मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कर्मविपाक

ढालगज भवानी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
"सामान्य वाचक" यांची "महाराज" या लेखावरील "कर्माच्या गती गहन असतात" अशी प्रतिक्रिया वाचून जालावर याविषयी काही लेख आहेत का याचा शोध घेतला. एक साईट सापडली. या साईटवरती लेख मिळाले. पैकी एका लेखातील खालील चपखल उपमा आवडली. ती शेअर करते आहे. मला तरी ती पटते. पूर्वी लो. टिळकांच्या "गीतारहस्य" ग्रंथातील "कर्मविपाक" विवेचन वाचून मंत्रमुग्ध झाल्याचे पक्के स्मरते. कदाचित सतत या व अशा विषयांवरील लेख वाचून "कंडीशनींग" झाले असल्याने मला पटत असेल. पण निदान हिंदू धर्म व त्यातील "कर्मविपाक" सिद्धांत, "नशीब/नियती" या अतिशय गूढ गोष्टीचा/घटनेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न तरी करतो. जे निश्चितच कौतुकास्पद आहे. खालील उतारा संपूर्णतः वरील साईटवरुन घेतलेला आहे. एका मोठ्या पिंपामध्ये प्रथम गहू टाकले, मग त्यावरती तांदुळाचा थर ओतला, तांदूळावर डाळ घातली, पुढे त्यावर दगडाचा चुरा टाकून त्यावर लोखंडाचा चुरा टाकला, आणि सर्वात शेवटी उत्तमोत्तम मौल्यवान रत्ने टाकून ते पिंप भरुन टाकले. त्यानंतर पिंपाच्या खालच्या दिशेने एक छिद्र पाडले. छिद्र पाडल्यावर त्या छिद्रातून आपण ज्या क्रमाने वस्तू भरल्या असतील,त्याच क्रमाने त्या वस्तू बाहेर पडायला सुरुवात होइल.मनुष्याचे जीवन असेच आहे. अनेक जन्मांच्या संचयित कर्मांचा काही भाग प्रारब्धरुपाने, स्वत:बरोबर घेऊन मनुष्य जन्माला येतो. हे प्रारब्ध म्हणजे जणू भोगरुपी कर्मांनी भरलेले एक पिंप असते.जन्माला येताना या पिंपाला एक छिद्र पाडले जाते, आणि सांगीतले जाते यातून जे जे जसेजसे खाली पडेल त्याचा स्वीकार कर आणि जीवन जग.सुरवातीला छान बासमती तांदूळ, डाळ व गहू टाकले असतील तर मनुष्याला छान पुलाव आणि पुरनपोळीचा स्वाद घेता येईल. परंतु पुढे तो स्वाद घेत असतानाच दगड आणि लोखंडाचा चुरा पडावयास सुरुवात होईल. असे होताक्षणी मनुष्याचा आरडा ओरडा सुरु होइल की "काय हे! मला हा चुरा का खावा लागतो आहे? मूळात तो चुरा त्यानेच कधीतरी साठविला आहे याची आठवन त्याला होणार नाही ही कर्मरहस्याची अजून एक मेख आहे.

वाचन 20135 प्रतिक्रिया 118

स्पंदना गुरुवार, 05/02/2013 - 07:47
हे तू किंवा आणि कोणी विद्वान जे म्हणता आहात ते ठिक. पण मला एक सांग जेंव्हा मला खडे आणि लोखंडाचा चुरा लागायला लागतो, तेंव्हा तो कुणा तरी एका व्यक्तीमुळे लागतो. म्हणजे त्यासाठी कोणीतरी कारणीभुत ठरते. मग मला माझ्या कर्मभोगाची फळे मिळत असताना त्याला कारणीभुत ठरणारा दुसरा कुनी कर्म करुन ठेवत असतो. मग ते चांगले वा वाईट, पण ते फक्त त्याच्या हातात नसते. मग त्या होणार्‍या कर्माची कारणी मिमांसा न करताच पुढे त्याचा हंडा भरला जातो. हे कसे? समजतय का मी काय म्हणते ते? आज माझ्यावर खुनाचा आळ आला. पण मी जो खून केला आहे तो दुसर्‍या एखाद्या व्यक्तीच्या कर्मभोगाची फळे म्हणुन घडलाय. म्हणजे त्या व्यक्तीने त्याच्या पुर्वजन्मी जे काही वाईट केले त्याचे फळ म्हणुन त्याला त्याच्या प्रिय व्यक्तीचा खुन होणे पहाणे नशिबी आले. आता यात खुन करणारी मी गोवले गेले, अन ज्याचा खुन झाला आहे तो ही गोवला गेला..हे कसे?

In reply to by स्पंदना

ढालगज भवानी गुरुवार, 05/02/2013 - 08:05
मी एक पुस्तक वाचले होते खरं पाहता "लिंडा गुडमन" चे "स्टार साइन्स" त्यात तिने एक उदाहरण दिले होते की मेरी ला जॉन ने कधीतरी पूर्वजन्मी दुखावले आहे त्यावर ती या जन्मी त्याला दुखावते मग नंतरच्या कोणत्या तरी जन्मी तो तिला याचे उट्टे म्हणून दुखावतो आणि ही साखळी अशीच चालू रहाते जोपर्यंत की मेरी किंवा जॉन कोणीतरी एकमेकांना न दुखावण्याचा "कॉन्शस" निर्णय घेत नाहीत. म्हणजे "निर्णय स्वातंत्र्य" हे आहे व ते उपयोग करुन कर्माची साखळी तोडता येत. तू प्रश्न विचारला आहेस की मेरी व जॉन हे दोघे या साखळीत कसे गोवले गेले? म्हणजे पहीलं कर्म कोणी कधी सुरु केले? ही साखळी कशी सुरु झाली? या गुंत्याचे टोक कुठे आहे? तर त्याला माझे उत्तर हे की या सर्व गुंत्याचे पहीले टोक कदाचित कोणालाच माहीत नाही. पण हा दिलासा काय कमी आहे की या गुंताड्याचा अंत मी माझ्या एकेक "कॉन्शस" निर्णयाने करु शकते.

In reply to by ढालगज भवानी

स्पंदना गुरुवार, 05/02/2013 - 08:25
तूझ्यामते मेरी अन जॉन एकमेकांच्या विरुद्ध लढत आहेत. जन्म मरण्याच्या फेरात ते दोघे असे वागताहेत. पण त्यात आण्खीन बर्‍याच साखळ्या गुंतत जातात. म्हणजे जॉनला दुखावण्यासाठी जॉनच्या मुलाचा मृत्यु. मग तो मुलगापण त्या चक्रात नाही का अडकला? एकुण एका क्ष व्यक्तीला त्याचे भोग भोगाअयला लावण्यासाठी दुसर्‍या य ला पाप करावे लगते. अन मग हे असेच. पुढे पुढे. समज मी निर्णय स्वातंत्र्य घेतले. म्हणजे जॉनचा मुलगा माझ्यावर हल्ला करताना मी माझा निर्णय घेउन त्याचा खुन केला नाही. पण त्या वेळी त्याच्या मुलाने माझा खून केला. मग माझ्या निर्णय स्वतंत्र्याने दुसरा एक आपला घडा भरुन रिकामा झाला. माझी त्यातुन सुटका नाही. कारण आता त्याचा पापाचा घडा मझ्या घड्यात रिकामी होणार. नाही उलगडत. अन नाही पटत. उगा मान हलवुन जय गुरु देव की! म्हणन आजवर नाही जमल.

In reply to by स्पंदना

ढालगज भवानी गुरुवार, 05/02/2013 - 08:40
सगळा केयॉस (गुंता) आहे हे जाणवतं. असा गुंता ज्याचा अंत ना पार लागतो. (डझंट मेक सेन्स) मग अशी एखादी थिअरी (सिद्धांत) वाचनात येतो व आशा वाटते की उत्तर सापडेल. पण सिद्धांतास पूरक किंवा विरुद्ध मुद्दे हे विचारमंथनातून आलेच पाहीजेत. त्या मुद्द्यांचे खंडन अथवा पूरक वाद घालता येणे हे शेवटी प्रत्येकाच्या बुद्धीवर व (मी म्हणेन ईश्वरी कृपेवर)अवलंबून आहे. मला पूरक उदाहरणे देणे नाही जमलं कदाचित अन्य कोणी करु शकेल. लेटस सी.

In reply to by स्पंदना

आनन्दा Fri, 05/03/2013 - 00:03
असे नाही. जेव्हा तुम्ही त्याला न मारण्याचा निर्णय घेता, तेव्हा तो विषय तुमच्यापुरता संपतो. त्याच्यासाठी तो चालुच राहणार अहे. परंतु त्यातही बहुधा एक मेख आहे. तुम्ही त्या कर्मात लिप्त असाल तरच ते तुम्हाला लागू होते.

