मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कवितेची पाककृती ३: मुक्तकं गहिऱ्या नात्यांची

राजेश घासकडवी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
कवितेची पाककृती ३: मुक्तकं गहिऱ्या नात्यांची (पुन्हा एकदा सरस्वतीला स्मरून...) आपण सर्वसाधारण आयुष्याविषयी चर्चा करणाऱ्या कविता कशा बनवायच्या हे पहिल्या लेखात पाहिलं. गेल्या लेखात आपण सदाबहार प्रेमकविता कशा बनवायच्या ते पाहिलं. पण या ओढाळ वयाच्या प्रेमकविता चाखून झाल्यानंतर कधीतरी नव्हाळ्याच्या प्रेमाच्या रूपांतर जिव्हाळ्याच्या नात्यामध्ये होतं. प्रेमाच्या बंधनात एकदा बांधले गेले की ते दोघे अधिकाधिक जवळ येतात. अशी जवळीक झाली की पुढे काय करायचं याबाबत मात्र त्या दोघांची मतं वेगवेगळी असतात. एक जुनं हिंदी गाणं या मतभेदाचं सुंदर चित्रण करतं... मै तेरा हजबंड तू मेरी वाईफ, जो मै कहू तू करेगी, तो आओ मिलकर प्यार करे, गाडी मे रोमान्स करे. तू मेर हजबंड मै तेरी वाईफ, जो मै कहू तुम करोगे, तो आओ मिलकर काम करे, प्यार की कोई बात करे. प्रेम व्यक्त करण्याच्या स्त्री पुरुषांच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. आणि कधी ना कधी त्या वेगवेगळ्या आहेत हे दोघांच्याही लक्षात येतं. आणि मग शिल्लक राहातो, एक लांबलचक हम्म्म्म्म. कधीतरी अचानक, कल्पना नसताना त्या नात्यातल्या तरुणाला तरुणीकडनं शब्द ऐकू येतात ज्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर असतं 'आय थिंक वी नीड टू टॉक'. इंग्लिशमध्ये ही रुळलेली वाक्यरचना आहे, मराठीत त्या बाबतीत प्रमाण भाषा बनवणाऱ्यांमध्ये त्याविषयी अजून एकमत नाही. पण ते यायच्या आधी तरुणीने 'हा असा का बरं वागतो?' वरती थोडाबहुत विचार करून झाल्यानंतर हम्म्म्म्म म्हटलेलं असतं. ८२.४७% वेळा स्त्री पहिल्यांदा हम्म्म्म्म म्हणते असं आमच्या सखोल अभ्यासावरून दिसलेलं आहे. (अशी चार दशांशापर्यंत आकडेवारी दिली की एकदम खरी वाटते की नाही? पण त्याविषयी अधिक जाणून घ्यायला आमच्या 'काही संख्याशास्त्रीय पाककृती' ची वाट पहावी लागेल) ते वाक्य पहिल्यांदा तो ऐकतो तेव्हा त्या बिचाऱ्याला आपल्यावर नक्की काय प्रसंग आलेला आहे हे कळत नाही. पण काही वेळा ऐकलेलं असलं की मग मात्र तो लवकरच सावध होतो. त्याचे कान टवकारतात आणि श्वास आत खेचला जाऊन हम्म्म्म्म च्या बरोब्बर उलटी प्रतिक्रीया होते. एखादा रानटी प्राणी आसपास आहे, त्याच्यापासून बचाव कसा करायचा, युद्ध करायचं की पळून जायचं या दोन्हीच्या अॅड्रेनलिनतर्रार तयारीत. खूप वेळा ऐकल्यानंतर मात्र त्याला यातून बचाव नाही हे कळतं व त्याचाही एक हम्म्म्म्म येतो. व नंतर सुरू होते ती ती व तो चर्चा.... नातं मोठं झाल्यानंतरच्या चर्चा या आपण दोघं नक्की कोण आहोत, त्यापासून तयार होणारं नातं हे चांगलं बनतंय का, ते चांगलं बाळसं धरतंय का, ते दिसायला चांगलं आहे का, लोक त्याला काही बोलत तर नाहीत ना, या स्त्रीच्या मातृसुलभ भावनेतून उद्भवतात (८२.