Skip to main content

काही नवे करावे म्हणून.-भाग ६

लेखक नूतन सावंत यांनी सोमवार, 01/06/2015 या दिवशी प्रकाशित केले.
माहेरचा आहेर म्हणून त्यांना तो घ्ययला लावला.निरोप घेताना म्हटलं,”चाफेरकर प्रकरण अजून संपलेलं नाहीये बरं. मी गेले की काही माहिती मिळवून तुला काय ते सांगते,त्याप्रमाणे तू करायचं.” दुसऱ्यादिवशी मी मुंबईलापरतले. (क्रमश:) ********************************************************ही बाग घेतल्यामुळे आलेले अनुभव लिहिण्यासाठी खरे तर ही मालिका लिहायला सुरुवाtत केली खरी;पण नमनालाच घडाभर तेल जाळावे लागले.पण त्यातून आजीचे बुडालेले पैसे मिळाले हा एक तिचा फायदा झाला आणि दुसरे म्हणजे निराधार झाल्याने हताश झालेल्या आजोबांनी पुन्हा कामे करायला सुरुवात केली.त्यामुळे आजीला दुहेरी फायदा झाला.माझ्यासाठीही या गावात घर नसले तरी काही माणसे जोडली गेली. माझ्या बागेत आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत वापरले नव्हते.त्यामुळे मीही रासायनिक खाते न वापरता जैविक खतेच वापरायची ठवली. काही वर्षपूर्वी वेद आणि उपनिषदाचा थोडा भाग अभ्य्सावा लागला होता.त्यात शेती,बगयातीबद्दल काही वाचल्याचे आठवत होते.माझे मामाही आरे,गुहागरचे मोठे बागायतदार असल्याने त्यांचाही या बाबतीत अभ्यास होता.त्यांनी मला ऋषी आणि कृषी ,लेखक मोहन जोशी , हे पुस्तक वाचायला दिले.त्यातील माहितीनुसार वडापिंपळाच्यालाच्या झाडांखालची माती ;देशी गाईचे,त्यातल्या त्यात काळ्या देशी गाईचे शेण,देशी गाईचे तूप (तेही काळ्या गाईचे असेल तर उत्तम) आणि मध यांचा उपयोग करून जमीन सुपीक कशी करता येईल याचे विवेचन आहे.या प्रयोगाला त्यांनी अमृतपाणी असे नाव दिले आहे. खूप पाणी लागणाऱ्या उसासारख्या पिकाने जमीन क्षारपड होऊन जाते त्यासाठी बरेच प्रयोग श्री.जोशी यांनी केले आहेत.गावागावात जाऊन व्याखाने दिली आहेत.या सर्वांचे सार म्हणजे हे पुस्तक आहे.त्यात कडूनिंब आणि गोमूत्राच्याही फवारण्यासंबंधी माहिती आहे. “चला भाईमामा,आजच ठरवून टाकते.पाच डझनी फळ तीन डझनी करायचं आणि पहिला तोडा मार्चमध्ये करायचा.”मी भाईमामाना सांगितलं.एव्हाना जूनची सुरुवात झालेली होती.मी वेळापत्रक आखले..श्रावण सरता सरता टाळमाती करावी आणि त्याचवेळी अमृतपाण्याचा प्रयोग करायचे ठरवले. दर महिन्याला एक फवारणी करायचे ठरले.कडूनिंब आणि गोमूत्र एका आड एक फवारायचे. एकदा जुलै महिन्यात पाहणी करून आले.मयू सोबत होताच.काही झाडांना मोहर आलेला दिसला.आश्चर्य वाटले नाही कारण रोपदळ झाडे असल्याने असे होते आणिअसा मोहर तोडून टाकायचा असतो हेही माहीत असतो.नंतर लक्षात आलं”,अरे,एका झाडावरचा तरी ठेवायला हवा होता.ऑक्टोबर-नोव्हेम्बरमध्ये जे आंबे दिसतात ते अशाच लवकरच्या मोहोराचे असतील का?”असो. माझ्या दोन बागांमधून पायवाट होती.कोळंबे नावाच्या गावाला जाण्यासाठी शॅार्टकट होता.