मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

असह्य हा उकाडा...

बाप्पू · · काथ्याकूट
सध्या उकाड्यामुळे खूप हैराण झालो आहे. आणि माझे घर अश्या ठिकाणी आहे जिथे बाहेरून भरपूर हवा येण्यासाठी विशेष अशी योजना नाहीये. खिडकी आणि दरवाजे १५ ते २० मिनिटे जरी लावून घेतले तर आतील तापमान आणि बाहेरील तापमान यामध्ये जवळपास ८-१० सेल्सिअस चा फरक पडतो. कित्येकदा घराला लॉक करून थोडा वेळ बाहेर गेलो आणि आल्यावर दरवाजा उघडला कि जणू काही भट्टी मध्ये शिरलोय असे वाटते... या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास रात्री झोपताना होतोय. रात्रभर इतके उकडते कि झोप च येत नाही.. फ्रीज खोलून आतमध्ये स्वताला कोंडून घ्यावे असे वाटते.. ( एकदा असा प्रकार चक्क केला देखील) . गेले ४-५ दिवस पंखा लावून झोपण्याचा प्रयत्न केला शांत झोप लागली खरी पण सकाळी उठल्यावर पायामध्ये खुप वेदना सुरु झाल्या.. मग आठवले कि मागे एकदा डॉक्टरांनी पंख्याचा वापर करू नका असे सांगितले होते. त्यामुळे आता पंख्याचा वापरावर देखील मर्यादा आल्या आहेत. तर थोडक्यात सांगायचे झाले तर मी सध्या तोंड दाबून बुक्यांचा मार खातोय. या निमित्ताने घरी नवीन ए सी किंवा कुलर खरेदी करावा म्हणतोय. पण कधीही या दोन्ही गोष्टी मी आजतागायत खरेदी केल्या नाहीत. ए सी दररोज ऑफिस मध्ये वापरतो पण त्याबद्दल काहीहि माहिती नाही. आणि कुलर आत्तापर्यंत फक्त १-२ नातेवाईकांकडे पहिला आहे. पण त्याचा आवाज इतका मोठा होता कि मी विचारलेला प्रश्न त्यांना ऐकू येणार नाही असे समजून मी प्रश्न विचारण्याच्या भानगडीत पडलो नाही. आज या दोन्ही गोष्टीपैकी एकाची निवड करण्याचा प्रसंग आला . त्यानिमित्ताने पडलेले काही प्रश्न - १ ) VIMP प्रश्न - पंखा आणि पायांचे दुखणे याचा काय सबंध ? २ ) बेड रूम १४० स्क्वेअर फुट आहे. तर तिथे ए सी घेणे चांगले कि कुलर ? ३ ) कुलर जर खरेदी केला तर त्यापासून चांगले output मिळवण्यासाठी काय काय requirement आहेत ? ४ ) ए सी जर खरेदी केला तर त्यापासून चांगले output मिळवण्यासाठी काय काय requirement आहेत ? ५ ) ए सी चे किंवा कूलर्स चे चांगले मॉडेल कोणते ? आपले अनुभव सांगितले तर फार मदत होईल ६ ) कुलर हवेमध्ये humidity निर्माण करतात म्हणजे नेमके काय ? याचा माझ्यावर किंवा रूम मधील इतर वस्तूंवर काय परिणाम होईल ?

वाचने 41152 वाचनखूण प्रतिक्रिया 209

यसवायजी 25/03/2015 - 22:50
बाकी नंतर बोलूच। पण,फ्रीज खोलून आतमध्ये स्वताला कोंडून घ्यावे असे वाटते.. ( एकदा असा प्रकार चक्क केला देखील) हे कसं केलंत ते सांगा. ("दार उघडून" अशी उत्तरें फाट्यावर मारण्यात येतील)

पॉइंट ब्लँक 25/03/2015 - 22:55
कुठलं एसी आणि कूलर घेवून बसलाय. रातच्याला छतावर पाणी शिंपडा, थंड पाण्यानं आंघोळ करा आणि द्या ताणून. आन पाणी कमी असल तर छतावर आंघोळ करून टाका, एका दमात दोन्ही थंड ;)

In reply to by पॉइंट ब्लँक

बाप्पू 25/03/2015 - 23:27
मी पहिल्या मजल्यावर राहतो शेवटच्या नाही.. त्यामुळे छतावर पाणी शिंपडणे, आंघोळ करणे :)) किंवा कुंड्या लावणे शक्य नाहीये :(

In reply to by बाप्पू

यसवायजी 26/03/2015 - 21:45
छतावर झोपायला जाऊ शकत असाल तर बेष्ट. चैतन्यनगरात रहायचो तेंव्हा असेच करायचो. मस्त वारे असते कात्रज घाटातून येणारे. पहाटे तर थंडी वाजायची.

खटपट्या 25/03/2015 - 23:13
जाड चादर पाण्यामधे भिजवून, पिळून त्याने खिडक्या झाकण्याचा प्रयत्न करा. बाजारात वाळाचे पडदे मिळतात, ते वापरा. तुम्ही एकदम वरच्या माळ्यावर राहात असाल तर छतावर कुंड्या ठेवुन त्यात झाडे लावा (पाणि देताना सावधान. छत गळके असल्यास त्रास होईल.) बाकी एसी, कुलर साठी मान्यवरांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

आजानुकर्ण 25/03/2015 - 23:15
८-१० सेल्सिअस
पत्र्याचे वगैरे छत आहे काय? कौलारू घर असेल तर घराच्या आत प्लायवूड वा तत्सम सीलिंग केले तर उन्हाचा त्रास थोडा कमी होतो. अर्थात सर्व घराला असे सीलिंग करुन घेणे खर्चिक प्रकार आहे.

