विश्वाचे आर्त - भाग १ - काळाचा आवाका

राजेश घासकडवी जनातलं, मनातलं
(वैज्ञानिक संकल्पनांवर सरळसोप्या भाषेत भाष्य करण्यासाठी ही लेखमाला सुरू केलेली आहे) कधीतरी एखाद्या शांत, स्वच्छ रात्री; शहराच्या प्रकाश प्रदूषणापासून दूर कुठेतरी आकाशात पाहिलं की अक्षरशः अगणित तारे दिसतात. मंदपणे लुकलुकणारे, स्थिर. आणि त्या क्षणात आत्तापर्यंत जन्माला आलेल्या जवळपास प्रत्येक मनुष्यप्राण्याशी आपण जोडले जातो. याच किंवा अशाच आकाशावर त्यांनीही आपले डोळे रोखलेले होते. कोणी तारकांच्या समूहात व्याधांची आणि हरणांची चित्रं पाहिली, कोणी त्यांचा वापर करून जहाजांमधून दर्यावर हुकुमत मिळवत नवीन प्रदेश धुंडाळले, कोणी त्या चांदण्याला कवितेत बांधलं तर कोणी त्यांची निरीक्षणं करून पंचांगं तयार केली, तर बहुतेक इतरांनी जमिनीला पाठ लावल्यावर झोपेच्या अधीन होण्याआधी डोळे भरभरून हे तारे पाहिले. प्रत्येकालाच या अथांग आकाशाने कधी ना कधी मंत्रमुग्ध केलं हे निश्चित. पूर्वी अनेकांची समजूत होती की देवाने माणसाला प्रकाश मिळावा म्हणून चंद्र-सूर्य तयार केले आणि आकाशाचं छप्पर त्यावर बांधलं. त्या छपराला पडलेल्या भोकातून त्या पलिकडचा स्वर्गीय प्रकाशच लुकलुकतो जणू. पण आता आपल्याला माहीत आहे की हे लुकलुकणारे ठिपके म्हणजे आपल्या सूर्यासारखेच तारे आहेत. काही ठिपके तर आपल्या आकाशगंगेप्रमाणे इतर दीर्घिका आहेत. त्यांमध्ये अब्जानुअब्ज तारे आहेत. किती तरी ताऱ्यांभोवती पृथ्वीसारखे ग्रह आहेत. आणि कुणास ठाऊक, त्यांतल्या अब्जावधी ग्रहांवर आपल्यासारखेच जीवही असतील. हा महाप्रचंड पसारा पाहिल्यावर आपल्याला अनेकदा आपल्या लहानपणाची जाणीव होते. मी, माझं विश्व, माझे त्रास, माझे प्रश्न, माझे आनंद, माझी दुःखं - ही सगळी मला मोठी वाटतात. पण अब्जावधी प्रकाशवर्षांच्या महाप्रचंड विश्वात आपण म्हणजे कःपदार्थ! हा स्वतःच्या क्षुद्रतेचा विचार काहीसा धक्का देणारा असतो. पण त्याच धक्क्यामध्ये आपलं मीपण सांडवून टाकून देण्याची क्षमता आहे. वैज्ञानिक लोक कदाचित विश्व नक्की किती मोठं आहे हे गणितं करून सांगू शकत असतील. पण आपल्या डोळ्यांसाठी ते अनंतच दिसतं. या अनंतात एक क्षणभर का होईना, विलीन होणं हे सुखद असतं. अवकाशाचा आवाका जसा महाप्रचंड आहे तसाच काळाचाही. आपण जन्मतो आणि ऐशी-शंभर वर्षं जगतो. आपल्या आजीआजोबांविषयीची माहिती आपल्याला त्यांच्या तोंडून कळते. त्याआधीचा इतिहास आपण पुस्तकांमधून वाचतो, सिनेमांमधून पाहातो. पण हजार दोन हजार वर्षं मागे जायला लागलं की इतिहासही अंधूक, धूसर व्हायला लागतो. आणि तेही समजण्यासारखं आहे. माणूस ज्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून जन्माला आला, त्या प्रक्रियेचा हा परिणाम आहे. जगण्यासाठी त्याला काल, परवा, आत्ता, या क्षणी, गेल्या मिनिटात, काय झालं एवढंच जाणून घेणं आवश्यक असतं. एखाद्या गोष्टीचे परिणाम शंभर वर्षांनी काय होतील याची पर्वा करण्याची गरज नसते, उपयोगही नसतो. तसंच शंभर वर्षांपूर्वी, हजारो वर्षांपूर्वी काय झालं ज्यामुळे आजच्या क्षणीचं सत्य समोर दिसतं आहे, हेही समजून घेण्याची गरज नसते. त्यामुळे आपली काळाची जाण ही सेकंद-मिनिट-तासावर अधिक असते. दिवस-महिना-वर्षाच्या गोष्टीही जाणून घेऊ शकतो. पण त्या जाणीवांना तितकी धार नसते. दशकं-शतकं-सहस्रकांची तर बातच सोडा. ताऱ्यांकडे पाहाताना जशी दृष्टी तोकडी पडते, तशीच अतिप्राचीन काळाकडे मागे वळून पाहातानाही आपली जाणीव थिटी पडते. अतिप्राचीन म्हणजे नक्की किती प्राचीन? या विश्वाचाच जन्म सुमारे चौदा अब्ज वर्षांपूर्वी झाला. पृथ्वीचा जन्म सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाला. मनुष्याचे जवळचे जातभाई सुमारे वीस लाख वर्षांपूर्वी पृथ्वीतलावर अवतरले. आणि आपला ज्ञात इतिहास आहे काही हजार वर्षांचा. अब्ज, कोटी, लाख, हजार - नुसते कोरडे आकडे बनतात. इतक्या मोठ्या आकड्यांनाही आपल्याला सहजपणे गवसणी घालता येत नाही. एकावर तीनचार पलिकडे शून्यं पडली की 'खूप खूप' पलिकडे समजण्यासाठी आपल्याला गणितं करावी लागतात. त्यापेक्षा आपण एक डोळ्यासमोर प्रतिमा उभी करू. कल्पना करा की तुम्ही दोन्ही हात पसरून उभे आहात. तुमची पसरलेली एक वाव म्हणजे आत्तापर्यंत पृथ्वीवर गेलेला एकंदरीत काळ. तुमच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाचं टोक म्हणजे पृथ्वीचा जन्म. शून्य वर्ष. आणि उजव्या हाताच्या मधल्या बोटाचं टोक म्हणजे आत्ताचा क्षण. या कवेत तुम्ही पृथ्वीचं आख्खं आयुष्य सामावून घेत आहात. या हातावर मनुष्यप्राणी नक्की कुठे आहे? असं विचारणं म्हणजे 'या महाप्रचंड अवकाशात आपण नक्की कुठल्या कणावर आहोत?' असं