Skip to main content

प्रबळ ट्रबल

लेखक स्पा यांनी मंगळवार, 24/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रवार ची संध्याकाळ फोनाफोन करण्यातच गेली . एका वेळी अनुक्रमे वल्ली, मोदक , आणि किसन शी बोलत होतो, मधेच गणेशा फोन करत होता. कलावंतीण ट्रेक ठरलेला होता.. पण पावसाळ्यात तो खूपच रिस्की आहे , तेंव्हा तो जमल्यास स्किप करा असे बर्याच जणांनी सांगितले . तेंव्हा हो नाय म्हणता म्हणता ४ पर्याय डोळ्यासमोर उरले . माहुली, शिवनेरी , लोहगड-विसापूर , आणि प्रबळगड . शेवटी प्रबळगडावर शिक्का मोर्तब झाले , आणि सर्वांना फोनवून सांगितले. शनिवारी भल्या पहाटे बाईक काढली , सौरभ आलेलाच होता .. मी सौरभ हर्शल आणि सिद्धू असे चौघ निघालो.. किसन पनवेलला भेटणार होता .. गणेशाने आयत्यावेळी टूल्ली दिली . शिळफाटा- पनवेल रोड धड धाकट केल्याने सुसाट पनवेलात घुसलो . मग छोटीशी चहा पार्टी झाली .. आणि निघालो. वातावरण मस्तच होतं .. पाऊस नव्हता .. पण ढग दाटून आले होते . शेडुंग फाट्याहून आत घुसलो .. दोन्ही बाजूने मस्त भात शेती सुरु झाली .. १० मिनिटात ठाकूर वाडी त पोचलो .. खाली एक कृष्णाचं सुंदर देऊळ आहे . रस्ता विचारात पुढे आलो आणि प्रबळ ने दर्शन दिल .. १. प्रचंड लांबीचा असा अवाढव्य डोंगर .. बाजूलाच कलावंतीण सुळका !! २. पायथ्याशी एका वडाखाली बायका लावल्या आणि हुंदडत वर निघालो .. ३. ४. अर्धा एक तास चालल्यावर एका वळणावर न्याहारी उरकली .. बाजूनेच एक कातकरी चाललेला त्याला विचारल प्रबळ गड किती वेळ ? म्हणाला ३ तास .. आमची हवा टाईट.. आम्ही खूपच आरामात होतो ... मग वेग पकडला आणि झपाझप वर आलो ५. मारुतीराया आणि गणपती ६. इथे जरा श्रम परिहार केला :) ७. .. साधारण एक तासात "प्रबळ माची " गाठली .. ८. चायला समोर पाहिल्यावर हैराण झालो .. जेवढ वर चढून आलेलो त्याच्या इतकाच अजून कडा चढायचा होता. रस्ता माहित नाही .. एका बाजूला कलावंतीण आणि त्या बाजूला प्रबळ ९. असंच विचारात विचारात शेताडीतून निघालो. पण एक तास झाला तरी प्रबळ जवळ यायची चिन्ह नाहीत .. आम्ही बरोबर समांतर चालतोय .. तेवढ्यात एक माणूस दिसला त्याला विचारलं. तर म्हणाला रस्ता चुकलात .. परत मागे माचीत जा... आयला . .सगळे हबकलेच . एवढ १ तास चुकीच चाललो म्हणजे .. आता मागे जाण्यात परत तेवढाच वेळ .. काय करायचं ? त्याला विचारलं असाच पुढे रस्ता नाही का? तर म्हणाला नाही.. तसा एक आहे खिंडीतून .. पण त्याबाबतीत तो आग्रही दिसला नाही .. तरी आम्ही मागे ण फिरता पुढे रस्ता दिसतोय का ते पाहायला निघालो .. परत १५ मिनिट चाललो .. शेवटी प्रबळ गडाच दुसर टोक दिसायला लागल .. पण आम्ही अजूनही समांतर .. भिडायचं कस ;) तिथे दोन तीन शाकारलेली घर होती .. तिथे जरा एक ब्रेक घेतला .. थोडी खादाडी केली .. काय करायचं ? आता मागे जायलाच हव होतं. घड्याळाचा काटा १०.