मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ललित लेखनात शिव्या असाव्यात का? :)

विसोबा खेचर · · काथ्याकूट
राम राम मंडळी, ललित लेखनात शिव्या असाव्यात का? माझ्या मते ललितलेखनात काय लिहावे, कसे लिहावे, कुठली भाषा वापरावी, याचे लेखकाला/लेखिकेला पूर्ण स्वातंत्र्य असावे. आपलं मत जाणून घेण्यास उत्सुक आहे! :) धन्यवाद.... आपलाच, तात्या.

वाचन 31390 वाचनखूण प्रतिक्रिया 46

बेसनलाडू Mon, 11/12/2007 - 11:13
शिव्या असाव्यात का असेच नुसते विचारले, तर "हो" असे उत्तर देईन. मात्र लेखनात चितारलेले व्यक्तिचित्र / चितारलेल्या व्यक्ती, प्रसंग इ. पार्श्वभूमी लेखनातूनच माहीत असताना / लेखनातूनच याची ओळख करून दिली असताना लेखनात शिव्या लिहिणे वेगळे आणि कुणालातरी शिव्या द्यायच्याच आहेत, अशा हेतूने 'ललित' लेखन करणे वेगळे . लेखनातील शिव्या या व्यक्तिनुरूप, परिस्थितीनुरूप असाव्यात; मात्र लेखन शिव्यांनुरूप नसावे :) (ओव्याशिव्यांतला)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 11:18
लेखनात शिव्या लिहिणे वेगळे आणि कुणालातरी शिव्या द्यायच्याच आहेत, अशा हेतूने 'ललित' लेखन करणे वेगळे . हा हा हा! मस्त....:) तुम्ही कुठल्या लेखनचा संदर्भ मनात धरून हा प्रतिसाद लिहिला आहात हे कळलं बरं का आम्हाला! :) लेखनातील शिव्या या व्यक्तिनुरूप, परिस्थितीनुरूप असाव्यात; मात्र लेखन शिव्यांनुरूप नसावे :) हे पण सहीच...:)) तात्या.

In reply to by बेसनलाडू

आजानुकर्ण Mon, 11/12/2007 - 11:24
मस्त!
लेखनातील शिव्या या व्यक्तिनुरूप, परिस्थितीनुरूप असाव्यात; मात्र लेखन शिव्यांनुरूप नसावे :)
(आनंदित) आजानुकर्ण

In reply to by बेसनलाडू

धनंजय Mon, 11/12/2007 - 11:37
ललितसाहित्याला लालित्याचे नियम असतात. कुठल्याही कलेला चौकट असते, हे स्टेज-कलाकार तात्या ओळखतातच. "रागिणीचा पदर ढळल्याचे त्यांच्या चटकन लक्षात येई..." वगैरे, वगैरे. हे सर्व बे.ला. यांनी छान सांगितले आहे. (मतदार या नात्याने) जिथे ललित-साहित्य-वस्तूच्या ओघात शिवी हीच चपखल बसते, तर ती वापरणे योग्य, इतकेच नव्हे जरुरीचेही असते. अन्यथा नाही. कारण ओघात नसून शिवी योजली तिथे रसभंग होऊ शकतो. +१

In reply to by धनंजय

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 11:57
जिथे ललित-साहित्य-वस्तूच्या ओघात शिवी हीच चपखल बसते, तर ती वापरणे योग्य, इतकेच नव्हे जरुरीचेही असते. अहो पण ती चपखल बसते किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार लेखकाचा नाही का? वाचक कसं काय ते ठरवू शकतात? फार फार तर सदर लेखकाचं लेखन वाचायचं किंवा नाही एवढाच फक्त वाचकांचा अधिकार आहे असं मला वाटतं. काय चपखल बसतं/काय लिहायचं/काय लिहायचं नाही हे ठरवण्याचा अधिकार लेखकाचाच नाही का? उदाहरणार्थ, पेंडश्यांच्या तुंबाडचे खोत कादंबरीत 'चोदिच्या' ही आमच्या कोकणतली अगदी ठेवणीतली शिवी आली आहे. ती चपखल बसते किंवा नाही हे वाचक कसं काय ठरवू शकतात? 'चोदिच्या'च्या ऐवजी 'चुतमारिच्या' किंवा 'भिकारचोटा' याही शिव्या चालल्याच असत्या की! किंबहुना, यापैकी तिथे कोणतीच शिवी आली नसती तरीही चाललंच असतं की! मग तिथे 'चोदिच्या' ही शिवी चपखल बसते असं तुम्ही म्हणाल का? की त्याबाबबत काय ते ठरवण्याचा अधिकार पेंडश्यांचा आहे हे एक वाचक म्हणून मान्य कराल? तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर Mon, 11/12/2007 - 12:11
फार फार तर सदर लेखकाचं लेखन वाचायचं किंवा नाही एवढाच फक्त वाचकांचा अधिकार आहे असं मला वाटतं. असं कसं तात्या? ह्याच चालीवर संकेतस्थळावर काय असावं आणि नसावं हे फक्त त्याच्या 'मालकाला'च ठरवायचा अधिकार आहे.. ते चूक की बरोबर हे ठरवण्यास लेखक मंडळींनी तोफा डागू नयेत...लेखक मंडळींनी लेखन करावं किंवा नाही इतक्याच अधिकारात राहावं.. असंही म्हणता येइल की मग ;-) थोडक्यात लेखकाने त्याच्या मर्जीप्रमाणे लिहावे वाचकाने त्याच्या मर्जीप्रमाणे मत नोंदवावे. दोघांनाही एकमेकाचे ऑब्जेक्षन नसाअवे!

