राजजींच्या 'रोखठोकनाम्या'ची 'ब्ल्यू प्रिंट'
महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा वसा घेऊन पुढे निघालेले तेजतर्रार नेते, मराठी माणसाची बुलंद तोफ, उत्तर भारतीयांचे निर्दालक, हिंदीनिर्मूलक श्रीमान राजजी ठाकरे यांच्या 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' नामक संघटनेने गत काही दिवसांत तमाम मराठीयांचे लक्ष वेधून घेतले आहे. पुराणकाली राक्षस ही संज्ञा वापरली जायची, तद्वतच हल्ली महाराष्ट्र देशी 'भय्या' ही संज्ञा जवळपास त्याच अर्थी वापरली जात आहे. तर सांगायचे असे की या भय्या मंडळींचे महाराष्ट्र देशीची राजधानी मुंबई व इतर नगरांत वर्चस्व वाढू लागल्याचे राज यांच्या चाणाक्ष चष्म्याने टिपले आणि नवनिर्माण बाजूला ठेवोन त्यांनी 'झाडाझडती' हाती घेतली. या झाडाझडतीने धरती आंदोळली. कित्येक 'बांगड्या' फुटल्या. कित्येक घरंगळत पुन्हा आपल्या मायदेशी गेल्या. राजमान्य राजेश्री राजजींच्या या तेजतर्रार आंदोलनाने बहु मराठी मने आनंदली. 'मराठा तितुका मेळवावा'चा नाद घुमला आणि या महाराष्ट्रदेशी 'आनंदवनभुवनी'ची अनुभूती येऊ लागली. तर या सगळ्याचा मोठा लाभ राजजींना झाला. त्यांची लोकप्रियता बहु वाढली.
त्यातच महाराष्ट्रदेशी निवडणूक जाहीर झाली. राजजींशी आमचे अतिशय घरोब्याचे संबंध असल्याने या निवडणुकीत आम्ही त्यांच्या पाठिशी असणार आहोत. म्हणूनच त्यांच्या अतिगुप्त बैठकांतही आमचा सहभाग असतो. अशाच एका बैठकीत आम्ही सहभागी झालो असता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 'रोखठोकनाम्याची' 'निळी छपाई' अर्थात ब्ल्यू प्रिंट आमच्या हाती लागली. (रोखठोक हे शीर्षक श्रीमान ठाकरेजींच्या स्वभावाशी निगडीत असून त्याचा 'ठोकण्याशी' काहीही संबंध नाही हे सूज्ञास सांगणे न लगे.) सांगायचा मुद्दा असा की हा रोखठोकनामा राजजींच्या व्यक्तिमत्वाला साजेसाच आहे. राजजी दगडांच्या या देशाच्या विकासासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विकासाची ब्ल्यू प्रिंट बनविण्याच्या प्रयत्नात होते, असे ऐकिवात होतेच. आता ते नेमके काय करणार आहेत, ते या रोखठोकनाम्यातून कळले.
राजजी हे सगळे जे काही करत आहेत, ते 'महाराष्ट्र माझा, मी महाराष्ट्राचा' या न्यायानेच असल्याने हा रोखठोकनामा मला मायबाप जनतेसमोर आणणे जरूरीचे वाटले. म्हणून तो कळीच्या नारदांकडून 'राज ने फिर उगला जहर' अशा विपरीत स्वरूपात बाहेर येऊ नये म्हणून आम्ही तो फोडण्याचा (हल्ली फोडणे, झोडणे, सहन करणार नाही, कानाखाली... वगैरे शब्द आमच्या तोंडी येतात, या मागचे इंगित आता कळलेच असेल.) धाडसी निर्णय आम्ही घेतला आहे. महाराष्ट्रहिताचा हा रोखठोकनामा असा.
* महाराष्ट्रात यापुढे फक्त मराठीच बोलली, लिहिली जाईल. (ही मराठी कोणती यावर सध्या चर्चा (खरं तर वाद) सुरू आहे. पुण्याची, विदर्भाची, कोकणातली, खानदेशातली की पश्चिम महाराष्ट्रातली असा तो वाद आहे. काहींनी ज्ञानेश्वरकालीने मराठीचे रूप सर्वांत शुद्ध मानावे असे म्हटले आहे. पण मराठा महासंघ व इतर संघटनांनी त्याला तीव्र विरोध करून तुकारामाच्या काळातील मराठी शुद्ध मानावी असे म्हटले आहे.
