मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य

माहितगार · · काथ्याकूट
अगदी अलिकडे पर्यंत गीतारहस्य म्हणजे लोकमान्य टिळकांनी लिहिलेला ग्रंथ एवढच सामन्यज्ञान होत.पण एकेकाळी ह्या ग्रंथाने विक्रिचे तत्कालीन विक्रम केले असावेत असे वाटते. लोकप्रभा साप्ताहीकातील एका लेखात डॉ.यशवंत रायकर यांनी, '१९१५च्या जून महिन्यात प्रसिद्ध झालेल्या गीतारहस्याच्या सर्व प्रती संपल्यामुळे लगेच सप्टेंबर महिन्यात पहिले पुनर्मुद्रण करावे लागले.' अशी माहिती दिली आहे.या ग्रंथाचा जो भाग (बहुधा शेवटील भाग) ऑनलाईन उपलब्ध झाला ते १९२४ सालचे पुर्नमुद्रण आहे त्यावर ५००० प्रती असा आकडा आहे. लोकप्रभा साप्ताहीकातील डॉ.यशवंत रायकर यांचा हा लेख इतर बाबीकरता वाचनीय (आणि चर्चा करण्याजोगा) आहेच पण त्यात रायकरांनी एखाद्या विषयावर लेखन करताना एखादा परिपेक्ष,एखादी बाजू कशी सुटून जाऊ शकते याचा उहापोह केला आहे. रायकरांचा लेख आणि गीतारहस्याचा ऑनलाईन उपलब्ध भाग वाचताना अजून एका गोष्टीकडे लक्ष गेल ते म्हणजे लोकमान्य टिळकांनी अवलंबिलेली संस्कृत ते मराठी अनुवादाकरता अवलंबलेली पद्धतपण उल्लेखनीय आहे. गीतारहस्याचा ऑनलाईन उपलब्ध भाग मराठी विकिस्रोत प्रकल्पात या दुव्यावर उपलब्ध केला आहे.(मराठी विकिस्रोत प्रकल्पात पिडिएफ फॉर्मॅटचे वाचन करताना युनिकोडीकरण करत लिहिण्याची म्हणजे ग्रंथ बारकाव्याने अभ्यासण्याची संधी सुद्धा उपलब्ध होते) गीतारहस्याचा उपलब्ध सदर ऑनलाईन भाग आणि रायकरांचा लेख याच्या वाचना नंतर काही प्रश्न पडले ते असे १) गीतारहस्य ग्रंथाचे अधिकृत नाव श्रीमद्भभगवद्गीतारहस्य असे आहे का ? २) गीतारहस्य ग्रंथाचे एकुण भाग किती ? (अर्काइव्ह डॉट ऑर्गवरून विकिस्रोतावर आणलेली मूळ प्रतीचे १९२४चे पुनर्मुद्रण गीतारहस्य ग्रंथ आहे पण पृष्ठ संख्या कमी आहे का हा गीता रहस्याशी संबंधीत ग्रंथ आहे आणि सुयोग्य आवृत्ती आहे यास दुजोरा/खात्री करून हवी आहे.कारण प्रथम पृष्ठावर ह्या ग्रंथाचा शेवटील भाग असा उल्लेख दिसतो आहे.) *(कुणाकडे गीतारहस्याचे अजून भाग असतील तर ते मराठी विकिस्रोत प्रकल्पात युनिकोडीकरणाकरता पिडिएफ फॉर्मॅटमध्ये उपलब्ध करून देऊ शकल्यास हवे आहेत) *(ऑनलाईन उपलब्ध (दुसर्‍या का शेवटच्या ?) भागात काही पृष्ठे रिकामी दिसताहेत.२रे, १६वे व १८वे पान रिकामे आहे ह्यातील एखादे पान गहाळ नसून मूळातूनच रिकामे असल्याची खात्री करून हवी आहे.) ३) उपरोक्त ग्रंथाच्या प्रथमपृष्ठावर "कर्मविपाकसिद्धांत" असा ग्रंथ नामोल्लेख दिसत नाही मग तो कुठून येतो ? ४) लोकप्रभेतील रायकरांच्या लेखात "मीमांसाशास्त्रातले ग्रंथतात्पर्य काढण्याचे सात नियम" असा उल्लेख येतो ते सात निय्म कोणते इत्यादी माहिती हवी आहे.गीतारहस्य बद्दल इतर माहिती चर्चा झाल्यास स्वागतच असेल. उपलब्ध झालेली माहिती मराठी विकिपीडियावरील लेख लिखाणात वापरण्याचा मानस आहे. येत्या वर्ष २०१४ करता आपण सर्व आणि मिपा परिवारास शुभेच्छा.

वाचने 57904 वाचनखूण प्रतिक्रिया 106

In reply to by arunjoshi123

अवतार Sun, 12/29/2013 - 22:16
हे त्या काळच्या पुणेरी ब्राह्मण समाजातील चालीरीतींना धरूनच होते. ते नुसतेच टिळक राहिले असते तर हे वागणे देखील दुर्लक्षित राहिले असते. पण ते राष्ट्रीय स्तरावरील पुढारी असल्यानेच इतर ब्राह्मण समाजाप्रमाणे त्यांचे सनातनी वागणे हे अधिक उठून दिसते. विशेषत: वेदोक्त प्रकरणात शाहू महाराजांच्या विरोधी भूमिका घेणे, पंचहौद मिशन चहा प्रकरणात काशीला जाऊन सर्व ज्ञात-अज्ञात पापांसाठी प्रायश्चित्त घेऊन येणे, स्वत:च्या कन्येला इंग्रजी शिकणे वर्ज्य करणे; ह्या भूमिका त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या भूमिकेला छेद देऊन जातात. पण ह्याच शाहू महाराजांनी चिरोल खटल्याच्या वेळी टिळकांना गुप्त रीतीने मदत केली होती, टिळकांच्या निधनाची वार्ता कळल्यावर राजवाड्यावरील झेंडा अर्ध्यावर उतरवला होता हे देखील विसरता येत नाही. टिळक काय आणि शाहू काय, यांना त्या काळाच्या मर्यादा होत्या. त्या मर्यादांच्या संदर्भातच त्यांच्या एकूण व्यक्तित्व आणि कर्तृत्वाचा विचार व्हायला हवा. संत चोखामेळा ह्यांचा एक सुंदर अभंग आहे.
उस डोंगा परी रस नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा ||

In reply to by अवतार

माहितगार Mon, 12/30/2013 - 11:28
नमस्कार, लोकमान्य टिळकांना/ची टिका टिळकांना स्वतःसही नवीन नव्हती.प्रसंगी त्यांच्या जिवलग मित्रांनी, सख्ख्या मुलांनीही त्यांच्या चहात्यांनीही टिका केली.तत्कालीन काँग्रेसमधील मवाळांनी काँग्रेस अधिवेशनात जहाल झाले होते आणि जहाल शांत होते.या सर्व गोष्टी टिळक बहुतांश अभ्यासकांना बर्‍यापैकी माहितही आहेत.टिळकांच्या नंतरच्या पिढ्यांनी टिका यथायोग्य आदरपुर्वक स्विकारून आपापल्या मार्गांना लागले. या गीतारहस्य विषयक धाग्यावर आतापर्यंत आलेल्या टिकाकारांनी नविन काहीच माहिती आणलेली नाही.टिळकांवर जनरल अवांतर टिका करणारी मिपा संस्थळावर कधीच चर्चा झाली नाही, सोबत वेगळा धागा उघडणे शक्य नाही का ? भविष्यात वेगळी चर्चा घेणे शक्य नाही ? आणि टिका करावयाची असल्यास या धाग्याच्या गीतारहस्य या विषयाच्या मर्यादेत राहूनही टिका करता येते. तशी टिका स्वतःस न सूचल्यास डॉ.यशवंत रायकरांच्या लेखाचा दुवा चर्चा प्रस्तावात दिलाच आहे. गीतारहस्या संबधीत रायकरांची टिका परिच्छेद जसाच्या तसा कॉपी पेस्ट करून त्या बद्दलही चर्चा होऊ शकते. अस्थानी विषयास सोडून लेखन करून जे साध्य करण्याचा प्रयत्न आहे तो तरी खरेच साध्य होणार आहे का ? तर तेही नाही.कारण विषयास सोडून असलेल्या लेखनाकडे दुर्लक्षच होण्याची शक्यता अधिक असणार आहे.त्यामुळे कृपया विषयांतर टाळून "लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य" या मुख्य विषयास अनुलक्षून आपण लेखन करत आहोत ना ? हे बघण्याचे पथ्य/औचित्य सर्वांनी पाळून सहकार्य करावे, ही अजून एकदा नम्र विनंती आहे

In reply to by माहितगार

अवतार Mon, 12/30/2013 - 20:49
ही पहिलीच वेळ नाही. जिथून विषयांतर सुरु झाले तिथेच ही सूचना आवश्यक होती. मला जे साध्य करायचे आहे त्यासाठी दुसऱ्यांचा आधार घेण्याची गरज नाही. वर टिळकांविषयी जे लिहिले आहे ती वस्तुस्थिती आहे. टीका नव्हे. नुसतीच टीका करण्याने काही साध्य होत नाही. म्हणूनच त्या काळातील महामानवांच्या मर्यादा लक्षात घेऊनच त्यांच्या व्यक्तित्व आणि कर्तृत्वाचा विचार व्हायला हवा हे स्पष्टपणे लिहिले आहे. आणि मिपावर विषयास धरून नसलेल्या लेखनाकडे जर दुर्लक्ष होणारच असेल :) तर मग तुम्हीही दुर्लक्ष करणेच उचित ठरले नसते काय?

In reply to by अवतार

माहितगार Mon, 12/30/2013 - 22:03
नमस्कार, आपले म्हणणे अंशतः बरोबर आहे.मी प्रस्तावातच विषयांतर टाळावयाचे स्मरण दिले असते तर बरे झाले असते.मागच्या प्रस्तावात ती काळजी सुद्धा घेतली होती आणि नेमके या वेळी राहीले,पण जेव्हा विषयांतर होते आहे हे लक्षात आले तेव्हा १) "टाळण्यात सहकार्याबद्दल धन्यवाद" हा प्रतिसाद आधीच्या प्रतिसादास आवर्जून दिला. पण आपण म्हणता तसे प्रस्ताव पुन्हा बदलून विषयांतर टाळण्याची विनंती जोडण्याची सुविधा असती तर तेही केले असते.ते सध्या उपलब्ध नसल्यामुळे मिपा प्रशासनाला विषयांतर झाकण्याची (वगळण्याची नव्हे) सुविधा उपलब्ध असावी अशी विनंती सुद्धा टाकली. >>तर मग तुम्हीही दुर्लक्ष करणेच उचित ठरले नसते काय? आपले म्हणण्यात अंशतः तथ्य आहे. इतरांनी मांडलेल्या प्रस्तावात विषयांतर येते तेव्हा मी दुर्लक्षच करतो.हा प्रस्ताव मांडणारा मी असल्यामुळे विषयांतर टाळण्याची विनंती करण्याची नैतीक जबाबदारी माझी ठरते आणि केवळ जबाबदारी नव्हे तर एका रचनात्मक उपक्रमाच्या भाग असलेला चर्चा प्रस्तावाचे खूप विषयांतर होणार नाही हे पहाणेही जरूरी ठरते हे आपण समजून घेऊ शकाल असे वाटते. आपण म्हणता तसे ती कदाचित मिपाची संस्कृतीही असेल तर मात्र अधिक दुर्लक्ष करण्या शिवाय सध्या तरी काही पर्याय दिसत नाही.

In reply to by प्रचेतस

माहितगार Sun, 12/29/2013 - 12:59
मिपाकरांपैकी आणि तेही अलिकडच्या काळात गीतारहस्य कुणी विकत घेतली हि निश्चीत आनंदाची बातमी आहे.धाग्यात विचारलेल्या शंका बद्दल आपल्या मार्गदर्शनाची प्रतिक्षा असेल. तसेच आंतरजालावर अद्याप न आलेला भाग कुणाच्या साहाय्याने स्कॅन करून मराठी विकिस्रोत प्रकल्पात चढवता आल्यास तसे करून हवे आहे.जून २०१५ मध्ये ग्रंथास १०० वर्षे पूर्ण होतील तेव्हा पूर्ण गीतारहस्य आंतरजालावर चढवले जाऊन त्याचे युनिकोडीकरणात हातभार लावला गेल्यास नविन पिढ्यांची आणि अभ्यासंकाची चांगंली सोय होऊ शकेल. प्रतिसादा करता धन्यवाद

Atul Thakur Sun, 12/29/2013 - 12:45
अर्धवटरावांशी सहमत. टिळकांचे पांडीत्य आणि तेजस्वी बुद्धीमत्ता जागोजाग दिसुन येते. त्यावेळी त्यांच्या कर्म अनुषंगाने केलेल्या गीतेच्या मांडणीवर प्रचंड टीका झाल्याचे वाचले आहे. (संदर्भः लोकमान्य - नरहर फाटक) पण टिळक सर्वांना पुरुन उरले. मला तर आजही त्यांनी केलेली मांडणी सर्वात योग्य अशी वाटते. धाग्यापेक्षा जरा वेगळा प्रतिसाद आहे त्याबद्दल क्षमस्व.

