मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सत्याचा जय...

डॉ सुहास म्हात्रे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
पूर्वपिठिका: नुकतेच मिपावरच्या एका धाग्यावरच्या डॉ सुबोध खरे यांच्या प्रतिसादात खालील वाक्य वाचले... शेवटी काय माणूस चांगला असणे आणी आयुष्यात यशस्वी होणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही. या वाक्यात सांगीतलेल्या शंभर नंबरी सत्याविरुद्ध समाजात काही वेळेस जाणीवपूर्वक तर इतर काही वेळेस अजाणतेपणाने विचार पसरवला जात असतो आणि त्यामुळे समाजावर किती अनिष्ट परिणाम होतो याबद्दल लिहायचे बरेच दिवस मनात होतेच. पण, डॉ खरेंच्या प्रतिसादाने हातातले काम बाजूला ठेऊन आजच त्यावर खालील विचार लिहायला भाग पाडले, याबद्दल त्यांचे खास धन्यवाद ! ============================================ "नेहमीच सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो."; "गरिबीची भाकरी श्रीमंतीच्या लाडूपेक्षा गोड असते."; "लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी."; "लबाडी केल्याशिवाय धन अथवा यश मिळत नाही" वगैरे, वगैरे, वगैरे... अशी काल्पनिक, फसवी आणि भोंदू विधाने सर्वसामान्य माणसातल्या भोळसट कवीमनाला भुरळ घालतात. डोळे उघडे ठेवून आजूबाजूला पाहिले तर त्यातला फोलपणा दिसायला फार वेळ लागत नाही. दुर्दैवाने भावनेच्या पुरात वाहून जाणार्‍या माणसाला सर्वसाधारणपणे डोळे उघडे ठेऊन बघणे जरासे कठीणच जाते. सर्वात वाईट गोष्ट ही की बर्‍याच वेळेस अशी विधाने आपले अपयश झाकण्यासाठी एक उत्तम पळवाट म्हणून सोईची वाटतात... अश्या फसव्या फुंकरीने मूळ आजारावर (अपयश) उपाय तर होत नाहीच पण तो अधिकच बळावतो (यशासाठी प्रयत्न करण्याऐवजी अपयशाचे समर्थन करून स्वतःचेच मानसिक खच्चिकरण करण्याची वृत्ती बळावते). जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम परखडपणे सत्याला सामोरे जायची (ब्रूटल ऑनेस्टी) आणि वस्तूस्थितीकडे डोळे उघडे ठेऊन बघण्याची (लॉजिकल थिंकिंग) सवय अंगीकारली पाहिजे. मग त्यावरून झालेल्या बोधाने जो निर्णय पटेल तो ज्याचा त्याने घ्यावा... मात्र जर चुकीचा निर्णय घेतला तर त्याच्या परिणामांची तयारी ठेवावी... त्या परिणामांची जबाबदारी झटकून टाकायला काल्पनिक समजूतींचा आधार घ्यायची घातक सवय सोडून देणे आवश्यक आहे. कोणीतरी म्हटले आहेच ना की, "यश म्हणजे अपयशाचा अभाव नाही तर अपयशातून उठून, अंग झटकून, परिस्थितीचा सामना करून तिच्यावर विजय मिळवणे आहे." म्हणूनच सुरुवातीला दिलेल्या किंवा तत्सम फसव्या वाक्यांऐवजी खालील परखड सत्य स्विकारल्यास "मानसिक खरेपणा" आणि "ऐहीक यश" या दोन्हींची शक्य तेवढी "नैतीक सांगड" घालणे शक्य होईल: १. नेहमी सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो. नेहमी सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतोच असे नाही. परिश्रम घेतल्याविना असे काही झाल्यास तो योगायोग समजावा. याचा अर्थ विजयासाठी असत्याने वागायला पाहिजे असा अजिबात नाही तर असत्याचा पराभव करण्यासाठी लागणारी अक्कलहुशारी आणि ताकद बाळगणे जरूर आहे असा आहे. सितेला पळवून नेल्यावर पश्चाताप झाला म्हणून रावणाने तिला सन्मानाने परत पाठवले नव्हते. रामाला रावणाबरोबरचे युध्द जिंकूनच सत्याचा विजय सिद्ध करावा लागला होता. २. गरिबीची भाकरी श्रीमंतीच्या लाडूपेक्षा गोड असते. हा चलाख श्रीमंतांनी गरीबाला कायम गरीब ठेवण्यासाठी आणि त्याच्या जीवावर स्वतः कायम श्रीमंत राहण्यासाठी पसरवलेली खोटी कल्पना आहे. या खोडलेल्या विधानाचा मानसिक सुखांशी ओढून ताणून संबंध लाउन (वडाची साल पिंपळाला लाउन) आर्थिक अपयशाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला जातो. सत्य हे आहे की लाडू हा नेहमीच भाकरीपेक्षा गोड असतो आणि श्रीमंती ही नेहमीच गरिबीपेक्षा जास्त सुखकारक जीवन शक्य करते. मात्र ऐहीक सुख समाधानकारक पद्धतीने भोगण्यासाठी, "जर तो पैसा सरळ मार्गाने मिळवलेला असला तर" खूप मदत होते. पैशाबद्दल सत्य असे आहे की त्याला ऋण/नकारार्थी (negative) मुल्य आहे. म्हणजे थोडक्यात असे "तो नसला तर नक्कीच दु:खदायक असतो, पण असला तर सुखदायक होईलच असे नाही." मात्र पैसा योग्य मार्गाने मिळवलेला असला तर त्याचे फायदे उपभोगताना न्युनगंड / पकडले जाण्याच्या भितीचा अभाव तरी नक्की राहील. ३. लुळीपांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी. हे एक भंपक विधान आहे. लुळेपांगळेपणा-धडधाकटपणा आणि श्रीमंती-गरिबी यांचा अर्थाअर्थी अथवा सरळ-सरळ काहीच संबंध नाही. सत्य हे आहे की, या जगात अनेक लुळेपांगळे गरीब आहेत आणि धडधाकट श्रीमंत आहेत. शिवाय अनेक पंगु श्रीमंत त्याच्या श्रीमंतीमुळे उत्तम/बरे जीवन जगत आहेत आणि त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त प्रमाणात असलेले धडधाकट गरीब हालाखीचे जीवन जगत आहेत. वैध मार्गाने कमावलेली सधनता तुम्हाला अश्या अनेक सुखकारक गोष्टी मिळवून देऊ शकते, ज्यांची गरीब स्वप्नेही बघू शकत नाही. ४. "लबाडी केल्याशिवाय धन अथवा यश मिळत नाही" हे सुद्धा वरच्या भोंदू वाक्यांइतकेच... किंबहुना त्यांच्यापेक्षा जरा जास्तच... भोंदू वाक्य आहे. जगात असत्य, अनिती वगैरेचा मार्ग पकडून धन आणि यश कमावणारे अनेक लोक आहेत पण त्याबरोबरच सत्य आणि नीतिच्या मार्गावर चालून सधन आणि यशस्वी झालेले लोकही कमी नाहीत. मात्र आपण दुसर्‍याची परिस्थिती पडताळून पाहत असताना वापरलेले सधनतेचे आणि यशाचे निकष आपले नसून त्या व्यक्तीचे असायला हवे; स्वतःबद्दल पडताळणी करायची असेल तेव्हाच स्वतःचे निकष वापरणे योग्य होईल; इतके तारतम्य ठेवणे जरूर आहे. कारण सधनतेची आणि यशाची व्याख्या माणसागणीक वेगळी असू शकते. वर केवळ चारच वाक्ये उदाहरणाखातर दिली आहेत. जरा आजूबाजूला पाहिले तर अशी अनेक भंपक वाक्ये "चलाख लोक स्वत:च्या फायद्यासाठी" किंवा "स्वघोषित विचारवंत चार टाळ्या कमवायला" वापरताना दिसतील. या आणि अश्या इतर वाक्यांना केवळ निरर्थक अथवा फोल म्हणून सोडण्यात अर्थ नाही. सक्रिय प्रयत्नांनी त्यांना कचर्‍याचा डबा दाखवणे आवश्यक आहे... कारण अपयश मागे सारून सतत स्वतःच्या बळावर प्रामाणिक प्रयत्न करून सधन व सुखी होण्याचा प्रयत्न करायला उत्साहीत करण्याऐवजी अशी वाक्ये अपयशाचे भ्रामक समर्थन करत समाजाला पंगू करण्याचे काम करत असतात... सशक्त, विचारी आणि शहाणा समाज बनण्याच्या वाटेत अश्या अंधश्रद्धा फार मोठा अडथळा बनून उभ्या आहेत.

वाचने 55827 वाचनखूण प्रतिक्रिया 218

In reply to by संजय क्षीरसागर

विलासराव Mon, 09/15/2014 - 18:08
१) गुलामगिरी, वसाहतवाद यांचा व्यक्तिगत प्रामाणिकपणाशी काहीही संबध नाही. २) सत्य (किंवा प्रामाणिकपणा) सदाविजयी आहे याचा अर्थ असत्य (अप्रामाणिकपणा), व्यक्तीच्या मनात अंतर्द्वंद्व निर्माण करतो. त्या अंतर्द्वद्वानं ती व्यक्ती लौकिकात कितीही यशस्वी झाली तरी स्वतःच्या मनासमोर कायम लज्जित राहाते आणि त्या अर्थानं ती पराभूत होते. थोडक्यात सत्याला असत्याशी सामना करायला लागत नाही कारण प्रामाणिक व्यक्ती अशा द्वंद्वापासून सदैव मुक्त असते. पुर्ण सहमत. अर्थातच बाकीच्या वादविवादात आपल्याला इंटरेस्ट नाही.

