मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बंगालच्या वाघिणी

सर्वसाक्षी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
स्त्री शक्तिचे प्रतिक असलेल्या देवीची अनेक रुपे आहेत, अनेक अवतार आहेत. मात्र बंगालच्या मुला मुलींना भावलेले देवीचे रुप म्हणजे कालिमाता किंवा दुर्गामाता - हातात शस्त्र घेऊन दैत्याचा वध करणारे हाती शस्त्र धारण केलेले रौद्र रुप. मात्र क्रांतिपर्वात याच देवींचे बालिकारुप पाहायला मिळाले. सरकारी अधिकाऱ्यांनी वा मानकऱ्यांनी उन्मत्त होऊन जनतेवर अत्याचार करायचे हा जणु इंग्रजांचा शिरस्ताच होता. हिंदुस्थानात यायचे ते सत्ता आणि वैभव उपभोगायलाच, जणु आपल्या आजवरच्या कर्तबगारीचा राणीने केलेला सन्मान! मात्र विसाव्या शतकात क्रांतिपर्व उजाडले आणि चित्र पालटले. बंगालचे वाघ आणि वाघिणी यांनी प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याला जरब बसवली. ज्याने अत्याचार केले, क्रांतिकारकांचा छळ केला, अनेकदा निरपराधांना तुरुंगात डांबले, निःशस्त्र आंदोलकांवर क्रूर हल्ला चढवायचा, बेदम मारहाण करायची असे कृत्य करण्यात स्वतःला धन्य मानुन सरकारी इतमामाचे पूर्ण मोल व इमानदारी सरकारच्या पदरात घालणारे अधिकारी या वाघ-वाघिणींना सहन झाले नाहीत. इथे आपला माज दाखवणे सोपे नाही आणि केलेल्या प्रत्येक अत्याचाराचा आपल्याला जाब द्यावा लागेल ही जरब प्रत्येक अधिकाऱ्याला बसली. आपण एक अधिकारी ठार केला म्हणुन राज्य लगेच संपणार नाही पण इथे आता ’मुकी बिचारी कुणी हाका’अशी परिस्थिती राहिली नाही, आता आपली जायची वेळ जवळ आली आहे हे सत्तेला समजून चुकले आणि ती समज देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले रक्त खुशीने सांडले. १९३१ मध्ये पूर्व बंगालमध्ये कोमिल्ला येथे नियुक्त झालेला जिल्हाधीकारी स्टिव्हन्स हा एक मग्रूर अधिकारी. याने सविनय कायदेभंगाची चळवळ करणार्‍या सत्यग्रहींवर अमानुष लाठिमार करुन असंख्य सत्याग्रहींना जबर मारहाण केली. अर्थातच क्रांतिकारकांना तो सलू लागला व युगांतर सारख्या क्रांतिकारक संघटनांनी त्याच्या वधाचा विडा उचलला. आपले भवितव्य समजुन चुकलेला तो जिल्हाधिकारी सावध झाला. त्याने बंदोबस्तात राहणे पसंत केले. त्याने सरकारी कचेरीत येणेच बंद केले, तो आपल्या बंगल्यात बसूनच सर्व कारभार बघु लागला. मात्र काहीही झाले तरी या उन्मत्त अधिकाऱ्याला यमसदनास पाठविण्याचा निश्चय क्रांतिकारकांमध्ये पक्का होता. बंगालच्या क्रांतिकारक संघटनांमध्ये मुलीही आघाडीवर होत्या. खुद्द कोमिल्ल्यात युगांतरच्या शाखेत प्रफुल्लनलिनी ब्रह्म हिने अनेक मुलींना प्रभावित केले होते. तिच्याच नेतृत्वाखाली शांती धोष व सुनिती चौधरी यांनी स्वत:ला झोकुन दिले. शांतीचे वडील कोमिल्ला विद्यापिठात तत्त्वद्न्यानाचे शिक्षक होते, आई एक गृहिणी होती. शांतीला आपल्या पित्याकडुनच देशभक्तिचे बाळकडु मिळाले होते. सरोजिनी नायडु यांचे १९२६ साली जेव्हा कोमिल्ला येथे भाषण झाले तेव्हा प्रारंभीचे स्तवन गीत शांतीने म्हटले होते. शाळेत तिची ओळख सुनिती चौधरी हिच्याशी झाली व पुढे दोघीही प्रफुल्लनलिनीबरोबर युगांतर मध्ये सामिल झाल्या जिथे त्यांची भेट प्रख्यात क्रांतिकारक अखिल नंदी याच्याशी झाली. सुनिती चौधरी ही इब्राहिमपूरची, घरची गरीबी. हिच्या प्रमाणेच हीचे दोन भाऊ देखिल क्रांतिकार्यात शिरले होते. मात्र हे पुढे जेव्हा तिला व भावांना सरकारने पकडले तेव्हा उघड झाले, त्याआधी तिला आपले भाउ क्रांतिकार्यात उतरल्याचे व भावांना आपली बहिण क्रांतिकारक असल्याचे माहित नव्हते. क्रांतिकारक संघटनांमध्ये गोपनियतेची शपथ देत असल्याने ते स्वाभाविक होते. कोमिल्ल्यात युगांतरचे कार्यकर्ते होते शांती, सुनिती, प्रफुल्लनलिनी, बिरेन भट्टाचार्य, अखिल नंदी, ललित बर्मन, क्षितिज रॉय आणि त्यांना मार्गदर्शन करीत होते सुपती रॉय. ५ मार्च १९३१ रोजी बिरेन भटाचार्यच्या नेतृत्वाखाली ब्राहमण बारिया येथील ट्पाल कचेरीतून सरकारी खजिन्यत भरण्यासाठी जाणारी पंचविस हजार रुपयांची थैली लुटली. हे पैसे अखिल नंदीकडे सोपविण्यात आले व याच पैशातुन क्रांतिसाठी पिस्तुले व काडतुसे विकत घेतली गेली. क्रूरकर्मा जिल्हाधिकारी स्टिव्हन्स याच्या वधाच्या योजन्या आखल्या जाउ लागल्या. हा शूरवीर आपल्या बंगल्यात जागत्या पहाऱ्यात लपून बसल्याने याला गाठायचा कसा हा प्रश्न भेडसावित होता. साधरणत: स्त्री क्रांतिकारक तोपर्यंत थेट हल्ल्यात सहभागी न होता मदत कार्य, प्रचार कार्य व साधारण क्रंतिकारकांच्या सहायिकांचे कार्य करीत होत्या. मात्र स्टिव्हन्सला घरात शिरुन मारायचा तर मुलींना प्रवेश मिळणे त्यातल्या त्यात शक्य होते तेव्हा या कामासाठे मुलींना निवडायचे का आणि त्या हे करु शकतील का असा विचारविनिमय सुरू झाला. या कामसाठी आपण तयार आहोत आणि ही कामगिरी आपल्यालाच मिळावी अशी मागणी शांती घोष आणि सुनिती चौधरी यांनी केली आणि सगळे चकित झाले. या दोघींचे वय होते फक्त चौदा वर्षे! ईयत्ता आठवीची परिक्षा नुकत्याच दिलेल्या या विद्यार्थिनी. सगळेच स्तिमित झाले. सहा फूट उंचीचा तो आडदांड गोरा समोर उभा राहिला तर या थरथर कापतील, या त्याला काय मारणार अशी शंका व्यक्त होताच त्या वाघिणींनी ठासून सांगितले की त्या ही कामगिरी पार पाडतीलच असा त्यांना ठाम आत्मविश्वास आहे. मग त्या दोघिंनी उलट आपल्या प्रमुखांना सवाल केल की कधी कधी पुरुष क्रांतिकारकांचे हल्लेही यशस्वी ठरले होतेच की, मग आता या दोघींना संधी का मिळु नये? अखेर ज्येष्ठ नेत्यांनी परवानगी दिली. सर्वांना निरुत्तर करीत त्या अवघ्या १४ वर्षांच्या विरांगनांनी ती जबाबदारी उचलली. गोळ्या झाडण्यासाठी गावाबाहेरील कोटबारीच्या जंगलात सराव झाला. या लहान मुलींनी पिस्तुल प्रथमच हाताळले होते. पैकी सुनिती ही कृश अंगकाठीची, तिची बोटे हडकुळी होती. तिला मागचा चाप अंगठ्याने ओढायला जमत नव्हता, तिने आपल्या प्रशिक्षकाला शक्कल सुचविली की मला अंगठ्या ऐवजी मधल्या बोटाने चाप मागे ओढयला शिकव! ही शक्कल लागु पडली. या दोघींनी दोन दिवस सराव केल. तेवढा पुरेसा होता कारण एक तर वेळ नव्हता व दुसरे म्हणजे गोळ्या अगदी जवळुन झाडायच्या होत्या. आणि प्रत्यक्ष कृतिचा दिवस उजाडला - दिनांक १४ डिसेंबर १९३१. कडक्याची थंडी पडली होती. अखिलदांनी पडदे लावलेल्या घोडागाडीतून त्या दोघींना बंगल्याच्या जवळ पास नेउन सोडले. त्या काळी मुसलमान स्त्रिया पडद्याच्या गाडीतुन जा ये करीत असल्याने कुणी शंका घेतली नाही. फाटकापाशी उतरल्यावर या दोघींनी नोंदपुस्तिकेत आपली नावे मीरा व इला अशी लिहिली व आपण ढाक्यात मुलिंसाठी पोहण्याच्या स्पर्धा अयोजित होत असून त्या संदर्भात परवानगीसाठी साहेबाला भेटाला आल्याचे सांगितले. कुणाला संशय आला नाही. दोघी थेट बंगल्यात गेल्या. स्टिव्हन्स बाहेर वरांड्यात येताच दोघींनी आपण ढाका येथुन आलो असुन पोहण्याच्या स्पर्धांमध्ये कोमिल्लच्या मुलींना भाग घेण्यास परवनगी द्यावी यासाठी आपण अर्ज आणला असल्याचे त्यांनी सांगत अर्ज काढुन दिला. हा अर्ज घेउन स्टिव्हन्सने वाचला व त्याने सांगितले की याबाबत मुलींनी मुख्याध्यापिकेला भेटावे. तो तसा शेरा लिहिण्यासाठी आतल्या खोलीत जाताच या दोघींनी शाली दूर सारुन आत लोकरी पोलक्याच्या आंत लपविलेली पिस्तुले बाहेर काढुन सज्ज केली व अर्ज घेउन स्टिव्हन्स बाहेर येताच सुनितीने थेट त्याच्यावर अवघ्या ५-६ फूट अंतरावरुन नेम धरीत धडाधड चार गोळ्या झाडल्या. काय होताय हे समजायच्या आंतच स्टिव्हन्सला गोळ्या बसल्या. त्याने सावरुन पळायचाअ प्रयत्न केला पण सुनितीच्या गोळ्यांनी आपले काम चोख बजावले होते. तो जागीच कोसळला व गतप्राण झाला. आवाज व किंकाळ्या ऐकताच आंत धावलेल्या नेपाळ सेन या सहायक अधिकाऱ्यावर शांतीने गोळ्या झाडल्या पण त्या मधे आलेल्या एका शिपायाला लागल्या. शिपायांनी वेढल्यावरही प्रतिकार करणऱ्या या वाघिणिंना शिपायांनी हाती येताच बेदम मारहाण केली. अवघ्या चौदा वर्षाच्या मुलींनी एका क्रूरकर्म्याला कंठस्नान घालुन नवा ईतिहास लिहिला, त्यांचा पराक्रम सर्वतोमुखी झाला. कॉंग्रेसने मात्र ’उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणास नाही’ या व्रताला जागुन त्यांचा निषेध केला. अवघ्या नऊ दिवसात त्यांच्यावर अभियोग उभा केला गेला व त्यांना ’दयाळुपणे’ फक्त जन्मठेपेची’ शिक्षा फर्मावण्यात आली. शांती घोषने निकाल ऐकताच न्यायधिशाला सुनावले की ’दावणीला बांधलेल्या जनावराप्रमाणे सडण्यापेक्षा आम्हाला फासावर लटकायला आवडेल’. या दोघींनी आपला झुंझार बाणा तुरुंगातही सोडला नाही. अंधारकोठडीला न जुमानत त्या दोघींनी आपल्याला ’क’ ऐवजी राजबंद्यांच ’ब’ वर्ग देण्यात यावा यासाठी अन्नस्त्याग्रह केला. एकदा तुरुंगपर्यवेक्षिकेशी अनैतिक संबंध असलेला एक तुरुंगद्वारपाल जेव्हा वारंवार स्त्री विभागात चकरा मारु लागला तेव्हा त्यांनी त्याच्या विरुद्ध तक्रारी केल्या व आवाज उठवुनही दाद मिळत नाही हे समजल्यावर उपोषणास प्रारंभ केला व अखेर त्याची बदली केली गेली. १९३९ साली आयुष्याची कोवळी वर्षे तुरुंगात करपून गेल्यानंतर अनेक राजबंद्यांबरोबर त्यांचीही सुटका झाली. दरम्यान दोघींच्याही घरची वाताहात झाली होती. मात्र त्यांनी न डगमगता नव्या आयुष्याला सुरुवात केली. सुनिती चौधरी १९४८ मध्ये डॉक्टर झाल्या व त्यांनी वैद्यकिय पेशा स्विकारुन गरीबांची सेवा केली. त्यांनी प्रद्योतकुमार घोष या क्रांतिकरकाशी विवाह केला. शांती घोष यांनी मात्र स्वातंत्र्योत्तर काळातही राजकारणात सक्रिय भाग घेतला. अवघ्या १४व्या वर्षी असा असामान्य पराक्रम करणाऱ्या या मुलींची नावे सुद्धा आपल्याला माहित नाहीत याची खंत वाटते. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यात त्यांचा वाघिणीचा वाटा आहे. आज त्यांच्या शौर्यकृत्याच्या ७७ व्या स्मरणदिनी त्या दोघींना सादर अभिवादन.