In reply to by आजानुकर्ण

बाप्पू 25/03/2015 - 23:31
नाही हो . सिमेंट बिल्डिंग मध्येच राहतो. पण बिल्डींग च्या चार हि बाजूला इतर बिल्डींग फार जवळ असल्याने हवा खेळती राहत नाही. आणि घराला फक्त एकाच खिडकी आहे आणि दरवाजा पण अर्थातच एकच आहे. त्यामुळे ताजी हवा येण्याचे हे दोन च मार्ग आहेत. आणि रात्री ते बंद करावे लागतात. खिडकी उघडी ठेवू शकतो पण त्यामुळे जास्त काही फरक नाही पडत .. :(

In reply to by बाप्पू

टीपीके 26/03/2015 - 02:39
डोंबिवलीला राहता का? नाही म्हणजे 'बिल्डींग च्या चार हि बाजूला इतर बिल्डींग फार जवळ असल्याने' म्हणता म्हणून विचारले

In reply to by बाप्पू

तुम्ही लिहिलेल्या वर्णनावरून तुमचे घर धनकवडी, बालाजीनगर भागात असण्याची शक्यता वाटते. कुठलेही नियम न पाळता एकमेकांच्या अत्यंत जवळ इमारती बांधल्या आहेत तिथे. अनेक इमारतींमध्ये शिरतानाच एकदम कोंदट वास येतो. बर्‍याच इमारतींच्या बहुतांश भागाला उन कधीच मिळत नाही.

In reply to by सूड

बाप्पू 01/04/2015 - 20:18
अहो हा माझा पहिलाच शतकी धागा झाल्यामुळे बर्याच प्रतिसादांना मी उत्तर नाही देऊ शकलो exact बालाजीनगर किंवा धनकवडी मध्ये नाही राहत. पण तेहून जवळच असलेल्या कात्रज मध्ये राहतो. इथे पण काही भागात हीच परिस्थिती आहे. पण आपण म्हणल्याप्रमाणे बालाजीनगर धनकवडी परिसरात अश्या असंख्य इमारती आहेत जिथे हवा आणि सूर्यप्रकाश अपवादानेच येतो हे मी पाहिलेले आहे . मी राहतो तिथे देखील अशीच परिस्थिती आहे. पण त्यांच्या इतकी भीषण नाही. आणि पहिल्या मजल्यावर राहत असल्याने मला इतका त्रास होत नाही. पण बालाजीनगर धनकवडीमधील लोकांचा विचार केला कि अंगावर काटा येतो. खरच अशक्य आहे. कोंबड्यांची खुराडी च जणू ....

In reply to by बाप्पू

हरकत नाही. मी स्वतः ६ महिने पुण्याईनगर मध्ये राहिलोय मित्रांबरोबर शेअरींगमध्ये. नंतर पद्मावतीमध्ये राहू लागलो तेव्हा खूप बरे वाटत असे. भारती विद्यापीठाच्या मागे अन पिआयसिटीच्या बाजूलाही भाड्याचे घर शोधण्याचा प्रयत्न केला होता पण तो भाग राहायला म्हणून अजिबात आवडला नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

बाप्पू 01/04/2015 - 20:36
मला बालाजीनगर मध्ये २ दिवस राहण्याचा अनुभव आहे, कॉट बेसिस वर एका होस्टेल मध्ये राहत होतो. परंतु तेथील वेगवेगळ्या अडचणींमुळे २ च दिवसात थेथून पळ काढला., ६००० रुपये दिले होते दोन महिन्यांचे भाडे व दिपोसिट म्हणून. त्यावर पाणी सोडून जावे लागले. तेथून मुक्काम हलवला तो आंबेगाव ला काकांकडे. पण ते दोन दिवस अत्यंत भयाण होते. त्या अनुभवावर एक लेख लिहिवा असे मनात आलेय.. लवकरच वाचायला मिळेल आपणा सर्वांना

In reply to by बाप्पू

ग्रेटथिंकर 06/04/2015 - 17:27
कात्रज गावठानात जाम दाटीवाटी झाली आहे.गेलाबाजार लवासात एखादे घर घेऊन टाका असे सुचवतो.

In reply to by टीपीके

उगीच आमच्या डोंबिवलीला बदनाम करू नका. आम्हाला शेजारांच्या घरात काय 'शिजतंय' हे पाहायाची भारी हौस, म्हणून एकमेकाला खेटून राहतो. *lol*

बाप्पू 25/03/2015 - 23:24
अहो कोंडून घेतेले म्हणजे आगदी शब्दश: अर्थ घेऊ नका. तर झाले असे कि त्यादिवशी खूप च जास्त गरम होत होते आणि पंखा चालू केल्यानंतर देखील गरम हवा येत असल्यामुळे मी घामाघूम झालो होतो. गार पाणी पिण्यासाठी म्हणून फ्रीज जवळ गेलो आणि हि आयडिया सुचली. त्यावेळी होम मिनिस्टर घरी नव्हत्या, आणि फ्रीज मध्ये देखील काही विशेष समान ठेवलेले नव्हते. मी फ्रीज मधले सगळे ट्रे बाहेर पटापट काढले. फ्रीज मध्ये आता बर्यापैकी रिकामी जागा झाली असल्याने मी थोडा वेळ तिथे बसलो होतो. विचित्र वाटत असले तरी मी तो उकाड्यामुळे वैतागून हा विचित्रपणा केला होता. हे काहीसे असे दिसले असेल चित्र जालावरून साभार . d

रेवती 25/03/2015 - 23:28
मलाही पंखा सहन होत नाही. हात व पाय असह्य दुखतात याचा अनुभव आहे. त्यातल्यात्यात उपाय म्हणून जरा जास्त पाणी पिऊन, पंखा लावून झोपणे. पांघरुणाशिवाय न झोपणे वगैरे. तुम्ही म्हणताय तो गडगडाटी कूलर खूप जुन्या पद्धतीचा भारतातल्या घरी आहे. तो असण्यापेक्षा नसलेला बरा! पण आता नवीन प्रकारचे कुलर्स असतील ना, ते इतका आवाज करणारे नसतील असे वाटते. माझ्या सासरी एसी ला पर्याय म्हणून जो कुलर घेतला होता त्याचा आवाज बराच कमी येत असे त्यावरून म्हणातिये. शिवाय आमच्या घरातील त्यावेळच्या बाल मंडळींनी पाणी ओतण्याच्या ठिकाणातून पेन, पेन्सिली, स्टिकर्स, मोडक्या खेळन्यांची चाके वगैरे बहुमुल्य प्रकारही त्यावरील ऑन ऑफ च्या स्टिकरसहित आत टाकले होते तरी तो चालू होता. नंतर मग एसी लावून घेतला.

