मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक वर्षानंतर . . .

श्रीगुरुजी · · काथ्याकूट
१६ मे २०१४ या दिवशी भारतात इतिहासाचे एक नवे पान लिहिले गेले. स्वतंत्र भारताच्या ६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका तथाकथित उजव्या विचारांच्या, प्रतिगामी व जातीयवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविले. त्यापूर्वीच्या ६७ वर्षांपैकी जवळपास ५४-५५ वर्षे काँग्रेसकडे सत्ता होती. उर्वरीत १२-१३ वर्षांपैकी सुमारे ६ वर्षे भाजप आघाडीचे सरकार होते व ५-६ वर्षे जनता पक्ष, जनता दल इ. वेगवेगळ्या तथाकथित मध्यममार्गी, डाव्या, निधर्मी आघाड्यांचे सरकार होते. परंतु १६ मे २०१४ रोजी प्रथमच भारतीय जनता पक्ष या उजव्या, राष्ट्रवादी, जातीयवादी इ. तथाकथित विशेषणांनी नटलेल्या पक्षाने संपूर्ण बहुमत मिळवून इतिहास घडविला. भाजपला बहुमत मिळण्यास मुख्य २ गोष्टी कारणीभूत होत्या. त्या म्हणजे, (१) २००४-२०१४ या कालखंडातील भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले व अत्यंत निष्क्रीय असलेले व सर्व आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरलेले काँग्रेसचे सरकार आणि (२) भाजपकडे असलेले नरेंद्र मोदींचे अत्यंत प्रभावी व आक्रमक नेतृत्व. अत्यंत झंझावाती प्रचार करून मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका करून जनमत आपल्या बाजूला वळवून भाजपला इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून दिले व जेमतेम ४४ जागा मिळून काँग्रेसचा अक्षरशः पालापाचोळा झाला. मोदींनी २६ मे २०१४ या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेताना सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना सोहळ्यासाठी निमंत्रित करून एक अत्यंत वेगळा पायंडा पाडून आपले पररष्ट्र धोरण कसे वेगळे असणार आहे याची चुणू़क दाखविली. एक वर्षानंतर परिस्थितीत कोणते चांगलेवाईट बदल झाले, भारताला किती फायदातोटा झाला, देशाच्या आर्थिक/राजकीय/सामाजिक्/संरक्षण/परराष्ट्र धोरण इ. क्षेत्रात कोणते बरेवाईट बदल झाले याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा या लेखाद्वारे घेत आहे.
आर्थिक
विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक-मर्यादेत वाढ, संरक्षण क्षेत्रात परकीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी, खाण उत्खनन कायद्यात आमूलाग्र बदल, रेल्वेसारख्या महाप्रचंड खात्यात खाजगी गुंतवणुकीला मुभा, राज्य सरकारांना अधिक निधी, अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार, कोळसा खाण उत्खननाचे आणि दूरसंचार तरंगलहरींचे लिलाव, चलनवाढीला अटकाव आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ही या सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. २०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली. औद्योगिक उत्पादनात २०१३-१४ मध्ये ४.२% ची वाढ झाली होती. हीच वाढ २०१४-१५ या वर्षात ५% टक्के इतकी आहे. आयातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत ०.५ % टक्क्यांची घट झाली आहे, तर निर्यातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २.० % टक्क्यांची घट झाली आहे भारताची अणु उर्जा क्षमता २०१३-१४ मध्ये ४,७८० मेगॅवॅट्स इतकी होती. २०१४-१५ मध्ये हीच क्षमता ५,७८० मेगॅवॅट्स इतकी झाली आहे. यात एकूण २१ % वाढ झालेली आहे. २०१४-१५ या वर्षात जीडीपी वाढीचा दर ७.४ % होता, शेती उत्पन्न वाढीचा दर १.१ % होता, कोळसा उत्पादन ८.२ % इतके वाढले. वीज उत्पादन - २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १०% वाढ झाली. थकीत कर्जे - सार्वजनिक बँकांच्या थकीत कर्जात २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १७% वाढ झाली. ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत मोदींनी ब्रिक्स बँकेची अभिनव कल्पना मांडली. ब्रिक्स बॅंक सुरू होऊन बॅकेचे सुरवातीचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. मनमोहन सरकारने २-जी तरंगलहरी आणि कोळसा खाणी वाटप करताना देशाचे तब्बल ३ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान केले होते. या दोन्ही प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे व २-जी तरंगलहरींचे वाटप रद्द करून लिलाव पद्धतीने त्यांचे वाटप करण्याचा आदेश दिला होता. गेल्या वर्षभरात ४० कोळसा खाणी व २-जी तरंगलहरी वाटपासाठी लिलाव केल्यामुळे देशाच्या तिजोरीत तब्बल २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत १६०+ खाणींच्या लिलावानंतर हीच रक्कम १५ लाख कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या लिलावात सुरवातीपासूनच संपूर्ण पारदर्शकता आणलेली आहे. थेट परकीय गुंतवणूक २०१३-१४ या वर्षात २०.८ अब्ज डॉलर्स होती. २०१४-१५ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात हीच गुंतवणूक २८.८ अब्ज डॉलर्स आहे. जनधन या नवीन योजनेंतर्गत नवीन १५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या नावाचे बँक खाते उघडले आहे. प्रतिवर्ष फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना मोफत गोष्टी देण्याचे पूर्वीच्या सरकारचे धोरण बदलून अल्प खर्चात नागरिकांच्या सहभागाने योजना सुरु करण्याची ही कल्पना अभिनव आहे. ५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून जीवनविमा देण्याची अभिनव योजना देखील यशस्वी ठरली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्या जाणार्‍या शेतकर्‍यांच्या नुकसानभरपाईच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ५०% किंवा अधिक नुकसान असल्यासच भरपाई देण्याची पूर्वीची अट बदलून आता ३३% नुकसान असले तरी भरपाई देण्यात येईल. तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे. जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे. महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे. आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
संरक्षण व परराष्ट्र धोरण
आपल्या शपथविधीला मोदींनी सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलावून एक नवीन पायंडा पाडला. सार्क समूहातील भारत हा सर्वात मोठा देश. सार्क हे एक कुटुंब मानले तर भारताचे स्थान सर्वात मोठ्या भावाचे. एखाद्या देशमुखाच्या घरातील लग्नाला पंचक्रोशीतील सर्व गावाच्या पाटलांनी उपस्थित रहावे व देशमुखांचे स्थान मान्य करावे अशा स्वरूपाचा हा पायंडा होता. त्यानंतर लगेचच मोदींनी भूतानला व श्रीलंकेला भेट देऊन शेजारी राष्ट्रांशी संबंध वाढविण्यावर भर दिला. मोदींच्या प्रयत्नामुळे श्रीलंकेत फाशीची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील ५ कोळ्यांना श्रीलंकेने मुक्त करून भारतात परत पाठवून दिले. काही वर्षांपूर्वी मोदींनी चीनला भेट देऊन तस्करीच्या आरोपावरून तेथील तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या २१ पैकी ११ गुजराती व्यापार्‍यांना सोडवून आणण्याची यशस्वी शिष्टाई केली होती. मागील महिन्यात नेपाळमध्ये जबरदस्त भूकंप झाला. भारत सरकारने अत्यंत तातडीने नेपाळला मदत पाठवून दिलासा दिला. काही महिन्यांपूर्वी मालदीवमध्ये अचानक पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना भारत सरकारने तातडीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला. येमेन व इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय अडकून पडले होते. भारताने ही परिस्थिती युद्धजन्य पातळीवर हाताळून बहुसंख्य भारतीयांना सुखरूप परत आणले. एवढेच नव्हे तर येमेन मध्ये अडकलेल्या ४१ देशांच्या ९०० हून अधिक नागरिकांना भारताने सुखरूप बाहेर काढले. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या फादर प्रेम यांना सरकारने सुखरूप भारतात परत येण्यास मदत केली. गतवर्षी सप्टेंबरमध्ये काश्मिरमध्ये भयानक पूर आलेला असताना केंद्र सरकारने तातडीने लष्कराच्या मदतीने नागरिकांना मदत केली होती. मोदी सरकारचे वैशिष्ट्य हे आहे की हे सरकार सर्वत्र व्हिजिबल आहे. पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारचे कोठेही अस्तित्व जाणवत नव्हते. मात्र या सरकारचे सर्व क्षेत्रात ठळक व सकारात्मक अस्तित्व दिसत आहे. गेल्या वर्षात अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगला इ. देशातील ४ हजारहून अधिक हिंदू नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. यापूर्वीच्या वर्षात हाच आकडा १ हजारहून कमी होता. या देशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. भारत हा त्यांचा एकमेव आधार आहे. पूर्वीच्या सरकारने त्यांच्या बाबतीत आस्ते कदम धोरण ठेवले होते. या सरकारने मात्र त्यांना दिलासा दिला आहे. मोदी फ्रान्स दौर्‍यावर गेले असताना त्यांनी फ्रान्सबरोबर राफेल या आधुनिक लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार केला. गेली अनेक वर्षे हा करार प्रलंबित होता. जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये सीमेवरील पाकिस्तानी सैन्याने नेहमीप्रमाणे अचानक गोळीबार सुरू केला. त्यात सीमाभागातील काही नागरिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान काही महिन्यांच्या अंतराने नियमितपणे असा गोळीबार करून नागरिकांचे प्राण घेत असते. या गोळीबाराविरूद्ध भारताची प्रतिक्रिया म्हणजे निषेधाचा खलिता पाठविणे. यावेळी प्रथमच भारतीय लष्कराला प्रतिगोळीबार करण्याची मुभा मिळाली. पाकिस्तानने गोळीबार सुरू केल्यावर प्रथमच भारतीय सैन्याने उलट गोळीबार करून जोरदार प्रत्त्युत्तर दिले ज्यात काही पाकिस्तानी सैनिक व नागरिक मरण पावले. भारताच्या जोरदार प्रतिकारामुळे आश्चर्यचकीत झालेल्या पाकिस्तानी लष्कराने गोळीबार थांबविला. त्यानंतर आजतगायत पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार होण्याचे प्रकार घडलेले नाहीत. ऑगस्टमध्ये भारत-पाकिस्तानची सचिव पातळीवर चर्चा होणार होती. परंतु चर्चेच्या काही दिवस आधी पाकिस्तानी राजदूताने हुरियतच्या फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतल्याने भारताने तातडीने चर्चा रद्द करून एकाच वेळी भारताशी व फुटीरतावाद्यांशी चर्चा होऊ शकत नाही असा पाकिस्तानला जोरदार इशारा दिला. मोदींनी नुकतीच चीनला भेट दिली. ही भेट चीनच्या भूमीवरून चीनला स्पष्ट शब्दात इशारा दिल्यामुळे गाजली. इंडिया-टुडे या साप्ताहिकाने या इशार्‍याबद्दल असे म्हटले आहे. "In Modi, India has a PM who can look China in the eye". याच लेखात पुढील वाक्ये आहेत. Prime Minister Narendra Modi's recent visit to China will be remembered for will be his plain-speaking. And it is by no means a small achievement. For years, Indian political leaders have gone to China and said what the Chinese wanted to hear. Modi changed all that when he openly "stressed the need for China to reconsider its approach on some of the issues that hold us back from realising full potential of our partnership" and suggested that "China should take a strategic and long-term view of our relations". In his speech at the Tsinghua University too, Modi went beyond the rhetorical flourishes of Sino-Indian cooperation and pointed out the need to resolve the border dispute and in the interim, clarify the Line of Actual Control to "ensure that our relationships with other countries do not become a source of concern for each other". This is a significant shift in India's traditional defensiveness vis-a-vis China and should put the relationship on a firmer footing. चिनार यांचा ह्या सविस्तर प्रतिसादात भारताच्या परराष्ट्र धोरणांचे ठळक मुद्दे आलेले आहेत. २ वर्षांपूर्वी केदारनाथ येथील प्रलयात शेकडो भाविक मृत्युमुखी पडले होते. तत्कालीन राज्य सरकार ती परिस्थिती नीट हाताळू शकले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षात भारताने भारतात व विदेशात अशी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. २००८ मध्ये अमेरिकेबरोबर अणुकरार झाल्यानंतर पुढे फारसे काही झाले नव्हते. मोदींनी आपल्या पहिल्या वर्षात ऑस्ट्रेलिया व कॅनडाला भेट देऊन युरेनियम पुरवठ्याबद्दल यशस्वी बोलणी केली. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेवर अजित डोवाल या अत्यंत कार्यक्षम अधिकार्‍याला आणण्यात आले आहे. "संरक्षण व परराष्ट्र धोरण" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ८ गुण.
भ्रष्टाचार निर्मूलन
गेल्या १ वर्षात एकही मोठा घोटाळा झालेला नाही हे या सरकारचे मोठे यश आहे. युपीएची १० वर्षांची कारकीर्द म्हणजे उच्चपदस्थांचा प्रचंड भ्रष्टाचार होता. युपीएतील अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले होते व त्यातून देशाचे प्रचंड नुकसान झाले. मनमोहन सिंग मूक राहून अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहनच देत होते. मोदींच्या कारकीर्दीत याला लगाम बसलेला दिसत आहे. 'मी भ्रष्टाचार करणार नाही व कोणाला करून देणार नाही' हे त्यांचे वचन पहिल्या वर्षात तरी सत्य झालेले दिसत आहे. मात्र भ्रष्टाचार्‍यांवरील कायदेशीर कारवाई मात्र पुरेशा वेगाने सुरू नाही. वड्राला खिरापतीसारख्या वाटलेल्या हरयाना व राजस्थानमधील जमिनी काढून घेण्यात आल्या. हरयानाने नुकतीच या जमीन व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. परंतु हे आधीच व्हायला हवे होते. महाराष्ट्रात छगन व समीर भुजबळांची चौकशी सुरू झाली आहे. आता तटकरे व अजित पवारांना समन्स गेले आहे. परंतु ही कारवाई अधिक वेगाने होणे अपेक्षित आहे. कोळसा घोटाळ्यातील जिंदाल व इतर काही नेत्यांवर व अधिकार्‍यांवर खटला दाखल झालेला आहे. मनमोहन सिंगांना देखील समन्स पाठविण्यात आले. "आपण न्यायालयात जाऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करू" असे माध्यमांसमोर सांगणार्‍या सिंगांनी प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात जाऊन समन्सला स्थगिती मिळवून चौकशी दूर पळण्याचाच प्रयत्न केला आहे. देशाबाहेरील काळा पैसा भारतात आणण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. काळ्या पैशाला प्रतिबंध करण्यासाठी एक नवीन कायदा करण्यात आला आहे. "भ्रष्टाचार निर्मूलन" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ७ गुण.
राजकीय
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची घोडदौड सुरूच राहिली. हरयाना व झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात शिवसेनेचे ओढणे उतरवून स्वबळावर बहुमताच्या जवळ पक्ष पोहोचला. जम्मू-काश्मिरमध्ये प्रथमच भाजपने तब्बल २५ जागा मिळवून दुसरा क्रमांक मिळविला. दिल्लीत मात्र पक्षाचा दारूण पराभव झाला. आता लवकरच बिहार विधानसभेची निवडणुक आहे. त्यापाठोपाठ मे २०१६ मध्ये तामिळनाडू, केरळ, पाँडीचेरी, प. बंगाल व आसामची निवडणुक आहे. या राज्यात भाजपची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत नक्कीच सुधारली असेल. महाराष्ट्रात भाजपने अत्यंत चातुर्याने शिवसेनेला आपली जागा दाखवून देऊन युतीतला मोठा भाऊ कोण हे दाखवून दिले. महाराष्ट्रात ब्राह्मण, हरयानात जाट नसलेला व झारखंड मध्ये आदिवासी नसलेला मुख्यमंत्री देऊन जातीवर राजकारण होणार्‍या या राज्यात एक वेगळा पायंडा पाडला. जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी या पूर्ण वेगळी विचारसरणी असलेल्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करून भाजपने एक वेगळाच प्रयोग केलेला आहे. यात भाजपकडे उपमुख्यमंत्रीपद, काही मंत्रीपदे व सभापतीपद आले आहे. पूर्वीच्या नॅकॉ-काँग्रेस सरकारने फुटिरतवादी मसर्रत आलमची स्थानबद्धता न वाढवता त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. त्यामुळे तो सुटला. सुटल्यावर लगेचच त्याने भारतविरोधी कारवाया सुरू केल्यावर त्याच्यावर लगेचच कारवाई करण्यास पीडीपीची तयारी नव्हती. परंतु केंद्राच्या दबावानंतर त्याला पुन्हा स्थानबद्द करण्यात आले. हा एक नवीन प्रयोग आहे. हा प्रयोग कितपत यशस्वी/अयशस्वी होईल ते काही काळानंतर कळेलच. परंतु पीडीपी सारख्या फुटिरतावादी पक्षावर केंद्राच्या व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून दबाव ठेवण्यास या प्रयोगाचा उपयोग होऊ शकेल असं आतातरी वाटतंय. दिल्लीत मात्र भाजपचा सुपडा साफ झाला. अत्यंत अवास्तव व अव्यावहारीक आश्वासने देऊन 'आआप'ने सत्ता मिळविली. प्रचंड बहुमत पाठीशी असूनसुद्धा केजरीवालांचा नाटकीपणा, पोरकटपणा, हेकेखोरपणा, हुकूमशाही वृत्ती अजिबात कमी झालेला नाही. त्यांचे विदूषकी चाळे अजूनही सुरुच आहेत. त्यांच्या नाटकापायी एका शेतकर्‍याचा फास लागून जीव गेला. केंद्राबरोबर ते कायम संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. एकंदरीत त्यांच्या मर्कटलीलांमुळे दिल्लीची जनता भरडली जाईल हे निश्चित. सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणुक होणार आहे. सध्या जनता दलाच्या अनेक तुकड्यांच्या विलिनीकरणाची चर्चा आहे. मागील वर्षी बिहारमध्ये झालेल्या १० विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी राजद, संजद व काँग्रेस ने युती करून १० पैकी ६ जागा जिंकल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीसाठी अशी युती प्रत्यक्षात येणे अवघड आहे. राजद व संजद या दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद हवे असल्याने दोन्ही पक्ष २४३ पैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करेल व त्या भांडणातून अशी युती प्रत्यक्षात येणार नाही. राजद व संजद वेगवेगळेच स्वतंत्र लढतील. या दोघांपै़की कोणाबरोबर शय्यासोबत करायची हा काँग्रेसपुढे यक्षप्रश्न असेल. लालू हा सोनिया गांधींचा नीलाक्षतनय असल्याने शेवटी काँग्रेस राजदचाच मळ्वट भांगात भरेल असा अंदाज आहे. भाजप चातुर्याने जीतनराम मांझीला आपल्या आघाडीत सामील करून घेईल. शेवटी राजद्+काँग्रेस, संजद, भाजप+लोकजनशक्ती+मांझी+उपेंद्र कुशवाह असे तीन गट वेगवेगळे लढतील. डावे पक्ष बहुतेक राजदबरोबर जातील. अशा स्वतंत्र लढतील भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन च्या सर्वेक्षणानुसार राजद्+काँग्रेस्+संजद युती झाल्यास या युतीला १२६ व भाजप आघाडीला ११२ जागा मिळतील. परंतु राजद, काँग्रेस, संजद व भाजप आघाडी स्वतंत्रपणे लढल्यास भाजप आघाडीला १२६, संजद ६४, राजद ४२ व काँग्रेस २ अशी स्थिती असेल. दिल्ली असो, उ.प्र. असो वा बिहार, काँग्रेसचे अस्तित्व संपलेले आहे. दिल्लीत भाजपला पराभूत करण्यासाठी गुपचुप आआपला मदत करणे, बिहार मध्ये राजद किंवा संजदची सेज सजविणे, उ.प्र. मध्ये मुलायम किंवा मायावतीच्या पदराखाली लपणे एवढेच काँग्रेस करू शकते. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन सर्वेक्षणानुसार एक वर्षानंतर मोदींची जादू बरीचशी कायम आहे. आता निवडणुक झाल्यास एनडीए ३१७ (पूर्वी ३३६), युपीए ७३ (पूर्वी ६०) अशी परिस्थिती आहे. इतर काही वाहिन्यांनी (आयबीएन, आजतक इ.) देखील सर्वेक्षण केले. त्यांनी जागांचा अंदाज दिलेला नाही. परंतु मोदींच्या कामावर व सरकारवर बहुसंख्य जनता समाधानी असल्याचे दिसते. मे २०१६ मध्ये प.बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पाँडिचेरीच्या विधानसभा निवडणुका आहेत. बंगालमध्ये पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने ममता बॅनर्जी निवडून येण्याची शक्यता आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याचा बंगाली जनतेवर काहीही परीणाम झालेला दिसत नाही. दुसर्‍या क्रमांकावर काँग्रेस असेल. तामिळनाडूत आता द्रमुकची पाळी आहे. केरळमध्ये डावे पक्ष निवडून येतील. आसाममध्ये अधांतरी विधानसभा असण्याची शक्यता आहे. या सर्व राज्यात पूर्वीच्या तुलनेत भाजपची कामगिरी सुधारलेली असेल. परंतु बहुमत मिळविण्यासाठी किंवा प्रमुख विरोधी पक्ष होण्यासाठी भाजपला अजून बराच काळ लागेल. एकंदरीत गेल्या वर्षभरात भाजपने राजकीय क्षेत्रात खूपच प्रगती केली आहे. राजकीय आघाडीवर भाजप सरकारला १० पैकी ८ गुण.
सामाजिक
गेल्या वर्षभरात एकही मोठी जातीय दंगल झाली नाही. यापूर्वी २०१३ मध्ये मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगलीत ६० हून अधिक नागरिक मरण पावले होते. काही ठिकाणी चर्चवर ह्ल्ले झाले. काही हल्ल्यांमागे जातीय नसून पूर्ण वेगळी कारणे होती. मोदी मंत्रीमंडळातील गिरीराज सिंह, साक्षी महाराज इ. गणंगांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. वाहिन्यांनी टीआरपी वाढविण्यासाठी त्या वक्तव्यांना प्रचंड प्रसिद्धी देऊन आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. परंतु नुकत्याच झालेल्या वेगवेगळ्या वाहिन्यांच्या सर्वेक्षणानुसार अशा वक्तव्यांकडे बहुसंख्य नागरिकांनी दुर्लक्ष केलेले आहे. मोदींनी मात्र या वाचाळ मंत्र्यांच्या वक्तव्यावर सार्वजनिकरित्या मौन पाळले आहे. त्यांनी तातडीने पावले उचलून अशा मंत्र्यांना घरी बसविले पाहिजे. एकंदरीत सामाजिक जीवनात शांतता आहे. "सामाजिक" क्षेत्रासाठी या सरकारला १० पैकी ६ गुण.
विरोधी पक्षांची कामगिरी
संपूर्ण वर्षात विरोधी पक्षांची कामगिरी निराशाजनक राहिली. वर्षाच्या शेवटी भूमी अधिग्रहण कायद्याच्या निमित्ताने काही विरोधी पक्ष एकत्र येताना दिसले. परंतु काही विरोधी पक्ष अजूनही काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत. काँग्रेस अजूनही गांधी घराण्याच्या पदराखालून बाहेर येण्यास तयार नाही. राहुल गांधी अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या काळात तब्बल २ महिने परदेशात वास्तव्य करून आले. आपल्या परदेश दौर्‍यासाठी जाब विचारला जाईल हे ओळखून परदेशातील सूटबूट सोडून झब्बापायजमा परीधान करून आल्याआल्या दुसर्‍या दिवसापासून घसा ताणून मोदींवर टीका करणे सुरू केले आहे. त्याच्याबरोबरीने शेतकर्‍यांच्या घरी जाऊन भेटण्याचे पूर्वीचे नाटकही सुरू केले आहे. ते परदेशात विपश्यना करत होते म्हणे. परदेशात जाऊन २ महिन्यात ते ३ नवीन शब्द शिकले - किसान, मजदूर, गरीब. आता त्यांच्या प्रत्येक दुसर्‍या वाक्यात हे ३ शब्द असतात. पूर्वी कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात ते महिला सबलीकरण, नरेगा असे शब्द उच्चारायचे. आता विषय कोणताही असला तरी किसान, मजदूर आणि गरीब हे ३ शब्द असल्याशिवाय त्यांचे वाक्य पूर्ण होत नाही. लोकसभेत संपूर्ण निष्प्रभ ठरल्यावर राज्यसभेतल्या बहुमताच्या जोरावर काँग्रेसने महत्त्वाची विधेयके अडवून धरली आहेत. परंतु काही महिन्यातच भाजप काँग्रेसला मॅनेज करून ही विधेयके पास करून घेईल हे निश्चित. महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका शिवसेना पार पाडत आहे. मनसेचा अवतार समाप्त झाला आहे. काही वर्षांतच राष्ट्रवादी आणि शिवसेनाही संपुष्टात येण्याची शक्यता आहे. डाव्या पक्षांची सद्दी जवळपास संपुष्टात आली आहे. प्रकाश करातांच्या जागी येचुरी येऊनसुद्धा काहीही फरक पडणार नाही. जनता दलाचे छोटे छोटे तुकडे अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर असल्याने विलिनीकरण करून धुगधुगी टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आआपची नाटके व तमाशे सुरूच आहेत. एकंदरीत विरोधी पक्षांची अवस्था दयनीय आहे. विरोधी पक्षांच्या कामगिरीला १० पैकी २ गुण. _________________________________________________________________________________ मोदी सरकारची पावलें योग्य दिशेने पडतांना दिसत आहेत. पुरेसा वेग आलेला नाही कारण लोकांना शिस्तबद्ध रीत्या कामे भराभर उरकीत जाणे हेच ठाऊक नाही. तें अंगवळणी पडण्यास बराच वेळ लागेल. कृतीपेक्षा बडबड अधिक हे ही काही मंत्र्यांच्या/ खासदारांच्या बाबतीत आढळत आहे.त्याला वेसण घालणे आवश्यक आहे. मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक, विकासाभिमुख आणि प्रामाणिक अशा शब्दात वर्णन करता येईल. गत सरकारच्या नाठाळ कामगिरीच्या पार्श्वभूमीवर या सरकारची कार्यक्षमता अधिकच खुलून दिसते. _________________________________________________________________________________ एक वर्षाच्या कामगिरीसाठी मोदी सरकारला ७/१० गुण. _________________________________________________________________________________
अच्छे दिन
माझी "अच्छे दिन" ची व्याख्या अशी आहे. भ्रष्टाचारमुक्त सरकार, कणखर सरकार, नवीन कल्पना घेऊन आलेले सरकार, इतरधर्मियांचे मतांसाठी लांगूलचालन न करणारे सरकार, पाकिस्तान व चीनसमोर नांगी न टाकता ताठ मानेने उभे राहिलेले सरकार, देशाला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर न्यायला सुरूवात करणारे सरकार, नागरिकांच्या हिताची काळजी घेणारे सरकार ... असे सरकार सत्तेवर असेल तर अच्छे दिन येण्याची सुरूवात आहे असे मानता येईल. यापूर्वीचे सरकार हे कणाहीन व अकार्यक्षम सरकार होते. ते भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले होते. माझ्या मते मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अच्छे दिन येण्याची सुरूवात झाली आहे हे नक्की! _________________________________________________________________________________
तळटीप
विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर जवळपास ८ आठवडे मी मिपापासून दूर होतो (राहुल गांधीही एवढाच काळ भारतापासून दूर होते!!!). परत आल्यानंतर हा लेख लिहिला आहे. अजून बरेच मुद्दे आहेत, परंतु विस्तारभयास्तव लेख आटोपता घेतो. वाचकांनी प्रतिसाद दिले तर त्यातील योग्य त्या मुद्द्यांवर प्रतिसाद देईन. जर प्रतिसाद विषयाला धरून असेल, जर प्रतिसाद सभ्य असेल, जर प्रतिसाद योग्य त्या आकडेवारी व वस्तुस्थितीवर आधारीत असेल, तरच उत्तर देईन. जर प्रतिसाद व्यक्तिगत स्वरूपाचा असेल, जर प्रतिसाद उपहासात्मक व कुत्सित टोमणे अशा प्रकारचा असेल, जर प्रतिसाद द्वेषमूलक व पक्षपाती स्वरूपाचा असेल अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष केले जाईल. Now shoot _________________________________________________________________________________