३० दाखवत होता. शेवटी सर्वांचा निर्णय झाला .. आज काहीही झालं तरी प्रबळ सर करायचाच .. मग काय " हर हर महादेव"!!! झपाझप उड्या मारत मागे सुटलो .. प्रबळ माची पहिलं टार्गेट ठेवलं. येताना अर्ध्या तासात मागे आलो .. तिथल्या एका शेतकऱ्याला रस्ता विचारला .. तर नशीब तो यायला तयार झाला .. त्याने एक वाट दाखवली .. पण हि वाट आहे? असा प्रश्न जवळ जवळ सर्वांना पडला.. भयंकर जंगल .. सर्व बाजूने किर्र रान आणि भयानक चढ .. मधेच एक धबधबा होता.. त्यात पाणी नव्हत .. त्याच्यातून वाट काढत वर जायचं होत ... आता मात्र सिद्धूने धीर सोडला .. त्याच्या बिचार्याचा पहिलाच ट्रेक होता .. आणि हे अस प्रचंड काहीतरी समोर होतं. कसे बसे मान खाली घालून चढायला लागलो .. किती वेळ चढतोय काही कळत नव्हत.. किस्नू आणि अल्पेश पुढे होते सौरभ मध्ये .. मी आणि हर्शल सिद्धुला हात देत वर घेत . हळू हळू येत होतो .. अजून एक चेक पोइंत आला.. इथे बसायला थोडी जागा होती .. आता बाजूला उंच कडा .. १०. ११. १२. १३. आणि समोरून येणार प्रचंड धुकं.. पाहता पाहता आम्ही त्या धुक्यात हरवून गेलो... अवर्णनीय अनुभव होता.. पाऊस नसल्याने आलेला थकवा त्या गार धुक्याने घालवून टाकला .. परत चढाइला सुरुवात केली . सिद्धूची हालत अतिशय वाईट झालेली होती.. आता तो परत मागे फिरतो का काय अस वाटत होत . पण नाही पट्ट्या चढला वरती .. कधीतरी १२.३० च्या सुमारास वर आलो ... आखिर कार.... WE HAVE DONE IT . प्रबळ सर झाला "याच साठी केला होता अट्टाहास " अशा भावना होत्या ...वर तर अक्षरश: नंदनवन फुललं होतं ... लुसलुशीत गवताची मलमली चादर अक्ख्या कड्यावर पसरली होती... प्राचीन वाटणारं जंगल .. त्यातूनच उफाळलेला गूढ धुक्याचा लोट ... मग तब्येतीत बसलो .. जेवणाची वेळ झालेली होती .. मेनू फर्मास होता . पुलाव, पोळी भाजी , थालीपीठ , सोन पापडी, किसान फेम "शंकर पाळे" .. १४. १५. १६. तडस लागेपर्यंत बकाबका जेवलो .. मस्त झर्याचं पाणी प्यायलो . आणि गड भटकायला निघालो .. धुंद रान १७. १८. १९. २०. आमच्याशिवाय वर बाकी कोणीही नव्हतं .. नुसत रान माजलेलं होतं .. वाट फुटेल तसं चालत होतो .. आणि एका क्षणाला त्या रानातून बाहेर मोकळ्यावर आलो ...... समोरच दृश्य भान हरपून टाकणार होतं.. समोर प्रचंड पसरलेली दरी .. आणि बाजूलाच दिसणारा कलावंतीण.. धुक्यामुळे अगदी क्षण दोन क्षण दर्शन होत होतं .. पण .. शब्दात सांगता येणार नाही असा आनंद झाला होता.. २१. २२. त्या पठारावरच आडवे झालो .. तेवढ्यात एक काका आले.. एकटेच आले होते .. गावातल्या एका छोट्या गाईड ला घेऊन . त्यांच्याबरोबर गप्पा टप्पा सुरु झाल्या . तेही ठाण्याचेच होते . १०० व्या वर गड फिरले होते .. आणि मजा म्हणजे ते नेहमी एकटेच फिरायला जातात .. :) त्यांनी आम्हाला गडावरील अजून एक दोन ठिकाण दाखवली . एक म्हणजे गणरायाचं प्राचीन मंदिर आणि दुसर म्हणजे गोड्या पाण्याचं कुंड. २३. २४. हे सगळ बघून झाल्यावर खाली उतरायला लागलो .. बाप्परे .. आता धमाल येत होती .. पायांनी साथ सोडून दिलेली होती.. कसे तरी रेटत खाली उतरत होतो .. माची गाठल्यावर परत चहा वेग्रे प्यायलो .. आणि काकांचा निरोप घेतला . हा अवलिया आज मुक्काम करणार होता आणि उद्या कलावंतीण करणार होता . पाऊस नसल्याने भिजणं झालेलं नव्हत. मग येताना दिसलेल्या एका ओढ्यात डुंबून घेतलं. परत उतारावरून कसबस सावरत खाली येणं.. पण एकमेकांची हालत बघून हसायला धमाल येत होती . येताना कृष्णाच्या देवळात जाऊन आलो . सुरेख देऊळ बांधलंय. २५. बाहेर आल्यावर सुसाट डोंबिवलीला सुटलो . एकूण प्रबळ ने आमची चांगलीच परीक्षा घेतली , पण सर्वजण चांगल्या मार्कांनी पास झालो :) *प्रकाश चित्र श्रेय : सौरभ उपासनी

