सायबानू मीच त्यो .... भाग १
लेखनप्रकार
एक उदास संध्याकाळ "नागरगोजे" गावावर उतरू लागली होती, गेल्या पंधरवड्यात अशा काही घटना तिथे घडल्या होत्या कि ते छोटंसं गाव चांगलंच हादरून गेलं होतं.
"नागरगोजे" सोलापूर-बीड महामार्गावरील तालुक्याच एक ठिकाण . तालुक्याचं असलं तरी मुळ गाव लहानच, फक्त "उसाची मोठी बाजारपेठ" आणि "कोर्ट" यामुळे बऱ्यापैकी गजबजलेलं. त्या भागातली जमीन "अफाट सुपीक" मुख्य पिक हे "ऊस" . गावाच्या आजूबाजूला आता हळूहळू उसाचे कारखाने उघडू घातलेले होते.गावापेक्षा गावाबाहेरच्या लोकांचीच गावात गर्दी जास्त .. यामुळे एकदा संध्याकाळ होऊन सगळी लोक आपापल्या मुक्कामी परतली .. गाव परत चिडीचूप.... गावातल्या "बस स्त्यान्ड" वर काय ती तुरळक गर्दी असायची . तर अश्या या गावात गेला महिनाभर "किसन गणपत शेलार" हि केस चांगलीच गाजत होती.... सर्व कडे चर्चा फक्त याच आणि याच केसची.............................
अरे हणम्या , लेका बर्फ काय उद्या आणणार आहेस काय? आण लवकर......
"शेळके साहेब" आपल्या बंगल्याच्या बाहेर खुर्ची टाकून "black lable" उघडत होते. त्यांनाही गेल्या महिनाभराच्या घडामोडीचा बराच ताण आलेला. विषय तोच - "किसन गणपत शेलार"
सर्पन्च्याच्या सुनेवर बलात्कार करून तिचा खून केल्याचा आरोपातला मुख्य आरोपी आणि दोषी सुद्धा ......
त्यांच्या मनातलं विचारचक्र काही केल्या थांबत नव्हतं, संपूर्ण घटनाक्रमच असा काही घडला आणि इतक्या वेगाने घडला कि बापरे....... त्यांनी सुद्धा अशी अपेक्षा केली नव्हती.म्हणूनच आजची रात्र "मदिरेच्या" आश्रयात घालवण्याचा त्यांचा निर्णय झालेला होता.....
"शेळके साहेब" ,वय - ५५ च्या पुढे, पेशाने "न्यायाधीश - State Court " , बेताची उंची, स्थूल शरीर, चेहऱ्यावर एकप्रकारचा बेरकी भाव, कदाचित इतकी वर्ष काम केल्याने सतत समोरच्या माणसाला पारखण्याचा चाळा लागलेला. स्वभाव अतिशय हलकट. जिथून खाता येईल तिथून खायचे, आणि प्रकरण अंगाशी आलेच तर मिटवायला दुसऱ्याला खिलवायचे. प्रसंगी "साम दाम दंड भेद" याचा वापर करायलाही हा माणूस मागे पुढे पाहत नसे.
सरकार दरबारी सुद्धा याचा एवढा वचक होता, कि त्याला अजून काढून टाकायची कोणाची हिम्मत झालेली नव्हती. पण यावर एक उपाय म्हणून राज्य सरकारने त्यांची बदली या गावात केलेली होती. ते मुळचे कोल्हापूरचे, त्यामुळे कोल्हापूरसारख्या "खादाडीच्या" शहरातून इथे या छोट्या तालुक्यात टाकल्याबद्दल प्रचंड संताप संताप झालेला होता त्यांचा. त्यांनी जीवतोड प्रयत्न केले , बदली टाळण्याची पण यावेळी त्यांना अपयश आले. ते शेवटी या गावात येऊन पडलेच.
अचानक "टाSSSSSSSण" असा स्वयंपाक घरात भांडी पडल्याचा आवाज झाला. साहेब एकदम दचकले.