वाचन 311403 प्रतिक्रिया 1265

चिनार Mon, 05/25/2015 - 13:01
विचारपूर्वक आणि यथायोग्य विवेचन ! पण शेती आणि रोजगार या विषयांवर सरकारचे धोरण अजून तितकेशे स्पष्ट नाही असे वाटते. माझ्याकडून सरकारला १० पैकी ७ गुण. तुमच्या अछ्चे दिन च्या संज्ञेशी सहमत ! आता मिपावर तुमची "मोदी भक्त" म्हणून नोंदणी होणार हे निश्चित !! :-)

In reply to by नाखु

संदीप डांगे Mon, 05/25/2015 - 14:51
कोण विरोधक, कोण समर्थक? सत्ता कुणाचीही असो, सरतेशेवटी माझ्या पदरात काय पडतं हेच मी बघणार. तसेही तटस्थ - निष्पक्ष व्यक्तींच्या परिक्षणांना काही अर्थ असतो. समर्थक किंवा विरोधक यांच्या परिक्षणांना काय किंमत द्यायची हे एक मतदार-नागरिक म्हणून मी ठरवू शकतो. नाही का? असो.
फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. ५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे.
ह्या विमायोजनेची अंमलबजावणी कोणती विमाकंपनी करणार आहे? एलआयसी एजंटकडून आलेल्या एका निरोपानुसार दायची नावाची जापनीज कंपनी हे काम करणार आहे. हे खरे असेल तर भारतीय जीवन विमा निगम ने काय घोडे मारले? पहिल्या १८ दिवसात १.७४ गुणिले ३३० = ५७४.२ कोटी रुपये सरकारने नकळत नागरिकांकडून काढून घेतले आहेत. असेच पुढेही काढत राहणार. ज्याचा कुठलाही हिशोब देणे सरकारला गरजेचे नाही. यावर जाणकारांचे मत अपेक्षीत आहे. काँग्रेसने जसे घोटाळे केलेत तस्सेच घोटाळे भाजप सरकारमधे शोधण्याचा मूर्खपणा मी तरी करणार नाही. इतकी बोंबाबोंब झाल्यावर साधा चोरही आपली शैली बदलतो. कदाचित आता घोटाळे करण्याची नवीच क्लृप्ती असेल जी लक्षात येइस्तोवर खूप वेळ निघून गेला असेल. मूळ मुद्दा माझ्यामते तरी घोटाळे शोधण्यापेक्षा किंवा आकडेवारीचे खेळ खेळण्यापेक्षा सामान्य नागरिकाच्या एकूण राहणीमानात काय फरक पडला हे बघणे रोचक असेल. तेही आता एका वर्षात नाही तर पाच वर्ष झाल्यावरच. अन्यथा असे धागे फक्त प्रचारकी वाटत राहतील. आणि हो, प्रचार काय फक्त निवडणुकीत होत नसतो हे सुज्ञास सांगणे न लगे. त्यामुळे तुमचेच पेपर आणि तुमचेच मार्क ही हितेशची टिप्पणी बरोबर आहे.

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी Mon, 05/25/2015 - 14:56
>>> पहिल्या १८ दिवसात १.७४ गुणिले ३३० = ५७४.२ कोटी रुपये सरकारने नकळत नागरिकांकडून काढून घेतले आहेत. असेच पुढेही काढत राहणार. ज्याचा कुठलाही हिशोब देणे सरकारला गरजेचे नाही. यावर जाणकारांचे मत अपेक्षीत आहे. ही योजना सक्तीची नाही. ज्या नागरिकांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे त्यांनी स्वसंमतीने पैसे दिले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या नकळत सरकारने पैसे काढून घेतले आहेत हा निष्कर्ष चुकीचा आहे.