In reply to by विलासराव

प्रभाकर पेठकर Mon, 09/15/2014 - 21:42
विलासाराव, >>>> त्या अंतर्द्वद्वानं ती व्यक्ती लौकिकात कितीही यशस्वी झाली तरी स्वतःच्या मनासमोर कायम लज्जित राहाते.. हे, अन्यथा, प्रामाणिक व्यक्तीने कधी अपघाताने अप्रामाणिकपणा केला तर त्याला ही बोचणी कायम राहून तो स्वतःच्या मनासमोर लज्जित राहिल. मुळातच अप्रामाणिक, संधीसाधू, स्वार्थी माणूस आपल्या ह्या दुर्गुणांना आपली हुशारी समजतो आणि अशा वागण्यातून आनंद मिळवितो. त्याला कधीच बोचणी लागत नाही अथवा तो लज्जितही होत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

मुळातच अप्रामाणिक, संधीसाधू, स्वार्थी माणूस आपल्या ह्या दुर्गुणांना आपली हुशारी समजतो आणि अशा वागण्यातून आनंद मिळवितो. त्याला कधीच बोचणी लागत नाही अथवा तो लज्जितही होत नाही. सुंदर वाक्यांनी भारून गेलेला माणूस ही वस्तूस्थिती विसरतो !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विलासराव Tue, 09/16/2014 - 00:51
मुळातच अप्रामाणिक, संधीसाधू, स्वार्थी माणूस आपल्या ह्या दुर्गुणांना आपली हुशारी समजतो आणि अशा वागण्यातून आनंद मिळवितो. त्याला कधीच बोचणी लागत नाही अथवा तो लज्जितही होत नाही. हे जरी खरे असले तरी त्याचा तुमच्या प्रामाणिक असण्याशी काय संबंध? म्हनजे लोक अप्रामाणिक आहेत म्हणुन मीही तसाच होणार असे का? उत्तर नको आहे. फक्त आपल्या अंतर्मनाचा जेंव्हा अभ्यास कराल तेंव्हा आनी तेंव्हाच हे लक्षात येईल. बाकी काहीही उपाय नाही. सुंदर वाक्यांनी भारून गेलेला माणूस ही वस्तूस्थिती विसरतो ! असं ०.०००००००००००००००००००००००१ % या केसमधे नव्ह्तं एवढच नमुद करतो.हा खयाली पुलाव आहे तुमचा. बाकी चालु द्या.

In reply to by विलासराव

तुमचा माझ्या एकंदर म्हणण्याबद्दल गैरसमज होते आहे. इतर काहीजणांनी त्यांची मी काय म्हणतो याची त्यांची (झालेली / करून घेतलेली) चुकीची समज खरी मानून बराच विपर्यास केला आहे, यामुळे बहुदा हा गैरसमज झाला आहे. म्हणूनच खालील गोष्टी स्पष्ट करत आहे... १. माणसाने अप्रामाणिकपणे वागावे असे कधीही मी म्हटले नाही... माझा अप्रामाणिकपणाला नेहमीच व्यक्तीगत वैचारिक आणि कृतीने विरोधच राहिला आहे. २. सर्वांनी चांगले / प्रामाणिकपणे वागावे असेच मलाही मनापासून वाटते. पण, आतापर्यंतचा जगाचा इतिहास आणि माणसाचे मानसशास्त्र पाहिले तर ही गोष्ट जगाच्या अंतापर्यंत स्वप्नच राहील असेच दिसते. पण यामुळे प्रामाणिक माणसांनी त्याचा प्रामाणिकपणा सोडावा असेही माझे म्हणणे नाही. जसे कायद्याच्या आवाक्यात राहून पोलिसांना गैरकायदा उद्योग बंद करायचे असतात तसेच चांगल्या माणसांना चांगलेपणा न सोडता आपले बुद्धिचातुर्य वापरून वाईटपणावर बर्‍याचदा (नेहमी नाही) मात करता येते असा माझा दावा आणि अनुभव आहे. ३. सर्वसाधारण प्रामाणिक माणसाचे अप्रामाणिक माणसाने नुकसान/पराभव केला (जे जगात बर्‍याचदा होते याबाबत दुमत नसावे) तरीसुद्धा प्रामाणिक माणूस मनातून सुखीच राहील; हे मात्र मला पटत नाही. कारण ती वस्तुस्थिती नाही. असा सुखी राहणारा माणूस संतच असला पाहिजे... जो एक कोटीत एकही नसतो. तेव्हा तो प्रतिवाद सर्व समाजाला लागू होत नाही. ४. एका व्यक्तिविशेषाचे अनुभव सर्व समाजाला लागू पडत नाहीत ह्यात दुमत नसावे... तसे असते तरच "सर्व समाज संतवृत्तीचा आणि स्थितप्रज्ञ आहे/असावा आणि म्हणून वास्तव पराजयातही आनंदी असू शकतो" या विधानाला काही अर्थ असता. पण वस्तुस्थिती अशी आहे की सर्वसामान्य माणूस (यात चांगला / प्रामाणिक माणूसही आला) वाईट / पराभव झाल्याने दु:खी होतो... मग वर वर तो आनंदी असल्याचे नाटक करत असला तरी. ५. चांगल्याचा (यात प्रामाणिकपणाही आला) आणि वाईटाचा संघर्ष अनादी आणि अनंत आहे. त्यात चांगल्याचा विजय आपोआप होत नाही (फारफार तर अभावाने झालेला योगायोग सोडला तर) तर चांगल्याने वाईटाशी संघर्ष करून त्याचा पराभव करूनच होतो. जर चांगल्याचा वाईटावर आपोआप विजय होत असता तर मग या पृथ्वीलाच स्वर्ग म्हणायला हरकत नव्हती. ६. आज जे वाईट आजूबाजूला दिसते आहे ते सर्वसामान्य चांगली माणसे ते वाईट संघर्षाशिवाय स्वीकारतात यामुळेच आहे. ज्या देशात ते वाईट (नशिबाला / सिस्टिमला दोष देत, आपल्या इथे असेच चालायचे असे म्हणत अथवा इतर काही कारणे सांगत) स्वीकारले जात नाही तेथे वाईटाचे प्रमाण बरेच कमी आहे आणि त्यासाठी आपण त्या देशांची स्तुती करतो. पण त्यांची मानसिकता स्वीकारायला आणि धडाडी आचरणात आणायला मात्र आपली तयारी नाही असेच दिसते. माझ्या लेखाचा मूळ उद्देश हेच नजरेसमोर आणण्याचा होता... आध्यात्मिक अथवा धार्मिक दृष्टिकोनातून ज्ञान देण्याचा तर अजिबातच नाही. ७. माझे स्वतःचे मत आणि अनुभव असा आहे की जर वेळप्रसंगी थोडे नुकसान स्वीकारायची आणि थोडी बुद्धी वापरायची इच्छा आणि धमक (दोन्ही) दाखवली तर खूप वेळेस (नेहमीच नाही) चांगल्या माणसाला चांगले मार्ग वापरून वाईटाचा सामना करून विजयी होता येते. केवळ स्वतःच्या मनाची समजूत घालत बसण्याने ते शक्य होत नाही. ८. शेवटी: (अ) माझे आवडते वाक्य : "या जगात जे वाईट आहे ते वाईट माणसे वाईट वागतात म्हणून नाही (कारण तसे वागणे हा त्यांचा गुणधर्मच असतो) तर चांगली माणसे वाईट वागणे सहन करतात म्हणून असते." (आ) रामायण, महाभारत यांत चांगल्याचा वाईटावरचा विजय संघर्ष केल्यानंतरच झाला. किंबहुना चांगल्यासाठी आणि आपल्या अधिकारासाठी चांगल्याची / सत्याची बाजू असणार्‍यांनी संघर्ष करावा हेच ही दोन महाकाव्ये सांगतात. असो. तुमच्याबद्दल आणि तुमच्या मतांबद्दल आदर आहे. वाद-प्रतिवादाच्या गदारोळात आणि विशेषतः मुद्दे भरकटवणार्‍या काही प्रतिसादांमुळे मला काय म्हणायचे आहे याबद्दल तुमचा गैरसमज झाला असे वाटले, म्हणूनच केवळ हा प्रतिसाद लिहिला आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विलासराव Tue, 09/16/2014 - 20:30
तुमचा माझ्या एकंदर म्हणण्याबद्दल गैरसमज होते आहे. इतर काहीजणांनी त्यांची मी काय म्हणतो याची त्यांची (झालेली / करून घेतलेली) चुकीची समज खरी मानून बराच विपर्यास केला आहे, यामुळे बहुदा हा गैरसमज झाला आहे. म्हणूनच खालील गोष्टी स्पष्ट करत आहे... तुमचे म्हणने मला समजले होते सर. तरीही स्पष्टीकरणाबद्द्ल आभार. तो मुद्दा मी कुणाचेही समर्थन करण्यासाठी उचलला नव्हता. प्रामाणीकपणा (नितीमत्ता/चारीत्र्य) हा वैयक्तीक असतो. त्याचा अगदी जग जरी तसे वागत नसले तरी स्वतःला जपता यायला प्रत्यवाय नसावा. नुकसान झाले तरीही. त्याचे कारण मी वरती दिलेले आहे: मुळातच अप्रामाणिक, संधीसाधू, स्वार्थी माणूस आपल्या ह्या दुर्गुणांना आपली हुशारी समजतो आणि अशा वागण्यातून आनंद मिळवितो. त्याला कधीच बोचणी लागत नाही अथवा तो लज्जितही होत नाही. हे जरी खरे असले तरी त्याचा तुमच्या प्रामाणिक असण्याशी काय संबंध? म्हनजे लोक अप्रामाणिक आहेत म्हणुन मीही तसाच होणार असे का? उत्तर नको आहे. फक्त आपल्या अंतर्मनाचा जेंव्हा अभ्यास कराल तेंव्हा आनी तेंव्हाच हे लक्षात येईल. बाकी काहीही उपाय नाही. त्याचे उत्तर तुम्ही दिले आहे ते मला पटते. ३. सर्वसाधारण प्रामाणिक माणसाचे अप्रामाणिक माणसाने नुकसान/पराभव केला (जे जगात बर्‍याचदा होते याबाबत दुमत नसावे) तरीसुद्धा प्रामाणिक माणूस मनातून सुखीच राहील; हे मात्र मला पटत नाही. कारण ती वस्तुस्थिती नाही. असा सुखी राहणारा माणूस संतच असला पाहिजे... जो एक कोटीत एकही नसतो. तेव्हा तो प्रतिवाद सर्व समाजाला लागू होत नाही. सहमत. असा सुखी राहणारा माणूस संतच असला पाहिजे... जो एक कोटीत एकही नसतो, ईकडेच माझा रोख होता. ४. एका व्यक्तिविशेषाचे अनुभव सर्व समाजाला लागू पडत नाहीत ह्यात दुमत नसावे... तसे असते तरच "सर्व समाज संतवृत्तीचा आणि स्थितप्रज्ञ आहे/असावा आणि म्हणून वास्तव पराजयातही आनंदी असू शकतो" या विधानाला काही अर्थ असता. पण वस्तुस्थिती अशी आहे की सर्वसामान्य माणूस (यात चांगला / प्रामाणिक माणूसही आला) वाईट / पराभव झाल्याने दु:खी होतो... मग वर वर तो आनंदी असल्याचे नाटक करत असला तरी. सहमत . अपवाद वरचा माणुस असावा.असा सुखी राहणारा माणूस संतच असला पाहिजे... जो एक कोटीत एकही नसतो. ५. चांगल्याचा (यात प्रामाणिकपणाही आला) आणि वाईटाचा संघर्ष अनादी आणि अनंत आहे. त्यात चांगल्याचा विजय आपोआप होत नाही (फारफार तर अभावाने झालेला योगायोग सोडला तर) तर चांगल्याने वाईटाशी संघर्ष करून त्याचा पराभव करूनच होतो. जर चांगल्याचा वाईटावर आपोआप विजय होत असता तर मग या पृथ्वीलाच स्वर्ग म्हणायला हरकत नव्हती. माझ्या माहीतीप्रमाणे जर स्वर्ग पृथ्वीवर नसेल तर ईतरत्र कुठेही नसावा. पण जे कोणी संत होते /झाले/आहेत ते या पृथ्वीवरील स्वर्गातच रहात असावेत. राग-द्वेष संपलेली अवस्था म्हनजे स्वर्गावस्था अशा अर्थाने. ६. आज जे वाईट आजूबाजूला दिसते आहे ते सर्वसामान्य चांगली माणसे ते वाईट संघर्षाशिवाय स्वीकारतात यामुळेच आहे. ज्या देशात ते वाईट (नशिबाला / सिस्टिमला दोष देत, आपल्या इथे असेच चालायचे असे म्हणत अथवा इतर काही कारणे सांगत) स्वीकारले जात नाही तेथे वाईटाचे प्रमाण बरेच कमी आहे आणि त्यासाठी आपण त्या देशांची स्तुती करतो. पण त्यांची मानसिकता स्वीकारायला आणि धडाडी आचरणात आणायला मात्र आपली तयारी नाही असेच दिसते. माझ्या लेखाचा मूळ उद्देश हेच नजरेसमोर आणण्याचा होता... आध्यात्मिक अथवा धार्मिक दृष्टिकोनातून ज्ञान देण्याचा तर अजिबातच नाही. अगदी खरे आहे हे. आध्यात्मिक अथवा धार्मिक दृष्टिकोनातून ज्ञान देण्याचा तर अजिबातच नाही ,मी नेमका या दृष्टिकोनातून प्रतिसाद दिला होता. असो. धन्यवाद. तुम्हाला टंकणकष्ट दिल्याबद्द्ल माफी असावी. वरील प्रतीसादात काही विरोधाभास असेल तर माझा दोष.मी शाब्दीक विवादात फार कच्चा आहे, त्यामुळेच मी बर्याच चर्चांमधे भाग घेत नाही. याविषयात मी जगात शेवटी असु शकेल कदाचीत. अपना क्षेत्र है प्रत्यक्ष अनुभुती: तीन प्रकारचे सत्य असते. १) शब्द सत्य. कोणितरी अधिकारी व्यक्तीने सांगीतले ते. २) अनुमान सत्य. तर्कवितर्क करुन ठरवले ते. ३) प्रमान सत्य( प्रत्यक्ष तुमच्या अनुभवावर उतरलेले) पहीले दोन्ही आपण मानतो. तिसरे आपन जाणतो. पहीले दोन्ही चुकु शकतात. तिसरा तुमचा अनुभव आहे. हाच खरा. पण बाहेरचा प्रत्येक अनुभव आपण घेउ शकत नाही. कोणि म्हनालं हे जहाल वीष आहे आनी मी म्हणेल अनुभव घेतल्याशिवाय मी माननार नाही. काय अनुभव घेणार, प्राण गेल्यावर कसला डोंबलाचा अनुभव? म्हनुन प्रत्येक गोष्टीचा आपन अनुभव घेतलाच पाहिजे असे नाही. दुसर्याच्या अनुभवाचा आपल्याला उपयोग करता येतो बाह्यजगतामधे. हीच नेमकी अडचण आहे अंतरजगतामधे. दुसरा केवळ मार्ग सांगू शकतो. आपल्याला स्वतःलाच त्याचा अनुभव घ्यायला लागतो. बुद्धाला बोधी प्राप्त झाली त्यातुन फक्त एकच मानुस मुक्त झाला तो मह्णजे सिद्धार्थ गौतम. बाकीच्यांना करुनेने मार्ग शिकवला जे चालतात ते मुक्त होतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

