रात्र काळी, घागर काळी
लेखनप्रकार
आजपावेतो घेतलेली तीन पदे तशी अप्रचलित म्हणावयास हरकत नाही.शेवटची दोन पदे प्रचलित व अतिशय लोकप्रिय अशी आहेत. सुंदर चाली व आकर्षक आवाज यांची भुरळ पडून शब्दांकडे व त्यांतील सौंदर्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. श्री. ज्ञानेश्वर महाराजांनी हा धोका लक्षांत घेऊन श्रोत्यांना विनवणी केली आहे की. शब्द सौंदर्याकडॆ लक्ष देऊन विषयाकडे दुर्लक्ष करूं नका. विष्णुदास नाम्यांचे पद असे आहे
रात्र काळी,घागर काळी,यमुना जळे ती काळी हो माय !
बुंथ काळी,बिलवर काळे, गळामोती एकावळी काळी हो माय !
मी काळी, कांचोळी काळी, कांसे कांसिली ती काळी हो माय !
एकली पाणीया नच जाय साजणी, सवे पाठवा मूर्ती सावळी हो माय !
विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी, कृष्ण्मूर्ति बहु काळी हो माय !
बुंथ --चुंबळ, गळामोती एकावळी --गळ्यातील मोत्यांचा एकपदरी हार, कांचोळी -- चोळी, कांसे कांसिली --नेसूचे लुगडॆ
.
प्रसंग कसा नाट्यमय आहे बघा. काळोख्या रात्रीची वेळ निवडून, एक गोपी काळ्या यमुनेवर पाणी भरावयास निघाली. चांगली तयारी करून निघाली. म्हणजे चुंबळ, घागर आहेतच, पण ( पाणी भरण्याकरिता अनावष्यक पण शृंगाराला आवष्यक असे अलंकार ) बिलवर, गळ्यातील मोत्यांचा हार, आवर्जून घेतले आहेत. अभिसारिका असल्याने सर्व गोष्टी निवडून काळ्या रंगाच्या घेतल्या. पण तरीही एक राहिलेच. ती स्वत: गोरीच होती. मग, मांजर डोळे मिटून दूध पिते, त्याप्रमाणे तिने ठणकावून सांगितले,"मी काळी". वाद मिटला. आतां जाण्यास अडचण काय? तीही तीने लगेच सांगितली." मी भित्री. एकटी कशी काय जाणार? सोबत नको ? सखे, त्या सावळ्याला बरोबर धाड ना !" च्या.
आपण घरांतल्या लग्नाच्या मुलीला काळी असेल तर सावळी, सावळी असेल तर गहूवर्णी, गहूवर्णी असेल तर चक्क गोरी म्हणतो. पण येथे ही बिलंदर गोपी स्वत:ला गोरी असून काळी व बाहेरच्या "कृष्णा"ला सावळी म्हणून मोकळी! विष्णुदास नाम्याला हा चावटपणा पसंत नाही. तो साफ़ सांगतो " माझी स्वामिनी काळी नाही बहूकाळीच आहे. पटत नाही ? पंढरपूरचा विठ्ठल पहा !"
या पदातली लय लक्षणीय आहे. तळ्यातील पाण्यावर दगड टाकला कीं तरंगाची वर्तुळे मोठी मोठी होत जातात त्याप्रमाणे प्रत्येक ओळीतील काळ्या रंगाचे विशेष्य मोठे होते; रात्र-घागर-यमुना जळ; बुंथ-बिलवर-गळामोती एकावळी; मी-कांचोळी-कांसे कासिली. मस्त जमलय कीं नाही?
अवांतर १. : विष्णुदास नामा म्हणजे म्हणजे आपले नेहमीचे, विठ्ठलाला खीर पाजणारे, जानेश्वरांचे सांगाती, नामदेव महाराज नव्हेत. हे बरेच नंतरच्रे. पण गाथेत याचे अभंग पहिल्या नामदेवांच्या अभंगातच मिसळून टाकले आहेत. "कॉपी राईट" कायदा नव्हता ना !
अवांतर २. : "अभिसारिका" वरून आठवले, मी तसा मिपावर नवा. पण वरवर चाळून मला मिपावर "अष्टनायिका" यावर काही सापडले नाही. गुणीजनांचे रसग्रहण राहून गेले की काय ?
शरद
वाचने
32957
वाचनखूण
प्रतिक्रिया
43
वाचनीय.
