मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मध्य वयातील वादळ -पुढे

सुबोध खरे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
कर्करोग स्तनांचा मध्य वयातील वादळ मध्यवयातील वादळ- पुढे ----------------- काही गोष्टीत आपल्या मित्रांनी मांडलेले मुद्दे लक्षात घेऊन आपण पुढे जात आहोत. चीड चीड कोणी स्वतःहून करीत नाही तर चिडचिड हि होते. जेंव्हा एखादी परिस्थिती आपल्या हातात नसते आणि तो बदलण्याचे आपल्याला सामर्थ्य नसते तेंव्हा माणसाची/ बाईची चिडचिड होते १ ) पुरुषांना पण असे(रजोनिवृत्ती सारखे) होते हे थोड्याप्रमाणात सत्य आहे पण पुरुषांची संप्रेरके साठीच काय सत्तरीपर्यंत कार्यरत असतात त्यामुळे त्या वयालाही पुरुषाला मूल होऊ शकते. पण स्त्रीच्या बाबतीत हि शक्यता एकदम संपत असते. या गोष्टीचाही पुष्कळ स्त्रियांवर खोलवर मानसिक परिणाम होत असतो. आता आपल्याला मुल होऊ शकणार नाही. हि निसर्गाने दिलेली आपल्यासारखा चालता बोलता जीव निर्माण करण्याची अफाट शक्ती आता संपली असे निराशावादी विचार मनात येतात. २)ज्या वयात स्त्रीची रजोनिवृत्ती येते त्याच काळात पुरुषाचे पोट सुटणे, टक्कल पडणे, चष्मा येणे इ. घडत असते. त्यालाही हे सर्व जाणून वाईट वाटत असते पण तो ते 'निसर्ग नियम' ह्या विचाराने सर्व काही स्विकारतो. याच वयात स्त्रियांनाही चष्मा(चाळीशीचा) लागलेला असतो वजन वाढलेले असते,चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात. पण यात अधिक म्हणून रजोनिवृत्ती येते. आणि ती अशी त्वरित आल्यामुळे त्यांचे भावविश्व सैरभैर होते. अशीच परिस्थिती पुरुषाची त्या वयात होते जर त्याची नोकरी गेली धंद्यात खोट आली किंवा आर्थिक स्थिती नाजूक झाली तर. कारण जसे सुंदर दिसणे हा स्त्री स्वभावाचा भाग असतो तसे आपल्या पायावर आर्थिक डोलारा सांभाळणे हे पुरुषाच्या स्वभावाचा भाग असतो. या काळात जर आर्थिक स्थिती नाजूक झाली तर पुरुषाचे भावविश्व असेच कोलमडते. परंतु त्याला जगापुढे आपले असे स्वरूप दाखवता येत नाही त्यामुळे पुरुषांचा असा कोंडमारा होतो असो स्त्रियांमध्ये हे शारीरिक बदल होतात त्याबरोबर त्यांच्या लैंगिक आयुष्यात फार मोठे बदल होतात. त्यांच्या संप्रेरकांमुळे मेंदूतील कामजीवनाची केंद्रे कमी काम करू लागतात त्याचा परिणाम पाच बाबतीत होतो. १.- कामेच्छा desire २.उद्दीपन arousal ३.-स्नेहन lubrication ४.- दाह pain ५.- अत्त्युच्च आनंद -orgasm यात उद्दीपन स्नेहन आणि दाह या तीन गोष्टींच्या प्रभावामुळे त्यांचे कामजीवन अस्ताव्यस्त होते. यात कामेच्छा कमी झाली नाही तरी उद्दीपन कमी होते स्नेहन कमी होते त्यामुळे कोरडेपणा जाणवतो यामुळे योनीमध्ये दाह होतो त्यामुळे स्त्रीला अत्त्युच्च आनंदापर्यंत पोहोचणे कठीण होते. या कारणा मुळे स्त्रीया कामसंबंध टाळण्याचा प्रयत्न करतात. याचवेळी नवर्याकडून मानसिक आधाराची गरज असल्यामुळे त्या जवळीक( intimacy) करण्याचा प्रयत्न करतात पण प्रत्यक्ष शरीरसंबंध टाळण्याचा प्रयत्न करतात. या अशा द्विधा वागण्यामुळे पुरुष अतिशय गोंधळात पडतो. बायको जवळ आल्यामुळे तो उद्दीपित होतो पण संबंध नाकारल्यामुळे तो दुखावला जातो. पुढच्या वेळी अशी अवहेलना होऊ नये म्हणून तो बायकोशी भावनिक जवळीक टाळतो. त्यामुळे आधीच तणावपूर्ण वातावरणात भर पडते. स्त्रियांनी जर आपल्या नवर्याला सुरुवातीलाच स्पष्ट सांगितले कि मला फक्त जवळीक हवी आहे संबंध नको तर पुरुषाची उद्दीपित होणे आणि नंतर थंड पडणे अशी कुचंबणा टळेल आणि निदान संबंधात तणाव वाढणार नाही. कोरडे पणामुळे योनीला जंतुसंसर्ग होतो आणि त्यामुळे खाज येणे जळजळ होणे पांढरे पाणी जाणे हे प्रकार सुद्धा वाढतात. याचा वेळेत इलाज करणे आवश्यक आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने स्नेहन(lubrication) साठी क्रीम वापरणे आणि जन्तुसंसार्गासाठी प्रतिजैविक घेणे हे त्यांच्या संबंधाना पुनर्प्रस्थापित करण्यासाठी फार महत्त्वाचे ठरते. शेवटी कामसुख हे एक असे सुख आहे कि ज्यासाठी दोन्ही साथीदारांचा सहभाग आवश्यक आहे. जसे पुरुषांनी दोन पायर्या उतरणे आवश्यक आहे तसेच स्त्रियांनी दोन पायर्या चढणे तितकेच आवश्यक आहे. अन्यथा दुरावलेले संबंध पुनर्प्रस्थापित करणे फार कठीण जाते. कारण हे सुख मिळवण्यासाठी बाहेर जाणे हे कोणाच्या हि हिताचे नाही. मानसिक आजार -२० टक्के स्त्रियांना या काळात नैराश्य येते( मेंदूत होणारा केमिकल लोच्या) हे असे का होते आहे हे स्त्रियांना काळात नाही आणि ती नाटके करीत आहे असे पुरुषांना वाटत असते. दुर्दैवाने हे नैराश्य( depression) आहे कि लक्ष वेधून घेण्यासाठी( attention seeking) केले जाते ते सहज सांगणे कठीण जाते. यासाठी पुरुषांना फार धैर्याने आणि संयमाने वागणे आवश्यक असते. पण हाच काळ त्यांच्या कर्तृत्वाचा असल्याने त्यांना आपल्या बायकोला तेवढा वेळ देत येतोच असे नाही आणि ती स्त्री एकटी पडते. ४० -५० टक्के स्त्रियांना निद्रानाशाचा त्रास होतो. त्या बोलत असताना नवरा घोरू लागला हे हटकून दिसणारे चित्र आहे. मग यातून बायका नाही नाही ते अर्थ काढू लागतात. नवर्याचे माझ्याकडे लक्ष नाही मी आता तेवढी सुंदर नाही पासून त्याचे बाहेर बहुतेक लफडे असावे इथपर्यंत. यावर उपाय काय? १) आपली शरीर प्रणाली मंद होत आहे आणि पाळी अनियमित होत आहे हे जाणवल्यावर स्त्रियांनी स्त्री रोग तज्ञाकडून तपासणी करणे आवश्यक आहे हे रजोनिवृत्ती मुले आहे हे नक्की झाले म्हणजे पुढच्या उपाया कडे वळता येते. २) पहिली गोष्ट म्हणजे आपली शरीर प्रणाली मंद होत आहे तर ती परत वेगवान करण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे सर्वात चांगला व्यायाम म्हणजे चालणे. रोज ३५ ते ४० मिनिटे वेगाने ( गाडी पकडण्यासाठी चालतो त्या वेगाने) चालायला सुरुवात करा. रिक्षा/ दुचाकीचा वापर अत्यावश्यक असेल तरच करा. याने आपल्या स्नायुंना व्यायाम मिळून मेंदूत इंडोर्फिन नावाची संप्रेरके तयार होतात( रजोनिवृत्तीमुळे हि संप्रेरके कमी झाली असल्याने स्त्रीला उदास/ निरुत्साही वाटत असते ते नक्कीच कमी होते. शरीर थकल्यामुळे झोप चांगली लागते आणि सकाळी उठल्यावर जो निरुत्साह वाटतो तो कमी होतो. ३) आहार दहा टक्क्यांनी कमी करा यात तेलकट मसालेदार गोष्टी कमी करून फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवावे.(तोच वापरून दोन्ही बाजूनि गुळगुळीत झालेला सल्ला)ज्यांना वाताचा त्रास आहे अशा भगिनींनी (जवळ जवळ ६० टक्के ना हा त्रास होतो ) सकाळी उठल्यावर दात घासल्यावर अंशे पोटी एक लिटर कोमट पाणी प्यावे या पाण्यात एक लिंबाचा रस आणि एक मोठा चमचा मध घालावा याने आपले पोट साफ होईल रात्रभर शरीरात साठलेली दुषित द्रव्ये बाहेर टाकण्यासाठी मूत्रपिंडाला मदत होईल आणि स्वस्तात निपटेल (काहीच नाही तर अपाय नक्कीच होणार नाही) ४) एखादा छंद लावून घ्या --(परत तेच -छंद असा सहज लावून लागत नाही) म्हणून साधारण चाळीशीनंतर स्त्रियांनी आपल्याला काय आवडते आणि काय करायचे होते जे राहून गेले याची यादी करायला घ्या आणि त्यातील एक एक गोष्टी करण्याचा प्रयत्न करा यातील एखादी गोष्ट आपल्याला जमू शकेल. आता जी जमू शकली आहे ती गोष्ट रजोनिवृत्ती नंतर पूर्ण झोकून देऊन करत येईल. ५) इतर आजार -चक्कर येणे गरम वाटणे (hot flushes) यासठी तज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे HRT (hormone replacement therapy) घेत येईल. हि घ्यावी किं घ्यावी याबद्दल जगभर मोठी चर्चा चालू आहे आणि मी वादात न पडता एकच सांगतो तुमच्या स्त्री रोग तज्ञाच्या सल्ल्याप्रमाणे करा. HRT ने रजोनिवृत्तीचे बरेचसे परिणाम काही काळा पुरते दूर करता येतात. एकदा तुम्ही त्या मानसिक स्थिती शी जुळवून घेतले कि हि औषधे बंद करता येतात. ६) नैराश्य यासाठी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने मनोविकार तज्ञाकडे जाऊन उपाय करता येईल. पण हा आजार आहे हे घरच्यांनी/ नवर्याने जाणून घेणे आवश्यक आहे. बाकी अदिती ताईनी दिलेल्या दुव्यांमध्ये शारीरिक आजाराची माहिती सुरेख तर्हेने दिलेली आहेच. घरच्यांसाठी-आपल्या बायकोला/ आईला समजून घेण्याचा प्रयत्न तरी करा. कदाचित एवढ्यावरच काम भागेल. तिच्या अशा काळात तिला आपल्या मदतीची अतिशय जास्त गरज आहे. ऑफिसात बॉस ची बकबक गपचूप ऐकून घेताच मग थोडीशी बायकोची ऐकली तर काय बिघडले ? बरेच लोक हेच म्हणतील कि ऑफिसात डोके पिकवून आलो तर घरी तेच मग फरक काय? स्त्रियांसाठी -- आपल्याला काय होते आहे याचे शांत डोक्याने परीक्षण करा कुठे चुकते आहे त्याचा विचार करा आणि संवाद ठेवण्याचा प्रयत्न करा पहा काही फरक पडतो का?

वाचन 53599 वाचनखूण प्रतिक्रिया 118

ढालगज भवानी गुरुवार, 05/09/2013 - 22:42
अरे हो मला एक प्रश्न विचारायचा होता - मासिक पाळीच्या दरम्यान व्यायाम केला तर चालतो का? म्हणजे कोणत्याही वयाच्या स्त्री ला. काही धोके आहेत त्यात का नाही?

