मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फ्रेन्च कार्टूनिस्ट हत्याकान्डाबद्दल

संदीप डांगे · · काथ्याकूट
फ्रेन्च कार्टूनिस्ट हत्याकान्डाबद्दल सगळीकडे गदारोळ सुरु आहे. हजारो लोक रस्त्यांवर आले आहेत "अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला", "आम्ही सगळे चार्ल्स हेब्डो", वैगेरे वैगेरे. आणि त्यातल्याच काही अतिउत्साही महाभागांनी परिसरातल्या मस्जीदी उध्वस्त करून आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क बजावला. मृतांबद्दल सहानुभूती असणे योग्यच आहे पण ती किती योग्य ते जरा तपासून बघायला हवी. मी स्वतः एक कलाकार असून कट्टरवाद्यांच्या भूमिकेतून मी ह्या हल्ल्याचे समर्थन केले कारण कुणीतरी हा वेगळा दृष्टीकोन मांडणे आवश्यक आहे, जो काही धाडसी वार्तापत्रे मांडत आहेतच. जेणे करून ह्या हत्याकांडाच्या इतर बाबींवर प्रकाश पडावा व मुस्लिमांची जी एकच एक प्रतिमा रंगवली जात आहे तो प्रयत्न हाणून पाडवा. पण काही मित्रांना माझा हा पवित्रा खटकला आणि त्याचे चेपू वर पडसाद उमटले. तिथे उदधृत काही विचार माझ्यापेक्षा जास्त चांगला,व्यवस्थित आणि माहितीपूर्ण विचार करणाऱ्या जाणकार मिपाकारांसमोर ठेवत आहे. चर्चा अपेक्षित आहे. "चार्ल्स हेब्दो" ह्या साप्ताहिकाने केलेल्या खोडसाळपणाबद्दल आज कुणीही बोलत नाही कारण कुणाची हत्या होणे म्हणजेच फार भयंकर एवढेच सामान्यपणे लोक समजतात. ज्याची हत्या झाली तो भारी निष्पाप आणि मारणारा क्रूर अविचारी नराधम. त्याच वेळेस गोडसेच कसे बरोबर, गांधी कसे मारण्याच्याच लायकीचे होते हे गेली साठ वर्षे आपण चघळत आहोत. म्हणजेच काय तर मारणारा आणि मरणारा ह्यापैकी जो आपला त्याचीच बाजू बरोबर. ह्यासंदर्भात आपण दोन अतिशय वेगळ्या गोष्टी लक्ष्यात घेतल्या पाहिजेत, एक म्हणजे, "चार्ल्स हेब्दो" ह्या साप्ताहिकाने फार खवचट आणि असंस्कृत अश्या व्यंगचित्रातून पैगंबरांचा अपमान केला. त्या साप्ताहिकाचा असे करण्यामागचा हेतू जाणून बुजून भावना दुखावून उचकवणे (provocative) असाच होता. माझा आक्षेप हा हत्याकांडाच्या पूर्वी झालेल्या बेजबाबदारपणाबद्दल आहे. लोक आज म्हणत आहेत कि "साधे एक चित्र काढले तर थेट गोळ्या घालायची काय गरज होती?" ते चित्र इतरांसाठी साधे असेल मुस्लिमांसाठी नाही हा एक मुद्दा, त्यातल्या एका व्यंगचित्रकाराचे मत असे होते "माझ्यासाठी पैगंबर पवित्र वैगेरे काही नाही, मी काही कुराणाचा कायदा मानत नाही, मी फ्रेंच कायदा मानतो." म्हणजेच इतरांच्या श्रद्धास्थानाला घाणेरड्या पद्धतीने चितारणार, त्यांचा अपमान करणार, वरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गळे काढणार. म्हणजे त्याला ज्या पद्दतीने इतरांच्या आत्मसन्मानाची हिंसा करता येणार ते तो करणार, त्याच्यावर इतरांनी त्यांच्या पद्दतीने प्रतिकार केला तर चूक. हा काय तर्क आहे? शब्द आणि चित्रांचे वार जास्त घातक असतात. बंदुकीपेक्षा लेखणी ताकतवान ते उगाच नाही म्हणत. एक गोळी एका वेळेस एकाला मारते. एकच चित्र लाखोंना लाखो वेळा आणि आयुष्यभर मारते. त्यामुळे लेखणी चालवताना हजारदा विचार करावा लागतो. दुसरी गोष्ट अशी कि जाणून बुजून केल्या जाणाऱ्या अपमानाचा बदला घेण्याची त्यांची ती रीत असेल, चांगली आहे कि वाईट आहे ह्यावर "आपण" कितीही काथ्याकुट केला तरी ते लोक बदलणार नाही. "हम करे सो कायदा" असाच सगळा प्रकार आहे तिकडे. जे काही बदलायचे आहे ते हेच बदलायचे आहे. जगातल्या सर्व मुस्लिमांना हे जाणवून देणे आवश्यक आहे कि "हम करे सो कायदा" हा प्रकार त्यांच्या जीवावर इतर मुठभर लोक करत आहेत. आणि आज तो शांतीप्रिय मुस्लिमांना व जगाला त्रासदायक ठरत आहे. ते करायचे सोडून तुम्ही जर पैगंबर आक्षेपार्ह स्थितीत दाखवले तर शांतीप्रिय मुस्लिम सुद्धा भडकून उठतील आणि जो उद्देश आहे तो उरणारच नाही. माझा मुद्दा फार साधा आहे. दहशतवाद (कोणताही, कारण जगात मुस्लिम दहशतवाद सोडून इतर अनेक धर्माचे, देशाचे, समाजाचे दहशतवादी आहेत. मिडिया त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो हा भाग वेगळा) व त्याबद्दल लिहिताना किंवा चित्र काढताना किमान एक लक्ष्यात घेतले पाहिजे कि कुठल्याही दहशतवादाला केवळ एकच एक बाजू नसते. हजारो कारणे आहेत. एक कलाकार म्हणून तुम्हाला सर्वांगीण विचार किंवा समजूतदारपणा दाखवता येत नसेल तर तुम्ही मरण्याच्या लायकीचेच असाल. हुसैनला आपण हिंदुनी का भारताबाहेर घालवले मग? पिके विरुद्ध का आंदोलन चालू आहे? जे चूक आहे त्याबद्दल जरूर लिहावे. लिहायला, छापायला मिळते म्हणून मर्यादा ओलांडू नये. साधीशी गोष्ट आहे. माझ्या-तुमच्या हातून काही गुन्हा घडला तर मला -तुम्हाला शिक्षा व्हावी किंवा ज्याने कुणी पाणउतारा करायचा त्याने माझा-तुमचा करावा. पण कुणी चारचौघात त्या गुन्ह्याला धरून आपल्या आई-बापावर अतिशय वाह्यात टीका केली तर ते तुम्ही किंवा मी सहन करू शकू काय? मुस्काट नाही का फोडणार त्याचे? बाकी राज्यघटना आणि कोर्टस याबद्दल, तर खूप दिवसांपासून चारली हेब्दो ला त्याचे धंधे बंद करण्यास सांगितले होते, त्याने ऐकले नाही. त्याच्याविरुद्ध केस म्हणजे "अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी" म्हणून केस होत नव्हती. त्याचवेळेस स्वेच्छेने बुरखा घालणाऱ्या स्त्रियांवर बुरखा न घालण्याची सक्ती करून फ्रेंच सरकार एक वेगळ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत होते. (बहुतेक मुस्लिम स्त्रियांना बुरखा घालणे आवडते असे साधारणपणे वाचनात आले आहे, किंवा त्यांना ते त्यांचे दमन वैगेरे वाटतच नसेल कदाचित.) आंतरराष्ट्रीय स्तरावर मुस्लिम समाजाबद्दल फार दुटप्पी कारभार आहे. प्रत्येक कट्टरवादी आपलेच तेच खरे म्हणत असतो. तो धार्मिक असो वा कुठलाही. दोन घटना सांगतो. माझ्या ओळखीतले एक वयस्कर दलित पोलिस इन्स्पेक्टर होते, ते मला म्हणाले तू एक चित्र प्रदर्शन भरव, तुला काय पैसा लागेल तो मी पुरवतो. पण चित्रे माझ्या संकल्पनेनुसार असली पाहिजेत. श्रीराम आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया याबद्दल अतिशय गलिच्छ प्रकारे त्यांनी वर्णन केले व म्हणाले हाच खरा इतिहास आहे. शबरी काही म्हातारी नव्हती तर ती एक तरणीताठी युवती होती, त्यांच्यात प्रेमालाप दाखव इत्यादी इत्यादी. त्यावेळेस मीसुद्धा देव वैगेरे मानणारा नव्हतो आणि रामायणातल्या असंख्य विसंगती मलाही दिसत होत्या. पण त्यांचे उद्दिष्ट वेगळे होते, त्यांना रामाचे जनमानसात असलेले पूज्यस्वरूप मलिन करायचे होते. कारण काय तर हिंदू धर्म कसा फालतू आहे हे सिद्ध करायचे. आणि "त्यांनी" स्वीकारलेला बौद्ध धर्म कसा श्रेष्ठ असे मिरवायचे. मी त्यांना सरळ नकार दिला कारण हे सगळेच बेसलेस आहे. मुद्दलातच चुकीचे आहे. एखाद्या धर्मात काही चुकीचे चाललेले असेल तर ते बदलण्याऐवजी त्यांच्या पुज्यस्थानावर हल्ला करा ते डळमळीत करा, हेच केले जाते. म्हणजे जे चुकीचे आहे ते तर चालू राहते, लोक मूर्ख राहतात आणि फ्रेममधला राम जाऊन बुद्ध किंवा जीजस येतो. कारण लोक शहाणे झाले तर सगळ्याच फ्रेम्स फेकून देतील, मग ह्या तमाम धर्मगुरुंचे कसे चालणार? पु ल देशपांडे यांचा एक अतिशय सुंदर वैचारिक लेख आहे यावर. त्यात त्यांनी धर्मश्रद्धांवरील आक्रमण आणि त्याचे माणसाच्या मनावर होणारे परिणाम याबद्दल लिहिले आहे. दुसरी घटना. एकदा एका मित्राशी वाद झाला होता "भारतीय मुस्लिम शाळांमधून वन्दे मातरम म्हणत नाहीत" यावरून. त्यावेळी तो जो पेटला होता आणि त्याच्या डोळ्यांतून अक्षरश आग बरसत होती. मी म्हणालो कि त्यांना म्हणायचे कि नाही त्यांचे त्यांना ठरवू दे आपण त्यांच्यावर जबरदस्ती नाही करू शकत. त्यावर तू फारच चिडला होता. तेव्हा ते त्याचे वन्दे मातरम "लादणे" असेच होते. स्वतंत्र भारतात प्रत्येकाला आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचा अधिकार आहे. कुणी एक त्यांच्यावर जबरदस्ती नाही करू शकत, हिंदू संघटना मुस्लिम शाळेतल्या वन्दे मातरम बद्दल फार संवेदनशील आहेत. जणू काही त्यांनी वन्दे मातरम नाही म्हटले म्हणजे ते देशद्रोही. मग आपले हिंदू धड राष्ट्रगीत ना म्हणू दे ना, तिकडे लक्ष नाही देणार. हा एक प्रकारचा पूर्वग्रहदुषित दृष्टीकोन आहे. मोठ्या संख्येने मुस्लिम सैन्यात आहेत, शहीद होतात, देशात इतरही क्षेत्रात देशाचे नाव मोठे करतात, तरी त्यांच्यावर संशय घेतोच. दोन धर्मात कुणीतरी दंगली घडवून आणतो, आपण एकमेकांची डोकी फोडतो. आणि दोघेही आयुष्यभर त्यांनी असे केले म्हणून आम्ही तसे केले म्हणत असतो. फायदा घेणारा फायदा घेऊन मोकळा. आपले बरेच मुस्लिम मित्र असतील. कधी त्यांना फेस टू फेस विचारून बघा. त्यांना काय वाटते ते. ते काहीही बोलले तरी "ते आपल्याशी कधीच खरे बोलणार नाहीत" हाच गंड सर्वसामान्य हिंदू बाळगून असतो. दुर्दैवाने तो खरा कि खोटा हे कुणीच कधी सांगू शकणार नाही. समाजसुधारणेचा आव आणणाऱ्या सर्वाना परिस्थितीचे पूर्ण भान आवश्यक आहे. समाजात सुधारणा करण्याची खरीच अपेक्षा व तळमळ असणारे कुणाची खिल्ली उडवत नाहीत. नाहीतर प्रकाश आमटे आदिवासींना नुसते "तुम्ही किती बावळट आणि मागासलेले आहात" असेच म्हणत राहिले असते कि झाली असती त्यांच्यात सुधारणा. आणि राजा राम मोहन राय यांनी घाणेरडी व्यंगचित्रे काढली असती तर सतीप्रथा बंद झाली असती. महात्मा फुले लोक मुलीना शिकवत नाहीत म्हणून लोकांना वाकुल्या दाखवत राहिले असते. इतरही अनेक उदाहरणे आहेत. याउपरही हाच आणि असाच मार्ग असेल तर शेवटही असाच होईल. मुस्लिमांच्या शरिया ची भीती घातली जाते. इतर लोक छुप्या मार्गाने तेच करतात ते मात्र नामानिराळे. दुतोंडी जे म्हणतो मी ते हेच. सगळीकडेच हे होत आहे. आपणच काहीतरी करायला पाहिजे दरी मिटवायला. नाही का? जाता जाता: ज्या जगात अमेरिका सारखा देश आहे, त्याने कधीही शांततेने जगता येईल असा विचार करू नये. अमेरिका फार कुटीलतेने दोन राष्ट्र, दोन समूह, दोन समाजामध्ये तेढ व अविश्वास निर्माण करण्यासाठी व त्यातून आपला फायदा आणि वर्चस्व मिळवण्यासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या दोन महिन्यात तेल-जगतात काय चालले आहे ते बघावे आणि आस्ट्रेलिया व फ्रांस मध्ये झालेल्या हल्ल्यांचा संबंध जोडता येतो का ते पाहावे. घटना फार सरळ आणि उघड जरी असल्या तरी त्या तितक्या सरळ कधीच नसतात. माझे मत तर असे आहे कि नेहमीप्रमाणे मुस्लिम जगताविरुध्द जनमत तापवण्याचा हा प्रकार अमेरिका करत आहे. सदर दोन्ही हल्ले अमेरिका पुरुस्कृत आहेत. कारण दोन्ही हल्ल्यांच्या कार्यपद्धतीत फारच विसंगती आहेत. ज्या साधारणपणे आढळत नाहीत.

वाचने 123597 वाचनखूण प्रतिक्रिया 358

जेपी Sun, 01/11/2015 - 08:17
लेख आवडला. एक इशारा-आता स्वत:पुरता आनंद शोधणारी दांभिक लोक येतीलच धाग्यावर. त्यामुळे आमची कल्टी. उगाच स्वत:चा वेळ वाया घालवुन लोकांना शहाणे करण्यात अर्थ नाही. (हभप) जेपी

भृशुंडी Sun, 01/11/2015 - 08:27
एक कलाकार म्हणून तुम्हाला सर्वांगीण विचार किंवा समजूतदारपणा दाखवता येत नसेल तर तुम्ही मरण्याच्या लायकीचेच असाल
समाजाला अशाच प्रबोधनाची गरज आहे. देव करो आणि तुमची इथल्या संपादकमंडळावर नेमणूक होवो.

थोडे पटले,थोडे नाही. असो. रविवार सकाळ आहे.मिपाकर पोहे,खिचडी,भजी हाणण्यात मग्न आहेत. येतीलच थोड्या वेळात चहा घेऊन हो.

In reply to by संचित

संदीप डांगे Sun, 01/11/2015 - 13:18
दाभोलकरांच्या हत्येबद्दल मत देऊ शकत नाही. कारण त्यांची हत्या कुणी,कशासाठी केली याचे सत्य अजूनही बाहेर आलेले नाही. पूर्ण सत्य समजल्याशिवाय मत देणे माझ्या मते उचित नाही. त्यांच्यावर कुणाचा वैयक्तिक राग हि असू शकतो, इतरही शंभर करणे असू शकतात. एक आपला तर्क लावून कुणावर तरी दोषारोप करण्यात आपले फक्त मनोरंजन होते. दोन्ही बाजू समोर असल्या तर काही निर्णय घेता येतो.

नगरीनिरंजन Sun, 01/11/2015 - 11:46
त्या कार्टूनिस्टांना मरण मंजूर होते आणि धोक्याची संपूर्ण जाणीव असूनही त्यांनी ती चित्रं काढली. मुख्य म्हणजे त्यांनी इतर धर्मांबद्दलही कार्टून्स काढली होती त्यामुळे तुमचा सल्ला अनाठायी आहे. उद्या कोणी काहीही कल्पना करेल आणि "त्या कल्पनेचा आदर करा नाहीतर गोळी घालेन" असे म्हणू लागले तर त्याला वेड्यांच्या इस्पितळात धाडले पाहिजे.

In reply to by संदीप डांगे

नगरीनिरंजन Sun, 01/11/2015 - 14:58
त्यांनी जशी चित्रे काढली तशी ती व्यक्ती लहानपणी नसेल का? त्यांना वॉर्निंग मिळूनही तशी चित्रं काढली किंबहुना वॉर्निंग मिळाल्यामुळेच तशी चित्रे काढली कारण "जीव घेऊ" असं कोणी म्हटलं म्हणून चित्रे बदलायची असतील तर न काढलेलीच बरी. म्हणजे मी उद्या म्हणालो की मी फ्लाईंग नूडल्स मॉन्स्टर पंथाचा अनुयायी आहे आणि तुम्ही काळ्या रंगाच्या सोडून इतर नूडल्स खाल्ल्यात तर तुमचा जीव घेईन तर तुम्ही काळ्या नूडल्स खाणे सुरु करणार आणि इतर नूडल्स खाणे सोडणार की नूडल्स खाणेच सोडणार की माझी पर्वा न करता हव्या त्या नूडल्स खाणार? आणि अमेरिकेला फूट पाडायची असेल पुष्कळ; पण मुळात धर्म ही गोष्ट शांतीप्रिय असती तर लोक भडकलेच नसते ना. आणि हे फक्त इस्लामच नव्हे प्रत्येक धर्माच्या बाबतीत लागू आहे.

