मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वेदाध्ययनातील- संथा देणे... अर्थात वेदाभ्यास शिक्षण/पाठांतर पद्धती

अत्रुप्त आत्मा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
....................................................................................................................................... खुलासा:- वेदपाठशाळांमधे प्राचीन काळापासून अध्ययन/अध्यापनाची एकच एक अशी, परंपरागत पद्धती रहात आलेली आहे. ही पद्धती फक्त पाठ करून ठेवण्याच्या विषयाकरिताच निर्माण झालेली आहे. हिला सामन्यतः मौखिकी अध्यापन पद्धती असे म्हटले जाते. ह्या पद्धती विषयी खूप जणांच्या मनात कुतुहल,आस्था,चिकित्साभाव इत्यादी असते. आंम्हा पुरोहित मंडळीना काम करत असताना,पाठांतर पाहुन ह्या अनुषंगानी काहि प्रश्नंही विचारले जात असतात. अश्या सर्व प्रश्नकर्त्यांना हा विषय नीट माहिती व्हावा,एव्हढ्याच हेतूने हा सदर लेख येथे देत आहे. @संथा देणे म्हणजे काय? >> संथा देणे म्हणजे ,वेदपाठ शिकविणारे गुरुजी , समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मंत्राचे छोटे तुकडे(चरण)पाडून ,वदवून आपल्या मागे घोकायला/म्हणायला सांगतात..याला प्राथमिक अर्थानी संथा-देणे असे म्हटले जाते. यापुढे...(विद्यार्थ्यांनी)संपूर्ण पाठांतर करण्याच्या विशिष्ट पद्धतीला, संथा घालणे अगर संथा म्हणणे ..असे म्हटले जाते. एखादा विषय/याज्ञिकातला प्रयोग/संहितेचा अध्याय (तोंड)पाठ करताना, संथा म्हणण्याचे ४ ट्प्पे असतात. १) चरणाची संथा(४वेळा) २) अर्धनीची संथा(४वेळा) ३) ऋचेची संथा(४वेळा) ४) गुंडिकेची संथा(४वेळा) = एकंदर १६ संथा. १)चरणाची संथा:- चरणाच्या संथेत, गुरुजिं..प्रथम समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मंत्राचा एकेक चरण दोनदा सांगतात.. मग विद्यार्थ्यांनी पोथित बघून तो त्यांच्या मागून ७वेळा घोकायचा. यात म्हणताना चूक झाली,की पुन्हा सुरवात. यात शुद्धअक्षर,जोडाक्षर,त्याचे गुरुत्व,अनुस्वारांचे उच्चार,स्वराघात,र्‍हस्व आणि दीर्घ/प्रदीर्घ-अश्या काना ,मात्रा,वेलांट्या,उकार, विसर्ग आणि त्यांचे तसेच उच्चार ,हे शंभर टक्के शुद्ध होत आहेत की नाहीत? हे गुरुजी कसून तपासत असतात. (कारण एकदा अशुद्ध पाठ झालं..की ती (मेंदूत उमटलेली) प्रींटाऊट,नंतर पुसणं कर्मकठीण असतं.) तर..हे स्तोत्रातले पाडलेले एकेक चरण ७ वेळा घोकत संपूर्ण अध्याय वा स्तोत्र - पूर्ण केलं जातं... ही झाली "चरणाची" पहिली संथा. अश्या चार संथा झाल्या की 'चरण' पूर्ण होतो. ही सगळी संथा गुरुजिंसमक्ष होते. (कारण तेच-मंत्रात अजिबात अशुद्धी राहू नये.) २)अर्धनीची संथा:- अर्धनीच्या संथेत ,सामान्यतः दोन चरण एकत्र घेऊन..किंवा मंत्राची अर्धी ओळ सात वेळा म्हटली जाते. (काहि वेळा जगतिच्छंदा सारखा,मंत्राचा लांबलचक छंद असेल,तर एका ओळीत ४/४ किंवा अगदी ६/६ चरणंही पाडावे लागतात) आधी चरण डोक्यात-बसलेला असतोच..त्यामुळे इथपासून गुरुजी समोर नसले,तरी चालते. तर.. ही...एकामागून एक ओळ पूर्ण ७ वेळा घोकत ...संपूर्ण अध्याय पूर्ण केला... की अर्धनीची १ संथा झाली...आता अश्याच पुढे अजुन ३ संथा म्हणायच्या..म्हणजे या अर्धनीच्या चार संथा होतात. ३)ऋचेची संथा:- ऋचेच्या संथेत..मागील अर्ध्या ओळीच्या संथेचा पुढचा भाग सुरु होतो..म्हणजे आता २ ओळिंची संपूर्ण ऋचा ,आणि पुढच्या ऋचेचा पहिला चरण(धरुन) ..,तसे ७ वेळा म्हणायचे. यातील पुढच्या ऋचेचा पहिला चरण त्यात घेण्याचे वैशिष्ठ्य असे..की यामुळे संपूर्ण अध्यायातल्या प्रत्येक पहिल्या ऋचेची-दुसर्‍या ऋचेशी गुंफण तयार होते. (कनेक्टींग होते.) ऋचे'तल्या या (पहिल्या)संथेवर,शिकविणार्‍या गुरुजिंचे बारीक लक्ष असते. (कारण तेचः- अशुद्धी आली कींवा मधे कुठे तयार झालेली आहे काय? हे पहाणे.) ह्या ऋचेच्या परत पुढे तीन संथा म्हणायच्या. म्हणजे या ऋचेच्याही एकंदर चार संथा पूर्ण होतात. ४) गुंडीकेची संथा:-..हा शेवटचा, परंतू अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. आता मागील ऋचेच्या संथेनी हीचेच निम्मे काम केलेले असते. पण तरिही.., आता कितीही पाठ येत असले..तरी(यातल्या पहिल्या संथेला) पोथीत पाहूनच..सदर पाठांतराच्या अध्यायाचा एकेक अनुवाक अथवा वर्ग (पॅरेग्राफ) ७/७ वेळा म्हणायचा असतो. आणि तो सगळा अध्याय पूर्ण करायचा असतो. ही झाली गुंडिकेची पहिली संथा.. अश्या अजुन तीन म्हणून ,ह्या गुंडिकेच्या चार संथा पूर्ण करायच्या. या गुंडिकेच्या संथेमधे, साधारणपणे दुसर्‍या किंवा तिसर्‍या संथेपासून ,(आता) विद्यार्थ्याची..इच्छा अगर तयारी-नसली तरी विद्यार्थ्यांनी पोथित न पहाताच ,मान वर करुन संथा म्हणायची असते. कारण त्याशिवाय-पाठ येणे..ही क्रीयाच आकाराला येऊ शकत नाही. अर्थात कोणत्याही सर्व सामान्य बुद्धीच्या विद्यार्थ्याला यातल्या शेवटच्या २ संथांमधे सर्वकाहि बिनचूक तोंडपाठ-येतेच. पण त्याहून(बुद्धिनी) आगे/मागे जे असतील..त्यांना कमी अगर जास्त कष्ट घ्यावे लागतात. तर,अश्या ह्या एकंदर १६ संथा घातल्या की आपल्याला अपेक्षित असलेला पाठांतराचा विषय-तयार होतो. आता आपण याचे-संकलित..,एका स्तोत्रपाठांतराच्या उदाहरणाद्वारे पाहुया. (हे आणखि डिटेलिंग,विशिष्ट हेतूनी आणि जाणिवपूर्वक करत आहे.) चरणाची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं,(७वेळा) गौरीपुत्रं विनायकम् ।(७वेळा) भक्तावासं स्मरेन्नित्यं, (७वेळा)आयुःकामार्थसिद्धये॥(७वेळा) प्रथमं वक्रतुण्डं च,(७वेळा) एकदन्तं द्वितीयकम् ।(७वेळा) तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं,(७वेळा)गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ (७वेळा)..... असेच प्रत्येक चरण म्हणत स्तोत्राच्या शेवटापर्यंत जायचे असते..मग येथे चरणाची एक संथा पूर्ण होते.अश्याच अजुन तिन संथा म्हटल्या,की चरणाची मुख्य संथा पूर्ण होते. अर्धनिची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं, गौरीपुत्रं विनायकम् ।(७वेळा) भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥(७वेळा) ॥ प्रथमं वक्रतुण्डं च, एकदन्तं द्वितीयकम् ।(७वेळा) तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ (७वेळा)..... अशीच प्रत्येक अर्धनि/अर्धी ओळ म्हणत स्तोत्राच्या शेवटापर्यंत जायचे असते..मग येथे अर्धनिची एक संथा पूर्ण होते.अश्याच अजुन तिन संथा म्हटल्या,की अर्धनिची मुख्य संथा पूर्ण होते. ऋचेची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं, गौरीपुत्रं विनायकम् । भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥..प्रथमं वक्रतुण्डं च(७वेळा) प्रथमं वक्रतुण्डं च, एकदन्तं द्वितीयकम् । तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ लम्बोदरं पञ्चमं च(७वेळा)..... अशीच प्रत्येक ऋचा ,पुढल्या ऋचेचा पहिला चरण तिच्यात लावुन म्हणत स्तोत्र एकेक ऋचेनी म्हणत पूर्ण घोकायचे असते..मग येथे ऋचेची एक संथा पूर्ण होते.अश्याच अजुन तिन संथा म्हटल्या,की ऋचेची मुख्य संथा पूर्ण होते. गुंडिकेची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् । भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥ १॥ प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् । तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ २॥ लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च । सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥ ३॥ नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् । एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥ ४॥ द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः । न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः ॥ ५॥ विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् । पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥ ६॥ जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् । संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥ ७॥ अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् । तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥ ८॥ (सुरवात ते शेवट -७वेळा..) .....असेच सुरवात ते शेवट -७वेळा.. म्हटले,की मग येथे गुंडिकेची एक संथा पूर्ण होते.अश्याच प्रकारे अजुन तिन संथा म्हटल्या,की गुंडिकेची मुख्य संथा पूर्ण होते. आता आपल्याला आवश्यमेव असा एक प्रश्न पडेल,की "(बुद्धिचा..)इतका बारीक किस पाडून, ही पाठांतर पद्धती तयार होण्या/करण्यामागचे प्रयोजन काय बरे असावे???" :) उत्तरः- ज्या काळात ही पद्धती आली/विकसीत झाली.तो काळ लेखनकलेची सुरवातहि न झालेला असा काळ होता. अश्या वेळी आपल्या जिवापाड जपाव्याश्या वाटणार्‍या गोष्टींपैकी, ही मंत्र /काव्य/स्तोत्र जतनाची एक गोष्ट होती. आणि याशिवायंही ,पुढे लेखनकला विकसीत झाल्यावर..जो विषय वारंवार म्हणावा,वापरावा लागणार आहे..त्यासाठी भल्यामोठ्ठ्या पोथ्यांची बाडे बरोबर घेऊन हिंडणे.