वाचने 28747 वाचनखूण प्रतिक्रिया 106

विसोबा खेचर Sun, 12/14/2008 - 03:43
सुनिती आणि शांती या वाघिणींना मानाचा मुजरा..! साक्षिदेवा, 'नाही चिरा नाही पणती..' ही उक्ति लागू व्हावी अश्या अनेक क्रांतिकारकांची आम्हाला केवळ तुझ्यामुळेच ओळख होत आहे..! अवघ्या १४व्या वर्षी असा असामान्य पराक्रम करणाऱ्या या मुलींची नावे सुद्धा आपल्याला माहित नाहीत याची खंत वाटते. खरं आहे! एवढंच नव्हे, तर 'भारताला आजादी विना खड्ग, विना ढाल मिळाली हो..!' अशी गीते गाण्यातच आम्ही धन्यता मानतो..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बगाराम Sun, 12/14/2008 - 04:30
तात्या, तुमच्या परिचयातील कुणा १४ वर्षाच्या चुणचुणीत मुलीकडुन हे काम करुन घ्याल का? कायदा देखिल १८ वयाच्या खालील मुलींना सज्ञान समजत नाही. त्यांना लग्न करण्याची देखिल परवानगी देत नाही. इथे तर चक्क बंदुक चालवुन जीव धोक्यात घालण्याचे प्रशिक्षण दिले जातेय.काहीतरी चुकतय अस वाटत नाही का? सिस्टमॅटीक ब्रेन वॉशींगच नव्हे का हे?

In reply to by विनायक प्रभू

बगाराम Sun, 12/14/2008 - 21:08
एनसीसी मध्ये विद्यार्थ्यांना मिलिटरीची ओळख करुन दिली जाते. भविष्यात त्यांनी सैन्यात भरती व्हावे ह्या अपेक्षेने. एनसीसीत दिलेले प्रशिक्षण घेउन कुणी युद्धावर जीव धोक्यात घालायला जात नाही.

In reply to by विनायक प्रभू

आजानुकर्ण Sun, 12/14/2008 - 22:32
एनसीसीचे प्रशिक्षण घेऊन युद्धावर जात नाहीत. सैन्याचे प्रशिक्षण घेऊन युद्धावर जातात हा बगाराम यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे. आपला, (सार्जंट) आजानुकर्ण

In reply to by विनायक प्रभू

आजानुकर्ण Sun, 12/14/2008 - 22:40
या प्रतिसादाचा चर्चेशी काय संबंध आहे कळला नाही. तसाही मी शांततावादी असल्याने माझ्यासारख्या अल्पवयीन मुलाच्या हातात बॅटन देण्याचा लोकांनी प्रयत्न केला तरी मी ते हातात घेणार नाही. तेवढा मी सुजाण आहे. आपला (हाताची घडी) आजानुकर्ण

In reply to by विनायक प्रभू

बगाराम Sun, 12/14/2008 - 23:41
जाऊ द्या हो! एकंदरीत मुद्दे संपलेले दिसतात. असली विधाने यायला लागली की समजुन जायचे.

In reply to by बगाराम

रामपुरी Wed, 12/17/2008 - 22:00
म्हणजे त्यांनी काय करायला पाहीजे होते असे तुमचे म्हणणे आहे हे तरी कळू दे. १८ वर्षे पूर्ण होण्याची वाट बघायला हवी होती की सैन्यात जाऊन प्रशिक्षण घेउन यायला हवे होते?

In reply to by बगाराम

टग्या Wed, 12/17/2008 - 06:47
काहीतरी चुकतय अस वाटत नाही का? सिस्टमॅटीक ब्रेन वॉशींगच नव्हे का हे?
ब्रेनवॉशिंगचे एक वेळ जाऊ द्या, पण...
५ मार्च १९३१ रोजी बिरेन भटाचार्यच्या नेतृत्वाखाली ब्राहमण बारिया येथील ट्पाल कचेरीतून सरकारी खजिन्यत भरण्यासाठी जाणारी पंचविस हजार रुपयांची थैली लुटली. हे पैसे अखिल नंदीकडे सोपविण्यात आले व याच पैशातुन क्रांतिसाठी पिस्तुले व काडतुसे विकत घेतली गेली.
यह बात कुछ हज़्म नहीं हुई| अर्थात, डेस्परेट (मराठी?) परिस्थितीत, जेव्हा एखादी गोष्ट करायचीच आहे म्हटल्यावर मनुष्य काहीही करू शकतो, पण म्हणून अशा कृत्यांचे समर्थन होऊ शकते काय? प्रस्तुत जिल्हाधिकारी मग्रूर होता, अत्याचारी होता, अमानुष होता आणि म्हणून त्याचा वध करणे गरजेचे / योग्य होते असे जरी (व्यक्तिशः मला जरी पटत नसले तरी) वादाच्या सोयीकरिता मानले, तरी त्याच्या वधाकरिता शस्त्रास्त्रसामग्री आणण्याकरिता पैसे नाहीत म्हणून टपालकचेरी लुटणे हे समर्थनीय होते काय? एकदा "क्रांतीसाठी"म्हटले की काय वाटेल त्याची भलावण होऊ शकते काय? (ही बातमी "टपालकचेरीवर दरोडा" या मथळ्याखाली फिट्ट बसावी. "क्रांतीसाठी" हे लेबल लावल्याने हा दरोडा क्षम्य होतो काय?) मग "शोले"मधला गब्बरसिंग गाववाल्यांना म्हणतो की मी तुमचे संरक्षण करतो आणि त्याच्या बदल्यात जर का मी तुमच्याकडून काही पोती धान्य (जबरदस्तीने) घेतले, तर कोणताही जुलूम करत नाही म्हणून, तर त्याचे लॉजिक नेमके कोठे चुकले? (टपालकचेरीत तरी पैसे येतात ते कोठून? जनतेकडून गोळा केलेल्या महसुलातूनच ना?) आणि हे क्रांतिकारक जर देशासाठी, जनतेसाठी हे सर्व करत होते (म्हणजेच जनतेचे प्रतिनिधित्व करत होते आणि जनतेची त्यांना मान्यता होती), तर जनतेकडून वर्गणी गोळा करून शस्त्रास्त्रांसाठी पैसे गोळा करता आले नसते काय? जनतेने ते दिले नसते काय? (स्वखुशीने की कसे तो नंतरचा प्रश्न.) त्यासाठी दरोडा घालण्याची काय गरज होती आणि दरोडा घालणे हे योग्य होते काय?
क्रूरकर्मा जिल्हाधिकारी स्टिव्हन्स याच्या वधाच्या योजन्या आखल्या जाउ लागल्या. हा शूरवीर आपल्या बंगल्यात जागत्या पहाऱ्यात लपून बसल्याने याला गाठायचा कसा हा प्रश्न भेडसावित होता.
आपल्या हत्येची कारस्थाने रचली जाताहेत, आपला जीव धोक्यात आहे याबद्दल खात्रीलायक कुणकुण लागल्यावर सदर सद्गृहस्थ स्वतःच्या सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी घेणार नाही काय? आणि सदर सद्गृहस्थ हा सरकारी अधिकारी आहे म्हटल्यावर खुद्द सरकार तशी व्यवस्था करणार नाही काय? स्वातंत्र्योत्तर कालात आजसुद्धा महत्त्वाच्या पदांवरील विविध अधिकारी व्यक्तींना, मंत्र्यांना वगैरे ती काय म्हणतात ती झेड सिक्युरिटी वगैरे देत नाहीत काय? आपल्या सुरक्षिततेला असलेल्या धोक्याबद्दल माहिती असूनही सदर महोदयांनी क्रांतीच्या / क्रांतिकारकांच्या सोयीसाठी आपल्या सुरक्षेची किमान खबरदारीसुद्धा घेऊ नये अशी अपेक्षा होती काय? ("शूरवीर" या शब्दावरून तरी तसे वाटले.) तशी अपेक्षा असेल तर या मुलींना कोणत्याही प्रकारची झडती न घेता लपवलेल्या पिस्तुलांसह जिल्हाधिकार्‍यापर्यंत जाऊ देण्यात आले यातून ती अपेक्षा पूर्णच केली गेली, असे म्हणावे लागेल. (किंवा सुरक्षेच्या खबरदारीमध्ये हलगर्जीपणा झाला असे म्हणावे लागेल - टेक युअर पिक.) एखादी कृती (विशेषतः 'वध' वगैरे) ही क्रांतिकारी कृती कधी होते आणि दहशतवादी/अतिरेकी/गुन्हेगारी कृती कधी होते ही मला कधीही न समजलेली गोष्ट आहे. वरील घटनेची इतर दोन घटनांशी तुलना करू या. १. सदर जिल्हाधिकारी हा मग्रूर असून त्याने सत्याग्रहींवर लाठीमार करून असंख्य सत्याग्रहींना बेदम मारहाण केली म्हणून युगांतरसारख्या क्रांतिकारी संघटनांनी त्याचा वध करण्याचा विडा उचलला / ऑपरेशन ब्लू स्टार नंतर काही शिखांनी इंदिरा गांधींची हत्या करण्याचा विडा उचलला / फाळणीनंतर गांधीजी मुसलमानांचा अनुनय करतात असे वाटल्याने आणि विशेषतः गांधीजींच्या पाकिस्तानला पाकिस्तानचेच पंचावन्न कोटी देण्याच्या आग्रहावर नाराज होऊन नथुराम गोडसे प्रभृतींनी गांधीजींचा वध करण्याचा विडा उचलला. २. जिल्हाधिकार्‍याच्या जिवाला धोका आहे याची कुणकुण असूनही या मुलींना कोणतीही झडती न घेता जिल्हाधिकार्‍यापर्यंत शालीत लपवलेल्या पिस्तुलांसह जाऊ देण्यात आले / आपल्या जिवाला धोका आहे याची पूर्ण माहिती असूनही इंदिरा गांधींनी आपल्या (सशस्त्र) अंगरक्षकांमधून शिखांना वगळण्यास नकार दिला / महात्मा गांधींच्या सुरक्षाव्यवस्थेबद्दल कल्पना नाही, बहुधा तेवढी कडक सुरक्षाव्यवस्था ठेवणे शक्यही नसावे आणि गांधीजींचे आपल्या सुरक्षाव्यवस्थेबद्दलचे नेमके विचार काय होते याची कल्पना नाही, परंतु नथुराम गोडसे पिस्तुलासह गांधीजींपर्यंत पोहोचू शकला. ३. पिस्तुलासह जिल्हाधिकार्‍यापर्यंत पोहोचलेल्या मुलींनी जिल्हाधिकार्‍यावर गोळ्या झाडून त्याचा वध केला / इंदिरा गांधींच्या शिख सशस्त्र अंगरक्षकांनी इंदिरा गांधींचा वध केला / पिस्तुलासह गांधीजींपर्यंत पोहोचलेल्या नथुरामने गांधीजींचा वध केला. या तीन घटनांमध्ये नेमका फरक काय? कोणाला तरी आपल्यावर, आपल्या "राष्ट्रा"वर अन्याय आणि जुलूम होतोय असे वाटले, त्याने/तिने त्यासाठी जी व्यक्ती जबाबदार वाटली तिच्या वधाचा पण केला, जिचा वध करायचा त्या व्यक्तीने पुरेशी काळजी न घेतल्यामुळे या व्यक्ती आपापल्या लक्ष्यांपरंत शस्त्रांसह पोहोचू शकल्या आणि त्यांनी आपापल्या लक्ष्यांचा पॉइंट ब्लँक रेंजवर (मराठी?) गोळ्या झाडून वध केला. यातले कोठले कृत्य समर्थनीय आणि कोठले नाही आणि का? यातले "क्रांतिकारक" कोण आणि "दहशतवादी/अतिरेकी/खुनी" कोण आणि कोणत्या निकषांवर? "क्रांतिकारक" म्हणून जेव्हा आपण कोणाचा गौरव करतो, तो पूर्णपणे विचार करून, समजूनउमजून करतो, की केवळ आपल्याला तसे करायला शिकवले गेले आहे म्हणून करतो, हीही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण विचार न करता काहीही केले, तर मग आम्हाला कोणीही (पर्यायाने आमच्या नेत्यांनी) काहीही सांगावे आणि आम्ही ते मागचापुढचा विचार न करता आचरावे, अशी परिस्थिती होते. आणि मग "मुकी बिचारी कुणी हाका रे" ही आमची परिस्थिती होती, हीच आहे, फक्त हाकणारे बदललेत, यापेक्षा तेव्हात आणि आतात काहीही फरक राहत नाही.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Wed, 12/17/2008 - 07:21
वा टग्याजी! १००% विचार पटले.
कुठल्याही एकाच दृष्टीकोनाशी आपण स्वतःला बांधून घेतले ("मॅरींग टू अ सर्टन स्कूल ऑफ थॉट") तर एकूण व्यापक अशा सत्याकडे दुर्लक्ष होते याचे , ही चर्चा म्हणजे एक चांगले उदाहरण आहे.
मुक्तसुनित ह्यंच्या ह्या विधानाचे विस्तृत विवेचन वरील प्रतिसादात वाचायला मिळाले. एकदा का 'क्रांतीकारक' 'जाज्वल्य भक्ति' 'देशासाठी बलिदान' वगैरे उल्लेख केले की बहुतेक लोक भावनेच्या भरात वाहुन जातात. आणि भावनिक झाले की तर्कबुद्धी वापरणे अशक्य होउन बसते, त्यामुळे वरील (कडू) व्यापक सत्ये दुर्लक्षली जाऊन त्यावर फक्त विखारी टीका करण्याचे प्रयत्न होतात. 'किव येते', 'हलकट विचार' इ.इ. शेरेबाजी त्यातुनच होते असे वाटते. गांधीवादी असो वा क्रांतीकारक सगळ्यांचे अंतिम ध्येय स्वातंत्र्यच होते, पण म्हणून आंधळेपणाने त्यांच्या कुठल्याही कृतीचे समर्थन वा अभिवादन करण्यापेक्षा चिकित्सक वृत्तीने त्यातले अनुकरणीय तेवढेच वेचुन काढणे अधिक योग्य. (टग्याजींचा पंखा) कोलबेर