In reply to by नगरीनिरंजन

संदीप डांगे Sun, 01/11/2015 - 15:39
जीवाला घाबरून चित्रे काढूच नये असा मला म्हणायचे नाही. पण ते करण्यामागचा उद्देश आणि अपेक्षित परिणाम काय आहे ते स्पष्ट दिसत आहे. आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून कुणाही व्यक्तीबद्दल अपमानस्पद चित्रण करून नक्की काय साध्य झाले? मी वर दिलेल्या लिंक वर काही मुसालामानांच्याही प्रतिक्रिया आहेत. त्या बऱ्याच बोलक्या आहेत. तुम्ही नुडल्स चे उदाहरण दिले. ते काही मला समजले नाही. त्यापेक्षा चांगले उदाहरण मी देतो हिंदू गायीला पवित्र मानतात. क्रिश्चन गायी कापून खातात. हिंदुना मानसिक त्रास व्हावा म्हणून क्रिश्चन गायी खात नाहीत तर ते त्यांचे अन्न आहे. आणि हे हिंदू समजून घेतात. ते आपल्या पवित्र गायी खाउन आपल्या चीथावतात असे हिंदू म्हणू लागला तर तो वेडेपणाच म्हणायचा. किंवा आमच्या धार्मिक भावनांचा अपमान होतो म्हणून क्रिश्चन लोकांनी गायी खाऊ नये असे म्हणणे सुद्धा वेडेपणाच आहे. पण त्याच वेळेस मुसलमानांना निषिद्ध असलेले डुक्कर घेऊन कुणी मशिदीत जाईल आणि म्हणेल तुम्हाला असेल अपवित्र पण मी इथेच बसून खाणार तर ते खोडसाळपणा ठरेल. व्यंगचित्रे किंवा लेखन हे एखाद्या अस्तित्वात व माहित असलेल्या गोष्टीमधली विसंगती हास्यास्पद रीतीने दाखवण्याची कला आहे. त्यात कुणाचा अपमान न करता नेमक्या विसंगतीवर बोट ठेवतात. चार्ल्स हेब्डोची चित्रे हि विचारहीन व प्रक्षोभक आहेत. ती फार तात्विक किंवा उदात्त नाहीत. मी त्यांची तुलना आपल्याकडे होणाऱ्या ब्राह्मणविरोधी हिडीस आणि हिणकस लेखनाशी करतो.

In reply to by संदीप डांगे

हुप्प्या Mon, 01/12/2015 - 10:15
>>पण त्याच वेळेस मुसलमानांना निषिद्ध असलेले डुक्कर घेऊन कुणी मशिदीत जाईल आणि म्हणेल तुम्हाला असेल अपवित्र पण मी इथेच बसून खाणार तर ते खोडसाळपणा ठरेल. व्यंगचित्र हे मशिदीत काढले नव्हते. मशिदीच्या भिंतीवर चिकटवले नव्हते. मुस्लिम वस्तीत जाऊन त्याच्या प्रती वाटल्या नव्हत्या. ते नियतकालिक जिथे अन्य नियतकालिके विकत मिळतात तिथे विक्रीस होते. ज्यांना इच्छा आणि कुवत आहे त्यांनी ते प्रकाशन विकत घ्यायचे असा सरळसरळ मामला होता. एकदा व्यक्तीस्वातंत्र्याचा गळा घोटायचा असे ठरवले तर मग कुठल्याही गोष्टीला खोडसाळपणाचे लेबल लावून त्याला शिक्षा करता येते. कसे ते बघायला पाकिस्तान, सौदी अरब वा इजिप्तची उदाहरणे आहेतच. >>व्यंगचित्रे किंवा लेखन हे एखाद्या अस्तित्वात व माहित असलेल्या गोष्टीमधली विसंगती हास्यास्पद रीतीने दाखवण्याची कला आहे. त्यात कुणाचा अपमान न करता नेमक्या विसंगतीवर बोट ठेवतात. चार्ल्स हेब्डोची चित्रे हि विचारहीन व प्रक्षोभक आहेत. ती फार तात्विक किंवा उदात्त नाहीत. मी त्यांची तुलना आपल्याकडे होणाऱ्या ब्राह्मणविरोधी हिडीस आणि हिणकस लेखनाशी करतो. तुम्ही त्या चित्राची हिणकस लेखाशी तुलना करा वा पिकासो वा मॉनेटशी करा. तो तुमचा अधिकार आहे. मात्र कलेची तुमच्या मनात जी संकल्पना आहे तीच ह्या चित्रकारांनी अनुसरावीत असा आग्रह ही हुकुमशाही आहे. स्वातंत्र्य नाही. जर त्या देशात हवी तशी चित्रे काढायला व प्रकाशित करायला मुभा असेल तर ती प्रकाशित झाल्यावर असा रडीचा डाव खेळता कामा नये.

In reply to by संदीप डांगे

नगरीनिरंजन Wed, 01/14/2015 - 08:03
पण त्याच वेळेस मुसलमानांना निषिद्ध असलेले डुक्कर घेऊन कुणी मशिदीत जाईल आणि म्हणेल तुम्हाला असेल अपवित्र पण मी इथेच बसून खाणार तर ते खोडसाळपणा ठरेल.
हे मान्य आहे. पण स्वतःच्याच देशात, स्वतःच्या पेपरमध्ये, स्वतःच्या कामाचा भाग म्हणून चित्रे काढणे हा गुन्हा कसा काय होऊ शकतो? शिवाय फक्त मुस्लिमांचीच नव्हे सगळ्या धर्माची चित्रे काढायचे ते लोक. असो. काल शार्ली हेब्दोच्या व्यंगचित्रकाराने स्टेटमेंट दिले ते आवडजर, तो म्हणाला: "सगळेच लहान असताना चित्रं काढतात आणि हे अतिरेकीसुद्धा कधीतरी लहान असतील, पण मोठे होताना कधीतरी या जगाकडे थोडं दुरुन पाहण्याची क्षमता त्यांनी गमावली."

In reply to by नगरीनिरंजन

संदीप डांगे Wed, 01/14/2015 - 12:38
The Times is, rightfully respectfully reasonably and sensibly so, not showing the cover because it will only feed the flame of fanaticism. Why would anyone want to see the cover, anyway? What purpose does it serve? This has gone beyond freedom of the press, it's now misplaced defiance that may very well result in many more deaths. The cartoonist who describes himself as having been a child, loving to draw cartoons. Well, that child never grew up unfortunately except that his 'I'm going to do what I want to I don't care what you think' attitude has gone far beyond the immaturity and inability to think beyond this very moment behavior that one would expect from a six-year-old. This is life and death, and all because he wants to draw cartoons. He's also an extremist.

In reply to by संदीप डांगे

नगरीनिरंजन Wed, 01/14/2015 - 12:50
He's also an extremist अगदी बरोबर. पण ते स्वतःचा जीव पणाला लावताहेत दुसर्‍यांचा नाही. मेलो तरी चित्रे काढणे सोडणार नाही असा त्यांचा हट्ट असेल तर आपण कोण अडवणारे? ज्याप्रमाणे मुस्लिमांना व इतर धर्मीयांना "देव आहे आणि देवानेच आपल्याला निर्माण केले आणि देवानेच कुराण/बायबल/गीता सांगितले" असा हट्ट सोडायचा नाहीय तसेच हे. मुस्लिमांना तर मुस्लिम सोडून इतर लोक वाट चुकलेले (काफीर) आहेत असे ठामपणे शिकवले जाते आणि त्याला ते विरोध करत नाहीत. धर्म म्हणजे अल्टिमेट काहीतरी आहे आणि बाकीच्यांनी त्याविरुद्ध बोलायचंच नाही अशी कल्पना कुठुन शिरलीये कोण जाणे. हे चित्रकार लोक जीव गेला तरी खोडसाळपणा सोडत नाहीयेत म्हणून ते बालिश आणि धर्मामुळे आजवर कोट्यवधी जीव गेले तरी धर्म सोडावासा न वाटणारे ते फार महान. चांगलंय.

In reply to by नगरीनिरंजन

संदीप डांगे Wed, 01/14/2015 - 13:44
धर्मामुळे कोट्यावधींचा जीव गेला वैगेरे ह्या मुद्द्यावर लेख नाही आहे. एखाद्या धर्माला जाणून बुजून डिवचण्याचा, अपमानित करण्याचा, खिल्ली उडवण्याचा प्रकार चुकीचा आहे हा मुद्दा आहे. चर्चा भरकटू देऊ नये. चित्रे काढण्याला माझा विरोध अजिबात नाही, पण त्याचा खरंच काही प्रबोधनपर उपयोग आहे कि नुसते नपुंसक खिल्ली उडवणे आहे हे महत्वाचे आहे. उद्देश महत्वचा आहे. हिंदू धर्म व हिंदू धर्म हा बेस असलेले धर्म सोडून जगात सगळ्या धर्मांनी, पंथांनी क्रूरता केली आहे. बाकी हिंदू धर्मही काही फार सोवळा राहिला आहे असे नाही. चातुर्वर्ण व स्त्री-दमन, जाती-पातीवरून चाललेल्या सद्यस्थितीतल्या हत्या हे त्याचेच उदाहरण आहे. त्यामुळे कुठल्याही धर्माला त्याच्या बळींच्या संख्येवरून किती क्रूर आणि किती मवाळ हा निकष लावायचा तर कठीण आहे कारण सगळी सांख्यिकी कुठून मिळवणार? बलात्कार वैगेरे तत्सम गंभीर गुन्हे झाल्यावर आपल्या कडे मध्यपुर्वेचे हात-पाय छाटण्याचे, लिंग छाटण्याचे कायदे करावे अशी जनमानसात मागणी होते. ह्या अघोरी प्रथा तिकडून उचलण्यास आपला समाज फारच उत्सुक आहे. पण तोच न्याय कट्टरवाद्यांनी स्वतः लावला कि त्रास होतो. माझा लेख हा दुटप्पीपणाबद्दल आहे. हत्याकांड बरोबर व चूक हा मुद्दा सापेक्ष आहे.

In reply to by संदीप डांगे

नगरीनिरंजन Wed, 01/14/2015 - 17:44
धर्मांधांच्या वेडाचाराची खिल्ली उडवणे हाच तर हेतू आहे आणि ती खिल्ली नपुंसक आहे असे म्हणायला माझी काहीच हरकत नाही. हिंदू धर्म सोवळ्यातला आहे असं कोण म्हणतंय? हिंदू धर्मानेही पुष्कळ हिंसा केलीच आहे आणि केवळ हिंसाच नव्हे तर अतिभयंकर असे शोषणही केले आहे. हिंदू धर्मातल्या खुळचट कल्पनाही खिल्ली उडवण्याच्याच लायकीच्या आहेत. बाकी दुटप्पीपणाबद्दल म्हणायचं तर माझ्या या आधीच्या प्रतिसादातलं शेवटची २ वाक्यं दुटप्पीपणाच दाखवणारी आहेत.

In reply to by नगरीनिरंजन

सामान्यनागरिक Mon, 01/19/2015 - 17:05
काहीही कारण असलं तरी एकदम बारा जणांना गोळ्या घालुन मारणे समर्थनीय ठरत नाही. एकुणच मुस्लीम धर्म असहिष्णु आहे हे खरंच. लेखकाने किती मुस्लीम धर्मीयांचा अनुभव घेतलाय हे माहीत नाही. पण जर घेतला तर नक्कीच हेच मत होईल. ज्या धर्मात स्त्रीयांवर जातातजाचक बंधनं घातली जातात त्यांच्या कडुन काय अपेक्षा करणार ? 'तस्लीमा नसरीन' वाचा म्हणजे कळेल. ती सुद्धामुल्स्लीमच आहे....

In reply to by खटपट्या

श्रीगुरुजी Wed, 01/21/2015 - 22:48
अचूक भाकिताबद्दल तीनशे वेळा अभिनंदन! धागाकर्त्याने धाग्याच्या मूळ विषयाबद्दल व आपल्या मतांबद्दल केव्हाच माफीनामा सादर केला. परंतु त्यानंतर सुद्धा ताबूत थंड न होता अजून डावीउजवी सुरूच आहे. चौशतकाचा टप्पा दूर नाही.

In reply to by श्रीगुरुजी

संदीप डांगे गुरुवार, 01/22/2015 - 00:21
धागाकर्त्याने धाग्याच्या मूळ विषयाबद्दल व आपल्या मतांबद्दल केव्हाच माफीनामा सादर केला
वाक्यांचा विपर्यास आणि सोयीस्कर शब्दांची घुसड करून धागाकर्ता आपणास नमला असा खोटा आविर्भाव निर्माण करण्यात गुर्जींचा कुणीच हात धरू शकणार नाही. "माझ्यामुळे हरभरा टरारून वर" आठवले... कृपया स्वत:ला झालेले गैरसमज अफवा म्हणून पसरवू नये. कायदेशीर गुन्हा आहे.

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी गुरुवार, 01/22/2015 - 12:38
>>> कृपया स्वत:ला झालेले गैरसमज अफवा म्हणून पसरवू नये. कायदेशीर गुन्हा आहे. स्वतःचाच कबुलीजबाब एकदा नीट वाचा. चुकून कबुलीजबाब दिला असेल तर तसा कबुलीजबाब द्या आणि आपल्या मूळ मतांचे पुन्हा एकदा समर्थन करा. गैरसमज तुम्हालाच झाले होते आणि तुमच्या कबुलीजबाबानंतर तुमचे ते स्वतःचे गैरसमज दूर झाले होते अशी माझी श्रद्धा होती. पण आता तसे दिसत नाही. काहीतरी केमिकल लोच्या दिसतोय.

In reply to by श्रीगुरुजी

मृत्युन्जय गुरुवार, 01/22/2015 - 12:43
त्यांचे म्हणणे बरोबर आहे गुर्जी. तुम्ही चुकीचा अर्थ लावलात असे वाटते. त्यांनी फक्त आपली चूक कबूल केली आहे. माफी मागितलेली नाही. उगाच खोटे बोलु नका.

राही Sun, 01/11/2015 - 12:18
समाजात सुधारणा करण्याची खरीच अपेक्षा व तळमळ असणारे कुणाची खिल्ली उडवत नाहीत. हे आवडले. बाकी थोडे आवडले, थोडे नाही.

In reply to by अर्धवटराव

संदीप डांगे Sun, 01/11/2015 - 13:24
मला तरी एवढे सरळ आहे असे अजिबात वाटत नाही. हे हत्याकांड राज्य पुरस्कृत असावे याची दाट शंका आहे. चार्ल्स हेब्दो ला प्रोत्साहित करणे, त्याचा पद्धतशीर प्रसार करणे आणि मग मुस्लिम भावना दुखावल्याच्या नावाखाली हत्या घडवून आणणे. जेणे करून मुस्लिम व बिगर-मुस्लिम यांच्यात कायमची तेढ निर्माण होईल. ह्या तापलेल्या वातावरणाचा फायदा घेऊन जनमत बदल्याच्या धुंदीत पेटवणे आणि आपला कार्यभाग साधणे असा मामला दिसतो.

आतिवास Sun, 01/11/2015 - 13:21
मी स्वतः एक कलाकार असून कट्टरवाद्यांच्या भूमिकेतून मी ह्या हल्ल्याचे समर्थन केले कोणतीही भूमिका असो, हल्ल्याचे समर्थन समर्थनीय नाही! तुमची भूमिका तार्किक टोकाला नेली तर काय होईल हा विचारही थरकाप उडवणारा आहे. असो.

In reply to by आतिवास

संदीप डांगे Sun, 01/11/2015 - 13:31
माझेच मत कायम बरोबर ह्या मताचा मी नाही. ह्या विशिष्ट परिस्थितीत हल्लेखोरांच्या बाजूने काय दिसते हे पाहण्याचा प्रयत्न आहे. दोन प्रकारच्या हल्ल्यांचा आपण इथे विचार केला पाहिजे, एक म्हणजे मानसिक हल्ला आणि दुसरा शारीरिक हल्ला. सर्वसाधारणपणे नेहमीच शारीरिक हल्ल्याला निषिद्ध मानले जाते. आपल्याकडे एक म्हण आहे "कुणी काही म्हटले तर तुझ्या अंगाला काय भोकं पडतात काय?" म्हणजेच अंगाला भोकं पडणे हेच भयानक पण मनाला भोकं पडतील तर ते चालते. चार्ल्स हेब्दो चे चित्र वैचारिक किंवा तात्विक वैगेरे नव्हते, ते असंस्कृत आणि विनाकारण चिथावण्याचा प्रकार होता.

In reply to by संदीप डांगे

स्पंदना Mon, 01/12/2015 - 06:52
तुमच्या बाजूने धमकी आलेली आहे आख्ख्या फ्रान्सला. काळजी सोडा डांगे साहेब. आता फ्रेंच लोकांनी जर त्यांची निदर्शने बंद नाहीत केली, ऑस्ट्रेलियासारखे ताबडतोब "I ride with you" अशी टी शर्टस नाही घातली, ताबडतोब सगळ्या धर्मियांनी इस्लाम हा शांतीप्रिय धर्म आहे हे नुसते मान्यच नव्हे तर त्याचा उदोउदो नाही केला, तर आण्खी जीव घेउ अस सांगितल आहे. तेंव्हा तुमचा नुसता मुद्दा समजूनच नव्हे तर त्याची ताबडतोब अंमलबजवणी सुद्धा सुरु आहे.

In reply to by स्पंदना

ताबडतोब सगळ्या धर्मियांनी इस्लाम हा शांतीप्रिय धर्म आहे हे नुसते मान्यच नव्हे तर त्याचा उदोउदो नाही केला, तर आण्खी जीव घेउ अस सांगितल आहे.
एका प्रतिसादात शांतीवाद्यांची केवढी हिप्पोक्रसी ठासुन भरलीये. @संदिप डांगे, आपलं काय म्हणणं आहे ह्या धमकीवर?