विचारण्यासारखंच. आपण प्रयत्न करून पाहू. तुमच्या डाव्या हाताच्या मनगटापर्यंत संपूर्ण अंधार आहे. त्या पहिल्या सुमारे पन्नास कोटी वर्षांआधीचं आपल्याला काहीच माहीत नाही. आपल्याला माहीत असलेले सर्व दगड त्यानंतरचे आहेत. तुमचं मनगट आणि कोपर यामध्ये कुठेतरी अगदी साधे, आदीम जीव पृथ्वीवर अवतरले. हे सर्व जीव एकपेशीय होते. आणि पुढच्या काहीशे कोटी वर्षांपर्यंत सगळी जीवसृष्टी एकपेशीयच होती. तुमच्या डाव्या खांद्याच्या आसपास कधीतरी वातावरणात ऑक्सिजनची वाढ व्हायला लागली. आणि त्याचबरोबर एकपेशीय जीवांची सद्दी संपण्याचे दिवस सुरू झाले. पण तरी हे ताबडतोब झालं नाहीच. पृथ्वीच्या आयुष्याचा विचार करताना तसंही 'ताबडतोब' काहीच होत नाही. त्यानंतर शंभरेक कोटी वर्षांनी, तुमच्या डोक्यापलिकडे, उजव्या खांद्याच्या आसपास पृथ्वीला द्विपेशीय जीवांचं दर्शन झालं. एकदा दोन पेशींचे जीव तयार झाल्यानंतर मग पुढच्या उत्क्रांतीने काहीसा 'वेग' पकडलेला दिसतो. उजव्या कोपराच्या थोडं पुढे, म्हणजे पुन्हा साधारण शंभरेक कोटी वर्षांनी आपल्याला आपल्याला काही जटिल जीवांचे पुरावे मिळतात. पण तुम्ही जोपर्यंत मनगटांपर्यंत येत नाही तोपर्यंत कुठल्याच जीवाला हाडं, कवच, दात वगैरेंप्रमाणे कठीण भाग तयार झालेले दिसत नाहीत. तसं झाल्यानंतरच अश्मीभूत झालेले जीवनाचे स्पष्ट ठसे आपल्याला सापडतात. मधल्या बोटाची पहिली दोन पेरं म्हणजे डायनोसॉरचा कालखंड. उरलेलं पेर म्हणजे त्यानंतरची साडेसहा कोटी वर्षं. त्यानंतर माणूस कधी आला? सुमारे साठ ते सत्तर लाख वर्षांपूर्वी मानवाचा मूळ पूर्वज पृथ्वीवर वावरत होता. हा प्राणी दोन पायांवर चालण्याचा प्रयत्न करत असे. चिंपांझी किंवा गोरिलांप्रमाणे चालताना हाताची मूठ टेकवून चालत असे. त्याच सुमाराला दोन पायांवर चालणारे आणि हाताच्या मुठींचा वापर करत चालणारे चिंपांझी-गोरिलासारखे प्राणी यांच्या वंशवृक्षाच्या फांद्या वेगळ्या झाल्या. त्यानंतर द्विपादांची फांदी ऑस्ट्रॅलोपिथेकस, आणि होमो इरेक्टस, होमो सेपिअन्स अशा पायऱ्यांनी पुढे गेली. आपण पसरलेल्या काळाच्या वावेत हे अंतर किती आहे? सुमारे सत्तर लाख वर्षं म्हणजे आपल्या बोटाच्या पेराचा एक दशांश भाग. त्यानंतर आलेले होमो सेपिअन काही लाख वर्षांपूर्वीचे, साधारण पंधरा दिवस वाढलेल्या, आता कापायला झालेल्या नखाइतकं अंतर व्यापतात. आणि आपल्याला माहीत असलेला लिखित इतिहास? शेतीप्रधान संस्कृतीनंतरचा इतिहासच आपल्याला वेगवेगळ्या संस्कृती म्हणून ठाऊक आहे. या संस्कृतीत काय येत नाही! हराप्पा-मोहेंजोदारो, इजिप्तचे पिरॅमिड, बाबिलोनियन सुमेरियन संस्कृती, महाभारत-रामायणांसारखी महाकाव्यं, सिकंदर-पोरसाची लढाई, येशू-बुद्ध-पैगंबरांचे धर्म, चेंगीझ खान-हिटलरसारखे क्रूरकर्मा आणि त्यांची युद्धं सगळं काही येतं. ज्ञात-अज्ञात अशा अब्जावधी लोकांची आयुष्यं, त्यांची सुखं-दुःखं, त्यांनी जीवनाशी दिलेले लढे, त्यांचे लहानमोठे जय-पराजय... अब्जावधी आयांनी आपल्या मुलांना दिलेले जन्म आणि सोसलेल्या वेदना, जोपासलेल्या आशा, त्यांची फळलेली किंवा विझलेली स्वप्नं... एवढा महाप्रचंड आवाका या काळाच्या कवेत कुठे बसतो? तुमच्या किंचित वाढलेल्या नखाकडे पाहा. आता ते नख भिंतीवर थोडं घासा. नखाचे काही कण निश्चितच भिंतीला चिकटले असतील. तुमच्या नखाची लांबी किंचित कमी झाली. काळाच्या कवेच्या तुलनेत मनुष्याच्या इतिहासाची आणि संस्कृतीची लांबी एवढीच आहे. आपल्या केसाच्या जाडीच्या सुमारे एक शतांश! आपल्या आकाशगंगेत दहाहजार कोटी तारे आहेत, अशा अब्जावधी आकाशगंगा आहेत... कित्येक ताऱ्यांभोवती ग्रह फिरतात... त्या ग्रहांवरही कदाचित सृष्टी असेल, त्यांच्यातही आपल्यासारखे प्रगत जीव असतील. त्यांचेही इतिहास कदाचित असेच समृद्ध असतील. कदाचित त्यांचेही इतिहास अशाच नखाच्या टोकांवर मावणारे असतील. त्यांनाही त्या नखाच्या टोकावरच्या कणाच्याही कणात आपलं आयुष्य मर्यादित करण्याची सवय असेल. आपण आपलं आयुष्य असं कणात व्यतित करतोच. पण याचा अर्थ असा नाही की तो आपला लहानगा कप्पा सोडून इतर विश्व तपासून पाहूच नये. आपण लहान आहोत, क्षुद्र आहोत म्हणून इतक्या भव्य दिव्यतेकडे डोळे उघडून पाहूच नये असं नाही. किंबहुना या विराट विश्वाकडे पाहून त्यातल्या प्रत्येक कणाच्या वेगळेपणातून आपण थक्क व्हायला हवं. आपल्या मर्यादित कणाच्या मर्यादित अवकाशात डोळ्यांवर झापड लावून बसलो, तर या आनंदाला आपण मुकून जाऊ. कणाकणाने का होईना, पण या विश्वरूपाचं आपण दर्शन घेण्याचा प्रयत्न करायला हवा. या काळाच्या विशाल कवेत आपला कण सामावून देऊन त्याला आपले हात पसरून मिठी मारायला हवी. (मी मराठी लाइव्हवर पूर्वप्रकाशित)
वर्गीकरण
लेखनप्रकार