In reply to by संदीप डांगे

कहर Mon, 05/25/2015 - 15:20
मत मांडण्यापूर्वी एकदा सत्यता पडताळून पहा हि LIC ची अधिकृत संकेत स्थळ… जर दाइचि कंपनी हा विमा करणार असेल तर LIC त्याची जाहिरात स्वताच्या संकेतस्थळावर का करेल … तुमचा हा LIC agent आणि त्याची दाइचि कंपनी whatsapp वर सध्या फ़ेमस आहेत अधिकृत या नावाखाली

In reply to by कहर

संदीप डांगे Mon, 05/25/2015 - 15:46
मत मांडण्यापूर्वी एकदा सत्यता पडताळून पहा
त्यासाठीच जाणकारांना आवाहन केले आहे, साहेब. मी म्हणतो तेच सत्य असा दावा मी कधीच करत नाही.

In reply to by खंडेराव

कहर Tue, 05/26/2015 - 15:42
हो पण कोणत्या कंपनी सोबत करार करायचा हा निर्णय बँकांचा आहे. मोदी नाही ठरवणार. हा आता इतक्या वर्षांच्या व्यवहारानंतरही तुमचा तुमच्या बँकांवर विश्वास नसेल (आणि तुमची बँक दाइचि कि कोणत्या कंपनीसोबत करार करणार असेल) तर राहू दे… नका भाग घेऊ योजनेत …

In reply to by खंडेराव

"१२ रुपये प्रति वर्ष या दराने २ लाखाचा विमा" ही प्रस्तुती (ऑफर) विमाकंपनीसाठी बराच धोक्याचा व्यवहार आहे. जास्त धोकादायक प्रस्तूतीं असलेल्या विम्यासाठी विमाकंपन्या नेहमीच संघ (कंसॉर्टियम) स्थापन करतात... या पद्धतीत, धोका सहयोगी कंपन्यांत विभागल्या गेल्यामुळे, एखाद्या धोकादायक प्रस्तूतीमुळे, प्रस्तूती देणारी विमाकंपनी बुडीत जाण्याची शक्यता फार कमी/नगण्य होते. ही पद्धत जगभर फार पूर्वीपासून वापरली जात आहे. थोड्या काळापूर्वीपर्यंत भारतात विमा ही सरकारची मक्तेदारी आणि म्हणून अत्यंत अविकसित उद्योग असल्याने ही पद्धत भारतात नविन आहे व जनता याबाबतीत अनभिज्ञ आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रसाद१९७१ Wed, 05/27/2015 - 15:05
१२ रुपया मधे प्रोसेसिंग कॉस्ट तरी कव्हर होइल का? एकतर सरकार मोठ्या प्रमाणावर सबसीडी देत असणार विमा कंपन्यांना,किंवा हे नुस्ते दिखावू आहे.

In reply to by प्रसाद१९७१

जेव्हा कस्टमर बेस प्रचंड मोठा असतो (जो काही दशकोटी होणे अपेक्षित आहे) तेव्हा "इकॉनॉमी ओफ स्केल" नावाच्या तत्वावर आधारीत एखादा वरवर तोट्यात वाटणारा व्यवसाय/प्रस्तूती प्रत्यक्षात फायद्यात आणू शकते. भारतातील (अ) वाढत असलेले आयुष्यमान, (आ) सुधारत असलेल्या आरोग्यसेवा, (इ) काही दशकोटींची ग्राहकसंख्या आणि (ई) विमाकंपन्यांचा संघ; या चार गोष्टी ही विम्याची प्रस्तूती यशस्वी ठरण्यास मदत करणार्‍या आहेत. याशिवाय, या कंपनीसंघात केवळ भारतिय आयुर्विमा ही सरकारी कंपनी नसून इतर खाजगी आंतरराष्ट्रिय कंपन्या असण्याने सबसिडीची शक्यता नाही. व्यवहारी, तार्कीक आणि सारासार विचाराकडे दुर्लक्ष करून केवळ राजकीय विरोधासाठी विरोध करायचा असला तर भारतिय लोकशाहीमध्ये तसा कांगावा करायची मुभा आहे... आणि तिचे अवास्तव प्रदर्शन ही काही आपल्याला नवी गोष्ट नाही... पण मला त्यात रस नाही... तेव्हा चालू द्या :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विनोद१८ गुरुवार, 05/28/2015 - 13:15
व्यवहारी, तार्कीक आणि सारासार विचाराकडे दुर्लक्ष करून केवळ राजकीय विरोधासाठी विरोध करायचा असला तर भारतिय लोकशाहीमध्ये तसा कांगावा करायची मुभा आहे... आणि तिचे अवास्तव प्रदर्शन ही काही आपल्याला नवी गोष्ट नाही... पण मला त्यात रस नाही... तेव्हा चालू द्या :)
मला वाटते आता तरी प्रकाश पडावा ???

In reply to by खंडेराव

कहर Wed, 05/27/2015 - 15:08
मग मी तरी कोठे म्हणले फक्त LIC आहे. तुम्ही म्हनला -
ह्या विमायोजनेची अंमलबजावणी कोणती विमाकंपनी करणार आहे? एलआयसी एजंटकडून आलेल्या एका निरोपानुसार दायची नावाची जापनीज कंपनी हे काम करणार आहे. हे खरे असेल तर भारतीय जीवन विमा निगम ने काय घोडे मारले ?
म्हणून मी सांगितले कि LIC आहे. इतकेच ..

In reply to by संदीप डांगे

प्रसाद१९७१ Mon, 05/25/2015 - 15:23
फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. ५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे.
@श्रीगुरुजी - ह्या योजनेतुन जेंव्हा खरे क्लेम चे पैसे मिळतील तेंव्हा ह्या योजनेचा लाभ घेतला आहे असे म्हणता येइल.

In reply to by प्रसाद१९७१

श्रीगुरुजी Mon, 05/25/2015 - 17:42
>>> @श्रीगुरुजी - ह्या योजनेतुन जेंव्हा खरे क्लेम चे पैसे मिळतील तेंव्हा ह्या योजनेचा लाभ घेतला आहे असे म्हणता येइल. बरोबर आहे. ह्या योजना सुरू होऊन अजून एक महिनासुद्धा झालेला नाही. अजून काही महिन्यांनंतर या योजनांच्या व्यवहार्यतेचा/अव्यवहार्यतेचा अंदाज येईल. तोपर्यंत जरा वाट पाहूया.

In reply to by प्रसाद१९७१

ह्या योजनेतुन जेंव्हा खरे क्लेम चे पैसे मिळतील तेंव्हा ह्या योजनेचा लाभ घेतला आहे असे म्हणता येइल. ही ही ही... विनोद बरा होता =))

In reply to by संदीप डांगे

मृत्युन्जय Tue, 05/26/2015 - 10:12
पहिल्या १८ दिवसात १.७४ गुणिले ३३० = ५७४.२ कोटी रुपये सरकारने नकळत नागरिकांकडून काढून घेतले आहेत. असेच पुढेही काढत राहणार. ज्याचा कुठलाही हिशोब देणे सरकारला गरजेचे नाही. यावर जाणकारांचे मत अपेक्षीत आहे. हा जो काही विमा आहे तो विमा कंपनी फुकट देणार आहे का? की हे जमवलेले पैसे विमा कंपनीला जातील? जर हे विमा कंपनीला जाणार असतील (त्यांनाच जाणार आहेत हे तर नक्कीच) तर उगाच उचलली जीभ आणी लावली टाळ्याला असे कशाला? १२ रुपयात विमा कोण देते? जर सरकार देत असेल (देत असेल म्हणजे मिळवुन देत असेल) तर अश्या प्रत्येक उत्पन्नाचा सरकारने वेगळा हिशोब कशाला द्यायला हवा?

In reply to by मृत्युन्जय

चिनार Tue, 05/26/2015 - 10:19
सहमत ! यांना अब्जो -खरबो रुपयांचे हिशोब नको आहेत. पण सरकारने विमा देण्यासाठी जमा केलेल्या पैशांचा हिशोब हवाय..आणि तो सुद्धा निधी जमा झाल्यापासून एका महिन्यात ! आणि क्लेम चे पैसे मिळणार नाहीतच हे यांनी आधीच गृहीत धरलंय..

In reply to by मृत्युन्जय

श्रीगुरुजी Tue, 05/26/2015 - 13:59
>>> हा जो काही विमा आहे तो विमा कंपनी फुकट देणार आहे का? की हे जमवलेले पैसे विमा कंपनीला जातील? जर हे विमा कंपनीला जाणार असतील (त्यांनाच जाणार आहेत हे तर नक्कीच) तर उगाच उचलली जीभ आणी लावली टाळ्याला असे कशाला? एलआयसी, बजाज, एटना इ. पैकी कोणती विमा कंपनी फुकट विमा देते का? इतर विम्यांप्रमाणे हा विमासुद्धा फुकट नसून त्याला वार्षिक ३३० रूपये प्रिमियम आहे. प्रिमियमचे गोळा केलेले पैसे विमाकंपनीकडेच जातात. "उचलली जीभ आणि लावली टाळ्याला" म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे ते जरा स्पष्ट करा. >>> १२ रुपयात विमा कोण देते? जर सरकार देत असेल (देत असेल म्हणजे मिळवुन देत असेल) तर अश्या प्रत्येक उत्पन्नाचा सरकारने वेगळा हिशोब कशाला द्यायला हवा? हे सरकार प्रतिवर्ष १२ रूपये प्रिमियमच्या बदल्यात २ लाखांचा अपघाती विमा देत आहे. अश्या प्रत्येक उत्पन्नाचा सरकारने वेगळा हिशेब द्यायचा म्हणजे नक्की काय करायचं ते जरा स्पष्ट करा.

In reply to by श्रीगुरुजी

मृत्युन्जय Tue, 05/26/2015 - 14:42
गुर्जी तुम्ही माझ्या प्रतिसादाला प्रत्युत्तर का करत आहात? ते संदीप डांगे यांनी विम्याच्या मुद्द्याबद्दल जे लिहिले आहे त्याला प्रतिवाद आहे. तुम्ही माझेच मुद्दे वेगळ्या भाषेत मांडत आहात.

In reply to by hitesh

चिनार Mon, 05/25/2015 - 14:06
नव्हे..मार्क द्यायला साक्षात बृहस्पतीने ज्यांची ट्युशन लावावी अशा श्री श्री राहुल गांधी यांना बोलावले आहे. त्यांचं कॅंडी क्रश खेळून झाला की ते येतीलच !

प्रसाद१९७१ Mon, 05/25/2015 - 15:18
@ श्रीगुरुजी - तुमचे भाजपप्रेम माहीती असुन सुद्धा, एक वर्षपूर्ती बद्दल, सरकारच्या कामगिरी ( ? ) बद्दल धागा काढणे म्हणजे तुम्ही फारच धाडसी आहात. प्रेम आंधळे असते असे म्हणतात त्याचा हा एक पुरावा होऊ शकतो.

In reply to by प्रसाद१९७१

काळा पहाड Mon, 05/25/2015 - 18:29
तोंड लपवून फिरायची गरज असताना
कशाबद्दल बरं? सरकारनं सुरवात अतिशय चांगली केलेली आहे. सगळ्या गोष्टी एका वर्षात साध्य होतील असा तुमचा समज असेल तर तुम्ही फारच आशावादी लोकांपैकी आहात. भारत हा एक अतिप्रचंड देश आहे आणि त्याला 'पळवायला' वेळ लागतो. या वर्षी गियर बदलून दुसर्‍या गियर मध्ये जाण्याची गरज आहे आणि त्यासाठी फॉरिन इन्व्हेस्टमेंट्स खरोखरंच प्रत्यक्षात येण्याची गरज आहे. बाकी तुम्ही हे तोंड लपवून वगैरे एका मिपा सदस्याला बोलत नसाल अशी आशा आहे.

वाचतेय.लेख प्रचारकी थाटाचा आहे हे मान्य पण नरेंद्रने,सरकारने काहीच केले नाही हा आंधळा विरोध झाला.विमा,पायाभूत प्रकल्प्,अवजड औद्योगिक प्रकल्प नेटास न्यायचे तर बराच वेळ हवा.भ्रष्टाचार आपल्या रक्तात आहे, अगदी गरीबापासून ते श्रीमंतापर्यंत.तो जायला कालावधी लागेल पण पैसे खाताना बाबू लोकांनी,पुढार्यानी दहा वेळा विचार केला,त्यांना कोणाचीतरी दहशत बसली तर खूप झाले. चांगल्या दिशेने प्रयत्न चालू आहेत व अजून तरी भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेत येत नाही आहेत हे पाहता आमच्यातर्फे सरकारला १० पैकी ६ गुण.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अद्द्या Mon, 05/25/2015 - 16:09
लेख प्रचारकी थाटाचा आहे हे मान्य पण नरेंद्रने, सरकारने काहीच केले नाही हा आंधळा विरोध झाला काय फालतूपणा आहे . इतर लोकांना , इथल्या लोकांना आपण एकेरी हाक मारता . . लोक ते चालवून पण घेतात . .का आणि कसं ते नाही माहित पण कमीतकमी पंतप्रधान पदावर बसलेल्या माणसाला तरी आदरार्थी वापरा . . एवढी साधी गोष्ट कळत नाही का ?

In reply to by अद्द्या

विनोद१८ Mon, 05/25/2015 - 16:44
भले लेख प्रचारकी थाटाचा असेल तुमच्या मते, पण त्यामधले मुद्दे जर तथ्यहीन असतील तर त्यांना मुद्देसुद प्रतिवाद करा / खोडुन काढा. नुसते 'लेख प्रचारकी थाटाचा आहे' असे म्हणुन कसे चालेल ??

In reply to by अद्द्या

काळा पहाड Mon, 05/25/2015 - 18:21
मराठेसाहेब, माई ब्रम्हदेवांना थोडंसं ज्युनियर आहेत. त्या देवांना पण इंद्र्या, नारद्या असं बोलू शकतात. :)

यमगर्निकर Mon, 05/25/2015 - 15:40
मोदिंचे काम बघुन पहिल्यांदा कोणीतरि देशासाठि काहितरि चांगले करत आहे असे वाटते, पण गेली ५० वर्षे ज्या सरकार ने देशाला मागास ठेवले लोकांना अज्ञानत ठेउन ५० वर्षे देशाला अक्षरशः लुटले आणि गेल्या १० वर्षात पुर्ण निष्प्रभ ठरले त्यावेळि त्या सरकार वर टिका करण्यासठि काहि लोकांच्या कंठतुन शब्द फुटत नव्हते तेच लोक गेल्या सरकार ने केलेल्या कामापेक्षा कितितरि पटिने चांगले काम मोदि सरकार ने गेल्या १ वर्षात करुन सुद्धा टिका करतात ह्याचे खुपच आश्चर्य वाटते आहे. मोदि सरकारला निदान ५ वर्षे व्यवस्थित काम करण्यासाठि दिलि पहिजे.

खंडेराव Mon, 05/25/2015 - 17:41
वेळ मिळेल तशी उत्तरे द्यायचा प्रयत्न करेलच आपल्या आकडेवारीवर. भरपुर लिहिले आहे आपण. अभिनंदन. सध्या फक्त पहिल्या मुद्द्याचे उत्तर देतो.
२०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली.
अर्थशास्त्राच्या कोणत्याही सिद्धांतानुसार हे रिसर्वस जर सर्व ठिक चालले असेल, तर दरवर्षी वाढलेच पाहिजेत. आता, आपण मागच्या तेरा वर्षांचा हिशोब करुयात. हे आकडे मी data.gov.in वरुन घेतले आहेत, अ॓नालिसिस मी स्वतः केलाय. 2002 29 2003 40 2004 49 2005 26 2006 7 2007 32 2008 55 2009 -20 2010 5 2011 7 2012 -6 2013 -1 2014 6 मागिल वर्षाच्या तुलतेत गंगाजळीमधे झालेली वाढ ( उदा, २०१४ मधे २०१३ पे़क्षा ६ टक्के वाढली, २००८ मधे ५५ % ). या सर्व वर्षांचा अ‍ॅवरेज १७% आहे. सगळ्यात जास्त वाढ ही ५५% तर कमी ही वजा २०% आहे. २००१ ते २०१४ मधे ७००% एकुन वाढ झाली आहे. त्यामुळे १२% ( तुम्ही म्हणताय ते ) हा काही इंडिकेटर धरता येणार नाही कामगिरिचा मोदी सरकारच्या, तसे पाहिले तर तो सरासरीपेक्षा कमीच आहे :-) आणि, आकडा चुकलाय तुमचा. तुम्ही ज्याला परकीय चलनाची गंगाजळी म्हणताय त्यात सोने आणि इतरही समाविष्ट आहे. मी ते पकडुनही हिशोब केला, सरासरी १८.५% येते २००१ ते २०१४ ची. कोणताही आकडा हा तुलनेत कमी किंवा जास्त असतो. १२% वाढली याला तुम्ही मागचा डाटा बघितला नसेल तर काही किंमत नसते.

