मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सत्याचा जय...

डॉ सुहास म्हात्रे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
पूर्वपिठिका: नुकतेच मिपावरच्या एका धाग्यावरच्या डॉ सुबोध खरे यांच्या प्रतिसादात खालील वाक्य वाचले... शेवटी काय माणूस चांगला असणे आणी आयुष्यात यशस्वी होणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही. या वाक्यात सांगीतलेल्या शंभर नंबरी सत्याविरुद्ध समाजात काही वेळेस जाणीवपूर्वक तर इतर काही वेळेस अजाणतेपणाने विचार पसरवला जात असतो आणि त्यामुळे समाजावर किती अनिष्ट परिणाम होतो याबद्दल लिहायचे बरेच दिवस मनात होतेच. पण, डॉ खरेंच्या प्रतिसादाने हातातले काम बाजूला ठेऊन आजच त्यावर खालील विचार लिहायला भाग पाडले, याबद्दल त्यांचे खास धन्यवाद ! ============================================ "नेहमीच सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो."; "गरिबीची भाकरी श्रीमंतीच्या लाडूपेक्षा गोड असते."; "लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी."; "लबाडी केल्याशिवाय धन अथवा यश मिळत नाही" वगैरे, वगैरे, वगैरे... अशी काल्पनिक, फसवी आणि भोंदू विधाने सर्वसामान्य माणसातल्या भोळसट कवीमनाला भुरळ घालतात. डोळे उघडे ठेवून आजूबाजूला पाहिले तर त्यातला फोलपणा दिसायला फार वेळ लागत नाही. दुर्दैवाने भावनेच्या पुरात वाहून जाणार्‍या माणसाला सर्वसाधारणपणे डोळे उघडे ठेऊन बघणे जरासे कठीणच जाते. सर्वात वाईट गोष्ट ही की बर्‍याच वेळेस अशी विधाने आपले अपयश झाकण्यासाठी एक उत्तम पळवाट म्हणून सोईची वाटतात... अश्या फसव्या फुंकरीने मूळ आजारावर (अपयश) उपाय तर होत नाहीच पण तो अधिकच बळावतो (यशासाठी प्रयत्न करण्याऐवजी अपयशाचे समर्थन करून स्वतःचेच मानसिक खच्चिकरण करण्याची वृत्ती बळावते). जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम परखडपणे सत्याला सामोरे जायची (ब्रूटल ऑनेस्टी) आणि वस्तूस्थितीकडे डोळे उघडे ठेऊन बघण्याची (लॉजिकल थिंकिंग) सवय अंगीकारली पाहिजे. मग त्यावरून झालेल्या बोधाने जो निर्णय पटेल तो ज्याचा त्याने घ्यावा... मात्र जर चुकीचा निर्णय घेतला तर त्याच्या परिणामांची तयारी ठेवावी... त्या परिणामांची जबाबदारी झटकून टाकायला काल्पनिक समजूतींचा आधार घ्यायची घातक सवय सोडून देणे आवश्यक आहे. कोणीतरी म्हटले आहेच ना की, "यश म्हणजे अपयशाचा अभाव नाही तर अपयशातून उठून, अंग झटकून, परिस्थितीचा सामना करून तिच्यावर विजय मिळवणे आहे." म्हणूनच सुरुवातीला दिलेल्या किंवा तत्सम फसव्या वाक्यांऐवजी खालील परखड सत्य स्विकारल्यास "मानसिक खरेपणा" आणि "ऐहीक यश" या दोन्हींची शक्य तेवढी "नैतीक सांगड" घालणे शक्य होईल: १. नेहमी सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो. नेहमी सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतोच असे नाही. परिश्रम घेतल्याविना असे काही झाल्यास तो योगायोग समजावा. याचा अर्थ विजयासाठी असत्याने वागायला पाहिजे असा अजिबात नाही तर असत्याचा पराभव करण्यासाठी लागणारी अक्कलहुशारी आणि ताकद बाळगणे जरूर आहे असा आहे. सितेला पळवून नेल्यावर पश्चाताप झाला म्हणून रावणाने तिला सन्मानाने परत पाठवले नव्हते. रामाला रावणाबरोबरचे युध्द जिंकूनच सत्याचा विजय सिद्ध करावा लागला होता. २. गरिबीची भाकरी श्रीमंतीच्या लाडूपेक्षा गोड असते. हा चलाख श्रीमंतांनी गरीबाला कायम गरीब ठेवण्यासाठी आणि त्याच्या जीवावर स्वतः कायम श्रीमंत राहण्यासाठी पसरवलेली खोटी कल्पना आहे. या खोडलेल्या विधानाचा मानसिक सुखांशी ओढून ताणून संबंध लाउन (वडाची साल पिंपळाला लाउन) आर्थिक अपयशाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला जातो. सत्य हे आहे की लाडू हा नेहमीच भाकरीपेक्षा गोड असतो आणि श्रीमंती ही नेहमीच गरिबीपेक्षा जास्त सुखकारक जीवन शक्य करते. मात्र ऐहीक सुख समाधानकारक पद्धतीने भोगण्यासाठी, "जर तो पैसा सरळ मार्गाने मिळवलेला असला तर" खूप मदत होते. पैशाबद्दल सत्य असे आहे की त्याला ऋण/नकारार्थी (negative) मुल्य आहे. म्हणजे थोडक्यात असे "तो नसला तर नक्कीच दु:खदायक असतो, पण असला तर सुखदायक होईलच असे नाही." मात्र पैसा योग्य मार्गाने मिळवलेला असला तर त्याचे फायदे उपभोगताना न्युनगंड / पकडले जाण्याच्या भितीचा अभाव तरी नक्की राहील. ३. लुळीपांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी. हे एक भंपक विधान आहे. लुळेपांगळेपणा-धडधाकटपणा आणि श्रीमंती-गरिबी यांचा अर्थाअर्थी अथवा सरळ-सरळ काहीच संबंध नाही. सत्य हे आहे की, या जगात अनेक लुळेपांगळे गरीब आहेत आणि धडधाकट श्रीमंत आहेत. शिवाय अनेक पंगु श्रीमंत त्याच्या श्रीमंतीमुळे उत्तम/बरे जीवन जगत आहेत आणि त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त प्रमाणात असलेले धडधाकट गरीब हालाखीचे जीवन जगत आहेत. वैध मार्गाने कमावलेली सधनता तुम्हाला अश्या अनेक सुखकारक गोष्टी मिळवून देऊ शकते, ज्यांची गरीब स्वप्नेही बघू शकत नाही. ४. "लबाडी केल्याशिवाय धन अथवा यश मिळत नाही" हे सुद्धा वरच्या भोंदू वाक्यांइतकेच... किंबहुना त्यांच्यापेक्षा जरा जास्तच... भोंदू वाक्य आहे. जगात असत्य, अनिती वगैरेचा मार्ग पकडून धन आणि यश कमावणारे अनेक लोक आहेत पण त्याबरोबरच सत्य आणि नीतिच्या मार्गावर चालून सधन आणि यशस्वी झालेले लोकही कमी नाहीत. मात्र आपण दुसर्‍याची परिस्थिती पडताळून पाहत असताना वापरलेले सधनतेचे आणि यशाचे निकष आपले नसून त्या व्यक्तीचे असायला हवे; स्वतःबद्दल पडताळणी करायची असेल तेव्हाच स्वतःचे निकष वापरणे योग्य होईल; इतके तारतम्य ठेवणे जरूर आहे. कारण सधनतेची आणि यशाची व्याख्या माणसागणीक वेगळी असू शकते. वर केवळ चारच वाक्ये उदाहरणाखातर दिली आहेत. जरा आजूबाजूला पाहिले तर अशी अनेक भंपक वाक्ये "चलाख लोक स्वत:च्या फायद्यासाठी" किंवा "स्वघोषित विचारवंत चार टाळ्या कमवायला" वापरताना दिसतील. या आणि अश्या इतर वाक्यांना केवळ निरर्थक अथवा फोल म्हणून सोडण्यात अर्थ नाही. सक्रिय प्रयत्नांनी त्यांना कचर्‍याचा डबा दाखवणे आवश्यक आहे... कारण अपयश मागे सारून सतत स्वतःच्या बळावर प्रामाणिक प्रयत्न करून सधन व सुखी होण्याचा प्रयत्न करायला उत्साहीत करण्याऐवजी अशी वाक्ये अपयशाचे भ्रामक समर्थन करत समाजाला पंगू करण्याचे काम करत असतात... सशक्त, विचारी आणि शहाणा समाज बनण्याच्या वाटेत अश्या अंधश्रद्धा फार मोठा अडथळा बनून उभ्या आहेत.

वाचने 55824 वाचनखूण प्रतिक्रिया 218

विटेकर गुरुवार, 09/04/2014 - 15:53
लेखातील वाक्या- वाक्याशी तीव्र असहमत ! तूर्तास इतकेच ! मी पैला हे लिहायचे राहीलेच !

In reply to by विटेकर

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/04/2014 - 16:09
हजारो वर्षांची गुलामगिरीची प्रथा आणि शेकडो वर्षांचा वसाहतवाद या दोन गोष्टी "सत्याचा असत्यावर विजय" होता काय हे सांगा, मग पुढे बोलू... अन्यथा डोळे गच्च मिटून राहणे हा लोकशाही हक्क तुम्हाला आहे, हे आम्हाला मान्य आहे :)

एसमाळी गुरुवार, 09/04/2014 - 16:06
लेख खुप आवडला. वाक्यावाक्याशी सहमत. बाकी माझे अत्यंत नावडता quote देतो. "There is crime,behind every fortune" साला मेहनत करुन आणी व्यवहारी राहुन ही मोठ्ठ होता येते.

In reply to by संजय क्षीरसागर

योगी९०० Sat, 09/06/2014 - 13:22
लेख विटेकरांचा नाही हे कळतेय हो...मलाही मिपावर ५ पेक्षा जास्त वर्षे झालीत.. या लेखाच्या विटेकरांच्या वाक्या- वाक्याशी तीव्र असहमतीच्या जेपी यांच्या असहमतीशी माझी सहमती...असे म्हणायचे आहे मला.

स्वप्नांची राणी गुरुवार, 09/04/2014 - 17:19
'ठेविले अनंते तैसेची रहावे...चित्ती असो द्यावे समाधान' एकदा ही हतबलता स्विकारली की मग 'भला उसका यश/पैसा/किर्ती मेरे यश/पैसा/किर्ती से ज्यादा कैसे' याचे स्वतःला कुरवाळणारे भंपक कारण शोधावेच लागते..त्यातूनच जन्मतो हा 'लुळी पांगळी.. आणि 'लबाडी केल्याशिवाय.. ई.ई. भोंदूपणा.

बाळ सप्रे गुरुवार, 09/04/2014 - 17:33
+ असंख्य असत्याला confront केल्याशिवाय त्याच्याशी संघर्ष केल्याशिवाय सत्याला यश मिळू शकत नाही..

