मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

१० वी 'क' - भाग १

किसन शिंदे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आज ३० एप्रिल! रिझल्ट्चा दिवस. मनात धाकधूक होतीच पास होईल की नाही याची. याचं कारण म्हणजे वर्षभर अभ्यासापेक्षा जास्त केलेली टवाळकी आणि वार्षिक परीक्षेला कठीण गेलेले बीजगणित आणि भूमिती! बाकीच्या विषयांचा तर तसा बरा अभ्यास केला होता पण आता पास होतो की नाही कोणास ठाऊक? च्यायला!! नापास झालो तर आईच्या हातचा खूप मार खावा लागेल आणि दादा टोमणे मारेल ते वेगळंच. आणि सगळ्यात वाईट म्हणजे आठवीतून पास होऊन नववीत आलेल्या मुलांची ती कुत्सित नजर. देवा हनुमंता, वाचव रेऽऽऽ देवा! शीऽऽऽ..ऐला काय घाणेरडे विचार आहेत. जाऊ दे. झटपट नाश्ता उरकून वेळेच्या अर्धा तास आधीच शाळेत पळालो. शाळेच्या फाटकावर माझ्यासारखीच बावरलेल्या आणि गोंधळलेल्या चेहर्‍यांची बरीच गर्दी उभी होती. काहींचे पालक सोबत आले होते, काही एकटेच आले होते. आपण पास झालोय आणि सगळ्या वर्गात आपला पहिला नंबर आलाय अशा थाटात काही स्कॉलर पोरं उगाचंच शायनिंग मारत उभी होती. 'पाल्या' पण आला होताच. पाल्या म्हणजे देवेंद्र पालेकर. माझा जिवश्च कंठश्च मित्र. आठवी आणि नववीच्या वर्षातला माझा बेंचसोबती. पालेकर एक नंबरचा स्कॉलर होता. अभ्यासू किडा. आठवीला असताना पहिल्यांदा आमची ओळख झाली. तेव्हापासूनच आम्ही एकत्र होतो. बापलेकरशी ओळख ही नववीच्या वर्षातली. नववीच्या सुरूवातीच्या दिवसात कधीतरी एक दिवस आमच्या बेचंवरची तिसरी जागा रिकामी होती आणि त्यादिवशी बापलेकर तिथे बसायला आला तो कायमचाच. मी, पालेकर आणि बापलेकर असे तिघेही एकत्रच शाळेत यायचो आणि एकत्रच घरी जायचो. सुरूवातीला अगदीच शामळू वाटणारा बापलेकर नंतर हळू हळू आम्हाला समजू लागला. चेहर्‍यावरून बराच सभ्य दिसणारा बापलेकर प्रत्यक्षात मात्र पक्का बेरकी होता. एके दिवशी इतिहासाच्या तासाला पाटील बाईंचा १८५७ चा राष्ट्रीय उठाव अगदी जोरात सुरू होता. सगळी मुलं शांत चित्ताने ऐकत होती. आमचंही बाईंच्या शिकवण्याकडेच लक्ष होतं. बापलेकरही बेंचवर कोपर रोवलेला डावा हात कानावर ठेऊन अगदी तन्मयतेने ऐकत होता. मला त्याची सवय माहीत होती म्हणून मला त्याच्या या एकाग्रतेने ऐकण्याचं कौतूक वाटलं, पाल्याला कोपराने ढोसून मी त्याच्याकडे लक्षही वेधलं. पाल्या हसला आणि हळूच माझ्या कानात कुजबूजला "साल्याकडे लक्ष देऊ नकोस. त्याने दप्तरात वॉकमन आणलाय आणि त्यात कॅसेट टाकून तो कुछ कुछ होता है ची गाणी ऐकतोय." कानात लावलेला इयरफोन लपवण्यासाठी त्याने डावा हात कानावर ठेवला होता याचा उगडला मला तेव्हा झाला. साला भेंचोत. "बापल्या कुठंय रे?" मी नख कुरतडत त्याला विचारलं. "माहित नाही रे. मी आज सकाळीच गावाहून रिझल्टसाठी आलोय." शाळेचे टोल पडले आणि पळत पळत आम्ही दोघंही वर्गात शिरलो. आमच्या वर्गाचे वर्गशिक्षक सुर्यवंशी सर अजून आले नव्हते. वर्गात नुसता गोंधळ चालू होता. प्रत्येकाला आपला काय 'निकाल' लागतो याची उत्सुकता कमी चिंताच जास्त होती. "शूऽऽऽऽ शांत बसा." अतिशय खणखणीत आवाजात बोलत सुर्यवंशी सरांनी वर्गात प्रवेश केला. एका हातात रिझल्टचा गठ्ठा होताच. सगळे एकदम चिडीचूप्प. "मला तुमच्याकडून जशी अपेक्षा होती तसा आपल्या वर्गाचा रिझल्ट लागलाच नाही. काही जण तर काठावर पास झालेत. शाळेत अभ्यासाच्या तासाला लक्ष कुठं असायचं तुमचं?" सरांनी आपल्या 'भाषणाला' सुरूवात केली. आणि मग आणखी पाच मिनिटं लेक्चर झाडून सरांनी एक एक रिझल्ट द्यायला सुरूवात केली. मोरे..पास चव्हाण..पास पवार..पास पालेकर...पास. पालेकरला ९०% पडले होते. सरांनी त्याचं खूप कौतूक केलं डोंगरे..नापास. 