In reply to by ढालगज भवानी

सामान्य वाचक गुरुवार, 05/02/2013 - 09:47
डेस्टिनी ने जो ढोबळ मार्ग आखून दिला आहे, त्यावरून च जायचे, का आपली विचारबुद्धी वापरून योग्य तो मार्ग निवडायचा , हे आपल्याच हातात आहे.

In reply to by सामान्य वाचक

संजय क्षीरसागर गुरुवार, 05/02/2013 - 10:10
नियती मानली तर आपल्या हातात काही नाही. नियती आहे हे आपण आपल्या बुद्धीनंच ठरवल्यावर पुन्हा
आपली विचारबुद्धी वापरून योग्य तो मार्ग निवडायचा'
हे शक्य नाही.

इरसाल गुरुवार, 05/02/2013 - 09:21
छिद्र पाडल्यावर त्या छिद्रातून आपण ज्या क्रमाने वस्तू भरल्या असतील,त्याच क्रमाने त्या वस्तू बाहेर पडायला सुरुवात होइल.
मौल्यवान वस्तुंनंतर जर चहा किंवा तत्सम पेय ओतले तर सगळ्यात आधी ते बाहेर निघेल याला आपण काय म्हणणार ?

In reply to by इरसाल

सामान्य वाचक गुरुवार, 05/02/2013 - 09:42
त्याच क्रमाने वस्तू बाहेर येतील असे नाही. पण ज्या वस्तू आपण भरल्या आहेत, त्या नक्कीच बाहेर येतील. क्रम पुढे मागे होऊ शकतो. ज्याप्रमाणे एका झाडाचे सगळे आंबे एकाच दिवशी पिकत नाहीत, त्याप्रमाणे सगळी कर्मे एकदम पक्व होत नाहीत. काही काही कर्मे संचित , काही प्रारब्ध अशी असतात. म्हणे काही फळे आत्ताच, नजीकच्या काळात मिळतात , तर काही संचित घेऊन आपण पुढच्या जन्मात जातो. (हिंदू अध्यात्मा नुसार, २-२ =० होत नाही. म्हणजे, जी काही चांगली & वाईट कर्मे आपण करतो, ती एकमेकास संतुलित करत नाहीत. दोन्ही प्रकारच्या कर्माची वेगवेगळी फळे भोगावी लागतात. )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/02/2013 - 09:37
व्यक्तिगत जीवनात पूर्वीचं काही आलेलं नसतं त्यामुळे कर्माची फळ वगैरे पुढच्या जन्मात काही येतील असं काही मला वाटत नाही. आपल्या या सध्याच्या वास्त्वजीवनातील विविध प्रवृत्तीं पुढील जन्मात काही किरकोळ गोष्टी घेऊन येतात म्हणे, चार दोन उदाहरणे आपल्याला दिसतात आणि या चार दोन उदाहरणाच्या पुष्ठ्यार्थ काहीएक तत्त्वाज्ञानाचा आधार दिला जातो आणि आपण अशा कर्मविपाकाचं ओझं उत्तम आनंदी जीवनात घेऊन फिरतो. मला हे सर्व थोतांड वाटतं, अर्थात आपलं वाचन किती, जगण्याचा अनुभव किती त्यामुळे असल्या गोष्टी मला फार प्रभावित करत नाही आणि आपण त्यावर बोलू नये ही माझ्यासाठी चांगली गोष्ट. बाकी, भगवंतांनीच म्हटलंय तेव्हा त्याचा योग्य अर्थ घेऊन आपण आपल्या जीवनाची वाटचाल करावी. कर्मणोह्यपि बोद्ध्वं बोद्धवं च विकर्मणः अकर्मश्च बोद्ध्व्यं गहना कर्मणो गति: (४/१७) कर्म विकर्म व अकर्म असे तीन प्रकार कर्माचे सांगितले जातात. संकल्प करुन फळाच्या इच्छेने जे कर्म केले जाते त्याला कर्म म्हणतात. चांगले संकल्प व चांगली कर्मे करीत जावीत, फळे मिळतील. विकर्म म्हणजे विशेष कर्म म्हणजे मन लावून केलेले कर्म आणि अकर्म म्हणजे अभिमान आणि फळ सोडून केलेले कर्म आणि ही सर्व कर्म करतांना तुमच्या कर्मामुळे किती लोकांचा फायदा झाला हे जग पाहते आणि तुम्ही कर्म कसे केले तो (असेल तर) देव पाहतो, असे म्हणून आपापल्या मार्गाने जात राहावे असे वाटते. -दिलीप बिरुटे

मोदक गुरुवार, 05/02/2013 - 09:51
प्रारब्ध, संचितकर्म वगैरे बाबींचा विचार केला तर आपण जन्माला आलो त्या क्षणापूर्वीच्या गोष्टी / घटनांकडे जावे लागते व इथूनच कदाचित माझ्या विचारांमध्ये गोंधळ होण्यास सुरूवात होते. शास्त्रीयतेच्या कसोट्यांवर या गोष्टींना काहीच अर्थ नाही परंतु २ + २ = ४ इतक्या सोप्या व सरळ नसलेल्या अनेक गोष्टी या जगामध्ये आहेत याचाही जवळून अनुभव घेतला आहे. (गोंधळलेला) मोदक.

संजय क्षीरसागर गुरुवार, 05/02/2013 - 09:58
सुरूवात झाली! कर्मसिद्धांत ज्यानं मानला तो कायमचा बंधनात अडकला. त्याची उत्सफूर्तता हरवली. त्यानं स्वछंद गमावला. आपण असहाय्यपणे नियतीच्या हातात आहोत या धारणेनं तो पूर्णपणे परस्वाधिन झाला. मानसिक गर्तेत सापडला. तो कधीही मुक्त होणं शक्य नाही. कर्मसिद्धांताला कोणताही वास्तविक आधार नाही. सर्व स्मृती, धारणा, विचार, भावना, मेंदूशिवाय कुठेही नाहीत. आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत. कोणत्याही क्षणी, मागे घडलेल्या घटनेचा कोणताही संदर्भ न आणता पूर्ण स्वातंत्र्यानं वस्तुनिष्ठ निर्णय घेणं कर्मबंधाच्या कल्पनेतून मुक्त करतं.

नगरीनिरंजन गुरुवार, 05/02/2013 - 10:00
सगळ्यात पहिल्या जीवाला/मनुष्याला काहीही पूर्वसंचित नसल्याने त्याचे नशीब कोरे (म्हणजे ना सुख ना दु:ख) होते का? गेल्या ६०-७० वर्षांमध्ये माणसांची संख्या दुपटीहून जास्त वाढली आहे याचा अर्थ जीवांचे इतर योनींमधून मनुष्ययोनीत येण्याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. म्हणजेच या काळात प्राण्यांमध्ये पुण्य करण्याची लाट आली आहे असे सिद्ध होते का?

In reply to by नगरीनिरंजन

ढालगज भवानी गुरुवार, 05/02/2013 - 10:19
पहील्या प्रश्नाचे उत्तर "गुंत्याचे पहीले टोक माहीत नाही" असे वर दिलेले आहे. हा सर्व पसारा कसा सुरु झाला माहीत नाही. दुसरा प्रश्न तर्कशुद्ध आहे की अनेक पशुयोनीतील जीव अचानक मनुष्ययोनीत येऊ घातलेत की काय? तर मग तर्काच्या लाइनवर बोलायचं झालं तर अशी कल्पना करा की एक हौद आहे ज्यात वरुन पाणी पडतं आहे (पशूयोनीतील जीव मनुष्य योनीत येणे) व खालील लहानशा छिद्रातून वाहूनही जात आहे (मनुष्ययोनीतील जीवांना मोक्ष मिळणे). मग कदाचित अशी असू शकेल की प्राण्यांमध्ये पुण्याचीलाट वगैरे आलीली नसून नेहमीप्रमाणेच प्राणी मनुष्य बनत आहेत परंतु मनुष्ययोनीतील जीव मात्र "तथाकथित" कलीयुगामुळे मोक्षप्राप्ती करुन घेऊ शकत नाहीयेत ज्यामुळ हौदात पाणी साठत चाललय. वरील थिअरी वर मी विश्वास करते असे नाही पन तुम्ही १ तर्क तर मी ७ तर्क एवढच. चला नवरा ओरडतोय. गुड नाईट.