मला सुचलेले काही उपाय
  • संध्याकाळी गार पाण्याने आंघोळ करा.
  • झोपण्यापूर्वी कांदा फोडून त्याचे बारीक तुकडे तळपायावर घासा (हा पारंपारिक उपाय आहे).
  • गार ताक पिणे हेही लाभदायक ठरू शकते.
यावरून आठवले - या गरमीला काय करावे बॉ?

नांदेडीअन 25/03/2015 - 23:41
४-५ हजारात चांगले कुलर मिळतात बाजारात. मी वर्षभरापूर्वी बजाज टॉर्क हे कुलर घेतले होते. मस्त आहे, एकदम हलके आणि जास्त आवाज न करणारे. पण कुलरची मागची बाजू खिडकी किंवा बाथरूमच्या दरवाज्याकडे राहील असे बघा, नाहीतर रूममध्ये दमटपणा येतो.

In reply to by बाप्पू

मुंबई किंवा चेन्नइ येथे बाहेरचे लोक गेल्यावर त्यांना दमटपणाचा जो अनुभव मिळतो तो शब्दांत वर्णन करता येणे अवघड आहे.

In reply to by मोहनराव

बाप्पू 26/03/2015 - 19:49
या उपायाने नक्की फायदा होईल. कारण मी जर हा उपाय केला तर मला घराबाहेर च झोपावे लागेल.. आणि बाहेर उकाड्याचा काहीच त्रास होणार नाही.

सुनील 26/03/2015 - 08:59
काही उत्तरे -
१ ) VIMP प्रश्न - पंखा आणि पायांचे दुखणे याचा काय सबंध ?
पास
२ ) बेड रूम १४० स्क्वेअर फुट आहे. तर तिथे ए सी घेणे चांगले कि कुलर ?
तुम्ही जर मुंबईत/मुंबईजवळ (समुद्रकिनार्‍यालगत) राहात असाल तर कूलरपेक्षा एसी बरा पडेल
३ ) कुलर जर खरेदी केला तर त्यापासून चांगले output मिळवण्यासाठी काय काय requirement आहेत ?
पास
४ ) ए सी जर खरेदी केला तर त्यापासून चांगले output मिळवण्यासाठी काय काय requirement आहेत ?
तुमच्या रूमची साइझ पाहता किमान १ टनाचा एसी तरी लावावा लागेल. एसी भिंतीवर वरच्या बाजूस लावा. बाहेरून हवा येण्याचे सर्व मार्ग (खिडक्या-दारे) पूर्णपणे बंद होतील हे पहा. एसी शक्यतो BEE ५ स्टार्सचा घ्या. तापमान २४-२६ डिग्री सेल्सियसवर सेट करा.
५ ) ए सी चे किंवा कूलर्स चे चांगले मॉडेल कोणते ? आपले अनुभव सांगितले तर फार मदत होईल
कूलर्स - पास एसी - बरेच आहेत जसे की विदेशींमध्ये सॅमसंग, हिताची आणि देशींमध्ये वोल्टास
६ ) कुलर हवेमध्ये humidity निर्माण करतात म्हणजे नेमके काय ? याचा माझ्यावर किंवा रूम मधील इतर वस्तूंवर काय परिणाम होईल ?
हवेत दमटपणा वाढतो. तापमान फार नसले तरी उकाडा जाणवतो. अस्वस्थता वाढते (किमान माझी तरी!). इतर वस्तूंवर काय परिणाम होतात ते ठाऊक नाही/

स्पा 26/03/2015 - 12:53
काही उपाय झोपण्या पूर्वी बर्फ घातलेल्या पाण्यात पाय बुडवून बसा , शरीराचे तापमान झटकन खाली येईल झोपण्यापूर्वी मनगटावर ,मानेभोवती,थंड रुमालाच्या पट्ट्या ठेवा.बरंच फरक पडेल तळपायाला , डोळ्यांना , कपाळाला "कैलास जीवन " चोपडा तळपायाला काशाची वाटी घेऊन खोबरेल तेल लावून अभ्यंग करा , पाय जितके काळे होतील तितकी हिट बाहेर पडेल

In reply to by स्पा

+++१११ टु पांडुब्बा! मलाहि उन्हाळयाचा त्रास होतोच. आमच्या कामामुळे. बाहेर उन्हातून जायचे .कधिही केंव्हाही आणि कुठेही..आणि वर परत या उन्हाळ्याच्या सिझन मधे जास्तीत जास्त होमहवनाची कामे असतात. लग्न/मुंज/वास्तुशांत..मग आंम्ही बाहेर एक,आणि यजमान घरी ही दुसरी हिट-खातो. यावर मी करत असलेले काहि मस्त फलित देणारे उपाय.. त्यातला बर्फपाण्याच्या बादलीत पाय बुडवुन बसणे..हा वर आलेलाच आहे. शिवाय रोज गुलकंद खाण्यात ठेवणे..(तो जर पत्रीखडीसाखर्,वापरून आणि गावरान गुलाबापासून घरीच केलात्,तर अतीउत्तम!) उन्हातून आल्यावर लिंबा एव्हढा लाल गुळाचा खडा खाऊन..वर दोन तांबे (साधे) पाणी पिणे. आणि चेहेरा, पायाचे तळवे..याला मुलतानी माती(गोपिचंदन..) याचा लेप-करणे. हे नित्य केलं...तर ४० डिग्रीच्या वरचा उन्हाळापण बरा जातो.

In reply to by स्पा

आयुर्हित 26/03/2015 - 15:33
पेट को रखो नरम और पैर को रखो गरम, सर को रखो ठंडा नही तो पडेगा दंडा| असेच ऐकले आहे... त्यामुळे "झोपण्या पूर्वी बर्फ घातलेल्या पाण्यात पाय बुडवून बसा" हे जरा चुकीचे वाटते. पंखा चालवण्याने पाय थंड होतात व त्यामुळे दुखतात. माझ्या मते आपण कंबरेपर्यंत पांघरून घेवून झोपावे, जेणेकरून पाय दुखणार नाही.

