मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तत्त्वभान ४. तत्त्वाचा 'ते'पणा

निरन्जनदास · · जनातलं, मनातलं
तत्त्वाचा 'ते'पणा
- श्रीनिवास हेमाडे  
तत्त्व म्हणजे पदार्थ हे समीकरण माणसाला लागू केले की माणूस जात-वर्ण यांचा वाहक असणारा 'पदार्थ' बनतो. साहजिकच त्याला समाजाचे नियम लागू होण्याऐवजी निसर्गाचे भौतिक नियम लागू होतात. भौतिक वस्तूचा नियम जिवंत, चैतन्यशील माणसाला लावला की माणसाची शुद्ध वस्तू होते. वर्ण-जात-लिंगभेद या सामाजिक नियामक तत्त्वांना एक तर सारतत्त्वे (essences) समजले गेले किंवा द्रव्य (substance) मानली गेली.
आज आपण 'तत्त्व' या संकल्पनेचा थोडा तपास करू. 'मी तत्त्वाने वागणारा माणूस आहे', 'दो नम्बर के धंदे के भी कुछ उसूल होते हैं', 'जगताना काहीतरी तत्त्वं असावीत,' अशा तऱ्हेची विधाने आपण ऐकतो. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश ही पंचतत्त्वे आहेत, गुरुशिष्य परंपरेतील 'गुरू' हे एक तत्त्व आहे (आदि शंकराचार्याचे श्री गुर्वष्टकम्), त्याचप्रमाणे समता, स्वातंत्र्य, समृद्धी ही तत्त्वे आहेत, अशीही वाक्ये तयार होतात. अमुकतमुक सिद्धांताचे सारतत्त्व, धर्मतत्त्वे, नीतितत्त्वे, अर्थशास्त्रातील मागणी-पुरवठा हे तत्त्व, निसर्गातील कार्यकारणतत्त्व आणि समरूपतेचे तत्त्व अशा अनेक शब्दप्रयोगात 'तत्त्व' शब्दाचा मनमुराद वापर होतो. सामाजिक व्यवहारात प्रेम, देशभक्ती, शेजारधर्म, मत्री, करुणा, पक्षनिष्ठा, मुक्ती, भक्ती, अहिंसा, सत्य, क्षमा, बंधुभाव इत्यादी सामाजिक तत्त्वे आढळतात.

अध्यात्माच्या किंवा धार्मिक क्षेत्रात 'तत्त्व' या शब्दाचे आकर्षण सर्वाधिक आहे, असे आढळेल. तिथे 'धर्मतत्त्वे' अतिमहत्त्वाची ठरतात. ती धर्मसंस्थापकाने अथवा ईश्वराने दिलेली असतात. ती नेहमीच अपरिवर्तनीय आणि ज्यांचे उल्लंघन करता येत नाही, अशी असतात (- किंवा तशी श्रद्धा असते.)

संस्कृतमधील 'तत्त्व' संज्ञा 'तत्' या सर्वनामाला भाववाचक 'त्व' प्रत्यय लागून 'तत्त्व' हे नाम होते. त्यापासून तत्त्वनिष्ठ, तत्त्ववादी, तात्त्विक, तत्त्वेन/ तत्त्वत: (वास्तवात), तत्त्ववित् (ज्ञाता), तत्त्वमसि हे इतर शब्द बनतात. अद्वैत वेदान्तानुसार ब्रह्म हे व्यापक असल्यामुळे त्याचे नाव 'तत्'. या 'तत्'चा 'ते'पणा हे तत्त्व आहे. जे काही 'आहे', असे म्हणता येईल ते केवळ हेच तत्त्व आहे. म्हणून तत्त्व म्हणजे ब्रह्म.

तत्त्व म्हणजे पदार्थ हा संस्कृतमधील आणखी एक अर्थ आहे. पद म्हणजे शब्द. शब्दाला अर्थ असणे म्हणजे पदार्थ. ज्यासंबंधी आपण शब्द उच्चारू शकतो, वर्णन करू शकतो, तो पदार्थ (पदस्य अर्थ:). येथे अर्थ असणे, याचा अर्थ ज्या वस्तूचे किंवा ज्या विषयाचे आकलन होते ती वस्तू किंवा विषय. एखाद्या वस्तूचे किंवा विषयाचे पदाने वर्णन करता येत असेल तर आणि तरच तो पदार्थ असतो, अन्यथा नाही. येथे पदार्थ म्हणजे प्रत्यक्ष वस्तू नाही तर वस्तू ज्याची बनली आहे ते सारतत्त्व (essence) किंवा द्रव्य substance). जसे की खुर्चीचे खुर्चीत्व, मनुष्याचे सार मनुष्यत्व, पशूचे पशुत्व. म्हणून तत्त्व म्हणजे पदार्थाचे यथार्थ स्वरूप. या पदार्थरूपी तत्त्वाचे ज्ञान म्हणजे तत्त्वज्ञान.