137 टिप्पण्या 48,983 दृश्ये

Comments

बबन ताम्बे नवीन

In reply to by संदीप डांगे

पण हे विश्व असे दूर दूर जाऊन कीती फुगणार आहे ? विश्वाची अनंत पोकळी हे खरेच गुढ आहे आणि आमच्या सारख्या सामान्य माणसांच्या बुद्धी पलीकडे आहे. जाऊ दया, तुम्ही म्हणता तसे इथेच आधी भरपूर गोंधळ आहेत. समस्या आहेत, टेंशन आहेत. विश्वाचे गुढ उकलेल तेंव्हा उकलेल. मुलाची कॉलेजची (प्रचंड) फी भरून येतो. :-)

डॉ सुहास म्हात्रे नवीन

लेखात बाकी सगळे सिध्दांत (सिध्दांतच आहेत ते) ठीक आहेत... आता ते सद्या सर्वात जास्त विश्वासू असल्याने, ते धरूनच विचार करावा लागतो आहे. पण ते सिध्दांत आहेत नियम (लॉ / अंतिम सत्य) नाहीत. पण ते काळाचं बघा जरा... काळ ही मानवाच्या कल्पनेतून आलेली "संकल्पना" व "एखाद्या घटनेचा प्लेसहोल्डर किंवा दोन घटनांमधिल लिनियर संबंध मोजण्याच्या गरजेपोटी निर्माण केलेले अर्बिट्ररी साधन आहे".. जसे मीटर भौगोलीक अंतरमोजण्याच्या गरजेपोटी, ग्रॅम वजन मोजण्याच्या गरजेपोटी, इ. इ. इ. अश्या अर्बिट्ररी साधनांत एक माणसाने ठवलेले एकक असते. उदा: 1. International Prototype Metre is the distance between two lines on a standard bar composed of an alloy of 90% platinum and 10% iridium, measured at the melting point of ice. 2. Under the International System of Units (via the International Committee for Weights and Measures, or CIPM), since 1967 the second has been defined as the duration of 9192631770 periods of the radiation corresponding to the transition between the two hyperfine levels of the ground state of the caesium 133 atom. अमिबाला किंवा त्या अगोदरच्या नायट्रोजनच्या कणाला काळ ही संकल्पना सुचली नाही किंवा तिची त्यांना गरजही नव्हती. काळ आणि तो मोजणे ही मानवाची गरज आहे. त्याकरिता वर सांगितल्याप्रमाणे एखाद्या घटनेचा प्लेसहोल्डर* किंवा दोन घटनांमधिल लिनियर संबंध ठरविण्याच्या गरजेपोटी मानवाने काल/वेळ ही कल्पिलेली संकल्पना आहे. एक मात्र नक्की, काल/वेळ ही मानवी संकल्पना आस्तित्वात येण्याअगोदर कोणत्या रुपात का होईना हे विश्व होते. कारण, अगदी बिग बँग सुध्दा (झाला असल्यास) नथिंगनेसमध्ये शक्य नाही ना ?! तसेच, हे विश्व मानवानंतरही शिल्लक राहीलच. कारण, सर्व मॅटर व उर्जा मानवाबरोबर एकदम नष्ट होणार नाही. मात्र, काल/वेळ ही संकल्पना मानवाबरोबर नष्ट होईल... अर्थात, तिचा वापर करणारी अजून काही दुसरी प्रजाती निर्माण झाली तर शिल्लक राहीलही... पण तेव्हाही काल/वेळ संकल्पनेच्या रुपातच असेल ! :) === * काल हा प्लेसहोल्डर म्हणुन वापरताना (उदा. ३ डिसेंबर २०१५ या दिवशी सकाळी ९ वाजता अमुक घटना घडली) सुध्दा खरे तर आपण त्या घटनेचा "०१ जानेवारी ०००१ च्या सकाळचा पहिला सेकंद" या अर्बिट्ररी बिंदूशी असलेला संबंध अर्बिट्ररी मापनांने (वर्षे, दिवस, तास, मिनीटे, सेकंद) मोजत असतो !

pacificready नवीन

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

>>>एक मात्र नक्की, काल/वेळ ही मानवी संकल्पना आस्तित्वात येण्याअगोदर कोणत्या रुपात का होईना हे विश्व होते. कारण, अगदी बिग बँग सुध्दा (झाला असल्यास) नथिंगनेसमध्ये शक्य नाही ना ?! तसेच, हे विश्व मानवानंतरही शिल्लक राहीलच. कारण, सर्व मॅटर व उर्जा मानवाबरोबर एकदम नष्ट होणार नाही. मात्र, काल/वेळ ही संकल्पना मानवाबरोबर नष्ट होईल... अर्थात, तिचा वापर करणारी अजून काही दुसरी प्रजाती निर्माण झाली तर शिल्लक राहीलही... पण तेव्हाही काल/वेळ संकल्पनेच्या रुपातच असेल ! :) नेमकं! बाकी ऊर्जा कधीही उत्पन्न अथवा नष्ट करता येत नाही तिचं रूपांतरण फ़क्त होतं हां भौतिक शास्त्राचा नियम बिग बँग मानल्यास मोडून पडतो का असा प्रश्न (माझ्या मनात) निर्माण होतो. एका काही नसलेल्या बिन्दुतून विश्व निर्माण होऊ शकतं या गोष्टीवर कसा विश्वास बसावा? लांबी रुंदी उंची खोली नसलेला पण प्रचंड घनतेचा एक बिंदू स्फोट झाला आणि त्यातुन विश्व निर्मिती झाली यावर विश्वास ठेवायचा. कधी तरीच् चालणारं डोकं पण बंद पडतंय