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

मूळ मुद्दा इथे हा आहे की बंगालच्या वाघिणी म्हणा किंवा इतरही क्रांतिकारक म्हणा ज्यानी ज्यानी हत्या केल्या त्या ब्रिटीश अधिकार्‍यांच्या किंवा त्या गोष्टीला कारणीभूत ठरलेल्या लोकांच्या केल्या. त्यांच्यातिक कोणीही रेल्वेस्थानकात, बसमधे बॉम्बस्फोट किंवा बेछूट गोळीबार नाही केला. सामान्य जनतेला त्यात वेठीला धरले नाही कोणी. " हनुमंत महाबळी रावणाची लंका जाळी, होते बळ म्हणूनि न जाळि झोपड्या गोरगरीबांच्या" हा फरक लक्षात घ्यावा. आणि क्रांतिकारकानी फक्त खजिन्याचीच लूट केली असं नव्हे. मध्यंतरी तर असे वाचनात आले की क्रांतिकारकानी खंडोबाचे देवस्थान लूटूनही क्रांतिकार्यासाठी पैसा जमा केला होता. आणि त्याबद्दल जनतेने त्याना कदाचित माफ अशासाठी केले असेल कारण त्यांचा त्यामागचा हेतू स्वतःच्या घरचे गल्ले न भरता देश स्वतंत्र व्हावा यासाठी काहीतरी करणे. गांधींनी संरक्षण अथवा शस्त्र जवळ बाळगणे नाकारले असेल तर ते ठीक आहे कारण ते त्यांच्या तत्वानुसार वागत होते. पण इंदिराजी आणि तो ब्रिटीश अधिकारी याना असा अतिरेकी आत्मविश्वास होता की आपल्याला कोण मारू शकत नाही. आणि त्यानेच त्यांचा घात केला. कारण विचार न करता काहीही केले, तर मग आम्हाला कोणीही (पर्यायाने आमच्या नेत्यांनी) काहीही सांगावे आणि आम्ही ते मागचापुढचा विचार न करता आचरावे, अशी परिस्थिती होते. आणि मग "मुकी बिचारी कुणी हाका रे" ही आमची परिस्थिती होती, हीच आहे, फक्त हाकणारे बदललेत, यापेक्षा तेव्हात आणि आतात काहीही फरक राहत नाही. हे बाकी खरे बोललात. ते वारंवार दिसलेच आहे. :) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

टग्या Wed, 12/17/2008 - 21:26
मूळ मुद्दा इथे हा आहे की बंगालच्या वाघिणी म्हणा किंवा इतरही क्रांतिकारक म्हणा ज्यानी ज्यानी हत्या केल्या त्या ब्रिटीश अधिकार्‍यांच्या किंवा त्या गोष्टीला कारणीभूत ठरलेल्या लोकांच्या केल्या. त्यांच्यातिक कोणीही रेल्वेस्थानकात, बसमधे बॉम्बस्फोट किंवा बेछूट गोळीबार नाही केला. सामान्य जनतेला त्यात वेठीला धरले नाही कोणी.
इंदिरा गांधींच्या शिख अंगरक्षकांनी इंदिरा गांधींची हत्या केली, सामान्य जनतेवर गोळीबार नाही केला. नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींची हत्या केली, जमलेल्या इतर उपस्थितांवर गोळ्या झाडल्या नाहीत.
आणि क्रांतिकारकानी फक्त खजिन्याचीच लूट केली असं नव्हे. मध्यंतरी तर असे वाचनात आले की क्रांतिकारकानी खंडोबाचे देवस्थान लूटूनही क्रांतिकार्यासाठी पैसा जमा केला होता. आणि त्याबद्दल जनतेने त्याना कदाचित माफ अशासाठी केले असेल कारण त्यांचा त्यामागचा हेतू स्वतःच्या घरचे गल्ले न भरता देश स्वतंत्र व्हावा यासाठी काहीतरी करणे.
जनतेने माफ केले म्हणजे नेमके कोणी माफ केले? खंडोबाचे देवस्थान त्या काळी ज्यांच्या मालकीचे होते (किंवा ट्रस्टखाली असेल तर ज्या ट्रस्टच्या अधिपत्याखाली होते) त्यांच्या किंवा खंडोबाच्या देवस्थानात त्या काळात दर्शनासाठी किंवा श्रद्धेपोटी नित्याने जा-ये करणार्‍या भक्तांच्या मतांची किंवा भावनांची चाचपणी (सर्व्हे वगैरे) कोणी केली होती काय? आणि माफ केले म्हणजे नेमके काय केले? दुसरा काही पर्याय होता काय? की 'पब्लिक मेमरी इज़ शॉर्ट' याचे हे उदाहरण आहे? क्रांतिकारकांचा हेतू स्वतःचे गल्ले भरण्याचा नव्हता हे शतशः मान्य. पण तरीही देवस्थानाची संपत्ती देवस्थानाच्या परवानगीशिवाय वापरणे - ज्या कार्यासाठी वापरायचे ते कितीही उदात्त असले तरी - समर्थनीय होते काय? देवस्थानाच्या मालकांना / विश्वस्तांना ते कार्य रास्त आणि उदात्त वाटून त्यांनी स्वखुशीने ती संपत्ती क्रांतिकारकांना दान दिली असती तर गोष्ट वेगळी. गल्लीतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन "आपण आपल्या गल्लीसाठी करतो आहोत", "ही आपल्या गल्लीसाठी अभिमानाची गोष्ट आहे", "त्याने आपल्या गल्लीची एकी वाढते" वगैरे कितीही उदात्त हेतूंनी करायचे म्हटले, तरी त्यासाठी वर्गणीची जबरदस्ती करणे किंवा एखाद्याने स्वेच्छेने वर्गणी द्यायचे नाकारले तर "नाही देत काय वर्गणी? गल्लीत ये, मग घेतोच बघून!" असे म्हणणे हे समर्थनीय होते काय? त्याने मूळ कार्याची उदात्तता टिकून राहते काय? हे उदाहरण आणि क्रांतीसाठी देवस्थान लुटणे यात नेमका फरक काय?
पण इंदिराजी आणि तो ब्रिटीश अधिकारी याना असा अतिरेकी आत्मविश्वास होता की आपल्याला कोण मारू शकत नाही. आणि त्यानेच त्यांचा घात केला.
संबंधित ब्रिटिश अधिकार्‍याबाबत कल्पना नाही, परंतु इंदिरा गांधींच्या बाबतीत माझ्या अर्धवट ऐकीव माहितीप्रमाणे (चूभूद्याघ्या!) इंदिरा गांधींना त्यांच्या जिवावरील संभाव्य धोक्याची पूर्वसूचना आणि अंगरक्षकांमध्ये शिखांची नेमणूक न करण्याचा सल्ला गुप्तचरांकडून मिळाला होता, परंतु "हे खरे असले तरीही मी माझ्या अंगरक्षकांच्या नेमणुकीत भेदभाव करू शकत नाही" म्हणून त्यांनी तो नाकारला होता. आधी म्हटल्याप्रमाणे ही ऐकीव माहिती आहे, त्यात कितपत तथ्य आहे याची मला कल्पना नाही, स्वतंत्र वाचनातून याची मी अद्याप खात्री करून घेतलेली नाही, परंतु यात तथ्य असल्यास त्याला अतिरेकी आत्मविश्वास म्हणावा की तत्त्वनिष्ठा की आणखी काही, याचा निर्णय मी करू शकलेलो नाही. अवांतर:
" हनुमंत महाबळी रावणाची लंका जाळी, होते बळ म्हणूनि न जाळि झोपड्या गोरगरीबांच्या"हा फरक लक्षात घ्यावा.
लंकेत गरीब नव्हते का? लंकेतल्या झोपड्यांत राहणार्‍या गरिबांनी सीतेचे हरण केले होते का?

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण Wed, 12/17/2008 - 21:31
लंकेत गरीब नसावेत. कारण लंका सोन्याची होती. (सोन्या हे रावणाचे लहानपणीचे नाव). त्यामुळे कोणालाही वाटले तर काढ एक सुवर्णवीट आणि वीक असे करु शकत असावेत. आपला, (रावण) आजानुकर्ण

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

एकलव्य Wed, 12/17/2008 - 08:20
टगेदादा - आपले भलतेच ब्रेनवॉशिंग झालेले दिसते आहे. चला आम्हीही सामील होतो आणि लिस्ट वाढवितो... सांगा बरे - फरक तो काय?
  1. शिवाजी महाराजांनी लाल महालावर रात्री घातलेली धाड आणि अफजलने केलेला पार्लमेन्टवरील हल्लाबोल
  2. मराठ्यांनी फोडलेले दिल्लीचे तख्त आणि अफगाणिस्तानात तालिबान्यांनी महाबुद्धाचा केलेला ध्वंस
  3. भगतसिंगाने झाडलेल्या गोळ्या आणि जनरल डायरने दिलेला गोळीबाराचा आदेश
  4. सुभाषबाबूंनी इशान्य भारतावर केलेले आक्रमण आणि हिटलरने इंग्रजांवर म्हणून भारताशी पत्करलेले वैर
  5. बांगला मुक्तिसंघर्ष आणि डायरेक्ट ऍक्शन फॉर पाकिस्तान
  6. ...
म्हटले तर फरक आहे आणि नाहीच म्हटले तर काहीही फरक नाही. तर्क चालू देत... त्याने नुकसान काहीही नाही. (मॅझिनी) एकलव्य Intelligence KILLS Judgment... Slowly but Surely!

