मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजीव दिक्षित - ??

यकु · · काथ्याकूट
सातवी-आठवीत असताना एकदा घरात राजीव दिक्षीतांच्या ''आजादी बचाओ आंदोलन'' च्या वीस कॅसेट्सचा संच (1996-97) दाखल झाला. हिंदी वक्तृत्वाची ओळखच राजीव दिक्षीत यांच्या भाषणातून झाली. कितीतरी दिवस घरात त्या कॅसेट लावल्या जायच्या आणि राजीव दिक्षीतांचे विचार, त्यांचा इतिहासाचा अभ्यास आणि एक स्वातंत्र्यप्राप्त 'देश' म्हणून भारतात होत नसलेल्या गोष्‍टींची तळमळ शब्दाशब्दातून दिसायची. राजीव दिक्षीतांची भाषणे ही काही फक्त राणा भीमदेवी थाटाची बाजारू भाषणे नव्हती - त्यांच्या प्रत्येक मुद्याला इतिहासातील साधार विवेचन, संदर्भ, विश्लेषणाची जोड असे. ती भाषणं ऐकूनच किराणा दुकानातून घरात येणार्‍या काही विशिष्‍ट ब्रॅण्‍डच्या वस्तू आणणे बंद झाले. स्वदेशी-विदेशी, इंग्रजांनी कशी देशाची वाट लावली आहे.. अजूनही विदेशी कंपन्यांमुळे कशी वाट लागत आहे, आपणही त्यात अजाणता कसा भाग घेतोय वगैरे मुद्यांवरुन कित्येकदा वाद घालून झाले.. अशीच काही वर्षे गेली. राजीव दिक्षीतांच्या कॅसेट आणि काही प्रमाणात तेही विस्मरणात गेले. काल-पर्वा फेसबुकवर पुन्हा एकदा राजीव दिक्षीतांच्या भाषणाची लिंक समोर आली. त्यात मात्र राजीव दिक्षीत रामदेव बाबांसोबत बसून आजही ( मी ऐकले तेव्हाचा काळ 96-97 ते 2010) तेच विचार, त्याच तळमळीने, त्याच तडफेनं श्रोत्यांसमोर मांडताना दिसत होते. मन आपोआप कितीतरी वर्षे मागे गेले. क्लिप संपली. पुढची क्लिप मात्र काळीज चिरुन गेली. त्या क्लिपवर राजीव दिक्षीत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होताना दाखवले गेले होते. हे कधी झालं? आपल्याला कळलं कसं नाही? कदाचित काहीतरी घोळ असेल म्हणून राजीव दिक्षीतांच्या निधनाबद्दलची बातमी शोधू लागलो. गुगलची कितीतरी पाने उलटवली.. पण एकाही पेपरनं राजीव दिक्षीतांच्या निधनाची बातमी दिलेली नव्हती. फार दिवस नाही झाले ते जाऊन.. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर मध्‍ये राजीवजी गेले.
त्यांच्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी अंतर्जालावरील मंचांवर केलेल्या चर्चा तेवढ्‍या दिसल्या. डोकं सुन्न झालंय! अशा व्यक्तीकडे, चळवळीकडे माध्‍यमांकडून एवढे दुर्लक्ष होऊ शकते, व्हावे का? माध्‍यमे खरंच विकली गेलेली आहेत? राजीव दिक्ष‍ीत जन्मभर विदेशी कंपन्यांविरोधात, सरकार विरोधात, प्रचलित कायद्यांविरोधात बोलत राहिले. त्यांचा असा एक विचार होता. तो खरंच दुर्लक्ष करण्‍या सारखा होता? एक ध्‍येय घेऊन जीवन झोकून देणारी राजीव दिक्षीतांसारखी माणसे समाजाला, माध्यमांना, शासनसंस्‍थेला खरंच नको असतात? ही असं वेड्यासारखं एकच एक ध्‍येय घेऊन जीवन समर्पित करणार्‍या राजीवजींची शोकांतिका की नेहमी स्वत:मध्‍ये मश्गुल असलेल्या तथाकथित 'समाजाची' शोकांतिका? राजीव दिक्षीत - अधिकृत संकेतस्‍थळ: http://www.rajivdixit.com/ छायाचित्र साभार.