तत्त्व ही संज्ञा माणसाच्या रोजच्या व्यवहारात वापरली जाते तेव्हा ती बहुधा सिद्धांत, रीती, सत्यनिष्ठा, सत्याचरण, नियम, व्यवस्था, तात्पर्य या नतिक अर्थाने वापरात येते. तर जगाचे वर्णन करताना (निसर्ग विज्ञानात) वस्तूचे सार, सारघटक, सारतत्त्व, निसर्गनियमांची व्यवस्था या अर्थाने वापरली जाते. अध्यात्म, धर्म या क्षेत्रात ती जगाचे सार, मूलघटक, ब्रह्म, मन, देवता अशा अर्थाने उपयोगात येते.

इंग्लिशमधील principle चाही अर्थ असाच केला जातो. A man of principle म्हणजे सत्यनिष्ठ माणूस. 'the principles of democracy' म्हणजे लोकशाहीतील मूलभूत सत्ये, नियम किंवा गृहीतके.
आता, 'तत्त्व' किंवा principle या शब्दाचा अर्थ नेमका निश्चित करता येईल का ? ही समस्या मांडता येईल.

या वरवर साध्या दिसणाऱ्या गोष्टीत एक अत्यंत महत्त्वाचे सूत्र दिसते. एकदा तत्त्व निश्चित झाले की त्या तत्त्वाचे उपयोजन ठरते आणि ती राबविण्याची व्यवस्था तयार होते, तेच संबंधित व्यक्तीचे किंवा गटाचे, देशाचे तत्त्वज्ञान बनते. 'माझे तत्त्वज्ञान' याचा अर्थ हाच होतो. 'मी तत्त्वनिष्ठ माणूस आहे' हे म्हणणे म्हणजे 'मी अमुकतमुक तत्त्वे मान्य करतो, त्यासाठी मी काहीही करीन.' हे तत्त्वप्रेम असते. वर्ण, जात, धर्म, िलगभेद किंवा देश, एखादी विचारसरणी हे तत्त्व बनले की त्या व्यक्तीचे तत्त्वज्ञान अस्तित्वात येते, तेच त्याच्या विचाराचे, आचाराचे आणि प्रत्येक कृतीचे नियंत्रण करू लागते.

असे दिसते की सार, सारघटक किंवा सारतत्त्व किंवा पदार्थ या अर्थाने 'तत्त्व' हा शब्द उपयोगात आणला जातो, तेव्हा सामाजिक प्रश्न उग्र होतात. तत्त्व म्हणजे पदार्थ हे समीकरण माणसाला लागू केले की माणूस जात-वर्ण यांचा वाहक असणारा 'पदार्थ' बनतो. साहजिकच त्याला समाजाचे नियम लागू होण्याऐवजी निसर्गाचे भौतिक नियम लागू होतात. भौतिक वस्तूचा नियम जिवंत, चतन्यशील माणसाला लावला की माणसाची 'शुद्ध भौतिक वस्तू' होते. वर्ण-जात-लिंगभेद या सामाजिक नियामक तत्त्वांना (social regulative principles) एक तर सारतत्त्वे (essences) समजले गेले किंवा द्रव्य (substance) मानली गेली. साहजिकच अमुक जातीचा माणूस अमुक रीतीनेच वागेल, असा खास जातीयवादी मानसशास्त्रीय सिद्धान्त तयार झाला. वर्ण-जात ही नियामक तत्त्वे असताना ती सारतत्त्वे किंवा द्रव्य ठरवली गेली की वर्ण-जात हीच मुख्य तत्त्वे बनतात. या तत्त्वांचे ज्ञान तेच तत्त्वज्ञान (जातीसाठी खावी माती), असा समज दृढ होत राहतो. माणसाचे 'मूळ स्वरूप ब्रह्म' आहे, तो 'प्रभूचा पुत्र' आहे किंवा 'अल्लाचा बंदा' आहे, या खऱ्या तर माणूस नावाच्या भौतिक वस्तूच्या व्याख्या आहेत. व्याख्या करणे हे माणसाचे सारतत्त्व किंवा द्रव्य शोधणेच असते. मग त्याला हवे तसे वापरता येते.

आता पाहा, 'माणूस विवेकशील, आत्मभान असणारा प्राणी आहे,' हीदेखील माणसाची व्याख्याच असते. सारतत्त्व किंवा द्रव्य म्हणून माणसाची व्याख्या करणे आणि नियामक तत्त्व म्हणून माणसाची कोणत्या तरी गुणधर्मामध्ये व्याख्या स्वीकारणे यात मूलभूत फरक करता येईल, असे वाटते. हा 'कोऽहम्?' (मी कोण आहे?)चे उत्तर शोधण्याचा प्रयत्न असतो.