'गाढवा, मला वाटलंच होतं तु काय दिवे लावणार ते' सरांनी असं म्हणताच वर्गात एकच हशा पिकला. सगळी पोरं हसली खरी पण लगेच सरसावून बसली, कारण अजून बरेच रिझल्ट यायचे बाकी होते. साळवी...पास पवळे...काठावर पास शेरकर..नापास. मग शेरकरकडे पाहून सरांनी अशी काही मान फिरवली कि बिचार्‍या शेरकरला भयंकर लाजल्यासारखं झालं. बापलेकर काठावर पास झाला होता त्याची आई आली होती रिझल्ट घ्यायला. आयला! सगळ्यांचे रिझल्ट येताहेत, माझा कधी?? एकदम आतुरतेने मी माझ्या 'निकालाची' वाट पाहत होतो. आणि मग सर म्हणाले "बनकर..पास." जसे कानावर हे शब्द पडले मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. मन एकदम पिसासारखं हलकं हलकं झालं. सरांनी सांगितलेल्या नंतरच्या रिझल्टकडे आम्ही लक्षच दिलं नाही. आमच्या लगेच गप्पा सुरू झाल्या. सगळ्यांचे रिझल्ट वाटून झाले आणि पुढे येणार्‍या दहावीच्या वर्षासाठी शुभेच्छा देऊन सर निघून गेले. जाताना 'चांगला अभ्यास करा रे' असं सांगायलाही ते विसरले नाहीत. सगळ्यांना तुकड्या विभागून दिल्या. काही जण 'अ' तुकडीत गेले, काही जण 'ब' तुकडीत गेले. सुदैवाने आम्हा तिघांनाही १०वी 'क'च्या तुकडीत जागा मिळाली होती. जे पास झाले होते त्यांचा नुसता दंगा सुरू होता आणि जे नापास झाले होते कडूलिंबांच्या पाल्याचा रस प्यायल्यासारखा चेहरा करून बसले होते. पास झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ आम्ही वडापावची पार्टी करायचं ठरवलं. मग मी, पालेकर, पवळे, सामंत, अहिरे असे सगळे आनंदाच्या भरात उड्या मारतच रस्त्यापलीकडील वडापावच्या गाडीवर पोहचलो. "मी तर चाटे क्लासला अ‍ॅडमिशन घेणारे. माझे गणित, विज्ञान आणि इतिहास थोडेसे कच्चेच आहेत." बटार्‍या डोळ्याचा पवळे म्हणाला. "थोडेऽऽऽऽ..साल्या काठावर पास झालायंस या विषयात आणि म्हणे थोडेसे कच्चेच आहेत" एकाच वेळी किंचाळत आणि पवळ्याची नक्कल करत सामंत बोलला. आम्ही सगळे खदाखदा हसलो. 'मी अजून कुठे अ‍ॅडमिशन घेतली नाही पण मी कर्नावट क्लास लावणार आहे' पाल्या सुमडीत माझ्या कानात बोलला. मी फक्त तोंडाने ह्म्म केलं आणि त्याला एक डोळा मारत हसलो. १४ जुनला सगळ्यांनी नक्की शाळेत यायचं असं म्हणत आम्ही ऐकमेकांचे निरोप घेतले. घरी जाताना आईची थोडीशी गम्मत करायचं मी मनात ठरवलं. नापास झाल्यासारखा रडवा चेहरा करू घरात शिरायचं आणि तिला घाबरवायचं असं ठरवलं. त्याचबरोबर मला दादा काय म्हणतोय हे ही पाहायचं होतं. त्याप्रमाणे अगदी रडवेला चेहरा करून घरात पाऊल टाकलं. बॅट हातात घेऊन कुठंतरी क्रिकेट खेळायला निघालेले बंधुराजही मला पाहताच दारात थबकले. "काळ्या नापास झालास ना?" माझा असा चेहरा पाहून त्याने लगेच विचारलं. तोपर्यंत इकडे आईच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. तिला वाटलं मी नापास झालोय म्हणून असा चेहरा केलाय. "शेंडेफळ ना. तुम्ही लोकांनीच त्याला जास्त लाडावून ठेवलंय." त्यात दुसरीकडून दाद्याही यथाशक्ती तिचे कान फुंकतच होता. एवढा वेळ तोंडाने बडबड करत असलेल्या आईने मग कोपर्‍यातली काठी उचलत माझ्याकडे मोर्चा वळवला. आता मात्र टरकलो, म्हटलं काठीचा पहिला तडाखा बसण्याआधीच सांगून टाकावं म्हणून मग हातातला रिझल्ट वर उंचावत मी मोठ्ठ्याने ओरडलो, "मी पास झालोयऽऽऽऽ" "उगाच आगाऊपणा का करतोस मेल्या." रागाने थरथरत असलेल्या आईने तरीही माझ्या पाठीत एक जोरदार धपाटा मारला. मला आता मार बसणार नाहीये हे कळताच "हॅ...नाटक्या कुठचा." असं तोंड वेंगाडून म्हणत दादाने बॅट खांद्यावर टाकत घरातून पलायन केलं. तो दिवस खूप कौड-कौतुकात गेला. दहावीचं वर्ष सुरू होण्याआधी महिनाभर आराम मिळावा म्हणून दुसर्‍या दिवशी बॅग भरून आम्ही गावी निघालो. क्रमशः