प्यारे१ गुरुवार, 09/04/2014 - 18:10
ह्या वाक्यांमधले तुलनात्मक अनावश्यक भाग काढून टाकल्यास स्वयंसूचना वाली छान वाक्यं बनतील. अमुक शिवाय तमुक नाही वगैरे का असतं? मी माझ्यासाठी अमुक एक करतो/करेन पुरेसं नाही?

पोटे गुरुवार, 09/04/2014 - 18:55
अजुन काही लबाड वाक्ये. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. हिंदु धर्म हा त्यागवादी आह्हे व इतर सर्व भोगवादी आहेत. बुडाला औरंग्या पापी.

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/04/2014 - 19:25
अमुक शिवाय तमुक नाही वगैरे का असतं? मी माझ्यासाठी अमुक एक करतो/करेन पुरेसं नाही? याची उत्तरे "आस्तिक-नास्तिक..." लेखाच्या पुढच्या भागात येतील, (जर्रा वेळ मिळू द्या). आतासाठी फक्त दोनच विधाने: १. माणूस समाजातले "बेट" (मी माझ्यासाठी अमुक एक करतो/करेन) म्हणण्याइतका वेगळा राहू शकणार नाही... संन्यास घेऊन जंगलात गेला तरी आजच्या काळात ते शक्य नाही. व्यक्ती व समाज यांची क्रिया-प्रतिक्रिया अनिवार्य आहे. २. एडवर्ड मरो म्हणून गेलाय : "क्लिष्ट गोष्टींची समज आपल्याला काही काळाने येईलच. पण समोर असलेल्या उघडउघड गोष्टीच्या उकलीला त्यापेक्षा जास्त वेळ लागतो असेच दिसते (The obscure we see eventually. The completely obvious, it seems, takes longer)."

यसवायजी गुरुवार, 09/04/2014 - 20:06
लुळेपांगळेपणा-धडधाकटपणा आणि श्रीमंती-गरिबी यांचा अर्थाअर्थी अथवा सरळ-सरळ काहीच संबंध नाही. यासाठी +१ पण, "लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी" याचा शिंपल अर्थ असा घेतला तर? की, श्रीमंतीमागे धावताना लुळेपांगळे व्हायची वेळ येणार असेल तर त्यापेक्षा धडधाकट गरिबी परवडली.

In reply to by यसवायजी

एस गुरुवार, 09/04/2014 - 20:25
"लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी" याचा अन्वयार्थ असा आहे की श्रीमंत होण्याच्या नादात आपले मूल्यसंस्कार विसरू नयेत. एवढंच. शब्दशः अर्थ घेण्याची गरज नाही. तसेच श्रीमंत होणे वाईट असते, पाप असते असेही मानू नये.

In reply to by यसवायजी

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/04/2014 - 20:36
त्या वाक्प्रचाराचा अर्थ सर्वसाधारणपणे तुम्ही म्हणता तसा घेतला जात नाही. असा ओढून ताणून अर्थ काढण्यापेक्षा "श्रीमंती वाईट नाही, पण तिच्या मागे धावताना सारासारविवेक बाळगा." असे म्हणायला हरकत नाही... आणि या सारासारविवेकात स्वतःची पात्रता आणि अपेक्षा यांचे प्रामाणिक गुणोत्तर ठेवले तर मग भ्रमनिरास आणि त्यावरची भ्रामक मलमपट्टी करायची गरज नाही. मुख्य म्हणजे श्रीमंती लुळीपांगळी असते किंवा तिच्याकरता कष्ट करण्याने माणूस लुळापांगळा होतो, या स्वतेजभंग करणार्‍या आणि गरिबीला भ्रामक उच्चासनावर बसवण्याच्या आत्मघातकी प्रवृत्तीला माझा विरोध आहे. ज्या समाजाच्या मनात उच्च स्वप्ने नाहीत आणि त्यासाठी कष्ट करायची तयारी नाही त्या समाजाचे केवळ वर्तमानच नव्हे तर भविष्य सुमार राहिले तर आश्चर्य कसले ? मुख्य म्हणजे हा उतारावरचा प्रवास इथेच थांबत नाही... स्वतःबद्दल असा कमीपणा (low self-esteem) वाटणारे समाज दुसर्‍या वरचढ समाजांचे गुलाम होतात हा इतिहास आहे... कारण सत्याचा/चांगल्याचा आपोआप विजय होण्याची कमीतकमी नगण्य शक्यता तरी असते पण तेजोहीन समाज मात्र हमखास प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गुलाम बनतो. याला इतिहास आणि वर्तमान साक्षी आहेत, फक्त डोळे उघडून पहायची गरज आहे.

In reply to by यसवायजी

विजुभाऊ Sat, 09/06/2014 - 16:08
यसवायजी. खरेतर मराठी तील हे सर्वाक भयानक आणि सर्वांगाने विकासाला मारक वाक्य आहे. या वाक्यावर पुलं नी एकदा लिहुन ठेवलय की श्रीमंती इताके धट्टकट्टे जगात काही नाही हे समजेपर्यन्त लोक गरीबीने लुळेपांगळे होऊन गेलेले असतात.

In reply to by विजुभाऊ

यसवायजी Sun, 09/07/2014 - 01:32
हो. पैशाचं महत्व मी तरी नाकारत नाहीच. पण मला वाटतं की, कुठल्याही म्हणी,वाक्प्रचाराचा अर्थ ती/तो वापरल्या जाण्याच्या 'टाइमिंग'वर ठरवावा. जसे की 'आराम हराम है' याचा अर्थ शब्दशः "आजारी असताना देखील आराम करु नये" असा नाही. सर सलामत तो पगडी पचास, Health is wealth, यातून सुद्धा एवढंच अपेक्षीत आहे की, एखाद्या गोष्टीमागे धावताना आरोग्याकडे दुर्लक्ष होणार असेल तर त्यापेक्षा ती तसली श्रीमंतीच नको. पैशामागे जिव तोडून धावताना धाप लागली तरी थांबायला वेळ नाही, आणी एक दिवस कोसळलो तर पाणी पाजायला आपली माणसं नाहीत अशी वेळ न येवो. बस्स.. बाकी सगळ्या शिर्‍या-उपमा हो.

धन्या गुरुवार, 09/04/2014 - 20:51
क्लास !!! पैशाच्या संदर्भातीलः
तो नसला तर नक्कीच दु:खदायक असतो, पण असला तर सुखदायक होईलच असे नाही.
यचा दाहक अनुभव घेतला आहे, घेतोय. अजून एक असंच टुकार वाक्यः जे होतं ते चांगल्यासाठीच होतं.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/04/2014 - 20:52
>>>>"लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी" ह्यात पैशापेक्षा आरोग्य महत्त्वाचे हा संदेश दिला आहे. गरीबच राहा किंवा श्रीमंत होऊ नका असा संदेश नाहिये. आरोग्याला योग्य तितके महत्व देऊन श्रीमंती आली तर त्याला आक्षेप नाही. पण, श्रीमंतीच्या मागे धावताना, शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होणार असेल आणि कांही व्याधी कायमस्वरूपी मागे लागल्या तर आलेल्या श्रीमंतीचा उपयोग काय? असा साधा सरळ अर्थ आहे. गरीबी म्हण़जेच 'धडधाकटपणा' आणि श्रीमंती म्हणजे 'लुळेपांगळेपणा' असा शब्दशः अर्थ घेऊ नये. लहानपणी शाळेत शिकताना "लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी" ह्या संदेशातून आयुष्यातील मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे महत्व अधोरेखित केले आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

याबद्दल माझे मत मी वरच्या एका प्रतिसादात जरा विस्ताराने दिले आहे, त्यात मला काय म्हणायचे आहे ते जास्त स्पष्ट होत आहे.

कवितानागेश गुरुवार, 09/04/2014 - 21:31
थिअरेटिकली हे पटतय की, अपयश मागे सारून सतत स्वतःच्या बळावर प्रामाणिक प्रयत्न करून सधन व सुखी होण्याचा प्रयत्न करायला हवा.... पण त्यावरचं एक आर्ग्युमेन्ट असंही असतं, की एकाचवेळेस "सगळेच" यशस्वी कसे होतील? काहीजण अपयशी होणारच. मग त्यांनी मनाची समजूत कशी घालायाची?

In reply to by कवितानागेश

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/04/2014 - 22:04
खरंतर यात काहीच थिअरेटिकल नाही. सगळंच प्रॅक्टीकल आहे. वस्तूस्थिती साधारण अशी असते: * सगळेच जण एकाच वेळी एकाच स्पर्धेत नसतात * एक संधी एका वेळी अनेकांना (उदा. नोकरी, व्यवसाय, इ) उपलब्ध असते आणि त्यांत अनेक जण यशस्वी होउ शकतात. * सगळे पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होतील असे नाही, पण भविष्यात त्याच / इतर प्रकारच्या अनेक प्रकारच्या संधींच्या अनेक फेर्‍या उपलब्ध असतात * महत्वाकांक्षी व्यक्ती स्वतःच्या संधी स्वतः निर्माण करतात... अश्या प्रकारचा (आउट ऑफ बॉक्स) विचार करणार्‍या माणसांची परंपरा असलेले देश इतर देशांना कोसांनी मागे टाकतात. अश्या देशांचे आपण कौतूक करतो, त्याबरोबरच त्यांचे अनुकरण करणे जास्त फायद्याचे आहे, नाही का? * आणि शेवटी अजून एक निर्दयी सत्य, ज्याला सर्वांनाच सामोरे जावे लागते... जीवनाच्या शर्यतीत काही मोहरे अयशस्वी होणारच... असे कोण म्हणाले की जगातले सर्वच "गुडिगुडी" आहे ? जग त्याच्या नियमाप्रमाणॅच चालणार, प्रत्येकाला आपल्या प्रयत्नाने आपले जगातले स्थान बनवायचे असले. अगदी प्रामाणिक आस्तिकही मान्य करतात की, "स्वतःला मदत करणार्‍यालाच देव मदत करतो (God help them who help themselves) ! ... इ. इ. इ. सतत प्रयत्नांच्या अभावामुळे अयशस्वी होणे हे नाकर्तेपणाचे आणि अक्षम्य आहे असे मला वाटते. जरा टोकाची पण सर्वमान्य उदाहरणेच द्यायची तर असा इतिहास सांगता येईल की "मायक्रोसॉफ्ट" हा बिल गेटचा पहिला प्रयत्न नव्हता... ना "रिलायन्स" धिरुभाई अंबानीचा !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कवितानागेश गुरुवार, 09/04/2014 - 22:53
अपयशाचे कारन प्रत्येकवेळेस प्रयत्न कमी पडणं हेच नसतं. म्हणजे प्रयत्न करु नयेत, असं मला म्हणायचं नाहीये. (खरं तर मला काहीच म्हणाय्चं नाहीये! :) ) पण प्रत्येकानी महत्त्वाकांक्षीच असायला हवं असं मात्र मला वाटत नाही.