In reply to by Atul Thakur

माहितगार Sun, 12/29/2013 - 13:03
नमस्कार आपला प्रतिसाद धाग्यास अनुसरूनच आहे.गीतारहस्य बद्दल (गीतारहस्यशी संबंधीत समर्थन आणि टिकेसहीत) सर्वंकष माहिती हवी आहे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद

मारकुटे Sun, 12/29/2013 - 12:56
गीतारह्स्य हे गीतेचे कर्म करा संदेश देते ह्या अनुषंगाने केलेले विवेचन आहे. तेच योग्य आहे अस नाही पण एक वेगळा दृष्टीकोन मिळतो. स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी लढणार्‍यांना प्रेरणा देण्याचे कार्य त्या ग्रंथाने केले. आज कदाचित त्याची गरज नाही. कदाचित भोगवादाला कंटाळलेली पिढी शंकराचार्यांच्या निवृत्तीपर भाष्यकडे आकर्षित होईल. कदाचित द्वैत वाद्याला श्रीभाष्य भावेल. कदाचित आळसात वेळ घालवणार्‍या पिढिला गीतारहस्य प्रेरीत करेल. कुणाला गीतेत काहीही नाही हे प्रतिपादन करतांना मुक्ती मिळेल.. कुणाला कसा आणि केव्हा आणि कुठला मार्ग सापडेल हे सांगता थोडीच येत? आपला आपला नशीबाचा भोग, भाग अथवा भाग्य!

In reply to by मारकुटे

धन्या Sun, 12/29/2013 - 13:36
कुणाला गीतेत काहीही नाही हे प्रतिपादन करतांना मुक्ती मिळेल..
असंही होऊ शकतं हा विचारच आला नाही कधी. ;) वल्लीशेठ, गीतरहस्य तुम्ही वाचत नसाल तर आम्हाला दया आधी वाचयला. :)

कवितानागेश Sun, 12/29/2013 - 16:23
घरी एक जुनी कॉपी आहे. त्यात या प्रकाशनाबद्दल, पानांबद्दल बघते आणि लिहिते. मला तरी काही वर्षांपूर्वी वाचताना भाषा क्लिष्ट वाटली, त्यामुळे पूर्ण वाचलं नाही.

In reply to by कवितानागेश

विकास Sun, 12/29/2013 - 18:01
लहानपणी वाचायचा प्रयत्न केला आणि भाषा समजली नाही म्हणून वाचले नाही. मला वाटते मूळ नाव हे, "श्रीमद्भगवद्गीता-रहस्य अथवा कर्मयोगशास्त्र" असे काहीसे नाव होते. गीतारहस्याचा भर हा त्यातील संन्यस्तयोगा कडे असण्यापेक्षा कर्मयोगाकडे आल्याने त्तत्कालीन हिंदू पंडीतांचा आधी आक्षेप होता. टिळकांचे म्हणणे होते की जी गीता युद्ध कर म्हणून सांगण्यासाठी केली आहे त्यात संन्यास कसला बघता... अजून एक तसा प्रसिद्ध किस्सा - मंडालेहून सुटून आल्यावर टिळकांच्या या लेखनाबद्दल आधीच माहीती जनतेला झालेली होती. पण इंग्रज तो ग्रंथ हस्तलिखित पटकन परत देत नव्हते. त्यामुळे अनेक जण काळजीने बोलायला लागले, की सरकारने ते परत केले नाही तर? टिळक शांतपणे म्हणाले की, "त्यांनी माझे हस्तलिखित घेतले आहे, डोके नाही!" त्यांना गीतार्हस्य हे बायबल जसे मिशनरी वाटतात तसे फुकट अथवा कमी किंमतीत वाटायचे होते. अर्थात ते पैशाअभावी फुकट वाटले गेले नाही पण स्वस्तात मात्र बाजारात आले आणि भराभर प्रती संपल्या.

In reply to by विकास

माहितगार Mon, 12/30/2013 - 12:53
विकासजी आपला प्रतिसाद गीतारहस्य ग्रंथाच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा माहितीपूर्ण असा आहे.तरीपण गीतारहस्याची १९१५ मधील किंमत ३ रुपये होती असे दिसते.३ रुपये हि किमंत १९१५ साली नेमकी कितपत कमी होती याची अधिक ससंदर्भ तुलनात्मक माहिती उपलब्ध कुणी करून दिल्यास धाग्यास अभ्यासपुर्णता येईल असे वाटते. आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादाकरिता धन्यवाद

In reply to by माहितगार

जयंत कुलकर्णी Mon, 12/30/2013 - 15:07
१९१३-१४ मधे एक मण गहू म्हणजे अंदाजे ३७.३ कि गहू ५ रु ४ आण्याला मिळायचा म्हणजे एका किलो गव्हाची किंमत होती दीड आणे. तसेच तांदूळ एक मण ५ रु ४ आणे, ज्वारी एक मण रु ४, बाजरी रु ३ आणे ८ प्रति मण.... त्या मानाने हे पुस्तक महागच म्हटले पाहिजे..... अजून मजेशीर माहिती येथे उपलब्ध आहे. http://dsal.uchicago.edu/statistics/1903_excel/

In reply to by कवितानागेश

माहितगार Mon, 12/30/2013 - 11:54
घरी एक जुनी कॉपी आहे. त्यात या प्रकाशनाबद्दल, पानांबद्दल बघते आणि लिहिते.
मिपा सदस्य जयंत कुलकर्णींकडून काही माहिती आली आहे.तरीही जेवढी अधिक माहिती मिळेल तेवढी हवीच आहे.
मला तरी काही वर्षांपूर्वी वाचताना भाषा क्लिष्ट वाटली, त्यामुळे पूर्ण वाचलं नाही.
काळा सोबत भाषिक बदल होतात,लेखकाच्या लेखनात आलेल्या तत्कालीन संदर्भांची आपणास कल्पना नसण्याचीही शक्यता असते.टिळकांना आणि इतर अनेक लेखकांना गीतेचे अनुवाद आणि भाष्य अनेक वेळा लिहावे लागले. त्यामुळे समिक्षा/भाष्य ग्रंथ आणि अशा चर्चा ग्रंथ समजून घेण्यास साहाय्यभूत होतात. बर्‍यापैकी मिपाकरांकडे घरी गीतारहस्याची आवृत्ती आहे.पुर्ण गीतारहस्य आंतरजालावर कुणाकडून चढवून मिळेल त्याच्या युनिकोडीकरणात कोणकोण सहभागी होईल ते माहित नाही म्हणून मी प्रत्येकास विनंती करतो आहे.या चर्चेच्या निमीत्ताने ही कामेही मार्गी लागल्यास गीतारहस्याच्या शतकपुर्तीपूर्वी मिपाकरांच्या मुकूटात एका चांगल्या कामाचा मानाचा तूरा खोवला जाईल असा आशावाद आहे. पुढील प्रतिसादाची प्रतिक्षा असेल. धन्यवाद

In reply to by जयंत कुलकर्णी

माहितगार Sun, 12/29/2013 - 18:36
नमस्कार वल्ली म्हणतात तसे आपणा कडे एवढी जुनी प्रत म्हणजे खरेच भाग्यवान.जयंतजी आपण म्हणता तसे हि प्रथमावृत्ती अथवा द्वितीयावृत्ती असावी कारण इस्वी सन १९१५ मध्ये अगदी चार महिन्याच्या कालावधीतच दुसरी आवृत्ती सुद्धा प्रकाशित झाली .आपणाकडे असणार्‍या ग्रंथाची पृष्ठ संख्या किती आहे हे समजले तर बरे पडेल. दुसरे आपण ज्या पानाचे चित्र दिले त्यावर बहिरंगपरीक्षण असा उल्लेख आहे.
>>सदरील ग्रंथात गीतेचे अंतरंगपरीक्षण तसेच बहिरंगपरीक्षण समाविष्ट आहे. ह्या ग्रंथाच्या स्वरूपाने मराठी भाषेमध्ये प्रथमच गीतेचे ’बहिरंगपरीक्षण’ केले गेले.अशी माहिती मराठी विकिपीडियावर आहे
यातील अंतरंगपरीक्षण तसेच बहिरंगपरीक्षण म्हणजे काय किंवा याचा संदर्भ काय असावा ? प्रथमच गीतेचे ’बहिरंगपरीक्षण’ केले गेले म्हणजे नेमके काय या बद्द्ल अधिक जाणून घेण्याची सुद्धा उत्सुकता आहे. प्रतिसादांकरता धन्यवाद

In reply to by माहितगार

जयंत कुलकर्णी Sun, 12/29/2013 - 19:09
अंतरंगपरिक्षण म्हणजे हे लिहिण्याची गरज नाही. गीतेचे अंतरंग खरेच काय सांगते त्याचे परिक्षण म्हणजे अंतरंग परिक्षण. बहिरंगपरिक्षणात इतर सर्व गोस्टी मोडतात. उदा. गीतेचा काळ, गीतेच्या इतर टीकांचा विचार, टिळकांनी याचे स्पस्टीकरण देऊन त्या परिक्षणाचे खालील भाग पाडले आहेत . त्याच्या मथळ्यांवरुन आपल्याला कल्पना येईल. गीता व महाभारत गीता व उपनिषदे गीता व ब्रह्मसूत्रे भागवतधर्माचा उदय व गीता हल्लीच्या गीतेचा काळ गीता व बौद्ध ग्रंथ गीता व बायबल मला वाटते हे ठीक आहे. मी काही यावर अधिकारवाणीने बोलू शकत नाही. या आधीक काहे माहिती विचरलीत तरमात्र गीता रहस्य परत वाचायला लागेल आणि एकदा सुरु केले की थांबणे कठीण...मग बाकीचे लिखाण मागे पडते.... :-)

In reply to by जयंत कुलकर्णी

माहितगार Mon, 12/30/2013 - 12:06
अंतरंगपरिक्षण आणि बहिरंगपरिक्षणातील ढोबळ फरक आपण माहिती करून दिलात. बहिरंगपरिक्षणाचा एवढा महत्वपूर्ण आंतर्भाव लोकमान्यांनी आपल्या लेखनात केला तरीपण गीता आणि महाभारत टप्प्या टप्प्याने विकसित झाले ह्याकडे टिळकांनी लक्ष का दिले नसावे ह्या बद्दल डॉ.यशवंत रायकरांच्या लेखनाची यानिमीत्ताने आठवण झाली. पूर्ण गीतारहस्यच ऑनलाईन उपलब्ध असावे अशी इच्छा आहे.म्हणजे तुम्हालाच वाचन अभ्यास आणि लेखनाची गळ घातली असे होणार नाही.दुसरे असेकी इतरांनी गीतारहस्य घरी असल्याचे म्हटले आहे पण आपण प्रत्यक्षात वाचले आहे त्यामुळे लगेच नसले तरी आधून मधून या धाग्यावर आपले मार्गदर्शन होत रहावे अशी विनंती आहे. आपल्या अभ्यापूर्ण आणि माहिती पूर्ण प्रतिसादांकरता धन्यवाद

In reply to by बॅटमॅन

माहितगार Mon, 12/30/2013 - 12:11
आपल्याकडे गीतारह्स्याची जुनी प्रत आहे या बद्दल अभिनंदन. गीतारहस्य ची प्रत असलेल्या मिपाकरांनी मराठी विकिस्रोत प्रकल्पाच्या माध्यमातून गीतारहस्य ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आणि तेथिल युनिकोडीकर्ण झालेला मजकुर वेळोवेळी तपासून मूळाबर हुकूम जसाच्या तसा आसल्याचे तपासण्यात सहकार्य केल्यास गीतारहस्याच्या प्रकाशनास शंभर वर्षे पूर्ण होताना एक चांगले कार्य मार्गी लागण्यात हातभार लागू शकेल असे वाटते. प्रतिसादाकरता धन्यवाद

Atul Thakur Sun, 12/29/2013 - 18:12
अर्जुन गीता ऐकल्यावर त्याने संन्यास घेतला नाही. योग्याप्रमाणे तो गुहेत जाऊन ध्यानाला बसला नाही आणि भक्ताप्रमाणे पुजापाठ वा नामसंकीर्तन करु लागला नाही. तो सरळ युद्धाला उभा राहिला आणि ज्या नातेवाईकांना पाहुन त्याला "सिदन्ती मम गात्राणि" वाटले होते त्यांना त्याने कापुन काढले. गीतेचा अर्थ कर्मयोगपर आहे याचा याहुन वेगळा पुरावा कोणता? मला आजवर त्याकाळच्या विद्वानांनी त्यांच्यावर आक्षेप का घेतला हेच कळले नाहीय.

In reply to by Atul Thakur

अर्धवटराव Mon, 12/30/2013 - 01:57
>>मला आजवर त्याकाळच्या विद्वानांनी त्यांच्यावर आक्षेप का घेतला हेच कळले नाहीय. -- अहो अक्षेप नाहि घेतला तर ते विद्वान कसले??? विद्वत्तेची कसोटी... कल भी थी, आज भी है, कल भी रहेगी.