वाचने 16218 वाचनखूण प्रतिक्रिया 38

अन्या दातार 16/12/2011 - 00:21
झाSSSSSSलं! काढलात हा विषय उकरुन. तु दिव्य मराठीत होतास तेच बरे होते. ही असली थेरं तरी सुचली नसती तुला. मीडियाच्या टॉप ब्रासची कनेक्शन्स तुला इथे बघायला मिळतील रे. बर्‍याच प्रश्नांची उत्तरे भेटतील या लिंकवर.

In reply to by अन्या दातार

धागाकर्ता म्हणून विनंती करतो की 'हिंदूत्व' हा विषय मनात धरुन हे लिहीलेले नाही. हिंदूत्व हा राजीवजींचाही मुख्य अजेंडा नव्हता. फक्त कुणीतरी कालपर्यंत आपल्यात होता, त्यानं एका विचारधारेला ध्येय मानून तिचा प्रचार केला, संघटना उभारल्या आणि ते करता-करताच तो गेला.. कुणाला त्याचं काही आहे की नाही किंवा कसे ते जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी चार ओळी लिहील्या आहेत. विषय उकरुन काढला? हे समजले नाही. यापूर्वी या विषयावर चर्चा झाली आहे का?

In reply to by यकु

अन्या दातार 16/12/2011 - 00:50
धागाकर्ता म्हणून विनंती करतो की 'हिंदूत्व' हा विषय मनात धरुन हे लिहीलेले नाही
याची कल्पना आहे. सदर दुवा हा फक्त हिंदुत्वाच्या नजरेतून बघु नये अशी प्रतिक्रियाकर्ता म्हणून विनंती.
विषय उकरुन काढला? हे समजले नाही. यापूर्वी या विषयावर चर्चा झाली आहे का?
थेट या विषयावर चर्चा झालेली आठवत नाही, पण स्वदेशी-विदेशी असा मुद्दा परकिय गुंतवणुकीसंदर्भात इथे चर्चिला गेला होता व फक्त स्वदेशीचा आग्रह का बरोबर नाही याबद्दल थोडेफार मतप्रदर्शन झाले होते.

In reply to by अन्या दातार

विश्वनाथ मेहेंदळे 16/12/2011 - 01:48
गल्ली चुकलात अन्या भाऊ. मला वाटते की इथे मुद्दा राजीव दीक्षित यांची मते योग्य होती की नाही हा नाही तर एखाद्याला असे अनुल्लेखाने मारणे योग्य आहे का हा आहे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

लेखाचा रोख अनुल्लेखाकडेच फक्त असावा असं मानतो.. या अनुल्लेखाचं वाईट वाटलं.. बाकी मतांच्या योग्यतेबद्दल काय बोलावे आता? राजीव दिक्षितांच्या मृत्यूविषयी मलाही थेट त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनाची पोस्टर्स कुठेशी लागलेली पाहूनच कळलं. त्यांच्या विचारांविषयी आणि प्रसाराविषयी खूप लिहीता येईल, पण आता काही उपयोग नाही. असं लिखाण विरोधी होण्याची खात्री असल्याने मरण पावलेल्या व्यक्तीच्या विचारांचे डिसेक्शन करण्यात औचित्य नाही असं वाटतं. शिवाय ते गेले तरी त्यांचे विचार हजारो लाखो लोकांमधे धगधगत ठेवून ते गेले आहेत, किंवा एक चळवळ त्यांच्यामागे उभी राहते आहे असा काही परिणाम उरलेला दिसत नसल्याने आता त्या विचारांना उपटून नाहीसं करत बसण्याची गरजही राहिली नाही. त्या विचारांनी मोठं मूळ धरलेलं नाही ही त्यातल्यात्यात समाधानाची गोष्ट. राजीव दिक्षित विरुद्ध राजीव साने असं एक राजीव सानेंनी केलेलं खंडन अप्रतिम होतं. ते ऑनलाईन कुठे मिळालं तर फार चांगलं.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