वाचने 26570 वाचनखूण प्रतिक्रिया 72

इरसाल Tue, 09/11/2012 - 14:27
भारी लिहीलेय. थोड्याफार फरकाने हेच अनुभवलेय पण पालेकरच्या जागेवरुन.

In reply to by इरसाल

पियुशा Wed, 09/12/2012 - 15:00
एकदम आतुरतेने मी माझ्या 'निकालाची' वाट पाहत होतो. आणि मग सर म्हणाले "बनकर..पास." जसे कानावर हे शब्द पडले मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. मन एकदम पिसासारखं हलकं हलकं झालं. हा किस्सा तुमचा स्वतःचा आहे का हो किसन ? असल्यास तुमचे आडनाव शिंदे आहे ना ? ;)

पैसा Tue, 09/11/2012 - 18:09
शाळा खूप आवडली. किसना, खूपच छान झालीय कथा. आणि शेवट क्रमशः बघून बरं वाटलं. फक्त लटकत ठेवू नको!

अभ्या.. Tue, 09/11/2012 - 19:08
किसन देवा छानच लिहिले आहे हो. (एला एखादी शिरोडकर नव्हती का? ;-)) लवकर भेटा पुढचा भाग घेऊन.

In reply to by अन्या दातार

शाळे ची गोष्ट नववीतच घडते आणि नववीच्या रिझल्ट च्या दिवशी संपते. म्हणून विचारत आहेत हो ते. बाकी किसन असे (म्हणजे ललित लेखन) लिहितो हे माहित नव्हते. लिखाण आवडले. एक-दोन समीक्षकीय टिप्पण्या आहेत, पण त्या खाजगीत.

अर्धवटराव Tue, 09/11/2012 - 21:43
९ वी 'ब' म्हटलं असतं तर आमचीच कथा वाटली असती... अगदी पास व्हायचे वांधे वगैरे नव्हते, पण आमच्या तिर्थरुपांना आमचे पाळण्यातले पाय न दिसल्यामुळे त्यांनी उगाच अपेक्षांचे ओझे आमच्या टार्गट खांद्यावर टाकण्याचा अपराध केला होता... ते विमान आम्हि दाणकन खाली आपटले :D अर्धवटराव

प्रचेतस Tue, 09/11/2012 - 22:35
बर्‍याच दिवसांनी किसन शिंदे लिहिते झाले. कथेला छान सुरुवात झालेली आहेच. टंकाळा न करता पुढचे भाग पटापट येऊ द्यात. बाकी ही कथा काल्पनिक की सत्यघटनेवर आधारीत?

