मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बहु भुकेला झालो...

विसोबा खेचर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
१९३०-३२ चा सुमार असेल.. गदगच्या आपल्या राहत्या घरातून एक मुलगा अंगावरील वस्त्रानिशी घरातून पळाला.. संगीत देवतेला 'जोहार मायबाप जोहार.. ' असं म्हणत निघाला..! त्याच्या आईनं त्याला काही भजनं शिकवली होती. गावातल्या कुणा मास्तरांकडून त्याला काही सांगितिक भाकऱ्यांची शिदोरी मिळाली होती. पण तेवढ्यानं त्याचं पोट नव्हतं भरत.. त्यामुळे सोबत ती थोडीशी शिदोरी घेऊन तो महाराचा महार 'जोहार मायबाप जोहार..' असं म्हणत निघाला.. ग्वाल्हेर, रामपूर, बनारस, जालंदर... खूप खूप वणबण केली त्या बहू भुकेल्याने... गावोगावचं सांगितिक उष्टं अगदी आवडीनं खाल्लं..जिथे जे काही मिळेल ते वेचलं.. आणि एके दिवशी हा महाराचा महार कुंदगोळला पोहोचला.. तिथे त्याचा 'मायबाप' त्याला भेटला.. त्या मायाबापाच्या दारात उभं राहून त्या महाराने पुन्हा एकदा 'जोहार मायबाप जोहार.. ' अशी करुणा भाकली.. उष्ट्यासाठी पाटी आणली होती..बहू भुकेला होताच तो.. परंतु आता ती भूक शमणार होती.. खुद्द मायबापाच्या घरचं चुलीवरचं गरमागरम सांगितिक अन्न मिळालं त्याला. अगदी पोटभर..! आता आम्हीही त्याच्या गायकीचे बहू भुकेले आहोत. तो आता नाही.. पण त्याच्या कलाश्री बंगल्यातील थोडीशी माती. तीच आम्हाला आता साखर-फुटाणा-बत्ताश्याच्या प्रसादासारखी आहे आणि तीच माती आम्ही अबीरबुक्क्यासारखी कपाळावर आयुष्यभर मिरवणार आहोत... -- तात्या.

वाचने 13859 वाचनखूण प्रतिक्रिया 32

अत्रन्गि पाउस Fri, 04/19/2013 - 13:49
तात्या...किती दिवसांनी भेटता.....ह्म्म्म चला दिंडी पुढे घेउन चला.. त्या महाराची कथा पुढे सांगा...आम्ही ऐकतो आहो...आणि इस्पिक एक्क्यावर जरा विस्तृत बोला जरा!!!

In reply to by NiluMP

मुक्त विहारि Fri, 04/19/2013 - 14:23
काय तुम्हाला " जोहार मायबाप जोहार" माहित नाही. तुम्हाला "कलाश्री" बंगला माहित नाही? मग तुम्ही नक्कीच संगीत ऐकत नाही. २० व्या शतकांत २ च भीमसेन झाले. एकाने समाजाची कान उघाडणी केली, तर दुसृयाने समाजाचे कान त्रुप्त केले. आणि अजून एक छान योगायोग म्हण्जे, दोघांनाही "भारत रत्न" मिळाले. असो.... तुर्त इतकेच... ह्या दोन महान व्यक्तीं विषयी लिहायची माझी पात्रता नाही.

In reply to by मुक्त विहारि

गणपा Sat, 04/20/2013 - 12:56
मुवि अहो किती कान टोचाल एखाद्याचे. ;) नव्या पिढीला दिग्गजांची ओळख आपल्या सारख्या रसिकांनीच करुन दिली पाहीजे. :) बाकी तात्या हात भलताच आखडता घेतलात.

In reply to by NiluMP

विसोबा खेचर Fri, 04/19/2013 - 14:51
असो.. चालायचंच. काळ खूप बदलला आहे. एस एम एस ने महागायक निवडण्याचा जमाना आहे. आपली चूक नाही. माझ्या लेखनाची उंची खूपच कमी पडली म्हणायची..! :)

In reply to by विसोबा खेचर

मुक्त विहारि Fri, 04/19/2013 - 15:00
असे अजिबात नाही... तुम्हाला वाईट वाटून घ्यायचे काही कारण नाही. खानावळीत जेवणार्‍या माणसाला घरच्या जेवणाची चव माहित नसते.

नीलकांत Fri, 04/19/2013 - 14:00
बरेच दिवसांनी तात्याचा लेख वाचला. भीमसेनांबद्दल तात्यांना भरभरून बोलताना कायमच ऐकलं आहे. भावना पोहोचल्या.

कपिलमुनी Fri, 04/19/2013 - 15:27
बैठकीला उशा, तक्के सरसावून बसलो ... पहाटेपर्यंत कान तृप्त करायचे म्हणून आणि एक तान घेउन मैफल संपावी असा वाटला .. मैफल अजून रंगू द्या

In reply to by कपिलमुनी

धमाल मुलगा Sun, 04/21/2013 - 23:09
अरे तात्याभैय्या, आता जरा एक बडा ख्याल येऊन जाऊंद्या ना! :) तात्या, एक जरा अण्णांच्या दरबारी कानडावर कडकडीत लेख येऊ दे की. काय?

स्पंदना Fri, 04/19/2013 - 17:47
अगदी त्या महारा सारखेच तात्या आम्ही महार होउन आता तुम्ही काय सांगता ते ऐकायला उभे राहीलो, पण तात्यानु झोळीत घासभर सुदिक वाढल न्हायसा. लय हात आखडता घेतला.