In reply to by नगरीनिरंजन

गवि गुरुवार, 05/02/2013 - 10:21
ननि, पुनर्जन्म किंवा तत्सम कल्पना मानायच्या तर तुम्ही उपस्थित केलेल पॅरेडॉक्सिक प्रश्न हे फक्त पहिले दुसरे किरकोळ प्रश्न आहेत. नीटपणे विचारले तर प्रश्नांचं शतक नक्की होईल. या सर्व गोष्टी मनुष्याला एक थियरी म्हणून मानायला आवडतात. कारण त्या सोपं एक्स्प्लेनेशन देतात. एरवी आपल्याला (मानवजातीला) एकूणच शष्प काही माहिती नाही किंवा समजणं शक्य नाही हे स्वीकारणं हजारपट कठीण आहे.

विसोबा खेचर गुरुवार, 05/02/2013 - 10:08
>>असे होताक्षणी मनुष्याचा आरडा ओरडा सुरु होइल की "काय हे! मला हा चुरा का खावा लागतो आहे? मूळात तो चुरा त्यानेच कधीतरी साठविला आहे तो कसा काय? जो जन्माला येतो तो स्वत:चंच पिंप कसं काय भरू शकतो?

In reply to by विसोबा खेचर

गवि गुरुवार, 05/02/2013 - 10:17
हेच म्हणतो. मुळात ही संकल्पना मानायची म्हणजे मागचा जन्म अन पुढचा जन्म मानला पाहिजे. या दोन्ही गोष्टी चालू जन्माच्या जाणिवेच्या (कॉन्शसनेस) कक्षेबाहेरच्या आहेत. त्या मानल्या की मग काहीही मानता येईल. तसंही काही मानायला हरकत नाही. ही थियरी नाही तर ती थियरी. आपल्याला थियरी पाहिजे हे महत्वाचं. बाकी पाककृती समजून लेख उघडला होता. कर्माच्या फळांना पाकात घालण्यापेक्षा सध्या हापूसचा सीझन आहे त्यांचा मोरांबा केलेला उत्तम.

In reply to by विसोबा खेचर

संजय क्षीरसागर गुरुवार, 05/02/2013 - 10:29
सर्व स्मृती मेंदूत असते आणि माणूस गेला की मेंदू पूर्णपणे फॉरमॅट होतो. नवजात अर्भकाला नवी कोरी हार्डडिस्क मिळते. सिद्ध बालवत होतो याचा अर्थ तो स्मृतीचा उपयोग केवळ डेटाबेस म्हणून करतो. त्यातून स्वतःच व्यक्तिमत्त्व सक्रिय होऊ देत नाही. हे एकदा लक्षात आल्यावर या क्षणी, प्राप्त प्रसंगात वागतांना, मनाच्या गुंत्यात न अडकता तुम्ही पूर्ण स्वातंत्र्यानं कोणताही वस्तुनिष्ठ निर्णय घेऊ शकता आणि ते खरं स्वातंत्र्य आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

गवि गुरुवार, 05/02/2013 - 10:34
सर्व स्मृती मेंदूत असते आणि माणूस गेला की मेंदू पूर्णपणे फॉरमॅट होतो.
हे प्रत्येकाच्या बाबतीत होत असूनही असे बॅरियर क्रॉस करताना फॉर्मॅट झालेली डिस्क घेऊन जन्माला आलेले अनेक मनुष्यप्राणी ही जन्म्-मृत्यू बॅरियरच्या दोन्ही बाजूंची थियरी ठामपणे जाणू आणि मांडू शकतात. :) हे कसं? वदतोव्याघातच वाटतो.

In reply to by गवि

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/02/2013 - 10:39
>>> प्रत्येकाच्या बाबतीत होत असूनही असे बॅरियर क्रॉस करताना फॉर्मॅट झालेली डिस्क घेऊन जन्माला आलेले अनेक मनुष्यप्राणी मेंदू पूर्णपणे फॉर्मेट होऊनही काही फायली नव्याने पुना इन्स्टॉल केल्यावर दिसू लागतात. अनेकदा आपण असे किस्से वाचतो आणि ऐकतोही. विज्ञान अशा गोष्टींचं कसं निराकरण करतं काही माहिती नाही. पण, माझ्यासारखे पुन्हा अशा किश्श्यांनी अनुभवांनी डळमळीत होतात राव. :( -दिलीप बिरुटे
नीलकांत, भल्या माणसा अरे ते अक्षररंग आणि खरडी दिसायची सोय दे ना भो

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि गुरुवार, 05/02/2013 - 10:47
मेंदू पूर्णपणे फॉर्मेट होऊनही काही फायली नव्याने पुना इन्स्टॉल केल्यावर दिसू लागतात. अनेकदा आपण असे किस्से वाचतो आणि ऐकतोही. विज्ञान अशा गोष्टींचं कसं निराकरण करतं काही माहिती नाही. पण, माझ्यासारखे पुन्हा अशा किश्श्यांनी अनुभवांनी डळमळीत होतात राव.
तेही ठीक. पण मग मूळ थियरी सत्य ठरत नाही. मागची मेमरी शिल्लक राहून यंदाच्या व्यक्तिमत्वात फेरफार घडवण्याचे बरेच चान्सेस राहतात. शिवाय विज्ञान हे आत्ता ज्या अर्थाने प्रचलित आहे ते अशा गोष्टींवर काही करु शकणार नाही. किंबहुना कोणतीही जिवंत माणसाची विचारशक्ती हे सोडवू शकणार नाही. याचा अर्थ बुद्धी कमी आहे असा नसून या सर्व गोष्टी जाणण्यासाठी आपण चौकट भेदू शकत नाही. "लंघून चौकट पार निघाया बघतो" हे खरं.. लंघून जाण्यासाठी नुसतीच पंखांची फडफड करत बसतो झालं. प्रत्यक्ष लंघू शकत नाही कारण आपलं अस्तित्वच "आत" आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर गुरुवार, 05/02/2013 - 10:50
काही अनफॉरमॅटेड डेटा कधीकधी तरगंत राहतो आणि तो नवजात अर्भकाच्या (किंवा एखाद्या जीवंत व्यक्तीच्या) मेंदूत सरळ पेस्ट होतो. अर्थात तो डेटा त्याचा नसतो त्यामुळे पुनर्जन्म ही कल्पना या अपवादात्मक स्थितीवर आधारित असली तरी फोल आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

मोदक गुरुवार, 05/02/2013 - 10:58
१) काही अनफॉरमॅटेड डेटा कधीकधी तरगंत राहतो आणि तो नवजात अर्भकाच्या (किंवा एखाद्या जीवंत व्यक्तीच्या) मेंदूत सरळ पेस्ट होतो. अर्थात तो डेटा त्याचा नसतो. २) त्यामुळे पुनर्जन्म ही कल्पना या अपवादात्मक स्थितीवर आधारित असली तरी फोल आहे १ व २ ही दोन विधाने परस्परविरोधी वाटत नाहीयेत का..? एकदम टोकाचा निष्कर्ष कसा काय काढलात..? २ मध्ये "पुनर्जन्म ही कल्पना या अपवादात्मक स्थितीवर आधारित असली तरी" म्हणजे या कल्पनेचे अस्तित्व तुम्ही मान्य करत आहात ना..? मग ती फोल कशी काय..?

In reply to by मोदक

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/02/2013 - 11:18
>>> १ व २ ही दोन विधाने परस्परविरोधी वाटत नाहीयेत का..? तुमच्यासारखीच ती विधानं मला परस्पर विरोधी वाटतात आणि संक्षीं साहेबांना वाटतात की नै म्हैती नै.
नीलकांत, भल्या माणसा अरे ते अक्षररंग आणि खरडी दिसायची सोय दे ना भो...!!!

In reply to by मोदक

संजय क्षीरसागर गुरुवार, 05/02/2013 - 13:34
कुणाला तरी अनफॉरमॅटेड डेटा मिळाला याचा अर्थ मृत व्यक्तीनं पुन्हा जन्म घेतला असं नाही. फक्त एका नव्या बालकाच्या (किंवा हयात व्यक्तीच्या) मेंदूवर कुणा इतराची स्मृती पेस्ट झाली. आणि ते देखील अपवादात्मक आहे. नॉर्मली मृत्यू म्हणजे कंप्लीट डेटा फॉरमॅट. आणि तसं आहे म्हणून तर अस्तित्व नित्यनूतन आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

मोदक गुरुवार, 05/02/2013 - 15:15
संक्षी.. अस्तित्व "नित्यनुतन" असेल तर ते संपूर्णपणे नवे हवे. एका नव्या बालकाच्या (किंवा हयात व्यक्तीच्या) मेंदूवर कुणा इतराची स्मृती पेस्ट झाली मग हे अस्तित्व नित्यनूतन कसे? (अवांतर - तुम्हाला पुनर्जन्म म्हणजे, "क्ष" या व्यक्तीचे मरणापूर्वी एखादे फ्रॅक्चरचे ऑपरेशन झालेले असावे व हातामध्ये रॉड बसवलेला असावा, "य" या बालकाने "क्ष" च्या स्मृतीसह जन्म / पुनर्जन्म घेतला सेल तर "य" च्याही हातामध्ये रॉड असावाच असे काही अपेक्षीत आहे का..?)