जुने दिवस आठवले. नवीन गुणार्थी वर्णव्यवस्था निर्माण झाली होती. ८० टक्क्यांच्या अलीकडील सवर्ण जे तिन्ही तुकड्यातून मोजून १५ होते आणि उरलेले मागासवर्गीय सवर्ण लोकांचा काय रुबाब त्यांना सर्व खोड्या , गैरहजर राहणे माफ होते. शालांत परीक्षेत एक दिवस वृत्त पत्रात शाळेचे आणि ह्या सवर्णांच्या मधील कोणाचे नाव झळकावे म्हणून शाळेतील सत्ताधारी आणि हे मुठभर ह्यांचा यत्न चालायचा. बाकीचे शाळेत हजेरी बुक भरायला यायचे. कमी मार्क मिळाले म्हणजे देशद्रोह किंवा बाहेर शेण खाऊन आल्याच्या अविर्भावात पालक पाल्यांचा पालापाचोळा करायचे.

नाखु Wed, 09/12/2012 - 08:47
११ सप्टेंबर २०१२... किसनाचा ले़ख वाचला आणि शाळेची आठवण खपली निघाली ..वैताग साला हे लोक असे कही ल्हितात आणि आम्च्या डोक्याला शॉट्...जाऊदे उगी र्‍हावे .... १२ सप्टेंबर २०१२.. शाळेची आठवण असलेले आपण एकटेच नाही हे पाहून बरं वाटल.( च्यायला आपल्याला का नाही सुचत अस चांगल चुंगल लिहायला... (पुढच्या सहलीला किसनदेवाची शिकवणी लावणे आले)....

चावटमेला Wed, 09/12/2012 - 10:52
लेख आवडला. सुरुवात छान झालीये. बाकी ते शिरोडकर ताईंचं विसरू नका ;) पुलेशु

मी_आहे_ना Wed, 09/12/2012 - 12:04
किसनदेवा...मस्त. येऊद्या लवकर पुढचा भाग. (नॉस्टॅल्जिक करून मनाचा ठाव घेणार्‍यांमधे तुमचाही समावेश) आम्हीही "१०वी क" वाले, पण आम्हाला ९वी रिझल्ट नंतर लगेच अर्धा दिवस शाळा सुरू केलेली (व्हेकेशन बॅच), त्यामुळे त्या वर्षी सुट्टीत कुठे जाणे नव्हते झाले :(

विजय मुठेकर Wed, 09/12/2012 - 15:58
किसनदेवा...... शाळेत परत घेऊन गेल्याबद्दल धन्यवाद. आमच्या शाळेत निकाल रोल नंबरनुसार देत. या शाळेत तसे देत नव्हते वाटते................. (खूप वेळाने बनकर निकाल घ्यायला आले म्हणून जरा किडा वळवळला......) बाकी शाळेत परत घेऊन गेल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.......

गणेशा Wed, 09/12/2012 - 18:43
किस्ना .. लिखान आवडले.. स्वताचेच प्रतिबिंब त्यात पाहिले .. मस्त.. ऊरुळी कांचन ची माझी शाळा आठवली ... ९ वी 'ह' आठवला .. अआणि नववी नध्ये पहिल्यांदाच आलेला पहिला नंबर आठवला.. ५ वी मध्ये असताना , पहिला नंबर जेंव्हा यीइल तेंव्हा घड्याळ घेवु असे अश्वासन मिळाले होते ते पुर्ण झाले, दहावी मध्ये असताना त्याच घड्याळा सहित आणि नविन शुज सहित प्रवेश झाला.. वर्गातील सर्व मित्र ही एकाच वर्गात आले .. १० 'ई'. ९ वी - ते १२ वी मधील तुफान गोंधळ घातलेली वर्षे आठवली .. तु असेच मस्त लिहित रहा.. मनापासुन वाचत आहे...

In reply to by प्रचेतस

५० फक्त गुरुवार, 09/13/2012 - 10:10
ह ह हुच्चचा असं असेल ओ ते, तुम्हाला काय माहित नाय, कविता केल्यात का तुम्ही कधी, नुसती विडंबनं मग तुम्हाला काय कळणार 'ह' तुकडी म्हणजे काय ते.

