मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भन्नाट २

परिकथेतील राजकुमार · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
भन्नाट १ "मी रमी, रमी चक्रवर्ती..." "आणि मी दारा बुलंद...." दाराच्या दिशेने एक आवाज गर्जत आला. फिरोजने चमकून दाराच्या दिशेने पाहिले. संपूर्ण दरवाजा झाकून दाराची भव्य आकृती उभी होती. चेहर्‍यावर एक आश्वासक हास्य चमकत होते. उभ्या राहण्यातला डौल भल्या भल्या हिरोंना झक मारायला लाविलं असा होता. तब्येतीने फिरोज देखील काही कमी न्हवता. टफ जाफर सारखे जण तो लोळवून बसला होता, पण दाराची एखाद्या किल्ल्याच्या भव्य तटबंदी सारखी मजबूत आणि कोरीव देहयष्टी पाहून फिरोज देखील वेडा झाला. "दारा बुलंद म्हणजे सामचे?" "अरे वा ! माझे नाव मुंबईपर्यंत देखील पोचले आहे तर" "फिरोज तुम्ही ओळखता यांना ?" रमीला आश्चर्य वाटणे साहजिकच होते. "ह्यांना कोण ओळखत नाही ? राजस्थानच्या प्रत्येक बहिणीच्या काळजाचा तुकडा आहे हा. ह्याच्यावरून जीव ओवाळून टाकायला साम आणि पंचक्रोशीतला माणूस अन माणूस तयार होईल. पण रमीजी तुम्ही माझे नाव कसे काय जाणता?" "सॉरी फिरोज, काल तुम्हाला ऍडमिट करताना तुमची माहिती देण्यासाठी मला तुमच्या वॉलेट मधून तुमचे लायसन्स काढावे लागले." "नो प्रॉब्लेम. पण ते गुंड तुम्हाला का पकडून नेत होते आणि दारा बुलंद अचानक तिथे कसे काय आले?" "ति एक फार वेगळीच स्टोरी आहे. माझे वडील एक शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी नुकतेच भुसुरुंग शोधणार्‍या यंत्रावर नवीनं काम सुरू केले आहे. त्याचीच काही टिपणे द्यायला ते मंदारला बरोबर घेऊन दिल्लीला गेले आहेत. त्यांना सोडून परत येत असतानाच हे घडले." "आणि मी ज्या गुंडांच्या मागे होतो ते गुंड ह्या मॅडमच्या मागे होते हा योगायोग" दारा हसत हसत म्हणाला. "पण बुलंद तुम्ही साम सोडून थेट मुंबईत कसे काय?" क्षणभरच दाराच्या चेहर्‍यावरची शीर रागाने तडतडली. मात्र त्याने पटकन स्वतः सावरले. "कोणाचा तरी शोध मला इथे घेऊन आलाय इराणी साहेब. आणि त्याला जिवंत सामला नेल्याशिवाय मला चैन पडणार नाही. " "दारा पहिल्यांदा हे साहेब वगैरे सोडा, आणि मी तुम्हाला वचन देतो की तुमच्या कामात तुम्हाला संपूर्ण यश मिळवून देण्याची जबाबदारी माझी. तुम्ही मुंबईत नवीनं आहात, त्यामुळे फिरोज इराणी हि काय बला आहे हे तुम्हाला माहिती नसेल." "वाह ! दारा बुलंद आणि फिरोज इराणी एकत्र म्हणजे संपूर्ण डिपार्टमेंटला आता सुट्टीवर जायला हरकत नाही" आवाज दाराच्या मागून येत होता. दाराने बाजूला सरकून थोडी वाट देताच उरलेल्या जागेतून कशीतरी अवघडत वाट काढत इन्स्पेक्टर दिनेश सयगल आत शिरला. "दिनेश तू दारा बुलंदना ओळखतोस?" "बाबा रे राजस्थान डिपार्टमेंटमधून सब इन्स्पेक्टर राठोड माझ्या चौकीत बदली होऊन आल्या पासून गेले ५ महिने आम्ही फक्त 'दारायणच' श्रवण करतोय." रूम मध्ये हास्याचा एकच गलका उडत असताना घाईघाईने डॉक्टर आत शिरले. "चला आता बाकीचे हास्य विनोद घरी जाऊन करायला तुम्ही आता मोकळे आहात. मिस्टर इराणी इन्स्पेक्टर साहेबांनी तुमचे स्टेटमेंट घेतले की ऑफिशली तुम्हाला इथून डिस्चार्ज मिळाला म्हणून समजा." "बुलंद तुम्ही कुठे उतरला आहात ? जर हॉटेलात उतरले असाल तर सरळ सामान उचला आणि माझ्या