In reply to by अर्धवटराव

माहितगार Mon, 12/30/2013 - 12:17
गीतारहस्यावर आक्षेप घेण्याकरताही काही किमान पातळीची प्रज्ञा लागत असेल असे वाटते, त्यामुळे अगदीच विद्वत्ता दाखवण्याकरता आक्षेप घेत्ले गेले होते किंवा कसे या बद्दल साशंकता वाटते.आक्षेपांशी सहमत होणे गरजेचे नाही पण समजून घेण्यास हरकत नसावी.अर्थात गीतारहस्यावरच्या तत्कालीन आक्षेपांचे कुणाकडून माहिती आली तर हरकत नसावी.

In reply to by माहितगार

अर्धवटराव Mon, 12/30/2013 - 13:55
"गीता कर्मप्रधान आहे कर्मसंन्यासी नाहि" हे एकच कारण आक्षेपांची फौज तयार करायला पुरेसं असावं त्याकाळि... कारण गीतेची संन्यस्त मांडणी विद्वज्जनांकडुन अगोदरच स्विकारली गेली होती. टिळकांनी मिल्ल, स्पेन्सर, काण्ट वगैरे प्रभृतींच्या साहित्याचा रेफ्रन्स घेतला आहे. बौद्ध तत्वज्ञानाचे दाखले दिले आहेत. हे सगळं "यावनी" कॅटॅगरीचं माप सोवळ्या गीतेला लावणं तत्कालीन विद्वानांना झेपलच नसेल. "आत्मा ८४ लक्ष योनींमधुन प्रवास करतो" या धारणेत ८४ लक्ष म्हणजे एखादी गुगल फिगर आहे हा टिळकांचा विचार श्रुती-स्मृती प्रमाण मानणार्‍यांना कसा मानवेल? गीतेत श्रीकृष्णाला अनेक संबोधने आहेत. या संबोधनांमागे काहि विशिष्ट योजना, काव्य आहे असं टिळकांना वाटत नाहि. प्रचलीत नामांपैकी सहज वापरायची म्हणुन घेतलेली नावे यापलिकडे टिळक त्यांना महत्व देत नाहि. बिग मटेरीयल फॉर आक्षेप. असं बरच काय काय आहे गीता रहस्यात. म्हणुनच म्हणतो... एकदा तरी अवश्य वाचावा हा ग्रंथ. आणि तब्बेतीने वाचावा. त्याची मोहिनीच वेगळी.

In reply to by अर्धवटराव

माहितगार Mon, 12/30/2013 - 14:45
लोकमान्य टिळक अंशतः परंपरावादी होते तरीही तुमच्याच शब्दात सांगायच झाल तर बर्‍यापैकी "रेडि टु थिंक" स्वभावाचे असावेत असे वाटते,म्हणूनच पाश्चात्य विचारांची सुयोग्य दखल विवीध लेखनातून ते घेत असे दिसते.संस्कृत ग्रंथ मुखोद्गत असूनही त्यातील अर्थ न समजणार्‍या तत्कालीन बहुसंख्य तथाकथीत पंडीतांना शब्दाच्या ससंदर्भ व्यूत्पत्ती दाखवत लोकमान्यांनी केलेल लेखन न मानवल्या मुळेही आपण म्हणता तसे आक्षेप घेतले गेले असू शकतात.त्या शिवाय त्या आक्षेपात तार्किक उणीवा लॉजीकल फॉलसीज असणे सहज संभवते. तरीही विषयाच्या सर्व बाजू अभ्यास करताना डॉ.यशवंत रायकर म्हणतात त्याप्रमाणे विष्णु वामन बापटशास्त्र्यांनी गीतारहस्याचे खंडन नेमके कसे केले याची माहिती करून घेणे अभ्यासकांकरीता उपयूक्त ठरू शकते असे वाटते.
असं बरच काय काय आहे गीता रहस्यात. म्हणुनच म्हणतो... एकदा तरी अवश्य वाचावा हा ग्रंथ. आणि तब्बेतीने वाचावा. त्याची मोहिनीच वेगळी.
जेवढा भाग वाचला त्यावरून मलाही तसेच वाटले म्हणूनच उर्वरीत भागही आंतरजालावर उपलब्ध करण्यात चहात्यांनी पुढाकार घ्यावा असे वाटते.लोकमान्यांच लेखनाची अभ्यासपूर्णता त्यांच्या चाहत्यांनाच नाही तर टिकाकारांकरताही मोहवणारी अशीच होती.

जयंत कुलकर्णी Sun, 12/29/2013 - 18:32
अनुक्रमणिका खालीलप्रमाणे - १ विषयप्रवेश २ कर्मजिज्ञासा ३ कर्मयोगशास्त्र ४ आधिभओतिक सुखवाद ५ सुखदु:खविवेक ६ आधिदैवत व क्षेत्रक्षेत्रविचार ७ कापिल्साख्यशास्त्र किंवा क्षराक्षरविचार ८ विश्र्वाची उभारणी व संहारणी ९ अध्यात्म १० कर्मविपाक व आत्मस्वातंत्र्य ११ संन्यास व कर्मयोग १२ सिद्धावस्था व व्यवहार १३ भक्तिमार्ग १४ गीतध्यायसंगति १५ उपसंहार १६ परिशिष्टप्रकरण - गीतेचे बहिरंगपरिक्षण एकूण पाने ८५४ अद्जिक दोन शुद्धीपत्र.

माहितगार Sun, 12/29/2013 - 22:19
आपण दिलेल्या माहितीने संदिग्धता कमी होण्यास बरीच मोलाची मदत झाली आहे.आपल्या कडे असलेला ८५४ पानांचा ग्रंथ हा श्रीमद्भवद्गीतारहस्याचा पहीला भाग तात्वीक विवेचनाचा असावा असे दिसते. मूळ संस्कृत श्लोक आणि त्यांचे मराठी भाषांतर दुसर्‍या भागात येते असे दिसते. तरीपण थोड्या शंका अजूनही बाकी आहेत मूळ संस्कृत श्लोक आणि त्यांचे मराठी भाषांतर दुसर्‍या भागात आहे तर त्याचा उल्लेख आपण दिलेल्या पहिल्या भागाच्या मुखपृष्ठा वर आला आहे.तो दुसरा भाग ८५४ पानामध्ये आंतर्भूत आहे का वेगळा या बद्दल अधिक खात्री झाल्यास बरे पडेल.

In reply to by जयंत कुलकर्णी

माहितगार Mon, 12/30/2013 - 12:28
विकिस्रोत प्रकल्पाच्या अचूकतेच्या दृष्टीने महत्वपूण माहिती आपण दिलीत या बद्दल आभारी आहेच.पूर्ण गीतारहस्य विकिस्रोतावर ऑनलाईन उपलब्ध होऊन त्याचे युनिकोडीकरण मार्गी लागल्यास,गीतारहस्याची प्रत असलेली मंडळी विकिस्रोत प्रकल्पात युनिकोडीकरण झालेल्या मजकुराची अचूकता तपासून देण्यात वेळोवेळी सहकार्य करू शकतील आणि आपणही सहभागी व्हावे हि ह्या निमीत्ताने विनंती.

Atul Thakur Mon, 12/30/2013 - 08:33
“ज्युरींचा निर्णय विरुध्द असला तरी मी निरपराध असल्याबद्दल माझे मत कायम आहे. वस्तुमात्राच्या भवितव्याचे नियंत्रण करणारी (याहून निराळी) उच्च सामर्थे आहेत. मी मोकळा राहाण्यापेक्षा माझ्या कार्याचा उत्कर्ष माझ्या क्लेशांनी व्हावा, अशीच कदाचित ईश्वराची इच्छा असावी.” टिळकांच्या वाणीतुन स्फुरलेल्या या उद्गारांनंतर न्यायाधीशाने त्यांना सहा वर्षाची सक्तमजूरी, हद्दपारी आणि हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. यापैकी सक्तमजूरी व दंड ही नंतर रद्द झाली. शिक्षा भोगण्यासाठी टिळक मंडालेला आले तेव्हा त्यांची पन्नाशी उलटुन गेली होती. जुन्या व्याधी सतत त्रास देत होत्या. त्यापैकी सर्वात गंभीर मधुमेह त्यांनी आहारावर संयम करुन ताब्यात ठेवला होता. त्याचवेळी त्यांना व्यक्तिगत जीवनातील अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. मुलांची शिक्षणं, पत्नीचा मधुमेह यासारख्या अनेक गोष्टींची त्यांना चिंता वाटत असे. स्वदेशापासुन दूर, व्याधिंनी पोखरलेलं शरीर आणि चिंतेने होरपळणारं मन घेउन टिळकांनी मंडालेला ज्या कार्याचासंकल्प सोडला तो पाहता त्यांची असामान्य जिद्द प्रत्ययास येते. हा संकल्प म्हणजे भगवद्गीतेवरील भाष्य. वडीलांच्या अखेरच्या समयी त्यांना गीता ऐकवीत असताना टिळक या विषयाकडे ओढले गेले. पुढे स्वतंत्रपणे, इतर मतमतांतरे आणि टीकांचा गलबला बाजुला सारुन गीतेचा अभ्यास करताना गीता ही निवृत्तीपर नसुन कर्मयोगपर आहे या निर्णयाला ते आले. किंबहुना तसा त्यांचा पक्का निश्चय झाला. श्रीभगवद्गीतारहस्य हे त्याचेच फलित आहे. भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखल्या गेलेल्या टिळ्कांनी बराच काळ डोक्यात घोळत असलेला गीतेवरील सांगोपांग टीका लिहीण्याचा बेत या कारावासामुळे मिळालेल्या सक्तीच्या विश्रांतीत पार पाडण्याचं ठरवलं. कारावासापुर्वीच टिळकांची याविषयीची तयारी सुरु होती. राजकीय चळवळीची कामे सांभाळुन त्यांनी आपला अभ्यास चालवला होता. कारावासात मोकळा वेळ मिळताच टिळकांनी संपुर्ण ग्रंथ फक्त साडेतीन महीन्यात लिहुन काढला. जवळ लेखनिक नाही. स्वतःचं समृद्ध ग्रंथालय दूर पुण्याला. अशासारख्या अडचणींना टिळकांनी जुमानलं नाही. योगायोगाची गोष्ट ही की भगवद्गीतेवरील विसाव्या शतकातील सर्वात महत्त्वाचे भाष्य म्हटले गेलेल्या गीतारहस्याचा जन्म भगवान श्रीकृष्णाप्रमाणेच कारावासात झाला. सुटका झाल्यावर टिळकांनी ग्रंथ प्रकाशित केला. शंकराचार्यांच्या अभिमान्यांकडून त्यांना प्रखर टीकेला तोंड द्यावे लागले. गीता कर्मपर नसुन संन्यासपर आहे असे प्रतिपादन करणार्‍यांचा हा गट होता. आचार्यांचे मत खंडन करण्याचं धारिष्ट्य दाखवणार्‍या टिळकांवर सनातन्यांनी टिकेची झोड उठवली. परंतु असामान्य बुद्धीमत्तेचे टिळक वादविवादात सर्वांना पुरून उरले. आज गीतारहस्य हा ग्रंथ भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील कधीही पराभूत न झालेल्या या नेत्याचं सर्वोच्च प्रतिक बनला आहे अतुल ठाकुर संदर्भ: “लोकमान्य” – न. र.फाटक (पूर्वप्रकाशित)

In reply to by Atul Thakur

माहितगार Mon, 12/30/2013 - 12:42
शंकराचार्यांच्या अभिमान्यांकडून त्यांना प्रखर टीकेला तोंड द्यावे लागले. गीता कर्मपर नसुन संन्यासपर आहे असे प्रतिपादन करणार्‍यांचा हा गट होता. आचार्यांचे मत खंडन करण्याचं धारिष्ट्य दाखवणार्‍या टिळकांवर सनातन्यांनी टिकेची झोड उठवली.
टिळकांचे लेखन अभ्यासतो तेव्हा टिळक परांपरागत तसेच आधूनिक दोन्ही संदर्भांचा समन्वय आणि अभ्यास करत लेखन करत.न.र.फाटकांनी वर दिलेली माहिती पाहता टिळकांचे केवळ कोणत्याही एकाच बाजूने चित्रण करणे योग्य होत नाही. न.स.फाटकांच्या विवेचना बद्दल डॉ.यशवंत रायकरांचे पुढील प्रतिपादनही सोबतच लक्षात घेता येईल
गीतारहस्याची काही वैशिष्टय़े न. र. फाटक यांनी चांगली मांडली आहेत. गीतेच्या आकलनासाठी महाभारताचा उपयोग कसा होतो हे टिळकांनीच प्रथम दाखवून दिले. गीताभ्यासाची दिशा त्यांनी बदलून टाकली. गीतार्थ समजून घ्यायचा तर आधी भौतिक शास्त्रांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे निदर्शनास आणून दिले. या ग्रंथामुळे नीतिशास्त्रावर मराठीत लेखन करण्याची उमेद अभ्यासक्रमांमध्ये निर्माण झाली. पण एरवी परखड मते देणारे न. र. फाटक येथे टिळकांचे पक्षपाती होतात. गीतारहस्याला युगप्रवर्तक ग्रंथ म्हणणे ठीक पण त्याची तुलना डार्विनच्या ‘ओरिजिन ऑफ स्पीसीज्’शी करणे म्हणजे अति झाले. शंकराचार्याचा पक्ष मांडणारे सनातनी बुरसट विचाराचे असतील तरी त्यांची कुत्सित टिंगळ करणारा मजकूर सात पाने व्यापतो, पण विष्णु वामन बापटशास्त्र्यांनी गीतारहस्याचे खंडन नेमके कसे केले हे पुस्तकात येत नाही.