In reply to by प्रचेतस

गणेशा गुरुवार, 09/13/2012 - 13:39
मुलींच्या तुकड्या अ,ब्,क,ड अश्या होत्या. आणि टेक्निकल घेतलेले असल्याने त्याच्या विषयानुसार मुलांच्या तिकड्या केल्या गेल्या होत्या. कार्पेंटर हा ट्रेड असल्याने आम्ही 'ह' मध्ये. अ ब क ड ई फ ग ह य ज अश्या तुकद्या होत्या. य आनि ज ह्या टेक्निकल न घेतलेल्या शेती हा विषय घेतलेल्या तुकद्या होत्या.

In reply to by गणेशा

५० फक्त गुरुवार, 09/13/2012 - 14:20
अ,ब, क, ड अशी नावं देण्याची पद्धत ए,बी,सी,डी या इंग्रजी वर्णमालेचं भाषांतर असेल तर, वाय कुठुन आलं मध्येच जे च्या आधी, गणेशराव, मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांच्या सुदृढीकरणाच्या दृष्टीनं तुम्ही माहिती अधिकाराखाली तुमच्या शाळेला एक पत्र पाठवावे आणि सदर प्रकरणाच्या बाबत एक अहवाल अविमसंचामासंला येत्या ३० दिवसांत सादर करावा.

Pearl गुरुवार, 09/13/2012 - 08:22
('साला ***' हे वगळता) छान लिहिलं आहे. आता तुम्ही म्हणाल कथेची गरज वगैरे म्हणून. पण तरीही *** आवडलं नाही. 'फुल्या फुल्या फुल्या' पण चाललं असतं. बाकी चांगली कथा. पु.ले.शु.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

स्पा गुरुवार, 09/13/2012 - 14:45
हो किसन अगदी साजूक तुपातल लिही हो.. शिवी वेग्रे म्हणजे हे तुझे अगदी अतीच हो.. इथे सभ्य लोक वावरतात .. जे आयुष्यात कधीही शिवी देत नाही . लेखकाने जस आहे तसं व्यक्त होण वेग्रे कल्पना जुन्या झाल्या . अवांतर श्री अशोक पाटील या एका जेष्ठ सभासद्ची प्रतिक्रिया या अनुषंगाने आठवली अवांतरच आहे , पण विषय निघाला म्हणून ती इथे पेस्ट करतोय स्पा... 'अवांतर' म्हणून मांडलेले मत तुम्ही अगदी १००% म्हणत स्वीकारले हे वाचून मला आनंद झाला. किंबहुना तुमच्यातील लेखक 'तसे' लिहिले गेले पाहिजे होते हे मान्य करतो ही बाब विशेष आहे. वरील आणखीन् एका प्रतिसादात श्री.अभिजित मोहोळकर म्हणतात "नाही वाटलं तर नका लिहू पण ओरडणार्‍यांकडे लक्ष देऊन एडीट करू नका..." त्याचाच पाठपुरावा प्रत्येक होतकरू लेखकाने केला तर त्याच्यातील अनुभवक्षमतेला जी शाब्दिक धार येईल तिने कथेचे मोल निश्चित्तच वाढते. लेखकाने वाचकाचा कधीच अनुनय करू नये या मताचा मी आहे. वाचकाला हवे तेच द्यायचे असेल तर लेखक लेखक न राहता कारागीर बनतो आणि हलवाई जसा ग्राहकाच्या मर्जीनुसार जिलेबीचा पाक तयार करतो, तद्वतच मग लेखकही 'दिवाळी अंक स्पेशालिस्ट' बनत जातो. जी.ए.कुलकर्णी म्हणायचे, "माझे प्रसिद्ध झालेले लेखन मी कधीच वाचत नाही. एकदा का हस्तलिखित त्या त्या संपादकाकडे पोस्टाने पाठवून दिले की माझी कथाकार म्हणून असलेली जबाबदारी संपली...त्यावरच्या प्रतिक्रिया मग ते देणारे जाणोत वा संबंधित मासिकाचे संपादक." त्यांच्या 'फुंका' या कथेतील एक प्रसंग या निमित्ताने तुमच्या अवलोकनार्थ देतो : यमाई जोगतिणीच्या परड्यातील एक भोपळा कथेचा नायक संगा हळूच चोरतो. ते कृत्य यमाई पाहते....आता त्या दोघांतील रोखठोक संवाद पाहा : "अरं, तुझं मढं पडलं हाळ भावीत ! भोपळं चोरायला चांगला सोकावलास नव्हं ! चार दिवस पाळतीवर हाय ही यमनी, ठाऊक हाय ? आता खाली जाऊन गावात बोंबलून नाही आले तर यमनी जोगतीण नव्हं मी !" यमनीने त्याच्याजवळ आपली काठी दणादणा आदळली. "जा ग जा थेरडे, मी कशाला घेऊ तुझा भोपळा ! माझ्या परड्यात गावजेवण घालायला बक्कळ भोपळे पडलेत !" मागे सरत संगा म्हणाला. यमनीने त्याच्यासमोर वर्तुळाकार हात नाचवले. ती म्हणाली, "गावजेवण घालणार्‍या घुबडाचं तोंड बघ !तुझ्या घरी दगडाचं जातं उपाशी मरेल ! मग हा भोपळा काय तुझ्या ढुंगणातनं पडला व्हय रे सोद्या ?". ~ अशी रोखठोक थेट भाषा या संवादात अगदी जशीच्यातशी उतरल्याने यमनीचा संताप चटदिशी वाचकाच्या रक्तात उतरतो. 'तुझं मढं' च्या जागी 'तुझा देह' घालून पाहा, सार्‍या वाक्याचा तोल बिघडून जाईल. तिच गोष्ट 'मग भोपळा काय तुझ्या ढुंगणातून पडला व्हय रे सोद्या ?" ची. ढुंगण नामाऐवजी फुल्या वा पृष्ठभाग हे शब्द जी.ए.ना वापरता आले असते, पण नाही, त्यानी एक लेखकाचे स्वातंत्र्य म्हणून नेमके तेच शब्द तेथील उद्वेग प्रकटण्यासाठी घालणे आवश्यक वाटले, जे वाचकांनी जशेच्यातसे स्वीकारले.

