मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

|| दक्षिणायण ||

सुहास.. · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
डिसक्लेमर : लेखकास कुठल्याही प्रांताबद्दल तिटकारा नाही पण रस्सम-भाता ऐवजी 'चटणी-भाकरी' खावुन वाढल्याने महाराष्ट्रावर निस्सीम प्रेम आहे. भारतात आर्य होते की द्रवीड ? (नुकताच आयपीएल मधून बाद झालेला,राहुल नव्हे बरे का) हे इतिहासाचा अभ्यास केल्यावरही मला समजणार नाही, अशी खात्री मला माझ्या अतुलनीय, अफाट आणि आडमाप बुद्धीमत्ते विषयी असल्याने मी त्या भानगडीत पडत नाही, पण काही समाजमान्य थोर इतिहास अभ्यासक विचारवंत व्यक्तींशी (म्हणजे काय हो ?) चर्चा केल्यावर दाक्षिणात्य मंडळी म्हणजे द्रवीड आणि इतर भाग म्हणजे आर्य असा एक समज आहे. तो कितपत खरा आहे याची मला कल्पना नाही (आणि घेणे-देणे ही नाही.), पण त्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या रहाणीमानामध्ये प्रचंड फरक आहे हे मात्र मी खात्रीने सांगू शकतो. तसं पहायला गेलं तर अगदी १८-१९ वर्षांचा होईपर्यंत आंध्र,केरळ,कर्नाटक आणि तामिळनाडू यापैकी कोठेही रहाणारा व्यक्ती माझ्या लेखी काळा ठिक्कर पडलेला "मद्राशी" असायचा.मग थोडीशी अक्कल आल्यावर ? (स्वतःविषयी माझे बरेच गैरसमज आहेत, हा त्यातलाच एक.) त्यातील फरक समजायला लागलं. त्यात दीड-एक वर्षे गुंटूर-हैदराबाद रहाण्याचा अनुभव गाठीशी पडला आणि खस्सम हईदराबादां के चारमिनारां की, त्यातील फरक अधिक स्पष्ट व्हायला लागला. असो, या चारही प्रांतात, भाषा आणि संस्काराच्या आधारावर थोडा-फार फरक आहे.पण एकुणच सगळे प्रांत दाक्षिणात्य या सदरात गणले जातात. फरकाची सुरुवात होते ती भाषेपासून. इथली भाषा टकंणे अतिशय सोपे आहे. आपल्या मराठीतला 'ळ' घ्या त्याला आडवा करा,मग 'ह' घ्या त्याला आडवा करा. हिचं दोन अक्षरे कधी काटकोनात फिरवा, कधी ४५ अंशात तर कधी त्याला उभा, आडवा, किंवा तिरका काप मारा.तशीच ही दोन्ही अक्षरे एकमेकांमध्ये वेगवेगळं अंतर राखत एकमेकांमध्ये घूसडा.झालं टकुंन . त्याचा उच्चार तर त्याहून सोपा आहे. वेगवेगळ्या आकाराचे ऍल्युमिनिअमचं डब्बे घ्या. त्यात खडे टाका. खडे टाकलेल्या डबे जोरजोरात हलवा.जो काही आवाज येईल अगदी तोच उच्चार. दिवसभर हेच मधुर स्वर माझ्या कानपूर त नृत्य करीत असतात (आयटी मध्ये अंदाजे ६०% जनता दाक्षिणात्य या प्रकारात मोडते. बाकीची सर्व मॅनेजर या जमातीत ). एव्हाना दोन दाक्षिणात्य माणसे बोलताहेत की भांडताहेत असा मला प्रश्न पडतो. हिन्दी ही राष्ट्रभाषा नाही हे हायकोर्टानं सांगायच्या आधीपासून येथील समस्त जनतेला माहीत असावे. बंगळूरात रिक्षावाले जरा तरी हिन्दी-इंग्रजी बोलतात, पण, आपल्या आकाश-गंगेच्या बाहेर असलेल्या तामिळनाडू नावाच्या परग्रहावर तमीळ शिवाय दुसर्‍या भाषेत काही बोलल तर बहुधा अयप्पास्वामी यांची जीभ छाटून टाकत असावेत.(माफ कर रे देवा ! ) अर्थात, त्याला एक अपवाद आहे, तो म्हणजे पल्लवरम ! या बहुल-मुस्लीम भागात ऊर्दूमिश्रीत तमीळ आणि तमीळमिश्रित हिन्दी? बोलल्या जाते. जिथे हिंदीचीच ही गत आहे तिथे बाकी भाषाच काय ? बंगळूरात मात्र माझ्या डोक्याला झिणझिण्या आल्या.