In reply to by खंडेराव

श्रीगुरुजी Mon, 05/25/2015 - 18:26
तुमच्या वरील आकडेवारीनुसार जर आपण २००९ ते २०१३ या ५ वर्षांची सरासरी काढली तर ती सरासरी -३ % इतकी कमी येते. जर २००४ ते २०१३ या १० वर्षांची सरासरी काढली तर ती सरासरी १५.४ % टक्के इतकी येते. त्यामुळे तुलना करताना आपण कोणती कक्षा वापरत आहोत यावर आपला निष्कर्ष अवलंबून असतो. गेल्या १ वर्षात परकीय चलनाच्या गंगाजळीत ३७ अब्ज डॉलर्सची वाढ झाली. ही वाढ गेल्या वर्षाच्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढली, गेल्या २ वर्षांच्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढली, गेल्या ५ वर्षांच्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढली, गेल्या १० वर्षांच्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढली, १९९१ पासून किती टक्क्यांनी वाढली इ. आकडेवारी तपासून वेगवेगळे तक्ते काढता येतील व त्यातून आपल्याला हवा तो निष्कर्ष काढता येईल.

In reply to by श्रीगुरुजी

खंडेराव Tue, 05/26/2015 - 10:31
तुमच्या वरील आकडेवारीनुसार जर आपण २००९ ते २०१३ या ५ वर्षांची सरासरी काढली तर ती सरासरी -३ % इतकी कमी येते.
हो, म्ह्णुनच गेल्या १४ वर्षांची दिलिये माहिती.
त्यामुळे तुलना करताना आपण कोणती कक्षा वापरत आहोत यावर आपला निष्कर्ष अवलंबून असतो.
मान्य केल्याबद्दल धन्यवाद. तुमचा काढलेला निष्कर्ष सर्व कक्षांमधे चुकीचा आहे.
जर २००४ ते २०१३ या १० वर्षांची सरासरी काढली तर ती सरासरी १५.४ % टक्के इतकी येते.
हो, १२ पेक्षा जास्त. आणि त्यात मधे एक जागतिक मंदी ही येउन गेली.
गेल्या १ वर्षात परकीय चलनाच्या गंगाजळीत ३७ अब्ज डॉलर्सची वाढ झाली. ही वाढ गेल्या वर्षाच्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढली, गेल्या २ वर्षांच्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढली, गेल्या ५ वर्षांच्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढली, गेल्या १० वर्षांच्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढली, १९९१ पासून किती टक्क्यांनी वाढली इ. आकडेवारी तपासून वेगवेगळे तक्ते काढता येतील व त्यातून आपल्याला हवा तो निष्कर्ष काढता येईल.
इतके करायची गरज नाही हो. सफरचंदाची केळ्याशी तुलना करु नका म्हणजे बस्स्.

In reply to by खंडेराव

श्रीगुरुजी Tue, 05/26/2015 - 14:30
>>> मान्य केल्याबद्दल धन्यवाद. तुमचा काढलेला निष्कर्ष सर्व कक्षांमधे चुकीचा आहे. कोणत्या कक्षेमध्ये चुकीचा आहे? तुलना मागील वर्षाशी करायची का मागील ५ वर्षांशी करायची का मागील १० वर्षांशी करायची ते आधी ठरवा. पहिलीत ९९% गुण मिळविलेल्या मुलाला ११ वीत ७५% टक्के मिळाले व १२ वीत ८५% टक्के मिळाले तर त्याच्या कामगिरीची तुलना पहिलीच्या गुणांशी करणार का ११ वी च्या गुणांशी करणार का १ ली ते ११ वी च्या गुणांची सरासरी काढून त्याच्याशी तुलना करणार? >>> इतके करायची गरज नाही हो. सफरचंदाची केळ्याशी तुलना करु नका म्हणजे बस्स्. तुम्हाला कोणते आकडे सफरचंद वाटले आणि कोणते केळे ते एकदा स्पष्ट करा.

In reply to by श्रीगुरुजी

खंडेराव Tue, 05/26/2015 - 16:15
तुम्ही एक अचिवमेंट म्हणुन एक आकडा देताय. १२ टक्के. त्याला माझे उत्तर असे, कि, मागिल वर्षाच्या तुलतेत गंगाजळीमधे झालेली वाढ ( उदा, २०१४ मधे २०१३ पे़क्षा ६ टक्के वाढली, २००८ मधे ५५ % ). या सर्व वर्षांचा अ‍ॅवरेज १७% आहे. सगळ्यात जास्त वाढ ही ५५% तर कमी ही वजा २०% आहे. २००१ ते २०१४ मधे ७००% एकुन वाढ झाली आहे. त्यामुळे १२% ( तुम्ही म्हणताय ते ) हा काही इंडिकेटर धरता येणार नाही कामगिरिचा मोदी सरकारच्या, तसे पाहिले तर तो सरासरीपेक्षा कमीच आहे :-)
तुम्हाला कोणते आकडे सफरचंद वाटले आणि कोणते केळे ते एकदा स्पष्ट करा.
हे खालचे
गेल्या १ वर्षात परकीय चलनाच्या गंगाजळीत ३७ अब्ज डॉलर्सची वाढ झाली. ही वाढ गेल्या वर्षाच्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढली, गेल्या २ वर्षांच्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढली, गेल्या ५ वर्षांच्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढली, गेल्या १० वर्षांच्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढली, १९९१ पासून किती टक्क्यांनी वाढली इ. आकडेवारी तपासून वेगवेगळे तक्ते काढता येतील व त्यातून आपल्याला हवा तो निष्कर्ष काढता येईल.
सफरचंद/केळे : Apple to apple comparision

In reply to by खंडेराव

श्रीगुरुजी Tue, 05/26/2015 - 19:39
>>> त्यामुळे १२% ( तुम्ही म्हणताय ते ) हा काही इंडिकेटर धरता येणार नाही कामगिरिचा मोदी सरकारच्या, तसे पाहिले तर तो सरासरीपेक्षा कमीच आहे :-) पण तो २००९ ते २०१३ या वर्षांच्या सरासरीपेक्षा जास्त आहे ना! आणि मागील वर्षीपेक्षा पण जास्त आहे ना!! आणि तो तुम्हाला इंडिकेटर धरायचा नसेल तर नका धरू. परंतु मागील वर्षात त्यापूर्वीच्या वर्षाच्या तुलनेत १२% इतकी वाढ झाली आहे ही वस्तुस्थिती लपत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

मृत्युन्जय Wed, 05/27/2015 - 10:45
तुमच्या दोघांचेही प्रतिवाद उत्तम आहेत. खंडेरावांचा प्रतिवाद इथे थोडा तोकडा पडतो माझ्या दृष्टीने. ममो सरकारची पहिल्या ५ वर्षातली कामगिरी तशी नक्कीच बरी होती. मार जास्त दुसर्‍या टर्म मध्ये खाल्ला. तिथे इतकी घाण करु ठेवली की लोकांचा भारताबद्दल दृष्टीकोनच बदललला. आणि शेवटच्या २ वर्षात तर फारच घाण केली. ती अजुनही निस्तरायला लागत आहे. त्यामुळे तुलना तिथेच होउ शकते.

In reply to by मृत्युन्जय

खंडेराव Wed, 05/27/2015 - 12:59
हे आपल्याला माहित आहेच. त्या मंदीमुळे २००९ ते १३ या काळात ३ वर्षे ही टक्केवारी वजा मधे गेली. २००९ मधे -२०, २०१२ मधे -६ आणि २०१३ मधे -१. त्यामुळे या पाच वर्षांची सरासरी कमी झाली. हे मान्य करायला आपली हरकत नसावी. २००२ ते २००८ ( मंदीच्या आधी ) ची सरासरी ३४% येते, जी १२ पेक्षा जास्त आहे.

In reply to by खंडेराव

श्रीगुरुजी Wed, 05/27/2015 - 13:11
सन २००० ते सन २००३ या काळात देखील मोठ्या प्रमाणावर जागतिक मंदी होती. परंतु तुम्ही दिलेल्या सारणीनुसार त्या काळातले आकडे असे आहेत. २००२ - २९ २००३ - ४० २००४ - ४९

In reply to by खंडेराव

मृत्युन्जय Wed, 05/27/2015 - 13:17
२००९ मधे -२०, २०१२ मधे -६ आणि २०१३ मधे -१. त्यामुळे या पाच वर्षांची सरासरी कमी झाली. वाटले होते त्याप्रमाणे २०१० आणि २०११ मध्ये ही टक्केवारी वाढलेली असावी. कृपया आकडेवारी देता का?

तिमा Mon, 05/25/2015 - 18:36
आंकडेवारी तपासायची असेल तर शिनिअर गुर्जींनाच बोलवावे लागेल. आमच्या मते या सरकारला १० पैकी राहुल मार्क. आता राहुल = ??(० ते १०) हे ज्याचे त्याने ठरवावे.

रमेश आठवले Mon, 05/25/2015 - 19:39
abpnews.com किंवा abplive.in यांनी एक शिखर सम्मेलन नुकतेच ( २१ मे ?) भरवले होते. त्यात भा ज प तर्फे अध्यक्ष अमित शाह आणि सरकार तर्फे जनरल सिंग , नितीन गडकरी, मनोहर पर्रीकर, जितेंद्रसिंग व रविशंकर प्रसाद यांनी आपली बाजू मांडली आणि विरोधी पक्षांतर्फे गुलाम नबी आझाद व लालूप्रसाद यांनी आपली बाजू मांडली. प्रत्येकाने सुरवातीला ५ मिनिटात आपले मत मांडले आणि नंतर च्या साधारण ४० मिनिटामध्ये वाही चे प्रवक्ते आणि श्रोते यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ही सर्व माहिती तू नळीवर उपलब्ध आहे.

श्रीरंग_जोशी Tue, 05/26/2015 - 07:17
गेल्या एक वर्षात नव्या सरकारमुळे झालेल्या बदलांचा व प्रगतीच्या वाढलेल्या वेगाचा आढावा घेण्याचा प्रयत्न आवडला. परंतु बरेच निष्कर्ष पटले नाहीयेत. प्रामुख्याने तीन गोष्टी लिहितो. आर्थिक प्रगतीची बहुतांश मानके सकारात्मक कल दाखवत आहे. या गोष्टींचे बरेचसे श्रेय अगोदरच्या सरकारने गेल्या दोन-तीन वर्षांत राबवलेल्या धोरणांना जाते. यातील दुसरा महत्वाचा घटक म्हणजे परकीय चलनाच्या गंगाजळीमधली वाढ. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधन तेलाचे भाव विक्रमी घसरणे. २००८ साली १४५ डॉलर्स / बॅरल असणारे इंधन तेल गेल्या वर्षी ५० डॉलर्स / बॅरल इतके खाली आले होते. डॉलर - रुपया विनिमय दर बदलला असल्याने (तेव्हा ₹४० प्रति डॉलरपेक्षाही कमी दर होता तर गेल्या वर्षी पासून ₹६२ च्या खालीवर होत राहिला) आपल्याला एकदम दोन तृतीयांश रक्कम इंधन आयातीसाठी कमी मोजावी लागत नसली तरी तुलनेने अंदाजे एक तृतीयांश नक्कीच कमी मोजावी लागते. तसेच निर्यातीद्वारे होणारा फायदा तेव्हाच्या तूलनेत दीडपट होतच आहे. हे दर कमी अधिक प्रमाणात एक वर्षाअगोदर इतकेच राहिले असते तर आज हीच चर्चा खूप वेगळ्या मुद्द्यांवर चालत असती.
यावेळी प्रथमच भारतीय लष्कराला प्रतिगोळीबार करण्याची मुभा मिळाली.
हे विधान खूपच चूकीचे आहे. फार पूर्वीही सीमेवरील गोळीबाराची बातमी असली की त्यात जवाबी कारवाईमें भारतीय सेनाने दूश्मन के xx सैनिकों को मार गिराया हे वाक्य नेहमीच असायचं. गेल्या दोन वर्षांत केव्हा तरी भारताच्या लष्करप्रमुखांनी वक्तव्य केलं होतं की पाकीस्तानी सैन्याने कुठलिही आगळीक केल्यास त्यांना तिथल्या तिथे धडा शिकवण्याचे पूर्ण अधिकार भारतीय लष्कराच्या स्थानिक कमांडर्सला असतात. तसेच भाततीय लष्कर पाकिस्तानविरुद्ध कधीच पहिली गोळी चालवत नाही असा प्रचार जरी माध्यमांतून केला जात असला तरी ते १००% सत्य आहे असे मानायचे काहीच कारण नाही. पाकिस्तानी लष्कराला आपले उपद्रवमुल्य दाखवून दिल्याशिवाय राहवत नसल्याने त्यांच्या कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय लष्कराला आपल्या देशाचे सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावर अडचणीत येणार नाही या गोष्टीची काळजी घेऊन त्यांचे काम करणे भागच असते. तिसरा मुद्दा म्हणजे, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीचे अस्तित्व संदर्भहीन करण्याची सुवर्णसंधी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आततायी धोरणांमुळे गमावली गेली. सेनेसोबत युती करून कमी जागा लढवूनही त्यांच्यापेक्षा अधिक आमदार निवडून येणे सहज शक्य होते. अन त्याचवेळी राष्ट्रवादीचे २० पेक्षाही कमी आमदार निवडून आले असते. गेल्या १५ वर्षांत राज्याची वाट लावणारा हा पक्ष संदर्भहीन झाला असता तर राज्यातली बहुतांश जनता भाजप नेतृत्वाची दीर्घकालिन ऋणी राहिली असती. उद्योगजगताकडून अजूनपर्यंत तरी नव्या सरकारच्या (फारशी सुधारणा न होणार्‍या) धोरणांवर काळजीच व्यक्त केली जात आहे. पूर्वलक्ष्यी प्रभावाने कर आकारणी हा तर खूपच कळीचा मुद्दा आहे. आता येणार्‍या काळात प्रत्यक्ष सकारात्मक धोरणबदल दिसू लागतील अशी आशा करूया. मला सर्वाधिक आवडलेली बाब म्हणजे यंदाचा रेल्वे अर्थसंकल्प. कदाचित गेल्या अनेक दशकांत एवढा वास्तववादी रेल्वे अर्थसंकल्प कधीच मांडला गेला नसेल.

In reply to by श्रीरंग_जोशी

काळा पहाड Tue, 05/26/2015 - 12:30
गेल्या दोन वर्षांत केव्हा तरी भारताच्या लष्करप्रमुखांनी वक्तव्य केलं होतं की पाकीस्तानी सैन्याने कुठलिही आगळीक केल्यास त्यांना तिथल्या तिथे धडा शिकवण्याचे पूर्ण अधिकार भारतीय लष्कराच्या स्थानिक कमांडर्सला असतात.
हे ए.के.अँटनींनी सांगितलं होतं (http://timesofindia.indiatimes.com/india/Army-has-free-hand-to-counter-Pak-Antony/articleshow/21792739.cms). ही या सरकारनं दिलेल्या मोकळ्या हाताची बातमी (८ ऑक्टोबर): http://www.ndtv.com/india-news/pm-gives-forces-free-hand-to-deal-with-pakistan-firing-government-sources-676585 काय बदललं? जे बदललं (११ ऑक्टोबर) ते इथे दिलं आहे: http://www.ndtv.com/cheat-sheet/war-not-an-option-says-pakistan-as-border-firing-declines-sharply-677799 तीन दिवसात पाकिस्तानचा सूर बदलला. एनडीटीव्हीच्या या लिंकनुसार भारतीय फायरींगमुळं २०,००० पाकिस्तानी बेघर झाले. यावरून ही फायरींग किती भयंकर असेल याची कल्पना येवू शकेल.