In reply to by स्पा

Pearl Fri, 09/14/2012 - 02:25
(कथेची गरज म्हणून वापराव्या लागणार्‍या) सरसकट सगळ्या शिव्यांना विरोध नाही. कथेत एकही अपशब्द, शिवी अजिबात वापरूच नये असं म्हणणं नाहीये. पण आई-बहिणीवरून (and,or) लैगिकतेवरून दिल्या जाणार्‍या शिव्यांना नेहमीच विरोध असेल. >>इथे सभ्य लोक वावरतात .. जे आयुष्यात कधीही शिवी देत नाही .>> ज्यांना लेखातल्या '***' ह्या प्रकारच्या शिव्या म्हणजे अतिशय नॉर्मल बाब (किंवा सभ्य बाब), 'त्यात काय एवढं', असं वाटतं असेल त्यांनी घरी एकदा आई, बहिण, बायकोसमोर (एखाद्याबद्दल तुमचा राग व्यक्त करताना) सहज म्हणून ह्या *** टाइप शिवी वापरून पहा आणि काय प्रतिक्रिया व्यक्त होते ते पहा. आणि ठरवा नॉर्मल आहेत का या शिव्या. आणि हो खरचं अशा *** टाइप अर्वाच्य शिव्या उभ्या आयुष्यात कोणालाही दिल्या नाहीयेत. राहून राहून आश्चर्य वाटतं एका गोष्टीचं की आपली संवेदनशीलता खरोखरच इतकी बोथट झाली आहे का की एखाद्या शिवीचा अर्थ (किती हिन आहे हे) माहिती असूनही आपल्याला त्यात काहीच वावगं कसं वाटत नाही. ती शिवी वाचायला जराही त्रास कसा काय होत नाही. असो. इथं वादविवाद घालायचा नव्हता, नाही किंवा वाढवायचाही नाही. कथेबद्दल कोणाला काय वाटतं ते सांगायचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. मी माझं मतं मांडलं होतं. पण प्रत्येक वेळी निष्कारण वाद घालायलाच लोकांना आवडतं त्याला काय करणार.