* महाराष्ट्रात प्रवेश नाक्यांवर 'मराठी बोलणार्यासच प्रवेश' असा बोर्ड लावला जाईल. या तसेच सर्व नाक्यांवर एक भाषाविषयक तज्ज्ञ ठेवण्यात येईल. त्याची पात्रता साधारणपणे मराठी प्राध्यापकाएवढी असेल. (पात्रता हा शब्द शैक्षणिक पात्रतेशी निगडीत असून त्याचा बौद्धिक कौशल्याशी संबंध नाही.) प्रत्येक गाडीतून उतरणार्या प्रवाशाला मराठी येते की नाही याची तो तपासणी करेल. तसेच मराठी शिकविण्याची व्यवस्थाही येथे असेल. किमान कामचलाऊ मराठी शिकविण्याचे 'क्लासेस' उघडणार्यांना येथे फुकट सरकारी भूखंड दिला जाईल. विमानतळावरही मराठी शिकविण्यासाठी खास अधिकारी असेल.
* शाळेतही अर्थात मराठीतूनच शिकवले जाईल. हिदी भाषिक विद्यार्थ्यांना 'एक्स्ट्रा मराठी' असा विषय असेल. त्यात त्यांना हिंदी भाषकांना ळ, ड, ट, ज्ञ ही अक्षरे तसेच च, ज यांचे उच्चार घोटवून घेण्यात येतील. त्यांच्याकडून मराठीचा सराव करण्यासाठी 'घननीळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा' हे गाणे कविता म्हणून पाठ्यक्रमात सामील करण्यात येईल. हे गाणे म्हणून दाखविणार्या हिंदी भाषकाला 'मराठी प्रवीण' ही पदवीही देण्यात येईल.
* याशिवाय ज्यांचे शिक्षण पूर्वी हिंदीत झाले आहे त्यांना मराठी शिकविण्यासाठी 'फाडफाड मराठी' 'तातडीचे मराठी', कामचलाऊ मराठी' 'शुद्ध मराठी' असे कोर्स सुरू करण्यात येतील. हे कोर्स चालविणार्या क्लासचालकांना सवलती देण्यात येतील. तसेच यासाठी लागणारी पुस्तके सरकारी खर्चाने उपलब्ध करून देण्यात येतील.
* उत्तर भारतीयांना मराठी 'धडा' शिकविणार्या मराठी युवकांना विशेष गुण दिले जातील. याचा उपयोग त्यांना सरकारी नोकरीतील प्राधान्य, सरकारी घरात प्राधान्य वगैरेसाठी होऊ शकेल.
* बैंक, बैग, इस्कूल, आईसीआईसीआई असे उच्चार करणार्या हिंदी भाषकांना कठोर दंड ठोठावण्यात येईल.
* केंद्र सरकारच्या महाराष्ट्रातील कार्यालयातही मराठीतूनच कामकाज चालेल. 'हिंदी पखवाडा' बंद करून 'मराठी वर्ष' असा उपक्रम राबविला जाईल. टपालापासून आयकरापर्यंतची सर्व कार्यालये मराठीतूनच काम करतील. रेल्वेचे कामकाजही महाराष्ट्रात तरी मराठीतूनच चालेल. त्यामुळे रेल्वेची उद्घोषणा फक्त मराठीत केली जाईल. महाराष्ट्रातील इतर भागात या उद्गोषणा मराठी आणि तेथील स्थानिक प्रादेशिक भाषेतही असतील. उदा. खानदेशात- खानदेशी. रेल्वेतील सर्व हिंदी शब्द मराठीत केले जातील. उपरी उपस्कर डिपो' वगैरे शब्दांचे मराठीत भाषांतर केले जाईल.
* दुकानांच्या सर्व पाट्या मराठीतच असतील. इंग्रजीत असलेल्या पाट्याही मराठीत करण्यात येतील. उदा. बिग बझारचे 'मोठा बाजार', कॅफे कॉफी डेचे कॉफीचे दिवसाचे हॉटेल असे नामकरण करण्यात येतील. एवढच नव्हे तर ज्या कंपन्या महाराष्ट्रातून चालविल्या जातात, त्यांची नावेही मराठीत होतील. उदा. रिलायन्सचे 'विश्वास', कॅमलचे 'उंट' अशीही नावे मराठीत असतील.