वाचने 14828
प्रतिक्रिया 71

प्रतिक्रिया

हिरवे गार फोटो आवडले. अन तुझ्यासाठी मौ भात नव्हता नेलास होय रे?

पायथ्याशी एका वडाखाली बायका लावल्या आणि हुंदडत वर निघालो वरील वाक्य वाचुन वारलो आहे. पुर्नजन्मात प्रतिक्रीया देईन

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पायथ्याशी एका वडाखाली बायका लावल्या आणि हुंदडत वर निघालो>>> वरील वाक्य वाचुन वारलो आहे. पुर्नजन्मात प्रतिक्रीया देईन>>> +++++++++++११११११११११११११११ अतिप्रचंड सहमत

प्रबळ चा डबल आनंद मिळालाय ! स्पा चे वर्णन अन उ चे फोटू ! वाउ !

फोटो लैच भारी. -दिलीप बिरुटे

स्पांडुरंगबुवा अप्रतिम केलात ट्रेक! जबर्‍या येकदम... :-) त्या अवलियाचा फोटू,,,आणी (दुसर म्हणजे गोड्या पाण्याचं कुंड.) --- याचा फोटू कुठ्ठाय...? :-(

In reply to by अत्रुप्त आत्मा

कुंडाचा फोटो हरवला :( आणि हे ते अवलिया विक्रांत कुलकर्णी . त्यांना मिपाच आमंत्रण दिलेलं आहे :)

In reply to by स्पा

हायला...काय माणुस हाय राव...! पण मागे अशी दुभंगलेल्या झाडाची पार्श्वभूमी कुणी घेतली..? तूच असशील कलात्मक टच द्यायला गेलेला. ;-) किसनद्येवा सांगा हो खरं काय ते...?

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुम्हाला तर स्पांडेशची सवय माहितीच आहे कि राव. ;) जोकस् अपार्ट.. माथ्यावर गणपतीच्या मंदिराकडे जाताना वाटेत हे दुंभगलेलं झाडं लागलं. मग तिथे आम्ही सगळ्यांनीच फोटो काढले. :)

हिरवेगार फोटो खूपच छान आले आहेत, मस्तच!
पायथ्याशी एका वडाखाली बायका लावल्या आणि हुंदडत वर निघालो ..
हे वाक्य पहिल्यांदा बाचून चुकल्यासारखं वाटलं आणि २-३ वेळा वाचून खात्री करून घेतली की बायका नंतर भेटल्या, दिसल्या इ. क्रियापद तर नाही ना. हुच्च विनोद साधला आहेस.

सफर एकदम आवडेश. फटू आणि शब्द दोन्ही झकास. एकदा मला आणि नान्याला प्रबळगडावरती दोन दोन घोट मारताना पकडले होते त्याची आठवण जागी झाली. ;)

गणेशाने आयत्यावेळी टूल्ली दिली . पायथ्याशी एका वडाखाली बायका लावल्या आणि हुंदडत वर निघालो .. किसान फेम "शंकर पाळे" .. अगदी अपेक्षित वाक्यं... असो, फोटो मस्त आलेत, एक्स पर्ट ज्ञानी लोकांचे प्रतिसाद आले की मग पुन्हा प्रतिसाद देईन.

