मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सांधण दरी-एक निसर्गनवल

प्रचेतस · · कलादालन
कार्यालयीन कामकाजातून वेळ काढून नाशिकला मामाच्या गावाला जायचा उद्देश यावेळी निराळा होता. तो म्हणजे सांधण दरी ला भेट द्यायचा. अर्थात पूर्वीच नियोजन केल्याप्रमाणे २४ एप्रील ला मी आणी माझा मामेभाउ व त्याचा मित्र असे तिघे पहाटे ५.३० वाजता नासिक वरून निघालो ते त्याच्या चारचाकीने. नासिक-मुंबई महामार्गाने घोटीच्या दिशेने आमचा प्रवास सुरु झाला. थोड्याच वेळात डावीकडे औंढ्या, पट्टा, डुबेरे व उजवीकडे अंजनेरी,डांग्या, घारगड, कावनई असे किल्ले दिसू लागले. समोरच कळसुबाई, अलंग, कुलंग व मदनगडाची सह्याद्रीतील सर्वोच्च रांग दिसू लागली. आम्ही घोटीच्या अलीकडून डावीकडे वळण घेतले व मोरधन किल्ल्याच्या कातळभिंतीच्या शेजारून असलेल्या सडकेने बारी गाठले. बारी हे कळसूबाईच्या पायथ्याचे गाव. आसपासच्या सर्व शिखरांत कळसुबाई आपले सर्वोच्च शिखर त्यावरील मंदिरासह मिरवत होती. आम्ही खालूनच त्याचे दर्शन घेऊन पुढे निघालो ते भंडारदरा धरणापाशी असलेल्या शेंडी गावात पोहोचलो. इथून सांदण दरीला दोन रस्ते जातात. एक शेंडीच्या अलीकडून घाटघरच्या मार्गाने साम्रद गावाला जातो (२३ किमी) व दुसरा धरणाच्या पाणलोट क्षेत्राला वळसा घालून घनचक्कराच्या पदरातून रतनवाडीच्या मार्गाने साम्रदला पोहोचतो (२६ किमी). आम्ह्लाला अर्थातच रतनगडाच्या पायथ्याल्या असलेल्या रतनवाडीच्या शिल्पसमृद्ध श्री. अमृतेश्वर मंदीराचे दर्शन घ्यावयाचे असल्याने आम्ही रतनवाडीच्या मार्गाने निघालो. हा रस्ता निर्विवादपणे देखणा आहे. घनचक्कराच्या कडेने, तलावाच्या बाजूने कधी दाट झाडीतून तर कधी उघड्या आभाळाच्या साक्षीने ह रस्ता चढ उतार घेत वळणे वळणे घेत जातो. वाटेने कळसुबाई, अलंग, कुलंग व मदनगडाची रांग, बाजूलाच घनचक्कर रांग, त्याचे मुडा हे सह्याद्रीतील तिसर्‍या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर हे रौद्र दर्शन देतात. रतनगड व खुट्टा सुळका कायमच साथीला असतात. ३० मिनिटातच रतनवाडीला पोहोचलो. अमृतेश्वर मंदीर व त्याच्या जवळच असलेली कोरीव काम असलेली पुष्करणी (कुंड) आमच्या पुढ्यातच होती. मंदीराच्या पाठीमागेच रतनगड व त्याचा खुट्टा सुळका उठावला होता. पुष्करणी ही अतीशय देखणी व शिल्पसमृद्ध आहे. शंख, चक्र, गदाधारी विष्णू च्या अनेक प्रतिमा आहेत. शेषशायी भगवान विष्णू व लक्ष्मी तसेच गजाननाचीही प्रतिमा आहे. पुष्करणी पाहून आम्ही श्री. अमृतेश्वर मंदीराचे दर्शन घेतले. १२०० वर्षांपूर्वीचे हे अतीशय देखणे हेमाड्पंथी कोरीव मंदीर आहे. मंदीराला पुर्वाभिमुख मुख्य द्वार व पश्चिमाभिमुख दुसरे द्वार अशी २ द्वारे आहेत. विविध शिल्पाकृतींचा खजिनाच इथे भरला आहे. हे सर्व डोळ्यांत व कॅमेर्‍यात साठवून चहा, पोहे खावून आम्ही आमच्या मुख्य उद्दिष्टाकडे म्हणजे सांदण दरीकडे जाण्यासाठी साम्रदकडे निघालो( रतनवाडीपासून साम्रद ५ किमी) थोड्याच वेळात तिथे पोहोचलो. इथेतर सह्याद्री आपले राकट सौंदर्य दाखवत उभा होता. रतनगड, खुट्टा यांचे एका वेगळ्याच बाजूने अतीशय प्रेक्षणीय दर्शन होत होते. बाजूलाच आजोबाचा महाकाय पर्वत आपल्याला आजोबा का म्हणतात ते दाखवून देत होता. कळसुबाई, अलंग, कुलंग व मदनगड पाठीमागच्या बाजूने रौद्र दर्शन देत होते. साम्रद ही छोटेखानी आदिवासी वाडी आहे. तिथे गाडी लावून आम्ही खंडूमामा यांस सांदण दरीची वाट दाखवण्यास बरोबर घेतले. १०/१५ मिनिटातच कातळाच्यासड्यावरून आमची वाट दाट झाडीत शिरली. व थोड्याच वेळात आम्ही एका घळीच्या मुखाशी आलो. सांदण दरीचे वैशिट्य म्हणजे ही जमिनीच्या पातळीखाली आहे. इथे खाली थोडेसे उतरावे लागते. अतिशय अरूंद अशी ही लांबच लांब जमिनीला पडलेली भेग आहे. सांदण दरीचे मुख.