मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

घरचं जेवण

मन१ · · काथ्याकूट
आत्ता पेठकरांचा इडलीवरचा धागा पाहून काहीतरी आठवलं. जे आधीच हरवून बसलोय; ते घालवलय ह्याची जाणीव झाली. तुम्ही रुढार्थानं म्हणता तशी माझी आई खूप कर्तबगार स्त्री वगैरेच्या व्याख्येत येत नाही. सज्जन, सालस, पापभीरु आणि वत्सलता म्हणजे काय हे पहायचं तर आमच्या मातोश्रींकडे पहावं. परवा हापिसात गप्पा मारताना कुणीतरी स्वयंपाकाचा विषय काढला. काहीतरी खटकलं. एरव्ही कधीही काव्य विभाग आणि पाकृ ह्यांच्या वाटेला न जाणारा मी काहीतरी हुडकण्यसाठी म्हणून, काही कानोसा घेण्यासाठी म्हणून पाकृ विभागात डोकावलो. खात्री झाली. . गप्पा मारताना प्रथमच मला जाणवलं की "तिखट कांडायला कधी घेतेस" हे माझ्या आज्जीचं वाक्य आता दुर्मिळ होणार होतं. गरम मसाल्याचा तिखट्-तेलकट वास पुन्हा नाकात शिरणार नव्हता. माझी आई तिखट घरी बनवायची.(ते वाळक्या लाल मिरच्या आणून स्वतः दळून घेणं वगैरे.) पण अर्थातच माझी आजी आम्ही कसे मुसळानी गावाकडे हातानी कुटत असू मिरच्या(तुमच्यासारखं गिरणीतून आणत नाही) हे ऐकवायची. ते दगडफूल का तमालपत्र का काहीतरी म्हणतात ते मसाल्याचं पान घरात आणून आम्ही "काळा मसाला" घरातच बनवायचो. . हळकुंड आणून घरगुती हळदही बनवली जायची. . अजून एक कुठलं तरी काहीतरी आणून आई औषधी म्हणून ठेवायची आंबेहळ्द म्हणे. नक्की कशासाठी वापरातात ठाउक नाही. पण घरात एका छोट्या बाटलीत तो प्रकार भरुन ठेवलेला असायचा. थोडंफार मध असायचं.(हे मात्र बहुतांशी हवाबंद असलेलं खरेदी केलेलच.) . आईच्या हातच्या साध्या फोडणीलाही आणि साधे वरणालाही स्वर्गीय चव. तृप्ती मिळालीच पाहिजे खाल्ल्यावर. फोडणीही कोणती? तर नेहमी मोहरीचीच असे नाही, कधी जिर्‍याचीही असायची. क्वचित तुपाची फोडणी होइ. आई कधी मुगाची खिचडी (दाल खिचडी) करी. त्यावर नुसतं चमचाभर तूप आणि सार. व्वा. हे आनंदी जीवनाचं सार. . मागची पाचेक वर्षे दाल फ्राय खातोय. तक्रर अशी नाही. तेही अन्नपूर्णेचच दान. पण अचानक कधी घरच्या वरणाची आठवण होते. चिंचगुळाचं वरण आंबट गोड, गुळमट चवीचं वरण. कधी साधे वरणाला नुसती जिर्‍याची फोडाणी आणि हल्काशी मीठ- मिरे मिश्रण भुरभुरलेलं. टॉमॅटोचं आंबट वरण म्हणजे आमचा जीव की प्राण. . कधीकधी नुसतं "मुद्दा वरण", मुद्दा वरण म्हणजे हाटलेलं घट्ट वरण. आणी त्यावर घरी बनवलेला "काळा मसाला" मी हट्टाने घ्यायचो. तिखट लागायचं पण खायचोच. कधी कधी कच्च्या तेलासोबत मस्त लागायचं. पण हे घरी आवडायचं नाही. . लोणचं ही सुद्धा "विकत आणायची वस्तू " नव्हती. लोणचं ही "मुरवायची" कला होती. . लोणी-तूप हे विकत आणायचं असतं हे रूम वर राहू लागल्यापासून समजलं,. तोवर पिवळ्या रंगाचं "बटर" लोणी समजून खाल्लं नव्हतं. आई सायीचं दही लावायची. घरी स्वतः मी कित्येकदा घुसळायला बसायचो. आम्ही सायीचं दही घुसळून लोणी काढायचो. लोणी "कढवून" तूप काढायचो. तूप कढत असतानाही, कच्चं असतानाही त्यात चमचा बुडवून खायची आमची दांडगी हौस. त्याबद्दल धपाटेही खाल्लेत. तूप बनल्यावर खाली उरते ती "बेरी" खरवडून खायची. मस्त गुळासोबत टाकलीत तर क्या केहने! माझी आवड पाहून शेजारच्या किनीकर अन वैद्य काकूही त्यांच्याकडे तूप- लोणी बनू लागलं की मला आवर्जून बोलवत. "हल्ली आमच्याकडं असं आवडिनं खाणारं कुणीच नाही" असं काहीतरी काकू म्हणायच्या. "घरी दोन दिवस कुठला जिन्नस टिकू देइल तर शपथ" असं उलट आई म्हणायची. आईचा वैताग काकूंना आनंद वाटायचा. ह्या काकूंच्या आदरातिथ्याच्या बदल्यात बाजारातून येताना त्याचं एखादं पत्र टाकणं, लगे हाथ आमच्या सामनासोबत त्यांचय खातेदारीवर त्यांचं सामान उचलणं अशी कामं करावी लागायची. घरगुती चविष्ट प्रकारांच्या मोबदल्यात ही कामं काहीच नवह्ती. . सणांना मजा असायची. पुरणाचे कणकेत उकडून तयार केलेले "दिंडे" नागपंचमीस मिळायचे. झोप येइस्तोवर हादडायचो. गौरे-गणपतीतही खाणे हे स्वर्गसुख. . चैत्र महिन्याच्या आसपास कधीतरी कैरी आणि डाळ ह्यांचं आईच्या हातून जमलेलं ओलसर मिश्रण म्हणजे यंव रे यंव. . कधी कांद्याच्या पातीचा घोलाणा होइ. कच्च्या पाती कापून त्यावर थोडीफार फोडणी आणि मीठ. बस्स. मस्त लागाय्चं. . कधी कांद्य्चाच्या पातीची "भरडा भाजी " मिळे, तर कधी ढोबळा मिरचीचा भरडा. कुठलीही भरडा भाजी खावी तर दह्यासोबतच हे माझं तेव्हापासून तत्वच ठरलं. अमराठी रुम मेट्सच्या घरातही ह्यासदृश प्रकार बनत असावा. पण त्यांना ती वस्तू explain करताना मला नाकी नौ आले होते. डाळीचे पीठ आणि इतर भाज्या ह्यांचे मुळात कॉम्बिनेशन करावेच कशाल हेच तो विचारित राहिला. मला कधीच धड त्याला सम्जावता आले नाही. . पालक, मेथी, चुका, अंबाडी ह्यातली कुठलीही भाजी किंव तशी इतर कुठलीही रानभाजी पाअनात पडली तर पूर्वी चेहरा वाकडा होइ. पण नक्की हा प्रकार कधी आवडायला लागला ते सांगता येणार नाही. परवा जाणवलेली गोष्ट म्हणजे मी चक्क चक्क अळूची भाजी आवडिने, मिटक्या मारत खात होतो! काय होतो मी, काय झालो मी. . बाहेरच्या कोशिंबीरिच्या चवीबद्दल सुरुवातीस माझी तक्रार होती. काहीतरी खटकत होतं. नंतर जाण्वलं मला ज्या कोशिंबिरीची सवय आहे, त्यात डाळ आणि दही दोन्हीही वापरलेले असतात. हाटेलात बहुतांश ठिकाणी दहि + काकडी/टोमॅटो/कांदा ह्यास कोशिंबीर म्हणतात. म्हणून मला त्रास होइ. नंतर अर्थातच त्यचीही सवय झाली. . कधी कधी मला आवडतो म्हणून भात कुकरमध्ये न करता भांड्यात शिजवला जाइ.(steam rice न करता boiled rice बने. आजही बहुसंख्य दाक्षिणाट्यांत घरी boiled riceच बनतो हे नंतर सहकार्‍याकडून समजले.) भांड्याला लागलेली खालची भाताची "खरवड" सुध्हा चविष्टच. . संक्रांतीला बाजरीच्या भाकर्‍या होत. दूध आणि गुळासोबत मस्त लागत. कधी आळूचेसुद्धा भजे बनवले जात. मला आवडत. . हल्ली हळद, तिखट्,मसाला, लोणचे,लोणी(यलो बटर),तूप सगळं खरेदीच होताना दिसतं. त्यामुळे कामातही सुटसुटितपणा येतो असा मुद्दा सहकार्‍यांशी गप्पा मारताना निघाला. . पिठलं बाहेरचं खाल्ल्यावर माझ्या लक्षात आलं की माझ्या घरी दोन्ही प्रकारचं पिठलं पूर्वीपासून बने. साधं (पुण्यातल्या काही मराठी हाटेलात मिळतं; मला आवडतं) तसं आणि दुसरं म्हणजे तव्यावरचं, दह्यातलं पिठलं. ह्याचीही खरवड मस्त लागाय्ची. आख्खा तवा खरवडून फस्त केला जायचा. पिठल्यात दही घालतात हेच मुळात बाहेरच्या निम्म्या पब्लिकला ठाउक नाही असं नंतर जाणवायला लागलं. पुन्हा एक धक्का. . कढी...पिवळी कढी नि पांढरी कढी. वरती लिहिलेलं लोणी काढल्यावर उरतं ना त्या ताकाचीही कढी व्हायची. भरगच्च होइस्तोवर तीही हाणली जायची. बाहेर पडल्यावरही गुजराती-राजस्थानी थालीच्या निमित्ताने हा माझा आवडता पदार्ध मात्र मला कायम मनासारखा मिळत आला. . गह्री बनवलेल्या कुठल्या पदार्थाबद्दल शेवटची तक्रार मी कधी केलीये, करावी लागलिये हेच आठवत नाही.आठवतय तेव्हापासून जेव्हा केव्हा खायला मिळालं तेव्हा साधसंच पण छान असं मिळालेलं. आता परत गेलो की भरडा भाजी, कढवलेलं तूप नि गरमागरम कढी ह्यावर तुटून पडायचं आहे. "व्हेज मध्ये व्हरायटी नाही" असं कुणी म्हटलं की गंमत वाटते ; कधी त्याला वैविध्यपूर्ण घरचं व्हेज जेवण मिळालं नस्सावं ह्या अंदाजाने वाईटही वाटतं.

वाचने 62360 वाचनखूण प्रतिक्रिया 121

गणपा Sun, 09/02/2012 - 19:35
सरळ मनातुन आलेला ओघवता.. किंचीत नॉस्टॅल्जीक करणारा लेख आवडला रे मनोबा. आमच्याकडे अजुनही मसाले, पापड, कुरड्या, तुप घरच्या घरी बनवले जातात. पण हे करणारी ती शेवटची पिढी असावी. हल्लीच्या इंस्टंट आणि धावपळीच्या जगात आम्ही हे कितपत टिकवून ठेवू शंकाच आहे.

अन्या दातार Sun, 09/02/2012 - 19:56
गणपा व प्यारे दोघांशी बाडीस. मी जेंव्हा घरी जातो तेंव्हा आई विचारते, काय स्पेशल बनवू? माझे एकच उत्तर असते: तु नेहमीचेच कर. मला सध्या तेच विशेष आहे.

प्रभाकर पेठकर Sun, 09/02/2012 - 21:18
आमच्या मागच्या पिढीने हे सर्व केले आहे. घरच्या घरी सर्व पदार्थ बनविणं, वाळवणं करणं, वर्षभराची बेगमी करून ठेवणं वगैरे वगैरे सर्व आमच्या घरच्या महिलांनी केले आहे. ताकदीची/घरसफाईची कामे पुरुषांकडे असायची. जाडे मीठ आणून ते पाट्यावर वाटून बारीक करून घेणे, नारळ फोडून देणे, वाळवणावर लक्ष ठेवणे इ.इ. कामे मीही केल्याची मला आठवतात. पापडाच्या लाट्या कच्च्या तेलात बुडवून खाणे. उडदाच्या पापडाच्या लाट्या मला खुप आवडायच्या (पचायच्या नाहीत, ते वेगळे), तादूळाच्या पापडाचे उकडलेले पीठ, कुरडयांचे सत्व इ.इ. तेलात बुडवून खायचो. कैरीचे लोणचे, लिंबांचे लोणचे, मिरच्यांचे लोणचे, मुरंबा, छुंदा हे उन्हाळ्यातील पदार्थ. तर दिवाळीला सगळा साग्रसंगित फराळ घरी तयार व्हायचा. चकल्या पाडायला मीच पुढे असायचो. (बहिणही असायची पण पुरुषांत मी एकटाच), अनारसे तळताना म्हणे हसायचे नाही नाहीतर ते हमखास फुटतात. मला तर उगीचच हसू यायचे. मग आई, मला स्वयंपाकघराबाहेर पिटाळून लावायची. दूसर्‍या दिवसांच्या भाज्या निवडायला रात्री आम्ही सर्वजणं कंदिलाच्या प्रकाशात बसायचो. कधी कधी मोड आलेले वाल सोलायचे, तर कधी गवार. त्याहून जीवाला हुरहुर लागते ती दिवाळीच्या आठवणींनी. अंगणात मी किल्ला बनवायचो. त्यावर मेथी पेरून शेती व्ह्यायची. अंगणात शेणसडाही करायला लागायचा. ते ही पहाटेच्या थंडीत. गाई शोधून त्यांचे शेण गोळा करून आणायचे. पाणी घालून मिसळायचे आणि तांब्याने सडा घालायचा. सडा घालून झाला की आई नाहीतर ताई मस्त रांगोळी काढायची. आणि माझं दरवर्षीचे ठरावीक काम. पणत्यांमध्ये तेल भरून, वाती लावून त्या पेटवायच्या आणि सर्व पणत्या (जवळ जवळ ३०-३५ असायच्या.) व्हरांड्याच्या कडेकडेने लावायच्या, मागच्या दारी पायर्‍यांवर ठेवायच्या. आंघोळीला मोती साबण आणि डोक्याला लावायला टाटाचे सुवासिक कॅस्टर ऑइल. उटण्याचा वास. आंघोळ करताना बहिणीने ओवाळलेली फुलबाजी. त्याची फुलं अंगावर उडायची त्याचे ते सुखकारक चटके. आंघोळी नंतर नवेकोरे (कोरेपणाच्या वास आणि स्पर्शासहित) कपडे लेऊन कानात अत्त्तराचा फाया वगैरे. मग सर्वांचा एकत्र फराळ आणि मी फटाके उडवायला मोकळा. हल्ली तशी थंडी पडत नाही. बाहेरून आणलेल्या फराळाबद्दल प्रेम वाटत नाही. फ्लॅट संस्कृतीत अंगणच उरलं नाही तर सडा काय टाकणार आणि सारवणार काय. आठवायला बसलो तर एक स्वतंत्र धागा होईल. पण खुप दिवसांनी जुन्या स्मृती जाग्या झाल्या. बरं वाटलं.