हे ऋषीमुनिंपासून ते सामन्यजनांपर्यंत सर्वांनाच त्याकाळी सोपे नव्हते. त्याशिवाय पोथ्या पाण्यानि/आगिमुळे,वाळवी/कसर लागण्यापुळे खराब होणे अशिही कारणे होतिच. आणखि म्हणजे, परस्पर विरोधीमतांच्या गटांनी एकमेकाचे लिखित स्वरुपातिल वांङगमय नष्ट करणे,हे ही एक प्रबळ कारण त्याकाळी होतेच...या अश्या सर्व कारणांसाठी हे ज्ञान मुखोद्गत-पाठ ठेवावे लागले असेल.(आमच्याकडला अचुक शब्द म्हणजे-जिवंत ठेवावे लागले असेल.) आणि विशेषतः जर ते जसे च्या तसे पाठ ठेवावे लागले असेल,तर त्याला अशीच तंतोतंत शब्दपाठांतराची पद्धती असायला हवी होती. आणि म्हणुन तसे जर का एकदा पाठ झाले,आणि त्याच्या वारंवार आवृत्या* म्हणुन पाठ ठेवलेही गेले, तर वरिल कारणांनी येणारे नष्टतेचे भय बाळगावे लागत नाही, हे तर निश्चित आहे. (आज आपण हे आपल्याला हव्या त्या सर्व विषयांसाठि, हजारो प्रकारच्या रेकॉर्डिंगच्या साधनांनि करतच असतो. :) ) आता जसेच्या तसे...म्हणजे काय हो नक्की? तर खाली दिलेले हे गणपतिस्तोत्र पहात पहात ह्या लिंकवर http://mfi.re/listen/zxd8acxaxqxwc2i/ganapatistotra_myself.mp3 जाऊन हे क्लिपिंग ऐका. जेणेकरुन ह्या पद्धतिनी पाठ केले असता,जसेच्या तसे मेंदुत उमटते..म्हणजे काय होते? ते कळणे सहज होइल :) (गायकबियक कुणी नाही.. मीच आमच्या(उच्चार)पद्धतिनी म्हटलेलं आहे हां! ;) ) http://mfi.re/listen/zxd8acxaxqxwc2i/ganapatistotra_myself.mp3 प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् । भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥ १॥ प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् । तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ २॥ लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च । सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥ ३॥ नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् । एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥ ४॥ द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः । न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः ॥ ५॥ विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् । पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥ ६॥ जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् । संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥ ७॥ अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् । तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥ ८॥ ......................................................................................................................... आवृत्ति*:- हा वेदाध्ययनातला अत्यंत महत्वाचा भाग आहे. एकदा पाठ झालेला विषय/अध्याय..किमान २ वर्ष तरी दररोज १ आवृत्ती म्हणून जिवंत-ठेवावा लागतो. नाहितर आमच्याकडल्या प्रसिद्ध म्हणी प्रमाणे..तो नवव्या दिवशी नवा-होतो. म्हणजे अक्षरशः पुन्हा संथा-घेऊन शिकण्याच्या पातळीवर येतो. आणि असंही हे सोपं काम नसतच. नुसती ऋग्वेदाची संहिता घेतली..तरी त्यात आठ अष्टके..म्हणजे ६४ अध्याय आहेत. अध्ययन सुरु झाल्यापासून जसजसे पाठांतर वाढत जाइल..तसतसा हा आवृतीचा काळ वाढत जातो. आणि दर दोन वर्षानी समांतर होत रहातो. मग पुढे ब्राम्हण/आरण्यक्/उपनिषदे/शिक्षाचतुष्टय/ज्योतिष(फलज्योतिषवालं नव्हे!)/शास्त्र/निरुक्त असे अनेक ग्रंथोपग्रंथ पचवत, जिवंत ठेवत, अध्ययन करावे लागते..एका वेदाच्या दशग्रंथांच्या अध्ययनाला पहिल्या वर्षाला ६ तास.. इथून सुरवात होऊन..शेवटच्या वर्षाला हा शिक्षण कालावधी १६ ते १८ तासांपर्यंत जाऊन बसतो. म्हणूनच ऋग्वेदाचे दशग्रंथ पूर्ण कंठस्थ (पाठ) होण्याचा कालावधी किमान १२ वर्षे आहे. पाठांतरातील अग्निदिव्य :- संचार जाणे .. संचार.., हा पाठांतराच्या वाटेतला अटळ सहप्रवासी आहे. आता संचार म्हणजे काय? तर एकसमान किंवा तोच तोच.. शब्द वा मंत्र ,संपूर्ण अध्ययनाच्या विषयांमधे कुठेही वारंवार येणे.. यामुळे काय होते? तर ..एका महारस्त्यावर जवळ जवळ सारखी नावं असलेले दोन फाटे असतील..तर नामसाधर्म्याच्या गोंधळामुळे, माणूस जसा या ऐवजी त्या गावात पोहोचावा. तसे काहिसे, हे सारखे-मंत्र अथवा शब्द करीत असतात. ऋग्वेदाच्या नुसत्या संहितेमधे असे हजारो संचार आहेत. नुसतं त्याच संहितेमधून वेगवेगळे पाच अध्याय व दोन सूक्त एकत्र करून निर्मिलेलं जे पंचसूक्त पवमान आहे..त्यात सुमारे आडिचशे संचार आहेत. बरं.., हे संचार म्हणजे फक्त (समान)शब्द आणि संपूर्ण अथवा अर्ध्या (समान)मंत्राचेच आहेत काय? आणि नुसते तेव्हढेच आहेत काय? तर..तसे नाही. काहि ठिकाणी तर, फक्त या अध्यायात या ओळीत विशिष्ट शब्दावर मात्रा आहे ..आणि एकदम पुढच्या कुठल्या तरी अध्यायात तोच मंत्र पण त्याच ओळिवर विशिष्ट शब्दावर (आता) मात्रा नाही, एव्हढाच फरक आहे. म्हणजे ही पवमानातली गंमत बघा. एके ठिकाणी "शुंभमा ऋतायुभि:" असे आहे,तर दुसरीकडे , "शुंभमानो ऋतायुभि:" असे आहे. परत दोन्ही कडच्या पुढच्या ओळी निसंशय वेगळ्याच असतात. आणि मग जर का हे लक्षात राहिले नाही..तर या अध्यायातून त्या अध्यायात उडी पडते. याच घडणार्‍या प्रकाराला म्हणतात, संचार-जाणे! उदाहरणा दाखल आपण आजुन एक दोन संचार पाहू .. सुदुघाहि-पयस्वती: आणि सुदुघाहि-घृतःश्चुतः.. हा शब्दाचा संचार झाला.हा ही सहज लक्षात रहातो. पण अनुस्वारांचे संचार म्हणजे,मेंदूची शस्त्रक्रीया करतांना जितकं बारीक..आणि नजर न हलता लक्ष ठेवावं लागेल..तसला भयंकर प्रकार. तो असा - पतामांतरिक्षा आणि पवंतामांतरिक्षा - या शब्दातल्या दुसर्‍या अक्षरावर ,म्हणजे व - वर ..प्रथम अनुस्वार नाही आणि नंतर पुढे, तोच अनु-स्वार-झालेला आहे!!! इतका सूक्ष्म फरक लक्षात राहाणे मुश्किल..आणि मग इकडून तिकडच्या आध्यायात उडि पडणे निश्चित! (यातलं पंचसूक्त पवमान..हे पाठ-ठेवायला अत्यंत कर्मकठिण आहे. मला स्वतःला हे पाठ झाल्यापासून सलग तिन महिने याची आवृती ठेवल्यानंतरही..पुढे पुन्हा सलग २ महिने पाठ म्हणताना, रोज २ अथवा ३ संचार-जायचेच! आणि ते ही रोज वेगवेगळे! आज ह्या गल्लीत चुकलो,की उद्या त्या गल्लीत! रामा..शिवा..आणि गोविंदा..बाकि काही नाही! ) आता आपल्या सुप्रसिद्ध रुद्रातला हा शब्दसंचार..,प्रत्यक्षच कसा-जातो..?ते पहा... (रुद्रामधे, आकरा नमका'चे आणि आकरा चमका'चे असे एकंदर २२अनुवाक आहेत.) यातल्या नमकाच्या पहिल्या अनुवाकातल्या तिसर्‍या ऋचेतली पहिली ओळः- यातेरुद्र शिवातनुरघोरा पापकाशिनी। आणि पुढची (वेगळी)ओळः- तयानस्तनुवा शंतमया गिरिशंता भिचाकशीहि॥ आता इथून सरळ नमकाच्या दहाव्या अनुवाकातली दुसर्‍या ऋचेतली पहिली ओळः- यातेरुद्र शिवातनु:शिवाविश्वा हभेषजी। आणि पुढची (वेगळी)ओळ:- शिवारुद्रस्य भेषजी तयानोमृड जीवसे॥ आता यात जर का रुद्र म्हणणारा माणूस पहिल्या अनुवाकात , यातेरुद्र शिवातनु च्या पुढे शिवाविश्वा हभेषजी असे चुकून म्हणून गेला..तर त्याची पाठांतर पद्धतीमुळे मेंदूत कोरली गेलेली पुढची ओळ ही दहाव्या अनुवाकातली ,म्हणजे शिवारुद्रस्य भेषजी तयानोमृड जीवसे॥ .., हीच तोंडातून उमटणार. हा गेला संचार! आणि याच्याही अगदी उलट घडून दहाव्या अनुवाकातून पहिल्या अनुवाकात असा उलटंही तो येणार.म्हणजे - संचार जाणार! आणि कित्तीही कुशाग्र बुद्धिमत्तेचा माणूस असला , तरी संपूर्ण एका वेदातले असे हजारो संचार लक्षात ठेवणं हे सामान्य बुद्धीमत्तेच्या बाहेरचचं काम.. मग हे काम सोप्प व्हावं म्हणून पुढे .. वेदांमधे पद/क्रम/जटा/माला/घन अशी सोय निर्माण करण्यात आली. याचा उचित वापर केला..कि हे संचारचं गाडं आडवं आलं, तरी त्याला नीट उभं करता येतं. (याविषयी पुन्हा केंव्हा तरी असच लिहिन! ) अर्थात, ज्या अध्ययनाचा आधार फक्त आणि फक्त पाठांतर हाच (राहिला)होता, त्या अतीप्राचीन (लेखनकलेची सुरवातही न झालेल्या) कालखंडात अश्या तर्‍हेच्या युक्त्या अथवा सोयी सुचणं, हे ही त्याच मानवी बुद्धीशी सुसंगतच म्हटलं पाहिजे. मग त्याचं समर्थन आजच्या आणि यापुढच्या काळात कोणत्याही पद्धतीनी अगर हेतूनी होवो. आज या निमित्तानी हा (पाठांतराचा) छोटासा आढावा घेणारा लेख लिहुन झाला याचं समाधान दोन कारणानी आहे. १) वेदज्ञान.., हे त्या किंवा आजच्या अथवा पुढच्या काळात उपयोगी/अनुपयोगी .. उपकारक/अनुपकारक..असं कसंही असलं .तरी .. हे ज्ञान पूर्वी आणि आजही पाठ ठेवणारे जे वेदाध्यायी आहेत. त्यांच्या बुद्धिमत्तेची जाणिव..या लेखनामुळे करवून देता आली.(एरवी..हे नुसतं सांगून शक्य नाही,आणि नसलंही पाहिजे. :) ) याशिवाय.., जे लोक:- "ह्हॅ!...हे शिकायला काय अक्कल अथवा बुद्धी लागते?" असे (कोणत्याही हेतूने) म्हणतात..त्यांना.. किमान हा लेख वाचल्यानंतर,पुन्हा असं म्हणताना,काहि क्षण थांबून विचार करावा लागेल... २)कुणितरी मनापासून शंका विचारल्या शिवाय, हे असल्या पद्धतीचं लेखन माझ्या हातून(कधिही) होत नाही..ते आज झालं. (या बद्दल आपले मिपाकर आदूबाळ यांचे मनःपूर्वक आभार. :) ) ===================================================