In reply to by एकलव्य

आजानुकर्ण Wed, 12/17/2008 - 09:16
मराठ्यांनी दिल्लीचे तख्त वगैरे काही फोडलेले नाही. दिल्लीपर्यंत गेलेले मराठे हे बिकट परिस्थितीची लागल्याची जाणीव होईपर्यंत बादशहाशीच एकनिष्ठ होते आणि सैनिकांचे पगार द्यायला पैसे नव्हते म्हणून मग पेशव्यांनी सिंहासनाचा चांदीचा पत्रा विकून पैसे गोळा केले. त्यालाच आपण तख्त वगैरे फोडले असे म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेतो. आपला, (वस्तुनिष्ठ) सुमेरसिंग आजानुकर्ण गारदी

In reply to by आजानुकर्ण

कोलबेर Wed, 12/17/2008 - 09:47
अजानुकर्ण शेठ, तुमच्यामुळे ही माहिती नविनच कळली. भगतसिंगाने घातलेल्या गोळ्यांमध्ये किती निरपराध मेले आणि डायरबाबाने घातलेल्या गोळ्यांमध्ये किती मेले ह्यांचा ताळमेळ लावला तर ती तुलना देखिल लिष्ट मधुन वगळावी लागेल. सुभाषबाबुंनी केलेले इशान्य भारतावरील (?) आक्रमण ह्या विषयी मात्र फारशी माहिती नाही. -- “The sign of an intelligent people is their ability to control their emotions by the application of reason”

In reply to by कोलबेर

एकलव्य Wed, 12/17/2008 - 17:55
भगतसिंगाने निरपराधांवर गोळ्या झाडल्या नाहीत असे आपण म्हणता आहात पण इंग्रज न्यायाधीश तसे म्हणत नाही. डायरचेही तसेच... आपण पाहाल त्याप्रमाणे आहे. शिवाजीला वाट चुकलेला देशभक्त म्हणणारेही कमी नाहीत. ही तुलना वगळायला हवी हे मान्य आहे पण वगळायचीच तर सगळ्याच वगळाव्यात. तसे यादी वाढवणारे बक्कळ आहेतच म्हणा. चीअर्स - एकलव्य

In reply to by एकलव्य

कोलबेर Wed, 12/17/2008 - 21:39
ही तुलना वगळायला हवी हे मान्य आहे पण वगळायचीच तर सगळ्याच वगळाव्यात.
टगोबांची उदाहरणे खोडून काढायला (त्यातील फोलपणा दाखवायला) तुम्ही मुद्दामच ही उदाहरणे दिलीत ह्याची कल्पना आहे, पण तरिही सगळ्याच तुलना वगळायच्या म्हंटलं तर हे चिकित्सा करुनच ठरवावे (भगतसिंगांच्या उदाहरणा सारखी) असे वाटते. चीअर्स - कोलबेर

In reply to by आजानुकर्ण

छोटा डॉन Wed, 12/17/2008 - 22:42
दिल्लीपर्यंत गेलेले मराठे हे बिकट परिस्थितीची लागल्याची जाणीव होईपर्यंत बादशहाशीच एकनिष्ठ होते आणि सैनिकांचे पगार द्यायला पैसे नव्हते म्हणून मग पेशव्यांनी सिंहासनाचा चांदीचा पत्रा विकून पैसे गोळा केले. त्यालाच आपण तख्त वगैरे फोडले असे म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेतो.
अगदी असेच म्हणतो ... मी जो काही अभ्यास केला आहे त्यातुन हीच परिस्थीती स्पष्ट होतो. मराठ्यांना तख्त फोडले खरे पण ते बहादूरी वगैरे नाही तर "गरज" म्हणुन फोडले हे सत्य आहे. आजानुकर्णाशी सहमत ...! ------ छोटा डॉन

In reply to by एकलव्य

टग्या Wed, 12/17/2008 - 20:46
टगेदादा - आपले भलतेच ब्रेनवॉशिंग झालेले दिसते आहे.
स्वतःच्या हातांनी धुवून जितके स्वच्छ करायला जमले तितके केलेय बुवा. आता लाँड्रीत धुतल्यासारखे एकसारखे पांढरेशुभ्र झाले नसेल, एखाददुसरा डाग राहिलाही असेल - चालायचेच. शेवटी स्वावलंबनाचा मार्ग खरा.
सांगा बरे - फरक तो काय?
तेच तर विचारतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करतोय - समजून घ्यायला आवडेल. मला कळलेला नाही. तुम्हाला कळला असेल तर जरा तुम्हीच समजावून सांगा की!
म्हटले तर फरक आहे आणि नाहीच म्हटले तर काहीही फरक नाही.
फरक आहे असे सतत सांगण्यात, ठसवण्यात आले आहे. फक्त नेमका काय फरक आहे ते कोणी स्पष्ट केलेले नाही. आता इतके जण सांगतात म्हणजे कदाचित त्यात तथ्य असूही शकेल. पण नेमके काय ते स्वतःला नीट समजल्याशिवाय केवळ सगळे सांगतात, सांगत आले आहेत म्हणून मानायचे काय? म्हणून तर म्हणतोय की फरक नीट समजावून सांगा; समजला तर मानायला काहीच हरकत नाही. पण न समजता केवळ 'बाबा वाक्यं प्रमाणम्' (किंवा 'संघं शरणं गच्छामि') म्हणून विश्वास ठेवणे माझ्यापुरते मला तरी योग्य वाटत नाही.

In reply to by विसोबा खेचर

कलंत्री Sun, 12/14/2008 - 12:31
खरं आहे! एवढंच नव्हे, तर 'भारताला आजादी विना खड्ग, विना ढाल मिळाली हो..!' अशी गीते गाण्यातच आम्ही धन्यता मानतो..! ही अवांतर आणि विषयाला भरकटवणारी प्रतिक्रिया आहे. संपादक मंडळानी यावर टिपण्णी करावी. तात्या : गांधी हलके आहे म्हणून कोणाचे कार्य उत्कट होत नाही असा विचार ठेवावा. शेवटी आपण सर्व एक आहोत आणि आपल्यासारख्या दिग्ग्जाच्या प्रतिक्रिया मूळ विषय अकारणच भरकटवतात.

In reply to by कलंत्री

अवलिया Sun, 12/14/2008 - 12:37
ही अवांतर आणि विषयाला भरकटवणारी प्रतिक्रिया आहे. संपादक मंडळानी यावर टिपण्णी करावी. मला अजिबात असे वाटत नाही. उलट भारताला स्वातंत्र्य अहिंसेतुन मिळाले नाही, किंवा क्रांतिकारकांमुळे मिळाले नाही. दुस-या महायुद्धामुळे बेजार झालेल्या आंग्लांना ह्या प्रचंड देशाचा कारभार करणे अशक्य झाले म्हणुन ते निघुन गेले हे जितक्या लवकर आपण समजु तितके आपल्याला चांगले असेल. यात अहिंसावाद्यांचा किंवा क्रांतीकारकांचा अपमान करण्याचा हेतु नाही, पण भावनाविवश होवुन इतिहासाकडे आपण पाहु नये. अर्थात इंग्रजांना अहिंसावाद्यांपेक्षा क्रांतीकारकांचे भय जास्त वाटत होते हे मात्र १०० टक्के नक्कीच. -- अवलिया अवलियाची अनुदिनी

In reply to by कलंत्री

सर्वसाक्षी Sun, 12/14/2008 - 13:13
द्वारकानाथजी, जर स्वातंत्रय्प्राप्तीसाठी सर्व मार्ग अनुसरणीय होते व जर स्वातंत्र्यप्राप्ती ही केवळ घोषणा, आंदोलने व मोर्चे यातुन न होता त्यात असंख्य क्रांतिकारकांचा सिंहाचा वाटा आहे तर सरकारी प्रचार यंत्रणेने दे दी हमे आजादी बीना खड्ग बीना ढाल असा खोटा व स्वतःला सोयीचा व हिताचा प्रचार करणे हे चीड आणणारे आहे, सदर लेख क्रांतिकारकांवर असल्याने या प्रचाराचा निषेध अवांतर ठरत नाही.

शंकरराव Sun, 12/14/2008 - 04:14
अवघ्या १४व्या वर्षी असा असामान्य पराक्रम करणाऱ्या या मुलींची नावे सुद्धा आपल्याला माहित नाहीत याची खंत वाटते. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यात त्यांचा वाघिणीचा वाटा आहे. आज त्यांच्या शौर्यकृत्याच्या ७७ व्या स्मरणदिनी त्या दोघींना सादर अभिवादन. आसेच म्हणतो.... स्वातंत्र चळवळीतील सर्व क्रांतिकरकांना व त्यांच्यातील निस्सिम देशभक्तिला शतशः वंदन प्रस्तुत ऍतिहासिक लेखाबद्द्ल सर्वसाक्षी याचे अनेक आभार

बगाराम Sun, 12/14/2008 - 04:18
या लहान मुलींनी पिस्तुल प्रथमच हाताळले होते. पैकी सुनिती ही कृश अंगकाठीची, तिची बोटे हडकुळी होती. तिला मागचा चाप अंगठ्याने ओढायला जमत नव्हता, तिने आपल्या प्रशिक्षकाला शक्कल सुचविली की मला अंगठ्या ऐवजी मधल्या बोटाने चाप मागे ओढयला शिकव! ही शक्कल लागु पडली. या दोघींनी दोन दिवस सराव केल. तेवढा पुरेसा होता कारण एक तर वेळ नव्हता व दुसरे म्हणजे गोळ्या अगदी जवळुन झाडायच्या होत्या. अवघ्या १४ वर्षे वयाच्या मुलिंना हातात बंदुकी देउन खून करायला लावणारे आणि तालिबानी अल-कायदा ट्रेनिंग कँपमधले अतिरेकी ह्यांच्यात काय फरक? १४ वर्षाच्या मुलींना काय समज असते की त्यांना आपले जीवित धोक्यात घालुन असले कृत्य करायला भाग पाडावे? वरील वर्णन वाचुन तर अंगावर काटा आला. कोवळ्या मुलिंना शस्त्रास्त्रे चालवायला शिकवुन जीवावर उदार करणारे हे देशभक्त मला तरी आदरस्थनी वाटले नाहीत. आपल्याला ’क’ ऐवजी राजबंद्यांच ’ब’ वर्ग देण्यात यावा यासाठी अन्नस्त्याग्रह केला. आवाज उठवुनही दाद मिळत नाही हे समजल्यावर उपोषणास प्रारंभ केला व अखेर त्याची बदली केली गेली. हे वाचुन गांधीजींची टवाळी करणारे काय म्हणतील ते वाचायला आवडेल.

In reply to by बगाराम

केदार Sun, 12/14/2008 - 04:47
बगाराम, ध्येय जेव्हा स्वातंत्र्य असते तेव्हा वयाला मर्यादा नसते. तूमचा तालिबान विषयीचा अभ्यास कच्चा असल्याचे लगेच दिसतेय कारण जेव्हा अफगाण, तालिबान्यांनी स्वतंत्र्य केले तेव्हां अफगाणात दिवाळी साजरी झाली होती हे आपल्याला माहीती नसावे. आजची तालिबान आणि तेव्हांची तालिबान खचितच वेगळी होती, थोडे खोलात शिरा. मग बोलू. तूम्ही फ्क्त आजच्याच तालिबानला खरे समजताय. कूठल्याही चळवळीला सामान्यांची मान्यता लाभली की फ्क्त चळवळ राहत नाही. त्यामूळे उद्य १० वर्षाच्या बालकाची कथा कोणी लिहीली ( भारतीय / अभारतीय) व ते स्वातंत्र्य प्राप्ती साठी बलिदान झाले असेल तर आम्हांस त्या व्यक्तीचा आदरच वाटेल. उपोषन हे गांधीजीनीच अस्तित्वात आणले, आणी उपोशन केले म्हणजेच अहिंसावादी असा सुर जो तूमच्या पोस्ट मध्ये लागतोय तो निश्चीतच चूक आहे. आणि जे अहिसांवादी नसतात (उदा सावरकर, नेताजी, ह्या भगिनी, मी स्वत :) इ इ) त्या सर्वांना 'कूठलाही' मार्ग चालतो. हिंसेंचा वा अहिसेंचा. की फरक पैंदा यारो. ताक. - गाधींजीची टवाळी करानारे हे कोण हे मला अजुन माहीत नाही पण तरीही उत्तर दिले कारण मि ही त्यांचा डोळस विरोधक आहेच.

In reply to by केदार

बगाराम Sun, 12/14/2008 - 04:50
माझ्या प्रतिक्रिया उडवल्या जात आहेत. मी कसे काय उत्त्तर देऊ? तालिबानचे समर्थन करणार असाल तर तशीही माझी शरणागतीच आहे.

In reply to by बगाराम

विसोबा खेचर Sun, 12/14/2008 - 05:02
सदर लेखावरील आपले मत समजले. आपला अभिप्राय व्यक्त करण्याची संधी आपल्याला दिली गेली आहे. मलाही आपण क्वेश्चन केले आहे. परंतु पक्या किंवा इतर कुणी या लेखाबद्दल त्यांचे मत लिहिल्यास, अथवा अभिवादन केल्यास प्रत्येकालाच आपण जाहीरपणे क्वेश्चन करू शकत नाही. आपण खरड पाठवून त्या विषयासंदर्भात एखाद्याशी चर्चा करू शकता. साक्षींचा सदर लेख हा काय चूक, काय बरोबर यावर भाष्य न करता इतिहासात जे घडलं आणि त्या मुलींनी जे केलं त्यावर भाष्य करणारा आहे.. असो, इथे अधिक विषयांतर न करता या संदर्भात आपण माझ्याशी खरडीतून संपर्क साधू शकता. शक्य झाल्यास व इच्छा असल्यास उत्तर देईन.. तात्या.