In reply to by प्रभाकर पेठकर

सस्नेह Sun, 09/02/2012 - 22:04
अगदी अगदी ! आठवणींना उजाळा देऊ तशा त्या घरच्या ताकच्या लोण्यासारख्या वरवर येतात . माझी आजी दिवाळीत शेणाचे 'पांडव'बनवायची. अजून कोल्हापूरच्या आसपास बनवतात. त्यात श्रीकृष्ण अन एक बळीरामही असायचा. त्यांना नैवैद्य द्यायचा शेवयांचा. साजुक तुपात खमंग भाजलेल्या अन दुधात शिजलेल्या त्या शेवयांची चव अजून मनात आहे...!

In reply to by मस्त कलंदर

सस्नेह Mon, 09/03/2012 - 21:35
व्वा, कलंदर, फोटू मस्त टाकलात. आजीच्या पांडवांची सय आली... पण तो ढेरपोट्या आडवा पडलेला बळीराजा नाही दिसत त्यात. अन ज्वारीच्या दाण्यांचे डोळे पांडवांचे.

In reply to by सस्नेह

स्पंदना Tue, 09/04/2012 - 06:02
हो ना! अन जो पेंद्या असतो त्याच्या बेंबीत झेंडुच फुल. अजुनही अवेळी कोणी आडव पसरलेल दिसल की "तु काय बेंबीत झेंडुच फुल लावायची वाट पहातोयस/पहातेस?' अस म्हणतो आम्ही. दरवेळी खुसखुस हसु येत अन मग जो कोणी अस्ताव्यस्त पसरलेला असेल तो बिचारा उठुन बसतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

sagarpdy Mon, 09/03/2012 - 13:07
गावचे अनुभव अगदी असेच! सगळ्यात जास्त आठवतात ते म्हणजे किल्ले. एका वर्षी आम्ही भावंडानी खूप काडेपेट्या गोळा केल्या होत्या . दिवाळीत किल्ला बांधून झाल्यावर उरलेली माती या काडेपेट्यात भरून, पानचुलीत टाकल्या. दुपारी चूल विझल्यानंतर भरपूर विटा मिळाल्या. मग किल्याला खरोखरची तटबंदी तयार केली. मजा आली. .. गावी दिवाळी पेक्षा जास्त मजा यायची ती मे महिन्यात. आम्ही बच्चा पार्टी सकाळी उठून छोट्या छोट्या पिशव्या घेऊन, आजोबांबरोबर गुरांकडे जात असू. त्याचबरोबर आंबे / काजू गोळा करत असू. पिशव्या भरून घरी परत आल्यावर फणस नाहीतर आंबे हा नाश्ता ठरलेला. आई-आजीची उन्हाळ्याची कामं - फणस / आंबा पोळी, आमसुलं, कोकम सरबत, तळलेले गरे - चालू असायची. नाश्त्यानंतर आम्हा पोरांची कामं ठरलेली - अंगणात पत्ते खेळणे आणि बाहेरच्या वाळवाणावर लक्ष ठेवणे. खाण्यात आणि खेळण्यात कधी महिना संपायचा ते कळायचा देखील नाही!

सस्नेह Sun, 09/02/2012 - 21:20
घरच्या अन्नाची आवड बाळगणारी पिढीसुद्धा हळूहळू नामशेष होत आहे. नुसते 'चान चान' म्हणून न थांबता घरच्या जेवणाची संस्कृति टिकवण्यासाठी उपाय सुचवावेत. उदा. संध्याकाळी बाहेरचे चमचमीत खाणे कंपल्सरी वर्ज्य. फक्त घरचेच. मग वरणभात का असेना.

पैसा Sun, 09/02/2012 - 21:51
हळवे करणारे लेखन. अशा आठवणी प्र्त्येकानेच जपलेल्या असतात. माझ्या मुलांना यापैकी फक्त घरच्या जेवणाच्या आठवणी मी देऊ शकते. १२ महिने नोकरी असल्यावर घरी हळद तिखट मसाले पापड करणे अशक्यच आहे. शिवाय पूर्वी पापड करताना शेजारच्या बायका हमखास मदतीला यायच्या. आता शेजारीण माझ्यापेक्षा जास्त वेळ बाहेर असते. महिना महिना तिच तोंड सुद्धा दिसत नाही मग मदत कसली! आणि मीही तिला परत मदत करू शकणार नाही. चालायचंच. पेठकर काकांचा प्रतिसाद आवडला.

चावटमेला Sun, 09/02/2012 - 21:57
पिठल्यात दही घालतात हेच मुळात बाहेरच्या निम्म्या पब्लिकला ठाउक नाही असं नंतर जाणवायला लागलं. पुन्हा एक धक्का. आमची आईसुध्दा दही घालून मस्त पिठलं बनवते. आणि हो, आईच्या हातचं थालीपीठ म्हणजे तर माझा जीव की प्राण. आता माहीत नाही, थालीपीठ हा प्रकार एक २०-२५ वर्षांनी अस्तित्वात तरी असेल का?

In reply to by चावटमेला

प्रभाकर पेठकर Mon, 09/03/2012 - 01:25
आता माहीत नाही, थालीपीठ हा प्रकार एक २०-२५ वर्षांनी अस्तित्वात तरी असेल का? चविष्ट पदार्थ कधीच नामशेष होणार नाहीत. फरक इतकाच की भाजणी घरी करण्याचे दिवस मागे पडत चालले आहेत. भाजणी सरळ तयार आणि विकतची वापरली जाते. अगदी त्याचीही आवश्यकता नाही. काही काही उपहारगृहांमधून तयार थालीपीठ मिळतं. येत्या ६ महिन्यात, खमंग थालीपीठ, मस्कतमध्येही मिळायला लागेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

मराठे Tue, 09/04/2012 - 21:42
थालीपिठांवरून आठवलं, एकदा ऑफिसमधला एक पाकिस्तानी मित्र सहकुटूंब आला होता. त्याला थालीपिठ खिलवलं होतं. ही आमची पेशल डेलिकसी आहे म्हटलं. अजूनही कधी कधी त्याची आठवण काढत असतो ! बाकी लेखात म्हटल्याप्रमाणे घरात बनवण्याच्या कित्येक गोष्टी आता सर्रास बाजारातून आणतात .. आणाव्या लागतात. माझ्या आजीच्या पिढीत गहू विकत आणून घरी कांडून पिठ केलं जाई, आईच्या जमान्यात बाजारातून गहू आणून मग गिरणीतून दळण आणलं जायचं, आम्ही बाजारातून गहू न आणता पिठ आणतो, आमचे चिरंजीव बाजारातून डायरेक्ट पोळ्याच आणणार.. कालाय तस्मै नमः । शेवटी औटसोर्सिंगचा जमाना आहे. दुसरं काय!

माझ्याही लहाणपणाच्या आठवणी जाग्या झाल्या. अजूनही आम्ही तिखट व मसाला घरीच करतो. घरी दळणे वगैरे करण्यापेक्षा मसाल्याचे घटक आणून, त्यांना तेलात भाजून कांडप यंत्रावर दळूण आणले की मसाला तयार. फार काही कष्ट लागत नाहीत. अडचण एकच आहे, खात्रीशीर मिरच्या मिळत नाहीत (योग्य तिखटपणा व रंग असलेल्या), हल्ली निरनिराळ्या जातींच्या मिरच्या विकण्यासाठी एकत्र केल्या जातात. तयार मसाल्यातील रंग व भेसळ आणि किंमतीतला मोठा फरक यामुळे तिखट व मसाला घरीच करण्याला आई प्राधान्य देते.

बॅटमॅन Mon, 09/03/2012 - 00:14
अत्यंत "मनापासूनचा" धागा. वरील पदार्थांत मी हच्चिद्द आवलक्की ऊर्फ दडपे पोहे, मांडे, डिंक / हळीवाचे लाडू, थालीपीठ आणि तोक्कु, सप्पिन सारु ऊर्फ थिक रसम , चटणीपुडी , ठेचा ऊर्फ रंजका, तसेच आंबा/गाजर/मिर्ची/माईनमुळाचे लोणचे हे पदार्थ अ‍ॅड करू इच्छितो. बाकी साधे कैतरी करण्याची फर्माईश करण्याबद्दल दातारशेठशी बाडीस. अस्लं कै ना कै आठवतंय च्यायला जातोच घरला लौकर.

In reply to by बॅटमॅन

मोदक Mon, 09/03/2012 - 00:54
डिंक हळीवाचे लाडू.. तसेच आंबा/गाजर/मिर्ची/माईनमुळाचे लोणचे.. अस्लं कै ना कै आठवून घरला लौकर जाणार्‍याची काळजी घे.. ;-)

चौकटराजा Mon, 09/03/2012 - 06:52
हम्म्म आता ती पुण्याची थंडी राहिली नाही. मुंबईची व्हिक्टोरिया ट्राम, एखाद्या संग्रहालयातच पाहायला मिळते. असे लिहून लोकाना हळवे बनविण्याचा प्यीयेलना छंद होता.त्याचा झटका मनोबाला आलेला दिसतोय ! बाकी महाराष्ट्रीयन माणसाने खरोखरच गर्वसे कहो असे म्हणावे यात " जेवण- खाण " हा मुद्दा वरच्या क्रमांकावर. मी गेले ९ वर्षे काही उद्यम न करता घरीच आहे. कंपनीत जेवण मिळत असे पण आंबट दही , वाटणाच्या उसळी व फडफडीत भात असल्या प्रकाराला तिलांजली मिळाली. आता पैसा कमी आहे. पण साधेवरण भात , तूप लिंबु हे कंटाळा न येता गेले ९ वर्षे खात आहे व मस्त मजेत आहे. सांगायचे तात्पर्य की आपण मराठी लोक जगातील सर्वोत्तम मेनू आपल्या जेवणात घेत असतो. मर्यादित प्रमाणात तेलकट तुपकट तिखट आंबट असा हा सैपाक ! .मनोबा , तू केनीच्या पानाची भजी कधी खाल्ल्येस का? ( ही पाने श्रावणात आघाड्याच्या जोडीने कुठेही उगवतात ) तशी मायाळूच्या पानाची भजीही मस्त लागतात.

In reply to by चौकटराजा

निश Tue, 09/04/2012 - 13:40
चौकटराजा साहेब, मायाळुची भजी अप्रतिम लागतात. त्याच बरोबर शेवरांची भाजी, करटुलाचि भाजी, भारंगाची भाजी, हादग्याच्या फुलांची भजी, कुलुचि भाजी, सुरणाच्या पाल्याचि भाजी व भोपळ्याच्या फुलांची भाजी अप्रतिम लागतात माजी आई आजही ह्या भाज्या करते. आणि सगळ्यात अवी ट जेवण ते म्हंजे, वरण भात तुप लिंबु,मेतकुट, तळलेली भरलेली मिरचि किंवा मिरचिच लोणच. लिहुनच सणसणित भुक लागली परत.

In reply to by निश

गवि Tue, 09/04/2012 - 13:48
रविवारीच गावाहून करटुली आणली. एकदम वेलीवरुन तोडलेली कवळी कवळी. :) रानभाज्यांची आठवण काढलीच आहे तर मग चिऊची भाजी (ऑफिसटाईमच्या झुडुपाच्या पानांसारखी छोटीछोटी पानं आणि मातकट वास) हीदेखील यात जोडतो. याला अधिक प्रचलित नाव काही आहे का? भज्यांचं नाव काढलंच आहेत तर ओव्याच्या पानांची भजी आणि गिलक्याची भजी अ‍ॅडवा..

In reply to by गवि

निश Tue, 09/04/2012 - 14:02
गविसाहेब, एकदम भन्नाट नाव घेतलित. ओव्याच्या पानाची भाजी एकदम भन्नाट. गिलक्याची भजी म्हंजे जबरदस्त मऊ मऊ हिरवे गिलके गोल गोल कापुन केलेली भजी एकदम तोंडात वीरघ़ळते. अप्रतिम . चिउचि भाजी माझि आ़जी करायची ति असताना आम्ही गावाला गेलो कि त्यावे़ळी ति आम्हाला चिऊची भाजी म्हणुनच ती लहानपणी भ्ररवायची आता आजी ही नाही व तिची ती अप्रतिम चविची भाजी ही नाही.

गवि Mon, 09/03/2012 - 10:33
प्रचंड प्रतिसाद लिहीता येईल पण रडू येईल, आवंढा दाटेल वगैरे कारणांनी थांबतो. आवंढ्याने घशात दुखण्याचा त्रास होतो. उत्तम लेख. भिडला..

मेघवेडा Mon, 09/03/2012 - 17:01
छ्या.. स्साला हा मराठी माणूस आय टेल यू.. फारच डाऊन विथ नॉस्टॅल्जिया ब्वॉ! ;) मनातून उतरलेलं उत्तम लिखाण. आवडलंच. :)

तिमा Mon, 09/03/2012 - 19:33
तुमच्या आठवणी आमच्या आठवणींशी ताडून बघितल्या. बर्‍याचशा मिळत्या-जुळत्या आहेत. पण आम्ही मागच्या पिढीतले असल्याने अजून आमची 'ही' आमच्या आईचा वारसा चालवत आहे. त्यामुळे मरेस्तोवर फारसे हळवे व्हायची वेळ येणार नाही.