In reply to by कवितानागेश

महत्वाकांक्षी असावे की नसावे हा प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे... अगदी हक्क आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे येथे तो मुद्दाच नाही. "मला फारशी महत्वाकांक्षा नाही, मला फार मोठे काही करण्यात रस नाही" असे म्हणणार्‍या आणि कमी / नसलेल्या यशाला झाकण्यासाठी भ्रामक वचनांचा आधार न घेणार्‍या प्रामाणिक लोकांबद्दल मला प्रचंड आदर आहे. त्याविरुद्ध, अपयश अथवा अपेक्षेपेक्षा कमी यशाला झाकण्यासाठी भ्रामक कारणसंहिता वापरणे म्हणजे केवळ दुसर्‍यांचीच नाही तर स्वतःची दिशाभूल करणारा खोटेपणा आहे... आणि तो त्या व्यक्तीकरता आणि समाजाकरता घातक ठरतो. हा मुद्दा आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कवितानागेश Fri, 09/05/2014 - 07:28
सहसा 'यश' ही गोष्ट भौतिक परिमाणांमध्ये मोजली जाते आणि त्यासाठी 'महत्त्वाकाम्क्षा' असणं आवश्यक आहे असंही बिम्बवलं जातं. त्यात बरेच लोक विनाकारण स्पर्धा निर्माण होउन भरडले जातात. जर का 'यश', हे स्वतःचीच 'संपूर्ण' कौशल्य वापरण्यावर मोजलं गेलं, आणि त्यातून मिळणार्‍या आनंदाप्रमाणे मोजलं गेलं, तर तुम्ही लिहिताय ते सगळं पटतंय.. :)

In reply to by कवितानागेश

केवळ सहमतच नाही तर हा मुद्दा फार मह्त्वाचा आहे आणि म्हणूनच तो लेखातील विधान ४ च्या विश्लेष्णात खालीलप्रमाणे आला आहे... मात्र आपण दुसर्‍याची परिस्थिती पडताळून पाहत असताना वापरलेले सधनतेचे आणि यशाचे निकष आपले नसून त्या व्यक्तीचे असायला हवे; स्वतःबद्दल पडताळणी करायची असेल तेव्हाच स्वतःचे निकष वापरणे योग्य होईल; इतके तारतम्य ठेवणे जरूर आहे. कारण सधनतेची आणि यशाची व्याख्या माणसागणीक वेगळी असू शकते.

सुहास.. गुरुवार, 09/04/2014 - 22:12
मला ते फळ्यावर लिहिलेले सुविचार घंटा कधी आवडलेले नाही .... एक मात्र होत ...if it is very clean, means it was dirty somewhere ! असो .... अजुन एक ... ते काही चांगदेव पाटील टाईप लोक्स, जी टॉक ला स्टेटस टाकायचे , " दुचाकीची मळवटलेली मागची सीट म्हणजे स्वच्छ चारित्र्याच लक्षण " ...आम्ही च्यायला पुसुन ठेवायचो ;)

राजेश घासकडवी गुरुवार, 09/04/2014 - 22:27
मस्त लेख. अनेक प्रस्थापित सत्यं म्हणून वावरणारी विधानं गैरसमजातून आलेली असतात. अगदी मोजक्या, विशिष्ट परिस्थितीत ती लागू होतात. मात्र त्यांना मान सर्वसाधारण सत्याचा मिळतो. 'धट्टीकट्टी गरीबी' इतका गैरसमज तर दुसरा कुठचाच नाही. गरीब देशांत बालमृत्यूंचा दर श्रीमंत देशांपेक्षा कितीतरी पटींनी अधिक असतो. हे धट्टेकट्टेपणाचं नाही, तर हलाखीचं लक्षण आहे. 'मागच्या जन्मीचं फळ म्हणायचं झालं...' हे असंच हतबलता व्यक्त करणारं वाक्य.

सुबोध खरे गुरुवार, 09/04/2014 - 22:39
माझी हि एक वीट शेवटी न्याय नीती वगैरे हा आपल्या कल्पनेचा आणि संस्काराचा भाग असतो. पण प्रयत्नवादाला उत्तेजन देणे आवश्यक आहे दैववादाला नव्हे. एडिसन चे उदाहरण का देतात? १००० पेक्षा जास्त वेळा अपयशी ठरूनही शेवटी बनवण्यात तो यशस्वी झालाच ना? माझ्याकडे आलेले एक दैववादी रुग्ण मला म्हणाले. डॉक्टर जे माझ्या नशिबात असेल तेच होइल. नशिबात मृत्युयोग नसेल तर काहीही होणार नाही. मी त्यांना शांतपणे म्हणालो साहेब तुमच्या नशिबात मृत्यू योग नाही हे तुम्हाला माहित असेल तरीही हि समोर रेल्वे लाईन आहे हि आपण डोळे मिटून पार कराल काय? शेवटी दैववाद नव्हे तर दुर्दम्य आशावादच राष्ट्राला पुढे नेत असतो. याची उत्तम उदाहरणे जर्मनी किंवा जपान हि आहेत. दुसर्या महायुद्धात राख रांगोळी झालेले हे देश केवळ प्रयत्नवादाने केवढ्या उंचीवर पोहोचले आहेत. 'ठेविले अनंते तैसेची रहावे...चित्ती असो द्यावे समाधान' असे राहिले असते तर त्यांची गणना इथिओपिया पाकिस्तान सारख्या देशांबरोबर झाली असती.

पोटे गुरुवार, 09/04/2014 - 23:10
आणि एक लबाड वाक्य ! कर्मविपाकाचे फळ मिळते

पैसा गुरुवार, 09/04/2014 - 23:13
एकूण काय, बरीचशी चमकदार वाक्ये ही अर्धसत्ये असतात. आणि आपला मेंदू शाबूत ठेवून सदैव प्रयत्न करत राहिले पाहिजे! श्री पोटे, एका चांगल्या धाग्यावर पुन्हा एकदा हिंदू, औरंगझेब इ. विषय काढून धाग्याचा खरडफळा केल्याबद्दल धन्यवाद आणि पोटे यांच्या काड्यांना इंधन पुरवल्याबद्दल इतर मिपाकराचे झाईर कौतुक.

दशानन गुरुवार, 09/04/2014 - 23:19
"hope is a good thing, maybe the best of things, and no good thing ever dies." याच्या विरुद्धअर्थी आपले तत्त्वज्ञान असते हा माझा अनुभव आहे.

In reply to by दशानन

माझा अर्धाच मुद्दा तुमच्यापर्यंत पोचला आहे असे दिसते आहे. माझे म्हणणे... "hope is a good thing, maybe the best of things, and no good thing ever dies." इथे थांबत नाही. ते तेथेच थांबले तर, "असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी" इथेच त्याचा अर्थ संपेल. माझे म्हणणे जास्त चांगल्या प्रकारे असे सांगता येईल... "Dream hard; and work harder and smarter to make it a reality."

मराठे गुरुवार, 09/04/2014 - 23:26
भारताच्या स्वातंत्र्यानंतर समाजवादी विचारसरणीचा चांगलाच जोर होता. तेव्हाचे जुने चित्रपट पाहतानासुद्धा ही बाब वारंवार जाणवते (आठवा: श्री चारसोबीस .. मुनाफाखोर वगैरे शिव्या). त्यामुळे एकूणच श्रीमंत म्हणजे वाईट आणि गरीबच चांगले असा संदेश जनतेच्या गळी उतरवला जात होता. अगदी अमिताभच्या सिनेमापर्यंत ही परंपरा अखंडीत होती. त्याच विचारसरणीतून असली वाक्य मागच्या पिढीतील माणसं वापरत असावीत.

पोटे गुरुवार, 09/04/2014 - 23:26
अजुन एक लबाड वाक्य ! जींकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील. मेलास तर स्वर्गात जाशील.

विटेकर Fri, 09/05/2014 - 10:04
सत्य असत्याशी मन केले ग्वाही | मानियले नाही बहुमता || मला अगदी प्रामाणिकपणाने असे वाटते की,चारित्र्याचे स्थान आयुष्यात नेहमीच अत्यंत वरचे आहे. त्याशिवाय असणारे यश अंतोगतत्वः अपयशाच्या आणि दु:खाच्या खाईतच नेते ! असे नसेल तर कर्माचा सिद्धान्त खोटा आहे असे म्हणावे लागेल.न्यूटन ही खोटा ठरतो. वरील लेखात आणि सार्‍या प्रतिसादात अनेक शब्दांची आणि त्यातील अर्थछ्टांची बेमालूम सरमिसळ झाली आहे असे मला वाटले म्हणून काही विधाने टंकीत आहे, आपल्याला मान्य व्हावीत असा मुळीच आग्रह नाही. ( हल्ली मी असले आग्रह सोडून दिले आहेत , जेव्हा पटेल तेव्हा पटेल , आणि नाही पटले म्हणून तरी बिघडले कुठे ? सार्वत्रिक / त्रिकालाबाधित सत्य नाकारल्याने सत्याला कमीपणी येत नाही , लोक संपून जातात. Principles are like Lighthouse . If you don't listen to them , "you" break down and not the principle. सत्य परास्त नही होता|) # यश आणि सुखी असणे या दोन भिन्न गोष्टी आहेत , परस्पर संबंध असला तरीही ! यशस्वी मनुष्य सुखी असेलच असे नाही. # प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगेवेगेळी आहे. ढोबळमानाने पैसा,प्रतिष्ठा आणि अधिकार ( सत्ता) ही यशाची त्रिसूत्री मानली तरीही यश नेमके कशाला म्हणावे याचा गोंधळ आहेच ! कारण त्याचे परिमाण ( युनीट) व्यक्तिगणिक बदलत जाते. #मी कोठेही दैववाद / प्रयत्नवाद या वादात विधान केले नाही ! प्रयत्नवाद हा श्रेष्ठ्च आहे हे नि:संशय ! ज्याला बुद्धिनुसार कर्म आणि कर्मानुसार बुद्धी तसेच चार पुरुषार्थ या संकल्पना समजल्या आहेत, त्याचा दैववाद / प्रयत्नवाद असा गोंधळ होत नाही. # वैभव मिळवणे / श्रीमंत होणे यात काहीही गैर नाही अशीच माझी धारणा आहे . धर्म आणि मोक्षाच्या चाकोरीत संयत असलेला काम आणि अर्थ मला मान्यच आहे .. पण धर्माच्या कक्षेत राहूनच ! अधर्माने केलेली कोणतीही गोष्ट दु:खात नेणारच ! किंबहुना या चाकोरीत राहून काम - उपभोग आणि उदंड अर्थार्जन करावे म्हनून तर त्याला " पुरुषार्थ" ही संज्ञा दिली आहे ! महत्वकांक्षेशिवाय पुरुषार्थ शक्य आहे का ? पण ती राक्षसी असू नये म्हणून तर त्याला धर्माचे बंधन आहे. अर्थाच्या अभावाने गुन्हे तर प्रभावाने पापे घड्तात म्ह्णून त्यालाही धर्माचे बंधन घातले आहे. वैभवाचे वावडे नाही, अधर्माचे वावडे आहे. # ठेविले अनंते तैसेची रहावे...चित्ती असो द्यावे समाधान | हे अत्यंत उच्चकोटीची पारमार्थिक अवस्था आहे. ( च्यायला वादविवादाच्या नादात आपण पींडीला पाय लावतो आहे याहे ही भान रहात नाही लोकांना ! ) समजून घेण्याचा भाग आहे .. उदंड कर्तृत्व गाजविल्यावरही हे माझे नाही .. हे "त्याचे" आहे हा तो भाव आहे . राम कर्ता हा भाव आहे , अवघे करणे जगदिशाचे हा भाव आहे , आहे तितुके देवाचे हा तो भाव आहे .. इदं न ममं हा भाव आहे ! हे भगवंता , जे उत्तम / उदात्त / उन्नत घड्ते आहे त्यात माझे काहीही नाही ..हे सारे तुझेच आहे , तू दिलेल्या अवस्थेत मी सुखीच आहे. या यशाचे श्रेय माझे नाहीच ! सुखदु:ख समकृत्वा ..चित्ताचे समत्व / स्थितप्रज्ञता असा तो भाव आहे. जगातील सुखाची ती परमोच्च अवस्था आहे.. त्याच्या इतके सघन,अखंड,अविनाशी,पूर्ण सुख दुसरे नाही, हाच तो शेवटचा पुरुषार्थ - मोक्ष ! हे अनंत जन्माच्या प्रयत्नाने साध्य होते ते समाधान माणसाला निष़्क्रीय बनवील ? # बाकी औरंग्या भक्तांबद्दल काय बोलावे ? हाकलून दिले पाहिजे.. फक्त संस्थळावरुनच नव्हे तर महाराष्ट्रातून आणि भारतातून ! बाकी संमं सर्वधर्मसमभाव मानत असल्याने आमचाच प्रतिसाद उडवला जाईल. जयचंदाना अभयच मिळेल. अगर शिवा न होता तो सुन्न्त सबकी होती.. हे भीषण सत्य ज्यांना उमगले नाही त्यांना माझ्या कंठरवाने काय फरक पडणार आहे ? अस्तु ! माझे मुद्दे माझ्याजवळ , आपण जरुर आपलेही मत मांडावे, मी प्रतिवाद करीनच असे नाही, कारण This is something like sacred cow for me !