इथे जुजबी कन्नड शिकावं म्हटल तर समोरचा कन्नड असेल असे नाही. तो कोणीही असू शकतो. मल्याळी, तामिळी, कन्नडागी किंवा मग तेलगू. असो. हैदराबादी हिन्दी हा मात्र पि.एच.डी. करण्याचा विषय आहे. 'उंन्ही बोले तो, बसांमई जा रइ थी !! " म्हणजे ती बसने चालली होती. बाब्बो !! काय प्रकार आहे ? एखाद्या भाषेचा अश्या प्रकारचा स्लँग असा पण असू शकतो पण तिचं भाषा मला कुठेतरी आधी ऐकल्यासारखी वाटली, येस्स, मालेगाव ! (सौजन्य : हैदराबाद मुक्ती संग्राम ) जसा इथे ' द अंग्रेज ' नावाचा चित्रपट आला होता तसेच मालेगाव आणि जवळपासच्या भागात ' खान्देस का जमांई' नावाची कॅसेट अतिशय गाजली होती. बाकी काहीही म्हणा, हैदराबादला मिळणारी, हिरवट रंगाची, बिर्याणी मस्त असते ब्वा !! एकमेकांना नावाने पुकारण्यात दाक्षिणात्य माणसासारखा सूरमयी कोणीच नसावा, नाव सपलं की त्याच्या नावाच्या मागे आपल्या इथे जस 'या'(जसे सुहाश्या) लावायची पद्धत आहे,त्याच प्रकारे इकडची मंडळी 'आ ' लावून एखाद्या ताणेसारखा लांबपर्यंत ओढतात. दिनेशाssss, पुर्णय्याssss, ईरण्णाssss, सुरेशाssss, महेशाssss, सतीशाssss, लक्ष्मणाsssss (खरं तर हे आमच्या तीर्थरूपांचे नाव, पण दक्षिणेकडे आडनाव लावत नाही आणि मी मात्र माझं पुर्ण नाव लिहीतो. माझी काही चेन्नईकडचे मित्र-मंडळी अजुन ही याच नावाने ठणाणा करतात.त्यातही सा* , लक्ष्मणाण्णाssss असा उल्लेख करतात.) . मंजू (इथे हे नाव स्त्री आणि पुरुष या दोघांकरिता आहे.) त्यापुढे तुम्ही काहीही लावा ..उदा. मंजूला (बाई),मंजूस्वामी (पुरुष). मंजूनाथ (पुरुष)..मंजूश्री (स्त्री आणि पुरुष) पुकारताना मात्र दोन्हीचा धावा एकच, मंजू !! , माझ्या रुमवर काम करण्यार्‍या स्त्री ला मात्र धास्तीने मंजू अम्माsss असे म्हणतो. नावाचा हा घोटाळा सगळीकडेच आहे. पण इथे मात्र अती प्रमाणात , चेन्नई ला असताना माझ्या वीस जणांच्या टीममध्ये ( ही मी टिम लिडर असल्याची जाहिरात नव्हे !) सहा 'सेन्थिल' नावाचे महान आत्मा होते. (मला फक्त 'सिन्थॉल' नावाचा साबण माहीत आहे.) पण त्या ही पेक्षा अवघड मला गेलं ते एका स्टॉपच नाव. 'कोपनाण्णाआग्रहरा !! (लिहिताना बोट दुखायला लागली.) काही मुली जश्या मोबाइल आणि कानाला हेडसेट सकट जन्माला येतात, त्याच प्रकारे इथले पुरुष मिशां सकट जन्माला येत असावेत. मिशा ठेवण्याची पद्धत आपल्याकडेही आहे. पण इथल्या मिशा नाकपुड्यांतून सरू होऊन थेट खालचा ओठ झाकले जाण्याला अर्धा सेमी उरेल अश्या प्रकारच्या, काही काही भरदार मिशा पाहूनं तर त्या व्यक्तीने मिशा ठेवल्यात की मिशांनी त्या व्यक्तीला ठेवले आहे तेच कळत नाही,त्यात दुग्ध-शर्करा योग म्हणजे कानावरून ओसंडून वाहणारे केस. व्वा ! काय पण ध्यान आहे.. बायकांची ही तीच गत. केसात गजरा आपल्याकडेही माळतात.काळ्याभोर केसांत दोन मोगर्‍यांची रांग लावून माळलेला सुगंधी मोगरा किती छान दिसतो ना ! पण इथे मुळात बायकाच काळ्याभोर !! आणि वर डोकं मोगराच्छादित !! केसांत गजरा माळला आहे की गंगावन मोगर्‍याच्या टोपलीत वाळायला घातले आहे तेच समजत नाही.