उदय के'सागर Mon, 09/03/2012 - 20:41
"व्हेज मध्ये व्हरायटी नाही" असं कुणी म्हटलं की गंमत वाटते >>> अगदी अगदी .... हे माझंही असंच होतं... असं कुणी म्हटलं की अश्या लोकांवर (विशेषतः भारतीय) कीव आणि हसू येतं... :)

In reply to by उदय के'सागर

अगदी अगदी .... हे माझंही असंच होतं... असं कुणी म्हटलं की अश्या लोकांवर (विशेषतः भारतीय) कीव आणि हसू येतं... १०० % सहमत.

In reply to by बॅटमॅन

गवि Tue, 09/04/2012 - 16:24
सर्व कीवकर्त्यांनो. कोणाचं वाक्य आहे हे की व्हेजमधे व्हरायटी नसते?.. जनरल फेकवाक्य असेल तर त्यामागचा उद्देश चूक आहे. पण .. ते मूळ वाक्य योग्य काँटेक्स्टमधे टाकून खाली लिहीतो म्हणजे त्यात तथ्य येईल. आणि या संदर्भात ते सत्य आहे असं यापूर्वी कोणी म्हटलंय ते माहीत नाही पण आता मी म्हणतो: व्हेज पदार्थांमधली व्हरायटी सर्वत्र* सहजपणे चाखायला उपलब्ध होत नाही. *सर्वत्र या शब्दात नारायण पेठ / सदाशिव / विलेपार्ले (पू)/नौपाडा ठाणे/दादर वगैरे एवढाच परीघ न घेता खवय्याच्या नजरेतून भारतातल्या आणि जगातल्याही विविध भागातली हॉटेले, रिसॉर्टस, रेस्टॉरंट्स -- विशेषत: खास क्विझिन बेस्ड रेस्टॉरंट्स(गुजराती वगळता) --, आंतरराष्ट्रीय लोकेशन्स, फूड फेस्टिव्हल्स, खाऊगल्ल्या असा मोठा खाद्यतीर्थक्षेत्रांचा परीघ घेतला पाहिजे.. सर्वांनाच पानगी, पातोळे, घावन, सांदण यांचा लाभ देणारी घरं /आज्या उपलब्ध असतातच असं नाही. जनरली उपलब्ध असतात ती हॉटेल्स. आणि उपरिनिर्दिष्ट परिसरातली ठराविक हॉटेलं सोडली तर हे सर्वत्र मिळत नाही. इथेही सर्व मिळत असेल असं नाही. जे मिळेल त्यातही "संपले"च्या पाट्याच जास्त. आता जनरल वेगळाल्या व्हरायटीच्या हॉटेलांमधेही सर्व क्विझिन्समधे (चायनीज, लेबनीज, मोरक्कन, कोल्हापुरी, मालवणी, कायस्थी, मेंगलोरी, केरळी, कर्नाटकी, थाई, मलाय, बंगाली) कोणते ना कोणते शाकाहारी पदार्थ असतातच, नाही असं नाही पण एकुणात उपलब्धी मांसाहारावर जास्त भर देणारी असते. अर्थातच याचा अर्थ शाकाहारात मुळातच कमी व्हरायटी बनवण्याचा स्कोप आहे असा नसून कमर्शियली म्हणा मागणी-पुरवठा तत्वाच्या किंवा अन्य काही कारणांनी म्हणा, शाकाहारी ऑप्शन्स मेन्यूकार्डावर तुलनेत बर्‍याच कमी संख्येने असतात. उदा. मालवणी कोंकणी हॉटेल. तिसर्‍या मसाला, कोंबडी वडे, कासव मटण सागुती,सोड्याचे कालवण आणि अन्य माश्याखेकड्यांच्या भरपूर ऑप्शन्समधे खोबरं लावलेली उसळ, सोलकडी असे शाकाहारी ऑप्शन्सही असतात पण ते निश्चित मेन अ‍ॅट्रॅक्षन /खास पेशकश वगैरेमधे नसतात. कोल्हापुरी स्पेशालिटी: तांबडा - पांढरा रस्सा, वजडी, खिमा, सुके आणि अनेक मटणाचे प्रकार हा याचा मुख्य आत्मा आहे. त्याच भागात आख्खे मसूर आणि नेहमीच्या भाज्या कोल्हापुरी मसाला लावून करतात आणि चांगल्याही असतात पण त्या मुख्य कोल्हापुरी स्पेशालिटी म्हणून विकल्या किंवा खाल्ल्या जात नाहीत. त्यांची संख्याही मांसाहारी डिशेसपेक्षा कमी असते. असंच कोणत्याही (शुद्ध शाकाहारी ठिकाण वगळता) वर्ल्ड क्विझिनविषयी म्हणता येईल. पट्टीचा खाणारा हा फक्त तांबे आरोग्यभुवनात अडकून पडत नाही. त्याला दोन्ही ऑप्शन्स चाखून पाहण्याची सोय असल्याने /मानसिक आठकाठी नसल्याने मांसाहारीमधे बरीच व्हरायटी मिळते असं उपलब्धता या दृष्टीने तो म्हणू शकतो. शुद्ध शाकाहारी ठिकाणांमधेही बाहेर खाताना काय ऑप्शन्स असतात हो? एखादं दादर पार्ल्यातलं किंवा टि़ळक रोडचं सन्माननीय घरगुती हॉटेल वाढतं डाळिंबी पुरी किंवा पालक पचडी. त्याखेरीज इतरत्र डोसा, इडली, दाल फ्राय, फारफारतर व्हेज हंडी, हैदराबादी आणि जालफ्रेझीशिवाय काय असतं जगावेगळं? या धाग्यात उल्लेखलेले पदार्थ देणारी व्यावसायिक ठिकाणं नगण्य आहेत. शाकाहारीमधले उत्तमोत्तम ऑप्शन्स पुढे आणून कोणी हॉटेल काढलं आणि ते चाललं तर आनंदच आहे. ते चालण्यास आमचा सर्वाहारी खाद्यशौकिनांचा प्रथम हातभार असेल हे नमूद करतो.

In reply to by गवि

बॅटमॅन Tue, 09/04/2012 - 17:11
गवि, मीदेखील सर्वाहारीच आहे. तुम्ही उल्लेखिलेली कारणे बरोबर आहेत; शंकाच नाही. पण सरसकट असे विधान करणारे लोक काही एक्स्प्लोअर करत नाहीत हे स्वतः पाहिले आहे. ठरीव ठशाची हाटेले सोडली तर हे लोक कुठे म्हणून जात नाहीत, शिवाय खाण्यापेक्षा बाह्यरूपाकडे जास्त लक्ष देतात. त्या लोकांचे असे शेरे ऐकून सटकणार नाही तर काय? भलेही त्यांच्या घरी जास्त काही बनत नसेल, पण बाहेर तरी एक्स्प्लोअर करावे की नाही? पण ते नाही. अनास्था आणि आळस यांतून जन्मलेल्या अज्ञानाचा परिपाक म्हणजे हे विधान असल्याने डोक्यात जाते. अशा लोकांत उत्तर भारतीयांचा भरणा जास्त असतो हे पाहिले आहे. बरं मेन नॉनव्हेज खाणार्‍यांत बंगाल्यांचा नंबर कदाचित भारतात तरी अव्वल असावा. पण त्यांच्यात व्हेजचे पदार्थ देखील बरेच असतात. ते लोक असे विधान जास्त करत नाहीत.

In reply to by गवि

मन१ Tue, 09/04/2012 - 20:44
सकारात्मक उत्तर पुणेकराच्या चष्म्यातून द्यायचा प्रयत्न करेन.(माझ्या माहितीतील पर्याय) मी जी लिस्ट देतो आहे; ती माझी आवडती ठिकाणे आहेत. मागे मित्रमंडळींत उल्लेख केला असता त्यातील काही ठिकाणे त्यांच्या मते "काहीच्या काही महाग आहेत" अशा क्याटेगरीत होती. १.उत्तम दाक्षिणात्य सात्विक(अळणी चवीसाठी) वाडेश्वर कडे जा. FC ROAD, गुडलक चौकातच आहे. पदार्थ :- सर्वच माझ्या आवडीचे आहेत. त्यातल्या त्यात इडली-मेदु वडा वगैरे आलेच(भरपूर चटणीसह). पण "सेट दोसा" अवश्य घ्या. तिखट्,मीठ, मसाला फार नसला तरी चविष्ट लागणार्‍या पदार्थापैकी हा एक जिन्नस.(थोडा जाड आहे, तुपात घोळलेला आहे थोडा.) "फ्राइड इडली" भंगार आहे. कॉर्न पॅटिसही चांगले. . २. समुद्रा. नळ स्टोपच्या सिग्नलच्या मागेच.(म्हात्रे पुलाकडे जाताना) दिसायला टिपिकल साधे पंजाबी आयटम मिलायचे एसी ठिकाण. प्रत्यक्षात त्याच्याकडे मिळणारी दाल खिचडी, दाल खिचडी कढी हे सुरेख, अप्रतिम, भन्नाट वगैरे वगैरे आहे. . ३. स्वीकार. समुद्राच्याच शंभर मीटर पुढे, पाडळे पॅलेसच्या समोर. मेसच्या थालीसारखी(रोज खायची) थाली मिळते. ती "बरी" ते "चांगली" ह्या क्याटेगरिपर्यंत असते. . ४. मराठी पिठलं भाकरी-भरीत भाकरी हवय? :- एस एन डी टी हून नळस्टॉप कडे येताना डाव्याबाजूला, मेन रोडवरच "गिरिजा"ची शाखा आहे. थालीपीठ उत्तम. भोपला घारगे(भोपळ्याचे थालीपीठ) झकास. पिठले मस्तच(अर्थातच बिनदह्याचे पिठले, सोबत स्वतंत्र दह्याचे मडके. आणि गरम भाकरी). भरीत ठिक ठाक(वांगे कमी, कांदा फार.) थाली आजवर एकदाही आवडली नाही. "बरी" सुद्धा वाटली नाही. गिरिजाच्या इतरत्रही पेठांमध्ये शाखा आहेत.(बहुतेक एस पी कॉलेजजवळ एक आहे.) . ५. चितपरिचित जे एम रोडवरील "मथुरा". गिरिजाप्रमाणेच सर्व. शिवाय कोथिंबिर वडी भन्नाट. हिरवागार मिरच्याचा ठेचा भारीच. . ६. "मथुरा" च्या शे-दोनशे मीटर दूर, झेड ब्रिजला जे एम कडून जाताना लागणारं "सोहम" मथुराप्रमाणेच सर्व काही, पण "पुरणपोळी" उपलब्ध. अगदि घरी बनवतो तितकी भारी नाही; पण एकदा खाउन पाहिलीत तरी चालेल. . ७.आशा डायनिंग हॉळ. अप्रतिम, सात्विक, अळणी, ब्राह्मणी चवीची म्हणता येइल अशी थाळी. जे एम ऱोडच्या मागे आपटे रोड आहे, तिथेच. शिवाय इतर सर्वांपेक्षा हे थोडे "पॉश" ठिकाण वाटते. घरच्यांना घेउन गेलात तर जन्मभर दुवा देतील. शिवाय स्वतःची "gud boy" अशी इमेज घरच्यांच्या समोर बनवायची असेल तर एकदाच इथे घेउन जा आणि इथलं जेवण मला फार्फार आवडतं हे सांगा, आई-बाबा इंप्रेस्स झालेच पाहिजेत. ( ज्या पोरीला पटवायचे आहे, तिच्या आई बापलाही एकदा इथे घेउन यावे, तुमच्याबद्दल चांगले मत होइल, एक opposition party गपगार होइल.) काय मिळते ? :- थाली म्हणजे घडीची पोळी, भरपूर शंगदाण्याची चटाणी, भरपूर कोशिंबीर्,वांगे-गवार्-पालक- वालाच्या शेंगा अशा टाइपची भाजी. मागाहून घरी बनतं त्या धाटणीचं साधं वरण भात नि वरून तूप. १९४८ पासून हा त्यांचा परंपरागत व्यवसाय सुरु आहे म्हणे. . ८. आशाच्याही शंभरपट चांगले म्हणजे "बादशाही डायनिंग हॉल". हॉल कसला, मेसच म्हणा ना. पण मेस/खानावळ म्हटल्यावर जी टिपिकल प्रतिक्रिया येते, ती देउ नका. ही एक उत्तम जागा आहे. उगाच नाही इतकी गर्दी होत. उभे रहायलाही जागा मिलणार नाही,. निदान वीस्-तीस मिनिटे तरी वेटिंग होणारच. सध्या रुमाल टाकतोय. वेज मध्ये ऑप्शन नाहित म्हणणार्‍यांची कीव करणे हा लेखाचा उद्देश नाही. ओघवतं लिहिताना एक वाक्य आलं; बस्स.

In reply to by मन१

प्रभाकर पेठकर Tue, 09/04/2012 - 20:57
एक 'सोहम' वगळता सर्व ठिकाणांना भेट देऊन झालेली आहे. ब्राह्मणी चवीला 'अळणी' हे विशेषण पटले नाही. बाकी प्रतिसादाशी सहमत.