बाळ सप्रे Tue, 09/16/2014 - 17:07
प्रामाणिकपणा/ सत्य/ स्वार्थ या गोष्टी व्यक्ती व परिस्थितीनुसार बदलतात त्यामुळे बोचणी लागतेच असे नक्की सांगता येत नाही.. माझ्या रोजच्या पहाण्यात कमी गर्दीच्या ठीकाणचे सिग्नल ७०-८०% (किंवा त्याहून जास्तच) लोक तोडतात. माझ्यामते लाल सिग्नलला थांबणे हा प्रामाणिकपणा.. त्याप्रमाणे बहुतांश पुणेकरांना टोचणी लागायला हवी.. काय वाटते लागत असेल टोचणी ? ही झाली छोटी गोष्ट.. त्याहून मोठे उदाहरण घेउ.. लाच घेणे.. माझ्या माहितीतल्या एका सरकारी खात्यात काम करणार्‍या माणसाची अशी विचारसरणी आहे.. इथे पैसे खाल्ले नाहीत तर जगणे मुश्कील आहे.. त्यामुळे तेच वागणे योग्य .. त्यामुळे 'तो' प्रामाणिकपणे पैसे खातो..

In reply to by बाळ सप्रे

याचाच विरोध कायदे, नियम, पोलिस, न्यायालये, इत्यादी वापरून चांगली मानसे करतात. हे सर्व "कायद्याचे राज्य असलेल्या" देशांतही आहे आणि भारतातही... फक्त आपल्या इथे सर्वसामन्य माणसांची त्याच्या पालनाचा आग्रह धरण्याची मानसिक तयारी व ताकद कमी पडते. आता याविरुद्ध नेहमीचा प्रतिवाद असतो की "हे भारतात शक्य नाही". त्या लोकांना माझे इतकेच सांगणे आहे की अमेरिकेचा / युरोपचा काही दशकांपूर्वीचा आणि सिंगापूरचा पाच-सहा दशकांपूर्वीचा इतिहास बघितला तर दिसेल की तेव्हाची तिथली परिस्थिती भारतातल्या आताच्या परिस्थितीपेक्षा जास्त खराब होती. फरक इतकाच की तेथे लोकांनी ती परिस्थिती बदलायचे प्रयत्न केले आणि त्याची फळे ते उपभोगत आहेत... आपण मात्र सिस्टीमला दोष देत किंवा स्वतःच्या कृतीच्या अभावाला मनाच्या आनंदाचे झाकण देत परिस्थिती आपोआप बदलून चांगली होईल किंवा दुसरा कोणी हे माझ्यासाठी करेल अशी स्वप्ने बघण्यात खूष आहोत.

In reply to by बाळ सप्रे

प्रभाकर पेठकर Tue, 09/16/2014 - 21:16
>>>>माझ्या रोजच्या पहाण्यात कमी गर्दीच्या ठीकाणचे सिग्नल ७०-८०% (किंवा त्याहून जास्तच) लोक तोडतात. माझ्यामते लाल सिग्नलला थांबणे हा प्रामाणिकपणा.. त्याप्रमाणे बहुतांश पुणेकरांना टोचणी लागायला हवी.. काय वाटते लागत असेल टोचणी ? प्रामाणिक माणूस सहसा सिग्नल तोडणार नाही. पण जे कोणी तोडतात त्यांच्या त्या कृत्यामुळे जेंव्हा एखादा अपघात होऊन एखादी व्यक्ती मृत होते किंवा जन्मभरासाठी विकलांग होते (ह्यात सिग्नल तोडणारा/री सुद्धा आले) तेंव्हा जन्मभराकरता टोचणी लागू शकते. अपघात होत नाही, कांही नुकसान होत नाही तो पर्यंत अशा कृत्याला आपली 'हुशारी' म्हणून दिमाखात मिरविले जाते.

In reply to by संजय क्षीरसागर

दिनेश सायगल Sat, 09/06/2014 - 00:37
अव्वो सर, गल्लि चुकलं काय व्वो? आनंद इथे कुठे आला? त्या विक्रमादित्याच्या कथेला काय म्हणायचं ते तिकडं म्हणा. हा पूर्णपणे वेगळा लेख आहे. या लेखाबद्दल काय ते इथं लिहा. का उगा तिकडचं हिकडं करताय? त्यात या संपादक लोकांनी फोटोग्राफी स्पर्धेला विषय 'आनंद' निवडून आणखी घोळ माजवलाय! =)) सगळाच आनंदीआनंद!

