तुम्ही नारळासारखे आहात..किंवा फणसासारखे..
जे ज्योतिषी शास्त्राचा अभ्यास करून अचूक भविष्य सांगतात त्यांना सादर वंदन करुन अन्य होतकरु रोजगारेच्छुक तरुणांसाठी एक स्वयंपूर्ण व्यवसायप्रस्ताव सुचवू इच्छितो. तुम्ही चेहरा पाहून भविष्य सांगण्याचा व्यवसाय सुरु करा.
गंमत नाही. खरंच..
एकदा का एखादी व्यक्ती भविष्य जाणण्यासाठी तुमच्या समोर जातीने आली तर तुम्ही कसल्याही विशेष शास्त्राचा वापर न करता अत्यंत इंप्रेसिव्ह आणि "वॉव" व्हॅल्यू असलेलं कथन करु शकता. याचा मूळ ज्योतिषशास्त्राशी काही संबंध लावू नये किंवा ज्योतिषी असेच वागत असतील असा दावा करु नये. या सामाजिक बांधिलकीतून केलेल्या प्रस्तावाला "जेन्युईन" ज्योतिषशास्त्राची खिल्ली समजू नये अशी आपली उगीच एक विनंती झालं...
आता एकच उदाहरण घेऊ..
समजा एक पुरुषमाणूस तुमच्याकडे आला.. (प्रत्यक्ष येणे आवश्यक हां.. त्यासाठी "नुसत्या जन्मतारखेने अचूकता येत नाही. हात पहावा लागतो किंवा मुख पहावे लागते", असे म्हणावे म्हणजे मग सगळे समक्ष येतात..)
आता..पुढे.. समजा त्याने सांगितलेली जन्मतारीख: ९ ऑगस्ट १९७५
म्हणजेच वय ३६.. आता एवढ्यावरुन कायकाय सांगता येईल याची झलक पाहू..
हा मनुष्यविषय विवाहित असण्याची शक्यता साधारणतः बरीच जास्त..उगाच असे किती लोक बिनलग्नाचे रहात असतील? सटवाईला नव्हता नवरा अन म्हसोबाला नव्हती बाईल अशा न्यायाने देखील एक जोडीदार मिळून साधारण बहुतेकांची लग्नं या वयापर्यंत होतातच.
तेव्हा आता बिंधास सांगा:
तुम्ही विवाहित आहात..
पुढे..
व्यक्ती प्रत्यक्ष तुमच्या समोर आहे त्यामुळे त्याच्या पोटाचा घेर, तुंदिलपणा, निरुत्साह यावरुन लग्नाला झालेली वर्षं साधारण ५, १० किंवा १५ इतपत ओळखता यावे..
त्यावरुन तुमचे लग्न लवकर / साधारण पंचविशीच्या आसपास / उशिरा झाले यापैकी काही सांगता येईल. पुन्हा एकदा शक्यतेचे वजन बरेचसे वजन आपल्या बाजूस ठेवून.
छत्तीस हे वय साधारणत: रक्तदाब / लठ्ठपणा / मधुमेह यांपासून पाच ते दहा वर्षे अलिकडे आहे. त्या व्यक्तीचं पोट काहीसे बाहेर असेल तर मग आणखीनच निर्धास्त व्हा..
तर मग अशा निरिक्षणाअंती आज रोजी असे वर्तवण्यास हरकत नाही की २०२० नंतर हृदयाशी संबंधित विकारांपासून जपावे.. किंवा रक्तजन्य विकारांपासून जपावे. आता गंमत बघा..
हृदयविकार झाला की तो कोलेस्टेरॉलशी जोडला की रक्ताशी संबंधित होऊ शकतो..
समजा नुसताच रक्तदाब जडला, तरी तो रक्ताशी संबंधित वाटतोच.
मधुमेह म्हणजे रक्तातली साखर वाढणे. त्यामुळे यापैकी काहीही डायाग्नोसिस पाचदहा वर्षांनी झाले की "अर्र..गविगुरुजींनी दहा वर्षांपूर्वीच सांगितलं होतं बरं का.. मीच करंटा वेळेवर जागा नाही झालो..नाही व्यायाम केला..", वगैरे स्वदूषणयुक्त संवादात असं आपलं नाव नक्की निघणार.
