मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अलिखीत रोजनिशीतील पाने अर्थात माझा मोटरसायकलवरचा प्रवास (भाग २)

पाषाणभेद · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
अलिखीत रोजनिशीतील पाने अर्थात माझा मोटरसायकलवरचा प्रवास (भाग २) मागील भाग १ पुढील भाग ३ {मी कंपनीतून पैसे अ‍ॅडव्हान्स उचलले. माझी भेट देणार्‍या आश्रम शाळांची नाशिक विभागातील यादी पण घेतली. नाशिक जिल्हा हा नाशिकमधला अधिकारी सांभाळणार असल्याने त्या शाळा सोडून माझ्या वाट्याला एकूण २०/२१ आश्रमशाळा आल्या. माझ्या वाटेच्या शाळांमध्ये नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा व जळगाव जिल्हयातल्या शाळा होत्या.} पुढे चालू......... थोडे आश्रमशाळांबद्दल: आश्रमशाळा ह्या महाराष्ट्र शासनाने चालवलेल्या निवासी शाळा असतात. त्या बहूतेक करून आदिवासी भागातच आहेत. मुले मुली या शाळांत राहतात व शिकतात. काही शाळा फक्त मुलांसाठी किंवा फक्त मुलींसाठी असतात तर बहूतेक शाळा एकत्र आहेत. अगदी गरीब परिस्थीती असणारी लहान लहान मुले या शाळात शिकायला असतात. त्यांच्याकडे बघीतले तर अगदी कणव येते. फक्त दिवाळी व मे च्या सुट्यांत त्यांना घरी जाता येते. सर्व शिक्षकांना त्या त्या शाळांमध्येच असणार्‍या क्वार्टर्स मध्ये रहावे लागते. मुलांना लागणारे जेवण शाळेतच तयार केले जाते. शाळांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, शिपाई, कामाठी आदी असतात. मुलांना सकाळी १२ वाजता तर संध्याकाळी ६ वाजता जेवण दिले जाते. (फक्त खिचडी! दोन जेवणात किती कमी अंतर आहे. नंतर सकाळच्या जेवणात किती जास्त अंतर आहे तुम्हीच बघा. कुपोषण होणार नाही तर काय होईल हो त्या गरीब मुलांचे?) (आश्रमशाळांमध्ये अनेक गैरप्रकार घडतात. ते आपण पेपरात वाचतोच. व्यवस्थापन कसे ढिसाळ असते, मुलांचे काय हाल होतात, शिक्षणाचा दर्जा काय, हा या लेखाचा विषय नाही तरीही लेखनाच्या ओघात तसे उल्लेख येवू शकतात.) घरी आल्यानंतर आता पुढची वाटचाल कशी करावी या विचारात गुंतलो. एकतर अनोळखी प्रदेशात जायचे होते, आणि मी आश्रमशाळांबाबतच्या दुष्किर्तीबद्दल ऐकून होतो. मला केवळ एका अर्जावर मुख्याध्यापकांचा सहीशिक्का आणायचा होता. माझे काम जरी पाच-दहा मिनीटांचे असले तरी ते त्या त्या आश्रशाळांमध्ये जावून करायचे होते. बरे कंपनीत कोणीही या माझ्या जाण्याच्या ठिकाणांना भेट देवून आलेले नव्हते. सगळे अधिकारी, ईंजीनीयर्स हे ऑफीसात बसणारे होते. माझ्या हातात केवळ आश्रमशाळांची यादी व पैसे होते. यादीत केवळ आश्रमशाळा (यापुढे शाळा) असलेली गावे व त्यांच्या तालूक्यांचा उल्लेख होता. त्या ठिकाणी कसे जावे याबाबत काहीच मार्गदर्शन नव्हते. एकूणच माझी परिस्थीती गंभीर होती. सगळ्यात पहिल्यांदा मी बाजारात जावून महाराष्ट्राच्या नकाशाचे पुस्तक आणले. बाजारात अनेक नकाशे उपलब्ध होते. मला साधारण जिल्हा लेव्हलचा नकाशा हवा होता. त्या नकाशापुस्तकांत औरंगाबादच्या समर्थ उद्योग प्रकाशनाचा 'रोड अ‍ॅटलास महाराष्ट्र' हे पुस्तक मला चांगले वाटले.