मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्त्रीमुक्ती - विस्कळीत विचार

चित्रा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
पाश्चिमात्य तसेच भारतातील स्त्रीमुक्तीवादी चळवळींचा माझा अभ्यास नाही, हे या लहानशा लेखाच्या प्रारंभीच सांगून टाकते. तेव्हा या लेखात जे काही आहे, ते माझ्या वैयक्तिक निरीक्षणांमधून आले आहे, त्यात माझे अनुभव जेव्हा कधीतरी स्त्रीमुक्तीवादी लेखिकांच्या स्त्री किंवा मिळून सार्‍याजणी सारख्या मासिकांमधून ज्या कथा/कादंबर्‍या किंवा लेख हाती लागले त्यांच्याशी आपोआप जोडले गेले, कधी त्यात आणि माझ्या मध्यमवर्गीय आयुष्यात मी जे काही समान पाहिले त्यामधून ही मते कधी टोकदार तर कधी बोथट होत गेली. स्त्रियांच्या मुक्ततेचा प्रश्न हा सर्व मध्यमवर्गीय स्त्री-पुरुषांच्या समाजाच्या दृष्टीने नेहमीच थोडा टिंगलीचा, थोडा टवाळीचा तर कधीकधी अतिशय गंभीर असा ठरला आहे. मुळात मध्यमवर्गीय स्त्री-पुरुषांबद्दल असे म्हणण्याचे कारण असे की एका पीडीत अशा व्यक्तीची ती स्त्री आहे म्हणून पीडीत आहे, आणि म्हणून तिची सुटका करावी, हा विचार मध्यमवर्गियांनीच महत्त्वाचा समजला आहे/असावा. या प्रश्नांकडे अभ्यासक म्हणून बघण्याची गरज मध्यमवर्गानेच जाणली असावी, असा माझा समज आहे. तरी हे प्रश्न मात्र मध्यमवर्गाच्या पलिकडले, सगळ्याच समाजांना, समाजातील सगळ्याच स्तरांतील लोकांचे आहेत. मी ज्या गावात वाढले, तेथे कुणबी, ब्राह्मण, कायस्थ आणि मुसलमान अनेक वर्षे राहत होते. ब्राह्मण कनिष्ठ मध्यमवर्गीय अधिक होते, कायस्थ हे त्यामानाने सुखवस्तू, शिकलेले असत आणि मुसलमान कारागीर अधिक होते. याउलट कुणबी विशेष करून लोणावळ्याकडील भागातून वसतीला आले होते, आणि लहान लहान "बेडी" करून राहत असत. हे सांगण्याचे विशिष्ट कारण असे, की या जातींप्रमाणे आणि आर्थिक स्तराप्रमाणे स्त्रियांवरील बंधने कमी-जास्त होती. तरीही एका विशिष्ट पातळीवर त्या स्त्रिया समान होत्या. तसेही 'अर्थ' सारख्या चित्रपटांमधून कथेतील पुरुषाच्या आजूबाजूच्या सर्व स्तरातील निम्न, मध्यमवर्गीय आणि यापेक्षा उच्चस्तरीय आणि वरवर पाहता मध्यमवर्गीयांच्या सोवळ्या बंधनांमधून मुक्त स्त्रियांचेही प्रश्न असतात त्यांची झलक दिसलीच होती. त्यावेळी साम्य लक्षात आले नाही, पण जशी मी मोठी झाले तशी माझ्या आजूबाजूला असलेल्या घरांमधली स्त्रियांबद्दलची अ‍ॅपथी, थोडेसे दुर्लक्ष, थोडीशी हात झटकून टाकण्याची भावना दिसायला लागली. माझ्या माहेरी कामाला येणारी बाई लग्न होऊन आमच्या वाडीत आली, तेव्हा आम्ही त्यांच्या घरच्या सत्यनारायणाला गेलो होतो ते आजही आठवते. तिची सासू वर्षानुवर्षे आमच्याकडे कामाला होती. तिच्या सुंदर आणि शालीन अशा त्या सुनेला लग्न करून आणल्यानंतर त्यांच्या घरी प्रसाद देताना पाहिल्याचे मला आजही जसेच्या तसे आठवते. पण नवरा व्यसनी झाला, लवकर गेला, त्याच्यामागे चार मुलांचा सांभाळ करण्यात तिचे आयुष्य कसे जाते आहे हे आम्ही पाहत होतो, पण थोडीफार पैशाची मदत आणि तिच्या मुलांच्या शिकवण्या याखेरीज आम्ही फार काही केले असे वाटत नाही. आता तिचे स्वतःचे घर आहे, मुले बर्‍यापैकी नीट शिकली, पण तिने खूप भोगले आहे/असावे. अजूनही चार घरची कामे सोडू शकत नाही, हेही तिचे वास्तव आहे. ज्या स्त्रिया तिच्याएवढ्याही नशीबवान नव्हत्या, त्यांना नवर्‍याच्या मृत्युनंतर घर सोडावे लागले, त्यांच्याबद्दल काहीबाही ऐकू येत असे. लहानपणची माझी खेळण्यातली मैत्रिण तिच्या बहिणीच्या बाळंतपणातल्या निधनानंतर सोळाव्या वर्षी लग्न होऊन तिच्याच मेव्हण्याला दिली गेली. माझ्या मुसलमान मैत्रिणीच्या घरातली अगदी थेट हीच कथा. तेव्हा आम्ही चौथीत असू. अकरावीतल्या तिच्या सख्ख्या मोठ्या बहिणीला अपघाती निधन झालेल्या बहिणीच्या पंचवीशीतल्या नवर्‍याच्या मागे स्कूटरवर बसून जाताना पाहिली तेव्हा वाटलेले आश्चर्य अजून आठवते. आमच्या घरी शिक्षण होते, घरदार व्यवस्थित होते. तरी कुठे फारशी स्त्री मुक्त होती? अर्थात पुरुषही मुक्त नव्हते. नोकरीला बांधलेले होते. पण घरातल्या स्त्रियांचा दिवस हा पहाटे चारला सुरु होई आणि रात्री अकराला मावळे. चार वाजता उठून करायचे काय तर आंघोळी करून सर्वांचे डबे, मुलींच्या वेण्या, आणि तयारी. दहाला परत थोडी सुटका झाली, तरी बारापर्यंत सकाळी शाळेत गेलेली मुले घरी येण्याची वेळ व्हायची, मग त्यांची जेवणे, अडीच तीनच्या सुमाराला दुपारची थोडी झोप आणि परत चार वाजल्यापासून संध्याकाळची तयारी. उन्हाळ्यात उन्हाळ्यातली कामे - वाळवणे घालणे, वर्षभराच्या तांदळाला बोरिक पावडर लावून ठेवायचा (हा काय प्रकार होता, तो जे केले आहे त्यांनाच कळेल. तांदूळ दोन हातांमध्ये घ्यायचा आणि पांढर्‍या पावडरने भरलेले हात घासून ती त्या तांदळाला चोळायची. असा वर्षभराचा तेरा-चौदा माणसांना लागेल एवढा तांदूळ आमच्या घरी उन्हाळ्यात यायचा), डाळींना उन्हे द्यायची, पापड, लोणची, मिरगुंडे, बटाट्याचा वर्षभरच्या उपासांना पुरेल एवढा कीस घालायचा, चिकवड्या-कुरड्या इ. इ. दहा कामे असत. ही कामे करण्यासाठी आम्ही मदत करत असू, पण मुख्य काम बायकांचेच. ती झाली की महिनाभर विश्रांती, माहेरी जाण्याची चंगळ असे. तेवढे झाले की परत जूनच्या पहिल्या आठवड्यात घरी. शिवाय एकत्र कुटुंबांमधील रुसवे-फुगवेही असत. या सगळ्या धबडग्यात नवर्‍याबरोबर चित्रपटाला जाण्यासारखी हौस तरी भागवायला वेळ कुठे होता? पुढे मी जेव्हा नवर्‍याकडून सासू-सासरे एकत्र चित्रपटांना जायचे हे ऐकले तेव्हा आठवले की आईबाबा दोघेच मिळून एकत्र चित्रपटाला गेले आहेत असा केवळ एक दिवस मला आठवतो. तेव्हा आईला झालेला आनंद आठवतो. माझ्या घरातल्या इतर स्त्रियांचीही कथा याहून काही फार वेगळी नव्हती. असे वाटते की या बायकांनी आपल्या जाणत्या आयुष्यातील खूप वेळ हा आपल्याला दिला, घरच्यांच्या सन्मानासाठी, पाहुणे-रावळ्यांसाठी दिला. आता तिला माणसांची ऊठबस करण्याचा फार कंटाळा येतो, इतका की कधीकधी मला तिच्या कंटाळ्याचा कंटाळा येतो. पण कधीतरी विचार करताना असे वाटते की तो कंटाळा येण्याचा तिला हक्क आहे. तो तिच्या वेळेवरचा तिचा अधिकार आहे. तो कसाही, तिला हवा तसा घालवण्याचा अधिकार तिला आहे. मुळात स्त्रियांची मुक्ती हा विषय इतका चावून चघळून चोथा झालेला विषय बनला आहे, की त्यावर वेगळे काय बोलणार असे कधीतरी वाटते. कधी वाटते की आपली एवढी पात्रता नाही. पण तरीही असे म्हणावेसे वाटते की प्रत्येक माणूस, जो जिवंत असतो, त्याला मिळालेल्या प्रत्येक क्षणाची लांबी ही सारखीच असते. पुरुष आणि स्त्री या दोन्ही व्यक्ती असल्या तरी त्यांना मिळणारे क्षण हे कसलेही लिंग न स्विकारता येतात. त्या क्षणांमध्ये स्त्रियांचा क्षण किंवा पुरुषांचा क्षण असे भेद नसतात. त्या क्षणाच्या काळात काय करावे निर्णय करण्याचे स्वातंत्र्य त्या व्यक्तीला असावे. असे अनेक क्षण स्वत:च्या मनाविरुद्ध काढणे याचा अर्थ जवळजवळ संपूर्ण आयुष्य मनासारखे न जगता येणे. हे कोणाही व्यक्तीला करावे लागू नये. यासाठी पैशाचे स्वातंत्र्य, शिक्षणाचे स्वातंत्र्य, दुसर्‍याच्या इच्छेचे, वेळेचे मोल समजणे इत्यादी गोष्टींचे महत्त्व आहे. बाईने डाळीला फोडणी द्यावी, का पुरुषाने; किंवा बाईने बाळाची शी काढावी, का पुरुषाने, हे प्रश्न माझ्या मते महत्त्वाचे आहेत, पण दुय्यम आहेत, प्रत्येक जित्याजागत्या व्यक्तीला मिळालेला वेळ कसा वापरता यावा या विचारांचे बाय-प्रॉडक्टस आहेत. मुळात जन्माला आलेल्या स्त्री-पुरुषांना आपल्याला मिळालेल्या वेळेचा वापर आपण मान्य केलेल्या चौकटींमध्ये, शक्य तितक्या स्वेच्छेने करता यावा, ही माझ्या मते खरी स्वातंत्र्याची व्याख्या असायला हवी. चौकटी अवघड असल्या तर स्वत:पुरत्या शिथिल करण्याचे स्वातंत्र्य हवे. स्त्री-मुक्ती चळवळीची उपेक्षा होते, त्यांचा अजेंडा कसा चुकीचा, एकांगी आहे हे खरेखोटे दळण आपण नेहमीच दळत असतो. मराठी लेखक आणि लेखिकाही एकेरी, कंटाळवाण्या कथा लिहून समाजातील विसंगती दाखवत राहतात. पण हे असे सतत कंटाळवाणे काहीतरी कथा-कादंबर्‍या-लेखांमधून दाखवणारे भले मूर्ख, एकांगी असतील, पण आजूबाजूला जे जिवंत व्यक्तींच्या आकांक्षा दाबणे, त्यांचा स्वतःच्या वेळेवर हवा तेवढा अधिकार नसणे घडत होते/घडत आहे ते अधिक चुकीचे आहे असे नाही वाटत?