काही लोकांची ये-जा चालू होती.जातायेता रामराम झडत होते,कोण कुठले याची चौकशी होत होत होती.सडयावरची बाग म्हटली की,उल्लेख व्हायचा,’”शामरावाची बाग घेतली का?’” “‘नाही हो सडयावरची बाग.”’ “हं हं,ती शामरावाची बाग.”समोरचा म्हणे.हे पाच-सहावेळा झाल्यावर मयूचा चेहरा त्रासिक दिसू लागला.कारण या बागेच्या व्यवहारात त्याचा मामेभाऊ होता.”काय रे ,काय झालं?तू का वैतागला आहेस?”असे विचारल्यावर तो फुटलाच.”अग, दादा होता न या व्यवहारात,हा शामराव कोण?या जागेचा पहिला मालक तर ‘मधुकर साळवी’ आहे ना?” “हं,मी बोलणारच होते तुला.पण आधी जाऊन फेरफार घेऊन येऊ.आता माझ्याकडे सात बाराचा उताराही नाही.म्हणजे आणलाय मी पण घरी ठेवलाय.चाफेरकरला भेटूया.”म्हणत आम्ही खाली पातेरेमामाच्या घरापर्यंत आलो.मामी उभ्याच होत्या.मामा रानात गेले होते.यशवंत ऑफिसमध्ये.’या,बसा.’झाले.मी मामींना म्हटले,”तुमच्याकडे गुरे आहेत ना?”मामीनी होकार दिला.”माझ्यासाठी एक काम कराल का?आजपासून गोमूत्र साठवायला सुरुवात करा.मी कॅन पाठवून देते.त्यात भरून ठेवा.मला हवे तेव्हा मी नेईन.आणि मी तलाठ्याकडे आहे .मामा आलेच तेवढ्यात तर पाठवून द्या.माझं काम आहे.”मामीनी परत मान हलवली. इतक्यात बेडयातून कोणीतरी दमदार आवाजात हाक मारली.”ओ मामी, पावणे हायत की गेले?”मामीनी भाहेर डोकावत विचारले,”कुटचे पावने?” प्रत्युत्तारादल आवाज आला.”अवो,त्या सावंत वैनी.शामरावाची बाग घेतलेल्या.” ’मयू काहीतरी बोलणार एवढ्यात मी त्याला गप्प राहण्याची खूण केली.”हायत ना.निघतातच हायत.”मामीनी सांगितले.एकाच मिनिटांत मामींच्याच्या दरवाजात उंचीपुरी व्यक्ती उभी राहिली.”ओ वैनी.मी भाई साळवी.तुमचा शेजारी ओळख करून घ्यायला आलोय.” ”नमस्कार.” मी हात जोडत म्हटले”.हे कोण?”मयूकडे हात दाखवत विचारणा झाली.’”भाऊ माझा.”या माझ्या उत्तरावर मयूने हात जोडले. “ओ वैनी,तुमचा गावात डंका वाजतोय हो.त्या गरीब बिचाऱ्या शित्याकाकुचे पैशे तुमच्यामुळे मिळाले,हे मला समजलंय.मी तुम्हाला माझ्या घरी बोलवायला आलो आहे.म्हटलं,आपले शेजारी आहेत,शेजारधर्म निभावायला पाहिजे.आता मी जेवल्याशिवाय सोडणार नाही हां तुम्हाला.” पहिल्याच भेटीत ओळख नसतानाहीइतके अगत्य दाखावणारा माणूसजेवणाचे आमंत्रण घेऊन समोर आलेला;पण मला आता शाम्रावाचे कोडे सोडवायचे होते.”आज नको हो,जरा काम आहे.आम्ही आता निघतच होतो.पुढच्या वेळी नक्की येईन.”मी आश्वासन दिले.आणि आम्ही निघालो. “मयू,तू त्या भाईला शामरावबद्दल विचारणार होतास ना?”मी चालता चालता विचारले.”हो ग पण तू रोखलंस ना!”तो फुरंगटून म्हणाला.”अरे,आपल्याच अजून काही माहीत नाहीये.या माणसाला किती ओळखतो आपण?आपण आधी तुझा दादा आणि जोशी साहेबाना भेटूया.काय म्हणतात ते बघूया.आपण सरकारी मोजणी करून जागा घेतली आहे तेव्हा जागा तर हीच आहे एवढे नक्की आहे.आणि आधी आपल्याकडचे कागदपत्र पाहू.