In reply to by आयुर्हित

स्पा 26/03/2015 - 17:51
पेट को रखो नरम और पैर को रखो गरम, सर को रखो ठंडा नही तो पडेगा दंडा|
काका , ऋतूनुसार वागावे हो, कोणी काहीतरी म्हटले म्हणून तेच बरोबर असे नसते. आईस बकेट हि सुद्धा खूप प्रसिद्ध उपचार पद्धती आहे , हवतर स्वत: करून बघा. आणि स्वताला झेपेल इतके गार पाणी घ्यावे . एवढे तर डोके लावू शकतो णा

In reply to by स्पा

आयुर्हित 06/04/2015 - 10:03
माझ्या मते आईस बकेट ही डोक्यावर घेतात. बऱ्याच सेलेब्रीटींनी डोक्यावरून घेतल्याचे फोटो पाहण्यात आहेत. पण कोणी पाय बुडवायला वापरल्याचे वाचले/ऐकले नाही. असल्यास त्यांचे अनुभव वाचायला नक्कीच आवडतील.

In reply to by वेल्लाभट

स्पा 27/03/2015 - 13:19
बाहेर उकडतय म्णुन शरीराचे तापमान वाढवा, हा अघोरी उपाय झाला वेल्ला साहेब इतकेही कळु नये म्हणजे कमाल आहे. शरिराचे तापमान नाॅर्मल राहिले पाहिजे, उकाड्याने ते वाढलेले असते.

In reply to by स्पा

स्पा 27/03/2015 - 13:21
बाहेर ५० डिग्री तापमान असेल तर आतले तापमान तुम्ही ७० करुन गार गार वाटतय म्हणाल का :D असो मी काही डाॅक्टर नाही. त्यामुळे काॅमन सेन्स लावता आला तर पहा

In reply to by वेल्लाभट

सुबोध खरे 27/03/2015 - 19:36
वेल्लाभट साहेब शरीराचे तापमान ९८" F ते १००"F किंवा ३८ते ३९ सेल्सियस या अत्यंत कमी कक्षेत ठेवले जाते. जेंव्हा बाह्य तापमान वाढल्याने आपल्या शरीराचे तापमान वाढू लागते तेंव्हा शरीर घाम वाळवण्याच्या उपायाने आपले आतील ( CORE ) तापमान टिकवून ठेवते. घाम वाळून जसे शरीराचे तापमान ९८' f ला येते तेंव्हा आपल्याला घाम येणे बंद होते. तेंव्हा शरीराचं तापमान खाली आलं की जास्त उकडणार नाही उलट आपल्याला बरे वाटू लागते जसे आपण कडक उन्हातून थंड सावलीत येतो तेंव्हा. थंडीत जेंव्हा बाह्य तापमान कमी असल्याने जसजशी आपल्या शरीरातून उष्णता गमावली जाते तसे वेगवेगळ्या उपायांनी( त्वचेचे रक्ताभिसरण कमी करून किंवा कुडकुडून ( स्नायूंची वेगाने हालचाल होऊन) शरीरात उष्णता राखली किंवा निर्माण केली जाते. या तर्हांनी शरीराचे तापमान अगदी कमी कक्षेत( NARROW RANGE) नियंत्रित ठेवले जाते.

एक घरगुती उपाययोजना आम्ही रात्री चादरी भिजवुन फरशीवर पसरवायचो आणि छताचा पंखा चालु ठेवायचो. बेडवर झोपायचो... वातावरणात थंड राहण्यास ब-यापैकी मदत होते ! हा उपाय घाटावरचा आहे. मुंबईच्या दमट वातावणात कितपत यशस्वी होईल सांगता येत नाही.

मनिमौ 26/03/2015 - 14:35
हा उपाय चालणार नाही. एसी हा उत्तम पर्याय आहे.कैलास जीवन ने तलखी कमी होईल. अजुन एक उपाय धने जिरे पाण्यात रात्री भिजवून ते पाणी पिणे

In reply to by मनिमौ

योगी९०० 26/03/2015 - 16:31
अजुन एक उपाय धने जिरे पाण्यात रात्री भिजवून ते पाणी पिणे ऑऑऑ ..? रात्री भिजवायचे तर प्यायचे केव्हा? सकाळी पिले तर त्याचा effect पुढील रात्रभर राहील काय?

In reply to by कपिलमुनी

खंडेराव 31/03/2015 - 22:23
याचा हिशोब करुन घ्या. नाहीतर कुलर त्रासदायक ठरतात. अगदी पुण्यातही आम्हाला रात्री ३ वाजता बंद करावा लागायचा आद्रता वाढली की. अर्थात आता जो आहे सिंफनी त्याला टायमर आहे.

तिमा 26/03/2015 - 17:42
तुमच्या एकच खिडकीच्या समोरची भिंत जर मोकळी असेल तर तिथे एक एक्झॉस्ट फॅन लावा. त्याच्या समोर खिडकीत पण एक लावा, पण तो हवा आंत येईल या पद्धतीने. दोन्ही फॅन रात्रभर चालू ठेवा. चांगले वायुवीजन होईल व घरांत हवा खेळून थंडावा वाढेल. हा उपाय एकाकडे केलेला पाहिला आहे. नाहीतर एसीशिवाय पर्याय नाही. १४० चौ. फूट रुमला १.५ टनाचा तरी घ्यावा लागेल.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सुबोध खरे 26/03/2015 - 18:40
चिमणराव आमच्या १. ५ टनाच्या एल जी विंडो ए सी चे १८५० वॅट आहेत म्हणजे दर तासाला १५ रुपये बिल आहे रात्री साधारण ५ तास चालतो ( चालू बंद होत) आणी आम्ही दुपारी २ तास लावतो. स्वच्छ हिशेबाने एक दिवसाचे ५० रुपये होतात. म्हणजे महिन्याचे ए सी चे १५०० रुपये होतात. तीन महिने १५ मार्च ते १५ जून चालविला तर ४५०० रुपये होतात. कोणत्याही थंड हवेच्या ठिकाणी इतके पैसे दोन दिवसाचेच होतात. त्यामुळे उन्हाळ्यात मुंबई सोडून आम्ही कुठेही जात नाही. ( शिवाय मुंबईत लोड शेडींग नाही). स्वतःचे थंड घर यासारखे सुख नाही. बायको कटकट करयला लागली तर दोन दिवस बाहेरून जेवण मागवा. तरीही खूपच स्वस्त पडते.