In reply to by श्रीरंग_जोशी

श्रीगुरुजी Wed, 05/27/2015 - 10:08
>>> तिसरा मुद्दा म्हणजे, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीचे अस्तित्व संदर्भहीन करण्याची सुवर्णसंधी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आततायी धोरणांमुळे गमावली गेली. सेनेसोबत युती करून कमी जागा लढवूनही त्यांच्यापेक्षा अधिक आमदार निवडून येणे सहज शक्य होते. अन त्याचवेळी राष्ट्रवादीचे २० पेक्षाही कमी आमदार निवडून आले असते. गेल्या १५ वर्षांत राज्याची वाट लावणारा हा पक्ष संदर्भहीन झाला असता तर राज्यातली बहुतांश जनता भाजप नेतृत्वाची दीर्घकालिन ऋणी राहिली असती. सेनेपेक्षा आपला जनाधार जास्त आहे हे भाजपच्या पूर्वीच लक्षात आले होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुरवातीला भाजपने १३५ (भाजप) + १३५ (शिवसेना) + १८ (मित्रपक्ष) असे वाटप सुचविले होते. शिवसेनेला ते मान्य नव्हते. नंतर भाजपने १३० (भाजप) + १४० (शिवसेना) + १८ (मित्रपक्ष) असे वाटप सुचविले. तेही शिवसेनेला मान्य नव्हते. अगदी शेवटी २५ सप्टेंबरला (२७ सप्टेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता) भाजपने १२५ (भाजप) + १४५ (शिवसेना) + १८ (मित्रपक्ष) असे वाटप सुचविले. आपल्यापेक्षा २० जास्त जागा सेनेला देऊन कमी आमदार निवडून येण्याचा धोका भाजपने पत्करला होता. एकीकडे शिवसेना नेते आगीत तेल ओतण्याची जाहीर वक्तव्ये करीत असताना भाजप नेत्यांनी समजूतदारपणे सेनेवर टीका करण्याचे टाळले होते. भाजपपेक्षा तब्बल २० जागा जास्त मिळत असूनसुद्धा शिवसेना हटवादीपणे १५१ जागांच्या खाली उतरायला तयार नव्हती. त्यामुळे युती तुटली. अर्थात झाले ते चांगलेच झाले. १२५-१४५-१८ असे वाटप झाले असते तर दोन्ही पक्षांना १०० च्या आसपास जागा मिळाल्या असत्या व दोन्ही काँग्रेसला २५-३० च्या आसपास जागा मिळाल्या असत्या. कदाचित शिवसेनेला भाजपपेक्षा काही जागा जास्त मिळून सेनेचा मुख्यमंत्री झाला असता व युतीतील मोठ्या भावाचे स्थान कायम राहिले असते. त्याऐवजी स्वतंत्र लढून भाजपने सेनेपेक्षा जवळपास दुप्पट जागा मिळवून मोठा भाऊ कोण हा प्रश्न कायमचा निकालात काढला व सेनेला आपली जागा दाखवून दिली.

In reply to by श्रीगुरुजी

सेनेपेक्षा आपला जनाधार जास्त आहे हे भाजपच्या पूर्वीच लक्षात आले होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुरवातीला भाजपने १३५ (भाजप) + १३५ (शिवसेना) + १८ (मित्रपक्ष) असे वाटप सुचविले होते. शिवसेनेला ते मान्य नव्हते. नंतर भाजपने १३० (भाजप) + १४० (शिवसेना) + १८ (मित्रपक्ष) असे वाटप सुचविले. तेही शिवसेनेला मान्य नव्हते. अगदी शेवटी २५ सप्टेंबरला (२७ सप्टेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता) भाजपने १२५ (भाजप) + १४५ (शिवसेना) + १८ (मित्रपक्ष) असे वाटप सुचविले. आपल्यापेक्षा २० जास्त जागा सेनेला देऊन कमी आमदार निवडून येण्याचा धोका भाजपने पत्करला होता. एकीकडे शिवसेना नेते आगीत तेल ओतण्याची जाहीर वक्तव्ये करीत असताना भाजप नेत्यांनी समजूतदारपणे सेनेवर टीका करण्याचे टाळले होते. भाजपपेक्षा तब्बल २० जागा जास्त मिळत असूनसुद्धा शिवसेना हटवादीपणे १५१ जागांच्या खाली उतरायला तयार नव्हती. त्यामुळे युती तुटली. अर्थात झाले ते चांगलेच झाले. १२५-१४५-१८ असे वाटप झाले असते तर दोन्ही पक्षांना १०० च्या आसपास जागा मिळाल्या असत्या व दोन्ही काँग्रेसला २५-३० च्या आसपास जागा मिळाल्या असत्या. कदाचित शिवसेनेला भाजपपेक्षा काही जागा जास्त मिळून सेनेचा मुख्यमंत्री झाला असता व युतीतील मोठ्या भावाचे स्थान कायम राहिले असते. त्याऐवजी स्वतंत्र लढून भाजपने सेनेपेक्षा जवळपास दुप्पट जागा मिळवून मोठा भाऊ कोण हा प्रश्न कायमचा निकालात काढला व सेनेला आपली जागा दाखवून दिली. या सगळ्या फापट पसारा प्रतिसादात मूळ राष्ट्रवादी चा आणि पन्प्र यांच्या 'हंगामी ' सल्लागार साहेबांचा काय संबंध ? बर विधानपरिषद सभापती निवडणुकीत राष्ट्रवादी शी अनैतिक हात मिळवणूक का केली ? मोदी दर पंधरा महिन्यांना मोठ्या साहेबांचा सल्ला का घेतात ? लवासा चा मुद्दा थंड्या बस्त्यात का गेला ? राष्ट्रवादी मधून भाजप मध्ये आलेले अनेक 'बिभीषण ' एका रात्रीत पवित्र झाले का ? असे अनेक प्रश्न आहेत .

hitesh Tue, 05/26/2015 - 09:36
भ्रष्टाचारामुळे प्रत्येक कमोडिटीची किंमत किमान तीस टक्याने वाढते. जर भ्रष्टाचार स्म्पला असेल तर स्वस्ताई यायला नको होती का ? भाजपा सेनेत काँग्रेस रा.वा. च्च बरेच लोक घ्स्लेले आह् आणि म्हणे भ्रष्टाचार बंद झाले !

In reply to by hitesh

मृत्युन्जय Tue, 05/26/2015 - 10:16
भ्रष्टाचारामुळे प्रत्येक कमोडिटीची किंमत किमान तीस टक्याने वाढते. तीस टक्क्याने किंमती वाढलेल्या नाहित उलट कमी झाल्यात म्हणजे भ्रष्टाचार झालाच नाही असे म्हणायला हवे, नाही का?

In reply to by मृत्युन्जय

hitesh Tue, 05/26/2015 - 10:37
एखाद्या वस्तुची किंमत १०० रु आसायला हवी. पण काँग्रेसने भ्रष्टाचार माजवल्यामुळी ती वस्तु १३० ला विकली जात होती. आता धुतल्या तांदळासारखा मोदी आहे. नो भष्टाचार ! मग आता ती ३० % ची सूज ओसरायला नको का ? म्हणजे प्रत्येक वस्तु स्वस्त व्हायला नको का ?

In reply to by hitesh

मृत्युन्जय Wed, 05/27/2015 - 11:16
त्याचे काय आहे हितेशभाऊ सूज तर १० वर्षांची आहे ना. म्हणजे मूळ १०० रुपयांची वस्तु १३० नसून रु. १३७८ इतकी झाली आहे आणि तुम्ही मात्र १३० रुपयांचे तुणतुणे वाजवत बसला आहात म्हणुन तुम्हाला स्वस्ताई दिसत नाही.

In reply to by hitesh

मृत्युन्जय Wed, 05/27/2015 - 12:48
ती तर उतरलीच आहे असे तुम्ही मान्य करता की. तुमची अपेक्षा होती १३० ची. परिस्थिती आहे १३७८ ची. तुम्ही १३० समजून टीका करत होता. १३७८ आहे म्हणजे ज्या अनुषंगाने तुम्ही टीका करत होता तेच चुकले आहे. म्हणजेच सांख्यिकीच्या तत्वाने महागाई उतरलीच आहे की.

In reply to by मृत्युन्जय

आजानुकर्ण Wed, 05/27/2015 - 16:06
म्हणजेच सांख्यिकीच्या तत्वाने महागाई उतरलीच आहे की.
या मुद्द्याशी सपशेल सहमत. याच अनुषंगाने मोदी सरकारच्या आरोग्यविषयक कामगिरीबाबतही थोडी टिप्पणी आवश्यक आहे. श्रीगुरुजींनी समतोल लिखाण करण्याच्या दृष्टीने कदाचित आरोग्यविषयक कामगिरीबाबत काही लिहिले नसावे. मात्र ते लिहिणे क्रमप्राप्त आहे. काँग्रेजी सरकारच्या कालावधीत (२०१३-२०१४) माझ्या १ वर्षाच्या भाचीचे वय २ वर्षे झाले. थोडक्यात सांख्यिकीच्या दृष्टीने १०० टक्के वाढ. या दराने ती लवकरच वृद्ध झाली असती असे म्हणण्यास वाव आहे. मात्र मोदी सरकारच्या कालावधीत प्रचंड चमत्कार झाला. २ वर्षाच्या भाचीचे वय ३ वर्षे झाले. सांख्यिकीच्या दृष्टीने केवळ ५० टक्के वाढ. या वर्षी तिचे वय सांख्यिकीच्या दृष्टीने ३३ टक्क्याने वाढेल व एकंदर वयोवृद्ध होण्याचा वेग येत्या पाच वर्षात बराच कमी होईल अशी आशा आहे. मोदी सरकारच्या आरोग्यविषयक कामगिरीमुळे हा सांख्यिकीचा मुद्दा लक्षात आला. जनसामान्यांचे हार्दिक अभिनंदन

In reply to by आजानुकर्ण

कहर Wed, 05/27/2015 - 16:28
तूनही दर शब्दा ऐवजी वय हा शब्द चुकून लिहिला असे समजतो तसे नसेल तर मात्र तुमच्या या तुलनेला सलाम. म्हणजे तर २०१४-१५ मध्ये डाळीची किंमत २०१३-१४ पेक्षा कमी झाली असती तर तुमची भाची जिथून आली तिथे पुन्हा पोचली असती असे तुम्हाला म्हणायचे आहे का ?

In reply to by आजानुकर्ण

संदीप डांगे Wed, 05/27/2015 - 16:59
हा हा हा. लय भारी... यावरून अजून एक किस्सा आठवला. एक सांख्यिकी प्रोफेसर, गणितावर प्रचंड विश्वास, आपल्या दोन मुलं आणि बायको सोबत एक नदी ओलांडायला किनार्‍यावर उभे असतात. आयुष्यातला कोणताही पेच सोडवण्यासाठी गणितच योग्य आहे असं प्रो ना वाटत असतं. नदी पायीच ओलांडायची असल्याने प्रो. पाण्याची खोली मोजतात. ती असते साडेचार फूट. मग साहेब स्वतःची, बायकोची, मुलांची उंची यांची सरासरी काढून निष्कर्ष काढतात की नदीत कुणीच बुडणार नाही कारण सरासरी ५ फूट आली आहे. चला नदी ओलांडूया. बायको काय म्हणते तिकडे दुर्लक्ष करत मुलांना घेऊन बायकोला ढकलत नदीत उतरतात. आपल्या गणितावर प्रचंड विश्वास असलेल्या प्रोफेसर साहेबांची साडेतीन फूट आणि चार फूट उंचीची मुले नदीत वाहून जातात.

खंडेराव Tue, 05/26/2015 - 10:35
चिनार यांचा ह्या सविस्तर प्रतिसादात भारताच्या परराष्ट्र धोरणांचे ठळक मुद्दे आलेले आहेत.
अहो, तिथे उत्तरे ही दिली आहेत या ठळक मुद्द्यांना २-४ लोकांनी, ती वाचा की. प्रतिवाद ही करा त्यांचा.

खंडेराव Tue, 05/26/2015 - 10:40
आमच्याकडे तोंडपाटीलकी म्हणतात
आपल्या शपथविधीला मोदींनी सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलावून एक नवीन पायंडा पाडला. सार्क समूहातील भारत हा सर्वात मोठा देश. सार्क हे एक कुटुंब मानले तर भारताचे स्थान सर्वात मोठ्या भावाचे. एखाद्या देशमुखाच्या घरातील लग्नाला पंचक्रोशीतील सर्व गावाच्या पाटलांनी उपस्थित रहावे व देशमुखांचे स्थान मान्य करावे अशा स्वरूपाचा हा पायंडा होता
हे कुठुन कळाले? लग्नाला २००० लोक जेवले घरातल्या तर काय लग्नघराचे मिंधे झाले का ते? नंतर श्रीलंका, पाकिस्तान ने काय केले ते शोधा जरा. स्वप्नरंजन वाटते दिवसाढवळ्या.. बरे तुमचे लिखाण वाचत नाहीत हे सार्क राष्ट्रप्रमुख, नाहीतर हे वाचुन मोदींना बोलावणे आणि स्वतः येणे ही बंद करतील!

In reply to by खंडेराव

खंडेराव Tue, 05/26/2015 - 11:03
आणि मोदी भेटीला गेले इतक्या ठिकाणी, त्याचाही तिथे असाच अर्थ काढत असतील का ? नसावे काढत अशी आशा आहे.

In reply to by खंडेराव

मृत्युन्जय Tue, 05/26/2015 - 11:16
हाहाहाहाहा. + १. शपथविधीचे आमंत्रण हा केवळ शक्तीप्रदर्शनाचा एक भाग होता. हे आमंत्रण भारताची शेजारी राष्ट्रांशी सौहार्दपुर्ण संबंध ठेवायची इच्छा आहे हा संदेश देणारा होता. हा एक योग्य पायंडा नक्कीच होता. पण याहुन जास्त त्याला महत्व नाही आणि मोठा भाऊ वगैरे तर निव्वळ फुकाची आत्मप्रौढी आहे.

संदीप डांगे Tue, 05/26/2015 - 10:43
जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये सीमेवरील पाकिस्तानी सैन्याने नेहमीप्रमाणे अचानक गोळीबार सुरू केला. त्यात सीमाभागातील काही नागरिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान काही महिन्यांच्या अंतराने नियमितपणे असा गोळीबार करून नागरिकांचे प्राण घेत असते. या गोळीबाराविरूद्ध भारताची प्रतिक्रिया म्हणजे निषेधाचा खलिता पाठविणे. यावेळी प्रथमच भारतीय लष्कराला प्रतिगोळीबार करण्याची मुभा मिळाली. पाकिस्तानने गोळीबार सुरू केल्यावर प्रथमच भारतीय सैन्याने उलट गोळीबार करून जोरदार प्रत्त्युत्तर दिले ज्यात काही पाकिस्तानी सैनिक व नागरिक मरण पावले. भारताच्या जोरदार प्रतिकारामुळे आश्चर्यचकीत झालेल्या पाकिस्तानी लष्कराने गोळीबार थांबविला. त्यानंतर आजतगायत पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार होण्याचे प्रकार घडलेले नाहीत.
चौथीच्या पुस्तकात शोभून दिसेल असा उतारा.

In reply to by संदीप डांगे

संदीप डांगे Tue, 05/26/2015 - 10:57
मोदी सरकारकडून गोळीबाराच्या निषेधार्थ खलिता : दिनांक : ३ जानेवारी २०१५ पाकिस्तानी सैन्याचा गोळीबार दिनांकः १६ मे २०१५ सीमेवरचा गोळीबार हा नेहमीचाच प्रकार आहे. कुठलेही सरकार आले तरी ते थांबणे अशक्य आहे. उगाच खोट्या बातम्या पसरवून लोकांचा जाणून बुजून दिशाभ्रम करणे चूक आहे.

In reply to by संदीप डांगे

hitesh Tue, 05/26/2015 - 12:30
गोळीबाराचं काय घेऊन बसलेत ! कार्गिल युद्ध वगळता पाकिस्तानबरोबरच्या सर्व लढाया या काँग्रेसच्याच काळात लढलेल्या आहेत. लबाड गुर्जी हेही विसरले !

