उत्तरायण २०१४ - पुणे ते बडोदा (भाग २ - अधिक माहितीसह..)

मोदक भटकंती
रात्री १२ पर्यंत गप्पा मारत बसलो व नंतर उद्याच्या प्रवासाची उजळणी करत दिवस संपला.. (भाग १) दिवसभराचा प्रवास आणि भरपेट खादाडी यामुळे रात्री गाढ झोप लागणे साहजिक होते पण मित्राच्या घराजवळ असलेली डेअरी, तेथे रात्रभर सुरू असणारी रिक्शांची वर्दळ आणि तेथेच वावरणारे कुत्र्यांचे टोळके यांनी शांत झोपेच्या आनंदावर विरजण घालण्याचा जणू चंग बांधला होता त्यामुळे सलग दुसर्‍या रात्री झोपेचे खोबरे झाले. अगदी कशीबशी पाऊणएक तास झोप मिळाली. सकाळी आजीबात फ्रेश वाटत नव्हते. जांभया देत देत प्रवास सुरू होणार हे उघड होते. निघण्याआधी आणखी थोडावेळ झोप काढून निघावे असाही विचार डोक्यात आला पण बडोद्यापर्यंतच्या रस्त्याचा नेमका अंदाज नव्हता. किती वेळ लागेल..? वाटेत ट्रॅफीक लागेल का..? त्यात घोडबंदर नाक्याजवळच्या पुलाला (वसईच्या?) तडे गेल्याने तेथे सुरू असलेल्या एकमेव पुलावर एका वेळी एकाच दिशेने वाहने सोडतात व ती वाहने गेल्यानंतर दुसर्‍या दिशेची वाहने. असा प्रकार सुरू आहे असेही कळाले होते. त्यामुळे किती वेळ लागेल हे ही माहिती नव्हते आणि या सगळ्या भानगडीत त्या दिवसाच्या राखीव वेळेच्या गणिताचा आनंदीआनंद झाला होता. कशाचाच काहीच अंदाज लागत नव्हता. सर्वात महत्वाची गोष्ट ही होती की बडोद्याला मितेशजींच्या घरी किमान रात्री ८ च्या आत पोहोचावे असे ठरवले होते. रात्रीबेरात्री पोहोचून त्यांना त्रास द्यावा लागू नये हा प्रयत्नही करायचा होता. धाडस की अनावश्यक धोका..? खरंच हा असा आळसटलेला प्रवास करायची गरज आहे का..? वगैरे गोष्टी टोचत होत्याच! "आता बाहेर पडलो आहेच तर बघू काय करायचे ते.. आधी मुंबईबाहेर तरी पडू!" अशा विचाराने गाडीला किक मारली. NH-8 सुरू होतानाच फाऊंटन इन हॉटेलला आता आठवडाभर पुढे काय असणार आहे याची चुणूक मिळाली. . अपेक्षेप्रमाणे एकेरी वाहतूक सुरू होती आणि उजवीकडे टर्न असताना तेथे रस्त्यावरच खुर्ची टाकून बसलेला मामा सर्वांना डावीकडे पिटाळत होता. कानातल्या जीपीएसने दंगा सुरू केला व तरीही चुकीच्याच रस्त्याने जात आहे हे पाहून पुढचा U टर्न दोन किलोमीटरनंतर आहे ही सुवार्ता दिली. हा टप्पा थोडा वेळखाऊ ठरला पण व्यवस्थित पार पडला. आता NH-8 व्यवस्थीत सुरू झाला. भला मोठ्ठा तीन लेनचा एका रेषेत आखल्यासारखा सरळ रस्ता आणि एखादे गाव / चौक असेल तर लगेच सुसज्ज उड्डाणपूल. बहुतेक उड्डाणपूलही घसघशीत तीन लेनचे होते. . उड्डाणपूल. . महाराष्ट्र पासींगच्या गाड्या आजूबाजूला दिसत होत्या. त्यांना ढकलल्यासारखे गडबडीने बाजूला करत गुजरात पासींगच्या गाड्याही वेगाने पुढे जात होत्या. काठेवाडी धाबे, सुसज्ज पेट्रोल पंप आणि टोलनाके ठरावीक अंतरावर दिसत होते. पेट्रोल पंपावर ओझरती नजर फिरवून पंक्चरचे दुकान आहे का हे लक्षात ठेवत होतो आणि किती रिडींग आहे तेही लक्षात ठेवत होतो. गरज भासलीच तर ही माहिती उपयोगी पडणार होती. रस्ता समतल आणि व्यवस्थीत मेंटेन केलेला होता. ठिकठिकाणी रिफ्लेक्टर्स, पांढरे पट्टे, दिशादर्शक बोर्ड दिसत होते. साधारणपणे कोणत्याही पुलावर दोन बीम जोडण्याच्या ठिकाणी गाडी हमखास आदळते कारण बीमची टोके जुळतात त्या जागेमध्ये रबरासारखा एक पदार्थ भरलेला असतो. तो प्रकारही शाबूत होता. त्यामुळे वेगावर कोणताही फरक न पडता प्रवास सुरू होता. सुरूवातीपासून ५० किंवा ५५ चा वेग पकडून चाललो होतो. (आत्ता टाईपताना वाटते आहे की त्यावेळी कंटाळा कसा आला नाही??) एक गोष्ट मात्र आवर्जून नमुद करण्याजोगी.. आजुबाजूला मोठ्या गाड्या १०० / १२० ने बघता बघता दिसेनाशा होताना आपण ५० / ५५ लाच टिकून राहणे खरोखरी अवघड जात होते. नकळत वेग वाढत होता. पुन्हा कमी करत होतो. (अर्थात मला गाडीचे माईलेज ही चेकवायचे होते म्हणून एकाच गतीने जात होतो.