झालस्तर ३६ हे वय चाळिशीच्या चार वर्षं अलिकडे आहे. त्यामुळे पुढचा आरोग्यविषयक भाकितसल्ला सुरक्षितपणे फेकता येईल, "२०१६ सालापर्यंत तुमचे आरोग्य ठीक राहील. त्यानंतर डोळ्यांचा त्रास संभवतो."
चाळिशीच्या आसपास चाळिशी लागतेच. ती नाही लावली तरी पेपर डोळ्यापासून दूर धरून वाचताना तरी निदान आपली आठवण होईल अजून एकदा.
हे एक उदाहरण झालं. तसे शरीराच्या ठेवणीवरुन अनेक आडाखे निघतात. हा आपापल्या अभ्यासाचा आणि अनुभवाचा भाग आहे. बुटका, लहान चणीचा मनुष्य असेल तर तो लहानपणीही तसाच असणार हे सांगायला कुंडलीची गरज नाही. त्यामुळे "लहानपणीच तुम्हाला जगाकडून फार वाईट वागणूक, अवहेलना, मानहानी वाट्याला आली", असं वर्तवायला हरकत नाही.
मग नेमकेपणा संपण्याची चिन्हं दिसली की निम्ननिर्दिष्ट सुपरजनरलाईज्ड वाक्यांमधील काही आपल्या मास्टर डेटाबेसमधून काढावीत. त्यासाठी सुसज्ज डेटाबेस बनवायला हवा. कॉम्प्युटर हे या बाबतीत वरदान म्हणून आपल्याकडे आलं आहे.
कोणालाही लागू पडतील अशी (किंवा पडताहेत की नाही हे कळणं अशक्य आहे अशी) खालील वाक्यं पहा.
१) तुम्ही नारळासारखे / फणसासारखे बाहेरून कठोर पण आतून मऊ आहात.
२) तुमच्याविषयी वेगवेगळ्या लोकांची अत्यंत भिन्न मते आहेत.
३) तुम्ही खूप कष्ट करता पण त्या प्रमाणात श्रेय मात्र तुम्हाला मिळत नाही.
४) तुम्ही खूप भावनाशील आहात, पण लोकांना ते समजत नाही.
५) नकार देणं तुम्हाला जमत नाही त्यामुळे तुमचं खूप नुकसान झालं आहे आणि लोक तुमचा फायदा घेतात.
६) वैवाहिक जीवनात तुम्ही सुखी आहात असं जगाला दिसतं पण वास्तविक आतून तुम्ही तितके सुखी नाही आहात.
७)वाढत्या शारिरिक अडचणींनी तुम्ही त्रस्त होत चालला आहात.
८) तुमची मनःस्थिती सध्या बरी नाही पण एक्सवायझेड महिन्यानंतर शुभ काळ आहे. (ही तारीख तातडीच्या भविष्यातली नसून प्रचंड दूरची असावी अशी काळजी घेणे आवश्यक. शक्यतो काही वर्षांनंतरची.)
आणखी काही उद्योगवाढीस आवश्यक तत्वे आचरावीत.
- येईल त्या प्रत्येकाला सल्ला देऊ नये. तुमचे ध्यान / एकाग्रता / मूड असे सर्व त्या वेळी जमून येणे आवश्यक आहे अशी भानगड तयार करावी. त्यासाठी काही चेले असणे आवश्यक. सल्ला मिळालेल्याला आपण "सिलेक्टेड नशीबवान" असे वाटले पाहिजे.
- स्वतःभोवती गूढतेचे वलय जपा
-अपॉईंटमेंटशिवाय कोणालाही घेऊ नका. भले महिन्यातून एखादा येत असेल तरी. आपली डायरी पॅक असल्याचे भासले पाहिजे.
-पैसे थेट हाताने घेऊ नयेत. एखादी गुरुंची तसबीर खोलीत ठेवून दक्षिणा गुरुचरणी ठेवण्यास सांगावे. नंतर ग्राहक गेल्यावर ती आपणच तातडीने उचलून घेत असलो तरी अशा वर्तनाने आपल्याला तिचा अजिबात मोह नाही असे जनमत होते.