संदीप डांगे नवीन

In reply to by pacificready

जे लोक 'सुरुवात कुठून झाली?' ह्या बायबली प्रश्नातच अडकून पडले आहेत त्यांना उर्जेचं हे वैशिष्ट्य नाकारावंसं वाटणं सहज आहे. आकाशगंगा एकमेकांपासून दूर जातायत ह्या फॅक्टवर त्यांची बिगबँग थेरी अवलंबून आहे. देवाचं अस्तित्व नाकारणे ह्या एकमेव मोहिमेवर असल्यासारखे बायबल मधे जे लिहिलंय ते खोटं आहे हे सिद्ध करण्याचा आटापिटा हेच ह्या मोहिमेचं लक्ष्य असल्यासारखं वाटतं. हिंदू तत्त्वज्ञानानुसार विश्वाचं अनादि-अनंतत्त्व मान्य करून त्यादृष्टीने काही शोधण्याचे प्रयत्न झालेत का कधी? माझ्यामते एकदा विश्वाचं हे वैशिष्ट्य मान्य केले की फुकाची संशोधने बंद होऊन माणूस स्वतःवर जास्त फोकस करू लागेल.

sagarpdy नवीन

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एवढा गोंधळ होण्यासारखं काय आहे ते समजेना झालाय !
जसे मीटर भौगोलीक अंतरमोजण्याच्या गरजेपोटी, ग्रॅम वजन (खरे तर वस्तुमान) मोजण्याच्या गरजेपोटी, इ. इ. इ. आहेत तसेच काळ मोजण्यासाठी वर्षे, दिवस, तास, मिनीटे, सेकंद आहेत.
आता जर अंतर, वस्तुमान या मिती असून त्याच्या मापनाची एकके मानवनिर्मित आहेत असे मान्य असेल, तर काळ हि मिती असून एकके मानवनिर्मित आहेत असे म्हणण्यास हरकत नसावी. मानव जाती नष्ट झाल्याने जर अंतर/वस्तुमान या मिती संपणार नसतील, तर काळ हि मिती का संपावी ?

pacificready नवीन

In reply to by sagarpdy

Observer (निरीक्षक) नसताना त्या गोष्टीचा relevence (असलं काय नसलें काय) राहत नाही. हे म्हणजे 'बघा मी आल्यापासनं बघतोय, इथं ना काही नव्हतं 5 वर्षापूर्वी. आता भसभसा बिल्डिंगा वाढल्यात' सारखं आहे. एका विशाल पटलावर माणूस नावाच्या तथाकथित बुद्धिवादी प्राण्याच्या मेंदूत आलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी 'कुणी गोविन्द घ्या, कुणी गोपाळ घ्या' चालीवर कुणी 'वाय' घ्या कुणी 'झेड' घ्या कुणी 'वायझेड' दोन्ही घ्या कुणी शुन्य घ्या असला काही घोळ आहे. (एक्स आपल्याला बीजगणितात सापडतो. एंगेज आहे ना तो!)

sagarpdy नवीन

In reply to by संदीप डांगे

का ? जरी मानवी अस्तीत्व गुर्जीनी सांगितल्याप्रमाणे नखाएवढेही नाही, तरी दोन हात लांबीचा 'इतिहास' आहेच ना ?

संदीप डांगे नवीन

In reply to by sagarpdy

नाही. तो प्रश्न वेगळा. विश्वाचा एकूण पसारा शेवटी मुलकण आणि त्यातल्या प्रोटॉन-न्युट्रॉन-इलेक्ट्रॉन ह्या त्रिगुणांवर येऊन थांबतो. सर्व विश्वाचं अस्तित्व ह्या त्रिकुटावर येऊन थांबतं. माणसाचं असणं आणि विचार करणे, स्मरण ठेवणं, रंग, आकार बघणं ह्या इंद्रियाधारित क्रिया ह्या सगळ्या काढून टाकल्या तर सर्व जग एक निरस अणूकणांची झटापट आहे. त्यात इतिहास भूगोल काही नाही. जर काहीच नष्ट होत नाही आणि निर्माण होत नाही तर इतिहास आणि काळाला काय अर्थ राहतो. ह्या मानवी संकल्पना झाल्या. ज्या भासमान आहेत. या विश्वात पाणी आणि पर्वत एकसमान आहेत. अग्नी आणि वायू एकमेकांचीच रुपे आहेत. माणसाला वा सजीवाला ती भिन्न जाणवतात. म्हणून ती तशीच आहेत असे नाही.

sagarpdy नवीन

In reply to by संदीप डांगे

कशाला विज्ञानात तत्त्वज्ञान घुसडताय ? मानवाचे (म्हणजे स्वतःचे) अस्तित्त्व नाही तर या विश्वाला आणि त्यातील घडामोडींना काही अर्थ नाही असे स्वकेंद्रित मत तुम्ही मांडत आहात का ?

संदीप डांगे नवीन

In reply to by sagarpdy

असं आहे काय? मी लिहिलेल्या प्रतिसादातलं एकतरी वाक्य खोटं आहे काय हे सांगा. बरं ह्या सगळ्या घडामोडींच्या उकलीची गरज मूळात कोणाला व का आहे हेही सांगा. मग बघू कशात काय घुसडलं जातंय ते.

sagarpdy नवीन

In reply to by संदीप डांगे

तंत्रीकतेत न जाता
निर्माण होत नाही तर इतिहास आणि काळाला काय अर्थ राहतो.
याचा अर्थ तुम्ही या दोन्ही गोष्टींचे (तुमच्या दृष्टीने निरर्थक) अस्तीत्व मानवी अस्तीत्व नसले तरी मान्य करता. एवढे सध्या बास !