In reply to by संजय क्षीरसागर

दिनेश सायगल Sat, 09/06/2014 - 12:18
पहिली गोष्ट म्हणजे त्या डब्बा बाबा सायगलचं नाव मला देऊ नका. तुमच्या नावावरून अशी बरीच नावे इतर लोक तुम्हाला देऊ शकतात. मात्र मी असं आजपर्यंत कधी केलं नाही. दुसरी गोष्टः संपादक मंडळी, निदान काही चांगल्या लेखांवर तरी उपर्निदिष्ट प्रतिसादासारखे असे काही संबंध नसलेले अवांतर कृपया संपादित करा ही विनंती. thumbsd

In reply to by दिनेश सायगल

विषयाशी काहीही संबंध नसतांना, स्वतः केलेली `स्वयंघोषित सर्वज्ञ' वगैरे शेरेबाजी चालते. आणि तुम्हाला साधं `बाबा' म्हटलं तरी राग यावा म्हणजे कमाल आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

दिनेश सायगल Sat, 09/06/2014 - 12:51
तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? त्या धाग्यावर स्वयंघोषित सर्वज्ञ नेमकं तुम्हालाच म्हटलंय असं स्वप्न पडलं काय? नाही म्हणजे, तिथे तुम्ही एकट्यानेच लेखाला आणि लेखकाला वाईट म्हटलंय; की मी तुमच्या कोणत्या प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊन "श्रीयुत क्षीरसागर हे स्वयंघोषित सर्वज्ञ आहेत" असं म्हटलंय? तुम्हाला शंका असेल तर तिथेच विचारून घ्या ना. या चांगल्या चर्चेची कशाला वाट लावताय?. सगळं जग तुमच्याबद्दल बोलतं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला मदतीची तातडीने गरज आहे एवढंच सांगू शकतो. तुमचा हेतू या धाग्यावर गोंधळ माजवण्याचा असेल तरी मी त्याला आणखी हातभार लावणार नाही. शुभेच्छा!

In reply to by दिनेश सायगल

तेच तुम्हाला विचारतोयं! मी फक्त तुम्हाला (दिनेश ऐवजी) `बाबा' म्हटलंय. सायगल ही तुमची खानदानी ओळख आहे (त्याला मी काय करणार?). आता त्या दोन गोष्टी जोडून, तुम्ही स्वतःला डब्बा म्हणतायं तर ते तुमचं कौशल्य आहे. शिवाय तुम्ही मला सर्वज्ञ म्हणतायं असं मी कधी म्हणालो? तुम्ही विषयविसंगत शेरेबाजी केली आहे इतकंच म्हटलंय. आशा परिस्थितीत कुणाला कसली गरज आहे ते वेगळं कशाला लिहू.

In reply to by संजय क्षीरसागर

त्या दुसर्‍या लेखाचा संदर्भ इथे नको (केवळ डॉ खरेंच्या प्रतिसादातून उद्धृत केलेल्या वाक्याचा संदर्भ असावा) म्हणून हा वेगळा लेख लिहीला आहे हे या लेखाच्या सुरुवातीलाच "पूर्वपिठिका:" या स्वतंत्र शिर्षकाखाली स्पष्ट लिहीले आहे... या पार्श्वभूमीवर आपली वरची टिप्पणी (आणि जमल्यास हा लेखही) परत वाचायची गरज आहे असे वाटते :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही ज्याला `प्रामाणिकपणा' समजतायं त्याची नक्की डेफिनिशन स्वतःला विचारा. आणि मग परत लेख लिहा. (संपादित)

In reply to by संजय क्षीरसागर

खास तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांना (भाग १ व २) बगल न देता त्यांची उत्तरे देउन आम्हाला उपकृत करावे ही विनंती. उत्तरांची वात पहात आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माझं म्हणणं इतकंच आहे :
तुमच्या लेखी सत्याला (म्हणजे प्रामाणिकापणाला) असत्याशी (अप्रामाणिकपणाशी) झगडा करुन `विजय' मिळवावा लागतो. आणि मी म्हणतो, प्रामाणिक माणसाला अप्रमाणिकतेशी झगडा करण्याची आवश्यकताच नाही. अप्राणिक माणूस स्वतःच्या मनातल्या अंतर्द्वंदामुळे (सुरुवातीपासून आणि) नेहमी, पराभूतच असतो. मग लौकीकार्थानं तो कितीही यशस्वी असो आणि दुनियेला वरुन काहीही दाखवो.
हजारो वर्षांची गुलामगिरीची प्रथा आणि शेकडो वर्षांचा वसाहतवाद या दोन गोष्टी "सत्याचा असत्यावर विजय" होता काय हे सांगा, मग पुढे बोलू..
त्यांचा माझ्या प्रतिसादाशी काहीएक संबंध नाही. गुलामगिरी आणि वसाहतवाद यांचा बिमोड कशामुळे होतो; मुळात सत्तालालसा काय आहे आणि सत्तालोलुपांना सत्ता मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी जनमानसिकता काय लागते, हा संपूर्ण वेगळा विषय आहे. तुम्ही एकदम सतरा खिडक्या उघडून, व्यक्तिगत प्रामाणिकपणाच्या संदर्भातला माझा प्रतिसाद भरकटवतायं, कारण प्रामाणिकपणाची नक्की व्याख्याच तुमच्याकडे नाही. सत्याचा विजय आणि व्यक्तिगत प्रामाणिकपणा या अनुरोधानं तुम्ही काहीही चर्चा करा, माझ्याकडे सर्व उत्तरं आहेत. (संपादित)

In reply to by संजय क्षीरसागर

आता तुमचेच प्रतिसाद तुम्ही परत वाचा असे सांगण्याची वेळ आली आहे !!! आणि माझे हे दोन प्रश्न कसे योग्य आहेत हे त्या प्रत्येक प्रश्नातच लिहीले आहे. तेव्हा ते प्रश्नही परत वाचावे, म्हणजे समजेल... जर समजावून घ्यायची इच्छा आणि धीटपणा असेल तर. नाहीतर गैरसोईच्या वाटणार्‍या प्रश्नांना टाळून इतर भलतेच मुद्दे काढणे ही काय प्रथम पाहिलेली गोष्ट नाही ! :)

विवेकपटाईत Sat, 09/06/2014 - 11:30
माणूस स्वत:शी खोट बोलू शकत नाही. त्या मुळे किती ही प्रतिष्ठा मिळविली तरी असत्य मार्गावर चालण्याचा मानसिक त्रास त्याला होणारच. तो सदैव पराजित राहिलं.

In reply to by विवेकपटाईत

तुमचं मत आध्यात्मिक वगैरे प्रकारे स्वत:ची समजूत* घालायला ठीक आहे... पण त्याने वस्तूस्थिती बदलत नाही. ती प्रयत्नानेच बदलावी लागते. तथाकथित "अध्यात्मिक पराजय" चांगल्या/प्रामाणिक लोकांच्या जीवनात आपोआप काहीच सकारात्मक बदल घडवून आणत नाही हे आपण आजूबाजूला असलेल्या परिस्थितीचे अवलोकन केल्यास सहज दिसते. तथाकथित अध्यात्मिक पराजय झालेले अनेक लोक "स्वतःच्या अपयशावर पाघरूण घालून स्वस्थ बसणार्‍या" लोकांवर अधिकार गाजवतात हे सर्वकालीक वास्तव आहे. म्हणूनच, सत्य परिस्थितीकडे डोळेझाक आपोआप काहीतरी चांगले होईल अशी आशा करणे व्यक्ती आणि समाजासाठी चूक आणि धोकादायक असते. असे समाजगट दुसर्‍या वरचढ समाजागटाचे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष अगतिक गुलाम होतात, हा माझ्या लेखाचा गाभा आहे. त्यामुळे तुमच्यासारख्या परिस्थितीचा जवळून अनुभव असलेल्या माणसाकडून असे मत आल्याने आश्चर्य वाटले, इतकेच नमूद करतो. इत्यलम.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

`आध्यात्मिक पराजय' वगैरे कधी कुणाचा होत नाही. आध्यात्म तर सदाविजयी आहे. पण तो चर्चेचा विषयच नाही. प्रामाणिकपणा ही स्वतःची समजूत घालायचा प्रकार नाही की अपयश झाकायची मानसिकता नाही. केवळ आणि केवळ प्रामाणिक माणसालाच अप्रामाणिक बिचकून असतो. आणि फक्त प्रामाणिक माणूसच परिस्थितीत विधायक बदल घडवून आणू शकतो. `जीवनात आपोआप बदल घडेल' हे निर्बुद्धाला वाटतं, त्याचा प्रामाणिकपणाशी सुतराम संबंध नाही. तुम्ही इत्यलम म्हणण्यापेक्षा विरोधी विचार खुल्यादिलानं मान्य केला असता तर कौतुक वाटलं असतं. (संपादित)

In reply to by संजय क्षीरसागर

तुमच्याकडून अधिक अपेक्षा नव्हती. तसेच तुमच्या किंवा कोणाच्या यशापयशाचा प्रश्न उपस्थित केला असे तुम्हाला कुठल्या स्वप्नात दिसले ? मात्र दुसर्‍यांना भरीला घालणे सज्जनपणाचे लक्षण नाही, हे खास तुमच्यासाठी नमूद करत आहे. दुसर्‍यांचे बघायला दुसरे समर्थ असतात. असो. तुमच्या कडून खास तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत... भाग १ आणि २, दोन्हीचीही.

In reply to by विवेकपटाईत

कवितानागेश Sat, 09/06/2014 - 21:19
विवेकपटाईतकाका, असत्य मार्गावर चालण्याचा मानसिक त्रास>> याची शक्यता फार कमी असते. कारण प्रत्येक माणूस तितका अंतर्मुख नसतो. अंतर्मुख व्हायला मोठे नैतिक धैर्य आवश्यक असतं. आणि असत्य मार्ग माणूस तेंव्हाच निवडतो, जेंव्हा तो फार बहिर्मुख आणि फार उपभोगवादी होतो, किंवा कसलीतरी फारच मोठी मह्त्वाकांक्षा असते. त्यामुळे त्याचं 'नैतिकरित्या चुकतंय' हे त्याला स्वतःला कधीच कळणार नाही. शिवाय त्याची ताकद वाढली तर आपोआपच असत्याची ताकद वाढणार, आणि 'असत्याचा सत्यावर विजय होणार!' अशा लोकांना 'तू कितीही ताकद्वान अस. तरिही तू पराजितच आहेस...' वगरै वगरै संवाद कुणीतरी साध्या माणसानी ऐकवलेत, असं दृश्य फक्त जुन्या हिन्दी सिनेमातून मी पाहिलं आहे. प्रत्यक्षात कधीही पाहिले/ऐकले नाही. :)

In reply to by विवेकपटाईत

विलासराव गुरुवार, 09/11/2014 - 20:27
विवेकसरांशी संपुर्ण सहमत. कुठलाही विदा माझ्याकडे नाही,मी देतही नाही कारण अनुभवसत्य. संपुर्ण जगाने नाकारले तरी मला त्याने फरक पडत नाही.