त्यात नवीन तालूके व नवीन रोड यांसहीत गावांची नावे प्रकाशीत केलेली होती. मी सगळ्या आश्रमशाळाची यादी परत एकदा बघीतली. त्या त्या ठिकाणच्या आश्रमशाळांची (यापुढे शाळा) गावे त्या नकाशात आहेत काय हे बघीतले. नशीबाने बर्‍याचशा गावांची नावे नकाशात होती. त्या गावांच्या नावावर मी पेनाने सर्कल केले. एकूणच परिस्थीतीचा विचार करून यादीतील वीसएक शाळांचे साधारण मी दोन गट केले. ऑफीसात मी एकाचवेळी या सगळ्या शाळांत न जाता दोन वेळात जाणार असे सांगीतले. त्यानंतर मी प्रवासाची तयारी केली. जरूरीपुरते कपडे, पैसे, शाळांची यादी, नकाशा पुस्तक, मोबाईल इ. वस्तू घेतल्या. त्याकाळी माझ्याकडे बीएसएनएल चे पोस्टपेड कनेक्शन होते. मोबाईल ग्रामीण भागात एवढा फोफावला नव्हता, तरी पण केवळ बीएसएनएल आहे म्हणून रेंज मिळेल असे मनात गृहीत धरून चालत होतो. प्रवासाला निघण्याच्या अदल्या दिवशी मी जसे काही वनवासाला निघालो अशी माझी परिस्थीती होती. अनोळखी भाग, अपुरी माहिती, किती दिवस लागतील याची माहिती नाही. वनवासाला जाणार्‍या रामाप्रमाणे मी घरच्यांचा निरोप घेतला. नकाशाचा अभ्यास करून मी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर तालूक्यातील 'सुकापूर' या गावापासून प्रवासला सुरूवात करण्याचे निश्चीत केले. त्यानंतरच्या दिवशी म्हणजे शनिवार ११/१०/०३ ला सकाळी १० ला मी नाशिक-नंदुरबार ही बस पकडली. नकाशात सुकापूर हे गाव पिंपळनेरच्या अलीकडे दिसत होते. बसमध्ये बसल्यानंतर मी एकदोन जणांना सुकापूरला कसे जाणार याविषयी विचारले असता पिंपळनेर पर्यंत न जाता पिंपळनेरच्या अलिकडे सुकापूरला जाण्यार्‍या रस्त्यावर उतरण्याचा सल्ला मिळाला. कंडक्टरने तिकीट पिंपळनेरचे काढण्यास सांगीतले. बस देवळा, सटाणा, तहाराबाद करत पिंपळनेरच्या २ /१ किमी अलीकडे असलेल्या एका फाट्याजवळ थांबली. मला तेथेच उतरावे लागले. खाली उतरल्यानंतर रस्त्याच्या एका बाजूला पेट्रोल पंप होता व दुसर्‍या बाजूला एक हॉटेल होते. दुपारचा १ वाजला असल्याने मला भुक लागली होती. आता पुढील ४/५ दिवस मिळेल ते खावे लागणार ह्या हिशोबाने तयारी ठेवलेली असल्याने त्या हॉटेलात मी काहीतरकाहीतरीखाल्ले. आता आठवत नाही पण बहूतेक मिसळच असणार. (शक्यतो मी पाव टाळतो.) गल्यावर असणार्‍या माणसाला मी सुकापूर ला कसे जाणार या विषयी विचारले. त्याने मला फाट्यावर उभे रहा व एखादी जीप मिळते का ते पहाण्याविषयी सांगीतले. आश्रमशाळांत जातांना प्रत्येक ठिकाणी बस मिळेलच अशी खात्री नसल्याने मिळेल त्या वाहनाने प्रवास करण्याचे मी ठरवले होते. मी हातात बॅग घेवून फाट्यावर उभा राहीलो. एकदोन गाड्यांना हात दिला. त्यानंतर एक खच्चून भरलेली प्रवासी जीप आली. एकहीजण खाली उतरला नाही. ड्रायव्हर अर्धा बाहेर राहून जीप चालवत होता. काही लोकं मागच्या फाळक्यावर बसलेले होते. तिनचार जण मागच्या पाय ठेवायच्या जागी उभे होते. त्या परिस्थीतीत आता मी जीपमध्ये कसा चढणार हा प्रश्न मला पडला होता. गाडीत तर माझी बॅगही ठेवायला जागा नव्हती. जीपमधल्या लोकांनी मी तेथील स्थानिक नाही हे ओळखले. एकदोन जणांनी मागे उभे राहायला सांगीतले. मला ते सगळे नवीनच होते. त्या प्रवासातील