संदीप डांगे नवीन

In reply to by sagarpdy

ते ठिक आहे. पण मी विज्ञानात तत्त्वज्ञान घुसडले जे म्हणालात त्याचं काय? कुठे घुसडले तत्त्वज्ञान ते सांगितले नाही आपण. आपली चर्चा डॉक्टरसाहेबांनी लिहिलेल्या प्रतिसादावर आहे. एवढं लक्षात ठेवा. आता पुढे. समजा मी किंवा तुम्ही अमर झालो अगदी बिलीयन ट्रीलियन वर्षे काहीसुद्धा होणार नाही. खायला मिळो न मिळो. हवा, पाणी म्हणजे जगायला आवश्यक असे काहीच मिळाले नाही तरी जीवंत राहिलो. आणि एवढी लाखो-अब्जो वर्षांची आपली स्मरणशक्तीही शाबूत राहीली. म्हणजे अगदी मिलीसेकंदाच्या फरकाने घडणार्‍या घटनाही तुम्हाला आठवत असल्या. तर त्या अवस्थेत काळ ह्या संकल्पनेला काहीही अर्थ राहत नाही. हा डॉक्टरांच्या सांगण्याचा उद्देश आहे. अणुरेणु आकार बदलत आहेत अनादि-अनंत. ते जसे पुर्वी होते तसेच आताही आहेत. मनुष्याच्या पिढ्या विभागल्या गेल्यात म्हणून काळ ह्या संकल्पनेचा भास होतो. अन्यथा सगळं इथे जसंच तसंच आहे आणि राहणार. यात कुठले तत्त्वज्ञान आहे ते सांगा बरे. वेळ ही रीलेटीव कंसेप्ट आहे. ह्यातच सगळे आले. आइन्स्टाइन साहेब तत्त्वज्ञानी होते. वैज्ञानिक नाही असं काही म्हणायचं आहे काय तुम्हाला? कारण हे सगळं त्यांनीच लिहिलंय हो. Surprising as it may be to most non-scientists and even to some scientists, Albert Einstein concluded in his later years that the past, present, and future all exist simultaneously. In 1952, in his book Relativity, in discussing Minkowski's Space World interpretation of his theory of relativity, Einstein writes: Since there exists in this four dimensional structure [space-time] no longer any sections which represent "now" objectively, the concepts of happening and becoming are indeed not completely suspended, but yet complicated. It appears therefore more natural to think of physical reality as a four dimensional existence, instead of, as hitherto, the evolution of a three dimensional existence. मी काही वेगळं बोल्लोय काय यापेक्षा? की साहेबांची ही थेरी बाद झाली? थोडं इथेही वाचून घ्या. स्पेसडॉट्कॉम आहे, बुवाबाजीडॉट्कॉम नाही. http://www.space.com/29859-the-illusion-of-time.html

आरोह नवीन

In reply to by संदीप डांगे

आईनस्टाईन पेक्षा तुम्ही काहीही वेगळे बोलत नाही..तुमच्या आनुमोदनाने आज आईनस्टाईन साहेब धान्य धान्य झाले

sagarpdy नवीन

In reply to by संदीप डांगे

रीलेटीविटी मधील "काळा"ची निरीक्षकासापेक्षता जशी आइन्स्टाइन ने मांडली तशीच स्पेसची देखील. त्यामुळेच माझा आधीचा प्रतिसाद बाद होत नाही. या मितीचे अस्तित्त्व (अथवा तिचे मानवनिर्मित) असणे व तिचे मोजमाप (आकलन) निरीक्षक सापेक्ष असणे दोन संकल्पनांमध्ये गल्लत करू नये. डॉक्टरसाहेबांनी लिहिले आहे कि
अमिबाला किंवा त्या अगोदरच्या नायट्रोजनच्या कणाला काळ ही संकल्पना सुचली नाही किंवा तिची त्यांना गरजही नव्हती. काळ आणि तो मोजणे ही मानवाची गरज आहे.
अमिबा किंवा नायट्रोजन च्या कणाला "अंतर" हि संकल्पना सुचली होती काय ? आणि यावरच खालची चर्चा सुरु आहे.

शब्दबम्बाळ नवीन

In reply to by sagarpdy

अध्यात्माची चर्चा त्या त्या धाग्यावर व्हावी! नाहीतर कशाचंच अस्तित्व नाही, आपण जे अनु रेणू खातोय त्याची पण गरज नाही चर्चा करण्याला अर्थ नाही म्हणून "ठेविले अनंते तैसेचि रहावे" असे विचार यायला सुरुवात होईल! म्हणून कृपया इथे तरी वैज्ञानिक गोष्टींवर चर्चा करावी!

संदीप डांगे नवीन

In reply to by शब्दबम्बाळ

प्रथमतः माझ्या प्रतिसादात अवैज्ञानिक वा अध्यात्मिक काय आढळलं ते स्पष्ट करावे. नाहीतर कशाचंच अस्तित्व नाही, आपण जे अनु रेणू खातोय त्याची पण गरज नाही असं शक्य आहे काय? चर्चा करण्याला अर्थ नाही म्हणून "ठेविले अनंते तैसेचि रहावे" असे विचार यायला सुरुवात होईल! हे तरी शक्य आहे काय?

राजेश घासकडवी नवीन

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अमिबाला किंवा त्या अगोदरच्या नायट्रोजनच्या कणाला काळ ही संकल्पना सुचली नाही किंवा तिची त्यांना गरजही नव्हती. काळ आणि तो मोजणे ही मानवाची गरज आहे.
कालमापनाचं एकक आर्बिट्ररी आहे असं म्हणणं योग्य आहे. मात्र मानवाच्या आधी काळाची जाणीवच नव्हती हे मी मान्य करणार नाही. आपण करतो इतकी अचूक कालगणना केलेली नसली तरीही सर्वच जीवसृष्टी काळाच्या लयावर चालते. दिवसा उठणारे आणि रात्री झोपणारे प्राणी, वर्षातून विशिष्ट काळात मायग्रेट करणारे पक्षी हे सगळे काही ना काही प्रमाणात काळाशी नातं ठेवून असतात. एक बॉडी क्लॉक सर्वांमध्येच असतं - आपल्या आधुनिक घड्याळांइतकं ते अचूक नसलं तरी शरीराने आपल्या जगण्याची आवर्तनं काळाच्या लयीवरच बांधलेली असतात. त्यामुळे मानवजात नसतानाही काळ ही 'नुसतीच संकल्पना' राहात नाही. त्या कालचक्रानेच जीवसृष्टीचा गाडा पुढे सरकतो.

संदीप डांगे नवीन

In reply to by राजेश घासकडवी

राजेशजी, आपण काळानुसार आवर्तनं मानत नसून आवर्तनानुसार काळ मानतो. आवर्तनं सत्य आहे, काळ भ्रम आहे. काही चुकत असेल तर जरूर कळवा.

राजेश घासकडवी नवीन

In reply to by संदीप डांगे

आवर्तनं सत्य आहे, काळ भ्रम आहे.
आवर्तन या शब्दातच काळ अंतर्भूत आहे. हा मुद्दा मी वरदेखील मांडलेला आहे. मी तुमचाच मुद्दा थोडा बदलून एक विधान करतो 'गती सत्य आहे, अवकाश किंवा अंतर हा भ्रम आहे' हे विधान तुम्हाला मान्य आहे का? या लेखमालेत तुमच्या दुर्दैवाने 'काळ' अशी काहीतरी सत्य, जाणवण्याजोगी संकल्पना आहे हे गृहित धरलेलं आहे. या गृहितकावरच तुमचा आक्षेप असेल तर त्याची एका स्वतंत्र लेखात मांडणी करा ही विनंती करतो. कारण इथे सतत ती चर्चा अनाठायी होईल. या लेखमालेपुरतं तरी काळ ही संकल्पना भ्रम नाही हे मानून या लेखनात इंटर्नल कन्सिस्टन्सी आहे की नाही हे ठरवा इतकंच म्हणू शकेन. जर हे गृहितक तुम्हाला इतकं प्रिय असेल तर या लेखमालेतून तुम्हाला नक्की काही हाती लागेल की नाही याची मला शंका आहे.