श्रीगुरुजी Sat, 09/06/2014 - 14:07
अजून काही विचारवंताच्या सभेत व वृत्तवाहिनीवरील चर्चेत टाळ्या मिळविणारी वाक्ये - - भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. - इंडियाने भारतावर नेहमीच अन्याय केलेला आहे. - काश्मिरचा प्रश्न दोन्ही देशातील राजकारण्यांनी निर्माण केलेला असून सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकाला भारतीयांबद्दल प्रचंड प्रेम व आस्था आहे. - भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांची संस्कृती एकच आहे.

विजुभाऊ Sat, 09/06/2014 - 16:13
सितेला पळवून नेल्यावर पश्चाताप झाला म्हणून रावणाने तिला सन्मानाने परत पाठवले नव्हते. रामाला रावणाबरोबरचे युध्द जिंकूनच सत्याचा विजय सिद्ध करावा लागला होता.
रावणाने केवळ उपभोग घ्यायचा म्हणून सीतेला पळवून नेले नव्हते त्यामागे केवळ लग्नासाठी प्रपोज केले म्हणून लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते. हे लक्ष्मणाचे आततायी कृत्य जबाबदार होते. तेंव्हा रामयणात सत्य आणि असत्याचे सोयीस्कर अर्थ लावण्यात काहीच अर्थ नाही

In reply to by विजुभाऊ

धन्यवाद ! या गोष्टीचा हा पैलूही आपल्याला धाग्याच्या मूलमंत्राकडेच नेतो. या गोष्टीतील घटना हेच सिद्ध करतात की सत्य / असत्य अथवा योग्य / अयोग्य हा विचार करून कृती करण्यापेक्षा माणूस अथवा माणसांचा समुदाय जास्तित-जास्त सोईची / निर्धोक वाटणारी गोष्ट करतो. या कथेत लक्ष्मण सत्याने/चांगलेपणाने वागला असता तर शूर्पणखेला नकार देउन थांबला असता. नाक कापणे योग्य असण्याइतकी कोणतीही कृती शुर्पणखेने केली नव्हती. पण लक्ष्मण आपोआप न्यायभावाने न वागता त्याने आतताईपणे शूर्पणखेचे नाक कापून करून अयोग्य गोष्ट केली... ही पहिली चूक. आणि रावणाने ती चूक सुधारण्यासाठी सितेला पळवून नेण्याची (अगदी तिला उपभोगासाठी पळवले नाही, हे मानले तरी) चूक रावणाने केली. त्यावेळेस त्याला त्याच्या या कृतीचे इतके गंभीर परिणाम होतील याचा त्याला ना अंदाज होता ना फिकीर. शिवाय एका चुकीने दुसरी चूक सुधारत नाही हे ज्ञान त्याला आपोआप सुचले नाही. काही थोडी माणसे सोडली तर इतर सर्व सारासारविवेकाने अथवा खरेपणाने वागण्याऐवजी जे निर्धोक्/कमी धोक्याचे आणि सोईचे वाटते ते करतात... म्हणूनच या जगात अप्रामाणिकपणा आणि वाईटपणाचा विरोध करण्यासाठी कायदे, सेना, पोलिस, सोसायटीचा गार्ड, नियम आणि ते तोडले तर शिक्षा... इ. इ. इ. अनेक साधने उभी करून अप्रामाणिकपणाचा/ वाईटाचा सक्रिय सामना करावा लागतो... आणि हे सगळे सतत करत रहावे लागते. बर्‍या-वाईटाचा, प्रामाणिक-अप्रामाणिकपणाचा संघर्ष अनादी आणि अनंत आहे आणि त्यांत जी बाजू प्रबळ होईल त्यालाच विजय मिळतो... ना काही आपोआप घडते, ना फुकट मिळते !

चौकटराजा Sun, 09/07/2014 - 07:38
तुम्ही जसे असता तसा तुम्ही विचार करता व तसे तुम्ही होत जाता. जसे तुम्ही होत जाता तसा तुम्ही विचार करता. उदा. मह्त्वाकांक्षी माणूस हा जन्मालाच यावा लागतो. तिचे दुकान नाही. तो तसा असला की तो कर्मयोगाला जवळ करतो. जरूर पडल्यास कुकर्म ही करतो.त्याला बहुदा यश मिळत जाते. त्याला जसे यश मिळत जाते तसा तो असा विचार करतो की कष्ट व लबाडी हेच सत्य आहे. मग तो तसाच वागत जातो. पुन्हा यशाची एक कमान रोवतो. इतरांच्या समाधानी वृत्तीची टिंगल करणे हा त्याचा स्थायीभाव बनतो. ही गोष्ट समाधानी माणसाची अगदी उलट पद्धतीने असते. तो ही जन्मालाच यावा लागतो. समाधानाचेही दुकान नाही.

लंबूटांग Sun, 09/07/2014 - 07:40
संक्षी सर आणि इक्का सरांची जुगलबंदी वाचली आणि इतरही प्रतिसाद वाचले. सत्य हेच आहे की सत्य आणि प्रामाणिकपणाने पोट भरत नाही की बिले भरता येत नाहीत. माझ्या पूर्वीच्या नोकरीतील सहकाऱ्याचेच उदाहरण. अतिशय हार्ड वर्किंग आणि एथिकल मनुष्य. कंपनीतील राजकारणात ह्याची नोकरी गेली. घरी ३ लहान मुली आणि बायको. अजुनही नोकरीविना आहे. सेव्हिंग्स आणि छोटीमोठी फ्रीलान्सिंग ची कामे करतोय. आता प्रामाणिकपणा आणि सत्याने वागूनही नोकरी गेली. अजूनही प्रामाणिकपणा आणि सत्यानेच वागतोय पण मन:शांती नाही कारण कुटुंबाला पोसायची चिंता. त्याने प्रामाणिकपणा सोडून काहीतरी वाईट करून पैसे मिळवावे असे म्हणत नाहीये पण शेवटी केवळ प्रामाणिक आहे म्हणून कोणी त्याला घरबसल्या पैसे देणार नाहीये.

In reply to by लंबूटांग

लंबूटांग Sun, 09/07/2014 - 09:03
ते ज्यांच्या राजकारणामुळे ह्याची नोकरी गेली त्यांच्यापैकी दोघेही आज त्याच कंपनीत दुसऱ्या डिविजन मध्ये अजून वरच्या पोस्टवर आहेत आणि एक जणाला तसेही रिटायरमेंटच घ्यायची होती त्याने ही संधी साधून ते साध्य केले इथले घर दीड मिलियन (१५ लाख) डॉलर्सना विकले आणि हवाईला (अतिशय सुंदर ठिकाण) राहयाला गेला. आता रोज छान छान फोटो टाकत असतो. ह्या प्राण्याने स्वत:ला रिटायर व्हायचे म्हणून काहीही उत्सुकता न दाखवता चालते आहे तितके दिवस चालू देत अशा रीतीने काम केले. ज्याची नोकरी गेली त्याने बरेचदा पुढाकार घेऊन काहीतरी करायचा प्रयत्न केला पण तो हाणून पाडला गेला.