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी Tue, 05/26/2015 - 14:08
>>> चौथीच्या पुस्तकात शोभून दिसेल असा उतारा. वर "काळा पहाड" यांनी दिलेली लिंक पुन्हा एकदा देतो. http://www.ndtv.com/cheat-sheet/war-not-an-option-says-pakistan-as-borde... ते वाचा आणि ठरवा की लिंकमधील उतारे कितवीच्या पुस्तकात शोभून दिसतील ते.

In reply to by श्रीगुरुजी

मदनबाण Tue, 05/26/2015 - 14:34
ह्म्म्म... या बाबतीत { म्हणजे पाकड्यांना उत्तर देण्याच्या बाबतीत बरं का... } माझा प्रतिसाद आठवला. बाकी चालु ध्या...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie Goulding

In reply to by श्रीगुरुजी

संदीप डांगे Tue, 05/26/2015 - 14:53
लिण्क चालवून दाखवा.... हे तुमचेच वाक्यः त्यानंतर आजतगायत पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार होण्याचे प्रकार घडलेले नाहीत. आणि त्यावर हा माझा प्रतिसाद तुम्ही अनुल्लेखाने मारलेला आहे. तुमच्याच तळटीपेप्रमाणे तुम्ही अजिबात वागत नाहीये गुरुजी. पुरावा दिला तिथे काहीच कमेंट नाही. टोमणा दिला तिथे कमेंट करताय. तुमच्यासाठी: gg

खंडेराव Tue, 05/26/2015 - 10:57
खोटे लिहिता हो तुम्ही :-(
ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत मोदींनी ब्रिक्स बँकेची अभिनव कल्पना मांडली. ब्रिक्स बॅंक सुरू होऊन बॅकेचे सुरवातीचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे.
वाचा हे खालचे-- The New Development Bank was agreed to by BRICS leaders at the 5th BRICS summit held in Durban, South Africa on 27 March 2013.[2] On 15 July 2014, the first day of the 6th BRICS summit held in Fortaleza, Brazil, the group of emerging economies signed the long-anticipated document to create the $100 billion BRICS Development Bank and a reserve currency pool worth over another $100 billion.[5] Both will counter the influence of Western-based lending institutions and the dollar. Documents on cooperation between BRICS export credit agencies and an agreement of cooperation on innovation were also signed.[6] Shanghai was selected as the headquarters after competition from New Delhi and Johannesburg. An African regional center will be set up in Johannesburg.[7] The first president will be from India,[8][9] the inaugural Chairman of the Board of directors will come from Brazil [3] and the inaugural chairman of the Board of Governors will be Russian.[3] On 11 May 2015, K. V. Kamath was appointed as President of the Bank.[10] विकीपेडिया वरुन साभार आता हे नका सांगु की मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असतांना ही कल्पना मांडली. http://www.ft.com/cms/s/0/2bcbd6e0-96e5-11e2-a77c-00144feabdc0.html#axzz3bDeg9400

अनुप ढेरे Tue, 05/26/2015 - 11:13
गुरुजींनी जरा प्रचारकी मोड मधून सन्यास घ्यावा ही विनंती! त्यांच्या असल्या भंपक लेखांनी मोदी सरकारची हानीच होईल. अजिबात फायदा होणार नाही.

खंडेराव Tue, 05/26/2015 - 11:19
भारताची अणु उर्जा क्षमता २०१३-१४ मध्ये ४,७८० मेगॅवॅट्स इतकी होती. २०१४-१५ मध्ये हीच क्षमता ५,७८० मेगॅवॅट्स इतकी झाली आहे. यात एकूण २१ % वाढ झालेली आहे.
भारतात जे २१-२२ प्लांटस आहेत, ते सर्व २०१४ पुर्वीचे आहेत ( मोदी सरकारच्या आधीचे ) जी वाढ झाली आहे त्यात या सरकारचे काय स्पेसिफिक कॉन्ट्रीबुशन? हे सांगु नका, करार केलेत म्ह्णुन, ते युरेनियम यायचे आहे अजुन.

In reply to by खंडेराव

संदीप डांगे Tue, 05/26/2015 - 11:25
खंडेराव, पिसं काढणं सोपं आहे हो. एवढा म्होटा ल्येक लिवलाय त्येनी इतका बेमालूम खोटेपणा पेरून तुम्हाला त्याचं काईच नवल वाटत न्हाई? आम्ही तर साष्'टांग' नमस्कार घालतो आहोत गुर्जींच्या प्रचंड अभ्यासाला. एवढ्या थापा एवढ्या कॉन्फीडन्सने मारणे ह्याला पराकोटीचा निर्ढावलेपणा लागतो.

In reply to by संदीप डांगे

खंडेराव Tue, 05/26/2015 - 11:37
आणि आत्ता कुठे पहिले २ प्यारा वाचलेत. इतकी पिसे निघतायेत की कोंबडी शिल्लक रहाणार नाही :-) खरच हिम्मत पाहीजे इतके खोटे लिहायला.. बाकी, खाली लो़कांची रांग लागायला नको अभ्यासपुर्ण लेख आहे म्हणत, म्हणुन जरा हिशोब करतोय!

In reply to by खंडेराव

मृत्युन्जय Tue, 05/26/2015 - 11:47
लेख अभ्यासपूर्ण तर नक्कीच आहे. काही तथ्यांश चुकीचे अथवा चुकीच्या ग्रूहितकांवर आधारलेले असु शकतात पण त्यामुळे लेखाचे माहितीमूल्य कमी होत नाही. प्रचारकी थाट ठेवला नसता तर बरे झाले असते. ममो सरकारच्या २ घोटाळ्यांच्या उल्लेखाचे प्रयोजन देखील कळाले नाही. विशेषत: २जी मध्ये तर ममो सरकारला स्वतःची बाजूच अजुन नीट मांडता आलेली नाही. तो घोटळा एवढा मोठा नक्कीच नाही. त्यामागचे अर्थशास्त्र समजुन घेतले पाहिजे. असो. एकुण लेखाची मांडणी आवडली. खंडेरावांचे काही आक्षेपही योग्यच. त्या त्रुटींमुळे लेखाला गालबोट लागले.

In reply to by मृत्युन्जय

संदीप डांगे Tue, 05/26/2015 - 12:03
काही तथ्यांश चुकीचे अथवा चुकीच्या ग्रूहितकांवर आधारलेले असु शकतात पण त्यामुळे लेखाचे माहितीमूल्य कमी होत नाही.
हे तुमचे विधान जरा चमत्कारिक वाटत आहे. मांडलेल्या गोष्टी जर चुकीच्या असतील तर लेख माहितीपूर्ण कसा? उद्या मी मंगळावरचे मनुष्यजीवन नावाचा लांबलचक लेख वेगवेगळे मुद्दे घेऊन लिहिला तर तुम्ही असेच म्हणाल का की लेखात सत्य नाही पण माहितीपूर्ण आहे? प्रस्तुत लेख तद्दन जाहिरात असून निव्वळ भाजपाच्या वर्षपूर्ती प्रचाराच्या मोहिमेचा एक भाग आहे हे धडधडीत दिसून येत आहे. आकडेवारी मांडली, मोठ्या मोठ्या बातम्या टाकल्या म्हणजे लेख अभ्यासपूर्ण होत नाही. तेवढे सोडले तर लेखकाने पक्षप्रेमातून केलेल्या टिप्पण्या दिसत आहेत. ह्याला 'निष्पक्ष अभ्यासपूर्ण परिक्षण' म्हणत असतील तर म्हणो बापडे. - एक भाजप समर्थक पण दांभिकता विरोधक

In reply to by संदीप डांगे

मृत्युन्जय Tue, 05/26/2015 - 12:20
आधीच म्हटल्याप्रमाणे काहे मुद्दे चुकीचे असुनही लेखनाचे अभ्यासमूल्य कमी होत नाही. बाकी प्रचारकी थाटाचा मलाही वैताग येतो हे आधीही सांगितले आहेच आणि वरतीही नमूद केलेले आहेच. कोणीतरी कट्टर समर्थक आहे म्हणुन त्याच्या पुर्ण प्रतिवादाला अमान्य करणे अवघड जाइल. अर्थात प्रतिवाद मोदींचे परदेश दौरे, न झालेले घोटाळे असा बिनडोक असेल तर नाइलाज आहे.

In reply to by मृत्युन्जय

संदीप डांगे Tue, 05/26/2015 - 12:41
माझा रोख तुमच्या तथ्यांश चुकीचे असूनही लेखास माहितीपूर्ण म्हटले त्या विधानावर आहे. ते विधान तार्किकदृष्ट्या कसे बरोबर असेल याचा मी विचार करतोय. 'तथ्यांश' ला 'मुद्दे' हा शब्द वापरला तर तुमच्या विधानाचा पूर्ण अर्थ बदलतो. एखादी व्यक्ती काहीही मुद्दे, मत, निरिक्षण मांडू शकते. पण ते करतांना मांडलेल्या माहितीच्या खरेपणाबद्दल आक्षेप असेल तर तो अमान्य करता येत नाही. उदा. सीमेवरिल पाकिस्तानी गोळीबार याबाबत प्रस्तुत लेखात धडधडीत खोटे मांडले आहे. दंगलींच्या संदर्भात छोटी दंगल-मोठी दंगल असे शब्द वापरून शब्दच्छल केला आहे. बाकी समर्थक म्हणा की विरोधक, दोघांच्याही प्रतिवादांमधे बिन्डोकपणा यायचाच, मनुष्यस्वभाव आहे.

In reply to by संदीप डांगे

मृत्युन्जय Tue, 05/26/2015 - 13:12
बाकी समर्थक म्हणा की विरोधक, दोघांच्याही प्रतिवादांमधे बिन्डोकपणा यायचाच, मनुष्यस्वभाव आहे. थोडा फरक तरीही आहेच. गुर्जींच्या लेखातल्या सग्ळ्याच गोष्टी प्रचारकी म्हणुन सोडुन देता येणार्‍यातल्या नाहित. शिवाय काही गोष्टींमध्ये आकडेवारी थोडीशी इकडे तिकडे झालेली असली तरी मूळ मुद्दा जर बरोबर असेल तर तो मुद्दा पुर्णपणे नाकारता येत नाही. उदा. माझ्याकडे २०१५ मधल्या एफडीआयचा डॅटा नाही. २०१४ चा देखील नाही. खंडेरावांची लिंक बघता से दिसुन येते की त्यांनी जो आकडा दिला आहे तो रिटेन्ड अर्निंग्स धरुन दिला आहे. २०१५ चा आकडा देखील रिटेन्ड अर्निंग्स धरुन दिला असेल तर ती तुलना बरोबर होइल अन्यथा कदाचित गुर्जींची आकडेवारी बरोबर असु शकेल. अर्थात हे जर तर झाले. आपण आक्डेवारीची सत्यता थोडा वेळ बाजूला ठेवल्यास एफडीआय वाढले हे तर नक्की दिसुन येइल. परकीय गुंतवणुकीसाठी आशादायक वातावरण निर्माण करणे हे सरकारचे मुख्य काम आहे. ममो सरकार यात सपशेल अपयशी ठरले. मोदी सरकार मात्र अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी ठरत आहे. आधी म्हटल्याप्रमाणे "फील गुड" फॅक्टर महत्वाचा आहे. मोदी सरकार या तयारीवर कळस कसा चढवते हे महत्वाचे. काही सिंग फंड्सनी आत्तापासूनच निराशेचे स्वर आळवायला सुरुवात केल्याचे दिसते. बरेच फंड्स खुष आहेत, आशावादीही आहेत. आजवरची कामगिरी बघता १०/१०. नंतर असेच चालू राहिल्यास उत्तम. पाकिस्तानवर केलेल्या प्रतिआक्रमणाबद्दल बोलायचे झाल्यास लष्कराला फ्री हँड देण्यात आला होता असे मिडीया आणी लष्कर देखील म्हणते. खरेखोटे देव जाणे. कदाचित वेळोवेळी हा फ्री हँड ममो सरकारने देखील दिला असावा. पण त्यांच्या देहबोलीमधुन, माहिती देण्यावरुन असे कधी जाणवले नाही. मोदी सरकार हे जाहीर करत आहे. हे उल्लेखनीय आहे. वर काळा पहाड यांनी दिलेल्या लिंकावरुन भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तराची माहिती मिळते. या आणि अशाच कारणासाठी मी ते म्हटले होते. आकडेवारी चुकीची आहे म्हणुन मूळ मुद्दाच आपण नाकारु शकत नाही. असो. बाकी द्वेष्ट्यांनी लिहिलेले बिनडोक धागे बघता हा धागा फारच कमी प्रचारकी आहे. धागे केवळ सरकार समर्थकांचेच प्रचारकी असतात आणी विरोधकांचे नसतात असे काही नाही. शिवाय दोन्ही धाग्यांमधील सर्व मुद्द्यांना बिनतोड प्रतिवाद करण्यात आला आहे. त्यामुळे ते धागे अनुल्लेखनीय आहेत तसा हा धागा होत नाही.

In reply to by मृत्युन्जय

नाव आडनाव Tue, 05/26/2015 - 13:31
सर, लोक बिनडोक असले आणी त्यांना राजकारणातल कळत नसलं तरी सुध्धा त्यानी ज्या विषयावर चर्चा चालू आहे तिथे मनातल्या शंका / प्रश्न विचारू नयेत का? ते विचारल्यानंतर तुम्ही त्यांना बिनडोक म्हणणार असाल तर ती चर्चा कशी? सरकारच्या निर्णयांवर, आजूबाजूला होणाऱ्या घडामोडींवर इथे मी आधीचं सरकार होतं तेंव्हा सुध्धा चर्चा होताना वाचल्या आहेत. माझा आय डी १ वर्षाचा आहे पण मी मिसळपाव ~५-६ वर्ष वाचत आहे. लोकांचं मत तुमच्यापेक्षा वेगळं असू शकतं आणी ते चूक सुध्धा असू शकतं, पण त्या सगळ्यांना बिनडोक म्हणणं मला तरी बरोबर वाटत नाही.