'कोऽहम्?'चे रेडीमेड उत्तर प्रत्येक भारतीयाला वर्ण-जात-लिंगभेद या सारतत्त्व किंवा द्रव्य स्वरूपात मिळते. हा त्या त्या व्यक्तीचा खासगी आत्मपरिचय असला तरी तो वस्तुत: सार्वजनिक असतो. कारण वर्ण-जात सार्वजनिक असते. ती व्यक्ती मग त्या आत्मपरिचयाच्या तावडीत सापडते आणि विवेकशील माणूस हे स्वत:चे भान हरविते. व्यक्तीचा जातपरिचय इतर तशाच व्यक्तींना वावगा वाटत नाही, उलट सुरक्षित वाटते आणि चुकून जर जातपरिचयाचा पत्ताच लागत नाही, असे लक्षात आले तर त्यासाठी जंग जंग पछाडले जाते. 'जाती परिचय शोधण्याचे तर्कशास्त्र' या विषयात भारतीय माणूस अतिशय तज्ज्ञ असतोच.

आजची भारतीय सामाजिक व राजकीय स्थिती अशा अनेक प्रकारच्या तत्त्वांच्या संघर्षांच्या विषारी विळख्यात अडकली आहे, हे सहज दिसून येते. आमची परंपरा वर्ण, जात आणि लिंगभेद यांनी ग्रस्त आहे आणि विद्यमान जीवनाचा ढाचा मात्र युरोपीय तत्त्वांचा आहे. आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान युरोपीय व पाश्चात्त्य आहे तर त्याचे उपयोजन मात्र परंपरा टिकविण्यासाठी होते आहे. 'कोऽहम्?'चे उत्तर 'भारतीय!' असे सामाजिक स्वरूपाचे मिळेल, अशा व्यापक आत्मभानाकडे, आत्मपरिचयाकडे जाण्याची तयारी कशी करावी, हे धोरण आखणे आवश्यक आहे.

tattvabhan.blogspot.in वरून साभार

पूर्वप्रकाशन आणि सौजन्य: लोकसत्ता, दि.२३ जानेवारी २०१४

तत्त्वभान ०१. तत्त्वभानाच्या दिशेने ०२. भानावर येण्यापूर्वी.. ०३. स्वजाणिवेचे पक्व रूप

वाचन 13475 प्रतिक्रिया 38

द-बाहुबली Tue, 07/14/2015 - 15:10
मी आधी ही लेखमाला वाचलेली नाही. म्हणून कुतुहल अतिशय निर्माण झाले होते. पण कदाचीत माझ्या कमकुवत आकलनक्षमतेमुळे असेल पण संज्ञांचे अर्थ स्पष्ट करणे यापलिकडे अजुनही लिखाण गेलेले नाही. निरस...

In reply to by द-बाहुबली

संदीप डांगे Tue, 07/14/2015 - 16:11
अरे वो बोले ना भाइ... लिकान को खंप्लेट होने दो कर्के. सबकुच पडने का बादमेंच बोलनेका.... पिच्चर अबि बाकी है मेरे दोस्त...

In reply to by संदीप डांगे

निरन्जनदास Tue, 07/14/2015 - 17:47
बीच बीच मी चलेगा यार ! अभी स्लायडाच है कर कू बोल्या मै ... पिच्चर कु टैम अै... "याला जबाबदार कोण...." आयेला नै अब्बी

In reply to by निरन्जनदास

द-बाहुबली Tue, 07/14/2015 - 18:36
ओके... बोलेतो आपुन वेट तो कर र्हायेला हय... पन "मुख्य चित्रपट विश्रांती नंतर" असा काही प्रकार तर नाही ना अशी शंका आली म्हणून कंटाळुन आवाज दिला... जुनी सवय.

In reply to by द-बाहुबली

निरन्जनदास Tue, 07/14/2015 - 19:06
कोई बात बात नै रे चलता है ये साला सब्जेक्टीच ऐसा अै कि कंटाला आताच आदमी कू. अब्बी, मै देक भाया, कित्ते सालो से बेवकूफ लडके -लडकि लोगोंकू शाना बना रयेलाए. मेरे कू कित्ता बोर होता है सोचा कब्बी. वोच बात वोच बात हमेशा बताव, उनके थोबडे को देखो, उनकी समज आय क्या देको, नै तो लगी वाट ! बौत मांडवली करनी पडती रे मेरेकू

In reply to by निरन्जनदास

द-बाहुबली Tue, 07/14/2015 - 19:20
अब्बी, मै देक भाया, कित्ते सालो से बेवकूफ लडके -लडकि लोगोंकू शाना बना रयेलाए.
अच्चा ए किडा है क्या... सही है, बिलकुल सही है ? पर तुपन कोन बेवखुप औ कौन अकलमंद कैसा पयचानते रे ?