अन्या दातार 16/12/2011 - 12:40
विमे, सदर लेखात अजुनही काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे याकडे तुमचे व सर्वांचे लक्ष वेधून घेतो.
माध्‍यमे खरंच विकली गेलेली आहेत? राजीव दिक्ष‍ीत जन्मभर विदेशी कंपन्यांविरोधात, सरकार विरोधात, प्रचलित कायद्यांविरोधात बोलत राहिले. त्यांचा असा एक विचार होता. तो खरंच दुर्लक्ष करण्‍या सारखा होता?
या दोन मुद्द्यांपैकी माध्यमे खरंच विकली गेली आहेत काय? याच्या होकारार्थी समर्थनार्थ एक दुवा दिला गेला ज्याच्याकडे पूर्णतः हिंदुत्वाच्या चष्म्याने बघितले गेले. विदेशी कंपन्यांविरोधात बोलण्यावरुन नुकत्याच झालेल्या चर्चेतील एक दुवा मांडण्यात आला, ज्याचा रोख राजीवजींच्या मुद्द्यांना विरोध करण्याकडे होता. एक काळ असा होता की राजीवजींच्या भाषणाने प्रभावित होऊन विदेशी वस्तु वापरणे मी कमी करत आणले होते व इतरांनाही तसे करण्यास सांगत होतो. राजीवजी व त्यांच्या भाषणांबद्दल मला आदरच आहे. अश्या व्यक्तीस अनुल्लेखाने मारणे नक्कीच उचित नाही; तरीही तसे का घडले याचे कारण स्पष्ट करण्याकडे माझा रोख होता.

मोदक 16/12/2011 - 01:34
एम टेक (Satellite Telecommunications) आणि डॉ़क्टरेट (Telecommunications ) शिकलेली व्यक्ती एका सामाजीक कार्यासाठी स्वत:ला समर्पित करते... आणि अत्यंत संशयास्पद स्थितीमध्ये निधन झालेले असताना कोठूनही चौकशी वगैरेची मागणी झाली नाही याचे खूपच वाईट वाटते. ( राजीव दिक्षितांची तळमळीने केलेली भाषणे ऐकून असे वाटते की मी एका खूप बंदिस्त कोशात जगतो. खूप सेफ आयुष्य :-( ) मोदक.

In reply to by मोदक

michmadhura 16/12/2011 - 11:21
सहमत आहे.

दादा कोंडके 16/12/2011 - 01:58
मी पण त्यांची खूप भाषणं ऐकली होती. त्यावेळी आमच्या वर्गात असलेल्या मुला-मुलींनी प्रभावीत होउन कोकाकोला व पॅप्सी प्यायचं सोडून दिलं होतं. एव्हडी लोकप्रीय व्यक्ती आणि त्यांच्या मृत्यूची दखल कोणीही घेउनये म्हणजे खरच धक्कादायक आहे!

अर्धवटराव 16/12/2011 - 04:13
राजीवजी गेल्याचं मला माहित होतं... अर्थात, मी कुठे तरी ति बातमीच वाचली असणार. त्यांचा मृत्यु संशयास्पद परिस्थितीत झाला असंही वाचलं होतं... त्याचं कोडं कधिच उकलणार नाहि हे तेंव्हाच कळलं होतं... राहिला प्रश्न मिडीयाच्या संवेदनशिलतेचा, तर अब्दुल कलाम राष्ट्रपती होताना त्यांनी आपली हेअर स्टाईल बदलावी कि नाहि यावर दिवसरात्र चर्वण करणारे उद्योगी लोकं ते... चालायचच. अर्धवटराव

