मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझे सत्याचे प्रयोग

ऋषिकेश · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
टिपः सदर लेखातील हिरव्या रंगातील तिरपी अवतरणे मुस्त सारांश आहे. भाषांतर नाहि मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस पोरबंदरला आजच्या दिवशी जन्माला आला. पुढे हा मुलगा शिकला, आफ्रिकेला गेला. तिथल्या वंशभेदाबरोबर लढला, आफ्रिकेत प्रसिद्धी मिळवून जेव्हा हा माणूस भारतात परतला तेव्हाही भारत पारतंत्र्यातच होता. टिळकांच्या नसण्याने संपूर्ण भारताला एकत्र बांधणार्‍या नेत्याची कमी होती. अश्यावेळी या माणसाने असं शस्त्र प्रत्येक भारतीयाच्या हातात दिलं जे वापरण्यासाठी इच्छाशक्ती सोडल्यास कोणत्याही कौशल्याची, शिक्षणाची अथवा नेत्याची गरज नव्हती. हा हा म्हणता संपुर्ण देशात हाच माणूस असा नेता बनला की त्याने उठा म्हणताच लाखो लोकं जीव तळहातावर घेऊन उभी राहत आणि त्याहून आश्चर्य म्हणजे त्याने थांबा म्हणताच चळवळ थांबे. त्याच्या ह्या असामान्य ताकदीने सगळे जग त्यांना महात्मा म्हणू लागले होते. ---------- "मला तुम्ही महात्मा म्हणता. आता यापुढील आयुष्यात मी जे काहि करेन ते सतत तुमच्यासमोर येत राहणार आहे. परंतू माझा भूतकाळ मी स्वतः सांगितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाहि. " माझे सत्याचे प्रयोग मधल्या शेवटच्या प्रकरणात हे वाक्य मी पाचेक वर्षांपूर्वी वाचलं आणि बापुंच्या प्रामाणिकपणासमोर मी हात जोडले. "माझे सत्याचे प्रयोग" हे माझं अत्यंत आवडत्या पुस्तकांपैकी एक. जर मला कोणी मी वाचलेल्या पुस्तकांपैकी उत्तम फिलॉसॉफिकल पुस्तक कोणते विचारले तर मी ह्याच पुस्तकाचे नाव देईन. पहिल्यांदा हे पुस्तक वाचल्यावर मी बराच भारावलो होतो; पण ते केवळ गांधी ह्या व्यक्तीने भारावणं होतं. मला हे पुस्तक इतकं आवडलं की ते पुनः पुन्हा वाचलं.. दरवेळी मला गांधीजी नव्याने भेटू लागले आणि हळू हळू मी गांधी या व्यक्तीपेक्षा गांधी ह्या विचाराने भारावलो गेलो. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना या व्यक्तीला आपण केलेली चोरी, आपली वासना आदी गोष्टींवर जाहिर वाच्यता करताना जराहि संकोच वाटलेला दिसत नाहि. "मी पहिली चोरी केली तेव्हा खूप रडलो. आता काय करावे हे कळेना. शेवटी मी ठरवले की वडिलांना सत्य सांगायचे. " असे ठरवून वडीलांना सत्य सांगणारा मोहन हा आपल्यातलाच एक वाटतो. तरूणपणीच्या चुकांबद्दल बोलताना "माझे वडील तिथे शेवटचे श्वास घेत होते. आणि मला पत्नीवरोबर शरीरव्यवहाराची उबळ आली. याची आता मला लाज वाटते परंतू तेव्हा ती भावना डोक्यावर स्वार होती. माझी पत्नी गर्भार होती. ती झोपली होती. पण तिची जराही पर्वा न करता मी तिला उठवले. पती इथे सुखासाठी तळमळत असताना तिने झोपणे मला प्रशस्त वाटले नाहि. मला सांगायला लाज वाटते की मी त्या परिस्थितीत तिला उठवले व तिला आलिंगन देणार इतक्यात दारावर टक्-टक झाली. मी प्रचंड रागवलो. दार उघडलं तर बाहेर नोकर होता. त्याला काहि बोलणार तोच त्याच्या डोळ्यातील भाव पाहून मी काय समजायचं ते समजलो. जेव्हा माझ्या वडिलांबरोबर मी हवा होतो तेव्हा मी काय हरत होतो ही बोच माझ्या मनाला तेव्हा पासून आहे" इतके स्वच्छ लिहिले आहे. सध्या कोणता भारतातील नेता आपल्या चुका अश्या जाहिरपणे कबूल करेल? माझी अशी समजूत होती की "माय एक्सपरीमेंटस विथ ट्रुथ" हेच ते मुळ पुस्तक. पण लवकरच कळाले की "सत्यना प्रयोगो अथवा आत्मकथा" हे ते मुळ पुस्तक. गेल्या महिन्यात एका मित्राकडून मुळे गुजराती कॉपी मिळवली. (गांघींची शैली आणि भाषांतरकाराची शैली यात बराच फरक वाटला. गांधीनी काहि घटना तिशय स्वच्छ व स्पष्टपणे लिहिल्या आहेत त्या भाषांतरात अलंकारात गुंफल्या आहेत). बापुंच्या स्वतःच्या शब्दातील पुस्तक वाचण्यात वेगळाच आनंद मिळाला. हे पुस्तक गुजरातीत लिहिणार्‍या, म्हणजेच आपला वाचकवर्ग केवळ "हाय-क्लास" मधे सिमीत न करता तळागाळात मी कसा होतो हे पोहोचवणार्‍या गांधींना नकळत वंदन केलं गेलं आपलं पुर्वायुष्य सामान्य माणसांप्रमाणेच जगलेल्या, सामान्य माणसासारख्या चुका केलेल्या ह्या माणसाचा हा असामान्यत्त्वापर्यंतच्या प्रवासापुढे आपण नतमस्तक होतोच पण आपणही असेच काहि असामान्य करू शकतो याची नकळत स्फुर्ती मिळते. अनेक मोठ्या नेत्यांची चरित्रे-आत्मचरीत्रे मी वाचली आणि अश्या हिमालयाएवढ्या माणसांनी नेहेमीच प्रभावीत झालो आहे. परंतू बापूंच्या आत्मचरीत्राने स्वतःत लपलेल्या असामान्यत्त्वाचा अविष्कार घडवला. कदाचित हेच बापुंचं यश नाहि का? ==== ह्या पुस्तकावर लिहिण्यासारखं बरंच काहि आहे. जमल्यास व मिपाकरांची इच्छा असल्यास दोन भागातील लेख लिहायला आवडेल आजच्या दिवशीही महात्म्याबद्दल मिपावर होणारी अपमानास्पद विधाने वाचली. राग येण्यापेक्षा वाईट वाटले. पूर्वानुभवावरून वाद घालण्यात फायदा नाहि हेही जाणून आहे. तरी तमाम गांधीविरोधकांनी गांधींवर वाटेल तशी टिका करताना त्यांनी स्वतःच्या चुकांमधून केलेल हे सत्याचे प्रयोग जरूर वाचावेत अशी आग्रहाची विनंती. बापूंच्या जन्मदिनी त्यांना कोटी कोटी प्रणाम!!

