर हा दाभोलकरांचे विचार मान्य नसलेल्या लोकांनी केलेला आरोप आहे.तो त्यांच्या हयातीत देखील केलेला आहे. प्रत्येक महापुरुषावर असे आरोप झालेले आहेत.ज्या लोकांनी दाभोलकरांचे जीवन प्रत्यक्ष पाहिले आहे त्यांना हे मान्य होणार नाही.मग ते त्यांच्या विचारांचे असोत वा नसोत. त्यांच्यावरील आरोपामुळे तात्विक विवेचनात बाधा येत नाही.

एस नवीन

In reply to by गामा पैलवान

बेछूट आरोप करत सुटायचे म्हणजे विरोधकांचे खच्चीकरण आपोआप होते. येनकेनप्रकारेण त्यांची मुस्कटदाबी करायची. याचे उदाहरण म्हणजे हा प्रतिसाद आहे. सदर प्रतिसादकाचा मी तीव्र निषेध करतो. आणि पुराव्यादाखल काय दिलेय तर हिंदूजागृतीसारख्या फॅसिस्ट संस्थळावरचा लेख. वा!

बॅटमॅन नवीन

In reply to by गामा पैलवान

याच न्यायाने उद्या मग धर्माच्या नावाखाली दंगल, जाळपोळ किंवा धुलाई करणार्‍यांनीही धर्माबद्दल बोलू नये असं म्हटलं तर चालेल का?

गामा पैलवान नवीन

In reply to by बॅटमॅन

अवांतर : बॅटमॅन, बाबरी मशीद हे नेमकं काय प्रकरण आहे? तिथे कोणीही नमाज पढत नव्हतं. मग ती मशीद कशी? आ.न., -गा.पै.

बॅटमॅन नवीन

In reply to by गामा पैलवान

मुसलमानांच्या धार्मिक स्थळाची नासधूस करणे या कलमाखाली हे कृत्य नक्कीच येते. बाकी जाणूनबुजून अज्ञानाचा आव आणणे चालू द्या.

गामा पैलवान नवीन

In reply to by बॅटमॅन

अवांतर : बॅटमॅन, वादग्रस्त वास्तू राममंदिर होतं. जे हिंदूंनी पाडलं. मुस्लिम तिथे कधीच नमाज पढले नाहीत. कारण त्या वास्तूत किबला (= मक्केचा दिशादर्शक दगड) नव्हता. आ.न., -गा.पै. टीप : हे फारंच अवांतर होतंय का?

स्वप्नांची राणी नवीन

नेमके आणी तर्कसंगत !! तुमचया ईतर सगळयाच लेखांसारखाच हा ही अतिशय आवडला आणी पटला. तर्कट नाती सांभाळत बसण्यापेक्षा अशा तर्क शुद्ध विचारसरणी मुळे आयुष्य अधिक सोपे आणी अर्थपूर्ण होते असाच अनुभव आहे. तुम्हाला ही विज्ञानदिना निमित्त हार्दिक शुभेच्छा..!!!

पॉइंट ब्लँक नवीन

आजचे तसेच भावी पिढ्यांचे जीवन अधिकाधिक सुविधापूर्ण , सुखी, समाधानी, आनंदी आणि सुरक्षित व्हावे, संस्कृती समृद्ध व्हावी, सर्वांची ऐहिक प्रगती व्हावी, अन्न-वस्त्र-निवारा-शिक्षण-आरोग्य या अत्यावश्यक प्राथमिक सुविधांपासून कुणीही वंचित राहू नये, निसर्गाचे संवर्धन करावे, पर्यावरणाचे संतुलन राखावे, ही विज्ञानाची प्राथमिक उद्दिष्टे आहेत
जोक ऑफ द डे! जर तुमचा तर्क जर जास्त सिरियसली घेतला आणि तुमच्या स्टाइलनं विज्ञानाला लावला तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा रहाणार नाही. कारण विज्ञाना आणि प्रगतीच्या नावावर जो निसर्गाचा नाश गेल्या चारशे वर्षात झाला आहे तेव्हढा धर्माला पाच हजार वर्षात करायला जमला नाही. ( हा मुद्दा नाही फक्त तर्क चुकीच्या पद्धतीने वापरता येतं ह्याचं उदाहरण होत. ह्याला इंग्रजीत शैतानाचा वकील होणे असं म्हणतात! त्यामुळं ह्यावर वाद घालू नये) विज्ञानाचं लेखन धर्मावर टिका न करता होउ शकत नाही का? का वि़ज्ञानवादी होण्यासाठी नास्तिक असणं गरजेचं आहे? धर्माचा दुरुपयोग काही लोक करतात, म्हणून धर्म चुकीचा म्ह्णायचं असेल तर विज्ञानाच्या दुरुपयोगाची उदाहरणं कमी नाहीत. विज्ञानाचं धर्माशी काही वाकडं नाही. तुम्हचं धर्माशी शत्रत्व असेल तर त्यासाठी विज्ञान हत्यार म्ह्णून वापरू नका!.

प्रकाश घाटपांडे नवीन

In reply to by पॉइंट ब्लँक

विज्ञानाचं लेखन धर्मावर टिका न करता होउ शकत नाही का? का वि़ज्ञानवादी होण्यासाठी नास्तिक असणं गरजेचं आहे?
हा कळीचा मुद्दा आहे. यनावालांच्या धाग्यांवर अन्यत्र याची चर्चा झालेली आहे.

चेक आणि मेट नवीन

आस्तिकांचे मतपरिवर्तन करणे ही पहिली चूक(कारण ते हाडाचे आस्तिक असतात). आणि देवधर्म यामुळे जगाची हानी(वेळ,पैसा वाया जाणे)होते म्हणून सांगणे ही दुसरी चूक. अशी एक वेळ येईल तेव्हा लोक स्वतः नास्तिक बनतील,त्यामुळे व्यर्थ श्रम करू नका. तोपर्यंत हा शांतीमंत्र घ्या↓ ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: । भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: । स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभि: व्यशेम देवहितं यदायु: ।।

होबासराव नवीन

तुमच्या लेखातले फक्त टॉवर ऑफ पिसा चे उदाहरण का काय तिथ पर्यंतच वाचु शक्लो. काका आमाले बि शिष्य बनवा ना जि...मि बि जातो ना मंग टॉवर ऑफ पिसा वर माल्या कडे त एक लय मोठ्ठि एक शिळा हाय 'स्व' गवसलेलि ते जरा फेकुन बघतो म्हणतो त्या टॉवर ऑफ पिसा वरुन्...पायतो का ते खालि किति तासात पोचते का मंग पोचतच नाहि..हा मंग 'स्व' गवसल्यावर एक परकारचि निराकारता येते जि मनुष्याला वायु पेक्षा तरल बनवते म्हन्त्यात. टुकार प्रतिसाद ;)

मितभाषी नवीन

लेख आव्डला. तुमच्या लेखांमुळे दुकानदारांचा थयथयाट वाढला याचा अर्थ लेख दखलपात्र आहे.

मुक्त विहारि नवीन

........अंधश्रद्धांचे स्तोम माजते ते देश आर्थिकदृष्ट्या मागासलेले राहातात." फक्त आर्थिकच नाही तर, सामाजीक आणि वैचारीक दृष्ट्यापण मागासलेलेच राहतात. जावूदे.... मिपा हेच मंदिर आणि येथील उत्तम लेखक हेच, आमचे देव.

यनावाला नवीन

विज्ञानदिनाच्या निमित्ताने या लेखातून नास्तिकवादाचा प्रचार केला आहे असा कांही सदस्यांचा समज झालेला दिसतो. या लेखनात उपदेश नसतो. कसला प्रचार नसतो. "देव मानू नका. पूजा करू नका. विज्ञानाचा अंगीकार करा." अशी आज्ञार्थी वाक्ये नसतात. जे बुद्धीला पटते, अनुभव-विवेकाला कळते ते लेखनात मांडतो. स्वीकारावे की नाकारावे हे वाचकांवर असते. "स्वबुद्धीने विचार करावा" असे एक विध्यर्थी वाक्य असते. या लेखाच्या प्रतिसादांत कांही सदस्यांनी
,"लेखणीला आवर घाला", "विचाराने मोठे व्हा." , "डोळे उघडा","बलस्थाने शोधा."व्यर्थ श्रम करू नका."," हा शांतिमंत्र घ्या".
अशा उपदेशपर आज्ञा दिल्या आहेत.असो. प्रत्येकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे. "जो जे वांच्छिल तो ते लिहो।"

तर्राट जोकर नवीन

In reply to by यनावाला

या लेखनात उपदेश नसतो. कसला प्रचार नसतो. "देव मानू नका. पूजा करू नका. विज्ञानाचा अंगीकार करा." अशी आज्ञार्थी वाक्ये नसतात. >> एखाद्या विचाराच्या प्रचारासाठी 'अमुकच करा' असा आदेश दिला पाहिजे असे नसते. ह्याचे साधे उदाहरण म्हणजे महिलांनी अंगभर नीट कपडे घाला असे स्पष्ट न म्हणता बुडणार्‍या संस्कृतीच्या नावाने बोंबा मारणे असते. ज्याचा गर्भित अर्थ महिलांनी नीट कपडे घालावे असा असतो. प्रचारात 'माझेच ऐका' अशा आज्ञार्थी वाक्यांची आवश्यकता नाही. दुसरा कसा त्याज्य आहे हे रेटून सांगणे एवढेही पुरते. स्वबुद्धीने विचार करा. हे फार गोल्मोल वाक्य आहे. स्वबुद्धी म्हणजे नेमकी कोणती बुद्धी? स्वबुद्धीने विचार करणारे लोक फारच कमी आहेत जगात. अगदी कमी. बाकीचे कळप आहेत. स्वबुद्धीने विचार करा असे सांगण्यावर विश्वास ठेवणारेही कळपच. तुमच्या लेखनात विज्ञानवादी(?) हे बुद्धीमंत, इतर लोक बुद्धीहिन हा सतत असणारा गर्भित अर्थ क्मालीच्या साळसूदपणे मांडलेला असतो/आहे. एवढे सोडले तर तुमचे लिखाण वैज्ञानिक विचार प्रचारासाठी काय योगदान देतं ह्याबद्दल साशंक आहे. तरीसुद्धा लेखन आवडतं. मनोरंजन होतं. धन्यवाद.