अभिजीत राजवाडे 16/12/2011 - 04:29
माझे कमनशिब कि मला यांच्याबद्दल अजुन माहित नव्हते. आता तु-नळी वरचे व्हिडियो पहायला घेतो. माहिती बद्द्ल आभार. तुमच्यामुळेच मला यु जी बद्दल कळले. आभार,

जोशी 'ले' 16/12/2011 - 08:10
ओह..मला पन राजीवजी गेल्याचे माहित नव्हते, किंबहुना गेल्या काहि वर्षां मधे त्यांच्या आंदोलना बद्दलहि काहि वाचनात आले नव्हते...स्व. राजीवजींना भावपुर्ण आदरांजली

जोशी 'ले' 16/12/2011 - 08:20
ओह..मला पन राजीवजी गेल्याचे माहित नव्हते, किंबहुना गेल्या काहि वर्षां मधे त्यांच्या आंदोलना बद्दलहि काहि वाचनात आले नव्हते...स्व. राजीवजींना भावपुर्ण आदरांजली

मराठी_माणूस 16/12/2011 - 09:40
मी ही त्यांच्या काही कॅसेट ऐकल्या होत्या , आणि त्यांचा अभ्यास पाहुन अवाक झालो होतो. त्यांच्या निधनाबद्दल माहीती नव्हती. भाउ , दादा, साहेब ह्यांच्या वाढ्दीवसच्या किळस आणणार्‍या होर्डिंग्स नको असताना पण दिसत असतात आणि अशा विद्व्वान व्यक्ती बद्दल काहीच समजत नाही ह्याचा खेद आहे. श्रध्दंजली

मन१ 16/12/2011 - 12:38
अफाट अशा सत्तास्पर्धेत असे मोहरे गळून पडणं हल्ली गृहितच धरायची सवय झालीय्.की माझीच संवेदनशीलता संपलिए? बादवे राजीवजींच्या विचारांबद्दल सॉफ्ट कॉर्नर असलेल्या संघ परिवारातील एखाद्या नियतकालिकानंही बातमी दिली नाही म्हणायची का? प्रश्न राहिला संशयास्पद मृत्युबद्द्ल, ते हृदयविकारानं गेलेत अशी बातमी ऐकलिये. तसे ते जाणेही अशक्य नसावे. अँजिओप्लास्टी व अँजिओग्राफी अजिबात करून न घेता निव्वळ आहारातल्या बदलानी आख्खा हृदयरोग परतवता येतो ह्या श्रद्धेवर ते जगत होते. फारसे "आधुनिक" उपचार न घेता नुसत्या आहारामुळे रोग बळावला व शेवटी घातक ठरला, ही एक शक्यता आहे. समजा तसे नसेल तरः- सत्तास्पर्धेत तुमचे उघड विरोधक कधीच तुमचे शत्रू नसतात. जीव जातो तो आपल्याच अनुयायांच्या , सहकार्‍अयंच्या असूयेपोटी हे इतिहासानं शिकवलेलं शहाणपण आहे. बलिष्ठ, वजनदार विरोधक परवडला पण सहकारी नको ही "power game" मधील पहिली शिकवण आहे. गविंचा प्रतिसाद समजला नाही. विशेषत : ह्या परिच्चेदातलं शेवटचं वाक्यः- शिवाय ते गेले तरी त्यांचे विचार हजारो लाखो लोकांमधे धगधगत ठेवून ते गेले आहेत, किंवा एक चळवळ त्यांच्यामागे उभी राहते आहे असा काही परिणाम उरलेला दिसत नसल्याने आता त्या विचारांना उपटून नाहीसं करत बसण्याची गरजही राहिली नाही. त्या विचारांनी मोठं मूळ धरलेलं नाही ही त्यातल्यात्यात समाधानाची गोष्ट. सध्या त्यांच्या मृत्यु व बातमीबद्दल बोलायचा धागा आहे, विचारांचा नाही असे समजून इतर मुद्द्यांवर शांत राहणार आहे. अवांतर : - धडाडीचे व जनाधार वाढत असणारे काँग्रेस नेते राजेश पायलट, माधवराव शिंदे(सिंधिया), वाय एस राजशेखर रेड्डी व परवा इशान्येच्या राज्यातले अजून एक मुख्यमंत्री असे एकूण चौघेजण अचानक अपघातात गेल्यावर वाइट वाटले होते.नेमका जनतेवरील प्रभाव व संघटनेवरील पकड वाढत असतानाच एकदम चौघेच्या चौघे अपघातात गेले. निव्वळ योगायोग, अजून काय. राजस्थानचे मुख्यमंत्रीही परवा एका घोटाळ्यात अडकले होते, तेही जाताजाता वाचले. बरे वाटले. पुन्हा पुन्हा वाचोत बापडे.