वाचने 20765 वाचनखूण प्रतिक्रिया 46

अनामिक 02/10/2008 - 23:31
ऋषिकेश.. छान लिहलेस... अजून नक्की लिही... वाचायला आवडेल!

प्राजु 02/10/2008 - 23:38
लेख आवडला. तू जरूर लिहावंस २ भागांत लिहिलंस तरी वाचायला आवडेल. मी गांधी भक्त नसले तरी, मला अशा प्रकारच्या पुस्तकांची आवड आहे. बापू म्हणून नव्हे पण मोहनदास करमचंद गांधीं वरचे ते पुस्तक मिळवून वाचायचा प्रयत्न करेन मी. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर 03/10/2008 - 00:22
ऋषिकेशराव, तुझा लेख चांगला आहे परंतु गांधींबद्दल माझी काही वैयक्तिक मते आहेत आणि ती फारशी चांगली नाहीत... असो, पुलेशु... तुझा, तात्या.

भाग्यश्री 03/10/2008 - 00:27
खरं सांगू, माझीही मतं चांगली नाहीएत. का कोण जाणे अगदी बापू म्हणावं, जसा टिळकांबद्द्ल आदर वाटेल तसा नाही वाटला कधी.. पण असे का याचे नक्की कारण कळत नव्हते.. आणि कारणाशिवाय मत बनवणे चुकीचे वाटायचे.. म्हणून मी ही हेच पुस्तक वाचले होते.. खरंच त्यांच्या प्रामाणिकपणाला सलाम! ते पुस्तक वाचून खरोखर आदर वाटतो.. बाकी त्यांनी राजकारणात काय केले,काय बरोबर,चुक ते माहीत नाही.. अजुन पक्कं मत नाही बनत माझं..

बिपिन कार्यकर्ते 03/10/2008 - 01:04
ऋषिकेश, जरूर लिही रे. तुझ्या नजरेतून वाचायला आवडेल. बिपिन.

In reply to by नंदन

प्रियाली 03/10/2008 - 03:21
नक्कीच आवडेल.

In reply to by प्रियाली

सहज 03/10/2008 - 08:14
लवकर पुढचा भाग येउ दे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

स्वाती दिनेश 09/10/2008 - 18:38
ऋषिकेश, जरूर लिही रे. तुझ्या नजरेतून वाचायला आवडेल. बिपिनसारखेच म्हणते. स्वाती

आनंद घारे 03/10/2008 - 03:08
"माझे सत्याचे प्रयोग" हे नांव मी शाळेत असतांना ऐकलेले होते, पण सेवानिवृत्त झाल्यानंतर ते (मराठी अनुवाद ) प्रत्यक्षात सविस्तर वाचले. बापूजींच्याबद्दल माझ्या मनात जे अनेक पूर्वग्रह साठलेले होते. त्यातले बरेचसे हे पुस्तक वाचल्यानंतर दूर झाले. या पुस्तकातला बराच मोठा भाग ते भारतात परतण्यापूर्वीच्या कालखंडाविषयी माहिती देतो, त्यात आपल्याला फारसा रस नसतो. भारतातील स्वातंत्र्याच्या चळवळीतला अखेरचा जो भाग आपल्याला महत्वाचा वाटतो तो सुरू होण्यापूर्वीच पुस्तक संपते. त्यामुळे मनातल्या शंकांचे निरसन होत नाही. हे पुस्तक वाचतांना त्याने मला खिळवून वगैरे ठेवले नाही, पण ते वाचनीय वाटले. ज्या लोकांना महात्माजींची मते पटत नसतील त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे असे मला वाटते. त्यामुळे त्यांचे मतपरिवर्तन होणार नाही पण त्यांनासुद्धा पूज्य बापूजींच्याबद्दल आदर वाटू लागेल असे मला वाटते. पहिल्याच प्रकरणात मला एक माझ्या दृष्टीने महत्वाची माहिती मिळाली. ती म्हणजे २ ऑक्टोबर ही जन्मतारीख आणि भाद्रपद वद्य द्वादशी ही जन्मतिथी या दोन्ही गोष्टी मला गांधीजींशी जोडतात.

In reply to by आनंद घारे

भाग्यश्री 03/10/2008 - 03:18
म्हणजे तुमचा पण वाढदिवस झाला की काय काल?? तसं अमेरीकेत आहात म्हणजे आजच! वाढदिवसाच्या शुभेच्छा!

In reply to by आनंद घारे

धमाल मुलगा 03/10/2008 - 10:44
नजरचुकीनं हे वाचायचं राहिलं की काय? घारेकाका, वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा! बाकी, ॠषिकेश, नक्की लिही 'सत्याचे प्रयोग'वर. मी माझ्या बायस्ड नजरेनं वाचलं होतं हे पुस्तक. पुन्हा दुसर्‍या एखाद्यानं माहित असलेली गोष्ट सांगावी आणि तीचा वेगळाच अर्थ अचानक समजावा असं काहीसं होईल अशी अपेक्षा करतो :) बाकी, एक विनंती: जे लिहिशील ते शक्य तितक्या तटस्थपणे ना गांधींची बाजु घेता ना गांधीविरोधी भुमिकेस सुसंगत अशी भुमिका घेता असं लिहिता येईल का? माझ्यासारख्या गांधीविरोधी विचारांचा पगडा असलेल्यांना असा लेख तटस्थपणातुन लिहिल्यास वाचुन कदाचित जास्त 'अपील'(मराठी शब्द?) होईल असा माझ्या बालबुध्दीचा कयास आहे.