Ram ram नवीन

आपला मान ठेवुन.......... मला तर धमकीच वाटली. अनेक चँनलवर साधु, बाबा लाेक पुराणातले, बायबल,इतर धर्मग्रंथातले दाखले देत असतात. विद्न्यानामुळे माणुस कसा वाईट झाल्याचे सांगत असतात, आश्चर्य असे वाटते की हे लाेक विद्न्यानाचे सर्व फायदे उपभाेगत असतात

गामा पैलवान नवीन

प्रचेतस, दाभोलकरांच्या परिवर्तन न्यासामध्ये अनेक गैरप्रकार झाले आहेत. स्वित्झर्लंडमधील स्विसएड नामे संस्थेकडून सेंद्रिय शेतीसाठी परिवर्तन न्यासास पैसे मिळाले आहेत. दाभोलकर अशी कुठली थोर शेती करीत होते की स्वित्झर्लंड मधून पैसा आणण्याची गरज पडावी? शिवाय या पैशांचा केवळ २०१० पर्यंतचाच हिशोब धर्मादाय आयुक्तांकडे सुपूर्द केला आहे. २०१० ते ऑगस्ट २०१३ मध्ये दाभोलकरांची हत्या होईपर्यंत (व नंतरही) किती पैसा आला हे कोणालाच माहीत नाही. तसेच ज्या कामासाठी पैसा आलाय त्या कामासाठीच तो वापरावा असा कायदा आहे. परिवर्तन न्यास सेंद्रिय शेतीसाठी आलेला पैसा इतर कामासाठी वापरतोय. कायदा धाब्यावर बसवणं कोणत्या प्रगतीशील तत्वांत बसतं? सामान्य माणसाच्या भाषेत याला फ्रॉड (=अफरातफर) म्हणतात. अधिक माहितीसाठी : https://www.hindujagruti.org/news/20475_dabholkar-s-scam-of-parivartan-nay-family-trust.html आ.न., -गा.पै. जाताजाता : स्विसएड म्हंजे काश्मीर पाकिस्तानात दाखवणारी कंपनी बरंका. (आरडाओरडा झाल्यावर तो नकाशा हटवला.)

प्रचेतस नवीन

In reply to by गामा पैलवान

हिंदुजनजागृतीचे नाव पाहूनच डोळे पाणावले. तिथे अशा फालतू आरोपांव्यतिरिक्त अजून काय असणार?

गामा पैलवान नवीन

In reply to by प्रचेतस

प्रचेतस, तुम्ही धर्मादाय आयुक्तांकडे विचारणा करून परिवर्तन न्यासाचे हिशोब पाहायला मागवू शकता. हिंजसचे आरोप खरे का खोटे त्याचा प्रत्यक्ष पुरावा मिळेल. आ.न., गा.पै.

आनन्दा नवीन

In reply to by प्रचेतस

हिंदुजनजागृतीचे नाव पाहूनच डोळे पाणावले.
असो.. शेवटी सगळ्यांचेस पाय मातीचे. काय बोलणार

तर्राट जोकर नवीन

In reply to by गामा पैलवान

आता तुम्ही हिंदुजागृत्ती चा लेख पुरावा म्हणून देताय तर प्रश्नच मिटला की हो. :-) आरोप करणे फार सोपे काम आहे हो. आपण त्यासाठी तर श्रियुत केजरीवाल यांची रातंदिन खिल्ली उडवत असतो. मुद्दा आहे आरोप सिद्ध होण्याचा. ह्या बाबतीत कोणता निकाल लागला आहे?

प्रकाश घाटपांडे नवीन

In reply to by गामा पैलवान

काल च्या झी २४ तास मधे मुक्ता दाभोलकर ने परिवर्तन न्यासाने जे कायदेशीर आहेत अशाच देणग्या स्वीकारल्या आहेत. परदेशी फंड हा कायदेशीर आहे असा खुलासा अभय वर्तक यांना दिला आहे.

गामा पैलवान नवीन

प्रघा, >> आपण सोयी साठी दाभोलकरांचे लेखन व दाभोलकर ही व्यक्ती वेगळ्या करु. मान्य. पण बहुतांश लोकं तसं करंत नाहीत. त्यांच्या मते चोराच्या संगतीत वावरणारा चोरच असतो. आ.न., -गा.पै.

तर्राट जोकर नवीन

In reply to by गामा पैलवान

मान्य. पण बहुतांश लोकं तसं करंत नाहीत. त्यांच्या मते चोराच्या संगतीत वावरणारा चोरच असतो. >> तुम्ही नक्की असं मत मानता?

प्रकाश घाटपांडे नवीन

In reply to by गामा पैलवान

त्यांच्यावरील आरोपामुळे तात्विक विवेचनात बाधा येत नाही. गामा या मुद्द्यावर भाष्य केले नाहीत. मला त्याही पुढे जाउन असे म्हणायचे आहे की वादा साठी आपण असे गृहीत धरु की कोर्टात हे आरोप सिद्ध झाले त्यामुळे त्यांनी केलेल्या कार्याला बाधा येते काय? ते आपल्या जागी आहेच ना? जगात सर्व माणसे एका विचाराची असणे शक्य नाही हे आपण सर्व जण जाणतोच. जो तो आपापल्या विचारांचा प्रसार यथाशक्ती करत असतोच.

गामा पैलवान नवीन

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रघा, लालबहादूर शास्त्रींनी अपघाताची जबाबदारी स्वत: उचलून आपल्या रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. काय गरज होती? शास्त्रीजींनी काय आगळीक केली होती की रेल्वेस अपघात झाला? सार्वजनिक क्षेत्रात वावरतांना काही किमान सचोटी नको का? आ.न., -गा.पै.

तर्राट जोकर नवीन

In reply to by गामा पैलवान

सार्वजनिक क्षेत्रात वावरतांना काही किमान सचोटी नको का? >> गुजरात दंगलीबद्दल मुख्यमंत्र्यांची नैतिक जबाबदारी टाळणार्‍या व्यक्तिबद्दल आपले काय मत? (इथं दुसरीही उदाहरणं दिली असती पण तुम्ही राजकारणातलं दिलं म्हणून मीही तेच दिलं)

तर्राट जोकर नवीन

In reply to by तर्राट जोकर

वरील प्रतिसाद फक्त गापै यांच्यासाठी आहे. इतरांनी अजिबात मनावर घेऊ नये. अन्य्था विषयांतराचा धोका आहे. आ.न. तर्राट जोकर.

गामा पैलवान नवीन

In reply to by तर्राट जोकर

अवांतर : तजो, गोधरा हत्याकांड मोदींनी घडवून आणलं का? नाही ना? मग गोधऱ्याची प्रतिक्रिया म्हणून दंगली उसळल्या तर त्यात मोदींचा दोष काय? शिवाय न्यायालयाने तीन तीन वेळा चौकशी करूनही दंगलींत मोदींचा हात असल्याचा तसूभरही प्रथमदर्शी पुरावा हाती लागला नाहीये. थोडं मागे जाऊया. १९४६ साली हिंदू मुस्लीम दंगली उसळल्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी राजीनामे द्यावयास हवे होते काय? तशीही गांधींना काँग्रेस विसर्जित व्हायला हवीच होती. अ.न., -गा.पै.

तर्राट जोकर नवीन

In reply to by गामा पैलवान

हे हे हे हे. =)) रेल्वे अपघात काय शास्त्रींनी घडवला होता काय? तरीही त्यांनी नैतिक जबाबदारी घेउन राजीनामा दिला. त्याब्द्दल तुम्हाला कौतुक. इतके दिवस गुजरात पेटत राहिलं, मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारली काय? नाही. मला वाटतं त्याबद्दल त्यांनी अजूनही वैषम्यही प्रदर्शित केलेले नाही. त्याबद्दल काय? गुजरात दंगल मोदींनी घडवून आणली हे कोण म्हणतंय का यावर मोदीभक्त टपुनच बसलेले असतात. प्रश्नही असेच विचारतात.

प्रकाश घाटपांडे नवीन

In reply to by गामा पैलवान

सार्वजनिक क्षेत्रात वावरतांना काही किमान सचोटी नको का?
हवी ना! सचोटी ची नेमकी संकल्पना व किमान म्हणजे नेमकी किती या मुद्यांभोवती चर्चा फिरत राहते व मूळ लेखातील विवेचन दुर्लक्षित राहते. एनजीओ व त्याचे बदलते स्वरुप हा एक वेगळा विषय आहे. त्यावर आजचा सुधारक मासिकाने एक विशेषांक काढला होता. असो

सतिश गावडे नवीन

In reply to by प्रकाश घाटपांडे

एनजीओ व त्याचे बदलते स्वरुप हा एक वेगळा विषय आहे. त्यावर आजचा सुधारक मासिकाने एक विशेषांक काढला होता.
काका, हा विशेषांक जालावर उपलब्ध आहे का? नसल्यास छापिल प्रत कुठे मिळेल का?