वाचने 30017 वाचनखूण प्रतिक्रिया 161

In reply to by मीली

शिल्पा ब Tue, 01/11/2011 - 08:59
हम्म...मुलं असतील तर बराच फरक पडतो हे खरंय. पण आजकाल भारतातसुद्धा घटस्फोटीत असलेल्याना खूप अडचणी येत नसाव्यात असे वाटते. बाकी यातून आपणच शिकायचे कि आपल्या मुलांना त्यांच्या बायकोच्या मताला किंमत दिली पाहिजे , तिच्या मताचा आदर केला पाहिजे वगैरे शिकवायचे....आणि मुलींना वेगळी वागणूक न देता त्यांच्या आवडीचे शिक्षण घेऊ द्यायचे....स्वावलंबी होण्यास मदत करायची.....म्हणजे त्यांना अशी चर्चा करायची वेळ येणार नाही. बाकी सासवांबद्द्ल बोलाल तितके कमीच... सुनेच्या जागी मुलगी असती तर मते क्षणात बदलली असती.

ऋषिकेश Tue, 01/11/2011 - 09:31
बराचसा बॅलन्स्ड लेख आवडला, एक दृष्टीकोन म्हणून पटला (खरंतर रुचला) मात्र भुमिका म्हणून १००% पटला नाही. अनेकदा स्त्री मुक्ती म्हणजे काय हा प्रश्न मला पडे.. स्त्री ने मुक्ती, मुक्तता मिळवायची ते कोणापासून? पुरुषापासून? मुलांपासून? समाजापासून? कामापासून? इतरांनी लादलेल्या इच्छांपासून? माझ्यामते स्त्री मुक्ती म्हणजे स्त्री ने 'न्यूनगंडा'पासून मिळवलेली मुक्ती. आपल्याला ही गोष्ट येणार नाही ह्या गंडापासून मुक्ती. मग ही मुक्ती फक्त पुरुषांचे / समाजाने लाधलेली बंधने/कामे झुगारण्यापुरतीच असून चालणार नाही तर एखादी बंधने स्वखुशीने लाऊन घेण्याचीही हवी. लेखात दिलेल्या व्याख्येप्रमाणे "आयुष्यात मिळालेल्या क्षणोक्षण काळात काय करावे निर्णय करण्याचे स्वातंत्र्य त्या व्यक्तीला असावे. " दुसरी गोष्ट, इथे स्त्री ची भुमिका ही केवळ पत्नी ह्या अर्थाने घेतली आहे (जसे भाज्या निवडणे - जे 'नवरा' का करत नाही वगैरे वगैरे) भाज्या निवडणे, केर काढणे, भांडी विसळणे, बगिचे साफ करणे, बिले भरणे वगैरे सोपी आणि कमी धोकादायक कामे घरातील लहान मुलांना (विषेशतः मुलगे) का करायला लाऊ नयेत? स्त्रीया मुलांना तेही कुटुंबांचा भाग आहे हे विसरून ही कामे स्वत: करतात किंवा नवरा करत नाही म्हणून ओरडा करतात मात्र स्वतःचा मुलगा जो पुढे कुणाचा तरी नवरा बनणार आहे त्याला कामे सांगितली जात नाहीत असे का? तिच गत मुलींची माझ्या ओळखीच्या अनेक मुलींना अजूनही ब्यांकांचे व्यवहार माहीत नाहीत असे का? स्त्री ने मुक्त व्हावं म्हणताना त्याला पोषक वातावरण लहानपणापासून निर्माण करण गरजेचं आहे. एम्बीए, बीई वगैरे झालं तरी साधी कुटुंबांची सहल आयोजित करण्यासाठी नवर्‍यामागे लागणार्‍या मुली मी बघतो तेव्हा विचित्र वाटतें. अगदी कमावत्या मुलींना ऑनलाईन बुकिंग, एजंटशी बोलणे, वहाने ठरवणे, त्यातील ठग टाळणे वगैरे प्राथमिक गोष्टींचेही ज्ञान नसते. जर मुली सक्षम नसतील तर त्या स्वतंत्र होतीलच कश्या? अ‍ॅकॅडेमिक शिक्षण आणि सक्षम विचार यात फरक आहे (आणि म्हणूनच मग आपण ह्याच एम्बीए मुली घरी बसलेल्या बघतो) स्त्रीने मुक्त, स्वतंत्र वगैरे व्हावं हेच मला मुळी पटत नाही. सर्वप्रथम तीने स्वयंपूर्ण असावं मग ती कायमच स्वतंत्र असेल 'लग्न करण्याआधीही, लग्न ठरवतानाही आणि लग्नानंतरही!"

In reply to by ऋषिकेश

यशोधरा Tue, 01/11/2011 - 10:01
अनेकदा स्त्री मुक्ती म्हणजे काय हा प्रश्न मला पडे.. स्त्री ने मुक्ती, मुक्तता मिळवायची ते कोणापासून? पुरुषापासून? मुलांपासून? समाजापासून? कामापासून? इतरांनी लादलेल्या इच्छांपासून? माझ्यामते स्त्री मुक्ती म्हणजे स्त्री ने 'न्यूनगंडा'पासून मिळवलेली मुक्ती. आपल्याला ही गोष्ट येणार नाही ह्या गंडापासून मु़क्ती. अगदी.

In reply to by ऋषिकेश

Pearl Wed, 01/12/2011 - 12:00
>>अगदी कमावत्या मुलींना ऑनलाईन बुकिंग, एजंटशी बोलणे, वहाने ठरवणे, त्यातील ठग टाळणे वगैरे प्राथमिक गोष्टींचेही ज्ञान नसते. जर मुली सक्षम नसतील तर त्या स्वतंत्र होतीलच कश्या? +१ पण बर्‍याच ठिकाणी असेही पाहिले आहे की अशा arrangements करणे, स्वतःहून ही कामे फटाफट करणे, decisions घेणे ही कामे बायकांनी/बायकोनी केलेली नवर्‍यांना आवडत नाहीत. त्यांचा असाच आग्रह असतो की तू compulsory घरातली कामे बघ. आणि मी बाहेरची बघणार. सो arrangements करणे/plan करणे. / banking/finance जाणून घेणे याबद्दल आवड असूनही असे करताना नवर्‍याची आडकाठी असल्याने / विरोध असल्याने त्यांना त्या गोष्टी करता येत नाहीत.

In reply to by नितिन थत्ते

विकि Wed, 01/12/2011 - 21:39
स्त्रियांची मुक्ती हा विषय इतका चावून चघळून चोथा झालेला विषय बनला आहे, असे जे काही लेखिकेने लिहीले आहे, हे वाक्य अजिबात पटत नाही. स्त्रिमुक्ति हा विषय अजूनही म्हणावा तितका प्रभावी झाला नाही हे १०० टक्के खरे आहे. मुळात अजूनही अनेक स्त्रिया परावलंबी किंवा भितीदायक आयुष्य जगत आहेत. वृत्तपत्रात येणार्‍या बातम्या , १.त्यात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार या मध्ये केवळ ती स्त्रि , तिचं पुढील आयुष्य सुखकर होईल म्हणून शरिर त्या व्यक्तिच्या हवाली करते. इथे स्त्रि मुक्ती विषय येतोच ना. २.वेश्याव्यवसाय करणार्‍या ,इथे स्त्रि मुक्ति तत्व लागू पडते. ३. गोरगरिब , कष्टकरी यांचे काय ? त्यांना तर स्त्रि मुक्ति म्हणजे काय हेच माहित नाही केवळ आपल्या कुंटूंब आणि मुलाबाळांसाठी जगायचे इतकेच ठाऊक ४. नुकतचं मुंबईत एका तांत्रिकाने काही मुलींच्या असहायतेचा फायदा घेऊन त्यांची अब्रु लुटली. येथे तर सुरक्षीततेबरोबर , अंधश्रध्देचा प्रश्न उपस्थित होतो. ५. अशी एक नाही अनेक कारणे देता येतील .

लेख उत्तम व संतुलित वाटला. पुरुष उवाच गटात एकदा चर्चा झाली होती. त्यात स्त्री मुक्तीची वर्गवारी केली होती ग्रामीण, शहरी, दलित. उच्चवर्णीय ( विशेषतः ब्राह्मणी), मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय वगैरे प्रकारचे भेद दाखवले होते. स्त्रियांना आरक्षण देताना त्यात अंतर्गत उपरोक्त संदर्भाने आरक्षणांतर्गत आरक्षण असावे. अन्यथा उच्चवर्णीय स्त्रियाच आरक्षणाचा फायदा घेईल व दलित स्त्री वंचित राहिल असा विचार मांडला होता.

वाहीदा Tue, 01/11/2011 - 16:53
कामाच्या गडबडीत असल्याने जास्त लिहू शकत नाही पण तरीही थोडे मुद्दे लिहावेसे वाटतात चित्राताईने एकूणच स्त्रियांच्या भावविश्वाविषयी, तिच्या दुःखांविषयी, तिच्या कुटुंबातील स्थानाविषयी केलेले चित्रण आवडले पण जरी एका विशिष्ट पातळीवर स्त्रिया समान आहेत तरीही आजच्या स्रीमुक्तीमध्ये प्रचंड भेदभावही पहायला मिळतात म्हणूनच भारतिय स्रीयांच्या सर्वांगीण न्यायाला धरून `आरक्षणामध्ये आरक्षण' अशी मागणी केली गेली. आणखिन एक प्रश्न आपल्याकडे 'चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे', 'एक औरत ही घर को आबाद करती हैं, या बरबाद करती हैं !' अश्या म्हणी रुढ होण्यामागचे कारण आपण स्त्रीयाच आहोत ना ? आपल्या स्त्रीयांमध्येही इतर स्त्रीयांसाठी इतकी असूया, हेवेदावे, विषमता का भिनली आहे ? मग जेव्हा आपण मुक्त होण्याचा विचार करतो तेव्हा या सर्व Negative Energy पासूनही मुक्त होणे गरजेचे आहे.

In reply to by वाहीदा

प्रियाली Tue, 01/11/2011 - 18:28
आणखिन एक प्रश्न आपल्याकडे 'चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे', 'एक औरत ही घर को आबाद करती हैं, या बरबाद करती हैं !' अश्या म्हणी रुढ होण्यामागचे कारण आपण स्त्रीयाच आहोत ना ? आपल्या स्त्रीयांमध्येही इतर स्त्रीयांसाठी इतकी असूया, हेवेदावे, विषमता का भिनली आहे ? मग जेव्हा आपण मुक्त होण्याचा विचार करतो तेव्हा या सर्व Negative Energy पासूनही मुक्त होणे गरजेचे आहे.
निगेटिव एनर्जीपासून मुक्त होणे आवश्यक आहे याच्याशी सहमत आहे. स्त्रियांमध्ये आसूया, हेवेदावे अधिक दिसतात याच्याशीही सहमत आहे परंतु याचे कारण स्त्रियांच्या प्रचंड उर्जेचा योग्य ठिकाणी व्यय होत नाही म्हणून. जसजसे स्त्रियांची शैक्षणिक पातळी, वाचन, स्वावलंबन, पैशाची आवक वाढत जाईल तसतसे तिचे विचार बदलत जातील. डोके योग्य ठिकाणी कारणी लागेल आणि आसूया, हेवेदावे करण्यास वेळ मिळणार नाही आणि स्त्रियांची अशाप्रकारे उन्नती होण्यासाठी तिला घरच्या पुरुषाची साथही आवश्यक आहे. एक उदाहरण सांगते. परवा माझ्या एका मैत्रिणीकडे पार्टी होती. त्याच दिवशी फूटबॉलचा सामनाही होता (दुर्दैवाने आम्ही तो हरलो..पण ती वेगळी गोष्ट) माझा नवरा कामानिमित्त परदेशी आहे. इतर मित्रमंडळ तेथे उपस्थित होते. घरात काहीही काम करायचे नव्हते. सर्व पुरुष बसून सामना बघत होते. बायका मात्र वेगळ्या बसून गप्पा मारत होत्या. मला सामना बघायचा होता. मी साडे तीन तास बसून सामना पाहिला. आमचे सर्व मित्र सामना बघताना व्यवस्थित माझ्याशी खेळ डिस्कस करत होते. खेळात घडलेला एक फाऊल मी समजावून सांगितला तेव्हा व्यवस्थित ऐकूनही घेत होते. मी प्रश्न विचारला तर समरसून उत्तरे देत होते. गंमत म्हणजे त्यापैकी एकही पुरुष आपल्या बायकोला म्हणाला नाही की 'इंटरेष्टींग सामना आहे. बस ना इथे आपण एकत्र बघू.' याच सुमारास माझ्या नवर्‍याने फोन करून मला स्कोर विचारला आणि नेमके काय झाले हे विचारून घेतले. (म्हणजे सामन्यात काय होते आहे हे विचारण्यासाठी त्याला उपस्थित मित्रांपैकी एखाद्याला फोन लावावा लागला नाही) संपूर्ण साडे तीन तास माझ्या मैत्रिणी बाजूला बसून 'आपण स्नोमध्ये मुलांना घेऊन शॉपिंग कसे केले?' यापासून "यावेळेस आयब्रो करताना आर्च कसा चांगला आला.", "शाळेत मुलांना टिचरने काय सांगितले" वगैरे गप्पा मारत होत्या. सोबत त्यांनी 'आज बहुधा हीचा (माझा) मूड नाही' असे मला सुनावले. त्यावर माझे उत्तर होते की 'माझा मूड चांगला आहे. मी आनंदाने सामना बघते आहे. हरलो तर मूड बहुधा खराब होईल पण असे होईलच असे नाही.' ---- खेळाचे हे उदाहरण क्षुल्लक आहे परंतु मी सहसा स्त्रियांना राजकारणाबद्दल, कारच्या सर्विसिंगबद्दल, विविध इन्शुरन्सेसबद्दल, सेविंग पॉलिसीजबद्दल, टेक्नॉलॉजीबद्दल तासंतास चर्चा करताना पाहत नाही.