"अरे भोसडीच्या , काय चालवलाय काय?
"साहेब काय नाय , एक मांजर हाय हिथ , त्याने समदी भांडी पाडली"... हनम्याने बाहेर धावत येत उत्तर दिलं, त्याच्या हातातल्या भांड्यात बर्फ होता.
"साहेब एक मांजर येतया ५ ६ दिवसांपासून आधी ते बाहेरच असायचं, आता आत सुद्धा यायला लागलंय."
"अरे मग हाकलाव ना त्याला"
"आवो साहेब ,त्याला रोज हाकलवून देतुया मी, तरी पन ते येत कुठून काय बे समजना झालंय, रोज जाताना ,आतल्या सर्व खिडक्या दार लावून जातो मी, आनी आनी ..हणम्या चाचारतो , पन ...................
आता त्याच्या डोळ्यात भय दाटलेलं असतं....
"आनी आनी काय ? बोल ना पुढे गाढवा.. "साहेब वैतागतात"
आताशा मला त्याच्या "हिरव्यागार" डोल्यान्च लय भय वाटून राहतंय. हणम्या पुटपुटतो.
"हात लेका , मर्द सारखा मर्द तू, आनी मांजराला घाबरतोस ?
नाही साहेब, हल्ली गावात महिन्याभरापासून "सुतकी कला" आलीय , तेव्हापासून जास्तच भ्या वाटून राहिलिया.
साहेब मी जेवण "फ्रीज" मध्ये ठेवून दिलाय , ते घ्या.. मी निघू? हनम्याला हल्ली दिवस मावळायच्या आत घरी जायची घाई लागलेली असते , हि गोष्ट "साहेबांच्या " नजरेतून सुटत नाही . ठीक आहे जा तू.
हणम्या डोक्याला मुंडासं बांधून निघून जातो, त्याची आकृती दूर दूर जात नाहीशी होईपर्यंत "शेळके साहेब" इथे टक लावून बघत असतात .... बाहेर गार वाऱ सुटलेलं असतं, साहेब डोळे मिटून घेतात, आनी परत भूतकाळात शिरतात,
एक एकर जमिनीवर वसलेलं गावातलं कोर्ट गावापासून तसं बाहेरच, संध्याकाळी ५ ला कोर्टातली तुरळक कामं संपली, कि उरली सुरली लोक निघून जात. मग ती "कोर्टाची ३ मजली भव्य दगडी इमारत" उगाचच भकास जाणवू लागे. कोर्टाच्या मागेच अधिकार्यांसाठी ४ ५ "क्वार्टर्स" बांधलेल्या होत्या. "क्वार्टर्स" कसल्या
,छान बंगलेच होते ते. खाली चार खोल्या , वरती दोन, आणी छोटीशी गच्ची. पुढे मागे झकास मोकळी जागा, मस्त बाग फुलवली होती तिथे, त्याच बागेत एक छान मोठा "झोपाळा", पण आपल्याला हा झोपाळा काय कामाचा, लहानपणी एकदा याच्यावरून पडलेलो होतो, तेव्हापासून याच्या बद्दलची जी भीती मनात दाटलिये ती अजून आहे... मगाशी मारे आपण हन्म्याला चिडवत होतो,
आपण सुद्धा घाबरतोच कि ..... असा मनात विचार येताच "शेल्क्यांना" पुन्हा आपल्या एकटेपणाची जाणीव झाली. बाजूलाच चिंचेचा मोठा वृक्ष होता , त्यावरची पक्ष्यांची "किलबिल", आणि दूर शेतातल्या चालू असलेल्या "मोटर" चा आवाज , याचीच साथ त्यांना होती,
मधेच त्यांना वाटलं, कि काढावी गाडी, आणि जाऊन येव गावात, उगाच एक फेरफटका ... पण केसचा निकाल लागल्यापासून गावकरी वेगळ्याच नजरेने त्यांच्या कडे पाहत, ते खूप दुर्लक्ष करायचे, ठरवायचे, आपल्याला कुठे इथे कायमचं राहायचं, पुढच्या वर्षी ट्रान्स्फर मिळवून , निदान सातारा तरी पदरात पडून घेऊच.