प्रकाश घाटपांडे नवीन

In reply to by सतिश गावडे

जालावर उपलब्ध नाही. पण माझ्या कडे आजच्या सुधारकचे पहिल्या अंकापासून सर्व अंक वर्षानुसार बाईंडिंग केलेले आहेत. माझ्याशी संपर्क साध

गामा पैलवान नवीन

तजो, >> विण्टरेस्टींग. अफलातून लॉजिक आहे. आय होप तुम्ही हे लॉजिक सर्व बाबतीत पाळता. दाभोलकर यांच्यासारखी जी माणसं समाजाला शहाणपणा शिकवू पाहतात, त्यांनी किमान स्वच्छ व कायदेशीर कारभार करावा. अन्यथा लोका सांगे ब्रह्मज्ञान अशी गत होते. आ.न., -गा.पै.

मम्बाजी सर्वज्ञ नवीन

सहमत! पण विज्ञानाची पूजा करणे म्हणजे धर्मावर चाबूक ओढत सुटणे बरोबर वाटत नाही. हे म्हणजे अरविंदा ने नरेंद्राला 'माझी देशभक्ती तुझ्या देशभक्ती पेक्षा मोठी आहे' असे म्हणणे वाटते. असो. लेख आवडला. पहिले उदाहरण सोपे होते. दुसर्या उदाहरणाच्या शेवटा पर्यंत पोचता पोचता नक्की कशात काय गेले ते झेपले नाही. ते तीन भांड्यांच्या खाली १ नाणे लपवण्याच्या आणि मग भांडी फिरवण्याच्या खेळासारखे झाले जर. थोडे अजून सोपे केलेत तर लवकर समजेल. बाय द वे यनावाला साहेब, एक विनंती आहे. काहीही झाले कि देव देवतांच्या मागे तोफा घेऊन सुटण्या अगोदर एकदा शर्ली हेब्डो सारखी चित्रे काढून दाखवा. सहिष्णुता आणि असहिष्णुता म्हणजे काय हे लगेच कळेल. देश सोडायची गरजाही पडणार नाही!

गामा पैलवान नवीन

एस, >> पुराव्यादाखल काय दिलेय तर हिंदूजागृतीसारख्या फॅसिस्ट संस्थळावरचा लेख. वा! पुरावा धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात आहे. हिंजस फक्त उल्लेख करतेय. २०१० नंतर हिशोब दिलाय का परिवर्तन न्यासाने? पैसे खायचे ते खायचे आणि वर गप्पा प्रबोधनाच्या मारायच्या ! सुंदर धंदा (की धंदे). आ.न., -गा.पै.

एस नवीन

In reply to by गामा पैलवान

हे इथे आहे नि ते तिथे आहे इतकेच फक्त तुमची ती जागृतीसमिती करू शकते. खरेच तसे असेल तर इथे हिशेब दाखवा म्हणजे दाभोलकरांनी पैसे खाल्लेत की नाही हे सिद्ध होईल. बादवे, मग न्यायालयाने काय निकाल दिला? की समितीने अजून तक्रारच दाखल केली नाही?

अत्रुप्त आत्मा नवीन

In reply to by एस

@बादवे, मग न्यायालयाने काय निकाल दिला? की समितीने अजून तक्रारच दाखल केली नाही?>> ते तसं काहीही होणार नाही. कारण मग दुसय्रानवर राळ उडवायला काही शिल्लक कसं राहणार? खरच सर्व बाबी पुर्ण केल्या तर सगळं स्वछपणे लोकांसमोर मांडावे लागेल. मग आली ना ह्यांची टनाटनी पंचाईत! असत्याशी हातमिळवणी केलेल्या या टवाळांकडून आपण अशी अपेक्षाहि ठेवता कामा नये.

गामा पैलवान नवीन

In reply to by एस

एस, >> की समितीने अजून तक्रारच दाखल केली नाही? समितीने कशाला तक्रार करायची? धर्मादाय आयुक्त झोपा काढताहेत? इतके पैसे खर्च करून प्रशासकीय डोलारा पोसायचा कशासाठी? फड्डेबाजांना रान मोकळं मिळावं म्हणून? पैसे खाणाऱ्यांची बाजू घेता नाही आली तर बघा जरा. आ.न., -गा.पै.

तर्राट जोकर नवीन

In reply to by गामा पैलवान

समितीच्या कांगावेखोरपणाबद्दल धर्मादाय आयुक्तांना लक्ष द्यावंसं वाटलं नसेल. तुम्हाला विरोधी वाटणार्‍या व्यक्तीबद्दल कार्यवाही झाली नाही म्हनून आयुक्त झोपा काढतात काय अशी विधानं करण्याची मुभा मिळत नाही. ज्याने आरोप केला त्याला पुरावे द्यावे लागतात. मी ही असे म्हणु शकतो की गापै नावामागे जो इसम आहे तोच २६-११ च्या मास्टरमाइण्ड आहे तर ते खरेच मानले पाहिजे.

गामा पैलवान नवीन

In reply to by तर्राट जोकर

तजो, त्याचं काय आहे की खरंतर हिंदूच झोपा काढताहेत. म्हणूनच धर्मादाय आयुक्तांनी झोपेचं सोंग घेऊ शकताहेत. माझी शब्दरचना जराशी चुकलीच. याचसाठी हिंदू जनजागृती समिती तिच्या नावाप्रमाणे हिंदूना जागं करतेय. ज्यांना झोपेचं सोंग प्रिय असतं ते कधीच जागे होत नसतात. आ.न., -गा.पै.

तर्राट जोकर नवीन

In reply to by गामा पैलवान

आली का हरदासाची कथा मूळपदावर? इथे हिंदूंचा काय संबंध? गैरव्यवहार गैरव्यवहार आहे. ह्या हिंदुजनजागृतीचा सर्व व्यवहार स्वच्छ धुतल्या तांदलाचा आहे ह्यावर तुमचा विश्वास असेलच. त्याला कुठलाही धर्मादाय आयुक्त लागू असायचे गरज नसेल. तसेच इतकी मठं, मंदिरं, इत्यादी बोकाळलेत त्याबद्दल तुमची ही जनजागृती जागं करायचं काम करते का? उगा टुकार लॉजिक घेउन येत नका जाऊ हो. आम्हाला राहवत नाही.

प्रचेतस नवीन

In reply to by तर्राट जोकर

तजो, कशाला वेळ घालवताय उगा, त्या कोडग्या सनातन्यांना काहीही फरक पडणार नाहीये माहिती आहे ना?

अभ्या.. नवीन

In reply to by तर्राट जोकर

अरे अरे जोकरसाब. शेवटी कशातही राम असावाच लागतो म्हणा की? (टेक्लाईट सरजी. चर्चा थांबवली तरी माझी कधीच हरकत नसते. ;) )

तर्राट जोकर नवीन

In reply to by अभ्या..

=)) =)) आम्ही never argue with stupid वाल्या कोटमधले स्टुपिड आहोत. आमच्याकडच्या अर्ग्युमेंटच्या एक्पिरियंसने आम्ही समोरच्याला हरवतो. स्टुपिडपनाच्या नाही. पण लक्षात कोण घेतो? ;-)

यनावाला नवीन

In reply to by प्रचेतस

डॉ.नरेन्द्र दाभोलकर यांच्यावर केलेला हा अरोप पूर्णतया बनावट आणि खोटा आहे. केवळ त्यांच्याविषयीच्या द्वेषभावनेने केलेला आहे. धर्मादय आयुक्तांकडे असा पुरावा असता तर वृत्तपत्रांत ही बातमी कधीच छापून आली असती. कुठल्याही प्रतिष्ठित वृत्तपत्रात डॉ.दाभोलकरांविरुद्ध एक ओळसुद्धा कधी छापून आलेली नाही. डॉ.दभोलकरांनी गेली सत्तावीस वर्षे समाजप्रबोधनाचे कार्य समर्पण भावनेने, निरपेक्षपणे केले. महाराष्ट्रातील सुबुद्ध जनता डॉक्टरांच्या कार्याचे मोल जाणते. ती त्यांची ऋणी आहे.

गामा पैलवान नवीन

In reply to by यनावाला

यनावाला, >> धर्मादय आयुक्तांकडे असा पुरावा असता तर वृत्तपत्रांत ही बातमी कधीच छापून आली असती. तुमचा वृत्तपत्रांवर भारीच भरवसा आहे. यालाच अंधळा विश्वास म्हणतात. उगीच कुठल्या बुवाबापूस नावे ठेवायला नकोत. दाभोलकरबापू की जय बोला. आ.न., -गा.पै.

एस नवीन

In reply to by गामा पैलवान

मी काय करावे व काय करू नये हे आपण सांगितले नाहीत तर जरा बरे होईल नाही का गामासाहेब? आ. खरोखरीचा न. एस.