श्रीगुरुजी Sun, 01/11/2015 - 15:24
@संपादक, खालील प्रतिसादात काही आक्षेपार्ह आढळल्यास प्रतिसाद काढून टाकावा. ________________________________________________________ लेख वाचून जबरदस्त धक्का बसला. लेख अजिबात पटला नाही. लेख एखाद्या निधर्मांधाने लिहिल्यासारखा वाटतो किंवा अल-कायदाच्या समर्थकाने लिहिल्यासारखा वाटतो. मणिशंकर अय्यर किंवा तत्सम मंडळींनी याआधीच या हत्याकांडाचे समर्थन केले आहे. या लेखात तसेच समर्थन आहे. >>> मृतांबद्दल सहानुभूती असणे योग्यच आहे पण ती किती योग्य ते जरा तपासून बघायला हवी. या हत्याकांडात फक्त मासिकाचा संपादक व व्यंगचित्रकार यांना मारले असून इतर १० कर्मचार्‍यांना आणि नंतर दुसर्‍या दिवशी ४ निरपराध नागरिकांना या धर्मांध अतिरेक्यांनी मारले आहे. या सर्व मृतांबद्दल सहानुभूती योग्यच आहे. >>> मी स्वतः एक कलाकार असून कट्टरवाद्यांच्या भूमिकेतून मी ह्या हल्ल्याचे समर्थन केले कारण कुणीतरी हा वेगळा दृष्टीकोन मांडणे आवश्यक आहे, जो काही धाडसी वार्तापत्रे मांडत आहेतच. कोणत्याही दृष्टीकोनातून या हल्ल्याचे समर्थन होऊ शकत नाही. व्यंगचित्रामुळे महंमद पैगंबरांची जी बदनामी झाली असावी त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने बदनामी इस्लामच्या नावाखाली केलेल्या अतिरेकी हल्ल्यांनी व कुराणचा आधार घेऊन होत असलेल्या स्त्रियांवरील हल्ल्यामुळे रोज होत आहे. अशा कालबाह्य आणि क्रूर गोष्टींमुळेच हा धर्म जगात सर्वत्र बदनाम झाला आहे. मात्र या बदनामीबद्दल हे धर्मांध किंवा तुमच्यासारखे त्यांचे समर्थक चकार शब्दही काढत नाहीत. >>> जेणे करून ह्या हत्याकांडाच्या इतर बाबींवर प्रकाश पडावा व मुस्लिमांची जी एकच एक प्रतिमा रंगवली जात आहे तो प्रयत्न हाणून पाडवा. मुस्लिमांची जी काही प्रतिमा जगभर तयार झाली आहे ती त्यांच्या वर्तनातूनच तयार झाली आहे. ती जगाने रंगविली नसून स्वतः मुस्लिमांनीच त्यात रंग भरले आहेत. >>> "चार्ल्स हेब्दो" ह्या साप्ताहिकाने केलेल्या खोडसाळपणाबद्दल आज कुणीही बोलत नाही कारण कुणाची हत्या होणे म्हणजेच फार भयंकर एवढेच सामान्यपणे लोक समजतात. व्यंगचित्र काढणे या कृत्यासाठी थेट मारून टाकणे हे भयंकर कृत्यच आहे. >> ज्याची हत्या झाली तो भारी निष्पाप आणि मारणारा क्रूर अविचारी नराधम. असं नेहमीच नसतं. अनेक नराधम गुन्हेगारांना फाशी देण्यात येते म्हणजे त्यांची अधिकृत हत्याच केलेली असते. परंतु ते निष्पाप नसतात व त्यांच्या गळ्यात फासाचा दोर लटकविणाराही नराधम नसतो. >>> त्याच वेळेस गोडसेच कसे बरोबर, गांधी कसे मारण्याच्याच लायकीचे होते हे गेली साठ वर्षे आपण चघळत आहोत. म्हणजेच काय तर मारणारा आणि मरणारा ह्यापैकी जो आपला त्याचीच बाजू बरोबर. तुम्हीही तेच करताय ना >>> एक म्हणजे, "चार्ल्स हेब्दो" ह्या साप्ताहिकाने फार खवचट आणि असंस्कृत अश्या व्यंगचित्रातून पैगंबरांचा अपमान केला. त्या साप्ताहिकाचा असे करण्यामागचा हेतू जाणून बुजून भावना दुखावून उचकवणे (provocative) असाच होता. मी ती व्यंगचित्रे जालावर पाहिली आहेत. त्यात खवचट किंवा असंस्कृत किंवा अपमानास्पद असे काहीही नव्हते. खरं तर इस्लाम म्हणजे शांती असे गोडवे एकीकडे गाताना दुसरीकडे हे रक्तपिपासू अतिरेकी शाळकरी मुले, महिला, निरपराध नागरिक असे काहीही न बघता सरसकट त्यांच्या हत्या करून आपली विकृत मानसिकता पुर्ण करतात हाच इस्लामचा व महंमद पैगंबरांचा सर्वात जास्त अपमान आहे. व्यंगचित्र हे यापुढे काहीच नाही. >>> माझा आक्षेप हा हत्याकांडाच्या पूर्वी झालेल्या बेजबाबदारपणाबद्दल आहे. काय बेजाबदारपणा झाला होता? लोक आज म्हणत आहेत कि "साधे एक चित्र काढले तर थेट गोळ्या घालायची काय गरज होती?" ते चित्र इतरांसाठी साधे असेल मुस्लिमांसाठी नाही हा एक मुद्दा, मुस्लिमांना व्यंगचित्र सोडाच, महंमद पैगंबरांचे कोणत्याही स्वरूपातले चित्र मान्य नाही. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात ८ वी च्या इतिहासाच्या पुस्तकात थोर पुरूष या शीर्षकाखाली अनेक धर्मसंस्थापकांची चित्रे दिली होती (गुरू नानक, गौतम बुद्ध, महावीर जैन इ.). त्यात कोणाचेही व्यंगचित्र नव्हते. साधी कृष्णधवल चित्रे होती. परंतु त्या चित्राविरूद्ध महाराष्ट्रात इतका गदारोळ झाला की शेवटी ते पुस्तक रद्द करावे लागले होते. >>> त्यातल्या एका व्यंगचित्रकाराचे मत असे होते "माझ्यासाठी पैगंबर पवित्र वैगेरे काही नाही, मी काही कुराणाचा कायदा मानत नाही, मी फ्रेंच कायदा मानतो." म्हणजेच इतरांच्या श्रद्धास्थानाला घाणेरड्या पद्धतीने चितारणार, त्यांचा अपमान करणार, वरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गळे काढणार. जर व्यंगचित्र घाणेरड्या स्वरूपात असते तर ते चूकच आहे. >>> म्हणजे त्याला ज्या पद्दतीने इतरांच्या आत्मसन्मानाची हिंसा करता येणार ते तो करणार, त्याच्यावर इतरांनी त्यांच्या पद्दतीने प्रतिकार केला तर चूक. प्रत्येकजण स्वतःच्या पद्धतीने वागू लागला तर कोणत्याही देशात अराजक माजेल. त्यासाठीच राज्यघटना व कायदे केलेले असतात व त्या देशात राहणार्‍या नागरिकांवर ते बंधनकारक असतात. जर व्यंगचित्र अपमानास्पद वाटले असेल तर त्यासाठी कायद्याची मदत घेता येते. स्वतः कायदा हातात घेऊन व्यंगचित्रकाराला व इतरांना ठार मारणे हा गुन्हाच आहे. >>> हा काय तर्क आहे? शब्द आणि चित्रांचे वार जास्त घातक असतात. बंदुकीपेक्षा लेखणी ताकतवान ते उगाच नाही म्हणत. एक गोळी एका वेळेस एकाला मारते. एकच चित्र लाखोंना लाखो वेळा आणि आयुष्यभर मारते. त्यामुळे लेखणी चालवताना हजारदा विचार करावा लागतो. बरोबर आहे. टीका व निराधार निंदा यातील फरक कायद्याला समजू शकतो. परंतु त्यासाठी माणसे मारत सुटणे हा उपाय नाही. >>> दुसरी गोष्ट अशी कि जाणून बुजून केल्या जाणाऱ्या अपमानाचा बदला घेण्याची त्यांची ती रीत असेल, चांगली आहे कि वाईट आहे ह्यावर "आपण" कितीही काथ्याकुट केला तरी ते लोक बदलणार नाही. "हम करे सो कायदा" असाच सगळा प्रकार आहे तिकडे. जे काही बदलायचे आहे ते हेच बदलायचे आहे. जगातल्या सर्व मुस्लिमांना हे जाणवून देणे आवश्यक आहे कि "हम करे सो कायदा" हा प्रकार त्यांच्या जीवावर इतर मुठभर लोक करत आहेत. आणि आज तो शांतीप्रिय मुस्लिमांना व जगाला त्रासदायक ठरत आहे. ते करायचे सोडून तुम्ही जर पैगंबर आक्षेपार्ह स्थितीत दाखवले तर शांतीप्रिय मुस्लिम सुद्धा भडकून उठतील आणि जो उद्देश आहे तो उरणारच नाही. त्या व्यंगचित्रात पैगंबर कोणत्याही आक्षेपार्ह स्थितीत दाखविलेले नाहीत. केवळ त्यांना चितारले या कारणासाठीच हे हत्याकांड झालेले आहे. >>> माझा मुद्दा फार साधा आहे. दहशतवाद (कोणताही, कारण जगात मुस्लिम दहशतवाद सोडून इतर अनेक धर्माचे, देशाचे, समाजाचे दहशतवादी आहेत. मिडिया त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो हा भाग वेगळा) व त्याबद्दल लिहिताना किंवा चित्र काढताना किमान एक लक्ष्यात घेतले पाहिजे कि कुठल्याही दहशतवादाला केवळ एकच एक बाजू नसते. हजारो कारणे आहेत. इस्लामी दहशतवादामागे कोणती कारणे आहेत? पेशावरमधील १३२ शाळकरी विद्यार्थ्यांना मारण्यामागे कोणते समर्थनीय कारण होते? भारतात असंख्य निरपराध नागरिकांचे प्राण घेण्यामागे कोणती समर्थनीय कारणे आहेत? कोणत्याही राष्ट्रात जायचं व घेटो करून रहायचं. सुरवातीला संख्या कमी असताना अल्पसंख्य म्हणून अवाजवी लाड करून घ्यायचे. त्याचवेळी भरपूर संतती जन्माला घालून वेगाने संख्या वाढवायची. पुरेशी संख्या झाली की आमच्यावर अन्याय होतोय , आम्हाला वेगळा देश पाहिजे अशी हाळी ठोकून सौदीसारख्या कर्मठ देशांकडून मदत घेऊन अतिरेकी हल्ले सुरू करायचे व सर्वत्र दहशत निर्माण करायची. हीच दहशतवादाची एकमेव बाजू आहे. >>> एक कलाकार म्हणून तुम्हाला सर्वांगीण विचार किंवा समजूतदारपणा दाखवता येत नसेल तर तुम्ही मरण्याच्या लायकीचेच असाल. हुसैनला आपण हिंदुनी का भारताबाहेर घालवले मग? पिके विरुद्ध का आंदोलन चालू आहे? हुसेनने हिंदू देवतांची अत्यंत आक्षेपार्ह व किळसवाणी चित्रे काढली होती. त्याबद्दल त्याला कोणीही गोळ्या घातल्या नव्हत्या. लोकशाही पद्धतीप्रमाणे त्याच्याविरूद्ध न्यायालयात खटले दाखल केले होते. त्या खटल्याला तोंड देण्याऐवजी तो देशातून कतारला पळून गेला. एका अर्थाने तो फरारी आरोपी होता. त्याला कोणीही भारतातून घालविलेले नव्हते. शिक्षेच्या भीतिने तोच देशातून पळाला होता. जर एखादी गोष्ट आक्षेपार्ह वाटली तर त्याचा निषेध करणे व आंदोलन करणे हे पूर्णपणे कायदेशीर आहे. पीके च्या कलाकारांविरूद्ध कोणीही अतिरेकी हल्ला केलेला नाही हे लक्षात घ्या. >>> जे चूक आहे त्याबद्दल जरूर लिहावे. लिहायला, छापायला मिळते म्हणून मर्यादा ओलांडू नये. साधीशी गोष्ट आहे. माझ्या-तुमच्या हातून काही गुन्हा घडला तर मला -तुम्हाला शिक्षा व्हावी किंवा ज्याने कुणी पाणउतारा करायचा त्याने माझा-तुमचा करावा. पण कुणी चारचौघात त्या गुन्ह्याला धरून आपल्या आई-बापावर अतिशय वाह्यात टीका केली तर ते तुम्ही किंवा मी सहन करू शकू काय? मुस्काट नाही का फोडणार त्याचे? जर तुम्ही स्वतःच्या आईबापाचा हवाला देऊन त्यांनी मला असेच शिकविले आहे किंवा आमच्या घराण्यात अशीच परंपरा आहे असे सांगून स्वतःच्या चुकीच्या वागणुकीचे समर्थन केलेत तर तुमच्याबरोबर तुमच्या आईबापाचाही उद्धार होणारच. >>> बाकी राज्यघटना आणि कोर्टस याबद्दल, तर खूप दिवसांपासून चारली हेब्दो ला त्याचे धंधे बंद करण्यास सांगितले होते, त्याने ऐकले नाही. त्याच्याविरुद्ध केस म्हणजे "अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी" म्हणून केस होत नव्हती. चार्ली हेब्दोचे धंदे? >>> त्याचवेळेस स्वेच्छेने बुरखा घालणाऱ्या स्त्रियांवर बुरखा न घालण्याची सक्ती करून फ्रेंच सरकार एक वेगळ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत होते. (बहुतेक मुस्लिम स्त्रियांना बुरखा घालणे आवडते असे साधारणपणे वाचनात आले आहे, किंवा त्यांना ते त्यांचे दमन वैगेरे वाटतच नसेल कदाचित.) कोठे वाचले हे? सौदी किंवा इतरत्र ४०-४५ डिग्री तापमानात मुस्लिम स्त्रिया स्वेच्छेने काळाकुट्ट बुरखा वापरतात का? कोणतीही स्त्री असे एकतर्फी बंधन मान्य करत नाही. बुरखाबंदीचा कायदा योग्यच आहे. ज्यांना तो मान्य नसेल त्यांनी त्या देशात राहू नये. >>> आंतरराष्ट्रीय स्तरावर मुस्लिम समाजाबद्दल फार दुटप्पी कारभार आहे. फक्त मुस्लिम नव्हे तर सर्वच समाजाबद्दल दुटप्पी कारभार आहे. >>> प्रत्येक कट्टरवादी आपलेच तेच खरे म्हणत असतो. तो धार्मिक असो वा कुठलाही. बरोबर कट्टरवादी हे फक्त धार्मिक नसतात. निधर्मीपणाचा अतिरेक, साम्यवादाचा अतिरेक, राष्ट्रवादाचा अतिरेक, जुन्या रूढींना चिकटून राहणे हाही कट्टरपणाच आहे. >>> स्वतंत्र भारतात प्रत्येकाला आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचा अधिकार आहे. कुणी एक त्यांच्यावर जबरदस्ती नाही करू शकत, बरोबर आहे. परंतु हे वागणे कायदेशीर असले पाहिजे. हम करे सो कायदा हे चालत नाही. दुसर्‍यांच्या अधिकारांवर गदा न आणता किंवा कायदा न मोडता कोणी कसेही वागू शकतो. >>> आपले बरेच मुस्लिम मित्र असतील. कधी त्यांना फेस टू फेस विचारून बघा. त्यांना काय वाटते ते. ते काहीही बोलले तरी "ते आपल्याशी कधीच खरे बोलणार नाहीत" हाच गंड सर्वसामान्य हिंदू बाळगून असतो. दुर्दैवाने तो खरा कि खोटा हे कुणीच कधी सांगू शकणार नाही. काही वर्षांपूर्वी मी एका हैद्राबादच्या इंजिनिअर असलेल्या व संगणक क्षेत्रात असलेल्या मुस्लिमाबरोबर काही महिने अपार्टमेंट शेअर करीत होतो. तो फक्त शुक्रवारी डोक्यावरून स्नान करायचा. इतर दिवशी फक्त खांद्याच्या खाली. लहानपणापासून शिकविलेली एक रूढी म्हणून तो असे करत असे. त्यावेळी काही वेळा त्याच्याबरोबर ही रूढी व मुस्लिमातील इतर काही रूढी याबद्दल चर्चा झाली होती. अशा अनेक रूढी तो पाळत होता व त्या रूढी खरोखरच योग्य आहेत का त्या कालबाह्य झाल्या आहेत याविषयी त्याने कधीही विचार केला नव्हता. १९९० च्या दशकात लेडी डायना व प्रिन्स चार्ल्सने पाकिस्तानला भेट दिली होती. त्यावेळी एका मशिदीच्या मुल्लाने डायनाबरोबर हस्तांदोलन केल्यामुळे तिथे मोठा गदारोळ उठून त्या मुल्लाला मशिदीतून हाकलण्यात आले होते. या घटनेचे माझ्याबरोबरील मुस्लिमाने समर्थन केले होते. >>> समाजसुधारणेचा आव आणणाऱ्या सर्वाना परिस्थितीचे पूर्ण भान आवश्यक आहे. समाजात सुधारणा करण्याची खरीच अपेक्षा व तळमळ असणारे कुणाची खिल्ली उडवत नाहीत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की तो चेष्टेचा विषय होतो. अतिरेकी राष्ट्र्वाद, अतिरेकी धर्मांधता, अतिरेकी निधर्मांधता, अतिरेकी साम्यवाद हे अशाच अतिरेकामुळे चेष्टेचा विषय होतात. याउपरही हाच आणि असाच मार्ग असेल तर शेवटही असाच होईल. मुस्लिमांच्या शरिया ची भीती घातली जाते. इतर लोक छुप्या मार्गाने तेच करतात ते मात्र नामानिराळे. अतिरेकाविरूद्ध लढण्याचे अनेक मार्ग आहेत. लेखन व व्यंगचित्रातून जनजागृती हा एक मार्ग आहे. >>> जाता जाता: ज्या जगात अमेरिका सारखा देश आहे, त्याने कधीही शांततेने जगता येईल असा विचार करू नये. अमेरिका फार कुटीलतेने दोन राष्ट्र, दोन समूह, दोन समाजामध्ये तेढ व अविश्वास निर्माण करण्यासाठी व त्यातून आपला फायदा आणि वर्चस्व मिळवण्यासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या दोन महिन्यात तेल-जगतात काय चालले आहे ते बघावे आणि आस्ट्रेलिया व फ्रांस मध्ये झालेल्या हल्ल्यांचा संबंध जोडता येतो का ते पाहावे. घटना फार सरळ आणि उघड जरी असल्या तरी त्या तितक्या सरळ कधीच नसतात. माझे मत तर असे आहे कि नेहमीप्रमाणे मुस्लिम जगताविरुध्द जनमत तापवण्याचा हा प्रकार अमेरिका करत आहे. सदर दोन्ही हल्ले अमेरिका पुरुस्कृत आहेत. कारण दोन्ही हल्ल्यांच्या कार्यपद्धतीत फारच विसंगती आहेत. ज्या साधारणपणे आढळत नाहीत. ९/११ चा हल्ला जॉर्ज बुशने प्लॅन केला होता. भारतात २००१ मधील संसदेच्या हल्ल्याची योजना अडवाणींनी बनविली होती. मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यामागे रा.स्व.संघ होता. कारगिल युद्धाचा कट वाजपेयींनी आखला होता. असे अनेक हास्यास्पद दावे आहेत. तुमचा वरील दावा त्यापैकीच एक.

In reply to by श्रीगुरुजी

क्लिंटन Sun, 01/11/2015 - 16:33
या असल्या तद्दन गुडघ्यातल्या आडाणी लेखावर इतकी सविस्तर प्रतिक्रिया देऊ शकणार्‍यांचे प्रचंड कौतुक वाटल्यावाचून राहत नाही. :) हे असले विचार करणारे सदस्यही मिपावर आहेत हे बघून एक मिपाकर म्हणून नक्कीच शरम वाटली. असो.