वाचन 40928 वाचनखूण प्रतिक्रिया 113

मुक्त विहारि गुरुवार, 01/15/2015 - 04:41
आमचे इंजिनियरिंग ह्या पेक्षा बरेच सोपे आहे, असे म्हणायची वेळ आणलीत. एक साधे गणपती अथर्व-शीर्ष पाठ व्हायला २१ दिवस लागले.रामरक्षा विसरलो ती विसरलोच. बुवा, मस्त माहिती दिलीत.

In reply to by मुक्त विहारि

टवाळ कार्टा गुरुवार, 01/15/2015 - 09:33
आमचे इंजिनियरिंग ह्या पेक्षा बरेच सोपे आहे, असे म्हणायची वेळ आणलीत.
असे नका म्हणू हो...काहिही येत नसताना पानेच्या पाने मोठी उत्तरे लिहिणे आणि मुख्य म्हणजे "ते उत्तर बरोबरच असेल असे परिक्षकाला वाटायला लावणे" हे विंजीनेरांचे मोठ्ठे स्किल आहे ;)

In reply to by टवाळ कार्टा

कपिलमुनी गुरुवार, 01/15/2015 - 14:53
अतिअवांतर : virtual network ची १ पान भरून लिहिलेली माहिती आठवली virtual अर्धा पान network अर्धा पान आणि एकत्रित ६ ओळी ;)

टीपीके गुरुवार, 01/15/2015 - 05:06
छान चालू आहे, नविन काहीतरी कळते आहे. खोडसाळपणा म्हणुन नाही, परंतु हे नक्की का पाठ करायचे? म्हणजे पूजेला, लग्नाला लागणारी स्त्रोत्र सोडून बाकीच्याही गोष्टी लिखित तर असतीलच ना? मग पाठ करून काय उपयोग? बायदवे तुम्हाला संस्कृत पण शिकवायचे कि फक्त घोकंपट्टी? या पाठांतराबरोबर अर्थ पण समजून घ्यायचा कि त्याची वेगळी शिकवणी? या शाळांमध्ये वेदाभ्यासंशिवाय इतर काय काय विषय शिकवतात? म्हणजे, गणित, विज्ञान, इतिहास,इंग्रजी इत्यादी इत्यादी?

रामपुरी गुरुवार, 01/15/2015 - 05:38
"का?" चा किडा डोक्यात वळवळलाच पण तरिही "कष्ट आहेत" हे मानलंच पाहिजे. येक सजेशन- उपकारक चा विरुद्धार्थी शब्द अपकारक. आता "अनुपकारक" चा आणखी कुठला अर्थ असेल तर माहिती नाही.

प्रचेतस गुरुवार, 01/15/2015 - 06:14
संथा देणं म्हणजे काय, श्लोकांचे पाठांतर कसे करावे हे परवाच तुमच्याकडून प्रवासात सविस्तर ऐकले होतेच. आज परत उजळणी झाल

In reply to by सतिश गावडे

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 01/15/2015 - 10:14
टीपीके @खोडसाळपणा म्हणुन नाही, परंतु हे नक्की का पाठ करायचे? म्हणजे पूजेला, लग्नाला लागणारी स्त्रोत्र सोडून बाकीच्याही गोष्टी लिखित तर असतीलच ना? मग पाठ करून काय उपयोग?>>> काहि उपयोग नाही. आता काळाच्या साधानांप्रमाणे ,या सगळ्याचे रोकॉर्डिंग (अगदी संथा देण्याचेही!) करुन ठेवता येणे शक्य आहे. केलेही गेलेले आहे. परंतू शास्त्र परंपरा ही मौखिकीनी-जतन करण्याची आहे. त्यात हा सगळा धर्मशास्त्रांचा अत्यंत मूलभूत भाग! त्यामुळे त्याच्या पद्धतीत बदल करा! वगैरे शब्द उच्चारले ,तरी तुमची झोपडी निराळी होऊ शकते. म्हणजे ऐकून घ्यायला कोणी ना म्हणणार नाही. माझ्यासारखा माणूस तर ह्या असल्या गोष्टी(आमच्यात) गेली दहा वर्षे रोज बोलत आहे. पण.... असो! नाहि म्हणायला मला ह्या गोष्टी आज जेव्हढ्या लागतात तेव्हढ्याच शिकण्याची बुद्धी तेंव्हा पहिल्या एका वर्षानंतरच झाली. आणि हे वडिलांच्या कानावर घालून त्यांच्या मदतीने..मी फक्त ऋग्वेदी आणि हिरण्यकेशी याज्ञिकातले पौरोहित्यासाठी अत्यावश्यक . एव्हढेच बरेचसे अध्ययन केले.आणि माझा नाहक वाया जाणारा वेळ वाचविला. आणि हो..पुजा/लग्न आणि अश्या विधिंना लागणारी स्तोत्र,अथवा फक्त मंत्र शिकून चालत नाही. त्याचे प्रत्येकी (शास्त्रोक्त) प्रयोग शिकावे लागतात. विवाहप्रयोगः /श्राद्धप्रयोगः / स'ग्रहमख वास्तुशांति प्रयोगः ..इत्यादी. @बायदवे तुम्हाला संस्कृत पण शिकवायचे कि फक्त घोकंपट्टी? या पाठांतराबरोबर अर्थ पण समजून घ्यायचा कि त्याची वेगळी शिकवणी? >>> दुर्दैवानी महाराष्ट्रात अजूनंही अनेक पाठशाळां मधे फक्त घोकंपट्टीच आहे. :( नंतर बरेचसे लोक बाहेरून संस्कृत व्याकरण शिकतात. @या शाळांमध्ये वेदाभ्यासंशिवाय इतर काय काय विषय शिकवतात? म्हणजे, गणित, विज्ञान, इतिहास,इंग्रजी इत्यादी इत्यादी? >>> इतर विषय पूर्वी नव्हते. असले तर अत्यंत जुजबी होते. पण आता काळाची पावले ओळखून बर्‍याच पाठशाळांमधे गणित आणि इंग्रजी ,संगणक ज्ञान हे जुजबी स्वरुपात शिकवले जाते. आणि खरतर याच शिक्षणाला आहे तो वेळ पुरत नाही. त्यामुळे अनाध्यायाचे जे शास्त्रानी सांगितलेले दिवस असतात,तेंव्हा हे शिकविले जाते. (अनाध्यायाचे दिवस म्हणजे:- हरेक महिन्यात येणार्‍या अष्टमी,पौर्णिमा,अमावस्या,प्रतिपदा इत्यादी तिथी,व ग्रहणादि काहि दिवस! ) ===================================== रामपुरी @"का?" चा किडा डोक्यात वळवळलाच >> माझ्याही फार पूर्वीपासून वळवळत होताच.पण आता कारणे-कळल्यानी शांत झाला आहे. @पण तरिही "कष्ट आहेत" हे मानलंच पाहिजे. >> याबद्द्ल खरच धन्यवाद.हे सगळे (एका वेदाचे वा तत्सम तसेच!)एव्हढे पाठांतर, हा निरर्थक काथ्याकूट आहे. आणि मानवी श्रम व बुद्धी उगीच खर्च करण्यातला आहे. हे मलाही मान्य आहे. परंतू हे समजून घेताना,अथवा विरोधी बाजू मांडताना ..अनेकांना हे निरर्थक आहे,यावरच लक्ष जातं. पण निरर्थक असला,तरी तो काथ्याकूट आहे. ही बाजू मांडण्यातली (स्वतःलाच उपकारक आणि आवश्यक) अशी गोष्ट ते विसरतात. @येक सजेशन- उपकारक चा विरुद्धार्थी शब्द अपकारक. आता "अनुपकारक" चा आणखी कुठला अर्थ असेल तर माहिती नाही. >>> येस..येस..परफेक्ट! माझं चुकलच ते! धन्यवाद. (संपादक , प्लीज बदला हो ते! :) ) ========================================= अजया @हे सर्व तुमच्या अजूनही लक्षात आहे का आता संचार?>>> आहे ना! (आवृत्तीच्या जोरावर) पाठ-ठेवावच लागतं. कारण आंम्ही बाहेर जे पौरोहित्य करायला जातो. तिथे नाटकाचाच नियम लागू पडतो. (ते आवश्यकंही आहे.) प्रयोग-करताना, स्क्रिप्ट हतात कशी चालेल? मात्र काहि फरक आहेतच. पंचसूक्त पवमानासारखा किचकट विषय किंवा दुर्गा सप्तशती सारखा साधा विषय ,जो सर्व सामान्यतः अनेकांना पाठ राहू-न शकणाराच विषय आहे. तिथे आंम्ही पोथी (समोर) वापरतोच. आणखि एक कारण म्हणजे, पौरोहित्यातले जे विषय फक्त वाचूनच दाखवण्याचे आहेत... जिथे काही इतर एक्टिव्हिटी-करायची नाहीये. तिथे हे पाठ-असण्याचा आग्रह शिक्षणातंही नाहिये. उदा:- दुर्गा सप्तशती! नवरात्रा'त किंवा इतरवेळी आंम्ही(कुणिही) पोथी समोर ठेऊनच हे फक्त वाचत असतो. =================================== अर्धवटराव @या सगळ्या कॉम्प्लेक्सीटीतच जात व्यवस्थेची बीजं असावीत.>> नाही.. ही बीज मूळची सामाजिक आहेत.आणि याला प्राचीन काळापासून धर्म आणि राजव्यवस्थेनी स्वार्थासाठी धर्मशास्त्रातल्या,वैयक्तिक आणि सामाजिक आचारशास्त्र, या विभागातून भरपूर समर्थन आणि खतपाणि दिलं आहे. अगदी चोख व्यवस्था लावलेली आहे. हे मात्र खरे आहे. ==================================== सतिश गावडे @ तुमची डीटेलिंग करण्याची हातोटी वाखाणण्याजोगी आहे.>> धन्यवाद. :) ========================================

In reply to by अत्रुप्त आत्मा

अर्धवटराव गुरुवार, 01/15/2015 - 20:38
एकाच व्यक्तीला १६ तास पाठांतर करणे, मग शेती करणे व गुरे सांभाळणे शक्य नसावे म्हणुन डिव्हीजन ऑफ लेबर तयार असावी. तिच पुढे जात व्यवस्था म्हणुन प्रचलीत झाली असावी.