In reply to by जेनी...

मैत्र Fri, 05/10/2013 - 08:04
फारच जनरल किंवा ब्रॉड असा प्रतिसाद.. योगा सोडून कुठलाही व्यायाम चालतो या विधानाला काही आधार आहे का? म्हणजे साधी योगासने चालत नाहीत पण कार्डिओ व्यायाम जसे ऐरोबिक्स किंवा जिममध्ये केलेले व्यायाम किंवा पोहणे, टेकडी चढणे, दोरीवरच्या उड्या, पिलॅट्स असले काय वाट्टेल ते व्यायाम चालतील पण योगा नाही? मला मिळालेल्या फीडबॅक नुसार साधी योगासने या काळात जास्त श्रमकारक व्यायामांपेक्षा जास्त चांगली..

In reply to by जेनी...

शिल्पा ब Fri, 05/10/2013 - 08:20
तुम्हाला कोणी सांगितलं? जो व्यायाम झेपेल तो करु शकता. अ‍ॅरोबिक्स, स्विमींग - टँपॉन असेल तरच, साधी योगासनंसुद्धा. पोटावर खुप ताण येणार नाही असा व्यायाम करु शकता. थोडक्यात जे झेपेल तेच करा...उगाच अमकी हे करते म्हणुन मी पण करेन असं नाही.

In reply to by शिल्पा ब

जेनी... Fri, 05/10/2013 - 08:26
आम्हाला आमच्या योगाच्या बाइनी सांगितलं ... म्हणुन मी नाहि करत :) उगा लोकांचा फीडबॅक घेण्यापेक्षा आपल्या शिक्षकांवर विश्वास ठेवलेला बरा ... उगा कशाला शरिराची मोडतोड ....

In reply to by शिल्पा ब

जेनी... Fri, 05/10/2013 - 08:31
टँपॉन सङळ्यानाच सुट होत नाहि .. इन्फेक्शन्स चे चान्सेसहि जास्त असतात .. प्रॉपर बसलं नाहि तर डोळ्यात पाणि आणतं ....

In reply to by शिल्पा ब

सुबोध खरे Fri, 05/10/2013 - 10:28
थोडक्यात जे झेपेल तेच करा...उगाच अमकी हे करते म्हणुन मी पण करेन असं नाही.एकदम सहमत इगो नसावा.

In reply to by मैत्र

जेनी... Fri, 05/10/2013 - 08:22
आणि आधाराचं म्हणाल तं तुमच्यासारखं फीडबॅक घेऊण लिवलं नैये ... स्वताचा अनुभव सांगितलाय .. काये मी कॉलेजला असताना योगाच्या क्लास ला जायची तेव्हा तिथल्या टीचर स्पष्टपणे सांगायच्या ज्यांना मासिक पाळी सुरु आहे त्यांनी योगा करु नका ... त्यामुळे मी कुठलाच प्रकार त्या दरम्यान करायची नाहि आणि नंतरहि कधीच केला नाहि ... इकडे तर योगाचे बरेच प्रकार शिकवले जातात ... अगदी नावहि कळत नाहित पण मस्त असतात ... महिन्यातले चार दिवस सोडुन नियमित केल्यास मानसिक शारिरिक बराच फरक जानवतो .... मासिक पाळी दरम्यान मी स्वतहा योगा सोडुन अ‍ॅरोबिक्स , स्टेप एम , झुम्बा ,जिम करते .. बाकिच्यांचं बाकिच्याना माहित ... मी स्वताहाचा अनुभव सांगितला ...

In reply to by ढालगज भवानी

सुबोध खरे Fri, 05/10/2013 - 10:26
मासिक पाळीच्या दरम्यान व्यायाम करू नये याला कोणताही शास्त्राधार नाही. मी लष्करात असताना माझ्या वर्गातील २५ डॉक्टर मुली सुद्धा लष्करी प्रशिक्षण घेत होत्या. तेंव्हा आम्हाला BPET (battle physical efficiency test) म्हणजे १२ मिनिटात ३.२ किमी धावणे हि पण चाचणी होती आणि अशा चाचण्यामध्ये त्या मुली पाळीच्या काळातही धावत असत. जर इतकी श्रमपूर्ण कामे तुम्ही जर करू शकता तर बाकी कोणताही व्यायाम करण्यास प्रतिबंध नसावा. एखादीला फारच कंबर दुखी किंवा तत्सम त्रास असेल तर गोष्ट वेगळी. अमेरिकन वायुदलात याच कारणासाठी लढाऊ वैमानिक म्हणून स्त्रियांना प्रवेश नव्हता कि महिन्यात ४ दिवस त्या उपलब्ध होणार नाहीत . परंतु १९९२ साली( बहुधा) तो पहिल्यांदा प्रवेश दिला गेला आणि त्या स्त्रियांनी आपणही तितक्याच दर्जाच्या वैमानिक होऊ शकतो हे सिद्ध करून दाखवले. जर आपण ६G (गुरुत्वाकर्षणाच्या सहा पट बळाने) किंवा जास्त बलाने विमान उलटे पालटे चालवू शकता तर योगासने करण्यासाठी कोणताही प्रत्यवाय नसावा असे वाटते.

जेनी... Fri, 05/10/2013 - 02:19
एच आर टी चे साइड इफेक्ट्स खुप असतात ना ?? ऐकुन आहे फक्त. हार्मोन्स चेन्जेस चा त्रास ज्याना वयाच्या १५/१६ वर्षापासुन होतो त्यांच्यासाठी एच आर टी ट्रीटमेन्ट त्रासदायक होउ शकते का ?? सूट होते का ?? काहि साधे उपाय ??

नैराश्य( depression) आहे कि लक्ष वेधून घेण्यासाठी( attention seeking) केले जाते ते सहज सांगणे कठीण जाते
लक्ष वेधून घेणं हे लक्षण असून मूळ मानसिक रोग वेगळाच असण्याचीही शक्यता नाही का? मानसिक रोग असेल त्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहेच. प्रगत देशांमधे प्रसूतीसंदर्भात क्लासेस भावी माता-पिता दोघांसाठीही असतात. अशा प्रकारच्या लेखनाची, संवादाची गरजही स्त्रिया आणि स्त्रियांशी संपर्कात येणार्‍या पुरुषांसाठीही तेवढीच महत्त्वाची आहे. टंकनदुरूस्ती: लेखात तुम्ही hot flashes याऐवजी hot flushes असा शब्द वापरलेला आहेत. (ही अतिरिक्त उष्णता फ्लश झाली तर अडचणच सुटते; निर्माण होत नाही.)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सुबोध खरे Fri, 05/10/2013 - 10:34
नैराश्य( depression)यात केमिकल लोच्या असतो आणि तो औषधानेच सुधारावा लागतो.पण लक्ष वेधून घेण्( attention seeking)याची गोष्ट वेगळी आहे. यात त्या स्त्रीला (आणि नवरयाला) समुपदेशनाने उपचार करता येतात लक्ष वेधून घेणे(attention seeking) हे नैराश्याचे लक्षण नव्हे.(ते हिस्टेरिया चे लक्षण असू शकते)

In reply to by सुबोध खरे

सेरेपी Mon, 05/13/2013 - 22:13
लक्ष वेधून घेणे(attention seeking) हे नैराश्याचे लक्षण नव्हे.(ते हिस्टेरिया चे लक्षण असू शकते)>> "histrionic personality disorder a disorder characterized by dramatic, reactive, and intensely exaggerated behavior, which is typically self-centered. It results in severe disturbance in interpersonal relationships that can lead to psychosomatic disorders, depression, alcoholism, and drug dependency. Symptoms include emotional excitability,..." म्हणजे आपण मॉडेल केलं तर histrionic behavior आणि नैराश्य यांचा पाथ कोएफिशियंट सिग्निफिकंट येईल नाही का? असो, आणि अदितीने मानसिक आजार म्हटलंय नाही का? फक्त डिप्रेशन नव्हे.