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 12:23
ह्याच चालीवर संकेतस्थळावर काय असावं आणि नसावं हे फक्त त्याच्या 'मालकाला'च ठरवायचा अधिकार आहे.. ते चूक की बरोबर हे ठरवण्यास लेखक मंडळींनी तोफा डागू नयेत...लेखक मंडळींनी लेखन करावं किंवा नाही इतक्याच अधिकारात राहावं.. असंही म्हणता येइल की मग ;-) अगदी खरं! आणि अहो काही लेखक मंडळींनी तर मालकांचा हा अधिकार अमान्य करून सदर संकेतस्थळ सोडून नवीन संकेतस्थळं काढल्याचेही माझ्या पाहण्यात आहे! :) थोडक्यात लेखकाने त्याच्या मर्जीप्रमाणे लिहावे वाचकाने त्याच्या मर्जीप्रमाणे मत नोंदवावे. दोघांनाही एकमेकाचे ऑब्जेक्षन नसाअवे! अगदी खरं आहे! दोघांनाही एकमेकाचे ऑब्जेक्षन नसाअवे! काही वाचक मंडळी ऑब्जेक्शन घेतात असे वाटते म्हणून तर शंकानिरसन करून घेण्याकरता हा चर्चाप्रस्ताव! :)) कसें? :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर Mon, 11/12/2007 - 12:33
काही वाचक मंडळी ऑब्जेक्शन घेतात असे वाटते म्हणून तर शंकानिरसन करून घेण्याकरता हा चर्चाप्रस्ताव! :)) त्यातले आम्ही तरी नक्कीच नाहीत हो..एक 'वाचक' ह्या नात्याने 'शिव्या खटकल्या' इतकी मताची एक पिंक टाकून मोकळे झालो हो. कसलेही ऑब्जेक्शन नाही!! पण अर्थातच 'संपादक' म्हणून कोणी ऑब्जेक्शन घेतले असल्यास ते वेगळे हो.. वाचक आणि संपादक म्हणजे एकच नव्हे! मिसळपाववर शेकड्यात वाचक आहेत पण संपादक पाचच आहेत असे वाटते.:))

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 13:43
'शिव्या खटकल्या' इतकी मताची एक पिंक टाकून मोकळे झालो हो. कसलेही ऑब्जेक्शन नाही!! पण अर्थातच 'संपादक' म्हणून कोणी ऑब्जेक्शन घेतले असल्यास ते वेगळे हो.. वाचक आणि संपादक म्हणजे एकच नव्हे! मिसळपाववर शेकड्यात वाचक आहेत पण संपादक पाचच आहेत असे वाटते.:)) वरील लेखनाचा संदर्भ लागला नाही! :) माझ्या चर्चाप्रस्ताव हा कुणा एका व्यक्तिच्या, लेखाच्या, संकेतस्थळाच्या संदर्भात नाही. तो कृपया ओव्हरऑल किंवा व्यापक अर्थाने घ्यावा असे माझे विनंतीवजा निवेदन आहे! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सहज Mon, 11/12/2007 - 12:37
>>काही वाचक मंडळी ऑब्जेक्शन घेतात असे वाटते म्हणून तर शंकानिरसन करून घेण्याकरता हा चर्चाप्रस्ताव! :)) ज्यांनी (म्हणजे ज्यांना तुम्ही त्यातल्या त्यात जवळचे मानता ती लोकं) ऑब्जेक्शन घेतलं असेल/आहे त्यांना "ललित लेखनात शिव्या असाव्यात का?" हा प्रश्र विचारला आहात का? :-) बेला यांनी बरोबर सांगीतल आहे. त्यामुळे तुम्हाला उत्तर कळले आहे ह्याबद्दल आमच्या मनात शंका नाही. :-) "शक्ति वेलू" "पोष्ट्या-गजानन" "चाणक्य भट्ट" "ऐहीकराव" (अजून थोडेसे उरलेले) यांना शिव्या घातल्याशिवाय व नमोगताचा जरा जप व तात्या-कोकणं-शिव्या-बाजार हे उल्लेख आल्याशिवाय तात्यांनी ललीत लेखन (मनमळ) करु नये काय, असा पण एक चर्चाप्रस्ताव टाकला पाहीजे. ;-) असो असे अधुन मधुन "ललित शाप" टाकल्या शिवाय आपल्याला समाधान मिळत नाही. काय करणार तब्येतीचा प्रश्र आहे (कफ-पित्त्-वात बॅलन्स मधे येत नाहीत ;-) ) तसेच "लोकांच्या ऑब्जेक्शन" साठी देखील तुम्ही कोकणी भाषेत एक शिवी राखुन आहात असे आतल्या गोटातुन कळते. त्यामुळे हा चर्चाप्रस्ताव उपयोगी आहे की नाही हे आपले पुढील "ललीत मनोगत" आल्यावरच स्पष्ट होईल. जय कोकणं! जय देवगडं!

