Skip to main content

लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 08/01/2015 या दिवशी प्रकाशित केले.
लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!

आता तयार व्हावे लढण्यास लेखणीने
रक्षण अबोलतेचे करण्यास लेखणीने

अभ्यास चिंतनाला शास्त्रात घोळवावे
कसदार शब्दशेती फुलण्यास लेखणीने

वास्तव चितारण्याची अवगत कला करावी
भक्कम नवीन पाया रचण्यास लेखणीने

नवज्ञान निर्मितेला जेथे उभार तेथे
आशय हळूच न्यावा भिजण्यास लेखणीने

भाकड-वृथा कथांच्या कक्षेपल्याड जावे
अभिजात सृजनाला पुजण्यास लेखणीने

लटकी-पुचाट वाणी शिरजोर होत आहे
यावे रणात गच्ची धरण्यास लेखणीने

जेव्हा चहूदिशांनी वादळ विराट तेव्हा
द्यावे अभय दिव्याला जळण्यास लेखणीने

                             - गंगाधर मुटे 'अभय'
--------------------------------------------------

लेखनविषय:

वाचने 12489
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

सोडून शेतकीचे आवेशपूर्ण गाणे! स्वीकारतोच आता शहरी काव्य-लेणे!! गाऊन दाखवीन असे सुरेल गाणे ! आता दिसेल तुम्हा साक्षात चांदणे !! नकोच खप्प मर्जी तुमच्या संपादकाची! पुरवीन आस आता गाऊन गाणी तुमची!! लागे न माळ आता शहरी प्रतिसादकाची ! मिळ्वीन पूर्ण खात्री माला आता कौतुकाची !! पुरेत हे प्रहार शिणलो प्रतिवाद करता! आता हवेत हार -साठी कवन करता !! मुटे कुल-सुताची ही स्वीकार मुक्त कविता! आवडेल नक्की तुजला थांबतो नक्की आता !! ओ मुटे , ह. घ्या , भांडायला येऊ नका !

In reply to by विटेकर

तुमची कविता मी 'गे माय भू तुझे मी' च्या चालीवर म्हणून बघितली. ठिक बसतीये मीटरमध्ये :)

In reply to by अन्या दातार

गे माय भू तुझे मी हे राष्ट्र देवतांचे आणि ही गझल एकाच वृत्तात (आनंदकंद) आहे. त्यामुळे चाल समान आहे.

In reply to by काळा पहाड

अल्ताफ राजाच्या "तुम तो ठेहरे परदेसी" गाण्यातील "अब याद आ रहा हैं वो माहे जनवरी था" या चालीवरही परफेक्ट जमतंय.

In reply to by सूड

याचा अर्थ "हे राष्ट्र देवतांचे" हे "या गो दांड्यावरना" या चालीतही म्हणता येईल! विटूकाका आणि इतरांची क्रिएटिविटी जबरदस्त आहे!

In reply to by वैभव जाधव

@वैभव जाधव, "ये दिल मुझे बता दे, तू किस पे आगया है" या गीतात थोड्याफार मात्रा कमी जास्त आहेत पण या ओळींची जवळीक आनंदकद या वृत्ताशी आहे. :)

मला वाटतय , मुटे सरांच्या मागील धाग्यातील प्रतिसादातील ज्ञानयज्ञामुळे पब्लिक इथे प्रतिसाद द्यायचं टाळतय , दुष्ट कुठले :-\ ह्यानिमिताने शेतकर्‍यांच्या कवितांना किमान ३० प्रतिसादांचे पॅकेज द्यावे असे मी संपादक मंडळाला आवाहन करीत आहे :D

लेखकाचा प्रत्येक धागा वेगळी कलाकृती / लेखन म्हणून घ्यावा . बाकीच्या धाग्यांवरचे पडसाद इतरत्र नसावेत

In reply to by कपिलमुनी

सहमत....! कवितेवर प्रतिसाद अपेक्षित. बाकी मुटेंची रचना आवडली. -दिलीप बिरुटे

नवज्ञान निर्मितेला जेथे उभार तेथे आशय हळूच न्यावा भिजण्यास लेखणीने
ह्या ओळी आवडल्या. पण कदाचित जिथे अशी अनुकूल परिस्थिती नाही तिथेही नव्या ज्ञानाच्या जोपासनेसाठी मशागत करणे हेही लेखणीचेच काम म्हटले पाहिजे. कविता छान आहे. पुलेशु.

अभिजात सृजनासाठी लागणाऱ्या मशागतीसाठी शुभेच्छा.

वा वा वा वा ! जाम आवडली ! क्या बात ! सहीच.....