In reply to by विटेकर

सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! पण मला वाटते की तुम्ही विचारांची प्रचंड गल्लत करत आहात. मला अभिप्रेत नसलेल्या अनेक गोष्टी तुमच्या प्रतिसादात आहेत. त्यामुळे मी सद्या त्यावर टीप्पणी करत नाही. पण माझ्या लेखाचा आणि त्यावरच्या माझ्या प्रतिसादांचा सारांश सांगतो: प्रत्येकाला आपले ध्येय काय आहे हे ठरवण्याचा अधिकार आहे. ध्येय गाठण्यात अपयश आल्यास पुन्हा प्रयत्न न करता (किंवा अगदी पुन्हा प्रयत्न करतानाही) वरवर गोड वाटणार्‍या भ्रामक वचनांचा / कल्पनांचा आधार घेऊन सारवासारव करण्यात ती व्यक्ती स्वतःचे आणि पर्यायाने समाजाची दिशाभूल व नुकसान करत असते. शिवाय हा शुद्ध अप्रामाणिकपणा होतो. अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर ध्येय भौतीक असो अथवा अधिभौतीक असो, त्याला प्रामाणिकपणाचा पाया आवश्यक असतो... याला बहुतेक तुमची ना नसावी.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अरे हो. आणि एक महत्वाचा प्रश्न मी तुमच्या सर्वात पहिल्या प्रतिसादाच्या माझ्या प्रतिसादात विचारला होता, तो अजून अनुत्तरीतच आहे. मीच तो जरा अजून विशद करून सांगतो... माझ्या मते "सत्याचा केवळ ते सत्य आहे म्हणून (काही क्षुल्लक योगायोग वगळता) आपोआप विजय आजपर्यंत ना कधी झाला ना भविष्यात होईल. सत्याला असत्याशी झगडल्याशिवाय विजय मिळत नाही." हे मत मान्य असले तर मग माझ्या प्रश्नातल्या उदाहराणांमध्ये दिलेल्या घटनांची नीट संगती लागेल व जुन्या चुका सुधारून योग्य कृती करता येईल. नाहितर मग भ्रामक वचनांचा आधार घेऊन व्यक्ती/समाज स्वतःला परत (नविन परिस्थितीमुळे वेगळ्या दिसणार्‍या पण तरीही) गुलामगिरीच्याच रस्त्यावर वाटचाल सुरू करेल.

ऋषिकेश Fri, 09/05/2014 - 11:55
प्रत्येक कोट हा स्थल-काल-व्यक्ती व मुख्यतः प्रसंग सापेक्ष असतो इतके लक्षात घेऊन हे कोट्स एक ललित म्हणून ऐकावे नी सोडून द्यावे. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या भुमिकांत व प्रसंगात वेगवेगळा वागतो व त्याने तसेच वागावे. कोणताही सार्वकालीन नियम व/वा तत्त्वे (व/वा कोट्स) प्रत्येक माणूस प्रत्येक प्रसंगी पाळत नाही. विचार-आचारातील विरोधाभास असणे नी त्याची जाणीव झाल्यावर त्यात (दोन्हीत) बदल करत जाणे हीच तर जगण्यातील मजाय. तेव्हा व्यक्तीला कप्प्यात टाकणे टाळावे हेच योग्य. (छ्या प्रतिसाद काहीसा वाहवत गेलाय. पण जौदे टंकलाय तर टाकतोच. एक डाव मापी असावी) लेख आवडला व सहमती आहे हे वे सां न

In reply to by ऋषिकेश

प्रत्येक कोट हा स्थल-काल-व्यक्ती व मुख्यतः प्रसंग सापेक्ष असतो इतके लक्षात घेऊन हे कोट्स एक ललित म्हणून ऐकावे नी सोडून द्यावे. मुख्य मुद्दा हा आहे की "सोडून द्यावे" हेच होत नाही. आळसाने अथवा लाजेकाजेने अयशस्वी लोक अश्या वचनांच्या मागे लपतात व स्वतःचे समाधान करून घेतात आणि चलाख लोक त्या वचनांचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घेतात. आणि मुख्य मुद्दा हा की या सगळ्यात "कृतीची जबाबदारी घेणे (accountability)" ह्या तत्वाला हरताळ फासला जातो. त्यामुळे ही प्रवृत्ती वरवर वाटते त्यापेक्षा अनेक पटींनी धोकादायक आहे.

प्यारे१ Fri, 09/05/2014 - 14:17
>>> accountability सध्या हे चांगलंच अनुभवतोय. वरचा म्हणतो टीमवर्क आहे. मी म्हणतो वरच्यानं सांगितलं म्हणून केलं (२-३ महिने सहन करुन नंतर वरच्याच्या वरच्याला सांगून मोकळा झालो (मी पण त्यातच), सध्या पोस्टमार्टेम सुरु आहे) ज्यानं कामाला उशीर लावला तो पेपर टाकून बसलाय माझ्याकडून होत नाही म्हणून. वरचा एकाला बोलला म्हणून एकानं सगळ्यात वरच्याला मेल करुन सांगितलं की मला इथं नको दुसरीकडं बदली द्यावी. एकाला नेमकं काय चाललंय तेच कळत नाहीये. मज्जा!

In reply to by प्यारे१

तुमचे उदाहरण "अकाउंटेबिलिटी" आणि "टीम वर्क" या फार महत्वाच्या पण समजायला पाहिजे त्यांना (प्रबंधकांना) बर्‍याचदा नीट न समजलेल्या आणि म्हणून धोपट वापराने जबरदस्तीने दुरुपयोग केल्या जाणार्‍या संज्ञा / शब्द आहेत. व्यक्तीगत अकाउंटेबिलीटी नसली की काय गोंधळ होतो, त्याचा चलाख लोक कसा दुरुपयोग करू शकतात आणि शेवटी कामाचा कसा खेळखंडोबा होतो त्याचे उत्तम वर्णन खालील प्रसिद्ध गोष्टीत केलेले आहे (माझी फार आवडती गोष्ट) : There was an important job to be done and Everybody was sure that Somebody would do it. Anybody could have done it, but Nobody did it. Somebody got angry about that, because it was Everybody’s job. Everybody thought Anybody could do it, but Nobody realized that Everybody wouldn’t do it. It ended up that Everybody blamed Somebody when Nobody did what Anybody could have. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

टवाळ कार्टा Fri, 09/05/2014 - 14:45
There was an important job to be done and Everybody was sure that Somebody would do it. Anybody could have done it, but Nobody did it. Somebody got angry about that, because it was Everybody’s job. Everybody thought Anybody could do it, but Nobody realized that Everybody wouldn’t do it. It ended up that Everybody blamed Somebody when Nobody did what Anybody could have.
लय भारी :)