In reply to by सहज

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 13:45
"शक्ति वेलू" "पोष्ट्या-गजानन" "चाणक्य भट्ट" "ऐहीकराव" (अजून थोडेसे उरलेले) यांना शिव्या घातल्याशिवाय व नमोगताचा जरा जप व तात्या-कोकणं-शिव्या-बाजार हे उल्लेख आल्याशिवाय तात्यांनी ललीत लेखन (मनमळ) करु नये काय, असा पण एक चर्चाप्रस्ताव टाकला पाहीजे. ;-) असो असे अधुन मधुन "ललित शाप" टाकल्या शिवाय आपल्याला समाधान मिळत नाही. काय करणार तब्येतीचा प्रश्र आहे (कफ-पित्त्-वात बॅलन्स मधे येत नाहीत ;-) ) तसेच "लोकांच्या ऑब्जेक्शन" साठी देखील तुम्ही कोकणी भाषेत एक शिवी राखुन आहात असे आतल्या गोटातुन कळते. त्यामुळे हा चर्चाप्रस्ताव उपयोगी आहे की नाही हे आपले पुढील "ललीत मनोगत" आल्यावरच स्पष्ट होईल. वरील लेखनाचा संदर्भ लागला नाही! :) माझ्या चर्चाप्रस्ताव हा कुणा एका व्यक्तिच्या, लेखाच्या, संकेतस्थळाच्या संदर्भात नाही. तो कृपया ओव्हरऑल किंवा व्यापक अर्थाने घ्यावा असे माझे विनंतीवजा निवेदन आहे! :) तात्या.

In reply to by सहज

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 14:02
"शक्ति वेलू" "पोष्ट्या-गजानन" "चाणक्य भट्ट" "ऐहीकराव" (अजून थोडेसे उरलेले) यांना शिव्या घातल्याशिवाय व सहजराव, आपण वरीलपैकी काही शब्द हे चुकीच्या पद्धतीने/चुकीचे लिहिले आहेत असे मला वाटते! 'शक्ति वेलू' नव्हे, 'शक्तिवेलू' 'पोष्ट्या-गजानन' नव्हे, 'पोष्ट्यागजानन' 'चाणक्य भट्ट' नव्हे, 'आर्य अशिषभट्ट' 'ऐहिकराव' नव्हे, 'ऐहिक राव' असो, चूभूद्याघ्या! :) आपला, (करेक्ट!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धनंजय Mon, 11/12/2007 - 19:05
हा साधारणपणे वाचकाला समजतो. दुसर्‍या कलेतील उदाहरण द्यावे तर चित्रपटातील नग्नता/संभोगाचे चित्रण. बहुतेक सरावाच्या प्रेक्षकांना कलात्मक ललितकलेच्या ओघात आलेले चित्रण कुठले संभोगाचे चित्रण आणि ब्ल्यू फिल्म कुठली ते ओळखू येते. याचे ढोबळ नियम कॅमेरा वापरायचे तंत्र, प्रकाशयोजना वगैरे, असे काही लोकांनी सांगायचा प्रयत्न केला आहे. पण या सर्व ढोबळ नियमांचा भंग करून (म्हणजे "पोर्नॉग्रफी"च्या कॅमेरा/प्रकाशयोजना तंत्राने बनवून) संभोगाच्या चित्रणाने भरलेला शॉर्टबस हा चित्रपट बघताना ते चित्रण कलात्मक ओघात आलेले आहे असे बहुतेक प्रेक्षक ओळखतात. http://movies.nytimes.com/2006/10/04/movies/04shor.html तुमचे उदाहरण अत्यंत योग्य आहे. "पेंडश्यांनी अमुक ऐवजी तमुक शिवी वापरली असती तर चालले असते का? ती शिवी वापरली नसतीच तर चालले असते का?" इथे वाक्य आणखी विशाल हवे : "लेखकाने अमुक ऐवजी तमुक शब्द वापरला असता तर चालले असते का? तो शब्द वापरला नसताच तर चालले असते का?" अशा प्रकारे नकळत-विचार करत गुणग्राही वाचक वाचन करत असतो, आणि अपेक्षित वाचकाच्या मनाचा ठाव घेत लेखकाने लिहावे, आणि आपल्या मनाचा ठाव लेखकाला लागला आहे असे वाचकाने ओळखावे... असा संवाद. "किंबहुना, यापैकी तिथे कोणतीच शिवी आली नसती तरीही चाललंच असतं की!" असे तुम्ही गमतीने म्हणत असलात तर ठीक. पण तुम्हाला जर खरेच वाटत असेल की त्या विशिष्ट ठिकाणी ती शिवी वापरून व्यक्तिचित्रणाचा, स्थलचित्रणाचा, आणि कथावस्तूचा घात होतो, (तरच "नसती तरी चाललं असतं" हे शब्द ललित-वाचकाकडून अर्थपूर्ण आहेत), तर मग पेंडश्यांचा वापर चुकला, असेच म्हणावे. तुम्ही वरील वाक्य गंमत म्हणून म्हणाला असलात, आणि तुमचे वाचक म्हणून मत असले की ती शिवी वापरून व्यक्तिचित्रणाचा, स्थलचित्रणाचा, आणि कथावस्तूचा पोष होतो, तर शिवी वापरणे ठीकच. वाचकाचा आणि लेखकाचा वाचकाचा लेखी पानाच्या मार्फत प्रवाही संवाद म्हणजेच "ओघ". यात वाचकाचा वाटा नाकारून चालत नाही. "वाचकाने वाचू नये" ही कल्पना ललित साहित्य या विषयाला लागू नाही, असे वाटते. "अपेक्षित वाचकवर्ग" वाचेल असे ललित लेखकाला अभिप्रेत असावे. किंबहुना ज्या ठिकाणी लेखक लेखन प्रसिद्ध करतो, त्यावरून त्याचा "अपेक्षित वाचकवर्ग" कुठला ते ठरवण्यास मदत व्हावी. त्या ठिकाणी नेहमी वाचन करणार्‍या वाचकाचे असे मत झाले की येथे लेखन करून लेखक आपल्याशी संवाद करू इच्छितो, आणि त्याने वाचन सुरू केले, तर वाचकाचे काय वावगे? त्या ठिकाणी लेख प्रसिद्ध करून लेखक वाचकाला तो अधिकार देत असतो, टीका करायचा अधिकार देत असतो. वाचकाला तो अधिकार द्यायचा नसेल तर आपले लेखन त्या ठिकाणी प्रसिद्ध न करणे इतपतच लेखकाचा अधिकार आहे. इथे वर जणूकाही एकच लेखक आणि एकच वाचक संवाद साधत आहेत असे लिहिले आहे. ते लिहायच्या सोयीसाठी. पण वाचक अनेक असतात आणि लेखक अनेक असतात, त्यामुळे "बहुतेक वाचक", "बहुतेक लेखक", वगैरे असा अर्थ लावून घ्यावा.