In reply to by धमाल मुलगा

टारझन 03/10/2008 - 23:27
धम्या हा घे मराठी शब्द अ पील = एक गोळी वाढदिवसाच्या शुभेच्छा , शुभेच्छूक -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

गणा मास्तर 03/10/2008 - 06:22
जरूर लिही ऋषिकेश. जिज्ञासुंनी पुलंच्या 'एक शुन्य मी' या पुस्तकातील गांधीजी आणि विनोबा यांच्यावरील लेख वाचावेत. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

विसोबा खेचर 03/10/2008 - 08:52
मी फक्त माझा व्यक्तिगत प्रतिसाद दिला आहे, ऋषिकेशने पुढील भाग लिहिण्यास माझीही काहीच हरकत नाही... तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती 03/10/2008 - 10:15
जरूर लिही रे ... आणि तुझ्या त्यावरच्या कमेंट्सपण! हे पुस्तक माझ्या लिस्टवरती आहेच, पण दुसर्‍याच्या नजरेतूनही बघायला आवडेल. एक अवांतर प्रश्नः काल गांधीजी आणि शास्त्रीजींची जयंती झाली. त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करणार्‍या कोणीही इथे (मिपावर) दोघांना एकत्र श्रद्धांजली, आदरांजली वाहिली नाही, असं का? अदिती

विजुभाऊ 03/10/2008 - 10:44
ऋषिकेश, जरूर लिही रे. ते पुस्तक मलाही प्रत्येकवेळेस वेगळ्यावेगळ्या ऍन्गलने भेटत रहाते. गान्धीं बद्दल त्यांच्या गोलमेज परिषदेतील भाषणानन्तर पत्रकारानी त्यांचे स्वीय सहायक महादेवभईदेसाई याना विचारले की ते सगळे भाषण ( साधारण दीड तास) न वाचता लक्षात कसे ठेवतात? त्यावर महादेव भाई म्हणाले की बापू जे बोलतात तेच त्यांच्या विचारात असते, ते जो विचात करतात तेच त्यांच्या वागण्यात असते आणि जे वागतात तेच जगतात. त्याना भाषण पाठ करायची गरजच काय? गान्धींबद्दल काही मते ही जे गान्धी समजु शकले नाहीत /पचवु शकले नाहीत त्यानी वदलेल्या विचारांवरुन घडवली गेली आहेत. गान्धीजी हट्टी दुराग्रही होते हे मात्र खरे. कोण्या एकाने मला सावरकर वाद आणि गांधीवाद असे काहितरी ई पत्र धाडले होते. त्या मित्राला मी फक्त एकच विचारले होते " कारे बाबा गांधींच्या विचारसरणीला मानणारे लोक आजही आहेत्. सव्वा शतकानन्तरही बरे वाईट म्हणुन गांधींवर चर्चा होतात. सावरकरांनी स्थापन केलेल्या हिन्दुमहासभा या संस्थेचे नाव किती लोकांच्या लक्षात असते. सावरकरानी केलेल्या समाजसुधारणेला किती लोकानी त्यांच्या नन्तर किंवा ते हयात असतानाही मान्यता दिली? त्यानी केलेल्या नाशीकच्या काळाराम मन्दीरातल्या दलीत प्रवेशाला किती जणानी मनापासुन प्रोत्साहन दिले. गांधी आणि सावरकर यांच्या एक फार मोठे साम्य आहे दोघांचीही विचारणसरणी त्यांच्या कट्टर अनुयायानी बुडवण्यासाठी मनापासुन प्रयत्न केले. गांधींचे खादीचा वापराचे प्रयोग हे त्याकाळाची गरज होती. काळानुरुप लोक बदलले नाहीत ही गांधींची चूक नाही. अर्थव्यस्थेत सर्वात तळातल्या घटकाचा उदय व्हावा. भांडवलशाहीच्या भोगवादाच्या वरवंट्याखाली तो भरडला जाउ नये प्रत्येक गावाने किमान गरजांसाठी स्वयंपूर्ण व्हावे हे विचार खरोखर क्रांतीकारक आहेत ते अर्थशास्त्रदृष्ट्याही योग्य आहेत. ग्राहक तुमच्या व्ययसायात व्यत्यय नाही . ग्राहक हा तुमच्या व्ययसायाचा उद्देश् आहे. ( रवा चांगला आहे का या प्रश्नाला " तोंडापुढचा सकाळ बाजुला न करता वाईट रवा विकायचा धन्दा अजून सुरु केलेला नाही ;हे उत्तर पुण्यातच मिळते: संदर्भः- अपूर्वाई...पु ल देशपान्डे)

वैशाली हसमनीस 03/10/2008 - 11:07
तुमचा लेख फार आवडला.मी हे पुस्तक वाचले तेव्हा माझीही अवस्था तुमच्यासारखीच झाली होती.आपल्याला आवड असेल तर आपण 'कस्तुरबा'हे पुस्तक अवश्य वाचावे.लेखक आत्ता आठवत नाही.

सुनील 03/10/2008 - 12:08
जरूर लिही. वाचण्यास उत्सुक. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

यशोधरा 03/10/2008 - 12:17
सावरकरांनी स्थापन केलेल्या हिन्दुमहासभा या संस्थेचे नाव किती लोकांच्या लक्षात असते. सावरकरानी केलेल्या समाजसुधारणेला किती लोकानी त्यांच्या नन्तर किंवा ते हयात असतानाही मान्यता दिली? त्यानी केलेल्या नाशीकच्या काळाराम मन्दीरातल्या दलीत प्रवेशाला किती जणानी मनापासुन प्रोत्साहन दिले. थोडस अवांतर होत आहे, माफ करा, पण ह्या ओळींवर मत मांडावेसे वाटले म्हणून. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आचार विचार आणि निस्पृहपणा प्रत्येकाला पेलेलच असे नाही. उलट, बर्‍याच जणांची असे विचार स्वीकारताना आणि मुख्य म्हण़जे आचारताना गोची होण्याची शक्यता अधिक!! आणि जे स्वार्थाचे नाही ते लोक फार पटकन विसरतात आणि इतरांनी विसरले तरी 'तेरी भी चूप आणि मेरी भी चूप' म्हणून गप्प बसतात!! लोकांच्या लक्षात सावरकर नाहीत हे लोकांचे दुर्दैव!!