अपार्टमेंटवर चला. आणि प्लीज 'नको, कशाला उगाच' वगैरे शब्द ह्या फिरोजला चालत नाहीत." "तू म्हणशील तसे फिरोज !" दिलखुलासपणे हसत दारा म्हणाला. ह्या दोन मनमौजी पण गुन्हेगारांच्या कर्दनकाळ असलेल्या खुळ्यांकडे दिनेश तोंडाचा आ वासून पाहतंच राहिला. अजबच होते सगळे... आणि मुंबईसाठी तेवढेच धोकादायक. "फिरोज उंट चालवून चालवून कंटाळलो बघ, जरा तुझी फेयर डिल चालवावी म्हणतो, तुझी हरकत नसेल तर" दाराच्या मागणीकडे फिरोज आ वासून पाहायलाच लागला. "अरे असे काय बघतोस ? आय कॅन ड्राइव्ह एनी व्हेईकल. दारा बुलंद राजस्थानातल्या सामचा असला तरी तुमच्या मुंबईत काय म्हणतात ते.. हा येवढा लल्लु पंजु नाहीये बरं का" दारा डोळा मारत म्हणाला आणि आता दिलखुलास हसायची पाळी फिरोजची होती. फिरोजची फेयर डिल दुसर्‍या कोणाला चालवताना बघून 'फिरदोस अपार्टमेंटच्या गुरख्याचे डोळेच बाहेर यायचे बाकी राहिले होते. ह्या आधी असे दृश्य त्याला गेल्या ५ वर्षात कधी बघायला मिळाले न्हवते. पण फिरोजनी काहीच गुप्त इशारा केला न्हवता म्हणजे बरोबर आलेला माणूस मित्र होता, निदान विश्वासातला नक्की होता. दिनेश सयगल नंतर आज पहिल्यांदा आपलेपणाने कोणाला तरी घरी घेऊन आला होता फिरोज. आणि तो कोणीतरी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून दारा बुलंद होता. मुंबईच्या अर्ध्या ताकदीच्या जोडीला आता राजस्थानची अर्धी ताकद येऊन मिळाली होती. मुंबईच्या गुन्हेगारी विश्वासाठी आता काय वाढून ठेवले आहे ह्याची चिंता आता त्या ईश्वरालाच. दारा कौतुकाने फिरोजच्या आलिशान फ्लॅटचे इंटीरिअर पाहतं असतानाच आतून फिरोजचा प्रश्न आला, "दारा काय घेणार ?" "रॉकेल सोडून काही चालेल" दारा डोळे मिचकावत म्हणाला आणि फिरोज आतून पेट्रोलचा कॅन घेऊन बाहेर आला. दोघांच्या हास्याच्या करंज्यांनी हॉल नुसता भरून गेला. काही वेळातच दोघांची छान गट्टी जमली. १२ गावचे पाणी प्यायलेला फिरोज आणि एका नजरेत माणूस तोलणारा दारा हे एकमेकांच्या खूपच जवळ आले. मधुर, शीतल आणि बादलचेच जणू प्रतिरुप असलेला फिरोज दाराला एकदम आवडून गेला. हळूहळू फिरोजची जिवनकहाणी ऐकून तर दारा खूपच प्रभावित झाला. थापांचा बादशहा फिरोज देखील दाराच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झालाच होता. हळूहळू दार खुलायला लागला आणि बाटली रिकामी व्हायला लागली. "दारा तू मुंबईत कसा काय? कोणाला शोधतो आहेस?" "मिर काझी" दारा शांतपणे म्हणाल आणि फिरोज त्याच्याकडे आश्चर्याने पाहतंच राहिला. "पण दारा अरे काझी आणि मुंबईत ? अ‍ॅज पर माय क्नॉलेज मिर काझी हा राजस्थान बॉर्डरवर शस्त्रांची आणि अफूची चोरटी आयात करणारा माणूस आहे. आणि तो मुंबई सारख्या विश्वाच्या वाटेला फिरकणे शक्यच नाही." "त्याने आता मुलींची सुद्धा निर्यात सुरू केलीये फिरोज ! सामच्या चार मुली मानखेड वरून लग्नाला जाऊन परत येत असताना काझीच्या माणसांनी उचलल्या. मी आणि माझ्या साथीदारांनी चढवलेल्या हल्ल्यात त्याची २८ माणसे ठार झाली. पण काझीला कुणकुण लागली असावी, तो आदल्याच रात्री पोरींना घेऊन मुंबईला रवाना झाला होता." "दारा तुझी खात्री आहे? तो इथेच आहे? तो जर मुंबईत असेल तर ४८ तासात मी त्याला तुझ्या हवाली करीन हा माझा तुला शब्द आहे." "फिरोज तू मला फक्त एका माणसाचा पत्ता