In reply to by धनंजय

प्रमोद देव Mon, 11/12/2007 - 19:23
धनंजय ह्यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. निव्वळ आपली कंड शमवण्यासाठी एखादी व्यक्ती शिव्यांचा वापर करणार असेल तर असे लेखन बहुसंख्य वाचकांना नक्कीच आवडणार नाही हे नक्की. मी तर म्हणतो की लेखकाला आपल्या वाचकाची नाडी ओळखता आली नाही तर तो त्याच्या कार्यात यशस्वी होऊ शकणार नाही. लेखकाचे लेखनाचे स्वातंत्र्य मान्य करुनही असे म्हणावेसे वाटते की शेवटी हे लेखन कुणी तरी वाचावे आणि ते आवडले असे 'उस्फुर्तपणे' म्हणावे असे जर लेखकाला वाटत असेल तर त्या लेखकाने प्रथम वाचकांच्या आवडीचा अभ्यास करावा आणि आपल्या लिखाणाच्या शैलीला अनूकुल असे व्यासपीठ निवडावे. बाकी जो तो (लेखक आणि वाचकही)आपापल्या मनाचा आणि मर्जीचा राजा आहे. त्यांनी मनाला वाट्टेल ते करावे. फक्त अशा वेळी इतरांकडून प्रतिसादाची अपेक्षा न ठेवता आत्मानंदासाठी लेखन/वाचन करावे.

In reply to by धनंजय

सर्किट Tue, 11/13/2007 - 03:01
ती शिवी वापरून व्यक्तिचित्रणाचा, स्थलचित्रणाचा, आणि कथावस्तूचा पोष होतो, तर शिवी वापरणे ठीकच. हे वाक्य ह्या चर्चेतील सर्वोत्कृष्ट वाक्य आहे, नव्हे मूळ प्रश्नाचे अचूक उत्तर आहे, असे मला व्यक्तिशः वाटते. तुंबाडचे खोत मधल्या शिव्यांचा विचार केला असता, त्यातील व्यक्तिचित्रणाचा "त्या" शिवीमुळे नक्कीच पोष होतो, हे जाणवेल. - सर्किट

आजानुकर्ण Mon, 11/12/2007 - 11:21
बाळासाहेब ठाकर्‍यांना त्यांच्या शिवराळ ठाकरी भाषेचा फार अभिमान(!) उठसूट शिव्या देत असत. एकदा "सामना"मधून त्यांनी आमचे लाडके नेते राष्ट्रवादी शरदचंद्ररावजी पवारसाहेब यांना "घेतले" दोनच दिवसांनी राष्ट्रवादी शरदचंद्ररावजी पवारसाहेब यांची मंचर येथे सभा झाली. काही कामधंदा नसल्यामुळे आम्हीही सभेला गेलो होतो. शरदचंद्ररावजी पवारसाहेब म्हणाले, "ठाकरे शिव्या देतात ते ठीक. त्यांच्या कोकणी शिव्यांचा त्यांना अभिमान असेलही. पण त्यांनी मला शिव्या द्यायला लावू नयेत. कोकणी शिव्या वापरून, घासून कशा गुळगुळीत झाल्या आहेत हे त्यांना माहिती आहे आणि तुम्हालाही. पण आपल्या परिसरातील मी दिलेल्या शिव्या ऐकल्या तर त्यांना दोन दिवस प्रातर्विधीगृहातून बाहेर येणे जमणार नाही." अनुभव कथा संपली. तात्पर्यः शिव्या फक्त कोकणातच देतात असे नाही. आपलाच, -(राष्ट्रवादी)आजानुकर्ण ललित लेखनात शिव्या असाव्यात असे माझे मत आहे. आपलाच, -(मतदार) आजानुकर्ण आता बोधकथा: एकदा एक माणूस मित्राकडे जेवायला गेला. मित्राच्या बायकोने फार सुंदर जेवण बनवले होते. इतके चांगले जेवण कसे काय बनले हे मित्राने विचारले तर मित्राची बायको म्हणाली, "आज चिमूटभर टाकलेलं मीठ बरोबर पडलंय, त्यामुळे जेवण बरं झालंय" तो माणूस खूष झाला. चिमूटभर मिठामुळे जर जेवण इतके चांगले झाले, तर प्रत्यक्ष मीठ किती सुंदर लागत असेल. असा विचार करून त्याने बचकभर मीठ तोंडात घातले. बोधकथा संपली. तात्पर्य सांगायला पाहिजे का? आपलाच, (गुरुदेव) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 11:27
बोधकथा संपली. तात्पर्य सांगायला पाहिजे का? आपलाच, (गुरुदेव) आजानुकर्ण धन्यवाद गुरुदेव! आता आपल्यासारख्याच थोरामोठ्यांकडूब शिकायची वेळ आमच्यावर आलेली आहे. म्हणून तर हा चर्चाप्रस्ताव! :)) (शिष्य) तात्या.