फक्त एका वाक्यात संपूर्ण लेख आणि सगळे प्रतिसाद निरुत्तर केलेत :
मला अगदी प्रामाणिकपणाने असे वाटते की,चारित्र्याचे स्थान आयुष्यात नेहमीच अत्यंत वरचे आहे. त्याशिवाय असणारे यश अंतोगतत्वः अपयशाच्या आणि दु:खाच्या खाईतच नेते
________________________ इक्कांनी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे लेखाची प्रेरणा, `प्रमोशन' या कथेवरचं डॉक्टर खर्‍यांच हे वाक्य आहे :
शेवटी काय माणूस चांगला असणे आणी आयुष्यात यशस्वी होणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही.
____________________________ आता कथेचाच संदर्भ घेऊन सगळी उकल कशी होते ते पाहाण्यासारखं आहे : १) मुळात प्रामाणिक माणसाला आपण अयशस्वी झालो असं कधीही वाटतं नाही. स्वतःला अपयशी समजणं हा इन्फिरिऑरिटी कॉप्लेक्स आहे आणि कंपॅरिजन हे त्याचं एकमेव कारण आहे. स्वतःशी प्रामाणिक असलेला, दुसर्‍याशी तुलना करुन स्वतःच्या यशाचं मोजमाप कधीही करत नाही. तो महत्वाकांक्षेला प्रामाणिकपणाशी तडजोडच करु देत नाही, त्यामुळे त्याची महत्वाकांक्षा सदैव त्याच्या काह्यात असते. ती त्याला कधीही ओवरपॉवर करु शकत नाही. आणि परिणामी, त्याला पश्चात्तापाची वेळ कधीही येत नाही. तो स्वतःच्या महत्वाकांक्षेपायी बायकोला पणाला लावायची बातच सोडा, कुणालाही कधीही वापरत नाही. नित्शेनं म्हटलंय : To use the other is the highest immorality. ___________________________ २) त्याचा शुद्ध हेतूच त्याला साथ देतो त्यामुळे परिणामांची तमा बाळगण्याचं कारणंच राहात नाही. जसा हेतू तशी कृती या न्यायनं त्यानं प्रत्येक प्रसंगात जवाबदारी सहज पेललेलीच असते. त्यामुळे कर्मविपाक, दैव वगैरे दिलासे त्याला लागत नाही. कामात अपयश येणं म्हणजे स्वतः अपयशी होणं अशी निर्बुद्ध कल्पनाच त्यानं केली नसल्यानं, तो परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेतो. स्वतःच चुकलं असेल तर दुरुस्त करतो, दुसरा आपल्यापेक्षा श्रेष्ठ असेल तर त्याच्या यशाचं कौतुक करतो. आणि दुसरा गैरमार्गानं यशस्वी झाला तर त्याला वैषम्य वाटण्याचा संबंधच येत नाही. तस्मात, त्याच्या लेखी, श्रीमंती किंवा गरीबी दैहिक किंवा मानसिक स्वास्थ्याशी रिलेट करुन, स्वतःच्या प्रामाणिकपणाला उजळ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. _____________________ ३) सरते शेवटी, प्रत्येक घटनेला अनंत फॅक्टर्स कारणीभूत आहेत ही उघड गोष्ट प्रामाणिक व्यक्तीला पूर्णपणे माहिती असते. त्यामुळे त्याला एखाद्या कृत्यातल्या अपयशाचा जसा विषाद नसतो तशी यशाची धुंदीही चढत नाही. त्याला फक्त एकच खात्री असते की आपल्या प्रामाणिकपणाचं स्वास्थ्य हे कोणत्याही लौकिक यशापयाशापेक्षा सदैव श्रेष्ठ आहे. आणि त्यासाठी त्याला कोणत्याही क्वोटची किंवा दिलासा देणार्‍या समर्थनाची यत्किंचितही गरज नसते. ______________________________ सरते शेवटी, `नेहमीच सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो'; याचा अर्थ लेखक समजतो तसा नाही. सत्य म्हणजे प्रामाणिकपणा. तो सदैव विजयी होतो कारण त्याचा विजय लौकिक यशावर अवलंबूनच नसतो. त्यामुळे लेखकानं निर्माण केलेली ही दुही : "मानसिक खरेपणा" आणि "ऐहीक यश" या दोन्हींची शक्य तेवढी "नैतीक सांगड" घालणे शक्य होईल. निरर्थक आहे. मानसिक खरेपणा हेच प्रामाणिकपणाचं दुसरं नांव आहे, त्याला पुन्हा नैतिकतेशी सांगड वगैरे घालावी लागत नाही आणि ऐहिक यशापयाशी त्याची तडजोडच होऊ शकत नाही. एका प्रामाणिकपणा पुढे बाकी सर्व गोष्टी व्यर्थ आहेत आणि हे समजलेला स्वतःला कधीही अपयशी मानत नाही. तस्मात, सत्याला जयापरायची क्षिती नसते. ते कायम विजयीच असतं

In reply to by संजय क्षीरसागर

वा, वा ! सर्जी, आपले धाग्यावर स्वागत आहे ! :) १) मुळात प्रामाणिक माणसाला आपण अयशस्वी झालो असं कधीही वाटतं नाही. २) त्याचा शुद्ध हेतूच त्याला साथ देतो त्यामुळे परिणामांची तमा बाळगण्याचं कारणंच राहात नाही. ३) सरते शेवटी, प्रत्येक घटनेला अनंत फॅक्टर्स कारणीभूत आहेत ही उघड गोष्ट प्रामाणिक व्यक्तीला पूर्णपणे माहिती असते... त्यामुळे त्याला एखाद्या कृत्यातल्या अपयशाचा जसा विषाद नसतो तशी यशाची धुंदीही चढत नाही. वरच्या विधानांत तुम्ही "प्रामाणिक माणूस" आणि "स्थितप्रज्ञ माणूस" या दोघांत प्रचंड गल्लत करत आहात. त्यातच वर हायलाईट केलेल्या भागात तुम्ही प्रामाणिक माणूस परिणामांबद्दल निष्काळजी (ज्याला कधी कधी आपण बेजबाबदार असेही म्हणू शकतो) असतो असाही दावा तुम्ही करताय, त्यात भर म्हणून... ३) सरते शेवटी, प्रत्येक घटनेला अनंत फॅक्टर्स कारणीभूत आहेत ही उघड गोष्ट प्रामाणिक व्यक्तीला पूर्णपणे माहिती असते... त्यामुळे त्याला एखाद्या कृत्यातल्या अपयशाचा जसा विषाद नसतो तशी यशाची धुंदीही चढत नाही. यातल्या हायलाईट केलेल्या भागामुळे "प्रामाणिक माणूस" आणि "सर्वज्ञानी माणूस" या दोघांत प्रचंड गल्लत करत आहात तुमचा प्रतिसाद वाचून एकच सांगावेसे वाटते : माझ्या अल्पमतीने लिहीलेल्या या लेखाचा मतितार्थ थोडक्यात आणि सहज समजेल अश्या सोप्या शब्दात याच लेखावरील या प्रतिसादात सांगितला आहे. तो तुम्ही वाचायची आवश्यकता आहे असे वाटते. लेख आणि प्रतिसादातले सर्व शब्द त्यांचे सर्वमान्य (शब्दकोषातले) अर्थ लक्षात ठेवून वापरले आहेत. नो प्रायव्हेट मिनिंग्ज अँड नो प्रायव्हेट लॉजिक, यु नो ! (तुम्हाला मधून मधून इंग्लिश लिहीणे आवडते, म्हणून हे शेवटचे वाक्य खास तुमच्यासाठी ! आप भी क्या याद करोंगे, सर्जी !) *** बाकी तुमचे नेहमीचे "प्रायव्हेट लॉजिक" आणि "दुसर्‍याने न सांगितलेले विचार स्वतः कल्पून त्याच्यावर थोपायची पद्धत" हे दोन्हीही आतापर्यंंत चागले माहित झाल्यामुळे तुमच्या इतर "इमॅजिन्ड/काँकॉक्टेड अ‍ॅलिगेशन्स" कडे दुर्लक्ष करत आहे... आण्भवाचं श्यान्पन, दुसरं काय ? :) . *** (मात्र, हा माझ्या धाग्याचा टीआरपी वाढविण्याचा तुमचा छुपा प्रयत्न आहे की काय ? आणि तसे असल्यास त्याबद्दल धन्यवाद द्यावे काय ? असे विचार मात्र जरूर मनात येउन गेले आहेत, हे नम्रपणे नमूद करत आहे :) =)) )

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ध्येय भौतीक असो अथवा अधिभौतीक असो, त्याला प्रामाणिकपणाचा पाया आवश्यक असतो.
यावर दुमत कुठेयं? मतभेद इथे आहे :
"सत्याचा केवळ ते सत्य आहे म्हणून (काही क्षुल्लक योगायोग वगळता) आपोआप विजय आजपर्यंत ना कधी झाला ना भविष्यात होईल. सत्याला असत्याशी झगडल्याशिवाय विजय मिळत नाही."
तुमच्या लेखी सत्याला (म्हणजे प्रामाणिकापणाला) असत्याशी (अप्रामाणिकपणाशी) झगडा करुन `विजय' मिळवावा लागतो. आणि मी म्हणतो, प्रामाणिक माणसाला अप्रमाणिकतेशी झगडा करण्याची आवश्यकताच नाही. अप्राणिक माणूस स्वतःच्या मनातल्या अंतर्द्वंदामुळे (सुरुवातीपासून आणि) नेहमी, पराभूतच असतो. मग लौकीकार्थानं तो कितीही यशस्वी असो आणि दुनियेला वरुन काहीही दाखवो. आणि प्रामाणिकपणा इतका सर्वोच्च आहे की त्याला अप्रामाणिकतेचा पराभव करण्याची गरजच नसते, मग लौकिकार्थानं तो कितीही अपयशी असो. _________________________________ "सत्याचा केवळ ते सत्य आहे म्हणून (काही क्षुल्लक योगायोग वगळता) आपोआप विजय आजपर्यंत ना कधी झाला ना भविष्यात होईल...." सत्य (म्हणजे प्रामाणिकपणा) `योगायोगानं विजयी' होत नाही. प्रामाणिक असणं हाच विजय आहे. तो स्वत्वाचा इतका मोठा गौरव आहे की अशी व्यक्ती अंगचोरपणा किंवा लौकिक यशापयश इतक्या शुल्लक गोष्टींचा कधीही विचार करत नाही. __________________________ लौकिकात काहीही करुन यशस्वी झालं पाहिजे या महत्वाकांक्षेपायी (जी निवाळ इन्फिरिऑरिटी काँप्लेक्सचा, पाश्चिमात्यांशी तुलना केल्याचा परिणाम आहे), भारताची मानसिकताच भ्रष्ट झालीये. भारतीय मानसिकतेनं स्वतःचा प्रामाणिकपणा गमावलायं. प्रामाणिकपणा, आपल्याच मौलिक विचारधारेशी फारकत घेऊन येत नाही तर, प्रामाणिकपणा हा सदैव विजयी आहे या नि:संशय विश्वासातून येतो. सत्याचा विजय योगायोगानं कधीही होत नाही, असत्य कायम पराभूत आहे आणि असत्याच्या पराभूत असण्यातच सत्याचा विजय आहे. त्यासाठी सत्याला, असत्याशी झगडण्याची आवश्यकताच नाही! (संपादित)