In reply to by श्रीगुरुजी

संचित Sun, 01/11/2015 - 20:01
कट्टरवादी हे फक्त धार्मिक नसतात. निधर्मीपणाचा अतिरेक, साम्यवादाचा अतिरेक, राष्ट्रवादाचा अतिरेक, जुन्या रूढींना चिकटून राहणे हाही कट्टरपणाच आहे. +1

In reply to by श्रीगुरुजी

कपिलमुनी Mon, 01/12/2015 - 18:17
गुर्जी, तुमच्याकडून टाईम मॅनेजमेंटचे धडे घ्यायचे आहेत. ( बरा वेळ असतो हो तुम्हाला एवढ्या सविस्तर प्रतिक्रिया द्यायला !;) हघ्या )

In reply to by श्रीगुरुजी

निशदे Tue, 01/13/2015 - 05:41
गुरुजी, तुमच्या संयमाची कमाल वाटते. अक्षरशः बेअक्कल आर्टिकल आहे. बादवे, पैगंबराची चित्रे कुराणाने खरेच प्रतिबंधित केली आहेत का? http://www.newsweek.com/koran-does-not-forbid-images-prophet-298298

In reply to by निशदे

नाखु Wed, 01/14/2015 - 09:48
___/\___. आज भोगीची भाजी म्हणजे काय ते कळाले. धागाकर्त्यांच्या सगळ्या सरमिसळ केलेल्या (कट्टर वाद) भलामण मुद्द्यांना गुरुजींनी व्यवस्थीत "सोलून", "निवडून" निगुतीने भाजी बनविली आहे. :BRAVO: :bravo: :clapping: सर्वांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा !!! तिळ्गुळ घ्या आणि येता जाता "सर्वधर्मसमभावाचा* डांगोरा पिटा" *YAHOO* *YAHOO!* :YAHOO: :yahoo: *याचा शासकीय सोडून अंमलबजावणी अर्थ "हिंदूना शिव्या घालत बसणे" हाच भारतात तरी आहे

In reply to by श्रीगुरुजी

संदीप डांगे Fri, 01/16/2015 - 21:06
श्रीगुरुजी, तुम्ही वेळ काढून या लेखातील वाक्या-वाक्यावर छान प्रतिवाद केला. धन्यवाद! कुठल्याही गोष्टीच्या तीन प्रकारच्या सत्यता असतात. एक मला वाटते ती, एक तुम्हाला वाटते ती आणि एक प्रत्यक्षात असते ती. प्रत्येकजण आपापले पूर्वग्रह घेऊन अधिकाधिक सत्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो. कधी आपण आपल्या पुर्वाग्रहालाच वाहन बनवतो. आपला पूर्वग्रह अंतिम सत्यासारखा असेल तर आपण तिथे पोचतोच, किंवा चकवा लागून गोल गोल फिरत राहतो. माझ्या मते तरी जगात चूक-बरोबर, चांगले-वाईट हे सगळे सापेक्ष असते. ही सापेक्षता आपल्या अनुभव आणि विचारांवर अवलंबून असते. त्यामुळे इथे धागाकर्ता म्हणून मी इस्लाम-प्रेमी आहे असा होत नाही किंवा तुम्ही प्रतिवाद करता म्हणून दिसणाऱ्या प्रत्येक मुस्लीमास तुम्ही कापत सुटणार असाही होत नाही. तरीही शेवटी माझ्या मनात एक स्वाभाविक प्रश्न उभा राहिलाय. दहशतवाद हा कधीही समोरासमोर येउन न केले जाणारे एक युद्ध आहे. त्यात अनेक अनामिक, चेहरे नसलेले, ओळख नसलेले, शिकलेले, न शिकलेले, श्रीमंत, गरीब, सुसंस्कारित, असंस्कारित असे सगळेच सामील आहेत. इस्लामी दहशतवादात साहजिक सगळे मुस्लिमच आहेत आणि असणार. तर मग आपण एक हिंदू म्हणून म्हणा किंवा एक सज्जन, पापभिरू, न्यायप्रिय, कायदेप्रिय, घटनाप्रिय सुजाण नागरिक म्हणून एकूण मुस्लिम लोकांशी कसे वागावे? कसे वागावे म्हणजे एक तर रोजच्या जीवनात आणि विशिष्ट परिस्थितीत. विशिष्ट परिस्थिती जसे कि दंगल, मारहाण, बाचाबाची यात आपण स्वाभाविक प्रतिक्रिया देतो. पण रोजच्या जीवनात कसे वागावे? म्हणजे अब्दुल कलाम यांनी भारताच्या संरक्षण सज्जतेत आणि अंतराळ विज्ञानात जी बहुमोल कामगिरी केली आहे त्यांच्याशी मी कसे वागावे? झाकीर हुसैन यांचा तबला ऐकू कि नये? झहीर खान याने एखाद्या पाकिस्तान्याचा त्रिफळा उडवला तर आनंदाने उडी मारावी कि नको? उत्तम काम करणाऱ्या एखाद्यास आपल्या संस्थेत कामाला ठेवावे कि नको? एखाद्या मुस्लिम व्यापाऱ्याकडून अतिशय स्वस्तात आणि आदराने वस्तू अथवा सेवा मिळत असेल तर ती घ्यावी कि नको? अझीम प्रेमजी यांच्या विप्रो मध्ये काम करावे कि नको? त्यांच्या कंपनीच्या सेवा किंवा वस्तू घ्याव्यात कि नको? रेहमान चे संगीत ऐकावे कि नको? कारण ते सर्व मुस्लिम आहेत आणि सर्व मुस्लिम हे दहशतवादी आहेत. (दहशतवाद्यांना समाजातूनच प्रोत्साहन आणि पैसा मिळतो म्हणून.) म्हणजे कसे आहे, वर वर जरी ती व्यक्ती व्यवस्थित वागत असली तरी आतल्या आत दहशतवादी असू शकते, त्यांना पैसा पुरवू शकते, माहिती पुरवू शकते. तेंव्हा नेमके वागायचे कसे? एक माणूस म्हणून मी दुसऱ्या माणसाशी कसे वागावे? त्याचा जात-धर्म ध्यानात ठेवून वागलो तर ते आपल्या मूळ संस्काराशी जुळत नाही. (मूळ संस्कार "सगळ्यांशी माणुसकीने वागावे"). माझ्या समोर असलेला, बसलेला, राहत असलेला व्यक्ती (तो हिंदू, मुस्लिम, गुजराती, मद्रासी, पुरुष, स्त्री , काहीही ) प्रत्यक्ष माझ्यासमोर काहीही वाईट कृत्य करत असेल तर मी त्यावर तिथेच आणि त्यालाच प्रतिक्रिया देऊ शकतो किंवा परिस्थितीनुसार नाही देऊ शकत. पण फक्त त्याच माणसाबद्दल मी माझ्या मनात एक प्रतिमा बनवेल आणि आयुष्यभर त्याच्याशी तसाच वागेन. पण तो ज्या धर्माचा आहे त्या सगळ्या धर्माच्या लोकांशी तसेच वागावे का?

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी Fri, 01/16/2015 - 21:21
>>> माझ्या मते तरी जगात चूक-बरोबर, चांगले-वाईट हे सगळे सापेक्ष असते. ही सापेक्षता आपल्या अनुभव आणि विचारांवर अवलंबून असते. प्रत्येकवेळी सापेक्ष असतेच असे नाही. उदा. तान्हे मूल हे निरागस आहे ही भावना सापेक्ष नाही. ती व्यक्तीनुसार, अनुभवानुसार किंवा विचारानुसार वेगळी असूच शकत नाही. किंवा पेशावरमधील १३२ शाळकरी मुलांना मारण्याचे कृत्य हे अत्यंत क्रूर असून ते करणारे नराधम आहेत हा विचार सापेक्ष असूच शकत नाही किंवा ही भावना व्यक्तीनुसार, अनुभवानुसार किंवा विचारानुसार वेगळी असूच शकत नाही. >>> तर मग आपण एक हिंदू म्हणून म्हणा किंवा एक सज्जन, पापभिरू, न्यायप्रिय, कायदेप्रिय, घटनाप्रिय सुजाण नागरिक म्हणून एकूण मुस्लिम लोकांशी कसे वागावे? कसे वागावे म्हणजे एक तर रोजच्या जीवनात आणि विशिष्ट परिस्थितीत. विशिष्ट परिस्थिती जसे कि दंगल, मारहाण, बाचाबाची यात आपण स्वाभाविक प्रतिक्रिया देतो. पण रोजच्या जीवनात कसे वागावे? देशाचा एक सज्जन, पापभिरू, न्यायप्रिय, कायदेप्रिय, घटनाप्रिय सुजाण नागरिक देशाच्या दुसर्‍या सज्जन, पापभिरू, न्यायप्रिय, कायदेप्रिय, घटनाप्रिय सुजाण नागरिकाशी जसे वागणे अपेक्षित आहे तसेच वागावे. >>> म्हणजे अब्दुल कलाम यांनी भारताच्या संरक्षण सज्जतेत आणि अंतराळ विज्ञानात जी बहुमोल कामगिरी केली आहे त्यांच्याशी मी कसे वागावे? एखाद्या देशप्रेमी शास्त्रज्ञाबरोबर जसे वागणे अपेक्षित आहे तसेच वागावे. >>> झाकीर हुसैन यांचा तबला ऐकू कि नये? नक्कीच ऐकावा व आनंद घ्यावा. >>> झहीर खान याने एखाद्या पाकिस्तान्याचा त्रिफळा उडवला तर आनंदाने उडी मारावी कि नको? एक कशाला, अनेक उड्या माराव्यात. >>> उत्तम काम करणाऱ्या एखाद्यास आपल्या संस्थेत कामाला ठेवावे कि नको? एखाद्या मुस्लिम व्यापाऱ्याकडून अतिशय स्वस्तात आणि आदराने वस्तू अथवा सेवा मिळत असेल तर ती घ्यावी कि नको? अझीम प्रेमजी यांच्या विप्रो मध्ये काम करावे कि नको? त्यांच्या कंपनीच्या सेवा किंवा वस्तू घ्याव्यात कि नको? रेहमान चे संगीत ऐकावे कि नको? जोपर्यंत मुस्लिम किंवा हिंदू किंवा इतर कोणीही देशाशी द्रोह करत नाहीत तोपर्यंत ते आदरणीयच आहेत. >>> कारण ते सर्व मुस्लिम आहेत आणि सर्व मुस्लिम हे दहशतवादी आहेत. (दहशतवाद्यांना समाजातूनच प्रोत्साहन आणि पैसा मिळतो म्हणून.) असं कोण म्हणालं? >>> म्हणजे कसे आहे, वर वर जरी ती व्यक्ती व्यवस्थित वागत असली तरी आतल्या आत दहशतवादी असू शकते, त्यांना पैसा पुरवू शकते, माहिती पुरवू शकते. तेंव्हा नेमके वागायचे कसे? जेव्हा त्या व्यक्तीचे खरे स्वरूप उघड होईल तेव्हा एखाद्या देशद्रोह्याशी वागावे तशी वर्तणूक असावी. मी पूर्वी अझरूद्दीनचा जबरदस्त फॅन होतो. मनोज प्रभाकरची आक्रमकता मला आवडायची. हसतमुख अजय जडेजा आवडायचा. जेव्हा त्यांचा मॅचफिक्सिंगमधील सहभाग सिद्ध झाला व त्यांच्यावर बंदी झाली तेव्हापासून ते टीव्हीवर दिसले तरी संताप येतो. >>> एक माणूस म्हणून मी दुसऱ्या माणसाशी कसे वागावे? त्याचा जात-धर्म ध्यानात ठेवून वागलो तर ते आपल्या मूळ संस्काराशी जुळत नाही. (मूळ संस्कार "सगळ्यांशी माणुसकीने वागावे"). दुसरा माणूस असेल तर माणसासारखेच वागावे. दुसरा जनावरासारखा वागत असेल तर वागणूक वेगळी द्यावीच लागेल. >>> माझ्या समोर असलेला, बसलेला, राहत असलेला व्यक्ती (तो हिंदू, मुस्लिम, गुजराती, मद्रासी, पुरुष, स्त्री , काहीही ) प्रत्यक्ष माझ्यासमोर काहीही वाईट कृत्य करत असेल तर मी त्यावर तिथेच आणि त्यालाच प्रतिक्रिया देऊ शकतो किंवा परिस्थितीनुसार नाही देऊ शकत. पण फक्त त्याच माणसाबद्दल मी माझ्या मनात एक प्रतिमा बनवेल आणि आयुष्यभर त्याच्याशी तसाच वागेन. पण तो ज्या धर्माचा आहे त्या सगळ्या धर्माच्या लोकांशी तसेच वागावे का? याची आवश्यकता नाही.

In reply to by श्रीगुरुजी

संदीप डांगे Fri, 01/16/2015 - 23:39
पेशावरमधील १३२ शाळकरी मुलांना मारण्याचे कृत्य हे अत्यंत क्रूर असून ते करणारे नराधम आहेत हा विचार सापेक्ष असूच शकत नाही
"We selected the army's school for the attack because the government is targeting our families and females," said Taliban spokesman Muhammad Umar Khorasani. "We want them to feel the pain." हे पठाणी लोक म्हणजे डोळ्यास डोळा न्याय प्रकारातले आहेत. ती त्यांची जीवनशैली आहे. एखाद्यास मित्र मानले तर त्याच्यासाठी जीव द्यायची त्यांची तयारी असते, आणि शत्रू मानले तर मात्र खैर नाही. पण मी मुलांच्या हत्याकांडाचा निषेध करतोच कारण त्या मुलांनी असा काय गुन्हा केला होता कि त्यांचा विनाकारण अशा क्रूर पद्धतीने जीव जावा.
असं कोण म्हणालं?
तुमचे प्रतिसाद तर धर्मालाच टार्गेट करत आहेत, नाही का? दहशतवादी ज्या धर्मातून येतात, ज्या धर्मासाठी स्वत:चे आणि इतरांचे रक्त सांडतात, ज्यांच्या धर्मातच काफरांना जीवे मारण्याच्याबद्दल लिहिलंय, तो धर्मच चुकीचा नाही का झाला मग?
जोपर्यंत मुस्लिम किंवा हिंदू किंवा इतर कोणीही देशाशी द्रोह करत नाहीत तोपर्यंत ते आदरणीयच आहेत.
करत नाही असे म्हणण्यापेक्षा उघडकीस येत नाही तोपर्यंत असे म्हणा. बऱ्याचदा आपल्या हातून कळत नकळत देशद्रोह होऊन जातो, त्याचे काय?
जेव्हा त्या व्यक्तीचे खरे स्वरूप उघड होईल तेव्हा एखाद्या देशद्रोह्याशी वागावे तशी वर्तणूक असावी. मी पूर्वी अझरूद्दीनचा जबरदस्त फॅन होतो. मनोज प्रभाकरची आक्रमकता मला आवडायची. हसतमुख अजय जडेजा आवडायचा. जेव्हा त्यांचा मॅचफिक्सिंगमधील सहभाग सिद्ध झाला व त्यांच्यावर बंदी झाली तेव्हापासून ते टीव्हीवर दिसले तरी संताप येतो.
क्रिकेटचा आणि देशद्रोहाचा काय संबंध? तुमच्यासाठी क्रिकेट हा धर्म असेल पण माझ्यासाठी एक फालतू खेळ असू शकतो. त्यांच्या फिक्सिंग ने कुणाचा जीव नाही गेला मग तुम्हाला एवढा संताप का येतो?
दुसरा माणूस असेल तर माणसासारखेच वागावे. दुसरा जनावरासारखा वागत असेल तर वागणूक वेगळी द्यावीच लागेल.
कोण जनावरासारखे वागवते आणि कोण जनावरासारखे वागते याचे प्रत्येक समुदायात नियम वेगवेगळे आहेत. एकाच पातळीवर कसे मोजणार? बरेच सुशिक्षित हुच्चभ्रु नवरे आपल्या बायकांना जनावरांसारखे वागवतात, मुलीना मारून टाकतात तेंव्हा हा सुशिक्षित हुच्चभ्रु समाज त्यांच्याशी कसा वागतो?

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी Sat, 01/17/2015 - 14:13
>>> हे पठाणी लोक म्हणजे डोळ्यास डोळा न्याय प्रकारातले आहेत. ती त्यांची जीवनशैली आहे. नरमांस खाणे ही एखाद्या गटाची जीवनशैली असली तर ती मान्य करायची का? तद्वत पठाणांची जीवनशैली काहीही असली तरी मुलांची हत्या समर्थनीय नाही. या हत्येसंदर्भात सापेक्ष मत असूच शकत नाही. >>> एखाद्यास मित्र मानले तर त्याच्यासाठी जीव द्यायची त्यांची तयारी असते, आणि शत्रू मानले तर मात्र खैर नाही. बादवे, हा पठाणांबद्दल गैरसमज पसरविलेला आहे. विशेषतः काबुलीवाला, जंजीर इ. हिंदी चित्रपटातून पठाण हा अत्यंत दिलदार, विश्वासू, जीवाला जीव देणारा वगैरे दाखविलेला आहे. अफगाणिस्तानवरील अनेक पुस्तकातून पठाणांचे खरे चित्र रंगविले आहे. पठाण हे अत्यंत विश्वासघातकी असून अगदी थोड्या पैशाकरता विश्वासघात करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. >>> तुमचे प्रतिसाद तर धर्मालाच टार्गेट करत आहेत, नाही का? दहशतवादी ज्या धर्मातून येतात, ज्या धर्मासाठी स्वत:चे आणि इतरांचे रक्त सांडतात, ज्यांच्या धर्मातच काफरांना जीवे मारण्याच्याबद्दल लिहिलंय, तो धर्मच चुकीचा नाही का झाला मग? धर्माचे तत्वज्ञान चुकीचे आहेच. परंतु तुम्ही आधी जी उदाहरणे दिली (डॉ. अब्दुल कलाम, झाकीर हुसेन इ.) सन्माननीय अपवाद आहेत. यांच्याव्यतिरिक्त सुद्धा गायक महंमद रफी, डॉ. यू.म. पठाण असे आदरणीय अपवाद आहेत. >>> क्रिकेटचा आणि देशद्रोहाचा काय संबंध? तुमच्यासाठी क्रिकेट हा धर्म असेल पण माझ्यासाठी एक फालतू खेळ असू शकतो. त्यांच्या फिक्सिंग ने कुणाचा जीव नाही गेला मग तुम्हाला एवढा संताप का येतो? तुमच्यासाठी तो फालतू खेळ असला (हाय कंबख्त, तूने पीही नही!), तरी माझ्यासाठी तो धर्म आहे. हजारो प्रेक्षक पदरचे पैसे खर्च करून तिकीट काढून सामने बघतात. कोट्यावधी प्रेक्षक तो सामना दूरदर्शनवर बघतात. असा सामन्यात फसवणूक करणे हे देशद्रोहाचेच उदाहरण आहे. >>> कोण जनावरासारखे वागवते आणि कोण जनावरासारखे वागते याचे प्रत्येक समुदायात नियम वेगवेगळे आहेत. एकाच पातळीवर कसे मोजणार? बरेच सुशिक्षित हुच्चभ्रु नवरे आपल्या बायकांना जनावरांसारखे वागवतात, मुलीना मारून टाकतात तेंव्हा हा सुशिक्षित हुच्चभ्रु समाज त्यांच्याशी कसा वागतो? प्रत्येकजण स्वतःच्या मनाने वागू नये यासाठीच कायदे, नियम वगैरे असतात. दुर्दैवाने भारतात धर्मावर आधारीत वेगळे कायदे केले आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

संदीप डांगे Sat, 01/17/2015 - 17:26
तुमच्यासाठी तो फालतू खेळ असला (हाय कंबख्त, तूने पीही नही!), तरी माझ्यासाठी तो धर्म आहे. हजारो प्रेक्षक पदरचे पैसे खर्च करून तिकीट काढून सामने बघतात. कोट्यावधी प्रेक्षक तो सामना दूरदर्शनवर बघतात. असा सामन्यात फसवणूक करणे हे देशद्रोहाचेच उदाहरण आहे.
क्रिकेटच्या सामन्यात फसवणूक करणे हा देशद्रोह कसा होऊ शकतो, काय तर तुम्हाला तो धर्म वाटतो म्हणून… ? जिथे चार टाळकी वर बसून निव्वळ पैसा बघतात, त्यासाठी वाटेल त्या गोष्टी करतात, तो धर्म नाही हो, व्यवसाय आहे शुद्ध. त्यांच्या फायद्यासाठी ते जनतेला सरळ सरळ *** बनवतात, आणि पब्लिक आपली येड्यासारखी क्रिकेट हा आमचा धर्म आहे वैगेरे करत धुंदीत जगत असते. (हाय कंबख्त, तूने पीही नही!) असे म्हणाल तर काय आहे ना की ही तुमची दारू जिथे बनते ना तिथे प्रत्यक्ष सर्वात वरच्या वर्तुळात मी काम केले आहे. कोण किती पाण्यात आहे, कोण किती धुतल्या तांदळाचा आहे ते पण बघितले. त्यामुळे आत काय आहे आणि बाहेर काय आहे याचा पुरेपूर अनुभव आहे (हाय कंबख्त, तूझे पताही नही!) . त्यामुळे त्या दारूपासून आंम्ही चारशे हात लांबच बरे! (माझ्या टिप्सवर एका सट्टेबाज मित्राने आयपीएल मध्ये १करोड कमावले, यावरून काय तो अंदाज घ्या, प्यायची कि नाही ते)

In reply to by संदीप डांगे

नगरीनिरंजन Sat, 01/17/2015 - 17:31
जिथे चार टाळकी वर बसून निव्वळ पैसा बघतात, त्यासाठी वाटेल त्या गोष्टी करतात, तो धर्म नाही हो, व्यवसाय आहे शुद्ध. त्यांच्या फायद्यासाठी ते जनतेला सरळ सरळ *** बनवतात
अत्यंत सहमत! छान लिहीलंत. विशेष म्हणजे हे वाक्य प्रत्येक धर्मालाही लागू होते.