In reply to by यशोधरा

अवलिया 03/10/2008 - 12:20
धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर हे त्यांचे मत आजही किती चपखल लागु आहे हे अजुनही कुणी लक्षातच घेत नाही. येत्या ५० वर्षांत भारतात शरियत कायदा लागु झाला तरी ती विशेष गोष्ट नसेल इतकी भयावद स्थिती आहे. पण लक्षात घेतो कोण?

In reply to by यशोधरा

इनोबा म्हणे 03/10/2008 - 13:59
बर्‍याच जणांची असे विचार स्वीकारताना आणि मुख्य म्हण़जे आचारताना गोची होण्याची शक्यता अधिक!! आणि जे स्वार्थाचे नाही ते लोक फार पटकन विसरतात आणि इतरांनी विसरले तरी 'तेरी भी चूप आणि मेरी भी चूप' म्हणून गप्प बसतात!! सहमत आहे स्वातंत्र्योत्तर काळानंतर बरीच वर्षे काँग्रेसचीच सत्ता होती, त्यामुळे साहजिकच गांधींच्या नावाचा जास्त उदो उदो झाला. आज इंदीरा गांधी आणि राजीव गांधींच्या जयंत्यांना जेवढे महत्व दिले जाते तेवढे ही टिळक,सावरकरांच्या नशिबात नाही. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

गणा मास्तर 03/10/2008 - 13:02
सावरकर गांधी आंबेडकर आणि इतरही सर्वांबाबत आपण नाटक, चित्रपट आणि मेलवाचुनच आपली मते ठरवतो. स्वतः सत्याचा धांडोळा घ्यायचा प्रयत्न कितीजण करतो? नाटक, चित्रपटातील मते ही त्या लेखकाची, दिग्दरश्काची मते असतात. चरित्र बर्याचदा फक्त कौतुक करण्यासाठी आणि आत्मचरित्र समर्थनासाठी लिहिली जातात. वेगवेगळ्या ग्रंथांच्या सहाय्याने, तत्कालीन आणि उत्तरकालीन समाजजीवनावर व्यक्तिंचा, त्यांच्या विचारांचा पडलेल्या प्रभावाने आपली मते ठरवली पाहिजेत. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

विनायक प्रभू 03/10/2008 - 13:17
http://vipravani.wordpress.com/ ही बापूंची टोचणी मला माहित नव्हती. चांगला लेख

विकास 03/10/2008 - 15:19
लेख चांगला आहे. गांधीजींचे विचार आणि राजकारण सर्व पटले नसेल, तरी त्यांच्याबद्दल आदर नक्कीच आहे. मात्र जेंव्हा "दे दी हमे आझादी बिना खड्ग बीना ढाल.." असे म्हणले जाते तेंव्हा डोके फिरते. बाकीचे क्रांतिकारक देशभक्त काही माश्या मारत नव्हते, असे वाटते. अर्थात हा दोष काही गांधीजींचा नव्हे तर त्यांच्या नावाच ट्रेडमार्क करणार्‍यांचा आहे. त्यांनी तर सत्याचे प्रयोग कधी केलेच नाहीत... केवळ सट्ट्याचे प्रयोग केले/करतात असे वाटते.

मदनबाण 03/10/2008 - 17:27
गांधीजी आणि त्यांचे सत्याचे प्रयोग या विषयी बर्‍याच वर्षा पुर्वी कुठल्या तरी पुस्तकात (आचार्य अत्रे लिखित बहुधा...) वाचले होते... ऋषि तु जरुर लिही या विषयावर ,,वाचायला नक्कीच आवडेल.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