In reply to by द-बाहुबली

निरन्जनदास Wed, 07/15/2015 - 22:36
देक भै, तू बी मेरे धंधे मी आजा, तेरे कु सब समज मे आयेगा. अरे, ये मास्टर होने की बातच ऐसी ऐ की बैठे जगेपे सामनेवाले की पोल खोलने की चाबी तो हाथ मे आती है , खोलने का दमीच नै रयताय कूच बी नै कर सकते ये मास्तर लोगां !

In reply to by द-बाहुबली

निरन्जनदास Tue, 07/14/2015 - 17:42
खरंय तुमचं विषय कंटाळा आणणारा आहे. तुमची आकलनशक्ती कमकुवत असण्या-नसण्याचा प्रश्न नाही. माणूस बुद्धिमान प्राणी आहे. तुम्ही माणूस आहात, बुद्धिमान आहातच. असं करू, एक रूपक वापरतो : आपल्या घराचं. ..... अजून बांधकामाला सुरुवात झालेली नाही. आताशी कुठे दगड, चुना, सिमेंट, वाळू, पाणी गोळा करणे चालू आहे. मजूर, मुकादम, इंजिनियर, बँकेचा साहेब, कर्ज अर्ज अशा बारा भानगडी, एकाच वेळी सतराशे साठ कामे अन सगळीकडे आपणच मरा ! हे सगळे मटेरियल गोळा झाले की मग बांधकाम सुरु ! पाया, प्लिंथ, कॉलम, स्लॅब, भिंती, गिलावा, अधूनमधून स्वतः पाणी मारणे (सकाळी,दुपारी, मध्यरात्री भुतासारखे कधीही जावे लागते, पाऊस पडत असला तरी), पाण्यासाठी वीज पुरवठ्याचा अर्ज-वायरमन-साहेबाला चहापाणी, ग्रामपंचायत-नगरपालिका कुठे कुठे हात सैल करणे, ही नको असलेली वैतागवाडी भोगावी लागते. मग वायरिंग इत्यादी इलेक्ट्रिक कामे, रंग त्यांचे उलटी आणणारे वास ....... असे बरेच भोगून..... ......... मग कुठे घर आकाराला येते. तोपर्यंत वाट पहावी लागते. त्यानंतर आपल्याला हवी तशी आतली शोभा-दायक कामे .... मग ती कटकट, तिची टकटक..... .............................................. ............................................................ ............................................................................ ............................................................................................. हुश्श ! ज्याला सोने हवे आहे त्याने खणण्याचे श्रम केलेच पाहिजेत !

माहितगार Tue, 07/14/2015 - 16:43
असे दिसते की सार, सारघटक किंवा सारतत्त्व किंवा पदार्थ या अर्थाने 'तत्त्व' हा शब्द उपयोगात आणला जातो, तेव्हा सामाजिक प्रश्न उग्र होतात. तत्त्व म्हणजे पदार्थ हे समीकरण माणसाला लागू केले की माणूस जात-वर्ण यांचा वाहक असणारा 'पदार्थ' बनतो. साहजिकच त्याला समाजाचे नियम लागू होण्याऐवजी निसर्गाचे भौतिक नियम लागू होतात. भौतिक वस्तूचा नियम जिवंत, चतन्यशील माणसाला लावला की माणसाची 'शुद्ध भौतिक वस्तू' होते......
वरून आठव्या परिच्छेदातील मांडणी समजल्या सारखी वाटते आहे, पण मला अद्याप पूर्णही समजलेली वाटत नाही आहे. स्वतः हेमाडे सर आणि इतरांकडूनही हा मांडलेला विचार अधिक सोदाहरण समजून घेणे आवडेल. त्या शिवाय ऐसीअक्षरे संस्थळाच्या २०१४ दिवाळी अंकात सुरेश द्वादशीवार यांची मुलाखत वाचली होती (ती राजकीय अंगाने कललेली असल्यामुळे राजकीय भाग सोडून देऊ) त्यात त्यांनी तत्त्व निष्ठांच विभाजन जन्मदत्त निष्ठा आणि मुल्यदत्त निष्ठा अस केल आहे. विषय चालूच आहे तर जन्मदत्त निष्ठा विरुद्ध मुल्यदत्त निष्ठा हा विषय आपल्याही विचारातून समजून घेण्यास आवडेल. तत्त्वज्ञानाच्या संयत प्रकाश देण्यासाठी निरन्जनदासांचे आभार.