धोका ओळखून नकार देण्याची माझी तयारी होती पण पुढची सगळी कामे बघून मी बॅग जीपवरील कॅरीयरवर ठेवली व मागच्या पाय ठेवण्याच्या पायरीवर उभा राहीलो. गाडी तर ड्रायव्हर हाणत होता. रस्ता हा ग्रामीण भागातला असल्याने सिंगल असून उखडलेला होता. मला जीपचे कॅरीयर घट्ट पकडून ठेवणे भाग होते. वीसेक मिनीटात सुकापूर आले. जीप'वरून' उतरल्यावर पाहीले तर सुकापूर अगदी छोटे खडेगाव दिसले. जवळच एका पाझर तलावाचे पाणीही दिसले. एका जणाला आश्रमशाळा कोठे आहे ते विचारले. त्याने जवळच असल्याचा हात दाखवून उल्लेख केला. मी चालत चालत शाळेत पोहोचलो. शनिवार असल्याने मुले आवारात खेळत होती. मी मुख्याध्यापकांची रुम कोणती ते विचारल्यावर त्यांनी ती सांगीतली. मी तेथे गेल्यावर माझी ओळख मी तेथील शिक्षकांना करून दिली. माझे येण्याचे प्रयोजन सांगीतले. त्यांनी मला बसायला सांगून मुख्याध्यापकांना येण्याविषयी निरोप एका मुलाकडे दिला. मी पुण्याहून आलो असे सांगताच कोणीतरी आपल्या डिपार्टमेंटचा माणुस आहे असे समजून ते बोलत होते. मला वेळ नाही व मला फक्त सही हवी असे त्यांना सांगीतले. तुमच्या शाळेला काही दिवसांनी नवीन कॉम्पुटर मिळतील असे त्यांना सागीतले. त्यानंतर त्यांनी मला एका रुममध्ये नेले. रुमची चावी एका शिक्षकांकडून मागून घेतली. एक धूळ भरलेली रुम उघडल्यावर आत बरेचशे खोके दिसले. ते सगळे कॉम्पुटरचे खोके होते. त्या सगळ्या खोक्यांत ७ कॉम्पुटर होते. मॉनीटर व सिपीयू, प्रिंटर, युपीएस चे जवळपास वीस एक खोके अगदी सिलपॅक होते. एकही खोका फोडलेला नव्हता. त्यांनी मला सांगीतले की हे सगळे कॉम्पुटर मागच्याच वर्षी आलेली आहेत व अजूनपर्यंत इंन्टॉलही झालेले नसतांना अजून तुम्ही कॉम्पुटर्स का देता आहात! मी त्यांना सांगीतले की तो माझा प्रश्न नाही. हे आधीच ठरलेले असते. आपण नोकर माणूस. मला फक्त या या अर्जावर सहीशिक्का द्या, मला लगेचच निघावे लागेल. तेवढ्यात मुख्याध्यापक आले. त्यांना माझे प्रयोजन सांगीतले. त्यांनी काही खळखळ न करता सही शिक्का दिला. मी लगोलग त्यांचा निरोप घेतला. परत जीपने गावात जेथे सोडले तेथे आलो. चौकशी केल्यानंतर आता अर्ध्या तासाने वरून एक बस येईल किंवा एखादे जीपडे भेटेल तर त्याने जा असे सांगीतले. गाव तर अगदी खेडे होते. मी तेथे एका टपरीवजा जागेत बसलो. जवळपास ५ वाजत आले होते. शेजारच्या एका टपरीतून टाईमपाससाठी चॉकलेटं घेतली, बसलो चघळत. तेवढ्यात तेथे एक मुस्लीम माणूस आला. त्याने एक बकरी पण आणली होती. सराईतपणे तो मी बसलेल्या टपरीत बकरी बांधून तो तयारी करू लागला. मला लगेच कल्पना आली की ती टपरी त्याची असून तो आता बकरीला कापणार. मी शाकाहारी असल्याने मला थोडी किळस आली पण हे जीवन आहे ते जगलेच पाहीजे असा विचार करून मी तेथून उठलो. आता त्या बकरीला कापतांना आपल्याला बघू न लागावे म्हणून थोडा लांब जावून उभा राहीलो. तो पर्यंत तेथे त्याचे गिर्‍हाईके येवू लागली. माझ्या नशिबाने लगेचच एक बस आल्याने पुढचा प्रसंग मला पाहता आला नाही. मी लगेचच बस मध्ये बसलो व बस पिंपळनेरच्या दिशेने निघाली. क्रमश: मागील भाग १ पुढील भाग ३