इथल्या ऑफिसात काय माहिती मिळतेय तेही पाहू.मग पुढे ठरवू काय करायचे ते.” आम्ही ऑफिसमध्ये आलो.सव्वादहा वाजले होते.यशवंता आमच्या पुढेच ऑफिसात शिरत होता.”काय रे,तुझा ऑफिसमध्ये येणाची वेळ काय?आणि येतोयस कितीला.?तुझ्या सायबाची पण ऑफिसला यायची वेळपण अर्ध्या तासापूर्वीच टळलेली आहे.म्हणजे तू एक तास उशिरा आहेस.”या माझ्या गमतीने दिलेल्या शेऱ्यावर यशवंत ओशाळवाणे हसून आतून खुर्चीआणून माझ्यापुढे ठेवली.,वैनी,तुम्ही हिते बसा.मी आतमदना झाडून घेतंय.”असे सांगत आत निघून गेला. इतक्यात चाफेरकर घाईघाईने येताना दिसला”.मी पाठवलाय पोस्टाने तुमचा आणि आजीचा सातबारा.”त्याने खुलासा केला. “नाही, माझे वेगळेच काम आहे.मला जरा या जागेचे फेरफार हवे आहेत.आज देऊ शकाल ना?”यावर तत्परतेने,त्याने होकार दिला. त्या फेरफारातून आणि त्याच्याबरोबर झालेल्या बोलण्यातून मला समजलेली हकीकत अशी होती.पूर्वी ही गुरचरणाची जागा होती आणि मधुकर धर्माजी साळवी हे सरपंच होते.१००% सामाजिक वनीकरण योजनेतून फुकट आंब्याची कलमे मिळवून त्यांनी या जागेत बाग केली होती आणि कूळ म्हणून आपले नाव लावून घेतले होते.नंतर ही जागा जोशींना विकताना त्यांनी रीतसर जिल्हाधिकारी कार्यालयातून बाग विकण्याची परवानगी घेतली होती.त्या आदेशाचा नंबर मिळाला.प्रत काही मिळाली नाही.शामरावाचा पत्ता ठिकाण काही समजला नाही. आता मयूचा दादा आणि जोशींना भेटण्याचे ठरवून रत्नागिरीत परत आलो .मयूचा दादा मुंबईला गेल्याचे समजले. बँकेत आलो तर श्री.जोशी यांना बढती मिळून त्यांची बदली मुंबईला झाली असे समजले.मला रात्री निघायचे होते.आता बारा वाजत आले होते. “चल मयू,आपण कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन या आदेशाची कॉपी मिळते का पाहूया.”तिथे जाऊन पोचलो.श्री.विनोद घोसाळकर नावाचे वरिष्ठ लिपिक तिथे होते.त्यांना थोडक्यात माझी ओळख देऊन सर्व सांगितले.म्हटलं,”मला या नंबरच्या आदेशाची साईन्ड प्रत हवी आहे.मी अर्ज देते.किती दिवसांनी येऊ.?” ‘मधुकर धर्माजी साळवी ,फणसोप’ हे ऐकल्यावर ते अस्वस्थ झाल्यासारखे झाले.लिहून दिलेल्या कागदावरच्या नंबरकडे पाहत विचारात पडले होते.”जरा थांबा हं,मॅडम,तुम्ही ना जरा बसून घ्या.मी बघतो जरा काय ते.”ते काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत होते.त्यांनी शिपायाला बोलावून, ‘शिंदे रावसाहेबांना लगेच बोलवा, असं सांगितलं.माझ्याकडे पाहत विचारलं,”मॅडम,सरकारी मोजणी घेतली होती ना जागा विकत घेताना?”मी होकार दिल्यावर त्यांचा अस्वस्थपणा थोडा कमी झाल्यासारखे वाटले. शिंदे रावसाहेब लगबगीने आले.त्यांना बसायला सांगून घोसाळकरानी हातातला कागद त्याच्या हातात देऊन म्हटले,”मधुकर धर्माजी साळवी,फणसोप.”शिंदे रावसाहेबाही चपापलेच.”अजून एक केस?” “ “बहुतेकनसावी.कारण जागा घेताना सरकारी मोजणी झालेली आहे.आणि आधीच्या जमीनमालकाला जागा विकण्याची परवानगी दिल्याचा आदेशही आहे.