प्रभाकर पेठकर Fri, 05/10/2013 - 16:06
चीड चीड कोणी स्वतःहून करीत नाही तर चिडचिड हि होते. जेंव्हा एखादी परिस्थिती आपल्या हातात नसते आणि तो बदलण्याचे आपल्याला सामर्थ्य नसते तेंव्हा माणसाची/ बाईची चिडचिड होते
परिस्थिती आपल्या हाताबाहेर असते आणि ती बदलण्याचे सामर्थ्य आपल्याकडे नसते तेंव्हा शांत मनाने परिस्थिती स्विकारणेच फायद्याचे असते. शिवाय परिस्थिति बदलण्याचे सामर्थ्य आपल्याकडे नसले तरी त्याची तीव्रता कमी करण्याचे उपाय अस्तित्वात असतील तर ते उपाय योजण्यात यावेत, असे मला वाटते.
१ ) पुरुषांना पण असे(रजोनिवृत्ती सारखे) होते हे थोड्याप्रमाणात सत्य आहे पण पुरुषांची संप्रेरके साठीच काय सत्तरीपर्यंत कार्यरत असतात त्यामुळे त्या वयालाही पुरुषाला मूल होऊ शकते. पण स्त्रीच्या बाबतीत हि शक्यता एकदम संपत असते. या गोष्टीचाही पुष्कळ स्त्रियांवर खोलवर मानसिक परिणाम होत असतो. आता आपल्याला मुल होऊ शकणार नाही. हि निसर्गाने दिलेली आपल्यासारखा चालता बोलता जीव निर्माण करण्याची अफाट शक्ती आता संपली असे निराशावादी विचार मनात येतात.
हल्ली १ किंवा २ मुले असण्याच्या जमान्यात, फार तरूण वयातच, ह्या पुढे मुले होऊ नयेत म्हणून, स्त्री-पुरुष स्वेच्छेनेच वेगवेगळे उपाय योजतात. म्हणजे प्रत्यक्ष रजोनिवृत्तीच्या कितीतरी वर्षे आधीच, आता आपल्याला मुल नकोच ह्याची, स्त्रीच्या मनाची तयारी झालेली असते. जीला अजिबात कधी मुल झाले नाही तिला वाईट वाटणे समजू शकतो. बाकी ज्यांना योग्य त्या वयात संतती प्राप्त झाली आहे त्यांना जरा हळहळ वाटेल पण मनावर खोल परिणाम वगैरे होण्याची शक्यता वाटत नाही.
२)ज्या वयात स्त्रीची रजोनिवृत्ती येते त्याच काळात पुरुषाचे पोट सुटणे, टक्कल पडणे, चष्मा येणे इ. घडत असते. त्यालाही हे सर्व जाणून वाईट वाटत असते पण तो ते 'निसर्ग नियम' ह्या विचाराने सर्व काही स्विकारतो. याच वयात स्त्रियांनाही चष्मा(चाळीशीचा) लागलेला असतो वजन वाढलेले असते,चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात. पण यात अधिक म्हणून रजोनिवृत्ती येते.
तसेच पुरूषांच्या बाबतीतही, हल्ली कॉमन होत चाललेला मधुमेह जडतो. मधुमेहानेही पुरुषांच्या लैंगिक सुखात, गरजेत आणि क्षमतेत बाधा येते. तर मधुमेह नसलेल्या पुरुषातही शैथिल्य येतेच. उगीच व्हायाग्रा वगैरेची विक्री होत असते का?
अशीच परिस्थिती पुरुषाची त्या वयात होते जर त्याची नोकरी गेली धंद्यात खोट आली किंवा आर्थिक स्थिती नाजूक झाली तर. कारण जसे सुंदर दिसणे हा स्त्री स्वभावाचा भाग असतो तसे आपल्या पायावर आर्थिक डोलारा सांभाळणे हे पुरुषाच्या स्वभावाचा भाग असतो. या काळात जर आर्थिक स्थिती नाजूक झाली तर पुरुषाचे भावविश्व असेच कोलमडते.
ही तर पराकोटीची परिस्थिती झाली. पण तशी खोट वगैरे नाही आली आणि नोकरीही व्यवस्थित चालू असेल तरी, मुलांच्या उच्च शिक्षणाचा वाढता खर्च, वाटती महागाई, (वयोमानानुसार)वाढता हॉस्पिटलचा, औषधपाण्याचा खर्च, इ.इ. मुळे, उद्या आपले उत्पन्न बंद झाले की घरखर्च कसा उचलायचा, आजचे राहणीमान टिकवायचे कसे? ह्या विवंचनेतून अनेक निवृत्त ज्येष्ठ नागरीक शरीर साथ देत नसले तरी कांही तरी उत्पन्नाचे साधन शोधून धडपडताना दिसतात. त्यांचे भावविश्वही कोलमडलेलेच असते.
१.- कामेच्छा desire २.उद्दीपन arousal ३.-स्नेहन lubrication ४.- दाह pain ५.- अत्त्युच्च आनंद -orgasm यात उद्दीपन स्नेहन आणि दाह या तीन गोष्टींच्या प्रभावामुळे त्यांचे कामजीवन अस्ताव्यस्त होते. यात कामेच्छा कमी झाली नाही तरी उद्दीपन कमी होते स्नेहन कमी होते त्यामुळे कोरडेपणा जाणवतो यामुळे योनीमध्ये दाह होतो त्यामुळे स्त्रीला अत्त्युच्च आनंदापर्यंत पोहोचणे कठीण होते.
ह्याच अवस्थेतून मधुमेही आणि इतर वयोवृद्ध पुरुषही जात असतात. माझा म्हणण्याचा अर्थ इतकाच की दोघांनाही आज ना उद्या ह्या गोष्टींना सामोरे जावे लागते. दोघांनीही एकमेकांशी बोलून, तज्ञांना सल्ला घेउन उपाय योजना कराव्यात किंवा आहे ती परिस्थिती 'निसर्गनियम' म्हणून स्विकारावी. प्रेम ही उत्कट भावना मनांत असावी, आपल्या साथिदाराला ती वरचेवर दिसून येईल असे वर्तन ठेवावे. शरीरसंबंधातून सुख शोधण्याचा अट्टाहास धरू नये, विशेषतः पुरुषांनी.
या अशा द्विधा वागण्यामुळे पुरुष अतिशय गोंधळात पडतो. बायको जवळ आल्यामुळे तो उद्दीपित होतो पण संबंध नाकारल्यामुळे तो दुखावला जातो. पुढच्या वेळी अशी अवहेलना होऊ नये म्हणून तो बायकोशी भावनिक जवळीक टाळतो.
भावनिक नाही शारीरीक. कधी कधी पुरुष कोषात जातो. संवाद तुटतो आणि म्हणूनच वातावरण अधिक तणावपूर्ण होते. इथे पुरुषाने पुढाकार घेऊन संवाद साधावा आणि कोषात जाऊन कोणाचेही भले होणार नाहीए हे जाणून अशी अवस्था टाळावी.
स्त्रियांनी जर आपल्या नवर्याला सुरुवातीलाच स्पष्ट सांगितले कि मला फक्त जवळीक हवी आहे संबंध नको तर पुरुषाची उद्दीपित होणे आणि नंतर थंड पडणे अशी कुचंबणा टळेल आणि निदान संबंधात तणाव वाढणार नाही.
ही गोष्ट फक्त स्त्री नाही करू शकत. कारण जर नवरा समंजस नसेल तर तो तिच्या पासून मनाने आणि शरीराने दूर जाऊ शकतो. हीच भिती तीला वाटत असावी, जे नैसर्गिक (तिला भिती वाटणे) आहे. नवराही तितकाच विचार करणारा असावा. निसर्गनियमाने आलेली दुर्बलता म्हणजे आयुष्यातील पराभव किंवा आपल्या पती/पत्नी समोर पराभव अशी भावना मनात येता कामा नये. ह्या साठीच समुपदेशनाची, तज्ञांची गरज जास्त आहे असे मला वाटते.
जसे पुरुषांनी दोन पायर्या उतरणे आवश्यक आहे तसेच स्त्रियांनी दोन पायर्या चढणे तितकेच आवश्यक आहे.
अखंड आयुष्यभर प्रत्येक पातळीवर हे आवश्यक आहे फक्त कामजीवनात नाही.
ऑफिसात बॉस ची बकबक गपचूप ऐकून घेताच मग थोडीशी बायकोची ऐकली तर काय बिघडले ?
हा:हा: दोन्ही ठिकाणी बिचार्‍याला 'चॉईस' कुठे असतो? (हे विनोदी विधान आहे. कृपया गांभिर्याने घेऊ नये)
आपल्याला काय होते आहे याचे शांत डोक्याने परीक्षण करा कुठे चुकते आहे त्याचा विचार करा आणि संवाद ठेवण्याचा प्रयत्न करा पहा काही फरक पडतो का?
सहमत. अगदी हेच मला म्हणायचे आहे. ह्या अवस्थेतून जात असलेल्या, लवकरच जाणार असणार्‍या सर्व नवराबायकोंस शुभेच्छा..! ज्यांचे लग्न झालेले नाही किंवा अजून अशा समस्या बर्‍याच दूर आहेत त्यांनी ह्या विषयावरील मिळेल ते साहित्य वाचून आपापल्या मनाची तयारी करावी. मुळात, ही समस्या नसून एक, टाळता न येणारी, नैसर्गिक अवस्था आहे हे ध्यानात असू द्यावे. असो.... त्यांनाही शुभेच्छा..!

In reply to by प्रभाकर पेठकर

सुबोधजी (अर्थात डॉक्टर असल्यानं) शरीर केंद्रबिंदू मानतात आणि प्रश्नाकडे अनिवार्य असाहय्यता म्हणून पाहतात. मी म्हटल्याप्रमाणे त्यांचा प्रश्नाकडे पाहण्याचा क्रम : शरीर > मन > आपण असा आहे.
१.- कामेच्छा desire २.उद्दीपन arousal ३.-स्नेहन lubrication ४.- दाह pain ५.- अत्त्युच्च आनंद -orgasm यात उद्दीपन स्नेहन आणि दाह या तीन गोष्टींच्या प्रभावामुळे त्यांचे कामजीवन अस्ताव्यस्त होते. यात कामेच्छा कमी झाली नाही तरी उद्दीपन कमी होते स्नेहन कमी होते त्यामुळे कोरडेपणा जाणवतो यामुळे योनीमध्ये दाह होतो त्यामुळे स्त्रीला अत्त्युच्च आनंदापर्यंत पोहोचणे कठीण होते.
या उलट पेठकर प्रश्नाकडे : (तसं न पाहता, मी म्हटल्याप्रमाणे), आपण > जाणिव > शरीर > मन असं बघतात त्यामुळे वेगळे विकल्प उपलब्ध होतात. अर्थात, प्रश्न नक्की सुटेल असं उत्तर येत नाही. त्यामुळे :
मानवी संप्रेरकांवर चर्चा करतांना हे दोन पोलॅरिटीज मधलं आकर्षण हाच विषयाचा केंद्र बिंदू ठरतो
हे पारस्पारिक आकर्षण आणि एकमेकातला अनुबंध सर्व प्रश्नांचं एकमेव उत्तर आहे. कामेच्छा, शरीर, वय, आयुष्यातले कोणतेही प्रसंग आणि एकमेकांच्या सर्व मानसिक अवस्था यावर ते मात करतं.

In reply to by संजय क्षीरसागर

सहमत खरे ह्यांच्या लिखाणाचे योग्य विश्लेषण केले आहे. अर्थात त्यांच्या व्यवसायाच्या संबंधित लिखाण ते करत असल्याने असे होणे साहजिकच आहे. किंबहुना लेखक म्हणून त्यांचा तो अधिकार आहे. सुदैवाने पेठकर काका व इतर मान्यवरांच्या प्रतिसादाने चर्चेला योग्य दिशा मिळते. ह्या विषयावर सध्या वाचन चालले आहे. ह्या धाग्याचा उपयोग पुढील आयुष्यात नक्कीच होईल.

प्यारे१ Fri, 05/10/2013 - 17:31
वाचतो आहे. समजून घेतो आहे. बाकी खरे डॉक्टरसाहेबांना अनाहिता विभागाचे मानद सभासदत्व मिळावे (त्यांची हरकत व इतर महिला सदस्यांची तयारी आणि ऊलट असा विचार करुन) आमच्यासाठी ते आहेतच.

पैसा Sat, 05/11/2013 - 10:11
चर्चा वाचते आहे. लेख आवडला. मी काही दिवसांपूर्वी टाइम्स ऑफ इंडियामधे एक लेख वाचला होता. त्या लेखाप्रमाणे आताच्या जीवनशैलीमुळे वयाच्या विशीतही काही महिलांना रजोनिवृत्ती येते आहे. तसे असेल तर ही केवळ मध्यवयातली समस्या न रहाता कोणत्याही करियरिस्ट महिलेला येऊ शकेल अशी समस्या बनत आहे. तुमच्या पाहण्यात अशा काही केसेस आल्या आहेत का? की अशा दुर्मिळ केसेसचा जास्त बाऊ केला जात आहे? आणि यांचे प्रमाण वाढत असेल तर ते रोखण्यासाठी काही करता येणे शक्य आहे का?

राही Sat, 05/11/2013 - 17:21
रजोदर्शन अथवा ऋतुप्राप्ती देखील अलीकडे लहान वयातच येऊ लागली आहे असे बर्‍याच ठिकाणी वाचले आहे. काही ठिकाणी या मागची कारणे गरोदरपणात मातेने घेतलेला योग्य आहार, जन्मानंतर अपत्याचे व्यवस्थित संगोपन आणि त्यामुळे स्त्री-अपत्यामध्ये(सुद्धा) आलेली सुदृढता ही असावीत असा निष्कर्ष होता. भारतामध्ये कदाचित हे फेनॉमिनन सुखवस्तू वर्गासाठीच लागू असावे. अतिलठ्ठपणा(ओबेसिटी) सुद्धा नियमितपणावर आणि निवृत्तीवर परिणाम करतो असेही वाचले आहे.

कधीकधी तुमच्या लेखांवर चर्चेत सहभागी व्हावसं वाटतं पण आपले दृष्टीकोन भिन्न आहेत. लेट मी एक्सप्लेन: तुम्ही शरीरतज्ञ असल्यानं प्रश्नाकडे पाहण्याचा क्रम : शरीर > मन > आपण असा आहे. आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत. आपण शरीर नसून `आपल्याला शरीराची जाणिव आहे' हा माझा अनुभव आहे. त्यामुळे प्रश्नाकडे बघतांना माझा दृष्टीकोन : आपण > जाणिव > शरीर > मन असा आहे. ____________________________________________ या लेखाचं शीर्षक आहे `मध्यवयातील वादळ'. आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत आणि वय शरीराला आहे, आपल्याला नाही हे मला पक्कं माहिती आहे. त्यामुळे पहिल्या चरणातच मी प्रश्नापासनं वेगळा होतो. याचा अर्थ शरीराला प्रश्न येणार आणि त्यांची व्यवस्था करावी लागेल याची पूर्ण कल्पना आहे पण मी कधीही `वादळात' सापडत नाही. याच दृष्टीकोनाचा दुसरा पैलू त्याही पेक्षा महत्त्वाचा आहे. आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत त्यामुळे लाभलेला देह स्त्री किंवा पुरूष आहे. आपण स्वतः स्त्री किंवा पुरूष झालेलो नाही. दोन वेगवेगळ्या पोलॅरिटीजमधे निसर्गानं स्वतःच्या पुनर्निमितीची अंगभूत योजना केलेली आहे. त्यात स्री देह पुरूष देहाला आकर्षित करण्यासाठी तयार झालेला आहे. त्यामुळे कोण कायकाय सहन करतं आणि कोणाला काहीही तसदी पडत नाही यावर कितीही चर्चा केली तरी ती व्यर्थ आहे. दोन्ही पोलॅरिटीज आवश्यक आहेत आणि त्यांची अंगभूत वैशिष्ठ्य आहेत. आपण देहाचे जाणते आहोत त्यामुळे जे आहे ते नाकारणं म्हणजे स्वपिडनाशिवाय दुसरं काही नाही. त्यानं सगळं जगणं अवघड होण्याखेरीज दुसरं काही साधत नाही. ________________________________________________ या दृष्टीकोनातल्या भिन्नतेमुळे इथल्या सं. मं. चे गैरसमज होतात आणि माझे प्रतिसाद उडवले जातात. तसंच तुम्हाला माझं म्हणणं लक्षात न आल्यानं विधायक आणि सर्वोपयोगी चर्चा होत नाही. त्यात माणसाच्या विनोदबुद्धीचं मला कौतुक आहे त्यामुळे एखाद्यानं हार्मोनियम आणि हार्मोन्सचा संबंध जोडला तर मला ते विषयांतर वाटत नाही. अर्थात त्यामुळे पुन्हा प्रतिसाद उडवले जातात आणि विषय निष्कारण गंभीर होतो. ___________________________________ विथ धीस अंडरस्टँडींग वेळ मिळेल तेव्हा तुम्ही मांडलेल्या चर्चेत मी जरूर सहभागी होईन आणि सुचवलेल्या उपायांवर एक अत्यंत अनुभवी डॉक्टर म्हणून तुमचा अनुभव समजावून घ्यायला आनंद होईल.