प्रभाकर पेठकर 03/10/2008 - 17:43
टिळकांच्या नसण्याने संपूर्ण भारताला एकत्र बांधणार्‍या नेत्याची कमी होती. गांधींच्या भारतात परतल्यानंतरही टिळक हयात होते. विजूभाऊ, गान्धींबद्दल काही मते ही जे गान्धी समजु शकले नाहीत /पचवु शकले नाहीत त्यानी वदलेल्या विचारांवरुन घडवली गेली आहेत. असे म्हणणे हे गांधी विरोधकांवर अन्यायकारक आहे. त्यांची मते ही 'ते गांधींना समजू/पचवू शकले नाहीत त्यांनी वदविलेल्या विचारांवरून घडविली गेली आहेत ह्या वाक्यात 'आम्ही गांधींना समजू शकलो/पचवू शकलो' हा अहंगंड दिसून येतो. (तसा प्रत्यक्षात नसला तरी शब्दरचना तसे सुचविणारी आहे.) गांधी विरोधकांची मते कुठल्याही एका पुस्तकावरून बनविलेली नसतात. समकालीनांवरील (उदा. भगतसींग, नेताजी सुभाषचंद्र बोस इ.इ.) पुस्तके वाचूनही त्या काळातील इतिहास, सामाजिक स्थिती, राजकिय चाली आणि हयात राजकारण्यांचे स्वभाव विशेष ह्या बद्दलची मते बनत जातात. कादंबर्‍या, सिनेमे हे जरी कुणा लेखकांची वैयक्तीक विचारधारा असली तरी जनसामान्यांसमोर अशी मते मांडताना त्यांना आवश्यक तो अभ्यास करावाच लागतो. प्रतिमा हनन केले म्हणून कोणी समर्थक कोर्टात खेचू शकतो. हे सर्व लक्षात घेऊन ऐतिहासिक पुरावे असल्याशिवाय कोणी लेखक अशी विधाने करणार नाही. (अन्यथा त्याचाही 'जेम्स लेन' व्हायचा..) त्या मित्राला मी फक्त एकच विचारले होते " कारे बाबा गांधींच्या विचारसरणीला मानणारे लोक आजही आहेत्. सव्वा शतकानन्तरही बरे वाईट म्हणुन गांधींवर चर्चा होतात. गांधी काँग्रेसचे अध्वर्यू होते. त्यांना काँग्रेसनेच 'महान आत्मा' बनविले होते. त्यातच काँग्रेसचा स्वार्थ दडला होता. स्वतंत्र भारतातील पहिल्या निवडणूकी पुर्वीच 'काँग्रेस बरखास्त करा' असा बापूंचा आदेश होता. काँग्रेसने तो पाळला नाही. १७ पैकी १४ राज्यांनी वल्लभभाईंना पंतप्रधान पदासाठी निवडले होते. ३ राज्ये न्यूट्रल राहीली. तरीही ह्या महान आत्म्याने लोकमताविरूद्ध जाऊन जवाहरलाल नेहरूंना पंतप्रधानपद का बहाल केले? 'सत्याचे प्रयोग' करणार्‍या 'महान आत्म्याने' त्या निर्णयातील बहुमताचा, सत्याचा आदर का केला नाही? बापूंच्या सेलीब्रेटी स्टेटसचा फायदा आणि भारतिय मुसलमानांचा अनुनय हा निवडणूकीतील 'हुकमी एक्का' होत्या. सावरकरांचे विचार हिन्दूनिष्ठ होते. मुस्लीम विरोधी होते. मुस्लीम मते आपल्या विरूद्ध जातील अशी भीती काँग्रेसला होती. म्हणून त्यांनी हेतुपुरस्सर गांधींना झुकते माप देऊन सावरकरांना डावलले. इंग्रजांनी बंधमुक्त केलेल्या सावरकरांवर स्वातंत्र्यप्राप्ती नंतर तथाकथित 'स्वतंत्र भारताच्या' काँग्रेसने पुन्हा खटला भरून बंदीवासात टाकले. पुढील ५० वर्षांच्या कालखंडात आपल्या अधिकारात काँग्रेसने सावरकरांना जनस्मृतीतून पुसण्याची हीन आणि यशस्वी खेळी खेळली. शालेयजीवना पासून अडाणी भारतावर गांधींना 'देव' बनवून ठेवले. तेही काँग्रेसला गरज होती म्हणून. असो. परवाच्या गांधी दिना निमित्त महात्मा गांधींना पुष्प हार आणि फुले अर्पण करण्यात आली. टिव्हीवर बातम्यांमध्ये दाखवत होते, एके ठीकाणी गांधीजींच्या डोक्यावर फुले ठेवायची होती. पण ती तिथे टिकेनात. शेवटी, पुतळ्याच्या डोक्यात ७-८ खिळे ठोकण्यात आले आणि त्याला फुले खोचून ठेवली होती. फार वाईट वाटले बघून. चर्चा चालू राहावी. गांधींबद्दल अजून काही चांगले वाचायला मिळाले आणि माझे मतपरिवर्तन झाले तर आवडेलच मला. तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..