*) वाटेत महाराष्ट्र-गुजरात बॉर्डर चेक पोस्ट लागले. . (फोटो अंतर्जालावरून साभार - फोटो प्रपोज्ड प्लॅनमधील वाटत असला तरी प्रत्यक्षात असेच भव्य दृष्य होते) कमी झोपेमुळे पित्त होवू नये म्हणून पोटात भरपूर पाणी ढकलत होतो. त्यामुळे निसर्गाच्या हाका आणि त्यांना उत्तर देणे क्रमप्राप्त होते. एके ठिकाणी गाडी सुरू करताना गाडीखाली रस्त्यावर एक भलामोठा काळा डाग दिसला. ऑईल सांडल्यावर दिसतो तसा. पाठीवर ओझे असल्याने नक्की काय झाले आहे..? कुठून ऑईल गळते आहे..? हे बघण्याचा आळस केला. तीनेक तास गाडी व्यवस्थीत चालली होती व काहीच प्रॉब्लेम देत नव्हती म्हणून फारशी चिंता केली नाही. अचानक एका क्षणी वाटले आजचा एकंदर प्रवास जरा ओव्हर कॉन्फीडन्समध्ये चालला आहे. चुपचाप पहिला धाबा दिसला तेथे गाडी बाजूला घेतली. फ्रेश झालो. चहापान केले. गाडीलाही थोडी विश्रांती मिळाली होती व ऑईलचेही नक्की काय ते बघायचे होते. येथेही तीच गत. पेव्हमेंट ब्लॉकवरती काळे ऑईल होतेच. मात्र ऑईल टँकमधील ऑईल व या ऑईलचा रंग जुळत नव्हता. जळाल्यासारखा काळा रंग येण्याचे कारण कळत नव्हते आणि दोन्ही ऑईलच्या नमुन्यांची कन्सिस्टन्सी जुळत नव्हती. अज्ञानाला शरण गेलो व गप हिरो होंडा सर्व्हीस स्टेशन शोधण्यास सुरूवात केली. एका रस्त्याशेजारच्या मेकॅनीकने "सब खोलके चेक करना पडेगा" असे सांगून फुकटचे टेन्शन दिले. वलसाडला एका चाचाने 'रविवारी सर्विस स्टेशन बंद असते व शेजारीच मेकॅनीक आहेत' म्हणून सांगीतले. दोन पोरसवदा मेकॅनीक गाडी सेंट्रल स्टँडला लावून पार गाडीखाली घुसले व चेनला ऑईलींग केले आहे ते जास्तीचे ऑईल गळते आहे. टेन्शन ची गोष्ट नाही व इंजीन ऑईल आणखी ३००० किमीपर्यंत चालेल असे सांगीतले. हुश्श करून परत वाटेला लागलो. वाटेत एका ठेल्यावर मलई पाणीवाले शहाळे फस्त केले. झोप आता एकदम पळाली होती. फ्रेश वाटत नसले तरी बडोद्याला आजच पोहोचणे शक्य वाटत होते. सुरत अजूनही दोनेक तास दूर होते. अचानक "उंबाडियु" चे बोर्ड, भाजत ठेवेलेले काळे हंडे.. अशी तयारी दिसू लागली. . त्या मडक्यांमध्ये कसलासा पाला भरून रताळे, बटाटे, घेवडा आणि रतालू (याचे मराठी नाव मलाही माहिती नाही!) यांचे काप करून त्याला आंबेहळदीची चटणी लावून भाजले होते. वजनावर विकत होते. पाव किलो उंबाडियुवर ताव मारला. . कच्चे जिन्नस. रताळे आणि बटाटा सोडून तिसरे सुरणासारखे दिसते आहे तेच ते रतालू. . आंबेहळदीचा एक तुकडा टाईमपास म्हणून चघळायला घेतला व पुन्हा मार्गी लागलो.. तीन साडेतीनच्या दरम्यान अचानक हायवेच्या बाजूलाच हे साहेब बसले होते. . अर्धा तास थांबून गाडीला विश्रांती दिली. थंडगार पाणी, थम्सअप-फ्लोट व एक बर्गर खाल्ला. इतका वेळ दबकत दबकत गाडी चालवत होतो आता वेग थोडा वाढवला. अचानक रस्त्याच्या बाजूला कसले तरी ठेले दिसू लागले. पोंक असे लिहिले होते मात्र पोंक म्हणजे काय हे माहिती नव्हते. . हुरडा होता. मात्र बनवायची पद्धत भारी होती. फोटोमध्ये भट्टी दिसत आहेच. मांडी घालून बसलेला माणूस ज्वारीची कोवळी कणसे भाजत आहे.. मातीमध्ये!!!! रेती सारखी दिसत असली तरी ती अतीतलम माती आहे, त्यात भाजलेली कणसे खुर्चीवर बसलेले दोन जण पिशवीत टाकत होते आणि पिशवी काठीने बडवून भाजलेल्या कणसांपासून दाणे वेगळे काढत होते. अत्यंत टेस्टी कोवळे लुसलुशीत दाणे. कोणताही फ्लेवर नसल्यानेच बहुदा.. पण जाम भारी टेस्ट होती!! (हे दाणे ५०० रू किलो होते. इतके महाग का ते माहिती नाही.) . संध्याकाळी ७ ला बडोद्यामध्ये प्रवेश केला. सरळ शहरात न जाता अहमदाबाद रोड व नंतर रिंग रोडने शहरात प्रवेश केला. जीपीएसवर डेस्टीनेशन खूप आधी सेव्ह केल्याने ते सेव्हड आहे हेच विसरलो व चुकत चुकत घरी पोचलो. ;) सकाळपासून १२ तासांत ४४० किलोमीटर रनींग झाले होते. गाडीने विनातक्रार सोबत केली होती. दोन तीन दिवसांपासून असलेला ताण एकदम कमी झाला. सुरक्षीतपणे पोहोचलो होतो. सलग असा एकट्याने केलेला पहिलाच इतका मोठा प्रवास. त्यामुळे थोडे टेन्शन होतेच.. ते सपशेल गेले. घरी पोहोचून टेकतो न टेकतो तोच मितेशजींनी बाँब टाकला.. "अपने को आज रातकोही पतंग बजार में जाना हैं!" (क्रमशः) *************************************** * - पुणे ते बडोदा संपूर्ण प्रवासात ६८ चे माईलेज मिळाले. ***************************************