In reply to by संजय क्षीरसागर

स्री देह पुरूष देहाला आकर्षित करण्यासाठी तयार झालेला आहे.
=)) =)) तुमच्या विनोदबुद्धीबद्दल मला फार आदर आहे. यात माझ्या लिंगभावाचा काहीही संबंध नाही.

In reply to by शिल्पा ब

शिल्पा, मयत रि कर्न्र क? ;-) हो, मी वाचते त्यांचे प्रतिसाद. कच्चा माल कधी, कुठे, कसा मिळेल सांगता येत नाही. :ड

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आजानुकर्ण Mon, 05/13/2013 - 19:14
तुमच्या विनोदबुद्धीबद्दल मला फार आदर आहे
सहमत. संजय क्षीरसागर यांचे प्रतिसाद आम्हाला मिपाकडे आकर्षित करण्यासाठी तयार झाले आहेत. ..

सुबोध खरे Sun, 05/12/2013 - 00:20
वरवर पाहता शरीरातील संप्रेरके कमी झाली तर बाहेरून औषध द्वारे ती पुरवली तर काय वाईट आहे. पण हे तितके सोपे नाही आत्ता पर्यंत माहित झालेल्या पुराव्यावरून असे दिसते कि या उपचार पद्धतीमुळे काही फायदे आणी काही तोटे आहेत according to results based on the review and meta-analysis, among 10 000 women aged 65 to 74 years and using HRT for 1 year, 9 hip fractures, 37.5 wrist fractures, and 57 vertebral fractures would be prevented. Other benefits include preventing 4 cases of colorectal cancer and 34 cases of dementia. Harms include causing 3 strokes, 1.5 thromboembolic events, 0 to 6 cases of breast cancer with short-term use and 10 to 15 cases with long-term use, 25 cases of cholecystitis with short-term use, and 53.5 cases of cholecystitis with long-term use.हे खालील लेखात पूर्ण प्रमाणात उपलब्ध आहे http://jama.jamanetwork.com/article.aspx?articleid=195214 (jama -journal of american medical association) याचा अर्थ असा कि हि उपचार पद्धती वाटते तितकी सुरक्षित नाही ती फक्त थोड्या काळासाठी म्हणजे ज्या स्त्रियांना गरम लाटेचा( HOT FLASH) फार त्रास होतो चक्कर येते अशा तर्हेच्या तात्पुरत्या तक्रारीवर उपाय म्हणून वापरता येईल कायम स्वरूपी वापर तेवढा सुरक्षित नाही. यानंतर जर नवीन काही संशोधन माझ्या नजरेस आले तर मी ते लिहीनच

सुबोध खरे Sun, 05/12/2013 - 00:47
सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात २ या माझ्या पूर्वी टंकलेल्या लेखातील उदाहरण देत आहे तिसरी गोष्ट २०१२ डिसेंबर ची आहे. एक सासू आपल्या सुनेला( वय २१ वर्षे ) ३ महिन्यापूर्वी लग्न झाले आणि तिची पाळी आली नाही म्हणून माझ्या दवाखान्यात (मुलुंड ला) घेऊन आली होती.तिच्या मुत्र तपासणीमध्ये गर्भारपण नाही असे आले होते म्हणून ते तपासण्यासाठी ती आली होती. सुनेची सोनोग्राफी केली तर असे लक्षात आले कि तिच्या बीजांड कोशात (ovary) मध्ये स्त्री बीज निर्मिती थांबली होती. याचा अर्थ तिला मुदतपूर्व रजोनिवृत्ती(premature menopause) झाली होती.मी तिला विचारले पाळी केंव्हा पासून आलेली नाही. तर ती म्हणाली कि लग्न झाले आणि पाळी बंद झाली.मी तिला म्हटले कि पण तसे वाटत नाही कि तुमची पाळी ३ महिन्यांपासून बंद झाली आहे. त्यावर ती म्हणाली कि माझी पाळी १ वर्षापूर्वी बंद झाली मी कल्याण ला एका स्त्रीरोग तज्ञाकडे गेले होते त्यांनी माझी रक्त तपासणी केली. ते रिपोर्ट पहिले तर तिला मुदतपूर्व रजोनिवृत्ती(premature menopause) झाल्याचे दिसत होते. त्यानंतर त्यांनी त्यास्त्री रोग तज्ञांकडून पाळी येण्यासाठी औषधे घेणे सुरु केले आणि पाळी येत होती तेवढ्या सहा महिन्यात लग्न उरकून घेतले. लग्न झाल्यावर सासू कडे गोळ्या घेण्याची चोरी असल्याने तिची पाळी आता बंद झाली होती. तिची मुदतपूर्व रजोनिवृत्ती(premature menopause) झाली होती हा दुर्दैवाचा भाग होता पण ते लपवून त्यांनी लग्न उरकून घेतले होते. तिची तपासणी संपल्यावर मी बाहेर आलो तेंव्हा सासुबाई नी विचारले कि निदान काय आहे. मी फक्त एवढेच बोललो कि ती गरोदर नाही.पुढे ती तिचा नवरा आणि सासू काय करणार या प्रश्नाला मी बगल दिली. अशा केसेस बर्याच प्रमाणात दिसतात. कारण पाळी येणे बंद झाले कि रुग्ण सोनोग्राफी साठी पाठवला जातो त्यामुळे अशा केसेस मी बर्याच प्रमाणात पाहिलेल्या आहेत. याचे नक्की कारण माहित नाही. कारण माहित नसले कि आधुनिक आयुष्यातील तणाव हे सदा धोपटायला मिळणाऱ्या गादीसारखे परंतु ते अजून सिद्ध झालेले नाही. आणी असे रुग्ण आदिवासी आणी खेड्यात सुद्धा दिसतात जेथे आधुनिक आयुष्यातील तणाव नसतो.

In reply to by सुबोध खरे

पाळी येणे बंद झाले कि रुग्ण सोनोग्राफी साठी पाठवला जातो
अनपेक्षित विनोद होतो आहे. रहावलं नाही. या विषयाचा अभ्यास नसताना स्पेक्यूलेशनः पाळी अनपेक्षित वयात बंद होण्याचं कारण एकच एक नाही; तणाव, कुपोषण अशांपैकी एक काही असेल का? विशीत पाळी बंद होण्यामागे अनुवांशिकता किती असेल? काही सांख्यिकी तर्क?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पैसा Sun, 05/12/2013 - 07:51
अशा केसेस मी बर्याच प्रमाणात पाहिलेल्या आहेत. याचे नक्की कारण माहित नाही. कारण माहित नसले कि आधुनिक आयुष्यातील तणाव हे सदा धोपटायला मिळणाऱ्या गादीसारखे परंतु ते अजून सिद्ध झालेले नाही. आणी असे रुग्ण आदिवासी आणी खेड्यात सुद्धा दिसतात जेथे आधुनिक आयुष्यातील तणाव नसतो.
याचा अर्थ की यावर अजून पुरेसे संशोधन झालेले नाही. पण मी वाचलेल्या टाईम्सच्या बातमी/लेखात मात्र त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातल्या महिलांमधे हा प्रकार आढळल्याचं म्हटलं आहे आणि बंगलोर इथे त्यावरून काही प्रमाणात संशोधन चालू आहे असे दिसते. अशा केसेसंना होमिओपाथी आणि योगाचा फायदा झाल्याचेही वाचनात आले होते. अर्थात हे सगळे अजून प्राथमिक अवस्थेतले निष्कर्ष असावेत.

In reply to by सुबोध खरे

बीजांड कोशात (ovary) मध्ये स्त्री बीज निर्मिती थांबली होती.
याबद्दल अधिक शंका, प्रश्न आहे. मुलगी जन्माला येतानाच तिच्या बीजांड कोशात २०-३० लाख* बीजं असतात; त्यातली अर्ध्याधिक ती वयात येईपर्यंत मरतात. वयात आल्यापासून दर महिन्याला एक बीज परिपक्व होऊन बाहेर पडतं इथपर्यंत माहिती वाचलेली आहे. रजोनिवृत्ती (कोणत्याही वयात का होईना) होताना ही बीजं पूर्णपणे मरतात का परिपक्व होणं थांबतं का आणखी काही? (हा आकडा निश्चितपणे आठवत नाही; पण असाच कैच्याकै जास्त वाटू शकेल असा आकडा होता. त्यावरून कोंबडीच्या बीजांड कोशात अशीच रचना असेल तर किती बीजं असतील याचा विचार केला होता. कोंबडी दर २४-३६ तासांत एक अंडं देते.)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सुबोध खरे Sun, 05/12/2013 - 15:11
मुलगी जन्माला येतानाच तिच्या बीजांड कोशात १० लाख बीजांड असतात.या पैकी दर महिन्याला काही डझन बीजांडे(या बीजांडात फलनशील स्त्री बीज असते) वाढीला लागतात यापैकी फक्त एकच स्त्रीबीज पूर्ण वाढ होते आणि जर त्याचे पुरुष बीजाशी मिलन झाले तर मुल जन्माला येते. चुकून जर २ बीजे वाढली तर जुळे होते हि शक्यता दोनशे पन्नास मध्ये एक अशी असते. कनिष्ठ प्राणी ( कुत्रे मांजरी इत्यादी) मध्ये ५ ते ६ बीजांची वाढ होते म्हणून म्हणून त्यांना एका वेळी ५-६ पिल्ले होतात. मानव किंवा सस्तन प्राण्यामध्ये पिल्लांना जन्म दिला जातो आणि पक्षांमध्ये फलन झालेली अंडी " घातली"जातात. कोंबडी दरदिवशी एक अंडे देते आणि अशी १२ ते १३ अंडी घातल्यावर कोंबडी ती उबवायला बसते. आणि या काळात कोंबडी परत अंडी घालत नाही( खुडूक बसली). पण पोल्ट्री फार्म मध्ये पिंजर्यात बसलेल्या कोंबडीची अंडी काढून घेतली जातात आणि ती अंडी देत राहते. अशी एक ते दीड वर्ष अंडी घातल्यावर त्या कोंबडीची अंडी घालण्याची शक्ती कमी होते आणि हळूहळू ती अंडी देणे बंद करते. या वेळेपर्यंत कोंडीची पिसे झडून जातात हाडे पण ठिसूळ होतात( अंडी घालून हाडातील कैल्शियम कमी होते) आणि ती कोंबडी २ वर्षापर्यंत मरते कोंबडीचे नैसर्गिक आयुष्य ७ वर्षे आहे. अर्थात या पूर्वीच तिला मारून तिच्या मासाचे प्रक्रिया केलेल्या अन्नात किंवा चिकन सूपमध्ये स्वादासाठी वापरले जाते.(हाडे ठिसूळ झाल्याने कोंबडीचे वजन कमी होते आणि तिला भाव कमी मिळतो म्हणून). काही देशात कोंबडीला ७ ते १ ४ दिवस उपाशी ठेवले जाते ज्यामुळे ती परत अंडी घालू लागते.कोंबडी अशा तर्हेने जास्तीत जास्त चारशे ते पाचशे अंडी देऊ शकते आणि तिची जीवनयात्रा संपते( संपविली जाते) मानवी आयुष्यात १४ वर्षे ते ५० वर्षे ( रजोदर्शन ते रजोनिवृत्ती) अशा ३६ वर्षात जास्तीत जास्त ४००-४५० स्त्री बीजांडाची पूर्ण वाढ होऊ शकते. बाकी स्त्रीबीजांडे फुकट जातात. रजोनिवृत्तीच्या वेळेस बीजांड कोशातील सर्व बीजांडे नष्ट झालेली किंवा र्‍हास पावलेली असतात. अकाली रजोनिवृत्तीमध्ये सुद्धा अशीच स्त्री बीजांडे नष्ट झालेली असतात त्यामुळे त्याला होमियोपाथी किंवा योगासनांनी फायदा होईल अशी शक्यता फारच कमी आहे.(TOI च्या लेखात म्हटल्याप्रमाणे). बर्याच वेळेला पाळी काही महिने आलेली नसताना हि अकाली रजोनिवृत्ती आहे असा शिक्का मारला जातो. मग असे इतर उपचार केलुयावर नैसर्गिक रित्या पाळी परत आली कि त्याचे श्रेय घेऊन हे लोक मोकळे होतात. मुळात सोनोग्राफी करून आणि संप्रेरकाची रक्तातील पातळी पाहून जर निदान पक्के केले असेल तरच अशा दाव्यांना अर्थ आहे. पोकळ दावे करण्यात काय हशील( पण तो धंद्याचा भाग आहे)आज काळ या इतर लोकांचीच चलती आहे.