In reply to by आदूबाळ

सुबोध खरे 31/03/2015 - 19:26
माझा पहिला ए सी १९९८ मध्ये विशाखापट्टणमला घेतला रुपये १९,०००/- होता. तो २०१४ मध्ये बॉडी गंजल्यामुळे बदलला. दुसरा ए सी मुलांच्या खोलीला २००५ साली लावला आहे तो अजून उत्तम चालू आहे. डेप्रीसिएशन काय झालं ते तुम्ही काढा. आम्ही फक्त एसी ची थंड हवा एप्रीशीएट करतो.

In reply to by प्रचेतस

सुजाताकडची हापूस अन् सीताफळ अन् बदाम-केशर!! जाऊ द्या!! शनिवारपर्यंत नको ती आठवण. (हडपसरला पण एक आहे शाखा-नोबेल समोर, पण मजा नाय)

In reply to by बाप्पू

हेमन्त वाघे 26/03/2015 - 20:44
बरोबर आहे पुणे हा त्यांच्या attitude मुले देश आहे. आम्ही मुंबई नामक ग्रहावर राहतो. इकडे सुद्धा पुण्यासारख्या छोट्या देश बद्दल काहीच्या काही आईकू येते.

In reply to by सूड

ग्रहाचा दर्जा काढुन घेतलेला ना रे त्या आपल्या देशानी? त्यांच्याकडे अपडेट झालेली दिसत नाही माहिती. अज्ञानात सुख म्हणतात ते हेच्च बर्र का. =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

बाप्पू 26/03/2015 - 23:08
आमच्या पुणे देशातील इतिहासाच्या पुस्तकातील हा उतारा. पान क्रमांक - १९८ मुंबई नावाचा ग्रह (लघु ) हजारो वर्षापूर्वी अवकाशात चंद्राभोवती फिरायचा. परंतु खगोल शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार या ग्रहाची दुसर्या एका लघु ग्रहास धडक बसली. या धडकेमध्ये मुंबई ग्रहाची गुरुत्वाकर्षण शक्ती खूप क्षीण झाली आणि तो ग्रह तुकडे तुकडे होऊन विखुरला. हे विखुरलेले तुकडे पृथ्वी नावाच्या ग्रहावर भारत देश्याच्या हद्दीत आरबी समुद्रात पडले. अश्या तुकड्यांना समुद्रात बेटाचे स्वरूप प्राप्त झाले असल्याने त्याला आता बेटांचे शहर असे देखील ओळखले जाते. जगातील महान देशांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्या पुणे देश्याच्या नजीकच हे शहर अस्तित्वात आल्यामुळे या शहराला देखील आता लोक थोडेफार महत्व देऊ लागलेत. परंतु या देशातील लोक अजून देखील हे मानायला तयार नाहीत कि आता मुंबई हि भारत देशाचा भाग आहे. आजदेखील काही लोक मुंबई हा ग्रह आहे असे म्हणून इतर देशांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न करतात. पण पुण्यातील लोकांनी वेळोवेळी झालेल्या वैचारिक युद्धात त्यांना पाणी पाजले आहे. ;) त्याला असलेली ग्रहाची मान्यता अंतरविश्व खगोल संशोधन संस्थेने काढून घेतली आहे त्यामुळे त्यांनी आता आपल्या प्रदेशाला ग्रह संबोधणे टाळावे आसे परिपत्रक या संस्थेने कित्येकदा काढून देखील हे लोक सुधरायला तयार नाहीत.

In reply to by बाप्पू

बाप्पू 26/03/2015 - 23:16
आणखी एक उतारा आहे मुंबई बद्दल आमच्या पुस्तकामध्ये पान नंबर २०७ पुणे देशातील प्रगती पाहून भारत देशातील बिहार आणि उत्तर प्रदेश इ प्रांतातील अनेक लोक पुणे देशात स्थायिक होण्यास आणि व्यवसाय करण्यास येण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु पुण्यातील सदाशिव पेठ, तुळशीबाग, स्वारगेट, कोथरूड, कर्वेनगर व पुण्याच्या इतर सर्व भागात राहणाऱ्या देशभक्त पुणेकर नागरिकांनी याचा बर्यापैकी विरोध केला तसेच जे काही लोक आले त्यांनापुण्याच्या संस्कृती ला मान देणे आणि पुण्यातील च नियम आणि भाषा पाळण्याची सक्ती केली. जे लोक या गोष्टी पळणार नाहीत त्यांना पुणेरी पाट्यान्द्वरे चांगलाच समाचार घेतला.. आजही इथले लोक कोणाचाही अपमान करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. त्यामुळे पुणे देशात आजही अस्सल मराठी संस्कृती टिकून आहे. नेमकी उलट परिस्थिती मुंबई शहरामध्ये दिसून येते. त्यांची भाषा आणि संस्कृती केव्हाच नामशेष झाली आहे. पैश्यांच्या हव्यासाने बिहार उत्तर प्रदेश गुजरात इ प्रांतातील लोकांना मुंबईत काहीही करण्याची मुभा दिल्याने आता मुंबईत मराठी नावाचा प्राणी पूर्णपणे संपला आहे. आणि जो काही शिल्लक आहे तो देखील आता " सामनेसे आगे जाके लेफ्ट को जाके बिल्डींग के पिच्छू वाले गार्डन मे भेटते हय " आशी वाक्ये बोलू लागलाय. जेव्हा जेव्हा पुणे देश आणि मुंबई शहर यांच्यामध्ये वैचारिक युद्ध होते तेव्हा मुंबई चे लोक हेच म्हणण्यात धन्यता मानतात कि " पुणे हा जर एक देश असेल तर मुंबई हा एक ग्रह आहे." परंतु मुंबई हा ग्रह नाहीये आणि त्याबद्दल चा इतिहास आपण पान नंबर १९८ वर पहिलआच आहे. .....