In reply to by मन१

गवि Tue, 09/04/2012 - 21:01
वा वा.. येऊ द्या आणखी उपयुक्त माहिती. बुकमार्क करतो. (एकेकाळचा बादशाही मेंबर आणि चेंज म्हणून दोन दिवसा आड डेक्कन, जंम आणि फ र्ग्युररस्ता विं चरणारा पुणेकर) गवि

In reply to by मन१

बॅटमॅन Tue, 09/04/2012 - 21:09
वाईच अ‍ॅडिशन्स.... संभाजी पुतळ्याजवळच पहिल्या मजल्यावरती जनसेवा भोजनालय-मस्त. जंम रोडवरच संभाजी उद्यानाच्या लायनीत त्याच्या जरा पुढे मयूर आहे ते कसे आहे? मायला कधीच नै गेलो. बाकी पुण्यात सर्वोत्तम दाक्षिणात्य चव मिळणारी २ ठिकाणे-जंम रोडवर दक्षिणायन (क्वांटिटीवरून शिव्या घालणार्या समस्त पब्लिकने प्लीऽ ऽज क्वालिटीकडे लक्ष देऊन मग सांगावे. ) आणि युनिव्हर्सिटी रोडवर साऊथ इंडीज. साऊथ इंडीजमध्ये दर अजून जास्त आहेत. हायफाय टाईपचे हॉटेल आहे. पण क्वालिटी तिथेपण मस्त आहे. फिशसाठी टिळक रोडवरती मासेमारी बेष्ट. स्वयं लालन सारंग यांनी चालवलेले एक नंबर हॉटेल. बाकी पण आहेतच अर्थात. नॉनव्हेज कुत्र्यासारखे तुटून पडून खायचे असेल तर बार्बेक्यू नेशन एक नंबर !! ६००-७०० रुपये काय ते एकदाचे द्या आणि सुरू व्हा तेच्यायला. बाकी एसपीज बिर्यानी, शाहजीज पराठा हाऊस ही स्टार ठिकाणे आहेतच पण मी नै गेलो स्वतः सबब त्यांवर भाष्य नै करत. बादशाहीबद्दल तर कोटिशः सहमत. बेलबाग चौकात त्या पद्धतीचे एक हॉटेल आहे असे ऐकलेय-बहुतेक पुणे बोर्डिंग- मी चुकतही असेन तरी चूक दुरुस्त करावी. कोरेगाव पार्कात मरकेश नामक मिडल ईस्टर्न नॉनव्हेज आणि इन जनरल नॉनव्हेज साठी उत्तम हॉटेल आहे. केएफसी वैग्रे मला बिल्कुल नै आवडत. पण फासोस नामक जी चेन आहे तिथला चिकन ऑन बासमती हा प्रकार एकदम भन्नाट असतो. एका मोठ्या वाडग्यात चिकन विथ ग्रेव्ही आणि दुसर्‍या तशाच एका वाडग्यात भरून भात. दोन्ही एकदम गरमागरम. चव तर काय सांगू मस्तच असते एकदम. सर्दीबिर्दी झाल्याचा संशय आला किंवा झणझणीत खाण्याची लहर आली तर जरूर जावे. मला माहिती असलेल्या शाखा म्हंजे मगरपट्ट्यातली आणि कोरेगाव पार्कातली. रुबी हॉल पासून अदमासे १ किमी दूर असलेले (मेनलँड चायनाला लागूनच असलेले) "ओह! कोलकाता" देखील मस्त आहे. बंगाली डिशेस लै छान मिळतात , पण ओव्हरप्राईस्ड. फिश फ्राय, भेकटी/भेट्की माछेर करी , इ. सर्व प्रकार मस्त. कोळंबीची मलई करी पण आहे "चिंगडी माछेर मलाई करी" या नावाने, पण ग्रेव्ही गोडसर असते. बंगाल्यांना जरा तसे गोड लागतेच म्हणा. स्मोक्ड हिलसादेखील छान. हिलसा म्हटले की बंगाली मरतात एकदम. पण किंमत आणि क्वांटिटी एकदम मिसम्याच बरं का. बाकी पार्टी वैग्रेसाठी आदर्श असे एक हॉटेल म्हंजे अटलांटिस-वानवडीत आहे. क्यांपातील क्वालिटी हॉटेल(कयानी बेकरिच्या शेजारी) तेही मस्त आहे-तिथले चिकन रारा, खीमा, तंदुरी चिकन हे आयटम लै झकास आहेत.

In reply to by बॅटमॅन

चावटमेला Wed, 09/05/2012 - 10:26
पण फासोस नामक जी चेन आहे तिथला चिकन ऑन बासमती हा प्रकार एकदम भन्नाट असतो. एका मोठ्या वाडग्यात चिकन विथ ग्रेव्ही आणि दुसर्‍या तशाच एका वाडग्यात भरून भात. दोन्ही एकदम गरमागरम. चव तर काय सांगू मस्तच असते एकदम. अगदी, अगदी :) ओह कॅलकता मात्र नाही आवडले बुवा :( . कदाचित त्यादिवशीचा मेन्यु गंडला असेल.

In reply to by चावटमेला

lgodbole Fri, 04/01/2016 - 18:26
फासोसच्या दारात पदार्थांची चित्रे असतात... तसेच मिळतात का ? कलिना विद्यापीठाच्या दारात आहे... एकदा जाइन

In reply to by बॅटमॅन

sagarpdy Wed, 09/05/2012 - 11:32
प्रथम चिकन ऑन भानामती असे वाचण्यात आले. नॉनव्हेज पदार्थांशी तसा बघून स्तुती करण्यापलीकडे संबंध नाही. उपरोल्लेखित सर्व खादाडीपैकी जनासेवाच ब्येष्ट! पुणे बोर्डिंग हाउस पेरूगेट चौकी शेजारी (बादशाही पासून अगदी १० मिनिटावर).

In reply to by गवि

मन१ Tue, 09/04/2012 - 22:10
@ ब्याटमन साऊथ इंडीजमध्ये हे सांगताना अत्यंत न्यूनगंड येतो आहे की अजूनही ह्या ठिकाणी मी जाउ शकलो नाही. :( . निस्ते हॉटेले नको सांगू बे. कशासाठी फेमस्/आवडते ते ही सांग की. दक्षिणायन पोंगल हा इथला अत्युत्तम. हा महाराष्त्रात कमी ठिकाणी सपडतो हाटेलात. विशेष प्रकारची मसाले ,लालमिरची,तेल न वापरता केलेली खिचडीही चविष्ट कशी लागू शकते(निव्वळ काळे मिर्‍याच्या जोरावर) हे पाहायचं तर पोंगल खावे. मला इथला आवडला. पण दोन्-तीन चमचे खाण्यासाठी शंभरच्या वर रुपये मोजावे लागतील. . जनसेवा भोजनालय थाली वॉव. यमयम. आशा डायनिंग हॉल आणि जनसेवा दोन्ही एकाच जातकुळीतले वाटतात. वरती आठ जागा दिल्या होत्या, यादी पुढे नेत आहे. पुणे बोर्डिंग ९.पुणे बोर्डिंगला शंभर वेळेस गेलोय; एकदाही यादीतील इतर ठिकाणांइतके आवडले नाही. त्यापेक्षा मला आवडले ते "सात्विक थाळी" बादशाहीच्याच समोरच्या गल्लीत; सदाशिव पेठेकडे जाताना. काय खाल? :- आशा डाय्निंग हॉलसारखी थाळी. आई-बाबा ह्यांना इंप्रेस करायला चांगले ठिकाण. . . १०.शाहजीज पराठा हाऊस वल्ली, ५०फक्त्,सूड्,धन्या ह्या सर्वांची माफी मागून स्पष्टपणे सांगतो. मला शाहजीपेक्षा चैतन्य पराठा जास्त आवडतं. पण तिथं काय खाल? पंचवीस्-तीस प्रकारचे पराठे आहेत. सगळे खात बसू नका. आधी मी सांगतो ते प्राधान्यानं टेस्ट करा. पालक पराठा, मेथी पराठा, गोबी पराठा(थोडा मसालेदार्,तिखट असेल हा), हरियाली पराठा. आलुअप्राठा सहासा सगळीकडेच बरा मिलतो, त्यामुळे इथला रेकमंड(वैशिष्ट्य म्हणून) करत नाही. इथे स्टफिंग इतकं असतं पराठ्यात की एकाच पराठ्यात भलेभले ढेर होतात. फ्रेशर असताना, पुण्यात नवीन असताना माझा आहार दांडगा होता. तरीही कसाबसा दोनच पराठे खाउ शके. आमची मित्रमंडळी दोघांत एक असे खातात. अत्यंत चविष्ट, पण आत्यंतिक तेलकट प्रकार. शिवाय वरुन अमूल चे बटर देणार ढीगभर. . ११. "नंदूज् पराठा" हे अत्यंत भारी ठिकाण. पुणे स्टेशनची शिवाजीनगरकडली बाजू आहे(प्लॅटफॉर्म आहे) तिथून पुढे जाउन डावीकडे वळा. अत्यंत जबरदस्त पराठे. मुख्य म्हणजे बनवण्याची पद्धत ही चैतन्य पेक्षा फारच वेगळी आहे. अगदि पाहिल्याबरोबर दोन्ही अगदि भिन्न भिन्न आहेत हे दिसते. चैतन्य बद्दल माझी तक्रार होती की हा एका पराठ्यात वाटीभर तेल-तूप टाकतो; इतकं नाय जात बॉ. तर नंदूज् मध्ये गेल्यावर समजलं, नंदूज् वाला एका पराठ्यात बाटलीभर तेल तूप टाकतो!! पण चवीला छान. . १२. कोथरुड डेपोजवळ, वनाज कंपनीच्या समोर खान्देशी हॉटेल. काय खाल? अत्यंत टपरीछप हॉटेल. हायजिन कॉन्शस लोकांनी न गेलेलच बरं. पुन्हा वर वेजच्या शेजारी नॉन वेज ठेवणार. पण हे सर्व झेलून तिथे जाणंही माझं सार्थकी लागलं. अत्यंत सुरेख अशी बाजरीची भाकरी, खास खान्देशी भरीत(ज्यात वांगी असते, गिरिजासारखा कच्च्या तेलकट कांद्याचा भडिमार नाही). फक्त जाताना दोन चार बाटल्या थंडगार पाणी घेउन जा. ह्याहून तिखट पदार्थ मी भूतलावर आजवर खाल्लेले नाहित. . १३.खान्देशी जुनी सांगवी पेट्रोल पंप जवळ ह्याचे सात दिवसात सात वेगळे आयटम असतात्.त्यातला चटणी-भाकरी हा माझा सर्वात आवडता. पण पुन्हा तेच, अत्य्म्त गलिच्छ वाटनारे वातावरण. बॅचलर पोरेच जाउ शकतील. फ्यामिलीवाले नाहीच. . १४. ह्या सर्वांहून चवीला चांगले, खायला स्वच्छ; वाजवी किमतीत :- बापट उपहार गृह केळकर संग्रहालयाच्या खाली. सदाशिव पेठ. काय खालः- पिठलं भाकरी. वाम्ग्याची भाजी भाकरी. इथली दाल्खिचडी "समुद्र" च्याच तोडीची. ह्यात डावं- उजवं करणं कठीण आहे. उपासाच्या दिवशी इथे बाकी काहीच मिलत नाही, फक्त उपासाचे जिन्नस. त्यातही एक एक तास वेटिंग असते. उपासाचे दिवस कुठले? आषाढी कार्तिकी एकादशी, महाशिवरात्र. काय खाल? साबुदाण्याची खिचडी? छे हो. ती कुठेही मिळेलच की! पण "भगर " हा आयटम चविष्ट असतो हे पटत नसेल तर एकदा इथे उपासाच्या दिवशी जाच. भगरीवर मस्त तूप,लिंबू आणि दाण्याच्या कुटाची आमटी. वा... झकास. नुसत्या आठवणीने दिल खुश झाला आमचा. . १५. मेस टाइप , एकदा जाउन पहायल हरकत नाही व जिथे ९९% हिंजवडीवाले गेले असतील असे ठिकाण. इन्फि फेज१ जवळ आंध्रा मेस आहे. थाली स्टाइल मिळते. पोळी-भाअजी-भात -वरण्-दही. ठिक ठाक. खूप असे ग्रेट नाही; पण बरे आहे. . १६. नळ स्टॉप; स्वामी समुद्रा सारखेच एसी रेस्टॉरंट. काय खाल? :- पंजाबी मेन्यु असतो, पनीर्-रोटी वगैरे त्याच स्टायलीत आहे. पण " पनीर बिरबली " आवर्जून खा. तो पालक पनीर चा भाउच असणारा, ग्रीन ग्रेवी वाला आयटम आहे;पण खूपच छान. . १७. नेहमीचेच यशस्वी असणारे दुर्वांकुर "शाही " प्रकरातली थाली खायची आहे? त्याही शाही थालीला राजस्थानी कीम्वा गुजराती टाच न ठेवता, मराठी टच ठेवायचा आहे? इथे अवश्य भेट द्या. थाली मध्ये कोशिंबीर, भाक्री, चपाती दोन्-तीन भाज्या हे सर्व अनलिमिटेड असेलच. शिवाय उन्हाळ्यात आमरस उत्तम. एरवीही मुगाचा शिरा वगैरे उत्तमात उत्तम इथेच्.शिवाय थालीमध्येच थालीपीठ देखील! मागाहून साधीवरण भात किंवा खिचडी ; दोन्ही वर तूप. चवीला छान. जेवल्यावर झोप येणे हा इथला साइअड इफेक्ट. अनेकदा गेलोय. पण हे दीपक मानकर ह्यांचे आहे असे नंतर ऐकण्यात आले. मग जायला कसेसेच होउ लागले. . १८. नेहमीचेच यशस्वी पुरेपूर कोल्हापूर नॉनव्हेज कोल्हापूरी थाली साठी प्रसिद्ध्.पण मल अवेज थालीही आवडते.पण दोन्ही मर्यादित आहेत, त्यामानने थोदॅस्से महागही आहे. पण एकदा तरी जावे असे,. अनेक शाखा आहेत, त्यातली एक वेज अभिषेक च्या शेजारी, मंगेशकर हॉस्पिटलच्या जवळ, म्हात्रे पूल एरियात. . अजून खूप जागा आहेत्,पण आता काही महिने झालेत पुण्याहून निघून आणि अतिकामाने मेंदु शिणलाय. काही काही गोष्टी पूर्ण आठवत नाहीएत. .

In reply to by मन१

रेवती Tue, 09/04/2012 - 22:15
पुण्यात गेल्यावर इथं जायचं, तिथं जायचं असं नुसतं ठरवते आणि गेल्या अनेक वर्षात कधीच जाणं होत नाही सबब हा धागा वाचनखूण म्हणून साठवत नाही. :) नुसतं ग्राहकपेठेत वस्तू खरेदीला जायचं म्हटलं तरी बराच वेळ जातो. असो. सगळे प्रतिसाद चांगले आलेत.