67 टिप्पण्या 28,456 दृश्ये

Comments

अर्धवटराव नवीन

जियो मोदक शेठ. करा करा... भरपूर पतंगबाजी करा.

चौकटराजा नवीन

In reply to by अर्धवटराव

मोदक स्वत: च एक पतंग आहे. या " गडा" वरून त्या गडा" वर जायची त्याला हौस आहे. त्याने पतंगबाजी वेगळी ती काय करायची ब्वा ? बाकी मोदक राव थे मयाक्डोनल्ड मधे ढोकळो मळे ?

पिलीयन रायडर नवीन

In reply to by चौकटराजा

मोदक स्वत: च एक पतंग आहे
खरंय... हा पतंग बरेच दिवस कुठेच लहरताना दिसेना म्हणुन शोधाशोध केली तर समजलं की साहेब बडोद्यात लहरत होते!! हा ही भाग मस्त झाला आहे मोदका..! मी कधीही "मॅकडोन्ल्डस" च नाव दुसर्‍या भाषेत आणि एवढ्या मोठ्या साईझ मध्ये लिहीलेलं पाहिलं नव्ह्तं.. भारी वाटलं.. आणि हुरडा पाहुन जी जळजळ झाली आहे ती नंतर सावकाशीने ख.व मध्ये व्यक्त करण्यात येईल..

अर्धवटराव नवीन

In reply to by चौकटराजा

काय शायराना अंदाझमे मोदकाचा आशिक मिजाझ मांडलाय... तो हि असा असा रांगड्या मराठीत. दिल खुष हो गया. अब लगे हातो त्या "गडां"ची नावेही सांगुन टाका ;)

प्यारे१ नवीन

+१ वरीलप्रमाणे. खरी पतंगबाजी सुद्धा करा असं म्हणायचंय का हो तुम्हाला अर्धवटराव?

श्रीरंग_जोशी नवीन

जोरदार प्रवासवर्णन आहे. फटू छान आहेत. का कुणास ठाऊक मला या लेखमालिकेवर परिक्रमेच्या लेखमालिकेचा प्रभाव जाणवतोय :-) .

झकासराव नवीन

४४० किमी... बाबौ!!!!!!!! मस्त सुरुय. :) ३०० च्या वर मला झेपत नाही.