In reply to by Atul Thakur

आयुर्हित Fri, 01/03/2014 - 19:49

"त्यापैकी सर्वात गंभीर मधुमेह त्यांनी आहारावर संयम करुन ताब्यात ठेवला होता"

काश !!! आजकालचे डॉक्टर/मधुमेह तज्ञ कधी याला खूप महत्व देतील? मधुमेह ताब्यात ठेवता येतो ह्याचा एक चांगला प्रत्यय. धन्यवाद कळावे, गोडवा असावा, आपला लाडका : आयुर्हीत

In reply to by आयुर्हित

विकास Fri, 01/03/2014 - 21:18
टिळकांच्या नावाने (त्यांचे) प्रसिद्ध वाक्य आहे, जे त्यांनी स्वतः आचरणात आणले होते, "जगण्यासाठी खावे, खाण्यासाठी जगू नये" :)

Atul Thakur Mon, 12/30/2013 - 21:28
या मताशी सहमत होणे कठीण आहे. न. र. फाटकांचे पुस्तक लोकमान्यांवर आहे मात्र उपसंहारात गांधी उदयानंतर टिळक आणि गांधी अशी तुलना करताना न.र.फाटकांनी काही बाबतीत गांधींना झुकते माप दिल्याचे दिसुन येते.

In reply to by Atul Thakur

माहितगार Mon, 12/30/2013 - 22:14
गंमतीचा योगायोग म्हणजे न.र. फाटकांनी, केळकरांनी लिहिलेल्या टिळकचरीत्रावर पक्षपाताचा आक्षेप घेतला होता (संदर्भ मटा Apr 14, 2008, 05.02PM IST) आणि न.र फाटकांनी लिहिलेल्या चरित्रावर डॉ.यशवंत रायकरांचा पक्षपाताचा आक्षेप आहे. रायकरांचे खटकलेल्या बाबी म्हणजे डार्विनच्या ‘ओरिजिन ऑफ स्पीसीज्’शी गीतारहस्याची तुलना करणे आणि विष्णु वामन बापटशास्त्र्यांच्या बाजूची दखल न घेणे असे दिसतात

In reply to by Atul Thakur

माहितगार Tue, 12/31/2013 - 06:44
अतुलजी खाली प्रा.बिरुटे सरांच्या प्रतिसादावरून लक्षात आलेली बाब म्हणजे न.चि.केळकरांनी लिहिलेल्या लोकमान्य टिळक चरित्र ग्रंथात गीतारहस्यावरील टिकेची आणि उत्तरांची विसृत दखल घेतलेली असल्यामुळेही न.र.फाटकांनी पुन्रावृत्ती टाळण्याच्या दृष्टीने विष्णु वामन बापटशास्त्र्यांच्या बाजूची दखल घेण्याचे टाळले असेल असेही असू शकते. आणि आपल्या माहिती आणि अभ्यासपूर्ण प्रतिसादांबद्दल धन्यवाद

साहित्यसम्राट न.चि.केळकर यांनी लोकमान्य टीळक यांचे चरित्र लिहिलं आहे त्यात श्रीमद्भभगवद्गीतारहस्य या ग्रंथाबद्दलही लिहिले आहे. तेव्हाच्या टीकारान्नी केलेल्या टिका आणि नंतर त्या टिकांवर लोकमान्य टिळकान्नी दिलेली उत्तरं असे एक प्रकरण आहे. सर्वच वाचण्यासारखे आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार Tue, 12/31/2013 - 06:24
नमस्कार, मला वाटते न.चि.केळकरकृत "लोकमान्य टिळक यांचे चरित्र" या ग्रंथाचे तीन खंड आहेत. श्रीमद्भभगवद्गीतारहस्य बद्दलचे आपण म्हणता ते प्रकरण कोणत्या खंडात येते हे जाणून घेणे आवडेल. सोबतच २०१५ मध्ये ग्रंथ प्रकाशनास १०० वर्षे पुर्ण होतात तेव्हा त्या निमीत्ताने मराठी विकिपीडियावरील श्रीमद्भवद्गीतारहस्य या लेखात आपल्या सवडीनुसार भर घालण्या बद्दल विनंती.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार Tue, 12/31/2013 - 06:48
बिरुटे सर लोकप्रभेतील रायकरांच्या लेखात "मीमांसाशास्त्रातले ग्रंथतात्पर्य काढण्याचे सात नियम" असा उल्लेख येतो ते सात निय्म कोणते य बद्दल काही माहिती उपलब्ध असल्यास तेही जाणून घेणे आवडेल आणि माहितीपूर्ण प्रतिसादांकरता धन्यवाद

In reply to by माहितगार

गीतारहस्य व् इतर प्रबंध असे शीर्षक आहे तिस-या खंडात त्यात अभिप्राय व टिका आहेत ग्रंथ तात्पर्य यात 1) ग्रंथाचा आरंभ व् शेवट कसा आहे 2) त्यात वारंवार काय सांगितले आहे 3)त्यात अपूर्वता कोणती 4) त्याचा परिणाम किंवा फल काय घडले 5) त्यात उपपत्ति कोणती सांगितले आहे आणि 6) या उपपत्तिच्या द्रढीकरणार्थ किंवा अन्य कारणासाठी दुस-या कोणत्या कोणत्या प्रासंगिक गोष्टी त्यात आहेत ? या सहा गोष्टींचा विचार करून ग्रंथा च्या तात्पर्याचा निर्णय केला पाहिजे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार Tue, 12/31/2013 - 12:20
ग्रंथतात्पर्य काढण्याचे नियम किती चटकन दिलेत ग्रेट. आपल्या सारख्या अभ्यासू व्यक्तींचा प्रतिसाद लाभला की मिपा मिष्टान्न होते. धन्यवाद.

सुधीर Mon, 12/30/2013 - 23:01
या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीची छापील प्रत माझ्याकडे आहे. तरीही काही महिन्यांपूर्वी मी पीडीएफ कॉपी जालावर आहे का ते शोधत होतो. तेव्हा मला ही लिंक सापडली होती. मला कल्पना नाही की, ती लिंक अधिकृत आहे का ते. या ग्रंथाच्या शॉर्ट नोट्स काढाव्यात (स्वतःसाठीच) असं मला खूप वाटलं होतं तसा प्रयत्नही मी ब्लॉगवर केला. पण नेहमीप्रमाणे इतर कामाचा व्याप वाढला. आजकालतर मिपावर यायलाही वेळ मिळत नाही, त्यामुळे शेवटी तो प्रयत्न अर्धवटच राहीला. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे हा ग्रंथ कर्मयोगागावर भर देण्यास सांगतो (कारण ती तत्कालिन समाजाची गरज असावी). पण टिळकांनी सन्यास हा मार्ग नाकारलेला नाही (त्याचं मूळ उगम -सांख्य- ह्यावर त्यांनी उत्तम भाष्य केले आहे, तसचं भक्तीमार्गावरचं त्यांचं विवेचन सुंदर आहे). नीतीमत्तेच्या सर्वोच्चतम पातळीवरची परीक्षा म्हणजे; दोन कर्तव्या मधलं सर्वश्रेष्ठ कर्तव्य ओळखणं आणि ते शुद्ध "बुद्धीने" करणं. आजच्या घडीला हा ग्रंथ केवळ यासाठीच मार्गदर्शक आहे आणि म्हणून तो मला खूप आवडला. बाकी, कर्मविपाकावर काहीजण आक्षेप घेतील, पण तो या पुस्तकाचा मूळ मुद्दा नाहीच. त्यामुळे तो आणि इतर असे काही मुद्दे बाजुला काढले तरी हरकत नाही.

In reply to by सुधीर

माहितगार Tue, 12/31/2013 - 06:36
नमस्कार, आपण दिलेल्या लिंकवर गेलो पण तिथे दिलेल्या पिडिएफ उघडता आल्या नाहीत.त्यांनी पिडिअ‍ॅफ मध्ये मूळ ग्रंथ जसाच्या तसा दिला असेल तर कॉपीराईटचा प्रश्न नाही. आपल्या ब्लॉगवरील टिपा माहितीपूर्ण आहेत.अर्थात मराठी विकिपीडियावरील श्रीमद्भवद्गीतारहस्य लेखात या टिपा वापरताना कॉपीराईट संबंधी आणि इतर अडचणी येण्याची संभावना आहे. आपल्या सवडीनुसार म.वि. वरील श्रीमद्भवद्गीतारहस्य लेखात काही माहिती लेखन करता आल्यास अथवा विकिस्रोत प्रकल्पात पुढेचालून मजकुर पडताळण्यात साहाय्य मिळाल्यास स्वागत असेल. माहिती आणि प्रतिसादाकरता धन्यवाद

In reply to by माहितगार

सुधीर Tue, 12/31/2013 - 09:50
काही महिन्यांपूर्वी ती लिंक चालत होती. मी त्यावेळेस डाऊनलोड केले होते. माझ्या कडे ते ४रही खंड पिडीएफ मध्ये आहेत. पण प्रत्येक पीडीएफची साईज १५ एमबी आहे (टोटल ६०एमबी). पीडीएफ छापील ग्रंथाप्रमाणे जशास तसं आहे. तुम्ही विकीवर लिहून झाल्यावर जरूर कळवा. वाचायला आवडेलच.

माहितगार Tue, 12/31/2013 - 09:50
(दैनिक तरूण भारतवर) खालील प्रमाणे आढळून आला. टिळक म्हणतात: ‘स्वकीयांबरोबर युद्ध करणे हे मोठे कुकर्म म्हणून खिन्न झालेल्या अर्जुनास त्याच युद्धास प्रवृत्त करण्यासाठी सांगितलेल्या गीतेत भक्तीने मोक्ष कसा मिळवावा याचे,म्हणजे नुसत्या मोक्षमार्गाचे विवेचन कशाला, ही शंका मनात येऊन तीच उत्तरोत्तर बळावत चालली. कारण, गीतेवरील कोणत्याही टीकेत त्याचे योग्य उत्तर आढळून येईना, तेव्हा टीकाकारांच्या छापेतून सुटका होऊन मूळ गीता निवृत्तीपर नसून कर्मयोगपर आहे, असा बोध झाला.’’ ‘‘महाभारत, वेदान्तसूत्रे, उपनिषदे आणि वेदान्तशास्त्रावरील इतर संस्कृत व इंग्रजी ग्रंथांच्या अध्ययनानेही तेच मत दृढ होत जाऊन (मूळ गीता निवृत्तीपर नसून कर्मयोगपर आहे), ते लोकात प्रसिद्ध केल्याने या विषयाचा अधिक ऊहापोह होईल,अशा बुद्धीने या विषयावर चार-पाच ठिकाणी निरनिराळ्या वेळी जाहीर व्याख्याने दिली. यापैकी एक व्याख्यान नागपुरात १९०२ सालच्या जानेवारीत झालेले असून, नागपूर येथे दिलेल्या व्याख्यानाचा गोषवाराही तेव्हा वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेला आहे.’’ ‘‘सांसारिक कर्मे गौण किंवा त्याज्य ठरवून, ब्रह्मज्ञान, भक्ती वगैरे नुसत्या निवृत्तीपर मोक्षमार्गाचेच गीतेत निरूपण केलेले आहे, हे मत आम्हास मान्य नाही.’’ ‘‘कर्मे कधीच सुटत नाहीत व सोडूही नयेत.’’ ‘‘गीतेवर पहिल्या टीका कर्मयोगपर असाव्या, या टीका आता उपलब्ध नाहीत;म्हणून गीतेचे कर्मयोगपर व तुलनात्मक हे पहिलेच विवेचन आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.’’ ‘‘केल्याविण काही होत नाही,’’ हा सृष्टीचा नियम लक्षात आणून तुम्ही मात्र निष्काम बुद्धीने कर्ते व्हा म्हणजे झाले.निव्वळ स्वार्थपरायण बुद्धीने संसार करून थकल्याभागल्या लोकांच्या कालक्रमणार्थ किंवा संसार सोडून देण्याची तयारी म्हणूनही गीता सांगितलेली नसून,संसारच मोक्षदृष्ट्या कसा केला पाहिजे व मनुष्यमात्राचे संसारातले खरे कर्तव्य काय, याचा तात्त्विकदृष्ट्या उपदेश करण्यासाठी गीताशास्त्राची प्रवृत्ती झालेली आहे. म्हणून पूर्ववयातच गृहस्थाश्रमाचे किंवा संसाराचे हे प्राचीन शास्त्र जितक्या लवकर समजून घेणे शक्य असेल तितक्या लवकर प्रत्येकाने समजून घेतल्याखेरीज राहू नये, एवढीच आमची शेवटी विनंती आहे.’’ (लो. टिळक लिखित ग्रंथ-प्रस्तावनेतून : सन १९१५) उपरोक्त उतारा कुणी पडताळून मूळाबर हुकूम असल्याचा दुजोरा दिल्यास विकिस्रोत प्रकल्पात घेता येईल

कालच आमच्या मित्राने , कोल्हापुर येथील अजव प्रकाशनने प्रकाशित केलेले गीतारहस्य भेट दिले आहे ...आता वाचायला घेतो ... मग प्रतिसाद टाकेन ! :)

आशिष दा Tue, 12/31/2013 - 15:02
चांगला धागा. थोड्या वेगळ्या अनुषंगाने विचार केल्यावर असा जाणवलं की स्वामी विवेकानंद पुण्यात दोन दिवस टिळकांकडे राहायला होते त्या वेळच्या त्यांच्यातल्या विचारांच्या आदान प्रदानाबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. २ महानायक- त्यांच्यात काय बोलणं झाला असेल? कदाचित कर्मपर जीवन हा लोकमान्यांचा दृष्टीकोन आणि ईश्वरप्राप्तीसाठी सन्यस्त जीवनाला पर्याय नाही हा स्वामी विवेकानंदांचा या मुलभूत फरकामुळे त्यांचे फार धागे जुळले नाहीत. स्वामीजी पुण्यात फारसे रमले नाहीत. एक दिवस लोकमान्यांना सांगून अचानक निघून गेले.