In reply to by बाप्पू

काकाकाकू 27/03/2015 - 04:41
आणि या देशातले एक मान्यवर नागरीक, बाप्पूसाहेब, हे १४० स्क्वेअर फुटाच्या खोलीला अर्ध्या टनाचा एसी लावू का एक टनाचा ह्याचा ईथे उहापोह करतायत !!!!!!!!

वेताळ 26/03/2015 - 19:30
तुमच्या १४० स्वे.फु. साठी तुम्हाला अर्धा टनी एसी लागेल.आता नवीन एसीसाठी विज देखिल कमी लागते. एसीची किंमत सर्वसाधारण पणे २५००० आहे.

सुबोध खरे 26/03/2015 - 21:02
बापूसाहेब पुण्याची हवा कोरडी असते त्यामुळे तेथे कूलर सुद्धा चालू शकतो. परंतु जर मध्येच पाउस पडला ( एप्रिल नंतर बर्याच वेळेस पडतो) तर मात्र हवेतील आर्द्रता वाढून कूलर उपयोगी ठरत नाही आणी घाम घाम होतो आणी अंग चिकटते. परवडत असेल तर वातानुकूलन यंत्र (ए सी)च घ्या. आपल्या १४ X १० फुट आकाराच्या खोलीस दीड टनाचाच एसी घ्या. कारण एक दोन माणसे असतील तर एक टनाचा ए सी पुरेल परंतु जरा दोन माणसे जास्त आली तर एक टनाचा ए सी जेमतेम पुरेल. शिवाय दोन्हीच्या किमतीत दोन तीन हजाराचाच फरक असतो. आणी विजेच्या बिलात फरक पडत नाही कारण तुम्ही जेवढे तापमान ठेवता त्याप्रमाणे तितका वेळ एसी चालू राहतो. विंडो ए सी स्वस्त पडतो परंतु स्प्लिट ए सी चा आवाज बिलकुल नसतो. त्यामुळे रात्री शयनगृहात दूरदर्शन बघणे किंवा संगीत ऐकणे यात व्यत्यय येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली खिडकी कायमची बंद होत नाही. मुळात जर आपल्या घराला एकाच खिडकी आहे असे आपण म्हणता तर ती बंद करणे कितपत शहाणपणाचे ठरेल. विशेषतः पुण्यात उन्हाळ्याचे तीन महिने सोडून आपल्याला ए सी लागणारच नाही मग नैसर्गिक वायू अभिसरण बंद ठेवून भर हिवाळा सोडून आठ महिने ए सी लावण्यात काय हशील आहे? या गोष्टी बहुसंख्य लोक विचारात घेत नाहीत. स्प्लीट एसी अर्थातच महाग असतो. पण आपल्याला संगीताची किती आवड आहे आणी ए सी साठी किती पैसे खर्च करायचे हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे यावरुन आपण ठरवू शकता.

स्वधर्म 26/03/2015 - 23:34
अांम्ही घरी एक साधा उपाय केला अाहे. पलंगासमोरच्या खिडकीत एक छोटा टेबल फॅन अाअातमधे तोंड करून ठेवला अाहे. बेडरूम पूर्ण बंद न करता हवा जायला जागा ठेवली अाहे व हाॅलमधील खिडकी उघडी ठेवतो. रात्री बाहेरची मस्त गार हवा घरात येते व पहाटे चक्क थंडी वाजते. मात्र हे करताना छताचा पंखा बंद ठेवावा. छताचा पंखा हा उकाड्यावरचा उपाय नाही, असे माझे मत अाहे. कारण त्यामुळे वरची हवा, जी गरम असते, ती खाली ढकलली जाते. तसेच छताच्या पंख्यामुळे खोलीतील हवेचा दाब वाढतो व बाहेरची थंड हवा अात येऊ शकत नाही. हा बरोबर हवा त्याच्या विरूध्द परिणाम झाला. पहिल्यांदा घरचे लोक छताचा पंखा बंद करायला राजी नव्हते, पण त्यांना अाता पटले अाहे. खरेतर मी या रचनेचा फोटो काढला होता, पण तो इथे दिसण्यासाठी कुठेतरी अपलोड करावा लागेल. त्यामुळे टाकू शकलो नाही. शक्यतो एसीच्या नादाला लागू नये. तुमचे घर गार झाले, तरी बाहेर तुंम्ही उष्णता फेकता. तुमचा फायदा, ज्यांना एसी परवडत नाही, त्यांच्यासाठी अाधिकचा ताप. - स्वधर्म

In reply to by स्वधर्म

खटपट्या 27/03/2015 - 00:15
अतिशय उत्तम उपाय ! करुन पाहिलेला आहे. खूपच चांगले परीणाम. फक्त खिडकी उघडी ठेवल्यामुळे उंदीर, घुशी, मांजर आत येउ शकतात. खिडकीला जाळी लावली असल्यास उत्तम.

In reply to by स्वधर्म

सुबोध खरे 27/03/2015 - 10:20
पटले नाही. आत मध्ये हवेचा दाब वाढला तर आतील हवा बाहेर जाईल. आणि समतोल प्रस्थपित होईल. बाहेर घाणीचा ट्रक गेला तर आत वास येत नाही का? तेंव्हा दोन्ही पंखे चालू ठेवले तरी आतील हवेच्या अभिसारणावर परिणाम होणार नाही. वर तिमा साहेबांनी लिहिले आहे तसा एक्झॉस्ट फॅन लावूनही तेच काम करता येईल. यात एक प्रश्न असतो कि बाहेरील हवा थंड होईपर्यंत आणि त्या हवेने आपले घर गार होईस्तोवर मध्यरात्र होते तेंव्हा रात्री आठ ते अकरा- बारा पर्यंत आपल्या आरामाची किंमत काय. बर्याच लोकांना गर्मी मुळे लवकर झोप लागत नाही आणि शेवटी थकल्याने झोप लागते आणि दुसर्या दिवशी उत्साह वाटत नाही. त्यातून मारवाडी हिशेब करायचा असेल तर एसी बसवून तो एक तास दीड तास चालवायचा घर आतून थंड करून घ्यायचे आणि नंतर खिडक्या उघडून एक्झॉस्ट फॅन लावून बाहेरील हवा आत खेचायची. या सर्व गोष्टींची किमत काय आणि आपल्याला काय परवडते हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.