In reply to by ५० फक्त

अगदी अपेक्षित वाक्यं
या बद्दल बोलतोच. आधी स्पा आणि टीम चे अभिनंदन .. फोटो घरी जाऊन नक्की बघेन, आता दिसले नाहित. -------- हा तर काय .. मी काही टुल्ली फिल्ली दिलेली नाही.. एक तर कलावंतीन १७ जनांना विचारुन कॅन्सल मीच करायला लावला.. एक तर नवखे लोक घेवुन जाता आणि वर ट्रेक हार्ड आहे की नाही ते पण पहात नाहीत. हे चुकीचे आहेच.. त्यात आमच्या कडे सँडल होता शूज नव्हते यावेळेस.. दूसरी खरी गोष्ट म्हणजे स्पा ला घरा जवळचाच गड हवा होता, सुधागड, विसापुर, कर्नाळा असे ऑप्शन पण नको होते, आणि मला पुण्यात यायचे होते नंतर, त्या मुळे प्रबळ गड ठरल्यामुळे वेळ लागणार हे माहित असल्याने मी आलो नाही, आणि ठरल्या ठरल्या मी नाहि सांगितले, त्यामुळे ऐनवेळी वगैरे सगळे खोटे आहे... आता प्रबळ करुन पुन्हा बाईक वर पुण्याला जायला वेळ लागला असता, उलट मला वाटले होते नवे लोक असताना सोपा सहज करण्यायोगा गड निवडला जाईन. असो थांबतो .. वरती टुल्ली दिली या वाक्यामुळे कीती लिहावे लागले बघ असो .. पुढील ट्रेक साठी शुभेच्छा

In reply to by मोदक

गणेशाने (नेहमीप्रमाणे!) टुल्ली दिली या मताशी सहमत.
त्याने टुल्ली दिली हे ठिक रे. पण आता तु त्यात अजुन किल्ली का फिरवतो आहे.? ;)

In reply to by किसन शिंदे

चचा(लिध्)मोड ऑन -- त्याने दिली टुल्ली तु का फिरवतो किल्ली कुठे आहे स्पाची हिरव्या डोळ्याची बिल्ली चचा(लिध्)मोड ऑफ --

In reply to by ५० फक्त

चचा(लिध्)मोड ऑन -- त्याने दिली टुल्ली तु का फिरवतो किल्ली कुठे आहे स्पाची हिरव्या डोळ्याची बिल्ली चचा(लिध्)मोड ऑफ --
:D हजरजबाबी ५०!

सुख सुख म्हणतात ते आणखी वेगळं काय असावं... अर्धवटराव

वाचून खूप मजा आली. फोटोंबद्दल रोज उठून तेच ते काय लिहायचं? असो. एक पद्धत म्हणून चांगले आहेत असं म्हणते. बायका परत आणल्या की नाही याबद्दल काही लिहिलं नाहीस ते? ;)

In reply to by पैसा

बायका परत आणल्या की नाही याबद्दल काही लिहिलं नाहीस ते?
बायकांनी त्यांना परत आणलं! वृत्तांत आणि फोटो दोन्ही आवडले.

त्ये स्वित्झर्लंड पावसाळ्यातल्या सह्याद्रीसमोर!!!

फोटो आणि वर्णन.. दोन्ही

झकास फोटू आणि वर्णन!