In reply to by मोदक

संजय क्षीरसागर गुरुवार, 05/02/2013 - 18:04
आपण प्रत्येक जण त्याचं उदाहरण आहोत. त्यामुळे अस्तित्व सदैव नित्यनूतन निर्मितीच करतं. अपवादात्मक स्थितीत एखाद्याला, गेलेल्या व्यक्तीचा अनफॉरमॅटेड डेटा मिळाला, याचा अर्थ गेलेल्या व्यक्तीचा पुनर्जन्म झाला असा होत नाही. फिजिकल गोष्टी संक्रमित होऊ शकत नाहीत. केवळ स्मृती संक्रमित होऊ शकते.

In reply to by संजय क्षीरसागर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/02/2013 - 11:16
काही गोष्टी येतात हे गवि आणि क्षीरसागर साहेब मान्य करत आहेत असे दिसते. काही डेटा परस्पर अनोळखी माणसाच्या जीवनात कसा घुसतो. अर्थात हे सर्व कर्मविकाचे फळ आहे, असे समजायचे कारण नाही. पण, या जन्म-पुनर्जन्म या कल्पनेत म्हणा की काही अन्य म्हणा काही गोष्टी येतात, मग ती अपवादात्मक स्थिती असो की अन्य काही. असे वाटायला लागते. -दिलीप बिरुटे
नीलकांत, भल्या माणसा अरे ते अक्षररंग आणि खरडी दिसायची सोय दे ना भो...!!!

In reply to by संजय क्षीरसागर

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 05/02/2013 - 12:37
@काही अनफॉरमॅटेड डेटा कधीकधी तरगंत राहतो >>> कुठे तरंगत राहातो? अवकाशात का? की अणखि कुठे तरी!? याला पुरावा काय? कुणी तपासलं हे? @आणि तो नवजात अर्भकाच्या (किंवा एखाद्या जीवंत व्यक्तीच्या) मेंदूत सरळ पेस्ट होतो.? १ तरी पुरावा द्या हो!!! काय प्रचंड अचरटपणा आहे हा!

In reply to by अत्रुप्त आत्मा

संजय क्षीरसागर गुरुवार, 05/02/2013 - 13:37
काही लोकांना त्यांच्या जीवनात न घडलेल्या घटना सरळ सर्व तपशिला सकट आठवतात हा पुरावा आहे. अनफॉरमॅटेड डेटा स्पेसशिवाय इतरत्र कुठे असणार? अवकाश हाच सर्व निर्मितीचा स्त्रोत आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

मोदक गुरुवार, 05/02/2013 - 15:22
काही लोकांना त्यांच्या जीवनात न घडलेल्या घटना सरळ सर्व तपशिला सकट आठवतात हा पुरावा आहे. मग पुनर्जन्म फोल कसा..??? अनफॉरमॅटेड डेटा स्पेसशिवाय इतरत्र कुठे असणार? अवकाश हाच सर्व निर्मितीचा स्त्रोत आहे. जरा आणखी डीटेल्स देता का..?

In reply to by संजय क्षीरसागर

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 05/02/2013 - 16:18
@ न घडलेल्या घटना सरळ सर्व तपशिला सकट आठवतात हा पुरावा आहे.>>> या पुराव्यांची जंत्री सादर करा,तुंम्ही सगळ्या या प्रांतातल्या समर्थकांनी एकत्र येऊन १ मोठ्ठी आघाडी उघडा आणी हा वाद एकदाचा हतावेगळा करा. दुसरं असं की वरिल पद्धतीचा पुरावा हा संपूर्ण नाही.विश्वातल्या अश्या घटनेबद्दल सायंटिफिकली प्रूफ म्हणता येइल अश्या स्वरुपाचा तर हा पुरावा अज्जिब्बात नाही. तेंव्हा आकाशात हे कुठे काय असतं? हे तिथे जाऊन फोटो किंवा तत्त्सम काहि पद्धतिने पकडलं आहे का? या बद्दल गेल्या हव्यातितक्या वर्षात अखिल आध्यात्मवादी जगतात कुणी काही प्रयत्न केले आहेत का? याची उत्तरे द्या. इहलोकात घडणार्‍या घटनांनी तुंम्ही ज्याला परलोक वगैरे समजता तिथल्या कार्यकारण भावाची अचुक उत्तरे शोधण्याची आर्धी पद्धत तुंम्ही उपरोक्त मुद्यातून दाखवली.अता उरलेली अर्धी दाखवा.

In reply to by अत्रुप्त आत्मा

संजय क्षीरसागर गुरुवार, 05/02/2013 - 17:47
कर्मसिद्धांत असं काही नाही. थोडं पुढे जाऊन, कुणाचाही पुनर्जन्म होत नाही हे मी स्पष्ट केलंय.

In reply to by संजय क्षीरसागर

अर्धवटराव गुरुवार, 05/02/2013 - 22:25
शरीरात वावरत असताना सत्य गवसो वा नाहि, मृत्युनंतर मेंदु नाहि, म्हणजे विचार नाहि... म्हणजे मुक्त अवस्था. मग सत्य शोधनाचा आटापिटा कशाला? मृत्युपश्चात तसंही जाणिव निराकार. होईल. अर्धवटराव

In reply to by विसोबा खेचर

ढालगज भवानी गुरुवार, 05/02/2013 - 15:57
पूर्वसंचित तात्या. मला जेवढं आठवतय त्याप्रमाणे पूर्वसंचित = आपल्या पूर्वीच्या अनेकानेक जन्मांच्या कर्मांचे गाठोडे व या जन्मीचे प्रारब्ध = अ‍ॅक्टीव्ह (कार्यरत) होणारे पूर्वसंचित.

In reply to by विसोबा खेचर

तिमा गुरुवार, 05/02/2013 - 18:17
आम्ही आमच्या पिंपात फक्त 'बिअर' भरुन ठेवली होती, त्यामुळे आम्हाला ती भरपूर मिळते आहे. या जन्मात सोकाजीरावांची सर्व कॉकटेल्स भरुन ठेवण्याचा मानस आहे.

सुधीर गुरुवार, 05/02/2013 - 10:24
(टिळकांनी गीतारहस्यात खूप चांगलं समजवलय, तरीही) माझाही कर्मविपाकावर फारसा विश्वास नाही. पण मला असं वाटतं ते मानल्यामुळे वा न मानल्यामुळे फारसा फरक पडत नाही. आपल्या नशिबामागे वा कमनशिबामागे काय कारण असलं पाहिजे ह्यावर जास्त चर्चा करून काही उपयोग नाही. त्यापेक्षा आहे ती परिस्थिती स्विकारून पुढे कसं जायचं हा विचार करणं जास्त उपयोगी ठरेल असं वाटतं. यावर स्टिव्हन कव्हींच्या ७ सवयी मधली पहीली सवय मला जास्त भुरळ घालते. ते म्हणतात, घडणार्‍या घटना आपल्या हातात नसतात, पण त्याला काय प्रतिसाद द्यायचा हे नक्कीच आपल्या हातात आसतं. पण प्रतिसाद दिल्यावर दिलेल्या प्रतिसादाचे परिणाम पुन्हा आपल्या हातात नसतात. ते पुन्हा निसर्गनियमांना धरून असतात. असो जाणकारांचे प्रतिसाद वाचण्यास उस्तुक!

In reply to by सुधीर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/02/2013 - 10:29
घडणार्‍या घटना आपल्या हातात नसतात, पण त्याला काय प्रतिसाद द्यायचा हे नक्कीच आपल्या हातात आसतं. पण प्रतिसाद दिल्यावर दिलेल्या प्रतिसादाचे परिणाम पुन्हा आपल्या हातात नसतात. ते पुन्हा निसर्गनियमांना धरून असतात. -दिलिप बिरुटे

In reply to by सुधीर

संजय क्षीरसागर गुरुवार, 05/02/2013 - 10:54
>पण त्याला काय प्रतिसाद द्यायचा हे नक्कीच आपल्या हातात आसतं.
पण प्रतिसाद दिल्यावर दिलेल्या प्रतिसादाचे परिणाम पुन्हा आपल्या हातात नसतात. ते पुन्हा निसर्गनियमांना धरून असतात. वागतांना हेतू शुद्ध ठेवा. त्याचा एकमेव नियम आहे : `मी कुणाला वापरणार नाही आणि स्वतःला कुणाला वापरू देणार नाही'. यामुळे मोहात अडकण्याची शक्यता शून्य होते आणि तुम्ही पूर्णपणे ऑथेंटिक होता, मग परिणामांची तमा बाळगण्याचं काही कारण नाही.