त्याचा हा नंबर आहे,आणि मॅडमना साईनड प्रत हवीय.त्या अर्ज देताहेत.किती दिवसांनी बोलावू?.”घोसाळकरानी त्यांना सांगितले. शिंदे रावसाहेब पुटपुटले.”हा शामराव मरून गेलाय तरी ह्याचा त्रास आहेच.” मला काही समजत नव्हतेच.पण शामराव हा शब्द पकडून मी विचारले. “हा शामराव कोण आहे हो?ह्याचा काय संबंध आहे या जागेशी.?”त्यांनी खुलासा केला.,”हाच मधुकर धर्माजी साळवी,त्यालाच शामराव म्हणायचे सगळे.”माझ्या डोक्यावरचा एक धोंडा उतरत नाही तोच त्याचे पुढचे शब्द ऐकून पोटात गोळाच आला.”एक नंबरचा लबाड माणूस.किती ताप देणार आहे डोक्याला कोणास ठाऊक?” ते पुन्हा घोसाळरांकडे कागद देत म्हणाले,”दहा वर्षांपूर्वीची केस आहे,एखादवेळेस त्या सगळया केस्बरोबर असेल तर मिळेल लवकर.तुम्ही मॅडमकडून अर्ज घ्या आणि आठ दिवसांनी फोन करून यायला सांगा.”ते निघून गेले. मी घोसाळकराना विचारले.”काय प्रकार आहे हा?”ते डोक्याला हात लावत उत्तले,”काय सांगू मॅडम,ह्या माणसाने इतके उपद्व्याप केले आहेत तेही इथल्याच माणसाना हाताशी धरून, की आम्हाला साठ केसेस null and void कराव्या लागल्या आहेत.”मी त्याची टेबलावरचा ग्लास उचलून तोंडाला लावला.माझ्या घशाची कोरड संपेना.ते पुढे बोलतच होते,” तीनजण सस्पेंड झालेत त्याची विभागीय चौकशी चालू आहे ती वेगळीच.” थोडे थांबून पुढे म्हणाले,“पण तुम्ही काळजी करू नका जोशी साहेब म्हणजे बँक ऑफ इंडियावालेच ना?मी व्यक्तिश: त्यांना ओळखतो.तेसुद्धा असं काही बेकायदेशीर करणार नाहीत.त्यांच्याकडे ती प्रत असलीच पाहिजे.” घोसाळकरांनी मला धीर दिला. “हो .पण ते आता मुंबईला आहेत तर मी मुंबईला गेल्यावर भेटेनच त्यांना.त्यांनी ती प्रत दाखवल्याचे आठवतेय मला पण ती साईन्ड कॉपी होती की नाही ते मला आठवत नाहीये.खरं म्हटलं तर शामराव कोण हे कळल्यावर मी सुटकेचा निश्वास टाकला होता.पण असा ऊचापती करणारा माणूस असेल या प्रकरणाची तड लावायलाच हवी ना?” ते म्हणाले,”मला आता एक वाजता कलेक्टर मीटिंग आहे.तुम्ही तीन वाजता येता का मग बोलूया काय आहे ते प्रकरण?” साहेबांकडे मी त्यांना मानेनेच होकार देऊन मी उठले.आता माझ्याही पोटात कावळे कोकलत होते.मयूचा चेहराही पडलेला.”त्याला धीर देत मी म्हटले,”तू कशाला खिन्न झालायस?,चल मस्त जेवूया.आणि तीन वाजता येऊया इकडे परत.काय ते कळेल तरी.आणि एक लक्षात तेव.आपल्याला सगळं नीट काही समजल्याशिवाय तू एकट्याने दादाला काही विचारायला जायचं नाही हं.उगाच तू तुझे संबंध खराब करू नकोस.वेळ आलीच तर बघू.” मयूने रागाने मान झटकली.आता भूक लागली असली तरी जेवायला मूड नव्हता.पण वेळ घालवायचा होता.समोरच सत्कार हॉटेल आहे तिथे गेलो,तिथे मैसूर मसाला डोसा मस्त मिळायचा.वर घरगुती लोण्याचा गोळाही असायचा. पोटात भर पडताच माझे डोके चालू झाले.