In reply to by नाव आडनाव

मृत्युन्जय Tue, 05/26/2015 - 13:43
शंका नक्की विचाराव्यात. त्यात अजिबात काहिच चूक नाही. प्रॉब्लेम असा आहे की त्या शंका नसुन सरळसरळ आरोप असतात. शिवाय शंका विचारताना किमान पातळीची बुद्धी वापरावी अशी अपेक्षा असते. ती दिसत नाही. केवळ आरोपासाठी आरोप असे त्याचे स्वरुप आहे. वात त्यांचा येतो. मुद्देसूद प्रतिवाद (जे खंडेराय किंवा अमोल करताना दिसतात) त्याचा (इतर बर्‍याच लोकांच्या प्रतिसादात अथवा धाग्यात) पुर्ण अभाव द्दिसतो हा मुख्य मुद्दा आहे. असो. तुम्ही माझे नीट प्रतिसाद वाचले तर हे जाणवेल की जिथे जिथे मुद्दे योग्य आहेत असे मला वाटले तिथे मी तसे मान्य केले आहे (खंडेराय किंवा अमोल हे मान्य करतील असे वाटते)

In reply to by मृत्युन्जय

मदनबाण Tue, 05/26/2015 - 13:52
प्रमाणाच्या बाहेर काहीच्या काही अवांतर... खंडेराय ? अवं पाव्हन... ते खंडेराव हायेसा.... तुम्ही "जय मल्हार" पाहण जरा कमी करा बरं ! ;) जाता जाता :- बानु /बाणाई / म्हाळसा / म्हाळसाई या आयडीज कधी मिपावर प्रकट होतील याची वाट पाहतो आहे, म्हणजे कसं समग्र "गोंधळ" कसा घातला जातो ते पहता येइल ! कसे ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie Goulding

In reply to by मदनबाण

खंडेराव Tue, 05/26/2015 - 14:11
तर, प्रश्न असा आहे, की हा लेख अभ्यासपुर्ण आहे की प्रचारकी आहे? आकडेवारीत जात नाही, त्याविषयी लिहिले आहेच. काही उदाहरणे घेउयात -
१६ मे २०१४ या दिवशी भारतात इतिहासाचे एक नवे पान लिहिले गेले.
आपल्या शपथविधीला मोदींनी सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलावून एक नवीन पायंडा पाडला. सार्क समूहातील भारत हा सर्वात मोठा देश. सार्क हे एक कुटुंब मानले तर भारताचे स्थान सर्वात मोठ्या भावाचे. एखाद्या देशमुखाच्या घरातील लग्नाला पंचक्रोशीतील सर्व गावाच्या पाटलांनी उपस्थित रहावे व देशमुखांचे स्थान मान्य करावे अशा स्वरूपाचा हा पायंडा होता
येमेन व इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय अडकून पडले होते. भारताने ही परिस्थिती युद्धजन्य पातळीवर हाताळून बहुसंख्य भारतीयांना सुखरूप परत आणले. एवढेच नव्हे तर येमेन मध्ये अडकलेल्या ४१ देशांच्या ९०० हून अधिक नागरिकांना भारताने सुखरूप बाहेर काढले
हे नविन नाही, जवळजवळ १२५००० भारतिय आपण सुखरुप आणलेत बाहेरुन आजपर्यंत.
दिल्लीत मात्र भाजपचा सुपडा साफ झाला. अत्यंत अवास्तव व अव्यावहारीक आश्वासने देऊन 'आआप'ने सत्ता मिळविली. प्रचंड बहुमत पाठीशी असूनसुद्धा केजरीवालांचा नाटकीपणा, पोरकटपणा, हेकेखोरपणा, हुकूमशाही वृत्ती अजिबात कमी झालेला नाही. त्यांचे विदूषकी चाळे अजूनही सुरुच आहेत. त्यांच्या नाटकापायी एका शेतकर्‍याचा फास लागून जीव गेला. केंद्राबरोबर ते कायम संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. एकंदरीत त्यांच्या मर्कटलीलांमुळे दिल्लीची जनता भरडली जाईल हे निश्चित.
हे आणि खालचे वाक्य वाचा
६ मे २०१४ रोजी प्रथमच भारतीय जनता पक्ष या उजव्या, राष्ट्रवादी, जातीयवादी इ. तथाकथित विशेषणांनी नटलेल्या पक्षाने संपूर्ण बहुमत मिळवून इतिहास घडविला. भाजपला बहुमत मिळण्यास मुख्य २ गोष्टी कारणीभूत होत्या. त्या म्हणजे, (१) २००४-२०१४ या कालखंडातील भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले व अत्यंत निष्क्रीय असलेले व सर्व आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरलेले काँग्रेसचे सरकार आणि (२) भाजपकडे असलेले नरेंद्र मोदींचे अत्यंत प्रभावी व आक्रमक नेतृत्व. अत्यंत झंझावाती प्रचार करून मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका करून जनमत आपल्या बाजूला वळवून भाजपला इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून दिले व जेमतेम ४४ जागा मिळून काँग्रेसचा अक्षरशः पालापाचोळा झाला.
तुम्ही घडवला कि इतिहास, आणि कोणी अजुन जिंकले की अवास्तव व अव्यावहारीक आश्वासने :-) तुमची व्यावहारिक आश्वासने कुठे गेली?
महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका शिवसेना पार पाडत आहे. मनसेचा अवतार समाप्त झाला आहे. काही वर्षांतच राष्ट्रवादी आणि शिवसेनाही संपुष्टात येण्याची शक्यता आहे. डाव्या पक्षांची सद्दी जवळपास संपुष्टात आली आहे. प्रकाश करातांच्या जागी येचुरी येऊनसुद्धा काहीही फरक पडणार नाही. जनता दलाचे छोटे छोटे तुकडे अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर असल्याने विलिनीकरण करून धुगधुगी टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आआपची नाटके व तमाशे सुरूच आहेत. एकंदरीत विरोधी पक्षांची अवस्था दयनीय आहे.
जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये सीमेवरील पाकिस्तानी सैन्याने नेहमीप्रमाणे अचानक गोळीबार सुरू केला. त्यात सीमाभागातील काही नागरिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान काही महिन्यांच्या अंतराने नियमितपणे असा गोळीबार करून नागरिकांचे प्राण घेत असते. या गोळीबाराविरूद्ध भारताची प्रतिक्रिया म्हणजे निषेधाचा खलिता पाठविणे. यावेळी प्रथमच भारतीय लष्कराला प्रतिगोळीबार करण्याची मुभा मिळाली. पाकिस्तानने गोळीबार सुरू केल्यावर प्रथमच भारतीय सैन्याने उलट गोळीबार करून जोरदार प्रत्त्युत्तर दिले ज्यात काही पाकिस्तानी सैनिक व नागरिक मरण पावले. भारताच्या जोरदार प्रतिकारामुळे आश्चर्यचकीत झालेल्या पाकिस्तानी लष्कराने गोळीबार थांबविला. त्यानंतर आजतगायत पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार होण्याचे प्रकार घडलेले नाहीत.
आता, याला प्रचार म्हणायचे कि अभ्यास हे ज्याचे त्याने ठरवायचे. मला हे लेखन प्रचारकी वाटले, म्हणजे आधी भाजी काय करायची ठरवले, आणि मग मसाले, मीठ हे गोळा केले. निष्पक्षपणाशी दुरचाही संंबंध नसलेले.

In reply to by खंडेराव

श्रीगुरुजी Tue, 05/26/2015 - 14:23
>>> हे नविन नाही, जवळजवळ १२५००० भारतिय आपण सुखरुप आणलेत बाहेरुन आजपर्यंत. हे नवीन नसलं म्हणून लेखात लिहिलेली माहिती व आकडेवारी खोटी ठरते का? >>> तुम्ही घडवला कि इतिहास, आणि कोणी अजुन जिंकले की अवास्तव व अव्यावहारीक आश्वासने :-) तुमची व्यावहारिक आश्वासने कुठे गेली? दिल्लीत काय घडले यावर दिल्ली निवडणुकांच्या एका धाग्यावर सविस्तर चर्चा झाली आहे. तेचतेच मुद्दे परत उगाळायची मला इच्छा नाही. >>> आता, याला प्रचार म्हणायचे कि अभ्यास हे ज्याचे त्याने ठरवायचे. मला हे लेखन प्रचारकी वाटले, म्हणजे आधी भाजी काय करायची ठरवले, आणि मग मसाले, मीठ हे गोळा केले. निष्पक्षपणाशी दुरचाही संंबंध नसलेले. तुम्ही काहीही म्हणा. त्याने वस्तुस्थिती बदलत नाही.

In reply to by खंडेराव

श्रीगुरुजी Tue, 05/26/2015 - 14:39
गेल्या काही दिवसांपासून जवळपास सर्व हिंदी/इंग्लिश/मराठी वृत्तवाहिन्यांवर "मोदी सरकारची १ वर्षातील कामगिरी" या एकमेव विषयावर जोरदार चर्चासत्रे होत आहेत. द हिंदू, इंडियन एक्स्प्रेस, इंडिया टुडे इ. दैनिकातून्/साप्ताहिकातून याच विषयावर अनेक तज्ज्ञांच्या लेखमालिका येत आहेत. आजच दैनिक सकाळ ने याच विषयावर पानेच्या पाने भरली आहेत. या सर्वांचे लिखाण अभ्यासपूर्ण आहे का प्रचारकी? माझ्या लेखातील आकडेवारी व इतरत्र प्रसिद्ध होणारी आकडेवारी पडताळून पह आणि मग ठरवा. बादवे, दैनिक सकाळचे १ वर्षाचे रेटिंग ६.५५/१० इतके आहे. माझे रेटिंग जवळपास तितकेच म्हणजे ६.८/१० इतके आहे.

In reply to by श्रीगुरुजी

संदीप डांगे Tue, 05/26/2015 - 14:58
तुम्हाला माध्यम-धंद्याची काही माहीती असेल तर हे माहितच असेल की सर्व वाहिन्या-माध्यमांनी हा विषय त्यांच्या धंद्यानिमित्त उचललेला आहे. तुमचा काय हेतू आहे हा विषय इथं मिपावर मांडायचा?

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी Tue, 05/26/2015 - 15:05
मिसळपाव या संकेतस्थळावर कोणत्याही विषयावर संकेतस्थळाचे नियम पाळून कोणत्याही विषयावर सभ्य लेखन करायला परवानगी आहे. कोणी कोणत्याही विषयावर लेखन केले तरी हे लेखन करण्याचा लेखकाचा हेतू काय हे विचारले जात नाही. तुम्हीही अनेक लेख लिहिले आहेत. आजगतायत ते लेख लिहिण्यामागचा तुमचा हेतू आजवर मी किंवा इतर कोणीही तुम्हाला विचारलेला नाही. असे असताना तुम्ही हे जाब विचारल्याच्या थाटात का विचारत आहात? हे विचारण्याचा तुम्हाला हक्क नाही. हा लेख नियमांविरूद्ध, प्रक्षोभक, असभ्य इ. असेल संपादक मंडळ नक्कीच तो काढून टाकतील.

In reply to by श्रीगुरुजी

संदीप डांगे Tue, 05/26/2015 - 16:13
तुम्ही हे जाब विचारल्याच्या थाटात का विचारत आहात? हे विचारण्याचा तुम्हाला हक्क नाही.
मला काय हक्क आहेत, नाहीत, ते तुम्ही सांगायचा तर प्रश्नच येत नाही. संमंला माझे प्रतिसाद असभ्य, अप्रस्तुत वाटतील तर ते हटवतीलच. बाकी, दुसर्‍यांना जाब विचारणारांना स्वतःची वेळ आली की हे सुचतं. मिपावरच कुणीतरी मला म्हटले होते की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट चव्हाट्यावर मांडता तेव्हा त्याचा सार्वजनिक पंचनामा होणारच. त्याची तयारी ठेवा किंवा आपले विचार सार्वजनिक करूच नका. तसे नको असेल तर आपले महान विचार आपल्या रोजनीशीत लिहून रात्री पारायणे करावी वैगेरे वैगेरे. निदान त्या सांगणार्‍या व्यक्तीइतक्या खालच्या पातळीवर मी येऊ शकत नाही. त्यामुळे त्या महान व्यक्तीच्या मानाने मी तुम्हाला फारच बाळबोधपणे प्रश्न विचारला आहे. बोचला का? सॉरी बरं का..! असले प्रश्न विचारल्या जाण्याचा त्रास होत असेल तर असले लेख लिहून सार्वजनिक संकेतस्थळावर टाकू नयेत माणसाने.

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी Tue, 05/26/2015 - 19:34
पुन्हा तेच. माझा हा लेख लिहिण्यामागचा हेतू काय हे विचारायचा तुम्हाला अधिकार नाही. इथे कोणीच कोणाला अमुकतमुक लेख का लिहिला, अमुकतमुक कविता का लिहिली, अमुकतमुक पाककृती का लिहिली असे विचारत नाही. तुम्ही मात्र मी हा लेख का लिहिला त्यामागचा हेतू विचारत आहात. >>> मला काय हक्क आहेत, नाहीत, ते तुम्ही सांगायचा तर प्रश्नच येत नाही. मी हा लेख का लिहिला त्यामागचा हेतू तुम्हाला सांगायचा प्रश्नच येत नाही आणि हे तुम्ही विचारण्याचा तुम्हाला अधिकारच नाही. सबब असे जाब विचारत जाऊ नका. >>> जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट चव्हाट्यावर मांडता तेव्हा त्याचा सार्वजनिक पंचनामा होणारच. त्याची तयारी ठेवा किंवा आपले विचार सार्वजनिक करूच नका. तसे नको असेल तर आपले महान विचार आपल्या रोजनीशीत लिहून रात्री पारायणे करावी वैगेरे वैगेरे. निदान त्या सांगणार्‍या व्यक्तीइतक्या खालच्या पातळीवर मी येऊ शकत नाही. त्यामुळे त्या महान व्यक्तीच्या मानाने मी तुम्हाला फारच बाळबोधपणे प्रश्न विचारला आहे. बोचला का? सॉरी बरं का..! मी पंचनाम्याला घाबरत नाही. योग्य त्या प्रतिसादांचा मी योग्य तो युक्तिवाद करीत असतो. परंतु लेख लिहिण्यामागचा हेतू विचारणं चुकीचं आहे. मला खात्री आहे की आजवर तुमच्या लेखांसाठी मी किंवा कोणीही तुम्हाला असा प्रश्न विचारला नसेल आणि तुम्हीही मी सोडून इतर कोणालाही हा प्रश्न विचारला नसेल. >>> असले प्रश्न विचारल्या जाण्याचा त्रास होत असेल तर असले लेख लिहून सार्वजनिक संकेतस्थळावर टाकू नयेत माणसाने. पुन्हा तेच. मी लेख कोठे टाकावेत याविषयी मी तुम्हाला सल्ला विचारलेला नाही आणि न विचारता सल्ला द्यायचा तुम्हाला अधिकार नाही.

In reply to by मृत्युन्जय

संदीप डांगे Tue, 05/26/2015 - 13:47
आकडेवारी चुकीची आहे म्हणुन मूळ मुद्दाच आपण नाकारु शकत नाही मुद्दा नाकारण्याचा प्रश्नच नाही हे तर मीही आधी म्हटले आहे. पण मुद्दा ज्या आकडेवारीवर आधारित आहे ती मुद्दा मांडणार्‍याच्या दृष्टीकोनातून त्याला सोयिस्कर अशी मांडता येत असेल तर त्याद्वारे एखाद्या विषयाकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्व-पश्चिम इतका बदलू शकतो. एफडीआयचाच मुद्दा घेतला तर दोनच वर्ष आधी एफडीआयला विरोध करण्यात सर्वात पुढे असणारा भाजप आज त्याच फंडांचे आकडे मांडून पाठ थोपटून घेत आहे. असंच एलबीटी, टोलनाके व इतर बाबींबद्दलही म्हणता येतं. तेव्हा मुद्दा काय आहे याची पार्श्वभूमी आणि आकडेवारी सगळंच सोडून देऊन निव्वळ मुद्दा मांडला म्हणून कुणाचे कौतुक मी करू शकत नाही. हेच मत ग्रेट्थिंकर यांच्या धाग्यावर पण मांडले होते. माझ्या मते मोदी सरकार पुर्वीच्याच सरकारचे फेसलिफ्ट आहे. चमकदार बॉडी ग्राफिक्स आणि स्टाईलींग वापरून गाडी सुंदर दाखवता येते पण स्पेक्स तेच आहेत तेव्हा त्याचे काय कौतुक? एक सामान्य नागरिक म्हणून मला 'पॉवर, मायलेज आणि कम्फर्ट' मधे स्वारस्य आहे आणि हे भक्त 'कसला मस्त कलर-फिनिश आहे, हेडलाईटचे डीझाईन कसले झ्याक आहे' म्हणून स्तुतीचे पाट वाहतात. दिल्लीत राजकीय आणि बाबू वर्तुळामधे बरेच काही बदललं आहे (असं म्हटलं जातंय). ते सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोचलं तर अशा मारा केलेल्या जाहिरातींची तितकीशी गरज राहणार नाही असं वाटतं. बाकी तुम्हाला समर्थकांना बिन्डोक म्हटलेलं आवडलेलं दिसत नाही. असो.

In reply to by संदीप डांगे

मृत्युन्जय Tue, 05/26/2015 - 14:39
भाजपाचा एफडीआयला विरोध नव्हता. रिटेल क्षेत्रातल्या परकीय गुंतवणुकीला विरोध होता. भाजपाचा विरोध एफडीआयला १९९१ साली नक्कीच होता, पण नंतर त्यांनी तो सोडुन दिल्याचे दिसते.

In reply to by संदीप डांगे

विनोद१८ Tue, 05/26/2015 - 12:55
मला वाटते हे काम फ़क्त तुम्हीच करु शकता, तशी तुम्हाला सर्वच विषयात चांगलीच गती दिसतेय.