निरन्जनदास Tue, 07/14/2015 - 18:50
आभारी आहे, हे म्हणणे औपचारिक आहे. पण तो उपचार, उपचार म्हणून पाळतो. तुमच्यामुळे सुरेश द्वादशीवार यांची मुलाखत पुन्हा वाचली, सगळी नाही, पण तुम्ही उपस्थित केलेला मुद्दा पाहिला. जन्मदत्त निष्ठा आणि मुल्यदत्त निष्ठा हे त्यांनी केलेलं तत्त्वनिष्ठांच विभाजन योग्य आहेच. पण ही परिभाषा साहित्यिक आहे, तात्त्विक नाही. कोणतीही मूल्यव्यवस्था कृत्रिमच असते. ती जन्मदत्त नसते. थोडा खुलासा असा : द्वादशीवार काय म्हणतात ? "जन्मदत्त निष्ठा जन्मत: प्राप्त होतात. त्या आपोआप चिकटतात. आपल्या कुळाविषयीचं, घराविषयीचं, कुटुंबाविषयीचं, जातीविषयीचं, नावाविषयीचं, धर्माविषयीचं आणि देशाविषयीचं प्रेम ह्या जन्मदत्त निष्ठा आहेत. लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यनिष्ठा त्या मिळवाव्या लागतात.त्यांसाठी कष्ट करावे लागतात." हे सारे म्हणणे बरोबरच आहे, यात शंका नाही. पण हा दोन मूल्यव्यवस्थांमधील संघर्ष आहे. तृतीय पुरुषी एकवचनी मी कोणती मूल्यव्यवस्था स्वीकारतो " यावर माझे मूल्य निश्चित होते. त्यानुसार मी पुरोगामी किंवा प्रतिगामी ठरतो. आता, होत काय की जन्मतःच काही गोष्टी आज समोर दिसतात, मग वाटत की हे असंच असतं. पण कधीतरी तसं नसेल असे आपण समजू शकत नाही. सोपे उदाहरण घेऊ. काही वर्षापूर्वी मोबाईल नव्हते. पण आज जन्माला येणाऱ्याला वाटते की ज्याअर्थी माझ्या जन्माच्या आधीपासून मोबाईल आहे त्याअर्थी तो मुळातच आहे ! नदी, डोंगर, उन, वारा, पाउस या गोष्टी जशा नैसर्गिक वाटतात तशा बल्ब, पलंग, मोटार,रस्ते, रेल्वे, विमान,सिनेमा, नाटक, कपडे, शाळा, मॉल्स, वेश्याव्यवसाय, दारू, विवाह बाह्य संबंध (विबास) विवाह, बारसे, लग्न, जात, धर्म, लिंगभेद या साऱ्या गोष्टी नैसर्गिक वाटू लागतात. त्यामुळे जगताना काय कृत्रिम आहे आणि काय नैसर्गिक आहे, हे चाणाक्षपणे ओळखणे महत्वाचे ठरते. आता, पाहा : माणसाला जात,धर्म,कुल यांच्याविषयी असेल प्रेम ते जन्मदत्त समजू. पण देशाबद्दल प्रेम, निष्ठा जन्मदत्त असते का ? देशावर प्रेम दिसते ते केवळ हिंदी सिनेमात. देशावर प्रेम असते तर भारत हा इतक भ्रष्ट, अनीतिमान म्हणून का प्रसिद्ध आहे ? सहजपणे लाच दिली जाते घेतली जाते. एक भारतीय दुसऱ्या भारतीयाला सहज लुटत असतो. जातीव्यवस्था ही आधुनिक लुटमारी आहे, वेतन आयोग लुटमारी आहे, यावर कुणी शंका घेत नाही. कारण प्रत्येकाला लुटीचा हिस्सा मिळत असतो. मग देशनिष्ठा जन्मदत्त कशी? १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला, ०२ अक्टोबर ला सतत उमाळे जाहीर करावे लागतात. जाहिरात करावी लागते. आजची शिक्षण व्यवस्था नवी लुटमारी नाही का ? देशप्रेम कृत्रिमरीत्या जागे करावे लागते. ती जन्मदत्त नाही. अनेक गोष्टी आहेत. जन्मदत्त दोनच घटना : जन्म आणि मृत्यू. उरलेले सारे मानव निर्मित. जात, धर्म, लिंगभेद जन्मदत्त वाटावे हीच शोषकांची इच्छा असते.

In reply to by द-बाहुबली

माहितगार Tue, 07/14/2015 - 21:45
लिंगभेद जन्मदत्त नाही ?
इथे त्यांना लिंगभेद शब्दात लिंगावर आधारीत भेदभाव हा अर्थ अभिप्रेत असण्याची शक्यता वाटते. अर्थात ज्यांना स्त्रीवादी भूमीका लक्षात येते ते ह्या मुद्याचा अधीक व्यवस्थीत स्पष्ट करू शकतील असे वाटते.