* छट पूजेला परवानगी दिली जाईल. पण ही पूजा पूर्णपणे मराठीत होईल. त्यासाठी मराठी भिक्षुक असतील. त्यानंतर होणारी गाणीबजावणीही अस्सल मराठी होईल. त्यात लावणी, लोकसंगीत, मराठी भावसंगीत असे चढत्या भाजणीचे कार्यक्रम ठेवावे लागतील.
* मनोरंजनाची साधने फक्त मराठीतच उपलब्ध होतील. उदा. मराठी चित्रपट सर्व चित्रपटगृहात लावले जातील. त्यातही अलका कुबल छाप चित्रपट तर मल्टिप्लेक्समध्ये दाखविण्यात येईल. मराठी अभिनेत्यांना ग्लॅमर येण्यासाठी त्यांची मानधनाची रक्कम ही कोट्यावधीत देण्यात येईल. समजा निर्मात्याने (कसेबसे) २५ हजार दिल्यास उर्वरित रक्कम महाराष्ट्र सरकार देईल. मराठीचा गौरव टिकविण्यासाठी सरकारचे हे 'पुरोगामी' पाऊल असेल.
* बॉलीवूडचे चित्रपटही मराठीतच तयार होतील. फक्त त्याला हिंदी सबटायटल्स देण्याची मुभा दिली जाईल. पण त्यांना या चित्रपटात कंपल्सरी एक मराठी आयटम सॉंग टाकावे लागेल. (मराठीत हिंदी आयटम सॉंग चालते मग हे उलटे का नाही?) महाराष्ट्रात रहाणार्या हिंदी भाषकांना 'कंपल्सरी' मराठी चित्रपट पहावे लागतील. त्यांचे मराठी सुधरेपर्यंत तरी आठवड्याला एक असा हा 'रतीब' असेल.
* मराठीत काम करणार्या बॉलीवूडच्या अभिनेत्यांना त्यांच्या चित्रपटांच्या संख्येनुसार पुरस्कार देण्यात येईल. उदा. पाच चित्रपट केल्यास महाराष्ट्र गौरव, दहा केल्यास महाराष्ट्राचा अभिमान असे पुरस्कार देण्यात येतील.
* मराठी रागसंगीतातील हिंदी, अवधी, ब्रज भाषेतली बंदिशी बदलून त्यांची जागा मराठी पदांनी भरून काढली जाईल. त्यासाठी पूर्वी जसे राजकवी असायचे तशी कवींची भरती करण्यात येईल. हे कवी या बंदिशींना पर्यायी मराठी बंदिशी देतील.
* बिहार व युपीमधून येणार्या रेल्वेगाड्यांमध्ये महाराष्ट्रातील शेवटचे स्टेशन येईपर्यंत मराठी संस्कृतीची सीडी दाखवली, ऐकवली जाईल. त्यात अभंग, गवळण, लावणीपासून भावसंगीत ऐकविण्यात येईल. त्यानंतर मराठी सण-उत्सवांची ध्वनिचित्रफित दाखविण्यात येईल. महाराष्ट्रात येताना शेवटचे स्टेशन असेल तिथे यावर एक प्रश्नमंजूषा ठेवली जाईल. त्यात प्रथम क्रमांक मिळविणार्यांना 'पाईक महाराष्ट्राचा' हा पुरस्कार देण्यात येईल.
तर राजमान्य राजजींच्या 'रोखठोकनाम्यात' मराठीचा गौरव वृद्धिंगत करण्यासाठी अनेक 'कलमे' आहेत. पण विस्तारभयास्तव त्यातील मोजकी कलमेच येथे दिली आहेत. माननीय राजजींच्या नेतृत्वाखालील सरकार या महाराष्ट्र देशी आल्यानंतर नक्कीच मराठीचा गौरव वाढेल हे उपर्यु्क्त तर्जुम्यावरून कळोन येते नाही का?
ता. क. - वरील 'रोखठोकनामा' ही थोरल्या महाराजांचे निकटस्थ रा. रा. मोरोपंत पिंगळे यांच्या आज्ञापत्रे या बहु गाजलेल्या ग्रंथाची त्रिशतकोत्तर आधुनिक आवृत्ती असल्याचे आमचिया कानावर आले आहे.