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 12:16
शरदचंद्ररावजी पवारसाहेब म्हणाले, "ठाकरे शिव्या देतात ते ठीक. त्यांच्या कोकणी शिव्यांचा त्यांना अभिमान असेलही. पण त्यांनी मला शिव्या द्यायला लावू नयेत. त्यांनी त्या देऊही नयेत, तो त्यांचा पिंड नाही/नसावा. शिव्या द्यायचाही एक पिंड असावा लागतो, स्वभाव असावा लागतो, तसे संस्कार असावे लागतात. (कुसंस्कार म्हणा हवं तर!) किंवा, 'मला शिव्या द्यायला लावू नयेत' असं नुसतंच धमकावू नये, हजारो लोकात जाहीरपणे काय त्या शिव्या देऊन दाखवाव्या! (जश्या ठाकरे प्रत्यक्ष देतात तश्या! नुसतीच बोलाची कढी बोलाचा भात काय कामाचा?!!) पण आपल्या परिसरातील मी दिलेल्या शिव्या ऐकल्या तर त्यांना दोन दिवस प्रातर्विधीगृहातून बाहेर येणे जमणार नाही." ही पुन्हा 'जर-तर'ची भाषा झाली! 'जर मी यांव करीन तर त्यांव होईल' या म्हणण्याला माझ्या मते तरी काही अर्थ नसतो! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

जुना अभिजित Mon, 11/12/2007 - 13:52
ठाकरे जे बोलतात ते करतात म्हणून प्रिय आहेत. पवारसाहेब जे बोलत नाहीत ते करतात आणि जे करतात ते बोलत नाहीत म्हणून प्रिय. जय महाराष्ट्र!! हाणा तिच्या आ**.. अभिजित..

In reply to by जुना अभिजित

रम्या Tue, 11/13/2007 - 12:10
अभिजित, ठाकरे जे बोलतात ते करतात म्हणून प्रिय आहेत. पवारसाहेब जे बोलत नाहीत ते करतात आणि जे करतात ते बोलत नाहीत म्हणून प्रिय. ठाकरे आणि पवारांमधील अगदी योग्य फरक (आणि साम्यसुद्धा !) योग्य शब्दात सांगितलात! आम्हाला तर दोघेही सारखेच प्रिय! जय महाराष्ट्रवादी! होऊन जाऊ दे च्या मारी!

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण Mon, 11/12/2007 - 19:30
'मला शिव्या द्यायला लावू नयेत' असं नुसतंच धमकावू नये, हजारो लोकात जाहीरपणे काय त्या शिव्या देऊन दाखवाव्या! (जश्या ठाकरे प्रत्यक्ष देतात तश्या! नुसतीच बोलाची कढी बोलाचा भात काय कामाचा?!!) खरे म्हणजे या विषयावर जितका काथ्याकूट करावा तितका कमीच. पण अजून एक विषयानुरूप बोधकथा आठवली म्हणून लिहितो. :)) एकदा नारदमुनी सहज फिरत फिरत पृथ्वीवर आले. आणि जाता जाता काही सत्कार्य करावे म्हणून उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या एका नागोबाला "तू लोकांना चावत जाऊ नकोस, त्रास देत जाऊ नकोस, म्हणजे तुझ्या पापाचा संचय कमी होईल व त्यामुळे रक्तदाबही कमी होईल." असे सांगितले. पाचसहा महिने गेले. लीव्ह ट्रॅव्हल अलाऊन्स एन्कॅश करण्यासाठी पुन्हा रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले. इथे येऊन पाहतात तो काय अगदी पोरासोरांनीही दगड, खडे मारून मारून नागोबाला अगदी बेजार केलेले. तो अगदी मरणोन्मुख होऊन पडला होता. नारदमुनी जवळ येताच तो म्हणाला, "माझ्या ह्या परिस्थितीला तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही सांगितल्यापासून मी लोकांना त्रास देण्याचे सोडले आणि माझी परिस्थिती अशी झाली." नारदमुनी म्हणाले, "अरे मी तुला चावत जाऊ नकोस असे सांगितले होते. पण स्वसंरक्षणासाठी तू निदान फुत्कार तरी टाकू शकतोस." नारदमुनींच्या पुढच्या यलटीए ट्रीपच्या वेळी नागोबा टुमटुमीत होता. तात्पर्यः फुत्कार टाकण्याने जे काम होते त्यासाठी चावण्याची काय गरज? (गुरुदेव) आजानुकर्ण

जुना अभिजित Mon, 11/12/2007 - 11:27
शिव्या असाव्यात म्हणून मुद्दाम शिव्या टाकणे किंवा शिव्या नसाव्यात म्हणून शिव्या काढून टाकणे दोन्हीही चूक. कथा काय मागते ते महत्त्वाचे. पुलं ची रावसाहेब ही वल्ली मार्गदर्शक ठरेल.. अभिजित