आदूबाळ नवीन

जबरा! तुमच्या गाडी चालवण्याच्या ष्टॅमिनाला सलाम! तो हुरड्यासारखा प्रकार सर्व करताना त्यावर एक सुकी लाल मिर्ची खोचून देतात. एकदा ती खाल्ली आणि फुल रॉकेट झालं.

विटेकर नवीन

उत्तम लेखन आणि त्याहीपेक्षा उत्तम उपक्रम ! मी याच मार्गाने दोन वर्षापूर्वी पुणे - गरुडेश्वर केले आहे पण कार ने ! सकाळी सहा वाजता पुणे सोडले ( सहकुटुंब-- ही पण एक अ‍ॅचिवमेंट !) संध्याकाळी साडे पाच वाजता गरु डेश्वर दत्त मंदिराच्या दारात ! आणि पावसाची संतत धार चालू होती ! एकूण ५४७ किमि. अधिकांश वेळ आणि रहदारी तलासरी पर्यंतच होती नंतर सुसाट !!! आणखी एक ! महाराष्ट्राच्या मानाने गुजरातमधील रस्ते अधिक सुंदर आणि टोल कमी आहेत. मी थेट बडोद्याला न जाता ( गुगल बाबा झिंदाबाद ) आतले रस्ते पहावेत म्हणून अलिकडेच बार्डोली ( तेच ते स्वातंत्रय्पूर्व कालातील शेतकर्यांचा सत्याग्रह वाले ), राजपीपला मार्गे गरुडेश्वरला गेलो.आतले रस्ते ही सुपर्ब आहेत . ऐन पावसाळ्यात देखील रस्ता खड्डेविरहीत होता. आणि अगदी गेल्या आठवड्यात पुणे - नाशिक कल्याण मार्गे केले ( पुणे -नाशिक संगमनेर मार्गे करण्याची माझी हिम्मत होत नाही ..भयानक रहदारी आणि एकपदरी मार्ग ! जरा नाक काढले की समोरचे वाहन अंगावर येते !)आणि कल्याण फाट्याच्या अलिकडेच नाशिक कडे अशी पाटी दिसल्याने " चुकुन " वळलो .. पुन्हा नाशिक रस्त्याला लागेपर्यंत भयानक रस्ता होता!!! असा काही रस्ता आहे आणि तो दुस्रुस्त करावा लागतो अशी काही नोंद सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दप्तरी नसावी. ब्रिटिशांच्या नंतर त्या रस्त्यावर सरकार फिरकलेच नसावे.किंवा नुसतेच "कागदोपत्री" फिरकले असावे !

मोदक नवीन

In reply to by विटेकर

सकाळी सहा ते संध्याकाळी साडेपाच - सहकुटुंब - ५४७ किमी - जबरदस्त!!! महाराष्ट्राच्या मानाने गुजरातमधील रस्ते अधिक सुंदर आणि टोल कमी आहेत. टोलबाबत माहिती नाही पण रस्त्याबाबत ही तक्रार अनेकदा अनेक ठिकाणी ऐकली आहे. कागलनंतर कर्नाटकात रस्ता चांगला आहे.. वापीनंतर गुजरातमध्ये रस्ता चांगला आहे.. मुदलात गोल्डन क्वाड्रीलॅट्रल हा NHAI चा प्रोजेक्ट आहे आणि NHAI चे काम केंद्रसरकारच्या अखत्यारीत असताना असा प्रादेशीक भेदभाव नक्की आहे का..? असल्यास का आहे..? मला तरी NH-8 घोडबंदर रोडपासून (बडोद्यापर्यंतच!) चांगला वाटला. बडोद्यापुढे रूंदीकरण सुरू आहे आणि तो रस्ता एकेरी / क्वचित दोन लेनचा आहे. एकपदरी रस्त्यांविषयी.. अशा रस्त्यावर गाडी चालवायला मला आवडते. ते वेगळेच 'टशन' असते. आणखी ५ / १० वर्षांनी कदाचित मत वेगळे असेल पण सध्यातरी 'शिंगल लेन' रोडला गाडी चालवायला मिळाली तर वेगळाच आनंद मिळतो.

दाते प्रसाद नवीन

In reply to by मोदक

अगदि. मी बंगलोर-पुणे (८५० किमी - Door to door) अनेक वेळा गाडीने आलो आहे . १२- १३ तास लागतात . कोल्हापूरपासून प्रवासाचा वेग कमी होत जातो . कर्नाटकात टोल महाराष्ट्रापेक्षा कमी आहे . टोलनाक्यावर सुद्धा वेळ कमी लागतो . पुण्याजवळ एका विशिष्ट टोलनाक्यावर २०-२५ मि. सहज लागतात .( बहुतेक शिरवळ ) पण आता कर्नाटकातील हाय वे maintenanceचे काम आय आर बी ला मिळाले आहे , त्यामुळे टोल वाढायची शक्यता आहे. गुजरातेत अमदाबाद -बडोदा हायवे झकास आहे (spped limit 100 kmph official).