कंजूस गुरुवार, 01/15/2015 - 09:50
आता तुमच्याकडून बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळण्याची खात्री झाली आहे तरी मी इथे विचारणार नाही कारण या विषयांत गांभिर्य आणि योग्यवेळ आल्यावरच ते काम होईल असे मानतो -एक वाद न घालणारा ठार नास्तिक.

In reply to by कंजूस

सतिश गावडे गुरुवार, 01/15/2015 - 10:02
अहो काका विचारा की. त्यानिमित्ताने: १. तुमचे शंका निरसन होईल. २. आमच्यासारख्या वाद घालणार्‍या आयडींना वाद घालता येईल. ३. या विषयाबद्दल प्रामाणिक कुतुहल असणार्‍या चार गोष्टी कळतील. ४. काहींना आत्मा, परमात्मा, मोक्ष वगैरेवर प्रवचन देता येईल. ५. बुवांच्या धाग्यावर शंभरी भरेल. (आणि मला मग बुवांकडून पार्टी उकळता येईल.)

साती गुरुवार, 01/15/2015 - 10:03
लेख आवडला. तुम्हाला हरकत नसेल तर विकीपेडिया किंवा तत्सम साईटवर नोंदवून ठेवा. कित्येक शब्दांचे अर्थं नव्याने कळले. जसे की संथा देणे, घेणे, आवृत्ती इ. 'का?' याचे उत्तर असे आहे की ज्यावेळी लिखित साधने जवळपास नव्हती किंवा मर्यादित होती त्यावेळी संकलित केलेली माहिती अथवा ज्ञान सुद्ध स्वरूपात प्रसारित व्हावे. आपल्याला आज त्या गोष्टी मे बी इर्रिलेवंट वाटत असतील त्या त्यावेळी खूप रिलेवंट किंवा 'लय भारी' ज्ञान, माहिती, कविता, नियम असू शकतात. म्हणून हा खटाटोप केला जायचा.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 01/15/2015 - 10:33
टवाळ कार्टा @काहिही येत नसताना पानेच्या पाने मोठी उत्तरे लिहिणे आणि मुख्य म्हणजे "ते उत्तर बरोबरच असेल असे परिक्षकाला वाटायला लावणे" हे विंजीनेरांचे मोठ्ठे स्किल आहे >> =)) अरे कार्ट्या...गप की जरा! तार्किकच आहे हा मेला! =)) ======================================= कंजूस @या विषयांत गांभिर्य आणि योग्यवेळ आल्यावरच ते काम होईल असे मानतो. >> ठिक आहे. तरिही तुंम्हाला विचारयचे असेल्,तर नक्की विचारा.माझी ना..नाही. :) ========================================= सतिश गावडे >>> =)) कित्ती तो (निरागस!) प्रामाणिक पणा!? गुण-लागलेला आहे, याची खात्री वेरूळ ट्रिप पासून झालेली होतीच. आता तर काहिच शंका उरलेली नाही. =)))))) ========================================= साती @लेख आवडला. तुम्हाला हरकत नसेल तर विकीपेडिया किंवा तत्सम साईटवर नोंदवून ठेवा.>>> धन्यवाद. पण मला अजुन , हे तिकडे कसे नोंदवायचे? हे माहित नाही. :( ( कृपया-सांगा कुणी मज! :) ) @कित्येक शब्दांचे अर्थं नव्याने कळले. जसे की संथा देणे, घेणे, आवृत्ती इ. >> याचसाठी केला ,(काल) हा -अट्टाहासं! लेख सार्थकी लागला. धन्यवाद. :) @'का?' याचे उत्तर असे आहे की ज्यावेळी लिखित साधने जवळपास नव्हती किंवा मर्यादित होती त्यावेळी संकलित केलेली माहिती अथवा ज्ञान सुद्ध स्वरूपात प्रसारित व्हावे. >> बरोबर..फक्त बदल एव्हढाच,कि प्रसारित व्हावे.आणि जसेच्या तसे जिवंत रहावे. @आपल्याला आज त्या गोष्टी मे बी इर्रिलेवंट वाटत असतील त्या त्यावेळी खूप रिलेवंट किंवा 'लय भारी' ज्ञान, माहिती, कविता, नियम असू शकतात. म्हणून हा खटाटोप केला जायचा.>> येकदम बरोब्बर! =========================================

प्रमोद देर्देकर गुरुवार, 01/15/2015 - 10:35
लक्षात ठेवणे कठीण आहे. परवा रेडीयोवर एक बातमी ऐकली की पुण्यातल्या वेदभवनाचे अध्यक्ष श्री.घैसासगुरुजींनी हे सगळे वेद पीडीएफ स्वरुपात जतन कारायचे ठरवले आहे.

In reply to by प्रमोद देर्देकर

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 01/15/2015 - 10:51
@ पुण्यातल्या वेदभवनाचे अध्यक्ष श्री.घैसासगुरुजींनी हे सगळे वेद पीडीएफ स्वरुपात जतन कारायचे ठरवले आहे.>>> हे काम ऑलरेडी झालेले आहे. हा माणूस फक्त त्यावर शिक्कामोर्तब-करेल.

साती गुरुवार, 01/15/2015 - 11:00
आम्ही शाळेत असताना राजापूरच्या वेदशाळेत आम्हाला दरवर्षी नेले जायचे. आम्ही दरवेळी गीतेचा एक एक अध्याय पाठ करून जायचो आणि ते पूर्णं गीता. आणि मग त्या मुलांचे पाठांतर बघून अक्षरशः अचंबित व्हायचो. तेव्हा हे लोक नेमके कसे पाठांतर करतात हे आम्हाला सांगायचे. रिअल हार्ड वर्क!

पैसा गुरुवार, 01/15/2015 - 11:40
खूपच छान लिहिलंत बुवा! मला वाटते, असे एकदा ऐकून पाठ होणार्‍याना एकपाठी, दोनदा ऐकून पाठ करणार्‍याला द्विपाठी इ. म्हणत असत. ऐकून शिष्यपरंपरेने चालत आलेल्या या ग्रंथांना म्हणूनच "श्रुति" असे नाव दिले होते. लिखाणाची कला अवगत नव्हती तेव्हा किती वर्षे हे सगळे मौखिक परंपरेने चालत आले होते याच्या कल्पनेने स्तिमित व्हायला होते. मी लहान असताना सगळे पाठांतर स्तोत्रे, श्लोक, गीताअध्याय दोन वेळा ऐकून बिनचूक म्हणू शकत होते. हळूहळू ते सगळं हरवलं. :(

In reply to by पैसा

बॅटमॅन गुरुवार, 01/15/2015 - 11:48
ऐकून शिष्यपरंपरेने चालत आलेल्या या ग्रंथांना म्हणूनच "श्रुति" असे नाव दिले होते. लिखाणाची कला अवगत नव्हती तेव्हा किती वर्षे हे सगळे मौखिक परंपरेने चालत आले होते याच्या कल्पनेने स्तिमित व्हायला होते.
आणि तितकेच महत्त्वाचे म्हणजे हे सगळं इतकी वर्षे टिकून राहिलं हेही आश्चर्यकारक आहे. भारतासारख्याच मौखिक परंपरा अन्य देशांतही होत्या, उदा. ग्रीस, इराण, इंग्लंड, इ. पण त्या परकीय आक्रमणांपुढे टिकल्या नाहीत. रोमनांनी केल्टिक धर्म खाल्ला, मुसलमान आक्रमणापुढे इराणी झरथ्रुष्टी धर्मही जवळजवळ संपलाच. ग्रीसमधली मौखिक परंपराही पुढे लोपलीच. पण भारतातली मौखिक परंपरा मात्र सर्व धक्के पचवून अजूनही टिकून आहे. गेली किमान तीनेक हजार वर्षे पाठांतराची ही पद्धत जवळपास आहे तश्शी टिकून आहे.

In reply to by बॅटमॅन

पॉइंट ब्लँक Sun, 03/15/2015 - 13:28
हो, ईतक्या परकिय आक्रमणांनतरही हे ज्ञान टिकून राहीले हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. पण आजकाल सेक्युलर व लिबरल या नावाखाली जे काही हिंदु या धर्माशी संबधित आहे त्याची लाज वाटण्याचा आणि त्याग करण्याचा को आजार पसरलाय तो पहाता परिस्थिती बिकट आहे असं वाटू लागले आहे. अत्रुप्त तुम्ही ही माहिती सर्वांपर्यंत पोचवण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्याचे कौतुक आहे.