In reply to by सुबोध खरे

आता आणखी एक प्रश्न आहे: सध्या उपलब्ध इमेजिंग तंत्रज्ञानातून "रजोनिवृत्तीच्या वेळेस बीजांड कोशातील सर्व बीजांडे नष्ट झालेली किंवा र्‍हास पावलेली असतात." हे बघितलेलं आहे का हॉर्मोन्स इत्यादी अप्रत्यक्ष प्रकारे हे ठरवलं जातं. (सामान्य वयात, ४० च्या पुढे कधीही रजोनिवृत्ती आल्यास अशा प्रकारच्या तपासण्या होत नसतीलही. पण अकाली रजोनिवृत्ती आल्यास, प्रसिद्ध उदाहरण इरोम शर्मिला, काय प्रकारच्या चाचण्या होतात?) या प्रश्नांची उत्तरं प्रतिसादामधे दिलीत तरी त्याचा एक स्वतंत्र धागा बनवलात तरी चालेल. भविष्यात वाचन, संदर्भाच्या दृष्टीने ते कदाचित सोपं पडेल. संपादकांना विनंती - मागच्या-पुढच्या सगळ्या धाग्यांमधे या संदर्भातल्या डॉक्टरांच्या सगळ्या धाग्यांच्या लिंका देता येतील का? गुगलून एक लिंक शोधली की बाकीचे सगळे धागे शोधाशोध केल्याशिवाय सापडतील.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सुबोध खरे Mon, 05/13/2013 - 09:47
रजोनिवृत्तीहोते म्हणजे बीजांड कोश मेंदूत तयार होणार्या संप्रेरकांना(FSH आणि LH) दाद देत नाही कारण त्यात विकास पावू शकणारी बीजांडे शिल्लक नसतात. यामुळे मेंदू ती संप्रेरके अधिक प्रमाणात तयार करतो. अधिक संप्रेरके करूनही बीजांड कोश त्याला दाद देत नाही म्हणून मेंदू ती संप्रेरके अजून अधिक प्रमाणात तयार करतो. आपण जेंव्हा रक्त तपासणी करतो तेंव्हा हि संप्रेरके आपल्याला रक्तात एका विशिष्ट प्रमाणापेक्षा जास्त आढळतात यावरून आपण हे निदान करतो कि आता रजोनिवृत्ती झाली. जेंव्हा आपण सोनोग्राफी ( किंवा MRI) करतो तेंव्हा हि स्त्री बीजांडे आपल्याला दिसू शकतात आणि बिजान्द्कोशाचा आकार एका विशिष्ट पातळीत असतो. रजोनिवृत्ती झाल्यावर हि स्त्रीबीजे दिसत नाहीत आणि बीजांड कोशाचा आकार फारच कमी झालेला असतो यावरून आपल्याला निदाम करता येते क रजोनिवृत्ती झाली आहे. अजून एक संप्रेरक (AMH - anti mullerian hormone) हे (बिजान्द्कोशात) बीजांडात तयार होते आणि हे बिजान्डांच्या संख्येवर अवलंबून असते.रजोनिवृत्ती बरोबर याचे रक्तातील प्रमाण खूप कमी होते. AMH चे रक्तातील प्रमाण पहिले असता आपल्याला बिजाण्ड कोशात किती स्त्रीबिजांडे शिल्लक आहेत. ( ovarian reserve) किती आहे ते कळतो. याचा उपयोग आजच्या काळातील महला ज्या आपल्या करियर साठी उशिरा लग्न करतात त्यांना आपण आपल्याला मुल होऊ द्यायचे कि किती थांबता येईल हे ठरविण्यासाठी करता येतो. (जर याची रक्तातील पातळी कमी झाली असेल ovarian reserve कमी आहे आणि रजोनिवृत्ती जवळ आली आहे हे समजते) डॉक्टर त्या महिलांना लवकर गरोदर होण्याचा सल्ला देतात.अर्थात सर्व साधारणपणे डॉक्टर खात्री करण्यासाठी रक्त तपासणी आणि सोनोग्राफी या दोन्ही चाचण्या करून घेतात९ या दोन्ही चाचण्या एकमेकांना पूरक असतात. कारण आपली रजोनिवृत्ती अकाली झाली आहे हा त्या स्त्री च्या दृष्टीने एक धक्का असतो.

In reply to by सुबोध खरे

या धाग्यावरचे हे प्रतिसाद एकत्र करून एक नवा धागा, भविष्यातल्या संदर्भासाठी बनवाल का? उस गोड लागला ... असं तुम्ही मनात म्हणत असाल तर थोडी नावं ठेवा मला! ;-)

In reply to by सेरेपी

सुबोध खरे Tue, 05/14/2013 - 00:11
सर्व जुळे अवयव ज्यात मूत्रपिंडे डोळे कान बिजाण्डकोश इत्यादी अवयव यात जर एक अवयव निकामी झाला तर दुसरा अवयव त्याची कसर जवळ जवळ पूर्णपणे भरून काढतो ( म्हणून काणी माणसे सुद्धा क्रिकेट/ टेनिस सारखा आत्यंतिक खेळ खेळू शकतात. म्हणूनच अगदी जर कर्करोग नसेल तर शक्यतो दोन्ही बीजांडकोश कधीच काढले जात नाहीत आणि एक बीजांड कोश काढल्यामुळे स्त्रीच्या प्रजनन क्षमतेत काहीही फरक पडत नाही.

In reply to by सुबोध खरे

सेरेपी Tue, 05/14/2013 - 01:36
हो मला त्यावरूनच प्रश्न पडला होता. एक किडनी निकामी झाली तरी दुसरी टेक-ओव्हर करते वगैरे.

निसर्गाचा उद्देश स्वतःची पुनर्निमिती (प्रोलिफरेशन) आहे आणि प्रणय त्याची प्रक्रिया आहे. संपूर्ण अस्तित्व सतत स्वतःला प्रणयातनं पुनर्निमित करतं. ती पुनर्निमिती आकार असेल किंवा उर्जा. या प्रक्रियेसाठी दोन पोलॅरिटीज आवश्यक आहेत. अस्तित्वाच्या दृष्टीनं दोन्ही पोलॅरिटीज आवश्यक आणि समान आहेत. भेद किंवा द्वैत माणसानं निर्माण केलंय. भूक ही नेगटीव (ऋण किंवा स्त्रैण) पोलॅरिटी मानली तर अन्न ही पॉजिटीव (घन किंवा पुरूष) पोलॅरिटी आहे आणि त्या दोहोंच्या मिलनातून शारीरिक उर्जा तयार होते. भूक अन्नाला आकर्षित करते. सर्व ऋण आणि घन पोलॅरिटीज याच पद्धतीनं काम करतात. स्री देह पुरूषाला आकर्षित करतो आणि त्यांच्या मिलनातून निसर्ग पुनर्निमित होतो. आणि मानवी संप्रेरकांवर चर्चा करतांना हे दोन पोलॅरिटीज मधलं आकर्षण विषयाचा केंद्र बिंदू ठरतो.

In reply to by संजय क्षीरसागर

मराठी_माणूस Mon, 05/13/2013 - 20:22
निसर्गाचा उद्देश स्वतःची पुनर्निमिती (प्रोलिफरेशन) आहे
असे असेल तर निसर्गाने स्वतःच दोन पोलॅरिटिची बंधने का घालून घेतली

In reply to by मराठी_माणूस

अर्धवटराव Mon, 05/13/2013 - 21:37
विषयाला अवांतर ठरु शकतो हा प्रतिसाद... तरिही... ज्या कुठल्या कारणाने (उल्कापात ? अ‍ॅसीड रेन्स ?) डायनासोर्सने शेवटचे "हे राम" म्हटले त्याकाळी असंख्य जीव आपापल्या उत्क्रांतीच्या तत्कालीन अवस्थेसह कायमचे नष्ट झाले. असले प्रलय पृथ्वीवर अनेकवेळा झालेत. अन्यथा आजघडीला कदाचीत आपण विचार देखील करु शकणार नाहि असे विविध शरीररचना/क्षमता असलेले प्राणि (मानव देखील) आपण बघु शकलो असतो. अर्धवटराव

In reply to by संजय क्षीरसागर

निसर्गाचा उद्देश स्वतःची पुनर्निमिती (प्रोलिफरेशन) आहे आणि प्रणय त्याची प्रक्रिया आहे
तुम्ही रिचर्ड डॉकिन्सची किंवा उत्क्रांतीशास्त्र या विषयावरची पुस्तकं मुद्दामच वाचत नाही का ठरवून आम्हां लोकांना हसवता? गुलाबाची कलमं, मोगर्‍याचं रोप वाकवून दुसरं झाड तयार करणं वगैरे asexual (मराठी?) पुनरुत्पादनाची, समोर दिसणारी उदाहरणं शालेय अभ्यासक्रमात शिकवली जातात हो! आंबेडकरांनी काय सांगितलं, "शिका, मोठे व्हा". त्यातली "शिका" ही पायरी गाळायची नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे Tue, 05/14/2013 - 00:30
दोन धृवांचे आकर्षण हा निसर्गाने जैविक वैविध्य कायम ठेवण्यासाठी निर्माण केलेला अतिशय उत्कृष्ट उपाय आहे. यामुळे दोन जिवातील गुणसूत्रे एकत्र होऊन त्याच्या पासून वेगळी असलेली तिसरी गुणसूत्रे निर्माण होतात आणि यातील चांगली गुणसूत्रे असलेले जीव स्पर्धेत टिकून राहून उत्क्रांत होतात. पण यासाठी दोन ध्रुव असण्याची गरज आहे असे नाही कारण एक पेशीय जीव पासून ते काही सरीसृप(reptiles) पर्यंत जीव द्विभाजन आणि अ लैंगिक पद्धतीने पुनरुत्पादन करताना आढळतात. god has linked procreation with recreation.otherwise no man will marry. हे आम्हाला वंध्यत्व वर उपचार या विषयात शिकवले होते. कनिष्ठ प्राण्यात(कुत्रे मांजर बिबळ्या सिंह वाघ हरीण गाय म्हैस इ) नराचे काम फक्त शुक्राणू देणे एवढेच असते त्यामुळे त्यांच्यात मादी हि पिल्लाला वाढवते आणि नराचे योगदान शून्य असते. याचे कारण त्या पिल्लांचे बरेचसे काम हे नैसर्गिक प्रेरणेने होते पहिले काही आठवडे /महिने सोडले तर ते पिल्लू आपले अन्न वासाने किंवा अन्तः प्रेरणेने मिळवू शकते.आणि मादी पुन्हा प्रसावाकडे वाले पर्यंत पहिल्या वेतातील पिल्ले स्वावलंबी झालेली असतात. मानवी बालपण हे प्राणीमात्रात सर्वात लांब म्हणजे जवळ जवळ पंधरा ते अठरा वर्षे असते या काळात एकट्या स्त्री ला बालकाचे पूर्ण पालन पोषण हे अशक्य आहे म्हणून वर लिहिलेले वाक्य बरोबर आहे असे वाटते. बाकी क्रमशः

In reply to by सुबोध खरे

god has linked procreation with recreation.otherwise no man will marry. हे आम्हाला वंध्यत्व वर उपचार या विषयात शिकवले
कॅथलिक किंवा अन्य ख्रिश्चन पंथाचं पाठ्यपुस्तक आणि/किंवा शिक्षक होते का?