मोदक नवीन

In reply to by दाते प्रसाद

गुजरातेत अमदाबाद -बडोदा हायवे झकास आहे (spped limit 100 kmph official). एक शंका. याही एक्प्रेस हायवेवर दुचाकी वाहनांना बंदी आहे का..? नकाशात आणंद पर्यंत NH-8 दिसतो आहे.. परंतु आणंद नंतर एक्प्रेस हायवेच्च आहे. रच्याकने - NH-8 जेथे एक्प्रेस हायवेला मिळतो तेथे (अनिमेश स्वामी पार्कजवळ) एक झकास इंटरसेक्शन (मराठी?) आहे. मॅप्सवरूनही त्याची भव्यता लक्षात येते.

संतोषएकांडे नवीन

In reply to by मोदक

होय. दुचाकी वाहनांना सक्तीची बंदी आहे. भारताचा पहिला एक्स्प्रेस हाइवे 'महात्मा गांधी द्रुतगति मार्ग नंबर १'या नावाने ओळखला जातो. बडोद्याहून प्रवेशानंतर सरळ अमदावादला निकासी असून फक्त आणंद आणी नडीयाद या दोन ठिकाणी निकासीची सोय आहे. आणंदहून पुढे पण NH8 च आहे. आणी तो अमदावादला नारोलला टच होतो.

पैसा नवीन

In reply to by दाते प्रसाद

गोव्यातून बेळगावला जाताना एन एच्४ए वरून जावे लागते. नॅशनल हायवे आहे पण गोव्याच्या सीमेपर्यंत उत्कृष्ट रस्ता आहे आणि अक्षरशः रेघ आखल्यासारखा कर्नाटक बॉर्डरपासून पुढे खानापूरपर्यंत नुसते खड्डे. हे कसं काय? आणि ही अवस्था गेली कित्येक वर्षे आहे.

बाबा पाटील नवीन

In reply to by पैसा

रात्री च्या अंधारात विचारत विचारत आम्ही चाललो होतो.फक्त डंपर सोडुन दुसरे कुठलेही वाहन रस्त्याने दिसत नव्हते.२५ किमी ला ५ तास लागले होते.नशिब स्कॉर्पिओ सारखा रणगाडा जवळ होता,जर चुकुन कार त्या रस्त्यावर घेतली असती तर २ - ३ किलोमिटरलाच तिला एखाद्या डंपरमध्ये चढवावी लागली असते,पण हे दहा वर्षापुर्वी आता हा रस्ता किती सुधरला आहे माहिती नाही,पण आजही गोव्यात त्या रस्त्याने जायची हिंमत होत नाही.

बॅटमॅन नवीन

हा भाग थरारक झालाय. पण ते इतकी झोप डोळ्यांत ठेवून प्रवास करणे काही पटले नाही. कुठं काही नघडतं घडलं असतं म्हणजे? असो. कल्जि घेण्यास आपण समर्थ आहातच, पण राहावले नाही म्हणून लिहिले. बाकी खादाडीचे वर्णन आवडले. गुर्जरदेशाची ट्रिप करण्याचा मानस आहे, बघू कधी प्रत्यक्षात येतो ते.

मोदक नवीन

In reply to by बॅटमॅन

झोपेच्या प्रकरणाला मी पण टरकून होतो आणि जर झोप अनावर होत आहे असे वाटले तर वाटेतल्या एखाद्या ठिकाणी दिवसाच मुक्काम करणार होतो.. ११ वाजेपर्यंत थोडीशी दमणूक जाणवत होती. नंतर पुन्हा फ्रेश झाल्याप्रमाणे रूटीन सुरू झाले त्यामुळे पुढचा प्रवास पूर्ण करण्याचे धाडस केले. अनाठायी जोखीम पत्करण्याची माझीही तयारी नव्हती. कल्जि बद्दल धन्स! :)

नितीन पाठक नवीन

१२ तासात ४४० किमी. लैइच स्टैमिना म्हनायचा कि ओ. परंतु ४४० किमी च्या मानाने प्रवास वर्णन कमी वाटते. NH-8 ते सुरत जरा डाइरेक्ट शॉर्टकट मारल्या सारखा वाटतोय. या प्रवासातील एकून सर्वसाधारण ताशी वेग, मधल्या घडामोडी याची माहिती मिळावी.