In reply to by प्रभाकर पेठकर

ऋषिकेश 09/10/2008 - 16:26
. तरीही ह्या महान आत्म्याने लोकमताविरूद्ध जाऊन जवाहरलाल नेहरूंना पंतप्रधानपद का बहाल केले?
या का चे उत्तर गांधीजीच देऊ शकले असते मात्र या प्रतिक्रियेसंबंधीत लेखन मी "महात्माची अखेर" (लेखकः जगन फडणीस) मधे वाचले होते ते आठवले. आज ते पुस्तक कपाटातून काढले. त्यातील तुमच्या विधानाला काहिसे पुष्टी देणारे तर काहि ठिकाणी अधिक प्रकाश टाकणारे हे परिच्छेद इथे जसेच्या तसे देत आहे: (यासाठी मुळ लेखकाची परवानगी घेतलेली नाहि तरी जर संपादक मंडळाला वाटले तर लेखन उडवू शकता) ========== भारताला स्वातंत्र्य मिळून साडेपाच महिने झाले होते. फाळणीमुळे रक्ताच्या नद्या वाहत होत्या-स्थलांतर होत होते. ज्यांच्या हाती देशाची सत्ता आली ते 'महान' नेते गोंधळून गेले, बावरून गेले. त्यांचे सारे आयुष्य केवळ सांतंत्र्य मिळवणे या एकाच उद्देशासाठी लढण्यात गेले होते. थेट प्रशासनाचा काहिच अनुभव पाठीशी नव्हता. बाहेर परिस्थिती इतकी पेटलेली होती की गांधी वगळता एकहि नेता मग तो काँग्रसचा असो, मुस्लिम लीगचा असो वा हिंदूमहासभेचा लोकांमधे जाऊ शकत नव्हता. जर फाळणीला गांधी जबाबदार असते तर ते लोकांमधे जाऊ शकले असते का? असो याचा उहापोह आपण आधीच्या प्रकरणामधे केला आहे. अचानक जबाबदारी अंगावर आलेले नेहरू व पटेल या फाळाणीमुळे उद्भवलेल्या अक्राळ-विक्राळ परिस्थितीने बरेच खचून गेले होते. खचलेल्या मनाने हे दोन नेते गांधींच्या अपरोक्ष लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या भेटीला गेले आणि तुम्हीच सरकार परत चालवा हि विनंती त्यांना केली. माऊंटबॅटन यांनी या विनंतीला नकार दिला . विचार करा जर हा नकार दिला नसता तर भारतीय जनतेच्या मनात काय काहूर मजले असते. यावर गांधीनी प्रार्थनासभांमधे नेहरू व पटेल यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. त्यात पटेलांना प्रार्थनासभेतील गांधींचे काहि उद्गार फर झोंबले. व याच काळात नेहरू पटेल मतभेद तीव्र झाले. स्वतंत्र्यलढ्यात खांद्याला खांदा लाऊन लढणारे जीवाभावाचे सहकारी सत्ता येताचे एकमेकांविरूध लढत होते. ======= पुढील भाग देण्याआधी असेहि नमुद करतो की इतरत्र असेही वाचले आहे की नेहरूंनी मात्र प्रास्थनासभेत गांधींनी केलेली टिका सकारात्मकरीतीने घेतली. परंतू हे तत्कालीन कोणीही नमुद केल्याचे वाचनात नाहि. आता पुढे... ======== आणि एक दिवस ती संध्याकाळ उजाडली. त्या संध्याकाळी जे काहि घडले ते जस्र घडले नसते तर देशाचा इतिहास बदलला असता. "सरदार, तुमच्या दोघांपैकी एकाला मंत्रीपद सोडावेच लागेल. तुमच्यातील दुरावा, मतभेद वाढणे देशाला हानिकरक आहे. आजच्या प्रार्थना सभेनंतर जवाहर मला भेटायला येणार आहेत त्यांनाही मी हेच सांगणार आहे. यासाठी मी माझा सेवाग्रामचा दौराहि रद्द करेन. जो पर्यंत तुम्हा दोघांत सामंजस्य होत नाही तोपर्यंत मी दिल्ली सोडणार नाहि" असे पटेल यांना गांधींनी ३० जानेवारी १९४८ला संध्याकाळी चार वाजता सांगितले. त्यानंतर प्रार्थनासभा व त्यानंटर नेहरूंशी चर्चा असा गांधींचा कार्यक्रम होता. ही चर्चा इतकी महत्त्वाची होती की गांधीना आयुष्यात प्रथमच वेळचे भान नव्हते. चर्चा लांबत चालली तेव्हा आभा कवरीबावरी झाली. तिला चर्चेत खंडही नको होता अथवा प्रार्थनेची वेळही चुकायला नको होती. तिने वेळ सुचवण्यासाठी बापुंपुढे हळूच घड्याळ सरकावले. पण त्याचाही उपयोग झाला नाहि. === नेहरू पटेल यांच्यातील वाद मिटले नाहीत पण त्याच दिवशी सभेला घाईत जाणार्‍या गांधींची हत्या झाली. पुढे नेहरू आणि पटेलांनी केवळ या घटनेचा परीणाम होऊन, आपल्या मतभेदांना मुरड घालून शासन केले. आता त्या संध्याकाळी जर गांधीजी जगले असते तर त्यांनी नेहरूंनाही त्याच निर्वाणीचा इशारा दिल असता की नाहि याबद्दल मतभेद आहेत कारण पटेलांनी काँग्रेस सोडावी म्हणून गांधीनी अनेकदा आडून वार केल्याचे दाखले मिळतात. जाता जाता: पुढे पटेलवादी गट उजवा ठरत चालला व म्हणून नेहरूंनी जयप्रकाशांना काँग्रसमधे येण्याची गळ घातली ती जयप्रकाशांनी आम्ही कॉग्रेसमधे आलो तर कदाचित सत्ता मिळेल, मंत्रीपद मिळेल, बहूमतही मिळेल पण आमच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे काय? असा प्रश्न करून फेटाळली. कीती तात्त्विक राजकारण त्या काळी चालायचे नाहि? संदर्भः महात्म्याची अखेरः जगन फडणीस १: फीडम ऍट मिडनाईटः डॉमिनिक लॅपिए, लॅरी कॉलिन्स २: महात्मागांधी: द लास्ट फेजः खंड २ : प्यारेलाल -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

बिपिन कार्यकर्ते 09/10/2008 - 18:36
फ्रीडम ऍट मिडनाईट...
अचानक जबाबदारी अंगावर आलेले नेहरू व पटेल या फाळाणीमुळे उद्भवलेल्या अक्राळ-विक्राळ परिस्थितीने बरेच खचून गेले होते. खचलेल्या मनाने हे दोन नेते गांधींच्या अपरोक्ष लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या भेटीला गेले आणि तुम्हीच सरकार परत चालवा हि विनंती त्यांना केली. माऊंटबॅटन यांनी या विनंतीला नकार दिला१
खरं आहे. असाही एक मतप्रवाह आहे की काँग्रेसचे बहुतेक नेते त्या वेळी हळू हळू वार्धक्याकडे झुकत होते. देशाचे तुकडे करून का होईना, पण आपल्या हयातीत स्वातंत्र्य मिळलेले त्यांना बघायचे होते. त्या वेळची जीनांची शारिरीक अवस्था हे मुस्लिम लीगचे बेस्ट केप्ट सिक्रेट होते. काँग्रेसी नेत्यांनी समजा अजून थोडी कळ काढली असती तर कदाचित जीनांचा मृत्यू लवकरच झाल्याने मुस्लिम लीग आणि पर्यायाने पाकिस्तान चळवळ मोडून पडली असती. अर्थात् हे सगळे जर-तर चे खेळ झाले. जीना - गांधी संघर्ष आणि अविश्वास एवढा जबरदस्त होता की फाळणी अटळ ठरली. गांधीजींचे मन नेहमीच नेहरूंना झुकते माप देत राहिले. पण पटेलांची गांधीनिष्ठा शेवटपर्यंत बर्‍या पैकी अढळ होती. गांधी - नेहरू - पटेल हे एक मोठे गौडबंगालच आहे. बिपिन.