गामा पैलवान नवीन

In reply to by एस

एस, रागावलात माझ्यावर? काही अधिकउणं बोलून गेलो असेन तर आजिबात मला माफ करू नका. राग येणे ही जिवंतपणाची खूण आहे. जशी माझी चीड आली तशीच घोटाळेबाजांचीही येऊद्या. बस, इतकंच! आ.न., -गा.पै.

एस नवीन

In reply to by गामा पैलवान

नक्कीच. फक्त कोण घोटाळेबाज आहे आणि कोण निर्दोष हे सनातन्यांच्या बेछूट व बिनबुडाच्या आरोपांवरून कुणी ठरवत नसते, इतके जरी आपण लक्षात ठेवले तरी पुरे आहे. आपणांस बाकी इतके फुटेज पुरेसे आहे. इत्यलम!

स्वधर्म नवीन

In reply to by गामा पैलवान

गामा साहेब, अापले दाभोळकर यांच्या संदर्भाने खालील प्रतिसाद व मते वाचली. > दाभोलकरांच्या परिवर्तन न्यासामध्ये अनेक गैरप्रकार झाले आहेत. > तुम्ही धर्मादाय आयुक्तांकडे विचारणा करून परिवर्तन न्यासाचे हिशोब पाहायला मागवू शकता. हिंजसचे आरोप खरे का खोटे त्याचा प्रत्यक्ष पुरावा मिळेल. > चोराच्या संगतीत वावरणारा चोरच असतो. > दाभोलकर यांच्यासारखी जी माणसं समाजाला शहाणपणा शिकवू पाहतात, त्यांनी किमान स्वच्छ व कायदेशीर कारभार करावा. अन्यथा लोका सांगे ब्रह्मज्ञान अशी गत होते. अापल्या सर्वात पहिल्या प्रतिसादात अापण अादिशंकराचार्यांचा दाखला दिला अाहे. त्यांनी स्थापन केलेले मठ (पीठे) ही अाजही अत्यंत श्रध्येय अाहेत, व ती शंकराचार्यच चालवातात. २००४-२००५ मध्ये कांची पीठाच्या शंकराचार्यांवर नुसते अारोपच झाले नव्हते तर, त्यांना या प्रकरणात काही महिने अटकही झाली होती. कांची मठाची १९४ बॅंक खाती गोठवली गेली होती. दाभोळकरांवर हिंजस सारख्या संस्थेने फक्त ‘आरोप’ केले अाहेत,तर अापण त्यांच्याबाबत वर काय काय बोलला अाहात. तर वरील शंकराचार्य व पीठाबाबत अापले काय मत अाहे?

गामा पैलवान नवीन

In reply to by स्वधर्म

अवांतर : स्वधर्म, जयेंद्र सरस्वती आणि विजयेंद्र सरस्वती यांनी शंकररामन यांची हत्या केल्याचा फुटक्या कवडीइतकाही पुरावा नसलेली केस आहे. हे न्यायालयाचं म्हणणं आहे. सत्र न्यायालयाने पोलिसांवर 'विश्वास' ठेवून जयेंद्र सरस्वतींना आतच ठेवलं. मग मद्रास उच्च न्यायालयासमोर अर्ज सुनावणीला आला. तिथे पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या चिंधड्या उडाल्या. म्हणे जयेंद्र सरस्वतींनी आयसीआयसीआय ब्यांकेतून पैसे काढून हत्येची सुपारी दिली. च्यायला, मठाचं खातंच नाही त्या बँकेत! पोलिसांनी मग जमीन विकून आलेल्या पैशातून हत्येची सुपारी दिली म्हणून युक्तिवाद केला. तर तो पैसा मठाच्या खात्यावरच होता. हे 'पुरावे' पाहिल्यावर उच्च न्यायालयात साहजिकच जामीन संमत झाला. ज्या दिवशी त्यांना जामीन मिळाला त्याच दिवशी विजयेंद्र सरस्वतींना अटक करण्यात आली. त्याच आरोपांखाली. लक्षात येतंय ना कोण सूडबुद्धीने वागतंय ते? पुढे नऊदहा वर्षांनी २०१३ साली ही कसलाही दम नसलेली मुडदूस केस कोलमडली. जयेंद्र सरस्वती आणि विजयेंद्र सरस्वती दोघेही निर्दोष आहेत. आ.न., -गा.पै.

स्वधर्म नवीन

In reply to by गामा पैलवान

गामा साहेब, एका बाजूला शंकराचार्यांवर केस उभी राहिली, त्यांना अटक झाली. अनेक साक्षीदार फिरले, एकाचा खून झाला व शेवटी शंकराचार्यांवर अारोप शाबित होऊ न शकल्यामुळे त्यांची सुटका झाली. विशेष गोष्ट अशी की शंकराचार्यांवर खटला दाखल झाला तेंव्हा जयललिता मुख्यमंत्री होत्या व अटकेला परवानगी देताना जयललिता यांना दु:ख झाल्याचे त्यांनी म्हटले अाहे. त्यांची शंकराचार्यांना असलीच तर सहानुभूती होती. म्हणजे तसाच काही पुरावा असल्याशिवाय एवढ्या मोठ्या असामीला अटक होऊ शकेल काय? उलट दाभोळकर हे सतत सरकारशी संघर्षच करत अाले, तरीही सरकारजवळ त्यांना अटक व्हावी अगर निदान चौकशी सुरू व्हावी, इतकाही पुरावा सरकारला मिळू शकलेला नाही. तरिही तुंम्ही त्यांना सरळ अारोपीच्या पिंजर्यात उभे केलेत. जो न्याय शंकराचर्याला, तोच न्याय दाभोळकरांना लावावा असं अापणांस वाटत नाही का? श्रध्देमुळे (काहीजणांना) अाधार मिळत असेल, शांती लाभत असेल, पण जर त्यामुळे एका व्यक्तीला विनाकारण सहानुभूती व दुसर्या व्यक्तीचा विनाकारण (मते न पटल्याने) द्वेष होत असेल, तर श्रध्देच्य फायद्यापेक्षा तोटा मोठा अाहे.

भाऊंचे भाऊ नवीन

कोणतीही व्यक्ती जोपर्यंत स्वत: मधे प्राण निर्माण करायचे रहस्य पूर्णपने जानत नाही तोपर्यंत तो आयुष्यात केंव्हा ना केंव्हा इच्छे अनिछ्चेने बाहय शक्तीला शरण जाणारच. कारण ती रचना निसर्गाने केली आहे आणी आर्ट ऑफ सर्वायविंगची ती मुलभुत ता आहे.... बाकी उलाला उलाला करणारे किती आले अन किती गेले त्याने ना विज्ञानाच्या विकासाला फरक पडला ना ईश्वर नामक बाह्य शक्तिला शरण जायच्या प्रवृत्तीला... असो तुमची चिकाटी सॉलिड आहे

तिमा नवीन

तुम्ही पुढच्या लेखांत फक्त विज्ञानाची महती लिहा. धर्म, देव वगैरेची वाच्यताही करु नका. एक शास्त्रीय प्रयोग म्हणून. त्यानंतर कशा प्रकारच्या प्रतिक्रिया येतात, ते पहाणे मनोरंजक ठरेल.

मम्बाजी सर्वज्ञ नवीन

In reply to by तिमा

सहमत. धर्माशी स्पर्धा करण्याच्या नादात आणि धर्म कसा चुकीच्या दिशेने नेतो हे दाखवण्याच्या नादात रस्ता चुकतो असे वाटते.

बाळ सप्रे नवीन

In reply to by तिमा

अगदी सहमत.. अगदी काँग्रेसच्या कारकीर्दीतल्या कुरापती काढणे टाळून केवळ विकास करून दाखवण्याइतके समर्पक.

सुधीर कांदळकर नवीन

तरीही वैज्ञानिक लिखाण करतांना धर्म वगैरे बाबींचा उल्लेख करून त्यांना आपण अवास्तव महत्त्व दिलेले आहे. अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचा अनाठायी उल्लेख करून महत्त्व वगैरे प्राप्त करून देऊं नये ही नम्र विनंती. आपला मार्ग आपण शांतपणे चोखाळावा. भलत्यांकडून नसत्या सुधारणेची अपेक्षा ठेवू नये.