In reply to by आशिष दा

विकास Tue, 12/31/2013 - 20:00
लोकमान्यांच्या आठवणींवरचे जे ते गेल्या नंतर लगेच संकलीत केलेले पुस्तक आहे, त्यात या संदर्भात आठवण आहे. घरी बघून नंतर जमल्यास येथे टाकेन. (त्यात विषयांचे इंडेक्सिंग नसल्याने शोधायला अवघड जाते). पण आत्ता रामकृष्ण मिशनच्या संस्थळावर हा दुवा मिळाला, त्यातील टिळकांनी लिहीलेला भाग खाली चिकटवत आहे. About the year 1892, i.e., before the famous Parliament of Religions in the World’s Fair at Chicago, I was once returning from Bombay to Poona. At the Victoria Terminus a Sannyasin entered the carriage I was in. A few Gujarati gentlemen were there to see him off. They made the formal introduction and asked the Sannyasin to reside at my house during his stay at Poona. We reached Poona, and the Sannyasin remained with me for eight or ten days. When asked about his name he only said he was a Sannyasin. At home he would often talk about Advaita philosophy and Vedanta. The Swami avoided mixing with society. There was absolutely no money with him. A deerskin, one or two clothes and a kamandalu were his only possessions. In his travels some one would provide a railway ticket for the desired station. The swami also believed like me that the Shrimad Bhagavad Gita did not preach renunciation but urged every one to work unattached and without the desire for fruits of the work Two or three years thereafter Swami Vivekananda returned to India with worldwide fame owing to his grand success at the Parliament of Religions and also after that both in England and America. He received an address wherever he went and on every one of such occasions he made a thrilling reply. I happened to see his likeness in some of the newspapers, and from the similarity of features I thought that the Swami who had resided at my house must have been the same. I wrote to him accordingly inquiring if my inference was correct and requesting him to kindly pay a visit to Poona on his way to Calcutta. I received a fervent reply in which the Swami frankly admitted that he was the same Sannyasin and expressed his regret at not being able to visit Poona then. Once after this, during one of the Congress sessions at Calcutta, I had gone with some friends to see the Belur Math of the Ramakrishna Mission. There Swami Vivekananda received us very cordially. We took tea. In the course of the conversation Swamiji happened to remark somewhat in a jocular spirit that it would be better if I renounced the world and took up his work in Bengal while he would go and continue the same in Maharashtra. "One does not carry," he said, "the same influence in one's own province as in a distant one." - पिकते तिथे विकत नाही! :(

माहितगार Wed, 01/01/2014 - 11:37
नमस्कार, मिपा सदस्य सुधीर यांच्या बहुमोल साहाय्यामुळे,जवळपास संपूर्ण गीतारहस्य मराठी विकिस्रोत प्रकल्पात चढवून; मराठी विकिस्रोतावरील https://mr.wikisource.org/wiki/श्रीमद्भवद्गीतारहस्य हे पान अद्ययावत करता आले असून तेथे श्रीमद्भवद्गीतारहस्य हा ग्रंथ वाचन आणि युनिकोडीकरण टंकनाच्याही दृष्टीने जि़ज्ञासूंकरीता ऑनलाईन उपलब्ध झाला आहे. अर्थात ऑनलाईन उपलब्ध झालेल्या प्रतींचे पुर्नमुद्रण/प्रकाशन बहुधा १९२४ आणि १९२६ सालचे असून १९२४ आणि १९२६ सालच्या प्रकाशकांनी पृष्ठ आकारात काही बदल तसेच नवीन काही पाने जोडल्याच्या शक्यतेमुळे १९१५ सालच्या आवृत्तीतील पृष्ठ संख्या आणि ऑनलाईन उपलब्ध झालेल्या आवृत्तीतील पृष्ठ संख्येच्या बेरजेत तफावत येते आहे. १) १९१५ सालची आवृत्ती उपलब्ध असलेल्या गीतारहस्य वाचक आणि चाहत्यांकडून पृष्ठसंख्येतील फरक मेळ घालून देण्यात, त्यांच्या सवडीनुसार साहाय्य हवे आहे. २) १९१५ सालची आवृत्तीचे आणि १९२६ सालच्या आवृत्तीचे मुखपृष्ठात फरक असण्याचीही शंका वाटते त्याबाबतही मार्गदर्शन हवे आहे. ३) लोकमान्य टिळक ग्रंथाच्या प्रस्तावनेच्या सुरवातीसच म्हणतात "श्रीमदभगवद्गीतेवर अनेक संस्कृत भाष्यें ,टीका आणि प्राकृत भाषांतरें अगर विस्तृत सर्वमान्य निरुपणें असतां हा ग्रंथ प्रसिद्ध करण्याचे कारण काय हें जरी ग्रंथारंभीच सागीतले आहे,..." ऑनलाईन उपलब्ध झालेल्या आवृत्तीत प्रस्तावनेपुर्वी, मुखपृष्ठा नंतर आतले मुखपृष्ठ,प्रकाशक मुद्रकाची ओळखपृष्ठ आणि अर्पणपत्रिका असलेले 'अथ समर्पण' अशी तीनच पृष्ठे दिसतात.तर मग येथे ग्रंथारंभ असलेले एखादे पृष्ठ गहाळ आहे का लोकमान्यांचा निर्देश मुखपृष्ठावरील श्लोकाकडे आहे का 'अथ समर्पण' कडे या बद्दलही मार्गदर्शन जाणकारांनी करावे अशी नम्र विनंती आहे.

In reply to by माहितगार

विकास Wed, 01/01/2014 - 12:02
उत्तम! अभिनंदन. फलाची आशा न धरता, मिपावर चर्चा चालू काय करता आणि त्यातून असे सकारात्मक फळ काय मिळते! ;) हे सर्व पाहून खूप आनंद झाला आहे. :)

आशु जोग Wed, 01/01/2014 - 12:23
तपश्चर्या वाया जात नाही या अर्थाचा श्लोक गीतेत आला आहे कुणाला माहीत असेल तर सांगावा...

In reply to by आशु जोग

क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति । कौन्तेय प्रति जानीहि न मे भक्तः प्रणश्यति ॥९- ३१॥
तुम्हाला हा श्लोक अपेक्षित आहे काय ??

माहितगार गुरुवार, 01/02/2014 - 09:41
नमस्कार, नववर्षारंभी काम पुड्।ए गेल्याचा आणि एका पाठोपाठ आलेल्या शुभेच्छांनी आनंद वाटला आणि प्रोत्साहन आणि साहाय्या बद्दल आपणा सर्वांचे मनःपुर्वक धन्यवाद.मायबोली संकेतस्थळावर कुणीतरी विनोबांच्या गीताईवर काम केल्या नंतर अभिनंदन स्विकारताना सांगीतल की खर श्रेय गीताई लिहिणार्‍या विनोबांच तस या वेळच खर श्रेय स्वतः लोकमान्य टिळकांचच, गीतारहस्याच्या पिडिएफ बनवणार्‍या अनाम अनुदिनी लेखकाच आणि त्या पिडिएफ उतरवून जतन करून योग्य वेळी उपलब्ध करणार्‍या मिपा सदस्य सुधीर यांच आणि भरभरून प्रतिसाद देणार्‍या मिपाकरांच.आम्ही फक्त समन्वय साधण्याच निमीत्त मात्र काम केल. गीतारहस्यातील प्रस्तावनेत गीतारहस्यात जे होऊ शकले नाही आणि बाकी आहे त्या बद्दल टिळकांच्याच शब्दात ‘‘कृतान्तकटकाऽमल ध्वज जरा दिसो लागली। पुर:सरगदांसवे झगडिता तनू भागली।। - (कविवर्य मोरोपंत) अशी आमची स्थिती असून संसारातील सहचरीही पुढे निघून गेले. यासाठी आपल्याला उपलब्ध असलेली माहिती व सुचलेले विचार लोकांस कळवावे, कोणीतरी समानधर्मा सध्या अगर पुढे ते पुरे करील या समजुतीने हा ग्रंथ प्रसिद्ध केला आहे.’ गीतारहस्या बद्दल अजून बरच काही चर्चा करण्या सारख बाकी आहे.त्या प्रमाणेच आपल्या सारखेच कोणीतरी समानधर्मा सध्या अगर पुढे मराठी भाषेतील जुने दस्तेवज मराठी विकिस्रोत आणि इतर माध्यमातून आंतरजालावर उपलब्ध करण्याचे काम पुढे नेतील. आपणा सर्वांनाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि धन्यवाद

