मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सत्यमेव जयते

सोत्रि · · काथ्याकूट
भल्या भल्यांना टीव्हीच्या छोट्या पडद्याने मोहात पाडले आहे. अमिताभ, सलमान, शाहरूख ह्यांच्या मांदियाळीत आता मि. परेफेक्ट, आमिर खान, हाही सामिल होतो आहे. तो सत्यमेव जयते ह्या एका कार्यक्रमाद्वारे छोट्या पदद्यावर येतो आहे. आजपासून दर रविवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम १६ भागांत दाखवला जाणार आहे. ह्या कार्यक्रमाचा कॉन्सेप्ट 'थीम्ड टॉक शो' असा आहे. स्त्री भ्रूण हत्या, बाल कामगार असे वेगवेगळे सामाजिक विषय/मुद्दे घेऊन, समाजातल्या विवीध स्तरातील लोकांचे अनुभव आणि प्रतिक्रिया ह्यावर चर्चा असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे. ह्या कार्यक्रमासाठी आमीरने तो 'मि. परेफेक्ट' आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केले. कार्यक्रमाची वेळ, कार्यक्रमाची प्रमोशल गाणी आणी कॅम्पेन हे त्याने त्याच्या परफेक्ट स्टाइलने एकदम व्यावसायिकरित्या केले आहे. आजचा विषय होता "स्त्री भ्रूण हत्या". आमिर नेहमीप्रमाणेच त्याच्या परफेक्ट मुडमध्ये कार्यक्रम सादर करत आहे. वेगवेगळ्या स्तरातील स्त्रिया त्यांचे भयानक, अतिशय अंगावर येणारे, अनुभव सर्व दर्शकांसमोर व्यक्त करत आहेत. आता बर्‍याच जणांना 'ह्यात काय' नविन?' असा प्रश्न पडेल आणि तो सार्थ आहेच. अश्या फॉर्मॅटमधले आणि अश्या विषयांना वाहिलेले ढीगभर कार्यक्रम आत्तापर्यंत येऊन गेलेत. पण आज पहिलाच भाग झाला आहे, जरा वेळ देवूयात आमिरला टीव्हीच्या छोट्या पडद्यावर स्थिर स्थावर व्हायला. काळच ठरवेल हा कार्यक्रम कसा आहे ते, तो यशस्वी होईल का ते आणि आमिर छोट्या पदड्यावर सेटल होईल का ते. मला तरी असे वाटते आहे, तुम्हाला काय वाटते?

वाचने 46807 वाचनखूण प्रतिक्रिया 172

In reply to by शिल्पा ब

अर्धवटराव 11/07/2012 - 00:35
त्याकरता बेसीक कंडीशन अशी कि आपल्याप्रमाणे इतरांनाही सुख - दुखः, आत्मसन्मान वगैरे असतो याची जाणीव ठेवणे. तिथेच तर घोडं पेंड खातं. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

चिगो 11/07/2012 - 22:46
अर्धवटराव, समाजात असमानता आणि भेदभाव होता आणि राहील, ह्याच्याची सहमत.. पण 'कास्ट' आणि 'क्लास' मधला हाच फरक आहे ना,राव. जात जन्मासोबत जी चिकटते ती मेल्यावरही सोडत नाही. क्लास सिस्टीममधे माणूस त्याच्या लायकीच्या भरवश्यावर वर जाऊ शकतो. उदाहरणच द्यायचे झाले, तर त्यादिवशीच्या कार्यक्रमातील आय ए एस अधिका-याचे देता येईल जो क्लास वनला पोहचला तरी खालच्या जातीतलाच राहीला..

In reply to by चिगो

अर्धवटराव 11/07/2012 - 23:16
नविन जाति व्यवस्थेत "कास्ट" हा शब्द उरणार नाहि... त्याची जागा "क्लास" घेईल. हा "क्लास" जन्मजात(च) नव्हे तर जन्मापुर्वी पासुन चिकटेल. गॉड पार्टीकल्स शोधणार्‍या क्ष वैज्ञानीकाच्या पिढीतल्या अस्सल युरोपीयन जी ई लॅब सर्टीफाईड क्लास ए स्पर्म पासुन जन्मलेले आम्हि सॉकर विश्वचशक जिंकणार्‍या ब्राझीलीयन फुटबॉलपटुच्या ग्लॅक्सो लॅब सर्टीफाईड स्पर्म पासुन जन्मलेल्या इतर जीवांपेक्षा जन्मजात श्रेष्ठ आहोत, आम्हाला सॅल्युट करा... हा आहे नवीन जातव्यवस्थेतला गंड. अर्धवटराव