तरीही, एक प्रकारची टोचणी जीवाला लागलेली असायची.. आणि याचं कारण त्यांना चांगलाच माहित होतं, पण त्यांना आता हा विचार करायचा नव्हता.
त्यांनी एक मोठा पेग बनवून तोंडाला लावला.... डोक्यात जरा हलल्यासारख झालं, पण बरं सुद्धा वाटलं
तिन्हीसांजा झालेली होती... भणाण वारं सुटलं होतं.. दूरवर गावात दिवे दिसत होते. "बापरे आपले पहिले २ महिने कसले भयानक गेले, सवयच नव्हती या शांततेची, "शेळक्यांनी ग्लास तोंडाला लावला, त्यांना जरा तरतरी आली. पण इथे मात्र काहीच काम नसायचं, फालतू भांडणांच्या किंवा
मालमत्तेसंबधीच्या केसेस .. वर्षानुवर्षे चाललेल्या..... काहीच थिल नाही यात .. "खादाडी" तर मुळीच नाही, साले हेच कफल्लक आपल्याला काय देणार ? शेळके विचारात बुडलेले होते. वर बायका मुलानी आपल्याबरोबर या अडाणी गावात यायला स्पष्ट नकार दिलेला, बरोबर आहे, त्यांना कसा जमणार, आपल्यालाच किती कष्ट पडले इथे रुळायला, शिवाय स्वप्नील चं "कॉलेज" ते कसं सोडणार तो? पण आपण मात्र रुळलो, हि शांतता आवडायला लागली , आणि ती केस दाखल झाली " किसन गणपत शेलार - बलात्कार आणि खून प्रकरण " साला आपला आयुष्य ढवळून निघालं या केस ने ..............तेवढ्यात "म्यांव ........ " या आवाजाने शेळके साहेब खाडकन दचकले ... खाली बघतात तो त्यांच्या पायाशी
काळ्या रंगाची, आणि हिरव्याजर्द डोळ्यांची" दोन मोठी आणि दोन लहान मांजर , त्यांच्याकडेच रोखून बघत होती.....
क्रमश:
वाचने
12065
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
मस्त! मिपावरच्या लेख दुष्काळातून बाहेर काढलंस लेका !
अवांतरः परा यांच्या कैट्वूमन परिक्षणावरून सुचलं काय रे?
In reply to मस्त! मिपावरच्या लेख by यकु
मस्त! मिपावरच्या लेख दुष्काळातून बाहेर काढलंस लेका
धन्यु ;)
परा यांच्या कैट्वूमन परिक्षणावरून सुचलं काय रे
नाहि रे
मागे अंबा जोगाई ला फीरायला गेलेलो असताना.....
बहिणीचा नवरा कोर्टात आहे, त्याचे जुने साहेब, मुंबईहून इकडे ट्रान्स्फर होऊन आले होते, त्यांना भेटायला तिथल्या कोर्टात गेलो होतो,
गोष्टीत वर्णन केल्यानुसार वातावरण होतं
तेव्हाच कथा मनात आकार धरायला लागली होती.....
सुदैवाने ते साहेब खूपच प्रेमळ होते....
मध्यंतरी मिपावर एवढं प्रचंड वैचारिक वादळ उठलेलं असल्याने ते थांबायची वाट बघत होतो........
नाहीतर हि गोष्ट त्या वावटळीत उडून गेली असती :)
भयकथेचा पहिलाच प्रयत्न .....
वाचतोय
मस्त रे स्पावड्या...पुढचे भाग लौकर टाक
In reply to मस्त रे स्पावड्या...पुढचे भाग by प्रीत-मोहर
वरील प्रत्येक शब्द माझाच आहे समजावे... :)
In reply to +१ by मदनबाण
वरच्या दोघांशी सहमत
In reply to +२ by पैसा
वरच्या तिघांशी सहमत.