सतिश गावडे नवीन

मांडलेले मुद्दे अतिशय योग्य असले तरी इतका प्रखर बुद्धीवाद सार्‍यांनाच झेपणारा नाही. धर्म आणि श्रद्धा ही समाजाची गरज आहे. त्यामुळे श्रद्धांवर सरसकट टिका न करता धर्म आणि श्रद्धा कालसुसंगत कशा करता येतील, त्यातील अपप्रवृत्ती कशा दूर करता येतील हे पाहणे सध्याच्या काळात अधिक हितावह असेल. बहुतेक डॉ. दाभोलकरांना हे नेमकेपणाने उमगले होते. त्यामुळे त्यांनी समाजाला चुचकारत चुका दाखवून दिल्या. हेच त्यांच्या चळवळीच्या यशामागचे कारण असावे. ज्यांच्या हितसंबंधांना बाधा येते अशांनीच दाभोलकरांच्या कार्याला तीव्र विरोध केला. सर्वसामान्यांना त्यांच्या कार्याबद्दल आपुलकी आणि आदर होता. जनाधार नसता तर त्यांची चळवळ यशस्वी झालीच नसती. १६३२ साली गॅलिलिओने केलेल्या पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्याच्या विधानापासून आधुनिक विज्ञानयुगाची सुरुवात मानली तर मागच्या जवळपास ४०० वर्षात नवनविन शोध लागत असताना धर्म आणि श्रद्धा कालबाह्य व्हायला हव्या होत्या. मात्र आजचे चित्र बरोबर उलटे आहे. जसजसे माणसाचे निसर्गासंबंधीचे ज्ञान वाढत आहे तसतसा माणूस अधिकाधिक धार्मिक आणि सश्रद्ध होत आहे. याला तुमच्या माझ्यासारखे अपवाद जरी असले तरी ते सार्वत्रिक चित्र नाही. मंदिरांबाहेरच्या रांगा वाढत आहेत, मंदिरांच्या बाहेरील याचक जरी "दे माय पोटाला" म्हणत असले तरी मंदिरांच्या दानपेटया नोटांनी भरून वाहत आहेत. भक्त लोक देवाला इतका पैसा देत आहेत की तो मोजण्यासाठी यंत्र ठेवावी लागत आहेत, माणसं राबवावी लागत आहेत. नविन वाहन आणल्यानंतर त्याची देवाची पुजा करावी अशी पुजा होत आहे; अगदी त्या वाहनाचा भाग अन भाग सुटा करून तो कसे कार्य करतो हे सांगता आले तरीही. मांडायचा मुद्दा हा की अशा "एक घाव दोन तुकडे" लेखांनी अपेक्षित बदल घडणार नाही. उलट विरोध वाढेल. त्यासाठी या गोष्टींच्या मुळाशी गेले पाहीजे. त्यांची समाजाला असणारी गरज समजून घेतली पाहीजे. आणि मग विवेकाने परिवर्तनाच्या दिशेने पावलं टाकायला हवीत.

राजेश घासकडवी नवीन

In reply to by सतिश गावडे

प्रतिसादाचा एकंदरीत गाभा पटलेला आहे. फक्त एका बाबतीत प्रश्न आहे.
मागच्या जवळपास ४०० वर्षात नवनविन शोध लागत असताना धर्म आणि श्रद्धा कालबाह्य व्हायला हव्या होत्या. मात्र आजचे चित्र बरोबर उलटे आहे.
हे खरं आहे का? धर्मसत्ता मानवाच्या जीवनावर जितकी कणखर पकड घेऊन बसली होती ती खिळखिळी झाली आहे यात वादच नाही. त्याकाळी तुम्ही जर काही धर्मविरोधी वागत असाल तर चर्च तुम्हाला बोलवून इन्क्विझिशन नावाचा क्रूर छळ करू शकत असे. भारतात छळाऐवजी वाळीत टाकणं असे. सर्वच समाजांमध्ये धर्मसंस्थांचे हे दात आणि ही नखं झिजलेली आहेत, बोथट झालेली आहेत. त्यामुळे तत्त्वतः ज्यांना इच्छा नसूनही या जोखडात बांधले गेले अशांची संख्या कमी व्हायला हवी. कदाचित झालीही असेल, पण जे धार्मिक आणि सश्रद्ध आहेत त्यांची क्रयशक्ती वाढल्याने, आणि माध्यमांतून आपल्याला जास्त दिसत असल्यामुळे 'चित्र' उलट दिसत असेल. (म्हणजे समजा बलात्कारांची संख्या वाढत नसेल, कदाचित किंचित कमीच होत असेल आणि रिपोर्टिंगचं प्रमाण प्रचंड वाढलेलं असेल, तर रिपोर्टेड बलात्कार वाढताना दिसतील - तसं काहीसं.) मात्र हे मोजायचं कसं हे मला माहीत नाही.

गामा पैलवान नवीन

In reply to by राजेश घासकडवी

राजेश घासकडवी, धर्म आणि धर्मसत्ता यांत महदंतर आहे. सामान्य भारतीय जेव्हा धर्माबद्दल बोलत असतो तेव्हा तो सेमेटिक धर्मसत्तेबद्दल बोलत नसतो. आ.न., -गा.पै.

राजेश घासकडवी नवीन

In reply to by गामा पैलवान

ख्रिश्चॅनिटीची धर्मव्यवस्था नीट बांधून काढलेली आहे आणि हिंदू धर्माची व्यवस्था स्थानिक पातळीवर चालणारी आहे. या अर्थाने फरक आहे. त्यामुळे ख्रिश्चॅनिटीने क्रूसेड्स घडवले तसे हिंदू धर्मगुरूंना घडवणं शक्य नव्हतं. पण सर्वसामान्य माणसाला धर्मनियम पाळायला लावण्यासाठी धर्मसंस्था केंद्रीभूत आहे की वितरित आहे याने तितका फरक पडत नाही. स्थानिक पातळीवरही धर्म मोडणारांना वेगवेगळ्या पद्धतींनी ताळ्यावर आणता येतं. आणि हे उपाय वापरले गेलेले आहेत - सर्वच धर्मांत. माझा मुद्दा आहे की या जाचणाऱ्या दोऱ्या बऱ्याचशा सुटलेल्या आहेत, किंवा सैल झालेल्या आहेत. तरीही 'धर्मश्रद्धा वाढत आहेत' हे 'चित्र' किंवा परसेप्शन का दिसतं - ते खरं आहे म्हणून की आजकाल आपल्याला जास्त लांबवरच्या गोष्टी स्पष्ट दिसतात म्हणून.

सतिश गावडे नवीन

In reply to by राजेश घासकडवी

माझा धर्मसत्ता या विषयाचा विशेष अभ्यास नाही. मी जे लिहिलं आहे त्या सध्याचं व्यक्तीगत पातळीवरील चित्र आहे. तुम्ही म्हणताय तशा धर्मसत्ता नक्कीच खिळखिळ्या झाल्या आहेत. मात्र व्यक्तीगत पातळीवर लोक अधिकाधिक धर्म आणि श्रद्धेला जवळ करत आहेत. आपली सौरमाला आणि त्यातील सारे ग्रह यांचे बर्‍यापैकी ज्ञान आज सर्वसामान्यांना आहे. तरीही शनिवारी शनि मंदिरांसमोरील रांगा वाढत आहेत. लग्न जुळवताना आजही कुंडली ही लग्नासंबंधी बोलणी सुरु करण्याची पहिली पायरी आहे. महाराष्ट्राला बुवाबाजीवर आसुड ओढणारे संत आणि त्यानंतर समाजसुधारक लाभले तरीही आजही आपल्याकडे बाबा, बुवा, बापू आणि महाराज उदंड झाले आहेत. लोक शर्टला त्यांचे चित्र असणारे पेन आणि बिल्ले लावण्यात आणि घराच्या भींतीवर त्यांचे फ्रेम केलेले (काही वेळेला चक्क फोटोशॉप केलेले) फोटो लावण्यात धन्यता मानत आहेत. ही झाली दोन प्रातिनिधीक उदाहरणे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यातून जाणवते की जसजसे विज्ञान प्रगत होत आहे तसतसे लोक अधिकाधिक धर्म आणि श्रद्धेला जवळ करत आहेत. आणि हे करत असताना ते विज्ञानाने मिळणारे लाभ नाकारत नाहीत हे विशेष. किंबहूना लोक आज विज्ञानाला आपल्या श्रद्धेच्या कामी वापरत आहेत. तिरूपती मंदिराची ऑनलाईन बुकिंग सुविधा हे याचे उत्तम उदाहरण आहे.

सप्तरंगी नवीन

यनावाला सर, लेख उत्तम आहे पण: " संस्कृती समृद्ध व्हावी, सर्वांची ऐहिक प्रगती व्हावी, अन्न-वस्त्र-निवारा-शिक्षण-आरोग्य या अत्यावश्यक प्राथमिक सुविधांपासून कुणीही वंचित राहू नये, निसर्गाचे संवर्धन करावे, पर्यावरणाचे संतुलन राखावे, ही विज्ञानाची प्राथमिक उद्दिष्टे आहेत." यातील काही भाग चुकीचे स्पष्टीकरण देणारा वाटतो. संस्कृतीचा (संस्कृती समृध्द होण्याचाही) आणि विज्ञानाचा काय संबंध? निसर्गाचे संवर्धन आणि पर्यावरणाचे संतुलन यात विज्ञानाचा कसा हातभार लागेल उलट पर्यावरणाचा ऱ्हासच होतो आहे ना विज्ञानाने? देव- धर्म पेक्षा , खर तर देव- धर्माच्या आहारी जाण्यापेक्षा, विज्ञान हाच प्रगतीचा मार्ग हे पटतेच पण हे सांगताना कदाचित आपण वेगळे काहीतरी दर्शवत आहात जे विषयाला धरून वाटत नाही, म्हणून पटत नाही.