४७% वेळा). कधी ते खूप गोंडस हसतं तेव्हा त्याला तीट लावावीशी पण तिला वाटते. पुरुषाला मुळातच या सर्व गोष्टींची तितकी हौस नसते. असल्या बाबतीतली त्याची उदासीनता त्याच्या स्वत:च्या नट्ट्यापट्ट्यातून दिसून येते. त्याच्या मते, बहुतेक दिवशी आंघोळ, लाज राखण्यापुरते कपडे आणि सकाळी दात घासण्याचे जगावर उपकार, एवढं त्या नात्याने केलं की बास झालं. घर हा एक प्रचंड मोठा खोका असतो आणि त्यात आपल्या वस्तू पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे ठेवायच्या असतात या त्याच्या व्यवस्थितपणाच्या कल्पना. बायकांना मात्र नट्टापट्टा करणं हे बाहेर जाण्याइतकंच महत्त्वाचं असतं. कशासाठी काय, असले युटिलिटेरिअन प्रश्न त्यांना भेडसावत नाहीत. बाहुलीच्या इवल्याशा स्कर्टला इवल्या इवल्या टिकल्या लावून त्यांची फुलं करणाऱ्या मुली मोठ्या होऊन घराचा प्रत्येक कोपरा सजवून सोडायला जातात. मग नात्याला त्यांनी मॅचिंग कपडे, आधुनिक फॅशन आणि व्हिटॅमिनच्या गोळ्या नाही दिल्या तरच नवल. एकदा का नात्यात पडलं की पुरुषांचे शिकारीचे दिवस संपलेले असतात, आणि एकत्र घरकुल बनवण्याचे स्त्रियांचे दिवस सुरू झालेले असतात. त्यामुळे ही गाणी बहुधा स्त्रियांच्या तोंडीच ऐकू येतात. या गाण्यांचं थोडक्यात स्वरूप तू हा असा वागतोस/आहेस, मी अशी वागते/आहे, त्यामुळे आपलं नातं बिघडतंय/छान आहे. काही वेळा या रचना 'मी ही अशी (क्षसारखी) - तू हा असा (यसारखा)------- (इथे क्ष हे उत्कट, भावनाप्रधान, अशा अर्थाचे शब्द घ्या तर य हे तर्ककठोर, सडेतोड, विचारी, निष्काळजी, विरक्त अशा अर्थाचे घ्या) आपलं कसं होणार........' अशा पुनरावृत्ती करणाऱ्या कडव्यांनी देखील तयार करता येतात. दोन्ही पद्धतींनी तयार करून बघा. मी एक चांदणी लुकलुकणारी, स्वैर, ठिणगी. तू तर चंद्र, संथ एकसंध प्रकाशाने अविरत तळपणारा... तुझ्याभोवतालचं अभेद्य खळं मी कसं छेदणार... मी एक फुलपाखरू, रंगपंखांनी फडफडणारं, धुंद माझ्यातच तू एका चिताऱ्याप्रमाणे, स्वसिद्ध, स्थितप्रज्ञ मला कसं पकडशील तुझ्या कुंचलेजालात... वगैरे वगैरे दुसरा, जास्त भरदार व अधिक पापिलवार प्रकार आहे. या प्रकारे कविता तयार करण्यासाठी थोडी जास्त क्लिष्ट रचना लागते. ही रचना शब्दांमधली नसून वेगवेगळ्या वाक्यांमधली आहे. पण त्याचबरोबर छंदांचं बंधन गळून पडतं त्यामुळे तुम्हाला सरळ सरळ परिच्छेद लिहून त्याची मु्क्तकं करता येतात. प्रत्येक वाक्यसंग्रह साधारण दोन ते तीन वाक्यांचा करावा. या कवितेत रे, अरे, नाही रे, राजा, अशा संबोधनांची रेलचेल असावी. वाक्यसंग्रह १: तुझ्याकडनं किंवा आपल्या नात्याकडनं माझ्या अपेक्षा (इथे स्वप्न, आकांक्षा, वाटलं होतं, वगैरे शब्दप्रयोग उपयुक्त ठरतात. एक गोजिरवाणं चित्र आवश्यक) वाक्यसंग्रह २: प्रत्यक्षात मला काय दिसतंय? किंवा तू त्या पूर्ण करतो आहेस का? (पण, मग, असं असताना, हे अपरिहार्य. प्रश्नार्थक वाक्य खूप परिणामकारक होतात. ) वाक्यसंग्रह ३: मी कशी वागते/आहे/कोमेजते (आणि मला मात्र, तडजोड, प्रयत्न करते रे मी, कसं, मला काय करावं कळत नाही, हे व असे शब्द बऱ्याच वेळा दिसतात) वाक्यसंग्रह ४: त्याने माझी व नात्याची घुसमट कशी होते (किंवा ते फुलतंय कसं - पण पोरींनी लाईन देण्याइतकंच ते क्वचित... भावना, कुचंबणा, जळणे, विझणे हे शब्द फार उपयोगी)) वाक्यसंग्रह ५: पुढे काय होणार... एक हम्म्म्म्म....