संदीप डांगे नवीन

In reply to by राजेश घासकडवी

माझे प्रतिसाद म्हात्रेसाहेबांच्या प्रतिसादावर आधारित आहेत. त्याचा लेखात गृहित धरलेल्या कालमापनाशी संबंध नाही. इतिहास लेखन करायचं तर काळ हे एकक धरायलाच लागेल. पुढचे लेख येऊ देत. आपण लेखाच्या विषयाशी संबंधीतच चर्चा करू. ज्या कुणाला ह्या संकल्पना नीट समजावून सांगायची इच्छा असेल आणि आमचं घोर अज्ञान दूर करायची इच्छा असेल त्यांना नम्र विनंती की कृपया वेगळा धागा काढा. की या लेखमालेच्या समांतर काही विषय असतील ते चर्चीले जातील. धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे नवीन

In reply to by राजेश घासकडवी

मात्र मानवाच्या आधी काळाची जाणीवच नव्हती हे मी मान्य करणार नाही. ही जाणीव

कोणाला

होती ??? मला काय म्हणायचं ते परत जरा वेगळ्या शब्दांत सांगतो... विश्वात असंख्य प्रकारचे बदल घडताहेत (व विश्व नष्ट (?) होणार असले तर, तोपर्यंत) घडत राहतील. माणुस सोडून दुसर्‍या कोणत्याही सजीव अथवा निर्जीव गोष्टींना त्या बदलांचा एकमेकाशी काय संबंध होता / आहे / असेल हे कळत नाही / कळण्याची ताकद नाही / कळण्याची निकड पडत नाही / कळण्याने फरक पडत नाही. माणसाला मात्र भूतकाळातील अवस्था, वर्तमान काळातील अवस्था आणि अगदी भविष्यात काय अवस्था असू शकेल यात (अनेक कारणांनी) रस असतो. अर्थातच मागची अवस्था पुढच्या अवस्थेत केव्हा संक्रमित झाली / होत आहे / होईल हे (अ) त्या एका संक्रमणाबाबतीत व (आ) अनेक संक्रमणांची तुलना करण्याची गरज फक्त मानवालाच आहे. त्यासाठी मानवाने वेळ ही संकल्पना व तिची एकके निर्माण केलेली आहेत. असो. पुभाप्र.

राजेश घासकडवी नवीन

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माणुस सोडून दुसर्‍या कोणत्याही सजीव अथवा निर्जीव गोष्टींना त्या बदलांचा एकमेकाशी काय संबंध होता / आहे / असेल हे कळत नाही / कळण्याची ताकद नाही / कळण्याची निकड पडत नाही / कळण्याने फरक पडत नाही.
हे विधान चुकीचं आहे. अनेक प्राण्यांना आत्ता समोर काय दिसतंय, त्यावरून भविष्यात काय होणार आहे हे ओळखण्याची शक्ती असते, निकड असतेच, आणि फरक पडतो. समोर वाघ दिसला की ताबडतोब पळून जाणं श्रेयस्कर हे अनेक प्राण्यांना कळतं. त्यांचं आयुष्य त्यावर अवलंबून असतं. माकडांना काळाची जाणीव नसते असं तुम्ही सिद्ध करू शकाल का? माणसाने काळ निर्माण केलेला नसून काळ होताच, माणसाने एककं निर्माण केली आणि अचूक मोजमाप सुरू केली इतकंच.

डॉ सुहास म्हात्रे नवीन

In reply to by राजेश घासकडवी

मात्र मानवाच्या आधी काळाची जाणीवच नव्हती हे मी मान्य करणार नाही यात तुम्ही "एकंदर जाणिवे"बद्दल बोलत नसून तर "कालाच्या जाणिवेबद्दल" बोलत आहात असा माझा ग्रह झाला होता व त्यावर मी माझा प्रतिसाद लिहिला होता... तसे नसल्यास तुमच्या वरच्या वाक्यात बदल करावा लागेल असे वाटते. मग माझा प्रतिसादही वेगळा असेल.

डॉ सुहास म्हात्रे नवीन

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

शिवाय... "कालमापन करून त्याचा विचारपूर्वक उपयोग करणे" हे फक्त मानवालाच जमले आहे. किंबहुना आता त्याची ती गरज बनली आहे... बाकी सर्व सजीवांच्या प्रतिक्रिया इतक्या विकसित नाहीत. उदाहरणार्थ, "आता दुष्काळ पडला आहे त्यामुळे आपली भूक तेवढीच असली तरी लहान झालेल्या कळपातील हरिणांना कमी प्रमाणात मारून पुढच्या पावसाळ्यापर्यंत भागवून घेऊ" असे कालमापन व जगून राहण्यासाठी वेळेवर अवलंबून असलेले व्यवस्थापन वाघ, चित्ता किंवा इतर प्राणी करू शकत नाहीत. कारण, त्यांची जाणीव आताची वस्तुस्थिती आणि तिच्यावर केलेली (नैसर्गिक व आठवणींवर अवलंबून असलेली) क्रिया इतपतच मर्यादीत आहेत... यात आजूबाजूच्या भौतीक अवस्थेचा (आवाज, वास, प्रकाश, भूक, समोरच्या प्राण्याचा प्रकार व त्याची ताकद, इ जे त्याच्या ज्ञानेन्द्रियांना जाणवते) यांचा सहभाग असतो... काल/वेळेचा जाणीवपूर्वक उपयोग नसतो.

एस नवीन

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

काळ-वेळेचा जाणीवपूर्वक उपयोग पक्षी-प्राणी करतात. अर्थात, तो मानवाइतका नसतो. तुम्ही दिलेल्या उदाहरणासारखे एक उदा. - दर विणीच्या हंगामाआधी एका प्रजातीचे पक्षी हे ठराविक जागी एकत्र जमून किलकिलाट करतात. जितका आवाज जास्त तितक्या प्रमाणात खाद्य मिळवण्यासाठी स्पर्धा जास्त, म्हणून त्या हंगामात कमी अंडी घातली जातात. दुसरे उदा. - ज्या वर्षी अवर्षण असते त्या वर्षी हरणांना मादी पिल्ले जास्त होतात आणि पाऊस व्यवस्थित असल्यास नर पिल्ले. यामागेही वंशविस्तारासाठीची संधी वाढवण्याचा विचार असतो. हरिणीला मादी पिल्लू झाल्यास दर हंगामात ती किमान एका पिल्लाची आई होत राहून हरिणी आजीचा वंश शाबूत राहील. आणि नर पिल्लू झाल्यास त्या नराला अनेक माद्यांपासून अनेक पिल्ले होतील असे गणित असते. यातले सर्वच काही फक्त नैसर्गिक जाणीव आहे असे म्हणता येणार नाही. आणि मानवाची जी असते ती जाणीव मात्र नैसर्गिक नाही असे कसे?