In reply to by मन१

त्यांचे विचार ऐकताना भारावून टाकणारे असले तरी परदेशी=षडयंत्र अशा कॉन्स्पिरसी थिअरीवर आधारलेलेच असायचे. प्रचंड पॅरेनॉईड आणि गैरसमजुतीने ठासून भरलेल्या पायावर विचार बनवले जात होते. आयआयटीतून शिक्षण म्हणजेच लॅटरल थिंकिंग असे मुळीच नव्हे ही समजूत मनात पक्की होण्याचं ते पहिलं कारण होते. सुरुवातीला मीही भारावून गेलो त्यांच्या "ऑरा"मुळे पण विचार केल्यावर जमिनीवर आलो इतकंच नव्हे तर ते विचार सरळसरळ चुकीचे आणि भलत्या बाजूला जाणारे वाटायला लागले. ते स्वतः त्यांच्या विचारांशी प्रामाणिक होते आणि बहुधा कोणत्या अधिक उच्च स्वार्थी उद्देशाने प्रसार करत नव्हते हे मात्र मान्य करायला लागेल. म्हणूनच म्हटलं की मृत्यू पावलेल्या आणि मागे फार अनुयायी न सोडलेल्या व्यक्तीच्या विचारांना आता जोरदार विरोध करण्यात काही अर्थ आणि औचित्य नाही. इतकंही लिहिलं नसतं पण यशवंताने योग्यायोग्यतेबद्दल स्पेसिफिक आणि थेट प्रश्न केला आहे म्हणून थोडं लिहिलं.

In reply to by गवि

नितिन थत्ते 16/12/2011 - 14:14
+१ त्यांच्या विचारांबद्दल मत व्यक्त करण्यासाठी हा धागा नाही म्हणून अधिक लिहीत नाही. बाकी संघपरिवारात त्याविषयी काही का चर्चिले गेले नाही याचे उत्तर कदाचित "१९९० आसपासच्या हिंदुत्वाच्या धामधुमीत त्यांच्या विचारांची जी उपयुक्तता होती ती आता संपली आहे" असे आहे. शिवाय ज्यांची मते चुकीच्या समजुतीवर आधारलेली होती ते केवळ 'त्यांच्या विचारांशी प्रामाणिक होते' एवढ्यासाठी त्यांची स्मृती ठेवावी का नाही हा एक वेगळाच प्रश्न आहे.
वर्धेला मी बारावीत असताना ते आमच्या वर्गावर आले होते.. आमच्या एका प्राध्यापकांचे ते मित्र होते... शपथ त्यानंतरचे बरेच दिवस पुर्णपणे भारावलेल्या अवस्थेत होतो...नंतरही बरेचदा ते सेवाग्रामला यायचे पण प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला नाही.... आमचे हे प्राध्यापक त्यांच्या भाषणाच्या कॅसेट्स अम्हाला ऐकवत..... त्यांची निधन वार्ता अतिशय चटका लावणारि होती... देव राजीवजिंच्या अत्म्याला शांती देवो... अमृत

डावखुरा 16/12/2011 - 16:38
खरं सांगतो यशवंत एकनाथ जी काकांनी सांगितले होते की...राजीव दिक्षित यांना श्रद्धांजली चे होर्डिंग कुठेतरी लावलेले पाहिले...मी ते होर्डिंग पहायला गेलो तर ते पण गायब होते.. नंतर बराच शोध घेतला पण तरी खरं कळायला मार्ग नव्हता...