In reply to by बगाराम

सर्वसाक्षी Sun, 12/14/2008 - 13:06
अवघ्या १४ वर्षे वयाच्या मुलिंना हातात बंदुकी देउन खून करायला लावणारे आणि तालिबानी अल-कायदा ट्रेनिंग कँपमधले अतिरेकी ह्यांच्यात काय फरक> इतिहास जरा नीट वाचा. वयाच्या १४ व्या वर्षी ज्या मुलींनी असिम शौर्य दाखवले त्यात आपल्याला क्रांतिकारकांचे तालिबानी वर्तन दिसले यात आपली मनोवृत्ती दिसुन आली क्रांतिकारक वा त्या वाघिणी यांना यत्किंचितही कमीपणा आला नाही. या वीरांगना ध्येयाने प्रेरित होऊन स्वतःच्या जीवावर उदार झाल्या होत्या, त्याना पढवुन वा बुद्धिभेद करुन तयार केलेल्या नव्हत्या. १४ व्या वर्षी समज नसते हे विधान आपले व्यक्तिगत मत वा आपला अनुभव असू शकतो पण ते जागतिक सत्य नव्हे. जरा भारतिय स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास एकदा वाचा, अनेक शाळकरी हुतात्मे दिसतील. बाकी आपली आदरस्थाने हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे त्यावर माझे काही भाष्य नाही. उपोषणाविषयीचे आपले घोर अज्ञान आपण जाहिर केले आहेत. क्रांतिकारकांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी कोणताही मार्ग वर्ज्य नव्हता. तुरुंगात हातापायात बेड्यांनी बद्ध असतानाही आपल्या अधिकारांसाठी आणि स्वाभिमानासाठी क्रांतिकारकांनी तेजस्वी उपोषणे केलेली आहेत. अहो जे फासावर जाणारच होते ते उपोषणाने देहत्याग करायला का भितील? गांधींचा विषय विनाकारण घुसडला आहातच तर ऐका: माझ्या अल्पशा माहितीनुसार सशस्त्र क्रांतिच्या पुरस्कर्त्यांपैकी तीन क्रांतिवीरांनी आपल्या ध्येयाखातर व राष्ट्राभिमानाखातर आमरण उपोषण केले व देहत्यागाने ते अजरामर झाले. ते तीन हुतात्मे आहेतः १) हुतात्मा मणींद्र बॅनर्जी - २० जून १९३४ फतेगढ तुरुंग २) हुतात्मा जतिन दास - १३ सप्टेंबर १९२९ लाहोर तुरुंग ३) हुतात्मा महाविरसिंह - १७ मे १९३३ अंदमान तुरुंग आता जरा आपण प्राणांतिक उपोषणाने हौतात्म्य पावलेल्या तीन गांधीवाद्यांचा तपशिल द्याल का? स्वतः गांधींनी तरअसे काही केले नव्हते.

In reply to by सर्वसाक्षी

विनायक प्रभू Sun, 12/14/2008 - 17:37
सर्वसाक्षी साहेब, जाउ दे. वार झोन म्हणजे काय? आणि वार झोन मधे वय नसते. हे कळणे खूप जणाना कठीण जाते. तालीबान्याबरोबर थोडीशी सुद्दा तुलना हास्यास्पद आहे.

In reply to by विनायक प्रभू

सर्वसाक्षी Sun, 12/14/2008 - 18:04
प्रभुशेट, अहो १४ वर्षी समज नसते हे ऐकुन मला तर जाम हसायला आलं. नापास झालेली काही पोरे ९५ टक्के मिळविणार्‍यांबद्दल असेच बोलतात 'मास्तरांचे चमचे आहेत/ कॉपी केली असेल/ मास्तरने पैसे खाऊन पेपर आधीच दिला असेल ..नाहितर इतके गुण मिळुच शकत नाहीत'. चालायचेच, कारण त्यांची कुवत तितपतच असते त्यामुळे त्यांना कुणाला बुद्धी असेल व कुणी कष्ट केले असतील असा विचारच करता येत नाही. किंवा असे कष्ट करायची तयारी नसते. मग अशी मुक्ताफळे उधळण्यापलिकडे ते दुसरे काय करणार? पुढे नोकरीत असेच होते. एखाद्या कर्तबगार मुलीने अल्पावधीत पदोन्नती मिळवली तर अनेक वर्षे खुर्चीत बसून दात कोरणारे छातीवर हात ठोकुन सांगतात की आहो आम्हाला ५ वर्षात मिळत नाही इथे हिला एका वर्षात मिळाले यात हिचे कर्तृत्व नाही तर बॉसचे आहे, तिने त्याला 'खूष' केला असेल. ज्या वयात आपल्याला काही समजत नसते वा काही करायची धमक नसते आणि त्या वयात इतरांनी काही असामान्य कृत्य केले तर ते मान्य न करायची रोगट मानसिकता असलेले नेमेकी हिच प्रतिक्रिया देतात. याना उदाहरणे शोधायचीच म्हटली तर खूप मिळतील, पण शोधणार कोण? आणि कशाला? लहानशी रांगोळी काढायची तरी कष्ट पडतात, मात्र जाता जाता पायाने ती फराटुन टाकायला कष्ट वा बुद्धी लागत नाही. कोणी रांगोळ्या रेखतात, कोणी पाहतात व कौतुक करतात, कुणी नाक मुरडतात तर कुणी त्या फराटुन टाकतात. ज्याची त्याची मानसिकता.

In reply to by विनायक प्रभू

आजानुकर्ण Sun, 12/14/2008 - 18:30
दोन प्रश्नः १. हमास, हिजबुल्ला पासून ते तालिबान पर्यंत सगळे आधुनिक क्रांतीकारक लहान मुलांचे ब्रेनवॉशिंग करत राहतात हे वारंवार दिसले आहे. पॅलेस्टिनींवर होणाऱ्या अत्त्याचारांच्या फिती वारंवार दाखवून ज्यू हे डुकरापासून जन्मलेले आहेत, हिंदू माकडाचे वंशज आहेत, हे धर्म घाण आहेत हे लहान मुलांच्या मनांवर बिंबवले जाते. या ब्रेनवॉशिंगमध्ये आणि वरील ब्रेनवॉशिंगमध्ये काय फरक आहे हे मला समजत नाही. २. आजकाल सामनामध्ये हिंदुस्तानचे इस्लामिस्तान होणार वगैरे पेटवापेटवीचे प्रयत्न चालले आहेत. समजा हे इस्लामिस्तान दुर्दैवाने यशस्वी झालेच तर कसाब आणि इतर ९ दहशतवादी हे नव्या इस्लामी राष्ट्रात क्रांतीकारक ठरतील का? हे प्रश्न प्रामाणिकपणे विचारत आहे. माझी कीव वगैरे न करता याची उत्तरे द्यावीत जेणे करून माझ्या संकल्पना अधिक स्पष्ट होतील.

In reply to by आजानुकर्ण

विनायक प्रभू Sun, 12/14/2008 - 18:40
अतिरेकी तयार करुन दुस-या देशात पाठविणे आणि देशभक्तीने प्रेरीत होणे हा एक फरक आहे. आजकाल अतिरेकी तयार करणे हा एक कारखाना आहे. ब्रेन वॉशींग ची प्रोसेस सहा महिने ते एक वर्ष चालते. वरील लेखात स्पाँटेनियस रिऍक्शन दिसते.

In reply to by विनायक प्रभू

बगाराम Sun, 12/14/2008 - 21:10
स्वतंत्र कश्मिर साठी लढणार्‍या अतिरेक्यांना क्रांतीवीर म्हणणार का?

In reply to by बगाराम

अभिजीत Sun, 12/14/2008 - 21:19
स्वतंत्र कश्मिर साठी लढणार्‍या अतिरेक्यांना क्रांतीवीर म्हणणार का? नाही. त्यांना अतिरेकीच म्हणणार.

In reply to by बगाराम

सर्वसाक्षी Sun, 12/14/2008 - 21:40
हा हिंदुस्थानचा भाग आहे. त्या भागाचा लचका तोडण्यासाठी परक्या देशातून शत्रू आक्रमण करीत आहे, दहशतवाद पसरवीत आहे. ही वस्तुस्थिती आहे. आता त्या घूसखोरांना क्रांतिवीर म्हणायचे की अतिरेकी ते आपणच ठरवा.

In reply to by सर्वसाक्षी

बगाराम Sun, 12/14/2008 - 21:45
हिंदुस्थानही त्याकाळी ब्रिटीश साम्राज्याचाच भाग होता. हे सगळे आपण नदीच्या कुठल्या तीरावर आहोत ह्यावर ठरते. मी अतिरेक्यांना अतिरेकीच म्हणणार. १४व्या वर्षी अल्लड वयात बंदुका हाती देणे हा अतिरेकच. आणि खुद्द कश्मिर मधील अतिरेकी? त्यांना काय म्हणाल मग?

In reply to by बगाराम

सर्वसाक्षी Sun, 12/14/2008 - 22:11
आपण ब्रिटिशधर्जिणे असाल तर तमाम क्रंतिकारक आपल्या नजरते अतिरेकी असणे स्वाभाविक आहे. आम्ही हिंदुस्थानच्या वतीने विचार करीत असल्याने आम्हाले ते क्रांतिकारक वंदनिय हुतात्मे वाटतात.

In reply to by बगाराम

भास्कर केन्डे Tue, 12/16/2008 - 02:03
बगाभाऊ, क्रांतिकारक असो वा अहिंसावादी, दोन्ही प्रकारांतल्या स्वातंत्र्यवीरांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आपल्या मातृभूमीस स्वतंत्र करण्यासाठी प्राण्याच्या अहुत्या दिल्या. त्यांच्या बलिदानांमुळे आपण येथे अशा मिमांसा करण्याच्या परिस्थितीत आहोत. याचे भान ठेऊन त्या क्रांतिवीरांना मानचा मुजरा करावा... पुढील पिढीसमोर आदर्श सांगत अशा देशभक्तांच्या कथा प्रत्येकाच्या मुखी वदल्या जाऊन पुन्हा देशभक्तीच्या चैतन्याने वातावरण मुग्ध करावे असे मला वाटते. वयाच्या बाबतीत योग्य-अयोग्यचा खल करण्यासाठी एक स्वतंत्र धागा सुरु केलात तर तेथे येऊन आम्ही आपली मते मांडू. पण येथे स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती उद्घृत करताना असले विचार करण्याऐवजी विधायक लेखन करावे अशी नम्र विनंती. त्या खलासाठी आपण अगदी श्रावण बाळ (कोवळ्या वयात आई वडिलांचे ओझे वाहने), अभिमन्यू (बालवयात वडिलांच्या सांगण्यामुळे युद्धात उतरणे) ते बाबू गेणू (कुणाच्या तरी ब्रेनवाशिंग मुळे नीच व कृर इंग्रज अधिकार्‍यांकडून उघड्या छातीवर गोळ्या घेण्यासाठी निशस्त्र सामोरे जाणे) पर्यंत सगळ्या उदाहरणांवर कीस पाडा... आम्ही आपले अनुमोदन करु पण इथे असले काही आमच्याच्याने होणार नाही. वंदे मातरम्! आपला, (देशप्रेमी) भास्कर संपादित आम्ही येथे वसतो.

In reply to by भास्कर केन्डे

बगाराम Tue, 12/16/2008 - 06:39
माननीय केंडेमहोदय, आपल्याला न पटलेल्या विचारांना 'हलकट' असे संबोधायला हे काही संघाचे कार्यालय नव्हे. इथल्या संपादक मंडळाने कृपया ह्या जहाल विचारसरणीच्या लोकांच्या भाषेला लगाम घालावा. अश्या शेरेबाजीमुळे चर्चा होणे अशक्य होउन बसते आणि हुल्लडबाजी करणार्‍यांना आपला मुद्दाच पुढे रेटल्याचे समाधान मिळते. -बगाराम

In reply to by सर्वसाक्षी

कलंत्री Sun, 12/14/2008 - 20:53
आता जरा आपण प्राणांतिक उपोषणाने हौतात्म्य पावलेल्या तीन गांधीवाद्यांचा तपशिल द्याल का? स्वतः गांधींनी तरअसे काही केले नव्हते. कोणास ठाऊक आज अनेक़जण गांधीवादाचे / विचाराचे समर्थन करण्यास पुढे येत आहेत ही मला सुखावणारी गोष्ट आहे. संकेतस्थळाचे निर्माण झाले तेंव्हा आम्ही गांधीवादावर काही लिहावे आणि सावरकरवादी, क्रांतिकारकवादी आणि संघाच्या विचारसरणीच्या लोकांनी तेच ते प्रश्न विचारावे आणि राष्ट्रीय लढ्याच्या संदर्भात आम्ही यथायोग्य उत्तर द्यावे आणि या लोकांचे परत परत तेच ती प्रश्न यावीत असे ठरलेले असे. आता वरील प्रश्नाचे उत्तर देणे सोपे आहे कारण स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा आणि त्याचे नायकत्व निर्विवादपणे कॉग्रेस आणि गांधीकडेच ( त्याच्या यश-अपयशाबरोबर) जाते. स्वातंत्र्य लढ्याचे अनेक पदर आणि पैलु आहेत, परंतु माझी अपेक्षा अथवा विनंती आहे की, गांधीवादी लोकांनी याविषयावरचा सांगोपांग अभ्यास करावा. सुदैवाने आज अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. प्रत्येक वर्षी गांधीवादाचा परामर्ष घेणारी अनेक पुस्तके प्रकाशित होत असतात. आजही गांधीवादाचा अभ्यास असणारी अनेक थोर आणि तज्ज्ञ लोक आहेतच. वरील प्रश्नाचा उपयोग करुन आपण याविचारसरणीचा सांगोपांग अभ्यास करावा. सर्वसामान्य लोकांना गांधीवादाबद्दल परत आस्था आणि विश्वास वाटेल अशी मांडणी करावी. शक्य असल्यास काही प्रश्नेही हाताळावावीत,तरच आपण गांधीवादाला समजावुन घेत आहे असे निष्पन्न होईल. अन्यथा भाषाविलास आणि वाणीविलासा बाहेर आपलेही पाऊल पडणार नाही. बर्‍याच वेळेस अनेक लोकांचा विचार करण्याची पद्धत एका टप्प्यावर येऊन थांबते ते आपल्याबाबतीत घडू नये अशीच माझी प्रार्थना आहे. याबाबतीत माझा जो काही अभ्यास आणि ग्रंथसंग्रह आहे तो आपल्यासाठी खुला आहे. द्वारकानाथ कलंत्री

In reply to by कलंत्री

सर्वसाक्षी Sun, 12/14/2008 - 21:43
द्वारकानाथजी, हा लेख दोन क्रांतिकारक कन्यांना समर्पित आहे. त्यावर जे काही लिहायचे ते अवश्य लिहा. पण या लेखात गांधीवाद घुसवु नका. आपण त्या विषयावर एक स्वतंत्र लेख लिहा.