- या सर्व लॉजिकसाठी काँप्युटरची फारशी गरज नाहीच. पण तरीही मधूनमधून तिकडे नजर टाकून काहीतरी बटण दाबावे. टूंक असा आवाज येणे आवश्यक. मात्र नुसत्या काँप्युटरने काहीही होत नाही. मुख्यतः तुमच्या मर्जीवर आणि एकाग्रतेवर सर्व अवलंबून आहे असा रोख ठेवावा. नाहीतर कॉम्प्युटरच फुटेज खाऊन जाईल. भविष्यासाठी कॉम्प्युटर वृद्ध लोकांबाबतीत (६५+) वापरावा. त्यांना त्यातले ज्ञान गूढता वाढवण्याइतपतच असते. तरुण लोकांसमोर संगणक भविष्यासाठी वापरला तर त्यांच्या लेखी आपण एकदम फ्रॉड ठरु शकतो.
मला वाटतं अशा अनेक सूचना आणि तंत्रांची जंत्री तयार करुन मस्तपैकी एक्सेल शीट बनवून एक उत्तम व्यवसाय सुरु करायला हरकत नसावी..
अजूनही खूप फॉर्म्युले आणि टिप्स आहेत. पण मी ते वाचकांवर सोडतो.. येऊ द्यात असतील तर..
वाचने
18026
वाचनखूण
प्रतिक्रिया
44
आवडेश!!!
आपण या विषयांसंदर्भात खाजगी शिकवणी घेणार असाल तर माझ्यासाठी एक जागा राखून ठेवावी ही नम्र विनंती.
भारी समर्थ
या सर्व लॉजिकसाठी काँप्युटरची फारशी गरज नाहीच. पण तरीही मधूनमधून तिकडे नजर टाकून काहीतरी बटण दाबावे. टूंक असा आवाज येणे आवश्यक. मात्र नुसत्या काँप्युटरने काहीही होत नाही. मुख्यतः तुमच्या मर्जीवर आणि एकाग्रतेवर सर्व अवलंबून आहे असा रोख ठेवावा. नाहीतर कॉम्प्युटरच फुटेज खाऊन जाईल. भविष्यासाठी कॉम्प्युटर वृद्ध लोकांबाबतीत (६५+) वापरावा. त्यांना त्यातले ज्ञान गूढता वाढवण्याइतपतच असते. तरुण लोकांसमोर संगणक भविष्यासाठी वापरला तर त्यांच्या लेखी आपण एकदम फ्रॉड ठरु शकतो.असेच म्हणतो. लेख उत्तम जमला आहे. मास्टर डेटाबेसमधला डेटा तर एखादया हाय प्रोफाईल ज्योतिषाची सिस्टीम हॅक करुन आणला असावा ईतका तंतोतंत मिळताजुळता आहे. - संगणकाचार्य बाबा धनानंद
एका ज्योतिषाने जबरदस्तीने माझ्यावर नारळ ट्रिक वापरली.
"माझा नारळ फणसासारखा आहे" - अस्मादिक
अशा प्रकारे एक मस्तंस केळं गविंनी दिलेलं आहे.....
केळे खा अन निरोगी रहा....
असा सल्ला पण छुप्या मार्गाने दिला हे सांगाया हरकत नसावी...
बाकी चालु द्या.....
अवांतर : युयुत्सुंचा धंदा बंद पडल्यास त्यांनी नुस्कान भरपाइ मागितली तर ?????
- तुम्ही इतरांसाठी खूप करता पण इतरांना त्याची जाणीव नाही. केलेल्या कष्टांचा योग्य मोबदला तुम्हाला मिळत नाही.
- तुम्हाला तुमच्या मुलांची सतत काळजी लागून राहिलेली असते. नुकत्याच काही आजारपणांना तुम्हाला तोंड द्यावे लागले आहे. (३६च्या माणसाची मुले तशी लहान किंवा शाळकरी असतात आणि त्यांची आजारपणे नित्याची असतात.)
- तुमच्यासाठी लवकरच यशाची नवी दारे उघडणार आहेत परंतु त्यासाठी कष्ट आवश्यक आहेत. कष्टाशिवाय फळ मिळणे कठीण आहे.
- गृहकलहाला तोंड द्यावे लागत असल्याने तुमचा जीव मेटाकुटीला आला आहे. (३६ मध्ये सासूचे-सुनेशी किंवा प्रॉपर्टीवरून कलह नक्कीच होत असावे.)
- ऑफिसमध्ये बॉस तुमच्या गुणांना वाखाणत नाही. तुमच्या बॉसबरोबर तुमचे खटके उडतात. लायकी नसतानाही तुमच्या बॉसला हे पद मिळाले आहे असे तुम्हाला वाटते. त्याच्याजागी तुम्ही असता तर कामाला योग्य न्याय देऊ शकला असता. (कोणाचे उडत नाहीत?)