लग्नात वधूने घातलेला गजरा म्हणजे उलट्या बाजुला घातलेला 'सेहरा' जणू. काळे-गोरे जगात सर्व ठिकाणीच आहेत. पण इथली काही मंडळी मात्र वेगळ्याच घाटणीची आहेत, बर लुंग्या तरी नेसतात नाहीतर ढेकळात पडली तर दिसणार नाहीत आणि म्हशीवर बसली तर म्हशीचा आकार बदलल्या सारखा वाटेल.त्यात हा अश्या प्रकारचा साजशृंगार. इथे सर्वात जास्त चलती आहे ती म्हणजे चित्रपटांची ! मला प्रश्न पडायचा की इथे चित्रपटासाठी महागडं बजेट रिकव्हर कसे काय होते ? त्याचे उत्तर आहे की इथले चित्रपट गावांमध्ये भरपूर चालतात. 'रामराजन' या नटाचा एक चित्रपट, एका गावामध्ये, दोन वर्षे चालल्याचे एकले ! (ते चित्रपटगृह त्याच्या स्व:ताच्याच मालकीचे होते.) अश्याच प्रकारचे इथे 'पेड फॅन क्लब्ज' आहेत. त्यांना तिकीटं फुकटात मिळतात. शिवाय वर क्लब्ज चालवायला पैसाही ! हे फॅन्स चालले लगेच वाजवत-गाजवत ४० फुटी फ्लेक्सला हार घालायला, बरं तो हार ही केव्हढा लांबलचक !! नवल म्हणजे एखाद्या नेत्याला घालायचा हार ही त्या नेत्याच्याच उंचीचा असतो.(पायात अडकून पडायचं साल एखाद्यावेळी.) रजनीकांत ला तर ही माणसं देवच मानतात , पण खुशबु सारख्या पडेल अभिनेत्रीचे मंदीर बांधेपर्यंत एखाद्याची आवड जाइलं असे मला स्वप्नात देखील वाटल नव्हतं. असो.. दक्षिणेकडे असणारा फरक हास्यास्पद असला तरी त्या फरका च्या त्रासामुळे कधी-कधी जीव अगदी मेटाकुटीला येतो. वाटत गड्या हा गाव आपला नव्हे .हे सगळं सोडावं आणि सरळ महाराष्ट्रात निघावं. काहीच जमले नाही तर शेती करुया आणि मग माझं मन माझ्या मळ्यात शिरत. दुपारभर च्या मेहनतीने अंग घामाने निथळून निघावं. मोट खुळू-खुळू वाजत असावी. पटाच्या गार-गार पाण्याने अंग खंगाळून घ्यावं. समोरच्या झाळीत बायजा आत्यानी चुलं पेटवलेली असावी. तिच्या मायेच्या हळव्या स्पर्शाने अजूनच चवदार झालेली गरमा-गरम झुणका-भाकर, लसूण-लाल मिरचीचा ठेचा आणि कांदा असलेली थाळी उचलावी . लिंबाच्या नाहीतर आंब्याचा थंडगार सावलीत बसावं. एका बुक्कीत कांदा फोडावा. पहिला घास घेताना दूर कुठून तरी गाईच्या किंवा म्हशीच्या गळ्यात बांधलेल्या घुंगराचा हलकासा स्वर कानी पडावा. सुख म्हणजे तरी दुसरं काय असतं ! पण पैसा आणि स्टेटसच्या मोहात माझा पाय अडकतो, (या आयटीच्या भिंती, काचेच्या असल्या तरी खुप मजबूत आहेत.) मन मात्र सदैव घुटमळत असतं त्या माझ्या मळ्याभोवती, सह्याद्रीच्या पायथ्यापाशी, अंबाबाईच्या दाराशी, तुळजाभवानी च्या पायाशी, गणरायाच्या दहा दिवसांच्या उल्हासा भोवती, विठ्ठलाच्या नामघोषाबरोबर, तुळापुर च्या त्रिवेणी संगमावरती , पुरुषोत्तम करंडकाच्या जल्लोषा भोवती, शनिवारवाड्या च्या दिपोत्सवात, गौताळ्याच्या धबधब्याशेजारी, दिवे घाटातल्या चिंब पावसाशी, जेजुरीत रात्रभर चालणाऱ्या जागरण-गोंधळाबरोबर, त्या तीनशे किल्ल्यांवर, गावोगावी चाललेल्या लावणी महोत्सवांमध्ये,माडांच्या बनातल्या कोकणातल्या रम्य किनार्‍यांभोवती,................ मागे राहिलेल्या माझ्या गावा भोवती... ही यादी कधी संपेल असे वाटत नाही... हा लेख लंवगीताईस समर्पित ..