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीरंग 11/07/2012 - 12:24
>>अहो, जास्त कशाला आत्ताच काही दिवसापूर्वी मिपावरच ’मी अमुक अमुक आहे आणि मला अमुक अमुक असण्याचा अभिमान आहे’ असं वाचलं होतं. अशा अभिमानातूनच मग दुसरा हीन ठरायला लागतो. अहो, जास्त कशाला आत्ताच काही दिवसापूर्वी मिपावरच, "सचिनने राज्यसभेत प्रवेश 'भ्रमवृंदाच्या' नाकावर टिच्चून केलाय." अशा आशयाच्या विनाकारण जातीय टिप्पणी करणार्या एका हिणकस पोस्टच्या समर्थनार्थ एका उच्चशिक्षित प्राध्यापक / डॉ. ने "वाह! मस्त! निबर हाणलाय!" वगैरे जाहीर कौतुक केले होते. तेच सध्या समाजात समता येईल आणि समता नांदावी अशा आशावाद बाळगत असलेले बघून बरे वाटले. :)

In reply to by श्रीरंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 11/07/2012 - 15:57
सचिनच्या राज्यसभेच्या प्रवेशाबाबतच्या कोणी कोणाला कोणत्या कारणाने हाणलं आहे, आणि शब्दाचा बाबतीत योग्य असा खुलासा योग्य तिथे केलाच होता तरीही असेल तशा आपल्या मताचा आदर आहेच. बाकी, सामाजिक उतरंड तशीही डोक्यातच जाते. उच्चशिक्षित प्राध्यापक डॉच्या अनावश्यक वाटलेल्या टीप्पण्या लक्षात ठेवूनही आपल्याला माझा समतेचा आशावाद भावला, त्याचे समाधान आहेच. -दिलीप बिरुटे

श्रीरंग 11/07/2012 - 12:14
मागे त्या कीटकनाशक कंपनीच्या मालकाला बोलावून अवघड प्रश्न विचारून ग्रिल करणार्या आमीरने, दारूविषयीच्या भागात मात्र, चित्रपटांमुळे दारूला मिळालेले ग्लॅमर, त्यामुळे नवीन पिढीवर पडणारा प्रभाव, याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. किमान स्वतःच्या चित्रपटात दारूचे ग्लॅमराईज्ड चित्रण करणार नाही असे जाहीर केले असते तरी त्याची बांधिलकी दिसून आली असती.

In reply to by श्रीरंग

रेवती 11/07/2012 - 20:18
किमान स्वतःच्या चित्रपटात दारूचे ग्लॅमराईज्ड चित्रण करणार नाही असं तो म्हणू शकेल असे वाटत नाही. चित्रपटाच्या कथेचा भाग म्हणून दारू आवश्यक असेल तर कोणता दिग्दर्शक त्याला तसे करू देईल? आता आमीर मोठा कलाकार आहे, तो स्वत:च्या अटी ठेवू शकतही असेल पण एखादी उत्तम पटकथा केवळ दारूचे सीन आहेत म्हणून नाकारायची हे पटत नाही. जसं काही आमीरने दारूवाले शिनेमे केले नाहीत म्हणून जनता दारू पिणे बंद करणार आहे! देशभक्तीचे सिनेमे किंवा देहभक्तीचे ;) दारूच्या संगतीनं पाहणारे प्रेक्षक असतातच.

In reply to by रेवती

श्रीरंग 12/07/2012 - 13:00
>>जसं काही आमीरने दारूवाले शिनेमे केले नाहीत म्हणून जनता दारू पिणे बंद करणार आहे! पण आमीर / तत्सम कलाकारांमुळे दारूला ग्लॅमर प्राप्त होऊन, दारू पीणं कसं कूल आहे, असे मनावर बिंबवले जाऊन अनेक नवोदित तरूण प्यायला चालू करत असावेत असं नाही वाटत का तुम्हाला?