खूप मस्त लिहिले आहे. एकदम पटलेच..
अहो हे जाऊद्या हो, ब्राऊ टाका ना......बाकी हेही छान आहेच पण ब्राऊची वाट पाहतोय जास्त :)
In reply to गवि, by इष्टुर फाकडा
हेच्च. "यवढं" टंकताय त्यापरीस ब्राउचा डब्बल मोठ्ठा भाग लिहा की राव..
तिकडे ते जयवंत कुलकर्णी काका सुद्धा असेच.
आम्ही बसलोय आपले स्पिअर एपिसोडची वाट बघत.
आवडलो हो बाबा श्री श्री गविमहाराज!
ह्याच धर्तीवरचा मिपावरचा एक जुना लेख आत्ताच वाचण्यात आला.
http://www.misalpav.com/node/13990 अजुनच भन्नाट!
लेख वगैरे म्हणून उत्तम आहे. पण जनरायलेझशन कधीच पटत नाही. माझे काही वैयक्तिक अनुभव खूपच वेगळे आहेत. असो.
In reply to लेख वगैरे म्हणून उत्तम आहे. by बिपिन कार्यकर्ते
.
In reply to +१ by इंटरनेटस्नेही
अठरा वर्षे वयात आण्भव वेग्रे कधी घेतले हो सुकुमार ?????
In reply to अठरा वर्षे वयात आण्भव वेग्रे by वपाडाव
फॉर यॅन्न अनुभूतीम्, येज्ज इस न्वॉट यॅप्लिक्येबल साऽऽर्र!
-हेच्च.कुंभकोणम्.
मस्त...आवडले...पटले.....
अरे कुठे गेलात तर नुसते मला भविष्य कळते असे नुसते पुटपुटा-
तुम्ही कोंडाळ्यात सापडलातच असे समजा, हा हा हा.
बाकी सगळे राहुद्या गवि पण तुम्ही चिकूसारखे आहात !! ब्राउचा पुढचा भाग येत नाही म्हणुन आम्हा सगळ्यांची अवस्था २९ तास लेट झालेल्या दमरेच्या प्रवाश्यांसारखी झालीये. चिकूवर बुक्की मारण्याचा कट शिजतोय असे ऐकुन आहे !! खरं खोटं माहित नाय बॉ ..
हघ्याहेवेसांनल.
-
(गविंचा फ्याण)
आणंदयात्री
In reply to बाकी by आनंदयात्री
गवि पण तुम्ही चिकूसारखे आहात !! . चिकूवर बुक्की मारण्याचा कट शिजतोय असे ऐकुन आहे !!
चिक्कू वर बुक्की मारली की तो फुटतो आणि थोड्यावेळाने बीयरसारखा दरवळ सर्वत्र पसरतो.
आंद्याजी बीयरची आठवण होतेय असे म्हणा की
तुम्ही लोकांसाठी खूप करता.पण त्याची कदर होत नाही.
हे वाक्य अनील अंबाणी पासून कलमाडींपर्यन्त सर्वाना चपखल लागू पडते
बार्नम इफेक्ट किंवा फोरर इफेक्ट या नावाने हा प्रकार शास्त्रज्ञांना माहीत आहे. याचा गाभा म्हणजे एक प्रयोग केला, यात प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन करणारा एक परिच्छेद सादर केला. व तो किती मिळताजुळता आहे याबद्दल गुणांकन करायला सांगितलं. ० म्हणजे बिलकुल साम्य नाही तर ५ म्हणजे तंतोतंत. सगळ्यांच्या गुणांकनाची सरासरी होती ४.२६! मग हे उघड केलं की प्रत्येक विद्यार्थ्याला हुबेहुब तोच मजकूर दिलेला होता.
You have a great need for other people to like and admire you. You have a tendency to be critical of yourself. You have a great deal of unused capacity which you have not turned to your advantage. While you have some personality weaknesses, you are generally able to compensate for them. Disciplined and self-controlled outside, you tend to be worrisome and insecure inside. At times you have serious doubts as to whether you have made the right decision or done the right thing. You prefer a certain amount of change and variety and become dissatisfied when hemmed in by restrictions and limitations. You pride yourself as an independent thinker and do not accept others' statements without satisfactory proof. You have found it unwise to be too frank in revealing yourself to others. At times you are extroverted, affable, sociable, while at other times you are introverted, wary, reserved. Some of your aspirations tend to be pretty unrealistic. Security is one of your major goals in life.