राजाभाउ गुरुवार, 01/15/2015 - 11:45
खुपच छान माहिती मिळाली. याविषयी नेहमीच कुतुहल वाटते. ओळखीच्या एका गुरुजींबरोबर एकदोनदा चर्चा केली होती पण इतकी नीट माहीती मिळाली नव्हती त्यामुळे धन्यवाद. एक शंका आहे कि वेदाभ्यास शिकवताना त्याचा अर्थही समजाउन सांगितला जातो का? आमचे गुरुजी (ते स्वता: याद्निक चुडामणी आहेत आणि त्यांचा संस्क्रुत चा अभ्यासही चांगला आहे) नेहमीच कार्याच्या वेळी आपण काय विधी करतोय वगैरे थोडक्यात समजाउन सांगतात. पण बर्याच ठिकाणी असे घडताना दिसत नाही. याचा एक किस्सा असा झाला होता. माझ्या एका मित्राकडे त्याच्या वडिलांच्या श्राध्दासाठी आलेल्या गुरुजींनी सांगितले कि तुम्ही श्राध्द चालविले आहे तर तुम्ही रात्री जेवायचे नाही, उपासाचे खाल्ल तर चालेल त्याने विचारले असे का वगैरे तर ते काय उत्त्र त्या गुरुजींनी दिले नाही, नंतर दुसर्या गुरुजींना विचारले तेंव्हा कळले कि ज्यांचे श्राध्द झाले त्या तुमच्या आप्तस्वकिंयासाठी तुम्ही प्रार्थना करणे अपेक्षित आहे. तर हे कसे करयाचे तर नामस्मरण किंवा एखादी पोथी,स्तोत्र वगैरे असे काहीही वाचु शकता अता ते करताना झोप येवु नये म्हणुन उपास. आता यातले महत्वाचे काय तर प्रार्थना पण गुरुजी ते न सांगता केवळ कर्मकांडच सांगतात. म्हणुन विचारले कि हे शिकवले जाते का ? का हे नंतर शिकतात आपापले?

In reply to by राजाभाउ

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 01/15/2015 - 17:52
@ नंतर दुसर्या गुरुजींना विचारले तेंव्हा कळले कि ज्यांचे श्राध्द झाले त्या तुमच्या आप्तस्वकिंयासाठी तुम्ही प्रार्थना करणे अपेक्षित आहे. तर हे कसे करयाचे तर नामस्मरण किंवा एखादी पोथी,स्तोत्र वगैरे असे काहीही वाचु शकता अता ते करताना झोप येवु नये म्हणुन उपास. आता यातले महत्वाचे काय तर प्रार्थना पण गुरुजी ते न सांगता केवळ कर्मकांडच सांगतात.>>>> हे ही तुंम्हाला जे संगितलं ते त्या वेळेवर देण्याचं उत्तर आहे. (धर्मशास्त्राच्या अर्थाप्रमाणे) खरं उत्तर असं, की..रात्रि न जेवण्याचा हा नियम (श्राद्धकर्ता)यजमान आणि श्राद्धाला जेवायला बसलेले ब्राम्हण या दोघांनाही आहे. त्याचे (धर्मशास्त्राच्या अर्थाप्रमाणे) असलेले कारण म्हणजे, त्या जेवणार्‍या ब्राम्हणांच्या शरिराला मृताचा आत्मा माध्यम म्हणून वापरतो..आणि काहि अन्न त्याच वेळी त्याद्वारे सेवन करतो..नंतर अन्नाचा वायुप्राणमय भाग जेवणानंतर पासून ,ते दुसर्‍या दिवशी दुपारच्या भोजनवेळे पर्यंत शरिरातून नानाप्रकारे बाहेर पडत असतो. तोही या (श्राद्ध दिवशी घरी आलेल्या) मृतात्म्यांना सेवायचा असतो. आता अश्यामधे जर का संध्याकाळी अन्नसेवन झाले,तर ह्या धर्मजीवशास्त्रीय कल्पने प्रमाणे श्राद्धसेवितअन्नाचे पुढील वायुप्राणमय भागात रुपांतर होण्यास अडचण अगर बाधा येइल. आणि मग ते त्या पितराला/आत्म्याला मिळणार नाही. व श्राद्धाचा उद्देश संपून श्राद्ध वाया जाइल.म्हणून काहिही खायचे नाही. अर्थात ही धर्म शास्त्रानी (लढवलेली आणि मढवलेली) कल्पना आहे. खरा उद्देश:- श्राद्धान्न, हे पचायला अत्यंत जड.. त्यातही ते दुपारी १२ च्या नंतर आणि ते ही यजमानाचे पितर आपले ठायी तृप्त झाले...हे त्याला वाटावे..म्हणून कचकाऊन हाणलेले!*..किंवा यजमान व मुख्य गुरुजिंच्या भावु'क युतीने त्या श्राद्ध जेवणार्‍याला खायला-लावलेले!!!... म्हटल्यावर यावर जर रात्री जेवलं तर ते पचेल का? बास ...बात खतम!... हा न्याय यजमानाला त्याच्याघरी श्राद्ध जेवणार्‍यां ब्राम्हणांना लावणे.. म्हणजे, दोघांच्याही प्रकृतीस सदर दिवशीच काहि बाधा होऊ नये..या कारणानीच आहे.. पण माणसे दोन्ही प्रकारची असतात. कुणी धर्मशात्रीय कल्पनांनी ऐकतील्,तर कुणी फक्त उपयुक्ततावादानी ऐकतील. म्हणूनच मी वरील प्रमाणे दोन्ही विवेचने, मला विचारणार्‍या लोकांसमोर ठेवीत असतो. माझा लोकसमंजस पणावर (अनुभवांती) भरपूर विश्वास आहे. आणि अपवाद वगळता या पद्धतीने ऐकल्या'नंतर फारसे कोणीच ना..म्हणत नाही. ज्याला जे आवडतं , तो ते निवडतो. :) (* :-सदर दोन शब्द हे कल्पना स्पष्ट व्हावी,म्हणून मुद्दाम अश्या लेखनातंही वापरलेले आहेत.गैरसमज नसावा. ) @म्हणुन विचारले कि हे शिकवले जाते का ? का हे नंतर शिकतात आपापले?>>> नाही.. हे पाठशाळेत शिकविले जात नाही.. हे माझ्यासारखे माझे पुरोहित मित्र..आपापल्या आकलनशक्ति व वकुबाप्रमाणे जुन्या लोकांकडून ऐकून त्यात नविन(काळातल्या) माहितीचा (आणि मनातल्या नितीचा) उपयोग करून आपल्या पर्यंत पोहोचवित असतात. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

राजाभाउ गुरुवार, 01/15/2015 - 19:05
अच्छा... असे आहे तर ते. मनापासुन धन्यवाद !! तुम्ही लिहीत रहा या विषयावर. एक तर खुप नविन काही कळत आहे आणि तुमची लिहीण्याची शैली फारच छान आहे.

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/15/2015 - 12:02
लेख प्रचंड आवडला. कुतुहल असलेल्या बर्‍याच गोष्टींबद्दल माहिती मिळाली. विकीवर नक्की टाका. भाषा लेखनाचा शोध लागण्यापूर्वी साहित्याची मूळ संहिता पुढच्या पिढीला पोहोचविण्यासाठी पाठांतराशिवाय इतर काही व्यवस्था नव्हती. अनेक पिढ्या पुढे जातानाही साहित्य पाठभेदरहित रहावे यासाठी शब्दांचा क्रम आणि उच्चार बदलविरहित आणि शुद्ध राहणे अत्यंत आवश्यक होते. त्यासाठी आवश्यक असलेल्या शुद्ध पाठांतरासाठी तयार केलेली संथा ही व्यवस्था सोप्या शब्दांत समजाऊन दिल्याबद्दल आभार. पाठांतर चांगले व्हावे यासाठी वापरलेले अजून एक तंत्र म्हणजे सगळे प्राचीन साहित्य गेय काव्य आहे. गेय काव्य बरेच नियमबद्ध असल्याने आणि त्याचे लक्षात राहणे जास्त सहज असल्याने त्यातले शब्द, ते उच्चारण्याची पद्धत (र्‍ह्स्व-दीर्घ, इ) आणि त्यांचा क्रम बदलणे कठीण होते... म्हणजे साहित्य मूळ रुपात राहण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वेद-उपनिषदे-पुराणेच नव्हे तर जुनी नाटकेही काव्यरुपातच लिहीली गेली आणि कालिदास, भर्तृहरी इ लेखक नाटककार यापेक्षा जास्त कवी म्हणूनच प्रसिद्ध आहेत. आपल्याला आज त्या गोष्टी मे बी इर्रिलेवंट वाटत असतील त्या त्यावेळी खूप रिलेवंट किंवा 'लय भारी' ज्ञान, माहिती, कविता, नियम असू शकतात. सहमत. कदाचित् आजच्या घडीला रिलिव्हंट असलेल्या काही गोष्टीसुद्धा असू शकतीलही... पण सर्वसाधारणपणे असे दिसते की टीका करणार्‍या लोकांनी आणि त्यांना अनुमोदन देणार्‍या लोकांनी प्राचीन लेखनाचा अभ्यास केलेला नसतो आणि इतरांना स्वतःच्या कामाच्या धबडग्यात त्यात लक्ष घालण्याइतके ते "फायदेशीर" वाटत नाहीत. जाणकारांनी प्राचीन लेखनाचा केवळ पाठांतरासाठी पाठांतर अथवा अभ्यासासाठी अभ्यास करण्याच्या पुढे एक पाऊल टाकून त्या लेखनात सद्यस्थितीत उपयोगी काही संदर्भ आहेत का हे अभ्यासल्याशिवाय आणि त्यातले उपयोगी भाग (मग ते केवळ साहित्य म्ह्णून उपयोगी का असेनात) सद्या मान्य असलेल्या पद्धतीने पुढे मांडले पाहिजे. अन्यथा "ते साहित्य उपयोगी/निरुपयोगी आहे" हा निरर्थक वाद असाच चालू राहील.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सुबोध खरे गुरुवार, 01/15/2015 - 13:06
एक्का साहेब आजच्या जगात जे ज्ञान आपल्याला दमड्या मिळवण्यासाठी उपयुक्त आहे तेच महत्त्वाचे बाकी सर्व "वायफळ" असा बर्याच तरुण लोकांचा भ्रम आहे. हेच लोक जेंव्हा भरपूर पैसे मिळवतात आणि आता त्यात काही राम राहिला नाही( म्हणजे भरपूर पैश्याने सगळेच प्रश्न सुटतात असे नाही हे लक्षात आल्याने) कि मग वेद ब्रम्हविद्या,योग प्राणायाम इ अशा जुन्या गोष्टीत रस घेऊ लागतात असे दिसते.) व पु काळे यांनी लिहिले आहे कि गीता हि १६ वर्षाच्या माणसाने वाचली( समजली) पाहिजे तर त्याला आयुष्यात जास्त फायदा करून घेत येईल ६० व्या वर्षी तेवढा होणार नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन गुरुवार, 01/15/2015 - 13:11
जाणकारांनी प्राचीन लेखनाचा केवळ पाठांतरासाठी पाठांतर अथवा अभ्यासासाठी अभ्यास करण्याच्या पुढे एक पाऊल टाकून त्या लेखनात सद्यस्थितीत उपयोगी काही संदर्भ आहेत का हे अभ्यासल्याशिवाय आणि त्यातले उपयोगी भाग (मग ते केवळ साहित्य म्ह्णून उपयोगी का असेनात) सद्या मान्य असलेल्या पद्धतीने पुढे मांडले पाहिजे.
अर्थातच. आणि जुन्या काळीसुद्धा संस्कृतात ग्रंथरचना करणारे लै कमीच लोक्स होते. फक्त ३.५% लोकांना संस्कृत येते असे गृहीत धरले (हेही लैच झाले) तरी त्या ३.५% पैकीही ग्रंथरचना करणारे १-२% च असतील जास्तीत जास्त. बायकांना ऐकून ऐकून कळेल तेवढेच, नपेक्षा कॉमनलि स्त्रियांना संस्कृत शिकवत नसत. त्यामुळे निम्मे लोक्स तिथेच गळाले. उरलेल्या १.७५% पैकीही २% म्हणजे ०.०३५% इतकेच लोक असावेत टोटल लोकसंख्येच्या. म्हणजे दहा हजारात ३५. हेही प्रमाण जरा जास्तच वाटतंय, पण असो.