स्पाऊने ट्रेकचा वृत्तांत खास त्याच्या अशा ठेवणीतल्या शब्दात दिलाय त्यामुळे लिहण्यासाठी माझ्याकडे फार काही राहिलं नाहिये. :) हि थोडीफार माहिती माझ्याकडून... प्रबळगड!! मुंबई पुणे हायवेवर पनवेलपासुन पुण्याच्या दिशेने साधारण ५-६ किमी गेल्यावर डावीकडे एक भला मोठ्ठा पसरट डोंगर दिसतो, तोच हा प्रबळगड! नावाप्रमाणेच राकट आणि बळकट असणारा हा दुर्ग खरचंच आपल्या 'स्टॅमिन्याची सत्वपरिक्षा' घेतो. ;) खालच्या ठाकुरवाडीतून प्रबळगडाच्या पायथ्याशी असणार्‍या माचीपर्यंत पोहचण्यासाठी साधारण १ तास लागतो. माचीवर पोहचल्यानंतर गावातून डावीकडे आणि उजवीकडे अशा दोन वाटा आपल्याला दिसतात. डाव्या बाजूची पायवाट पकडून कलावंतीणकडे पोहचायला पाऊण तास आणि उजव्या बाजुची पायवाट पकडून प्रबळगडाच्या माथ्यावर पोहचायला दिड ते दोन तास लागतात. पनवेल आणि कल्याण या प्राचीन बंदरावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला असावा. गडाच्या माथ्यावर प्रचंड मोठं पठार आहे आणि त्याचा बहुतेक भाग घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. वर मनुष्यनिर्मीत काही गुहा सुध्दा आहेत, घनदाट असणारं जंगल आणि आमचा वाटाड्या 'रमेश' फार उशीराने आम्हाला मिळाल्यामुळे त्या आम्हाला पाहता आल्या नाहीत. उत्तरकाळात या गुहांचा उपयोग करून शिलाहार, यादव राज्यकर्त्यांनी तिथे लष्करी ठाणी स्थापन केली आणि गडाचं मुरंजन असं नामकरण केलं. निजामशाहीच्या अस्तावेळी कुठेच आश्रय न मिळाल्याने शेवटी शहाजीराजे जिजाऊमाता आणि लहानग्या शिवाजींना घेऊन या मुरंजनाच्या आश्रयाला गेले. किल्ल्यावर मुघलांचा अंमल सुरू होण्यापुर्वी १६३६ साली शहाजींनी हा किल्ला सोडला आणि त्यानंतर १६५६ मध्ये शिवरायांच्या पदरी असणार्‍या आबाजी महादेव या शुर सरदाराने कल्याण-भिवंडीपासुन रायरीपर्यंतचे अनेक किल्ले स्वराज्यात घेतले त्यात हा मुरंजनही होता. दुर्गाची भव्यता पाहून राजांनी याचं 'प्रबळगड' असं नामकरण केलं. पुढे जयसिंगाशी झालेल्या पुरंदरच्या तहात जे २३ किल्ले महाराजांनी त्यांना दिले त्यात प्रबळगडही होता. माथ्यावर असणारं विस्तीर्ण पठार, एका बाजुने दिसणारं माथेरान, पुर्वेला आणि पश्चिमेला वाहणारी अनुक्रमे उल्हास आणि गडी नदी, तसेच जवळच असणारा इर्शाळगड या सगळ्यांचा विचार करता मराठेशाहीच्या अस्तानंतर इंग्रजी राजवटीत गोर्‍या लोकांनी या गडाचा विकास करायचं ठरवलं. पण उन्हाळ्यात गडावर पाणी मुबलक प्रमाणात नसते हे दिसल्यावर त्यांनी विकास करण्याचा विचार सोडून दिला. हे काही फोटू माझ्या ५ मेगापिक्शेलच्या कॅमेर्‍यानं काढलेले... :) प्रबळगड. धुक्यात लपेटलेली कलावंतीणची मागची बाजू. 'फोटोसेशन' ;) मुंग्यांच वारूळ. काहितरी नाव दिसतंय. बहुतेक प्रबळगड असावं. वरच्या फोटोत बाप्पा आणि मारूतीराया एकत्र दिसत नाहियेत ते इथे दिसतात. प्रबळगडाच्या पायथ्याशी असणार्‍या माचीवरून कलावंतीण आणि प्रबळगडाच्या मध्ये असणारा हा 'V' दिसतो. एके ठिकाणी दगडात कोरलेला हा मेंढाही आढळला.

In reply to by किसन शिंदे

किसन देवा, फोटु अफलातुन आले आहेत. तो वारुळाचा आणि V चा फोटो तर अतिशय आवडला. आमच्या स्पांडुरंगाने काढलेले फोटो आणि वर्णन पण झकास. एकदा जावेच लागेल इथे.