In reply to by लंबूटांग

उत्तम उदाहरण ! अशी उदाहरणे जगभर रस्तोरस्ती पडलेली आहेत. यात अप्रामाणिकपणा आणि प्रामाणिकपणा यांच्या रस्सीखेचीत अप्रामाणिकपणाची सरशी झाली... कारण प्रामाणिक माणूस अप्रामाणिक माणसाला पराजित करू शकला नाही. यासाठी त्याने अप्रामाणिकपणा करायला पाहिजे असे मी अजिबात म्हणणार नाही. पण आपल्या विरोध्कांची कार्यशैली अभ्यासून त्यांच्यावर वरचढ होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, इतकेच माझे म्हणणे आहे (इथे तुमच्या उदाहरातील माणसाबद्दल शेरा नसून केवळ वस्तूस्थितीवर आधारीत म्हणणे आहे). केवळ मी प्रामाणिक आहे या धुंदीत राहण्याने अप्रामाणिक लोकांचे फावते, ते तुम्हाला बुद्दू समजून निर्वेधपणे त्यंचे अप्रामाणिक धंदे चालू ठेवतात आणि त्यांना कोणताहि विरोध होत नाही बघून मस्त मजेत ऐहीक सुखे उपभोगतात. त्यांना पायबंद बसण्यासाठी "अप्रामाणिकपणाला विरोध केला जातो, त्याला उघडे पाडले जाते आणि योग्य ती शिक्षाही केली जाते" अशी वस्तूस्थिती निर्माण करणे हे प्रामाणिक लोकांचे कर्तव्य असते. केवळ आंतरिक समाधानाच्या भ्रामक कल्पनेने ना खरे आंतरिक अथवा बाह्य सुख मिळते... ना अप्रामाणिकपणाचा पराजय होतो ! त्यासाठी अप्रामाणिकपणाशी संघर्ष करायची तयारी पाहिजे... यशस्वी झालात तर आंतरिक आणि बाह्य दोन्ही सुखसमाधान मिळेल. कोणी ज्ञानी माणूस म्हणून गेला आहेच की: वाईट माणसांचे फावते याचे कारण वाईट माणसे वाईट वागतात हे नाही (कारण तो त्यांचा गुअणधर्मच असतो), तर चांगली माणसे ते स्विकारतात म्हणून तसे होते ! या धाग्यावर आध्यात्मिक कारणे सांगत विरोध करणारे विसरत आहेत की: चांगल्याच्या / सत्याच्या विजयासाठी श्रीकृष्णाने गितेत अर्जुनाला खुद्द स्वतःच्या नातेवाईकांबरोबर युद्ध करण्याला भाग पाडले होते आणि सितेच्या सुटकेला प्रभू रामचंद्रांनी रावणाशी युद्ध केले होते... दोन्ही उदाहरणात स्वतःच्या अंतर्मनाच्या समाधानात मश्गूल राहून सुखी होण्याचा सल्ला नव्हता अथवा कृती केलेली नव्हती... जर तसे झाले असते तर अश्या सल्यामुळे / कृतीमुळे पांडव किंवा श्रीराम नक्कीच सुखी झाले नसते. तेव्हा माझे ऐकू नका पण निदान रामकृष्णांचे तरी ऐका अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे... कारण हा त्यांच्या एकट्याचा प्रश्न नाही... तर सर्व समाजाच्या मानसिक आरोग्याचा आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्यारे१ Sun, 09/07/2014 - 13:50
चलाख प्रामाणिक असणं आणि भोळसट प्रामाणिक असणं ह्यात प्रचंड फरक आहे. प्रामाणिकपणाबरोबर चलाखी आणि धूर्तपणा (ह्यातल्या लबाडीच्या शेडला वगळून) असायलाच हवा. योग्य नि चांगल्या गोष्टीसाठी धूर्तपणा आवश्यकच आहे. गायीला मारायला निघालेल्या कसायाच्या प्रश्नाला साधूनं दिलेलं खोटं उत्तर प्रामाणिकच ठरतं ते ह्यामुळं. (गोष्टीचा मूळ हेतू एखाद्याचा जीव वाचवणं हा असल्यानं तिथं कसायाची जीवनपद्धती, आणि त्याच्या व्यवसायावर आलेली गदा, कदाचित त्याचा गोष्टीमध्ये न आलेला धर्म ह्यांचा विचार गौण आहे, तो करु नये.) शिवाजी महाराजांचं सर्वार्थानं अत्यंत आदर्श उदाहरण आपल्यासमोर असताना आपण उगाच बाकीचे उहापोह करत बसतो. असो!

In reply to by प्यारे१

पोटे Sun, 09/07/2014 - 17:40
कसाई स्वतःच्या मर्जीने गाय मारत नाही.. गायीचा मालक गायीला कसायाकडे विकून येतो. मग कसाई त्याला मारतो. त्यामुळे गुन्हेगार गायीचा मालक असतो. कसाई नव्हे. (संपादित)

In reply to by पोटे

प्यारे१ Sun, 09/07/2014 - 18:48
बरं मग? जीव वाचतोय तो कुणामुळं? मुद्दा भरकटवू नका हो. :)

In reply to by प्यारे१

पोटे Mon, 09/08/2014 - 02:41
तुम्ही गायीचा जीव वाचवला कारण तुम्ही गाय खात नाही आणि कदाचित कसाई म्लेंच्छ धर्माचा असणार म्हणुन. गाईऐवजी शेळी असती आणि मारणारा हिंदु असता तर तुम्ही त्याला शेळीचा पत्ता दिला असता. ( आणि मारणार्‍याचा पत्ता घेऊन रात्री मटण्खायलाही गेला असतात. ) गाय / शेळी ऐवजी कोंबडी असेल आणि मारणारा हिंदु / मुस्लिम कुणीही असेल तर कदाचित बघणारा कोंअडीचा पत्ता सांगेल किंवा खोटे बोलून कोंबडी स्वतः देखील ढापेल !! भूतदया वगैरे झूठ आहे. पटले का ? गाय हा शब्द वापरला की आपण किती सोज्ज्वळ हे ढोंग करता येते म्हणुन या उदाहरणात हिंदुलोक वर्षानुवर्षे गाय हाच प्राणी वापरतात. प्राणी बदलला की रीअ‍ॅक्शन बदलते. :)

In reply to by पोटे

पोटे Mon, 09/08/2014 - 03:35
गायीला मारायला निघालेल्या कसायाच्या प्रश्नाला साधूनं दिलेलं खोटं उत्तर प्रामाणिकच ठरतं ते ह्यामुळं हे पूर्ण उदाहरणच लबाडीचं उत्तम उदाहरण आहे.. आमच्या आज्ज्यानेही हेच उदाहरण दिले होते. बघणारा भगवी छाटी घातलेला हिंदु साधु, गरीब बिचारी गाय आणि मारणारा दाढीवाला लुंगीधारी म्लेंच्छ ... असे चित्र नजरेसमोर राहील याची पूर्ण दक्षता घेऊनच हे उदाहरण रचले गेलेले आहे. या उदाहरणात साधु गायीला वाचवणारच ! कारण तो गाय खात नाही आणि समोरचा म्लेंछ आहे म्हणुन. आमचा आज्जा कवाच वर गेला. तो साधुही मोक्षाला गेला असणार. गायदेखील आता वेगळ्या योनीत गेली असेल आणि तो म्लेंच्छ कसाईही अल्ला को प्यारा झाला असणार ! त्यामुळे आता हे असले लबाड उदाहरण टाकुन द्यायला हवे.

In reply to by पोटे

विजुभाऊ Tue, 09/09/2014 - 13:08
गायीला मारायला निघालेल्या कसायाच्या प्रश्नाला साधूनं दिलेलं खोटं उत्तर प्रामाणिकच ठरतं ते ह्यामुळं. (गोष्टीचा मूळ हेतू एखाद्याचा जीव वाचवणं हा असल्यानं तिथं कसायाची जीवनपद्धती, आणि त्याच्या व्यवसायावर आलेली गदा,
समजा की तो कसाई हा ती गाय कापून विकून त्यातून मिळणार्‍या पैशातून स्वतःच्या उपाशी मुलांचे उदर भरण करत असेल आजारी बायकोवर / आई वडीलांवर औषधोपचार करणार असेल आणि ती गाय हातची गेल्या मुळे ते आईवडील मेले किंवा मुलांचे शिक्षण अर्धवट राहीले असेल तर त्या तसल्या भोंदू प्रामाणीकपणाला काय अर्थ उरतो. स्वतःचे नुकसान होणार नाही किंवा स्वतः सुरक्षीत रहाणार आहोत याची खात्री असेल अशावेळेस दाखवलेला प्रामाणीकपणा हा नैसर्गीक असतो. आपण दाखवलेल्या प्रामाणीकपणामुळे आपल्या इजा होणार आहे हे माहीत असताना दाखवलेला प्रामाणीकपणा हा मूर्खपणा असतो.

In reply to by विजुभाऊ

प्यारे१ Tue, 09/09/2014 - 13:23
माणसाच्या जीवनाला गायीच्या जीवनापेक्षा अधिक मूल्य आहे असं म्हणायचंय काय तुम्हाला? नैसर्गिक शब्दावर चान चान चर्चा झालेली आठवतेय. तसंच माणसाच्या (इतर जीवांच्या तुलनेतील) महानतेवर देखील. असो. प्रामाणिकपणा भोंदू म्हणा हवं तर. चालतंय आम्हाला.

In reply to by विजुभाऊ

श्रीगुरुजी Tue, 09/09/2014 - 20:48
>>> समजा की तो कसाई हा ती गाय कापून विकून त्यातून मिळणार्‍या पैशातून स्वतःच्या उपाशी मुलांचे उदर भरण करत असेल आजारी बायकोवर / आई वडीलांवर औषधोपचार करणार असेल आणि ती गाय हातची गेल्या मुळे ते आईवडील मेले किंवा मुलांचे शिक्षण अर्धवट राहीले असेल तर त्या तसल्या भोंदू प्रामाणीकपणाला काय अर्थ उरतो. या न्यायाने आफ्रिका खंडातील कृष्णवर्णियांना अत्यंत वाईट अवस्थेत जहाजात कोंबून अमेरिकेत गुलाम म्हणून विकणारे सुद्धा समर्थनीय ठरतात कारण गुलामविक्रीतून मिळालेल्या पैशातून ते उपाशी मुलांचे उदर भरण करत असतील किंवा आजारी बायकोवर/आई वडीलांवर औषधोपचार करणार असतील किंवा समाजोपयोगी कार्यासाठी देणग्या देणार असतील.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

लंबूटांग Sun, 09/07/2014 - 18:55
मी लवकर बाहेर पडलो नाहीतर माझीही काहीशी तशीच गत झाली असती. मी त्यालाही सांगत होतो पण त्याचा शेवटपर्यंत विश्वास होता की आपण प्रामाणिकपणे काम करत असल्याने ते आपल्याला अगदी काढूनच टाकणार नाहीत. असो थोडक्यात प्रामाणिकपणे वागून आपले चांगलेच होईल असे नाही तर त्याबरोबरच प्रयत्न केले पाहिजेत आणि योग्य जागी. दगडावर डोके आपटून काही फायदा नाही. स्वगतः हीच अक्कल नको त्या लोकांना प्रतिसाद देताना कुठे जाते काय माहिती. .

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्यारे१ Sun, 09/07/2014 - 18:46
बरेच मुद्दे सारखे असूनही सांगण्याच्या पद्धतीमध्ये घोळ होत असल्यानं काही मुद्दे समजत नाहीत. त्यामुळं तावातावानं भांडण होत आहे असा भास होतो आणि त्यामुळंच लफडी होतात.