शोधून दे. तू जीव धोक्यात घालायची गरज नाहीये." "ते नंतर बघू दारा. आधी त्या माणसाचे नाव तर कळू दे." "त्याला मुंबईत काय नावाने ओळखतात मला माहीत नाही फिरोज पण आम्ही त्याला नवाब हैदर म्हणून ओळखतो. त्याने मुंबईत नवाब असल्याचे भासवून कोणाला तरी गंडा घातला आणि राजस्थानला पळून आला. त्यानेच काझीला मुंबईपर्यंत पोचायला मदत केली आहे. एकदा हा माणूस हाताला लागला तर काझी पर्यंत पोचणे फारसे अवघड नाही." "चिंता करू नकोस दारा, मी आताच दिनेशला फोन करतो आणि माझी माणसे देखील कामाला लावतो. त्यांतून तू आणि मी संपूर्ण मुंबई पिंजून काढूच." रात्री ९ च्या सुमाराला संपूर्ण तयारीनिशी जेव्हा फिरोज आणि दारा अपार्टमेंटच्या पार्किंगला आले तेव्हा मुंबईच्या काळ्या विश्वाला हळूहळू जाग यायला सुरुवात झाली होती. "गफुर चरसीचा अड्डा... तिथे नक्की काही माहिती कळेल दारा. बरेचसे राजस्थानी पंटर त्या अड्ड्यावर चिलीम ओढायला गोळा होतात." दाराने होकारार्थी मान हालवली आणि फिरोजने गाडीला वेग दिला. फिरोज दरवाज्यातून बाहेर पडत असतानाच एक पोलिस जीप आडवी येऊन उभी राहिली. जीप मधून एक इन्स्पेक्टर आणि त्याच्या जोडीला एक रुबाबदार तरुण बाहेर आले. "मिस्टर इराणी ? मी इन्स्पेक्टर ब्रिजेश लाल." ऐनवेळी पोलिस तडमडल्याने फिरोजच्या चेहर्‍यावर नाराजीची छटा उमटणे साहजिकच होते. "हे पाहा लाल साहेब मी माझे स्टेटमेंट दुपारीच दिले आहे, आणि प्लीज मी आत्ता थोडासा घाईत आहे." "मिर काझीला शोधायचे आहे का? शेजारी उभ्या असलेल्या तरुणाने हसत हसत विचारले. दारा आणि फिरोज चमकून त्याच्याकडे पाहतंच राहिले. "हे मंदार पटवर्धन, कमिशनर साहेबांचे भाचे आणि काल तुम्ही ज्यांचा जीव वाचवला त्या मिस रमी चक्रवर्तींचे होणारे पती." लालनी ओळख करून दिली. "ओह ! फिरोज आश्चर्याने म्हणाला. तुम्हाला भेटून खरंच खूप आनंद झाला मिस्टर पटवर्धन, पण तुम्ही हि माहिती येवढ्यात कुठून गोळा केलीत?" "मला सकाळी दिल्लीला पोचल्या पोचल्याच रमीचा फोन मिळाला. डॉक्टरांच्या सुरक्षेची व्यवस्था करून मी तातडीने मुंबईची फ्लाईट पकडली. दारा बुलंद ज्यांच्या मागे लागले आहेत ते गुंड रमीच्या मागे होते हे प्रकरण नक्कीच गंभीर आहे हे मी ओळखले. मी येईपर्यंत गोल्डन डिटेक्टिव एजन्सीच्या गोल्डीने रमीला वाचवणार्‍या दोघांचा संपूर्ण बायोडाटाच माझ्या समोर आणून ठेवला. त्याच्याच माणसांनी मला दारा बुलंद हे मिर काझी नावाच्या माणसाला शोधत आहेत हि बातमी मला आणून दिली." "थँक्स मंदार, तुमची मदत मिळाली तर आमचे काम सोपेच होईल. त्या काझीच्या तावडीत साम गावच्या चार मुली हाल सोसत आहेत." "चार नाही फिरोज पाच ! आज दुपारी हॉस्पिटल मधून घरी जात असतानाच रमी नाहिशी झाली आहे आणि तिच्या बरोबर असलेल्या डॅनीचा देखील कुठेच तपास लागत नाहीये." "तुझा काय विचार आहे मंदार?" "गफुर चरसीचा अड्डा?" मंदारने फिरोजकडे पाहतं विचारले आणि त्याक्षणी फिरोजने दाराकडे बघून स्मित केले. दोघांची विचार करण्याची पद्धत अगदी सहज जुळून गेली. इन्स्पेक्टर लाल तिघांकडे आळी पाळीने पाहतं असतानाच मंदारने फेयर डिलच्या मागच्या सिटवर झेप घेतली आणि फिरोजने क्षणात गाडीला वेग दिला. आजा कोणा कोणाच्या खबरी खणल्या जाणार ह्याची चिंता करत लालने जीपकडे मोर्चा वळवला. (क्रमशः)