वाचने 4162 वाचनखूण प्रतिक्रिया 25

विंजिनेर 20/12/2010 - 11:35
चांगला लेख आहे :) म्हाराष्ट्राच्या दक्षिणेला जा नायतर पश्चिमेला - सगळीकडे नवशे, हौशे आणि गवशे असतातच! केल्याने देषाटण असे म्हणतात ते उगीच नाही. असं केल्याने तुमचं अनुभव विष्व समृद्ध का काय ते करायला फार्फार मदत होते असं म्हणतात ब्वॉ.... (गवशा)विंजिनेर

अर्धवटराव 20/12/2010 - 11:38
जींकलस भावड्या !! पण गड्या, आजकाल आपला गाव तेव्हढा सुंदर नाहि राहिला रे... अरे तू आरामात भाकर-तुकडा खायला एखाद्या झाडाखाली बसायचा... आणि त्याच झाडाच्या फांदीवर एखाद्या शेतकर्‍याचं प्रेत लटकलेलं असायचं :( (मराठी) अर्धवटराव

आणि विषय तर अगदी माझा आवडता.. भाषेचं "वळण".... नवर्‍याचा एक कलिग आहे.. त्याच हा accent इतका स्ट्राँग आहे ना..कि तो server हे सुद्धा "सरवराsss" असा म्हणतो यार!मस्त!... अजुन एक म्हणजे. हाईट आहे... त्याने त्याच्या लेडि कलिग ला एक प्रश्न विचारला होता कि ज्यामुळे मोठ्ठं संकट ओढावलं अस्तं त्याच्यावर.. त्याने विचारलं होतं "कॅन आय हॅव ध कीस प्ळीज?" आणि जे काही हशा पिकला ना! रे ब्बाप! खरं तर त्याला म्हणायचं होत> " कॅन आय हॅव द कीज (keys) प्लीज?" :) आणि मुव्हीज बद्दल बोलशील तर काहीही होउ शकतं.. साउथ वाल्या मुव्हीज चा एक ठराविक साचा आहे. की जो तस्साच असतो.. त्याचं अतिशय सुंदर असलेलं विडंबन क्विक गन मुरुगन मध्ये पहायला मिळतं ... मला जाम आवडतं! :)

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन 20/12/2010 - 13:42
लेख एकदम अभ्यास वगैरे करुन आणि तटस्थपणे लिहिल्याचे जाणवते
असेच म्हंटले आहे ! - आण्णा

विलासराव 20/12/2010 - 13:17
मी नोकरीत असताना बरेचसे कलीग दक्षीणेतलेच होते. त्याची आठवण झाली. बाकी कुणीतरी वरती म्हणल्याप्रमाणे गाव ही बदललाय आता.

स्वैर परी 20/12/2010 - 13:28
सुहास राव! खुप सुंदर लिहिले आहे! आपण आय्.टी वाले, खरच एक्दा का पैशाच्या मोहात अडकलो, कि सुटणे नाही! :( गावाकडची मजा, जी लहाणपणी अनुभवाय्ला मिळायची, ती आता कुठे! बाकि असेच तुमचे लेख येउद्या! जोरदार! :)

काही काही भरदार मिशा पाहूनं तर त्या व्यक्तीने मिशा ठेवल्यात की मिशांनी त्या व्यक्तीला ठेवले आहे तेच कळत नाही
(नसलेल्या) मिशा फेंदारून हसलो. अजून येऊ द्यात.