In reply to by रेवती

मन१ Tue, 09/04/2012 - 22:21
त्यापेक्षा वेळात वेळ काढून जा. कंपनी नसेल मिळत तर मला घेउन जा सोबत तै. तसेही आम्ही भटेंच. तुम्हास ब्राह्मणभोजनाचे पुण्यही लाभेल. मी "कुठली ठिकाणं चांगली" हे सांगितलेलं नाहीये. प्रत्येक ठिकाणी मला काय काय आवडलं, हे नेमकं सांगायचा प्रयत्न केलाय. तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्राधान्यक्रम ठरवू शकता.(उदा:- प्राठे नको, पिठलं भाकरी वाल्या जागा हव्या. किम्वा पंजाबी आयटम नको, थाली शोधूया, अशा प्रकरचे) . . भोजनाभिलाषी भटजी

In reply to by मन१

बॅटमॅन Tue, 09/04/2012 - 23:37
नंदूज पराठा आणि खान्देशी हे दोन वेगळे स्पॉट्स कळाले यातून. धन्यवाद मनोबा. चैतन्य आपलादेखील आवडता पराठा आहे, पण अलीकडे ते ब्रॉब्डिङ्नॅगिअन पराठे पूर्वीसारखे जात नाहीत ब्वॉ. आणि दुर्वांकुरात मुगाचा शिरा आणि कधी देतात हो ? थाळी रेट १०० असल्यापासून , म्हंजे २००६ पासून जेवतोय, कधी नै पाहिला तो तिथे. तो मान सुकांताचा. पण या दोन्ही ठिकाणांची क्वालिटी तितकी राहिली नाही असे वाटते. म्हंजे लै काय फरक नै, पण कुछ तो है मिसिंग. बाकी फर्गसन रोडवरः गुडलक कॅफे- बस नाम ही काफी है. हॉर्न ओके प्लीज-उत्तम पंजाबी जेवण. बाय द वे- नॉनव्हेज, विशेषतः चिकन-मस्त मिळते. एकूणात जरा हायफाय. बापट आणि सात्विक हे दोन्हीही छान आहेत. बापटची व्हरायटी आणि क्वालिटी खास आहे. सात्विकच्या समोर १) रस्सा जसा हवा तस्सा २) रस्सा मंडळ ही दोन हॉटेले आहेत. पहिले बकवास आहे. रस्सा मंडळ छोटे पण छान आहे. त्यांची मुख्य शाखा सिंहगड रोडवर आहे म्हणे. कुठेय काय माहिती. रस्सा मंडळ मध्ये चिकन मालवणी छान वाटले. तिथे तितर पक्ष्याचे मांसदेखील मिळते, पिंजर्‍यात ते पक्षी ठेवलेले असतात. काहीवेळेस ससेदेखील पाहिले आहेत. अर्थातच खाण्याचा धीर झाला नाही हेवेसांनल. बाकी सदाशिव पेठेतच, आबाचा ढाबा म्हणून एक आहे तेदेखील बरे आहे असे ऐकलेय. जंम रोडवरच एक लै मस्त हॉटेल होते फॅट काँग म्हणून, इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षी लै वेळेस जायचो. सालं बंद पडलं :( रच्याकने: पुण्याचे भाग पाडून त्या त्या भागातली प्रकारवाईज चांगली हॉटेल्स असा धागा काढला तर मस्त लेखमाला होईल की नै?

In reply to by बॅटमॅन

मन१ Wed, 09/05/2012 - 00:00
लिस्ट भारी बनते आहे. ब्रॉब्डिङ्नॅगिअन पराठे ??? आणि दुर्वांकुरात मुगाचा शिरा आणि कधी देतात हो ? आम्हास दोन तीन वेळेस मिळालेला, बहुत करुन दुपारी वर्किंग डे मध्ये लंच ला. मी २००७- २००८ मध्ये लै वेला गेलोय. सुकांता उल्लेखनीय वाटलं नाही.(उत्तर भारतीय त्याचा नको तितका गवगवा करतात; त्यामानाने मला ते तितकं आव्डलं नाही. अर्थात, ते आणि हल्ली उघ्डलेलं डहाणूकर चौकातलं "थाटबाट" उत्तमच आहे. पण मला दुर्वांकुर थोडंसं ज्यास्त आवडायचं.(उत्तर भारतीय "येह कौनसी जगह है" असं विचारायचे, कधी यायची नाहीत दुर्वांकुरला.)) . . म्हंजे लै काय फरक नै, पण कुछ तो है मिसिंग. हे बर्‍याच जणांन्कडून ऐकलय. मी अशात गेलो नाहीये. तिथे जावेसे वाटत नाही. . बापटची व्हरायटी आणि क्वालिटी खास आहे. सात्विकच्या समोर +१.प्रश्नच नाही. . १) रस्सा जसा हवा तस्सा २) रस्सा मंडळ हे नवीनच. . बाकी सदाशिव पेठेतच, आबाचा ढाबा म्हणून एक आहे तेदेखील बरे आहे असे ऐकलेय. ते पुरेपूर कोल्हापूरचेच भावंड वाटते शैलीवरून. दोन्-तीनदा गेलो आहे. पण तितके अपील नाही झाले.(पुरेपूर्ला अनेकदा गेलोय. त्याच्या क्याटेगरीत्,त्याच्या जॉनरमध्ये ते चांगलेच आहे.) . जंम रोडवरच एक लै मस्त हॉटेल होते फॅट काँग म्हणून, इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षी लै वेळेस जायचो. सालं बंद पडलं तरी सांगत होतो इंजिनिअरिंग सोडू नका म्हणून. पण तुम्हाला चार वर्षातच सोडायची घाई फार. . रच्याकने: पुण्याचे भाग पाडून त्या त्या भागातली प्रकारवाईज चांगली हॉटेल्स असा धागा काढला तर मस्त लेखमाला होईल की नै? अरे यह पी एस पी ओ नही जानता.................................. मिपावर काही विषय कसे कितीही वेळेस काढले तरी हिट्ट असतात, त्यात सर्वात वर ह्या विषयाचच नाव आहे. जरा जुने धागे बघा की. गांधी-नेहरु-काँग्रेस्-संघवाले, भारत्-पाक, स्फोट्,हिंदु-मुस्लिम्,**ण आणि **णेतर ,मिपा आणि मिपाकर,विडंबने कसे पुन्हा पुन्हा येत राहतात; कधीही न थकता पब्लिक कशी त्यावर perpetual गप्पा मारते, वाद घालते; तसाच, किंवा त्याहून अधिक चर्चित विषय म्हणजे खादाडीची ठिकाणे. नेमके सगळे हा धागा पाहूनच बिळात बसलेत. नाय तर सुरु झाले सगळे एकसाथ तर चार्-पाचशे प्रतिसाद तर कुठेच नाय गेले.

In reply to by मन१

बॅटमॅन Wed, 09/05/2012 - 00:15
ब्रॉब्डिङ्नॅगिअन पराठे ???
लिलिपुट आणि ब्रॉब्डिङ्नॅग हो. पण खरा श्रेयअव्हेर जातो तो बिग बँग मधील शेल्डन कूपरला. राज कुथ्रपल्लीने शेल्डनच्या ऑफिसात मुद्दाम खोडी काढण्याकरिता म्हणून एक भलेमोठे टेबल ठेवलेले असते त्याचा उल्लेख तो "व्हॉट इज धिस ब्रॉब्डिङ्नॅगिअन मॉन्स्ट्रॉसिटी?" असा करतो. तो शब्दप्रयोग लैच आवडला, सबब चोरल्या गेला आहे.
आम्हास दोन तीन वेळेस मिळालेला, बहुत करुन दुपारी वर्किंग डे मध्ये लंच ला.
असेल. मी लंच कधी नाही केले तिथे, सबब माहिती नाही.
सुकांता उल्लेखनीय वाटलं नाही.(उत्तर भारतीय त्याचा नको तितका गवगवा करतात; त्यामानाने मला ते तितकं आव्डलं नाही. अर्थात, ते आणि हल्ली उघ्डलेलं डहाणूकर चौकातलं "थाटबाट" उत्तमच आहे. पण मला दुर्वांकुर थोडंसं ज्यास्त आवडायचं.(उत्तर भारतीय "येह कौनसी जगह है" असं विचारायचे, कधी यायची नाहीत दुर्वांकुरला.)) .
थाटबाट नवीनच कळाले. मी ज्या उत्तर भारतीयांबरोबर राहिलो, त्यांना दुर्वांकुर मात्र मस्त आवडले होते. सुकांताला अजून नेले नाहीये. बघू मग तौलनिक रिअ‍ॅक्शन.
अरे यह पी एस पी ओ नही जानता..................................
नै ना भौ म्हूनच तर म्हंतोय :) पाहतो आता जुने धागे, पण विभागवार केल्यास उत्तम होईल असे वाटते.

In reply to by बॅटमॅन

तर्री Wed, 09/05/2012 - 15:31
नागपूर हे एक चविष्ठ सामिष हाटेल होते भर सदशिवात ! भिंतीकडे (तोंड लपवून) मस्त हाणता येत असे ! कुणाच्याच यादीत त्याचा संदर्भ नाही . बंद झाले की काय ?

In reply to by बॅटमॅन

मोदक Wed, 09/05/2012 - 18:42
सुगरण जवळ आहे ते. आणि ब्याम्या.. तू ससा खाल्ला नाहीस..? एकदा खावून बघ! लुसलुशीत आणि आतून गोडवा असलेले एकदा ट्राय करूनच बघ.. फक्त जेवताना / नंतर ससा डोळ्यासमोर आणायचा नाही, घास घशात अडकतो रे त्या गोंडस प्राण्याला आठवले की. :-(

In reply to by मन१

रेवती Wed, 09/05/2012 - 00:22
मागल्यावर्षी आख्खी भारतवारी संपत आली आणि लक्षात आले की एकदाही बाहेर जेवायला गेलो नाहिये. रात्री जरा उशिरानेच डोक्यात प्रकाश पडल्याने लक्षुमी रस्त्यावरचं ते भगतचंद की कायसे जेवणाचे ठिकाण मिळाले. चांगले होते जेवण. मला तरी खूपच आवडले. फार वाट पहायला लावली पण. आता काय उरलंसुरलं तरी देतात की नाही अशी शंका आली. ;) तुला बरोबर घेऊन जाणे हा पर्याय मला आवडला. चालताबोलता ज्ञानकोशच तू! ;) शिवाय ते पुण्याचं विसरू नकोस रे भटा!

In reply to by मन१

sagarpdy Wed, 09/05/2012 - 11:36
चैतन्य पराठा मला देखील खूप आवडले (येथील इटालियन पराठा हा प्रकार भल्या भल्या पिझ्झ्याना धूळ चारेल!). परंतु अजून शाजी ला गेलो नाहीये तेव्हा पास!

In reply to by गवि

मन१ Tue, 09/04/2012 - 22:17
गवि, आता वरची लिस्ट पहा.(लिस्ट अजून अपूर्णच आहे.) पुण्यात चार चार वर्षे राहूनही पब्लिकला हे इथे आहे हेच ठाउक नाही. मग म्हटले जाते की "वेज मध्ये ऑप्शन्स नाहीत." माझ्या पुण्यातील परिचितांत हे वाक्य म्हणनार्‍यातले ९०% लोक अशा थिकाणांपासून अनभिज्ञ होते. जवळच्या मित्रांपैकी कुणी असे म्हटल्यास मी शक्य्तो मित्रांना ही ठिकाणे दाखवतो. त्यांनाही ती आवडतात. मग त्यांना आवडेल त्या दिवशी ते हवे तिथे जातात, पण बहुतांशी ते वाक्य कमी होते/बंद होते. शाकाहार काय अन मांसाहार काय, दोन्ही आवडिने त्यांचा सुरु राहतो. अर्थात ही सर्व ठिकाणे पाहूनही कुणा पट्टीच्या खवय्यास ऑप्शन्स नाहित असे वाटत असेल तर ते स्वाभाविकच आहे; पण ते त्याच्या खाद्य भटकंतीमुळे. आणि "ऑप्शन्स नाहित " असे म्हणण्यापेक्षा इतरांनी "ऑप्शन्स दिसत नाहित" असे म्हटलेले उचित वाटेल. अर्थात , कुनी काय म्हटलेले उचित ठरेल हे ठरवनारा मी कोण हाही प्रश्न आहेच्.कुनी आक्षेप घ्यायच्या आत मीच ते विधान मागं घ्यावं का काय?

In reply to by बॅटमॅन

सुहास.. Wed, 09/05/2012 - 16:15
हे माझंही असंच होतं... असं कुणी म्हटलं की अश्या लोकांवर (विशेषतः भारतीय) कीव आणि हसू येतं >>> लई वेळा सहमत ! मनोबा , खाण्याचा लेखा जोखा महाप्रचंड आवडेश रे ! आजकाल स्साल ते विलायती आणि हायब्रीड पिकांनी पण अक्षरशः चव घालविली ..ही काल परवाची गोष्ट , दर आठवडा दर रविवारी बाजारात जात असतो मला गेले चार आठवडे गावरान गवार हवी होती ..स्साला बाजारात पत्ता नाही ... ईथे नाशकात त्यादिवशी नाशीक रोड ला पुण्याकडे जाताना जरा पुलाखालच्या बाजारात घुटमाळलो ...अर्धा किलो भर विकत घेतली . सकाळी नाष्ट्यापासुन ते रात्रीच्या जेवणापर्यंत हादडली .. साधी तव्यावर तळुन जरा मीठ घातलेली पण चवदार लागत होती . अगदीच जुन्या कालावधीत जन्माला आलो नसलो तरी काही लहाणपणी जिभेवर तरळणार्‍या चवी अजुन जश्याच्या तश्या आहेत. तुझा लेख त्याच लहाणपणातल्या खाद्य प्रवासा कडे घेवुन गेला ...ईथे मिपावर आवडते खाद्य मध्ये मी लिहीले होते, ते अजुन जिवंत ठेवले आहे ..." आईच्या हातचे सर्व काही "

सूड Mon, 09/03/2012 - 20:56
लेख वाचला आणि सर्वांप्रमाणेच भूतकाळात गेलो. जेवण म्हटलं की स्वयंपाकघर, आई आणि 'शिकताय ते बरंय. उद्या गरज पडली तर कुणाची वाट बघत बसावी नाही लागणार, हाताने बनवून खाल' असं तिचं आम्हा दोन्ही भावांना सांगणं, रेसिप्या सांगायची तिची विशिष्ट पद्धत सगळंच आठवलं. आज ती नाही पण कधी 'अमुक पदार्थ खावासा वाटतोय, काय करावं?' असा प्रश्न पडला नाही. ज्याअर्थी तिने आम्हाला स्वयंपाक शिकू दिला त्याअर्थी तिला पुढे घडणार्‍या गोष्टी आधीच कळल्या असाव्यात असं कधी कधी वाटून जातं. तिच्या आशीर्वादाने खाण्याची आबाळ अजूनपर्यंत झालेली नाही.