वाचने 9159 वाचनखूण प्रतिक्रिया 18

मीनल 04/12/2009 - 07:11
काँप्युटर्स येऊन पडलेले. आणि १ वर्ष कुणी इंस्टॉलच केले नाहीत? किती गोंधळ. किती अपव्यय? वस्तू असून ही न वापरणे म्हणजे केवळ प्युअर वेस्टेज! मीनल.

In reply to by मीनल

मनिष 06/12/2009 - 11:09
काँप्युटर्स येऊन पडलेले. आणि १ वर्ष कुणी इंस्टॉलच केले नाहीत? किती गोंधळ. किती अपव्यय? वस्तू असून ही न वापरणे म्हणजे केवळ प्युअर वेस्टेज!
अहो पण गरज नसतांना ती वस्तू माथी मारणे म्हणजे काय? खाली स्वाती ताई म्हणतात तसे, खायला फक्त २ वेळेला खिचडी (ती पण कसली देव जाणे!) आणि २० (वापरता न येणारे) काँप्युटर? चिडचिड होते नुसती!!!

प्रभो 04/12/2009 - 07:55
दफो, अरे यात "माझा मोटरसायकलवरचा प्रवास" कुठेय???? --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

In reply to by प्रभो

पाषाणभेद 04/12/2009 - 08:02
भाई, आताशीक कुटं पयल गाव झालया नव्ह का? का घाई करूं र्‍हायले. हाये आजून मोटारसायकलीवर्ला प्रवास हाये. काळजी नकू. ------ आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्‍या बातम्या/ लेख वाचत नाही. पासानभेद बिहारी

विजुभाऊ 04/12/2009 - 11:39
मी असेच एका कॉलेजात कपाटात ठेवलेले कॉम्प्यूटर्स पाहिले होते. शिक्षकाना ते वापरता येत नव्हते. संस्थेला स्टॉक द्यायचा अस्तो .मुलानी कॉम्प्यूटर मोडले तर काय ? म्हणून प्राचार्यांच्या आज्ञेने ते कपाटात विराजमान होते.

आशिष सुर्वे 04/12/2009 - 11:54
झ्याक लिवताय राव्व.. म्या चिपलूनचा चाकरमानी.. म्हनून खालच्या वर्ननाने एक्दम गावी पोच्ल्यासारकं वाटलं बगा:
ड्रायव्हर अर्धा बाहेर राहून जीप चालवत होता. काही लोकं मागच्या फाळक्यावर बसलेले होते. तिनचार जण मागच्या पाय ठेवायच्या जागी उभे होते
म्या आत्येच्या गावाला (नांदगावला) जाताना अगदी अस्साच जायचा जीपीतून.. माजी आय लय घाबराय्ची बग.. म्या मातुर मस्त हवा खात, गावच्या पाखरान्वर सायनिंग मारत लटकायचा.. पासान राव्व, जरा बिगीबिगी लिवा की.. कसाला हे 'क्रमश:' चं ध्यान दाखवू र्‍हायलंय?? आंगोलीला बसलोय, साबन पन घासलाय चान्गला!.. पन पानीच नाय.. अगदी तस्संच वाटतंय राव्व.. जल्ला आमाला धीरच नाय बगा.. - कोकणी फणस

सुनील 04/12/2009 - 12:33
छान प्रवासवर्णन. ग्रामीण भागातून एस्टीच्या लाल डब्याने फिरताना(खिडकीची जागा मिळाली असेल तर) मौज वाटते. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ज्ञानेश... 04/12/2009 - 12:58
वाचतो आहे. चांगला जमला आहे हा भाग सुद्धा. 'पडून राहिलेले कंप्युटर्स'सारखे अनेक प्रकार सरकारी खात्यात बघायला मिळतात. मी असाच विनाकारण पडून राहिलेला दीड लाखाचा 'सोलर' पाहिला आहे, पुणे जिल्ह्यात! पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