माहितगार गुरुवार, 01/02/2014 - 12:56
नरहर कुरुंदकरांनी १९७० मध्ये आकाशवाणीवर "कर्मयोगी टिळक" या विषयावर भाषण दिलं. ते पूर्ण स्वरूपात आंतरजालावर इथे आढळल. त्यातील या धागा चर्चा आणि समीक्षेकरता आवश्यक तेवढाच भाग खाली देत आहे. त्यात कुरुंदकरांच्या मते
लोकमान्यांनी नुसता कर्मयोग नव्हे तर भगवद्गीतेत ज्ञानमूलक, भक्तिप्रधान, निष्काम कर्मयोग सांगितलेला आहे असे सांगितले
जन्मभर टिळक जे आचरण करीत आले, त्याचे तात्त्विक स्पष्टीकरण करण्याचा योग मंडालेच्या तुरुंगवासामुळे आला. लोकमान्यांनी भगवद्गीतेचा अभ्यास केला. या गीतेच्या सूक्ष्म व्यासंगामुळे गीतेचे प्रतिपाद्य कर्मयोग आहे, या निर्णयावर ते आले असा प्रकार नाही. खरा प्रकार असा आहे की, ज्ञानमूलक, भक्तिप्रधान, निष्काम कर्मयोग लोकमान्य जन्मभर आचरणात आणीतच होते. योग आला म्हणून गीताभाष्य त्यांनी लिहिले. गीतेवरील रहस्य भाष्य न लिहिता ‘माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान’ या नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला असता तरी त्या ग्रंथात तीच भूमिका आली असती. भगवद्गीता हे निमित्त आहे. कर्मयोगाचे प्रतिपादन हा खरा हेतू!
हे कुरंदकरांच्या मता बद्दल आपली मते काय आहेत हे जाणून घ्यावयास आवडेल. समीक्षा संदर्भा करिता कुरुंदकरांच्या भाषणाचा थोडा अधिक भाग : गेल्या हजार-बाराशे वर्षांत गीतेचे जे अलौकिक भाष्यकार होऊन गेले त्यात ज्ञानमार्गाचे नेते म्हणून शंकराचार्य, भक्तिमार्गाचे नेते म्हणून ज्ञानेश्वर आणि कर्ममार्गाचे नेते म्हणून लोकमान्य टिळक हे तीन भाष्यकार सर्वात महत्त्वाचे मानले पाहिजेत. भगवद्गीतेत ज्ञान, भक्ती आणि कर्म या तीनही सूत्रांचे प्रतिपादन आहे. शंकाराचार्याना कर्म आणि भक्ती यांचे महत्त्व मान्यच असते; पण त्यांच्या मते ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. टिळकांचीसुद्धा पद्धती हीच आहे. आपण लोकमान्यांनी गीतेचा अर्थ कर्मयोगपर लावला आहे, असे म्हणतो. स्थूलपणे ते खरेही आहे. पण टिळकांचे नेमके म्हणणे मात्र वेगळ्या भाषेत सांगावे लागेल. त्यांच्या मते भगवद्गीतेत ज्ञानमूलक, भक्तिप्रधान, निष्काम कर्मयोग सांगितलेला आहे. लोकमान्यांचे हे ‘गीताभाष्य’ त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात प्रकाशित झाले आहे. लोकमान्यांच्या सार्वजनिक जीवनाला स्थूलमानाने सांगायचे तर त्यांच्या पंचविशीपासून आरंभ होतो. या सार्वजनिक जीवनाची पंचविशी पूर्ण होतात न होतात तोच त्यांना मंडालेच्या तुरुंगात दीर्घकाळ राहण्याचा योग आला. जन्मभर टिळक जे आचरण करीत आले, त्याचे तात्त्विक स्पष्टीकरण करण्याचा योग मंडालेच्या तुरुंगवासामुळे आला. लोकमान्यांनी भगवद्गीतेचा अभ्यास केला. या गीतेच्या सूक्ष्म व्यासंगामुळे गीतेचे प्रतिपाद्य कर्मयोग आहे, या निर्णयावर ते आले असा प्रकार नाही. खरा प्रकार असा आहे की, ज्ञानमूलक, भक्तिप्रधान, निष्काम कर्मयोग लोकमान्य जन्मभर आचरणात आणीतच होते. योग आला म्हणून गीताभाष्य त्यांनी लिहिले. गीतेवरील रहस्य भाष्य न लिहिता ‘माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान’ या नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला असता तरी त्या ग्रंथात तीच भूमिका आली असती. भगवद्गीता हे निमित्त आहे. कर्मयोगाचे प्रतिपादन हा खरा हेतू! या कर्मयोगाचे स्वरूप आपण नीट समजून घेतले पाहिजे. कोणते तरी कर्म करीत राहा, कारण माणसाने कर्म केले पाहिजे, इतका एकेरी ढोबळ विचार लोकमान्यांनी कधी मान्य केला नसता. लाकूडफोडय़ा, मजूर जन्मभर कर्म करीतच असतो. आपल्यासारख्या गरीब देशात कोटय़वधी माणसांचे जीवन जन्मभर कोणते तरी काम करीतच जाणारे असते. ‘बाबा रे, आळशी बसून राहू नकोस, कोणते तरी काम कर’ हा उपदेश निराळा आणि कर्मयोग निराळा. तो स्वत: कर्मयोगी आहे. माणूस जेव्हा स्वत:च्या अस्तित्वासाठी, स्वत:च्या हितासाठी, लाभासाठी कर्म करतो तो कर्मयोग नव्हे. व्यक्तिगत स्वार्थ आणि हित या परिघाबाहेर जाऊन समूहाच्या कल्याणात स्वत:च्या स्वार्थाचा लोप जेव्हा करतो, त्या वेळी कर्म ही साधना आणि उपासना होते. कर्मयोगात स्वार्थाचा लोप हा गृहीत आहे म्हणून तर काबाडकष्ट असा शब्दप्रयोग न करता ‘कर्मयोग’ म्हणायचे. हे कर्म अज्ञानाने करून चालणार नाही. समाजाची गरज काय, राष्ट्राची गरज काय? भोवतालची परिस्थिती कोणती, त्या परिस्थितीत शक्य काय, अशक्य काय इ. विचार केलाच पाहिजे. म्हणून कर्मयोगात जे कर्म अपेक्षित आहे ते ज्ञानमूलक आहे. सर्वसामान्यपणे टिळकांच्या भूमिकेवर जो आक्षेप घेण्यात येतो त्याचा आरंभ या ठिकाणी आहे. फळाची अपेक्षा न ठेवता जर कर्म करायचे असेल तर मग कर्म बरोबर की चूक हे ठरविण्याची कसोटीच शिल्लक राहणार नाही, असे आक्षेपकांचे म्हणणे असते. हा आक्षेप घेणारी मंडळी एक मुद्दा विसरूनच जातात. लोकमान्य कर्माला फळ नसते असे म्हणत नाहीत. कर्माला फळ असते हेच त्यांचे म्हणणे आहे. जर कर्माला फळच नसते तर मग कर्म कोणतेही केले तरी बिघडले नसते. कर्माला फळ असते म्हणूनच कर्म ज्ञानमूलक असायला हवे. हा आपला देश इंग्रजांच्या ताब्यात होता. भारत स्वतंत्र असणे अगर स्वतंत्र नसणे दोन्ही बाबी सारख्याच, असे जर टिळकांचे मत असते तर त्यांना कुणी लोकमान्य म्हटलेच नसते. टिळकांना भारत स्वतंत्र हवा होता. ते स्वातंत्र्यात जन्मले असते तर ते म्हणाले असते, ‘स्वतंत्र भारत बलवान आणि स्वावलंबी झाला.’ हा हेतू डोळ्यासमोर ठेवूनच सारे काम चालणार आहे. आपण ज्या मार्गाने जात आहोत तो लोकजागृतीचा व लोकसंघटनेचा आहे हे त्यांना कळतच होतं. आजोबाच्या कष्टाचे फळ नातवाला मिळणार असते. कर्माला फळ आहे; फक्त ते आज नाही, या जन्मी नाही; आणि स्वातंत्र्यलढय़ाच्या दर चळवळीला अपयश कसे ठरल्याप्रमाणे येत असते. सर्व अपयश पचविण्यासाठी आपल्या पिढय़ा पायाभरणीत संपणार आहेत हे जाणूनही चिकाटी चालू ठेवण्यासाठी नुसता नि:स्वार्थीपणा पुरत नाही; फळाची आशासुद्धा सोडावी लागते. अशा वेळी आपण जे कर्म करतो आहोत ते बरोबर आहे की नाही हे कसे ठरणार? म्हणूनच निष्काम कृतीला भक्तीची गरज लागते. लोकमान्य निष्काम कर्मयोग सांगतात याचे कारण कर्माला फळ नसते हे नाही, तर कर्माला फळ असते हेच निष्काम कर्मयोग सांगण्याचे खरे कारण आहे. जन्मभर टिळकांचा ज्ञानमूलक भक्तिप्रधान निष्काम कर्मयोग चालूच होता. ते त्यांच्या जन्मभराच्या उद्योगाचे सूत्र होते. हे सूत्रच गीतेच्या आधारे त्यांनी सांगितले. आपले कर्तव्य कोणते हे ठरविण्यासाठी ज्ञानाची उपासना हे कर्तव्य ठरतात, भक्तिपूर्वक आचरण हा या कर्मयोगाचा पूर्वार्ध समजावयाचा आणि सततचे अपयश पचवून पुन:पुन्हा कामाला लागायचे, हा या योगाचा उत्तरार्ध समजावयचा. पारतंत्र्याच्या काळी समोर कोणतीही आशा नसताना आपल्याच अंतरंगातून प्रेरणा घेऊन जळतच जन्म काढीत असताना टिळकांचे तत्त्वज्ञान हा आधार असतो. टिळकांचे जीवन हे या तत्त्वज्ञानाचे उदाहरण असते, तर स्वातंत्र्याच्या युगात या तत्त्वज्ञानाचे महत्त्व कमी होत नाही. सर्व मोह डोळ्यासमोर दिसत असताना आपण निष्काम कर्मयोग विसरलो, तर स्वार्थाच्या या सार्वजनिक जीवनात दुसरे काही दिसणारच नाही. मग कर्मयोगही कुठे उरणार नाही. म्हणूनच लोकमान्य टिळकांसारख्या कर्मयोग्याचे जीवन व चिंतन पिढय़ान् पिढय़ा राष्ट्राला पोषक देणारे ठरते असे म्हणायचे.

In reply to by माहितगार

अर्धवटराव गुरुवार, 01/02/2014 - 14:17
गीतारहस्य म्हणजे टिळकांचे स्वतःचे जीवन विषयक सूत्र आहे हे खरच आहे. आयुष्यभर टिळक हेच तत्वज्ञान जगले. गीतेत त्यांना त्याचीच अनुभूती यावी हे ही सहाजीक आहे. एक लहानसा मुद्दा असा कि टिळकांनी प्रथम गीतावाचन केलं ते आजारी माणसाच्या उशाशी बसुन, त्याच्या समाधानाकरता. ते त्यांच्या अन्कॉन्शस माईण्ड मधे कुठेतरी असणारच. पुढे आपल्या राजकीय जीवनात त्यांनी आपले सिद्धांत, कर्म गीतेतल्या तत्वांशी कंपेअर केले असणार. ते मॅच होत गेले व गीतारहस्य टीळकांच्या अंतरंगात आकार घेत गेलं. पुढे तुरुंगवासात टिळकांनी गीतारहस्य कंपाइल केलं. टीळकांच्या कुठल्याश्या चरित्र्यात मी वाचलं होतं कि त्यांना गणिती प्रमेयं मळलेल्या वाटेने सोडवण्याऐवजी स्वतः आपल्या तर्काने सोडवण्यात मजा वाटायची. कदाचीत हीच वृत्ती त्यांच्या गीताभ्यासासंदर्भात दिसुन येते.

In reply to by अर्धवटराव

माहितगार गुरुवार, 01/02/2014 - 16:20
गीतारहस्य म्हणजे टिळकांचे स्वतःचे जीवन विषयक सूत्र आहे हे खरच आहे. आयुष्यभर टिळक हेच तत्वज्ञान जगले. गीतेत त्यांना त्याचीच अनुभूती यावी हे ही सहाजीक आहे.
या गोष्टीशी सहमत.पण कुरुंदकरांच्याकडून टिळकांच्या एका बाजूच उदात्तीकरण होताना त्यांच्या व्यासंगाची बाजू नकळत गौण तर होत नाहीएना.तुम्ही म्हणता तसे गीतेच लोकमान्यांकडून वाचन झाल तेव्हाच गीतेतून कर्मयोग पूर्ण आयूष्याची प्रेरणा मिळाली.ती तशी गीतेतून मिळालेली नसती तर कुरुंदकर स्वतःच म्हणतात तसे "लोकमान्यांनी, गीतेवरील रहस्य भाष्य न लिहिता ‘माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान’ या नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला असता." पण त्यांना तसा गीते बद्दल लिहावा वाटला म्हणजे त्यांना गीतेचा व्यासंग होता. वर मिपा सदस्य विकास यांनी टिळकांची विवेकानंदांसोबतचे वर्णन केले आहे त्यातही,विवेकानंद कोण आहेत याची कल्पना नसताना त्यांच्याशी चर्चा झाली आहे तरीही, विवेकानंदांच्या इतर विचारांपेक्षा गीतेची कर्मयोगपरता हाच विषय टिळक उचलून धरतात ह्यातून त्यांचा व्यासंग आणि जीवन दृष्टीकोण दोन्हीही प्रगट होते आहे. कुरुंदकर कर्मयोग हा ज्ञानमुलक असावाच लागतो सोबत श्रद्धा अथवा भक्ती हवीच नुसते कर्म हा कर्मयोग नव्हे हा कुरुंदकरांचा दृष्टीकोण आणि टिळकांच्या दृष्टीकोणाशी जुळतो का वेगळा आहे ह्यावर जाणकारांनी/अभ्यासकांनी प्रकाश टाकावयास हवा. दुसरे असे कि जर कुरुंदकर विचारांनी समाजवादी होते तर ते स्वतः उपरोल्लेखीत कर्मयोग योगाची त्यांचीच व्याख्या आणि समाजवाद यांची सांगड कशी घालत. हा कुरुंदकरांशी संबंधीत तसा वेगळा मुद्दा आहे. पण टिळक त्यांच्या उत्तरकाळात बोल्शेवीकांबद्दलही चर्चा करत होते तर तेही त्यांचीही कर्मयोग व्याख्या कुरुंदकरी शैलीचीच असेल तर साम्यवादाशी सांगड कशी घालत असावेत अशा काही शंका मनात उपस्थित होतात. पुढेचालून असेही म्हणता येऊ शकते का की टिळकांच्या श्रद्धेचा भक्तीचा परीघ हा भारत आणि भारताय राजकीय स्वातंत्र्याच प्राधान्य असा होता.नवीन वर्षाच २०१४च स्वागत करताना एक मराठी विचारवंत त्यांच्या अनुदिनीवर म्हणतात कि एकाच प्रश्नास प्राधान्य देण हे इतर प्रश्नांच अजाणता घडणार सपाटीकरण अथवा अतीसुलभीकरण कि ज्यात इतर तत्कालीन प्रश्न गौण गृहीत धरले जातात. कदाचित तत्कालीन समाज सुधारंकाचे आक्षेप येण्याची जागा इथे असावी या कडे कुरंदकर ओझरता उल्लेख करताना भाषणात म्हणतात "...म्हणून कर्मयोगात जे कर्म अपेक्षित आहे ते ज्ञानमूलक आहे. सर्वसामान्यपणे टिळकांच्या भूमिकेवर जो आक्षेप घेण्यात येतो त्याचा आरंभ या ठिकाणी आहे." या कुरुंदकरांच्या विश्लेषणाकडे आपण कसे बघतो ?