In reply to by प्रियाली

वाहीदा Tue, 01/11/2011 - 19:59
खेळाचे हे उदाहरण क्षुल्लक आहे परंतु मी सहसा स्त्रियांना राजकारणाबद्दल, कारच्या सर्विसिंगबद्दल, विविध इन्शुरन्सेसबद्दल, सेविंग पॉलिसीजबद्दल, टेक्नॉलॉजीबद्दल तासंतास चर्चा करताना पाहत नाही तेच तर मी म्हणत आहे समजून न घेता असूया, द्वेष, मत्सर, हेवेदावे हे अवगुण चटकन का बाहेर येतात ? मी अगदी खुप शिकलेल्या उच्चभ्रू स्त्रीयाही आमच्या मुंबईच्या लोकल मध्येही तावातावने भांडताना पाहिल्या आहेत. लोकलमधली ४थ्या (सीटच्या) जागेसाठी अगदी खालच्या स्तराला जाऊन शिविगाळ करताना ही पाहिल्या आहेत. त्यांची पैशाची आवक ही जास्त आहे. मग याला काय म्हणायचे ? शि़क्षण जास्त संस्कारावर ही या अगदी छान गप्पा मारतात पण वेळ आली की असूया, द्वेष, मत्सर, हेवेदावे हे अवगूण पटकन बाहेर पडतात. आमची आई म्हणायची - जब किसी भी ईन्सान को बहोत ज्यादा जोरसे दबोचा जाता है और उसके मुंहसे जो पहली चीख निकलती है 'क्या वो गाली होती है या खुदा / मां की ललकार' वहीं समझमें आती है उसकी असलियत, तहजीब बाकी सब फरेब हैं ! :-) अवांतर : मी कामात आहे म्हणून तुम्ही सगळ्या रिकाम्या आहात असं कुठे म्हंटल ग मी प्रियालीताई ??

In reply to by वाहीदा

प्रियाली Tue, 01/11/2011 - 20:43
अवांतर : मी कामात आहे म्हणून तुम्ही सगळ्या रिकाम्या आहात असं कुठे म्हंटल ग मी प्रियालीताई ??
मी तुला किंवा इतरांना रिकाम्या म्हणत नव्हते. रिकामा न्हावी ...प्रमाणे रिकामी बाई असा वाक्प्रचार वापरत होते. :) हिंदीत म्हण आहे ना - खाली दिमाग* शैतान का घर. * खाली दिमाग म्हणजे निर्बुद्ध डोके नव्हे पण क्षमता असूनही योग्य ठिकाणी न वापर झालेले डोके. --- विशेषतः भारतात फ्रस्ट्रेशन लेवल खूप जास्त आहे. बायकांची तर आहेच. त्यांना ऑफिस, घर, मुले, पाहुणे, सासू-सासरे सर्वच बघावे लागते. परदेशाप्रमाणे नवर्‍यांची खूप मदत होत नाही. हे नैराश्य ट्रेनमध्ये बाहेर पडत असावे. परक्यांवर राग काढणे सोपे असते म्हणून भारतात पुरुषही जरा काही झाले की रस्त्यावर मारामारीस उतरतात. (उदा. गाडीला सायकलचा धक्का लागल्यावर एकदम अक्षयकुमारश्टाईलने फायटींग करताना पाहिले आहे.), रस्त्यावर जोरजोरात हॉर्न वाजतात वगैरे.

In reply to by वाहीदा

Pain Fri, 01/21/2011 - 06:52
आमची आई म्हणायची - जब किसी भी ईन्सान को बहोत ज्यादा जोरसे दबोचा जाता है और उसके मुंहसे जो पहली चीख निकलती है 'क्या वो गाली होती है या खुदा / मां की ललकार' वहीं समझमें आती है उसकी असलियत, तहजीब बाकी सब फरेब हैं ! वा वा! अगदी मूलभूत, प्रातिनिधीक आणि इतरही बरेच काही...

In reply to by प्रियाली

स्वाती२ Tue, 01/11/2011 - 20:10
>>खेळाचे हे उदाहरण क्षुल्लक आहे परंतु मी सहसा स्त्रियांना राजकारणाबद्दल, कारच्या सर्विसिंगबद्दल, विविध इन्शुरन्सेसबद्दल, सेविंग पॉलिसीजबद्दल, टेक्नॉलॉजीबद्दल तासंतास चर्चा करताना पाहत नाही. हे मी ही पाहिलयं. गंमत म्हणजे या विषयात मला रस आहे याचे माझ्या नवर्‍याला किंवा माझ्या मित्रांना काही विशेष वाटत नाही मात्र माझ्या काही मैत्रिणींनी मात्र माझ्या आवडी-निवडी 'पुरुषी' आहेत असे लेबल लाऊन टाकलयं. या बाया 'कमावत्या' आहेत हे विशेष. अर्थात त्यात त्यांचे काही चुकते असे नाही. त्यांना तसेच वाढवले गेले असावे. निगेटिव्ह एनर्जी बाबत म्हणायचे तर ही वृत्ती आहे. बायका ती ज्या पद्धतीने व्यक्त करतात त्या मुळे ती अधिक जाणवते. अगदी शाळेत देखिल मुलगे मारामारी करुन भांडण सेटल करतात तर मुली पाठीमागून कुचकुच करतात. नव्या जमान्यात फेसबुक वर लिहितात.

In reply to by प्रियाली

शुचि Tue, 01/11/2011 - 20:17
प्रियाली अगदी अगदी!!! परवा मी नणदेकडे गेले होते तिथे पुरुषमंडळी आणि मुले "वी गेम" खेळत होते काय मजा येते सांगू या खेळात टेनीस खेळताना. मी माझ्या नवर्‍याला हरवलं, मुलीला हरवलं. मी एकदम एन्जॉय करत होते. तिकडे सगळ्या बायका बसून गप्पा मारत होत्या. मी थोड्या वेळानी त्यांच्यात गेल्यावर सासूबाई - "अहो, आता जरा वेळ इथेही घालवा म्हटलं" हे वाक्य त्यांनी मला ४ दा ऐकवून दाखवलं. नवरादेखील तेच करतो - तू बायकांच्यात जाऊन बस हेच सुचवतो. मला या गोष्टी खूप लागतात.

५० फक्त Tue, 01/11/2011 - 18:13
लेख छान आहे, पण बरेच मुद्दे पटले नाहीत. स्त्री मुक्ती ही मोक्ष / स्वर्ग मिळणे या सारखीच अगम्य गोष्ट आहे. मिळण्याआधी फक्त वर्णने एकायची आणि सांगायची, दिवास्वप्नात रमायचं आणि हे नक्की कधी मिळेल याच्या वाट पाहण्यात आजचे सुंदर क्षण वाया घालवणं हा मार्ग आजकाल ब-याच स्त्रियांना हवा असतो. मुक्ती हवी आहे ती कशापासुन, कशासाठी, कधी आणि कशी या कुठल्याही गोष्टीचा संदर्भ न घेता नवरा सासरच्या इतरांबरोबर भांडणं यालाच हल्ली स्त्री मुक्ती समजलं जातं, आणि यापेक्षा वाईट म्हणजे याच लग्नातुन झालेल्या मुलांचा वापर शस्त्रांसारखा केला जातो, ब्लॅकमेल करण्यासाठी, यात भर म्हणुन कायदा आहेच. "आता राहतेय या घरात ते या लेकराकडे पाहुन, नाहीतर...." असले डायलॉग टाकायचे, मग हे लेकरु पोटात घेताना हा स्वाभिमान आणि स्पेस कुठं गेलेली असते. वाल्या कोळ्याचं बायको सारखं इएमाअय भरायला, हॉटेलात न्यायला, मजा करायला, पोरं हवी असताना नवरा लागतो आणि त्याच्या आईबापा बरोबर आदरानं बोलता-वागताना स्त्री मुक्तीचा प्रश्न येतो हा दुटप्पीपणा म्हणजेच स्त्री मुक्ती हे गणित पुढं यायला लागलंय. कोणत्या गोष्टीची तुलना कुठं करायची याचं भान नाही, नव-यापेक्षा १/५ पगार नसणा-या पण उगीचच मी, माझं मन, माझी माणसं, माझे मित्र्/मॅत्रिणि. अभिमान, या विषयावरुन उगाचच गोंधळ घालायचा या दिशेनं ही चळवळ जाताना पाहुन फार वाईट वाटतं. स्वताच्या स्पेस साठी भांडावं पण मग लग्नाआधी ही स्पेस कुठं असते , जी एकदम नंतरच आठवते. स्त्री मुक्ती पेक्षा लग्न किंवा वॅवाहिक जबाबदारी पासुन मुक्ती या दिशेनं ही चळवळ चाललेली पाहुन वाईट वाटतं. लग्नाआधी कुणापासुन मुक्ती नको असते पण स्वप्नात येणारा राजपुत्रानं आपल्या नावावर सगळी इस्टेट करुन मरुन जावं, मग मी स्वःताला झाशीची राणि सिद्ध करेन हा विचार का असं विचारावसं वाटते. तथाकथित पाश्चिमात्य पुढारलेल्या देशांत अशा अर्धवट रस्ता चुकलेल्या चळवळींनी पिढ्यान पिढ्या बरबाद करण्याचं काम व्यवस्थित केलेलं असताना आज आपण कोणताही मागचा पुढचा विचार न करता डोळॅ झाकुन या मागं जायचं हा एकच विचार या सगळ्यांत दिसतो आहे. अगदी नव-यानं अग्निसाक्षि मधला नाना असुच नये पण बायकोनं तो हदिदेचुस मधला अजय देवगण असावा अशी अपेक्षा ठेवु नये. आज काल ब-याच जणींची स्वप्नं म्हणजे आई बापानं भरपुर खर्च करुन लग्न करुन द्यावं मग नव-याणं छान फिरवुन आणावं सासरी घरकामाला / सासरी नोकरी करावी लागायच्या आधीच, आपल्या लग्नाआधीच्या मित्राची भेट घालुन वन टाईम घसघसीत डायव्होर्स सेटलमेंट करुन द्यावी अशी अपेक्षा असते आणि यातलं एक जरी क्रम चुकला की लगेच स्त्री मुक्ती की जय. माझी मतं ब-याचजणांना पटणार नाहीत पण मी भविष्याचा विचार करीत नाही आणि माझ्या आजच्या दिवसांत आणि भारतांत तरी आपली पुढची पिढी या जगांवर राज्य करणारी असावी असं वाटत असेल तर जे चालु आहे तेच योग्य आहे असं मला वाटतं. चर्चा बरीच एकांगी वाटली म्हणुन दुसरी बाजु मांडावी असं वाटलं, म्हणुन हा लिखाण प्रपंच. हर्षद.