In reply to by माहितगार

द-बाहुबली Wed, 07/15/2015 - 13:22
ठीकय , लिंगाधारीत भेदभाव करुन केले जाणारे शोषण नक्किच जन्मदत्त नाही असे कल्पुया. अर्थात जंगलचा नियम जोप्रत्यक्ष निसर्गच मान्य करतो/चालवतो त्याचा विचार करता, " लिंगाधारीत भेदभाव करुन केले जाणारे शोषण नक्किच जन्मदत्त नाही " या विधानाबाबतच शंका मनात अजुनही आहे पण असो. त्या मुद्याचा मला उहापोह हा नंतर होइलच पण मुळ मुद्दा की फक्त जन्म व म्रुत्यु या दोनच घटना जन्मदत्त आहेत याला माझा संपुर्ण आक्षेप आहे. जन्म व मृत्यु प्रमाणे लिंगभेद ही सुधा संपुर्ण वैज्ञानीक आणी जन्मदत्त घटनाच आहे असे माझे प्रामाणीक मत आहे. किंबहुना मी लिंगभेदाशिवाय भौतीक जग कल्पुच शकत नाही. निरन्जनदास भाउ लिंगभेद व त्याचे आयुष्यवर परिणाम ही गोष्ट जन्मदत्त कसे काय मानु शकत नाहीत बरे ?(मी शोषण हा विषय इथे मांडत नसुन निव्वळ लिंगभेदातुन निर्माण होणारे फरक व मानवी वर्तनावर त्याचा परिणाम या द्रुश्टीकोणातुन चर्चा अपेक्षीत करत आहे, स्त्रीवादी(च) अथवा पुरुषवाद्या(च) भुमीकांनी यात घुसेखोरी न करता निरन्जनदास भाउंच्या तत्वज्ञानातील त्रुटीचां/अचुकतेचा उहापोह करावा. बोलेतो खुद निरन्जनदास भाउ चर्चामे आये तो मंजा आयेगा.

In reply to by द-बाहुबली

माहितगार Wed, 07/15/2015 - 14:15
निरन्जनदास भाऊंच्या प्रतिसादाची नक्कीच प्रतीक्षा करूया. माझ्या मतानुसार दोन व्यक्तीत फरक असणे आणि दोन व्यक्तीत भेदभाव असणे यात अंतर आहे. 'भेदभाव' आणि भेदभाव आणि 'भेदभाव' यात तुम्ही कशास अधीक ठळक करता यावर आपला दृष्टीकोण बराच अवलंबून असेल असे वाटते. भेदभाव या शब्दातील आपला फोकस 'भाव' शब्दा पेक्षा भेद या शब्दावर अधीक येतो आहे असे वाटते. मुलांना आणि मुलींना नावे वेगळी ठेवणे, मोठ्या लोकांनी मुलांना विशीष्ट प्रकारची खेळणी देणे मुलींना विशीष्ट प्रकारचीच खेळणी देणे हे खरेच मुलाने अथवा मुलीने जन्मदत्त निवडलेले असते का ? कि भेदभाव कृत्रीमरित्या पेरला जात राहतो आणि सरांनी मोबाईल फोनचे जसे उदाहरण दिले तसे जी गोष्ट तुम्ही आधी पासून पहात आला असता ती तुम्हाला कृत्रीमच्या एवजी नैसर्गीक वाटावयास लागते.

In reply to by माहितगार

द-बाहुबली Wed, 07/15/2015 - 16:25
लिंगभेद आणी भेदभाव ह्या दोन वेगळ्या संज्ञा आहेत. "भेदभाव" करणे नक्किच जन्मदत्त नाही हे. पण लिंगभेद हा जन्मदत्तच आहे. निरन्जनदास भाउ हे सर आहेत हे माहिती न्हवते. असो. सर फक्त जन्म आणी मृत्यु या दोनच गोष्टी जन्मदत्त मानत आहेत हे सर्वस्वी चुक आहे लिंगभेद हा सुधा जन्मदत्तच आहे हे ते सपशेल विसरतात. असो तुमच्या माज्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यांच्या अशा चर्चा कितीही झाल्या तरी त्या सरांच्या मनाची थोडीचं उकल करु शकणार आहेत ? चला सरांच्याच प्रतिसादाची वाट बघुया कि लिंगभेद हा जन्मदत्त आहे हे त्यांना पटवुन घेता येतय की खोडुन काढता येतयं...

अर्धवटराव Tue, 07/14/2015 - 19:58
'तत्व' शब्द किती विवीध अंगाने आपल्याला भिडतो हे बघुन मजा वाटली. जाती व्यवस्थेबद्दलची तत्वनिष्ठा आज विक्राळ रूप धारण करुन आहे. पण तसं व्हायला माणसाची तत्वप्रीयता कारणीभूत नाहि. त्याचा उगम डिव्हीजन ऑफ लेबर मधे आहे. मानवी श्रमावर चालणार्‍या दुनीयेत हे डिव्हीजन फोफावलं. ऑटोमेशन युगात त्याचं व्यवस्थामूल्य शुण्य झालं तरी परंपरागत उच्चनीचतेच्या कल्पना आणि आधुनीक राजकारणाची गरज म्हणुन पेंढा भरलेलं हे शव आजही वहावं लागतय. त्याला तत्वाचा आधार सत्यप्रीयता म्हणुन आलेला नसुन सरळ सरळ लाभधारकांची सोय म्हणुन आलेला आहे.