In reply to by ऋषिकेश

प्रभाकर पेठकर 10/10/2008 - 13:37
गांधीजी पक्के राजकारणी होते. सरदार, तुमच्या दोघांपैकी एकाला मंत्रीपद सोडावेच लागेल. .... ......कारण पटेलांनी काँग्रेस सोडावी म्हणून गांधीनी अनेकदा आडून वार केल्याचे दाखले मिळतात. ऐतिहासिक कालखंडावरील पुस्तके लिहीताना, राजकारण्यांवर लिहीताना, लोकांच्या मनात आदराचे स्थान मिळविलेल्या व्यक्तिंबद्दल लिहीताना लेखकाला फार सांभाळून लिहावे लागते. वाचकाला वाक्यांचा शब्दार्थ न घेता त्या- त्या वाक्यांमध्ये असलेला गूढार्थ स्वतःच शोधावा लागतो. हे सुद्धा कुठलेही एखादे किंवा त्या व्यक्तीला धार्जिण्या लेखकांची अनेक पुस्तके वाचून मत न बनविता आदरस्थानावर विराजमान त्या त्या व्यक्तींच्या सानिध्यात आलेल्या विरोधकांची मतेही अजमावू पाहावी लागतात. त्यातूनच सत्याचा 'अंश' जाणवू शकतो. वरील दोन वाक्ये घेतली तर दूसर्‍या वाक्यात पटेलांबाबत गांधीजींची त्या काळातील मनोवस्था दिसून येते तर पहिल्या वाक्यात गांधीजींमधला मुत्सद्दीपणा समोर येतो. 'दोघांपैकी एकाला' असे तोंडाने म्हणताना 'कोणी' हे उत्तर दूसर्‍यावाक्यात दृष्टीस पडते. असो. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

यशोधरा 03/10/2008 - 17:59
>>तरीही ह्या महान आत्म्याने लोकमताविरूद्ध जाऊन जवाहरलाल नेहरूंना पंतप्रधानपद का बहाल केले? काँग्रेस कार्यकारिणीचे अध्यक्षपद सुभाषबाबूंना न मिळता जवाहरलाल यांना मिळावे यासाठी राजकारण करणारे गांधीच होते ना?

In reply to by यशोधरा

३_१४ विक्षिप्त अदिती 03/10/2008 - 18:01
>> काँग्रेस कार्यकारिणीचे अध्यक्षपद सुभाषबाबूंना न मिळता जवाहरलाल यांना मिळावे यासाठी राजकारण करणारे गांधीच होते ना? नक्की आठवत नाही, पण सुभाषबाबूंच्या अध्यक्षतेखालच्या त्रिपुरा काँग्रेसच्या कमिटी मेंबर्सना राजीनामा द्यायला गांधीजींनीच भाग पाडलं, ज्यायोगे सुभाषबाबूंना राजीनामा द्यावा लागेल.

देवदत्त 03/10/2008 - 19:38
'माझे सत्याचे प्रयोग' वाचून उलट माझा त्यांच्याबद्दलचा आदर कमी झाला. का त्याचा अंदाज नाही. असो, तुम्ही त्यावर आणखी लिहिलेत तर बहुधा त्यांचे म्हणणे नीट समजायला मदत होईल. ते ही करून पाहतो.

बिपिन कार्यकर्ते 03/10/2008 - 19:48
पेठकर काकांशी सहमत आहे. खरं बघितलं तर मलाही गांधीजींबद्दल बर्‍याच गोष्टी खटकतात. त्यांचा त्यांच्या मतांबद्दलचा अतितीव्र अट्टाहास, गरिबीत राहण्याचा हट्ट (पहा, सरोजिनीदेवी नायडू यांचे विधानः "काँग्रेस हॅज टू स्पेंड अ लॉट ऑफ मनी टू कीप हिम इन पॉव्हर्टी"), त्यांचे नेहरूंवरचे अनाकलनिय पुत्रवत प्रेम आणि त्या पायी वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस इ. वर झालेला अन्याय, महादेवभाई देसाई यांनी लिहिलेले आहे त्या प्रमाणे - सकाळी उठून जर पेपर मधे फोटो / बातमी नसेल तर त्यांना थोडे खट्टू वाटायचे इत्यादी. पण दुसर्‍या बाजूने बघाल तर सर्वसामान्य भारतिय जनतेशी नाळ जोडलेला हा टिळकांनंतरचा एकमेव नेता. जे केलं ते सहज आणि प्रामाणीकपणे केलं. काँग्रेस ने त्यांना देवत्व वगैरे बहाल केलं हेही खरंच. आणि तिथेच त्यांचा खरा पराभव झाला. ऋषिकेशषिखरंच लिही. आणि त्या निमित्ताने इथे नीट चर्चा व्हावी हीच इच्छा. बिपिन.