In reply to by Pearl

स्पा Fri, 09/14/2012 - 09:42
ज्यांना लेखातल्या '***' ह्या प्रकारच्या शिव्या म्हणजे अतिशय नॉर्मल बाब (किंवा सभ्य बाब), 'त्यात काय एवढं', असं वाटतं असेल त्यांनी घरी एकदा आई, बहिण, बायकोसमोर (एखाद्याबद्दल तुमचा राग व्यक्त करताना) सहज म्हणून ह्या *** टाइप शिवी वापरून पहा आणि काय प्रतिक्रिया व्यक्त होते ते पहा. आणि ठरवा नॉर्मल आहेत का या शिव्या. आपणाला वरील प्रतिसाद शष्प कळला नाही असेच म्हणावे लागेल वरील शिव्या या नॉर्मल आहेत, असे मी कुठेही म्हणाल्याचे मला आठवत नाही , असो बाकी तुम्ही आया बहिणींवर घसरल्या आहात म्हणून विचारतो असे तुमच्या घरचे भाऊ , वडील, नवरा.. एखादा चित्रपट , शिवराळ कादंबरी वाचून ते करमणूक म्हणून तिथेच सोडून न देता घरी तसेच शब्द वापरतात वाटत नाही तसा अनुभव असेल तर हो म्हणा.. आमचे शब्द आम्ही मागे घेतो अशा *** टाइप अर्वाच्य शिव्या उभ्या आयुष्यात कोणालाही दिल्या नाहीयेत. हॅ हॅ म्हणजे इतक्या अर्वाच्य नसल्या तरी तुम्ही शिव्या घालता म्याडम श्या ह्या श्या असतात यावरून एक अवांतर जोक आठवला एक बै दुसर्या बै ला म्हणते शी तुमचा राजू किती घाण घाण शिव्या देतो तेंव्हा समोरची बै म्हणते , जौंद्याहो लहान आहे तो.. मोठा झाला कि चांगल्या चांगल्या शिव्या देईल तशी गत झालीये बै तुमची .. असो.. वाद घालण्यात मलाही रस नाही.. चालुन्द्या

In reply to by स्पा

Pearl Fri, 09/14/2012 - 18:36
>>हो किसन अगदी साजूक तुपातल लिही हो.. शिवी वेग्रे म्हणजे हे तुझे अगदी अतीच हो.. इथे सभ्य लोक वावरतात .. जे आयुष्यात कधीही शिवी देत नाही >> या तुमच्या उपरोधिक वाक्यावरून तरी ' '***' ह्या प्रकारच्या शिव्या म्हणजे अतिशय नॉर्मल बाब , 'त्यात काय एवढं' असं तुमचं मत असावं असचं वाटतं. तस तुमचं मत नसेल तर उत्तमच आहे. >>म्हणजे इतक्या अर्वाच्य नसल्या तरी तुम्ही शिव्या घालता>> आमच्या शिव्यांची मजल मूर्ख, गाढव,.... वगैरे इतपर्यंतच. बाकी तुम्ही अजिबातच कधी अपशब्द वापरला नाही हे जाणून अंमळ आनंद जाहला. असो.

In reply to by Pearl

बॅटमॅन Fri, 09/14/2012 - 13:13
पण प्रत्येक वेळी निष्कारण वाद घालायलाच लोकांना आवडतं त्याला काय करणार.
नेमके आमच्या तोंडचे वाक्य चोरलेत बघा ;) अर्थात डायरेक्शन उलटी हेवेसांनल.

In reply to by स्पा

हो किसन अगदी साजूक तुपातल लिही हो.. शिवी वेग्रे म्हणजे हे तुझे अगदी अतीच हो.. इथे सभ्य लोक वावरतात .. जे आयुष्यात कधीही शिवी देत नाही . लेखकाने जस आहे तसं व्यक्त होण वेग्रे कल्पना जुन्या झाल्या .
मला उद्देशून लिहिले असशील तर कमाल आहे, नाहीतर चालू देत.....