सतिश गावडे नवीन

In reply to by सप्तरंगी

संस्कृतीचा (संस्कृती समृध्द होण्याचाही) आणि विज्ञानाचा काय संबंध?
मला वाटते संबंध आहे. एखादया छोटया-मोठया मानवी समुहाचे विशिष्ट पद्धतीचे आचरण किंवा जीवनशैली म्हणजे संस्कृती अशी संस्कृतीची ढोबळ व्याख्या करता येईल. ऐहिक प्रगती, अन्न-वस्त्र-निवारा-शिक्षण-आरोग्य या बाबी संस्कृतीचाच भाग आहेत. आणि या सार्‍या बाबींचा विज्ञानाशी थेट संबंध आहे. विज्ञान जितके प्रगत तितकी ऐहीक प्रगती जास्त; तसेच प्रगत विज्ञानाने अन्न-वस्त्र-निवारा-शिक्षण-आरोग्य या गोष्टींचा दर्जा निश्चितच उंचावतो. त्यामुळे विज्ञान आणि संस्कृतीचा नक्कीच संबंध आहे.
निसर्गाचे संवर्धन आणि पर्यावरणाचे संतुलन यात विज्ञानाचा कसा हातभार लागेल उलट पर्यावरणाचा ऱ्हासच होतो आहे ना विज्ञानाने?
विज्ञान निसर्गाचे संवर्धन आणि पर्यावरणाचे संतुलन यास हातभार लावते हे धाडसी विधान आहे. कदाचित धागालेखकच हा मुद्दा स्पष्ट करू शकतील. विज्ञानाने पर्यावरणाचा ऱ्हासच होतो हे आपल्या आजूबाजूला दिसते. आधुनिक सुविधांची निर्मिती करताना किंवा औद्योगिक विकास करताना तारतम्य बाळगून निसर्गाची कमीत कमी हानी कशी होईल हा विचार करता येईल.

अर्धवटराव नवीन

In reply to by सतिश गावडे

मला वाटतं अजीबात संबंध नाहि. सदर लेख मला सरळ सरळ आधुनीक बुवाबाजीचा प्रकार वाटतो. धर्म व्यवस्थेने माणसाचे प्रश्न सोडवण्याचा दावा केला. त्यातुन हितसंबंध जोपासणारी स्ट्रीम तयार झाली. त्याचे मक्तेदार तयार झाले. त्यातुन पुढे शोषणाची अव्याहत साखळी निर्माण झाली. हे सगळं कशामुळे झालं ? याचा उगम धर्माचा धर्मव्यवस्थेत होणार्‍या परिवर्तनात आहे. धर्म जेंव्हा "विषाचा धर्म शरीराला बाधा पोचवणे आहे, व औषधाचा धर्म रोगनिवारण आहे" इतका स्वच्छ असतो तेंव्हा तो माणासाला त्याचं प्रतिबेंब दाखवायचं काम चोख करत असतो. धर्मव्यवस्था जेंव्हा मानव कैवार आपल्या हाती घेते तिथे त्यात मानवी गुणादोष यायला लागतात. विज्ञानदिनाच्या निमीत्ताने विज्ञानाचं विज्ञानव्यवस्थेत संक्रमण करण्याची तीच खोड पुन्हा गिरवली जात आहे. धर्माचं धर्मव्यवस्थेत परिवर्तन व्हायला काहि काळ तरी जावा लागला. विज्ञानव्यवस्थेची निर्मीती कितीतरी वेगाने होईल. इतर सदोष व्यवस्थांना नावं ठेवायच्या कंड शमनार्थ आपण विज्ञानाचं बुवाबाजीकरण करत आहोत याचं भानच दिसत नाहि सो कॉल्ड विज्ञानवाद्यांना (किंबहुना विज्ञानाकरता विज्ञानवाद, विज्ञान'इझम' सारखी दुसरी घाणेरडी शिवी नाहि) मधुमक्षीका अन्नसाठवणुकीकरता मध गोळा करते व संरक्षणार्थ डंख मारते हा धर्म. मधात अमुक प्रकारचे ग्लुकोज असते व डंख मारल्याने अमुक प्रकारचं केमीकल इंजेक्ट होतं, हे विज्ञान. माणासाला मध मिळेल कि डंख हे माणूस मधमाशीला कसं हाताळतो यावर अवलंबुन आहे. त्याचा संबंध ना धर्माशी ना विज्ञानाशी. असो.

प्रकाश घाटपांडे नवीन

In reply to by अर्धवटराव

आम्हाला जे विज्ञान अभिप्रेत आहे तेच खरे विज्ञान तुम्ही म्हणता ते छद्मविज्ञान अशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भूमिका घेणारे अनेक विज्ञानधर्मी दिसतात. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान अशी व्याख्या मांडली जाते.मग त्यात अध्यात्माला ही विज्ञानात बसवता येते.

यनावाला नवीन

In reply to by सतिश गावडे

@सतीश गावडे & सप्तरंगी ...... सौंदर्य, कला, साहित्य इ.विषयीं समाजात विशिष्ट अभिरुची निर्माण होते. तदनुसार त्यांची निर्मितीही होते, तसेच काही कर्मकांडे, आचार-विचारांचे कांही संकेत-शिष्टाचार रूढ होतात. अशा गोष्टींच्या समुच्चयाला त्या समाजाची, त्याकाळची संस्कृती म्हणता येईल. "एखादया छोटया-मोठया मानवी समूहाचे विशिष्ट पद्धतीचे आचरण किंवा जीवनशैली म्हणजे संस्कृती अशी संस्कृतीची ढोबळ व्याख्या करता येईल." ही सतीश गावडे यांची व्याख्या मूलभूत आहे. समाजाला स्वास्थ्य लाभले, लोकांना मोकळा वेळ असला तर संस्कृती निर्माण होते. शेतीच्या शोधानंतर (हा निरीक्षणांधारित वैज्ञानिक शोधच होता.) माणसाला अन्नाची शाश्वती लाभली. त्याची अन्नशोधार्थ भटकंती थांबली. संस्कृतिनिर्मितीचा प्रारंभ झाला. पुढे वैज्ञानिक शोधांमुळे अनेक सुख-सुविधा निर्माण झाल्या .माणसांना अधिक मोकळा वेळ मिळू लागला. त्यामुळे संस्कृती विकसित झाली. बहरली. संस्कृतीच्या समृद्धीसाठी विज्ञानाचे योगदान मोठे आहे, यात संशय नाही. वैज्ञानिक शोध आणि त्यावर आद्धारित तंत्रज्ञान यांमुळे झालेल्या पर्यावरणरक्षणाची अनेक उदाहरणे देता येतील. सैपाकासाठी सौर चुलीच्या वापरामुळे वृक्षतोड कमी झाली. तसेच विजेसाठी सौरऊर्जा, पवनऊर्जा यांच्यामुळे प्रदूषण कमी झाले. या ऊर्जांचा वापर जगभर वाढत आहे. त्यांत अधिकाधिक सुधारणा होत अहेत. जगभराचा विचार केला तर क्रेडिट कार्डांमुळे कागदीचलन कमी झाले. तसेच ई-गवर्नन्स,ई-बुक्स इ.मुळे कागदाचा वापर मोठ्या प्रमाणात थांबला. झाडे वाचली.

सप्तरंगी नवीन

In reply to by यनावाला

पर्यावरणाबद्दल विचार केला, बर्याच अंशी पटले. कारण आपण विज्ञानाचा वापर योग्य रीतीने नाही केला म्हणून पर्यावरणाचा ऱ्हास होत असावा, directly विज्ञानामुळे नाही. तरीही अजून विचार करेन. पण संस्कृती संवर्धन वगैरे नाही पटत, ते उगीच लेखाच्या साच्यात फिट करता आहात असे वाटते, जेणेकरून आस्तिक लोकांना पटावे. कदाचित मला स्वत:ला संस्कृती संवर्धनाची फारशी गरज वाटत नसेल त्यामुळेही नसल पटत. बाकी लेख एकदम आवडला. अगदी A , B जार मधील concentration calculate करून पहिले. बरोबर आहे.

राजेश घासकडवी नवीन

In reply to by सप्तरंगी

संस्कृती संवर्धनाला विज्ञानाचा अप्रत्यक्ष हातभार कसा लागला आहे हे समजून घेण्यासाठी मी स्टीव्हन पिंकरचं पुस्तक 'द बेटर एंजेल्स ऑफ अवर नेचर' वाचा. मानवी समाजातली सर्वसामान्य हिंसा आणि तिचाच परिपाक असलेली युद्धं गेल्या काही शतकांत कशी कमी झालेली आहेत यावर अत्यंत सखोल अभ्यास करून लिहिलेलं पुस्तक आहे. याची कारण तो बहुतांशी सामाजिक देतो - समाजांचं एकीकरण (छोट्या छोट्या राज्यांपासून मोठ्या राष्ट्रांपर्यंत प्रवास), व्यापार-उदीमाची वाढ, लोकशाहीचा विस्तार, सार्वजनिक शिक्षणाचा प्रसार, जग लहान झाल्यामुळे एकमेकांशी झालेली ओळख वगैरे वगैरे. मात्र या सगळ्याच्या पायाशी वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती हा महत्त्वाचा घटक आहे. जर ते आठशे पानांचं पुस्तक वाचावं की नाही असा विचार करत असाल तर हा वीस मिनिटांचा व्हीडियो जरूर पाहा.

यनावाला नवीन

In reply to by राजेश घासकडवी

श्री.राजेश यांनी दिलेल्या लिंकवरील भाषण ऐकले. स्टिव्हन पिंकर यांचे हे भाषण सर्वांनी ऐकावे असे आहे. त्यात मांडलेले विचार वास्तवावर आधारित असल्याने पटतात. मानव प्रजातीची वैचारिक वाटचाल अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे, श्रद्धेकडून बुद्धीकडे, अविवेकापासून विवेकाकडे, हिंसेपासून अहिंसेकडे, उपासनेच्या देवाकडून नास्तिकतेकडे होणे क्रमप्राप्त आहे. स्वाभाविक आहे. मानवाच्या या प्रगतीचा आलेख म्हणजे सतत वरवर जाणारी सरळरेषा नव्हे. त्यात चढ-उतार आहेतच. पण मोठा कालखंड (शतक) घेतला तर प्रगती निश्चित दिसते. निसर्गत: आपोआप प्रगती होतेच. पण विज्ञानाची विस्मयकारक घोडदौड, समाजसुधारकांनी केलेले प्रबोधन, जनजागृती, या सर्वांच्या परिणामाने मानवप्रजातीच्या या प्रगतीने आता चांगला वेग घेतला आहे. बालपणापासून मनावर सतत होणार्‍या श्रद्धासंस्कारांचे ओझे आज ना उद्या फेकून देऊन माणूस स्वबुद्धीने विचार करणार हे निश्चित.