In reply to by श्रीरंग

रेवती 12/07/2012 - 20:32
एखाद्या सिनेमामुळे कपड्यांच्याही फ्याशनी येतात आणि जातात. दारू पिण्याची फ्याशन मात्र आजूबाजूच्या वातावरणाने (घरात किंवा नेहमीच्या येण्याजाण्याचे ठिकाण, मित्रपरिवार) लागू शकत असेल असा अंदाज आहे. शिवाय त्यासाठी पैसाही लागतोच. सिनेमा पाहून दारूची सवय लागलेल्यांचे प्रमाण कितपत असेल? दारूची फारच सवय असलेल्यांना विचारलेत तर 'सॉलीड' पिऊन 'राडा' करण्याची हौस अठवडाभरात संपत असेल (अंदाज). नंतर राहते ती सवय. दारूची सवय वाईट आहे हा काही आजचा शोध नाही. एखाद्या गोष्टीने आपले फार काही चांगले होणार नाही मग त्या वाटेला जायचे का? हा विचार ज्याचा त्याने करावा. आमीरने किंवा कुणीही असा मक्ता घेतलेला नाही/घेऊ शकत नाही. अगदी सख्खे आईवडील/बायको/मुलं तळमळून सांगतात, मुलांवर/नवर्यावर्/आईवडीलांवर कितपत परिणाम होतो? आमीरच्या जन्माआधीपासून पिऊन गटारीत लोळणारे नव्हते का? मुलांसाठी 'रोल मॉडेल' असणारे (पालक) जिथे ही मर्यादा सांभाळू शकत नाहीत तिथे सिनेमांची काय बात! तसं असतं तर देशभक्तीपर सिनेमे काय कमी आले होते?

In reply to by रेवती

श्रीरंग 13/07/2012 - 00:08
अगदी अगदी...आमीरच्या आधीपासून पिऊन गटारात लोळणारे होतेच. सिनेमात "दारू प्या" असा थेट संदेश नसतो हे मलाही माहित आहे. पण चित्रपटांत दारू पीणं कसं 'कूल' आहे हे अभावितपणे ठसवलंच जातं असं माझं तरी मत आहे. कीटकनाशक कंपनीच्या मालकाला रासायनिक कीटकनाशकं बनवू नकोस सांगणं सोप्पं आहे, पण स्वतःच्या चित्रपटातून होणार्या दारूच्या भलामणीची मात्र कोणतीही जबाबदारी स्वतःवर घ्यायची नाही. कमाल आहे! असो. सिनेमा पाहून नवोदित तरुण प्रभावित होत असावेत हेच तुम्हाला पूर्णतः अमान्य असेल, तर आपला हा वाद व्यर्थ आहे.