ऋषिकेश 03/10/2008 - 22:49
सगळ्यांचे चर्चा पोकळ गांधीद्वेषाने न बरबटवता मुद्देसुद मते मांडाल्याबद्द्ल अतिशय आभार. माझा असा आग्रह मुळीच नाहि की गांधी प्रत्येकाला पटावेत. अथवा असेहि म्हणणे नाहि की गांधीजी प्रत्येक वेळी राजकीय दृष्ट्या बरोबर होते. मी गांधीचा आदर करतो तो एक सच्चा माणूस म्हणून, एक समाजसेवक म्हणून, एक सामान्यांचा असामान्य नेता म्हणूनही. याच बरोबर मी हे ही स्पष्ट करतो की मला सावरकर, टिळक, भगतसिंग, नेताजी अथवा आंबेडकर यांसारख्या महान व्यक्तींबद्दलही गांधीजीं इतकाच आदर आहे. किंबहूना वर उल्लेखलेल्या व्यक्ती स्वतंत्रपणे इतक्या थोर आहेत की एकाचे मोठेपण सांगायला दुसर्‍याला खुजे दाखवायची अजिबात गरज नाहि. सारकरवाद काय अथवा आंबेडकरांचे विचार काय हे पूर्णपणे स्वतंत्र विचार आहेत. गांधीवर टिका करताना वारंवार या नेत्यांचा इतका वापर केला जातो की या नेत्यांचे विचार म्हणजे केवळ "गांधीवादाला विरोध " इतकाच आहे की काय अशी शंका यावी. आणि म्हणूनच हे इतरविचारसरणींवर अन्यायकारक आणि दुर्दैवी आहे. गांधीचं राजकीय अंग हे अनेक अंगांपैकी एक आहे. मी कोणत्याही व्यक्तीचा त्याच्या एका / काहि राजकीय निर्णयामुळे तिटकारा करत नाहि. धमु,
जे लिहिशील ते शक्य तितक्या तटस्थपणे ना गांधींची बाजु घेता ना गांधीविरोधी भुमिकेस सुसंगत अशी भुमिका घेता असं लिहिता येईल का?
नक्की प्रयत्न करेन. विजूभाऊ, गांधीवादाची बाजु घेताना सावरकरांना कनिष्ठ दाखवण्याचा प्रश्नच येत नाही. गांधी मला आवडत असले तरी मला सावरकरांचेही बरेच विचार अनुकरणीय वाटातात. वर म्हटल्याप्रमाणे गांधी काय सावरकर काय अथांग पुस्तकं आहेत आपल्याला झेपेल तेवढं वेचत राहायचं. बाकी,
भांडवलशाहीच्या भोगवादाच्या वरवंट्याखाली तो भरडला जाउ नये प्रत्येक गावाने किमान गरजांसाठी स्वयंपूर्ण व्हावे हे विचार खरोखर क्रांतीकारक आहेत
सहमत आहे. यशोधरा,
लोकांच्या लक्षात सावरकर नाहीत हे लोकांचे दुर्दैव!!
अगदी सहमत. ज्यांच्या लक्षात सावरकर नाहित ते खरेच दुर्दैवी. विकासराव,
मात्र जेंव्हा "दे दी हमे आझादी बिना खड्ग बीना ढाल.." असे म्हणले जाते तेंव्हा डोके फिरते. बाकीचे क्रांतिकारक देशभक्त काही माश्या मारत नव्हते, असे वाटते. अर्थात हा दोष काही गांधीजींचा नव्हे तर त्यांच्या नावाच ट्रेडमार्क करणार्‍यांचा आहे. त्यांनी तर सत्याचे प्रयोग कधी केलेच नाहीत... केवळ सट्ट्याचे प्रयोग केले/करतात असे वाटते.
++++१ :) फक्त गांधींनीच स्वातंत्र्य दिले म्हणून इतरांचा अपमान करणे आणि गांधींनीच देशाची वाट लावली म्हणून त्यांची जाहिर नालस्ती करणे ही दोन्ही टोके पाहिली की डोके फिरते हेच खरे :) पेठकरकाका, आपली मते आपण मांडली आहेत आणि त्यात ठामपणे चुक अथवा बरोबर ठरवण्याइतका विदा माझ्यापाशी याक्षणी नाहि मात्र,
मुस्लीम मते आपल्या विरूद्ध जातील अशी भीती काँग्रेसला होती. म्हणून त्यांनी हेतुपुरस्सर गांधींना झुकते माप देऊन सावरकरांना डावलले
हे खटकले. सावरकरांसारखा मानी माणूस कधीही काँग्रसपुढे मला निवडा म्हणून जाईल अथवा काँग्रेसच्या कृपेवर विसंबून राहिलसे वाटत नाहि. सावरकरांनी कधी सत्तेत वाटा मिळावा अशी इच्छा केल्याचे ऐकीवात नाहि. असो, गांधीबद्दल काहिंची ठाम मते आहेत, काहि बनवत आहेत, काहिंची मतेच नाहित. ज्यांना मते आहेत त्यांनी ती मांडल्याबद्दल अनेक आभार. हा येता व पुढील आठवडा प्रचंड व्यस्त असेन तेव्हा त्यानंतर सत्याचे प्रयोगवर अजून नक्की लिहिन. -ऋषिकेश

प्रभाकर पेठकर 03/10/2008 - 23:24
सावरकरांसारखा मानी माणूस कधीही काँग्रसपुढे मला निवडा म्हणून जाईल अथवा काँग्रेसच्या कृपेवर विसंबून राहिलसे वाटत नाहि. सावरकरांनी कधी सत्तेत वाटा मिळावा अशी इच्छा केल्याचे ऐकीवात नाहि. आपण चुकीचा अर्थ लावता आहात. मी तसे आडूनही सुचविलेले नाही. मी असेही म्हंटलेले नाही की गांधीजींनी मला निवडा असे काँग्रेसला सांगितले. गांधीजींनीही सत्तेत वाटा मिळावा अशी इच्छा व्यक्त केल्याचे माझ्याही ऐकिवात नाही. हे सर्व स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसने स्वार्थासाठी केले. सावरकरांनी काँग्रेस समोर मला निवडा अशी भीक मागितली नाही किंवा सत्तेत वाटा मिळावा अशी इच्छाही प्रदर्शित केली नाही. मी जे आडूनही सुचविले नाही ते कृपा करून माझ्या तोंडी भरवू नका अन्यथा प्रतिसाद देणे मला अवघड होऊन बसेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

ऋषिकेश 03/10/2008 - 23:42
हे सर्व स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसने स्वार्थासाठी केले.
+१ बाकी आपण लिहिलेल्या प्रतिसादामधे डावलले म्हणालात म्हणून मला असे वाटले की डावलण्याचा प्रश्न येतोच कुठे .... पण जर आपले तसे म्हणणे नसेल तर काय प्रश्नच मिटला :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

प्रभाकर पेठकर 03/10/2008 - 23:53
डावलले नक्कीच. पण कोणी? काँग्रेसने. माझा प्रतिसाद हा श्री. विजुभाऊंच्या प्रतिसादतील खालील वाक्या संदर्भात आहे... कारे बाबा गांधींच्या विचारसरणीला मानणारे लोक आजही आहेत्. सव्वा शतकानन्तरही बरे वाईट म्हणुन गांधींवर चर्चा होतात. सावरकरांनी स्थापन केलेल्या हिन्दुमहासभा या संस्थेचे नाव किती लोकांच्या लक्षात असते. काँग्रेसने हा भेदभाव बुद्ध्याच केला. लोकमानसातील सावरकरांचे महत्त्व कमी होऊन गांधीजींचे वाढावे असे प्रयत्न स्वातंत्र्योत्तर काळात झाले. पब्लीक मेमरी इज शॉर्ट... लोकं सावरकरांना, त्यांच्या कार्याला लवकर विसरले. तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..

मन 09/10/2008 - 20:34
आणि वरच्या प्रतिक्रिया सुद्धा... अशीच अभ्यासु मतं वाचयला नक्कि आवडतील.... पु ले शु. आपलाच, मनोबा

प्रकाश घाटपांडे 10/10/2008 - 19:38
अजुन काही लिहिल्यास एक चांगला दस्ताऐवज तयार होईल. सत्याचे प्रयोग सांगणे देखील किती धैर्याचे असते. प्रकाश घाटपांडे