In reply to by सुधीर

मन१ गुरुवार, 05/02/2013 - 12:57
आंतरजालिय भाषेत बोलायचं तर धागे कोणते कुणी टाकावेत हे आपल्या हातात नसतं. त्यांना किती/कोणते प्रतिसाद द्यायचे (किंवा दुर्लक्ष करायचं) हे आपल्या हातात असतं. पुन्हा येणारे उपप्रतिसाद आपल्या हातात असतीलच असं नाही.

पैसा गुरुवार, 05/02/2013 - 12:53
मी म्हणजे काय? कर्म म्हणजे काय? मोक्ष म्हणजे काय? मोक्ष का मिळवायचा? मोक्ष्/मुक्ती मिळाली किंवा न मिळाली तर मला काय फरक पडेल?

मन१ गुरुवार, 05/02/2013 - 13:08
रमतारामाचा एक लेख "पुनर्जन्म या व्यवस्थेसंबंधी काही प्रश्न" ह्यातील काही भागाशी संबंधित वाटला http://www.misalpav.com/node/19118

मनीषा गुरुवार, 05/02/2013 - 13:36
कर्माची फळे, बरी, वाईट, कडू, गोड, आंबट प्रत्येकालाच मिळतात.. पण ज्या जन्माची त्याच जन्मात .. आता आयसीआयसीआय चे लोन घेतले आणि एच डी एफ सी ला पेमेंट केले तर तुमचे पैसे जातील पण आयसीआयसीआय चे लोन कसे फेडले जाईल ? ते तसेच राहणार नाही का?

In reply to by मनीषा

ढालगज भवानी गुरुवार, 05/02/2013 - 16:00
लहान मुलांचा खून वगैरे होतो त्याचे स्पष्टीकरण कसे द्यायचे मग? त्यांनी या जन्मी काय कर्म केले ज्याचे त्यांना फळ मिळाले?

In reply to by ढालगज भवानी

मनीषा गुरुवार, 05/02/2013 - 16:18
ते त्यांचे दुदैव म्हणावे आणखी काय.. आणि घडणारी प्रत्येक बरी वाईट घटना काय कर्माचे फळ असते का? आता तुम्ही आधी 'शुची' होता.. त्याची 'ढालगज भवानी' झालात.. हे कुठल्या कर्माचे फळ म्हणायचे? :) (सॉरी.. कृ. ह. घ्या.)

In reply to by मनीषा

गवि गुरुवार, 05/02/2013 - 16:35
घडणारी प्रत्येक घटना ही कर्मांचे संचित असते यात वादच नाही. पण ती आपल्याच कर्मांचे संचित असते आणि त्यातही शक्यतो बरे वाईट जे केले त्याचा बरावाईट परतावा नंतर देऊन स्कोर सेटलिंग करणारे असते ही समजूत अगदीच बिनबुडाची दिसते. घडणारी प्रत्येक घटना ही असंख्य पाहतामोजता न येणार्‍या जुन्या आणि अगदी त्याक्षणीच्या अनप्रेडिक्टेबल घडामोडींमुळे घडते. त्या सर्व घटना या जितक्या क्लिष्टतेने एकत्र येतात ते पाहणं किंवा त्यातून काही अर्थ लावणं / शास्त्र शोधणं हे शक्य आहे का ते मला माहीत नाही, पण ते वर्थ नाही असं वाटतं. अपघात होणं हे त्या रस्त्याची देखभाल, वाहनाची देखभाल, टायरचा पातळपणा, आदल्या रात्री रस्त्यात खिळा पडलेला असणं, वाहनचालकाच्या मनात त्या वेळी आलेला विचार, त्या विचाराची सैरभैर करण्याची आणि ड्रायव्हिंगवरचा ताबा सुटवण्याची क्षमता, ड्रायव्हरला असलेले आजार, त्यासाठी घेतलेले औषध, त्यातला झोपवण्याचा गुण, आजार मुळात होण्यास कारण ठरलेली त्याची वर्षानुवर्षांची जीवनशैली, व्यसन, खेरीज समोरच्या वाहनाचा ताबा सुटलेला असताना केवळ आपण त्याच्या रस्त्यात त्याचवेळी "असणं", आपण त्याचवेळी हातात आपलं मूल घेतलेलं असणं, जिथे ट्रक आपल्या अंगावर आला त्या जागेची भौतिक रचना (मागे कातळ असणे आणि पळण्याची जागा नसणे) अशा असंख्य गोष्टींची बेरीज असते. तीही रेषीय बेरीज नव्हे. कदाचित गुणाकारही म्हणता येईल. पण आपण चूक अशी करतो की आपण आपल्या बर्‍यावाईटाच्या दृष्टीनेच मोजमाप करतो. "मी" अमुक केलं म्हणून "मला" अपघात झाला. अरे नाही बाबा.. तू केलंस किंवा आणखी शंभर सजीव निर्जीव वस्तूंनी मिळून जाणता अजाणता जे केलं त्याचा त्या क्षणीचा परिणाम म्हणून तुझ्या शरीरावर ट्रक चढला, तुझ्या ज्या भागावरुन ट्रकचं चाक गेलं त्या भागाला इजा झाल्याने शरीराचा महत्वाचा रक्तप्रवाह थांबला आणि त्यामुळे तुझ्या शरीराचं चलनवलन थांबलं. आता यामधे जगाला, निसर्गाला, या सर्व व्यापाराला "कोण" मेला किंवा काय मोडलं याने काही फरक पडत नाही. आपापतः त्या जागी "मी" असतो तेव्हा मला, माझ्या नातेवाईकांना थेट झळ बसल्याने "व्हाय मी?" हा तीव्र प्रश्न पडतो आणि हे उत्तर शोधणं अत्यंत निकडीचं वाटतं आणि मग त्यातून अशा थियरीज उभ्या राहतात.

In reply to by गवि

प्यारे१ गुरुवार, 05/02/2013 - 16:52
मी आणि माझं ह्या कक्षेत जोपर्यंत गोष्ट येत नाही (ही कक्षा माझा देश नि त्यातले सगळे लोक व तद्नुषंगानं येणारं सगळं, माझा ग्रह (पृथ्वी) अशीही असू शकते ) तोवर मी त्यावर शक्यतो विचार करत नाही. विचार झालाच अथवा केलाच तर त्यातून जास्त करुन शोक अथवा विषाद उत्पन्न होतो ज्यानं घ टना परिस्थितीमध्ये विशेष फरक पडत नाही. माझं मर्यादित जग ही माझ्या कक्षेची व्याप्ती असताना, इतर कुणाबद्दल अहित चिंतण्यापेक्षा, त्याला जबाबदार धरण्यापेक्षा, त्याचा रागराग करण्यापेक्षा, त्याचा सूड घेण्यापेक्षा मला कर्मविपाकाची थिअरी जास्त प्रिय आहे. थोडं अवांतरः 'मी आणि माझे ऐसे, विसरले जयाचे अंतःकरण तो सन्यासी निरंतर जाण' असं माऊली म्हणतात तेव्हा त्यांना अपेक्षित अर्थ हा असतो की 'माझे' पणाची भावना गेल्यावर सगळीकडे समानत्व दिसतं. त्यामुळं इथं आल्याची गेल्याची, फायद्याची अथवा नुकसानीची भाषा बंद होते. क्षुल्लक स्वार्थ शिल्लक न राहिल्यानं असलेल्याच आनंदाची पुनर्प्राप्ती होते.

In reply to by ढालगज भवानी

मन१ गुरुवार, 05/02/2013 - 16:20
लहान मूल एखाद्या दुर्दैवी घटानेत विनाकारण बळी जाते. पण मग "काही का असेना पण स्पष्टीकरण देता यावे" अशी भूमिका आहे का?मग स्पष्टीकरण देता येइल अशी एखादी कल्पना स्वतःच करायची किम्वा इतर कुणीतरी रचलेली कल्पना मान्य करायची असे काही आहे का? समजलं नाही. म्हणजे समजूत घालून घेण्यासाठी आपण ही कल्पना करतोय हे मान्य आहे का?