शासकीय कार्यालयात एखादे प्रकरण कसे हाताळले जाते याची कार्यपद्धती लक्षात घेता या आदेशाची प्रत निवड नस्तीला(select file) लावलीच पाहिजेम्हजे त्या वर्षभरात निघणाऱ्या आदेशांची एक प्रत त्या फाइलमध्ये असते.बाकीचे कागदपत्र नसले तरी आदेशाची प्रत मिळू शकते.पुन्हा जरा धीर आला.परत कलेक्टर ऑफिसमध्ये येऊन आवारातल्या झाडांखाली बांधलेल्या पराखाली बसून राहिलो तीन वाजेपर्यंत. तीन वाजता परत घोसाळकरांना भोज्या केला.’या,बसा’ झाले.आणि कहाणीला सुरुवात झाली,”हा माणूस सरपंच असल्याने तिथेच पंचायतीच्या ऑफिसात बसून कुठली जमीन कोणाची/वगैरे माहिती काढून मालक कुठे असतात?इथेच की बाहेरगावी याचाछडा लावर असे.त्यानंतर गिऱ्हाईक शोधून त्याला जागा दाखवत असे.कूळ म्हणून कसणे होत नाही असा बनावट अर्ज देऊन इथल्या लोकांच्या सहाय्याने बनावट आदेश काढून जमीन विकून टाकत असे.निबंधकांच्या ऑफिसमध्ये अ च्या जागी ब ला उभा करून अंगठे देऊन व्यवहार पुरा करत असे.तिथलाही एकजण अडकलाय यात.बरं,हा सरपंच.याच्यावर कोण अविश्वास दाखवणार?असा प्रकार केलेला.रेशन ऑफिसमध्येपण संधान बांधून बनावट रेशनकार्ड बनवून घ्यायचा ओळखीचा आणि राहण्याचा पुरवा म्हणून ब च्य नावाने. तिथले दोघेजण अडकले आहेत. आहेत. केवढं मोठं रॅकेट उभे केला होतं या माणसाने. अंगठा लावणाऱ्या माणसाला शंभर दोनशे द्यायचा.हळूहळू उघड व्हायला लागलं सगळं.सात- आठ वर्षात साठ केसेस निघाल्या अशा.पण बाकीचाही असतीलच पण तक्रार नसल्याने आम्ही काय करणार?पण लोकांचे शाप बाधतातच.मुलगा आजारी पडून गेला. हाही पक्षाघात होऊन मरून गेला. इथल्या लोकांच्या डी.ए. चालूच आहेत अजून.” मी सुन्नच झालेली सगळं ऐकून; ‘अरे देवा!आणि अजूनही लोक या बागेला त्याची बाम्हणून ओळखतात. मला लाभेल ना ही बाग?’असे काही बाही विचार मनात येऊन गेले.’आणि नक्की माझी बाग असेल ना हीच?’इतक्यात घोसाळकर म्हणाले,”तुम्ही मला अर्ज द्या आणि एका आठवड्याने फोन करा.” मी माझे विचार गोळा केले. मी त्यांना म्हटलं, “तुम्ही निवड नस्तीठेवता का?या वर्षीची असेल तर त्यात मिळू शकेल ना?”आता इतकी जुनी ठेवलीये का तेही पहावे लागेल.पण मी पाहतो.त्यात मिळाली तरी मी तुम्हाला देऊ शकेन.पण मॅडम एक गोष्ट तुमची लक्षात आलीय का?”त्यांना माझ्या मनातल्या विचारांची कल्पना आली होती.मी म्हटलं,”हो.आपल्याला त्या साठ प्रकरणांचाही तपास करावा लागेल ना?त्या सर्व प्रकरणात हा आदेश क्रमांक नाही हेही पहावे लागेल ना?” “हो. तुम्ही तुमच्या अर्जात याचाही उल्लेख करा.म्हणजे हे कागदपत्र त्यासोबत असतील तर तेही मिळतीलआणि तुम्ही निर्धास्त होऊ शकाल.तसाही तुमचा व्यवहार जोशीसाहेबंबरोबर झालाय शामरावबरोबर नाही.” घोसाळकर म्हणाले.मी त्यांना अर्ज लिहून दिला आणि त्यांचा निरोप घेतला. (क्रमशः) *************************
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8366
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