In reply to by नगरीनिरंजन

संदीप डांगे Sat, 01/17/2015 - 17:41
हो, अगदी खरे आहे. हे प्रत्येक धर्माला लागू होते. पैसा आणि अनिर्बंध सत्ता जगात सर्व धर्मप्रसाराच्या मुळाशी असते. इतर कुठल्याही सत्तेला लोक सहजासहजी उलथून टाकतात पण धर्मसत्ता महाकठीण.

In reply to by नगरीनिरंजन

आजानुकर्ण Sat, 01/17/2015 - 18:29
जिथे चार टाळकी वर बसून निव्वळ पैसा बघतात, त्यासाठी वाटेल त्या गोष्टी करतात, तो धर्म नाही हो, व्यवसाय आहे शुद्ध. त्यांच्या फायद्यासाठी ते जनतेला सरळ सरळ *** बनवतात अत्यंत सहमत! छान लिहीलंत. विशेष म्हणजे हे वाक्य प्रत्येक धर्मालाही लागू होते.
सहमत

In reply to by पिंपातला उंदीर

सुबोध खरे Sat, 01/17/2015 - 19:29
साहेब थोडी गल्लत होते आहे. आय पी एल मध्ये फिक्सिंग झाले तर गोष्ट वेगळी. पण जेथे भारत विरुद्ध दुसरा देश यात असे करणे हा देशद्रोह आहे कारण तुमच्या देशाची प्रतिष्ठा पणास लागलेली आहे/असते. आपण आपल्या देशासाठी खेळतो आहे एवढे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा मराठवाडा सिंह विरुद्ध पुणेरी वाघ किंवा विदर्भ घोडे विरुद्ध कोकणी कोल्हा याला कोण विचारतो?

In reply to by सुबोध खरे

आजानुकर्ण Sat, 01/17/2015 - 20:23
बीसीसीआय ही प्रायव्हेट कंपनी आहे. ते खेळतात ते सामने हे भारत वि. दुसरा देश असे असतात ही आपण करुन घेतलेली सोयीस्कर गैरसमजूत आहे.

In reply to by आजानुकर्ण

संदीप डांगे Sat, 01/17/2015 - 21:48
भारत सरकारविरुद्ध विविध न्यायालयीन खटल्यांमध्ये बी सी सी आय ने आपण स्वायत्त संस्था असून देशाचा व त्यांचा काहीही संबंध नाही असे शपथेवर सांगितले आहे. बी सी सी आय ला लागणारा पैसा ते स्वत: उभे करतात. भारत सरकारचे त्यांच्यावर कसलेही नियंत्रण नाही. खेळाडू त्यांच्यातर्फे खेळतात, देशातर्फे नव्हे. क्रिकेटचा राष्ट्रीय संघ हा खरेतर बी सी सी आय चा राष्ट्रीय संघ असतो. इतर खेळांप्रमाणे क्रिकेटमध्ये देशप्रेम वैगेरे असे काही नसते.

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी Sat, 01/17/2015 - 22:51
>>> भारत सरकारविरुद्ध विविध न्यायालयीन खटल्यांमध्ये बी सी सी आय ने आपण स्वायत्त संस्था असून देशाचा व त्यांचा काहीही संबंध नाही असे शपथेवर सांगितले आहे. बी सी सी आय ला लागणारा पैसा ते स्वत: उभे करतात. भारत सरकारचे त्यांच्यावर कसलेही नियंत्रण नाही. खेळाडू त्यांच्यातर्फे खेळतात, देशातर्फे नव्हे. क्रिकेटचा राष्ट्रीय संघ हा खरेतर बी सी सी आय चा राष्ट्रीय संघ असतो. इतर खेळांप्रमाणे क्रिकेटमध्ये देशप्रेम वैगेरे असे काही नसते. कर वाचविण्यासाठी व माहिती अधिकाराच्या जाळ्यात न येण्यासाठी बीसीसीआय वाटेल ते सांगू शकते. पण त्यात सत्यांश किती? २०११ मध्ये भारतात झालेली विश्वचषक स्पर्धा कोणी जिंकली होती? भारताने की बीसीसीआय ने? जगभरातील वृतपत्रात क्रिकेट संघाचा भारतीय संघ असा उल्लेख असतो का बीसीसीआयचा संघ? क्रिकइन्फो सारख्या क्रिकेटला वाहलेल्या संकेतस्थळावर सामन्यांच्या व संघाच्या उल्लेखात भारत वि. ऑस्ट्रेलिया असा सामना दाखवितात का बीसीसीआय वि. ऑस्ट्रेलिया? डेव्हिस चषक स्पर्धेत भारताचा संघ असतो का आयटीएचा? हॉकीच्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचा संघ असतो की आयएचएचा? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भारतातील कोणत्याही नागरिकाला हे प्रश्न विचारा ते काय उत्तर देताहेत ते बघा. त्यांच्या उत्तरावरून कळेल की या सामन्यात फसवणूक करणे हे देशद्रोह करण्यासारखेच का आहे ते.

In reply to by श्रीगुरुजी

आजानुकर्ण Sat, 01/17/2015 - 23:51
अहो गुरुजी जगभरातील वृत्तपत्रांमध्ये मोदींनी मुसलमानांचे शिरकाण केले असेही छापून आले होते. अगदी अमेरिकेने विसाही नाकारला. खरे होते का ते? असं पेपरातल्या गोष्टीवर विश्वास ठेवून चालत नाही. न्यायालयात काय सिद्ध झाले ते पाहा. बीसीसीआयवर भारत सरकारचे आणि पर्यायाने भारतीय जनतेचे काहीही नियंत्रण नाही. पैशासाठी हपापलेली श्रीनिवासन-शरदपवार अशी चार टाळकी ती संघटना चालवतात. त्याला भारतीय संघ म्हणायचं असेल आणि त्यावर तुमची देशभक्तीची व्याख्या अवलंबून असेल तर आनंद आहे.

In reply to by आजानुकर्ण

श्रीगुरुजी Sun, 01/18/2015 - 13:07
>>> बीसीसीआयवर भारत सरकारचे आणि पर्यायाने भारतीय जनतेचे काहीही नियंत्रण नाही. निव्वळ बीसीसीआय वर नव्हे तर भारत सरकारचे भारतीय ऑलिंपिक संघटना, भारतीय हॉकी संघटना, भारतीय बॅडमिंटन संघटना अशा कोणत्याही क्रीडा संघटनेवर नियंत्रण नाही. याचा अर्थ असा नाही की भारताचे संघ हे भारत देशाचे नसून या खाजगी संघटनांचे संघ आहेत. ऑलिंपिकमध्ये, आशियायी स्पर्धेत, जागतिक स्पर्धेत भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या माध्यमातून भारत देशाचा संघ सहभाग घेतो. उद्घाटनाच्या सोहळ्यात खेळाडू भारत देशाचा राष्ट्रध्वज घेऊन संचलनात सामील होतात, भारतीय ऑलिंपिक संघटनेचा नव्हे. जेव्हा एखादा भारतीय खेळाडू सुवर्णपदक जिंकतो तेव्हा भारताचे राष्ट्रगीत वाजविले जाते, भारतीय ऑलिंपिक संघटनेचे नव्हे. कारण हा भारत देशाचा संघ असतो. तसेच हॉकी, क्रिकेट अशा कोणत्याही खेळाच्या स्पर्धेत त्या खेळांच्या संघटनेचा ध्वज किंवा गीत नसून भारत या देशाचे राष्ट्रगीत व भारत या देशाचा राष्ट्रध्वज असतो.

In reply to by श्रीगुरुजी

सुबोध खरे Tue, 01/20/2015 - 10:14
श्री गुरुजी मुद्देसूद प्रतिवाद करण्याची आपली हातोटी आणि धीर वाखाणण्याजोगा आहे. परंतु डोळ्यावर झापडे बांधलेल्या लोकांना शब्दाचा कीस काढण्यात जर आनंद वाटतो तर तसे असो. त्यांना जागे करण्यात किंवा त्यांची झापडे उघडण्यात काय हशील आहे. असे झापडबंद कम्युनिस्ट आणि समाजवादी लोक आपल्याला सर्वत्र दिसतात. सर्व सामान्य माणूस कोणताही संघ भारतीय संघ म्हणूनच ओळखतो. बी सी सी आय चा नाही मग असे चार लोक काहीका म्हणेनात त्याने काय फरक पडतो. आय पी एल चे तसे आहे का ?

In reply to by सुबोध खरे

आजानुकर्ण Tue, 01/20/2015 - 17:45
ही चर्चा वाचून आता माझ्या डोळ्यावरची झापडे निघाली आहेत. बीसीसीआयने केवळ पैशासाठी आम्ही भारताचे अधिकृत प्रतिनिधी नाही असे सुप्रीम कोर्टात खोटे सांगितले होते. सुप्रीम कोर्टाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. बीसीसीआय (स्वतः म्हणत नसले तरी) भारत देशाचा अधिकृत संघ आहे. बीसीसीआयचा विजय हा भारताचा विजय आहे. बीसीसीआय जे काही करते ते सर्व भारत देशासाठी करते. बीसीसीआयचे खेळाडू हे देशावर लढणाऱ्या सैनिकांप्रमाणे देशभक्त आहेत. बीसीसीआय अध्यक्ष आणि राष्ट्रपती यांच्याप्रती मी माझी निष्ठा कायम ठेवीन जय जवान, जय किसान, जय बीसीसीआय.

In reply to by आजानुकर्ण

श्रीगुरुजी Tue, 01/20/2015 - 22:41
>>> बीसीसीआयने केवळ पैशासाठी आम्ही भारताचे अधिकृत प्रतिनिधी नाही असे सुप्रीम कोर्टात खोटे सांगितले होते. बरोबर >>> सुप्रीम कोर्टाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. दुर्लक्ष केले का नाही ते अजून स्पष्ट नाही. मुद्गल समितीच्या व आयपीएल मधील फिक्सिंगच्या खटल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवलेला आहे. तो ५ जानेवारीला लागेल असे वाटले होते. परंतु सर्वोच्च न्यायालय अजूनही निकाल राखून आहे. नजीकच्या भविष्यकाळात हा निकाल लागेल. त्यावेळी बर्‍याच गोष्टी स्पष्ट होतील असं वाटतंय. >>> बीसीसीआय (स्वतः म्हणत नसले तरी) भारत देशाचा अधिकृत संघ आहे. चूक. बीसीसीआय ही फक्त संघटना आहे. बीसीसीआयचा स्वतःचा कोणताही संघ नाही. जो संघ आहे तो भारत या देशाचा संघ आहे. >>> बीसीसीआयचा विजय हा भारताचा विजय आहे. चूक. विजय किंवा पराभव हा भारत या देशाच्या संघाचा होतो. बीसीसीआयचा नव्हे. ऑलिंपिकमध्ये पदक मिळते ते भारतीय खेळाडूला मिळते, भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या खेळाडू किंवा संघाला नव्हे. >>> बीसीसीआय जे काही करते ते सर्व भारत देशासाठी करते. बीसीसीआयचे खेळाडू हे देशावर लढणाऱ्या सैनिकांप्रमाणे देशभक्त आहेत. बीसीसीआय अध्यक्ष आणि राष्ट्रपती यांच्याप्रती मी माझी निष्ठा कायम ठेवीन जय जवान, जय किसान, जय बीसीसीआय. इतका त्रागा करू नका हो.

In reply to by अनुप ढेरे

कपिलमुनी Wed, 01/21/2015 - 15:47
ते केवळ सोयीस्कर प्रश्नांना उत्तरे देतात . आता फक्त दुसर्‍या फोटो कडे बघून सांगतील तिथे india पण लिहिला आहे

In reply to by कपिलमुनी

बाळ सप्रे Wed, 01/21/2015 - 16:16
भारतातील क्रिकेटच्या नियमनासाठी असलेली BCCI ही एकमेव संघटना आहे. ( इतर सर्व क्रिकेट खेळणार्‍या देशांप्रमाणेच ) त्यामुळे BCCI चा लोगो असल्याने तो भारतीय संघ नाही युक्तिवाद कल्पनेपलिकडला आहे .. बाकी सर्व आंतरराष्ट्रीय संघदेखिल कपड्यांवर राष्ट्रध्वज वगैरे न लावता त्यांच्या संघटनेचे चिन्हच लावतात. BCCI एखाद्या तांत्रिक मुद्द्यासाठी सरकारी हस्तक्षेप टाळण्यासाठी मूर्खासारखे एखादे वक्तव्य करते आणि BCCI चा द्वेष करणारे क्रिकेटशी जास्त आपुलकी नसणारे त्याची री ओढुन त्याचा असा विपर्यास करतात !! एनि वे ज्यांना क्रिकेटशी जर देणे घेणे नसेल तर BCCI काय आणि भारत काय सगळं सारखच.. जर उद्या BCCI म्हणालं की ते वक्तव्य चुकीचं होतं तो भारतीय संघच आहे तर काय हे लोकं क्रिकेटमध्ये जास्त रस घेणार आहे का? मग उगीच कशाला BCCI आणि भारत हा वाद ??

In reply to by बाळ सप्रे

संदीप डांगे Wed, 01/21/2015 - 16:43
सप्रेजी, मुद्दा चुकलाय. क्रिकेटमधली फसवणूक म्हणजे देशद्रोह आहे का? हा मुद्दा आहे. माझ्यामते देशद्रोह हा सर्वव्यापी असतो. त्यात नागरिकास कुठे मुभा नसते. आर्मीतल्या जवानाने फितुरी केली तर तो देशद्रोह कारण त्याचा प्रभाव सगळ्या नागरिकांवर पडतो, त्यात सिलेक्टिव किंवा मी मानतो तुम्ही नाही, तुम्हाला संताप येतो मला नाही असे काही नाही. बाय डिफाल्ट, सगळ्यांनाच ते मान्य असले पाहिजे. क्रिकेटचे तसे नाही. ते एक मनोरंजन आहे फक्त. भारतीय क्रिकेट संघ हा भारतीय लोकांचा बनलेला असला तरी तो भारतीय जनतेला कुठल्याही कायदेशीर पद्दतीने उत्तरदायी नाही. सैनिकाने फितुरी केली किंवा कर्तव्यात कसूर केली तर त्यावर फक्त देशद्रोहाचाच खटला चालतो. क्रिकेटर्स च्या बाबतीत नाही. क्रिकेटप्रेमी जनतेने क्रिकेटद्वेषी जनतेवर क्रिकेटप्रेमातून देशप्रेमाची सक्ती करावी हे अतार्किक आहे. मनोरंजन आणि देशभक्ती ह्या स्पष्ट दोन वेगळ्या संकल्पना आहेत. त्याची सरमिसळ होऊ शकत नाही. बाकी पुढे काही दिवसात याच विषयावर येणाऱ्या नवीन धाग्यावर चर्चा होईलच. मला आता एक वेगळाच प्रश्न पडला आहे, दाउदच्या पैश्यातून बनलेला देशभक्तीपर चित्रपट आपण पाहायला जाऊ का? त्या चित्रपटातून त्याने कमावलेला पैसा हा देशद्रोही कारवायांसाठीच वापरला जाणार तेंव्हा आपली भूमिका काय असावी?

In reply to by संदीप डांगे

बाळ सप्रे Wed, 01/21/2015 - 17:05
भारतीय क्रिकेट संघ हा भारतीय लोकांचा बनलेला असला तरी तो भारतीय जनतेला कुठल्याही कायदेशीर पद्दतीने उत्तरदायी नाही.
हे मान्य.. खेळाडूने केलेल्या फसवणूकीला देशद्रोह वगैरे ठरवणे एक टोक तर संघ भारताचाच नाही म्हणणे हे दुसरे टोक.. खेळात राष्ट्रीय संघात सामने असले तरी nationalism should not take precedence over sport खेळाचे नियम पाळणे प्रथम असले पाहीजे .. spirit of cricket खाली खेळाडू दोषी ठरु शकेल देशद्रोहाखाली नाही..

In reply to by संदीप डांगे

आजानुकर्ण Wed, 01/21/2015 - 19:15
मी क्रिकेटचा तिरस्कार वगैरे करत नाही. उलट आधी आवडीने पाहायचो. मुद्दा देशद्रोहासंबंधीचा आहे. जर एखादा खेळाडू (आणि प्रेक्षक) देशद्रोही असल्याचा दावा असेल तर मुळात ह्या खेळाचे प्रतिनिधित्व ज्या संघटनेकडून केले जाते त्यांची स्वतःची मते काय आहेत हे तपासणे आवश्यक आहे. त्यासाठीच हा सगळा उपद्व्याप.

In reply to by आजानुकर्ण

सुबोध खरे Wed, 01/21/2015 - 19:24
कर्ण साहेब जर एखाद्या भारतीय -(चुकलो बी सी सी आय च्या) टीममधील खेळाडूने (समजा शिखर धवन ने) पाकिस्तानच्या विरुद्धच्या सामन्यात पैसे खाऊन (फिक्सिंग) विश्वचषकातील सामना हरला तर आपण त्याला भ्रष्टाचार म्हणाल कि देशद्रोह ? नाहीतरी बी सी सी आयचाच संघ हरला आहे आपल्याला काय घेणे देणे?