In reply to by सुबोध खरे

हे आणखीनच मजेशीर. साधारण अशा प्रकारचं तत्त्वज्ञान ख्रिश्चन धर्मात आहे. रेनेसाँपूर्वीच्या युरोपमधे ते लोकप्रियही होतं. इतिहास, मानववंशशास्त्र आणि उत्क्रांतीशास्त्राच्या प्रगतीमुळे यावर आता युरोपीय लोकांचा विश्वास नाही पण भारतीय (हिंदू आणि सैन्यातले) डॉक्टर विश्वास ठेवतात हे भारीय.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सुबोध खरे गुरुवार, 05/16/2013 - 10:08
god has linked procreation with recreation.otherwise no man will marry.याचा अर्थ धार्मिक असा अजिबात नाही. जर संभोगात आनंद मिळणार नसेल तर मानवी नर कोणत्याही स्त्री च्या जवळ जाणार नाही. प्राणीमात्रातील संभोगाची नैसर्गिक प्रेरणा(INSTINCT) नर आणि मादीला एकत्र आणतात आणि संभोगानंतर नर दुसरया मादीकडे वळतो. नराची नैसर्गिक प्रेरणा हि जमेल तितक्या माद्यांशी संभोग करून जितकी जास्त स्वतःची संतती वाढवता येईल तितकी वाढवावी अशी आहे यात अपत्य संगोपनात नराचा वाटा शून्य आहे. याचे एक कारण प्राणीमात्रात बहुसंख्य गोष्टी या नैसर्गिक प्रेरणेने होतात. हरिणाचे पिल्लू जन्माला येताच काही मिनिटात उठून उभे राहते, नैसर्गिक प्रेरणेने आईचे दूध पिऊ लागते आणि अर्ध्या तासात पळू लागते. तशी परिस्थिती मानवी बाळाची नाही. ते आईच्या( किंवा कोणत्याही बाहेरील मदतीशिवाय) पहिली जवळ जवळ १० वर्षे पर्यंत परावलंबी असते. मानवी मूल हे पूर्ण नैसर्गिक प्रेरणेवर जगू शकणार नाही आणी मानवी बालपण हे जवळ जवळ १५ वर्षे इतके लांब असते. शिवाय एक स्त्री गरोदरपण आणी मुलाच्या जन्माच्या वेळी जवळ जवळ ११ -१२ महिने पूर्ण परावलंबी असते आणी त्यापुढे १३ ते १४ वर्षे अपत्य संगोपनात जर एखाद्या स्त्रीला द्यावी लागतात. पुरुषाला जर संभोगात आनंद नसेल तर पुरुष एवढी जबाबदार का घेईल? असा साधा अर्थ आहे. मानव सोडून फारच कमी प्राणी केवळ आनंदासाठी सम्भोग करत असावेत. आणी हा आनंद जितका मिळेल तितका घ्यावा हा विचार नसेल तर किती पुरुष स्त्रीची जबादारी गळ्यात अडकवून घेईल?हे नागडे सत्य आहे. असे सहसा मी लिहित नाही पण आता विषय निघाला आहे म्हणून लिहित आहे.विसाव्या शतकातील स्त्रियांसाठी सर्वात मोठा आणी क्रांतिकारी शोध म्हणजे कुटुंब नियोजनाची साधने हा होय. याशिवाय स्त्री मुक्ती हि अशक्य होती ( आणी आहे) अन्यथा स्त्री हि चूल आणी मूल यातून कधीच बाहेर आली नसती. कारण संभोगेच्छा टाळणे शक्य नाही आणी त्यातून येणारे गर्भारपण तिला आयुश्या साठी बंधनात टाकणारे असते. मग कुठली मुक्ती आणी काय? असो सध्या इतकेच.

In reply to by सुबोध खरे

संजय क्षीरसागर गुरुवार, 05/16/2013 - 11:41
असा साधा अर्थ आहे.
हेच तर इतका वेळ सांगतोय! आणि तुमच्यासारखा अनुभवी माणूस सहमत झाला म्हणजे प्रश्नच मिटला.
मानव सोडून फारच कमी प्राणी केवळ आनंदासाठी सम्भोग करत असावेत.
त्यांचा संभोग कंपल्सिव असतो. मानवी प्रणय ऐच्छिक असू शकतो आणि तो पारस्पारिकार्षण आणि नातं (जे केवळ मानवात आहे) यातला महत्त्वाच दुवा आहे. आयुष्याच्या उत्तरंगात दोघातलं एकमेकांप्रती आकर्षण आणि प्रेमच निर्णायक ठरतं. प्रणय दुय्यम ठरतो.
आणी हा आनंद जितका मिळेल तितका घ्यावा हा विचार नसेल तर किती पुरुष स्त्रीची जबादारी गळ्यात अडकवून घेईल?हे नागडे सत्य आहे
सही! पण हे इतकं एकांगी नाही. स्त्रीला सुद्धा प्रणयाचा आनंद असतोच.
विसाव्या शतकातील स्त्रियांसाठी सर्वात मोठा आणी क्रांतिकारी शोध म्हणजे कुटुंब नियोजनाची साधने हा होय.
यू वील अग्री, इतक्या क्रांतीकारी शोधानंतर सुद्धा प्रणयातला आनंद सर्वतोपरी एकाच गोष्टीवर अवलंबून आहे : पारस्पारिक आकर्षण! नाही तर प्रणयानंतर नातं कसं टिकणार? कारण ती काही दिवसभर चालणारी गोष्ट नाही.

In reply to by सुबोध खरे

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/16/2013 - 11:41
जर संभोगात आनंद मिळणार नसेल तर मानवी नर कोणत्याही स्त्री च्या जवळ जाणार नाही.
हे फक्त मानवी नराच्या बाबतीतच आहे आणि इतर प्राणिमात्रांमध्ये संभोगात आनंद मिळत नाही? अन्य प्राणिमात्रांमध्ये एका मादीसाठी होणारी दोन नरांची जीवघेणी मारामारी पाहता विश्वास बसत नाही.
अपत्य संगोपनात नराचा वाटा शून्य आहे.
असहमत. नैसर्गिक, शारीरीक भेदभाव वगळता, कमी-अधिक प्रमाणात मानवी नराचाही अपत्य संगोपनात सहभाग असतो.
ते आईच्या( किंवा कोणत्याही बाहेरील मदतीशिवाय) पहिली जवळ जवळ १० वर्षे पर्यंत परावलंबी असते. मानवी मूल हे पूर्ण नैसर्गिक प्रेरणेवर जगू शकणार नाही आणी मानवी बालपण हे जवळ जवळ १५ वर्षे इतके लांब असते.
सहमत. परंतू मानवी मुल एकट्या आईच्या मदतीवर मोठे होत नसते. त्याला वडिलांचे साहाय्यही असावे लागते. बहुतांशी असते. जर एखादा पुरूष आपली जबाबदारी टाळत असेल तर ते चुकीचे आहे.
हा आनंद जितका मिळेल तितका घ्यावा हा विचार नसेल तर किती पुरुष स्त्रीची जबादारी गळ्यात अडकवून घेईल?
म्हणजे फक्त संभोगासाठी पुरूष लग्न करतो? पण त्यासाठी लग्न करायची काय गरज आहे? फक्त संभोगासाठी कितीतरी वेश्या उपलब्ध असतात. कायद्यानेही त्याला संमती आहे. आर्थिक भार वगळता कुठलीही जबाबदारीही नाही. प्रत्येक स्त्री-पुरुषाची शारीरीक गरजे इतकीच, किंबहुना जास्त, भावनिक गरज असते. प्रेम करणे आणि करवून घेणे हा प्रत्येक स्त्री-पुरूषाचा मुलभूत हक्क आहे. भावनेशिवाय (परंतु संभोगासह) सहजीवन ही एक शिक्षा ठरावी इतके भावनेला महत्त्व आहे. विषय अत्यंत गहन आहे. वरवरची विधाने करू नयेत.
विसाव्या शतकातील स्त्रियांसाठी सर्वात मोठा आणी क्रांतिकारी शोध म्हणजे कुटुंब नियोजनाची साधने हा होय.
विसाव्याशतकातील अनेक क्रांतीकारी शोधातील एक म्हणजे कुटुंब नियोजनाची साधने असे म्हणावे लागेल. सहमत आहे.
याशिवाय स्त्री मुक्ती हि अशक्य होती ( आणी आहे) अन्यथा स्त्री हि चूल आणी मूल यातून कधीच बाहेर आली नसती. कारण संभोगेच्छा टाळणे शक्य नाही आणी त्यातून येणारे गर्भारपण तिला आयुश्या साठी बंधनात टाकणारे असते.
गर्भारपणामुळे आणि संतती निर्माण करण्याने एकटी स्त्रीच बंधनात अडकते? फार एकांगी विचार वाटतो आहे. मुलांच्या तळमळीने घराकडे धावणारे पुरुष पाहा, मुलांपासून मोठ्या कालावधीसाठी दूर राहून पाहा. पत्नीशी कितीही बेबनाव झाला तरी, मुलांसाठी म्हणून घटस्फोट न घेणारे पुरुष पाहा. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी हाडाची काडं करणारे पुरुष पाहा, मुलांच्या आजारपणात काळजीने काळवंडणारे, त्यांच्या उशाशी बसून राहणारे पुरूष पाहा. पुरुषाचा शारीरीक, मानसिक, भावनिक सहभागाशिवाय कुटुंब चालत नसतं. गर्भारपण टळणे म्हणजे स्त्री मुक्ती असा संकुचित विचार का? एक 'व्यक्ती' म्हणून समानाधिकार, वैचारिक, आर्थिक स्वातंत्र्य, भावना व्यक्त करण्याच्या, सामाजिक स्वातंत्र्य उपभोगण्याच्या समान संधी आदी अनेक पैलू 'स्त्री-मुक्ती'च्या विचारांमागे असतात/असावेत. पुरुषाचा सर्वस्तरावरील सहयोग महत्त्वाचा आहे. हल्लीच्या जमान्यात दोन मुलांच्यावर अधिक मुले होऊ न देण्याकडे सर्वच पती-पत्नीचा कल असतो. म्हणजे दोन मुलांनंतर गर्भारपण टळले. झाली का अशा सर्व स्त्रीयांची मुक्ती?? क्षमा असावी पण आपले विचार काही पटले नाहीत.