-
इंट्या,
मुंबई प्रदेश अध्यक्ष,
मिसळपाव दुर्लक्षित पँथर.
In reply to वरच्या तिघांशी by इंटरनेटस्नेही
वर किती आहेत ते मोजायचे कष्ट घेतले नाही.
आहे तेवढ्या सर्वांशी सहमत.
मस्त कथा रे.. स्पा.
पुढील भाग लवकर येउदे.
In reply to वर किती आहेत ते मोजायचे कष्ट by गांधीवादी
वरचे सगळे वाहियात इन्सान आहेत. त्यांनी माझेच शब्द वापरुन प्रतिसाद दिला आहे. पण आपले म्हणुन सोडुन देतो.. आणि सहमत आहे असे म्हणतो
In reply to वरचे सगळे वाहियात इन्सान by अवलिया
'वाहियात इन्सान' हा चुकीचा शब्द आहे.
खरा उच्चार वाहीय्यात असा होतो ?
भारी जमलय :)
वा क्या बात....अगदि शब्द चित्र चितारल आहेस मित्रा...
सुरुवात अगदी छान जमलिये.
पुढचे लेखन कृपया लवकर टाका.
थोडे मोठे लीहा.......
सुरूवात छान झाली आहे..
पुढे लवकर लिही.
छान..पुढचा भाग वाचायला उत्सुक.
अगदी छान..
पुढे.... ? लवकर...
मस्त लिहितोस पु.ले.शु.
मस्त रे स्पा.
पुढील भाग लिही लवकर.
भावश्या.
मस्त जमलेय. पुढील भाग लवकर येऊ द्या.
- नीलकांत
हिरव्या डोळ्यांच्या (त्यातही काळी...) मांजरांना मीच काय पण आमच्या कोल्हापुरातील बरेचजण वचकून असतात. त्याला परंपरागत जे कारण आहे त्याचा उहापोह इथे करत नाही....पण हणम्याची जी काय भीती आहे ती 'शेळक्यां'ना ब्लॅक लेबल घेताना अनाठायी वाटली असली तर पुढील भागात तीचे परिणाम त्याना दिसून येतीलच अशी 'आशा' आहे.
कोर्ट क्वार्टर्सचे वर्णन अगदी चपखल आहे....पन्हाळा आणि इचलकरंजी या कोल्हापूरच्या तालुका पातळीवरील कोर्टासाठी दिलेले बंगले (झोपाळ्यासह) असेच आहेत.
कोल्हापूरसारखे 'खादाडी' गाव हातचे गेले म्हणून शेळकेच काय पण त्यांच्या कोर्टातील पट्टेवालादेखील रडला असता.....गब्बरसिंग झाली आहेत इथल्या कोर्टातील मंडळी....खावून खावून....(मी स्वतः कित्येकाना खायाला घातले असल्याने या सर्वाना "स्पा" नी इंपोर्ट केलेल्या हिरव्या डोळ्यांच्या मांजराचा शाप लागू दे !)
इन्द्रा
In reply to हिरवे डोळे....!! by इन्द्र्राज पवार
आई शप्पत....ब-याच दिवसानी चान्गला लेख वाचला...मस्त..
अवा॑तर :
इन्द्रा साहेब, तुमच्या कोर्ट प्रकरणा बद्द्ल वाचायला आवडेल. बाकी तुम्ही कोर्टात जाण्याएवढ केलय तरी काय???
In reply to हिरवे डोळे....!! by इन्द्र्राज पवार
"हिरव्या डोळ्यांच्या (त्यातही काळी...) मांजरांना मीच काय पण आमच्या कोल्हापुरातील बरेचजण वचकून असतात. त्याला परंपरागत जे कारण आहे त्याचा उहापोह इथे करत नाही...."
सांगाकी वाइच...
In reply to "हिरव्या डोळ्यांच्या (त्यातही by शैलेन्द्र
+१
In reply to "हिरव्या डोळ्यांच्या (त्यातही by शैलेन्द्र
@ नन्दादीप....