''ललित साहित्यिक आपला अनुभव भाषेच्या साहाय्याने व्यक्त करत असतो, ही भाषा शास्त्रीय साहित्याच्या भाषेसारखीच भाषा असते; पण ती केवळ ज्ञान देण्यासाठी नसते तर अनुभव साक्षात करणे हे या भाषेचे मुख्य उद्दिष्ट असते असे प्रसिद्ध साहित्य समीक्षक प्रा.वा.ल.कुलकर्णी यांचे मत आहे. हा साहित्यिकाचा अनुभव ज्यावेळी वाचकाला किंवा रसिकाला येतो त्यावेळी त्याला आनंद मिळतो''१ ललित साहित्याची भाषा ही व्यक्तिपरत्वे बदलते म्हणूनच आपण खांडेकरांची शैली, फडकेंची शैली असे म्हणतो, उद्या कदाचित अभ्यंकरांची शैली असेही म्हणावे लागेल. त्याचप्रमाणे साहित्य प्रकारानुसारही ही भाषा बदलते एवढेच नव्हे तर प्रत्येक साहित्य कृतीनुसार ती बदललेली आढळते. ललित साहित्याची भाषा ही साहित्यामधे साधन व माध्यम या दोन्ही भुमिका बजावताना दिसते. ती भाषा वाचकांपयंत संदेशवहनाचे कार्य करते; पण त्याच बरोबर ती सौंदर्यानुभव देऊन रसिकाला आनंद देण्याचेही कार्य करते.म्हणून ललित लेखनात लेखकाला/लेखिकेला लिहिण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते, असे आमचे मत आहे. संदर्भ :- १) ललित साहित्याची भाषा : शब्दशक्ती आणि अर्थविचार. पृ. क्र. ५८. साहित्यशास्त्र -प्रा. हनुमंत माने, प्रा. शिवानंद गिरी. कैलास पब्लीकेशन औरंगाबाद. प्रथामावृत्ती २००५. किंमत ६० रुपये.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 15:11
ललित साहित्याची भाषा ही व्यक्तिपरत्वे बदलते म्हणूनच आपण खांडेकरांची शैली, फडकेंची शैली असे म्हणतो, उद्या कदाचित अभ्यंकरांची शैली असेही म्हणावे लागेल. कोण अभ्यंकर? हां हां, आलं लक्षात. ते मराठी संस्थळांवरचे शिवराळ तात्या अभ्यंकर! :) त्याचप्रमाणे साहित्य प्रकारानुसारही ही भाषा बदलते एवढेच नव्हे तर प्रत्येक साहित्य कृतीनुसार ती बदललेली आढळते. ललित साहित्याची भाषा ही साहित्यामधे साधन व माध्यम या दोन्ही भुमिका बजावताना दिसते. ती भाषा वाचकांपयंत संदेशवहनाचे कार्य करते; पण त्याच बरोबर ती सौंदर्यानुभव देऊन रसिकाला आनंद देण्याचेही कार्य करते.म्हणून ललित लेखनात लेखकाला/लेखिकेला लिहिण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते, असे आमचे मत आहे. वा बिरुटेसाहेब, संदर्भासहीत दिलेला प्रतिसाद आवडला! आपला, अभ्यंकर! :)

टग्या Mon, 11/12/2007 - 23:42
खरा प्रश्न 'ललित लेखनात शिव्या असाव्यात का?' हा नसून, 'शिव्यांमध्ये ललित लेखन असावे का, आणि असल्यास किती असावे?' हा आहे. दुवा

देवदत्त Mon, 11/12/2007 - 22:56
"लेखनात शिव्या लिहिणे वेगळे आणि कुणालातरी शिव्या द्यायच्याच आहेत, अशा हेतूने 'ललित' लेखन करणे वेगळे" सहमत.. नाही तर मग "खरा प्रश्न 'ललित लेखनात शिव्या असाव्यात का?' हा नसून, 'शिव्यांमध्ये ललित लेखन असावे का, आणि असल्यास किती असावे?' हा आहे." इथे सहमती होईल ;) अहो पण ती चपखल बसते किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार लेखकाचा नाही का? वाचक कसं काय ते ठरवू शकतात? त्याला अधिकार आहे. लेखकाला कोणी जोर दाखवून त्याच्याकडून लिहून घेऊन शकत नाही. पण त्या शिव्या जर उगाच येत राहिल्या तर त्या वाचकाला मग लेखनात जास्त रस वाटणार नाही. मग ते लेखकाचे स्वगत (किंवा कंसातले वाक्य) वाटू नये. पुलंनी लिहिल्याप्रमाणे शिव्या ह्या सोडा वॉटरच्या बाटलीप्रमाणे. जसे बाटली उघडताच बूच निघताना जो आवाज होतो त्यात जोर असतो. नंतर तो जोर कमी होतो, त्याचप्रमाणे 'भXX' ह्याप्रमाणे जी पहिली शिवी निघते त्यात पूर्ण राग असतो. नंतरच्या शिव्यांना तेवढा जोर राहत नाही. (आता पुढील शिव्यांमध्ये किती राग/अर्थ असतो हे शिव्या लिहून किंवा मला शिव्या देऊन नका सांगू ;) ) असो... मी काही कोणाला शिव्या देत नाही आणि मला जास्त शिव्या ही माहीत नाहीत. त्यामुळे मी जास्त लिहू नये. मी आपले मनातले लिहिले (दुसर्‍यांची वाक्ये वापरून).

In reply to by चित्तरंजन भट

विसोबा खेचर Tue, 11/13/2007 - 01:45
"मनोगत" आपल्या ठिकाणी "मिसळपाव" च्या अंकाला मी पूर्ण मदत करीन. धन्यवाद चित्तोबा! बघू कसं जमतं ते, परंतु मिसळपावचा होळी विशेषांक काढायचं माझ्या मनात आहे, तेव्हा तुझी मदत नक्कीच होईल याची खात्री आहे! कलोअ, आपला, (हावलूबायप्रेमी!) तात्या. -- होली के दिन दिल खिल जाते है रंगोमे रंग मिल जाते है, गिले शिकवे भूलके दोस्तो, दुश्मनभी गले मिल जाते है!