In reply to by सुबोध खरे

स्वधर्म 27/03/2015 - 14:51
आत मध्ये हवेचा दाब वाढला तर आतील हवा बाहेर जाईल. आणि समतोल प्रस्थपित होईल.
ही फुटबाॅलमधून हवा निघून गेल्याप्रमाणे एकदाच घडून जाणारी व समतोल प्रस्थापित होणारी प्रक्रीया नाही. छताचा पंखा लावल्यानंतर तिथल्या सिस्टीममध्ये एक स्टेडी स्टेट निर्माण होते. तीत पंख्याच्या वरती कमी दाब व खालच्या बाजूला जास्त दाब तयार होतो. अशा स्थितीत पंख्याच्या वरील बाजूस कमी दाब असल्याने इतर ठिकाणांहून हवा तिथे खेचली जाते व हवेचा प्रवाह तयार होतो. खिडक्या ह्या साधारणपणे पंख्याच्या खालच्या पातळीवर असल्याने, तिथे वातावरणातील (बाहेरील) हवेच्या दाबापेक्षा जास्त दाब असण्याची शक्यता अाधिक असते. पण हे सगळे प्रवाहाच्या प्रोफाईलवर, खोलीच्या अाकारावर , खिडकी किती उंचीवर अाहे, इ.वर अवलंबून अाहे. याचा अर्थ बाहेरची हवा अाजिबातच अात येऊ शकणार नाही, असा नाही. कदाचित खिकीच्या वरच्या भागातून थोडी बाहेरची हवा अात येईलही. परंतु एकूणात, छताच्या पंख्यामुळे बर्याच प्रमाणात अातली तीच तीच हवा फिरवली जात असल्याने, बाहरची हवा कमी प्रमाणात अात येते.
बाहेरील हवा थंड होईपर्यंत आणि त्या हवेने आपले घर गार होईस्तोवर मध्यरात्र होते
पुण्यात तरी संध्याकाळी दुपारच्या तुलनेत बरेच थंड वारे सुटतात, असा अनुभव. अाणि अापल्याला घर गार करण्यापेक्षा अापल्या अंगावर थंड वारे अाल्याशी मतलब. अजून एक - एसी लावल्यावर कंझम्शन कमी करण्यासाठी दार बंद करणे हिताचे असते, पण त्यामुळे तीच तीच हवा घ्यायला लागते. त्यापेक्षा तुलनेने बाहेरची ताजी हवा जास्त चांगली नाही का?

In reply to by सुबोध खरे

स्वधर्म 27/03/2015 - 14:53
तिमा म्हणतात त्याप्रमाणे एक्झाॅस्ट पंखे लावण्याची कल्पना चांगली अाहे, पण ते खोलीतच लावले तर परिणामकारक होईल असे वाटते.

In reply to by स्वधर्म

अ‍ॅक्चुअली, पंख्यामुळे हवा खाली ढकलली जाईल का वर हे पंख्याच्या पात्यांच्या अँगलवर आणि पंख्याच्या फिरण्याच्या दिशेवर अवलंबून असतं. एक्झॉस्ट फॅन पण बाहेरची हवा आत आणायला किंवा आतली हवा बाहेर - दोन्हीकरता उपयोगी पडू शकतो. http://www.hansenwholesale.com/ceilingfans/fan-direction-summer-winter.asp

समजा पुण्यासारख्या शहरात जिथे फक्त 3 महिने गरम होते अन्यथा थंडी असते तिथे ए.सी फक्त उन्हाळ्याचे 3 महिने चालू ठेवला आणि नंतर बंद केला तर तो खराब होतो का? का तो सतत वापरातच राहीले पाहिजे?

In reply to by अभिजीत अवलिया

सुबोध खरे 27/03/2015 - 20:01
अभिजीत अवलिया साहेब तीन महिने वापरून झाल्यावर ए सी बासनात बांधून ठेवायचा नाही. तर दोन तीन महिन्यांनी एकदा नुसता पंधरा मिनिटे चालवा म्हणजे त्याची मोटार जाम होणे ई प्रकार होणार नाहीत. पुढच्या उन्हाळ्याच्या सुरुवातीस त्याचा फिल्टर साफ करा आणी जोवर ए सी वापरता तोवर फिल्टर दर एक महिन्यांनी साफ करा. म्हणजे ए सी वर्षनुवर्षे टिकेल. माझा १९९८ चा ए सी शेवटी त्याची बॉडी गंजल्यामुळे मागच्या वर्षी बदलला. मुलांच्या खोलीतील ए सी नउ वर्षे उत्तम चालू आहे.

योगी९०० 27/03/2015 - 08:43
मुंबईत वाळा कोठे मिळेल ते माहित आहे का? लॅपटॉप कुलरचे चार्/पाच फॅन्स पडले आहेत. घरगुती कुलर तयार करावा असा विचार हा धागा वाचून मनात आला. अर्थात humidity मुळे काही फायदा होईल असे वाटत नाही पण तेवढेच काहीतरी केल्याचे मनाचे समाधान.. (नाहीतरी सुट्टीत मुलांना काय कामाला लावे याचा प्रश्न आहेच..)

वेल्लाभट 27/03/2015 - 12:04
पुण्यात कूलर चालेल. मुंबईत कूलरचं काम नाही. पुण्याच्या हवेची आर्द्रता कमी आहे मुंबईपेक्षा. सो कूलर घेऊ शकता. पण एसी चं सुख एसीतच. आहाहाहा! विडियोकॉन चे वापरतोय गेली अनेक वर्ष. नो तक्रार.