In reply to by ५० फक्त

मुक्तसुनीत Tue, 01/11/2011 - 20:36
स्त्री मुक्ती ही मोक्ष / स्वर्ग मिळणे या सारखीच अगम्य गोष्ट आहे. मिळण्याआधी फक्त वर्णने एकायची आणि सांगायची, दिवास्वप्नात रमायचं आणि हे नक्की कधी मिळेल याच्या वाट पाहण्यात आजचे सुंदर क्षण वाया घालवणं हा मार्ग आजकाल ब-याच स्त्रियांना हवा असतो. असहमत. "स्त्रीमुक्ती" ( हा शब्द मला अपुरा नि अयोग्य वाटतो पण संभाषणाच्या सोयीकरता वापरू). ही बिलकुलच अगम्य गोष्ट नाही. त्याचा मोक्षस्वर्गादि गोष्टींशी काहीच संबंध नाही. हे दिवास्वप्नही नाही. आणि ते मिळावे म्हणून कुणीही वाट बघत बसलेले नाही. ज्यांना ही गोष्ट महत्त्वाची वाटते ते सर्व आपापल्या वैयक्तिक आणि सामाजिक डोमेन मधे या गोष्टीचा पाठपुरावा करण्याचा सतत प्रयत्न करतात. ही एकदा करण्याची गोष्ट नसून रोजच्या जगण्याची गोष्ट आहे. शिंपल :-) मुक्ती हवी आहे ती कशापासुन, कशासाठी, कधी आणि कशी या कुठल्याही गोष्टीचा संदर्भ न घेता नवरा सासरच्या इतरांबरोबर भांडणं यालाच हल्ली स्त्री मुक्ती समजलं जातं, आणि यापेक्षा वाईट म्हणजे याच लग्नातुन झालेल्या मुलांचा वापर शस्त्रांसारखा केला जातो, ब्लॅकमेल करण्यासाठी, यात भर म्हणुन कायदा आहेच. "आता राहतेय या घरात ते या लेकराकडे पाहुन, नाहीतर...." असले डायलॉग टाकायचे, मग हे लेकरु पोटात घेताना हा स्वाभिमान आणि स्पेस कुठं गेलेली असते. वर वर्णिलेले सर्व विचार हे अज्ञानमूलक आहेत ही गोष्ट खरी आहे. मात्र या चुकीच्या अर्थांमुळे एकंदर संकल्पनेलाच रद्द करण्याकडे तुमच्या विवेचनाचा कल दिसतो. तथाकथित पाश्चिमात्य पुढारलेल्या देशांत अशा अर्धवट रस्ता चुकलेल्या चळवळींनी पिढ्यान पिढ्या बरबाद करण्याचं काम व्यवस्थित केलेलं असताना आज आपण कोणताही मागचा पुढचा विचार न करता डोळॅ झाकुन या मागं जायचं हा एकच विचार या सगळ्यांत दिसतो आहे. नक्की कुठल्या पिढ्या "बरबाद" झाल्या ते कळले तर बरे होईल. हां, एकांगी व्यवस्थेतले एकाच पक्षाला मिळणारे फायदे नि आळस संपले असतील. याचे वर्णन "बरबादी" कसे करता येईल ? माझी मतं ब-याचजणांना पटणार नाहीत पण मी भविष्याचा विचार करीत नाही आणि माझ्या आजच्या दिवसांत आणि भारतांत तरी आपली पुढची पिढी या जगांवर राज्य करणारी असावी असं वाटत असेल तर जे चालु आहे तेच योग्य आहे असं मला वाटतं. तुमची मतं पटली नाहीत इतपत बरोबर आहे. पुढची काही वाक्ये काहीशी "नवकाव्या"प्रमाणे गूढ आहेत :-)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

टारझन Wed, 01/12/2011 - 13:27
टाळ्या . खोडसाळ पणे नाही पण एका स्त्रीला एका पुरुषाने +१ दिलाय म्हणुन. - ब्रुसली

चित्रा Tue, 01/11/2011 - 19:26
प्रथम स्त्री-मुक्ती : ह्या मुक्तीची व्याख्या वेगळी करावी याबद्दल बरेच जणांनी लिहीले आहे (हर्षद, ऋषिकेश, यशोधरा, शिल्पा ब). कोणाची मुक्तता करणे यात आधी बंधने आहेत हे अध्याहृत आहे. ती मुक्तता पुरुषांपासून आहे असे मी लेखात म्हटलेले नाही, अनेकांनी जी उदाहरणे दिली आहेत त्यातही एक एमबीबीएस बायको व तिचा यशाची चढती कमान असलेला नवरा यांच्या उदाहरणाखेरीज वर ज्या स्त्रियांनी आपले अनुभव लिहीले आहेत अशापैकी कोणत्याही स्त्रीला पुरुषांनी घरात जखडून ठेवले आहे असे नाही. ते रुढींनी ठेवले आहे असे म्हणू शकतो. जाचक रुढींमुळे, रितीरिवाजांमुळे शिक्षणात न्यून रहायला मदत होते. रूढी अशी की बायकांनी दुपारच्या वेळी जाडजाड पुस्तके वाचू नयेत. किंवा स्टेशनवर जायला, दुकानातून काही खरेदी करून आणायला बायकांना कोणाचीतरी सोबत लागते. किंवा हॉटेलात बायकांनी एकटे जाऊ नये. इ. इ. म्हणून जाचक रूढींपासून मुक्तता हवी. बायकांना असलेल्या न्यूनगंडातून सुटका हवी हे तर खरेच. पण हे न्यून का राहते? कारण मुलीचेही आईवडिल हेही पठडीतूनच आलेले असतात. इथे सासर - माहेर याबद्दल बोलण्याची गरज आहे असे नाही. (सासरबद्दल जास्त बोलले जाते कारण विशेषत: सासरी आल्यानंतर मुलींना आपल्या मोकळेपणावर बंधने आली असे वाटते, कारण दोन कुटुंबांमधील मुलांना वाढवण्यातील फरक बाहेरून आलेल्या मुलीच्या लगेच लक्षात येतात, बर्‍याचदा जाचक वाटतात/असतात). प्रियाली यांच्या कथेतली मुलगी अंगावर कधी कसलेही काम न पडल्याने, अमेरिकेत आल्यावर नेहमीच्या स्थैर्याच्या कल्पनेला (स्वतःचे पैसे, नोकरी, विश्व) तडा गेल्यामुळे जास्त गांजली आहे. हे कथेतील मुलाच्या बाबतीत होत नाही, कारण पैसे त्याचे आहेत, विश्व त्याचे आहे, त्यात ही मुलगी आली आहे. कामधंदा नसताना मुलीच्या कामाच्या ठिकाणी राहण्याची कल्पना मुलांनी केल्यास त्यांनाही हे जाचक होईल हे समजले पाहिजे. यातून ती आपले स्थैर्य कसे परत मिळवते तर नवर्‍याचा त्याग करून. येथे परत आपण स्थैर्य कशाला म्हणतो, व्यक्तीची 'वाढ' कशाला म्हणतो, शिक्षण ज्या विषयात घेतले त्यातच काम केले पाहिजे का/करावे का, कामात बदल करता येऊ नयेत का, असे मूलभूत प्रश्न उभे राहतात. माझ्या मते ते सर्व प्रत्येकाचे स्वतःचे असतात. ते आपण जवळच्यांना पटवून देऊ शकतो का, यावर आपल्या कुटुंबाचे आणि आपले स्वास्थ्य अवलंबून असते. पण या लेखाचा हा विषय नाही. लेखातून बर्‍याच बायकांना शिक्षणाची, मोकळेपणाची, वेळेची सवलत मिळत नाही/नसावी हे दाखवून देण्याचा मी प्रयत्न केला आहे. पण स्त्रियांसाठी झालेली क्रांती ही पुरेशी आहे, असा समज मला हर्षद यांच्या लिखाणात जाणवला. हर्षद म्हणतात तशा मुली आहेत/असतील. पण अशा काही मुली आहेत म्हणून हे विचार प्रसृत करणे आता बास झाले असे म्हणणे म्हणजे एक प्रकारची हुकुमशाहीच होईल. तेव्हा "जे चालु आहे तेच योग्य आहे असं मला वाटतं" यात नक्की काय चालू आहे ते योग्य आहे, असे हर्षद यांचे मत आहे, ते कळले तर पुढे बोलता येईल.

स्वाती२ Tue, 01/11/2011 - 19:41
बरेचदा स्त्री मुक्ती वर चर्चा होते तेव्हा बरेचदा मुली शिकूनही नोकरी न करता घरी का बसतात हा मुद्दा येतो. यात सासरच्या लोकांना, नवर्‍याला पसंत नाही एवढे एकच कारण नसते. ज्या विषयात शिक्षण झालेय त्या विषयात मनासारखी नोकरी न मिळणे, त्या विषयात काम करण्याची आवड न उरणे, नवर्‍याबरोबर परदेशात गेल्यास तिथल्या नियमांमुळे नोकरी न करु शकणे, नवर्‍याच्या होणार्‍या बदल्या, 'आई' होण्यासाठी डॉक्टरी सल्ल्याने घ्यावी लागणारी सक्तीची बेडरेस्ट, बाळंतपणात उद्ध्भवलेल्या समस्यांमुळे खालावलेली तब्येत, मूल प्रीमी असणे किंवा त्याच्या तब्येतीचे प्रॉब्लेम, घरातील वडिलधार्‍या माणासांचे आजारपण वगैरे अनेक कारणासाठी स्त्रीला नोकरी सोडायची वेळ येऊ शकते. नोकरीत गॅप आल्यावर सर्वच क्षेत्रात लगेच नोकरी मिळतेच असे नाही. मिळाली तरी बरेचदा सर्व हिशोब मांडता बरेचदा ब्रेक इवनही होत नाही असे जाणवते. माझ्या नात्यात दोन केसेस अशा आहेत की मूल होण्यासाठी नोकरी सोडावी लागली/ बिझनेस विकावा लागला. एका केस मधे स्पेशल नीड चाईल्ड म्हणून करिअर संपले. तेव्हा सरसकट सगळ्यांना एका मापात मोजणे योग्य नाही. माझ्या बाबतीत मला इथे ले ऑफ मिळाल्यावर विसाच्या अडचणींमुळे पुन्हा जॉब घेता आला नाही. पुढे शिकण्यासाठी अ‍ॅडमिशन मिळूनही विसाची अडचण झाली. सर्व मार्गी लागे पर्यंत ५ वर्षांची गॅप पडली होती. त्यात २००० ची मंदी. तसेच या सर्व गोंधळात आम्हाला काही झाले तरी एकत्रच राहायचे होते. नवर्‍याचा जॉब स्टेबल होता आणि नोकरी नाही म्हणून माझ्या आर्थिक स्वातंत्र्यावर गदा आली नाही त्या मुळे नोकरी नसणे सुसह्य झाले. माझ्या स्वातंत्र्यावर गदा आली असती तर मी काही झाली तरी एकत्र राहायचे वगैरे विसरुन स्वतःच्या पायावर उभे रहाण्यासाठी झगडले असते. पण तसे झाले नाही. सुरवातीला नोकरी नाही, २४ तास मुलाबरोबर घरी रहाणे वगैरे गोष्टींशी जमवून घेणे कठिण गेले. त्यात सासरची माणसे 'बसून खाते' वगैरे म्हणायची. या काळात नवर्‍याचा भक्कम आधार होता. दिवसभर दंगा करणार्‍या मुलाला सांभाळून मी ही थकते याची जाणिव होती. मदतीचा हात कायम होता. आणि मला जेव्हा मदत हवी असायची. स्वतः साठी वेळ हवा असायचा तेव्हा मी ही हक्काने मागायची. आयडिअली बघायचे तर आम्हाला दोघांनाही आपापल्या क्षेत्रात नोकरी करता यावी हे स्वप्न होते. पण तसे झाले नाही. मात्र मी स्वतःला पूर्ण वेळ गृहिणी आहे म्हणून अबला समजत नाही. घरी पाहुणे येणार असतील तर नवरा, मुलगा दोघांची मदत घेते आणि मला ती मिळते. कुणाकडे आम्ही गेलो तर माझा मुलगा माझ्या प्रमाणेच आत येऊन घरातील गृहिणीला मदत हवी का असे विचारतो, मदत करतो. नवर्‍यानेही एक दोनदा मदत हवी का असे विचारले पण त्या गृहिणींना माझा नवरा चेष्टा करतोय असे वाटले :). सर्व आर्थिक व्यवहार मला माहित आहेतच शिवाय गुंतवणूकीचे निर्णय मी घेते. तुम्ही स्वतः खंबीर असाल तर तुम्हाला कुणीही वाईट वागवू शकत नाही.