-- घळीच्या सुरुवातीलाचा एक जिवंत झरा आहे जो कधीही आटत नाही. दगडांनी तो बंदिस्त केल्यामुळे अतिशय निर्मळ असे ते थंडगार असे ते पाणी पिवून आम्ही उल्ह्सित झालो. घळ उतरायला लागलो. सुरुवातीचा सोपा कातळटप्पा उतरुन आम्ही आत दरीच्या नाळेत प्रवेश केला. आत दरीचे सापासारखे लांबच लांब वळण दिसत होते. काही ठिकाणी १५/२० फूट तर काही ठिकाणी जेमतेम २/३ फूट अशी ती अतिशय निरुंद नाळ होती. दोन्ही बाजूला काळ्याकभिन्न कातळकड्यांनी ती बंदिस्त केली होती. पहिला कातळ्टप्पा उतरताच एका पाणसाठ्याने आमचा मार्ग अडवला. साधारण १.५ फूट खोल १२/१३ फूट लांब अश्या त्या पाण्यातून शेवाळलेल्या दगडांवरून आम्ही कौशल्याने मार्ग काडून पलीकडे गेलो. आता तीव्र उतार सुरु झाला होता. नाळ अधिकाधिक अरूंद होत होती. कुठेही सपाट मार्ग नव्हता. दरडी, लहानमोठे दगडगोटे यांचा अक्षर्शः तिथे खच पडला होता. आता आमचा मार्ग दुसर्‍या मोठ्या पाणसाठयाने अडवला होता. एका बाजूला ४.५ फूट खोल पाणी दुसर्‍याबाजूला ३ फूट खोल पाणी होते. हेही कधीही आटत नाही कारण सुर्य इकडे कधीही पोहोचू शकत नाही. अतिशय थंडगार अश्या त्या पाण्यातून १७/१८ फूट लांब चालण्याचा थरार हा शब्दातीत आहे. प्रत्यक्ष अनूभवातूनच तो घ्यावा. अजूनही आमचा नाळेतूनच प्रवास चालला होता. जवळ जवळ १.५ किमी अश्या ह्या अरूंद नाळेच्या टोकाशी पोहोचायला ३० /४० मिनिटे लागतात. दोहो बाजूंचे उंच उंच कातळकडे व आकाश्याच्या छोट्या तुकड्यापलीकडे काहीही दिसत नाही. आता आम्ही नाळेच्या टोकाशी आलो होतो. आत इथून सह्य पर्वताचे उग्र दर्शन होते होते. ३५०० फूट सरळ तुटलेले कडे व रतनगडाचा कडा प्रेक्षणीय दिसत होता. ही नाळ पुढे काही अवघड कातळारोहण टप्प्यांवरून जात करोली घाटाला जावुन मिळते. अर्थात आम्ही त्याच्या वाटेला गेलो नाही हे सांगणे न लगे. १५/२० मिनिटे तिथे थांबून आम्ही मागे फिरलो. परत त्या पाण्याचा थरार अनुभवला. दगडगोट्यांवरून दडस दडस चढून आम्ही घळीच्या बाहेर पडलो. अप्रतीम अश्या ह्या निसर्गनवलाने आम्ही अवाक झालो होतो. ही अरूंद घळ पाणी व ज्वालामुखी यांच्या एकत्रीत परीणामामुळे बनली असावी. पूर्ण सांदण दरीत कधीही उन पोहोचत नाही त्यमुळे कायमच सुखद गारवा असतो. आता परत आजोबा, रतनगड, खुट्टा , कळसुबाई रांगेचे डोळे भरून दर्शन घेतले. साम्रद गावात अचानक छोटे चक्रीवादळ आले. साम्रद वरून घाटघरच्या वाटेने निघालो. घाटघरचा रौद्र कोकणकडा व पायथ्याचा तलाव व त्यावरील विद्युत प्रकल्पाचे इथून सुंदर दर्शन होते. तिथे थोडावेळ थांबून आम्ही आता धरणाच्या दुसर्‍या बाजूने निघालो. कळसूबाईच्या मागच्या पदरातून वळसा मारून परत शेंडी गाव व तिथून बारी, घोटी वरून आम्ही ३ च्या सुमारास नाशिकला पोहोचलो ते परत पुन्हा इथे यायच्या विचारानेच. --------------------- (भारावून गेलेला) वल्ली
लेखनविषय:

वाचने 34632 वाचनखूण प्रतिक्रिया 38

मेघवेडा Tue, 05/04/2010 - 11:49
अ प्र ति म!! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

रानी १३ Tue, 05/04/2010 - 12:46
जबर्‍या!!!!!!...आम्हि गेलो होतो मागच्या पावसाळ्यात्........खुप सुन्दर ठिकाण...... पाउस जोराचा असल्यामुळे उतरुन फिरता नाहि आला......गाडीतुनच रपेट झालि.....

In reply to by रानी १३

प्रचेतस Tue, 05/04/2010 - 13:54
सांदण दरी पावसाळ्यात अवघड आहे. कारण त्या तिथे पाणी ओसंडून वाहात असते व जिथे एप्रिल, मे मध्ये ३.५ फूट पाणी असते तिथे तेव्हा ६ फूटांच्या वर पाणी जाते.

In reply to by प्रचेतस

जयंत कुलकर्णी Tue, 05/04/2010 - 15:25
पण पावसाळ्यात पाणी धो धो वहात असते का ? म्हणजे मला असे विचारयच आहे की ६ फुट डबक्यातील खोली असेल तर ठीक आहे, पण वहाते असेल तर कठीण आहे. मी अशा काही ठिकानी गेलो आहे की तेथे पाण्यातून जावे लागत होते, पण पाण्याला फोर्स नव्हता. जर त्या पाण्याच्या साठ्याच्या पुढे चढ असेल तर नुसते पाणी साठून राहील. कल्पना येत नाही, जाईन तेव्हा माहिती काढीन. या लेखाबद्दल धन्यवाद ! जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

In reply to by जयंत कुलकर्णी

प्रचेतस Tue, 05/04/2010 - 15:31
पण जिथे ते २ साठे आहेत तिथे खड्डा असल्याने पाणी साचून राहते व कधीही आटत नाही अर्थात पावसाळ्यात व जानेवारीपर्यंत त्याचे प्रमाण जास्त असते.

In reply to by प्रचेतस

शैलेन्द्र Tue, 05/04/2010 - 16:47
सांदन घळीतुन पावसाळ्यात ४-५ टी एम सी पाणी वाहुन जाते, दरीच्या तोंडाशी भींत बांधुन त्या पाण्यावर वीजनिर्मीती करण्याचा सरकारी प्रस्ताव आहे. जर तो पास झाला तर या अप्रतीम ठीकाणाला आपण कायमचे मुकु, म्हणुन ही घळ आत्ताच पाहुन घ्या.

जयंत कुलकर्णी Tue, 05/04/2010 - 14:55
गेलोच मी इथे. जरा वाटाड्याचा पत्ता किंवा त्यांना कसे गाठायचे सांगाल का ? (अगोदर) पावसाळ्यात शक्यच नसेल ना ? जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

प्रचेतस Tue, 05/04/2010 - 15:16
तुम्ही साम्रदला पोहोचताच तुमच्या गाडीभोवती कुणी ना कुणी गावकरी येतातच. कुणीही तुमच्याबरोबर वाट दाखवायला येईल. पावसाळ्यात मात्र शक्य नाही तेही अर्थात त्या २ पाणसाठ्यांमुळेच. जानेवारीनंतर कधीही जा किंवा आता या महिन्यात वा जूनच्या पहिल्या आठवड्यात जा. सह्कुटुंबासमवेत जा कारण ही घळ अवघड अजिबात नाही. त्यांनाही निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार अनुभवू द्या.