In reply to by मन१

ढालगज भवानी गुरुवार, 05/02/2013 - 17:51
हो थोडीशी "अफूच" आहे. मान्य आहे. अधिकारी व्यक्तीने, अधिकारवाणीने, माझ्या बुद्धीला झेपेल/समजेल असे काही सांगीतले नाही. तेव्हा कल्पना करुन, उत्तरे शोधूनच मला प्रवास करावा लागणार. मेंदू-मनाची कवाडे बंद तर करता येत नाहीत.

In reply to by मन१

इनिगोय Fri, 05/03/2013 - 19:20
'असं का घडलं?' हा प्रश्न प्रत्येकालाच कधी स्वतःच्या, कधी इतरांच्या बाबतीत पडतोच की. त्याचं उत्तर शोधण्याची निकड किती आहे, हे घटनेच्या तीव्रतेवर अवलंबून आहे. एखादी व्यक्ती परक्या देशात 23 वर्षं तुरुंगात पडते, किंवा चार वर्षांची मुलगी अत्याचाराला सामोरी जाऊन मरून जाते, तेव्हा त्या प्रसंगात तीच का सापडली, हे शोधावंसं वाटणं साहजिक नाही?

In reply to by इनिगोय

गवि Fri, 05/03/2013 - 19:32
असे का घडले ? आणि तिच्या बाबतीतच का घडले हे पूर्ण वेगळे आहे. दोन्ही प्रश्न आपापल्या जागी व्हॅलिड आहेत. पण तीच का याची काराणमीमांसा वेगळीकडेच जाते. घटना घडते ती घडते. आपापत: तिच्याशी घडते. आपण व्यक्तीला केंद्रस्थानी मानून तिची कर्मे अन जन्म यांचे हिशेब करतो.

प्यारे१ गुरुवार, 05/02/2013 - 14:16
मी एका गाडीतून जात होतो. गाडीने जाताना सिग्नल तोडला, पुढे जाऊन गाडीने दोन चार लोकांना चिरडलं. तसाच पुढं गेलो. रात्रीची वेळ असल्यानं कुणी पकडलं नव्हतं. पुढं जाऊन गाडी दरीत पडली. गाडी वापरण्यासारखी राहिली नव्हती. मी गाडीतून बाहेर पडलो. जसं गाडीतून बाहेर पडलो, मला काही आठवेनासं झालं. नवीन गाडी घेतली. नेहमीसारखं मजेत सुरु झालं. थोड्या दिवसांनी एसीपी प्रद्युमन आपल्या दया, अभिजीत, साळुंके सगळ्यांना घेऊन आले. नि म्हणाले (तेच हाताचा भांगडा करत) प्यारे तुम्ने गाडी चलाते हुए सिग्नल तोडा हय, लोगोंको बडी बेरहमीसे कुचला हय. तुम्ही फांसी होगी! दयानं एक वाजवल्यामुळं आधीच झिणझिण्या येत होत्या. मी म्हणालो, एसीपी, मी माझी गाडी एकदम व्यवस्थित चालवतो आहे. बघा. ते म्हणे नाही. तुझी आधीची गाडी आठव. मी म्हणालो आठवत नाही. तुला शिक्षा होणारच. एसीपी दुष्ट आहे. खटला झाला, मी हल्ली एका ठिकाणी असतो. त्याला तुरुंग म्हणतात. मी जो गुन्हा केला नाही त्याची शिक्षा मला मिळते आहे असं मला वाटतं. सीआयडी तुरुंगात बघतो. मस्त जेवण असतं, हल्ली तुरुंगातच मजा वाटते.

In reply to by प्यारे१

गवि गुरुवार, 05/02/2013 - 14:29
स्टोरी मस्त आहे. उदाहरणही खास. इथे मुळात तू ज्यांना उडवलं त्यांनीच आधी काहीतरी जाणता अजाणता असं केलं होतं की त्याचं फळ तू त्यांना दिलंस. मग ते फळ त्यांना देण्याचं तुझं काम म्हणजे पुण्यच असायला हवं. पण नाही.. ते वाईट कृत्य ठरतंय. तुझ्या लेखी ते पाप म्हणून पडतंय. नंतर तुला कोणीतरी उडवून किंवा अन्य मार्गाने पीडा देऊन ते चुकतं करतं.. पण त्या कोणाच्या तरी बाबतीत स्वतःकडे आणखी पाप घेऊनच तेही हे कृत्य करतात. या सर्व विषयात आणि तुझ्या गोष्टीमधेही मुख्य गृहीतक असं आहे की १. तथाकथित ठार मारणं ="दुरित" = "पाप" = "निगेटिव्ह" किंवा मदत करणं = "पुण्य" "पॉझिटिव्ह" इ इ २. अशा गोष्टींचा पाठपुरावा करणारे आणि हिशोब ठेवणारे, बॅलन्स करु इच्छिणारे एसीपी प्रद्युम्न आणि कानाखाली आवाज काढणारे कोणीतरी "दया" अस्तित्वात आहेत. असं एकदा मानलं की बाकी सर्व ठीकच आहे. पण हे मानता येणं कठीणच की. निसर्ग किंवा तत्सम काही एंटिटीच्या नियमांनी सर्व गोष्टी घडतात आणि त्या अतर्क्य आहेत असं म्हटलं तर मग अमुक म्हणजे पापच आणि तमुक म्हणजे पुण्यच आणि तेही कधीना कधी बॅलन्स झालंच पाहिजे हे सर्व कशापाई म्हणे? निसर्गाला काय फरक पडतो प्यारेने चार पादचार्‍यांना उडवले काय किंवा एखाद्या दरडीने एखादे झोपडे झोपवले काय किंवा भूकंपाने दहा हजार लोक होत्याचे नव्हते केले काय? हिशेबाची कल्पना आपलीच की.

In reply to by गवि

प्यारे१ गुरुवार, 05/02/2013 - 15:34
दुसर्‍या कुणाला दोष देणं- अमुक मुळे तमुक झालं इ,इ, द्वेषानं ,मत्सरानं जळणं- मी गरीब, तो श्रीमंत, तो सुंदर मी कुरुप, काळा गोरा, उंच, बुटका इ.इ. गर्वानं, अहंकारानं (अहंगंड/न्यूनगंड दोन्ही)फुगणं - मी लई हुशार, मी लई मठ्ठ हे सगळं बंद होण्यासाठी वरची सिस्टीम. तुम्ही त्या सिस्टीमला मानत नाही पण असेच निर्मत्सर, निरंहकार, निर्लेप सारखे वागता तर तुम्हाला सगळं समजलंय. शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणताना द्वेष करतो नि सुखी आहे, गर्व आहे नि सुखी आहे ह्या काँट्रॅडिक्टरी वाक्यांना कुठंतरी संपवायला हवं की. ह्या सगळ्याचा मुख्य हेतू सुखानं आयुष्य जगणं = सुखदु:खरुप द्वंद्व संपवणं. नि ह्याच सुखरुप अवस्थेत देह सोडणं हा आहे. ते नाही जमलं तर हरला. जमलं तर जिंकला. नो द सिस्टम, युज इट, गेट रिझल्ट्स, फर्गेट सिस्टम. सिस्टीम मध्ये अडकायचं नाही. गणितातला क्ष उत्तर मिळाल्यावर पकडून नाही बसत. सोडून देतो. :)

रमताराम गुरुवार, 05/02/2013 - 14:19
मर्ढेकरांच्या 'पिपात मेले ओल्या उंदिर' या कवितेची आठवण झाली.

इरसाल गुरुवार, 05/02/2013 - 16:00
मोक्ष मिळाला की नाही हे मला कसे कळणार. आणी कळाले तरी तो मी नसणार मग त्याचा मला काय फायदा? बरं ज्यांना मोक्ष मिळाला त्या आत्म्यांना देव स्वतःजवळ ठेवुन आपली इनव्हेन्ट्री का बरे वाढवत आहेत ? मागच्या ६०/६५ वर्षात लोकसंख्येची बोंबाबोंब करत असताना इतकी संख्या देव कशी मॅनेज करत आहेत ?

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 05/02/2013 - 16:33

मुळात ह्या कर्मविपाकवाद्यांना एका प्रश्नाचं उत्तर कध्धिही देता आलेलं नाही.

तो प्रश्न असा-'' की माझा हा जन्म व त्यातिल घटना हा जर मागच्या जन्माचा हिशोब आहे,आणी तो जन्म त्याच्या मागच्या जन्माचा हिशोब,,,तर असं मागे जाता जाता मला कधि ना कधि सर्वात पहिला जन्म असणारच आहे.
मग मला त्या जन्मात जे मिळालं ते त्याच्या मागे जन्म नसताना त्यात कुठून आलं?''