In reply to by स्वाती२

यशोधरा Tue, 01/11/2011 - 19:58
तुम्ही स्वतः खंबीर असाल तर तुम्हाला कुणीही वाईट वागवू शकत नाही. पर्फेक्ट. मलाही हेच म्हणायचे आहे आणि समजा जरी कोणी वाईट वागवू पाहिले तरीही अशी वागणूक कशी हाताळावी हेही ठरवता येते. म्हणूनच कोणतेही गंड न बाळगणं ( इन्फिरिअर वा सुपिरिअरही ) महत्वाचं. त्यामूलेच ऋ ने म्हटलं आहे ते मला पटतं आणि माझंही तेच मत आहे की स्त्रीने मुक्तता मिळवायची ती कोणापासून? ती मुक्तच आहे की. केवळ तिला ते जाणवणं महत्वाचं. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायची ताकद हवी. समजा, सभोवतालच्या चार लोकांना घेतलेले निर्णय पटणार नसतील, तर त्यापासून उद्भवणारे वाद, विवाद, बरे - वाईट इ. लहान मोठ्या प्रश्नांना स्वतःवर विश्वास ठेवून तोंड द्यायची हिंम्मत हवी.

In reply to by यशोधरा

नगरीनिरंजन Tue, 01/11/2011 - 21:07
>> ती मुक्तच आहे की. केवळ तिला ते जाणवणं महत्वाचं. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायची ताकद हवी सहमत आहे. स्वातंत्र्य, समानता वगैरे गोष्टी आधी आपल्या मनात निर्माण झाल्या पाहिजेत. स्त्रीमुक्तीवर चर्चा करणार्‍या स्त्रियांपैकी एकीलाही आपण मुक्त नसल्याचा न्यूनगंड नसेल तर ती स्त्रियांना बळ देण्याच्या गप्पा न करता कोणत्याही दुर्बळ अन्यायग्रस्ताला बळ देण्याचीच भाषा करेल. समानतेवर आणि स्वातंत्र्यावर चर्चा करताना आपणच लिंगभेद किती सहजपणे वापरतो आहोत हे कोणाच्याच लक्षात येत नाहीय. एखादी गोष्ट नष्ट करायची असेल तर ती आधी स्वतःच्या मनातून नष्ट झाली पाहिजे.

In reply to by नगरीनिरंजन

मितान Tue, 01/11/2011 - 22:30
>>>एखादी गोष्ट नष्ट करायची असेल तर ती आधी स्वतःच्या मनातून नष्ट झाली पाहिजे. १०० % अनुमोदन ! स्त्रीसमानता हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. एकदा नणंदेने हळदीकुंकवाला एका प्रौढ कुमारिकेला नि एका विधवा स्त्री ला बोलावले. येताजाता उल्लेख " ती विधवा असली म्हणून काय झाले ! हळदीकुंकू काही धार्मिक समारंभ नाही. सामाजिक आहे " मग मी वाद घातला. ज्या अर्थी ' ती विधवा असूनही .. ' हा विचार डोक्यात येतो त्या अर्थी आपण तिला 'समान' मानत नाही ! कोणतेही काम करताना " मी स्त्री असूनही ... " हे डोक्यात येते तेव्हाच आपण मुक्तीपासून चार पावलं लांब गेलेलो असतो.

In reply to by मितान

गवि Wed, 01/12/2011 - 10:11
एखादी गोष्ट रद्द व्हायची असेल तर आधी त्याची रद्दी व्हावी लागते. म्हणजेच ती ओब्सोलीट व्हावी लागते. हळदीकुंकवाला विधवेला / पुत्रहीन स्त्रीला बोलावणे, न बोलावणे, मंगळसूत्र घालणे/ न घालणे वगैरे अशा अनंत सनातन वादांवर १.हळदीकुंकवाला विधवेला सन्मानाने बोलावणे २. हळदीकुंकू आवर्जून बंदच करणे. ३. मंगळसूत्र कटाक्षाने टाळ्णे ४. मंगळसूत्र कटाक्षाने घालणे. अशासारख्या उपायाने नुसतेच संवर्धन किंवा संघर्ष होत राहतो. उपाय हाच की त्या हळदीकुंकवाला बोलावण्याचे महत्वच मनातून नष्ट व्हावे. त्याची साधी किटी पार्टी व्हावी. चिकटलेले "सौभाग्य"या गोष्टीचे महत्व गळून जावे. कपाळी कुंकू लावून घेताना जे अतीव समाधान डोळे मिटलेल्या चेहर्‍यावर येतं ते ओब्सोलीट व्हावं. उपाय हाच की कधीकधी मंगळसूत्र घातले.. कधी नाही घातले.. कधी हरवले.. कधी विसरले अशा वागण्यातून आपोआप त्याचे "मंगळसूत्र"पण गळून पडले पाहिजे आणि तो एक जनरल फॅशनचा दागिना उरला पाहिजे.. घातला काय. न घातला काय.. तत्समच.. लग्न या कराराने शारिरिकदृष्ट्या आणि फिजिकल शक्तिदृष्ट्या भिन्न व्यक्तींनी एकत्र येऊन राहून मुलेबाळे पैदा करून तरीही नैसर्गिकरित्या असावे तसे स्वातंत्र्य दोघांनाही मिळेल हे कधीच शक्य नाही. ही अपेक्षाच मुळात चुकीची आहे. तस्मात लग्न करणे (वेळेत लग्न होणे), मूलबाळ होणे, नोकरीत नवरा जास्त कमावणारा, एन आर आय असणे, आयुष्याचा जोडीदार मिळणे, हवी तशी हव्या त्याच पगाराची नोकरी मिळणे"च"... आणि इतर असंख्य लाईफ इव्हेंट्सना आपण जे प्रेशर लावून ठेवले आहे आणि ते लँडमार्क्स वेळोवेळी अचिव्ह झालेच पाहिजेत अशी जी सक्ती करून ठेवलीय, तीच ओब्सोलीट झाली तरच सर्वांना हवे ते करता येईल. दोघांनी एकत्र रहावे आणि मिळून काही करावे तरच दोघांना स्वातंत्र्य मिळेल अशा सक्तीने दोघेही काहीच करणार नाहीत आणि मग तो सो कॉल्ड संसार "पार पडणार" नाही. सुरु केला पाहिजेच आणि मग सुरु केला म्हणून पारही पाडला तर पाहिजेच ना ? (!!!) ज्याच्याकडून स्वातंत्र्य हवंय त्याच्याकडूनच सुरक्षितताही हवीय अशी सरळसरळ कमकुवत भूमिका जोपर्यंत स्त्रिया घेताहेत तोपर्यंत स्वातंत्र्य कोणत्याही पातळीवर शक्य नाही. या धाग्यातवरही मूळ लेख, चर्चा, प्रतिसादांत अनेक ठिकाणी ही भूमिका दिसते. मग त्यासाठी "मुलांचं काय", "नातेवाईकांचा सपोर्ट नसणे" अशी खूप कारणं सापडतात. या गोष्टी मूल होण्याच्या खूप आधी घडायला हव्यात. नातेवाईकांच्या सपोर्टशिवाय त्या समाजाच्या नजरा झेलण्याची ताकद हवी. स्वातंत्र्य हवंय ना..मग किंमत द्यायला भीती वाटते? समाज नाही बदलणार तुमच्यासाठी. स्वातंत्र्य तुम्हाला हवंय.. समाजाला नकोय.. तेव्हा तुम्ही बदला. स्वातंत्र्य हे पुरुषांना दुर्दैवाने फुकट मिळालंय असं धरलं तरी स्त्रियांच्या "पडते घेण्यामुळे" त्याला पोषण मिळत राहिलंय आणि हे पडतं घेत राहणं हे शहाणपणाचं लक्षण नसून दुर्बळपणाचंच आहे असं ढळढळीत दिसतंय हे दु:ख.

In reply to by गवि

शिल्पा ब Wed, 01/12/2011 - 10:20
बहुतेक असाच विचार पाश्चिमात्य देशातील स्त्रियांनी करून लग्न करण्यापेक्षा लिव्ह इन रीलेशनशीप वगैरे रूढ केले असावे. पण त्या स्त्रिया कमावत्या आणि स्वावलंबी असतात...मुलं बाळ स्वतःच्या जीवावर पोसू शकतात...खुपदा करतातही. अर्थात कोणीतरी आपली सुरक्षा करणारा /री असावा/वी अशी अशा करणे गैर नाही. बाकी तुमच्या प्रतिसादाशी सहमत.

In reply to by शिल्पा ब

गवि Wed, 01/12/2011 - 10:22
अर्थात कोणीतरी आपली सुरक्षा करणारा /री असावा/वी अशी अशा करणे गैर नाही. >>> अजिबात गैर नाही. पण दॅट इज द कॉस्ट ऑफ फ्रीडम..

In reply to by आजानुकर्ण

शिल्पा ब Wed, 01/12/2011 - 10:30
बॉडी गार्ड म्हणायचंय का? पण त्यातही स्त्री का पुरुष हा मुद्दा येतोच...त्या गार्डापासून सुरक्षा कोण देणार? स्वतःच खमकं राहायचं बुवा!! बाकी चालुच द्या.

In reply to by शिल्पा ब

आजानुकर्ण Wed, 01/12/2011 - 10:32
बॉडी गार्ड म्हटले की ते जास्त फिजिकल होते आणि गार्डापासून सुरक्षा वगैरे प्रश्न उद्भवतात. त्यामुळे प्लेटॉनिक नातेसंबंध दर्शवण्यासाठी सेक्युरिटी गार्ड असा शब्दप्रयोग केला.

In reply to by स्वाती२

प्रियाली Tue, 01/11/2011 - 19:59
नवर्‍याबरोबर परदेशात गेल्यास तिथल्या नियमांमुळे नोकरी न करु शकणे, नवर्‍याच्या होणार्‍या बदल्या, 'आई' होण्यासाठी डॉक्टरी सल्ल्याने घ्यावी लागणारी सक्तीची बेडरेस्ट, बाळंतपणात उद्ध्भवलेल्या समस्यांमुळे खालावलेली तब्येत, मूल प्रीमी असणे किंवा त्याच्या तब्येतीचे प्रॉब्लेम, घरातील वडिलधार्‍या माणासांचे आजारपण वगैरे अनेक कारणासाठी स्त्रीला नोकरी सोडायची वेळ येऊ शकते. नोकरीत गॅप आल्यावर सर्वच क्षेत्रात लगेच नोकरी मिळतेच असे नाही.
सगळं खरं. परदेशातल्या अडचणी या भारतातल्या अडचणींपेक्षा वेगळ्याही असतात. कायद्याने, विस्कळीतपणाने माणसाचे हात बांधले जातात. तरीही यातील अधोरेखीतांतून मी स्वतः गेले आहे. नोकरीत २ वर्षे आणि ५ वर्षे अशा गॅप्स आहेत पण जेव्हा नोकरी पुन्हा स्वीकारायची ठरवली तेव्हा हातात पडेल ती करेन असा स्टँड घेतला. निदान चारचौघांत वावरायची सवय सुटली आहे ती तरी पुन्हा येईल असा विचार केला. लाइन बदलली. परिस्थिती बदलत असते, दिवस बदलत असतात. मुले मोठी होतात. तब्येत सुधारते. माणसाचे निर्णय बदलतात. घरी बसणार्‍या बायकांना कमी लेखणे हा सांगण्याचा हेतू नाही किंवा त्यांना हसण्याचाही हेतू नाही. कारण मी स्वतः गृहिणीची भूमिका व्यवस्थित केली आहे आणि नवर्‍याच्या बळावर. भीती याची वाटते की समजा संसारातले एखादे चाक अवेळी मोडले तर कुटुंबाची काळजी कोण घेणार? त्यावेळी बाईच्या हातात नोकरी नसेल तर निर्माण होणारे प्रश्न अधिक गंभीर असतील. प्रश्न अडचणी आहेत म्हणून नोकरी न करण्याचा निर्णय घेतला हा नाही. जर नोकरी करायची इच्छा असेल आणि तरीही करता येत नाही हा आहे. अडचणी तर सर्वच बाबतीत असतात. म्हणून पुरुष नोकरी सोडून घरी बसत नाहीत. हा त्याग बाईलाच करावा लागतो. मग मुलांना आईची गरज असते/ घरातली बाई चांगली काळजी घेऊ शकते अशा सबबी पुढे केल्या जातात. जेथे इच्छा असते तेथे मार्ग असतो अन्यथा, अनेक सबबी आणि कारणे पुढे करता येतात असे म्हणेन. (बाईला पुढे करता येतात असे म्हणायचे नाही. कुटुंब पुढे करते.) नोकरी करायची की नाही हा निर्णय बाईचा हवा एवढेच सुचवायचे आहे.
तेव्हा सरसकट सगळ्यांना एका मापात मोजणे योग्य नाही.
१००% मान्य. कुटुंबांच्या गरजा वेगवेगळ्या असतात परंतु 'बाईने नोकरी सोडून घरी बसावे' याखेरीज किती कुटुंबे वेगळा मार्ग स्वीकारतात. असे किती कुटुंबात दिसते की नवरा म्हणतो आपण दोघे पार्टटाईम नोकरी करू आणि काही दिवस तू घरी रहा, काही दिवस मी घरी राहतो. किंवा तू संध्याकाळी नोकरी कर पण पायावर उभी रहा. एखाद्या केसमध्ये तरी नवरा घरी बसला - निदान आपल्या आई वडलांची काळजी घ्यायला असे दिसले का? तेव्हा समानता हा शब्द वापरला तरी समानतेपासून अद्याप आपण दूर आहोत असे आहे.