मस्त फोटो आणि वर्णन. ९,११, १२,१३,२२ क्रमांकाचे फोटो सर्वात जास्त आवडले.

भारी भटकंती! आता (गाडी वरपर्यंत जाते याची खात्री करुन) सिंहगड नाहीतर गेलाबाजार पर्वती तरी करावी म्हणतो...

माझा गणेशा झाला रे स्पावड्या.... पिकासा लिंक दे! अ‍ॅड जस्ट करुन वाचतो नि फटु पाहतो....! तुम्ही तिकडे ऐश करताना आम्ही सज्जनगडावर रामरायाच्या पायी डोके ठेवले. खूप छान झाले दर्शन नि एकंदर ट्रीप. :) (हे जळजळ कमी करण्यासाठी ;) )

झकास आलेत फोटो! वर्णन पण छान. :)

थोडी ऐतिहासिक माहिती. या किल्ल्याच्या तटाला पूर्वी अकरा बुरूज होते. दोन मोठे दरवाजे होते. तीन पाण्याची टाकी होती./आहेत १८०० साली हा किल्ला ढासळायला सुरवात झाली असे म्हणतात. या गडावर विशेष काही घडले नसल्यामुळे त्याचे नाव फार प्रसिद्ध झाले नाही. पुढे काही लोकांनी यावर वस्ती करायचा प्रयत्न करून पीकपाणी केले होते. पण एक महत्वाची गोष्ट इ.स. १८२८ साली घडली ती म्हणजे पुरंदरचा रामोशी उमाजी नाईक व भुरोजी नाईक पुरंदरच्या भागात लुटालूट करून कोकणात उतरले तेव्हा ते या किल्ल्याच्या आश्रयास गेले. त्यांच्या बरोबर त्यांच्या जिवाला जीव देणारे तीनशे रामोशीही होते. त्यांनी प्रबळवर मुक्काम ठोकल्यावर जे पत्रक काढले ते खालील प्रमाणे- "तमाम लोकांस कळविण्यास येते की, आम्ही राजे उमाजी नाईक व भुरोजी नाईक, पुरंदर-सुरूसन सुम्मा अश्रीन मैयतैन व अलफ १८६७ या साली दक्षिण कोकणात रत्नागिरी व उत्तर कोकणात साष्टी या दोन प्रांतांतील खेड्यातील पाटील, महार, व इतर लोकांस असे कळविण्यात येत आहे की त्यांनी आपल्या खेड्यात होणार्‍या उत्पन्नाबद्दल ब्रिटिश सरकारास एकही पैशाचा वसूल देऊ नये. हा हुकुम जो कोणी अमान्य करील त्याची चीजवस्तू जाळून टाकून त्याला आमचे तरवारीस बळी दिली जाईल सर्व वसूल आम्हा देत जावे. ह्या जाहिरनाम्याची प्रत करून तुम्ही आपणापाशी ठेवाल म्हणून हा तुम्हाकडे पाठविलेला आहे. हुकुमाप्रमणे कु्रकुर न करता तुम्हाला वागलेच पाहिजे. हा हुकूम अमान्य कराल तर तुमच्या सर्व खेड्याचा विध्वंस करून टाकू. ता. दिजंबर इ.स. १८२७ रोजी हा जाहिरनामा आमच्या खुद्द शिक्क्याखाली प्रसिद्ध केला आहे." हा झाला इतिहास. पण फोटो सुंदर व ट्रेकही सुंदर झाला आहे यात शंका नाही. एक विसरू नका - "Safety is the Name Of this Game" हे सगळ्यांनाच ! (मिनू मेहता व बापू काकांबरोबर ट्रेक केलेला)

ट्रेकही आवडला आणी जकुकाकांची माहितीही

कलावंतीणीचा प्लॅन केलेलात ना ?.. .. तरीही सोबत बायका नेल्यात.. प्रबळ इच्छा होऊन प्लॅन बदललात खरा.. पण एकूण तुम्ही लोक जाम षौकीन निघालात भाऊ... वयच आहे म्हणा ते.. ;) ऑन अ सिरियस नोट; फोटो प्रचंड आवडले आहेत. जंगलातले फोटो पाहून कॉलेजचे पावसात भटकण्याचे दिवस आठवले. विशेषत: झाडीझुडुपांचा अन हिरवाईचा लुक आम्ही दरवर्षी भीमाशंकरचा पाऊस झेलायला जायचो तिथल्यासारखा वाटला..