सुकामेवा गुरुवार, 01/15/2015 - 15:55
मुलांकडून लहानपणी पाठांतर करून घेतले ते उत्तम पद्धतीने लक्षात राहते व मेंदूची कार्यक्षमता वाढते. वय वाढल्यावर अर्थ समजून सांगितला जातोच किंवा तो संदर्भ लावून शोधणे सोप्पे जात असेल.

नरेंद्र गोळे गुरुवार, 01/15/2015 - 16:27
अतृप्त आत्माजी, ह्या लेखाखातर आपणास मनःपूर्वक धन्यवाद. मौखिक पाठांतरांची नितांत आवश्यकता मी खालील लेखात वर्णन केलेली आहे. http://www.misalpav.com/node/25439 अनेक आचरणसूत्रांच्या समुच्चयाने संपन्न झालेल्या संहितेस योग म्हणू लागले. योगाचे वर्णन अष्टांग-योग असे केले जाऊ लागले. अष्टांगयोगानुसार वर्तन करत गेल्यास प्रत्येकासच, कैवल्य म्हणजेच मोक्ष प्राप्त होऊ शकतो, अशा निष्कर्षांप्रत आपले पूर्वज आलेले दिसतात. भारतीय ब्रह्मविद्येचे लेखन वेळोवेळी, सूत्ररूपे होतच राहिले. गीतेत कृष्णाने अर्जुनास केलेल्या उपदेशास, व्यास मुनींनी शब्दबद्ध करून ठेवलेले आहे. गीतेतील, अनुष्टुभ छंदात लिहिलेले, ६९७ श्लोक, ब्रह्मविद्येचे सर्व सैद्धांतिक पैलू सविस्तर उलगडून दाखवण्यास समर्थ आहेत. त्याचप्रमाणे पतंजली मुनींनी १९५ योगसूत्रांत लिहून ठेवलेली योगसूत्रे जीवनातील अनुभवसाराचे प्रात्यक्षिक पैलू शब्दबद्ध करतात. मात्र सूत्रांत सांगितलेले वर्ण्य विषय, उत्तम भाषाज्ञानाशिवाय सहजी आकलनयोग्य, राहत नाहीत. म्हणूनच त्यांच्या स्पष्टीकरणार्थ आपले वेद, आपली पुराणे, आपले योगशास्त्र इत्यादींची भर आपल्या संस्कृतीत सतत पडत गेली. १४ विद्या आणि ६४ कलांनी संपन्न जनजीवनाची गुरूकिल्ली, ह्या सर्व संहितांत मिळून भारतीय समाजाने आजही मुख्यतः मौखिक परंपरेने सांभाळून ठेवलेली आहे. . त्या मौखिक परंपरेच्या वंशसातत्याची गुरूकिल्ली आज आपण येथे प्रस्तुत केलीत त्याखातर अतृप्त आत्माजी, आपणास अनेकानेक धन्यवाद. ह्यासंदर्भात असंख्य प्रश्न इथे आधीच उपस्थित होवून आपण यथाशक्ती उत्तरेही दिलेली आहेत. माझ्याही मनात असंख्य प्रश्न आहेत. वर्तमान भारतीय जनतेस आपल्या ऊर्जस्वल परंपरेचा निदान अर्थ तरी कळावा म्हणून आपण हा ज्ञानयज्ञ असाच चालू ठेवावा ही विनंती. माझ्याही काही प्राथमिक प्रश्नांची उत्तरे द्यावी ही विनंती. . १. http://www.misalpav.com/node/29916 वेदमूर्ती अशा का आहेत ते मला माहीत नाही. आपण सांगू शकाल काय? २. चारही वेदांतील ऋचांची संख्या प्रत्येकी किती आहे? ३. दशग्रंथी ब्राम्हण तयार करणार्या वेदपाठशाळांची भारतातील एकूण संख्या किती असेल? ४. त्यात दरसाल पूर्णवेळ वेदविद्या शिकणार्या विद्यार्थ्यांची संख्या किती असेल? ५. ऋषी आणि मुनी ह्यांत काय फरक असतो?

In reply to by नरेंद्र गोळे

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 01/15/2015 - 16:44
नरेंद्र गोळे आपल्या प्रतिसादप्रोत्साहनाबद्दल शतशः धन्यवाद. आपल्या चारंही प्रश्नांची उत्तरे देताना कोणतिही माहिती (माझ्याचकडून) राहू अथवा चुकू नये.या साठी मी आपले सदर पाचही प्रश्न आमच्या व्हॉट्सप वरील.. अश्याच गोष्टींवर काम करणार्‍या एका समुहाकडे सूपूर्त करित आहे. तेथून माहिती मिळताच. मी ती आपल्या पर्यंत व्य.नि.तून पोहोचवतो. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/15/2015 - 16:48
ती माहिती व्यनीतून देण्याऐवजी / व्यनितून देण्याबरोबर इथेही टाकली तर इतरांनाही त्या माहितीचा फायदा होईल. तेव्हा ती इथे/ही टाकाच.

In reply to by अत्रुप्त आत्मा

अभ्या.. गुरुवार, 01/15/2015 - 19:51
+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११ गुरुजी, ह्यो धंदा बी सोप्पा नाय राव. लैच चिकाटी तुमची. कळलं एवढेच की लै कष्ट उपसायलसा तुमी. . . (एक फ्लेक्स बसवला जाईल तुमच्या सन्मानार्थ...टोटल फ्री आपल्यातर्फे)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अभ्या.. गुरुवार, 01/15/2015 - 20:09
एक्का काका, असले लै जणांचे लै चित्रं हायेत बर्का माझ्याकडे. गुर्जीनी सुपारी दिली तर औघड हुईल. ;) . . (माझं एकदा लग्न लावू दे गुर्जी मग स्कूटरवाला काय तुम्ही सांगाल तो फोटू टाकतो. :) )

In reply to by अभ्या..

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/15/2015 - 20:22
मग ठरलं तर ! इकडे तुम्चं लग्न लागलं की तिकडे एक गल्ली भरून (गणेशोत्सव ईष्टाईलमध्ये) फ्ळेक्समालिका लाऊ, कसं ? ;) ;)

In reply to by नरेंद्र गोळे

मदनबाण Wed, 02/18/2015 - 14:22
५. ऋषी आणि मुनी ह्यांत काय फरक असतो? या बद्धल अधिक इकडे :- ऋषि मुनि

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- स्वाईन फ्लूचा कहर, देशात 624 बळी, राज्यात बळींचा आकडा 72 वर

आयुर्हित गुरुवार, 01/15/2015 - 20:26
आमचा संबंध फक्त गीतेच्या काही ठराविक अध्यायांना संथा लावून घेण्यापर्यंतच आला आहे. त्यामुळे अधिक नवीन माहिती मिळाली. उत्तम माहितीपूर्ण लेख लिहिल्याबद्दल अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद. आपण प्रतिसादात लिहिले आहे की, रात्री न जेवण्याचा हा नियम: (श्राद्धकर्ता)यजमान आणि श्राद्धाला जेवायला बसलेले ब्राम्हण या दोघांनाही आहे. यावर काही शंका : जैनधर्मात सर्व लोकांसाठी रात्री न जेवण्याचा नियम आहे. पण वैदिक/सनातन धर्मात १)सर्वसामान्य ब्राह्मण(किंवा ब्राह्मणेतर) गृहस्थाश्रमी लोकांसाठी रात्री न जेवण्याचा नियम/काही उल्लेख आहे काय? २)ब्रह्मचर्यश्रम पाळणाऱ्या वर्गासाठी रात्री न जेवण्याचा नियम/काही उल्लेख आहे काय? ३)आत्ताच्या वेदशाळेत जावून वेदाभ्यासी मुलांसाठी रात्री न जेवण्याचा नियम/काही उल्लेख आहे काय? ४)शेवटच्या वर्षाला हा कालावधी १६ ते १८ तासांपर्यंत जाऊन बसतो असे आहे तर नेमके जेवतात केव्हा? हे चारही सारखे दिसणारे पण वेगवेगळी प्रश्न आहेत, त्यामुळे कृपया वेगवेगळी उत्तरे अपेक्षित आहेत.

In reply to by आयुर्हित

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 01/15/2015 - 20:49
फ़क्त प्रश्न -४ चे उत्तर देतो! शिल्लक ८ तासात हे गाणित सहज बसते. त्याचे स्पष्टीकरण हवे असल्यास व्य.नि. करा. तिथेच देइन. :) बाकीच्या सर्व शंका निरसनासाठि बापटशास्त्रिं चे मनुस्मृति चे -माराठी भाषांतर वाचा. त्यात आख्खा आचारधर्मच पहायला मिळेल. मी इथे ती उत्तरे, देत बसू शकत नाही! क्षमस्व!

भृशुंडी गुरुवार, 01/15/2015 - 23:44
एक शंका आहे- घनपाठी/एकपाठी वगैरे जे भेद आहेत, त्या पद्धतीने पठण अजून होतं का?