In reply to by प्रभाकर पेठकर

सुबोध खरे गुरुवार, 05/16/2013 - 12:39
अन्य प्राणिमात्रांमध्ये एका मादीसाठी होणारी दोन नरांची जीवघेणी मारामारी पाहता विश्वास बसत नाही.
अन्य प्राण्यांच्या बाबतीत एकदा मादीशी संबंध संपल्यावर नर तिच्याकडे ढुंकूनही बघत नाही. तो इतर नरांशी जीवघेणी मारामारी फक्त आपले वंशसातत्य ठेवण्याच्या आंतरिक प्रेरणेने करतो. (सिंह आणी चित्ते यांच्यात तर दोन किंवा तीन किंवा चार नर सुद्धा यासाठी सामंजस्य(!) करतात). तेंव्हा त्यांच्यात संभोग हा नैसर्गिक प्रेरणेनेच होतो आनंदासाठी नाही.
अपत्य संगोपनात नराचा वाटा शून्य आहे.
हे वाक्य मानवाला नव्हे तर कनिष्ठ प्राण्याना उद्देशून आहे. संभोगात आनंद आहे म्हणून मानव एकदा संबंध ठेवल्यावर स्त्री ला सोडून जात नाही आणी अपत्य संगोपनात सहभागी होतो. (जसा कनिष्ठ प्राण्यामध्ये नर सोडून जातो)
हा आनंद जितका मिळेल तितका घ्यावा हा विचार नसेल तर किती पुरुष स्त्रीची जबादारी गळ्यात अडकवून घेईल
? हे आणी इतर सर्व वाक्ये मानवाच्या आंतर प्रेरणेबद्दल लिहिली आहेत. एक तरुण माणूस आणि स्त्री भेटले तर त्यांचा पहिला विचार हा नैसर्गिक आकर्षणाचा असतो. विवाह अपत्य संगोपन इत्यादी हे मानवाच्या विचारशक्ती चे प्रतिक आहेत नैसर्गिक प्रेरणेचे नव्हेत. एका रात्री पुरते भेटले आणी नंतर वेगळे झाले. यातून जर संतती निर्माण झाली तर तो पुरुष त्याची किती काळजी घेईल? मात्र अशी स्त्री पूर्वी एकतर बेकायदेशीर गर्भपाताच्या दिव्यातून जात असे किंवा आत्महत्या करत असे अन्यथा त्या मुलाला गपचूप जन्म देत असे आणी अनाथाश्रमात सोडत असे. लग्न झालेल्या स्त्रिया सुद्धा आयुष्भर बाळंतपण स्तनपान परत बाळंतपण या चक्रातून सुटका नसे. माझ्या आजीला १२ अपत्ये झाली. तिचे आयुष्य काय होते? आमचे आजोबा कितीही चांगले होते तरी चूल आणी मुल यातून तिची सुटका झाली का? माझी आई (तिचा त्या अपत्यात १२ वा क्रमांक होता) - आम्हा दोन मुलांना जन्म दिल्यावर थोडे मोठे झाल्यावर( ६-७ वर्षाचे) तिने स्वतःचे शिक्षण सुरु केले. मी १० वी होई पर्यंत तिने आपले एम ए आणी बी एड पूर्ण केले मी १२ झाल्यावर तिने शिक्षिकेची नोकरी धरली आणी २००० साली ती सन्मानाने मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाली. माझ्या आजीत आणी माझ्या आईत हा फरक का दिसतो? दोनच मुले. हे त्याचे उत्तर आहे. आता वेळ नाही म्हणून मी आपल्या प्रत्येक वाक्याचे उत्तर देत नाही आपण माझ्या लेखाचे एक विशिष्ट विचार मनात धरून वाचन केले आहे त्यामुळे असे झाले आहे असे वाटते

In reply to by सुबोध खरे

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/16/2013 - 13:19
(डॉ.)सुबोध खरे साहेब,
संभोगात आनंद आहे म्हणून मानव एकदा संबंध ठेवल्यावर स्त्री ला सोडून जात नाही आणी अपत्य संगोपनात सहभागी होतो.
संभोगात आनंद आहे ह्यात वाद नाहीच परंतू, पुरूष फक्त म्हणून स्त्रीला सोडून जात नाही हा तर्क मला तरी पटत नाही. माझ्या आधीच्या प्रतिसादात प्रतिपादिलेली 'भावना' ह्या गरजेकडे आपण काणाडोळा करीत आहात.
विवाह अपत्य संगोपन इत्यादी हे मानवाच्या विचारशक्ती चे प्रतिक आहेत नैसर्गिक प्रेरणेचे नव्हेत.
फक्त संभोग सुखासाठी पुरूष लग्न करतो ह्या विचारांशी मी असहमत आहे. मनुष्यप्राणी हाही एक 'प्राणी' आहे. त्याला नैसर्गिक प्रेरणा असणे स्वाभाविक आहे. पण विवाहासाठी ती आणि तेवढीच गरज आहे असे नाही. ज्या 'विचारशक्ती'च्या नैसर्गिक देणगीतून त्याने विवाहसंस्था जन्माला घातली आहे त्याच विचारशक्तीने त्याला/तिला 'भावना' दिलेली आहे.
माझ्या लेखाचे एक विशिष्ट विचार मनात धरून वाचन केले आहे
जरा उलगडून सांगणार का? कुठला तो विशिष्ट विचार? माझ्या प्रश्नांची, शंकांची तुम्हाला उत्तरे द्यायची नसतील तर जबरदस्ती नाही. पण माझ्या हेतू बद्दल शंका का यावी हे कळले नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

सुबोध खरे गुरुवार, 05/16/2013 - 18:22
साहेब, मी फक्त माणसाच्या आंतरिक प्रेरणेवर लिहित होतो म्हणून ते वाक्य god has linked procreation with recreation.otherwise no man will marry.लिहिले आहे. आपण माणसाच्या प्रगल्भ विचारसरणी बद्दल लिहित आहात. आपण सर्व गोष्टींचा साकल्याने विचार केला तर बरोबर लिहिले आहे. पण मी फक्त मानवाच्या आंतरिक प्रेरणे बद्दल ( जो आपल्याला अध्यारुथ गोष्टींचा एक भाग आहे)या अर्थाने लिहिले होते आपला असा समज झाला कि मी आपले लिखाण पूर्वग्रह दुषित आहे असे लिहिले आहे. तसे नाही.

In reply to by सुबोध खरे

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/16/2013 - 19:05
मी आपले लिखाण पूर्वग्रह दुषित आहे असे लिहिले आहे. तसे नाही.
धन्यवाद. आंतरीक प्रेरणा मला मान्य आहेच. इतर प्राण्यांप्रमाणे मानवातही ती आहे. पण, मानवात फक्त तेवढ्याच प्रेरणेने विवाह होत नाहीत. त्यात प्रेम भावनाही असते. पुरुषाला फक्त संभोगात रस असतो आणि मुलांच्या संगोपनात त्याचा सहभाग नसतो (ह्या मुद्द्यावर तुमचे उत्तर आले आहेच), अपत्य संगोपनातून सुटका झाल्यास स्त्री मुक्ती येईल वगैरे विधानांना माझा विरोध आहे आणि राहील. आपण आई आणि आजीचे जे उदाहरण दिले आहे ते सर्वसमावेशक नाही. शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती झाली. पण स्त्री मुक्ती एवढ्या दोनच मुद्यांवर उभारलेली नाही. तसे असते, तर दोन मुलांनंतर सर्वच स्त्रीयांची मुक्ती झालेली दिसून आली पाहिजे. पण तसे होत नाही. कारण स्त्री-मुक्ती हा एक गहन आणि बहुआयामी विषय आहे. पुरुष वर्चस्व आणि स्त्रीचे दुय्यम स्थान संपुष्टात आले तर तिथून स्त्री मुक्तीस प्रारंभ होईल.

In reply to by सुबोध खरे

आजानुकर्ण गुरुवार, 05/16/2013 - 20:49
हे आंतरिक प्रेरणा वगैरे ठीक आहे. पण याचा प्रेमाशी काय संबंध आहे? आपल्या इतिहासात बहुपत्नित्वाची प्रथा चालू होती. मग नवऱ्याचे सर्वच बायकांवर प्रेम होते की काय?

In reply to by आजानुकर्ण

मन१ Fri, 05/17/2013 - 12:21
एका सद्गृहस्थांकडून ऐकलेले आर्ग्युमेंटः- अनेक बायकांवर प्रेम असूही शकते. तुम्हाला दोन्-तीन बहीण कींवा दोन्-तीन भाउ असतील तर तेव्हा सारेच आवड्तात की नाही? भावंडात बंधूभाव असतोच की नाही? किंवा तुम्हाला अनेक अपत्ये आहेत, आणी सारीच प्रियही आहेत असे असू शकते. तिथे "प्रेमाच्या वाटणीचा" प्रश्न येत नाही.मग दोन बायका असतील तर मग त्या दोघीही प्रिय असणे ह्यात चूक ते काय? --आर्ग्युमेंट संपले.

In reply to by मन१

गवि Fri, 05/17/2013 - 12:42
काय आर्ग्युमेंट आहे.. झकास. मलाही अनेक स्त्रिया आवडणे आवडेल.. पण त्या सर्व स्त्रियांना मी एकटाच आवडावा असा माझा आग्रह राहील.. या समस्येमुळे एकच स्त्री मला आवडते आणि तिलाही मी एकच पुरुष आवडतो असं स्वतःच्या मनाशी खोलवर मानणे अशी लग्न नामक करारवजा रचना आपण करुन घेतली आहे. ;)

In reply to by गवि

पैसा Fri, 05/17/2013 - 12:52
अहो गवि, आणि आता तुम्हा लोकांकडे तेवढा वेळ कुठे आहे? पूर्वीच्या संस्थानिकांना पोटासाठी नोकरी करायला लागत नव्हती त्यामुळे त्यांना सगळ्या बायकांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत असेल. आता एकुलती एक बायकोच रोज उठून ओरडत असते की नवर्‍याला माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही म्हणून!

In reply to by गवि

मन१ Fri, 05/17/2013 - 13:43
लग्न नामक करारवजा रचना ही शिंची अलिकडेच मगच्या सात आठ दशकात उपटलेली बंधने आहेत. त्यापूर्वी कित्येक स्त्रियांशी विवाह करायचेच की राजेरजवाडे(किंवा ज्यांना झेपेल ते). शिंचा ब्रिटिशांनी एकावेळी एकपत्नीत्व घ्यायला लावून लैच अन्याय केलाय आख्ख्या भारतावर. प्राचीन परंपराच लोपली की हो.

In reply to by मन१

गवि Fri, 05/17/2013 - 13:58
अहो बरेच झाले की.. बहुपत्नीत्व शिल्लक ठेवले असते तर वरील न्यायानेच (पक्षी: अनेक भाऊ असले तर बहिणीचे सर्वांवर सारखेच प्रेम असू शकते..) अनेक पुरुषांवर सारखेच प्रेम करणार्‍या या बायका आपल्या सद्य पतीकडे बहुपतित्वाची मागणी करु लागल्या असत्या.. लई भानगडी उद्भवल्या असत्या राव.. आणि टीव्ही सीरियल्समधल्या गुंतागुंती तर १०^१०३ इतक्या वाढल्या असता असा एक अंदाज आहे.