In reply to by सुबोध खरे

आजानुकर्ण Wed, 01/21/2015 - 19:29
त्याला मी भ्रष्टाचारच म्हणणार. कायदेशीर व्याख्याही तशी सुसंगतच आहे. Whoever by words, either spoken or written, or by signs, or by visible representation, or otherwise, brings or attempts to bring into hatred or contempt, or excites or attempts to excite disaffection towards, the Government established by law in India, a shall be punished with imprisonment for life, to which fine may be added, or with imprisonment which may extend to three years, to which fine may be added, or with fine. Read more: http://devgan.in/ipc/section/124A/#ixzz3PSqPoBGT

In reply to by सुबोध खरे

सौंदाळा Wed, 01/21/2015 - 19:30
+१ देशाला रेप्रेझेंट करत असताना (क्रिकेट / खेळ, राजकारण, सैन्य, वित्त किंवा अजुन काहीही) देशाची नाचक्की होईल असे काम करणे म्हणजे माझ्या दृष्टीने देशद्रोह.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

सौंदाळा Wed, 01/21/2015 - 19:34
देशाची नाचक्की होईल असे काम जाणुनबुजुन करणे म्हणजे माझ्या दृष्टीने देशद्रोह.
असे वाचावे

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

श्रीगुरुजी Wed, 01/21/2015 - 22:37
>>> देशाची नाचक्की होईल असे काम जाणुनबुजुन करणे म्हणजे माझ्या दृष्टीने देशद्रोह. +१ हेच म्हणायचं होतं मला.

In reply to by श्रीगुरुजी

आजानुकर्ण Wed, 01/21/2015 - 22:39
तुमच्या दृष्टीने असला तरी इंडियन पीनल कोडच्या दृष्टीने तो नाही. आणि तेवढंच महत्त्वाचं आहे. असा खटला भरला तर श्रीगुरुजींना काय वाटतं असं विचारायला कुणी येणार नाही.

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी Wed, 01/21/2015 - 22:32
अहो तिथे बरंच काही लिहिलंय. सदर्‍याच्या मागच्या बाजूवर आणि दोन्ही बाह्यांवर सुद्धा अजून बरंच काही लिहिलेलं असतं.

In reply to by अनुप ढेरे

श्रीगुरुजी Wed, 01/21/2015 - 22:30
ही टोपी परीधान केलेले खेळाडू मैदानात क्वचितच दिसतात. बहुतेक क्षेत्ररक्षक बोडक्या डोक्यानेच क्षेत्ररक्षण करतात. पुर्वी सचिन, हरभजन वगैरे खेळाडू हॅट परीधान केलेले दिसायचे. पण त्यांच्या श्वेतरंगी हॅटवर कोणतेच चिन्ह नव्हते. यष्टीरक्षक, फलंदाज व फॉरवर्ड शॉर्टलेगचा क्षेत्ररक्षक जे हेल्मेट वापरतो त्यावर सगळ्यात वर भारताचा राष्ट्रध्वज कोरलेला असतो. दुसर्‍या चित्रात जो सदरा दाखविला आहे, त्याची फक्त पुढची बाजू दाखविली आहे. त्यावर इंडीया असे लिहिलेले आहे व त्याबरोबरीने स्टार, नाइके, बीसीसीआय असे अनेक लोगो आहेत. सदर्‍याच्या मागील बाजूवर व दोन्ही बाह्यावर सुद्धा अनेक कंपन्यांचे लोगो असतात. म्हणजे हा संघ निव्वळ बीसीसीयचा संघ नसून स्टार, सहारा, नाईके, भारत या व अशा अनेक मालकांचा संघ दिसतो. सदर्‍याच्या मागच्या बाजूचा व दोन्ही बाह्यांचा फोटो टाकलात तर उरलेले मालकही कळतील. म्हणजे प्रत्यक्षात अनेक मालक असलेला हा संघ हा आमचा खाजगी संघ आहे हा दावा इथेही खोटा ठरतो तर. *LOL*

In reply to by श्रीगुरुजी

आजानुकर्ण Wed, 01/21/2015 - 22:32
मालक आणि प्रायोजकमध्ये फरक आहे असे वाटते. आता ज्ञानेश्वर आणि तुकाराम मिपाचे मालक आणि प्रायोजक दोन्हीही नाहीत. तरीही त्यांचा फोटो मिपाच्या प्रत्येक पानावर दिसतो. त्यामुळं काय दिसतं याच्यावर अवलंबून राहण्यात काही पॉईंट नाही.

In reply to by आजानुकर्ण

श्रीगुरुजी Wed, 01/21/2015 - 22:39
जो संबंध भारताच्या ऑलिंपिक संघाचा व भारतीय ऑलिंपिक संघटनेचा आहे किंवा जो संबंध भारताच्या टेनिस संघाचा व भारतीय टेनिस संघटनेचा आहे तोच.

In reply to by श्रीगुरुजी

आजानुकर्ण Wed, 01/21/2015 - 22:43
थोडक्यात कुठल्याच खेळाचा देशप्रेमाशी आणि देशद्रोहाशी संबंध नाही. यू गॉट यॉर आन्सर देअर इटसेल्फ. देशद्रोहाच्या कुठल्याच व्याख्येत खेळाचा संबंध नाही.

In reply to by आजानुकर्ण

श्रीगुरुजी Wed, 01/21/2015 - 22:50
देशाच्या उन्नतीसाठी, देशाच्या मानसन्मानासाठी केलेले कोणतेही कृत्य हे देशप्रेमच असते व देशाच्या विरूद्ध, देशाची मानहानी होईल असे केलेले कोणतेही कृत्य हे देशद्रोहच असतो.

In reply to by श्रीगुरुजी

आजानुकर्ण Wed, 01/21/2015 - 22:55
हो पण ही तुमची व्याख्या झाली. पुस्तकी व्याख्या वेगळी आहे ना. तुम्ही वर्गात शिकवताना पुस्तकातलं शिकवता की मनातलं? (ह घ्या.)

In reply to by श्रीगुरुजी

आजानुकर्ण Wed, 01/21/2015 - 23:04
आता तुमचंच बघा ना.
बघायची हौस असेल तर बघा. आम्हाला दाखवायला काही लाज वाटत नाही. (निर्ल्लजम् सदासुखी!) =))

In reply to by श्रीगुरुजी

अनुप ढेरे गुरुवार, 01/22/2015 - 09:55
ही टोपी परीधान केलेले खेळाडू मैदानात क्वचितच दिसतात.
b
पुर्वी सचिन, हरभजन वगैरे खेळाडू हॅट परीधान केलेले दिसायचे. पण त्यांच्या श्वेतरंगी हॅटवर कोणतेच चिन्ह नव्हते.
a

In reply to by आजानुकर्ण

श्रीगुरुजी गुरुवार, 01/22/2015 - 20:20
हे वाचा आणि बीसीसीआय ही प्रायव्हेट कंपनी आहे का सार्वजनिक याविषयी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पहा. http://indianexpress.com/article/sports/cricket/gurunath-meiyappan-was-involved-in-betting-bcci-functions-are-public-supreme-court/

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी Sat, 01/17/2015 - 22:42
>>> पण जेथे भारत विरुद्ध दुसरा देश यात असे करणे हा देशद्रोह आहे कारण तुमच्या देशाची प्रतिष्ठा पणास लागलेली आहे/असते. सहमत. हे लोक आयपीएल आणि भारतीय संघ खेळत असलेले क्रिकेट हे एकाच तराजूत तोलत आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

आजानुकर्ण Sat, 01/17/2015 - 23:58
आयपीएल आणि बीसीसीआय हा एकच तराजू आहे. हे वाचा स्वतः बीसीसीआयने कोर्टात दिलेले निवेदन. हे वाचूनही तुम्हाला बीसीसीआयचे समर्थन म्हणजे देशभक्ती म्हणायचे असेल तर खुशाल म्हणा. http://www.thehindu.com/2004/10/01/stories/2004100104821200.htm NEW DELHI, SEPT. 30 . Sachin Tendulkar, Sourav Ganguly, Rahul Dravid and ... play for the official team of the Board of Control for Cricket in India (BCCI) and not the official team of India. "If India plays England, it is a match played by the official team of BCCI and not the official team of India," BCCI counsel and senior advocate, K. K. Venugopal, said in the Supreme Court today. This was stated before a five-judge Bench, headed by Justice N. Santosh Hegde, by Mr. Venugopal in support of the BCCI stand that its activities, including the selection of the Indian team, had nothing to do with the Government of India. "We do not even fly the national flag nor use any national emblem in the activities of the Board," he said. When the popular film ``Devdas'' was selected as an Indian entry into an international film festival, its selection had no official stamp of the Government of India. Mr. Venugopal said India as a country was not represented at the International Cricket Council and that the Board uses its own flag. — PTI

In reply to by आजानुकर्ण

श्रीगुरुजी Sun, 01/18/2015 - 13:19
>>> आयपीएल आणि बीसीसीआय हा एकच तराजू आहे. आयपीएल ही बीसीसीआयने आयोजित केलेली खाजगी संघांची स्पर्धा आहे. यात भारत देशाचा काहीही संबंध नाही. >>> हे वाचा स्वतः बीसीसीआयने कोर्टात दिलेले निवेदन. हे वाचूनही तुम्हाला बीसीसीआयचे समर्थन म्हणजे देशभक्ती म्हणायचे असेल तर खुशाल म्हणा. बीसीसीआय स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही निवेदन देतील. पण त्यात सत्यांश किती? >>> "We do not even fly the national flag nor use any national emblem in the activities of the Board," he said. विश्वचषक, चॅम्पियन्स अशा स्पर्धेतील कोणत्याही सामन्यापूर्वी सामन्यात खेळणार्‍या दोन्ही देशांचा राष्ट्रध्वज फडकाविला जातो व त्यानंतर दोन्ही देशांचे राष्ट्रगीत वाजविले जाते. नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू होण्याआधी दोन्ही देशाचा राष्ट्रध्वज फडकाविला गेला व त्यानंतर दोन्ही देशांचे राष्ट्रगीत वाजविले गेले. भारतीय संघातील खेळाडूंच्या हेल्मेटवर भारतीय राष्ट्रध्वज कोरलेला आहे. भारताने १९८३ व नंतर २०११ मध्ये विश्वचषक जिंकला तेव्हा विश्वचषकावर विजेता म्हणून भारत देशाचे नाव कोरले होते, बीसीसीआयचे नव्हे. जेव्हा संघ एखाद्या देशाचे अधिकृत प्रतिनिधित्व करतो तेव्हाच असे केले जाते. त्यामुळे बीसीसीआय खोटं बोलत आहे हे अगदी उघड दिसत आहे. पण असे बीसीसीआय का करत आहे? त्याचे कारण म्हणजे बीसीसीआय वर धनदांडगे उद्योगपती व राजकारण्यांचे वर्चस्व आहे आणि आयकर, सेवाकर, माहिती अधिकारांची कक्षा इ. पासून लांब राहण्यासाठी बीसीसीआयने आपण खाजगी संस्था असल्याचा आव आणला आहे. >>> Mr. Venugopal said India as a country was not represented at the International Cricket Council and that the Board uses its own flag. — PTI हे पण खोटं आहे. क्रिकेटच्या कोणत्याही स्पर्धेत भारताचा राष्ट्र्ध्वज असतो, बीसीसीआय चा नव्हे. बीसीसीआय खोटे बोलत आहे हे उघडच आहे.

In reply to by श्रीगुरुजी

खटपट्या Sun, 01/18/2015 - 13:36
विश्वचषक, चॅम्पियन्स अशा स्पर्धेतील कोणत्याही सामन्यापूर्वी सामन्यात खेळणार्‍या दोन्ही देशांचा राष्ट्रध्वज फडकाविला जातो व त्यानंतर दोन्ही देशांचे राष्ट्रगीत वाजविले जाते.
खरं तर "वेस्ट ईंडीज" हा मुळात एक देश नाहीये. अनेक देशांच्या क्रिकेट समीत्यांचा मिळून बनलेला एक संघ आहे. वेस्ट ईंडीज समूहामधे जे देश सामील आहेत त्यांची करंसीदेखील वेगवेगळी आहे. एक राष्ट्रगीत आहे का माहीत नाही. पण जो ध्वज फडकावला जातो तो वेस्टईंडीज क्रिकेट समीतीचा ध्वज आहे बहूतेक.

In reply to by खटपट्या

श्रीगुरुजी Sun, 01/18/2015 - 18:27
बरोबर. वेस्ट इंडिजचा संघ म्हणजे कॅरेबिअन समूहातील पोर्ट ऑफ स्पेन, जमैका, त्रिनिदाद, बार्बेडोस अशा अनेक छोट्या देशातील खेळाडूंचा एकत्रित संघ आहे. त्यामुळे तो संघ कोणत्याही विशिष्ट देशाचा राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत न वापरता त्या संघाच्या संघटनेचा ध्वज व गीत वापरतो. परंतु इतर देशांचे स्वतःचे संघ असल्यामुळे ते आपापल्या देशांचा राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत वापरतात.

In reply to by श्रीगुरुजी

आजानुकर्ण Sun, 01/18/2015 - 16:51
स्वतः बीसीसीआय (पैशासाठी की आणखी कशासाठीही) आम्ही भारत देशाचे प्रतिनिधी नाही. भारत सरकारचा आणि आमचा काहीही संबंध नाही. खेळाडू आमच्यासाठी खेळतात देशासाठी नाही असे निवेदन सुप्रीम कोर्टात देते. कोर्ट ते मान्य करते. तरीही तुम्हाला - तुमच्या मते खोटारड्या - अशा प्रायवेट कंपनीसाठी खेळणे हे देशासाठी खेळणे आहे असे वाटते. आणि अशी प्रायवेट कंपनीचे समर्थन करणे ही देशभक्ती वाटते. शिवाय अशा मतलबापुरत्या भारतीय कंपनीच्या खेळाडूंचे समर्थन न करणे देशद्रोह वाटतो. धन्य आहात. आमचा तुमच्या देशभक्तीला शिरसाष्टांग नमस्कार.

In reply to by आजानुकर्ण

श्रीगुरुजी Sun, 01/18/2015 - 17:44
>>> स्वतः बीसीसीआय (पैशासाठी की आणखी कशासाठीही) आम्ही भारत देशाचे प्रतिनिधी नाही. भारत सरकारचा आणि आमचा काहीही संबंध नाही. खेळाडू आमच्यासाठी खेळतात देशासाठी नाही असे निवेदन सुप्रीम कोर्टात देते. कोर्ट ते मान्य करते. तरीही तुम्हाला - तुमच्या मते खोटारड्या - अशा प्रायवेट कंपनीसाठी खेळणे हे देशासाठी खेळणे आहे असे वाटते. आणि अशी प्रायवेट कंपनीचे समर्थन करणे ही देशभक्ती वाटते. शिवाय अशा मतलबापुरत्या भारतीय कंपनीच्या खेळाडूंचे समर्थन न करणे देशद्रोह वाटतो. धन्य आहात. मी बीसीसीआयचे समर्थन करतच नाहीय्ये. भारतीय संघ हा बीसीसीआय या खाजगी संस्थेचा संघ आहे असे तुम्ही मानताय. भारतीय नागरिक तसे मानतच नाहीत. ते या संघाला 'भारताचा' संघ मानतात. हा संघ भारत या देशाचा संघ आहे हे सिद्ध करणारी अनेक उदाहरणे मी दिलीत (भारताच्या ध्वजाचा वापर, भारताचे राष्ट्रगीत). तरीसुद्धा हा संघ भारत या देशाचा संघ नसून बीसीसीआय या खाजगी संघटनेचा संघ आहे असे तुमचे मत आहे. आपल्याला माहिती अधिकाराच्या कक्षेतून वगळण्यासाठी बीसीसीआय ने न्यायालयात खोटे शपथपत्र दिले आहे. बीसीसीआय प्रमाणेच इतर खेळांच्या संघटनांमध्ये भारत सरकार हसक्षेप करीत नाही किंवा त्या नियंत्रित करीत नाही. परंतु या खेळांचे संघ हे त्या खाजगी संघटनांचे संघ नसून ते रत या देशाचे संघ असतात व ते या खाजगी संघटनांचे प्रतिनिधित्व करत नसून भारत या देशाचे प्रतिनिधित्व करत असतात. जे खेळाडू भारत या देशाचे प्रतिनिधित्व करत असताना गद्दारी करतात तो देशद्रोहच असतो. >>> आमचा तुमच्या देशभक्तीला शिरसाष्टांग नमस्कार. धन्यवाद! तुम्हाला अनेक उत्तम आशीर्वाद!!

In reply to by श्रीगुरुजी

आजानुकर्ण Sun, 01/18/2015 - 17:59
एकंदर ध्वजसंहितेनुसार नागरिकांवर बंधने होती तेव्हा बीसीसीआय संघाला भारताचा ध्वज वापरायचीही परवानगी नव्हती. त्यासंदर्भातले अनेक खटले कोर्टातही झाले आहेत. आता इतर सर्व नागरिकांनाही भारताचा ध्वज वापरायची परवानगी आहे. त्याचप्रमाणे बीसीसीआयलाही परवानगी मिळाली आहे. भारताच्या अधिकृत प्रतिनिधीत्वाचा जसा इथे संबंध नाही. तसा भारतीय नागरिक काय मानतात आणि काय मानत नाहीत याचाही इथे संबंध नाही. सुनीता विल्यम किंवा कल्पना चावलाचे यश हे आपलेच आहे असेही भारतीय नागरिक मानतात.
जे खेळाडू भारत या देशाचे प्रतिनिधित्व करत असताना गद्दारी करतात
मुळात हे खेळाडू भारत देशाचे प्रतिनिधित्व करतात हा हायपॉथिसिचच चुकीचा आहे. त्या खेळाडूंच्या मालकांनी स्पष्ट सांगितलंय की आम्ही भारत देशाचे प्रतिनिधित्व करत नाही. त्याच्या विरोधात एखाद्या खेळाडूने अवाक्षर उच्चारलेले मी वाचलेले नाही. त्यामुळे त्या खेळाडूंनाही आपण कोणाची चाकरी करतोय याची पूर्ण कल्पना आहे. तरीही 'मान ना मान मै तेरा मेहमान' असे म्हणत तुम्हाला त्यांना भारत देशाचे प्रतिनिधी मानायचे असेल तर खुशाल माना. तुम्हाला सत्य समजून घ्यायची इच्छा नाही हेच यातून दिसते. मला तर वाटते एखादी संघटना आम्ही भारताचे प्रतिनिधीत्व करत नाही असे म्हणते तोच देशद्रोह मानायला हवा. मात्र त्या संघटनेचे समर्थन न करणे हा देशद्रोह असल्याचा तर्क अत्यंत अजब आहे.