अप्पा जोगळेकर Mon, 09/03/2012 - 22:27
डाळिंब्याची उसळ आळूचं फतफतं उडदाच्या पापडाच्या लाट्या पोह्याचे भाजलेले पापड (हे अलीकडे पार गायब झालेत) कुरडया आणि चिकवड्या सोर्‍यातून पाडलेल्या चकल्या, हाताने वळलेले बेसनाचे लाडू आणि चिरांट फोडल्यावर बालमनाला होणारा आनंद हात दुखेपर्यंत वाटलेलं पुरणयंत्रातलं पुरण दही टांगून बनवलेला चक्का घरगुती मडक्यात फर्मेंट केलेली सुंदर वाईन सध्या तरी इतकेच आठवते आहे. सुंदर आठवणींना उजाळा दिल्याबद्दल लेखकाचे आभार.

स्पंदना Tue, 09/04/2012 - 06:15
मी अजुनही घरी तिखट मिसळते. अर्थात तिखट पावडर विकतची पण बाकी सारा मसाला मी घरी बनवुन मग तो तिखटात मिसळते. मग कांदा मिसळलेल चवीसाठी म्हणुन बाजुला काढायच वगैरे उद्योग होतात, पण हल्ली ते बाजुला काढलेल तसच पडुन रहात. एक मात्र आहे, माझा स्वयंपाक अजुनही बावनकशी कोल्हापुरीच असतो. अगदी परवा व्हायरलन लागोपाठ दोनदा आजारी पडले पण उठुन भाकरी केल्या न खाल्ल्या त्या दिवशी बरं वाटल. चपातीचा वासही नको होता तेंव्हा. मी अजुन इतक बनवते म्हंटल्यावर कदाचीत हा र्‍हास एकपिढी पुढे सरकेल अस वाटतय. मनोबा लेखाबद्दल काय बोलायच? माझ्या घरी मोठी रवी आहे. आता धुळ खातेय, पण ती खांबाला बांधुन 'खुळ्ळक्क खुळ्ळक्क' ताक घुसळण्याचा धंदा अगदी आवडीन केलाय. अन ते त्यावर येणार लोणी .... तो तुप कढवण्याचा वास्...मी अजुनही घरीच कढवते, पण लोणी बाहेरच्..अनसाल्टेड..

इरसाल Tue, 09/04/2012 - 10:01
हे लोक आजकाल अगदी प्रत्येकाच्या मनातुन खणुन काढल्याप्रमाणे लिहीत आहेत. कशाला स्मरणरंजनात अडकवत असतील ?

In reply to by इरसाल

मी_आहे_ना Tue, 09/04/2012 - 12:17
अगदी हेच टंकणार होतो... मनोबा.... फारच 'नॉस्टॅल्जिक' करणारा लेख!

मी न्याहारीला गुरगुट्या मऊभात, ताकातली फक्कड उकड, धिरडं, आंबोळी हे पदार्थ बनवते म्हटल्यावर हापिसातले लोक्स आश्चर्याने बघतात.... बर्याच जणांना हे पदार्थ माहित नाहित..

In reply to by प्रेरणा पित्रे

गुरगुट्या मऊभात आणि नाचणीची आंबिल या दोन अतिपोषक पण जेवणेच्छा मारक पदार्थांनी आमचे शैशव ठार करपवून टाकले बघा. :( बाकी उकड , धिरडं, आंबोळी इ. शी सहमत. :)

गवि Tue, 09/04/2012 - 13:15
मी बदलत्या काळासोबतही खूष आहे. अर्थातच जुनं आठवून दाटून येणं हे "आता तो काळ गेला" अशा अर्थाने असतं. तो काळ परत यावा अशी इच्छा नाही. पुलंनी म्हटलंच आहे ना की सकाळी आम्हाला ओव्या ऐकायला मिळाव्यात म्हणून तू कंबर मोडून जात्यावर दळण दळत बस अशी अपेक्षा करणं चूक आहे. (दळल्याने व्यायाम होत असेलही. इथे उल्लेख फक्त सोयीबाबत आहे.) आता गिरणीच. तरीही आवंढा आवरुन गंमत म्हणून एक यादी तयार करतो. यापूर्वी इतर प्रतिसादांमधे हे पदार्थ आले असतील किंवा नसतील तरी: १. पानगी २.पातोळे ३. पोह्याचं डांगर ४. घारगे ५. फणसाचं सांदण ६. पंचामृत (आमटीचा प्रकार, दूधदह्याचं नव्हे.) ७. गोळ्याचं सांबार. ८. बिरड्यांची उसळ ९. कुळथाचं पिठलं १०. उकडीचे मोदक ११. सांजोरी / साटोरी १२. घावन / घाटले १३. फणसाची भाजी १४. कैरीची डाळ १५. कोयाडं १६. पेरुचा कायरस १७. तंबिटाचे लाडू (पाकृ पेंडिंग फ्रॉम रेवतीकाकू) १८. राघवदासाचे लाडू १९. सांडगे २०. कुरडया २१. गव्हाचा चीक २२. तांदळाची उकड २३. गव्हल्याची ख्रीर २४. केळफुलाची भाजी २५. जिर्‍यामिर्‍याचा भात २६. दडपे पोहे

In reply to by गवि

रेवती Tue, 09/04/2012 - 18:37
सॉरी गवि! एकदा केले होते पण माझ्याकडच्या त्यावेळच्या मिक्सरमध्ये पीठ नीट झाले नव्हते. आता नवीन मिक्सरमध्ये करून बघते. कळवण्यास विसरले, क्षमस्व.

मन१ Tue, 09/04/2012 - 14:10
सर्व वाचकांचे आभार. गवि,ब्याटमन , बल्लवाचार्य पेठकर काका आणि इतर काहींचे प्रतिसाद प्रचंड भावले. वेळेअभावी सध्या फक्त रुमाल टाकून ठेवतोय. सोल्कढी, पूडचटणी, हातकुटीची(खलबत्त्यात कुटलेली) शेंगदाणे आणि लसणाची चटाणी(मिक्सरीकृतचटणीहून शंभरपट चविष्ट असते.), मुळ्याची तिखट कडवट भाजी, मुगाच्या रव्याचा शिरा/सांजा, सत्यनारायणाचा केळी, केश्सर, काजू बदाम घालून केलेला शिरा. सातूचं दुधात कालवलेलं चविष्ट, पौष्टिक पीठ, लाह्याचं पीठ. नाचणी सत्व सालीच्या लाह्या, बत्तासे. चुरमुर्‍याचा सुशीला(ह्याचा आधीच कुणीतरी उल्लेख केलाय वर) . .अपूर्ण

मुद्दा वरण!!!! जीव की प्राण! त्या नंतर पुढचं वाचायला लागायला १० मिनिटे लागली! :) लेख मस्तच आहे. खूप खूप आठवणी जाग्या झाल्या. आमच्याकडे मसाले, पापड, लोणची, सांडगे, कुर्डया, चिंचा वाळवणे वगैरे प्रकार आख्ख्या बिल्डिंगचे एकत्रच व्हायचे. उन्हाळ्यात सुट्टीत राखण बसणे हा एक मोठा प्रकार असायचा. ते सगळं आठवतं आता आणि मग निमूट दुकानातून घेऊन येतो सगळं!

प्रभाकर पेठकर Tue, 09/04/2012 - 19:27
शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ एकाच ठिकाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध नसतात ह्याला मुख्य कारण जे 'शाकाहारी' (सर्वाहारी नाही) असतात ते, ज्या भटारखान्यात मांसाहारी पदार्थ शिजवले जातात अशा उपहागृहात जात नाहीत. शाकाहारी उत्तम जेवण/पदार्थ बनविण्यासाठी स्वयंपाकी मिळत नाहीत. कारण अशा स्वयंपाक्याला नोकरी मिळण्यासाठी फार कमी पर्याय उपलब्ध असतात. मांसाहारी आणि सर्वहारींची संख्या शुद्ध शाकाहारींपेक्षा जास्त असल्याने असे पदार्थ बनविणारे स्वयंपाकीच तयार होतात. जे उत्तम शाकाहारी स्वयंपाक करतात ते शाकाहारी वैशिष्ट्य असलेल्या उपहारगृहातच नोकरी करीत असतात. शुद्ध शाकाहारी गिर्‍हाईक मांसाहारी उपहारगृहाकडे फिरकत नसल्याने शाकाहारी वैशिष्ट्यांची उपहारगृहे वेगळी असतात. जसे पुरोहित, मामा काणे (एकेकाळी होते), कामत, उडप्यांची उपहारगृहे, गुजराथ्यांची उपहारगृहे, एखाद्या कुटुंबाने चालविलेले शाकाहारी उपहारगृह, कुठलेही अल्पोपहाराचे उपहारगृह, पावभाजी उपहारगृहे इ.इ.इ. अनेक पर्याय शाकाहारींसाठीही उपलब्ध असतात. परदेशात शाकाहारी पर्याय कमी उपलब्ध असतात असा माझाही अनुभव आहे. पण भारता व्यतिरिक्त शाकाहारींचे प्रमाणही इतरत्र कमी आढळते. जिथे जे विकले जाते तिथे तिथे ते बनविले जाते. टंड्रा प्रदेशात एअर कंडीशनर्स विकायचे दुकान कोण टाकणार? शाकाहारी जेवणात विविधता नाही असे म्हणणार्‍याला स्वयंपाकाचा अनुभव नसावा. भारतात तरी मांसाहार म्हंटले की अंडे, कोंबडी, मासे, मटण, डुक्कर, गोमांस ह्यांचे पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या मसाल्यांनी त्यात वैविध्य आणून बनविले जातात. तर शाकाहारीं मध्ये भाज्या हा पर्याय घेतला तरी फळभाजी, पालेभाजी, मुळं, शेंगा असे अनेक प्रकार आहेत. त्यांचे कोरडी भाजी, पीठ पेरून भाजी, रस्सा भाजी, डाळ मिसळून केलेली भाजी, मिश्र भाजी असे विविध प्रकार आणि त्याला वेगवेगळ्या पद्धतीने (कोल्हापुरी, मालवणी, पंजाबी, गुजराथी, ब्राह्मणी, कायस्थांची, सिंधी, राजस्थानी इ..इ.इ.) बनविण्याच्या पाककृती असतात. पोळ्या तर किती प्रकारच्या साधी पोळी, घडीची पोळी, परोठा, फुलका, रोटी, नान, कुलचा, स्टफ्ड परोठा, गोडाच्या पोळ्या, पुर्‍या, भटूरे, धीरडी, डोसे, आंबोळ्या, ठेपले (अगदी फोडणीची पोळी, पोळीचे लाडू) असे अनेकविध प्रकार आहेत. भातांचे प्रकारही अनंत आहेत. साधा भात, मसाले भात, बिरड्यांचा भात, वांगी भात, पुलाव (मुळचा मांसाहारी पण आता शाकाहारातही समाविष्ट), टोमॅटो, पालक भात, खिचडी, बिशी ब्याळी, वडा भात, फोडणीचा भात, दही बुत्ती, अनेकानेक प्रकार आहेत. आमट्या- तुरीच्या डाळीची,मुगाच्या डाळीची, डाळ ढोकळी, चण्याच्या डाळीची, सर्व उसळी, मोड आलेली कडधान्ये, विविध भाज्या वापरून पातळ भाज्या ह्यातही गुजराथी खासियत, दाक्षिणात्य पद्धती, पंजाबी तडके इ.इ.इ. लोणची, कोशिंबीरी, पापड, कुरडया, पापड्या, सांडगे, डांगर, पचडी, पंचांमृत, दही घालून, बिन दह्याची. चटण्या - ओल्या आणि कोरड्या असंख्य आहेत. गोडाचे पदार्थ- श्रीखंड बासुंदी पासून यादी करायला घेतली तर पन्नास एक सहज नांवे निघतील. तेच उपहाराचे. पोहे, बटाटे वडे, डोसे, उत्तपा, सांजा, उपमा, ढोकळा, शेव, चिवडा, पापड्या, फाफडा, कचोर्‍या, पॅटीस अंतहीन यादी तयार होईल. अजून वरील यादीच्या चौपट पदार्थ शाकाहारीच्या छत्राखाली येतात. पण सध्या एवढेच पुरे. हे सर्व पदार्थ भारतात वेगवेगळ्या उपहारगृहात मिळतात. प्रत्येक उपहारगृहाची एक खासियत असते. कोल्हापुरी, मालवणी, गोवन खासियत असलेल्या उपहारगृहात आपण शाकाहारी पदार्थ खायला जात नाही. तसेच गुजराथी उपहारगृहात आपण मटण बिर्याणी खायला जात नाही. मांसाहारी उपहारगृहात शाकाहारी पदार्थांचे वैविध्य दिसून येत नाही तर तिथे मांसाहारी वैविध्य तरी कुठे असते? पंजाबी मांसाहारी उपहारगृहात मालवणी, आणि मालवणी उपहारगृहात लखनवी बिर्याणी मिळत नाही. एखाद्याने ठेवली तरी नुसते मेनू मधील एक नांव असते. तो त्या जागेचा अस्सलपणा त्यात नसतो. 'मालवणी चिकन', 'दम बिर्याणी', 'फिश कोळीवाडा' 'मटण कोल्हापुरी' वगैरे वगैरे वगैरे मेनू मधली नांवे असतात. रंग, रुप आणि चवीच्या नांवाने अगदी बोंब असते. सर्व एकाच उपहारगृहात करायचे म्हंटले तर तसे त्या त्या क्षेत्रातले तज्ञ कारागिर लागतात. तसे आणले तर बाहेरच्या गिर्‍हाईकांपेक्षा भटारखान्यात कर्मचारीवर्ग जास्त होईल. त्यांचे वेतन, राहण्याची, जेवण्या-खाण्याची सोय इ.इ.इ. पाहता कुणा मालकाला परवडणार नाही. शिवाय, प्रत्येक भटारखान्याचे आकारमान, सामानाची उपलब्धता, नगरपालिकेचे नियम इत्यादीं गोष्टी त्या त्या भटारखान्याची उत्पादन क्षमता ठरवत असतो. कुठल्याही भटारखान्यातून अमर्यात उत्पादन शक्य नसतं. त्यामुळे आपल्या मर्यादा जाणून मेनू आणि वैशिष्ट्य ठरवावे लागते. सर्व एका ठिकाणी अपेक्षिण्यापेक्षा त्या त्या वैशिष्ट्यांच्या उपहारगृहांना भेटी द्याव्यात. कोल्हापुरीसाठी 'पुरेपुर कोल्हापुर, मालवणीसाठी 'कोकण दर्शन', पंजाबी साठी 'ग्रेट पंजाब', मराठी थाळीसाठी 'श्रुती डायनिंग हॉल' गुजराथी जेवणासाठी एखादे गुजराथी उपहारगृह इ.इ.इ. शाकाहारी पदार्थात वैविध्य नाही किंवा निदान भारतात तरी, बाहेर कुठे मिळत नाही असे मला वाटत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