(डिसक्लेमर-१ वरील रोखठोकनामा हा विनोद करण्याचा प्रयत्न असून शक्य झाल्यास आपल्या गालाची कातडी यातून हलेल ही अपेक्षा. मात्र या लेखावरून 'मराठीचे पाय ओढणारे मराठीच' या किंवा तद्वतः नावाचा नवा धागा काढल्यास आम्ही तो आमचा अपमान समजू :D
पूर्वप्रकाशित-वेबदुनिया
आणि हो, माझ्यावर राजविरोधी, मराठीविरोधी असे शिक्के मारण्याआधी कृपया माझेच हे लेख वाचण्याची तसदी घ्यावी. ही नम्र विनंती.
http://www.misalpav.com/node/4147
http://www.misalpav.com/node/4148
http://www.misalpav.com/node/3655
वाचने
12792
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
काही लोक चरचगेट पण म्हणतात 8|
चुचु
In reply to काही लोक by पर्नल नेने मराठे
आता तिकडे ना चर्च ना गेट मग काही का म्हणेनात.!
आणखी काही सुचना-
फोर्ट विभागाला -किल्ला म्हणावे.हा किल्ला पण आता नाही. दादर म्हणजे गुजरातीत जिना असे वाचले होते. त्याचेही नामांतर व्हावे.
शिवाजी पार्क ला शिवाजी उद्यान.चर्नी रोड असे लिहिलेल्या ठिकाणी काळे फासुन तिकडे गिरगाव असे लिहावे.ग्रँट रोडला महामार्ग. नरिमन पॉईंट्ला नरिमन बिंदु.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
In reply to काही लोक by पर्नल नेने मराठे
लेख अर्धा वाचल्यावर मला तो कशा प्रकारचा लेख आहे ते लक्षात आले. मग मी मनातल्या मनात यादी केली की हा लेख कुणाला व कुणाला तो वाचून राग येईल.
कळविण्यास अत्यंत आनंद होतो की माझ्या यादीतली नावं बर्यापैकी बरोबर ""सही") निघाली.
ही यादी खासगी/गोपनीय (confidential) असल्याने ती "फोडायचा" आग्रह करू नये ही विनंती.
असो.
सुधीर काळे
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
In reply to कुणाला आवडेल, कुणाला नाहीं याची यादी by सुधीर काळे
हा लेख तुम्हाला आवडला की नाही?
मीही अशीच यादी केली होती. माझ्या यादीत तुमचेही नाव असून मला माझा अंदाज पडताळून पहायचा आहे.
आणि अर्थातच..ही यादी खासगी/गोपनीय (confidential) असल्याने ती "फोडायचा" आग्रह करू नये ही विनंती.
In reply to काही लोक by पर्नल नेने मराठे
मी मुकुंद स्टीलमध्ये असताना भट्टीवर बरेच पुरभय्ये होते. (नंतर आम्ही मराठी लोकही घेतले)
ते सापाल सरप (सर्प) म्हणत. मग ते चर्चगेटला चरचगेट म्हणतात यात मला आश्चर्य वाटले नाही.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
तुमचा अपमान होऊ नये म्हणून गप्प बसतो. ;)
बाकी लेख विनोदी असला तरी फारफेच्ड वाटला. असो.
बिपिन कार्यकर्ते
In reply to हम्म्म्म!!! by बिपिन कार्यकर्ते
तुमचा अपमान होऊ नये म्हणून गप्प बसतो. ;)
बाकी लेख विनोदी असला तरी फारफेच्ड वाटला. असो.
अगदी असेच म्हणायचे आहे.
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
विनोद करण्याचा इतका केविलवाणा प्रयत्न ह्याआधी पाहिला नव्हता. कशाची चेष्टा करावी हे ज्याचं त्याला कळलं पाहिजे. भैय्यांनी इतकी घाण करूनही त्यांच्या विरूद्ध बोलणार्या राज ठाकरेंविषयी अशा प्रकारचा लेख एका मराठी माणसाने, मराठी संस्थाळावर लिहावा आणि संपादकांनी तो ठेवावा ह्याचे वैषम्य वाटले. सावरकरांनी सांगितलेली सद्गुण विकॄती तंतोतंत पटली.
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
वाईट या गोष्टीचे वाटते के लिहीणारा एक मराठी माणुस आहे.