In reply to by प्यारे१

बरोबर आहे... पण सांगण्याच्या पद्धतीतला घोळ होत नाही, पद्ध्तशीरपणे केला जातो... कारण "माझं कधीच चुकत नाही" असे सतत म्हणणार्‍याला "माझे चुकले म्हणण्याचे धैर्य नसते"... त्यापेक्षा घोळ करणे जास्त सोईचे वाटते... अर्थात असे करणे असत्याचे आचरण असते हे विसरले जाते, हे वेगळेच म्हणा !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्यारे१ Sun, 09/07/2014 - 18:55
चालायचं. समजा एक रॅट रेस आहे. त्यामध्ये जिंकून देखील रॅट रॅटच राहणार ना? रॅट रेस च्या बाहेर आलेलं उत्तम त्यापेक्षा. -नौसौ चुहे खाऊन बाहेर पडलेला प्यारेबोका. :)

In reply to by प्यारे१

झालं, केलं एक रुपक "ऑन द फ्लाय" तयार, तथाकथित रॅट रेसमध्ये भाग न घेता कसे आपले "छानसे कारकून राहून मस्तपैकी साहेबाची गुलामी करावी" याच्या समर्थनार्थ ! :) ;)

विटेकर Mon, 09/08/2014 - 10:10
सगळे प्रतिसाद वाचून आणि उलट सुलट मते ऐकून माझे पूर्वीचेच मत अधिक ठाम झाले आहे. चारित्र्याला म्हणजेच प्रामाणिकपणाला पर्याय नाही !! वेगेवेगळी उदाहरणे देऊन लोक आपल्या अप्रामाणिकपणाचे समर्थन देत आहेत झालं ..! अप्रामाणिकपणाचे फळ चांगले असूच शकत नाही. मना सांग पा रावणा काय झाले | अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले || कर्माचा सिद्धांत नाकारणे म्हणजे स्वतःचीच घोर फसवणूक आहे. प्रत्येक मनुष्य आपआपल्या कुवतीनुसार प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावत असतो ( विश्वाचा आकार केवढा? ज्याच्या त्याच्या डो़क्याएवढा ! ) एका गावात एका शेतकर्‍याकडे एक लंगडा घोडा होता. लोक म्हणत , हा मूर्ख इसम आहे , उगाचच लंगडा घोडा पोसतो आहे. एका सुगीच्या हंगामात साथीच्या रोगामुळे गावातील सारे बैल आजारले , या शेतकर्‍याने लंगड्या घोड्याच्या साह्याने वेळेवर पेरणी करुन घेतली. लोक म्ह्णाले , वा! हा हुषार आहे , बघा , घोडा कसा कामाला आला. पुढे काही दिवसातच शेतकर्‍याचा तरुण मुलगा त्या लंगड्या घोड्यावरुन पड्ला, त्याचा पाय मोडला .. लोक म्हणाले , या मूर्खाला अक्कल नाही ,कशाला लंगडा घोडा पाळावा ? तरुण पोरं आता झाला की नाही आडवा! पुढच्याच आठ दिवसात त्या राज्यावर परचक्र आले आणि गावात सक्तीची सैन्य- भरती आली , गावातील सारी तरुण पोरे सक्तीने सैन्यात नेली ... फक्त एक सोडून !! लोक म्हणाले .. बघा बघा.. लंगडा घोडा कसा कामाला आला !!! अप्रामाणिक मनुष्य अशाप्रकारे जेव्हा भौतिक प्रगती करत असतो तेव्हा त्याचे कर्म त्याला मस्त हसत असते ! तुम्ही - आम्ही आपल्या बुद्धीनुसार त्याचे अन्वयार्थ लावत असतो कारण आमची कुवत तेव्हढीच असते ! आणि "जानामि पुण्यं नच में प्रवृत्ती.." या न्यायाने त्या अप्रामाणिक माणसाच्या यशाची उदाहरणे देऊन आमच्या करु घातलेल्या पापाची भलामण करत असतो ! बुडत्याला तेव्ह्ढाच काडीचा आधार ! श्री वरदानंद भारती एक सुंदर उदाहरण द्यायचे - आपले कर्मफल हे एका मोठ्ठ्या कणगीत भरुन ठेवलेले असते. वरुन आपण जे काही करत असू त्याचे बरे - वाईट फल ते साठत जाते आणि खालून त्याचे फळ आपण काढून घेत असतो. वरु न जे टाकतो आहे त्याचे फळ लगेच खाली मिळत नाही... मधे जे भरलेले आहे ते अगोदर खाली सरकत राहील. सध्या वाईट कर्म करत असू तर त्याचे लगेच वाईट फळ मिळनार नाही ! पापाचा घडा भरल्याशिवाय त्याचे फळ मिळणार कसे ? तो घडा भरेपर्यन्त रावणाने सुद्धा अनिर्बन्ध राज्य केले. व्यासांनी शांतिपर्वात दोन्ही हात वर करून ओरडून ( होय, ओरडूनच ) सांगितले की बाबांनो.. धर्माने वागा रे ! उर्ध्वबाहो.... ( वल्लीशेट , तेव्हढा श्लोक पूर्ण करा हो.. आता आठवत नाहीये ! ) तेव्हा मी सांगून काय शष्प फरक पडणार आहे ? अस्तु . नेहमी प्रमाणेच... माझे डिसक्लेमर , माझी मते माझ्याजवळ , तुम्हाला तुमचे मत मांडण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे , मी प्रतिवाद करेनच असे नाही आणि माझे मत बदलेल असेही नाही !

In reply to by विटेकर

श्रीगुरुजी Mon, 09/08/2014 - 20:58
>>> सगळे प्रतिसाद वाचून आणि उलट सुलट मते ऐकून माझे पूर्वीचेच मत अधिक ठाम झाले आहे. चारित्र्याला म्हणजेच प्रामाणिकपणाला पर्याय नाही !! संपूर्ण सहमत ! कर्माचे फल कधी ना कधीतरी मिळतेच. अर्थातच चांगल्या कर्माचे चांगलेच फळ मिळते आणि वाईट कर्माचे वाईटच! "The game of life is a game of boomerangs. Our thoughts, deeds and words return to us sooner or later with astounding accuracy."

In reply to by श्रीगुरुजी

चारित्र्याला म्हणजेच प्रामाणिकपणाला पर्याय नाही !! याला कोणाचाच आक्षेप असण्याचा प्रश्न नाहीच. प्रामाणिक माणूस हे सत्यही जाणून असेल की अप्रामाणिक/चरित्रहीन माणसे त्यांला आपणहून त्याचा हक्क ताटात वाढून त्यांच्यापूढे ठेवणार नाहीत... कारण तो प्रामाणिक माणसांचा गुणधर्मच नाही, किंबहुना ते तसे करत नाहीत म्हणूनच त्यांना अप्रामाणिक/चरित्रहीन म्हटले जाते. तसेच, आपल्या हक्कांकरिता संघर्ष करायला मागे राहण्याला काय म्हणतात हे प्रमाणिक माणसाला सांगण्याची गरज नाही. तेव्हा, अगदी सर्वस्व पणाला नाही लावले तरी प्रामाणिकपणे, आपली अक्कलहुशारी कामाला लाउन आपल्या हक्कांचे जमेल तेवढे रक्षण करावे... आणि अपयश आले तर त्याला भ्रामक वचनांच्या मागे लपवू नये... कारण तो अप्रामाणिकपणा होईल ! त्यापेक्षा अपयश का आले हे प्रामाणिकपणे समजावून घेउन, यशासाठी भविष्यात काय सुधारणा करायला पाहिजे हा विचार करावा. कारण, अप्रामाणिकपणापुढे हार मानणे आणि वरवर "मी मनातून आनंदी आहे" असे म्हणणे यापेक्षा दुसरा अप्रामाणिकपणा विरळा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

प्रसाद१९७१ Tue, 09/09/2014 - 18:58
अर्थातच चांगल्या कर्माचे चांगलेच फळ मिळते आणि वाईट कर्माचे वाईटच!
भारतातले ९९.९९ टक्के नगरसेवक, आमदार, खासदार अगदी मजेत वयाच्या ८०-९० वर्षा पर्यत खुटखुटीत जगत आहेत. तुमचे म्हणणे जर खरे असेल तर ते पुण्य करत असणार आणि आमच्या सारखी माणसे पापे करत असणार.

विटेकर Mon, 09/08/2014 - 10:40
मग कर्माचा सिद्धांत असाच आहे तर माझ्या हातात काहीच नाही का ? असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी .. असेच आहे तर मी प्रयत्न करुन तरी काय होणार आहे? टिळकमहाराजांनी त्याचे फार सुंदर विवेचन केले आहे ( गीतारहस्य पृष्ठ २३७ -२४४ पहीली आवृत्ती), ते मूळातूनच वाचावे , मला ते तितक्या अधिकाराने सांगता येणार नाही. कर्म करण्याचे स्वातंत्र्य तुमचे आहे , फळाचे नाही ! विस्तवावर ( अजाणतेपणाने देखील ) पाय पडला की चटका बसणारच ! चुकुन पाय पडला हे लॉजिक तिथे चालत नाही. ईश्वर दयाळू नाही , तो तुमचे कर्मफल तुमच्या पदरात टाकतोच टाकतो ! खरे तर तो काहीच करत नाही , त्याचे तसे कर्तृत्वच नसते . मात्र कर्म निवडण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे. बुद्धी आणि विवेकाने आपले कर्म निवडावे हे स्वातंत्र्य न वापरता विषयासक्त होऊन कर्म आचरले आणि त्याचे वाईट फळ मिळाले तर त्याला जबाबदार कोण? (मना त्वाचि रे पूर्व संचित केले | तयांसारखे भोगणे प्राप्त झाले ||) आणि कोणते कर्म योग्य आणि कोणते अयोग्य याचे यम - नियम म्हणजेच धर्म ! त्याच्या कक्षेत राहून जे जे कर्म कराल ते " निष्कर्म्य " ( हाच शब्द टिळक महाराजांनी वापरला आहे ) म्हणजे ज्याचे फळ भोगावे लागत नाही असे ! मग अन्याय सहनच करायचा का ? हत्या करुन ही अर्जुनाला पाप का लागत नाही.. त्याचे कारण ही पुन्हा धर्मच ! म्हणून मेलास तर स्वर्गात जाशील , जि़ंकलास पृथ्वीचे राज्य भोगशील. कारण युद्ध करणे हाच क्षत्रियाचा धर्म आहे ! आणि हे कर्म ( युद्ध करण्याचे कर्म)"निष्कर्म्य" आहे. आणि म्हणून अन्याय सहन करणे हे धर्माचे वागणे नव्हे ! नाठाळाच्या माथी हाणू काठी हा धर्म ! देशद्रोही तितुके कुत्ते .. मारुनी घालावे परते .. हा धर्म ! It is wise to be unwise is unwise ! हा धर्म ! याच धर्माच्या कक्षेत राहून जरुर वैभव मिळवावे , पुरुषार्थ करावा, उपभोग घ्यावा ! पण अधर्माचा शॉर्ट्कट वापरून त्याने मिळणारे "क्षणैक" एन्द्रीय सुख भोगायला मिळावे म्हणून त्याचे समर्थन करु नये ! धिस इज क्रिमिनल !