(मला नाही रे माहीत, काय करू सांग ना, कसं होणार, तडजोड... वगैरे शब्दप्रयोग करावेत) एक स्वप्नाळू छटा येणं आवश्यक आहे. त्यासाठी कविता लिहिताना चेहेऱ्यावरचे भाव पुसून टाकून आढ्याकडे बघा, व नजरेने जणू त्यात भोक पाडून पलिकडचं आकाश दिसतंय का हे पाहाण्याचा प्रयत्न करा. (वरच्या कुळकर्ण्यांच्या घरात काय चाललंय वगैरे नको...) सध्या कवितक प्रणालीमध्ये तुम्हाला दोन्ही प्रकारच्या रचनांपैकी कुठचीही निवडता येते. त्यातली पहिली कडव्यांच्या पातळीवरची प्रणाली तशी सोपी आहे - तिच्यासाठी कवितकमध्ये चंद्र-चांदणी, फुलपाखरू-फूल, चित्र-चित्रकार अशा कही जोड्या तयार करून ठेवलेल्या आहेत. पण अजून नात्याच्या प्रकारावरनं त्याचं वर्गीकरण नीट पूर्ण झालेलं नाही. वाक्यसंग्रहाच्या कविता हा थोडा क्लिष्ट प्रकार आहे, व कवितकाने कितपत प्रगती करता येईल याबाबत शंका आहे. हे अर्थात खरोखर उच्च दर्जाची कविता करण्यासाठी. मागे म्हटल्याप्रमाणे वैयक्तिक वापरासाठी आणि काही वेळा मराठी दिलाची धडकन होण्यासाठीही या प्रणालीने वर सुचवलेले आकारबंध व त्यात टाकता येणारे शब्दप्रयोग यांनी अत्यंत प्रभावी कविता करता येतात. खरोखरचा अनुभव असेल तर ठीकच, पण अनुभव नसताना शब्दांचं जाळं विणणं बिलकुल कठीण नाही, हे कवितक मागचं तत्वज्ञान आहे. कधी तर अनुभूतींची ठेचच लागते शुद्ध शब्दांना असं वाटतं. मी एक रचना उदाहरणार्थ दाखवतो. त्यातले वाक्यसंग्रह कुठचे हे उघड होईलच. त्यासाठी पुन्हा लिहीत बसत नाही. या नात्याचं राज्य अस्ताला चाललंय नव्हतं कारे आपण म्हटलं एक पाऊल तुझं आणि एक माझं? दोघेही सारखेच... राजा आणि राणी... मग का होतात आपल्या राज्यात हे धनुष्याचे टणत्कार? ही बेसुमार अग्नि़वृष्टी? त्यांना सामंजस्याच्या ढाली, अश्रूंचे पाऊस...कुठवर पुरणार, माझ्या राजा? आणि इतकं असूनही तू कसा क्षणात हसतोस, काहीच झालं नाही असा, फसफसलेल्या, उत्साहाने वाहणाऱ्या सोड्यासारखा? या हसण्याने कशी बोथट होईल माझी मघाची दुधारी वेदना? एकीकडे राजा रुसला - दुसरीकडे राज्य बुडलं. माझ्या मनातल्या आकांक्षा भस्म होतात समिधेसारख्या या भावनेच्या जाळात. आणि घड्याळाचा लोलक काळजीने बघत तसाच हलत राहातो... मागे पुढे मागे पुढे तर मंडळी कविता लिहायला घेण्यापूर्वी वर सांगितल्याप्रमाणे आढ्याकडे बघा. एक खोल गंभीर श्वास घ्या, भुवया चिंतेने थोड्या वर घ्या, आणि मान थोडी नाही नाही अशी हलवत तो 'हम्म्म्म्म' म्हणत सोडा. चला, तुमचा मूड तयार झाला. आता ताबडतोब कविता करायला घ्या. (वरील कविता खऱ्या अर्थाने माझी नाही, ते माझ्या बुद्धीने केलेलं मराठीतलं स्वैर रूपांतर आहे, या कवितेचं.)