आर्य चाणक्य Tue, 11/13/2007 - 01:57
छटाकभर ढोसून एकमेकाची आय माय काढणारे तात्या आणि गझलसम्राट ह्यांचा संवाद पाहून आम्हाला अतीव आनंद झाला! मिसळपाव हे संकेतस्थळ आता बहरणार ह्यात शंका नाही!

In reply to by आर्य चाणक्य

विसोबा खेचर Tue, 11/13/2007 - 07:33
चाणक्यकाका, छटाकभर ढोसून एकमेकाची आय माय काढणारे तात्या आणि गझलसम्राट ह्यांचा संवाद पाहून आम्हाला अतीव आनंद झाला! तुमच्या वरील वाक्यात दोन करेक्शन्स करेन म्हणतो! - १) सम्राटांचं माहीत नाही, परंतु काल सोमवार होता व आम्ही बुधवार आणि शनिवार व्यतिरिक्त इतर कोणत्याच वारी ढोसत नाही! :) २) वरील संवादात चित्तोबांनीच आमची 'आयमाय' काढली आहे, आम्ही नाही, हे बारकाईने निरिक्षण केल्यास आपल्या लक्षात येईल! मिसळपावची शिवीसंस्कृती 'साल्या', 'भोसडीच्या', 'भिकारचोटा', 'फोकलिच्या', 'चुतमारीच्या' इथपर्यंतच! एखाद्याच्या 'आईला' शिव्यात गोवणे हे बहुधा अन्य कुठल्या संकेतस्थळाचे संस्कार असावेत! असो.. मिसळपाव हे संकेतस्थळ आता बहरणार ह्यात शंका नाही! तात्या अभ्यंकरांसारखी व्यक्तिमत्वे जिथे असतात ती संकेतस्थळं बहारतातच असा इतिहास आहे! :) अर्थात, आपली आणि चित्तोबांसारख्याची उपस्थितीदेखील इथे बहार आणील यातही शंका नाही! :) असो.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू Tue, 11/13/2007 - 08:32
एखाद्याच्या 'आईला' शिव्यात गोवणे हे बहुधा अन्य कुठल्या संकेतस्थळाचे संस्कार असावेत! --- म्हणजे कुठल्या हो? आजवरच्या ज्ञात मराठी संकेतस्थळांपैकी मिसळपाव धरून जवळजवळ सगळ्याच संकेतस्थळांवर सदस्य आणि / किंवा पाहुणा म्हणून आजवर वावरलो आहे. त्या संकेतस्थळांची नावे पुढीलप्रमाणे - १. मनोगत २. मायबोली ३. उपक्रम ४. मिसळपाव ५. माझे शब्द ६. असंख्य ब्लॉग्ज - याला संकेतस्थळ म्हणता येणार नाही ७. मराठी गझल ८. सुरेश भट डॉट इन् पैकी मिसळपाव व्यतिरिक्त अन्यत्र आयमाय तसेच इतर गोष्टींवरून शिव्या दिल्याघेतल्याचे वाचनात / पाहण्यात आलेले नाही. परिस्थितीनुरूप लेखन, लेखनातून रंगवलेले व्यक्तिविशेष हे वगळता शिव्यांची अंताक्षरी कुठे पाहण्यात नाही. असे एखादे स्थळ तुमच्या पाहण्यात असले, तर सांगा; भेट देऊन तेथील संस्कारांची खातरजमा करता येईल. मुळात संकेतस्थळासारखे एखादे आभासी माध्यम संस्कार कसे काय करू शकेल, हाच प्रश्न मला पडला आहे. फार तर आपण ती त्या संस्केतस्थळाची 'संस्कृती' म्हणू. संस्कार हे सदस्यांचे / सदस्यांवर झालेले असतात; मोठा काल व्यतीत करणारी ती एक प्रक्रिया असते; आसपासच्या व्यक्ती, वातावरण, समाजरचना, आर्थिक परिस्थिती इ. चा तो परिपाक असतो. त्यामुळे संकेतस्थळाचे संस्कार नाही, तर असे आपले मला वाटते. एखाद्या संकेतस्थळावरील सदस्यांच्या 'वैचारीक' देवाणघेवाणीमधून जर शिव्यांचे आदानप्रदान होतच असेल, तर ती सुद्धा सदस्यांची जबाबदारी वाटते; संकेतस्थळाची, त्याच्या जडणघडणीची, प्रशासनाची (अस्तित्त्वात असल्यास!) नाही. त्यामुळे अशा सो कॉल्ड संस्कारांची जबाबदारी संकेतस्थळासारख्या एखाद्या भासमान माध्यमाची असणे तितकेसे पटले नाही. असो. (सुसंस्कृत)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर Tue, 11/13/2007 - 08:44
पैकी मिसळपाव व्यतिरिक्त अन्यत्र आयमाय तसेच इतर गोष्टींवरून शिव्या दिल्याघेतल्याचे वाचनात / पाहण्यात आलेले नाही. परिस्थितीनुरूप लेखन, लेखनातून रंगवलेले व्यक्तिविशेष हे वगळता शिव्यांची अंताक्षरी कुठे पाहण्यात नाही. तरीही मिसळपाववर आपली सन्माननीय उपस्थिती असते, येथे आपण उत्तमोत्तम (मधुबाला, जानू) लेखनही करता ही मात्र नक्कीच आनंदाची बाब आहे! :) मुळात संकेतस्थळासारखे एखादे आभासी माध्यम संस्कार कसे काय करू शकेल, हाच प्रश्न मला पडला आहे. जाऊ द्या हो! फार विचार नका करू आणि फार प्रश्नही पाडून घेऊ नका! :) फार तर आपण ती त्या संस्केतस्थळाची 'संस्कृती' म्हणू. चालेल! तसं करू...:) संस्कार हे सदस्यांचे / सदस्यांवर झालेले असतात; मोठा काल व्यतीत करणारी ती एक प्रक्रिया असते; आसपासच्या व्यक्ती, वातावरण, समाजरचना, आर्थिक परिस्थिती इ. चा तो परिपाक असतो. लय भारी विचार! त्यामुळे अशा सो कॉल्ड संस्कारांची जबाबदारी संकेतस्थळासारख्या एखाद्या भासमान माध्यमाची असणे तितकेसे पटले नाही. असो. हम्म! आम्हाला मात्र आता तुमचे विचार पटले आहेत.... :) च्यामारी आपली सपशेल माघार! :) तात्या.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Tue, 11/13/2007 - 09:39
वाचक हा देव. लेखक हा ह्या देवाचा पूजक. हे वाक्य एखाद्या संकेतस्थळ ह्या माध्यमाच्या परिघात ठीक असेल.. पण त्या परिघा बाहेरमात्र त्याविषयी पूर्ण असहमत. कारण अन्यथा 'गुरुनाथ आबाजी कुलकर्णी ' हे झालेच नसते.