याचा मूळ ज्योतिषशास्त्राशी काही संबंध लावू नये किंवा ज्योतिषी असेच वागत असतील असा दावा करु नये. या सामाजिक बांधिलकीतून केलेल्या प्रस्तावाला "जेन्युईन" ज्योतिषशास्त्राची खिल्ली समजू नयेअशी आपली 'उगीच विनंती' करून लेखाची धार बोथट केलीत असं वाटलं.
In reply to लेख आवडला by राजेश घासकडवी
common मजकूर जबरा आहे. प्रयोगाविषयी नविनच माहिती मिळाली.
In reply to लेख आवडला by राजेश घासकडवी
+१. मूर्खांना मूर्ख म्हणण्यात अजिबात कचरायचे कारण नाही. (असेच काहीसे रामदासही सांगून गेलेत ना?) जगात हजारो(लाखो(...)) लोक दगड असतात नाहीतर मंद असतात. त्यांच्या जीवावर हे भोंदू लोक पैसे कमावणरच. पण म्हणून उगाच त्यांच्या मनाला लागेल वगैरे चिंता करू नये. असेच अजून लेख येऊद्यात.याचा मूळ ज्योतिषशास्त्राशी काही संबंध लावू नये किंवा ज्योतिषी असेच वागत असतील असा दावा करु नये. या सामाजिक बांधिलकीतून केलेल्या प्रस्तावाला "जेन्युईन" ज्योतिषशास्त्राची खिल्ली समजू नयेअशी आपली 'उगीच विनंती' करून लेखाची धार बोथट केलीत असं वाटलं.
...अर्थात, लोकसेवेसाठी असले सल्ले नि टिपा फुकटात देत बसण्यापेक्षा, तुम्ही स्वतःच इथे ज्योतिषाचे दुकान का थाटत नाही? तेवढीच युयुत्सुंना कांपिटिशन होईल (नि तुम्हालाही पैसे सुटतील)...
स्पर्धा ही उत्कर्षासाठी चांगली, की कायसेसे ऐकलेले आहे. शिवाय ग्राहकांसाठी तर निश्चितच चांगली ठरावी.
द मोअर द मेरियर... (किंवा, इफ़ यू कान्ट बीट देम, जॉइन देम...)
भट्टी झकास जमली, पण जनराईल्ड डेटाबेसच्या भानगडीत गल्लत झाली राव. ही जनरलाईज्ड विधानं सकाळी येणार्या कुडमुड्याच्या तोंडी किंवा गेलाबाजार फुटपाथवर बसून भविष्य सांगणार्याच्या तोंडी चपखल बसतात.
जे भविष्यकथन करणारे असतात त्यांची वाक्यं निराळी असतात. ती मुख्यतः घेऊन गेलेल्या समस्येसंदर्भात असतात. (खर्या खोट्याच्या भानगडीत तुर्त पडत नाही. निरिक्षणं सांगतो इतकंच.)
निष्कर्षः जनरलाईज्ड विधानांचा डेटाबेस तयार करणारे आणि त्यात भर घालणारे ह्यांना केव कुडमुडे/फुटपाथवरच्या जोतिष्यवाल्यांचा अनुभव असावा. ज्योतिष्याच्या आधारे आलेल्या अडचणींवर उपाय्/तोडगे देण्याचा प्रयत्न करणार्यांचा प्रत्यक्षदर्शी अनुभव नाही असे म्हणावयास पुष्कळ जागा आहे. :D
In reply to च्यायला... by धमाल मुलगा
ज्योतिष्याच्या आधारे आलेल्या अडचणींवरअडचणी ओढवून घेण्यासाठी ज्योतिष्याकडे कोण जात असावे बरे?
In reply to ? by पंगा
.
In reply to ? by पंगा
अडचणी ओढवून घेण्यासाठी ज्योतिष्याकडे कोण जात असावे बरे?ग र जू! आणखी कोण? अवांतरः आम्ही मुळातच सुद्दलेखनाला फाट्यावर मारत असल्यामुळं विरामचिन्हांच्या जागा बदलणेच काय, पण हुकवणेही ग्राह्य धरतो. ज्यां गरजुंना अर्थ लावायचे असतील त्यांनी नॉस्ट्रॅडेमसच्या भाकितांप्रमाणे अर्थ लाऊन घ्यावेत ही णम्र इनंती. ;) अतिअवांतरः नॉस्ट्रॅडेमस म्हणे स्वप्नं पाहून त्यावर लिहायचा. आमच्या विजूभाऊंचे स्वप्नप्रवासही त्याच जातकुळीत मोडत असतील तर विजूभाऊंनाही मिनी-नॉस्ट्रॅडेमस म्हणावं काय असा विचार चमकून गेला. :D
____/|\____
रु टा आ
गविसाहेब,
मस्त जमून आलाय लेख!