मराठी_माणूस 16/12/2011 - 17:15
काही प्रतिक्रियांचा रोख कळला नाही. स्वदेशीचा आग्रह हा चुकीचा समज किंवा गैरसमज हे कसे काय ते कळले नाही. हे देशप्रेम नव्हे काय ? का आता त्याची गरज नाही, कारण आपण आता स्वतंत्र झालो आहोत , म.गांधींचा काळ केंव्हाच गेला असे म्हणायचे आहे

In reply to by मराठी_माणूस

मन१ 16/12/2011 - 18:16
ह्यावर नवीन धागा निघाल्यास अवश्य चर्चा करता येइल. हा त्यांच्या निधनाच्या बातमीच्या धागा असल्याने अधिक लिहिणे उचित होणार नाही.

In reply to by मन१

यकु 16/12/2011 - 20:53
मन,
ह्यावर नवीन धागा निघाल्यास अवश्य चर्चा करता येइल.
मी प्रयत्न करतो आहे. जमल्यास नवा धागा निश्चित टाकतो.

In reply to by मराठी_माणूस

राजीव दिक्ष‍ीत जन्मभर विदेशी कंपन्यांविरोधात, सरकार विरोधात, प्रचलित कायद्यांविरोधात बोलत राहिले. त्यांचा असा एक विचार होता. तो खरंच दुर्लक्ष करण्‍या सारखा होता? वरील अधोरेखित याच धाग्यातले आहे.. त्यामुळे मर्यादित मत मांडून लगेच्च मरणोत्तर औचित्याचा मुद्दा मी प्रत्येक कॉमेंटमधे मांडला आहे..माझ्या प्रतिसादांनुसार तर मला नवा धागा काढूनही चिरफाड करण्याची इच्छा आता नाही असं स्पष्ट होतंय.. एवढे बोलून मी आपले चार शब्द संपवतो.. "अहो ते तुम्हाला उद्देशून नव्हतेच मुळी.." असं म्हणत असाल तर आनंद आणि धन्यवाद.

विकास 16/12/2011 - 21:16
मला राजीव दिक्षित यांच्याबद्दल हा धागा वाचेपर्यंत माहितीच नव्हती. मी देखील असेच फेसबुकवर कुणाच्या तरी स्टेटसमधे त्यांच्या एमपी३ का असेच काहीतरी बघितले, पण पुढे काही बघायला गेलो नाही. त्यामुळे अजून काहीच ऐकलेले नाही. पण आता नक्कीच ऐकेन... इथे जे काही वाचले आणि जालावर (विकी आणि त्यांच्या नावाचे संसथळ) शोधले त्यावरून ते स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक असावेत असे जाणवले. त्यांचा संबंध हा "भारत स्वाभिमान आंदोलन" अर्थात रामदेव बाबांच्या आंदोलनाशी होता. डंकेल करार (१९९१ चा सुमार) पासून ते (साधारण वयाच्या पंचविशीत) ते या संदर्भात आंदोलन करू लागले. त्या आधी ते कौंसिल फॉर सायंटीफिक इंडस्ट्रीयल अँड रिसर्च मधे काम करत होते. सुरवातीस भगतसिंन आणि उधम सिंग यांचा प्रभाव आणि नंतर गांधीजींचा प्रभाव होता. त्यांच्याच संस्थळावरील वाक्यात म्हणले आहे, "1987 में सेवाग्राम आश्रम, वर्धा में प्रख्यात गाँधीवादी, इतिहासकार धर्मपाल जी के सानिध्य में अंग्रेजो के समय के ऐतिहासिक दस्तावेजों का अध्ययन करके देश को जाग्रत करने का काम किया" आता यावरून जर कुणाला ते संघपरीवारातले आहेत असे वाटत असेल तर उत्तमच. :-) अर्थात स्वदेशी, भारत स्वाभिमान असे शब्द आले की संघच असणार असे गृहीत धरणारे बरेच असतात, त्यातलाच हा प्रकार असावा असे वाटले. असो.

