मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिस्टर प्रामाणिक

तिमा · · जनातलं, मनातलं
मी अत्यंत प्रामाणिक आहे बरं! आपल्या देशातलाच काय, या जगातला सर्वात प्रामाणिक माणूस आहे मी! त्यामुळेच तर या भ्रष्टाचारी राक्षसांकडून सामान्य जनतेची सुटका करण्यासाठी मी पक्ष स्थापन केला. माझा पक्ष मोठ्या संख्येने निवडून आल्याबरोबर लगेच सत्तेचे दलाल सावध झाले. सगळ्यांनी माझ्याविरुद्ध कट केला. मला माहितच होते ते. ते आतून कसे एक आहेत, हेच तर मला जनतेला दाखवून द्यायचे होते. माझे सरकार स्थापन झाल्याबरोबर मला आणि माझ्या माणसांना किती काम करु आणि किती नको असे झाले. रोजच्या रोज आम्ही कामांचा फडशा पाडायला सुरवात केली. सरकारी नियम हे आपणच केलेले असतात नं? मग ते वाकवले, मोडले तर एवढी बोंबाबोंब का करायची ? मागे तिकडे मरहट्ट देशांत नाही का,उघड्यावर शपथविधी झाला? मग आम्ही तो केला तर एवढा गहजब का? रोज नवी धमाल उडवून द्यायलाही डोकं लागतं. आणि इथे कुणाला पांच वर्षं राज्य करायचं होतं? इतक्या कुरापती काढल्या, पण ते दलाल सगळे निर्ढावलेले होते. सरकार पाडतच नव्हते. मग जालीम इलाज केला. असं बिल आणलं की त्यांना विरोध करावाच लागला. त्यांची ही अभद्र युती मी लोकांसमोर आणली आणि दिला बार उडवून. राजीनामा का दिला म्हणून काय विचारता? अहो, कधी एकदा मोक्कळं होऊन रस्त्यावर येतोय असं झालं होतं! आता एका दगडांत किती पक्ष/पक्षी मारायचे ही काय कोणाची मोनोपोली आहे? आता बघाच तुम्ही! ही तर फक्त झलक होती. आता 'मेन शो' तुम्हाला लोकसभेतच बघायला मिळेल! अरे,मिरपूड कसली फवारताय? आम्ही तर एकेकाला चुलाणावरच बसवू. कारण विचारताय पुन्हा? जरा थांबा, एकदा त्यांची गठडी वळली की बघतो मग तुमच्या मिडीयाकडे पण! कारण उघड आहे, या जगांत फक्त आम्हीच काय ते प्रामाणिक आहोत. खोकतो सुद्धा प्रामाणिकपणे!

वाचने 3561 वाचनखूण प्रतिक्रिया 9

मारकुटे 15/02/2014 - 11:38
भारतात लोकशाही आहे हे खुप चांगले आहे. अन्यथा केवळ गांधी घराण्यातील लोकांचाच तमाशा पहावा लागला असता. आता कुणी पण करु शकतो. बाबासाहेब आंबेडकरांचे या देशावर खुप उपकार आहेत. त्यांनी दलितांना सवर्णांप्रमाणे वागण्याची संधी दिली. सर्वसामान्य माणसाला सत्तेपर्यंत जाण्याची संधी दिली. मात्र आजही मुस्लिम समाज इतर जनतेपेक्षा मागासलेला आहे त्याला पुढे आणणारा यायला हवा.

In reply to by मारकुटे

टवाळ कार्टा 15/02/2014 - 12:36
बाबासाहेबांमुळे शिक्षणात आरक्षण आले पण दलित स्वता शिकले म्हणुन पुढे आले...कोणाच्याही हाताला न धरता घोड्याला पाण्याजवळ नेता येते पण पाणी त्याने स्वताच प्यायचे असते

आयुर्हित 15/02/2014 - 18:25
आम्हास या “शिलाजित” ची कीव येवू पहाते लोकपालबिल नाव घेउनी सत्तेत यावे वाटते ||धृ || IAC, आंदोलने, उपोषणे व्यर्थ जिथे ठरते स्वस्त बिजली फुकाचे पाणी अशी गाजरे दाखवते | कनेक्शन तोडूनी लोकांचे वीज बिल जाळते सत्तेत येण्या आतुर गुढग्याला बाशिंग बांधते || ५ बेडरूमचा डुप्लेक्स अर्ज करुनी मागवते सारे पितळ उघडे पडे, मेडियावरच डाफरते | मंत्र्यासाठी पेटवून दिल्ली, रस्त्यावरच झोपते "गिर गये तो भी टांग उपर" करावेसे वाटते || सोडून सारे धर्म, लोकसभेचे स्वप्न पहाणे लोकपाल पटावरहि न ठेवता राजीनामा देणे | सत्तेच्या लोभापायी हातची सत्ता घालवणे तेल हि गेले तूपही जाणार, हाती येणार धुपाटणे ||