अतिशय रोचक भाग. जमिनीच्या व्यवहारात चांगलेच हात पोळून घेतले आहेत. त्यामुळे तुम्ही हा प्रकार कसा हाताळला याबद्दल उत्सुकता आहे. पुभाप्र!

शामरावचे कारनामे पाहून खोसला का घोसला चित्रपट आठवला... पुभाप्र.

आदूबाळ ,तुम्ही प्रकाशित कराल का? *विन्क* मुवि,होय.रत्नाग्रीतालेच. अभिजीत-१, मीपण सामान्यच आहे पण स्वत:च्या हक्कांसाठी जागरूक असलेली आणि आवाज उठवणारी,

In reply to by नूतन सावंत

मी प्रकाशक असतो तर नक्की केली असती. तुम्ही, सोन्याबापू, आतिवासतै वगैरे लोकांनी मिळून माझ्या प्रकाशनसंस्थेला हिट पुस्तकं दिली असतीत!

जमिनीची गोष्ट म्हटल्यावर असे काही वळण आले नसते तर आश्चर्य वाटले असते. जमिनीच्या व्यवहारात काही सरळ साधे असू शकते यावरचा विश्वास उडाला आहे !

In reply to by मुक्त विहारि

जमीन गावाकडची असेल तर गिळण्यासाठी स्वकीयांबरोबर गाववालेही अगदी तत्पर आणी निर्ढावलेले असतात. अनुभवी नाखु

अरे बापरे, जमिन प्रकरणात इतक्या भानगडी असतात हे माहितच नव्हते. पैजारबुवा,

गुरं चारायचे माळरान फुकटातल्या कलमांनी स्जवुन लाटलय का मेल्याने? काय माणस तरी. आहे त्यात कधी समाधानच नाही. आणि कस लाटता येइल याचाच विचार.

In reply to by स्पंदना

ही अशी माणसे जगांत सगळी कडेच असतात. किंबहूना अशा माणसांमुळे ज्यांना खरोखरच गरज असते, त्यांना मदत मिळत नाही.

हो स्पंदना.बिचारी गुरं.ती काय तक्रार करू शत नाहीत.जिथे माणसांच्या तक्रारीला वेळेत न्याय मिळू शकत नाही तिथे गुरांसाठी कोण आणि कशाला तक्रार करणार?आणि केलीच तर वेळ,पैसा या निकषांवर तिचे निवारण कधी होणार? मूवी, याबाबत बोलूच शकत नाही.कारण ज्यांना गरज असते त्यांना शिक्षणाभावी अशी काही मदत असते हेच माहीत नसते. कशाप्रकारे गैरव्यवहार आणि फसवणूक केली जाते होतात याचे प्रशिक्षणच झाले या व्यवहारात.

मस्त लिहीत आहात. तुम्हाला सरकारी कामाची इतकी बारिक माहिती आहे आणि शिवाय तुमच्यात धाडसही आहे म्हणुन तुम्ही हे सगळं सहज हाताळु शकलात. चुकुन आमच्या सारखे लोक अशा भानगडीत अडकले तर अवघडच..