बाकी परंपरागत ज्योतिषाचा मला काही फारसा चांगला अनुभव नाही.
१. माझ्या पत्रिकेत मला ३ बहीणी लिहिल्या होत्या. मला एकही बहीण नाही.
२. एका ज्योतिष सांगणार्या आजोबांनी मला अभियांत्रिकीची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाल्या-झाल्या एका महिन्याच्या आत चांगली नोकरी लागणार असे सांगीतले होते. मला अभियांत्रिकीची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सुमारे चार वर्षांनी चांगली नोकरी मिळाली.
३. पुण्यातील एका पेठेतल्या महाराजसदृष बाबांनी मला मी त्या वेळेस ज्या कंपनीमध्ये तात्पुरती नोकरी करत होतो त्याच कंपनीमध्ये कायम झाल्याची ऑर्डर निघाली असल्याचे मला सांगून टाकले होते. या आनंदात मी बेहोष व्हायचा बाकी राहिलो होतो. दोन महिन्यांनी माझी अॅप्रेंटीसशिप संपली आणि मला कंपनी सोडावी लागली. पर्मनंट केल्याची ऑर्डर बहुतेक कुठेतरी फसली होती.
४. पुण्यातल्या एका प्रसिद्ध ज्योतिषीमहाराजांनी (व. दा. भट) मला माझ्यावर चोरीचा आळ येईल असं सांगून ताबडतोब माझ्या दादा-वहिनींचे घर सोडावयास सांगीतले होते. मी पुरता घाबरलो होतो. माझी माझ्या भावाने खूप समजूत काढली. त्यानंतर आम्ही ६ वर्षे एकत्र राहिलो आणि दोघांच्या नोकरीची ठिकाणे खूप दूर असल्याने वेगळे झालो.
त्यानंतर मी ज्योतिषाच्या वाटेला जायचे नाही असे ठरवून टाकले होते. नाही म्हणायला ८-९ वर्षांनी मी युयुत्सु यांचे नवीन तंत्रानुसार मांडले जाणारे भाकित त्यांच्याकडून घेतले. त्यांच्या या तंत्राची मला अजिबात माहिती नाही आणि अजून ते खरे ठरले आहे किंवा नाही हे सिद्ध झालेले नाही; परंतु आपले परंपरागत ज्योतिष मात्र तद्दन फालतू प्रकार आहे हे माझे ठाम मत बनले आहे.
आपण म्हणता त्याप्रमाणे हा एक बिझनेस आहे. जोडीला बालाजीचे एखादे देऊळ बांधले की मग तुमची रोजची आंघोळ सोने, चांदी, नोटा यांचीच होणार हे नक्की. एक-दोन वर्षात बालाजी नवसाला पावतो अशी आवई उठवली की तुमच्या सात पिढ्यांची पंचपक्वान्न खाण्याची सोय झालीच म्हणून समजा. उदाहरणार्थ पुण्याजवळचा बालाजी, शिरपूरचा बालाजी, पाषाणचा बालाजी...अजून कितीतरी असतील. दगडूशेठ गणपती नवसाला पावणारा म्हणून ख्यातकीर्त आहे. माझे तिथे कधीकाळी बोललेले कुठलेच नवस कधीच पूर्ण झालेले नाहीत. नवस हा एक तितकाच भंपक प्रकार आहे. देवाला अभिषेक, मंदिराच्या (मस्जिदीच्या देखील) उभारणीसाठी देणगी, पोट फुटेस्तोवर साबुदाण्याची खिचडी हादडून त्याला निर्लज्जासारखे 'उपास' म्हणणे, तासनतास रांगेत उभे राहून मूर्तीचे दर्शन घेणे, त्यासाठी पैसे मोजणे, वशिला लावणे या सगळ्या गोष्टी तद्दन भंपक आणि निरर्थक आहे असे माझे स्पष्ट मत आहे. यापेक्षा आपली ऊर्जा आणि आपले धन कितीतरी लोककल्याणकारी आणि उपयुक्त कारणांसाठी वापरता येऊ शकते. पण भारतीय लोकांवर या सगळ्या गोष्टींचा इतका घट्ट पगडा आहे की पुढची ५०० वर्षे आपण या मूर्खपणातून बाहेर निघू शकणार नाही. आजकाल तर कर्मकांडाचे स्तोम जास्तच वाढत चालले आहे. मग सत्यसाईबाबासारखे भोंदू लोभी जनतेच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन कोट्यवधींची माया गोळा करतात आणि स्वतःला देव म्हणवून घेतात्...असो...