लेखन छानच आहे. दाक्षिणात्य भाषा कानाला, डब्यात खडे टाकून हलवल्याच्या आवाजासारख्या लागताता असे मलाही वाटायचे, किंबहुना आपल्याकडे असे म्हणले जाते हे लहानपणापासून ऐकले आहे म्हणून वाटायचे. पण तमिळींच्या सहवासात बरीच वर्षे काढल्याने माझा हा गैरसमज साफ धुवून गेला आहे. तमिळ भाषा कानाला खूपच गोड वाटते. त्यातले अगदी टिपिकल हेलकावे तर मस्तच. मात्र तमिळ मित्राच्या तोंडून "मॅन, युवर लँग्वेज इज व्हेरी हार्ड ऑन इअर्स!" असे ऐकले तेव्हा हसू आले होते. असाच लेख एखादा तमिळभाषिक सुहास, 'तैरसादम.कॉम'वर कसा लिहिल याची कल्पना करतोय. ;)

कवितानागेश 20/12/2010 - 15:52
काही मुली जश्या मोबाइल आणि कानाला हेडसेट सकट जन्माला येतात, त्याच प्रकारे इथले पुरुष मिशां सकट जन्माला येत असावेत. ........... केसांत गजरा माळला आहे की गंगावन मोगर्‍याच्या टोपलीत वाळायला घातले आहे तेच समजत नाही. >>>> अनेक 'पात्र' डोळ्यासमोरुन तरळून गेली. ह.ह. पु. वा. (मुम्बईतल्या तामिळनाडूत राहणारी) माउ

गवि 20/12/2010 - 18:10
लेख झकास.. थोडेसे क्वालिफाईड असल्याने आमचेही पावशेर. काही वर्षे सेलम या पिव्वर तामिळ शहरात घालवल्यावर आणि ओमलुर, कोईंबतूर, ऊटी वगैरे बरेच रूटीन पाहिल्यावर मी काही मुद्दे मांडायला लायक झालो: १) तामिळनाडूच्या लहान शहरांमधे हिंदीत प्रश्न विचारला तर लोकांना "ऐकू" येत नाही. २) जेवणालाही सापाड म्हणतात आणि भातालाही. ३) मिनी मील म्हणजे तीन प्रकारचे भात आणि फुल मील म्हणजे पाच प्रकारचे भात. आणि काही मेगा मील वगैरे असेल तर मग सात प्रकारचे भात. ४) महाराष्ट्रीय सुद्धा तिथे उत्तर भारतीयच. ५) आमच्याकडील अ-तामिळ रजिस्ट्रेशन नंबर असलेली वाहने (दुचाक्या) पाहून उद्भवणार्‍या विचित्र स्थानिक नजरांनी उगीच तणावग्रस्त स्थिती निर्माण व्हायची. ६) लुंगी नेसून बिंधास गावभर हिंडायला जराही संकोच वाटायचा नाही. लुंगीत थेटरमधे जाऊन सिनेमे बघणे नॉर्मल आहे. केलेही. ७) जितक्या बस आहेत तितक्या बस कंपन्याही आहेत. अण्णा या ब्रँडच्या बसेस सेलमात बर्‍याच होत्या. सर्व बसवाल्यांचा बस ष्टांडवर समान अधिकार आहे. ८) कानाची शकले होतील इतक्या जोरात बसमधे गाणी लावतात. ती ज्यावर वाजतात ते स्पीकर अनेकदा सीटखाली असतात त्यामुळे पार्श्वभागाला संगीतमय दणके बसतात. ९) सर्व बसेसना हॉर्न वाजवण्यासाठी अनेक दाबपट्ट्यासदृश लिव्हर्स स्टेरिंगच्या बाजूला असतात आणि सर्व बसेसचे डायवर त्या लिव्हर जणू ब्रास बँड वाजवावा तशा तालात दाबून पॅंपर्पँपँ पॅंपर्पँपँ असे वाद्य वाजवतात. १०) सर्व लोक सतत ओरडून बोलतात.

तमिळ लोकांचे सिनेमा व रजनी प्रेम अफाट . जर्मनीत रजनी (तमिळ भाषेत ) ४० ठिकाणी प्रदर्शित झाला. व तुफान चालला .बहुतेक निर्वासित( श्रीलंकन ) तमिळ आमच्या हॉटेलात आहेत .त्यातील सर्वच एकजात लिट्टेचे समर्थक आहेत .अर्थात त्यातील सक्रीय किती आहेत .हे देवच जाणे (इंग्रजी भाषेमुळे संवाद घडतो ) लेखातील बारकावे आवडले .एकत्र राहून अस्मिता जपण्याच्या त्यांच्या वृत्तीला सलाम प्रभाकरन अजून जिवंत आहे .अशी अनेकांची ठाम समजूत आहे .