In reply to by प्रियाली

स्वाती२ Tue, 01/11/2011 - 20:59
जर का नवरा हा अधिक कमावणारा असेल आणि बर्‍याच ठिकाणी तसेच असते अशा वेळी आर्थिक दृष्ट्या त्याचे नोकरी सोडणे हे अव्यवहार्य असू शकते. पार्ट टाईम नोकरी करू हे म्हणायला सोपे आहे पण बरेचदा त्या बरोबर हेल्थ इंन्श्युरन्स सारखे बेनीफिट घालवणे परवडणार नसते. इथे तर नाहीच नाही. तिच गोष्ट काही दिवस तू काही दिवस मी ची. यातील बर्‍याच गोष्टी नवरा-बायकोला कितीही मान्य असल्या तरी व्यवहारात उतरवताना इतर बरेच फॅक्टर्स आड येतात. ज्या ठिकाणी साबाटिकल घेता येते अशा ठिकाणी बरेचदा नवरा-बायको हे करतात. आजही कामाच्या ठिकाणी पुरुषाने मुलाला बरे नाही म्हणून रजा मागितली तरी भुवया उंचावल्या जातात. गेल्या वर्षी अशाच एका माणसाला माझ्या नवर्‍याने मूल आजारी आहे म्हणुन कॉल इन करु दिले तर लिंगभेद विसरुन सगळे कावले होते. सगळ्यांचे म्हणणे त्याच्या बायकोने रजा घ्यावी असे होते. त्याच्या बायकोची महत्वाची मिटिंग आहे त्या मुळे तिला घरी रहता येणार नाही असे माझ्या नवर्‍याने सांगितल्यावर 'मला नसते जाववले आजारी पोराला सोडून' म्हणणार्‍या बायकाच होत्या. एका बाईला ब्रेस्ट मिल्क कलेक्ट करण्यासाठी वेळेची सवलत दिली होती तेव्हाही अशाच कटकटी. शेवटी माझा नवरा तेवढा वेळ तिच्या जागी लाईनवर कामाला उभा राहिला तेव्हा लाज वाटून साळकाया गप्प झाल्या. आता अशा वेळी कुणाला मुक्त करायचे हा प्रश्न येतोच.

In reply to by स्वाती२

रेवती Tue, 01/11/2011 - 22:04
स्वाती२ आणि प्रियालीतै, दोघी म्हणतात ही सत्यपरिस्थिती आहे. मुलांच्या तब्येतीच्या प्रश्नामुळे नोकरी न करता (असलेली सोडून) घरी रहावे लागते हे खरे. गॅप पडल्याने पुन्हा नोकरी मिळण्यास प्रश्न येतात. तोपर्यंत आजूबाजूच्यांनी तरी गप्प बसावं पण तेही काहीबाही बोलत राहतात. पण नंतर काही काळाने प्रश्न सुटल्यावर नोकरीसाठी प्रयत्न करता येतात जे अमेरिकेत (बाकिच्या देशांबद्दल माहीत नाही) बर्‍याच प्रयत्नांनंतर का होइना शक्य होते. भारतात मात्र बरेच अवघड जात असावे हे माझ्या मामेबहिणीच्या अनुभववरून वाटत आहे. माझा अनुभव हा मुलाच्या आजारपणाचा आहे व नोकरी (पार्टटाईम) मिळण्यास त्रास सध्या होतो आहे. नातेवाईकांचे बोलणे मनावर न घेण्याइतकी निर्लज्ज मी झाले आहे.;) अगदी रोजच्या भेटण्यातल्या मैत्रिणीही आडून बोलतात तेंव्हा नेहमीच खंबीर राहणे जमत नाही. कधीतरी मनाला खूप लागते पण ते चालायचेच. या सगळ्यात नवर्‍याची साथ असणे मात्र अतिशय महत्वाचे. सुदैवाने मला त्याबाबत तक्रार करायला फारशी जागा नाही. माझ्या उच्चशिक्षित नणदेलाही नोकरी सोडून मुलांची काळजी घेण्यासाठी घरी रहावे लागते आहे. पण तिचा मोठ्या पोस्टवर असलेला नवरा, त्याचे काम करण्याचे राज्य, तिथली राजकिय परिस्थिती, कामे करून घेण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची गुंडांची मनोवृत्ती (गुंडांना हाताशी धरून काम करवून घेणारे मोठे लोक) या सर्वांमुळे मुलांची सुरक्षितता हा मोठा प्रश्न बनला आहे. मुलांना शाळेत सोडणे, आणणे, बाजार या सगळ्यासाठी दोन अंगरक्षक नेहमीच असतात. तरीही जमेल ती समाजसेवा ती नेहमी करताना दिसते. तिला वाईट वाटत असावे पण या बाबतीत इलाज नाही.

In reply to by रेवती

गॅप पडल्यावर परत नोकरी मिळवणं कठीण असावं याची मला कल्पना आहेच आणि कदाचित आज मी सुपात आहे या बद्दल मी पण मनाची तयारी करत आहे.
तरीही जमेल ती समाजसेवा ती नेहमी करताना दिसते. तिला वाईट वाटत असावे पण या बाबतीत इलाज नाही.
रेवतीताई, स्वतःचं काहीतरी ती करते आहे, स्वतःसाठी काहीतरी जागा निर्माण करते आहे, मुळीच वाईट वाटण्याचं कारण नाही. प्रियाली म्हणते त्याप्रमाणे उलट परिस्थिती (स्त्री मोठ्या पदावर आणि तिचा नवरा मुलांच्या सुरक्षिततेसाठी नोकरी सोडून त्यांची देखभाल करतो आहे) असं दिसणं कठीण सध्यातरी आहे. पण प्रियाली, माझा प्रश्न असा आहे की स्त्रियांनी नोकरी करणं, घराबाहेर काहीतरी स्वतःची जागा निर्माण करणं हे सगळं किती जुनं आहे? भारतात साधारण ५० वर्ष, अमेरिकेत ~ २००? म्हणजे हा टू-बॉडी (किंवा मल्टी-बॉडी) प्रश्न तुलनेने नवा आहे आणि प्रचलित पुरूषप्रधान (किंवा मुख्य कमावणारा पुरूषच) संस्कृती काही हजार वर्ष जुनी आहे. या बाबतीत अजून समानता नाहीच आहे, पण ती निर्माण व्हायला पुरेसा कालावधीही झाला नाही आहे असं मला वाटतं. किती वर्ष/पिढ्या लागतील माहित नाही पण भारतातच बघायचं तर स्त्रियांची फारतर तिसरी पिढीच नोकरी करणारी असेल. स्त्रियांची पैशांसाठी नोकरी इथपासून ते करियरसाठी नोकरी यासाठी ५० वर्ष लागली तर कुटुंबप्रमुखपद स्त्रीकडेही दिसण्यासाठी आणखी काही काळ नक्कीच जावा लागेल. स्पेशल नीड्स असणार्‍या मुलासाठी ले-ऑफ नंतर नोकरी न धरणारी एक आई भेटली; कदाचित अजून काही वर्षांनी तिलाही जबाबदारीची नोकरी करता येईल अशी परिस्थिती निर्माण होईल. पण तोपर्यंत ती स्वतः, मुलाच्या केसवरून अभ्यास करते आहे, स्वतःचा नृत्याचा छंद जोपासत आहे. तिच्यासाठी शुभेच्छांव्यतिरिक्त माझ्याकडे प्रचंड आदर आहे. ऋ आणि स्वातीताई यांचे प्रतिसाद आवडले.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रियाली Tue, 01/11/2011 - 22:57
प्रश्न कुटुंबप्रमुखपद हवे किंवा जुने-नवे असा नाही. माझ्यामते स्त्रियांनी आपल्या पायावर उभे राहणे महत्त्वाचे आहे. याचे एक कारण विभक्त कुटुंब पद्धती असेही मी म्हणेन. पूर्वी घरातला कमावता मुलगा मेला तरी त्याच्या विधवेचे आणि मुलांचे संगोपन करण्यास कुटुंबातील इतर माणसे तयार असत. आता ही परिस्थिती बदलली आहे.
स्पेशल नीड्स असणार्‍या मुलासाठी ले-ऑफ नंतर नोकरी न धरणारी एक आई भेटली; कदाचित अजून काही वर्षांनी तिलाही जबाबदारीची नोकरी करता येईल अशी परिस्थिती निर्माण होईल. पण तोपर्यंत ती स्वतः, मुलाच्या केसवरून अभ्यास करते आहे, स्वतःचा नृत्याचा छंद जोपासत आहे. तिच्यासाठी शुभेच्छांव्यतिरिक्त माझ्याकडे प्रचंड आदर आहे.
ही बाई जे करते ते उत्तमच आहे आणि आदरणीय आहे. मी कुठल्याही पद्धतीने त्याला नावे ठेवत नाही. प्रश्न उद्भवतो जेव्हा काही कौटुंबिक कारणांसाठी बाई नोकरी सोडून बसली आणि नंतर कुटुंबात काही वाईट झाले तर तिने कुठे बघायचे? एक उदाहरण पाहिले - एका अतिशय श्रीमंत घरात पडल्याने आमच्या ओळखीतल्या एका मुलीने नवर्‍याच्या स्टेटसला शोभा देत नाही म्हणून नोकरी सोडली. नोकरीची गरज नव्हतीच. भल्या मोठ्या घराची निगा राखायला, आजारी सासूची काळजी घ्यायला वगैरे बायको होती. कालांतराने सासू वारली पण दोन मुले झाली. मुलांचे संगोपन करण्यात वेळ निघून गेला. नंतर नवरा बायकोचे पटेना. नवर्‍याचा बाहेरख्यालीपणा बाहेर आला. तो नाद सोडून द्यायची शक्यता शून्य आहे हे कळल्यावर ही बाई त्याला सोडून आली कारण मुलांना घेऊन सोबत राहणे कठिण झाले होते. आता परिस्थिती अशी आहे की मुले श्रीमंतीला सरावलेली आहेत, त्यांच्या शाळेच्या फी जबरदस्त आहे. मुलगी माहेरची सर्वसाधारण आहे. तिला नोकरी नाही. नवरा विचारत नाही. सर्वच त्रांगडं झालं आहे. म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे की आपली इच्छा असेल तर नोकरी करावी. काही वेळेस नोकरी करणे अशक्य असू शकते पण शक्य असल्यास अवश्य करावी. ती करताना आता पैसे फारसे वाचत नाहीत, दगदग होते हे सर्व खरे असते परंतु भविष्याचा विचार करून तरी करावी.

In reply to by प्रियाली

पैशाचा लोभ चांगला असेल/नसेल, तरीही जगण्यासाठी पैसा लागतोच तेव्हा शक्य असेल त्या सर्व परिस्थितीत प्रत्येक सज्ञान माणसाने स्वतः आणि आपल्यावर अवलंबून लोकांपुरते पैसे कमावावेत याला सहमती आहेच.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चित्रा Wed, 01/12/2011 - 00:09
जगण्यासाठी पैसा लागतोच तेव्हा शक्य असेल त्या सर्व परिस्थितीत प्रत्येक सज्ञान माणसाने स्वतः आणि आपल्यावर अवलंबून लोकांपुरते पैसे कमावावेत याला सहमती आहेच. ह्याच्याशी सहमत. पण यामुळे एक गंमत होते. आपल्यावर अवलंबून असलेल्या लोकांपुरते पैसे कमावणे ही गोष्ट अमेरिकेत तरी सोपी नाही. अमेरिकेत आलेल्या पुरुषांनाही राहणीमान उत्तम ठेवण्यासाठी आपली इंजिनीअरिंगची करिअर सोडून देऊन अधिक पैसा मिळवण्यासाठी दुसर्‍या करिअरची (सॉफ्टवेअर, मॅनेजमेंट) वाट धरावी लागली, असे दिसते. वरचा मुद्दा - मग एम.बी.बी. एसची सीट का वाया घालवली, हा बाद होतो. डॉक्टरीलाही नंतर मिळणारा पैसा बराच आहे, पण त्यासाठी लागणारी उमेदवारीची वर्षे बरीच आहेत. शिवाय आज जे प्रोफेशन बक्कळ पैसा मिळवून देणारे आहे, ते उद्या तसेच राहील असे नाही. तरी स्वाती२ म्हणतात तशी घरातून पैशाने स्वतंत्र असण्याचीही अपेक्षा असतेच. आजकालचे हे पैशावर चालणारे जग आणि त्यात वाटचाल करीत असताना आपले डोके शांत राखणे हे म्हणजे खरे तर महान तपस्येसारखे आहे! आदर्श (आयडिअल) अशी गोष्ट होईल की हा निर्णय म्हणून जवळच्यांनी एकत्र घ्यावा, आणि कुटुंबापुरते निर्णय घ्यावे. आणि त्याचे परिणाम भोगण्याची तयारी ठेवावी. पण मुक्ततेची केवळ पैशाशी सांगड घालणे योग्य ठरणार नाही. पैसा आहे म्हणून मुक्ती मिळते असे नाही, पण पैशाने काही गोष्टी सोप्या नक्कीच होतात त्यासाठी तो मिळवावा, एवढेच.