वाचने 11762 वाचनखूण प्रतिक्रिया 27

Pain Fri, 03/19/2010 - 02:02
तू मेर हजबंड मै तेरी वाईफ, जो मै कहू तुम करोगे, तो आओ मिलकर काम करे, प्यार की कोई बात करे. कधीतरी अचानक, कल्पना नसताना त्या नात्यातल्या तरुणाला तरुणीकडनं शब्द ऐकू येतात ज्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर असतं 'आय थिंक वी नीड टू टॉक'. नातं मोठं झाल्यानंतरच्या चर्चा या आपण दोघं नक्की कोण आहोत, त्यापासून तयार होणारं नातं हे चांगलं बनतंय का, ते चांगलं बाळसं धरतंय का, ते दिसायला चांगलं आहे का, लोक त्याला काही बोलत तर नाहीत ना, या स्त्रीच्या मातृसुलभ भावनेतून उद्भवतात (८२.४७% वेळा). कधी ते खूप गोंडस हसतं तेव्हा त्याला तीट लावावीशी पण तिला वाटते. पुरुषाला मुळातच या सर्व गोष्टींची तितकी हौस नसते. असल्या बाबतीतली त्याची उदासीनता त्याच्या स्वत:च्या नट्ट्यापट्ट्यातून दिसून येते. त्याच्या मते, बहुतेक दिवशी आंघोळ, लाज राखण्यापुरते कपडे आणि सकाळी दात घासण्याचे जगावर उपकार, एवढं त्या नात्याने केलं की बास झालं. :)) =)) छान !

धनंजय Fri, 03/19/2010 - 02:11
हाहा :-D शीर्षकाबद्दल सुचवणी - "गाणी गहिऱ्या नात्यांची" ऐवजी "कविता/कथा गहिऱ्या नात्यांची" असे करावे. शेवटच्या वाक्यातील दुव्यावरील कवितेला चाल लावून गाता येईल हे जितके सहज पटते, तितके कवितकाच्या उत्पादनातून वाटत नाही. कवितकातल्या उदाहरणाची कल्पना मात्र सार्वकालिक. वरील लेखात कवितक नसून लघुकथक सांगितलेले आहे, अशी दिपोटी* म्हणून आमची टिप्पणी आहे. - - - *दिपोटी = डेप्युटी इन्स्पेक्टर ऑफ स्कूल्स. याला फारसे काही कळत नसते, पण शेरे मारण्यासाठी त्याला पगार देतात.

In reply to by मुक्तसुनीत

Nile Fri, 03/19/2010 - 06:35
भल्याभल्यांनी शिरसाष्टांग घातल्यावर आम्ही काहीही न बोलता आमची लाज राखतो. मात्र भावी आयुष्यात (कवितकं करायला हो) उपयोगी पडतील अश्या फार महत्त्वाच्या गोष्टींची भर आमच्या ज्ञानात पडली आहे इतके नमुद करुन मास्तरांना धन्यवाद देतो.

शुचि Fri, 03/19/2010 - 02:34
गुर्जी पाय लागू मी शीतलता तेवणारी नभी तू प्रखर रवीकिरण आपले होणार कसे मीलन? ___ मी सरीता खळाळून वहाणारी तू पहाड स्थितप्रज्ञ शांत कसे गाऊ मीलनगीत गाण्यात? ___ मी कोमल कमलीनी मृदुल तू कठोर तो पाषाण नाते कसे फुलेल अपुले अजाण? ___ असेच दूरून पेटून विझायाचे अंतरी अन निखारे वहायाचे असेच का रे राख राख व्हायाचे? ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।

In reply to by शुचि

राजेश घासकडवी Fri, 03/19/2010 - 19:49
कोमल कमलिनी आणि कठोर पाषाण, खळखळती सरिता आणि स्थितप्रज्ञ पहाड अशा साचेबद्ध उपमांनी कवितेला बहार आलेला आहे. कवितकच्या प्रणालीशी तुम्ही कायमच इमान राखलेलं आहे, ते याही रचनेत दिसून येतं. बाकी ती व तो काव्य या बाबतीत कवितक तुम्हाला काय शिकवणार? (ह. घ्या.) तुमच्या स्वाक्षरीत मधुशालातलं एक कवन दिसलं. अधिक गुणांसाठी मधुशालाच्या काव्यांमध्ये काही प्रणाली दिसते का ते पहा. (डिस्क्लेमर - प्रणाली असणं म्हणजे काव्य वाईट असणं असं नव्हे - ताजमहालदेखील आराखडे करूनच बनवला होता...) राजेश