In reply to by अत्रुप्त आत्मा

संजय क्षीरसागर गुरुवार, 05/02/2013 - 17:44
मग मला त्या जन्मात जे मिळालं ते त्याच्या मागे जन्म नसताना त्यात कुठून आलं
या एका मुद्यानं सर्व कर्मसिद्धांत निकालात निघतो. यू आर राइट!

In reply to by अत्रुप्त आत्मा

ढालगज भवानी गुरुवार, 05/02/2013 - 18:05
नॅचरल नंबर्स = १-२-३-४ ....... रियल नंबर्स = ....-५,-४,-३, -२,-१,०,१,२,३..... इथे मागे मागे जात आदि (सुरुवात) कुठे मिळतो? मग रियल नंबर्स ही कल्पना फोल धरायची का? निकालात काढायची का?

In reply to by संजय क्षीरसागर

ढालगज भवानी गुरुवार, 05/02/2013 - 18:11
उत्तर देता नाही आलं की संबंध नाही का? माझे मत आहे संबंध आहे. दोन्ही ना आदि ना अंत अशा कन्सेप्ट्स आहेत.

In reply to by ढालगज भवानी

सामान्य वाचक गुरुवार, 05/02/2013 - 19:42
अंत म्हणाल तर , तो ही नक्की आहे, पण आपल्या बुद्धीच्या पलीकडचा आहे. हे सगळे सगळ्यांना पटले पाहिजे हा अट्टाहास कशासाठी?

In reply to by सामान्य वाचक

ढालगज भवानी गुरुवार, 05/02/2013 - 19:44
नाही अट्टाहास नाही. जितके प्रश्न उपस्थित होतात चांगलेच आहे. स्वतःच्या श्रद्धा, समजुती, भ्रम तर भ्रम( ऑर व्हॉटेव्हर) रिव्हिझीट (चाचपण्याची) करण्याची संधी मिळते.

In reply to by ढालगज भवानी

सामान्य वाचक गुरुवार, 05/02/2013 - 20:18
अति प्रश्न & चर्चा , याने आणखी गोंधळ होऊ शकतो. चर्चा करायची तर त्या विषयातील माहिती असलेल्या, अधिकारी व्यक्तीशी करावी. अन्यथा उलट परिणामच होण्याची शक्यता जास्त

In reply to by सामान्य वाचक

विटेकर Fri, 05/03/2013 - 15:47
हे अगदी मान्य ! चर्चा करायची तर त्या विषयातील माहिती असलेल्या, अधिकारी व्यक्तीशी करावी. हे तर १०० % खरे आहे.. काय वाट्टेल ते चालू आहे झालं

In reply to by ढालगज भवानी

सस्नेह गुरुवार, 05/02/2013 - 19:52
विश्वात अशा कोणत्याही दोन गोश्टी नाहीत ज्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. विघटन केले असता सर्व गोष्टी मूलतः अणूंनीच ना बनल्या आहेत ? 'माती असशी मातीत मिळशी....'

In reply to by अत्रुप्त आत्मा

श्रिया Sat, 05/04/2013 - 12:34
मग मला त्या जन्मात जे मिळालं ते त्याच्या मागे जन्म नसताना त्यात कुठून आलं?'
' अ.आ. तुमच्या प्रश्नाचं हे समाधानकारक उत्तर असेलच असे नाही, पण मला ह्या संबधित हा एक सिद्धांत तार्किक वाटतो, कि आपण सगळे "आत्मा"रुप आहोत आणि परमात्म्याचे अंश आहोत.परमात्म्याचे अंश असल्याने आत्म्याला अल्पस्वातंत्र्यहि आहे. सुरवातीला सर्व जीवात्मे परमात्म्याच्या निकट सान्निध्यात (व कर्मबंधनातून मुक्त)होते .पण जीवात्म्यांना परमात्म्यापासून विलग होऊन स्वतंत्र होण्याची इच्छा झाली, त्यांची हि इच्छा पूर्ण करण्यासाठी परमात्म्याने भौतिक जगाची निर्मिती केली व जीवात्म्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना तशी जीवन परिस्थिती उपलब्ध करून दिली. अशाप्रकारे भौतिक जगातील "पहिल्या जन्माची" सुरुवात झाली. व तेथून आपल्या कर्माप्रमाणे जीवात्मा पुढचे जीवन जगत आहे. पण त्याचे अंतिम उद्दिष्ट पुन्हा परमात्म्याच्या निकट सान्निध्यात जाणे हे आहे.

In reply to by श्रिया

तुमच्या संपूर्ण प्रतिसादाचं सार-रूप ,मला पहिला जन्म देवाने दिला आणी त्यावेळेसंही ''जे'' काहि दिलं ते त्यानीच दिलं असं होइल...मला हे तात्विक दृष्ट्या किंवा १ मुद्दा म्हणून मान्य आहे.कारण त्यामुळे पुनर्जन्माच्या सूत्राला १ सुसंबद्धता मिळते.(परंतु,तरिही- हे सर्व घडवणारा देव किंवा तशी तत्सम नैसर्गिक शक्ति पुरावा देऊन सिद्ध करा असं म्हटलं की हे ही गृहीतक निकालात निघतं...कारण मुळात हे असलं काहि अस्तित्वातच नाहिये.) पण मी हा वाद यामुद्यावर सोडुन द्यायला तयार आहे.माझ्या सारख्यांचं भांडण निव्वळ एखादी गोष्ट/गृहीतक खरं की खोटं या एकमेव कारणासाठी नाहीच. धर्माच्या बाबतीतल्या प्रत्येक गोष्टीत
हे खरं/खोटं करण्याचं मूळ कारण
हे त्यामागिल विषमता लबाडी शोषण अन्याय हे सर्व आहे... हा कर्मविपाकाचा सिद्धांत किंवा नशिब मानायला लावणारी कोणतिही सिस्टिम आपल्यावर दोन प्रकारे अतिक्रमण करते... पैकी पहिला प्रकार--- आपल्याला नशिबाच्या पाठिमागे दडायची सोय उपलब्ध होणे.याचे गैरफायदे म्हणजे कोणत्याही कामात अपयश आलं की,आपण प्रामाणिक प्रयत्न केलेले असले काय/नसले काय - ''हे माझ्या नशिबातच नव्हतं'' असं म्हणण्याची आपली तयारी होते. त्यामुळे अनेकदा आपल्या अडचणीवरचं/अपयशामागचं खरं कारण कळायची कुठलिच शक्यता शिल्लक उरत नाही. (जी नशिबा शिवाय विचार केला तर असतेच असते.) आपण आपल्या/दुसर्‍याच्याही बाबतीत हेच वाक्य उच्चारतो-की ''सालं नशिबात नसेल त्याच्या'' किंवा ''अजुन योग आलेला नाही'' अश्या अनेक प्रकारे याची अभिव्यक्ति होत असते. नोकरी न लागण्यामागे खरी कारणं असतात, बेकारी/समाजात नोकरदारांच्या प्रमाणात नोकर्‍यांची असलेली अल्प उपलब्धता. त्याशिवाय ''मी अमुक इतकं आणी अमुक अश्या प्रकारचं शिकलोय,म्हटल्यावर मला तमुक प्रकारचीच नोकरी मिळाली पाहिजे... साहेबाचं शिक्षण आणी चपराश्याची नोकरी का करू?'' अश्या पद्धतीचा न्याय्य असला तरी परिस्थितिकडे डोळेझाक करणारा सूर. नशिबाचा दुसरा पछाडणारा प्रकार-हा याच कर्मविपाकाच्या धार्मिक सिद्धांताचा भाग आहे..त्या नुसार पुढे चातुर्वण्य संकप्लना आणी त्या अनुषंगानी आजच्या काळात केलेला चातुर्वण्य समर्थकांचा खोडसाळ अपप्रचार-दुट्टप्पीपणा इत्यादी सर्वकाही... म्हणजे वाद उपस्थित झाला,की ''चातुर्वण्य आंम्ही जन्माधिष्ठित मानत नाही कर्माधिष्ठित(च) मानतो'' असं म्हणायचं,मग ''धर्मशास्त्रातंही तसच सांगितलय'' अशी मखलाशी करायची...मग आमच्या सारख्यानी-''कर्माधिष्ठित मानता तर ''तशी व्यवस्था गेल्या हज्जारो वर्षात कुणी का निर्माण केली नाही???,आणी सध्या आपण का निर्माण करत नाही???'' असं विचारलं की तोंड बंद झाल्यामुळे एकतर उखडायचं/चिडायचं तरी किंवा वादातून पळ काढायचा... याच पद्धतिने मी आमच्या भिक्षुक वर्गात कायम १ आव्हान देत असतो-की जर का तुंम्ही जातिचे गुण हे जन्मसिद्ध न मानता कर्म सिद्ध मानता तर, ज्याला मोटार चालवता येते तो ड्रायव्हर या कर्मगत विभागणी प्रमाणे ज्याला वेदमंत्र नीट म्हणता येतील,तो हिंदू समाजातल्या कोणत्याही जातितला माणुस हिंदु पुरोहित असं करायला तुंम्ही का तयार होत नाही???- वेदपाठ शाळेत कोणत्याही हिंदू मुला/मुलिला प्रवेश का देत नाही???-तर मग मात्र हे चालत नाही आणी हा अधिकार(?) फक्त ब्राम्हणांनाच..वगैरे भाषा सुरु होते. (त्यात अनेक पुरोहित मंत्र म्हणताना अस्खलित अशुद्ध म्हणतात ते मात्र चालतच--''केश्वाय न्मः/नारायनाय न्मा:/माध्वाय न्मा:'' र्‍ह्स्व/दीर्घ/जोडा(मारलेली) गुरुत्वहीन अक्षरं/विसर्गांच्या उच्च्चारी चुका या बाबतीत तर न बोललेच बरं...१विनोदी फार्स व्हायचं बळ असलेलं साहित्य-साधन आहे ते...!) म्हणजे एकिकडे लायकतेची भाषा करायची,दुसरीकडे त्याच लायकतेच चाललेलं स्खलन मात्र सहजतेनी बघायचं... असा हा सगळा गोंडस पसारा आहे... त्यामुळे कर्मविपाक इत्यादी बद्दलची चर्चा सुरु झाली की त्याच्या बाजुनी बोलताना माणसाच्या इहलौकिक दृष्ट्या असलेल्या गुण/अवगुणांना/नैतिकतेला हताशी घेऊन ''कर्म'' या गोष्टिचा अर्थ गृहीत धरायचा..पण दुसरीकडे धर्मात प्रत्येक वर्ण/जातिच्या बाबतीत सांगितलेल्या ''कर्मा''ला मात्र साफ दुर्लक्षित करायचं... असा हा संपूर्ण दुटप्पी खेळ आजही चालू आहे...
म्हणुनच हे उपरोक्त सर्व सोडुन केवळ धार्मिकतेनी सांगितलेले जातिचे गुण नाही,तर नैसर्गिकपणे असलेले माणसांचे इहलौकिक गुण जमेला धरून ''तुंम्हाला'' कर्मसिद्धांताचा खेळ हवा असेल तर माझ्यासारख्याचा त्याला मुळीच विरोध नाही