In reply to by बॅटमॅन

तसे नाही. या पेक्षा अर्वाच्य शिव्या असलेले साहित्य वाचले ऐकले आहे. मिपा पुरसे बोलायचे झाले तर गविंचे काही लेखन बरेच शिव्या प्रचुर होते. तिथे मी असे कधी म्हटले नाही. लेखनात किंवा नाटक सिनेमात शिव्या येतात तेव्हा त्यात एकदम फ़्लुएन्टली आल्या पाहिजेत (असे माझे मत आहे). म्हणजे ती शिवी नसती तर त्या वाक्याला ते वजन आले नसते अशा पद्धतीची. उदाहरणे देतो. नाटक : कुसुम मनोहर लेले पात्र :- भाच्या खोटे संवाद :- "चौपट लाफे मारीन भडव्या.... तू पक्का मादरचोत, काहीच पुरावा ठेवला नाहीस....काय रे लेल्या भोसडीच्या, ल्युकास कंपनीत इन्जीनीअर आहेस न भडव्या" गिरीश ओक यांनी हे काम असे काही केले होते की अजिबात अनैसर्गिक वाटायचे नाही. हे नाटक घरच्यांसमोर कैकदा पाहिले आहे (सौजन्य प्रभात वाहीनी). काहीही खटकले नाही. यानंतर काही काळ आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये शिव्या घालायची फ्याशन आली होती. त्यातला एक किस्सा. एक पात्र म्हणते, "अरे तू एकदम (पॉज) चूssssतिया आहेस". यातील चू तो अभिनेता अवाजवी रीतीने ताणत होता. आणि प्रत्येक शिविनंतर प्रेक्षागृहातून हशा, पण संवादाला नाही तर त्याच्या पद्धतीला. एकांकिका पडली हे सांगायला नकोच. इथे तशी फ़्लुएन्सी वाटली नाही, म्हणून म्हटले.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बॅटमॅन Fri, 09/14/2012 - 13:15
फ्लुएन्सीचा मुद्दा असेल तर मग अंशतः सहमत आहे. व्यक्तिशः पहायचे झाले तर अँटी-शिवी सूर जास्त दिसला म्हणून म्हणालो इतकेच.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

५० फक्त Fri, 09/14/2012 - 14:22
का ओ विमे, त्या प्रभात वाहिनीच्या आठवणी काढताय उगाच, असो. कुमले हे एक खुप छान नाटक आहे हे नक्की.

In reply to by Pearl

मन१ Fri, 09/14/2012 - 07:52
सहमत. अगदि शिव्यांच्याच बाबत नाही,पण त्याच धर्तीवर म्हणता येइल असं मला वाटलं तेव्हा दोन ओळिंत http://www.misalpav.com/node/22251#comment-412809 इथे लिहिलं होतं. तेही एकूण लिखाण म्हणून आवडलं होतच. पण काही भाग टाळता आला तर उत्तम.

In reply to by Pearl

मन१ Fri, 09/14/2012 - 08:00
सहमत. अगदि शिव्यांच्याच बाबत नाही,पण त्याच धर्तीवर म्हणता येइल असं मला वाटलं तेव्हा दोन ओळिंत http://www.misalpav.com/node/22251#comment-412809 इथे लिहिलं होतं. तेही एकूण लिखाण म्हणून आवडलं होतच. पण काही भाग टाळता आला तर उत्तम. (अर्थात मी स्वतः ही लिहिण्याच्या भरात काही ललिहून जातो ह्याची कल्पन आहे.)

प्रास Fri, 09/14/2012 - 10:42
किसनद्येव लई फॉर्मात आल्याचं कळतंय. येऊ द्या भाई, पुढला भाग लवकर. वाट बघतंय हं मी....!

खुशि Mon, 09/17/2012 - 14:25
किसन, छान लिहिले आहेस. माझ्या लहानपणची आठवण झाली.तेव्हा ना मुली जास्त शिकल्या नाही तरी चालते अशा विचारान्चे काही लोक अजुनही होते. माझ्या मोठ्या बहिणीलाही वडिलानी सातवी पर्यन्तच शिकवले होते.पण आता काळ बदलला आहे असे म्हणून मला हायस्कुलला घातले होते पण दरवर्षी वार्षिक परीक्षा झाली की रिझल्टच्या आधी नापास झालीस तर शाळेतुन काढुन टाकेन अशी धमकी देत असत.पण मी नापास झाले नाही आणि त्यानी शाळेतुन काढले नाही. तुझे लिखाण वाचुन लहानपणची ही आठवण झाली.

मालोजीराव Fri, 01/04/2013 - 15:57
१)पास आहोत पण किती टक्के पडलेत २) नापास आहोत पण किती विषय उड्लेत ३) पास आहोत कि नापास आहोत , हे रिझल्ट ऐकणारे तीन प्रकारचे श्रोतेगण त्यातला आमचा प्रकार तिसरा...त्यामुळे लेख विशेष आवडला :)