स्पावड्या, ट्रेक झकास झाला हे दिसतेच आहे, भरपूर मजा केली हे पण मान्य पण रस्ता वगैरे माहिती नसताना असे वेडे साहस करू नकोस. निसर्ग, हिरवाई, धुके, पाऊस वगैरे ठीक आहे पण चुकून एखादा साधासा अपघात (किरकोळ पाय मुरगळणे / घसरून पडणे) झाला की या सगळ्या गोष्टी सरळ शत्रूपक्षात जातात. अगदी मुक्कामाच्या तयारीने बेडींग घेवून जावे असे नाही पण जास्तीचे खाद्यपदार्थ, एखादा फर्स्ट एड बॉक्स बरोबर बाळग. ट्रेक करा.. मजा करा.. पण थोडे सांभाळून. :-)

ट्रेक अगदी मस्त झाला राव, अगदी इथम्भूत माहिती दिली गेली आहे स्पा आणि किसान देवांकडून ट्रेक ची.... अपयश हि यशाची पहिली पायरी हे उच्चारून त्या रस्ता चुकल्याचा मूर्खपणा सगळे लपवत होते चालता चालता ... खर म्हणजे काही अतरंगी घडल तर त्याने त्या घटनेची आठवण अजून घट्ट होऊन जाते, म्हणून १-१.३० तास चुकीच्या वाटेने चाललो त्याचा फारस काही वाटत नाही आता..... धन्यवाद स्पव्ड्या सगळे मी काढलेले फोटू टाकल्याबद्दल... (माझा एकाच फोटो टाकल्याबद्दल खेद) अजून काही विशेष फोटो आहेत ते मी वेगळ्या धाग्यात टाकेन काही दिवसात जसा वेळ मिळेल तसा...

स्पाउ तु नाही काढले फोटो? सौरभ उप्स..__/\__ ११ १२ १३ १७ काय काय म्हनाव त्या फोटोंना. अन आता तुम्ही सारे पहिला कोपर्‍यात गप उभा रहा. माहितगार असल्याशिवाय अस उगिच आली लहर म्हणुन निघायच नाही. धोकादायक आहे हे. सगळी माहिती जमवुन मगच निघायच. अन जमल तर आधी जाउन आलेल कुणी असेल तर ठिकच नाहीतर कोणत्या तरी ग्रुप बरोबर जात जा. एकदा सराव झाला की मगच हे अस आली लहर ...काय?

लेख व हिरवेगार फोटो मस्तंच !

छान फोटो आणि वर्णन

सहजसु॑दर वर्णन आणि किमयागार जादुगर फटू..... किणकिनाट प्रस॑ग आणि सोबत पाहुन मी घ॑टा वा ग्लास बनतो पण प्रसन्न आणि मन्जुळ किणकिनाट हवाच..........

आज फोटो नीट पाहीले. सगळेच फोटो मस्त आलेत. धुक्यातले तर सुंदरच आहेत. त्यातले काही ढापल्या गेल्या आहेत. स्पावड्या किती बेरकी आहे हे शेवटच्या फोटोतल्या त्याच्या हसण्यावरुन पट्कन कळतय. :)

In reply to by कवितानागेश

स्पावड्या किती बेरकी आहे हे शेवटच्या फोटोतल्या त्याच्या हसण्यावरुन पट्कन कळतय. Smile>>> काय रे स्पांडू..? खरं का हे.?

वैभवी दुर्ग कड्यांचं, सह्याद्रीच्या रौद्र वैभवाचं दर्शन दरवेळी आवडूनच जातं.

सुरेख निसर्ग दर्शन :) अमोल

हिरव्या रानातील पांढरट धुक्यात हरवलेली वाट आणि तिच्या न्यारा थाट आवडून गेला. फोटो सगळेच अफलातून आले आहेत. दमल्यावर निसर्गाच्या सानिध्यात मोकळ्या रानावर घरगुती ,रुचकर जेवण करून मग झऱ्यांचे पाणी प्यायला. ही झाली खरी पंचतारांकित पंगत.