In reply to by सर्वसाक्षी

बगाराम Sun, 12/14/2008 - 21:16
माझी कीव केल्याबद्दल धन्यवाद. जहालमतवादी बर्‍याचदा वैयक्तिक शेरेबाजीवर उतरतात हा अनुभव घेतला आहे. असो मी तुम्हाला काहिही विचारणार नाही. कारण तात्यांना माझे साधे क्वेश्चन खटकतात पण तुम्ही विनाकारण माझी केलेली कीव खटकत नाही ह्यावरुन त्यांचा तुमच्या विचारांशी बायस आहे हे स्पष्ट दिसते. आणि ते इथले आणिबाणी काळातील मालक असल्याने मी तुमच्याशी हा वाद वाढवणार नाही.

In reply to by सर्वसाक्षी

ऋषिकेश Sun, 12/14/2008 - 21:40
आता जरा आपण प्राणांतिक उपोषणाने हौतात्म्य पावलेल्या तीन गांधीवाद्यांचा तपशिल द्याल का? स्वतः गांधींनी तरअसे काही केले नव्हते.
यामुळे माझी उत्सुकता चाळवली. जालावर बरेच शोधले. "पोट्टी श्रीरामुलु" ही एकमेव भारतीय गांधीवादी उपोषणाने हुतात्मा झाली आहे या निष्कर्षाप्रत येणार तो पर्यंत अजून दोघे नि:शस्त्र क्रांतीकारी मिळाले... मात्र ते गांधीवाअदी होते की नाहि कल्पना नाहि. (अनेक परदेशी गांधीवादी मात्र हुतात्मा झालेले आढळतात)
  • पोट्टी श्रीरामुलु (एकत्र आंध्र प्रदेशसाठी सत्याग्रह, उपोषण आणि त्यातच मृत्यू. कट्टर गांधीवादी)
  • मोहन किशोर नामो दास
  • मोहीत मोईत्रा
(वरील दोन हुतात्मे, हुतात्मा महाविरसिंह बरोबर उपोषण केलेले त्याचे अंदमानमधील मित्र. मला जी थोडीशी माहिती मिळाली त्यानूसार हे सशस्त्र क्रांतीकारी नव्हते, स्वांतंत्र्यलढ्याशी नक्की निगडीत होते. मात्र गांधीवादी होते की नाहि कल्पना नाहि) बाकी तुमचे लेख मला नेहमीच आवडतात. विचारात टाकतात. हा लेखही आवडला. :) -(गोंधळलेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

सर्वसाक्षी Sun, 12/14/2008 - 22:03
ऋषिकेशमहाशय, पोट्टी श्रीरामुलु हे गांधीवादी होते व त्यांनी आमरण उपोषण केले होते हे आपले म्हणणे अगदी बरोबर आहे. मात्र हे उपोषण आपल्याच स्वतंत्र भारतात घडले, स्वातंत्र्यसंग्रामात इंग्रजांविरुद्ध नव्हे. अर्थात त्याने पोट्टीजींच्या त्यागाचे महत्व कमी होत नाही. मात्र मी उल्लेख अशासाठी केला की इथे संदर्भ वेगळा होता. उदाहरण दिल्याबद्दल धन्यवाद. इतर दोन हुतात्म्यांची माहिती शोधायचा प्रयत्न आपण अवश्य करुया, मात्र शांततापूर्ण आंदोलन करणार्‍या गांधीवाद्यांना अंदमानला काळ्या पाण्यावर पाठवले जात नसे, तो मान क्रांतिकारकांनाच मिळायचा त्यावरुन ते क्रांतिकारकच असावेता से अनुमान आहे.

In reply to by सर्वसाक्षी

ऋषिकेश Sun, 12/14/2008 - 22:12
वर म्हटल्याप्रमाणे ही माहिती प्रतिवादासाठी म्हणून मुद्दाम न शोधता उत्सुकता म्हणून शोधली. असो.
इतर दोन हुतात्म्यांची माहिती शोधायचा प्रयत्न आपण अवश्य करुया,
जरूर. अंदमानच्या सेल्युलर जेलच्या एका साईटवर या तिघांनी उपोषण केले व त्यांचा मृत्यू झाला. हे कोणालाहि कळू नये म्हणून जेलरने त्यांची प्रेते समुद्रात फेकून दिली होती :( अशी माहिती मिळाली आहे. -(गोंधळलेला) ऋषिकेश

In reply to by सर्वसाक्षी

टग्या Tue, 12/16/2008 - 03:59
पोट्टी श्रीरामुलु हे गांधीवादी होते व त्यांनी आमरण उपोषण केले होते हे आपले म्हणणे अगदी बरोबर आहे. मात्र हे उपोषण आपल्याच स्वतंत्र भारतात घडले, स्वातंत्र्यसंग्रामात इंग्रजांविरुद्ध नव्हे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोरारजीभाईंच्या गोळीबाराला बळी पडलेल्या १०५ (की ८०? मोरारजीभाईंच्या मते ८०.) जणांच्या स्मरणार्थ फ्लोरा फाउंटनचे नाव बदलून 'हुतात्मा चौक' केले गेले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ स्वतंत्र भारतात घडली, इंग्रजांविरुद्ध नव्हे, अशी माझी प्रामाणिक समजूत आहे. (तसेही मारले गेलेले नि:शस्त्र होते अशी निदान माझी तरी समजूत आहे. चूभूद्याघ्या.) आता हे १०५ (किंवा ८०) हे केवळ स्वातंत्र्योत्तर काळात मारले गेले म्हणजे ते हुतात्मे होत नाहीत काय? मग 'हुतात्मा चौक' हे नामकरण चुकीचे आहे काय? हुतात्मा चौकाचे नाव बदलून पुन्हा 'फ्लोरा फाउंटन' असे (किंवा 'स्व. मीनाताई ठाकरे कारंजे' असे) करण्यासाठी आंदोलन करण्यास शिवसेनेस सांगावे काय?

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण Tue, 12/16/2008 - 19:25
स्व. मीनाताई ठाकरे कारंजे निषेध निषेध. येथे खरे तर तीन मुद्दे आहेत. तुम्ही स्व. कोणाला म्हटले आहे? कारंज्याला म्हटले असेल तर ठीक. पण मग मीनाताई ठाकरे स्व. कारंजे असे हवे होते. त्यामुळे तुम्ही स्व. हे मीनाताईंबाबत म्हटले आहे हे सिद्ध होते. मराठीत स्व. या शब्दाचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. येथे कै. किंवा वै. चालले असते. (पुण्यश्लोकही म्हणायला हरकत नाही.) मात्र स्व. असे लिहून आपण इतिहासातील चुका पुन्हा करत आहोत असे वाटते मुस्लिम आक्रमकांनी इराणपासून उत्तर आफ्रिकेपर्यंतचा विस्तृत भूभाग १००-१५० वर्षांत पादाक्रांत केला. इराण, अरबस्थान, इजिप्त यासारख्या ठिकाणी त्यापूर्वीच्या संस्कृतीचे पालन करणारा माणूस आता औषधालाही शिल्लक नाही. भारतात त्यांना पहिले यश ७१२ मध्ये मिळाले. पण नंतरच्या काळात बाप्पा रावळसारख्या वीरांनी अगदी सिंध प्रांत पण परत जिंकून घेतला. गझनीच्या महंमदाने लाहोर आणि त्याजवळचा भाग जिंकला ११ व्या शतकाच्या सुरवातीला आणि ते दिल्लीपर्यंत पोहोचले ते १२ व्या शतकाच्या शेवटी म्हणजे जवळजवळ २०० वर्षांनंतर! तेव्हा सिंध प्रांतापासून दिल्लीपर्यंत भूभाग पादाक्रांत करायला त्यांना ७१२ ते ११९२ अशी ४८० वर्षे थांबावे लागले याचे कारण हिंदूंनी (विशेषतः राजपुतांनी) अत्यंत कडवा प्रतिकार केला होता. आणि त्यानंतर राणा प्रताप, शिवाजी महाराज, गुरू गोविंद सिंह आणि दक्षिणेतील विजयनगर साम्राज्याने त्या आक्रमणाचा कडवा प्रतिकार केला. या वीरांनी शत्रूला तो प्रसन्न व्हावा म्हणून दक्षिणा दिल्या नाहीत आणि तलवारीचा मुकाबला तलवारीनेच केला म्हणून इराण आणि इजिप्त मध्ये घडले ते भारतात घडले नाही. या वीरांनी तुमचा भाबडा विश्वास उराशी बाळगला असता तर काय झाले असते? वरील आक्रमणासारखेच हे भाषिक आक्रमणही धोक्याचे आहे. मराठीचा वेगळा ठसका आहे. तिथे हिंदाळलेले शब्द वापरून तुम्ही उत्तरेच्या सांस्कृतिक आक्रमणापुढे शरणागती पत्करत आहात. सावरकरांनी केलेल्या भाषाशुद्धीच्या प्रयत्नांची तरी थोडी चाड ठेवा. आपला, (मोनिकाचा प्रियकर) विल्यम जेफरसन आजानुकर्ण हां. आता 'स्व. मीनाताई ठाकरे कारंजे' असे लिहून शिवसेनाच मराठीची कशी वाट लावत आहे हे निर्देशित करण्याचा आपला प्रयत्न असेल तर आम्ही वरील विधाने मागे घेतो. आपला, (टगवंतरावांचा फ्यान) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

क्लिंटन Tue, 12/16/2008 - 22:39
धन्यवाद. हुतात्मा स्मारकातील कारंज्याच्या निमित्ताने का होईना आपण मुस्लिम आक्रमण भारतासाठी धोक्याचे होते हे मान्य केलेत ही कमी महत्वाची गोष्ट नाही.मात्र माझा वेगळ्या चर्चेतील वेगळ्या संदर्भातला प्रतिसाद थोडासा बदलून (गांधींचा भाबडा विश्वास ऐवजी तुमचा भाबडा विश्वास असा शब्दप्रयोग करून) इथे आणणे हे वडाची साल पिंपळाला लावण्यासारखे आहे असे माझे स्पष्ट मत आहे. मी इतरांइतक्या नियमितपणे मिसळपाववर लिहित नसलो तरी मी मनोगतवर असल्यापासून गेल्या २.५ वर्षांत कमितकमी ५० चर्चांमध्ये तरी भाग घेतला आहे.त्यात कोणाचाही एका चर्चेतला प्रतिसाद उघडउघड किंवा आडवळणाने मी वेगळ्या चर्चेत आणलेला नाही आणि व्यक्तिगत पातळीवर जाऊन चर्चा केलेली नाही. असे प्रकार करणे मिसळपाव सारख्या संकेतस्थळावर निकोप चर्चा होण्यासाठी योग्य नाही असे मला स्वत:ला वाटते. तरी सरपंचांचा निर्णय मान्य. तेव्हा यावर अजून काही लिहित नाही. बाकी या चर्चेत क्रांतिकारकांची तुलना तालिबानींबरोबर करायचा प्रयत्न चालला आहे असे वाटते. वयाच्या १४ व्या वर्षी देशासाठी काही करावे अशी कळकळीची भावना असलेली मुले फारच थोडी आणि त्यापुढे जाऊन स्वत: काहीतरी करणारी मुले म्हणजे लाखांमध्ये हाताच्या बोटावर बघायला मिळतील. आमच्या छत्रपतींनी रांझ्याच्या पाटलाचे एका स्त्रीची बेअब्रू केल्याबद्दल हातपाय १४-१५ वर्षी तोडायचा हुकुम दिला होता.पुढे १६ व्या वर्षी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले.सांगा त्यांचा कोणी ब्रेनवॉश केला होता? संत ज्ञानेश्वरांनी १२ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. तसेच ’ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ म्हणणारी मुक्ताबाई वयाने त्यांच्याहूनही लहान होती. सांगा त्यांचा कोणी ब्रेनवॉश केला होता? सावरकरांनी वयाच्या १५ व्या वर्षी स्वातंत्र्यासाठी मारिता मारिता झुंजेन अशी प्रतिज्ञा घेतली तेव्हा त्यांचा कोणी ब्रेनवॉश केला होता? श्री. एकलव्य यांनी म्हटल्याप्रमाणे तेजाला वयाचे वलय नसते.आणि तरीही देशासाठी त्याग करणार्‍या क्रांतिकारकांना तालिबान्यांच्या पंगतीत आणून बसवायच्या प्रवृत्तीचा निषेध आणि बंगालच्या वाघिणींना मानाचा मुजरा. ---विल्यम जेफरसन क्लिंटन