वाचने 16646 वाचनखूण प्रतिक्रिया 38

गवि Mon, 12/20/2010 - 15:38
डेंजर आहेत तुमचे कथानायक पराभाऊ. "फेअर डील" वगैरे म्हणजे एकदम खास अर्नाळकरी सिनकरी वाटतंय. ;) "दीर्घ झुरका मारून, धूम्रवलये सोडत" वगैरे फेअरडिलला टेकून उभे वगैरे राहिलेले नायक दिसायला लागले. एकदम काळापहाड.. येऊ द्या पुढचे लवकर..

In reply to by गवि

मेघवेडा Mon, 12/20/2010 - 15:40
"दीर्घ झुरका मारून, धूम्रवलये सोडत" वगैरे फेअरडिलला टेकून उभे वगैरे राहिलेले नायक दिसायला लागले. एकदम काळापहाड.. असेच म्हणतो. पुढचे भाग लौकर येऊ द्या!

असुर Mon, 12/20/2010 - 16:03
सहीच!!! :-) परा, तू जर ही कथा (खरोखरच) कंप्लीट केलीस तर मी तुला परावळकर म्हणायला सुरुवात करणार आहे! :-) --असुर

नन्दादीप Mon, 12/20/2010 - 16:22
परा भाऊ, लवकर लवकर लिहा पुढच.. बरेच दिवस झाले, या सर्व नायका॑ची भेट झाली नव्हती. मस्त जम्लय्... जबरदस्त.....भन्नाट....

चिगो Mon, 12/20/2010 - 16:55
>>"रॉकेल सोडून काही चालेल" दारा डोळे मिचकावत म्हणाला आणि फिरोज आतून पेट्रोलचा कॅन घेऊन बाहेर आला. दोघांच्या हास्याच्या करंज्यांनी हॉल नुसता भरून गेला. मस्तच पराशेठ.. >>परा, तू जर ही कथा (खरोखरच) कंप्लीट केलीस तर मी तुला परावळकर म्हणायला सुरुवात करणार आहे! असूरभौ, आप्पून बी !! स्वालिड जमतंय पराशेठ, लगे रहो !!