In reply to by आजानुकर्ण

श्रीगुरुजी Sun, 01/18/2015 - 18:20
तुम्ही मला फक्त एवढंच सांगा की, (१) ऑलिंपिक मध्ये जे भारतीय खेळाडू भाग घेतात ते भारतीय ऑलिंपिक संघटना या क्रीडा संघटनाचे प्रतिनिधित्व करतात का भारत या देशाचे? (२) हे खेळाडू जर या संघटनेचे प्रतिनिधित्व करत असतील तर ऑलिंपिकमध्ये ते भारतीय ऑलिंपिक संघटनेऐवजी भारत या देशाचा राष्ट्रध्वज कसा व का वापरतात? ऑलिंपिक स्पर्धास्थानी या संघटनेच्या ध्वजाऐवजी भारत या देशाचा राष्ट्रध्वज का फडकत असतो? एखाद्या भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकल्यास या संघटनेच्या ध्वजाऐवजी भारत या देशाचा राष्ट्रध्वज का फडकावला जातो आणि या संघटनेच्या गीताऐवजी भारत या देशाचे राष्ट्रगीत का वाजविले जाते? कोणत्याही खाजगी संघटनेला भारताचा राष्ट्रध्वज हा स्वतःचा ध्वज म्हणून वापरायची कायदेशीर परवानगी आहे का? कोणत्याही खाजगी संघटनेचे प्रतिनिधित्व करणार्‍या खेळाडूंना स्वतःच्या बनियन/टीशर्ट/हेल्मेट वर भारत या देशाच्या राष्ट्रध्वजाचे चित्र वापरण्याची कायदेशीर परवानगी आहे का? कोणत्याही खाजगी संघटनेला स्वतःचे गीत म्हणून राष्ट्रगीत वापरता येते का? (३) भारतीय ऑलिंपिक संघटनेवर भारत सरकारचे नियंत्रण आहे का आणि या संघटनेत भारत सरकार हस्तक्षेप करते का?

In reply to by श्रीगुरुजी

आजानुकर्ण Sun, 01/18/2015 - 18:31
ऑलिंपिक व्यवस्थेचा माझा फारसा अभ्यास नाही. मात्र भारतीय ऑलिंपिक संघटनेने 'आम्ही भारताचे प्रतिनिधित्व करत नाही' असं कुठं सांगितलंय का? बीसीसीआयने ते अगदी स्पष्ट शब्दात भारताच्या सुप्रीम कोर्टात सांगितलंय. निदान भारतीय ऑलिंपिक संघटनेला संशयाचा फायदा देता येईल. तसं बीसीसीआयबाबत शक्य आहे का? अझरुद्दीन प्रकरणाला फार तर 'कर चुकवण्यासाठी भारताचे प्रतिनिधित्व करत नाही असे सांगणाऱ्या भ्रष्ट कंपनीला एका भ्रष्ट कर्मचाऱ्याने फसवले' असे म्हणता येईल. तिथे देशप्रेम आणि देशद्रोहाचा काय संबंध आला?

In reply to by आजानुकर्ण

श्रीगुरुजी Mon, 01/19/2015 - 14:26
>>> मात्र भारतीय ऑलिंपिक संघटनेने 'आम्ही भारताचे प्रतिनिधित्व करत नाही' असं कुठं सांगितलंय का? बीसीसीआयने ते अगदी स्पष्ट शब्दात भारताच्या सुप्रीम कोर्टात सांगितलंय. बीसीसीआयने असं सांगितलं कारण त्यांना माहिती अधिकाराच्या कक्षेत यायचं नव्हतं. ऑलिंपिकच्या तुलनेत क्रिकेट भारतात प्रचंड लोकप्रिय आहे, बीसीसीआय कडे प्रंचंड पैसा आहे, त्यावर सरकारचे थेट नियंत्रण नाही व त्यामुळेच त्या पैशावर नजर ठेवून भ्रष्ट राजकारणी व लबाड उद्योगपती बीसीसीआय वर नागोबासारखे वेटोळे घालून बसले आहेत. आपले उद्योग चव्हाट्यावर येऊन न्यायालयाच्या कक्षेत येऊ नयेत व त्याचबरोबर माहिती अधिकाराच्या कक्षेत येऊ नयेत यासाठी बीसीसीआय जीवाचा आटापिटा करीत आहे व त्यामुळेच आमचा भारत सरकारचा संबंध नाही, आम्ही भारतीय मानांकने (राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत इ.) वापरत नाही इ. तद्दन खोटे दावे बीसीसीआयने केले आहेत. खरं तर राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत इ. राष्ट्रीय मानांकने कोणत्याही खाजगी संस्थेला वापरायची कायदेशीर परवानगी नाही. फक्त सरकारी संस्थांनाच ही मानांकने वापरायची कायदेशीर परवानगी आहे. बीसीसीआय उघडउघड ही सर्व मानांकने वापरते. ऑलिंपिक संघटनेला तेवढे ग्लॅमर नाही. त्यामुळे तिथे जाण्यात फारशी चुरस नाही. बीसीसीआय प्रमाणे भारतीय ऑलिंपिक संघटना देखील भारत सरकार नियंत्रित करीत नाही. तथापि ज्याप्रमाणे ऑलिंपिक संघटना ऑलिंपिक, एशियाड, राष्ट्रकुल स्पर्धा इ. स्पर्धांसाठी जो संघ पाठविते तो भारतीय ऑलिंपिक संघटनेचा खाजगी संघ नसून तो भारत या देशाचा संघ असतो, तद्वत क्रिकेटचा संघ हा बीसीसीआय चा खाजगी संघ नसून भारत या देशाचा हा संघ असतो. मला वाटतं मी पुन्हा एकदा पुरेशा स्पष्टीकरणासहीत हा मुद्दा स्पष्ट केलेला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

आजानुकर्ण Mon, 01/19/2015 - 17:41
काहीही फेकू नका. मी वर दुवा दिलेले बीसीसीआयचे निवेदन २००४ चे आहे. भारताचा माहिती अधिकार कायदा २००५ चा आहे. तरीही तुम्हाला तो भारत देशाचा संघ आहे असे मानायचे असेल तर खुशाल माना. एवढा क्रिकेटसंबंधातील देशप्रेमाचा पुळका असेल तर आधी बीसीसीआयवर देशद्रोहाचा खटला दाखल करा.

In reply to by आजानुकर्ण

श्रीगुरुजी Mon, 01/19/2015 - 18:53
>>> काहीही फेकू नका. मी वर दुवा दिलेले बीसीसीआयचे निवेदन २००४ चे आहे. भारताचा माहिती अधिकार कायदा २००५ चा आहे. तरीही तुम्हाला तो भारत देशाचा संघ आहे असे मानायचे असेल तर खुशाल माना. एवढा क्रिकेटसंबंधातील देशप्रेमाचा पुळका असेल तर आधी बीसीसीआयवर देशद्रोहाचा खटला दाखल करा. मी कधीही फेकत नाही. क्रिकेट स्पर्धांमध्ये भारताचा सामना असताना भारताचा संघ भारताचा राष्ट्रध्वज फडकावताना व राष्ट्रगीत गाताना प्रत्येक सामन्यात दिसते. प्रत्यक्ष बीसीसीआय आपल्या संकेतस्थळावर क्रिकेट संघ हा भारताचा संघ आहे असा उल्लेख करते (स्वतःचा खासगी संघ आहे हा उल्लेख कोठेही नसतो). जगात सर्वत्र, क्रिकेटच्या अधिकृत संकेतस्थळावर, रेकॉर्ड बुक्समध्ये, जागतिक स्पर्धांमध्ये हा संघ बीसीसीआयचा संघ आहे असा कोठेही उल्लेख नसतो. हा संघ भारताचा संघ आहे हाच सर्वत्र उल्लेख आहे. भारतीय संघातल्या खेळाडूंच्या हेल्मेटवर भारतीय राष्ट्रध्वज कोरलेला आहे. फक्त देशाशी संबंधित संस्थांनाच या मानांकनांचा वापर करता येतो. इतरांना नाही. तरीही तो संघ बीसीसीआय चा खाजगी संघ आहे व भारत या देशाचा या संघाशी कोणताही संबंध नाही असा तुमचा अट्टाहास असेल तर तसे खुशाल माना.

In reply to by श्रीगुरुजी

आजानुकर्ण Mon, 01/19/2015 - 19:15
तरीही तो संघ बीसीसीआय चा खाजगी संघ आहे व भारत या देशाचा या संघाशी कोणताही संबंध नाही असा तुमचा अट्टाहास असेल तर तसे खुशाल माना.
तो माझा अट्टाहास नसून त्या संघाचे मालक असलेल्या बीसीसीआयचाच अट्टाहास आहे.

In reply to by श्रीगुरुजी

आजानुकर्ण Sun, 01/18/2015 - 18:37
भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या घटनेत हे कलम आहे. थोडक्यात भारत सरकार व इतर प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय संघटना यांच्यातील दुवा म्हणून ऑलिंपिक संघटना काम करते. त्यामुळे निदान अप्रत्यक्षरीत्या भारताचे प्रतिनिधी निवडण्याचा हक्क भारतीय ऑलिंपिक संघटनेला आहे. Maintaining liaison between the Government of India and member federations or associations

In reply to by आजानुकर्ण

श्रीगुरुजी Mon, 01/19/2015 - 15:27
बीसीसीआयच्या अधिकृत संकेतस्थळावरील एका अधिकृत पानात खालील वाक्य आहे. "India first won a Test series abroad in 1967-68, when the New Zealanders were beaten 3-1 on their own pitches. Three seasons later, the Indian team went several steps further, winning back-to-back series in the West Indies and England." इथे क्रिकेट संघाचा उल्लेख "Indian team" असा स्वतः बीसीसीआयनेच केलेला आहे. तसेच न्यूझीलँडविरूद्धची मालिका बीसीसीआयच्या संघाने जिंकली असे न म्हणता "India first won a Test series abroad " असे म्हटलेले आहे. मला वाटतं ही वाक्ये पुरेशी बोलकी आहेत.

In reply to by अनुप ढेरे

आजानुकर्ण Mon, 01/19/2015 - 19:16
पुरावे दिले तरीही मुद्दे रेटून नेण्याचे गुरुजींचे कसब वाखाणण्यासारखे आहे. आता मी शरणागती पत्करत आहे. श्रीगुरुजींचा विजय असो!

In reply to by आजानुकर्ण

सुबोध खरे Tue, 01/20/2015 - 10:22
कर्ण साहेब बी सी सी आय ने सर्वोच्च न्यायालयात काय निवेदन दिले त्याला काहीही अर्थ नाही.( या न्यायाने कसाब्ने सुद्धा निवेदन दिले होते कि त्याला उगाचच पकडले आहे) न्यायालयाने ते मान्य केले का? जाऊ द्या आपल्याला वितंडवाद घालायची सवय आहे त्याल कोण काय करणार?

In reply to by सुबोध खरे

आजानुकर्ण Tue, 01/20/2015 - 17:42
कसाबने कोर्टात दिलेले निवेदन सुप्रीम कोर्टाने मान्य केले का? बीसीसीआयने कोर्टात दिलेले निवेदन सुप्रीम कोर्टाने मान्य केले का? काय आहेत या दोन प्रश्नांची उत्तरे?

In reply to by आजानुकर्ण

श्रीगुरुजी Tue, 01/20/2015 - 22:43
आयपीएल मधील फिक्सिंग, श्रीनिवासन इ. विरूद्ध सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर बर्‍याच गोष्टी स्पष्ट होतील.

In reply to by आजानुकर्ण

मृत्युन्जय Mon, 01/19/2015 - 13:57
बीसीसीआय ही एक स्वायत्त संस्था आहे आणि भारतीय सरकारच्या नियंत्रणाखाली येते की नाही हे ठरवण्यासाठी जो खटला चालु होता त्यातील हे निवेदन आहे जे कायदेशीर दृष्ट्या योग्य आहे. पण तो जो संघ खेळतो तो भारताचा संघ म्हणुन खेळतो. जरी त्यावर भारतीय सरकारचे नियंत्रण नसेल तरीही तो भारताचा संघच आहे. भारत सरकारचा संघ नसेलही कदाचित. भारतातील प्रत्येक संस्था भारतीय सरकारच्या नियंत्रणाखाली येतेच असे नाही तरीही ती भारतीय संस्था असु शकते.

In reply to by श्रीगुरुजी

बाळ सप्रे Mon, 01/19/2015 - 16:49
क्रिकेट संघ भारताचा नसून BCCI चा आहे हा एक तद्दन फालतु प्रतिवाद आहे. प्रत्येक देशाचे प्रतिनिधित्व करायला नागरीकत्वाची अट असते. जी भारतीय संघालाही लागू आहे..

In reply to by बाळ सप्रे

थॉर माणूस Mon, 01/19/2015 - 17:43
रत्येक देशाचे प्रतिनिधित्व करायला नागरीकत्वाची अट असते.
क्रिकेटमध्ये असं नसावं बहुतेक. कारण... Luke Ronchi : न्युझीलंडमधे जन्मलेला क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियामधे स्थायिक झाला. तरी दोन्ही देशांकडून खेळला. Geraint Jones : जन्म पापुआ न्यु गिनिआ मधला, आई वडील स्थायिक झाले ऑस्ट्रेलियामधे पण पालक वेल्श वंशाचे असल्याने खेळला इंग्लंडकडून. सध्या इंग्लंडच्या संघात चान्स मिळत नाही म्हणून पापुआ न्यु गिनिआ कडून खेळतो. Dirk Nannes : जन्म ऑस्ट्रेलियाचा, वाढला पण तिकडेच पण वंशाने डच म्हणून खेळला नेदरलँडस कडून, नंतर परत ऑस्ट्रेलियाकडून. अशी काही उदाहरणे आढळतात. बाकी चालू द्या.

In reply to by थॉर माणूस

बाळ सप्रे Mon, 01/19/2015 - 17:46
नियमाप्रमाणे हे खेळाडू त्या देशातील अपेक्षित वास्तव्यानंतरच संघात निवडले जातात.. उठ्सूट कोणालाही निवडले जात नाही..

In reply to by बाळ सप्रे

थॉर माणूस Mon, 01/19/2015 - 18:01
इंटरेस्टींग... हा नियम कुठे वाचायाला मिळेल? नेट वर कुठेच सापडत नाहीये... आणि आयसीसीची साईट म्हणजे दिव्य आहे, तिथं शोधणं जाम अवघड जातंय मला.

In reply to by बाळ सप्रे

थॉर माणूस Tue, 01/20/2015 - 09:02
हुश्श्य... सापडले बरं का नियम. नै तुम्ही गेलात कायतरी बोलून, लिंक वगैरे न देता. पण हा नियम आहे की नाही हे पिल्लू राहीलं ना राव आमच्या डोक्यात. तर, एखादा खेळाडू त्या देशाचे नेतृत्व करू शकतो... १. ज्या देशाचा पासपोर्ट(नागरीकत्व) त्याच्याकडे आहे. किंवा २. ज्या देशातला त्याचा जन्म आहे (वास्तव्य नव्हे, जन्म) किंवा ३. गेली सलग चार वर्षे त्याने त्या देशात किमान सहा महिने वास्तव्य केल्याचा दाखला दिला आहे. उदाहरणार्थ Geraint Jones जन्मला पापुआ न्यु गिनिआ मधे म्हणून तिथे राहिलेला नसला तरी तो तिकडून खेळतो. नागरीकत्व ऑस्ट्रेलियाचे म्हणून तिथल्या स्पर्धांमधे खेळू शकला. आणि अर्थातच इंग्लंडमधे रहाण्याचा दाखला मिळवून तिथल्या स्पर्धांमधेही खेळला आणि नंतर तिथूनच आंतरराष्ट्रीय कारकिर्द सुरू केली.

In reply to by थॉर माणूस

श्रीगुरुजी Tue, 01/20/2015 - 12:18
बरोबर आहे. अनेक खेळाडू स्वतःचे नागरिकत्व असलेल्या देशाव्यतिरिक्त इतर देशांकडून खेळलेले आहेत ते याच नियमांच्या आधारे. पूर्वी ग्रॅहम हिक हा झिंबाब्वेचा नागरिक होता, पण काही वर्षे इंग्लंडमध्ये वास्तव्य करून नंतर इंग्लंडकडून खेळला. केपलर वेसेल्स तर ऑस्ट्रेलिया व द. आफ्रिका या दोन्ही देशांकडून खेळला. पुण्यातला रियाझ पूनावाला महाराष्ट्राच्या रणजी संघात होता. भारतीय संघात त्याची कधी निवड झाली नाही. परंतु तो नंतर यूएई कडून खेळला. सध्याच्या काळात केव्हीन पीटरसन, मॉर्गन ही उदाहरणे आहेत. पूर्वी रॉबिनसिंग त्रिनिदादचा नागरिक असूनही भारताकडून खेळला होता.

In reply to by मृत्युन्जय

आजानुकर्ण Mon, 01/19/2015 - 17:43
मूळ मुद्दा भारताचा संघ आहे की नाही असा नसून बीसीसीआयसाठी खेळताना पैशाची अफरातफर व फिक्सिंगसारखे प्रकार केले तर ते देशद्रोहाइतके गंभीर होतात का हा आहे. यासाठी हा संघ व भारत देश यांमधला संबंध समजून घेणे आवश्यक आहे.

In reply to by कपिलमुनी

थॉर माणूस Mon, 01/19/2015 - 18:05
*ROFL* *lol* येवढं तिरकं घुसल्यावर मुळ मुद्दा कुठला आठवायला... अजून मुळ मुद्दा पुण्यातली हेल्मेटसक्ती आहे असं कुणी कसं म्हटलं नाही कुणास ठाऊक. *biggrin*

In reply to by आजानुकर्ण

मृत्युन्जय Mon, 01/19/2015 - 18:45
पैशाची अफरातफर व फिक्सिंगसारखे प्रकार केले तर ते देशद्रोहाइतके गंभीर होतात का हा आहे अर्थातच तो देशद्रोह नाही धरला जाणार. समजा आयकर खात्यातल्या एका अधिकार्‍याने अफरातफर केली तर त्याच्यावर देशद्रोहाचे कलम नाही लावले जात. किंबहुना एखाद्या मंत्र्याने जरी अफरातफर केली तरी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक होत नाही.

In reply to by मृत्युन्जय

आजानुकर्ण Mon, 01/19/2015 - 19:19
आयकर खाते आणि मंत्री हे जनतेला थेट जबाबदार आहेत. बीसीसीआयचे तसे नाही. मला वाटते समर्पक उदाहरण म्हणजे रिलायन्स कंपनीच्या एखाद्या मॅनेजरने अफरातफर केली तर ज्या स्वरुपाची शिक्षा होऊ शकते त्या स्वरुपाची शिक्षा बीसीसीआयच्या खेळाडूंना व्हावी. देशप्रेमाच्या उकळ्या फुटण्याचा तिथे संबंध नाही. देशप्रेम ही इतकी सस्ती गोष्ट नाही.