In reply to by क्लिंटन

आजानुकर्ण Tue, 12/16/2008 - 22:43
इथे वैयक्तिक टीका केलेली नाही. तसे वाटले असल्यास माझा नाईलाज आहे. मला सगळ्या क्रांतीकारकांविषयी संपूर्ण आदर आहे. मुद्दा असा आहे की १४व्या वर्षी मुलांच्या हातात शस्त्र देणे या प्रसंगाचे गौरवीकरण सध्याच्या काळात योग्य आहे का. आपला (सम्यक) आजानुकर्ण

In reply to by बगाराम

संजय अभ्यंकर Sun, 12/14/2008 - 21:14
बंगाली वाघीणींनी देशबांधवांवर अत्याचार करणार्‍याला मारले. शस्त्रास्त्रे घेऊन निरपराध लोक, ज्यात कोवळी मुले, स्त्रीया यांचा समावेश होतो त्यांना नव्हे. तालीबानी आणी भारताचे स्वातंत्र्य सैनीक ह्यात फरक आहे. जालीयनवाला बागेत निरपराध्यांना मारणारा आणी त्या बद्दल अजीबात खंत न बाळगणार ज. डायर हा तालीबान्यांच्या पठडीतला होता. आपल्या क्रांतीकारकांनी इंग्लंड मध्ये जाऊन, त्यांच्या रेल्वे स्थानकांवर बेछूट गोळीबार केला होता काय? संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

पक्या Sun, 12/14/2008 - 04:21
फार सुरेख लेख. बंगालच्या वाघिणींची ओळख करून दिल्याबद्द्ल सर्वसाक्षींना धन्यवाद. शांती आणि सुनिती यांना त्यांच्या अतुलनीय पराक्रमाबद्द्ल अभिवादन. >>कॉंग्रेसने मात्र ’उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणास नाही’ या व्रताला जागुन त्यांचा निषेध केला. कॉंग्रेसचा धिक्कार असो.

बगाराम Sun, 12/14/2008 - 05:06
इथल्या सभासदांना क्वेश्चन केल्या बद्दल माझे काही प्रतिसाद उडवल्याचा खुलासा सरपंचांनी केलेला आहे. आणिबाणी असल्याने त्यांचा निर्णय मान्य आहे. मी ह्या धाग्यावर केलेले लेखन कुणीही क्वेश्चन म्हणून घेउ नये, ती फक्त माझी मते आहेत. अभिवादन करण्यापूर्वी, ही आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील काळी पाने आहेत. हुतात्मा भगतसिंह राजगुरू ह्यांनी केली ती खरी सशस्त्र क्रांती. जाणत्या वयात. त्यांनी कधी अवघ्या १४ वर्षाच्या कोवळ्या मुलींना प्रशिक्षण देउन पुढे केले नाही.ह्यावर विचार करावा इतकेच म्हणतो. कसलेही स्पष्टीकरण अपेक्षीत नाही. बगाराम

In reply to by बगाराम

_समीर_ Sun, 12/14/2008 - 07:00
हुतात्मा भगतसिंह राजगुरू ह्यांनी केली ती खरी सशस्त्र क्रांती. जाणत्या वयात. त्यांनी कधी अवघ्या १४ वर्षाच्या कोवळ्या मुलींना प्रशिक्षण देउन पुढे केले नाही.ह्यावर विचार करावा इतकेच म्हणतो. हम्म... विचारकरण्याजोगा मुद्दा आहे खरा.

साक्षीजी सुंदर लेख... अप्रतिम लेख. अशा क्रांतिकारी स्त्रियांच्या चरित्राची ओळख करून दिल्याबद्दल आपले आभारी आहोत. पुण्याचे पेशवे

कलंत्री Sun, 12/14/2008 - 07:50
बगारामजी, आपले प्रतिसाद वाचले. त्यात तथ्यांश असला तरी कोणत्याही बाबीचा सर्वांगीण विचार व्हावा. १. जिल्हाधिकार्‍यानीच सविनय सत्याग्रहीवर अत्याचार केले. २. पुरुष क्रांतिकारकानी त्या कृत्याचा बदला घेण्याचा विचार केला.त्या साठी त्यांनी आपला अथवा परका असा विचार न करता हम है हिंदुस्थानी असा स्तुत्य विचार केला. ३. परिस्थिती मात्र त्यांना अनुकुल नव्हती. ४. जिल्हाधिकारी भेकडासारखा आपल्या घरातच होता. ५. अश्या वेळेस अपवाद आणि आपदधर्म म्हणून या कोवळ्या मुलींनी हे कृत्य करण्याचे मनावर घेतले आणि पार पाडले. ६. त्यानंतर मात्र सशस्त्र विचारानंतर योग्य वेळी निषेध अथवा सत्याग्रहाचे हत्यार वापरले. असा जर क्रम असेल आणि तो आहे ( सर्वसाक्षीची तशी विश्वासार्हता आहे) तर आपल्याला या भगिनीबद्दल आदरच वाटला पाहिजे. अपवाद म्हणून कोणताही मार्ग त्याज्य नाही. सर्वसाक्षीजी : आपली निष्ठा आम्हास कौतुकास्पदच वाटते. आपल्याकडून आमच्या मोठ्या अपेक्षा आहे. आपण क्रांतिकारकांच्या लढ्याबद्दल एखादे चांगले पुस्तक प्रकाशित करा. भारताच्या इतिहासातले हे पर्व दुर्लक्षितच आहे आणि आपण ठरविले तर त्याला योग्य तो न्याय देऊ शकता. क्रांतिकारकांचे समयोचित स्मरण केल्याबद्दल सर्व मिपाकरातर्फे आपले आभार.

एकलव्य Sun, 12/14/2008 - 12:22
पराक्रमाला आणि तेजाला वय नसते. १६ व्या वर्षी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले... त्यांचे सवंगडी आणि महाराजांनीही १४ व्या वर्षीही काही हरामखोरांना यमसदनाला पोहचविले असण्याची दाट शक्यता आहे. दिल्ली हादरविणारा थोरला बाजीराव मराठी दौलतीचा पंतप्रधान झाला तो १७ व्या वर्षी. इंग्रजांना नमविणारा माधवराव तर त्याहूनही लहान असताना सूत्रे सांभाळू लागला. अकबर वयाच्या १४ व्या वर्षी दिल्लीच्या तख्तावर बसला. अनेक नावे देता येतील... स्वतंत्र भारतासाठी कोवळ्या वयात बलिदान देणार्‍या बंगालच्या वाघिणींना प्रणाम. (ऋणी) एकलव्य

In reply to by एकलव्य

विसोबा खेचर Sun, 12/14/2008 - 13:06
पराक्रमाला आणि तेजाला वय नसते. एकलव्यराव, वरील अवघ्या पाच शब्दात आपण फार मोठी गोष्ट सांगून गेलात! आपल्याला सलाम..! तात्या.

In reply to by एकलव्य

एकलव्य मी अगदी आणी अगदी ह्याच शब्दात प्रतिक्रिया देणार होतो. माझ्या मनातले शब्द आपण इथे उतरवले आहेत त्या बद्दल शतशः धन्यवाद ! ह्या वाघिणींना आमचा मानाचा मुजरा. सर्वसाक्षी ह्यांचे मनःपुर्वक आभार ! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

In reply to by एकलव्य

आजानुकर्ण Sun, 12/14/2008 - 18:32
महाराजांविषयीचा आदर त्यांनी कितव्या वर्षी तोरण बांधले यात नसावा. तो त्यांनी आयुष्यभर दिलेला लढा आणि केलेला राज्यकारभार यात आहे. अकबरापासून ते माधवरावांपर्यंत आलेली उदाहरणे ही आधीचा राजा नसणे या तत्कालिक परिस्थितीमुळे आली आहेत. राजांकडे असलेली मार्गदर्शनाची साधणे - वजीर-दिवाण-अमात्य किंवा कारभार चालवणारे राघोबादादांसारखे लोक वेगळेच परंतु नामधारी जबाबदारी त्यांच्याकडे असा प्रकार असावा. त्यामुळे कोणीतरी ब्रेनवॉशिंग केल्याने हल्ले करणे आणि राज्यकारभाराची जबाबदारी लहान वयात अंगावर येणे यात गुणात्मक फरक आहे.

In reply to by आजानुकर्ण

एकलव्य Sun, 12/14/2008 - 19:23
कर्णसाहेब, तुलना वरील महापुरुषांच्या आणि बंगालच्या वाघिणींच्या एकूण कर्तबगारीची नाही. १४ व्या वर्षी किती जाण असते याची सर्वांना माहिती असलेली उदाहरणे देण्याचा प्रयत्न आहे. जबाबदारी स्वतःहून घेतली की अंगावर आल्यावर सांभाळली हा किडा निघेल याची खात्री होती. (दिलेली उदाहरणे अंगावर आल्यावर सांभाळली या गटात सरसकटपणे टाकणे हे खूपच ढोबळ होईल हा भाग अलहिदा! ) अकबरापासून ते माधवरावांपर्यंत आलेली उदाहरणे ही आधीचा राजा नसणे या तत्कालिक परिस्थितीमुळे आली आहेत. राजांकडे असलेली मार्गदर्शनाची साधणे - वजीर-दिवाण-अमात्य किंवा कारभार चालवणारे राघोबादादांसारखे लोक वेगळेच परंतु नामधारी जबाबदारी त्यांच्याकडे असा प्रकार असावा. धक्का बसला. आपला आवाका वरील अंदाजदर्शनापेक्षा अधिक असावा अशी अपेक्षा होती. एनिवे... जबाबदारी कशीही आलेली असो... पण आपल्या थोरपणाचा स्पार्क या वीरांनी -- महाराज/बाजीराव/माधवराव/अकबर -- अगदी "कोवळ्या" वयात दाखविला असे वाक्ये आणि दाखले अजरामर आहेत. इतिहास बदलणारी ही माणसे आहेत. अवांतर - वरील उदाहरणे नाममात्र आहेत. पानिपतावर विश्वास गेला तोही कोवळ्या वयात आणि लाखो मराठी वीरांनी प्राण टाकले तेही कोवळ्या वयातीलच असावेत. पण इतक्या दूरवर पल्ला मारण्याची हिंमत त्या वयात त्यांच्याकडे होती इतकाच मुद्दा येथे आहे. (घाईघाईत) एकलव्य

In reply to by एकलव्य

बगाराम Sun, 12/14/2008 - 21:21
महाराजांनी जे केले त्याची तुलना इथे होऊ शकत नाही. महाराज कुठतरी जाउन प्रशिक्षण घेउन मुघलांच्या सैन्यात सुसाईड किलर म्हणून गेले नाहीत. त्यांनी स्वराज्य बांधणी केली. केवढी मोठी जिद्द दाखवली. त्यांच्या राज्यात जर १४ वर्षाच्या बालिकांना प्रशिक्षण देउन जीवावर उदार करुन पाठवण्यात आले असते तर त्यांना तरी ते खपले असते का? असला प्रकार करण्यापेक्षा ते स्वतः तलवार घेउन शत्रुच्या छावणीत घुसले असते. हा मोठा फरक इथे आहे.

In reply to by यशोधरा

बगाराम Sun, 12/14/2008 - 21:32
होय अर्थातच लहान वयात केले. इथे कधी केले वर नसुन काय केल े त्यावर फरक केला आहे.