In reply to by स्वाती२

वाहीदा Tue, 01/11/2011 - 20:17
त्यात सासरची माणसे 'बसून खाते' वगैरे म्हणायची. हे वाक्य जरा अतिच आहे . तु खंबिरपणाने घेतले हे खुपच छान !

सखी Tue, 01/11/2011 - 20:45
चित्रा, वर ब-याच जणांनी म्हटल्याप्रमाणे संयत, संतुलित लेख आवडला. वरचा स्वाती२ यांचा प्रतिसादही आवडला, पटला. मला वाटते कळीचा मुद्दा हा आहे की मदतीचा हात असणे आणि हक्काने ती मदत मागु शकणे. सगळ्यांनाच असे पर्याय असतातच असे नाही. वरती उच्चशिक्षण घेऊन घरी का बसायचं? हा प्रश्न बराच चर्चिला गेला आहे. जसं अदिती म्हणते की त्याने एखाद्याला ओपन सीट मिळाली असती, हे ही खरं असलं तरी प्रत्येक वेळेस घटस्फोट हे ही सरसकट सगळ्यांना उत्तर होऊ शकत नाही. ब-याचदा आपल्या आयुष्यातील अग्रक्रम (priorities ?) बदलतात. लग्नाआधी मुख्य ध्येय स्वतःचे शिक्षण, नोकरी-रोजगार याकडे असते, लग्नानंतर - मूख्य म्हणजे मुलं झाल्यावर ते prioritiy ठरतात, परत स्वतःचे किंवा घरातील एखाद्या व्यक्तीचे आजारपण आल्यास, अजुन गुंतागुत व ताण. तसेच इन्द्रा यांनी म्हटल्याप्रमाणे जर घरातल्या गृहिणींना नंतर येऊन सुद्धा नव-याला चहा वगैरे आणुन द्यावा लागतो. यावर तसे पटवुन पटवले व कामाची विभागणी सामंजस्याने केली तर चांगलेच पण जर समोरच्या माणसालाच पटवुन घ्यायचे नसेल तर झोपेचे सोंग घेतलेल्याला कसे जागे करणार? याबाबतीत चहासारखी साधी मागणी करणा-या माझ्या माहीतीतल्या बायका, मैत्रिणींची आक्रस्ताळ्या म्हणून संभवाना होते.

In reply to by सखी

".....पण जर समोरच्या माणसालाच पटवुन घ्यायचे नसेल तर झोपेचे सोंग घेतलेल्याला कसे जागे करणार? ...." ~ वर रेवती यानीही "चहासारख्या साध्या गोष्टीबाबत स्त्रीने नवर्‍याला पटवून दिले पाहिजे..." असा एक योग्य आणि समंजसपणाचा विचार मांडला होता...त्याला उत्तर काय द्यावे या विचारात असतानाच आत्ताच हा सखी यांचा प्रतिसाद वाचला. "झोपेचे सोंग..." परफेक्ट ! काय लिहू या पुढे मी आमच्या मेव्हण्याविषयी इथे ज्यादाचे ?? इथे जातीचा विचार खरेतर यावयास नकोय, पण तरीही केवळ अपरिहार्यता म्हणून उल्लेख करतो की, आम्हा 'मराठा' समाजातील, जो प्रामुख्याने पुरुषप्रधान आहे, व्याखेत 'पुरुष' म्हणजे कर्ता आणि 'स्त्री' ने त्याच्यासाठीच जन्मायचे असा अलिखित संकेत आहे. वरील बरेचसे (स्त्री वर्गाचे) अनुभवाचे बोल वाचल्यावर एक बाब प्रकर्षाने जाणवते ती ही की, ब्राह्मण कुटुंबातील स्त्री ही आपल्या शिक्षणाच्या बलावर (तसेच 'अर्निंग हॅण्ड' या बोनस स्ट्रेन्ग्थच्या साहाय्याने) आपल्या अधिकाराविषयी विशेष रुपाने जागृत असते आणि वेळ पडल्यास नवरोबाच्या 'अरे' ला, 'का रे' असे ताडदिशी उत्तर देऊ शकते. पण मराठा स्त्री, त्यातही ती जर एकत्र कुटुंबात वाढली असली तर ज्यादाच, नवरा नावाच्या झाडाला पिंगा घालतच राहते. कारण 'लोक लाज के खातीर' ! जी स्त्री पाच आकडी वेतन घरी आणते तिलाच जर रोज सकाळी उठून कणीक मळायला लागत असेल तर कोणत्या तोंडाने ती स्त्री मुक्तीच्या गोष्टी करेल. एकदा कळवळुन मी तिला, सासुबाईना सांगून एखादी बाई कामाला ठेव असे सुचविले तर तिचे उत्तर होते, "असू दे, तुझ्या भावोजीना माझ्याच हातचा स्वयंपाक चांगला लागतो." काय बोलायचे या उत्तरासमोर? हा आम्हा बहीणभावाचा संवाद चालू असताना शेजारच्या खोलीत मि.नवरा नावाचा थोर प्राणी म.टा.चा अग्रलेख वाचत समाजातील विविध क्षेत्रात असलेल्या असमानतेबाबत गंभीरपणे विचार करीत बसला होता. इन्द्रा

अडगळ Tue, 01/11/2011 - 21:38
देवळात गेलो होतो मधे तिथं विठ्ठल काही दिसेना रख्माय शेजारी नुसती वीट मी म्हणालो राह्यलं रख्माय तर रख्माय कुणाच्या तरी पायावर डोक ठेवायचं पायावर ठेवलेलं डोक काढून घेतलं आपल्याच पुढं मागं लागेल म्हणून आणि जाता जाता सहज रख्मायला म्हणालो विठू कुठे गेला दिसत नाही रख्माय म्हणाली कुठ गेला म्हणजे उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला मी परत पाहयल खात्री करून घ्यायला आणि म्हणालो तिथं कोणीही नाही म्हणते नाकासमोर बघण्यात जन्म गेला बाजूचं मला जरा कमीच दिसत दगडासारखी झाली मान अगदी धरली बघ इकडची तिकड जरा होत नाही कधी येतो कधी जातो कुठे जातो काय करतो मला काही, काही माहिती नाही खांद्याला खांदा भिडवून नेहेमी बाजूला असेल विठू म्हणून मी पण बावळट उभी राहिले आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहेमी मला कधीच कस कुणी सांगितलं नाही आज एकदम मला भेटायला आले अठ्ठावीस युगांचे एकटेपण. -अरुण कोलटकर.

नितिन थत्ते Tue, 01/11/2011 - 22:13
वर काही ठिकाणी स्त्रियाच स्त्रियांच्या शत्रू अशा अर्थाचे काही प्रतिसाद आहेत म्हणून एक विचार. सासू-सून किंवा जावा-जावा या नात्यांमध्ये जो तणाव दिसतो तो त्या एकमेकींच्या शत्रू असतात म्हणून हे मान्य नाही. तो कुटुंबांतर्गत पॉवर पॉलिटिक्सचा भाग आहे. आणि सत्तेला (कुटुंबप्रमुखाला) प्रसन्न करून घेण्याचा भाग आहे. सासू आणि मोठी जाऊ यांना आधीपासून त्या घरात रहात असल्याने सत्तेशी जवळीक करण्याची अधिक संधी असते. आणि त्या नव्या सुनेशी/जावेशी त्या प्रकारे वागून (कुटुंबाची काळजी केल्याचे दर्शवून) सत्तेला आवडेल असे वर्तन करीत असतात. (मुद्दा स्पष्ट होत आहे की नाही याबाबत साशंक आहे) समांतर उदाहरण द्यायचे तर एखाद्या बिल्डिंगच्या गेटपाशी टॅक्सी उभी राहिली की तिथला दरवान टॅक्सीवाल्यावर गुरकावतो आणि टॅक्सी हटवायला सांगतो. येथे ती टॅक्सी उभी राहू नये ही दरवानाची इच्छा नसून त्या बिल्डिंगच्या मालकाची इच्छा असते. आणि मालकाला हवे तसे वर्तन दरवान करीत अस्तो. दिसताना दरवान हा टॅक्सीवाल्याचा शत्रू असावा असे चित्र दिसू शकते. ----- लग्न करायच्या वेळी "नोकरी करणार का?" या प्रश्नाचे अनेक मुलींनी "तुम्ही म्हणाल तसे" असे उत्तर दिल्याचे आठवते. -----

In reply to by नितिन थत्ते

प्रियाली Tue, 01/11/2011 - 22:34
पावर पॉलिटिक्स +१ आणि हे होत असताना पुरुष नावाचा प्राणी बर्‍याचदा वाळवंटातल्या वादळात मान धडात खुपसून डोळे बंद करून घेणारा उंट बनणे पसंत करतो. ;)

In reply to by नितिन थत्ते

श्रावण मोडक Tue, 01/11/2011 - 22:47
मुक्ती म्हणजे स्त्री-पुरूष यांच्यात लिंगसापेक्ष भेद नसणे या अर्थी समता असणे असे मानून, स्त्रीच स्त्रीची शत्रू यातील वैमनस्यभाव खोडून काढताना कुटुंबातले पॉवर पॉलिटिक्स हे मान्य केले, तर त्या कुटुंबातील संदर्भचौकटीत स्त्रीमुक्तीची गरज संपत तर नाही? कारण असा सत्तासंघर्ष करू शकणारी स्त्री सक्षम आहे, असेही म्हटले जाऊ शकेल. रादर, अनेकदा आदिवासी समाजाची उदाहरणे भोळसटपणे देताना असे दाखले येतातही. मुळात, 'स्त्रीच स्त्रीची शत्रू' यातील शत्रू हा शब्द रूढ अर्थाने (वैमनस्यभावी) वापरलेला आहे का? की तो एक प्रकारे रुपकाच्या स्वरूपात योजला आहे?

In reply to by श्रावण मोडक

नितिन थत्ते Tue, 01/11/2011 - 23:05
>>सत्तासंघर्ष करू शकणारी स्त्री सक्षम आहे, असेही म्हटले जाऊ शकेल. ती सत्तासंघर्ष करीत नसून सत्तेला आवडणारे वर्तन करत असल्याचे दर्शवून सत्तेशी जवळीक करण्याचा प्रयत्न करीत आहे.

In reply to by नितिन थत्ते

शिल्पा ब Wed, 01/12/2011 - 00:25
लग्न करायच्या वेळी "नोकरी करणार का?" या प्रश्नाचे अनेक मुलींनी "तुम्ही म्हणाल तसे" असे उत्तर दिल्याचे आठवते. हे नेमकं कशासाठी हे समजलेले नाही...कदाचित चांगला कमावणारा वगैरे मुलगा हातचा जाऊ नये म्हणून असेल... पण जर लग्नाआधीच कोणी असे बंधन घालायला बघत असेल तर लग्नानंतर काय परिस्थिती होईल याचा विचार लोक करत नाहीत....मुलीच्या समाधानासाठी तिने नोकरी केली तर काय हरकत आहे? पण ...मुलाची आई / वडील वगैरे लोक तसेच मुलीकडचे लोक ते सांगतील तसं करचा दबाव आणत असतात...विशेष करून उच्चशिक्षण नसलेल्या मुलीवर...कारण काय? एकतर मुलीला शिकवायला नाही म्हणायचे आणि वर मग शिक्षण कमी म्हणून वाट्टेल ती तडजोड कर म्हणून सांगायचे... सगळ्यांना फाट्यावर मारा आणि स्वतःवर विश्वास ठेवा....असेही झगडायचे तसेही झगडायचेच...बाहेरचे लोक फक्त गप्पा हाणणार मदत करणार नाहीत...काय उगा कोणालाही महत्त्व द्या.