मदनबाण Fri, 01/16/2015 - 02:45
हा अनुभव अगदी जवळुन घेतला, पण तुमच्या कडुन बरीच नवी माहिती कळली त्याबद्धल होलसेल मधे आभार ! :) बाकी लेखाचे शिर्षक वाचल्यावर आधी उगाच हा प्रतिसाद ट्रिगर ठरला की काय असे वाटले होते ! ;) @ गोळे काका आपला प्रतिसाद फार आवडला, आणि तुम्ही विचारलेले प्रश्न विचार करण्यास प्रवॄत्त करणारे आहेत. :) बाकी विश्वामित्राचा क्षत्रिया पासुन ब्रम्हर्षी होण्याचा प्रवास { कथा } वाचण्यासारखी आहे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मधुबन खुशबु देता है... { Saajan Bina Suhagan }

In reply to by खटपट्या

भृशुंडी @घनपाठी/एकपाठी वगैरे जे भेद आहेत, त्या पद्धतीने पठण अजून होतं का?>> होय. होतं. आणि दशग्रंथ पूर्ण झाले,की तो -दशग्रंथी ब्राम्हण.. त्यातल्या संहितेचे- पद/क्रम म्हणला, कि तो- क्रमांती , पुढे जटा/माला/घन म्हणला,कि तो घनपाठी ब्राम्हण.. , असे ते स्तर आहेत. त्यात हे एकंपाठी द्विपाठी त्रिपाठी ... येत-नाही. ह्या संज्ञा, पाठांतर शक्तिची- नामरूपं म्हणून ओळखल्या जातात. ==================================== मदनबाण @पण तुमच्या कडुन बरीच नवी माहिती कळली त्याबद्धल होलसेल मधे आभार! >> धन्यवाद बाणोबा! :) ==================================== खटपट्या @ब्राम्हणेतर मंडळी या वेदशाळेत प्रवेश घेउ शकतात का ?>>> दुर्दैवाने अजून तरी..नाही! :( (आमच्या लोकांना काय होतं,मला कळत नाही.मी अनेकदा हा विषय काढतो.(ब्राम्हण) स्त्रियांनाही आपल्यातल्याच काहि जणांनी ,नाहि का शिकवलं?..तसच हे ही! असं म्हणतो..त्याला अनेकजण सहमत होतात,पण पुढे प्रतिसादच देत नाहीत.काहिजणं तिरस्कार करतात.व्यवसाय भयास्तव पाण्यातंही पहातात.पण हे सगळं होणारच. असं मी गृहीत धरुन ठेवल्यामुळे (आता) मला त्याचा त्रास होत नाही. मी माझ्याकडून प्रयत्न सुरुच ठेवलेले आहेत. :) ) नाहि म्हणायला, आमच्यातले काहि लोकं ,असा कुणी ब्राम्हणेतर शिकायच्या इच्छेनी आला,तर त्याला शिकवायला तयार होतात,पण ते ही फक्त पुराणोक्त विधी/अध्ययन..! २००४ साली,मी एकंदर ३ ब्राम्हणेतर मुलांना (वेदोक्त..)शिकवायला घेतले होते. (मस्त तयार होत होते तिघेही!) तो एका खर्‍या हिंदूहितवादी संघटनेचा सामाजिक उपक्रम होता. पण पुढे काहि कारणास्तव ते सारेच बारगळले. तरिही,त्यानंतर.. मी कुणालाहि शिकवायला तयार होतो/आहे/राहिन. हे मानशी बाळगून आहे. ====================================

In reply to by अत्रुप्त आत्मा

खटपट्या Fri, 01/16/2015 - 12:18
तुमच्याबद्द्ल आधी आदर होताच आता दुणावला !! परत एकदा, जालावर तुमच्यासारख्या गुर्जींना ओळखतो याचा अभिमान आहे.

In reply to by खटपट्या

टवाळ कार्टा Fri, 01/16/2015 - 14:28
मग....उग्गीच्च नै त्येंला आमी गुर्जी म्हंतो :) ग्रेट"च" हैत त्ये...जेपीला सांगून वाड्डिवसाचा फ्लेक्ष पन लाव्णार है :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस Fri, 01/16/2015 - 14:01
ब्राम्हणेतर मंडळी या वेदशाळेत प्रवेश घेउ शकतात का
ब्राह्मणांव्यतिरिक्त क्षत्रियांना (प्राचीन काळी) वेदाध्ययनाचा अधिकार होता याची अनेक उदाहरणे आहेत. नंतर हा अधिकार का बंद झाला असावा/ काढून घेतला असावा कल्पना नाही. कदाचित भृगु आणि क्षत्रिय संघर्षांमुळे?

In reply to by प्रचेतस

पैसा Fri, 01/16/2015 - 14:14
क्षत्रियांना वेदाध्ययनाचा अधिकार बंद झाला नाही. कारण त्यांची मुंज होणे अपेक्षित आहे शिवाय वेदोक्त प्रकरणातही "ते क्षत्रिय नसल्याने त्यांना वेदोक्त पद्धतीचा अधिकार नाही" असा युक्तीवाद झाला होता. त्यावरून हा अध्ययनाचा अधिकार बंद झाला असावा असे वाटत नाही. प्रश्न बहुधा कोणाला क्षत्रिय म्हणावे असा असावा. त्यातही कलियुगात कोणी क्षत्रिय शिल्लक नाही असे पिल्लू कोणीतरी सोडले होते. कोण ते माहीत नाही. तेही कारण असावे. ब्राह्मणेतरांसाठी वेदपाठशाळा गोव्यात तपोभूमी, कुंडई इथे आहे. http://www.srigurudev.org/index2.html. या संस्थेतर्फे योगाचा प्रसार इत्यादि इतरही अनेक उपक्रम राबवले जातात. तिथल्या सध्याच्या स्वामींबद्दल मी काही बोलत नाही. पण संस्थेचा मूळ उद्देश चांगला आहे.

सिरुसेरि Fri, 01/16/2015 - 15:22
आमच्या रसायन शास्त्र च्या सरांनी पहिली 20 मुलद्रव्ये अशीच पाठ करून घेतली होती . त्याची आठवण झाली . H He Li Be B C N O F Ne Na Mg Al Si P S Cl Ar K Ca

जयंत कुलकर्णी Sun, 03/15/2015 - 07:12
धन्यवाद ! ही जी पाठांतराची पद्धत आहे, त्यात थोडा बदल करुन, ती जर सुटसुटीत करुन, लागल्यास दोन पानी मजकुराचे उदा. देऊन जर एक प्रोसेस लिहिलीत तर मुलांना बराच फायदा होईल. (आहे तशीच कदाचित लागणार नाही) कारण जो पर्यंत आपल्या येथे जी परिक्षापद्धती आहे ती अशीच राहणार असेल तर पाठांतराचे महत्व कधिच कमी होणार नाही. आणि कशीही असली तरी ज्या गोष्टी आपल्याला परिक्षा काळात शोधून काढायच्या नसतात किंवा पुस्तकात बघण्यास परवानगी नसते त्या लक्षात ठेवाव्या लागतातच.

मी वेदाध्ययनातील- संथा देणे... म्हणजे काय? हा लेख लिहिला, आणि नंतर..तो ,आमच्या पौरोहित्य करणार्या (पुण्या/मुंबईच्या) भटजी लोकांमधे,मी व्हॉट्सपवर लिंक देऊन शेअर केला होता. आणि काल आमच्या एका वादविवादा च्या ग्रुपवर सदर लेख परांजपे, नावाच्या मुंबईच्या आमच्याच एका (मला अज्ञात..असलेल्या) पुरोहिताने ,स्वतःच्या नावे शेअर करण्यास (कदाचीत गेला १ किंवा २ अठवडे..) सुरवात केली आहे. वर शहाजोगपणानी... "@ परांजपे गुरुजी@ हा लेख माझा आहे .या मध्येकाहि बदल करु नये" असं निर्लज्जपणानी लिहुन मोकळा झालेला आहे. यावर कॉपिराइट अथवा अन्य कोणत्याही अॅक्टनुसार काहि कारवाई करता येते काय? कृपया मला सांगा. __/\__

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस Sun, 03/15/2015 - 08:55
अगदी असाच फ़ॉरवर्ड मला आला होता. बाकी ते कारवाई कशी करायची ते मला माहीत नाही पण एकदा माझा लेख दुसऱ्या कोणाच्या ब्लॉगवर जशाच्या तसा छापून आल्यावर मी गूगल साईटवर तक्रार दाखल केली होती आणि त्यांनी तो ब्लॉग काढून टाकला होता.

माहितगार Sun, 03/15/2015 - 09:39
यावर कॉपिराइट अथवा अन्य कोणत्याही अॅक्टनुसार काहि कारवाई करता येते काय? कृपया मला सांगा
कॉपीराईट कायदा तुम्हाला दोन अधिकार देतो पहिला प्रताधिकार ज्यात तुम्ही निर्मित केलेली तुमची स्वतःची कृती तुमच्या मालकीची असते. त्याच कायद्यान्वये तुम्ही काही कारणाने मालकी हक्क सुपूर्त केले अथवा कॉपीराईट लेखकाच्या पश्चात ६० वर्षांनी पब्लिक डॉमेन मध्ये आले तरीही कृतीवरचे तुमचे नाव बदलता येत नाही - हा लेखकाचा नैतीक अधिकार झाला. म्हणजे संत तुकारामांच्या कृतीला समर्थ रामदासांचे नाव आणि समर्थ रामदासांच्या कृतीला तुमचे नाव वापरता येत नाही त्या पब्लिक डॉमेन मध्ये असल्यातरीही. कोणत्याही माध्यमातून तुमची कृती अनधिकृतपणे पुनःप्रसारित केली जात असेल तर अशा माध्यमास तुम्ही ते प्रसारण तातडीने बंद करण्यास सांगू शकता. पण २१ दिवसांच्या आत काँपीटंट कोर्टाचा आदेश प्राप्त करून घ्यावा लागतो समजा तसा आदेश २१ दिवसात प्राप्त न झाल्यास संबंधीत माध्यम त्या मजकुर कोर्टाचा आदेश येईपर्यंत पुनः प्रक्षेपीत करता येतो हे सर्वसाधारण आंतरजालास लागणाराच नियम. व्हॉटअ‍ॅप आंतरजालीय सुविधा नाही पण सर्वर वगैरे वापरत असावेत अशाच काही स्वरुपाचा नियम त्यांनाही लागू होत असावा. कायद्याच्या दृष्टीने यात बराच किस पाडून अभ्यास करावा लागेल. काही अडचणी असू शकतात. (जसे विकिपीडिया प्रताधिकारमुक्तीचे नियम लावतो तेथे कॉपीराईट शाबुत ठेऊन हवा असल्यास जसेच्या तसे लेखन विकिपीडियावर देणे टाळावे. आपले स्प्ष्टीकरण येईपर्यंत आणि हि चर्चा पूर्ण होई पर्यंत मराठी विकिपीडियावरील आपण टाकलेला(टाकवलेला) मजकुर मी तिथे झाकला आहे. थोडक्यात विकिपीडियावर अलंकारीक भाषा विशेषणे इत्यादी ललित लेखन शैली वगळून मजकुर टाकल्यास तुम्हाला ललित शैलीवरचा प्रताधिकार स्वतंत्र ठेऊन विकिपीडियावर केवळ फॅक्ट बेस्ड लेखन करता येऊ शकते. विकिपीडियावरील लेखन कुणी इतरत्र प्रसारीत करत असेल तर अशा मजकुराच्या लेखातील लेखकांचा अथवा संपादन इतिहासाचा दुवा देणे अभिप्रेत असते त्यामुळे लेखकांच्या नैतीक आधिकाराची काळजी घेतली जाऊ शकते) कायदे विषयक अंमलबजावणी व्यवस्थीत करुन घेण्यासाठी वकीलाचा सल्ला आणि मदत लागू शकते. वकिलाचा सल्ला आणि इतर पाऊले उचला अथवा उचलू नका किमान पहिली पायरी म्हणून प्रताधिकार उल्लंघन असण्याबद्दल सर्वसाधारण सूचना तुम्ही असे उल्लंघन करणार्‍या व्यक्तीला आणि संबंधीत माध्यमाला त्वरीत देणे चांगले. कायद्याच्या माध्यमातून गोष्ट किती पुढे न्यायची याचा नंतर विचार करत बसता येऊ शकते. मी अजूनही माहिती शोधून देण्याचा प्रयास करेन. पण अर्थातच माझा सल्ला केवळ कोणतीही कायदेशीर जबाबदारी न घेणारे व्यक्तीगत मत आहे. कायदे विषयक सल्ला अधिकृत तज्ञांकडून घेणे हे श्रेयस्कर हे ओघाने आलेच.