In reply to by संजय क्षीरसागर

भाग १: "सत्याचा केवळ ते सत्य आहे म्हणून (काही क्षुल्लक योगायोग वगळता) आपोआप विजय आजपर्यंत ना कधी झाला ना भविष्यात होईल...." हे मान्य नाही तर मग मी विटेकरांच्या पहिल्या प्रतिसादाच्या प्रतिसादात जो प्रश्न विचारला आहे त्याचे "प्रामाणिक, लॉजीकल, सरळ-सरळ, मुख्य मुद्द्याला बगल न देता आणि उगाच नको त्या प्रायव्हेट लॉजिक वापरलेल्या विधानांचा वापर करून विपूल लेखन न करता" उत्तर द्या... मग पुढे बोलू. अन्यथा तुम्ही केवळ आमची करमणूक करता आहात, असे समजले जाईल. बर्याचदा अडचणींचे वाटणारे मुद्दे तुम्हाला दिसेनासे होतात (याला "सोईस्कर अंधत्व" किंवा "कन्व्ह्नियंट ब्लाइंडनेस" असे म्हणतात) आणि नसलेले मुद्दे दिसतात (याला "दिशाभूल करणे" किंवा "डायव्हर्शनरी टॅक्टीक्स" असे म्हणतात). याला उपाय म्हणून ("प्रिव्हेन्शन इझ बेटर दॅन क्युअर") तो प्रश्न तुमच्या सोईकरिता खाली परत देत आहे... हजारो वर्षांची गुलामगिरीची प्रथा आणि शेकडो वर्षांचा वसाहतवाद या दोन गोष्टी "सत्याचा असत्यावर विजय" होता काय हे सांगा, मग पुढे बोलू... ज्याना हा प्रश्न विचारला होता त्यानी या प्रश्नाचे उत्तर द्यायचे टाळून निष्कारण धर्म / अध्यात्म / इ मध्ये आणून सरळ वस्तूस्थितीवर आधारलेल्या या मूळ प्रश्नालाच बगल दिली होती. तरीसुद्धा तुम्हाला त्यात बरेच काही दिसले आणि तुम्ही त्यांत सद्य लेखात अध्याहृत नसलेल्या अनेक गोष्टींची भर टाकून एक लेखवजा प्रतिसाद लिहीला आहे. या प्रश्नाच्या उत्तरात त्याची पुनरावृत्ती होणार नाही अशी "होप अगेन्स्ट होप" अपेक्षा आहे. ======================= भाग २: आता तुम्हाला याच विषयावर अजून एक खास प्रश्न... जर "सत्याचा नेहमीच आपोआप विजय होतो आणि त्यासाठी संघर्षाची गरज नाही" हे सत्य आहे, तर "तुम्ही नेहमी जी अनेक वैश्विक आणि अढळ सत्ये सांगत असता" त्यासंबधात... अ) तुमची सत्ये दुसर्‍यांना समजावून सांगायला; "ती सत्ये ठासून-ठासून सांगणारे, सर्वसामान्य लेखक/प्रतिसादक लिहीतात त्यापेक्षा जास्त संख्येने आणि जास्त मोठे लेख/प्रतिसाद लिहायची" गरज तुम्हाला का वाटते * ? हा तुम्हाला पटलेल्या सत्याच्या बाजूने तुम्ही केलेला संघर्ष नाही का ? आणि इतके करून सुद्धा... आ) बहुतेक वेळेला ती सत्ये बहुसंख्य लोकांना अमान्य का असतात ? सत्याचा तर आपोआप विजय व्हायला पाहिजे नाही का ? या प्रश्नाचेही धर्म / अध्यात्म / इत्यादींना मध्ये न आणता "हे मी म्हणतो आहे म्हणून खरेच आहे" या धाटणीत नसलेले, सरळसरळ, वस्तूस्थितीवर आधारलेले लॉजिकल उत्तर अपेक्षित आहे, हेवेसांन. ...... * : इथे तुमच्या लेख/प्रतिसाद लिहीण्यावर काहीच आक्षेप नाही, तो तुमचा मानवी अधिकार आम्हाला पूर्ण मान्य आहे. पण जी गोष्ट आपोआप होते त्याकरिता इतका आटापिटा करण्याचे जे कारण आहे ते अपेक्षित आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आणि तो तुमच्या लेखातून आणि प्रतिसादातूनच उचललायं; त्या अनुषंगानं चर्चा झाली तर तिला काही अर्थ आहे. खालच्या प्रतिसादात मी तुमचा आणि माझा (मूळ मुद्दा) परत उधृत केलायं, इंटरेस्ट असेल तर पाहा. (संपादित)

In reply to by संजय क्षीरसागर

तुमच्या इकडे बघा, तिकडे बघा या टोलवाटोलवीत रस नाही. प्रश्न (भाग १ आणि भाग २) सरळ सोपे प्रश्न आहेत... त्यांना सरळ सरळ उत्तरे देवू शकलात तर बघा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

१) गुलामगिरी, वसाहतवाद यांचा व्यक्तिगत प्रामाणिकपणाशी काहीही संबध नाही. २) सत्य (किंवा प्रामाणिकपणा) सदाविजयी आहे याचा अर्थ असत्य (अप्रामाणिकपणा), व्यक्तीच्या मनात अंतर्द्वंद्व निर्माण करतो. त्या अंतर्द्वद्वानं ती व्यक्ती लौकिकात कितीही यशस्वी झाली तरी स्वतःच्या मनासमोर कायम लज्जित राहाते आणि त्या अर्थानं ती पराभूत होते. थोडक्यात सत्याला असत्याशी सामना करायला लागत नाही कारण प्रामाणिक व्यक्ती अशा द्वंद्वापासून सदैव मुक्त असते. तुमच्या लेखी `सत्याचा आपोआप विजय होतो' म्हणजे आकाशातून अचानक बुलेट येऊन खलनायक मरतो इतका बाळबोध आहे. त्यामुळे तुमची प्रामाणिकपणाची व्याख्या फार ढोबळ आहे (खरं तर, तुमच्याकडे व्याख्याच नाही). `सत्य कायम विजयी आहे' हे वाक्य प्रामाणिकपणाच्या महत्तेविषयी आहे. आणि तुम्ही (काय, इतर कुणीही) त्याचा प्रतिवाद करु शकत नाही, यातच प्रामाणिकपणाचा विजय आहे. (संपादित)

In reply to by संजय क्षीरसागर

अपेक्षेप्रमाणे तुमची उत्तरे भरकटलेली आहेत... प्रश्नांत तसे करू नये असा उल्लेख करूनही :( भाग १: (तुमचे उत्तर) पहिला प्रश्न परत वाचावा. तो सत्याच्या विजयाबाबत आहे... भाग २: (तुमचे उत्तर) उत्तराच्या जागी मला तुमचे प्रायव्हेट लॉजीक नको. कोणाच्याच प्रायव्हेट लॉजिकवर जग चालत नाही... विशेषतः तुम्ही सांगत असलेल्या. स्वप्नरंजन फक्त स्वतःच्या स्वप्नरंजनात स्वतःला गुरफटून घेण्यास उपयोगी पडते. वस्तुस्थितीचे डोळे उघडून अवलोकन केल्याशिवाय आणि त्याचा शास्त्रबद्ध अर्थ लावण्याचा प्रयत्न (याला लॉजिकल अनॅलिसिस असेही म्हणतात) केल्यशिवाय सत्य दिसत नाही. असे पहिल्यांदाच केले तर बरेच धक्कादायक सत्य पुढे येते. जरूर करून पहा... खूप काही ज्ञान मिळते असा अनुभव आहे. नंतरही सतत असे केल्यासही बराच फायदा होतो. अर्थात, गच्च डोळे मिटून अंतर्मनात बसण्याच्या लोकशाही अधिकाराबद्दलही आम्हाला खूप आदर आहेच. मला काय म्हणायचयं ते मी स्पष्ट सांगत आहे... आजूबाजूला डोळे उघडे ठेउन "सत्य परिस्थिती बघा आणि बोला" असेच म्हणतोय मी" ! त्यामुळे तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. स्वतःच सोईची कल्पना करून मला काय म्हणायचे ते विकृत करून सांगणे सोडले तर बरे. मला काय म्हणायचे ते नीट सांगायला मी समर्थ आहे, ते इतर अनेकांना समजले आहे. पण ते तुम्हाला सोईचे नाही असेच दिसते आहे कारण प्रश्नांची उत्तरे द्यायला प्रथम टाळाटाळ केलीत आणि आता फक्त टोलवाटोलवी केली आहे. त्यामुळे तुम्ही न दिलेल्या उत्तरांचे खंडन करण्यात मला रस नाही. आशा नाही, पण तरीसुद्धा... तुम्हाला सगळ्यांना समजेल अशी उत्तरे कशी द्यावी याकरिता मदत करतो आणि "होप अगेन्स्ट होप" सरळ व प्रामाणिक उत्तरांची अपेक्षा करतो. ==========

उत्तरांचा फॉर्मॅट

भाग १: येथे उत्तर लिहा.> भाग २: अ) प्रथम सहमत की असहमत हे सांगा. नंतर तुमच्या निवडलेल्या पर्यायाचे (मनाचे बोल आणि प्रायव्हेट लॉजिक वगळून) समर्थन करा.> अ) प्रथम सहमत की असहमत हे सांगा. नंतर तुमच्या निवडलेल्या पर्यायाचे (मनाचे बोल आणि प्रायव्हेट लॉजिक वगळून) समर्थन करा.> सूचना: १. अँगल्ड ब्रॅकेट्सच्या जागी तुमची उत्तरे अपेक्षित आहेत. २. फक्त मुद्द्याना धरून लिहीणे अत्यंत महत्वाचे आहे... कठीण आहे पण प्रयत्नाने जमते. ३. फक्त संसदिय भाषा वापरा. काही शब्द केलेल्या वाद-प्रतिवादाचे वजन कमी करतात. ४. फक्त तुमचे स्वतःचे मत अपेक्षित आहे. इतरांची मते (यात माझेही मत आलेच) सांगण्यासाठी इतर समर्थ आहेत. ५. प्रश्न फार सरळ आणि सोपे आहेत. उत्तरेही सरळ आणि सोपी अशीच अपेक्षित आहेत... कारण आम्ही काही फार पोचलेले ज्ञानी नाही. तेव्हा सामान्य व्यवहारी लोकांना समजेल अशी उत्तरे अपेक्षित आहेत. ५. "आपल्याला एखादी गोष्ट माहित नाही / आपले चुकले आहे" हे समजणे ही ज्ञानाची / चूक सुधारण्याची पहिली पायरी असते. या जगात सर्वज्ञानी असे कोणीच नाही (त्यांत मी आणि तुम्ही दोघेही आहोतच). तेव्हा ही पहिली पायरी प्रत्येकाला वारंवार चढावीच लागते. ही पायरी उघड्या डोळ्याने पाहून ती चढणे हे सर्व ज्ञानांचे मूलभूत ज्ञान आहे. ========= फॉर्मॅट जरा मोठा झाला. पण त्याचा हेतू उत्तरे सरळ, सोपी आणि प्रामाणिक करण्याचा आहे. उत्तरांची वाट पहात आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अरेच्च्या... अँगल्ड ब्रॅकेट्स टाकल्यास त्यातला मजकूर मिपाप्रणाली कोड समजून अदृश्य करते हे माहित असून सुद्धा अँगल्ड ब्रॅकेट्समध्ये मजकूर टाकण्याची चूक झालीच ! बघा अशी चूक होतेच मर्त्य मानवाच्या हातून. पण ती मान्य करून सुधारणे आणि पुढे ती परत परत करणार नाही असे ठरवणे हेच प्रगतीचे लक्षण आहे. तर वर नीट न दिसणारा फॉर्मॅट खाली नीट दिसेल असा देत आहे. त्यात अँगल्ड ब्रॅकेट्सऐवजी साध्या ब्रॅकेट्स टाकल्या आहेत याची कृपया नोंद घ्यावी..