गामा पैलवान नवीन

In reply to by यनावाला

यनावाला, >> बालपणापासून मनावर सतत होणार्‍या श्रद्धासंस्कारांचे ओझे आज ना उद्या फेकून देऊन माणूस स्वबुद्धीने विचार >> करणार हे निश्चित. हे वाक्य तुमची विज्ञानाप्रती असलेली दृढ श्रद्धाच अधोरेखित करतंय. तर मग प्रगती म्हणजे नक्की काय? आणि ती होण्यासठी श्रद्धा कशाला भिरकावून द्यायला हवीये? आ.न., -गा.पै.

यनावाला नवीन

In reply to by गामा पैलवान

@श्री. गामा पैलवान माणसाची बुद्धी अपंग होण्याचे कारण म्हणजे त्याची श्रद्धाभावना. देव, धर्म आणि त्यांच्याशी निगडित असलेले विषय ही धार्मिकांची श्रद्धाक्षेत्रे असतात. धार्मिकांची बुद्धी अन्य क्षेत्रांत चांगली चालते. आर्थिक गुंतवणूक, खरेदी-विक्री, लग्न-कार्ये (पत्रिका, मंगळ, इ. सोडून) अशा गोष्टी ते विचारपूर्वक करतात. पण व्रते, अनुष्ठाने, अभिषेक, होमहवन, अंत्यसंस्कार,दहावे-बारावे-तेरावे-मासिकश्राद्ध अशा विषयांत त्यांची बुद्धी पांगळी होते. कारण ते विषय त्यांच्या श्रद्धाक्षेत्रातील आहेत. श्रद्धेने मन व्याप्त झाले की बुद्धी चालेनाशी होते.त्यामुळे समाज अप्रगत राहातो.म्हणून श्रद्धात्याग आवश्यक आहे.पूर्ण त्याग शक्य नसला तरी श्रद्धेवर बुद्धीचे नियंत्रण हवेच.

प्रचेतस नवीन

In reply to by यनावाला

कुरुंदकरांनाही तुम्ही पांगळ्या बुद्धीचे म्हणाल काय? घरातल्यांच्या इच्छेखातर त्यांनी स्वत:च्या मुलाची मुंज केली होती.

प्रकाश घाटपांडे नवीन

In reply to by प्रचेतस

विवेकवाद विज्ञान आणि श्रद्धा हे मे.पु रेगे यांचे पुस्तक याबाबत जरुर वाचावे http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5617951503483211621?BookName=Vivekvad-Vidnyan-Ani-Shraddha त्यातील तिसरा विभाग मी अस्तिक का आहे? परंपरागत श्राद्ध देवाशी भांडण धार्मिक श्रद्धा व इश्वराचे अस्तित्व ही प्रकरणे जरुर वाचा

सतिश गावडे नवीन

In reply to by प्रकाश घाटपांडे

धन्यवाद काका. मे.पु रेगेंचे नाव ऐकले होते. मात्र त्यांचे एकही पुस्तक आजवर माझ्या पाहण्यात आले नाही. हे पुस्तक जरूर वाचेन.

यनावाला नवीन

In reply to by प्रचेतस

श्री.प्रतेतस् लिहितात,
"कुरुंदकरांनाही तुम्ही पांगळ्या बुद्धीचे म्हणाल काय? घरातल्यांच्या इच्छेखातर त्यांनी स्वत:च्या मुलाची मुंज केली होती."
आपण समाजात, कुटुंबात राहातो. त्यामुळे आचारांच्याबाबतीत पूर्ण स्वतंत्र नसतो. (विचार पूर्णतया स्वतंत्र असू शकतात).व्यक्तीच्या विचार-आचारात एकवाक्यता हवी हे खरे. तरी कुतुंबीयांसाठी काही प्रसंगी आचारांना मुरड घालावी लागते. कुणा निरीश्वरवादी गृहस्थाने आपल्या नातेवाईकांसमवेत गणपतीची आरती म्हटली, प्रसाद ग्रहण केला म्हणून तो आस्तिक होत नाही. माझे वृद्ध आई-वडील गांवी असताना गणेशचतुर्थीच्या सणाला मी गावी जात असे. सकाळी लौकर स्नान करून, मुकटा नेसून, जानवे घालून पूजेसाठी सिद्ध होत असे. भटजी (द.कोकणात गुरुजी शब्द रूढ नाही.) आले की पूजेला बसायचे. ते केशवाय नम:।माधवाय नम:।गोविंदाय नम:। म्हणताना आचमने घ्यायची. ॐ प्राणाय स्वाहा।व्यानाय स्वाहा।उदानाय स्वाहा।समानाय स्वाहा।... च्या वेळी नाकावर बोटे ठेवून प्राणायाम दाखवायचा. आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसाम् कुर्वे घंटारवं तत्र देवताह्वान लक्षणम्। ऐकताना घंटा वाजवायची. ते माल्यादीनि सुगंधीनि पुष्पाणि प्रतिगृह्यताम् । म्हणत असताना फुले वाहायची.अशी पूजा केली आहे. मी बसलो नसतो तर वडील सकाळी आंघोळ करून पूजेला बसलेच असते. त्यांना त्रास झाला असता. तो टाळण्यासाठी हे कौटुंबिक कर्तव्य करणे आवश्यक होते. ते केल्याने विचारसरणी बदलत नाही.

प्रकाश घाटपांडे नवीन

In reply to by यनावाला

श्रद्धेने मन व्याप्त झाले की बुद्धी चालेनाशी होते.त्यामुळे समाज अप्रगत राहातो.म्हणून श्रद्धात्याग आवश्यक आहे.पूर्ण त्याग शक्य नसला तरी श्रद्धेवर बुद्धीचे नियंत्रण हवेच.
यातील श्रद्धा त्याग आवश्यक आहे या मतावर मानसशास्त्रज्ञांची मतभिन्नता दिसून येते.बुद्ध्यांक जसा महत्वाचा आहे तसा भावनांक देखील महत्वाचा आहे.श्रद्धा ही बाब भावनेशी निगडीत आहे. फक्त बुद्धीवर चालणारे बायोकेमिकल रोबो भविष्यात निर्माण होतील ही कदाचित.

यनावाला नवीन

In reply to by प्रकाश घाटपांडे

श्री.घाटपांडे लिहितात,
फक्त बुद्धीवर चालणारे बायोकेमिकल रोबो भविष्यात निर्माण होतील ही कदाचित.
प्रकाशजींनी हे बहुधा अनवधानाने लिहिले असावे. श्रद्धा ही अनेक मनोभावनांपैकी एक आहे. श्रद्धेच्या त्यागाने सर्व भावना संपतात असे मुळीच नाही. आनंद, सुख, दु:ख, द्वेष, करुणा, दया, सहसंवेदना, काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, दंभ, लोभ अशा अनेक मनोभावना आहेत. श्रद्धेचा त्याग केला तरी इतर भावना उरतातच. श्रद्धाविसर्जनाने माणूस भावनाशून्य होत नाही. रोबो होण्याचा प्रश्नच नाही. ... श्रद्धेची व्याख्या जाणली पाहिजे. जी गोष्ट इंद्रियानुभवाला येत नाही, तर्कबुद्धीला पटत नाही, जिचे अस्तित्व सिद्ध झालेले नाही, जिचा समावेश माणसाच्या अर्जित ज्ञानभांडारात नाही, अशी गोष्ट पूर्वसंस्कार, गातानुगतिकता, ग्रंथप्रामाण्य, इ.आधारे सत्य मानण्याची मनोवृत्ती म्हणजे श्रद्धा. उदा.:- "मंगळवारी येणार्‍या संकष्टीच्या दिवशी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले तर विशेष पुण्य लाभते." श्रद्धांचे विसर्जन करणे शक्य आहे. प्रमुख अडथळा असतो तो बालपणापासून मेंदूवर बिंबविलेल्या चुकीच्या संस्कारांचा. खरे तर प्रत्येक व्यक्ती जन्मत: नास्तिकच असते. बालपणी देवाविषयींचे संस्कार बिंबवले नाहीत तर देव म्हणून कोणी असतो असे त्या व्यक्तीला कधीही वाटणार नाही. वाटण्याचे कारणच नाही. पण देवाविषयींचे संस्कार होतातच. त्या पूर्व संस्कारांचे ओझे डोक्यावरून उतरवले की श्रद्धा संपल्या. मन म्हणजे सर्व भावभावनांचा समुच्चय. त्याचे विसर्जन संभवत नाही.