In reply to by माहितगार

विकास गुरुवार, 01/02/2014 - 20:41
सर्वप्रथम कुरुंदकरांच्या लेखाच्या दुव्याबद्दल आपल्याला दुवा! :) त्यांचे लेखन कधी कधी पटले नाही तरी नुसतेच वाचनीय नाही तर विचार करायला लावणारे आणि त्यातून आपण काहीतरी शिकलो असे वाटते... पुढेचालून असेही म्हणता येऊ शकते का की टिळकांच्या श्रद्धेचा भक्तीचा परीघ हा भारत आणि भारताय राजकीय स्वातंत्र्याच प्राधान्य असा होता. टिळकांना प्रच्छन्न सुधारक म्हणायचे. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्या दृष्टीने वयं पंचाधिकं शतम् म्हणजे कुणालाही न दुखावता सर्वांना एकत्र घेऊन जायचे हे धोरण होते. त्यामुळे जर ते स्वातंत्र्यानंतर हयात असते तर आगरकर अथवा इतरांसारखे रॅडीकल नाही पण समाजसुधारक नक्की झाले असते असे वाटते. तरी देखील भारतीय आध्यात्मिक तत्वज्ञान हे धार्मिक कर्मकांडाच्या पेक्षा वेगळे आहे त्यापासून स्वतंत्र आहे. त्यामुळे देव या संकल्पनेचा नेहमीपेक्षा वेगळा अर्थ लावताना आपली संत मंडळी पण दिसतील... बाकी कर्मकांडे ही त्या त्या वेळच्या पद्धती म्हणायचे आणि सोडून देयचे. टिळकांवर गीतेचा प्रभाव असावा का? तर नक्की असेल असे वाटते. (अवांतरः वर अर्धवटरावांनी कुणा आजारी व्यक्तीजवळ टिळकांनी प्रथम गीता वाचल्याचे म्हणले आहे. हा प्रसंग मला नवीन आहे आणि अधिक कळून घेण्यास नक्की आवडेल.) गीतेचा प्रभाव पब्लीकवर आहे. कारण त्यात विचाराला चालना घेयची इच्छा असल्यास मिळू शकते! विनोबा म्हणतात, "गीताई माऊली माझी, तीचा मी बाळ नेणता, पडता झडता घेई, उचलूनी कडेवरी". अर्थात जेंव्हा आयुष्यात आव्हाने निर्माण होतात तेंव्हा असे गीता भक्त गीतेत उत्तरे/मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे भले गीतारहस्यात टिळकांचे जीवनविषयक तत्वज्ञान असेलही, नव्हे ते होतेच, पण ते त्यांना गीतेतून मिळाले असे म्हणण्यात काहीच गैर नाही आणि म्हणूनच त्यांनी ते म्हणले. कुरुंदकरांच्या बाबतीत अजून एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते. की ते जितके खर्‍या अर्थाने स्वतंत्र विचारवंत होते तितकेच त्यांचा कल हा डावीकडे झुकलेला होता. ते त्यांनी देखील कधी लपवलेले नव्हते. त्यामुळे कुठेही देवधर्म म्हणणे टाळणे त्यांना कायम योग्य वाटत आले. याचे एक मस्त उदाहरण म्हणजे, "छत्रपती शिवाजी महाराज जीवन - रहस्य". जर वाचले नसले तर अवश्य वाचावे असे ते पुस्तक आहे. आय विश, कुरंदकरांना अधिक जगायला मिळाले असते आणि या छोट्याशा पुस्तकाचा ते अधिक विस्तार करू शकले असते... पण त्यात देखील त्यांची धडपड शिवाजीने कसे हिंदवी स्वराज्य म्हणून केले नाही, हिंदू धर्माशी संबंध नाही वगैरे वगैरे करण्यात जाते. तेच येथे टिळकांच्या बाबतीत झालेले दिसते. तरी देखील त्यांचे एकंदरीत लेखन बघता त्यांच्या विचाराच्या प्रामाणिकपणावर अविश्वास दाखवावासा कधीच वाटत नाही. असो: नवा धागा काढण्याऐवजी किंचित अवांतर. अमेरीकेत हवाई राज्याच्या अमेरीकन काँग्रेससाठीच्या (खासदार) लोकप्रतिनिधी तुलसी गॅबर्ड ह्या पहील्या हिंदू लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी गीता जयंती निमित्त युट्यूबवर गीतेवरून टाकलेला संदेशः

In reply to by अर्धवटराव

अर्धवटराव: एक लहानसा मुद्दा असा कि टिळकांनी प्रथम गीतावाचन केलं ते आजारी माणसाच्या उशाशी बसुन, त्याच्या समाधानाकरता... नीलकंठ खाडिलकर त्यांच्या हिंदुत्व (मुंबई: परचुरे प्रकाशन २००५: ५३-५४) या पुस्तकात लिहितात की वयाच्या सोळाव्या वर्षी आजारी वडिलांना गीतेवरील टीका वाचून दाखविताना टिळकांच्या मनात हा प्रश्न आला की युद्ध करावे यासाठी सांगितलेल्या गीतेत मोक्षामार्गाचा विचार कशाला? अवांतर: खाडिलकर पुढे लिहितात--आमचे [टिळकांचे] प्रदीर्घ वाचन-चिंतन-मनन यानंतर असे मत झाले आहे की मनात भक्ती, मस्तकात ज्ञा,आणि हातात कुशल कर्म हीच गीतेची आणि यशाची त्रिमूर्ती आहे(पृ ५४).

विटेकर गुरुवार, 01/02/2014 - 15:23
माहितगार आपण उत्तम काम केले आहे ... हा ग्रंथ माझ्या नित्य वाचनात आहे आणि दासबोध आणि गीता रहस्य या दोन ग्रंथात कामालीचे साम्य मला आढ्ळले आहे ! माझ्या कडे १९१५ ची प्रत आहे तुम्हाला हवी तेव्हा उपलब्ध करुन देऊ शकेन. ही प्रत साक्षात टिळक महाराजांनी स्वाक्षरी करुन माझ्या आजोबांना ( फौजदार, औन्ध संस्थान )यांना भेट दिली आहे ! हा आमच्या घरचा अनमोल ठेवा आहे !

In reply to by विटेकर

माहितगार गुरुवार, 01/02/2014 - 16:41
प्रोत्साहनाकरिता धन्यवाद.मराठी विकिबंधू प्रकल्पात गीतेचे दोन तीन मराठी अनुवाद आधीच उपलब्ध आहेत नाही असे नाही.एक अनुवाद कुठून आला आहे माहित नाही पण आजच्या सरळ सुलभ मराठीत आहे सोबत ज्ञानेश्वरी आहे (गीताई आहे पण कॉपीराईट स्टेटस साशंकतेत असल्याने वगळली जाण्याची शक्यता आहे). पण प्रत्येक शब्दाचा अर्थ सिद्ध करत अथवा व्युत्पत्ती देत केलेल्या अनुवादाकरता गीतारहस्या शिवाय पर्याय नाही हे लक्षात घेऊन हा प्रयास केला. गीतारहस्याचे युनिकोडीकरण करून उपलब्ध झाले आणी गीताईच्या कॉपीराईटचा प्रश्न मिटला तर गीतेच्या प्रत्येक श्लोकाचा आजच्या मराठीतला अनुवाद मग गीताई मग गीतारहस्यातील अनुवाद मग ज्ञानेश्वरीतील श्लोक आणि त्याचे अर्थ असे करता येऊ शकेल पण या करता मराठी विकिप्रकल्पांवर अधिक चहात्या स्वयंसेवकांची गरज असेल.केव्हा किती आणि काय काय होते ते काळ ठरवेल.आपण गाडीचा मार्गावर आपल्या क्षमतेत आहे तेवढी पुढे नेऊन सोडावयाची. मी गीतारहस्य त्याच्या प्रस्तावनेपलिकडे अद्याप फारसा वाचला नाही पण आपण म्हणतातसे दासबोध आणि गीतारहस्य दोन्हीही वेग वेगळ्या धाटणीने कर्मयोगाची मांडणी करत असल्यामुळे साम्य वाटत असावे.आपल्या सारख्या जाणकारांनी खुलासा करणे अधिक योग्य पण दासबोधातील तत्वज्ञान मुलतः वाल्मिकी लिखीत योगवसिष्ठातून येत असावे असे योगवसिष्ठ चाळताना वाटले होते.गीतेचा आणि योगवसिष्ठाचा काही सहसंबंध किंवा तत्वज्ञानात साम्य फरक आहे किंवा नाही या बद्दल फारशी माहिती नाही.

In reply to by माहितगार

माहितगार Sun, 01/05/2014 - 07:59
गीतारहस्याच्या पहिल्या भागातील विषयप्रवेश प्रकरणातील पान क्रमांक ५ वर योग्वसिष्ठाचा उल्लेख आढळला.योगवसिष्ठाच्या शेवटच्या निर्वाण या प्रकरणात भगवदगीतेतील अनेक श्लोक आणि भगवद्गीतेचे सार जसेच्या तसे गोवले असल्याचे टिळक नमूद करतात.आध्यात्म रामायण आणि योगवसिष्ठ हे ग्रंथ विस्तृत असले तरी ते भगवद्गीतेच्या मागाहूनचे असल्याचे त्यांच्या रचनेवरून उघड होते असे मत टिळक पान क्रमांक ६वर नमुद करतात

In reply to by माहितगार

माहितगार Sun, 01/05/2014 - 08:16
नमस्कार, गीतारहस्याची अर्पण पत्रिका "अथ समर्पणम" लोकमान्य टिळकांनी संस्कृतातून लिहिली आहे.पूर्ण "अथ समर्पणम" चा शब्दार्था सहीत मराठी अनुवाद हवा आहे.

In reply to by माहितगार

बॅटमॅन Sun, 01/05/2014 - 16:23
श्लोक १. श्रीगीतेचा अर्थ इतका खोल अन गंभीर आहे. जुन्या कवींनी आणि अनेक आचार्यांनी बहुत प्रकारे तो विशद केल्यावर त्यापुढे माझी अल्पबुद्धी ती काय? श्लोक २. तरीही माझ्या उद्धटपणामुळे जुन्या आणि उचित अशा नवीन शास्त्रार्थांना समोर ठेवून गीतार्थ सांगण्यास मी पुन्हा तयार झालो आहे. श्लोक ३ ते पुढे. काय कार्य आणि काय अकार्य याचा निवाडा करण्याची इच्छा असलेले श्रेष्ठ लोक हा गीतार्थ ऐकण्यास पात्र आहेत. अशाप्रकारे सज्जन लोकांना प्रिय अशा कालिदासाच्या भाषेत मी कथन करीत आहे. श्लोक ४. (मी) टिळककुलोत्पन्न बाळ हा गंगाधराचा मुलगा असून शांडिल्य गोत्री ब्राह्मण आहे. महाराष्ट्रातील पुण्यपुरात(पुण्यात) राहतो. श्लोक ५. (मी) शालिवाहन शकाच्या १८३७ व्या वर्षी सज्जनांचा मार्ग अनुसरून हरिवचन स्मरून, श्लोक ६. हा ग्रंथ जनतेच्या आत्मारूपी देवास समर्पित करतो आहे. या ग्रंथामुळे परम पुरुष असा देव प्रसन्न होवो. खाली बहुतेक गीतेतला श्लोक आहे त्याचा अर्थ असा: हे कौंतेया, तू जे करशील, जे खाशील, जे यज्ञात अर्पण करशील, जे दान देशील आणि जी तपश्चर्या करशील ते सर्वही मला अर्पण कर.

राही Fri, 01/03/2014 - 18:11
जवळजवळ संपूर्ण गीतारहस्य मराठी विकिस्रोत प्रकल्पात चढवून आपण एक मोलाचे काम केले आहे. नव्या वर्षाची एक सुंदर भेट या निमित्ताने आपणा सर्वांना मिळाली आहे. मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. हा धागा वाचनखूण साठवावी असा मोलाचा झाला आहे.

विकास Fri, 01/03/2014 - 18:50
अवांतरासाठी क्षमस्व... प्रत्यक्ष विषयाला धरून नसेल कदाचीत पण लोकमान्यांच्यावर येत असलेल्या चित्रपटाचा ट्रेलर आत्ताच पाहीला आणि येथे सांगावासा वाटला...

माहितगार Sat, 01/04/2014 - 13:41
केतकर ज्ञानकोशात लोकमान्य टिळकांचे एक वाक्य उधृत केले आहे '' गीता म्हणजे कर्म, भक्ति व ज्ञान या तीन स्वतंत्र निष्ठांची खिचडी किंवा कापूस, रेशीम व जर यांच्या चिंध्या शिवून तयार केलेली गोधडी नसून, कापूस, रेशीम व जर यांचे निरनिराळे धागे यथास्थानी योग्य रीतीनें जमवून दिल्यावर कर्मयोग नांवाचें मौल्यवान् व मनोहर असें गीतारूपी सनंग अव्वलपासून अखेरपर्यंत 'अत्यंत योगयुक्त चित्तानें' सलग विणलेलें आहे.'' (गीतारहस्य पा. ४६२)

In reply to by विकास

माहितगार Sun, 01/05/2014 - 08:08
ना.सी.फडकेयांनीही गीतारहस्याबद्दल काही लेखन/उहापोह केले आहे असे वाचण्यात आले.त्यांच्या गीतारहस्यसंबंधीत लेखनाबद्दल/मतांबद्दल काही अधीक माहिती उपलब्ध झाल्यास हवी आहे.