In reply to by विकास

मन१ 17/12/2011 - 00:46
निव्वळ site वर दिलेला विदा पाहण्यापेक्षा अधिक माहिती गोळा केलित, त्यांच्या सभा-संमेलने ऐकलित, प्रत्यक्ष कार्याची माहिती घेतलित तर संघ परिवारातील व्यक्तिंना त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर होता हे दिसून येइल असे मला वाटते. आपण अभ्यासूपणे माहिती घ्यालच ह्याबद्द्ल किंतु नाही. प्रारंभीच्या काळात गांधींचे अभ्यासक धर्मपालजींबरोबर त्यांचे काम असूही शकते. तसेही खुद्द गांधीचाच समावेश संघ नेत्यांनी एकेकाळी "प्रातः पूजनीय" व्यक्तींमध्ये केलेलाच आहे. तस्मात् गाअंधीवादाचा पूर्वी प्रभाव होता म्हणून आता इतरांचे समर्थन मिळू शकणार नाही असे नाही. आपल्या प्रतिसादात संघ परिवाराचा उल्लेख दिसला, तो थेट मीच केलेला असल्याने मला अधिक प्रकाश टाकणे जरूरीचे वाटले.

In reply to by मन१

विकास 17/12/2011 - 05:07
अहो अभ्यास केला म्हणूनच तर तसे लिहीले ना! :-) बादवे राजीवजींच्या विचारांबद्दल सॉफ्ट कॉर्नर असलेल्या संघ परिवारातील एखाद्या नियतकालिकानंही बातमी दिली नाही म्हणायची का? हे आपले वाक्य वाचले आणि ते लिहीण्या आधी आपण माहिती गोळा केली नसावी असे वाटले. :-) कारण "A Tribute" असे म्हणत संघाच्या मुखपत्रातच त्यांच्या निधनाची बातमी सापडली. मात्र त्या व्यतिरीक्त पटकन शोधताना ऑरगायजर मध्ये त्यांचा संदर्भ दिलेला असला तरी एखाद्या लेखात, एखाद्या ओळीपुरताच मर्यादीत दिसला. ते जर संघाशी संबंधीत असते तर तसे स्पष्टपणे आले असते... संघसंबंधीत स्वदेशी जागरण मंच संघटना आणि राजीवजींची भारत स्वाभिमान संघटना यांच्या मुद्यात/आंदोलनात जरी काही समानता असली तरी त्या वेगळ्याच होत्या/आहेत. तरी देखील समानशीले या अर्थाने स्वदेशी जागरण मंचच्या श्रद्धांजलीची एक छोटीशी बातमी दिसलीच... म्हणून आपले वरील वाक्य तितकेसे पटले नाही. बाकी संघाच्या नावातच राष्ट्रीय आहे, त्यामुळे देशासाठी कुणिही प्रामाणिकपणे करताना दिसले तर तेव्हढ्यापुरते "समानशीले" होऊ शकतात. म्हणूनच मला वाटते, सरसंघचालक बाळासाहेब देवरसांनी (आणि तत्कालीन जनसंघाने) १९७१ साली भारत-पाक युद्धासंदर्भात इंदिराजींना दुर्गा म्हणले होते. माझा मुद्दा इतकाच आहे, वास्तव वेगळे असताना, ज्या पद्धतीने आपण सॉफ्ट कॉर्नर आणि संघ परीवार, हिंदूत्ववादी हे शब्द आणले तसेच इतर तत्संबंधीत प्रतिसाद बघता, एक प्रकारची Guilt by association तयार करायचा नेहमीचा प्रकार वाटला. आता ते नकळत पण झालेले असेल पण त्याची गरज नाही असे नक्कीच वाटते. असो.