राही नवीन

प्रवासवर्णन छान आहे पण फार भराभर आटपले आहे. जरा विस्ताराने आले असते तर आनखी मजा आली असती. तो सुरणासारखा दिसत असलेला कंद म्हणजे कोनफळ आहे. उंधियूंमध्ये हा पाहिजेच. रताळी, कणग्या, करांद्यासारखा हा उकडूनही खाता येतो. पण फार पिठूळ आणि थोडासा बुळबुळीत लागतो. ह्याचे तळलेले काप छान लागतात. खीरही छान होते. हे कोनफळ उपासाला चालते. पोंक खाताना त्यावर लिंबू पिळून चाट मसाला अथवा सैंधव भुरभुरवतात आणि वरतून बारीक शेव पसरून खातात. कोथिंबीरही असते. आपल्या हुरडा पार्टीसारख्या तिकडे पोंक पार्टीज प्रसिद्ध आहेत. अहमदाबादच्या बाहेर विस्तीर्ण फार्म-हाउसेज़ आहेत तिथे या दिवसांत पोंक पार्ट्यांना बहर आलेला असतो.

मोदक नवीन

In reply to by राही

माहितीबद्दल आभार्स.. कोनफळ आतून फिकट जांभळ्या रंगाचे असते का..? @ नितीन आणि राही... तो प्रवास असा शॉर्टकट मारल्यासारखाच झाला ;) फारशा काही घडामोडी घडल्याच नाहीत.. तरीही अधिक माहिती अ‍ॅडवली आहे. पुढचे भाग याहून मोठे नक्की असतील याची काळजी घेईन. गाडी थांबवून फोटो काढण्याचा आळस तसेच वेळेचे गणित जुळवायचे असल्याने फोटो कमी काढले गेले. :(

राही नवीन

In reply to by मोदक

होय, कोनफळ आतून थोडे जांभळट गुलाबी रंगाचे असते. लवेंडर रंग म्हणतात तसे. फिकट आमसुली सुद्धा म्हणता येईल. कोनफळाचा वेल चौधारी असतो तुळशीच्या खोडासारखा. या वेलाच्या पानाच्या अ‍ॅक्सिलमध्ये करांद्यासारखे कंद धरतात, आकाराने पसरट आणि वेडेवाकडे. त्यांना भेबडें म्हणतात. ही भेबडेसुद्धा जमिनीतल्या कोनफळकंदासारखीच लागतात.

डॉ सुहास म्हात्रे नवीन

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

"उंबाडियु" म्हणजे कोकणातली "पोपटी". त्या शेगा घेवड्याच्या नसून वालाच्या आहेत. हे सगळे पदार्थ कोकणात भांबुर्डिच्या पानाने झाकून मडक्याचे तोंड बंद करतात. भांबुर्डिचा एक प्रकारचा तिखटपणा आणि सुवासिकपणा त्या पदार्थांना येवून त्यांची लज्जत वाढवतो. ही पोपटी ओल्या नारळाच्या खोबर्‍याबरोबर खायला मस्त लागते. लहानपणी आजोळात केलेल्या मजामजा आठवल्या.

मोदक नवीन

In reply to by रुस्तम

भांबुर्डीचा पाला म्हणजे नक्की कशाचा पाला..? पुण्यात शोधाशोध करावयाची असल्यास याच नावाने करावी का..?

डॉ सुहास म्हात्रे नवीन

In reply to by मोदक

ही वनस्पती कोकणात माळरानांवर तणासारखी उगवते. पुण्याकडे कधी पाहिली नाही किंवा काय नावाने ओळखली जाते ते माहित नाही. पाने हातात चुरगळली तर एक उग्र सुगंध येतो. पानांची चव तिखट असते. पोपटी सोडून इतर उपयोग पाहिला नाही.

संपत नवीन

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

"उंबाडियु" म्हणजे कोकणातली "पोपटी". हे ठाऊक नव्हते. पोपटीमध्ये अंडी, चिकन, वांगीदेखील घालतात. हा प्रकार आमच्या अलिबाग बाजूला असतो, पण कोकणात इतर ठिकाणीही करतात का?

कैलासवासी सोन्याबापु नवीन

भोपाळच्या एन आय टी ला असलेल्या एका मित्राला गर्लफ्रेंड ची आठवण आली म्हणुन अंगात एक टी कंबरे खाली बर्मुडा बर्मुड्याच्या खिशात एटीएम अन लायसन अन मागे पागल प्रेमी दोस्त असल्या आमच्या पहिल्या "अमरावती-भोपाळ" यात्रा ऑन सी.बी.झेड आठवली महाराजा!!!!. ५०-५५ हाच स्पीड अप्रतिम असतो, बाईक ट्रिप चा मुद्दा काय ? तर आजुबाजुच्या निसर्गाचा आस्वाद घेत केलेली रोमांचक दुचाकीची मुशाफिरी!, ह्यात ९० च्या स्पीड मधे काय डोंबल निसर्ग दिसतोय! मग त्या स्पीड मधे काय हशील!!! असो!! फिरते रहा, अ‍ॅडव्हेंचर्स करत रहा पुलेशु

संतोषएकांडे नवीन

. घ्या बडोद्याच्या संक्रांतिचा संध्याकाळचा फोटो

विजुभाऊ नवीन

जमले तर बडोद्याच्या " मकरपुरा" पॅलेस ला भेट द्या. एकदम मस्त आहे. बर्‍याच हिन्दी हॉरर चित्रपटात ही हवेली दर्शन देवुन गेलेली आहे.