मन१ Tue, 09/04/2012 - 19:44
अनुभव आणि व्यावहारिकता ह्यांचे भक्कम पाठबळ असलेल्या प्रतिसादास दंडवत. "श्रुती " नाव gud books मध्ये पाहून कसेसेच झाले. पुण्यातले श्रुती म्हणत असाल तर त्याहून आशा, श्रेयस व इतर शेकडो चांगली ठिकाणे आहेत. वरती "सकारात्मक प्रतिसाद देतो" म्हणून गविंच्या प्रतिसादाखाली रुमाल टाकलाय तो हेच enlist करायला. मी नुसती ठिकाणे लक्षात ठेवत नाही, जमेल तितके कुठल्या ठिकाणे काय काय चांगले मिळते ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो.

In reply to by मन१

प्रभाकर पेठकर Tue, 09/04/2012 - 19:58
मी दिलेली नांवे 'सर्वोत्तम' नाहीत. एक उदाहरण म्हणून, शास्त्रापुरती घेतली, आहेत. प्रत्येकाने आपापल्या आवडीच्या उपहारगृहांकडे पाय वळवावेत, ही विनंती. पुण्या - मुंबईत अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

In reply to by प्रभाकर पेठकर

बॅटमॅन Tue, 09/04/2012 - 20:06
दंडवत. _/\_ किमान भारतात तरी हा शाकाहाराभाव कुठेच अनुभवायला मिळत नाही- अपवाद बंगालचा. मागे एका प्रतिसादात मी म्हटले होते की बंगाली व्हेज डिशेस देखील बर्‍याच असतात, पण कोलकात्यात सर्वसामान्य हाटेलांची अवस्था लै दारूण आहे. तशी साधीसुधी हाटेले आय मीन मध्यमवर्गीय जवळपास नाहीतच म्हटले तरी चालेल. प्यूर व्हेजवाले लै गंडतात तिथे. मी सर्वाहारी असल्याने प्राब्ळम नै आला पण चिकनं लै खाऊन खाऊन नंतर वात आला. (कोलकात्यात २ वर्षे काढलेला) बॅटमॅन.

In reply to by बॅटमॅन

प्रभाकर पेठकर Tue, 09/04/2012 - 20:17
अजून दुसरी एक समस्या असते. जन्मापासून मांसाहारी कुटुंबात मांसाहार करीत वाढलेला स्वयंपाकी मांसाहारी पदार्थ बनविण्याच्या कौशल्यावर जेवढा भार देतो तेवढा शाकाहारी पदार्थांबाबत देत नाही . शाकाहारी पदार्थ नांवालाच शिकतो. एखादा पदार्थ शिकताना आपल्याला त्याची मनापासून आवड असायला लागते. शाकाहारी कुटुंबात वाढलेला शाकाहारी माणूस पुढे जाऊन मांसाहारी झाला तरी शाकाहारी पदार्थ शिकताना/करताना मन लावून शिकतो/करतो. दाक्षिणात्य स्वयंपाक्याला मराठी शाकाहारी पदार्थ शिकताना/करताना अडचणी येतात. त्याला मुळात स्वयंपाकाची आवड असेल तर जसे सांगितले तसेच्या तसे तो करू शकतो पण त्यात ती आत्मियता नसते.

In reply to by प्रभाकर पेठकर

बॅटमॅन Tue, 09/04/2012 - 20:24
हां हे बाकी खराय!! हा मुद्दा लक्षातच आला नव्हता. पण एक सांगा,
जन्मापासून मांसाहारी कुटुंबात मांसाहार करीत वाढलेला स्वयंपाकी मांसाहारी पदार्थ बनविण्याच्या कौशल्यावर जेवढा भार देतो तेवढा शाकाहारी पदार्थांबाबत देत नाही . शाकाहारी पदार्थ नांवालाच शिकतो.
आणि
शाकाहारी कुटुंबात वाढलेला शाकाहारी माणूस पुढे जाऊन मांसाहारी झाला तरी शाकाहारी पदार्थ शिकताना/करताना मन लावून शिकतो/करतो.
ही तफावत का? बाकी पेठकरकाका हॉटेल बिझनेसबद्दल आपण इथे काही आधी लिहिलेले आहे काय? नसल्यास ते लिहावे अशी या निमित्ताने नम्र विनंती. प्रत्यक्ष हॉटेल व्यावसायिकाकडून त्या व्यवसायाशी संबंधित वाचायला मिळणे म्हणजे पर्वणि असेल. जर लिहिले असेल तर कृपया लिंक्स द्याल का प्लीज?

In reply to by बॅटमॅन

प्रभाकर पेठकर Tue, 09/04/2012 - 20:41
जन्मापासून मांसाहारी कुटुंबात मांसाहार करीत वाढलेला स्वयंपाकी मांसाहारी पदार्थ बनविण्याच्या कौशल्यावर जेवढा भार देतो तेवढा शाकाहारी पदार्थांबाबत देत नाही . शाकाहारी पदार्थ नांवालाच शिकतो. आणि शाकाहारी कुटुंबात वाढलेला शाकाहारी माणूस पुढे जाऊन मांसाहारी झाला तरी शाकाहारी पदार्थ शिकताना/करताना मन लावून शिकतो/करतो. कदाचित, मांसाहारी कुटुंबात जन्मलेल्या मांसाहारी व्यक्तीची 'नाळ' मांसाहाराला जुळलेली असते आणि शाकाहारी कुटुंबात जन्मलेला शाकाहारी माणूस पुढे जाऊन मांसाहारी किंवा मिश्रहारी झाला तरी त्याची 'नाळ' शाकाहाराशीच जुळलेली राहते. हे सर्वसाधारण निरिक्षण आहे. ह्याला अपवादही असू शकतील. हॉटेल बिझनेसबद्दल आपण इथे काही आधी लिहिलेले आहे काय? नाही. अजून काही लिहीले नाही. कारण हा व्यवसाय मीच अजून शिकतो आहे. त्यावर काही लिहावे इतका माझा अधिकार नाही. हं! आजवरचे जे अनुभव आहेत, जी निरिक्षणं आहेत ती मांडेन कधीतरी सर्वांसमोर. धन्यवाद.

५० फक्त Wed, 09/05/2012 - 08:16
अरे, खायला जायच्या ठिकाणांच्या लिस्टा काय काढताय, च्यायला फोनं करुन बोलावलं तर एकजण येत नाही, उगा गप्पा मारताय इथं, असो. आजी- आजोबांचा सहवास न लाभल्यानं अनवट, अनोळखी पदार्थांची आपली काही ओळख जास्त नाही,आणि त्यातुन येणारा नॉस्टॅलिजिया पण नाही, ह्याचं वाईट वाटतंच कधीतरी पण त्याचवेळी पुढं जाताना मागं अडकवुन ठेवणारा एक दोरखंड कमी आहे याचा आनंद पण आहे. तर दुर्मिळतेच्या बाबतीत वर्षातुन एकदा होणारी पडवळाची भजी हीच काय ती दुर्मिळता, बाकी पोळी, भाजी, वरण, भात हा शाकाहार ओळखीचा. खाण्याबद्दल खाली स्वाक्षरीत लिहिलेलं आहे, आणि गेल्या दोन वर्षात स्वाक्षरी बदललेली नाही यावरुन काय ते समजुन घ्या. पुण्यातल्या खादाडीबद्दल -- पराठे - बॅटमॅनशी चैत्यन बद्दल सहमत, शाजीला पर्याय नाही, हल्ली आम्ही सहा सहा चुरचुर नान खाउन येतो हा भाग अलहिदा. - उत्तर भारतीय - हॉर्न ओके - जरा उच्चवर्गीय , भगतचंद ताराचंद हे सुद्धा उच्चवर्गीय, क्वालिटि कॅम्प - जरा जास्तच उच्चवर्गीय, दिल्ली किचन् मॉडेल कॉलनी ( वपाडावच्या रुममागे ) गावात आणि बाहेर एक्स्प्रेस वे वर रंगला पंजाब, - हे एकदम आँथेटिक पंजाबी. सोलापुर रोडला यवत जवळ कांचन - शामसवेरा ही भाजी आणि गोडसर असणारी लखनवी बिर्याणी - (अतृप्त आत्मा तृप्त झाला तर तुमची आमची काय टाप आहे) मराठी घरगुती - बादशाही - जनसेवा - सात्विक - दुर्वांकुर - श्रेयस - पिठलं भाकरी - खेड शिवापुरला कैलास गार्डन आणि मोराची चिंचोळीला थोपटेंच्या घरी (किटलीनं शुद्ध तुप वाढणे हा माज इथंच अनुभवा शकता ) मिसळपाव - हेमंतची गाडी कर्वे रोड, मामा मंगला टॉकिज्च्या बाहेर, ज्योती भिगवण, वैद्य रविवार पेठ, खासबाग मिसळ सिंहगड रोड, नारायणगाव, मंचर (संदर्भ - विनोद बाणखेले), दिपक पौड गाव (संदर्भ - वल्ली ), कांचन सुद्धा चांगलं आहे. नाष्टा - बिपिन सह्याद्री हॉस्पिटलच्या बाहेर कर्वे रोड, पेठेतले बरेच छोटे स्टॉल, वडापाव - सहकार नगर मधलं हॉटेल, नाव नक्की आठवत नाही. दक्षिण भारतीय - रास्ता पेठेतल्या दोन मेस, भवानी आणि आंध्रा मेस, बजेटमध्ये उत्तम जेवण. दक्षिणायन क्वालिटिबद्दल उत्तम पण उपासमार निश्चित (थोडक्यात होंडा ब्रायो), हैदराबादी बिर्याणी - कोयला एफसी रोडच्या शेवटी चायनीज - सुदित्सु डहाणुकर कॉलनी, अजुन एक आहे पण वल्लीला मुहुर्त मिळत नाहीय म्हणुन राहिलंय तिथं जायचं. बार्बेक्यु - सरुटॉबाने, कबाब - कबाब फॅक्टरी रॅडिसन खराडी (बहुतेक) पाणीपुरी - वारजे जकात नाक्याजवळ, रुणवालच्या गेट समोर आणि इतर अनेक, आईस्क्रिम - नॅचरल सगळेच , ट्रॉपिकाना कॅम्प मधलं सिझलर - दि प्लेस कॅम्प, याना, ढोले पाटिल रोडवर एक, नाव आठवत नाही योको बहुदा. बंगाली - ओह कलकत्ता, अतिच्च उच्च पण क्वालिटि आणि क्वांटिटि पण तेवढीच उच्च, इतरवेळी गणेशखिंड मधली दोन हॉटेल ग्रेट. अजुन अ‍ॅडवत राहिनच, बाकी अजुन सोलापुरातले टाकायचे राहिलेत असो.

In reply to by ५० फक्त

बॅटमॅन Wed, 09/05/2012 - 11:12
तुमचीच वाट पाहत होतो. अपेक्षेप्रमाणेच प्रतिसाद. एकच शंका: टिपिकल नॉर्थ इंडियन स्टाईल पाणीपुरी पुण्यात तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी मिळते??????असेल तर सांगा जरूर. कोलकात्यातली पाणीपुरी जगात एक नंबर आहे. त्या तुलनेत इथली म्हंजे ऐरावतापुढे तट्टाणी.

In reply to by बॅटमॅन

मोदक Wed, 09/05/2012 - 18:53
कँपमध्ये एम जी रोडवर अरोरा टॉवर्सच्या दिशेने उलटे चालत आले (कारण वाहनांना नो एंट्री आहे!) उजवीकडून तिसरी गल्ली. चौथे दुकान. दही सामोसा आणि चाट हे प्रकार - मस्ट ट्राय. तुला जळवण्यासाठी.. सध्या इंदूर मध्ये आहे. कालच पाणीपुरीवर ताव मारला... (टोटल ७ फ्लेवरचे पाणी होते - खट्टामीठा, तीखा, कैरी, लेमन, लसूण, हिंग, जीरा) जबरा प्रकार होता!!! उद्या, शुक्रवारी आणि शनिवारी परत परत जाणार आहेच! :-D

In reply to by ५० फक्त

निश Wed, 09/05/2012 - 18:07
५० फक्त साहेब, मला ओह कलकत्ता चा पत्ता मिळेल का? एक मित्र मागे पुण्याला आला होता काही कामा निमित्त तेव्हा तिथे गेला होता. त्याला नक्की आठवत नाही आहे पत्ता तो ऐव्हढच म्हणाला होता की जंगली महाराज रोडवर आहे.