प्रकाश घाटपांडे नवीन

In reply to by यनावाला

प्रकाशजींनी हे बहुधा अनवधानाने लिहिले असावे
नाही. विचारपूर्वक लिहिले आहे.भविष्यात असे बायोकेमिकल रोबो विज्ञानातील संशोधनाने शक्य होतील अशी माझी समजूत आहे.
श्रद्धा ही अनेक मनोभावनांपैकी एक आहे. श्रद्धेच्या त्यागाने सर्व भावना संपतात असे मुळीच नाही.
होय. त्याच बरोबर श्रद्धा, अश्रद्धा वा अंधश्रद्धा हे मेंदुचेच अविष्कार आहेत.श्रद्धा ही संकल्पना आहे ती व्याख्येत बंदिस्त करता येईल असे मला वाटत नाही.त्या निमित्त फार फार तर शब्दिच्छल होईल. आजच्या दै. सकाळ मधे श्रद्धा समजूत आणि विश्वास हे विश्वास सहस्त्रबुद्धे यांचे परिमळ सदरात असलेले स्फुट आहे. ते म्हणतात," श्रद्धा म्हणजे अशी समजूत की ज्यासाठी पुरावा नाही. जे कोणीतर सांगितले आहे, कोठेतरी लिहून ठेवले आहे त्यावरुन समजूत करुन घेणे" सुप्रसिद्ध साहित्यिक विजय तेंडुलकर एकदा म्हणाले होते ," माणुस अंधश्रद्ध असतो कारण अंधश्रद्ध असणे ही त्याची गरज असते." ( संदर्भ - तिमिरातून तेजाकडे पृष्ठ ३८४ ले. नरेंद्र दाभोलकर) मेंदुच्या मनात या पुस्तकात लेखक सुबोध जावडेकर म्हणतात," जगण्याच्या लढाईत अंधश्रद्धा आदिमानवाला उपयोगी पडल्या असणार. कठीण परिस्थितीत मनाला उभारी देण्याचे काम त्यांनी केल. कल्पना करा, लाखो करोडो वर्षांपुर्वी माणसाचा पूर्वज जंगलात एकटाच आहे. त्याच्या टोळीपासून त्याची ताटातूट झालीय.चहू दिशांना घनदाट काळोख. दुरुन वन्य प्राण्यांच्या डर्काळ्या कानावर येताहेत. आणि..... शेजारच्या झुडपातून कसली तरी खसखस ऐकू येते. या भीतीदायक परिस्थितीत कशाच्या आधारावर त्याने उभं राहावं? अशी एखादी गोष्ट ( लकी हाडूक? ) त्याच्यापाशी असेल आणी त्यामुळे आपण संकटातून तरुन जाउ अस त्याला वाटत असेल, तर त्याला बोल कसा लावणार? त्याच्या अंधविश्वासाच्या जोरावरच तो तगून राहिला आणि तो विश्वास नसणार्‍याने केवळ भीतीनंच 'राम' म्हटला. अशा अंधश्रद्ध आदिमानवाचे आपण वारस आहोत! अंधश्रद्धा समाजात का टिकून आहेत त्याच हे स्पष्टीकरण आहे, अंधश्रद्धेचे समर्थन नव्हे!" अंनिस अंधश्रद्धांची कारणे जी दिली जातात त्यात अज्ञान, अगतिकता, संस्कार ही कारणे आहेत. ही तर कारणे आहेतच पण हे अंधश्रद्धेचे जैविक कारण देखील आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. आदिमानवापासून हा फॅक्टर जैविकरित्या संक्रमित होत गेला आहे. दाभोलकरांनी जीवनाच्या खडबडीत रस्त्यावर अंधश्रद्धा शॉक अबसॉर्बर सारखे काम करतात असेच म्हटले आहे. आता काहींच्या दृष्टीने असलेल्या श्रद्धा या दुसर्‍याच्या दृष्टीने अंधश्रद्धा असतात हा भाग वेगळा. अंधश्रद्धा हा शब्द पिवळा पितांबर म्हणल्या सारखे आहे. त्यामुळे अंनिस वर जो आक्षेप असतो कि यांना अंधश्रद्धा निर्मूलन नसून श्रद्धा निर्मूलन करायचे आहे. एका अर्थाने ते खरेच आहे. श्रद्धा अंधश्रद्धा हा शब्दोच्छल कित्येक शतके चालू आहे इथुन पुढेही तो चालूच राहिल. तो काही निकाली लागणारा प्रश्न नव्हे.

सप्तरंगी नवीन

In reply to by प्रकाश घाटपांडे

वरील लिखाणावरून अंधश्रद्धा हे केवळ weakness चे लक्षण आहे हेच प्रतीत होते. strong व्यक्ती अशा अंधश्रद्धा बाळगण्यापेक्षा आणि त्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा (उदा. एक तास पूजा करणे ) दुसरे काहीतरी चांगले करण्यात वेळ घालवेल. आस्तिकता आणि भावनांक याचा काहीही संबंध नाही, उलट मी हे म्हणु शकते मी आंधळी श्रद्धा न ठेवल्याने भावनांक चांगला असु शकतो. तसा तर आस्तिक - नास्तिक वाद कधीच न संपणारा आहे.

गामा पैलवान नवीन

यनावाला, >> श्रद्धेने मन व्याप्त झाले की बुद्धी चालेनाशी होते. माझा अनुभव वेगळा आहे. बुद्धी वापरून श्रद्धा विकसित करता येते. मात्र तुम्ही म्हणता तसं श्रद्धेवर बुद्धीचं नियंत्रण हवंच, याच्याशी सहमत आहे. किंबहुना बुद्धीच्या सहाय्याने श्रद्धावर्धन केल्यास ती बुद्धीच्या अधीन राहते. असं माझं मत आहे. आ.न., -गा.पै.

गामा पैलवान नवीन

यनावाला, तुमचं खालील विधान वाचलं : >> जी गोष्ट इंद्रियानुभवाला येत नाही, तर्कबुद्धीला पटत नाही, जिचे अस्तित्व सिद्ध झालेले नाही, जिचा >> समावेश माणसाच्या अर्जित ज्ञानभांडारात नाही, अशी गोष्ट पूर्वसंस्कार, गातानुगतिकता, ग्रंथप्रामाण्य, इ.आधारे >> सत्य मानण्याची मनोवृत्ती म्हणजे श्रद्धा. उदा.:- "मंगळवारी येणार्‍या संकष्टीच्या दिवशी सिद्धिविनायकाचे दर्शन >> घेतले तर विशेष पुण्य लाभते." यावरून एक घटना आठवली. इस्रोचे शास्त्रज्ञ नव्या अग्निबाणाची प्रतिकृती तिरुपतीच्या चरणी अर्पण करत. ही श्रद्धा आहे. मोहिमेचे संभाव्य यश वा अपयश इंद्रियांच्या अनुभवास आलेले नाही. मोहीम यशस्वी होईल की अपयशी याची तर्कबुद्धी लढवणे अशक्य आहे. अग्निबाण नवीन असल्याने त्याविषयी अर्जित ज्ञानभांडारात काहीच विदा उपलब्ध नाही. मोहिमेच्या यशापयशातून अर्जित ज्ञानभांडार वाढणार आहे. तर मग श्रद्धा असणं उचित की अनुचित? आ.न., -गा.पै. आ.न., -गा.पै.

तर्राट जोकर नवीन

In reply to by गामा पैलवान

गंडलेला प्रतिसाद. इस्रोचे शास्त्रज्ञ नव्या अग्निबाणाची प्रतिकृती तिरुपतीच्या चरणी अर्पण करत. ही श्रद्धा आहे. >> हे शास्त्रज्ञांचे वागणे हिंदु संस्कृतीला, परंपरेला धरुन आहे. काही मानसिक चौकटी आपण तोडु शकत नाही. सगळ्या जगात अशा चालिरीती असतात. ह्यचा अर्थ ते वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे नाहीत असा होत नाही. मोहिमेचे संभाव्य यश वा अपयश इंद्रियांच्या अनुभवास आलेले नाही. मोहीम यशस्वी होईल की अपयशी याची तर्कबुद्धी लढवणे अशक्य आहे. अग्निबाण नवीन असल्याने त्याविषयी अर्जित ज्ञानभांडारात काहीच विदा उपलब्ध नाही. मोहिमेच्या यशापयशातून अर्जित ज्ञानभांडार वाढणार आहे. >> अतिशय अतिशय गंडलेलं लॉजिक. अग्निबाण म्हणजे जंगलातून काल पकडून आणलेला रानटी घोडा नव्हे. आजच्या अशा मोहिमा आणि चौदाव्या शतकातल्या स्पॅनिश दर्यावर्दींच्या मोहिमा ह्यात फरक आहे हे कळत असून कसं काय बुवा लिहिताय?

होबासराव नवीन

काही मानसिक चौकटी आपण तोडु शकत नाही. सगळ्या जगात अशा चालिरीती असतात. येस्स. तजो बर्‍याच काळानंतर तुमच्या पुर्ण प्रतिसादाशि सहमति.

गामा पैलवान नवीन

तजो, १. >> आजच्या अशा मोहिमा आणि चौदाव्या शतकातल्या स्पॅनिश दर्यावर्दींच्या मोहिमा ह्यात फरक आहे तरीही अनिश्चितता कायमच आहे. २. >> काही मानसिक चौकटी आपण तोडु शकत नाही. सगळ्या जगात अशा चालिरीती असतात. >> ह्यचा अर्थ ते वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे नाहीत असा होत नाही. आहेतच मुळी ते वैज्ञानिक दृष्टी बाळगणारे. त्या ज्या न तुटणाऱ्या मानसिक चौकटी आहेत त्यालाच श्रद्धा म्हणतात. यनावाला नेमके त्यालाच बावळटपणा समजून चाललेत. आ.न., -गा.पै.