संतोषएकांडे नवीन

In reply to by विजुभाऊ

आता मकरपुरा पॅलेसला भेट देणं शक्य नाही. कारण एयरफोर्सने त्याला आपलं हेडओफीस बनवलय. फोटो घेण तर अजीबात शक्य नाही. हो,जर पाहायचाच असला तर दरवाजा, तहेखाना आणी पुराना मंदिर व दुसर्या बर्याच हॉरर फिल्मांमधे तो पहायला मिळेल.

मोक्षदा नवीन

उधिओचा भाऊ उम्बदिओ असावा असे वाटते उन्दिऊ ‘उलटी खोपडी’ म्हणजे मडके उलटे करून सुरती पापडी गोराडू (कंद/कोनफळ ) इतर पदार्थ तेच करण्याची हीच पद्धत झग्रात जमिनी खालील धग ढेऊन उकडतात त्यात थोडे तेल घालत असावे , ओली हिरवी चटणी त्याबरोबर खाण्यास देतात ,फोटो टाकल्याने अंदाज आला

मोदक नवीन

In reply to by मोक्षदा

बरोबर. आंबेहळदीची हिरवी चटणी भाजलेल्या कंदांसोबत सोबत दिली होती.

सुधांशुनूलकर नवीन

वडोदर्‍याला लीलो चिवडो आणि दुलीरामचा (टॉवरने पासे) पेंडा खाल्लाच (आणि येताना बरोबर भरपूर आणलाच) पाहिजे. सयाजी बाग बघायचीच. जमलं तर (आणि परवानगी असली तर) राजवाडा जरूर बघा. तिथे राजा रविवर्मांची मूळ चित्रं आहेत. पुभाप्र सर्वांचाच, सुधांशुनूलकर

संतोषएकांडे नवीन

In reply to by सुधांशुनूलकर

राजवाडा पाहण्याची परवानगी देत नाहीत. फक्त गणपतिच्या सात दिवसात तो पाहायल मिळतो.कारण राजवाड्याच्या गणपतिंच दर्शन जाहीर प्रजे साठी असतं. आणी अरजंट पाहायचाच असेल राजवाडा तर सध्या टी वी वर येणार्या 'व्हीस्पर' च्या जाहीरातीत तो दाखवला आहे.

संतोषएकांडे नवीन

In reply to by मोदक

होय, नवीन राजवाडा म्हणजे लक्ष्मीविलास पॅलेस.१८९४ मधे त्याची निर्मीती. त्या आधी गायकवाड सरकार सरकार वाड्यात रहायचे.

पैसा नवीन

In reply to by संतोषएकांडे

तुम्हाला गुजरात/बडोद्याची बरीच माहिती दिसते आहे. एखादा स्वतंत्र लेख येऊ द्यात!

राही नवीन

मला वाटते राणीवशातील स्त्रियांच्या वस्त्रांचे (आणि राजपुरुषांच्याही) एक संग्रहालयही आहे. त्यात चिमणाबाई राणीसाहेबांची खर्‍या मोत्यांचे जडावकाम असलेली चोळी, खर्‍या (अस्सल सोन्याच्या) जरीचे तारकाम, चांदीसोन्याच्या तारांनी विणलेली पैठणी, बसरा मोती जडवलेले मंदिल असे बरेच काही पाहिल्याचे आठवते. राजकुमारांची मिनिट्रेन सुद्धा होती. राजेसाहेबांचा एक खास रेल वे डबाही होता पण तो बडोद्यात पाहिला की आणखी कुठे ते आता नीटसे आठवत नाही. गुजरात आणि मेवाडात 'लिलवो' हे प्रकरण खूप लोकप्रिय आहे. लिलवो म्हणजे ओल्या तुरीचे किंवा तत्सम ओल्या कडधान्याचे दाणे. जिथे जिथे गुजराती वस्ती आहे तिथे तिथे हे दाणे विकायला असणारच.

मोदक नवीन

In reply to by राही

"सयाजी बाग" त्या म्युझीयमचे नाव. जुन्या काळच्या अनेक वस्तू आहेत. पोषाख, शस्त्र, वाद्य (संगीत) असे वेगवेगळे विभाग आहेत. व्हेल माशाचा ७१ फूटी हाडाचा सांगाडाही आहे. (नेहमीप्रमाणे) फोटो काढायला परवानगी नव्हती. मात्र आवारातच देवदेविकांच्या आणि तत्सम पुरातनकालीन मुर्ती जतन करून ठेवल्या आहेत. त्यांचे फोटो काढून वल्ली ला सुपूर्त केले आहेत. रेल्वेचा डबा बहुदा लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये असावा. हा पॅलेस उत्तरायण मुळे बंद होता. लिलवो मागच्या ट्रीपमध्ये खाल्ले आहेत. गहू, ज्वारी वगैरे धान्येही हिरव्या स्वरूपात मिळतात. हिरवी बडीशेपही मिळाली आणि पुण्यापर्यंत व्यवस्थीत राहिली. पोपटीच्या लिंकबद्दल धन्स!!!