विटेकर Mon, 09/08/2014 - 10:53
सत्याला कधीच झगडावे लागत नाही ! असत्याचा नेहमीच पराभव होतो ! असत्य फक्त अंधारात आकार धारण करुन भेव दाखवते, सत्याचा प्रकाश पडला की ते दूर पळते. सत्याला नाही पण आपल्याला झगडावे लागते ,सत्याला काही शष्प देखील फरक पडत नाही. एखाद्या मनुष्य डो़क्यावर उभे राहून सूर्य पशिमेकडे उगवतो असे म्हणत असेल आणि आजूबाजूचे देखील त्याच्याच "दृष्टिकोनातून" पाहून तेच म्हणत असतील तर "मी पूर्वेकडेच उगवतो" हे सूर्य येऊन सांगत नाही, त्याला काहीही फरक पडत नाही.. तुमच्या सारखाच एखादा शहाणा मनुष्य येऊन सांगतो की गाढवांनो , जरा पायावर उभे राहून पहा की सूर्य नेमका कोठे उगवतो ते ! झगडावे लागते ते त्याला , ज्याला ही सत्य लोकांना सांगायची इच्छा आहे त्याला ! अन्यथा त्यालाही दोन पर्याय आहेतच , एक डोळे झाकणी करुन डो़क्यावर उभे राहून म्हणणे की हो सूर्य पश्चिमेकडेच उगवतो किंवा त्यांना सत्य उमगेपर्यन्त प्रतिवाद करत राहणे ! (तिसरा पर्याय म्हणजे " चालू द्या" म्हणून आपण आपल्या मार्गाने चालत रहाणे ! हल्ली मी तिसरा पर्याय स्वीकारतो ! स्मायली ) या ही प्रतिसादाला माझा दिस्क्लेमर लागू आहेच !

In reply to by विटेकर

तुमच्या सारखाच एखादा शहाणा मनुष्य येऊन सांगतो की गाढवांनो , जरा पायावर उभे राहून पहा की सूर्य नेमका कोठे उगवतो ते ! उत्तम ! लेखाचा मतितार्थ हाच आहे की "माणसाने विचार करणारा, आपल्या चुका जाणणारा आणि त्यावरून काही शिकणारा शहाणा माणूस बनण्याचा प्रयत्न करावा" ! बस इतकेच बरेच काही करून जाईल !! :)

In reply to by विटेकर

विजुभाऊ Tue, 09/09/2014 - 13:12
सूर्य पूर्वेला उगवतो हे अर्धसत्य आहे. ते एका फ्रेम ऑफ रेफर्न्स शी बाम्धील आहे. मी उत्तर धृवावर गेलो आणि सूर्य दक्षीणेकडून उगवतो हे सत्य सांगितले तर ते कितीही सत्य असेल तरीही जोवर पहाणारा तेथे येणार नाही तोवर त्याच्यासाठी ते मिथ्यच असेल.

In reply to by विजुभाऊ

मदनबाण Tue, 09/09/2014 - 13:30
मी उत्तर धृवावर गेलो आणि सूर्य दक्षीणेकडून उगवतो हे सत्य सांगितले तर इजुभाऊंना उत्तर धृवावर जाण्यासाठी हार्दिक शुभेच्छा ! ;) बा द वे खाणं काम बंद झाले ते तिकडे उत्तर धृवावर करणार आहात काय ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

राजेश घासकडवी Mon, 09/08/2014 - 12:58
लेखावरची चर्चा पाहून लेखातले मुद्दे अधोरेखित झाले. आता विटेकर, संक्षी, इस्पीकचा एक्का आणि झालंच तर पोटे - या सर्वांकडेच सत्य आहे. आणि त्यांनी एकमेकांशी, इतरांशी लढाही दिला. पण त्यांच्यापैकी कोणी जिंकलं का? छे! यावरूनच सिद्ध होतं की सत्याचा विजय नेहमी होत नाही, कधी कधी तर लढा देऊनसुद्धा होत नाीह.

In reply to by राजेश घासकडवी

संक्षींचा विजय झाला नाही असे खोटेनाटे पसरवू नका. संक्षींचा नेहमी विजय होतो. संक्षी हारा नही, संक्षी हारते नही. (हे "आनंद मरा नही" च्या चालीवर म्हणावे)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्यारे१ Mon, 09/08/2014 - 13:57
हार जीत तो आदमी की होती है जानी. संक्षी आदमी नही, सोच है. सोच को न आप हरा सकते हो, ना मिटा सकते हो. (इथे काही प्रतिसाद येणार आहेत त्यांना मोठं व्हायला सांगूया काय? ;) )

In reply to by राजेश घासकडवी

नावाच्या यादीत स्वतःचे नाव सामील न करताना दाखवलेला विनय पाहून डॉळॅ पानाव्ले ! ;) (आता हा विनय कोण आणि त्याचे नाव यादीत का नाही हे विचारू नये. त्याचे उत्तर मिळेलच असे नाही. :) )

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्यारे१ Mon, 09/08/2014 - 16:45
हल्ली इन्फ्लुएन्शल पिपल पण इझिली इन्फ्लुएन्स्ड होतात हे पाहून आमचे ही ड्वाळे पाणावले. ;) -पळून गेलेला. =))

विटेकर Mon, 09/08/2014 - 14:03
तिसरा पर्याय म्हणजे " चालू द्या" म्हणून आपण आपल्या मार्गाने चालत रहाणे ! हल्ली मी तिसरा पर्याय स्वीकारतो ! Wink ) या तिसर्‍या पर्यायात जीत नेहमी माझीच असते !

In reply to by विटेकर

या तिसर्‍या पर्यायात जीत नेहमी माझीच असते ! हे तुमचं मत झालं. पण... सगळ्या पर्यायांत जीत नेहमी माझीच असते ! हे संक्षींचं मतही तुम्हाला मान्य आहे काय हे पण जाणून घ्यायला आवडेल ! :)

In reply to by कवितानागेश

विटेकर Mon, 09/08/2014 - 14:45
छानं हं माऊ तै ! इथे लोक अटी-तटीला आलेत आणि तुम्हाला पुरस्काराचे पडलयं ! निऊन घाला तो पुरस्कार बारा गडगड्याच्या विहिरीत ! आणि विजयी " पावलेल्या" ????? केलेत हो तुम्ही "पावन" ! ह.घ्या.हे.वे.सां.न.ल.

In reply to by विटेकर

धन्या Mon, 09/08/2014 - 17:19
या ओळीचा अर्थ जर "एकच सत्य ब्राम्हण बहुतेक बोलतो" असा असेल तर मग या धाग्यावर हिरीरीने सत्य मांडणार्‍यांपैकी ब्राम्हण कोण आहे हे शोधूया. त्याने प्रतिसादांमध्ये जे सत्य म्हणजे काय लिहिले असेल ते सत्य. आता सत्य काय हे ठरवणं खुप सोपं झालंय. :)

In reply to by विटेकर

बॅटमॅन Tue, 09/09/2014 - 11:51
वल्लीने सांगितलेला अर्थ बरोबर आहे. विप्र या शब्दाचा अर्थ ब्राह्मण असा होतो त्याचबरोबर तो शहाणा, ऋषि असादेखील होतो. http://spokensanskrit.de/index.php?script=HK&beginning=0+&tinput=+vipra&trans=Translate&direction=AU आता लबाड ब्राह्मणांनी शहाणपणा 'हायज्याक' केला असे कुणाला म्हणायचे असेल तर चालूद्या. ;)

In reply to by धन्या

हो ना ! अकरावीपर्यंत संस्कृत शिकलेला आमचा एक वर्गमित्र, "तमसोमा ज्योतिर्गमय ।" याचा अर्थ "तुझी आई ज्योतीबाला जाते." असा ठासून सांगत असे ते आठवले :) ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हाडक्या Mon, 09/08/2014 - 20:07
हा हा हा .. बादवे, तुम्ही बॅ. पी. जी. पाटलांच्या बरोबर एकच वर्गात होता की काय ? नाही ते पण त्यांच्या वर्गमित्राच्या बाबतीत हाच किस्सा सांगायचे म्हणून विचारतोय. ;)

In reply to by हाडक्या

धन्या Mon, 09/08/2014 - 20:42
दुर्दैवाने शालेय पातळीवर संस्कृत खुप वाईट पद्धतीने शिकवलं जातं. साधारण साचा असा असतो: देव शब्द, माला शब्द, आत्मनेपद, परमस्मैपद, सुभाषिते आणि त्यांचा अर्थ रटणे, रामरक्षा घोकणे. एव्हढया माहितीच्या जोरावर दहावीला संस्कृतमध्ये आरामात ७०+ गुण मिळतात.

In reply to by हाडक्या

तसं मला काही आठवत नाही. पण मी माझ्या मित्राला थोपुवर त्याचा स्त्रोत विचारतो, तुम्ही तुमच्या दुव्याला तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने विचारुन पहा :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हाडक्या Tue, 09/09/2014 - 19:13
अहो, बॅ. पी. जी. पाटिल आता जिवंत नाहीत हो.. लई मोठ्ठा मानूस (रयत शिक्षण संस्थेसाठी).! तो दुवा त्यांच्यावरच्या पुस्तकाचा आहे. त्यांची ओळख करून द्यायची गरज पडु नये म्हणून. :)