In reply to by बगाराम

यशोधरा Sun, 12/14/2008 - 21:45
>>इथे कधी केले वर नसुन काय केल... लहान वयात महाराजांनी स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली, कारण त्यांच्या आजूबाजूला जे चालले होते ते त्यांच्या संवेदनाशील मनाला रुचत नव्हते. जिजाबाई आणि दादोजी कोंडदेवांचे मार्गदर्शन त्यांना होते (या बाबतही हल्ली वाद आहेत हे ठाऊक आहे, कृपया तो फाटा फोडू नये), भल्यावाईटाची जाण अंगच्या बुद्धीमत्तेमुळे आणि योग्य मार्गदर्शनामुळे लहान वयातच आली होती, म्हणून त्या काळाला जे सर्वप्रथम करणे योग्य होते, की जसे आपल्या सोबत्यांच्या मनात स्वराज्याची इच्छा जागवणे.. ते त्यांनी केले. लहान वयात मोहीमाही केल्याच ना? (काय केले..) जसे वातावरण असेल, तशी कृती असावी लागते, काही जण वेडे ध्येयवादी तशी कृती करु शकतात,काही जणांना ते जमत नाही. या कन्यकाही तश्याच होत्या म्हणावे लागेल. आजच्या दहशतवाद्यांशी, त्यांच्या मनोवृत्तीशी क्रांतीवीरांचा आणि वीरांगनांचा संबंध जोडणे योग्य वाटत नाही.

In reply to by बगाराम

सर्वसाक्षी Sun, 12/14/2008 - 21:48
आपण पुन्हा पुन्हा असे ठसवु पहत आहात की त्या मुलींना स्वतःची अक्कल नव्हती व त्यांना चिथावले गेले. असो. आपण स्वतःला हवे ते निष्कर्शे काढु शकता. मात्र यावरुन आपल्या स्त्री व क्रांतिकारक यांच्या विषयीच्या भावना समजल्या.

In reply to by सर्वसाक्षी

आजानुकर्ण Sun, 12/14/2008 - 22:35
बगाराम यांनी स्रीविषयक काहीही वावगे विधान केलेले नाही असे वाटते. शांतपणे पाहिल्यास एका विचारसरणासाठी असलेला क्रांतीकारक हा दुसऱ्या विचारसरणीसाठी अतिरेकी वाटू शकतो. या विचारस्वातंत्र्याला आक्षेप असण्याचे कारण नाही आपला (शांतताप्रेमी) आजानुकर्ण

In reply to by एकलव्य

चतुरंग Sun, 12/14/2008 - 21:56
पराक्रमाला आणि तेजाला वय नसते. लाख बोललात!! ह्याच संदर्भात सारेगमप लिटल चँप्स ह्या कार्यक्रमात हृदयनाथांनी सांगितलेला किस्सा चपखल ठरावा. सावरकर बारा वर्षाचे असताना भगूरहून नाशिकला आले एका गाण्याच्या स्पर्धेसाठी. त्यांनी लिहिलेले 'हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा' हे ओजस्वी गाणे ते स्वतः गायले. त्यांना पहिले बक्षीस मिळाले. लोकमान्य टिळक परीक्षक होते. १२ वर्षांचा मुलगा हे ओजस्वी शब्द, हे अलंकार, हे वृत्त पेलू शकत नाही, लिहू शकत नाही ह्या शंकेतून स्पर्धेनंतर छोट्या विनायकाला जवळ बोलावून त्यांनी विचारले "बाळा, आता मला खरंखरं सांग की हे शब्द, हे गाणं तुझंच की तुझ्या वडिलांनी, गुरुजींनी, मोठ्या भावाने कोणी लिहून दिले?" सावरकरांनी वयाच्या १२ व्या वर्षी दिलेल्या उत्तरातून ते असामान्य का होते ह्याची प्रचिती येते - सावरकर लोकमान्यांना म्हणाले "ज्ञानेश्वर वयाच्या १६ व्या वर्षी 'भावार्थदीपिका' ग्रंथ लिहू शकतात तर मी १२ व्या वर्षी हे गाणे का लिहू शकत नाही?" काय तेजस्वी बाणा, केवढा आत्मविश्वास, केवढे सामर्थ्य!! म्हणून सावरकर एकमेवाद्वितीय, म्हणून ते स्वातंत्र्यवीर, म्हणून ते महान!! पराक्रमाला आणि तेजाला वय नसते!!! चतुरंग

या दोन वाघिणींना मानाचा मुजरा. आणि ज्या कोणी स्त्रिया, मुलींना वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांना 'गेट वेल सून'. (समानतावादी) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बगाराम Sun, 12/14/2008 - 21:11
इथे कुणीहि लिंगभेद केलेला नाही, १४ वर्षाची मुले असती तरी देखिल मी हेच म्हणालो असतो. आपण मला उद्देशुन गेट वेल सून म्हणत असाल तर आपण निष्कारण हा नविन वाद इथे आणत आहात असे वाटते.

In reply to by बगाराम

तो भेद ज्या कोणी केला होता त्यांच्यासाठी होतं, तुम्ही नाही ना केला भेद (खरं की काय?) तर मग का ते स्वतःवर ओढवून घेत आहात? का खरंच गरज आहे तुम्हाला 'गेट वेल सून'ची? बाकी १४व्या वर्षी मलाही बरीच अक्कल(?) होती असं आठवतं. शाळेत स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास शिकवायचे (वय वर्ष १०-११ पासून) तेव्हाच आम्हा मित्र-मैत्रिणींमधे चर्चा होत असे, "पुन्हा कोणी आपल्या देशावर हल्ला केला तर आपणही असंच क्रांतिकारकांसारखे वागून त्यांना विरोध करु या." आणि या चर्चांमधे कोणाही मोठ्या माणसाचा सहभाग नसे.

लिखाळ Sun, 12/14/2008 - 21:15
बंगालच्या वाघिणींना अभिवादन ! लेख छानच. एखाद्या क्रांतीने वातावरण भारले जाते तेव्हा तरल, बुद्धीमान, उत्साही, धैर्यवान लोक आपोआपच त्याकडे आकर्षिले जातात. शिवाजी महाराजांशी अश्यांची तुलना नाही केली तरी महाराजांच्या कार्यामुळे प्रेरित झालेल्या एका १३-१४ वर्षांच्या मुलाने एका मह्त्वाच्या लढाईत ध्वज सांभाळत मोठी चकमक विजयी केली होती असे शिवचरित्रात वाचलेले स्मरते. जेव्हा समाजात मोठी उलाढाल होते तेव्हा लहानाप्सून मोठ्या पर्यंत अनेक जण भारले जातात. मुद्द्महुन ब्रेनवॉश केलेले आणि अश्या वातावरणात वयापेक्षा पोक्त विचार करुन कृती करणार्‍यांत फरक केला पाहिजे असे वाटते. -- लिखाळ.

मुक्तसुनीत Sun, 12/14/2008 - 22:02
चर्चा वाचली. काही मते मांडतो. याबद्दल मतभिन्नता होऊ शकते. - क्रांतिकारकांचे काम , त्यांनी दिलेले बलिदान याबद्दल एक भारतीय म्हणून मी ऋणी आहे. त्यांची स्मृती सदैव मनात राहील. - ज्यांनी अत्याचार केले त्यांचे रक्त वहात असेल तर एक माणूस म्हणून मला बरेच वाटते. मात्र कायद्याचे राज्य हवे असणारा एक नागरीक म्हणून या मार्गांबद्दल नेहमीच प्रश्न येत रहातील. - अर्थशास्त्रीय बाबींमुळे इंग्रज हा देश सोडून गेले यात तथ्य आहे. पण या निर्णयात निरनिराळ्या उठावा-आंदोलनांचा मोठा भाग होता हेही बरोबर. इट डीड्न्ट मेक द गव्हर्निंग एनी इझीयर. - कुठल्याही उदात्त हेतूने का होईना , पण लहान मुलांच्या हाती हत्यार देणे हे निश्चितच विवाद्य आहे. कुठल्याही एकाच दृष्टीकोनाशी आपण स्वतःला बांधून घेतले ("मॅरींग टू अ सर्टन स्कूल ऑफ थॉट") तर एकूण व्यापक अशा सत्याकडे दुर्लक्ष होते याचे , ही चर्चा म्हणजे एक चांगले उदाहरण आहे. माझी अशी सभासदाना विनंती आहे की , वैयक्तिक शेरेबाजी , अपशब्द टाळा. दुसरा काय म्हणातो ते पटत नसेल तर तसे सांगा. दुसर्‍याची कीव करणे , कमी लेखणे वगैरे वगैरे गोष्टी टाळता येण्यासारख्या आहेत.

In reply to by मुक्तसुनीत

आजानुकर्ण Sun, 12/14/2008 - 22:38
हा दृष्टिकोण स्वागतार्ह आहे. दुसऱ्याची कीव करणे, किंवा दुसऱ्याचा आवाका मोजणे यामुळे चर्चेत काहीही साध्य होत नाही. लहान मुलांच्या हाती हत्यार देण्याचे कोणत्याही कारणामुळे उदात्तीकरण होऊ नये हे सध्याच्या प्रसंगात सुसंगत आहे. आपला, (सहमत) आजानुकर्ण

विकास Sun, 12/14/2008 - 22:03
बंगालच्या या दोन्ही क्रांतीकारींना मानाचा मुजरा! वर बरेच काही लिहून झाले आहे त्यामुळे त्यात परत पडत नाही.

चित्तरंजन भट Sun, 12/14/2008 - 22:08
माहितीजालावर शहिदांसाठी, क्रांतिकारकांसाठी एवढे लेखन कुणी केले नसेल आणि एवढी प्रकाशचित्रे कुणी पुरवली नसतील. शहिदांसोबतच सर्वसाक्षींनाही सलाम!

वाचक Sun, 12/14/2008 - 22:31
मगच तपासले पाहीजेत - आता एकेक बघू १. हे 'ब्रेनवॉशिंग' आहे अथवा नाही २. असलेच तर 'तालिबानी' करतात त्यात आणि ह्यात फरक आहे का ? असल्यास कोणता? ३. १४ वर्षांची मुले/ली हे समर्थनिय आहे का ? तर शेवटी प्रत्येक गोष्ट आपण कोणत्या 'काँटेक्स्ट' मधे बघतो ह्याच्यावर सर्व अवलंबून आहे. 'मी त्याला आई बहिणीवरुन शिव्या दिल्या' हे एक नुसते वाक्य 'कारण त्याने माझ्या बहीणीची छेड काढली' ह्या वाक्यानंतर लगेच 'समर्थनिय' वाटू शकते. तेव्हा 'साक्षी़जींनी' दिलेला इतर ईतिहास पहाता 'ह्या कन्या' वीरांगनाच ठरतात. आता एकेका प्रश्नाची उत्तरे माझ्या दॄष्टीकोनातून १. हे 'ब्रेनवॉशिंग' आहे अथवा नाही हो - हे ब्रेनवॉशिंगच आहे आणि प्रत्येक असामान्य नेता जेव्हा आपल्यामागे यायला आपल्या अनुयायांना तयार करतो तेव्हा ते एक प्रकारचे ब्रेनवॉशिंगच असते - दुर्दैवाने ह्या शब्दाला एक काळी किनार लाभली आहे पण शब्द्शः अर्थ लक्षात घेतला तर माझे म्हणणे पटावे. आणि कार्य सिद्धिस जाण्यासाठी त्याची गरज असतेच. आजकालच्या युगातल्या 'कॉर्पोरेट' कंपन्या पण 'मिशन स्टेटमेंट' आणि इतर गोष्टींनी हेच साध्य करत असतात. २. असलेच तर 'तालिबानी' करतात त्यात आणि ह्यात फरक आहे का ? असल्यास कोणता? भारता सारख्या आधी स्वतंत्र असलेल्या देशावर ईंग्रजांनी आक्रमण करुन अत्याचार चालविले होते - अशा वेळी ज्याला जसे पटते त्या मार्गाने त्याचा प्रतिकार करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच ठरते. त्याचप्रमाणे रशियन आक्रमण असताना 'तालिबान्यांनी' ह्याचाच अवलंब केला आणि त्यांना यशही मिळाले. नंतर आता तशी परिस्थिती उरलेली नसताना ते त्याच मार्गाचा वापर करत आहेत आणि पाकिस्तानही 'दुसर्‍या' सार्वभौम देशात कारवाया घडवून आणण्यासाठी - हे अर्थातच 'समर्थनिय' नाही - माझ्या दॄष्टीकोनातून कारण मी एक देशभक्त भारतीय आहे पण पाकिस्तानी नागरिकांचे मत वेगळे असू शकेल - मी म्हणतो तो 'काँटेक्स्ट' तो हाच. ३. १४ वर्षांची मुले/ली हे समर्थनिय आहे का ? वय किती आहे ह्याला खरे म्हणजे काहीही अर्थ नाही - एकदा आपण करतो आहोत ते कृत्य स्वतःच्या 'काँटेक्स्ट' मधे योग्य आहे ना मग 'साधनं अनेकता...' विचार व्हावा