बॅटमॅन नवीन

In reply to by मोदक

त्या म्यूझियममध्ये एक १२०० किलो वजनाचा दगड आहे का? तो म्हणे गामा पैलवानाने १९०२ साली जरा वेळ उचलला होता. http://en.wikipedia.org/wiki/The_Great_Gama#Lifted_1200_kg_stone

मोदक नवीन

In reply to by बॅटमॅन

नाही पाहिला. व्हेलच्या सांगाड्याप्रमाणे मार्केटींग करण्याचे जबर पोटेंशिअल असलेला प्रकार आहे पण त्याची वेगळी पाटी वगैरे दिसली नाही. अडीच फूट उंच असेल तर किती लांब असेल..? १२०० किलो म्हणजे जरा जास्ती वाटते आहे. अर्थात तुझ्यावर किंवा विकीवर संशय नाही पण गणित जुळत नाहीये.

बॅटमॅन नवीन

In reply to by मोदक

शंका बरोबर. http://geology.about.com/cs/rock_types/a/aarockspecgrav.htm इथे कॉमनली आढळणारे खडक आणि त्यांची घनता दिलेली आहे. जनरली पाहिले तर सर्व खडक हे २.२ ते ३ टन प्रति घनमीटर या रेंजमध्ये आहेत. तस्मात अदमासे ३*३*३ फूट वाला दगड घेतला तरी त्याचे वजन अदमारे २२०० किलो असेल. सच्छिद्रता इ. सगळे जमेला धरूनही १२०० किलो साईझ होण्यासाठी अडीच फूट हाईट असेल तर लांबीरुंदी दोनेक फूट असली तरी लै झालं, नै का?

बॅटमॅन नवीन

In reply to by बॅटमॅन

अगदी दोनेक फूट नसली, तरी अडीच फूट हाईट, चार फूट लांबी अन फूटभर रुंदी अथवा आसपास अशी मापे असावीत असे वाटते. तस्मात दगडाचे टेन्शन नाही. पण मुळात मनुष्य इतके वजन अगदी दोनचार सेकंद तरी उचलु शकतो का? तर ऑफिशियल रेकॉर्डमध्ये प्रॉपर वेटलिफ्टिंग मध्ये तीनचारशे किलो आहे. तस्मात नीट वजन उचलायचे नसेल, फक्त उचलून दोन सेकंदात ठेवले असे असेल तर बाराशे तत्त्वतः शक्य वाटते.

मोदक नवीन

In reply to by बॅटमॅन

तस्मात दगडाचे टेन्शन नाही. लिंक बद्दल धन्स. नवीन माहिती मिळाली. :) शक्य असेल. जुन्या लोकांबद्दल ज्या अचाट गोष्टी ऐकतो त्यानुसार हे अगदीच अशक्य नाही.

संतोषएकांडे नवीन

In reply to by राही

विचार आहे की 'लिलवो'ची रेसीपी टाकूनच द्यावी एकदाची.बरेचसे मिपाकर लिलवाप्रेमी दिसतायत.

संतोषएकांडे नवीन

In reply to by राही

राजकुमारांची मिनिट्रेन आधी राजवाड्याच्या ६०० एकरच्या परिसरात फक्त राजकुमारांसाठी होती.नंतर महाराजांनी ती ट्रेन सयाजीबागेत जाहीर इतर मुलांसाठी दिली.आता ट्रेन बंद केली असून त्याच्या जागेवर जरा मोठी ट्रेन नगरपालिकेनी ठेवली आहे. त्या गाडीत बाळांबरोबर त्यांचे पालकही बसू शकतात. आणी पूर्वीची ट्रेन पाहायचीच असेल तर आठवा शम्मी कपूरचं 'ब्रह्मचारी' आणी त्याचं गाणं चक्के पे चक्का चक्के पे गाडी.ची गाडी. ती च ती मिनिट्रेन....

पैसा नवीन

तू निशाचर प्राणी असल्याचे माहिती आहे त्यामुळे झोपेत बाईक चालवलीस याचं काही नवल वाटलं नाही. पण नॅशनल हायवेवर जास्त रिस्का घेऊ नको. वर्णन मस्तच! खरं तर मलाही बाईकवरून लांब कुठे जायचा मोह होत आहे. आमचा ड्रायव्हर तयार होतो का बघू! ;)

सस्नेह नवीन

तब्बेतीत चाललाय की दौरा ! फोटो मस्त !