रसास्वादाची ही मालि़का अशीच चालू रहावी.
In reply to वाचनीय by श्रावण मोडक
मस्त !
In reply to +१ by मिसळभोक्ता
+२
पुढचा लेख जरा लौकर द्या!
In reply to वाचनीय by श्रावण मोडक
राजेश घासकडवी म्हणाले होते...
"तुम्ही वर्णन केलेलं शब्दसौंदर्य, नादसौंदर्य तर आहेच. पण मला थोडा व्यापक अर्थ जाणवला.
रात्र हे मला आपल्या चराचर विश्वाचं प्रतीक वाटलं. मी म्हणजे स्वतःचा आत्मा. धारण केलेली वस्त्रं, अलंकार हे आपलं शरीर. जर आपल्याला आपला घट भरायला यमुनेकडे जायचं असेल तर सोबतीला ती काळी मूर्ती हवी. म्हणजे ईश्वराचा सहवास पदोपदी नसेल तर या जीवाला कायमच भीती वाटत राहाणार. जर तो सहवास लाभला तर कसली भीती?
मला वाटतं विठ्ठलाचा काळा रंग हे दूषण नसून, गुण कसा आहे हे दाखवण्याच्या पार्श्वभूमीवर या कवितेचा अर्थ लावायला हवा. विठ्ठल व कृष्ण हे एकच समजले जात का, किंवा अवतार समजले जात का - या बाबतीत मी अनभिज्ञ आहे“.
हा धागा कै श्रावण मोडक यांना भावला होता...
खुपच सुन्दर....श्रामोंशी सहमत....+१
श्रामोंशी सहमत.
ऑडीओ दुवा कुठे आहे का?
In reply to या पदाचा by सहज
कॉलिंग नंदन, मागे नंदनने या गाण्याचा दुवा दिला होता..
बाकी वाचतोय
बरीच वर्षे ही गवळण जाणकाराकडून समजून घ्यावी या प्रयत्नात होतो.
ती इच्छा फलद्रुप झाली.
सुंदर रसग्रहण .भाटकर बुवांनी लावलेली या गवळणीला सुंदर चाल दिली होती.
एकली पाणीया नच जाय साजणी ह्या ओळीला फार सुरेख वळण दिले होते.
आणखी लिहा .तुमचे विवेचन आनंददायक अनुभव आहे.
रात्र काळी.. घागर काळी
मला हे गाणे खूप आवडते. एकदा ऐकून कधीच समाधान होत नाही, त्यामुळे पुन्हा पुन्हा ऐकलेच जाते.
नंदनने एकदा हे गाणे काहीतरी संदर्भाने माझ्या खरडवहीत लिंकवले होते. तेव्हाही "बुंथ" म्हणजे काय, किंवा गाण्याचा एकंदर अर्थ काय हे लक्षात येत नव्हते. कधीतरी निखिलने तुमच्या उपक्रमावरील लेखाची लिंक दिली होती. तो लेख इथेही प्रकाशित केल्याबद्दल तुमचे, आणि हे इतके सुंदर गाणे मी ज्यांच्यामुळे ऐकले आणि अर्थ समजून घेतला त्या नंदन आणि निखिलचेही आभार.
In reply to हा घ्या दुवा.. by मस्त कलंदर
हे इतके सुंदर गाणे मी ज्यांच्यामुळे ऐकले आणि अर्थ समजून घेतला त्या नंदन आणि निखिलचेही आभार.खुलाशाबद्दल धन्यवाद! नंदनमुळे ऐकले आणि निखिलकडून समजून घेतलेस का? ;)
In reply to अच्छा by श्रावण मोडक
हा हा हा.. याला सिलेक्टिव्ह रिडींग म्हणावे की वृद्धदृष्टीता????
In reply to हा घ्या दुवा.. by मस्त कलंदर
दुव्या बदल धन्यवाद!
In reply to मस्त कलंदरा... by संजय अभ्यंकर
गाणे छानच आहे याबद्दल शंकाच नाही.
दुव्यावर ऐकायला येणारे गाणे ओरिजनल नाही. म्हणजे ते मुळ ध्वनी मुद्रण नाही.
याचे संगीतकार द्त्ताराम गाडेकर आहेत. (कोणीतरी भाटकरांचा उल्लेख केला आहे. तो चुकीचा आहे.)
गोवींद पोवळे आणि प्रभाकर नागवेकरयांनी गाईलेले होते.