In reply to by शिल्पा ब

पंगा Wed, 01/12/2011 - 03:49
सगळ्यांना फाट्यावर मारा आणि स्वतःवर विश्वास ठेवा....असेही झगडायचे तसेही झगडायचेच...बाहेरचे लोक फक्त गप्पा हाणणार मदत करणार नाहीत...काय उगा कोणालाही महत्त्व द्या.
हे आवडले! (तूर्तास एवढेच.)

चित्रा Wed, 01/12/2011 - 02:52
धन्यवाद, या चर्चेत आपले व्यक्तिगत अनुभव सांगितल्याबद्दल, चर्चा योग्य तर्‍हेने पुढे नेल्याबद्दल सर्वांचे आभार. एकमेकांच्या या बर्‍यावाईट अनुभवांमधूनही आपण बरेच काही शिकत असतो, याबद्दल शंकाच नाही. यशोधरा म्हणते तसा मुक्तता ह्या शब्दावरून माझ्याही मनात काही वर्षे गोंधळ होता. (जन्मतः मुक्त असलेल्या व्यक्तीलाच कसे अजून मुक्त करणार?) पण १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण गुलामीची भावना होऊन ते स्वातंत्र्य मिळवायला वेळ लागलाच. हेच लहान प्रमाणांवर मागासलेल्या जातींचे, समाजांचे आणि त्यातील घटकांचे होत असावे. तेव्हा तुम्ही मुक्ती हा शब्द वापरा, अगर वापरू नका, दुर्बळ घटकांचे सक्षमीकरण ही कल्पना हवे तर म्हणा. अर्थ तोच आहे. समाजापासून (पुरुष, मुले, नातेवाईक, मित्र) मुक्ती, फटकून वागता येणे हा अर्थ नव्हता, असू नये. पण सक्षम होण्याची इच्छा, संधी, आणि त्यासाठी पोषक साधने ही मात्र सर्वांना मिळावी. नगरीनिरंजन म्हणतात ते या दृष्टीने अगदी पटते की "स्त्रीमुक्तीवर चर्चा करणार्‍या स्त्रियांपैकी एकीलाही आपण मुक्त नसल्याचा न्यूनगंड नसेल तर ती स्त्रियांना बळ देण्याच्या गप्पा न करता कोणत्याही दुर्बळ अन्यायग्रस्ताला बळ देण्याचीच भाषा करेल". मी यात फक्त एवढेच म्हणेन की सुरुवात ही ज्याबद्दल प्रीती आहे, मनापासून चीड आहे, अशा गोष्टींपासून झाली तर ती झेपत असावी/पेलता येत असावी. समारोपादाखल - अजूनही समानतेजवळ आपण पोचलो नाही, याबद्दल बहुतेकांना संशय नसावा. केवळ हर्षद यांनी या चर्चेत भाग घेतलेल्या व्यक्तींपेक्षा फारच वेगळे विचार मांडले आहेत असे वाटले. त्यांच्याही आजूबाजूच्या निरीक्षणांबद्दल मला संशय घ्यायचा नाही, पण असे नक्की वाटते की त्यातून चुकीचे निष्कर्ष काढले जात आहेत. काही स्त्रियांच्या वर्तनामुळे किंवा काही विवक्षित प्रकारच्या वृत्तपत्रीय लेखनामुळे या चळवळीकडे बघण्याचा दॄष्टीकोन डागाळला, तरी त्यासाठी अशा विचारांनाच चुकीचे किंवा झाले तेवढे परिणाम पुरे असे म्हणणे हे योग्य ठरणार नाही. प्रियालीने मांडलेला विचार - स्त्रीने कुठच्याही वाईट परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या सक्षम असण्याची गरज आहे - महत्त्वाचा आहे. पण हे सर्व करीत असताना आपण जो चाकोरीतला विचार करत असतो तो कधीतरी सोडावा लागेल, त्याचीही तयारी ठेवावी लागेल. कुटुंबसंस्थेचाही विचार नव्याने, वेगळा करावा लागेल. या चर्चेत काहीजण (आणि काही विचार) सहभागी झाले नाहीत याची जाणीव आहे. चर्चा एकाच अंगाने जाते आहे असे काहींना वाटलेही आहे/असावे. अशांनीही आपली मते मांडायला काहीच हरकत नाही/नव्हती.. आता या चर्चेत बरेच प्रतिसाद झाल्याने कोणाला वेगळा काही विचार मांडण्यासाठी नवीन चर्चा सुरू करायची असली तर तीही करावी. परत एकदा सगळ्या प्रतिसादकांचे आभार.

आजानुकर्ण Wed, 01/12/2011 - 09:48
या संदर्भात एक बाजू मांडणारा वाचनीय लेख येथे http://www.martynemko.com/articles/men-as-be%E2%80%8Basts-burden_id1228

विजुभाऊ Wed, 01/12/2011 - 10:59
चित्राताई फारच संयमित संतुलीत लेख. तुमची जशी परिस्थिती होती तशीच माझ्या आईची होती. ऑर्थोडॉक्स एकत्र कुटुंबातून नन्तर विभक्त झाल्यावर आईने शिक्षणाची इच्छा पूर्ण केली. माझा एक चुलत भाऊ आणि माझी आई हे एकाच वर्षी बी ए ची परीक्षा देत होते. चुलत भाऊ नापास झाला त्याच्या त्या गोष्टीचे घरातल्या सर्वानी चुलत भावाला दुकानात काम असते म्हणून अभ्यास करता आला नाही हे समर्थन दिले माझ्या आईला काय फक्त घरकामच करायचे होते असे म्हणायचे. माझ्या वडीलानी जमेल तसे आईला प्रोत्साहन दिले. माझ्या पत्नीला मी लग्नानन्तर पोस्ट ग्रॅज्युएट कर म्हणून बरेचदा सांगून पाहिले. तुझा शिक्षणाचा उपयोग कर. पण ती देखील ऑर्थोडॉक्स गुजराती कुटुंबात वाढलेली आहे. तीला स्त्रीने घर संभाळले पाहिजे हे बाळकडू पाजण्यात आलेले आहे. ती स्वतःच त्या कोषातून बाहेर येण्यास तयार नाही. पण माझे नातेवाईक , मित्र वगैरे कोणी घरी आले तर ती त्यांचे आदराअतिथ्य खूप आनन्दाने करते. घरकाम करणे हे कमीपणाचे नाही पण स्वतःच्या हुशारीचा उपयोग न करणे हे योग्य नव्हे. कोणीतरी वर मुलीने केलेल्या जोड आडनावाच्या सहीचे उदाहरण दिले आहे. त्या मुलीने स्वतःची सही बदलायची नाही असे ठरवले असते तर तीचा नवरा फार कुरकुरण्याव्यतीरीक्त फारसे काही करु शकला नसता. पण तीने ठाम नाही संगितले असते तर फारसे काही बिघडले नसते. तिच्या नावाचा निर्णय नवर्‍याला करायला तीनेच परवानगी दिली. आणि स्वतः जोपासलेल्या प्रतिमेला तडा दिला. मुली लग्नानन्तर त्यांचे नाव बदलण्यास का परवानगी देतात? तसे करून त्या स्वतःची ओळख स्वतःच पुसून टाकतात. याबात कस्तुरबा गांधींचे उदाहरण फार बोलके आहे. मिस्टर गांधीनी त्याना मांसाहार करावयास सांगितला त्यानी त्यास ठाम नकार दिली. मिस्टर गांधी फारसे काही करू शकले नाहीत. हे एक साधे उदाहरण. म.गांधी नी त्यावरून एक शिकवण घेतली तुमच्या परवानगीशिवाय तुमचा आत्मसन्मान कोणीच हिरावून घेउ शकत नाही.

In reply to by विजुभाऊ

पक्या Wed, 01/12/2011 - 13:59
>>त्या मुलीने स्वतःची सही बदलायची नाही असे ठरवले असते तर तीचा नवरा फार कुरकुरण्याव्यतीरीक्त फारसे काही करु शकला नसता. थोडीफार कुरबूर हि सभ्य सुसंकृत घरात होत असावी. पण अशी कितीतरी घरे असतील, आहेत (सुशिक्षितांची ही) जिथे विरोध केला की त्या स्त्रीविरुध्द बळाचा वापर होतो. काही उदाहरणे तर जवळच्या माहितीतील आहेत. अशावेळी स्त्रीलाच पडते घ्यावे लागते. निमूटपणे मारहाण सहन करणे हे अयोग्यच आहे पण पोलिसात तक्रार करणे , घटस्फोट मागणे, माहेरी निघून जाणे हे ही प्रत्येक वेळी त्या स्त्रीला करणे शक्य होत नाही. ..विशेषतः मुलांची जबाबदारी अंगावर असताना. घरातले वातावरण चांगले रहावे , मुलांसमोर तमाशा नको , म्हणून नवर्‍यांचे राग सहन करणार्‍या स्त्रिया पाहिल्या आहेत. अशावेळी आर्थिक स्वातंत्र्य ही स्त्री मुक्तिची पहिली पायरी ठरावी. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या पायावर उभे रहाणे. सर्व सामन्य पुरूष जशी या बाबतीत तडजोड करीत नाहीत (जसे की आजारी आईवडीलांची काळजी घ्यायची म्हणून पुरषाने नोकरी सोडली) तशीच स्त्रीने देखील करु नये. तसे झाले तरच इतर समस्यां सोडवण्याचे मार्ग आपोआप खुले होतील. किंबहूना तशी व्यवस्था समाजात आपोआप निर्माण होईल.. जसे की डे केअर सेंटर वगैरे. चित्राताई , लेख छानच झाला आहे.

Pain Fri, 01/21/2011 - 06:13
एकांगी लेख. सोयीस्कर अपवादांचा उल्लेख केला गेला आहे. तसे उलटे अपवादही देता येतील. आदिजोशी यांनी म्हटल्याप्रमाणे "टिपीकल" नवरा हवा असतो पण टिपीकल बायको व्हायची तयारी नसते. तसेच काहींचा स्त्रियांना फक्त काही हॉटेलामध्ये एकटे गेले असता न्याहाळण्यात येते असा गैरसमज झाला आहे. मूळात लोकांनी बघावे यासाठीच फॅशन, नट्टापट्टा, ब्युटीपार्लरच्या वार्‍या केल्या जातात तेव्हा अशी तक्रार करणेच गैर आहे. जर ते खरोखरच इतके नावडते असेल तर आजपर्यंत आलेल्या एकाही लेखातील/ प्रतिसादातील तशा उल्लेखाचा/ कॄत्यांचा कधीही निषेध का नाही केला?

In reply to by Pain

मनीषा Fri, 01/21/2011 - 10:24
"टिपीकल" नवरा हवा असतो पण टिपीकल बायको व्हायची तयारी नसते. टिपीकल बायको होण्याची तयारी नसते असं म्हणण्यापेक्षा तसं होणं शक्यं नसतं असं म्हणणं जास्त संयुक्तीक ठरेल. आजकालच्या नवर्‍यांनाच टिपीकल बायको नको असते.. म्हणजे बायकोने घरातली सर्व कर्तव्य करावीतच ( सासू सासर्‍यांची , पतीची सेवा, मुलांचे संगोपन, नातेवाईक, पाहूणे इ. इ. ) पण त्या बरोबर समाजात त्याच्या बरोबरीने सगळीकडे जायला हवे, एखादी कला असेल तर उत्तमच, आणि अर्थार्जनही करावे .. पण तरीही महत्वाच्या सर्व निर्णयांचे सर्वाधिकार पतिकडेच द्यावेत अशा अपेक्षा असतात... त्या पूर्ण न झाल्यास संघर्ष होतो आणि बहूतेक वेळा स्त्रीलाच दोष दिला जातो. तसेच काहींचा स्त्रियांना फक्त काही हॉटेलामध्ये एकटे गेले असता न्याहाळण्यात येते असा गैरसमज झाला आहे. हा गैरसमज नाही .. आणि मुद्दा कोणी कोणाला न्याहळते हा नसून, आजकालच्या सो कॉल्ड मॉडर्न समाजात सुद्धा एकट्या स्त्रीला समाजात वावरताना अनेक बंधने येतात, हा आहे