माहितगार Wed, 07/15/2015 - 11:43
'narrative' आणि 'ओळख' या संकल्पना आपल्या पुढील लेखात येणार असतीलतर ठिकच, एरवी या धागा लेखातील तत्त्वचर्चेच्या अनुषंगाने आपल्याकडून समजून मिळावे असे वाटते.

हा भाग देखील आवडला. तुमची उत्तरे देण्याची हातोटी देखील प्रशंसनिय आहे. खात्रीने सांगतो तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांचे आवडते सर असणार. पैजारबुवा

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

निरन्जनदास Wed, 07/15/2015 - 19:34
बुवा धन्यवाद, आता, गोची अशी कि विद्यार्थ्यांना मी आवडायला विद्यार्थी तर पाहिजेत ! तत्त्वज्ञानाला मार्केट नाही सध्या कॉलेजात

निरन्जनदास Wed, 07/15/2015 - 19:26
मित्रहो, तुम्ही सारे अतिशय पोटतिडकीने चर्चा करीत आहात, ते माझ्या नजरचुकीच्या गाढवपणामुळे. मला खरे तर लिंग भेदभाव असे म्हणावयाचे आहे. लिंगभेद नैसर्गिकच आहे, यात शंका नाही. अर्थात हे म्हणणे म्हणजे "लिंगभेद नैसर्गिकच आहे" हे म्हणणे सुद्धा आज तितके वैज्ञानिक नाही. उदाहरणार्थ सिमोन द बोवा च्या मते (The Second Sex : Woman As Other )लिंगभाव कृत्रिम आहे, मुलीला मुलगी म्हणून आणि मुलग्याला मुलगा म्हणून वाढविणे हेच राजकारण आहे. मुलीचे मन मुलाचे आणि मुलाचे मन मुलीचे असू शकते. पण तसे घडू नये, यासाठी शरीर आणि मन यांच्यात विसंवाद टाळावा, या हेतूने मुलाला मुलगा व मुलीला मुलगी अशी वागणूक जबरदस्तीने देण्यात येते. पण यातून लिंगांतरीतांचा प्रश्न निर्माण होतो. किंवा अन फाउस्टो स्टर्लिंग या विदुषीच्या मते माणसाला जन्मतः केवळ एकच लिंग असते आणि एकच लिंगभाव असतो, हे चूक आहे. तिची वेबसाईट . पण तुमची चर्चा फारच विधायक आहे. मला बरे वाटते. आणि बरंका बॉमकेस मित्रा, मी सर आहे, हे सरकवून टाका बाजूला ! तो केवळ भाजी भाकरीचा मामला आहे. अर्थात महत्वाचा आहे. पण लष्कराच्या भाकऱ्या ! त्यात मलाही थोड्या मिळतात, हे नशीब.

निरन्जनदास Wed, 07/15/2015 - 19:29
कृपया, "तुम्ही सारे अतिशय पोटतिडकीने चर्चा करीत आहात, ते माझ्या नजरचुकीच्या गाढवपणामुळे." हे वाक्य पुढीलप्रमाणे वाचावे "तुम्ही सारे अतिशय पोटतिडकीने चर्चा करीत आहात. पण इथे माझ्या नजरचुकीमुले गाढवपणा झाला आहे. " पुढचे सारे बरोबर. चुकीबद्दल माफी चाहतो.

निरन्जनदास Wed, 07/15/2015 - 19:37
मित्रहो, आणखी एक खुलासा सर्वांसाठी करतो. मी नगर जिल्ह्यातील संगमनेर या दिव्य गावात राहतो. इथे इंटरनेट कनेक्शनची सदैव बोंब असते. त्यामुळे कधी कधी उत्तरास उशीर होईल. गैरसमज नसावा, ही विनंती.

In reply to by निरन्जनदास

मितभाषी Wed, 07/15/2015 - 22:38
अरे व्वा. तुम्ही तर मन्हा गाववाला शेतस. वाचतोय. और आन्दो. काही शन्का आहेत. शेवटी निवान्त बोलू. (सन्गमनेरी) मितभाषी.