In reply to by विकास

चिंतामणी 20/12/2011 - 00:29
>>>बाकी संघाच्या नावातच राष्ट्रीय आहे, त्यामुळे देशासाठी कुणिही प्रामाणिकपणे करताना दिसले तर तेव्हढ्यापुरते "समानशीले" होऊ शकतात. म्हणूनच मला वाटते, सरसंघचालक बाळासाहेब देवरसांनी (आणि तत्कालीन जनसंघाने) १९७१ साली भारत-पाक युद्धासंदर्भात इंदिराजींना दुर्गा म्हणले होते. चांगल्याला चांगले म्हणले तरी त्याचे भांडवल कसे करावे हे या उदाहरणातुन दिसत आहे. असो. "इंदिराजींना दुर्गा" अटल बिहारींनी म्हणले होते. याच वाजपेयींनी मा. शरद पवारांना गुजराथमधील भुकंपाचे वेळी पंतप्रधानांच्या विमानातुन तेथे नेले होते आणि सर्व मदत कार्यासाठी नेमलेल्या समीतीच्या अध्यक्षपदी नेमले होते. (या प्रतीसादाबद्दलची प्रतिक्रीया काय असणार आहे याचा अंदाज आहे)

In reply to by विकास

चिंतामणी 20/12/2011 - 00:09
>>>"1987 में सेवाग्राम आश्रम, वर्धा में प्रख्यात गाँधीवादी, इतिहासकार धर्मपाल जी के सानिध्य में अंग्रेजो के समय के ऐतिहासिक दस्तावेजों का अध्ययन करके देश को जाग्रत करने का काम किया" आता यावरून जर कुणाला ते संघपरीवारातले आहेत असे वाटत असेल तर उत्तमच. Smile म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे? संघवाले म.गांधी यांचेबद्दल जाणून नाहीत? :O :-O :shock: >>>अर्थात स्वदेशी, भारत स्वाभिमान असे शब्द आले की संघच असणार असे गृहीत धरणारे बरेच असतात, त्यातलाच हा प्रकार असावा असे वाटले. ही पोटदुखी आहे होय. 8) 8-) :cool:

विनोद१८ 16/12/2011 - 22:49
............स्व. राजीवजींना भावपुर्ण आदरान्जली....... मला त्यान्ची दोन भाषणे मिळाली त्यान्चे दुवे खाली देत आहे... जाणकारानी आपली त्यावर आपली प्रतिक्रिया द्यावी. http://www.youtube.com/watch?v=x6WSRZvOuZ4&NR=1 http://www.youtube.com/watch?v=FmwhMY2iqtQ&NR=1 विनोद१८

रणजित चितळे 21/12/2011 - 05:12
दिक्षितांबद्दल मला फारशी माहिती नव्हती, आपण करुन दिलीत, धन्यवाद. आपल्या देशाला अशा माणसांची गरज आहे. कोणचाही मनुष्य लोकप्रिय होण्या साठी काही गोष्टी लागतात - प्रतिभा, कष्ट, चारित्र्य, काळ, नशिब ह्या सगळ्या गोष्टींची जोड लागते. दिक्षितांकडे काळ व नशिबाची जोड नव्हती हेच म्हणावे लागेल.

नितिन थत्ते 21/12/2011 - 09:43
विकास आणि रणजित चितळे यांना राजीव दीक्षित यांच्याबद्दल काहीही माहिती नव्हती हे वाचून प्रचंड आश्चर्य वाटले.