उत्तरांचा फॉर्मॅट (सुधारित)

भाग १: (उत्तर) भाग २: अ) (प्रथम सहमत आहे / नाही यापैकी मान्य असलेला पर्याय नोंदवावा आणि मग त्या पर्यायाचे थोडक्यात मर्त्य मानवांना समजेल असे साध्या शब्दात समर्थन द्यावे.) आ) (प्रथम सहमत आहे / नाही यापैकी मान्य असलेला पर्याय नोंदवावा आणि मग त्या पर्यायाचे थोडक्यात मर्त्य मानवांना समजेल असे साध्या शब्दात समर्थन द्यावे.) सूचना वर दिल्या आहेतच, फक्त त्यांत अँगल्ड ब्रॅकेट्सऐवजी साध्या साध्या ब्रॅकेट्स असे वाचावे. तसदीबद्दल क्षमस्व.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तुमच्या लेखाचा सारांश असा आहे :
कारण अपयश मागे सारून सतत स्वतःच्या बळावर प्रामाणिक प्रयत्न करून सधन व सुखी होण्याचा प्रयत्न करायला उत्साहीत करण्याऐवजी अशी वाक्ये अपयशाचे भ्रामक समर्थन करत समाजाला पंगू करण्याचे काम करत असतात
आणि (पुढे स्पष्टीकरण देतांना) प्रतिसादात, तुम्ही म्हटलंय :
अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर ध्येय भौतीक असो अथवा अधिभौतीक असो, त्याला प्रामाणिकपणाचा पाया आवश्यक असतो
तुम्हाला `प्रामाणिकपणा' म्हणजे काय याची नक्की कल्पनाच नसल्यानं, तुमच्या लेखात कमालीचा वैचारिक गोंधळ झालायं. प्रामाणिकपणाला इंग्रजीत Integrity असं म्हटलंय, कारण इंटेग्रिटी इंटीग्रेटस अ पर्सन! प्रामाणिकाता व्यक्तीला एकसंध करते. प्रामाणिक व्यक्ती स्वतःबद्दल इतकी निर्धास्त असते की तुम्ही लेखात लिहीलेल्या कोणत्याही वाक्याची तिला गरज नसते. मी आतापर्यंत हेच सांगतोयं. आणि तुम्ही स्वतःच्याच प्रतिसादाविरुद्ध लिहितायं! थोडक्यात, प्रामाणिक व्यक्ती (तुम्ही लेखात म्हटल्याप्रमाणे) नाऊमेद होते ही तुमची केवळ व्यक्तिगत आणि निराधार कल्पना आहे. ________________________ आणि मजा म्हणजे, ज्या `समाजाला पंगू करण्याचे काम करणार्‍या मानसिकतेबद्दल' तुम्ही लिहीलंय, तिचं कारण ती वाक्यं नसून मोठ्याप्रमाणावर बोकाळलेला (व्यक्तिगत) अप्रामाणिकपणाच आहे! थोडक्यात, भारतीय समाजात बोकाळलेला भ्रष्टाचार हे त्याच्या निंद्य होण्याचं उघड कारण आहे. आणि तुम्ही ते (तुम्हालाच नीट अर्थ न कळलेल्या) वाक्यांवर थोपतायं. भ्रष्टाचार हा इन्फिरिऑरिटी काँप्लेक्सचा परिणाम आहे आणि तो ऐहिक सुखाच्या तुलनेमुळे होतो ही उघड गोष्ट आहे. प्रामाणिक व्यक्ती अशा मानसिकतेपासून मुक्त असते. समाज हे व्यक्तिसमूहाचं केवळ नांव आहे. तस्मात, व्यक्ती जर प्रामाणिक झाली तर समाज बदलेल. यापेक्षा सोप्या शब्दात मी लिहू शकत नाही. (संपादित)

In reply to by संजय क्षीरसागर

दिनेश सायगल Sun, 09/07/2014 - 17:57
अ) सत्य म्हणजे काय? आणि असत्य म्हणजे काय? तुम्ही जे म्हणता तेच प्रत्येकाचं सत्य असेल का? रामायण ही कथा आहे म्हटलं तरी रामाचं सत्य आणि रावणाचं सत्य एकच असेल का? म्या पामराला समजेल अशा मराठी भाषेत उत्तर द्या. ब)
प्रामाणिक व्यक्ती स्वतःबद्दल इतकी निर्धास्त असते की तुम्ही लेखात लिहीलेल्या कोणत्याही वाक्याची तिला गरज नसते. मी आतापर्यंत हेच सांगतोयं. आणि तुम्ही स्वतःच्याच प्रतिसादाविरुद्ध लिहितायं! हा लेखनातला अंतर्विरोध, लेखन निरुपयोगी ठरवतो.
असं तुम्ही म्हणताय. पण प्रामाणिक असून नाउमेद झालेले, आणि व्यवस्थेचा बळी ठरून आत्महत्या केलेल कित्येकजण मला माहिती आहेत. ते तुमच्या मते यशस्वी होते का? क)
भ्रष्टाचार हा इन्फिरिऑरिटी काँप्लेक्सचा परिणाम आहे आणि तो ऐहिक सुखाच्या तुलनेमुळे होतो ही उघड गोष्ट आहे. प्रामाणिक व्यक्ती अशा मानसिकतेपासून मुक्त असते.
नक्की का? कित्येक राजकारणी जे वैयक्तिक रीत्या अत्यंत स्वच्छ चारित्र्याचे असतात ते पक्षाचा फायदा, पक्षासाठी पैसे गोळा करने अशा कारणांनी उद्योगपतींकडून देणग्या घेतात आणि मग त्याना काही ना काही बदल्यात द्यावेच लागते. यात इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स कुठे आला? शिवाय तो राजकारणी तर वैयक्तिक आयुष्यात अत्यंत प्रामाणिक आहे. मग आता? केवळ कुतुहल म्हणून विचारत आहे. तुम्ही सगळं सोपं करून सांगता असं तुमच्या पानावर लिहिलेलं पाहिलं. शक्य असल्यास या शंकांचे उत्तर देऊन उपकार करावेत.

In reply to by दिनेश सायगल

अ) सत्य म्हणजे काय? आणि असत्य म्हणजे काय? तुम्ही जे म्हणता तेच प्रत्येकाचं सत्य असेल का? रामायण ही कथा आहे म्हटलं तरी रामाचं सत्य आणि रावणाचं सत्य एकच असेल का?
पहिली गोष्ट, सत्याचा आध्यात्मिक अर्थ बाजूला ठेवू कारण तो चर्चेचा विषय नाही. आणि सत्याच्या प्रचलित अर्थानं विषय पुढे नेऊ. सत्य म्हणजे प्रामाणिकपणा (इक्कानी म्हटलंय तो `मनाचा खरेपणा'). प्रामाणिकपणा हा गुण आहे त्यामुळे तो व्यक्तिपरत्वे बदलत नाही. थोडक्यात, प्रामाणिकपणा महत्त्वाचायं आणि तो सर्वांसाठी एकच आहे. `जे आत तेच बाहेर' ही प्रामाणिकतेची कसोटी आहे. प्रामाणिकपणात नैतिकता अंगभूतच आहे त्यामुळे प्रामाणिक व्यक्ती आपसूक नैतिक असते.
ब) प्रामाणिक व्यक्ती स्वतःबद्दल इतकी निर्धास्त असते की तुम्ही लेखात लिहीलेल्या कोणत्याही वाक्याची तिला गरज नसते. पण प्रामाणिक असून नाउमेद झालेले, आणि व्यवस्थेचा बळी ठरून आत्महत्या केलेल कित्येकजण मला माहिती आहेत. ते तुमच्या मते यशस्वी होते का?
तुमच्या निरिक्षणाशी मी सहमत आहे. तरी देखिल आत्महत्त्यामागची कारणमिमांसा लक्षात घेण्याजोगी आहे. मी आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, प्रामाणिकता व्यक्तीला एकसंध करते आणि ही एकसंधता जर कायम राहिली तर व्यक्ती नाऊमेद होणं असंभव आहे. जीवनातलं अपयश म्हणजे `आपण अपयशी ठरलो' असं जेव्हा एखाद्याला वाटतं तेव्हा तो स्वतःपासून विभक्त होतो आणि त्यामुळे स्वतःला संपवण्याचा विचार करतो. थोडक्यात, प्रामाणिक व्यक्तीचा गैरसमज तिला आत्महत्त्येसाठी उद्युक्त करतो, प्रामाणिकपणा नाही. अशा व्यक्तीचा गैरसमज दूर झाला तर ती नाऊमेद होणं अशक्य आहे. दोष विचारसरणीचा आहे, प्रमाणिकपणाचा नाही.
क) भ्रष्टाचार हा इन्फिरिऑरिटी काँप्लेक्सचा परिणाम आहे आणि तो ऐहिक सुखाच्या तुलनेमुळे होतो ही उघड गोष्ट आहे. प्रामाणिक व्यक्ती अशा मानसिकतेपासून मुक्त असते. नक्की का? कित्येक राजकारणी जे वैयक्तिक रीत्या अत्यंत स्वच्छ चारित्र्याचे असतात ते पक्षाचा फायदा, पक्षासाठी पैसे गोळा करने अशा कारणांनी उद्योगपतींकडून देणग्या घेतात आणि मग त्याना काही ना काही बदल्यात द्यावेच लागते. यात इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स कुठे आला? शिवाय तो राजकारणी तर वैयक्तिक आयुष्यात अत्यंत प्रामाणिक आहे. मग आता?
मुळात दुसर्‍यावर सत्ता गाजवण्याची वृत्तीच इन्फिरिऑरिटी काँप्लेक्सचा परिणाम आहे. थोडक्यात, स्वतःला सिद्ध करण्यासाठी राजकारण्यांना जनतेच्या शिक्कामोर्तबाची (नितांत) गरज असते. त्यामुळे (जवळजवळ) सर्व राजकारणी कमालीच्या न्यूनगंडानं पछाडलेले असतात. कधी पराभूत राजकारणी पाहिला तर तो हवा गेलेल्या टायरसारखा बिनकामाचा झालेला असतो. त्याची सगळी उर्जा जनमतावर अवलंबून असते आणि जनतेनं पराभूत केल्यावर त्याला लोकात मिसळायची देखिल शरम वाटू लागते. लाखात एखादी व्यक्ती राजकारण, जनतेची सेवा या प्रामाणिक हेतूनं अंगिकारते. अशा व्यक्तीला जनता आपण होऊन मदत करते, त्याला कुणाकडे याचना करावी लागत नाही. ज्याला अशी याचना करावी लागते तो फक्त पक्षाच्या नांवाखाली स्वतःचाच स्वार्थ साधण्याचा अप्रामाणिकपणा करत असतो. स्वच्छ चारित्र्याच्या एकाही राजकारण्याला कधीही खोटेपणा करावा लागत नाही. थोडक्यात, ज्याचा हेतू प्रामाणिक आहे त्यानं तत्त्वाशी तडजोड करण्याचा प्रश्नच येत नाही कारण जनहिताच्या त्याच्या (मूळ) प्रामाणिक हेतूतच, त्याच्या सर्व तत्वाचीं एकरुपता झालेली असते. असा प्रामाणिक राजकारणी कायम निर्धास्त असतो कारण त्याला नेतृत्व न देण्यात जनतेचाच तोटा असतो. त्यामुळे, यदाकदाचित तो पराभूत झाला तरी त्याला जनतेची सेवा करण्याची एक संधी हुकली यापलिकडे खेद होण्याची शक्यता नसते.