द-बाहुबली Wed, 07/15/2015 - 19:56
सर, सध्य परिस्थीतीमधे संपुर्ण राज्यातच विज अन नेट बाबत अशी बिकट परिस्थीती निर्माण झाली तरी आश्चर्य वाटणार नाही त्यामुळे प्रतिसादास विलंब झाल्यास नक्किच गैरसमज होत नाही(जर ऑनलाइन दिसत नसाल तर). तैसेच पोटतिडकेने चर्चा पेक्षा मुद्देसुद चर्चा हीच आमची डिमांड हाये.
आता, गोची अशी कि विद्यार्थ्यांना मी आवडायला विद्यार्थी तर पाहिजेत ! तत्त्वज्ञानाला मार्केट नाही सध्या कॉलेजात
जे ब्बात, आता तुमच्या लक्षात आले असेल... विषय सरळपणे का बोलायचा नाही ते :)

In reply to by द-बाहुबली

निरन्जनदास Wed, 07/15/2015 - 22:23
हाॅ हाॅ हाॅ हाॅ हाॅ ! "तत्त्वज्ञानाला मार्केट नाही सध्या कॉलेजात" इथेही एक दुरुस्ती करतो. "कॉलेजात" ऐवजी "भारतात'' वाचावे !! आणि "मुद्देसुद चर्चा" हाच एक "मुद्देसुद मुद्दा" आहे, ते मान्यच !

सुधीर Wed, 07/15/2015 - 20:04
तुमच्या ब्लॉगवर सगळे लेख आहेतसे वाटते. तरीही जस जसा वेळ मिळेल तसा मिपावर लेख आणि चर्चा वाचेनच... स्टिव्हन कव्हींनी तत्त्व आणि मूल्यावर सुंदर भाष्य केलंय. ते म्हणतात, "तत्त्व ही कालातीत असतात आणि केलेल्या कृतीचे परिणामही तत्त्वांना अनुसरून असतात. पण मूल्यांचं तसं नाही, चोर-दरोडेखोरांनाही मूल्य असतात. म्हणून मूल्यांची जोपासना ही योग्य तत्त्वांच्या चौकटीत व्हायला हवी." पुढे त्यांनी असेही म्ह्टले आहे, "तत्त्वांची समज जितकी जास्त तितका आपल्या कृती करण्याच्या वा निर्णय घेण्याच्या क्षमतेतला स्वाभाविकपणा जास्त. सभोवतालचं विश्व समजून घेण्याच्या माणसाच्या मर्यादेमुळेच सगळीच्या सगळी तत्त्वे समजून घेता येतीलच असे नाही." असो, दरवेळेला प्रतिसाद द्यायला जमलं नाही तरी चर्चा, मतभेद चालू राहू द्या. तेवढेच नवीन विचार समजत आहेत.

In reply to by सुधीर

निरन्जनदास Wed, 07/15/2015 - 22:31
सुधीर धन्यवाद. ब्लॉगवर आहेत लेख पण इथे ते आणल्यामुळे फार उत्तम चर्चा होते आहे. स्टिव्हन कव्हींचं Knowledge workerही संकल्पना मस्त आहे. पण तुम्ही येत चला.

गामा पैलवान Sat, 07/18/2015 - 01:33
निरन्जनदास, अतिशय मोजक्या शब्दांत अगदी समर्पक वर्णन आलंय. फक्त एक वाक्य जरा समजावून सांगावं ही विनंती : >> वर्ण-जात ही नियामक तत्त्वे असताना ती सारतत्त्वे किंवा द्रव्य ठरवली गेली की वर्ण-जात हीच मुख्य तत्त्वे बनतात. जात ही जन्माने मिळते आणि ती कधीच बदलत नाही. याउलट वर्ण म्हणजे माणसाचा कल असतो. हा प्रयत्नांद्वारे बदलता येतो. तर वर्ण आणि जात दोन्ही नियामक तत्त्वे कशी काय? मुळातून 'नियामक तत्त्वे' म्हणजे नक्की काय? ही संज्ञा जरा विस्कटून सांगावी. असो. लेखात एक खुसपट काढायचंय म्हणून काढतो. लेखातलं हे विधान पाहूया : >> संस्कृतमधील 'तत्त्व' संज्ञा 'तत्' या सर्वनामाला भाववाचक 'त्व' प्रत्यय लागून 'तत्त्व' हे नाम होते. त्यापासून >> तत्त्वनिष्ठ, तत्त्ववादी, तात्त्विक, तत्त्वेन/ तत्त्वत: (वास्तवात), तत्त्ववित् (ज्ञाता), तत्त्वमसि हे इतर शब्द बनतात. या साऱ्यांत तत्त्वमसि हा शब्द वेगळा आहे. 'तत्त्व' हा शब्द त्याचा गाभा नाही. कारण त्याची फोड 'तत्त्व + मसि' अशी नसून 'तत् + त्वम् + असि' अशी आहे. असं असलं तरीही यांतील तत् या पदातून परत तत्त्वाकडेच निर्देश होतो. लेखाबद्दल धन्यवाद ! :-) आ.न., -गा.पै.