चतुरंग Fri, 03/19/2010 - 02:37
क्या बात है! :D ग्रासस्टांझाज, आजपासून तुझं नाव 'वर्जेश घासकडवी'!! :B (जालिंदरषिष्य)चतुरंग

मुक्तसुनीत Fri, 03/19/2010 - 02:42
पुलंच्या "हसवणुकी"मधल्या पहिल्या लेखाची आठवण झाली : नवकथेची रेसिपी : (पुलंचा हा लेख साठ सालातला !) तु मा प्रे आ तु मा प्रे ना तू मा प्रे आ पण हा खलनायक का असं करतोय ? तू मा प्रे आ पण तुझा बाप का अ क?

धनंजय Fri, 03/19/2010 - 04:02
पहिल्या प्रकारात बटबटीत आणि चाकोरीतल्या उपमा वापरल्या तर सोप्या. पण त्या बेचव मात्रेला यमक-वृत्ताच्या साखरपाकातून काढल्याशिवाय गिळवणार नाही. शिवाय शब्दही लाडीक आणि जुन्या वळणाचे वापरलेले बरे. उदाहरणार्थ हा गृहपाठ : - - - तो : मी रवि तळपत, तू ग यामिनी उगता मी, तू शिघ्रगामिनी चंचल शशि तुज लाखलाभ गे बनाव अपुला शक्य नसे ती : शशि हा अंशच तव तेजाचा चित्र तुझे येथे तू नसता भेटसि मज तू सांजपहाटे विवाह अपुला अढळ असे - - - वृत्त-यमकाशिवाय वाचवत नाही, वाचत नाही.

In reply to by धनंजय

राजेश घासकडवी Fri, 03/19/2010 - 07:08
नेहेमीप्रमाणेच चांगला झाला आहे, पण यमक वृ्त्तांचं बंधन घालून घेणं अनाठायी, काहीसं रसभंजक झालं असं वाटतं. कवितक प्रणालीमध्ये नाही ते करून दाखवून थोडी शाईन मारण्यापलिकडे जुन्या धाटणीच्या शब्दांनी व रचनेने नव्वदोत्तरीच्या मानसिकतेचा अर्क कवितेत सामावून घेण्यात हे कवन अयशस्वी झालं असं वाटतं. छंद नाकारण्यात जी व्यक्तीगतता आहे, ती या रचनांच्या तळमळीचा आत्मा आहे असं वाटतं. तू सूर्यासारखा बाहेर दिवसा आणि माझी तर कॉलसेंटरची रात्रपाळी... कशी फुलावी आपल्या प्रेमाची लव्हाळी? हे जास्त खुलतं. यमक हलकेच आलेलं आहे, पण चवीत ते पुढे येत नाही. राजेश

In reply to by राजेश घासकडवी

>>तू सूर्यासारखा बाहेर दिवसा आणि माझी तर कॉलसेंटरची रात्रपाळी... कशी फुलावी आपल्या प्रेमाची लव्हाळी? ओ हो, क्या बात है ! =D>

In reply to by तुका म्हणे

धनंजय Fri, 03/19/2010 - 18:58
नाही, "अढळ" असेच! (या धड्याच्या अनुषंगाने "मै तेरा हजबंड तू मेरी वाईफ" हे आधीच गृहीत धरायचे आहे.
नातं मोठं झाल्यानंतरच्या चर्चा... एकदा का नात्यात पडलं की पुरुषांचे शिकारीचे दिवस संपलेले असतात, (गृहपाठातले पहिले कडवे) आणि एकत्र घरकुल बनवण्याचे स्त्रियांचे दिवस सुरू झालेले असतात. (गृहपाठातले दुसरे कडवे)
गृहपाठात कुठल्यातरी बाबतीत धड्याच्या चौकटीला धरून ठेवल्यास पास होण्याइतपत गुण मास्तरांना भूतदयेने तरी द्यावेच लागतात.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू Fri, 03/19/2010 - 10:52
या प्रकाराला पोएटिक प्रोग्रामिंग म्हणून त्याचा मराठीच्या अभ्यासक्रमात किंवा झालंच तर संगणकशास्त्राच्या अभ्यासक्रमात समावेश करावा काय? (संगणकशास्त्रज्ञ)बेसनलाडू