"...बाकी तुम्ही कोर्टात जाण्याएवढ केलय तरी काय???..."
~ वेल, खरं सांगायचं म्हणजे वैयक्तिक पातळीवर मी काही केलेले नाही, पण आमच्या शेतीवाडीच्या, बांधकामाच्या, ट्रान्स्पोर्टच्या, व्यवसायाच्या वर्षानुवर्षे चाललेल्या (अगदी जुन्या मराठी चित्रपटातील चंद्रकांत-सूर्यकांत टाईपच्या) केसीस दोन जिल्ह्यात आणि अगदी तालुकापातळीवर चालू आहेत....त्याबाबत ज्येष्ठांनी सांगितले की, वेळोवेळी (वकिलांसमवेत) अटेंड करायला लागतातच..... कोल्हापुरातील किमान डझनभर वकील गोठ्यातील जनावराच्या अंगावर चिकटून संसार करणार्या पिसवासारखे आमच्या घराला चिकटून असतात... काय सांगू ! त्यामुळे कोर्टातील अ पासून ज्ञ पर्यंत कोण कसे आणि किती खात असतो, याचा विदा भरपूर आहे माझ्याकडे....पण उद्या इथे कुणी हे सिद्ध करा म्हटले तर मात्र माघार...कारण खाणारा काही लेखी स्वरूपात मागणी करून खात नाही...वा खायाला घालणाराही त्याबाबत कुठला स्टॅम्प करून त्यावर सह्या घेऊ शकत नाही. असो.
@ शैलेन्द्र [नाव छान आहे...]
सांगाकी वाइच...!
सांगतो....पण सांगण्यापूर्वी हेही सांगणे तितकेच गरजेचे आहे की हा एक समज आहे विशेषतः नदीकाठील ग्रामीण भागातून....अंधविश्वासही म्हणू शकता...हे असे असतेच का? असे जर दाभोळकरांनी मला विचारले तर मी स्पष्टपणे 'नाही' असेच उत्तर देईन.
समज असा आहे की, जर मांजर काळे असेल तर ते अशुभ मानतातच पण त्यातही त्याचे हिरवे डोळे (फार क्वचित पाहायला मिळतो हा प्रकार....कदाचित त्यामुळेच काही आख्यायिका तयार झालेल्या असतात) असल्यास ज्याला "ते" दिसते त्याला किंवा तिला ते गेल्या जन्मातील त्याने/तिने केलेल्या पापाची आठवण करून देण्यासाठी (बदला घेण्यासाठी नव्हे...) आले आहे आणि त्या पापाची भरपाई आता या जन्मात कशी करून घेतली जाईल या विचाराचे त्याची/तिची झोपच उडते.
उदा. एखाद्या हिंदी चित्रपटात 'जनम जनम का रिश्ता' दाखविणारे कथानक असते. नायक-नायिका मागील जन्मात प्रेमी असतात पण एखादा 'प्राण, प्रेम चोप्रा, डॅनी' छाप खलनायक वा 'बिंदू, अरुणा इराणी' स्टाईल खलनायिका ते प्रेम अयशस्वी करून दोघापैकी एकाचा मृत्यू घडवून आणला जातो...मग नायक मेल्यास नायिका आत्महत्या करते, व त्याच चित्रपटात ते दोघे नवा जन्म घेतात व त्या खलनायक वा खलनायिकेचा आता येनकेन प्रकारच्या बहादुरीने नि:पात करतात व सुखी होतात.
हे झाले चित्रपटातून...पण प्रत्यक्षात असे झाले असेल तर ते कसे मानायचे....तर ज्याने त्या जोडीची कठोरपणे ताटातूट केली असेल तर त्याला या जन्मात त्याची भरपाई करावी लागेल व ते सांगण्यासाठी वा आठवण करून देण्यासाठी हिरव्या डोळ्याचे काळे मांजर त्याच्या नजरेस सातत्याने पडत जाते (अंगावर येत नाही...पण काहीवेळा नदीकाठच्या शेतात अशी मांजरे हमखास दिसतात..त्यातही ते आताच्या एखाद्या मुलीला दिसले आणि तिने घरी आईला सांगितले तर त्याच संध्याकाळी त्यावर उतारा म्हणून शेताच्या बांधावर चांगला चमचमीत नैवेद्य ठेवला जातो...)