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन Sat, 05/04/2013 - 18:13
+१०००००००००००००००००००००००००००००००००००............ नाद खुळा प्रतिसाद. अत्रुप्त आत्म्याशी पूर्णतः सहमत!!!!!!!

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ Sat, 05/04/2013 - 18:15
>>>>म्हणुनच हे उपरोक्त सर्व सोडुन केवळ धार्मिकतेनी सांगितलेले जातिचे गुण नाही,तर नैसर्गिकपणे असलेले माणसांचे इहलौकिक गुण जमेला धरून ''तुंम्हाला'' कर्मसिद्धांताचा खेळ हवा असेल तर माझ्यासारख्याचा त्याला मुळीच विरोध नाही छान. बाकी माणसामध्ये लोभ, चुका करण्याची, फसवण्याची प्रवृत्ती हे दुर्गुण 'जात्याच' आहेत त्याचे हे सगळे परिणाम आहेत. धर्मच नव्हे तर सगळीच क्षेत्रे व्यापून पुन्हा हे दुर्गुण तोंड वर काढून बसलेलेच आहेत.

संजय क्षीरसागर गुरुवार, 05/02/2013 - 22:38
संबंध नाही हेच उत्तर आहे. गणना सुरू होण्यापूर्वी संख्या ही कल्पना नव्हती. अ आचं म्हणणंय प्रथम जन्माचं संचित कसं आलं? आता या दोन्हीचा काय संबंध आहे?

अग्निकोल्हा गुरुवार, 05/02/2013 - 23:32
मी कायम जागे राहु शकत नाही मी कायम झोपलेलाही अजिबात राहु शकत नाही मी केवळ श्वास आत घेउन राहु शकत नाही वा नुसताच बाहेर सोडत राहु शकत नाही जे शरीर मिळाल ते सुध्दा स्थिर नाही सतत बदल होतोय त्यात थोडक्यात जिथ बघतोय तिथ उर्जेच रुपांतर होताना दिसतय स्थिर असं काहीच भासत नाही म्हणूनच जेव्हां अटल अविचल मोक्षाची कल्पना निर्माण होते प्रॉमिस्ड लँड , कायमचा स्वर्ग स्गळ्याच मनाच्या कल्प्नाशक्तिच्या भरार्‍या असं मन जे स्वतःच स्थिर नाही कधी अनुभव देत तर कधी डुलक्या काढतं थोडक्यात मी नुसताच जन्मलेला राहणे शक्यच नाही (अमर) परीणामी मृत्युरुप हे सुध्दा माझे कायमच्या मुक्कामाचे स्थान नाही...

अशोक पतिल गुरुवार, 05/02/2013 - 23:46
खर म्हणजे या विश्वात प्रत्येक पदार्थाची ( ग्रह असोत की अणु,मुलकण इ.) काटेकोर आखुन दिलेली गती ,कक्शा असते. युगानुयुगे त्यात तिळमात्रही फरख नसतो.इतकी सुसुत्रता असते. या मागे काहीतरी प्रेरणा असेलच.या स्थीरांकावरच विज्ञांनाचे नियम कार्य करतात.अन्यथा या विश्वात अराजकता माजली असती. तसेच प्रत्येक क्रियेला प्रतीक्रिया असते या नियमा नुसार प्रत्येक कर्माला फळ हे असणारच. आपले आचार विचार हे फक्त या जन्मातले नसुन ते मागचे संचित असु शकतील. नाहीतर प्राण्याचा मेंदु व मानवाचा मेंदु या मधे इतका फरख कसा असता ? या एकाच जन्मात भाव भावना कश्या विकसित झाल्या असत्या ? मानवी जिवनात अंसख्य नाती गोती परस्पर सबंध हा मागील जिवनाचा सामुहीक परस्पर कर्म विपाकाचा परिणाम असु शकेल.

In reply to by अशोक पतिल

अग्निकोल्हा Fri, 05/03/2013 - 00:06
या स्थीरांकावरच विज्ञांनाचे नियम कार्य करतात.अन्यथा या विश्वात अराजकता माजली असती.
मुळात विश्वात अराजकता नाहीये हाच कित्ती कित्ती मोठा गोड गैरसमज आहे.. मला तर बुआ प्रचंड अराजकता सगळीकडे दिसत आहे... काय परफेक्ट आहे इथे ? हा आता हे इंपर्फेक्शनच एक परफेक्ट गोश्ट निर्माण/नियंत्रित करते आहे असा समाज विषेश कारणाने बाळगायचा हव्यास असेल तर.... _/\_

बॅटमॅन गुरुवार, 05/02/2013 - 23:49
पूर्वसुकृत या कल्पनेतील हवा योगवासिष्ठात स्वतः वसिष्ठांनी घालवल्यामुळे आपण तर ब्वॉ जाम खूश आहोत. सोनारानेच कान टोचले ते एक बरं झालं.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Fri, 05/03/2013 - 00:03
मी काय लै डीप बीप नै वाचायला. पण जिक्तं उमागलं तिक्तं सांगतो. वसिष्ठ म्हणतात, की पूर्वसुकृताचा बाऊ करण्यात काही अर्थ णाही. मागल्या जन्मीचे गाठोडे साठलेले असले तरी या जन्मी ते वाढत नाही, तितकेच राहते. त्यामुळे या जन्मात आपण किती हातपाय हलवतो त्यावर आपण पुर्वसुकृतावर किती वरताण करतो ते , पक्षी आपला उत्कर्ष अवलंबून आहे. तस्मात, पुरुषप्रयत्न हाच सर्वांत महत्वाचा हा संदेश वसिष्ठ देतात.

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ Fri, 05/03/2013 - 00:09
ओक्के. असाध्य ते साध्य, करिता सायास, कारण अभ्यास, तुका म्हणे. रेखा तितुकी पुसोनि जाते, हे तो प्रत्यक्ष प्रत्यया येते, तेणे डोळेझाकणी करावी,काय निमित्य? आधीच्या प्रतिसादाचा अर्थ वेगळा वाटतोय दादा. पूर्वसुकृत ही कंसेप्ट नाहीच असं वसिष्ठ म्हणतात असं वाटतंय एकदम. असो.