In reply to by सुबोध खरे

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 05/16/2013 - 21:13
god has linked procreation with recreation.otherwise no man will marry.याचा अर्थ धार्मिक असा अजिबात नाही.
१. देवाचा उल्लेख करूनही हे वाक्य धार्मिक कसं नाही हे मला समजलं नाही. २. दुसरं महत्त्वाचं कारण हे की विज्ञान, मनोव्यापार, इतिहास इत्यादि विषयांच्या अभ्यासातून हे वरचं वाक्य साफ चूक आहे हे दिसलेलं आहे. अभ्यास नाकारून "बाबा वाक्यं प्रमाणम्" मानणं हे धर्म आणि धार्मिकपणाचं एक लक्षण आहे. त्या दृष्टीनेही हे वाक्य धार्मिक आहे.
जर संभोगात आनंद मिळणार नसेल तर मानवी नर कोणत्याही स्त्री च्या जवळ जाणार नाही.
आत्तापर्यंत जी काही उत्क्रांतीशास्त्र, मानववंशशास्त्राची पुस्तकं वाचलेली आहेत त्यात असं काहीही लिहीलेलं नाही. या सगळ्यांच्या संशोधनानुसार मानवी नर आणि अन्य प्राण्यांमधला नर यांची प्रेरणा समान असते, स्वतःची गुणसूत्र पुढे ढकलणं. प्रेयिंग मँटीस या कोळ्यांच्या जातीत आणि अन्य काही प्राण्यांच्या जातीमधे मादी नरांकडून स्पर्म घेतल्यानंतर त्याला खाते, त्यातून पोषण मिळवते आणि तरीही हे नर मेटींग करतात.
शिवाय एक स्त्री गरोदरपण आणी मुलाच्या जन्माच्या वेळी जवळ जवळ ११ -१२ महिने पूर्ण परावलंबी असते आणी त्यापुढे १३ ते १४ वर्षे अपत्य संगोपनात जर एखाद्या स्त्रीला द्यावी लागतात. पुरुषाला जर संभोगात आनंद नसेल तर पुरुष एवढी जबाबदार का घेईल?
१. याच धाग्यात खालच्या प्रतिसादांमधे 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' या पुस्तकाची लिंक दिलेली आहे. इतिहासाचार्य राजवाडेंनी त्यात शेतीपूर्वकालीन आणि शेतीच्या शोधानंतरचा मनुष्यांमधले लैंगिक संबंध, कुटुंबसंस्था आणि पुनरूत्पादनाचा इतिहास दिलेला आहे. खासगी मालमत्ता जमा करण्याची सुरूवात झाल्यानंतर, आपल्या कष्टांनी जमा केलेली मालमत्ता आपल्याच मुलांना मिळावी या विचारांपोटी पुरुष स्वतःच्या मुलांची जबाबदारी घेतो. २. (जशी अनेक स्त्रियांना अपत्य संगोपनाची इच्छा नसते तसंच) अनेक पुरुषांनाही अपत्य संगोपनाची इच्छा आणि हौस असते असं समाजात दिसतं. या पुरुषांवर तुमचं हे वाक्य प्रचंड अन्याय करणारं आहे. (हे एक उदाहरण) ३. हे "पूर्ण परावलंबीपण" अलिकडे फारच कमी झालेलं दिसतं. प्रसिद्ध स्त्रियांचं उदाहरण द्यायचं तर नोबेल पारितोषिक विजेत्या मेरी क्यूरी, गेर्टी कोरी या स्त्रिया प्रसूतीच्या दोन-तीन दिवस आधीही प्रयोगशाळेत काम करत होत्या. सर्वसामान्य आयुष्यात बघायचं तर मुंबईच्या लोकल ट्रेनमधेही पाच-सहा महिने गर्भार असणार्‍या स्त्रिया नियमितपणे ऑफिसात जाताना दिसतात. प्रसूतीच्या पुढच्या आठवड्यात स्त्रिया कामालाही लागलेल्या दिसतात. अशी एक बाई आमच्या ऑब्झर्व्हेटरीतही पाहिली आहे; शुक्रवारी संध्याकाळी नेहेमीप्रमाणे निघाली, सोमवारी मुलं झाली. ही बाई पुढच्या सोमवारी तिचं संशोधन प्रसिद्ध करण्यासाठी लिखाण करायला लागली होती. बांधकामाच्या साईटवरही तान्ही पोरं एकीकडे आणि त्यांच्या आया विटा वहाताना दिसणं हे प्रकार दिसतात. Evolution of sexual reproduction, Kin selection आणि तत्संबंधी पानांवर बरीच तपशीलवार माहिती आहे. तुमच्या प्रतिसादातली अधलीमधली वाक्य ठीकठाक असली तरी त्यातला कार्यकारणभाव सुसंगत नाही; लैंगिकता, शरीरसंबंध, अपत्यसंगोपनाची आवड वगैरे गोष्टींमधेही बरीच गडबड दिसते आहे. स्त्री-स्वातंत्र्यामधे कुटुंब नियोजनाची साधनं स्त्रियांच्या हातात येणं महत्त्वाचं असलं तरी हेच एकमेव कारणही नाही. माझा प्रतिसाद फारच त्रोटक आहे. मानववंशशास्त्र, उत्क्रांती, यांचा इतिहास या विषयांवर आणि स्त्रियांचं समाजातलं खालचं स्थान कशामुळे आलं याबद्दलही लिहीण्यासारखं बरंच काही आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शिल्पा ब गुरुवार, 05/16/2013 - 21:24

<<<<em>१. देवाचा उल्लेख करूनही हे वाक्य धार्मिक कसं नाही हे मला समजलं नाही.</em>
देवाचा उल्लेख असलेलं सगळंच धार्मिक असतं असं थोडंच आहे.

नुसतीच गुणसुत्र पुढं ढकलणे हाच एक नाही तर संभोगात आनंद नसेल तर संभोग फारसा होणार नाही.. हेच प्रेयिंग मँटीसच्या बाबतीतसुद्धा सत्य आहे. - डिस्कवरीवरच पाहीलंय म्हणुन.

बाकी चालु द्या.

In reply to by शिल्पा ब

माझ्या वरच्या प्रतिसादातलं संबंधित वाक्यः "देवाने मानव (किंवा अन्य प्राणी) यांच्यात संभोगात आनंद निर्माण केलेला आहे, असं म्हटल्यावर हे धार्मिक प्रतिपादन नाही असं कसं म्हणायचं?" असं वाचावं. जेनेरिक देव, धर्म, त्यांचा परस्परसंबंध वगैरेबद्दल चर्चा म्हणजे इथे अवांतर होईल; ते अन्यत्र बोलता येईल.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सुबोध खरे Fri, 05/17/2013 - 10:11
धागा बराच भरकटलेला आहे आणि मूळ मुद्दा बाजूला राहिला आहे म्हणून मी शेवटी वेगळ्या प्रतिसादात मला काय म्हणायचे होते ते सांगतो

In reply to by सुबोध खरे

त्यापेक्षा वेगळा धागाच टाका. नैसर्गिक प्रेरणा आणि त्यामुळे घडलेले बदल, सामाजिक परिणाम वगैरे विषय बराच मोठा आहे. त्यामुळे मूळ लेखनाचा जीव नको गुदमरायला. संपादकांना विनंती: या विषयावरचे प्रतिसाद वेगळे काढता आले तर दोन्ही विषय स्वतंत्रपणे चर्चा/प्रश्नोत्तरांसाठी वेगळे ठेवता येतील.

राही Mon, 05/13/2013 - 21:17
त्यात स्री देह पुरूष देहाला आकर्षित करण्यासाठी तयार झालेला आहे जेव्हा होमो सेपियन्स ही प्राणिजात घडत होती त्या प्रारंभीच्या काळात कदाचित मादी होमोसेपियनदेह नर होमोसेपिअन देहाला आकर्षित करण्यासाठी बनला असेलही.(तसेही,केवळ देह देहाला आकर्षित करीत नसतो. त्यामधला मन हा भाग ते करीत असतो.नुसत्या कलेवररूपी देहांमध्ये आकर्षण उरत नाही.) पण हजारों-लाखों वर्षांनंतर होमोसेपियन्सच्या मज्जासंस्थेत काही सूक्ष्म बदल घडले असतीलच ना, की ज्या योगे मादी होमोसेपियनला असे वाटू लागले असेल की नर होमोसेपियनला आकर्षित करण्यापुरतेच आपले अवतारकार्य नाही,किंबहुना ते प्रयोजन अगदी दुय्यम असून इतरही अनेक उद्दिष्टे असू शकतात? विनोदाच्या अंगाने पाहिले (ते खरेच आहे म्हणा) तरी स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता असते. म्हणजे तिचा पुष्कळसा काळ संगोपनात खर्ची पडतो. मग तिला मारूनमुटकून सदासर्वकाळ प्रणयिनी,अभिसारिका किंवा इतर कोणी शृंगारनायिका ठरवण्यात काय अर्थ? मेंदू हा प्राणिदेहाचा आणि प्राणिदेह हा निसर्गाचा भाग मानला तर मेंदू म्हणजेच निसर्ग. निसर्गच हे बदल घडवीत आला आहे. त्यामुळे होमोसेपियन मादीने स्वतःचे आयुष्य आपल्या मेंदूच्या प्रेरणांनुसार ठरवणे हे निसर्गाविरुद्ध नाही. असो. एक दृष्टिकोन मांडला इतकेच. आणखी : "न जातु कामः कामानां उपभोगेन शाम्यते | हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते ||"

In reply to by राही

पैसा Mon, 05/13/2013 - 21:21
आणखी थोडी भर. प्रत्येक पुढच्या पिढीत अधिक चांगल्या प्रजेसाठीच निसर्गाचा हा सगळा खेळ चाललेला असतो. म्हणजे सुप्रजनन हा मूळ हेतू आहे आणि त्यासाठी योग्य त्या नराला/मादीला आकर्षित करणे हा त्यासाठी पूरक हेतू.

In reply to by राही

राही, तुम्हाला रस असेल तर रिचर्ड डॉकिन्सने उत्क्रांतीशास्त्रावर लिहीलेली पुस्तकं जरूर वाचा. (या संदर्भात विशिष्ट कोणतं पुस्तक ते आठवलं की किंवा बघून सांगते.) दोन लिंग असणं उत्क्रांतीमधे फायद्याचं का ठरतं हे त्याने फार सुंदर लिखाण केलेलं आहे. मराठीत याबद्दल लिखाण आहे का नाही माहित नाही. संक्षींचा (निदान या संदर्भातला) दृष्टीकोन प्रचंड हास्यास्पद आहे याची वैज्ञानिक दृष्टीकोनानुसार काही कारणं: १. निसर्गाचा काही उद्देश आहे असं म्हणलं तर निसर्गाला काही जाणीव आहे असं म्हणावं लागतं. हे चूक आहे. २. स्त्री आणि पुरुष अशी दोन लिंग तयार होण्यात पुनरुत्पादन आणि झालेली संतती पुनरुत्पादनाच्या वयाला येणं यात फायदा होतो, त्यामुळे अशा प्रकारचं विभाजन झालेली जनता टिकून राहिली. ३. गेल्या काही दशकांमधे, विशेषतः दुसर्‍या महायुद्धानंतर माणसाच्या बाबतीत सामाजिक परिस्थिती फारच बदलल्यामुळे सगळ्या नैसर्गिक गोष्टींचं तस्संच्या तस्सं पालन करणं हे माणसाच्या प्रगतीमधे खोडा घालण्यासारखं झालेलं आहे. . . . ही यादी बरीच वाढवता येईल आणि यातल्या प्रत्येक मुद्द्यावर लोकांनी मोठमोठी पुस्तकं लिहीलेली आहे. पण आत्ता वेळ नाही, तेवढी आवश्यकताही नसावी. संक्षींचाच एक फार प्रसिद्ध न झालेला पण पोटेंशियल असणारा विनोदः लाघवी मूल काय आणि काय काय.

राही Mon, 05/13/2013 - 22:13
या विषयावर थोडेफार वाचन झालेले आहे. लेन्स्की वि.श्लाफ्ली वाचले आहे. मला वाटते माझ्या प्रतिसादातून आपला वरील मुद्दा क्र. तीनच डोकावतो आहे. बाकी सहमत.

स्त्री-पुरूष संबंध आणि उत्तररंगातल्या कौटुंबिक संबंधांवर त्यांचा होणारा परिणाम याविषयी आहे. अर्थात भारंभार अनावश्यक माहितीनं इतका वैचारिक गोंधळ झालेला असतो की नेमकं काय चाललंय, कशासाठी चाललंय आणि काय साधायचंय ते लक्षात येणं असंभव.

In reply to by संजय क्षीरसागर

अर्धवटराव Tue, 05/14/2013 - 02:59
>>अर्थात भारंभार अनावश्यक माहितीनं इतका वैचारिक गोंधळ झालेला असतो की नेमकं काय चाललंय, कशासाठी चाललंय आणि काय साधायचंय ते लक्षात येणं असंभव. -- भारंभार माहिती आवश्यक असते. कन्क्ल्युजन निघण्यापुर्वी वैचारीक गोंधळ देखील आवश्यक असतो. विचार प्रकियेचं ते आवश्यक अंग आहे. कन्क्युजनची घाई कशाला? अर्धवटराव

In reply to by संजय क्षीरसागर

आजानुकर्ण Tue, 05/14/2013 - 16:47
गैरसमज आणि तथ्ये या दुव्याचा लाभ आपण घेणे अत्यंत आवश्यक आहे. सत्याची जाणीव कधीही झाली तरी चालू शकते असे आमचे प्रामाणिक मत आहे. http://sogc.org/publications/female-orgasms-myths-and-facts/