कानडाऊ योगेशु 04/12/2009 - 13:21
पाषाणभेदा मस्त लिहिले आहे. प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहीले. ("सामना" चित्रपटातीची सुरवात अशीच काहीशी आहे. बसची वाट पाहणारा मास्तर,धुरळा उडवत येणारी व न थांबणारी एस.टी... वगैरे वगैरे..) वनवासाला जाणार्‍या रामाप्रमाणे मी घरच्यांचा निरोप घेतला. =)) (मला खरडवहीची सुविधा अद्यापही उपलब्ध न झाल्याने मी तुझ्या एकाही खरडीला उत्तर देवु शकत नाही आहे त्याबद्दल क्षमस्व.जमल्यास मला ypj@indiatimes.com वर मेल कर.) --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

मदनबाण 04/12/2009 - 21:19
दफोराव वाचतोय... मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia

sujay 04/12/2009 - 21:34
लई भारी. गावाकडील जीप प्रवास तर आपल्याला लई आवडतो बघा. म्होरले भाग टंका बिगीबिगी. (वडाप प्रेमी) सुजय

अक्षय पुर्णपात्रे 04/12/2009 - 21:54
श्री पाषाणभेद, ओघवते अनुभवकथन झाले आहे. न उघडलेल्या संगणकांची संख्या सरकारी पातळीवर संगणकांचे जाळे सगळीकडे कसे पसरत आहे, हे दाखवण्याकरता नक्कीच वापरली जात असणार. आमच्या शाळेतही (शाळा सरकारी नसूनही) एक दिवस क्रिडासाहीत्याचे भांडार पाहिले आणि आम्ही त्यातील एक-दशांशही वापरलेले नाही याची तेव्हाही जाणीव झाली आणि संताप झाला होता. बालपण आदिवासी भाग जवळच असलेल्या गावात गेल्याने आश्रम शाळांविषयी थोडेफार माहीत आहे. आजकाल काय परिस्थिती आहे हे आपल्या लेखातून कळतेच आहे. वर्ष-दोन वर्षात भारतात आल्यावर स्वत:च्या घरापाशी असलेला रस्ताही ओळखता येत नाही त्या पार्श्वभुमीवर पंधरा-वीस वर्षांपुर्वी पाहिलेल्या ग्रामीण भागात फारसा बदल झालेला नाही हे चित्र दुर्दैवी आहे. पुढील भागांची आतुरतेने वाट पाहत आहे.

धनंजय 04/12/2009 - 22:04
ओघवते कथन - वा! वाईट परिस्थितीबद्दल वाचून - अरेरे... लेखमाला उत्सूकतेने वाचतो आहे.

स्वाती२ 05/12/2009 - 00:10
पडून राहिलेले कंप्युटर्स आणि खायला फक्त खिचडी :(

पाषाणभेद 05/12/2009 - 20:29
मंडली, टायप कराया टायम लय लागतोया मान्य हाय पन त्याला विलाज नाय. कामच लय येवून पल्डया. आन आपन कस हापीसमधीच टायप करतो ना, घरी टायप कराया घ्येतलं की लगीच बोंब पडती 'तुमच झालं का चालू' म्हून. तरीबी घरी म्या टायप करतोच, हापिसातलं कामं घरी आन्लया म्हनूनशान. हाय काय आन नाय काय. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी

विशाल कुलकर्णी 10/12/2009 - 12:06
दफोभौ वाचतोय... येवुद्या पटापट ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

गणपा 10/12/2009 - 13:29
वाचतोय रे दगड फोड्या. खेळाच सामान तुटेल खराब होईल या कारणासाठी कपाटांत बंदच राहाते. त्यातले चेंडु, फुटबॉल उंदिर कुरतडुन जातात पण मुलांच्या वाटेला काही येत नाही. अशी प्ररिस्थिती अजुनही बर्‍याच शाळांत आहे. संगणाका सारखी महागडी वस्तु मुलांपर्यंत पोहचेल का याची शंकाच वाटते. -माझी खादाडी.