नोंद ~~ फक्त एक उदाहरण म्हणून 'जोडी'चे दिले आहे....कारणे अनेकही असू शकतात...जमिनीचे वाद, दत्तकप्रकरणातील कावेबाजी, छळवाद....फसवणूक....फार प्रकार असतात.
तसे पाहिले तर चांगला नाही हा विषय...पण औत्सुक्याने सदस्यांनी सविस्तर लिहा असे म्हटल्यामुळे एवढा प्रपंच मांडला आहे....तो गंभीरपणे घेऊ नये.
इन्द्रा
In reply to कोर्ट आणि मांजर...! by इन्द्र्राज पवार
धन्यवाद,
मस्त माहीती..
सामाजीक समजुती याविषयी पण एखादा लेख पाडला पाहीजे.. ;-)
In reply to कोर्ट आणि मांजर...! by इन्द्र्राज पवार
"शैलेन्द्र [नाव छान आहे...]"
धन्यवाद, तुम्हीही इंद्र मीही इंद्र... पण माझ्या नशीबी अप्सरा नाहीत तुमच्यासारख्या.. बसलोय आपला बर्फ खात... ;-)
In reply to हिरवे डोळे....!! by इन्द्र्राज पवार
काय आहे ते कारण? किमान खरडवहीत तरी सांगा...
स्पा, रंगतेय रे... मांजरी पकड घेणार नक्कीच..
पुढचा भाग लवकर येऊ दे.
जमलय जमलंय. स्पावड्या. काजु कणसातुन बाहेर आल्याबद्दल अभिनंदन.
काजु कणसातुन बाहेर आल्याबद्दल अभिनंदन
हॅ हॅ।हॅ
सर्वांना धन्यवाद.....
लवकरच पुढचा भाग टाकण्याचा प्रयत्न करेन
स्पाड्या छान लिहितोयस. पुभाप्र.
आयला direct भयकथा?
पण स्पा भाऊ झकास सुरुवात झालीये..
वाचतोय
अरे वा! भयकथा... चांगली सुरुवात केली आहे.
पण
सोलापूर बीडकडचा माणूस कोकणी बोलत नाही! सोलापूर भागातला गडी असेल तर तेलुगू चा जास्त प्रभाव असेल. हुबारलो, हितं वगैरे सारखे शब्द प्रयोग असायला हवेत.
मांजर येतं पेक्षा
"चाSSर दिस जालं, मांजर सारकं सारकं हित याला जालंय, येता जाता हुबारायला की ओ सायेब"
साहेब मी जेवण "फ्रीज" मध्ये ठेवून दिलाय , ते घ्या.. मी निघू?
हे वाक्य असे योग्य वाटते "जेवान फ्रिजात ठिवलंय, म्या जातु"
कोकणातले गडी सोलापूरला कामाला जात असतील तर ठीक आहे. (पण ते तितकेसे पटत नाही, दुष्काळी प्रदेशात कशाला जाईल तो मुंबई सोडून?)
तसे नसेल तर किमान कथा रत्नांग्रीजवळ घडते आहे असे तरी म्हणा...
In reply to कोकणी by गुंडोपंत
पंतांशी सहमत.
कथेची सुरुवात तर मस्त थर्रार झाली आहे. पुभाप्र.
चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद..
माझा भाषेचा एवढा अभ्यास नाही, त्यामुळे लिखाणात बऱ्याच त्रुटी जाणवतील...
वाचक जश्या लक्षात आणून देतील तश्या निस्तरत जाईनच...
:)
मस्त! मिपावरच्या लेख