In reply to by मृत्युन्जय

मदनबाण Wed, 05/27/2015 - 11:58
विशेषत: २जी मध्ये तर ममो सरकारला स्वतःची बाजूच अजुन नीट मांडता आलेली नाही. तो घोटळा एवढा मोठा नक्कीच नाही. त्यामागचे अर्थशास्त्र समजुन घेतले पाहिजे. 'मनमोहनसिंग यांनी धमकावले'

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kehdoon Tumhen... :- DJ Aqeel

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी Tue, 05/26/2015 - 14:17
पहिल्या १८ दिवसात १.७४ गुणिले ३३० = ५७४.२ कोटी रुपये सरकारने नकळत नागरिकांकडून काढून घेतले आहेत. असेच पुढेही काढत राहणार. ज्याचा कुठलाही हिशोब देणे सरकारला गरजेचे नाही. यावर जाणकारांचे मत अपेक्षीत आहे.
हे आपणच वर बेमालूम खोटं लिहिलेलं वाक्य आहे हे २४ तासांच्या आत विसरलात वाट्टं?

In reply to by श्रीगुरुजी

संदीप डांगे Tue, 05/26/2015 - 15:02
हा हा हा. यात काय खोटं आहे? तुम्हीच दिलेल्या माहितीवर मी 'माझं मत' मांडलंय वरुन जाणकारांचे मार्गदर्शनही मागीतलंय. परत एकदा: रहने दो बेटा, तुमसे ना हो पायेगा.

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी Tue, 05/26/2015 - 15:23
किती वेळा समजावून सांगायचं? हे तुमचंच वाक्य परत वाचा.
पहिल्या १८ दिवसात १.७४ गुणिले ३३० = ५७४.२ कोटी रुपये सरकारने नकळत नागरिकांकडून काढून घेतले आहेत. असेच पुढेही काढत राहणार. ज्याचा कुठलाही हिशोब देणे सरकारला गरजेचे नाही. यावर जाणकारांचे मत अपेक्षीत आहे.
जी योजना ऐच्छिक आहे व ज्या योजनेसाठी काही नागरिकांनी स्वतःहून स्वखुषीने पैसे भरले आहेत ते पैसे "सरकारने नकळत नागरिकांकडून काढून घेतले आहेत. असेच पुढेही काढत राहणार. ज्याचा कुठलाही हिशोब देणे सरकारला गरजेचे नाही." असं तुम्ही लिहिलं आहे. हे खोटं नाही का? ऐच्छिक योजनेत स्वतःहून भरलेले पैसे आणि सरकारने नकळत नागरिकांकडून काढून घेतलेले पैसे या दोन्हीतला फरक समजावा अशी फक्त अपेक्षाच ठेवू शकतो. फरक समजत नसेल तर इथूनच नमस्कार!

In reply to by श्रीगुरुजी

dadadarekar Fri, 06/26/2015 - 21:28
वरुन ऑर्डर असल्याने ब्यान्का सक्ती करत आहेत. आजच्या लोकसत्तात वाचकांच्या पत्रात आहे. भारतातील डेथ रेट व संभाव्य क्लेम यांचा अभ्याअस करुन फायदा आहे म्हणुनच इन्शुरन्स कंपनीने पॉलिसी देण्या ए मान्य केले आहे.

In reply to by dadadarekar

काळा पहाड Wed, 07/01/2015 - 11:28
वरुन ऑर्डर असल्याने ब्यान्का सक्ती करत आहेत.
बँका सक्ती करू शकत नाहीत आणि करतही नाहीयेत. "वरून ऑर्डर" म्हणजे कुठून? (काही दादा भाई टाईप अर्बन बॅंका आणि पतसंस्था वगळता) बँका आता ऑटॉनॉमस झाल्या आहेत याची आपल्याला कल्पना आहे का? बँकेचं मॅनेजमेंट बँकेच्या हितासाठी निर्णय घेतं. रिझर्व बँक सुद्धा बँकांना "ऑर्डर" देवू शकत नाही नाही तर रघुराम राजन ना आता व्याजाचे दर कमी करा म्हणून बँकांना रिक्वेस्ट करावी लागली नसती. अजून तुम्ही "वरून ऑर्डर" टाईपचा विचार करता म्हणजे डॉक्टर होवून सुद्धा "मेंटॅलिटी" मध्ये फरक पडलेला दिसत नाहीये.
भारतातील डेथ रेट व संभाव्य क्लेम यांचा अभ्याअस करुन फायदा आहे म्हणुनच इन्शुरन्स कंपनीने पॉलिसी देण्या ए मान्य केले आहे.
बर मग? त्यात चुकीचं काय आहे? बँका आणि इन्श्यूरन्स कंपन्या त्यांच्या फायद्याचा विचार करूनच बिझनेस करतात. आणि तेच बरं आहे. नाहीतर "समतेचं राजकारण" करणार्‍यांनी इतर संस्था कशा विकून खाल्ल्या तशी स्थिती इथेही दिसली असती. बाय द वे, डॉक्टरकीला अ‍ॅडमिशन तुम्हाला अभ्यास करून मिळाली (वाटत नाहीये तसं) की वशिला लावून? तुम्ही एक डॉक्टर आणि दुसरे ते "आनंदी" डॉक्टर. दोन्ही डॉक्टर तसे नगास नगच आहेत.

In reply to by काळा पहाड

dadadarekar Wed, 07/01/2015 - 13:55
लोकसत्तामध्ये वाचकांचा पत्रव्यवहार यात ते पत्र आले आहे. शोधून बघ. यदाकदाचित माझ्यावर सक्ती झालीच तर मी पुराव्यासकट पकडुन देईन. इन्शुरन्स बद्दल तुम्ही मला शिकवु नये . कारण मी तीन वर्षे डॉ. म्हणुन इन्शुरन्स कंपनीतही होतो. या स्कीममध्ये कंपनीलाही फायदा होणार आहेच. मग हे काँटेक्ट परदेशी कंपनीला का दिले ? हा मुद्दा तुमच्या लक्षात आलेला दिसत नाही आहे.

In reply to by dadadarekar

काळा पहाड Wed, 07/01/2015 - 15:10
लोकसत्तामध्ये वाचकांचा पत्रव्यवहार यात ते पत्र आले आहे. शोधून बघ.
आता कुठल्या तरी बँकेतल्या कुठल्या तरी क्लार्क किंवा मॅनेजरनं कुठल्यातरी माठाला शेंडी लावली तर ती बँकांची पॉलिसी म्हणून समजायची? भेंडी काही लॉजिक बिजिक असतंय का नाही? इथं आम्ही आधार कार्ड घ्यायला जात नै, ते इन्शूरन्स मॅन्डॅटरी म्हटल्यावर तिथं मॅनेजरची बिनपाण्यानं करणार नै का? ही असली उदाहरणं तुम्ही आम्हाला सांगणार होय? मग झालंच तर. (अवांतरः आमच्या कडे लोक्सत्ता येत नै).
यदाकदाचित माझ्यावर सक्ती झालीच तर मी पुराव्यासकट पकडुन देईन.
कुणीही देईल जर असं सक्ती वगैरे काही कोणी बोललं बँकेत तर.
इन्शुरन्स बद्दल तुम्ही मला शिकवु नये . कारण मी तीन वर्षे डॉ. म्हणुन इन्शुरन्स कंपनीतही होतो.
मग काय शिकलात तिथं? इन्श्युरन्स कंपनी जनतेच्या फायद्यासाठी काम करते वगैरे काही शिकवलं का? मला तुमच्या वाक्याचा अर्थ लागलेला नाही. कारण इन्श्युरन्स कंपनीनं फायदा कमवून काहीतरी पाप केलं किंवा सरकारनं त्यांना धंदा देवून काहीतरी पाप केलं असा तुमचा सूर दिसतोय.
या स्कीममध्ये कंपनीलाही फायदा होणार आहेच. मग हे काँटेक्ट परदेशी कंपनीला का दिले ? हा मुद्दा तुमच्या लक्षात आलेला दिसत नाही आहे.
अहो जो जास्त फायदेशीर बिझनेस बेनेफिट्स देईल त्यालाच बिझनेस जातो. आमच्या कंपनीचे सगळे क्लायंट परदेशी आहेत. ते आम्ही त्यांना पैसे खिलवतो म्हणून नव्हे तर आमच्या कामाचे रेटस त्यांना परवडतात म्हणून. भारतीय कंपन्या एकतर एवढ्या मोठ्या ट्रान्सॅक्शन्स ला तयार नसतील किंवा त्यांना बिझनेस बेनेफिट्स दिसत नसतील किंवा त्यांची तेवढी कपॅसिटी नसेल. हजार कारणं आहेत त्यातलं कोणतही असू शकेल. परदेशी कंपनीला न देता रिलायन्सला दिलं असत, भारती ला दिलं असतं तर तुम्ही उलट्या बाजूने बोंबलला असता. कॉन्ट्रॅक्ट कुणाला द्यावं हा सरकारच्या अखत्यारितला निर्णय आहे आणि तो निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य त्यांना आहे.

In reply to by काळा पहाड

dadadarekar Wed, 07/01/2015 - 15:30
इन्शुरन्स कंपन्या फायदा कमवतात म्हणजे त्या पाप करतात असे मी बोललो नाही. इन्शुरन्स कंपन्यानाही फायदा व्हायला हवा. पण या प्रकरणात खटकले हे की मी परदेशातून मेक इन इंडियाच्या अंतर्गत इथे व्यवसाय खेचुन आणीन हे म्हणणारा पंतप्रधान इतका मोठा इन्शुरन्स प्लॅको, भारतातील कंपन्या सक्षम असताना , कोणतीही पारदर्शक प्रक्रिया न राबवता धाडदिशी परदेशी क्म्पन्रीला देतो. बाय द वे , तुमची डिग्री , कॉलेज समजू शकेल काय ?

In reply to by dadadarekar

काळा पहाड Wed, 07/01/2015 - 16:23
बाय द वे , तुमची डिग्री , कॉलेज समजू शकेल काय ?
आँ. मी तुम्हाला केव्हा सांगितलं माझी डिग्री आणि कॉलेज सांगेन म्हणून? तुम्हाला काय माहिती माझी डिग्री झालीय का नाही? भेंडी जिथं मी माझं नाव सांगत नै तिथं बाकीच्या गोष्टी सांगेन होय? तुम्हाला डिग्री आणि कॉलेज सांगायला काय मी सांगितलं होतं का?

In reply to by काळा पहाड

dadadarekar Wed, 07/01/2015 - 17:34
आणि ब्यान्क म्यानेजर लबाड व क्लाएंट माठ आहे , हे तुम्हे जजमेंटही दिलेत. ...... तुमच्या जजमेंटचा स्पीड पाहून आमचेच काय , साक्षात रामशास्त्रांचेही डोळे पाणावले !

In reply to by dadadarekar

काळा पहाड Wed, 07/01/2015 - 17:56
कमिटी नेमा, चौकशी करा, रिपोर्ट लिहा, मोर्चा काढा अशा गोष्टीत आपण अडकत नसतो दादा. साधं लॉजिक आहे. जो अशा गोष्टीला खरं मानून बळी पडतो तो माठच असणार. सरकार कुठल्याही गोष्टीला ज्यात जनतेकडून पैसे घ्यायचे असतात त्याबद्दल अशा पद्धतीनं जबरदस्ती करत नाही. ती करायची तर ते सर्व्हिस टॅक्स वाढवतात, वेगळ्या प्रकारचे टॅक्स लावतात. सरकारची कोणतीही गोष्ट अनिर्बंध (हॅफॅझार्ड) पद्धतीनं केली जावू शकत नाही. प्रत्येक गोष्टीला कायद्याच्या चौकटीत बसवून केल्याशिवाय नोकरशहा सुद्धा हल्ली ती स्वीकारत नाहीत. नाहीतर त्यांचा 'पारीख' होवू शकतो. एखादा ट्रॅफिक हवालदार पैसे खातो तो सरकारी पॉलिसी म्हणून खात नाही.

In reply to by काळा पहाड

dadadarekar Wed, 07/01/2015 - 14:24
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज इथून फ्री सीटवर अ‍ॅडमिशन घेऊन मिळवलेली आहे. तुझी डिग्री व कॉलेजचे नाव सांगणार का ?

In reply to by खंडेराव

मृत्युन्जय Tue, 05/26/2015 - 11:34
१. युरेनियम ची भारतातील उपलब्धता अणु उर्जा उत्पादनात महत्वाची भूमिका बजावते. हे युरेनियम उपलब्ध करवुन देणे आणी त्यावर निर्बंध आणणे हे सरकारचे कार्य आहे. वेळोवेळी गरज ओळखुन त्यानुसार सरकार निर्बंध वाढवते / कमी करते. सध्याची वाढलेली क्षमता भारताची अंतर्गत युरेनियम उपल्ब्धता दर्शवते अथवा हे दर्शवते की सरकारने निर्बंध कमी केले असावेत. नक्की काय अहे ते माहिती नाही. २. युरेनियमची आयात करण्याचे जे करार झाले आहेत ते दीर्घकालीन आवश्यकता लक्षात घेउन केलेले आहेत. ३. युरेनियम जास्त प्रमाणात उपलब्ध करुन दिले म्हणजे सरकारने काही खुप मोठे कार्य केले आहे असे मात्र नाही. हा निर्णय योग्यच आहे असे कोणीही पुर्ण माहितीशिवाय छातीठोकपण सांगु शकत नाही. प्राप्त परिस्थितीत कदाचित ममो सरकारने देखील असेच निर्णय घेतले असते. अपुर्‍या माहिती अभावी यात मोदी सरकारचे नक्की काय श्रेय हे सांगता येणार नाही. अवांतरः १. सध्याची भारताची अणू उर्जा क्षमता, उत्पादन आणि प्रकल्प यांच्याबद्दल मला फारशी माहिती नाही त्यामुळे पास. २. माझी माहिती ऐकीव / अपुर्‍या ज्ञानावर आधारलेली आहे. त्यामुळे चुकीची असु शकेल.

In reply to by मृत्युन्जय

खंडेराव Tue, 05/26/2015 - 12:39
विज उत्पादन हे असे एका वर्षात वाढत नाही, कोणतेही सरकार आले तरी. याला दीर्घकालिन प्रयत्न लागतात. जे काय वाढले वर्षभरात, ते सर्वच मोदी सरकारला देणे म्हणजे चावटपणा आहे.

खंडेराव Tue, 05/26/2015 - 11:32
थेट परकीय गुंतवणूक २०१३-१४ या वर्षात २०.८ अब्ज डॉलर्स होती. २०१४-१५ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात हीच गुंतवणूक २८.८ अब्ज डॉलर्स आहे.
२०१३-१४ मधे ही २४.८ अब्ज होती, जरा खात्री करुन लिहित चला http://dipp.nic.in/English/Publications/FDI_Statistics/2013/india_FDI_December2013.pdf

मदनबाण Tue, 05/26/2015 - 12:14
टोल मुक्तीचे काय झाले ? आजही टोल नाक्यांचे व्यवहार "पारदर्शक" का झाले नाहीत ? टोल घेतले जाणार्‍या रस्त्यांची अवस्था उत्तम असते काय ? महागाई खरंच कमी झाली ? नक्की ? सामान्य माणसाचे साधा डाळ भात खाण्याचे वांदे आहेत,कारण १०० रु खाली दाळ मिळणे कठीण झाले आहे. संदर्भ :- डाळींचे भाव कडाडले; वर्षभरात ६४ टक्के वाढ डाळींचे दर गगनाला भिडले, किलोमागे मोजावे लागतायेत १३० रु डाळींना महागाईचा ‘तडका’ डाळींची आयात करणार? जाता जाता :- नक्की खरे खोटो माहित नाही,पण निवणुकीच्या वेळी १०० दिवसात काळा पैसा परत आणु आणि प्रत्येकाच्या { हिंदूस्थानी व्यक्तीच्या} अकाउंट मधे १५ लाख जमा करु असे काहीसे अश्वासन दिले गेले होते... खरचं अस काही अश्वासन दिले गेले होते काय ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie Goulding

In reply to by मदनबाण

संदीप डांगे Tue, 05/26/2015 - 12:58
प्रत्येकाच्या { हिंदूस्थानी व्यक्तीच्या} अकाउंट मधे १५ लाख जमा करु असे काहीसे अश्वासन दिले गेले होते उत्तरः https://www.youtube.com/watch?v=Wo9EN-dlZns