In reply to by माहितगार

माहितगार Sun, 03/15/2015 - 15:29
२०१२ च्या अमेंडमेंट(ibnlive वृत्तदुवा हि पोस्ट देताना जसा दिसला) मध्ये पॉईंट ३२ मध्ये सेक्शन ५२ सबसेक्श्न १ च्या बी आणि सी संबधीत सुधारणा अभ्यासल्या तर '..........technical process of electronic transmission or communication to the public' अशी वर्डींग आहे जी व्हॉट अ‍ॅप सारख्यांनाही अ‍ॅप्लिकेबल ठरावयास हरकत नाही असे वाटते. लेखकाच्या नैतीक आधिकारांचा मुद्दा उपस्थित असलेली, दिल्ली हायकोर्टापुढे आलेली एक रोचक केस इंडियन कानून डॉट कॉमवर पाहण्यास मिळाली. अशा अजूनही केस असतील त्या इंडीयन कानून डॉट कॉम अथवा सर्वोच्च न्यायालयाच्या संस्थळावर शोधून पाहता येऊ शकतात. (हे केवळ व्यक्तीगत मत आहे कायदे विषय सल्ला नव्हे)

माहितगार Sun, 03/15/2015 - 10:15
मिसळपाव सोबत तुम्ही तुमचा लेख मायबोली किंवा तुमच्या कॉपीराईटची काळजी घेणार्‍या इतर संस्थळावर टाकला तर तुमचा कॉपीराईट शाबूत राहतो. पण विकिपीडियावर लेखन टाकताना कॉपीराईट बद्दल परिस्थिती पुर्णपणे बदलते. विकिपीडिया संपादन खिडकी खाली By saving changes, you agree to the Terms of Use, and you irrevocably agree to release your contribution under the CC BY-SA 3.0 License and the GFDL. You agree that a hyperlink or URL is sufficient attribution under the Creative Commons license. अशी सुचना दिलेली असते. थोडक्यात लेखामधील लेखकांमध्ये सहभाग असल्याच्या अप्रत्य्क्ष उल्लेखाच्या आवश्यकते पलिकडे तुमचा कॉपीराईट संपल्यात जमा होतो. लेखामधील लेखकांमध्ये सहभाग असल्याच्या अप्रत्य्क्ष उल्लेख आणि विकिपीडियाचा संबंढीत लेखाच्या इतिहासाच्या दुव्याचा संदर्भ दिल्या नंतर जगभरातील कोणतीही व्यक्ती तो मजकुर वापरण्यास बदलण्यास अगदी स्वतःचे इतर बदल करून अथवा तसेच कमर्शीयली सुद्धा विकू शकते. विकिपीडियाच्या या निती मागे काही चांगले उद्देश नक्की आहेत कि जेणे करुन ज्ञान हे कोणत्या न कोणत्या माध्यमातून सर्वसामान्य जनते पर्यंत शक्य तेवढ्या सुलभतेने पोहोचत राहावे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा जसे तुमचा हा लेख ललित लेखन शैलीतील असलातरी माहिती पुर्ण लेख आहे. तो मला स्वतःला विकिपीडियात जसाच्या तसा घेण्याच्या आड कॉपीराइट अ‍ॅक्ट येतो हे खरे आहे परंतु कॉपीराईट फॅक्ट्स किंवा वस्तुस्थितीवर आणि आयडीयांवर लागू शकत नाही (तो तुमच्या लेखन शैली इत्यादीवर असतो). माऊंट एव्हरेस्ट सर्वात उंच पर्वत आहे त्याची उंची क्ष आहे यातील फॅक्ट्वर कॉपीराईट लागू शकत नाही. हि माहिती कशी सांगितली गेली यावर कॉपीराईट लागतो. त्यामुळे मी केवळ तुमच्या लेखातील फॅक्ट्स तेवढ्या घेऊन विकिपीडियातील लेखात (माझ्या स्वतःच्या शब्दात) भरू शकतो आणि संदर्भात तुमच्या या तुमचा आणि या लेखाचा उल्लेख करु शकतो. म्हणजे मी विकिपीडियावर मुख्यत्वे ललित लेखन शैली टाळावयास हवी शक्य तेवढी विशेषणे आणि लेखनातील आलंकारीकता टाळल्यास ते ज्ञानकोशीय शैलीतही येते त्या शिवाय कॉपीराईटचे उल्लंघनही टळते. हि चर्चा व्यनि एवजी धाग्यावर करतो आहे म्हणजे इतरांनाही या चर्चेचा लाभ घेता येईल.

माझा सर्व मिपाकरांना एक सल्ला आहे . सर्वांनी आपल Film Writers Association च सदस्यत्व घ्याव आणि तिथे आपल लिखाण तिथ रजिस्टर कराव . नावात फिल्म असल तरी तुम्ही आपल सगळ्याप्रकारच लिखाण तिथ रजिस्टर करू शकता . अगदी माफक पैशात हे होत . आणि सर्व प्रक्रिया online आणि सुलभ आहे . http://fwa.co.in/. हा त्यांचा संकेतस्थळ पत्ता . तिथे दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर फोन केलात तरी ते तुम्हाला सविस्तर माहिती देतात . जर काही अडचण असेल तर मिपाकर मला किंवा इथले सदस्य जयंत कुलकर्णी काकांना संपर्क करू शकता . एकूणच आपल लिखाण हि आपली बौद्धिक संपत्ती आहे आणि तिच्यावर कुणीही डल्ला मारू नये यासाठी आंतरजालीय लेखकांमध्ये जागृती होण हि काळाची गरज आहे .

प्रचेतस Sun, 03/15/2015 - 11:56
हे आत्म्या, आपला लेख चोरीस जाणे ही आपल्या लेखनास मिळालेली दादच समज आणि वृथा शोक करू नकोस. ह्या जगात शाश्वत असे काहीच नसते.

In reply to by प्रचेतस

जयंत कुलकर्णी Sun, 03/15/2015 - 18:37
कुठे तरी आहे ना ? तुम्ही म्हणता तसे, लेखन अशाश्वत होते जेव्हा ते कोणी वाचत नाही तेव्हा म्हणजे लेखका पुरता जगाचा अंतच की..... :-)

In reply to by जयंत कुलकर्णी

लेखन अशाश्वत होते जेव्हा ते कोणी वाचत नाही तेव्हा म्हणजे लेखका पुरता जगाचा अंतच की..... :-)
+++१११ पण जयंत काका..., अगोबा ढगोबा हत्ती उर्फ वल्लीमहाराज पिंप्रीकर (यांना सर्वकाहि नीट आधीच माहित असल्यामुळेच.. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing003.gif ) ते आशय सोडून तत्वातच भांडत बसतील... ( त्याच त्या त्यांच्या निरर्थक आत्मरंजक वृत्तीनुसार! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif ) त्यामुळे ... एकंदरीत..विषय 'सोडून द्या...' ;) कारण त्यांचेवर काहिच परिणाम होणार नाही. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing018.gif

तुमच्यासाठी दिवाणी किंवा फौजदारी दावा करणे असे दोन पर्याय आहेत मात्र त्यासाठी प्रचंड सातत्य आणि खर्च लागेल...प्रशांत परांजपेना तुम्ही वकिलातर्फे नोटीस पाठवून देखील सदर लिखाण चेपूवरून काढून टाकायला लावू शकता... जरी तुम्ही तुमचे लिखाण कॉपीराईट एक्टखाली नोंदवलेले नसले तरी त्याचे अधिकार अबाधित राहतातच... तत्पूर्वी चेपूचे लिखाण असलेल्या स्क्रीनचे फोटोही घेऊन ठेवा...

In reply to by माम्लेदारचा पन्खा

माहितगार Sun, 03/15/2015 - 17:20
खालील शंका मला खरेच माहित नाही म्हणून विचारतो आहे. * गुरुजींनी प्रतिसादात फेसबुकचा उल्लेख केलेला दिसत नाही. तसे फेस्बुकवरही झाले आहे का ? ** वकील न वापरता स्वतःच व्यक्तीगत विनंती/सूचना केली तरी फेसबुक कडून प्रतिसाद मिळू शकतो का ? * समजा वेळ नसेल अथवा आर्थीक कारणांनी लगेच केस करणे गुरुजींना जमत नसेल तर, कायदेशीर प्रक्रीयेसाठी अधिकतम किती कालावधीत दावा दाखल करावा लागतो, लिमीटेशन अ‍ॅक्ट खाली कालावधीच्या काही मर्यादा आहेत का ? ** समजा कुणाला कालांतराने दावा दाखल करावयाचा असेल तर कोण कोणते पुरावे गोळाकरुन ठेवणे आणि विटनेस चालू शकतील; व्हॉट अ‍ॅप्सवरील मेसेजचा पुरावा कशा पद्धतीने जतन करता येऊ शकेल ? (खास करून व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुकच्या केस मध्ये एका खाली एक शेकडो संदेश दिवसा गणिक येतात त्यातील आपला आक्षेप असलेला संदेशाचा पुरावा कसा जतन करावा. असे मेसेज पाहणारी इतर मंडळी विटनेस म्हणुन चालू शकतात का या विटनेस मंडळींनी काय काळजी घेतली पाहीजे. खास करुन जसे गुरुजींच्या केस मध्ये त्यांच्या आप्त ओळखीत कुणी वकील फारसे चार्जेस न लावता करुन देत असेल तर ठिक पण ऑदरवाईज असे खर्च सर्वसामान्य व्यक्तीला परवडणारे असणार नाहीत यावर इतर काही क्मी खर्चाचे मार्ग उपलब्ध आहेत का ?