डॉ सुहास म्हात्रे नवीन

In reply to by एस

तुम्ही म्हणता त्या कृती प्राण्यांनी कालाचे आकलन किंवा कालाचे मापन (वर्ष, महिना, दिवस, इ) करून केलेल्या कृती नाहीत तर त्यांच्या भोवतालच्या भौतीक (दिवसाभरातल्या उजेडातला फरक, हवामानातील दिवसांतर्गत व मोसमांच्या फरकाने होणारे बदल, आजूबाजूच्या अन्न/पाण्याचे स्त्रोत यांतील नैसर्गिक बदल, इ) बदलांवर अवलंबून झालेली त्यांची कृती असते. अश्या कृती मुख्यतः अन्नपुरवठा, सुरक्षा व वंशविस्तार यासंबंधी आजूबाजूच्या परिसराशी जुळवून घेण्यासाठी अथवा स्थान बदलासाठी प्राण्यांनी केलेल्या क्रियांची उदाहरणे आहेत. तुम्ही त्यांचा कालमापनाशी जोडलेल्या संबधाला शास्त्रिय भाषेत "असोसियेशन (बरोबरीने घडणार्‍या पण संबंध नसलेल्या गोष्टी)" म्हणतात, त्या "कॉजल रिलेशनशिप (सकारण संबंध असलेल्या गोष्टी... एक गोष्ट असल्याकारणामुळेच होणारी दुसरी गोष्ट)" नसतात. माणुस सोडून इतर जीवांचे काही व्यवहार वरवर पाहता कालामानाप्रमाणे होतात असे दिसले तरी ते तसे (कालाची जाणीव असल्याने) होत नाहीत याबाबत थोडीशी टोकाची, पण मुद्दा शास्त्रियरित्या सहज सिद्ध करणारी, उदाहरणे अशी... १. आफ्रिकेत लाखोंच्या संख्येने दरवर्षी होणारे विल्डबिस्ट मायग्रेशन हे आजही तेथिल सर्वात मोठे पर्यटक आकर्षण आहे... त्यामध्ये ते प्राणी वर्षभरात ठराविक काळी ठराविक ठिकाणे फिरत हजारो किमीचा प्रवास करत मूळ जागी परत येतात. ते वर्षाच्या कुठल्या महिन्यात कुठे असतील याचा सर्वसाधारण अंदाज सांगता येतो. परंतू याचा अर्थ असा नाही की ते प्राणी वर्षाचा ठराविक महिना पाहून जागा बदलतात ! तर, मोसमाच्या चक्राप्रमाणे जेथे अन्नपुरवठा होतो तेथे ते प्राणी फिरत जातात. एखाद्या वर्षी अवर्षण झाले तर त्यांचे फिरण्याचे वेळापत्रक दर जागेच्या पाणी व अन्नपुरवठ्यावर अवलंबून (वर्षाच्या महिन्यावर अवलंबून / कालाच्या जाणीवेने नव्हे) बदलते. २. मोनार्क फुलपाखरे दरवर्षी उत्तर अमेरिकेतून प्रवास करत ठराविक मार्गाने हजारो किमी दूर दक्षिण अमेरिकेत जातात व मूळ जागी परततात. त्याचे हे फिरणे (मायग्रेशन) कालाचा विचार/जाणीव यातून झाले असे म्हणणे धाडसाचे (अशास्त्रिय) ठरेल... कारण तेवढे करण्याइतका कीटकांचा मेंदू विकसित झालेला नसतो. अर्थातच हे सगळा प्रवास वातावरणातले बदल व अन्नाचा पुरवठा यावरच मुख्यतः अवलंबून असतात आणि हवामान बदलाने त्यांच्या मायग्रेशनमध्ये बदल होतात / होत आहेत. ३. सायबेरिया व इतर भागातले मूळ रहिवासी असलेल्या व भारतात येणार्‍या प्रवासी पक्षांबद्दल आणि प्रदूषण व हवामानातील बदलांमुळे त्यांच्या बदललेल्या संख्या / वेळा / मार्गांबद्दल वर्तमानपत्रांत वाचले असेलच. ४. वातावरणात विपरीत बदल झाल्याने आंब्याला एकदोन महिने अगोदर/उशीरा (अवकाळी) मोहोर येतो... कारण झाडे वर्षाचा महिना (जानेवारी, फेब्रुवारी, इ) पाहून (कालमापन करून) केव्हा मोहोर यावा हे ठरवत नाहीत तर हवामानात ठराविक बदल होण्यावर ते अवलंबून असते. अगदीच साधे उदाहरण द्यायचे तर तीच ती फळे (आंबे, द्राक्षे, इ) पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण गोलार्धात एकमेकापासून सहा महिन्यांच्या अंतराने फळतात व पक्व होतात... कारण या दोन स्थानांतले मोसम एकमेकांच्या विरुद्ध काळी येत-जात असतात. असो. इतक्यावरून मुद्दा स्पष्ट व्हावा.

डॉ सुहास म्हात्रे नवीन

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

याविरुध्द, माणसाची काल आणि त्याच्या मापनाची निकड ही त्याच्या विचारशक्तीच्या विकासामुळे दैनंदिन जीवनाची व कुतुहलाची गरज झाली आहे. त्यांची ढोबळ व्यावहारीक उदाहरणे अशी... १. दैनंदीन जीवन : "माझ्याकडे जानेवारी महिन्यात ३०,००० रुपये हवेतच कारण त्या महिन्याचा घराचा हप्ता २०,००० रुपये आहे आणि माझा घरखर्च १०,००० रुपये आहे." किंवा "या महिन्यात शनिवार, रविवार सोडून मला रोज सकाळी ९:०० वाजता कामावर हजर राहणे आवश्यक आहे." किंवा "माणसाने कोणत्या वर्षी काय (शिक्षणची पूर्तता, नोकरी सुरू, लग्न, मुले, रिटायरमेंट, मरण, इ इ इ) करणे/होणे अपेक्षित आहे?". २. कुतुहल : "शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या साली / आजपासून किती वर्षांपूर्वी झाला?" किंवा "पहिले यशस्वी विमानोड्डाण कोणत्या वर्षी झाले?" किंवा "पृथ्विची / विश्वाची उत्पत्ती किती वर्षांपूर्वी झाली?" किंवा "चंद्राच्या कक्षेत पोहोचायला अपोलो ११ ला किती वेळ लागला ?" किंवा अगदी "मी दर महिन्याला ५,००० रुपये अमुक एका स्कीममध्ये गुंतवले तर त्याचे १,०००,००० व्हायला किती वर्षे/महिने लागतील?".