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी Sat, 01/17/2015 - 22:26
>>> क्रिकेटच्या सामन्यात फसवणूक करणे हा देशद्रोह कसा होऊ शकतो, काय तर तुम्हाला तो धर्म वाटतो म्हणून… ? देशाचे प्रतिनिधित्व करताना देशाची व देशातील नागरिकांची फसवणूक करणे हा देशद्रोहच आहे. >>> जिथे चार टाळकी वर बसून निव्वळ पैसा बघतात, त्यासाठी वाटेल त्या गोष्टी करतात, वाटेल ते म्हणजे? >>> तो धर्म नाही हो, व्यवसाय आहे शुद्ध. त्यांच्या फायद्यासाठी ते जनतेला सरळ सरळ *** बनवतात, आणि पब्लिक आपली येड्यासारखी क्रिकेट हा आमचा धर्म आहे वैगेरे करत धुंदीत जगत असते. तो व्यवसायच आहे. मी ज्या अर्थाने 'धर्म' हा शब्द वापरला तो तुम्हाला समजलाच नाही. अज्ञानातून होतं असं. चालायचंच. >>> (हाय कंबख्त, तूने पीही नही!) असे म्हणाल तर काय आहे ना की ही तुमची दारू जिथे बनते ना तिथे प्रत्यक्ष सर्वात वरच्या वर्तुळात मी काम केले आहे. कोण किती पाण्यात आहे, कोण किती धुतल्या तांदळाचा आहे ते पण बघितले. त्यामुळे आत काय आहे आणि बाहेर काय आहे याचा पुरेपूर अनुभव आहे (हाय कंबख्त, तूझे पताही नही!) . त्यामुळे त्या दारूपासून आंम्ही चारशे हात लांबच बरे! पुन्हा तेच. "तूने पीही नही" हे संबोधन ज्या अर्थाने वापरले ते तुम्हाला समजलेच नाही. असो. >>> (माझ्या टिप्सवर एका सट्टेबाज मित्राने आयपीएल मध्ये १करोड कमावले, यावरून काय तो अंदाज घ्या, प्यायची कि नाही ते) मग तुम्ही का नाही कमावले? काही महिन्यांपूर्वी पैशाच्या तंगीमुळे तुम्ही आत्महत्या करायला निघाला होता. स्वतःची टीप वापरून तुम्हाला भरपूर कमावता आले असते. बेसिकली आयपीएल हा एक व्यवसायाचा इव्हेंट आहे. त्यात देशाचा संबंध नाही. आणि कोणत्याही धंद्यात थोडीफार लबाडी ही असणारच.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगृरुजी व व संदीपजी माझ्यामते ह्या विषयावर आपण सर्वांनी आपापली मते व्यक्त केली आहेत त्यापुढे जाऊन आता क्रिकेट व देशद्रोह ही सुद्धा उपचर्चा झाली , आता आपण सर्वांनी ह्या चर्चेला पूर्णविराम देणे योग्य ठरेल. एवढे म्हणून मी ह्या धाग्यावरून रजा घेतो.

In reply to by निनाद मुक्काम …

संदीप डांगे Sun, 01/18/2015 - 01:16
धन्यवाद निनादजी, आपण प्रस्तुत लेखाशी सुसंगत मुद्दे मांडून आणि माहिती देऊन चर्चा भरकटू दिली नाही. तुमच्यामुळे मला अजून चार नवीन गोष्टी कळल्या, धन्यवाद!

In reply to by श्रीगुरुजी

संदीप डांगे Sun, 01/18/2015 - 01:01
प्रतिवाद करायला सत्यावर आधारित मुद्दे तुमच्याकडे नाहीत म्हणून तुम्ही वैयक्तिक व नाजुक विषयांकडे घसरत आहात. यावरूनच तुमची दुसऱ्याना माणूस म्हणून वागवणारी माणुसकी दिसून आली. मला सट्टा खेळायला आवडत नाही म्हणून आपल्या घामाचे पैसे जुगारावर लावत नाही. मेहनतीच्या चार पैश्यात समाधानी आहे. आणि मी काय प्यायलोय आणि नाही याचा इतिहास उगाळून तुम्हाला काय उपयोग? तुम्ही क्रिकेट आणि देशप्रेम याचा स्वत:चा स्वत: जो संबंध लावलाय किंवा मार्केटिंगच्या तंत्राने तुमचा जो काय ब्रेनवाश केलाय (किंवा लाखो लोक तसाच विचार करतात म्हणून ते बरोबर) त्यामुळे तुम्हाला क्रिकेटमधून देशप्रेमाच्या उकळ्या फुटतात. हे अत्यंत बेसलेस आहे. त्यामुळे दुसऱ्यांचे अज्ञान काढण्याआधी स्वत:चेच ज्ञान वाढवा आणि काही चुकीच्या कल्पना उराशी बाळगून राहू नका. कधी सत्य समजले ना तर फार मोठा धक्का बसेल. आपल्याला आवडतं तेच श्रेष्ठ आणि सत्य असाच कट्टरवाद्यांचा दावा असतो, तुम्ही पण त्यातलेच.

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी Sun, 01/18/2015 - 13:27
>>> प्रतिवाद करायला सत्यावर आधारित मुद्दे तुमच्याकडे नाहीत म्हणून तुम्ही वैयक्तिक व नाजुक विषयांकडे घसरत आहात. यावरूनच तुमची दुसऱ्याना माणूस म्हणून वागवणारी माणुसकी दिसून आली. तुम्ही तर निष्पापांना अतिरेक्यांनी मारण्याचे समर्थन करून अतिरेक्यांना पाठिंबा देत आहात, यातच तुमचीही माणूसकी दिसून आली. >>> मला सट्टा खेळायला आवडत नाही म्हणून आपल्या घामाचे पैसे जुगारावर लावत नाही. मेहनतीच्या चार पैश्यात समाधानी आहे. तुम्ही आपले प्रतिसाद नीट वाचा. क्रिकेट तुम्हाला आवडत नाही आणि तुम्ही क्रिकेटचा तिरस्कार करता. तरीसुद्धा तुम्हाला क्रिकेटमधल्या अगदी बिनचूक टिप्स माहिती आहेत आणि त्यावरून तुमच्या एका मित्राने म्हणे एक कोटी मिळविले. या हास्यास्पद दाव्यावर मी किंवा इतर कोणी काय प्रतिसाद द्यावा अशी तुमची अपेक्षा आहे. जाता जाता, एप्रिलमध्ये आयपीएल सुरू होतंय. आम्हालाही २-४ टिप्स द्या ना. थोडे पैसे कमावीन म्हणतो. >>> आणि मी काय प्यायलोय आणि नाही याचा इतिहास उगाळून तुम्हाला काय उपयोग? तुम्ही क्रिकेट आणि देशप्रेम याचा स्वत:चा स्वत: जो संबंध लावलाय किंवा मार्केटिंगच्या तंत्राने तुमचा जो काय ब्रेनवाश केलाय (किंवा लाखो लोक तसाच विचार करतात म्हणून ते बरोबर) त्यामुळे तुम्हाला क्रिकेटमधून देशप्रेमाच्या उकळ्या फुटतात. ब्रेनवॉश तुमचाच झालाय आणि तो अतिरेक्यांच्या आंधळ्या प्रेमाने झालाय. तुम्ही चक्क माणसे मारायचे समर्थन करताय. देशाचे प्रतिनिधित्व करताना फसवणूक करणे हा देशद्रोह आहेच. >>> हे अत्यंत बेसलेस आहे. त्यामुळे दुसऱ्यांचे अज्ञान काढण्याआधी स्वत:चेच ज्ञान वाढवा आणि काही चुकीच्या कल्पना उराशी बाळगून राहू नका. कधी सत्य समजले ना तर फार मोठा धक्का बसेल. तुम्हाला सत्याचा आविष्कार झालेला दिसतोय. जरा इतरांनाही सांगा ना सत्य काय आहे ते. >>> आपल्याला आवडतं तेच श्रेष्ठ आणि सत्य असाच कट्टरवाद्यांचा दावा असतो, तुम्ही पण त्यातलेच. तुम्ही पण त्यातलेच.

In reply to by श्रीगुरुजी

संदीप डांगे Sun, 01/18/2015 - 18:00
तुम्ही आपले प्रतिसाद नीट वाचा. क्रिकेट तुम्हाला आवडत नाही आणि तुम्ही क्रिकेटचा तिरस्कार करता. तरीसुद्धा तुम्हाला क्रिकेटमधल्या अगदी बिनचूक टिप्स माहिती आहेत आणि त्यावरून तुमच्या एका मित्राने म्हणे एक कोटी मिळविले. या हास्यास्पद दाव्यावर मी किंवा इतर कोणी काय प्रतिसाद द्यावा अशी तुमची अपेक्षा आहे.
तिथे प्रत्यक्ष सर्वात वरच्या वर्तुळात मी काम केले आहे. कोण किती पाण्यात आहे, कोण किती धुतल्या तांदळाचा आहे ते पण बघितले. त्यामुळे आत काय आहे आणि बाहेर काय आहे याचा पुरेपूर अनुभव आहे हे तुम्ही वाचले नाही बहुतेक.

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी Sun, 01/18/2015 - 18:23
>>> हे तुम्ही वाचले नाही बहुतेक. मी तुमचं बरंच काही वाचलंय हो. तुम्ही कुठल्या वर्तुळात आणि किती खोलवर गेलात तेही वाचलंय. पण त्यात सत्यांश किती, पूर्वग्रह किती आणि कल्पनेच्या भरार्‍या किती हे सांगता का जरा.

In reply to by श्रीगुरुजी

संदीप डांगे Sun, 01/18/2015 - 19:39
यात सत्यांश किती, पूर्वग्रह किती आणि कल्पनेच्या भरार्‍या किती हे सांगता का जरा.
आता खरंच वाटतंय, तुम्हाला वादासाठी वाद घालत आहात. तुम्हाला सत्य सांगीतले तरी तुम्ही म्हणाल आम्हाला हे मान्यच नाही तर काय करणार? तुमच्यासाठी सत्य हे तुम्ही काय मानता यावरच अवलंबून आहे. तुमच्या मताविरुद्ध मत मांडतोय म्हणून तुम्ही तर संदीप डांगे नावाचा व्यक्ती अस्तित्वातच नाही असेही म्हणाल. किंवा माझ्या डोक्यावरच परिणाम झालाय त्यामुळे मी काहीही बरळतो असे तुम्ही म्हणाल. मी जे बीसीसीआय मध्ये सुमारे वर्षभर काम केले तो माझा भास आहे, भ्रम आहे असेही तुम्ही म्हणाल. तुम्हीच वकील, तुम्हीच जज, तुम्हीच जल्लाद अशा वातावरणात तुम्हाला काही सांगायची मला काहीच गरज नाही. तुम्ही काही अर्जुन नाही कि मी काही कृष्ण नाही तुम्हाला सत्याचे याचिदेही याचिडोळा अनुभव द्यायला. तुमचे सत्य, कल्पनेच्या भराऱ्या तुमच्यापाशी. माझ्या माझ्यापाशी. तुमच्या आंधळ्या क्रिकेटप्रेमाची खिल्ली उडवली तर तुम्ही माझ्यावर चक्क खोटारडेपणाचे आरोप करत आहात. म्हणजेच तुम्ही चिडला असून आपण मानत असलेल्या धर्मावर कुणी चिखल उडवला म्हणून तुम्ही फार व्यथित झाला आहात. हेच होत असते गुरुजी. आपण मूर्ख ठरवलो जातोय असे वाटले कि माणसे चिडतात. नाहीतर क्रिकेट हे देशप्रेम कसे हे तुम्ही सांगत बसला नसता. आज मी क्रिकेटचा तिरस्कार करतो म्हणजे जन्माला आल्यापासून करत होतो असा त्याचा अर्थ होत नाही, तुम्ही आज जेवढे आहात त्याच्या कैकपटीने मी क्रिकेटवेडा होतो. प्रेमामध्ये लोक आंधळे असतात. ठेच लागली कि सत्य कळते. तुम्ही क्रिकेटचा आनंद घ्या, बाकीचा विचार करू नका. फक्त एकच - क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असे म्हटले जाते. पण ते तसे प्रत्येक वेळी असतेच असे नाही. क्रिकेट व देशप्रेम किंवा देशद्रोह यांचा काही संबंध नाही. तुम्ही मानत असाल पण देशाचे कायदे असे मानत नाहीत. तसे असते तर फिक्सिंग करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून संजय दत्तसारखे जेलमध्ये टाकले असते. क्रिकेट या विषयावर मला पुढे बोलायची गरज वाटत नाही त्यामुळे इथेच थांबतो. तुमचं चालू द्या.

In reply to by संदीप डांगे

आजानुकर्ण Sun, 01/18/2015 - 19:49
क्रिकेट व देशप्रेम किंवा देशद्रोह यांचा काही संबंध नाही. तुम्ही मानत असाल पण देशाचे कायदे असे मानत नाहीत. तसे असते तर फिक्सिंग करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून संजय दत्तसारखे जेलमध्ये टाकले असते.
सहमत. स्वतः बीसीसीआय अगदी निःसंग्दिग्ध शब्दात सांगते आहे की आमचे खेळाडू हे भारताचे अधिकृत खेळाडू नाहीत. आम्ही भारताचा झेंडा वापरत नाही. भारत सरकारचा आणि आमचा काहीही संबंध नाही तर गुरुजींचा दावा आहे की बीसीसीआयच खोटे बोलत आहे. इतका हास्यास्पद दावा याआधी वाचला नव्हता. भारताचे नागरिक काहीही म्हणतील. उदा. मी भारताचा नागरिक आहे आणि मी म्हणतोय बीसीसीआय द. आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करते. या माझ्या म्हणण्याला कुठल्याच कोर्टात काडीचीही किंमत नाही. स्वतः बीसीसीआय (आणि भारत सरकार) त्या संघटनेबाबत काय म्हणते आहे हेच अधिकृत मत आहे. त्याचप्रमाणे अझरुद्दीन किंवा जडेजा काय करतात त्याला देशद्रोहाऐवजी बलात्कार म्हणण्याची मागणी 'भारताचे नागरिक' करतील. त्यालाही कोर्ट काडीचीही किंमत देणार नाही.

In reply to by आजानुकर्ण

श्रीगुरुजी Tue, 01/20/2015 - 12:46
>>> स्वतः बीसीसीआय अगदी निःसंग्दिग्ध शब्दात सांगते आहे की आमचे खेळाडू हे भारताचे अधिकृत खेळाडू नाहीत. आम्ही भारताचा झेंडा वापरत नाही. भारत सरकारचा आणि आमचा काहीही संबंध नाही तर गुरुजींचा दावा आहे की बीसीसीआयच खोटे बोलत आहे. इतका हास्यास्पद दावा याआधी वाचला नव्हता. अहो, कसाबने सुद्धा निसंदिग्ध शब्दात सांगितले होते की त्याने नागरिक मारले नाहीत म्हणून. पण वस्तुस्थिती काय होती? प्रत्येक सामन्यात भारताचा ध्वज, भारताचे राष्ट्रगीत वापरून सुद्धा जर बीसीसीआय सांगत असेल की आमचे खेळाडू हे भारताचे अधिकृत खेळाडू नाहीत, आम्ही भारताचा झेंडा वापरत नाही तर हा दावा खोटा आणि हास्यास्पद नाही का? स्वतःच्या अधिकृत संकेतस्थळावर बीसीसीआय लिहिते क्रिकेट संघाचा उल्लेख हा स्वतःचा संघ असा एकदाही न करता भारतीय संघाने अमुकतमुक मालिका जिंकली किंवा भारतीय संघ अमुकतमुक मालिकेत चांगला खेळला असा उल्लेख करते आणि त्याचवेळी 'आमचे खेळाडू हे भारताचे अधिकृत खेळाडू नाहीत' असा दावा करते, त्यावेळी या दोन गोष्टींमधील विरोधाभास व खोटारडेपणा कोणाच्याही सहज लक्षात येईल. तुमच्यासारख्या काही जणांच्या तो लक्षात येत नाही हे दुदैव आहे किंवा तुम्ही जाणूनबुजून असे करत आहात. _____________________________________________________________________________ बीसीसीआयच्या अधिकृत संकेतस्थळावरील या पानातील http://www.bcci.tv/about/2015/history ही खालील वाक्ये वाचा. he Provisional Board met in Mumbai in December 1928 during the Quadrangular tournament, to discuss the next course of action. It was at this meeting that Govan and De Mello prevailed upon the others to reconsider the decision taken at the previous year's meeting. They did not want India to miss out on the opportunity to host South Africa in 1929 and tour England in 1931! Their persistence paid off. The Provisional Board was deemed to have finished its work, and the Board of Control for Cricket in India established. Govan was the first President, and De Mello the first Secretary. Five months later, the ICC admitted India as a Full Member. १९२८ मध्ये "भारताला" (बीसीसीआय ला नाही) आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचा पूर्ण वेळ सदस्य करून घेण्यात आले. Govan and De Mello tried their best to convince Kumar Shri Duleepsinhji, nephew of 'Ranji,' to lead the Indian team to England in 1932. इथेही "भारतीय संघ" असा उल्लेख आहे (बीसीसीआय चा संघ असा उल्लेख नाही) हे लक्षात घ्या. क्रिकेट संघाचे "भारताचा संघ" असा उल्लेख केलेली अजून काही वाक्ये (संपूर्ण संकेतस्थळावर कोठेही हा संघ बीसीसीआय चा संघ आहे असा उल्लेख नाही). On the eve of the inaugural Test, which was played at Lord's in 1932, both Porbandar and Limbdi pulled out, and Col. C.K. Nayudu, the premier cricketer in the squad, was awarded the honour of becoming India's first Test captain. India first won a Test series abroad in 1967-68, when the New Zealanders were beaten 3-1 on their own pitches. Three seasons later, the Indian team went several steps further, winning back-to-back series in the West Indies and England. हा क्रिकेटचा संघ भारताचा संघ नसून आमचा म्हणजे बीसीसीआयचा संघ आहे व आम्ही भारताचा ध्वज वापरत नाही हे बीसीसीआय चे दावे तद्दन खोटे आणि हास्यास्पद आहेत हे आता तुमच्या लक्षात आलं असावं अशी इच्छा आणि अपेक्षा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

आजानुकर्ण Tue, 01/20/2015 - 19:57
बीसीसीआय चे दावे तद्दन खोटे आणि हास्यास्पद आहेत हे आता तुमच्या लक्षात आलं असावं अशी इच्छा आणि अपेक्षा आहे.
होय गुरुदेव. बीसीसीआयचे सर्वच दावे तद्दन खोटे व हास्यास्पद आहेत. तुमचे दावे अत्यंत खरे आहेत. (खरे या शब्दाचा डॉ. साहेबांशी काहीही संबंध नाही. नाहीतर त्यांना वाटेल मी वितंडवाद घालतोय.) दुर्दैवाने देशभक्त खेळाडूंना बीसीसीआयसारख्या खोटारड्या व हास्यास्पद दावे करणाऱ्या कंपनीची चाकरी करावी लागत असल्याने तत्काळ या संघाचे राष्ट्रीयीकरण करण्यात यावे व क्रिकेटप्रेमाला देशप्रेम न समजणाऱ्यांस देशद्रोही समजण्याचा अध्यादेश मोदीमजकुरांनी काढावा अशी मागणी मी या माध्यमातून याठिकाणी करत आहे.

In reply to by आजानुकर्ण

संदीप डांगे Tue, 01/20/2015 - 21:12
आमचे या मागणीस बेशर्त अनुमोदन आहे बाद्वे, क्रिकेट, देशप्रेम, देशद्रोह, बेटिंग आणि फिक्सिंग असा वेगळा धागा काढावा का? ("मेलो… नक्क…………ओ " इति समस्त मिपाकर)