पैसा 20/12/2010 - 20:07
खूप आवडला. आमच्या हापिसात बरेच तमिळी आहेत. त्यांच्या पाठीमागे आम्ही त्याना एल टी टी ई म्हणतो. पण ते जेव्हा आपसात बोलतात तेव्हा एवढ्या मोठ्याने बोलतात ना, कानठळ्या बसतात. बरं ते नॉर्मल बोलतायत की भांडतायत हेच कळत नाही किती वेळ!

चिगो 20/12/2010 - 22:23
ठणाणा करत बोलणे, हे ह्यांचे गुणवैशिष्ट्य... ह्यांना कॉल आल्यावर त्यांच्याबाजूला दोन मिनिटं जो मोबाईलवर बोलून दाखवेल त्याला आपण इडली-पेस्सारट्टू-पोंगल-डोसा-मेदूवडा चा भरपेट नाश्ता द्यायला तयार आहे.. ;-) तसेच ह्यांचे पिक्चर्स (हिंदीत डब झालेले) झी सिनेमा-सेट मॅक्स वर पाहणे, म्हणजे परमानंद आहे. :-) बाकी लेख मस्तच...

रेवती 20/12/2010 - 23:14
पक्का महाराष्ट्रप्रेमी आहेस सुहास! उत्तर भारत किंवा दक्षिण भारतापैकी मला दक्षिणच जास्त आवडतो. अजूनही बर्‍याच ठिकाणी जुन्या वळणाचे आयुष्य चालू आहे म्हणून. तुझा लेख वाचून मला माझ्या या धाग्याची आठवण झाली.

मराठे 20/12/2010 - 23:16
आणि आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे 'मुंडी हलवणे'... मी चेन्नईला असतानाचा एक किस्सा: ऑफिसमधून परतताना तिथल्या रिक्षावाल्याला "अड्यार???" असं विचारलं तेव्हा त्याने मुंडी होय होय आणि नाय नाय अशी काहीशी हलवली. मग परत पृच्छा "अड्यार कमिंग??" पुन्हा तेच.. .. "येस ऑर नो??" मग उत्तर आलं "येस्सार"... ..असो.. खरं म्हणजे आपल्याकडेही हा प्रकार आहे. पण मुंडी हलवण्याची फ्रिक्वेन्सी थोडी कमी आहे.

मैत्र 21/12/2010 - 11:23
सुहाश्या ... :) झक्कास... जरा हैदराबाद बंगळूराबद्दल लिहा जास्त... वरचं बरंचसं वर्णन तमीळ आहे... हैद्राबादी हिंदी वर एक स्वतंत्र धागा होऊ शकतो... सगळ्यात बेष्ट म्हणजे - कुठलाही रिक्षावाला वगैरे तुम्ही म्हणाला... 'मेहदीपटनम होना' किंवा 'खैरताबाद होना' तर समजणार तुम्ही जरा तरी हैद्राबादी... उगाच अतिशुद्ध अलाहाबादी हिंदी झाडलं की तो समजलाच तुम्ही नवीन म्हणून... आर टी सी क्रॉस रोड इथे बावर्ची मध्ये किंवा बशीर बाग कॅफे बहार मध्ये मिळते ती उत्तम हैद्राबादी बिर्याणी आणि परंपरागत हवी असेल तर बिनधास्त पुराना पुल ओलांडून सालारजंग च्या पलिकडे ओल्ड सिटी मध्ये खावी... ती शादाब / मदीना ची खरी बिर्याणी ... ती पण मटण बिर्याणी... दुसरा झकास प्रकार म्हणजे - हलीम ... पण त्यासाठी रमजान / ईद ची वाट पहावी लागते. वेगळा पदार्थ म्हणजे खुबानी का मीठा आणि डबल का मीठा... यातला पहिला हा जर्दाळू आणि गूळ / काकवी वजा गोड पदार्था पासून बनतो... आणि दुसरा चक्क ब्रेड वापरून!! हैद्राबाद चं निजामी आणि तेलूगू काँबिनेशन भन्नाट आहे... पण समस्त कर्नाटक / तमिळनाडू चं उत्तम सांबार / झकास इडली ... आणि सर्वात उत्तम कॉफी ! -- सीसीडी ची नाही फिल्टर कॉफी... काSपी.... बंगळुरातले आणि चेन्नईमधले रिक्षावाले.. एम टी आर आणि इतर ठिकाणचा बिसीबेळे भात... त्यावर ते छोट्याशा वाटीत येणारं तूप... किती गोष्टी लिहाव्यात... धमाल... यावरही येऊ द्या जरा डिट्टेलवार... बोकोबा...