In reply to by माहितगार

१८४९ साली ब्रीटीशांनी महाराजा दुलीप सिंग यास त्याच्याकडे असलेला कोहिनूर हिरा महाराणी Victoria हिला भेट म्हणून देण्यास भाग पाडले. तो हिरा नंतर Amsterdam येथे त्याला पैलू पाडण्यासाठी पाठवण्यास आला. पैलू पाडल्यावर तो अधिकच दिमाखाने चमकू लागला. हा संदर्भ पकडून लोकमान्यांनी लिहिले कि गीता ही कोहिनूर सारखीच दैदिप्यमान आहे आणि राहीलच. परंतु ज्या काळात आणि ज्या उद्देशानी ती अस्तित्वात आली ती परिस्थिती आज नाही. त्यामुळे तिचा स्वयंप्रकाश काही अंशी मंदावला आहे. म्हणून ज्ञानभक्तीमूलक कर्म योगाची छिन्नी घेऊन त्यांनी गीतेला नवीन पैलू पाडण्याचा प्रयत्न केला (गीतारहस्य लिहिले)जेणेकरून ती पैलू पाडलेल्या कोहिनूरप्रमाणे पुन्हा नवीन दिमाखाने चमकू लागेल.अर्थात लोकमान्यांचा यत्न किती यशस्वी झाला हे सुजाण वाचकांनींच ठरवायचे आहे. लोकमान्यांपासून स्फूर्ती घेऊन मीही Understanding karma in light of Paul Ricoeur’s philosophical anthropology and hermeneutics (Nagpur: International Centre for Cultural Studies 20006) हे ५०० पानी पुस्तक प्रकाशित केले आहे (माझं त्यांच्याशी काही नातं नाही!). थोडक्यात माझा विचार असा की प्राचीन काळी वेदांत (ज्ञानयोग) आणि कर्मांत (कर्मयोग) ही दोन स्वतंत्र (किंवा पर्यायाने परस्परपूरक = ज्ञानकर्मसमुच्चय) अशी मुक्तीची साधने होती. परंतु काळानुसार कर्मान्ताचा लोप होऊन फक्त वेदांत उरला. माझा उद्देश कर्मयोग हे स्वतंत्र (किंवा पर्यायाने ज्ञानाबरोबर पूरक) असे साधन परत उपलब्ध करून देणे हा होता. Paul Ricoeur यांची theory of action ही काही प्रमाणात आपल्या कर्म सिद्धांताशी मिळती जुळती आहे म्हणून मी तिचा आधार घेतला आहे. तसेच आपला पारंपारिक कर्म विचार आधुनिक परिभाषा आणि प्रणालीतून मांडला तर त्याला अधिक प्रतिसाद मिळेल ही पण अपेक्षा होती.

In reply to by श्रीनिवास टिळक

माहितगार Tue, 01/07/2014 - 20:51
पैलू पाडणे या रुपकात, मला माझे विचार(संप्रदाय) जोडावयाचे नाहीत, तर भगवदगीता जशी मूळ रूपात आहे तशी दाखवावयाची आहे, आणि गीतेच मूळरूपच पैलू पाडलेल्या कोहिनूर हिर्‍या प्रमाणे आहे आणि लोकमान्यांचा गीतारहस्य लेखना मागचा दृष्टीकोण आहे असे गीतारहस्याची प्रस्तावना वाचताना वाटले. या धाग्याच्या वाचकांकरता थोडक्यात Paul Ricoeur यांची theory of action आणि कर्मयोग यांची थोडक्यात तुलना देता आल्यास हा धागा वाचनीय आणि समृद्ध होईल. आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादांकरता धन्यवाद.

माहितगार Sun, 01/05/2014 - 08:18
नमस्कार, गीतारहस्याची अर्पण पत्रिका "अथ समर्पणम" लोकमान्य टिळकांनी संस्कृतातून लिहिली आहे.पूर्ण "अथ समर्पणम" चा शब्दार्था सहीत मराठी अनुवाद हवा आहे.

विकिस्रोत वरिल श्रीमद्भवद्गीतारहस्य (पुस्तक) हा धागा आजच बघितला. हा एक अत्यंत चांगला आणि उपयोगी उपक्रम आहे. बर्‍याच प्रयत्नानेही न मिळणारे हे महत्वाचे पुस्तक असे उपलब्ध करून दिल्याबद्दल धागाकर्त्यांचे आभार आणि मनःपूर्वक अभिनंदन. शिवाय त्या अनुषंगाने होणारे इतर टीकाटिप्पणी आणि साधकबाधक चर्चाही रोचक होईल असे वाटते. या प्रकल्पाला मनापासून शुभेच्छा !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माहितगार Tue, 01/07/2014 - 20:54
विकिस्त्रोत प्रकल्पास भेट, प्रतिसाद आणि शुभेच्छांकरता धन्यवाद. आपल्या आवडीचे वाचन लेखन होत राहो ही शुभेच्छा.

माहितगार Mon, 01/06/2014 - 14:04
नमस्कार, अथ समर्पणम् चे युनिकोडीकरण केले पण काही अक्षरे पुसट होती अथवा जुन्या टंकांचा उपयोग होता त्यामुळे टंकलेली अक्षरे बरोबर आहेत याची करून हवी आहे. सोबतच प्रत्येक शब्दाचा शब्दार्थ आणि प्रत्येक ओळीचा अनुवाद करून मिळावा अशी जाणकारांना विनंती आहे. अनुवाद करताना अनुवाद प्रताधिकारमुक्त कॉपीराईट मुक्त करत आहोत असे लिहावे म्हणजे तो विकिस्रोत प्रकल्पात कॉपीपेस्ट करता येईल ॥अथ समर्पणम्॥ श्रीगीतार्थः क्व [खात्रीचेटंकन?] गंभीर: व्याख्यात: कविभि: पुरा । आचार्यैर्यश्च बहुधा क्व [खात्रीचेटंकन?] मेऽल्पविषया[खात्रीचेटंकन?] मति:॥ तथापि चापलादस्मि वक्तुं तं पुनरुद्यतः । शास्त्रार्थान् संमुखीकृत्य प्रत्नान् नव्यैः सहोचितैः [खात्रीचेटंकन?]॥ तमार्याः श्रोतुमर्हन्ति [खात्रीचेटंकन?] कार्याकार्य-दिदृक्षव:[खात्रीचेटंकन?] । एवं विज्ञाप्य सुजनान् कालिदासाक्षरैः प्रियैः ॥ बालो गांगाधरिश्चाऽहं तिलकान्वयजो द्विजः । महाराष्ट्रे पुण्यपुरे वसन् शांडिल्यगोत्रभृत ॥ शाके मुन्याग्नि वसुभू-संमिते शालिवाहने । अनुसृत्य सतां मार्गं [खात्रीचेटंकन?] स्मरंश्चापि वचो ऻ[खात्रीचेटंकन?] हरेः ॥ समर्पये ग्रंथमिमं श्रीशाय जनतात्मने । अनेन प्रीयतां देवो भगवान् पुरुषः परः ॥ --- यत्करोषि यदश्नासि [खात्रीचेटंकन?] यज्ज्य्द्दोषि ददासि यत् । यत्तपस्यासि कौंतेय तत्कुरुध्ध मदर्पणम् ॥

In reply to by माहितगार

बॅटमॅन Mon, 01/06/2014 - 14:23
ओ साहेब, धाग्यावरचे प्रतिसाद पाहण्याचे कष्ट घेत चला की जरा. कालच टंकलाय अनुवाद, दिसला नाही का आँ???????????????????? http://misalpav.com/comment/542617#comment-542617

In reply to by बॅटमॅन

माहितगार Mon, 01/06/2014 - 17:25
पुरता अगदी अगदी क्षमस्व.सध्या बर्‍या पैकी मिपावर पडिक आहे. प्रतिसाद पाहण्याचा सारखा प्रयास असूनही आपली आपली अनुवादाची एवढी सुंदर भेट देणारा अत्यंत उपयूक्त प्रतिसाद नेमका राहीला असे दिसते. आपल्याला अजून एक आग्रहाची विनंती आहे.आपण अनुवाद प्रताधिकार कॉपीराईट मुक्त करत असल्याचे नमूद केलेत तर तो विकिस्रोत प्रकल्पात घेता येईल आणि मिपा शिवाय इतर मराठी बांधवांनाही आपण केलेल्या या अनुवादाचा लाभ आणि आनंद घेणे सोपे जाईल. अनुवाद उपलब्ध करण्या बद्दल अजून एकदा धन्यवाद

In reply to by बॅटमॅन

माहितगार Tue, 01/07/2014 - 21:11
आपण करून दिलेला अनुवाद विकिस्रोतवर चढवला आहे. लोकमान्य टिळक ग्रंथाच्या प्रस्तावनेच्या सुरवातीसच म्हणतात "श्रीमदभगवद्गीतेवर अनेक संस्कृत भाष्यें ,टीका आणि प्राकृत भाषांतरें अगर विस्तृत सर्वमान्य निरुपणें असतां हा ग्रंथ प्रसिद्ध करण्याचे कारण काय हें जरी ग्रंथारंभीच सागीतले आहे,..." आपण दिलेला अनुवाद वाचल्या नंतर,उपरोक्त संदर्भ 'अथ समर्पणच्या' पहिल्या आणि दुसर्‍या श्लोका बद्दल असण्याची शक्यता वाटली.तसेच, श्लोक क्रमांक ५, ६ आणि गीतेतील श्लोक सोबत वाचले तर जनतेचा आत्मा आणि हरी (इश्वर) यांना समर्पण आणि अर्पण आहे. लोकमान्यांना जनतेचा आत्मा आणि हरी यांचे अपरोक्ष अद्वैत दर्शवायचे असे काही असेल का असेही वाटून गेले. आपल्या अनमोल अनुवाद 'भेटी' करता पुन्हा एकदा धन्यवाद.

In reply to by माहितगार

राही Mon, 01/06/2014 - 15:40
बहुतेक सर्व बरोबर. क्व शब्द बरोबर आहे. क्व सूर्यप्रभवो वंशः, क्व मेs/ चाल्पविषया मति: हे रघुवंशाचे प्रथम वाक्य सुप्रसिद्ध आहे. [कुठे तो सूर्यप्रभव वंश (आणि तो वर्णू इच्छिणारी) कुठे माझी अल्पमती. मे+अल्प किंवा च+अल्प]. फक्त शेवटी गीतेतल्या श्लोकात यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् असे पाहिजे.

In reply to by राही

बॅटमॅन Mon, 01/06/2014 - 17:15
प्रत्न हा शब्द बरोबर आहे. त्याचा अर्थ "जुना" असा आहे. संदर्भ खाली पहावा. http://spokensanskrit.de/index.php?script=HK&beginning=0+&tinput=+pratna&trans=Translate&direction=AU

In reply to by राही

माहितगार Tue, 01/07/2014 - 21:14
आपल्या मार्गदर्शना प्रमाणे विकिस्रोत प्रकल्पातील लेखन अद्ययावत करता आले.खूप खूप धन्यवाद

Understanding karma...ची सुधारित आवृत्ती amazon.com वर उपलब्ध आहे. गुगलवर पण आहे (अर्थात ठिकठिकाणी मधली पाने गाळलेली). मूळ आवृत्तीचा draft skydrive वर चढविला आहे त्याचा दुवा https://skydrive.live.com/redir?resid=838F479655AE3BFB%21129

माहितगार Wed, 01/08/2014 - 09:11
गीतारहस्याच्या मूळ प्रथम आवृत्ती (१९१५) चे मुखपृष्ठ आणि नंतरच्या आवृत्तींचे मुखपृष्ठ यात अंशतः फरक असावा असा असे वाटते. मूळ प्रथम आवृत्ती (१९१५) चे मुखपृष्ठा नंतरचे पान मिपा सदस्य श्री जयंत कुलकर्णी यांनी पुरवलेल्या छायाचित्रातून मिळाले.बहुधा मुखपृष्ठावरील मजकुर आणि त्यानंतरच्या प्रथम पानावरील मजकुर एक सारखाच असावा असा अंदाज आहे. मुखपृष्ठा नंतरच्या प्रथम पानावरील मजकूर खाली टंकून उपलब्ध केला आहे.१९१५ची आवृत्ती असलेल्या गीतारहस्या चाहत्यांकडून खालील मजकूर १९१५ आवृत्तीच्या मुखपृष्ठावर असल्याची खात्री करून हवी आहे. शिवाय शेवटच्या कव्हरचे छायाचित्र पहाण्यात आलेले नाही त्यावरही काही मजकुर असल्यास अवश्य कळवावे हि नम्र विनंती
The Hindu Philosophy of Life,Ethics and Religion ॐ तत्सत् । श्रीमद्भवद्गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र गीतेचें बहिरंगपरीक्षण,मूळ संस्कृत श्लोक[टंकनभेद],मराठी भाषांतर,अर्थ- निर्णायक टीपा,पौर्वात्य व पाश्चिमात्य मतांची तुलना वगैरेसह . हा ग्रंथ बाळ गंगाधर टिळक यांनीं रचिला. तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर । असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥ गीतासु. ३. १९. पुणें. शके १८३७. सन १९१५. किंमत तीन रुपये.