In reply to by श्रीरंग

रेवती 13/07/2012 - 02:38
जरूर प्रभावित होतात. मान्य करते पण त्यांचे प्रमाण किती? (माझ्याकडे विदा नाही) त्या दारूवाल्या भागात डॉ. देशपांडे यांची मुलाखत पाहून रिसेप्टर्स तयार होण्याचे प्रकरण माहीत झाले. कपड्यांची एक फ्याशन येऊन ती लाट काही दिवसांत ओसरते पण या शारिरीक हानीचे काय? सिनेमात खून करा असाही संदेश नसतो. पण हे प्रकार धडधडीतपणे तुम्ही परिणामकारकरित्या लोकांसमोर आणता ना? परिणाम होणारच. परिणामकारक असले तरी देशभक्तीचे सिनेमे पाहून कोणत्या गोष्टींपासून लांब रहायचे हे आपण बरोब्बर ठरवतो ;) त्यावेळी हातात झेंडे घेऊन का बरे निघत नाही? मग हे का ठरवता येऊ नये? त्यासाठी आमीर कशाला हवा? त्याने सिनेमात दारू पिण्याचाचा अभिनय केला (अगदी दारू पिऊन केला असे समजू, कधीकधी तसे असतेही ) तरी त्याच्या हातात दिग्दर्शकाच्या नाड्या असतात का? आमीर हा काही आदर्श मनुष्य नाही. त्याच्या आयुष्याबद्दल आपल्याला विनाकारण जास्त माहिती आहे म्हणून आरोप करायला वाव तरी मिळतो नाहीतर याची पूजाच केली असती लोकांनी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 15/07/2012 - 15:39
वृद्धांच्या समस्या ही एक सामाजिक समस्या आहे, आणि त्यावर मिपावर जालावर अनेकवेळा काथ्याकुट झालेला दिसतो. नवीन असं काही नसल्यामुळे आजचा भाग पाहण्याचा मुडच होत नव्हता. पण, सोत्रीच्या धागा रैवारी हलवायचाच असा मनोमन संकल्प असल्यामुळे आजचा भाग पाहावा लागला. (आता काय दोनच तर भाग राहीले) :) बाकी, आमिरखानचे डोळे आज सुरुवातीपासुनच भरत होते. विषयच तसा असल्यामुळे क्यामेराही नीट फिरत होता. असो. वृद्धांसाठीचे क्लब, एकटेपणावर विवाह हा एक मार्ग. आणि अशा विविध बाबी आजच्या भागात संपन्न झाल्या. आयुष्याचा आणखी एक डाव प्रसन्न अशा जोडप्यानं सुरु केला. त्यांची छबी टीपण्याचा मोह आवरता आला नाही. 2012-07-15-088 बाकी, प्रतिसाद सवडीने टाकतोच.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रेवती 15/07/2012 - 20:09
आमच्याकडे अजून दिसायचाय हा भाग. विषय काय असेल ही उत्सुकता होती. धन्यवाद हो सर! दहा पंध्रा मिंटात पाहते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 22/07/2012 - 21:10
पाणी हेच जीवन आहे. पाणी. दुषित पाणी. पाण्याचे नियोजन. टँकरचा पाणीपुरवठा, होणारे अपघात. पाण्याच्या समस्या, गटाराच्या पाण्याने आंघोळ, पाण्यासाठी काय नियोजन केले पाहिजे. पाण्याचा योग्य वापर. असो, धन्यवाद. उफ्ह, ओह, गाल फुगवणे. इत्यादि. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शिल्पा ब 22/07/2012 - 21:18
तुम्हाला फार बॉ आमिर खान ची नफरत ! अर्थात आम्हाला फार प्रेम आहे अशातला भाग नाही, फिर भी.. मी माझ्या लहानपणापासुन पाणी वाचवा ! हे ऐकतेय पण कोणाला काही करताना पाहीलं नाही. म्हणजे नळाला पाणी असलं की वाटेल तितकं वाहु द्यायचं अन नसलं की बचतीचा प्रश्नच नाही. माझं स्वत: काँट्रीब्युशन म्हणजे दात घासताना नळ चालु ठेवत नाही, घासुन झाल्यावरच पाणी घेते. कुकरातलं पाणी वगैरे झाडांना घालते, फेकुन देत नाही. असं बारीक सारीकंच!