In reply to by संजय क्षीरसागर

दिनेश सायगल Mon, 09/08/2014 - 12:49
चर्चेला वळण वगैरे लावणारा मी नाही! खरं सांगायचं तर तुम्ही आधीपासून जे सांगताय तेच परत सांगितलं आणि माझ्या शंका अजिबात दूर झालेल्या नाहीत. प्रामाणिक माणूस नाउमेद होणार नाही, सगले राजकारणी न्यूनगंडाने पछाडलेले असतात इ. गोष्टी अजिबात पटल्या नाहीत. पण असो. याहून जास्त उत्तरे इथे मिळतील असं वाटत नाही. त्यामुळे धन्यवाद असं म्हणतो आणि आपली रजा घेतो. सत्य हे नेहमी एकच असतं याबद्दल मात्र थोडे अधिक लिहीत आहे. इथल्या चर्चेतून काही उत्तरे मिळाल्यास उत्तर देणार्‍याला धन्यवाद!
सत्य म्हणजे प्रामाणिकपणा (इक्कानी म्हटलंय तो `मनाचा खरेपणा'). प्रामाणिकपणा हा गुण आहे त्यामुळे तो व्यक्तिपरत्वे बदलत नाही. थोडक्यात, प्रामाणिकपणा महत्त्वाचायं आणि तो सर्वांसाठी एकच आहे.
यावर विचार करण्यासाठी मी वर राम आणि रावणाचं उदाहरण दिलं. आता आर्य आणि अनार्य यांचं उदाहरण पाहू. (इथे मुद्दामच हिंदू राजे विरुद्ध मुस्लिम आक्रमक हे उदाहरण घेतले नाही, कारण त्याला इतर फाटे फुटू शकतात.) आर्यांच्या दृष्टीने अनार्य हे यज्ञाचा विध्वंस करणारे, म्हणून त्यांना नामशेष केलं पाहिजे. तर अनार्यांच्या दृष्टीने आर्य हे आक्रमक, त्यांचे किल्ले पाडणारे. दोघेही आपल्या जागी बरोबर आहेत. दोघेही प्रमाणिकपणे आपल्या सत्याच्या रक्षणासाठी संघर्ष करत आहेत. आणि दोघांच्या दृष्टीने दुसरा असत्याची बाजू घेत आहे. दोघांनाही आपण अप्रामाणिक म्हणू शकणार नाही. आता या घटनेत सत्य एक दिसतं का? तर नाही. इथे सत्य विभागलेलं दिसतं. इथे तुम्ही कोणाला प्रामाणिक्/सत्याच्या बाजूने म्हणणार? मानवी स्वभावाचा आणि व्यवहाराचा जिथे प्रश्न येतो तिथे अन्यत्र विटेकर बुवांनी म्हटल्याप्रमाणे "सूर्य पूर्वेला उगवतो" यासारखं २+२=४ असं उत्तर दरवेळी देता येत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

माझ्या दोन साध्या प्रश्नांची सरळ उत्तरे न देता इतर जंजाळाने भरलेले प्रतिसाद देतात यावरुन तुम्हाला माझं पटलेलं आहे पण ते मान्य करणं तुम्हाला जमत नाही (असतो एकेकाचा स्वभाव :) ) हे सुस्पष्ट दिसत आहे. साधी सरळ गोष्ट नाकारायला किंवा नसलेली गोष्ट आहे असे सांगायला नेहमीच मैलभर लांबीच्या स्पष्टीकरणाची आणि मुद्दा भरकटवायची गरज पडते. मात्र त्यात आपण स्वतःच उघडे पडतो आहोत इकडे दुर्लक्ष होते ! सत्य मूळ स्वरूपात स्विकारायला खूप मानसिक ताकद लागते हे म्हणतात ते यामुळेच !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माझे प्रतिसाद जर काँप्लेकेटेड आहेत असं वाटतंय तर तुमच्या प्रतिसादावरचा सायगलांचा प्रतिसाद पाहा. मी चर्चा कुठे भरकवटतोयं? तुमच्याच लेखाचा सारांश आणि तुमच्याच स्पष्टीकरणातला अंतर्विरोध दाखवलायं. तुम्ही फक्त (तुमच्या लेखी) `प्रामाणिकपणा' म्हणजे काय ते लिहा कारण तोच चर्चेचा केंद्रबिंदू आहे. एकदा तुम्ही स्वतःच्या विचारांना सुस्पष्टपणे मांडायला लागलात की तुमच्या लक्षात येईल, प्रामाणिकपणाला `नैतिकतेशी सांगड' वगैरे घालावीच लागत नाही कारण प्रामाणिकपणाचं दुसरं नांव नैतिकता आहे. आणि ज्याला तुम्ही सत्य म्हणतायं (आणि जे संघर्षाशिवाय विजयी होऊ शकत नाही असं तुम्हाला वाटतंय), तो प्रामाणिकपणाचा उपमर्द आहे, कारण सत्य आणि प्रामाणिकपणा यात भेद नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

बर मग मी माझे प्रश्न तुमच्यासाठी तुमच्या शबदांत अ़जूssssन सोपे करतो: भाग १: सत्य आणि प्रामाणिकपणा एक आहेत हे तुम्हीच वर लिहीले आहे. शिवाय तुमच्या म्हणण्याप्रमाणे या दोन्हींचा आपोआप विजय नक्की असतो, त्याकरता काही करणे आवश्यक नसते, हे वारंवार लिहीत आला आहात. तर मग... गुलामीच्या आणि वसाहतवादाच्या इतिहासात जे घडले ते सगळे सत्य/प्रामाणिकपणाचा विजय होता का ? (हो की नाही असे उत्तर अपेक्षित आहे) आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे गुलाम/गुलाम राष्ट्रांकडे सत्य/खरेपणाचे मानसिक समाधान होते तर त्यांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष का केले ? भाग २: हा भाग मात्र तसाच्या तसाच कायम आहे. कारण याला उत्तर देण्याऐवजी त्याच्याकडे मुद्दाम प्रचंड दुर्लक्ष करत आहात इकडे खास लक्ष वेधत आहे. किंबहुना, सर्वप्रथम या प्रश्नाचे उत्तर द्या. पहिला प्रश्न (इतर बर्‍याच प्रश्नांसकट) आपोआप सुटेल !!!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

इतिहास उगाळण्यात मला रस नाही. वसाहतवादात काय झालं आणि शूर्पणखेचं बरोबर होतं की उर्मिलेचं चुकलं याचा उहापोह तुम्ही करावा, मला त्यात स्वारस्य नाही. माझ्या मते ते निरर्थक आहे. तुम्ही ग्रॉस लेवलवर विचार करतायं आणि मला बाळबोध प्रश्न विचारतायं की गुलाम देशांचा आपोआप विजय झाला असता का? हे म्हणजे व्यक्ती प्रामाणिक असून मेली कशी? इतकी ढोबळ विचारणा झाली. मी प्रथमपासून व्यक्तिगत प्रामाणिकपणाविषयी लिहीतोयं आणि प्रामाणिक व्यक्ती, तसा कोणताही विचार करत नाही, इतकाच माझा मुद्दा आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

चला भाग १ वर कोणथी उत्तर देण तुम्हाला जमत नाही (त्यापेक्षा ते सोईचं नाही) हे तर कबूल केलत. धन्यवाद ! भाग २ : हा तर तुमचा वर्तमानकाळ आहे ना ? त्यापासून का दूर पळताय ???

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

@इस्पीक चा एक्का - तुमच्यासाठी हे खास . हे वाचा आणि वरील ID कडे दुर्लक्ष करा . चिखल फेकी शिवाय काही मिळणार नाही Yesterday I urged you to talk with people who disagree with you. That requires respectful engagement. But I'm not suggesting you waste your time on people who are willfully ignorant. The six signs of willful ignorance: (1) The person you’re debating uses nastiness as a substitute for thought; (2) attacks the source of an argument rather than the argument’s merits; (3) claims causation from mere correlation (e.g., a rooster’s crowing makes sun rise); (4) disputes facts on which there’s an overwhelming scientific or historical consensus on climate change, widening inequality, the Holocaust); (5) blames or stereotypes entire groups of people; (6) repeats the same point without responding to arguments or information you provide. Did I leave anything out?

In reply to by पिंपातला उंदीर

सहमत. अश्या लोकांचा दुसर्‍यांना त्रास होत नसेल किंवा दुसर्‍यांच्या विचारावर दुष्परिणाम होत नसेल किंवा मुद्दा उगाचच भरकटवण्याचा प्रयत्न नसेल तर सर्वसाधारणपणे मी दुर्ल़क्ष करतो... समाजातला "आउटलायर" आहे हा बेनेफिट ऑफ डाऊट देऊन. पण जर कोणी लोकांच्या गप्प राहण्याच्या सुसंस्कृतपणाचा फायदा घेऊन "जितं मया" असे करत सतत उपद्रव देत असेल तर त्याला वस्तूस्थितीची जाणीव (याला शुद्ध मराठीत जागा दाखवणे असेही म्हणतात) करून देणे आवश्यक असते, असेही मला वाटते. खरं तर उपद्रवी लोकांत बरीच मोठी उर्जा असते... फक्त ती चूकीच्या दिशेने वाहत असते. या सगळ्या खटाटोपात बर्‍याचदा त्या व्यक्तीला आपली चूक कळून येते. तसे मान्य करण्याची त्याच्यात हिंमत असेलच असे नाही. आणि नाही केली कबूल तरी काही फरक पडत नाही, कारण तो उद्देश नसतोच. चूक कळली तरी खूप झाले. निदान भविष्यात आपले प्रायव्हेट लॉजिक इतरांवर थोपून "प्रसिद्ध" होण्याची सवय आपल्यावरच उलटते हे समजले तरी खूप झाले. मात्र इतकेही समजण्याची समज नसल्यास त्या व्यक्तीसंदर्भात योग्य अधिकारी योग्य निर्णय घेतीलच. असो. मीही आता सोडूनच देणार होतो. फक्त तुम्हाला म्ह्णून हा शेवटचा प्रतिसाद लिहीत आहे.

In reply to by पिंपातला उंदीर

स्वतःच्याच प्रतिसादांना, एकदम फिट बसतात हे लक्षात आलं की झालं!