In reply to by निश

५० फक्त गुरुवार, 09/06/2012 - 08:07
ओह कलकत्त्ता, जेएम रोडवर नाही, ते बंडगार्डन / ढोले पाटिल रोडवर आहे , सिटि पॉइंट नावाच्या इमारतीत, जहांगीर हॉस्पिटलकडुन जो रोड येरवड्याकडे जातो तिथे.,

श्रीरंग_जोशी Wed, 09/05/2012 - 09:09
मनोबांनी एकदम अंतःकरणाजवळच्या विषयाला हात घातला. प्रस्तुत लेख व त्यावरील विविध प्रतिक्रियाही जोरदार. आजकालच्या बर्‍याच भाज्या संकरित वाणाच्या असल्याने पूर्वीसारखी चव मिळत नाही. वर विषयांतर झालेच आहेत तर माझेही एक निरीक्षण नोंदवतो. काही महिन्यांपूर्वी काश्मीर सहलीला गेलो होतो तर जागोजाग १००% शुद्ध शाकाहारी भोजनालयांचे प्रमाण इतके होते की आपल्याकडे कुठेही आढळणार नाही. याबद्दल चौकशी केल्यावर कळले की बरेच लोक वैष्णव देवी ची यात्रा व काश्मीर सहल एकत्र करतात अन यात्रेदरम्यान मांसाहार टाळतात (जे सर्वाहारी असतील ते). अन दुसरे वैशिष्ट्य म्हणजे बहुतांश पदार्थ आपल्याकडील पदार्थांप्रमाणे बनवले होते जसे फुलके, रस्सा भाज्या इत्यादी. पंजाबी प्रभाव जाणवला नाही. परदेशात जागोजाग विविध देशांच्या पदार्थांची फास्ट फूड साखळी उपाहारगृहे आढळतात पण त्या प्रकारचे भारतीय उपाहारगृह नसल्याने मन खट्टू होते. कल्पना करा असे काही उपाहारगृह असावे जेथे सकाळी पोहे, उपमा, इडली, पराठे, व इतर वेळी कचोरी, समोसे, उतप्पे, साबुदाणा वडे या प्रकारचे पदार्थ मिळतील. कसली धमाल होईल नं? पण कदाचित भारतीय पदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी एकाच चवीचे बनवणे अशक्य असल्याने कुणी त्यासाठी फ्रंचायझी संकल्पना राबविली नसावी.

आनंद भातखंडे Wed, 09/05/2012 - 16:06
एकत्र कुटुंब असल्याने अजूनही आईच्या हातचे असे अनेक पदार्थ खायला मिळतात. बाकी लेख मस्तच. (तर्री साठी नवीन माहीती: मी एकत्र कुटुंबात राहतो.) ;)

राही गुरुवार, 09/06/2012 - 15:26
यायचे तेव्हढे प्रतिसाद येऊन झालेले आहेत, धागा मुखपृष्ठावरून हटण्याच्या बेतात आहे. आता आणखी सांगण्यासारखं फारसं काही नाही. तरी एकदोन गोष्टी लिहाव्याशा वाटतात. यात काहींच्या दृष्टीने दुर्मीळ अशा बर्‍याचशा पालेभाज्यांचे उल्लेख आले आहेत. पुण्यात किंवा परदेशात या भाज्या दुर्मीळ असतीलही पण निदान मुंबईत तरी त्या अजिबात दुर्मीळ नाहीत. दादर, माटुंगा रोड आणि माटुंगा, गिरगाव-बनाम लेन,गावदेवी,फोर्ट मार्केट, कुलाबा-कोळीवाडा,भायखळा,परळ, चिंचपोकळी,भांडुप,मुळुंद,ठाणे,डोंबिवली,पार्ले,अंधेरी,गोरेगाव,बोरिवली इ. ठिकाणी त्या हंगामात मुबलक मिळतात.यात उल्लेख न झालेले असे भोपळ्याचे कळे,टोकाकडचे कोवळे तणावे(बोखे),चवळीच्या लांब शेंगांच्या वेलाचेही कोवळे तणावे,चंदनबटवा,करडई,मोहरीचा पाला,सुरणाचा पाला,असे बरेच काहीबाही असते. केवळ वांग्याचेच आठ-दहा प्रकार तरी असतात. कंटोळी/करटुली सुद्धा खूप असतात. फक्त या भाज्या आणून साफ करणे कुणाला जिकीरीचे वाटू शकत असेल म्हणून त्या आणल्या जात नसतील. त्यामुळे यात स्मरणरंजकताही जाणवली नाही. आणखी म्हणजे यात हळवेपणाने लिहिल्या गेलेल्या टाकळा,पोकळा, तेरं कुर्डू या भाज्या अक्षरशः कुठेही उगवतात, बहुतेककरून रस्त्याच्या कडेने किंवा उकिरड्यावर. टाकळा तर मी पुण्यात बाणेर,पाषाण,सूस रोड्,सांगवी,सोलापुर रोडवर पुणे सोडून जरासं पुढे अशा नवीन विकसित होणार्‍या भागातल्या मोकळ्या जागेत आणि रस्त्याच्या कडेने अमाप पाहिला आहे. आताशी तो जून होऊन त्याच्या पिवळ्या फुलातून शेंगा धरल्या आहेत. पानेही पिवळसर झाली आहेत. या पिवळ्या रंगामुळे तो पट्कन उठून दिसतो. रस्त्यांवरून वर्दळ असल्यामुळे/नसल्यामुळे थुंकणे व इतर पुढचे प्रकार बिनधास्त चालतात. शहराच्या इतक्या जवळ जर या भाज्या उगवत असतील तर आडरानातून कापून आणण्याचे श्रम कोण कशाला करील? आमच्या घरी टाकळा तर अजिबात आणू नये अशी सर्वांना सक्त ताकीद आहे. या धाग्याचे उरलेसुरले जे कोणी वाचक असतील, त्यांनी स्मरणरंजनाच्या भावुकतेत वाहून न जाता सध्याच्या वास्तवाचा विचार करावा इतकंच. तशाही सर्वच पालेभाज्या शिजवण्यापूर्वी स्वच्छ धुणे,मिठाच्या किंवा पोटॅशिअम पर मँगनेट्च्या पाण्यात बुडवून ठेवणे वगैरे काळज्या लोक घेतच असतात, पण तरीही हे सांगणं उचित वाटलं.

In reply to by राही

रेवती गुरुवार, 09/06/2012 - 19:16
ग्रेट. या भाज्यांचा उल्लेख नसलेला मलाही जाणवला पण 'इतकं कोण करत बसणार?' अशी (घाईगर्दीवाल्यांचं एक ठीक आहे)मानसिकता असल्यानं "अय्या! तुम्ही चंदनबटव्याची भाजी खाता?" (चंदबटव्याच्या जागी आणखी कोणतीही पालेभाजी कल्पावी). याचं उत्तर दिल्यानंतरही अविश्वासानं पाहिलं जातं. एकांनी तर चक्क "गरीबं आहात का पालेभाजी खायला?" असं विचारून बुचकळ्यात पाडलं होतं. बाकी केनीकुर्डूची भाजी वगैरे श्रावणात उगवतात एवढे माहित होते. टाकळ्याबद्दल सहमत. विचारही नको वाटतो तो!

रेवती Sat, 04/02/2016 - 08:18
पुन्हा एकदा पोथी वाचल्यासारखा हा लेख वाचला. २०१२ला आपण काय प्रतिसाद दिले होते (किंवा मिपासदस्य झाल्यापासून) हे सगळं पहायला मिळतं. गंमत वाटते. काही बाबतीत आपण बदलत जातो. आधी गोडा मसाला, गरम मसाला घरी करतच होते पण मागील वर्षी कैरीचे लोणचे शिकून घेतलेय व आता दुसर्‍यांदा केले. विकतचे आता खाववत नाही. आधीच बाहेर खाण्याचा आनंद होता आता आणखीनच नको वाटते. मुलाला आवडते म्हणून जाणे होते. भाजणी घरी केलेलीच लागायची. तो हट्ट सोडला. आता आईला तेवढे करणे होत नाही. तिखट, हळद यांचा वहिनीकडे मोठा व्यवसाय असल्याने उत्तम दर्जाचे जिन्नस घरात अजून तरी येतायत पण त्यामुळे कंपनीचा शिक्का असलेले घ्यायला नको वाटते. त्यांच्याकडे मागायलाही नको वाटते. जवळजवळ पाचेक वर्षांनी आत्ता पहिल्यांदा तिखट रामदेव प्रकारातले आणले आहे. भारतभेटी कमी झाल्यात पण येथे काही गोष्तींची उपलब्धता आहे म्हणून बरे वाटतेय.

सविता००१ Sat, 04/02/2016 - 12:05
करते सगळं घरीच. कारण मलाच आवडतं करायला. शिवाय एकदा एक लेख वाचला होता की विकतच्या मसाल्यांमध्ये भेसळ म्हणून काय काय घालतात. मग अगदीच शिसारी आली. म्हणून जाणीवपूर्वक वेळ काढून घरीच करते. आई तर नाहीये सांगायला पण मग ओगले आजी आहेत ना :) रुचिरा झिंदाबाद. तिखट, हळद पण आणते दळून. पण वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे मिरची नाही ओळखता आली. मग मागच्या वर्षी झाली होती फजिती. अगगीच तिखट नाही.तेव्हा मात्र विकत आणलं होतं. आता रामदेव बाबांचं आणून पहावं की काय असं चाललंय. हा लेख मात्र भन्नाट आहे. वाचायचा राहून गेला होता. आणि हो, पुण्यातलीच कितीतरी ठिकाणं खरंच माहीतही नाहीत मला:(

नीलमोहर Sat, 04/02/2016 - 12:20
आवडला लेख, बाहेरचं कधीतरी बरं वाटतं पण घरच्या जेवणाची सर कशालाच नाही. आमच्याकडेही बर्‍याच गोष्टी, तिखट, मसाला, लोणचे, लोणी, तूप सगळं घरीच बनतं.

स्वाती दिनेश Sat, 04/02/2016 - 17:35
आवडला, तेव्हाही आवडला होताच. परत परत वाचला.. आणि स्मरणरंजनात दंग झाले. स्वाती

मन१ Tue, 04/05/2016 - 11:06
दोन चार वर्षं उलटली. कॅलेंडरं बदलली. माझ्या विविध समजुती, श्रद्धा बदलल्या. नवे अनुभवही आले. थोडंफार शहाणपण देउन गेले. दुनियेकडे पहायचा चष्मा अलवार बदलत चालला. पण आजही काही मूळ आवडीनिवडी जशाला तशा आहेत. अगदि खोल आतवर असाव्यात तशा. नवे पदार्थ, नवे जिन्नस ट्राय केले. आवडले. कक्षा विस्तारल्या. पण आधी जे आवडत होतं, त्यांची अजगा नव्या पदार्थांनी घेतली असं झालं नाही. पूर्वीचेही आवडतात; आणि आता नव्यांनाही सामावून घेतलय. . . दोन चार वर्षांत अधून मधून हा धागा वर आलेला दिसतो. कित्येकदा तर मी मिपावर ऑल्मोस्ट निष्क्रिय असतानाही हा धागा वरती येउन गेल्याचं दिसतय. का होत असावं असं? माझा अंदाज -- आपण सगळे वेगळे आहोत. सगळ्याच्या स्वतःच्या अशा आवडी वेगळ्या. ज्याची त्याची घरं वेगळी, वातावरणं, संस्कृती वेगळी. कुणी चाळीतला, कुणी फ्लॅटवाला, कुणी झोपडितला, कुणी गावातल्या वाड्यात राहणारा....ज्याचे त्याचे भाव विश्व वेगळे. कदाचित काही मूल्यंही वेगळी. त्याच सोबतीनं आवडीही वेगळ्या. म्हणजेच व्यक्ती तितक्या प्रकृती.... लाखो प्रकारची माणसं.... हे सगळं खरं. हे नेहमी बोललं जातच.पण.... आपण खूपसे वेगळे असतो, म्हणेज पूर्णच वेगळे असतो असं नाही. किंबहुना "आपण वेगळे आहोत" हे पुन्हा पुन्हा सांगावं लागतं; कारण आपल्यात कुठेतरी समानत्व आहे ह्याची ऑपॉप/ इम्प्लिसिटली एक जाणीव मनात असते. म्हणजे.... अ‍ॅट रॅण्डम जर आपण विविध पातळीवर "आपल्यासारखे" लोक शोधू लागलो, तर परफेक्ट तीच आवड सर्व बाबतींत आपल्यासारखे असणारे मुश्किल. चित्रपट, संगीत, खाणं, मौज करण्याची कल्पना, रिकाम्या वेळेचा उपयोग करण्याच्या कल्पना, आवडते काम, खेळ , सुम्दरतेच्या आपल्यक्लल्पना..... असे सगळे निकष लिहिले तर कोणत्या न कोणत्या बाबींत कुठलीही दोन व्यक्तिमत्वं काही प्रमाणात तरी वेगळी असणार. म्हणून आपण म्हणतो की "आपण सगळे वेगळे ,स्वतंत्र" . . पण हे चित्र अपूर्ण आहे. आपण काही निकषांत वेगळे असलो, तरी कित्येक निकषांत आपल्यात काही समान आवडीहीए असतीलच की. भिन्नता आप्ल्या व्यक्त होण्यात असेल. कुणाला एखाद्या संगीतानं नॉस्टॅल्जिक व्हायला होत असेल, किंवा कुनाला काही खास अशा चवीएंमुळे. पण खाल्ल्यानंतरच्या क्षणांत किम्वा संगीत कानात पोचून मेंदूत डिकोड झाल्यानंतरच्या क्षणांत "नॉस्टॅल्जिया" चा जो अनुभव येतो; तो दोघांचा थोडाबहुत सारखाच असणार. म्हणजे तेवढ्या अनुभूतींबाबत तरी आपण समान असणार. . . हा धागा बहुतेक त्या काही समान असणार्‍या जाणिवांपर्यंत पोचतोय असं वाटतं. त्यामुळे वर्षं उलटली तरी लोकं दखल घेतात. प्रतिसाद देतात. मला दह्यातलं पिठलं घरची आठवण करुन देतं, कुणाला माशाचं कालवण करुन देत असेल. पदार्थ वेगळे असले तरी त्या पदर्थां 'नंतर' होणारी त्याची आणि माझी मनाची अवस्था बरीचशी सारखीच असेल. आपण खूपसे वेगळे असतो. बरेचसे सारखेही असतो.