सुबोध खरे 27/03/2015 - 19:20
VIMP प्रश्न - पंखा आणि पायांचे दुखणे याचा काय सबंध ? अत्यंत गरमी मुळे आपल्या शरीरातून पाणी घामावाटे बाहेर पडते. पुण्यासारख्या शहरात घाम येत नाही हे खरे नाही तर पुण्यातील हवा कोरडी असल्याने घाम फार पटकन वाळतो. आणि असे शरीरातून पाणी बाहेर गेल्याने त्याबरोबर क्षारही जातात. (सोडियम आणि पोट्याशियम). हे क्षार टिकवण्यासाठी आपली मूत्रपिंडे शरीरातील कॅलशियम आणी पोट्याशियम बरोबर सोडियम ची अदलाबदली करतात. यामुळे आपल्या शरीरातील कॅलशियम कमी होते आणि यामुळे आपले स्नायू दुखतात ( अंग दुखते, उत्साह वाटत नाही). दिवसभर आपण फिरता तेंव्हा झालेली झीज भरून काढण्यासाठी रात्रीची झोप गाढ(REM SLEEP) लागणे जरूर असते. या झोपेत आपले स्नायू एकदम गलितगात्र( RELAX) होतात. ( गाढ झोपेत एकदम उठलात तर शरीरात शक्ती नसल्याचा अनुभव येतो हा यासाठी) आणी हि झोप नीट लागली नाही तर सकाळी उठल्यावर आदल्या दिव्शीचे थकलेले स्नायू आंबलेल्या अवस्थेत असतात. शरीराचा जो भाग थंड होतो तेथील रक्त पुरवठा कमी होतो.त्यामुळे पंखा लावून आपण पाय उघडे ठेवून झोपलात तर स्नायूचा रक्तपुरवठा पाहिजे तितका सुधारत नाही आणि सकाळी उठल्यावर पाय दुखण्याचा अनुभव येतो. यास्तव रात्री झोपताना पायावर पातळ चादर घेऊन झोपणे (पूर्ण उघडे ठेवण्यापेक्षा) आता याला उपाय काय-- एकतर भरपूर पाणी पिणे. शिवाय उसाचा रस,नारळाचे पाणी, लिंबाचे किंवा कोकमाचे सरबत,पन्हे किंवा फळांचा रस हेही घेणे आवश्यक आहे कारण या सर्व रसात पोट्याशियम असते आणी त्यात घातलेल्या मिठात सोडियम असते. अशा तर्हेने आपल्या शरीरातील क्षारांचे आणी पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे आवश्यक आहे. यानंतर आपले घर थंड कसे ठेवता येईल यावर वरती उहापोह झालेला आहेच.

In reply to by सुबोध खरे

बाप्पू 01/04/2015 - 17:52
आपला प्रतिसाद एकदम शास्त्रीय असल्याने वाचायला थोडा जड गेला. पण नीट वाचल्यावर सगळे काही समजले. खूप खूप धन्यवाद. माझ्या VIMP प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल. या धाग्यावरील आपले सर्वच प्रतिसाद एकदम माहितीपूर्ण आहेत.

अजया 27/03/2015 - 19:25
एसीच!पॅनासोनिक १.५ टन,स्प्लिट एका खोलीत.दुसर्या खोलीत विन्डो एसी आहे.१.५चाच.पण त्याची काही ना काही कुरकुर निघते.पॅनासोनिक स्प्लिट मात्र असंच अहाहा!! नो तक्रार!!

पुण्यामधे ए.सी.ची गरज नाही. कुलर घेउन टाका एक मस्तं. त्यामधे गुलाबपाणी किंवा वाळा टाकायचा. मज्जानु लाईफ. फक्त थेट वार्‍याच्या झोतामधे झोपायचं किंवा बसायचं नाही. कुलरची मागची बाजु खिडकीमधे किंवा दरवाज्यामधे करुन ठेवायची. :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

बाप्पू 01/04/2015 - 18:21
सर्व मिपाकरांचे याचर्चेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार.विशेषतः सुबोध खरे यांचे आभार. सिम्फनी चा कूलर घेतला ३ दिवसांपूर्वी. ए सी घेण्याचा निर्णय रद्द करावा लागला . कारण वर्षातील फक्त २-३ महिन्यांचा प्रश असल्याने ३० ते ३५ हजार ची इन्वेस्टमेंट आणि पुन्हा लाईट बिलापोटी महिन्यचे २-३००० अधिकचे रुपये मोजणे आर्थिकदृष्ट्या थोडे अवघड वाटते. तसेच आता घराला एक नवी खिडकी तयार करून घेतली. त्यामुळे आता हवेचा संचार आता बर्यापैकी सुरु झाला आहे. कूलर वापरतान मी त्यामध्ये साधे पाणी घालण्या ऐवजी फ्रीज मधील थंड पाणी घालतो तसेच त्याची मागची बाजू खडकी कडे ठेवून त्याला नवीन हवा मिळत राहील अशी सोय केली. कूलर ची हवा सरळ सरळ अंगावर घेण्याऐवजीत त्याला अश्या रीतीने सेट केले आहे कि तिची हवा पहिल्यांदा छताला टेकेल आणि तिथून रिफ्लेक्ट होऊन अंगावर येईल. अगदी नाही पण जवळपास ९० टक्के ए सी ची हवा असल्यासारखे वाटतेय

जेपी 27/03/2015 - 20:37
शेंच्युरी निमीत्त श्री.बाप्पु आणी श्री.सुबोध खरे यांचा सत्कार एक एक वाळ्याचा पंखा* आणी लिंबु सरबत* देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम उष्ण मंडळ कार्यकर्ते. *अटी लागु

In reply to by ब़जरबट्टू

बाप्पू 01/04/2015 - 18:35
आता चर्चा मी सुरु केली आहे.. त्यामुळे मला इथे माझी उपस्थिती दाखवणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हीच म्हणाल " कि नुसता धागा सुरु करून बाप्पू कुठे पळाले ??? बाय द वे - वाळ्याचा पंखा म्हणजे काय :)