नंदू Fri, 03/19/2010 - 11:25
कवितकांच्या या अफाट मालिकेबद्दल ग्रासस्तांझा गुरूजींच्या प्रतिभेला दंडवत. हा भाग देखिल नेहमीप्रमाणेच बहारदार झाला आहे. जाता जाता "ते माझ्या बुद्धीने केलेलं मराठीतलं स्वैर रूपांतर आहे" =)) हे मात्र फारच आवडलं. आणि हो एक नवा शब्द कळला 'पापिलवार' तसा संदर्भाने अर्थ लागतोय पण म्हणजे नक्की काय ते कळलं तर बरं.

आपल्या स्वप्नांचं सुंदर आकाश तु रंगवतेस किती सहजपणे आभाळभर पसरलेला तुझा खट्याळपणा आवरता आवरता, सावरता सावरता, मला आठवतेस तू ! [प्रश्नार्थक वाक्याऐवजी उद्गारवाचक चालेल का ?] अश्रुंच्या पलिकडेही जाऊन तू सहज सोसते, आयुष्यातील वाळूतील चटक्यांना भावना जाळत तु तेवत ठेवतेस हलकेच माझी ज्योत. कसं सांगु तुला, तुझ्याचसाठी तुझ्याच स्वप्नांना फुलवण्यासाठी मी तडजोड करतो वादळ वार्‍यांशी ! जमलं का ? कविता कशी करावी या विषयावर बोलायला.. आमच्या कॉलेजात येता काय पुढल्या वर्षी गॅदरींगला.[अटी लागू] :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राजेश घासकडवी Fri, 03/19/2010 - 19:35
'आवरता आवरता, सावरता सावरता' ने नादमयता आलेली आहे. 'वादळवाऱ्यांशी तडजोड' पण छान. आणि या कवितेच्या सुजाण स्वराला उद्गारवाचक चिह्नंच अधिक शोभून दिसतात. तुम्ही कवितकच्या प्रणालीचा थोडा विस्तार केलेला आहे. 'तू क्ष करतेस, त्यावर य करताना मला आठवतं तुझं अ करणं, तुझं ब करणं. त्यामुळे मला क वाटतं.' हे छान व्हेरिएशन आहे. कवितकच्या नव्या व्हर्जनमध्ये त्याचा नक्की समावेश करीन. पहिल्या चार कडव्यांचं एक वाक्य करून बघा... राजेश

गुरुजी, कवितक प्रणालीची द्वारे सामान्यांना उघडी करून दिल्याबद्दल आपले आभार मानावे तितके थोडेच आहे. मागच्या धड्याखालचा गृहपाठ आजारपण सांगून टाळता आला पण यावेळी सपशेल हरलो आहे. काही म्हणता काही सूचत नाही. हा गृहपाठ सोडवता येणार नाही असे वाटते. क्षमस्व. साष्टांग नमस्कार करून पळवाट न काढता प्रामाणिकपणे असमर्थता व्यक्त करत आहे. (प्रामाणिक) अक्षय

राजेश घासकडवी Sat, 03/20/2010 - 07:40
अहो तुमच्यासारख्या अभ्यासू विद्यार्थ्याने असं हताश होऊन कसं चालेल? नाती सगळीकडे असतात, प्रश्न सगळीकडे असतात. तुम्हीच एक लिहिलेला आहे. तू केलिस उघडी दारे, मानतो तुझे आभारे, अक्षयास पूर्णत्वाचा हा आशिर्वच तव साचा पण नकळे अक्रित झाले, मम पात्र रिते हे पडले कशि करू अता प्रतार्णा देऊन तब्ब्येती कार्णा तव प्रश्न मला झेपेना मज काही काही सुचेना कर क्षमा मला यावेळी ना सुचे शब्द ना ओळी राजेश

In reply to by राजेश घासकडवी

आहे नाम गुरूचे घासू मी शिष्योत्तम उदासू मज वाटे मार्ग कठिण दिसे मला न तीर तो पळवे सर्व शीण सांगे शोध हाच धीर जगती नातीच फार प्रश्न त्यांचेच भार असे कसे हे नाते कवितकात न्हाते

शरदिनी Tue, 05/18/2010 - 21:16
घासकडवी गुरुजी.... हिंदोळ्याचे विवेचन आणि हा कवितकाचा पाठ आवडला...