In reply to by विसोबा खेचर

आर्य चाणक्य Tue, 11/13/2007 - 10:21
वरील संवादात चित्तोबांनीच आमची 'आयमाय' काढली आहे मागे कवितेतुन कुणीतरी कुणाचे वडील काढले होते..आता शिव्यातुन आई काढली आहे!! छान चालले आहे! तात्या तेवढे माझे प्रतिसाद का उडवले ते सांगा.. त्यामध्ये आयमाय वरील अपशब्द नसल्याने ते उडवले का?

In reply to by आर्य चाणक्य

सर्किट Tue, 11/13/2007 - 23:22
प्रतिसाद संपादित. (आर्य, कृपया पुन्हा डिवचण्याआधी विचार करावा, ही विनंती.) -सर्किट

In reply to by आर्य चाणक्य

विसोबा खेचर Tue, 11/13/2007 - 12:12
तात्या तेवढे माझे प्रतिसाद का उडवले ते सांगा.. त्यामध्ये आयमाय वरील अपशब्द नसल्याने ते उडवले का मला माहीत नाही. प्रतिसाद उडवण्याचं अथवा त्याचं संपादन करण्याचं काम मी करत नाही. आपण कृपया या बाबतीत पंचायत समितीकडे जाब विचारावा... तात्या.

आता लोकांना समजले असेल कि http://misalpav.com/node/114 हे स्वगत मी केवळ मिसळपाववर का टाकले ते? उपक्रमवर का नाही? मनोगतवर का नाही? अन्यत्र का नाही? प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

सर्किट Tue, 11/13/2007 - 11:32
तुम्ही आपले स्वगत मिसळपावावर का टाकेलत, ते चाणक्य सारख्या शिशुविहारातल्या लोकांना कळेल असे कसे मांडता येईल ? आपल्याला च्यालेंज देतोय. त्यांना कळेल असे मांड की हो ! - सर्किट

किमयागार Wed, 11/14/2007 - 06:50
ललित लेखनात शिव्या असाव्यात का ह्यावर इथं काय प्रश्न विचारताय? आगामी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तुम्हीच काय? साधा उपाय सांगतो- ललित लेखन वाचायला सुरूवात करा.ललित लेखन म्हणजे काय ते आधी समजुन घ्या.वाचन वाढवा मग असले प्रश्न पडणार नाहीत! -किमयागार

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Wed, 11/14/2007 - 09:24
आगामी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तुम्हीच काय? तुम्ही मत दिलंत तर! :) साधा उपाय सांगतो- ललित लेखन वाचायला सुरूवात करा.ललित लेखन म्हणजे काय ते आधी समजुन घ्या.वाचन वाढवा मग असले प्रश्न पडणार नाहीत! काय सांगता?! बरं बरं, तसं करू... बाय द वे, माझ्या प्रस्तावात मी मतं मागवली होती. सल्ले नव्हे! तरीही न मागता दिलेल्या फुकटच्या सल्ल्याबद्दल आपले आभार... तात्या.

सखाराम_गटणे™ Sun, 01/11/2009 - 20:30
लिखाना तुन दिलेल्या शिव्या हे, लेखनाला अनुरुन असावे, पात्राला अनुरुप असावे. उगाच आपला शब्द्कोश उघडा करण्यासाठी नसावे. अबिजीत चे शरद पवार आणि ठाकरे यांच्या बद्दल चे मत आवडले. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

विसोबा खेचर Mon, 01/12/2009 - 09:16
जुने लेखन प्रतिसाद देऊन वर आणण्याबाबत गटण्यांशी प्रत्यक्ष बोललो असताना त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले आहे.. (सख्यावर लोभ असलेला) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सखाराम_गटणे™ Mon, 01/12/2009 - 09:26
आभारी आहे. ---- (आंतरजालिय आर आर पाटील)सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.