In reply to दुव्यावर ऐकायला येणारे गाणे ओरिजनल नाही. by चिंतामणी
नापास .
In reply to हा घ्या दुवा.. by मस्त कलंदर
मस्त कलंदर, दुव्याबद्दल आभारी.......!
-दिलीप बिरुटे
In reply to हा घ्या दुवा.. by मस्त कलंदर
लिंकबद्दल धन्यवाद मक!
रंगा
मस्त! मस्त!
अजूनही लिहा.
विष्णुदास नामा यांचाबद्दल अधिक माहीती कुठे वाचता येईल?
In reply to विष्णुदास नामा यांचाबद्दल by llपुण्याचे पेशवेll
असेच विचारतो.
रसग्रहण मस्तच!
पहिल्याप्रथम मूळ सुंदर कविता व त्यातल्या कठीण शब्दांचे अर्थ देऊन ती वाचनीय करण्याबद्दल धन्यवाद. मी ते गाणं (बहुधा) मंगेशकर भगिनींपैकी कोणीतरी म्हटलेलं ऐकलं आहे. पण त्याचा अर्थच न लागल्यामुळे दोन ओळींपलिकडे जाता आलं नव्हतं.
तुम्ही वर्णन केलेलं शब्दसौंदर्य, नादसौंदर्य तर आहेच. पण मला थोडा व्यापक अर्थ जाणवला.
रात्र हे मला आपल्या चराचर विश्वाचं प्रतीक वाटलं. मी म्हणजे स्वतःचा आत्मा. धारण केलेली वस्त्रं, अलंकार हे आपलं शरीर. जर आपल्याला आपला घट भरायला यमुनेकडे जायचं असेल तर सोबतीला ती काळी मूर्ती हवी. म्हणजे ईश्वराचा सहवास पदोपदी नसेल तर या जीवाला कायमच भीती वाटत राहाणार. जर तो सहवास लाभला तर कसली भीती?
मला वाटतं विठ्ठलाचा काळा रंग हे दूषण नसून, गुण कसा आहे हे दाखवण्याच्या पार्श्वभूमीवर या कवितेचा अर्थ लावायला हवा. विठ्ठल व कृष्ण हे एकच समजले जात का, किंवा अवतार समजले जात का - या बाबतीत मी अनभिज्ञ आहे. तज्ञांनी अधिक टिप्पणी करावी.
In reply to थोडा वेगळा अर्थ by राजेश घासकडवी
कधीकधी, जसा शब्दशः अर्थ दिसतो, तसाच तो असतो.
इथे, गोपी चावट आहे, हाच अर्थ आहे. उगाच आत्मा, चराचर जग, वगैरे संबंध लावायचे तर "ए साथी रे, तेरे बिना भी क्या जीना" ला पण लावू शकतो.
In reply to कधीकधी by मिसळभोक्ता
इथे, गोपी चावट आहे, हाच अर्थ आहे. उगाच आत्मा, चराचर जग, वगैरे संबंध लावायचे तर "ए साथी रे, तेरे बिना भी क्या जीना" ला पण लावू शकतो.
सगळ्या चांगल्या गोष्टीना विरजण लावलेच पाहीजे का?:(
In reply to थोडा वेगळा अर्थ by राजेश घासकडवी
रात्र हे मला आपल्या चराचर विश्वाचं प्रतीक वाटलं. मी म्हणजे स्वतःचा आत्मा. धारण केलेली वस्त्रं, अलंकार हे आपलं शरीर. जर आपल्याला आपला घट भरायला यमुनेकडे जायचं असेल तर सोबतीला ती काळी मूर्ती हवी. म्हणजे ईश्वराचा सहवास पदोपदी नसेल तर या जीवाला कायमच भीती वाटत राहाणार. जर तो सहवास लाभला तर कसली भीती?
गुर्जी __/\__
छानच आहे हा तुम्हाला समजलेला अर्थ.
In reply to छानच !! by सूड
मिभो आणि घासकडवी दोघांशीही सहमत. जसा मूड असेल तसा अर्थ घेईन.
मि . भो. शी सहमत.
ही गवळण आहे अन तो ही भक्तीचा एक अत्यंत उत्कट प्रकार आहे.
'शरद ' शब्दांच्या अर्था बद्दल धन्यवाद. अतिशय आवडत अन सकाळच्या भक्तिसंगीतातील आवडत गाण.
सुंदर गाण्याचे सुंदर रसग्रहण!