श्रीरंग_जोशी Fri, 04/19/2013 - 19:11
अगदी थोड्या शब्दांत बरेच काही लिहून गेलात, तात्या!! माझ्या दुर्दैवाने पंडीतजींना गाताना ऐकले नाही पण ६ वर्षांपूर्वीच्या सवाईमध्ये किमान त्यांचे निवेदन प्रत्यक्ष ऐकले. गेल्या पंधरवड्यात त्यांचे एक शिष्य श्री आनंद भाटे यांची मैफल ऐकण्याची संधी मिळाली. त्यावेळी जोहार मायबाप ऐकताना अक्षरशः अंगावर काटे आले. जीव ओतला होता आनंद भाटेंनी त्या गायनात.

शुचि Fri, 04/19/2013 - 19:22
चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमि ही तिथी गंधयुक्‍त तरिहि वात उष्ण हे किती ! दोन प्रहरिं कां ग शिरीं सूर्य थांबला ? राम जन्मला ग सखी राम जन्मला खरच इवलासं देखणं बाळ पाहायला सूर्यही पळभर थांबला - काय गोड कल्पना आहे.

In reply to by शुचि

दादा कोंडके Sat, 04/20/2013 - 14:26
मला वाटतं, धागा छोटा आहे पण यात काहिही चूकीचं नाही. स्वतः प्रतिसाद चुकीचा देउन वर धाग्यालाच चुक ठरवणार्‍यांचा निषेध.

आनंद घारे Sat, 04/20/2013 - 14:13
आणि एके दिवशी हा महाराचा महार कुंदगोळला पोहोचला.. तिथे त्याचा 'मायबाप' त्याला भेटला.. त्बांच्याबद्दल कोणीच काही लिहिले नाही. ते सवाई गंधर्व आता फक्त उत्सवाच्या नावापुरतेच राहिले आहेत. खुद्द मायबापाच्या घरचं चुलीवरचं गरमागरम सांगितिक अन्न मिळालं त्याला. अगदी पोटभर..! स्व.पं.भीमसेन जोशी यांनी आपल्या गुरूचे ऋण वेळोवेळी व्यक्त केले होते. पुढच्या पिढीला कदाचित त्यांच्याबद्दल काहीच माहिती नसण्याची शक्यता आहे.

हा लेख चांगला आहे . पण तुमचा लौकिक याहूनही मोठा सविस्तर लेख लिहिण्याचा आहे. तेंव्हा तसा लेख अपेक्षित आहे. पं.भीमसेन जोशी ह्यांच्या अनेक मैफिली ऐकण्याचा योग आला. लक्षात राहिलेली मैफिल पुण्यात दगडूशेठ गणपती ने अभंग वाणी हा कार्यक्रम ! कवी शंकर वैद्य हे सुत्रसंचालक / निवेदक / निरुपणकार होते. पंडितजी नी उत्तर रात्री पर्यन्त गाऊन रसिकांना तृप्त केले. शंकर वैद्य यांनीही आपल्या वाणी आणि बुद्धीने सभेला स्तिमित केले होते. पंडितजींनी जवळ जवळ २० अभंग गाऊन आपल्या कलेची आणि कष्टाची प्रचीती रसिकांना दिली. रस्त्यावर जवळपास १० ००० चा जमाव बसला होता. कोण म्हणतो शा.संगीत लोकाभिमुख नाही? आपले कलाकार समर्थ नाहीत हेच खरे. रात्री २ ला ही अविस्मरणीय मैफिल संपली. बरोबर माझा एक इंग्रजाळलेला, घरचा श्रीमंत मित्र होता. त्याने अशी मैफिल पहिल्यांदाच ऐकली होती. त्यानंतर तो आंतरबाह्य बदलला. तो इतका अस्वस्थ झाला की घरी जायलाच तयार होईना. मला हया सगळ्या रेकॉर्ड हव्यात - मगच घरी जाणार. त्याला घेवून मग "हिराभूवन" (टिळकरोडचा डेक्कन कोपरा ) मध्ये जावून दुध प्यायलो आणि एस.पी कॉलेजच्या होस्टेल वर राहणाऱ्या एका मित्राच्या खोली वर गेलो. सकाळी १० वाजता अलूरकर मधून १०/१२ रेकॉर्ड घेवून तो घरी रवाना झाला. तो मित्र पुढे पं.जींचा भक्त बनला व त्याला शा.संगीताची गोडी लागली. पंडितजी ची "सावन की बुन्दनिय" ही केदार मधली द्रुत बंदिश तरी एकाच !

चौकटराजा Mon, 04/22/2013 - 07:56
भीमसेन जोशी याना मी अगदी पाच दहा फुटावर बसून गाताना पाहिले आहे. ऐकले आहे. १९७७ चे सुमारास त्यांचा वा माझा एक लहानसा वाद झाला. ( अर्थात त्यावेळी ते भीमसेनच फोनवरून बोलताहेत याची कल्पना नव्हती.)आपला लेख मात्र फार अपुरा वाटला. अर्थात त्यांचे विषयी इतके लिहिले गेले आहे की नव्याने काय लिहिणार ? ते गाताना एखाद्या शार्दूलासारखे दिसत व चेहर्‍यावर मधुनच एकदम निरागस भाव.एकदा एकाने त्याना विचारले " तुम्ही ठराविक रागच का गाता ?" त्यानी उत्तर दिले ते इतके निर्व्यज होते की ते म्हणाले " मला तेवढेच राग येतात व मला जे येते तेच मी गातो"