--समीर
आपण नारळासारखे होण्याऐवजी, नारळीकरांसारखे झालो तर देशाला फायदा होईल. ;)
बाकी लेख चांगला जमला आहे.
In reply to मला वाटते by विकास
म्हणजे नेमके कसे?
In reply to मला वाटते by विकास
अत्यंत बोलकी प्रतीक्रीया....वाहव्वा...लाजवाब... :smile: :-)
.
गमतीदार आहे.
त्याच प्रकारे शनी आपल्या पत्रिकेतल्या घरात ~२९.५ वर्षांनी येतो. आदली मागली अडीच वर्षे धरली (सगळी मिळून २.५+२.५+२.५ = साडेसात वर्षे), तर बर्याच महत्त्वाच्या घटना तेव्हा होतात.
६० वर्षांच्या अलिकडल्या-पलीकडल्या साडेसातीच्या काळात हृदयविकाराचा झटका वगैरे...
(येथे "शनीची साडेसाती"चा पाश्चिमात्त्य ज्योतिषातला अर्थ मानलेला आहे.)
In reply to गमतीदार आहे by धनंजय
(येथे "शनीची साडेसाती"चा पाश्चिमात्त्य ज्योतिषातला अर्थ मानलेला आहे.)हे कळले नाही.
In reply to ? by पंगा
पाश्चिमात्य ज्योतिषांच्या पद्धतीत साडेसाती ही शनिराशीच्या (म्हणजे पत्रिकेत शनी ज्या घरात आहे त्या घराच्या) आदल्या घरातील शनीच्या प्रवेशापासून साडेसात वर्षे चालते.
भारतातल्या ज्योतिषांच्या पद्धतीत शनी चांद्रराशीच्या आदल्या घरापासून सुरू होते.
उदाहरणार्थ : एखाद्या जातकाच्या जन्माच्या समयी चंद्र वृषभात होता आणि शनी मीनात होता.
भारतीय ज्योतिषांप्रमाणे जातकाला सावधान करण्यालायक साडेसाती अगदी लवकर सुरू होईल - एक-दोन वर्षांत शनी लगेच पुढल्या मेषराशीत गेल्यावर, आणि साडेसात वर्षे चालू राहील.
पाश्चिमात्य ज्योतिषांप्रमाणे जातकाला सावधान करण्यालायक साडेसाती साधारण वयाच्या २७व्या वर्षी सुरू होईल - शनी कुंभात गेल्यावर.
वगैरे.
In reply to फरक आहे असे ऐकून आहे by धनंजय
माहितीबद्दल आभारी आहे.
मस्त! वृत्तपत्रातील राशीभविष्य आठवले -
- आजार संभवतो (सर्दी-पडशापासून ते कॅन्सरपर्यंत काहीही)
- प्रवासाचा योग (नाक्यावरच्या वाण्यापासून पृथ्वीप्रदक्षिणेपर्यंत काहीही)
...
आमचे एक स्वामीजी चेहरा बघून भविष्य सांगतात.
'सरकारी नोकरीत बढतीची हमखास संधी' असं सांगितल्याच्या दुसर्याच दिवशी मी स. नो. चा राजीनामा दिला. :)
बाकी 'सरांपेक्षा मॅडम थोड्या स्ट्रिक्ट आहेत' हे भविष्य सांगायला स्वामीजीच काय कुणिही चालेल.
छान छान
अमोल केळकर
आवडलं
व्यक्ती प्रत्यक्ष तुमच्या समोर आहे त्यामुळे त्याच्या पोटाचा घेर, तुंदिलपणा, निरुत्साह यावरुन लग्नाला झालेली वर्षं साधारण ५, १० किंवा १५ इतपत ओळखता यावे..
एकदम मस्त...............
आवडेश!!!