परंतु, मधुरा भक्ती हा प्रकार जेवढा उत्तरेत (उदा. राजस्थानी मीरा) प्रचलीत झाला तेवढा महाराष्ट्रात झाला नाही. अशा गवळणी ह्या अपवाद.
एक शंका : बुंथ हा एक दागिना आहे असे वाचल्याचे आठवते.
In reply to रसग्रहण अप्रतिम. by अडगळ
डोक्यावरुन घ्यायचे एक वस्त्र असा अर्थ मोल्सवर्थमधे दिलाय.
http://dsal.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A5&display=utf8&table=molesworth
त्यानुसार चुंबळ हे योग्य वाटते. तसेही डोक्यावर घगर ठेवायला गोपीने चुंबळ घेणे तर्कानेही योग्य आहेच!
In reply to बुंथ म्हणजे by चतुरंग
चतुरंगरावचंद्रजीसाहेब :-)
तूसी छा गये!
सुरेख रसग्रहण!
छान पद, गाणे, रसग्रहण.
मात्र गोपी खुद्द गोरी आहे, असा संदर्भ मला स्पष्ट सापडला नाही. गोपी खरोखरच काळीसावळी आहे, असे समजूनही तितकाच गहिरा अर्थ लागतो.
विठ्ठलाचा संदर्भ असल्यामुळे कवी आध्यात्मिक अर्थ सांगतो आहे, असे मानायला काहीच हरकत नाही. शेवटच्या ओळीत "विष्णुदास नाम्या" हे पुंल्लिंगी नाव आहे, पण उरलेल्या पदातल्या ओळींत "मी" स्त्री आहे, त्यामुळे लाक्षणिक (रूपक म्हणून) अर्थ घ्यायचा आहे, हा निर्देश कवीनेच दिलेला आहे.
एकदा का आध्यात्मिक अर्थ घ्यायचे ठरवले, तर तो अर्थ बर्यापैकी स्पष्ट आहे. शृंगारिक पातळीवरचा अर्थ तर शब्दांचा वाच्यार्थच आहे. दोहोंपैकी कुठलाही एक अर्थ टाळता येत नाही. (गाण्यात मी मूडप्रमाणे फक्त गायकाचा ध्वनीच ऐकीन, तबला ऐकणार नाही... किंवा तबलाच ऐकीन गायकाचा आवाज ऐकणार नाही... अशी निवड क्वचितच करता येते. अपवाद सोडल्यास अशी निवड करूही नये. रसहानी होते.)
गवळणीचे रसग्रहण आवडले. अर्थातच मराठीतील शब्द असून अर्थ माहीत नव्हता तो समजला.
मिपावर चालु झालेली गजल पासुन गवळणीपर्यन्तची रसग्रहण यात्रा जोमाने चालु राहु देत.
खूप सुंदर !
खूपच सहजपणे उलगडली तुम्ही ही कविता :)
धन्यवाद :)
गवळणीचे रसग्रहण आवडले. अर्थातच मराठितील शब्द असून अर्थ माहीत नव्हता तो समजला.
मिपावर चालु झालेली गजल पासुन गवळणीपर्यन्त ची रसग्रहण यात्रा जोमाने चालु राहु देत.
हा प्रसंग आणि त्याचे कारण कळले नाही.
सुंदर विवेचन.
मुशाफिर.
नॉस्टॅल्जिक झालो.
खूप लहानपणी रेडिओवर हे गाणे ऐकले होते ते आठवले.
माझ्या आयुष्यात ऐकलेल्या पहिल्या गाण्यांपैकी एक असावे. आणि दुसरे आठवते ते अरे कृष्णा, अरे कान्हा, मनरंजना मोहना.
त्यामुळे मनात कोरलेले आहे. आणि दुसरे आठवते ते अरे कृष्णा, अरे कान्हा, मनरंजना मोहना.
त्या वेळी शब्द काही कळत नव्हते. मी बहुधा पहिली दुसरीतच असेन.
बुंथ काळी,बिलवर काळे, गळामोती एकावळी काळी हो माय !
यात 'गळामोती एकावळी' ऐवजी 'तयामुखी एकावर' असे ऐकल्याचे (वाटल्याचे) अजून आठवते. तेव्हा आमच्याकडे वॅक्यूम ट्यूबचा रेडिओ होता आणि त्याला कोळिष्टकासारखी एरियल. :)
नंतर ही दोन्ही गाणी फार कधी ऐकू आली नाहीत.
(म्हातारा)
वाचनीय