स्वानन्द Mon, 12/20/2010 - 17:04
भट्टी मस्त जमायला लागली आहे... पण ३-४ भागात संपवू नको रे. किमान १० भाग हव्वेच. ( आता सगळे भाग आल्यावरच वाचणार होतास ना असे नको विचारू. कंट्रोल नाय राहिला बे :( )

श्रावण मोडक Mon, 12/20/2010 - 19:32
नो. घसरला भाग. ओळखीसंबंधातील संवाद ('अर्रे, तुम्ही यांना ओळखता' वगैरे), काही गोष्टींची प्राथमिक माहिती संवादातून देणे (अॅज पर माय क्नॉलेज...), हुकणारे (किंवा तसे वाटणारे) तपशील (राजस्थान डिपार्टमेंटचा सब इन्स्पेक्टर मुंबईत येण्याचं प्रकरण) यातून लेखनाचे वजनच घसरते आहे. त्यातून पुढे 'दम गेला' असं नको व्हायला.

In reply to by श्रावण मोडक

चिगो Mon, 12/20/2010 - 22:03
नदी पर्वतांतून खाली उतरली की तिचा वेग आणि उन्माद थोडा कमी होतोच... आताशी कथा थोडी तपशिलात जातेय, म्हणून मंदावल्यासारखी वाटत असेल. साहजिकच आहे ते.. थोडा दम खावा, पराशेठ पुन्हा उचलतात बघा..

In reply to by श्रावण मोडक

श्रामो अहो पहिल्यांदाच ह्या नायकांना वाचणार्‍यांना काय थांग पत्ता लागायला नको का ? आपण काय सु. शिं. ची कादंबरी कुठल्यापण पानापासून वाचायला लागलो तरी आपल्याला मागचे पुढचे संदर्भ लागुन जातात येवढे आपण 'सुशीमय' आहोत.

आदिजोशी Tue, 12/21/2010 - 14:35
हलकटपणा न करता पुढचे भाग पटापट टाकावे ही नम्र विनंती. आणि ह्या कथेच्या लिखाणात तुम्हाला मदत करणारे श्री श्री धमालराव बारामतीकर साहेब ह्यांना त्यांच्या "शिकार" कथेविषयी टोचणी मारावी ही पण नम्र विनंती.

चला आता अड्यावर फायटिंग सुरु होणार का? बाकीच्या नायकांशी भेट कधी होणार ? सगळ्या नायकांचे शत्रू व लक्ष्य (शिकार) एकच असणार.? का वेगवेगळे खलनायक पण त्यांच्यात काहीतरी समान धागा .? मुंबईतच सर्व काही घटना घडणार का राजस्थान व अजून कुठेतरी भन्नाट पाठलाग असणार ? कितीतरी प्रश्न पण उत्तर एकच तिसरा भाग वाट पहा .

संदीप चित्रे गुरुवार, 12/30/2010 - 03:09
पर्‍या लेका मोठं धाडस करतोयस म्हणून अभिनंदन ! आता खास पुणेरीपणा करतो ... अट्टल सुशिप्रेमी तुझा प्रत्येक शब्द नीट वाचतील आणि तपशीलाची थोडीही चूक दाखवतील :) उदा.: >> "फिरोज उंट चालवून चालवून कंटाळलो बघ, जरा तुझी फेयर डिल चालवावी म्हणतो, तुझी हरकत नसेल तर" फिरोजची 'स्पीड ब्रेक', मंदारची 'फेअर डील' आणि डॅनीची पिवळी 'पॉन्टेक' (तसाच उच्चार लिहायचे सुशि !) :) बाय दि वे -- ह्यात प्रिन्स, डॅनी, शिल्पा, मधुर, बादल, शीतल, सलोनी, रमी, मोहिनी, बॅ. दीक्षित, जज्ज केसर, इ. मुकेश, इ. दिनेश, इ. ब्रिजेश लाल ह्या सगळ्यांचा काय काय सहभाग आहे ह्याची उत्सुकता .... त्याहून मोठी उत्सुकता म्हणजे फक्त बॅ. अमर विश्वास येणार की 'रातों का राजा'चाही रोल आहे ते बघायचंय !