अर्धवटराव नवीन

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कुठलंही ट्रान्स्फॉर्मेशन व्हायला ट्रान्स्फॉर्मींग मटेरीयलमधे ट्रान्स्फॉर्मेशनची वृत्त्ती म्हणजे काळ. याच वृत्तीमुळे उर्जेची रुपांतरणं होतात, उर्जा गोठली जाऊन मॅटर बनतं आणि मॅटर परत उर्जेत रुपांतरीत होतं.

डॉ सुहास म्हात्रे नवीन

In reply to by संदीप डांगे

कालव्यवस्थापन (Time Management) : एक अपसंज्ञा (चुकीचे नाव, misnomer) इथे लेखाचा मूळ विषय जरा वेगळा असला तरी त्यात "काल" या संकल्पनेबद्दल काही विचार आहेत.

राजेश घासकडवी नवीन

In reply to by कवितानागेश

लेखन तयार आहे म्हणून भसाभस लेख टाकणं मला स्वतःला पटत नाही, आणि संस्थळाच्या वाचकांच्या दृष्टीनेही ते सोयीचं नसतं. प्रत्येक लेखावर चर्चा व्हायला पुरेसा वेळ मिळाला पाहिजे, म्हणून वाट बघतो आहे. तरी सुरूवातीचे लेख प्रास्ताविक अधिक आणि माहिती कमी अशा स्वरूपाचे असल्यामुळे थोडे लवकर टाकायला हरकत नाही.

विवेक ठाकूर नवीन

In reply to by राजेश घासकडवी

तुम्ही मला विचारलं होतं : काळ नसेल तर पृथ्वी स्वतःभोवती कशी फिरेल? स्थिरच राहाणार नाही का? आणि मी म्हटलंय हे म्हणजे घड्याळ नसेल तर माणूस कसा चालेल विचारण्यासारखं आहे. तस्मात, हा उलगडा झाल्याशिवाय पुढे चर्चा काय करणार?

मराठे नवीन

In reply to by विवेक ठाकूर

एकदा 'काळ' या शब्दाची तुमची व्याख्या सांगा बघू. म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय ते तरी कळेल. घड्याळ हे कालमानपाचं एक यंत्र आहे. कालमापन हे मानवनिर्मीत आहे आणि काळ हा अखंड आहे ... असं मला वाटतं. ज्याप्रमाणे स्पेस / अवकाश अखंड आहे, त्याला उंची, लांबी , रुंदी या मापन करण्याजोग्या मिती आपण वापरतो. आणि त्या मोजता येण्यासाठी पट्टी वापरतो. द्विमीतीत राहणारे अमिबासारखे प्राणी उंची मापण्याचा कदाचीत प्रयत्नही करणार नाहीत. पण याचा अर्थ उंची नाहीच असा नव्हे. तसेच काळ मोजताना आपण आधी, आत्ता आणि नंतर अशा शब्दांचा वापर करतो. जरी आपण नसलो किंवा पृथ्वीही अस्तित्वात नसली तरी काळ आहेच. मोजायला कोणी नसलं म्हणून काळ ही संकल्पनाच नाही असं कसं ? मला समजलं नाही.

विवेक ठाकूर नवीन

In reply to by मराठे

काळ हा प्रक्रियेसाठी किंवा घटनेसाठी संदर्भ म्हणून वापरला जातो. म्हणजे प्रक्रियेला इतका काळ लागला किंवा घटना अमक्या वेळी घडली. पण मूळात काळ असं काहीही अस्तित्वात नाही. तास, मिनीट, सेकंद, वर्ष, महिने वगैरे मानवनिर्मित संकल्पना आहेत. त्यामुळे `काळ आहेच' हे विधान चूक आहे. अस्तित्त्वात घटना आणि प्रक्रिया आहेत पण काल नाही. या विपरित, घटना घडल्यावर ती नक्की कुठे घडली यासाठी अमर्यादित अवकाशात एक ठिकाण ठरवले जाते. पण घटना घडण्यापूर्वी अवकाशाची पूर्वोपस्थिती अनिवार्य आहे. तस्मात, अवकाश कायम आहे, घटना किंवा प्रक्रिया घडण्यावर ते अवलंबून नाही. आणि त्याही पुढे जाऊन, घटने किंवा प्रक्रियेचा त्यावर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे जरी आपण नसलो किंवा पृथ्वीही अस्तित्वात नसली तरी काळ आहेच. मोजायला कोणी नसलं म्हणून काळ ही संकल्पनाच नाही असं कसं ? मला समजलं नाही. असं नाही, काहीही प्रकट झालं नाही तरी अवकाश असेल पण काळाची काहीही आवश्यकता नाही.

प्रमोद देर्देकर नवीन

एवढी चर्चा चाललीच आहे तर एक अवांतर प्रश्न ही पृथ्वी व इतर ग्रह हे अवकाशात कसे आहेत? म्हणजे आपण म्हणतो की हिमालयकडची बाजु वरची तर केरळकडची बाजु खालची पण हे पडताळुन पहायला कोणत्या प्रतलाशी जुळवु शकतो काय? जसे एखादा कागद आपण एखाद्या खोलीत सरळ धरला की तिरका हे निश्चित सांगु शकतो तसे. जर नाही तर पृथ्वी हे ग्रह ही आकाशगंगा उभी आडवी कशी आहे हे कुठल्या आधारे सांगु शकतो काय?

पाणक्या नवीन

राजेश साहेब, मनपुर्वक आभार, उत्तम लेख. तुम्ही म्हणाला तसं "तुमच्या डाव्या हाताच्या मनगटापर्यंत संपूर्ण अंधार आहे" याचा अर्थ विश्वाच्या उत्पतीची गुपिते सध्या "झाकल्या मुठीत" आहेत असा घेऊ, पुढे चला.. लिहित राहा.

अक्षय१ नवीन

अब्जावधी प्रकाशवर्षांच्या महाप्रचंड विश्वात आपण म्हणजे कःपदार्थ! हा स्वतःच्या क्षुद्रतेचा विचार काहीसा धक्का देणारा असतो. Pan mi ahe mhanun ya sarv vishwala arth ahe..mi ya vishwat nasen tar kahich nahi..mhanun mi pan mahatvacha ahe