In reply to by शिल्पा ब

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 22/07/2012 - 21:27
नफ्रत बिफ्रत कै नै. आमिरचे पिच्चर मी लै इंजॉय केले आहेत. पण, आमिरचं या कार्यक्राचं संचलन मला कधीच भावलं नाही. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. माझ्या गावाच्या जवळुन गोदावरी नदी वाहते. सात कि.मि. अंतरावर आहे. जायकवाडी (पैठण) धरणाचं बॅक वॉटर आम्हाला उन्हाळ्यात पुरतं. नगरपालिकेच्या पाण्याच्या मोटर्स जळतात कधी कधी आणि त्यामुळे पाण्याचे हाल होतात. पाच-पाच दिवस पाणी येत नाही. प्यायचं पाणी खुप जपुन वापरावं लागलं. आमच्याकडे बोअर आहे, शेजारधर्म म्हणुन पाणी देतो बर्‍याचवेळी. पण, नळाला पाणी आलं की मग मत पुछो त्याचा कै च्या कै वापर, हे झालं आमचं उदाहरण पाण्याच्या बाबतीत सर्वत्र असंच असावं. -दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 29/07/2012 - 20:54
बारावा भाग संपला. हिंदुस्थानातील शिल्पकार. सत्यमेव जयतेचा आज शेवटचा भाग होता. आज कोणता विषय घेऊन आमिरशेठ येतात त्याची उत्सुकता होतीच. आज शेवटचा भाग असल्यामुळे आमिरखानंनं आत्तापर्यंतच्या भागांमुळे कोणी दुखावले असतील तर चुकभुल देणेघेणे असे सांगुन माझा उद्देश केवळ आहे ती परिस्थिती दाखवुन काही बदल व्हावेत या अपेक्षेने आपल्यासमोर विविध विषय घेऊन आलो असे सांगुन मुद्याला हात घातला. गुजरात भुकंप आणि दंगलीनंतर काहींच छत्र हरवलं अशा लहान मुलांचा सर्वोदय संस्थेनं सांभाळ केला. जम्मु-काश्मिरमधे गुलाम कादीर आणि आशा भट यांनी कसा भाईचारा स्थापित केला आहे, आणि गुलाम कादीरांनी काश्मिरमधुन गेलेल्या पंडितांनी परत यावे अशी हाक घातली. 'डोंग’( उल्लेख चुकत असावा) जमातीला कशी अस्पृष्यतेची वागणुक मिळत होती त्यांना सन्मानानं जगायला लावुन संघटन करुन दलितांना जमिनदाराच्या ताब्यात गेलेल्या जमिनी मिळवुन दिल्या. देहव्यापारातुन स्त्रिया, मुली, यांची मुक्तता करणारी स्मिता. सुभाषिनी आपल्या मुलाला अनाथालयात शिकवुन त्याच्या बळावर गरिबांसाठी मोफत सेवा देणारं रुग्णालयाचं स्वप्न पूर्ण केलं. विकलांगासाठी शिक्षण आणि रोजगार मिळवुन देणारी नसिमा. कॉलेज करता करता शाळेत न जाणा-या मुलांना एकत्र करुन शिकवणारा बाबर. आणि सरकारी शाळांमधुन उत्तमातलं उत्तम शिक्षण मिळावं यासाठी विप्रोचे मालक अजिमप्रेमजी यांच्या आर्थिक मदतीतुन राष्ट्रनिर्माणाचं एक स्वप्न साकारतंय. (नावांच्या बाबतीत चुभुदेघे) अतिशय धावपळीत उरकलेला आजचा भाग. हिंदुस्थानातल्या समाजासाठी काहीतरी करणा-यांचा धावता आढावा. या देशात काही चांगलंही होत असतं त्याची ओळख देणारा भाग. बाकी, एवढा देशप्रेमानं भारावलेला भाग पण फार कमी जणांचे डोळे भरलेले दाखवता आले. बाकी, आणखी दोन शब्द आणि आभार प्रदर्शन थोड्याश्या सवडीनं. जाता जाता : आज दै. लोकमतच्या मंथन पुरवणीत वाचलं अमेरिकेतली टॉकशॉवाली ओप्रा विनफ्रे (च्यायला काय अवघड नाव आहे) बाई म्हणे जीच्या कार्यक्रमाला उतरती कळा लागल्यामुळे जगभरातल्या समकालीन सामाजिक प्रश्नांचा गुंता उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. नुकतेच भारतातल्या विशेषतः मुंबैतल्या झोपडपट्टीमधे फिरवुन म्हणे भारतीय कसे (गुण्यागोविंदानं) राहतात वगैरे असा विषय घेऊन 'ओप्राज नेक्स्ट चाप्टर' मधे दाखवलं. पुढेही जगभरातील दु:ख, दारिद्र्य, दाखवत ती बाई फिरणार आहे. आमिरनं स्टुडियोतुन बाहेर पडुन तिच्यासारखंच सत्यमेव जयतेचा दुसरा भाग सुरु करावा, कारण सामाजिक आणि दु:खाच्या प्रश्नांना मध्यमवर्गीयांकडुन चांगले पाठबळ मिळते आणि 'माध्यमातुन' अशाच विषयांवर मार्केट व्हॅल्युही कॅश करता येते, असं माझं रोखठोक मत आहे. -दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 02/03/2014 - 11:17
सत्यमेव जयते चा दुसरा भाग सुरु झालाय आजचा विषय महिलांवरील बलात्कार... :/ स्टार प्लस. -दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 03/03/2014 - 10:30
निर्भयाचा विषय घेऊनही कालच्या भागात अमिरखानला काही हाती लागलं नाही. कालचा भागात बलत्कार करणा-याचं काही होत नाही, दुर्दैवाने असाच संदेश गेल्याचे दिसते. टीआरपीच्या बाबतीत सर्वत्रच छापून आलंय की दुस-या भागात अमिरखान आणि त्याच्या टीमला काही जमले नाही म्हणून. ’सत्यमेव जयते विरोधाभासाच्या विळख्यात’ (दुवा दैनिक लोकमतला जातो) ज्या महिलांवर असे प्रसंग आले त्यांचे अनूभव ह्दयद्रावक होते. एकतर शारीरिक आणि मानसिक आघात पण समाज आणि न्यायपालिकेकडून आलेला निष्ठूरतेचा अनूभव हे पाहतांना दु:ख नक्कीच वाटत होते. -दिलीप बिरुटे