In reply to by प्रचेतस

शैलेन्द्र Tue, 05/04/2010 - 16:53
ऑक्टॉबर- नोव्हेंबरमध्ये साम्रद्च्या पठारावर, दरीच्या कडेला पॅराग्यायडींग केले जाते. त्याचाही आणंद घ्या, त्याच वेळेस तेथे भन्नाट रानफुले फुलतात तसेच पावसळ्यात गेल्यास करोली घाटाच्या वरच्या अंगाला असलेला धबधबा वार्‍याने ऊलटा फीरतो, अदभुत दृष्य असते.

झकासराव Tue, 05/04/2010 - 15:58
वाह!!! फोटो सुंदर आहेत. :) सांदणदरीत जाण्याचा थरार काही औरच असणार. मस्त ट्रेक आहे हा.

मितभाषी Tue, 05/04/2010 - 18:01
गेलोच मी इथे. जरा वाटाड्याचा पत्ता किंवा त्यांना कसे गाठायचे सांगाल का ? (अगोदर) पावसाळ्यात शक्यच नसेल ना ? मी आहे ना. जाताना अगोदर सांगा. सगळी व्यवस्था करतो.. :)

मीली Tue, 05/04/2010 - 19:11
सांदण दरीचे फोटो खूप छान आले आहेत.चित्र सहल घडवल्याबद्दल धन्यवाद. मीली

पक्या Wed, 05/05/2010 - 01:45
सुरेख फोटोज. सांदण दरी ची माहिती आवडली. -जय महाराष्ट्र , जय मराठी !

स्पंदना गुरुवार, 05/06/2010 - 13:33
अप्रतिम!! धन्यवाद!! नुसते बघुनच जीव दडपल्यासारखा झाला. 8> शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

मनमोजी गुरुवार, 05/06/2010 - 19:51
अप्रतिम!! सांदण दरी ची माहिती आवडली व ट्रेक करायला आवडेल.

simplyatin Tue, 05/11/2010 - 14:16
फोटो पाहून आनन्द जाहला. आम्ही या परीसरात सायकल मोहीमेला गेलो होतो. ३१/१२/२००९-०२/०१/२०१० या काळात ३ दिवसांच्या सायकल मोहिमेत निसर्ग गिरीभ्रमणने रतनगड आणि कळसूबाई या दोन्ही शिखरांवर सायकली नेल्या आणि भंडारदरा परिसर भटकंती पूर्ण केली.

मदनबाण Wed, 05/12/2010 - 08:21
अप्रतिम... तुम्ही काढलेले फोटो फारच सुंदर आहेत... :) मदनबाण..... When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams. Dr Seuss

असुर Wed, 02/16/2011 - 18:51
यागाग्गो!!! ब्येक्कार, लै ब्येक्कार!! कसली वेड भारी जागा आहे ही! आश्चर्योद्गारांची एक हजाराची माळ लावली इथे तरी अपुरीच पडेल! "127 Hours" आठवला ना एकदम!!! खतरनाक - दरीचे फटू बघूनच धूर आला! :-) आता जायला लगणार इथे!! पर्यायच नाही! --असुर

In reply to by असुर

मुलूखावेगळी Wed, 02/16/2011 - 21:30
वल्ली , खुप सुन्दर फोटो आनि वर्णन .
"127 Hours" आठवला ना एकदम!!! खतरनाक - दरीचे फटू बघूनच धूर आला!
+१००

In reply to by असुर

मुलूखावेगळी Wed, 02/16/2011 - 21:30
वल्ली , खुप सुन्दर फोटो आनि वर्णन .
"127 Hours" आठवला ना एकदम!!! खतरनाक - दरीचे फटू बघूनच धूर आला!
+१००

गणेशा Wed, 02/16/2011 - 20:32
लय भारी .. या शनिवारी , रतनगड ला जातच आहे .. तुमचा लेख अगदी माझ्या प्रवासाच्या आधीच नेमका येतो .. मस्त वाटते मग .. (मागील वेळेस कुलंग गडचा प्लॅन फसला गेला होता, यावेळी नक्कीच प्लॅन फसणार नाही अशी काळजी घेतो आहे... ) मी पहिल्यांदाच या रांगा मध्ये जात आहे.. अनुभव नक्कीच भारवलेला असेल असे वाटते .. ) सिन्नर ला मित्र राहतो तेथुन सुरुवात करतो आहे.

धमाल मुलगा Wed, 02/16/2011 - 22:09
अरेऽऽ... काय झक्कास आहे हे!!! ठरलं! ठरलं!! ठरलं!!! आपल्याला इकडंच जायचं.. कोणी सोबत आलं तर सोबत नाहीतर आपण एकटे जाणार! :) हॅट्स ऑफ मित्रा...झकास एकदम.