मी याला विनोद न म्हणता फालतुपणा म्हणेन. :-(
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
In reply to सहमत ! by विशाल कुलकर्णी
अगदी सहमत...
दगडू धोंडू कडून ही अपेक्षा नव्हतीच....
पूले शु.................................
:-(
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
In reply to +++++१ by अनिल हटेला
लेख अर्धा वाचला आणी सोडुन दिला...
अजुन बरच काही लिहायची इच्छा होत आहे.. पण गप्प बसतो..
--टुकुल.
In reply to सहमत ! by विशाल कुलकर्णी
१०००% टक्के सहमत
*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
आपल्याशी सहमत
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
पुणेरी मराठीत झणझणीत ऊत्तर द्यायची खुपच ईच्छा होते आहे..पण बोललो तर परत म्हणाल अपमान केलात म्हणुन...
बाकी समजुन घ्या आता तुम्हीच.
"(डिसक्लेमर-१ वरील रोखठोकनामा हा विनोद करण्याचा प्रयत्न असून शक्य झाल्यास आपल्या गालाची कातडी यातून हलेल ही अपेक्षा."
सॉरी, अपेक्षा पुर्ण करु शकत नाही..
Think twice before you speak, and then you may be able to say something more insulting than if you spoke right out at once.
लेख वाचून खेद वाटला..
लेखकाला मानसिक आजार असण्याची दाट शक्यता असल्याने एवढेच म्हणेन..
''लवकर बरे व्हा आणि माणसात..(ते ही मराठी माणसात) या''
-
मराठमोळा
कोकणी फणस
लेख मस्तच लिहिलाय. वागण्या-बोलण्यातलं व्यंग छानच टिपलंय.
अवांतर:
शिवसेनेच्या अनुभवावरून सांगतो की राज ठाकरे देखिल फारसं काही करू शकणार नाहीत. सद्द्या जे काही सुरु आहे ते केवळ जम बसवण्यासाठी आहे इतकेच. एकेकाळी शिवसेनेनेही अशीच दहशत इतर भाषिकात बसवलेली होती; मराठी माणसाचा स्वाभिमान जागृत करून त्याच्यात एक जबरदस्त विश्वासही निर्माण केला होता हे देखिल तितकेच सत्त्य आहे...पण इतर भाषिकांकडून पैशाच्या थैल्या जसजशा मोकळ्या झाल्या तसतशी मग शिवसेना मराठी माणसाला विसरत गेली .
शिवसेनेने राज्यसभेत पाठवलेले खासदार कोण होते ते आठवून पाहा...संजय निरूपम,चंद्रिका केनिया,राहूल बजाज वगैरे वगैरे
तरीही राजना एक संधी द्यायला काहीच हरकत नाही. कारण शेवटी काही झाले तरी ते मराठी आहेत आणि आपण त्यांना मदत नाही केली तर मग आहेतच इतर भाषिक लोक...ते लगेच ताबा घेतील ननिसेनेचा.
विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
हीहीही ... लोळून नाही हसायला आलं तरी गालावर सुरकुत्या नक्कीच आल्या! पण बिकाशी सहमत ... थोडा लांबला आहे लेख. लांबी कमी असती तर आणखी पंच वाटला असता.
ळ, ट, ण चा मुद्दा फारच आवडला. चुकून "डॉ.सौ. ळ" यांचं चित्रं काही बंगाली मित्रांनी पाहिलं. त्यांना जोक समजून सांगावा लागला... तेही ते इन्फिनीटीच्या आकाराचं मुळाक्षर असतं ना, अशी सुरूवात करून!
अदिती
हा लेख तुम्ही टाकायला नको होता. वेब दुनीयेतच ठेवायला पाहिजे होता.
-----------------------------------
"मिपा खेळून घरी जावू नका. घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे."
"ऑफिसातल्या कंटाळ्याला उध्वस्त करी मिपा... मिपा मिपा खेळत बसा."
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
लेख फारच आवडला.
त्याची पात्रता साधारणपणे मराठी प्राध्यापकाएवढी असेल. (पात्रता हा शब्द शैक्षणिक पात्रतेशी निगडीत असून त्याचा बौद्धिक कौशल्याशी संबंध नाही.)
लेखकाला कधीतरी डिलीट बटनाचा त्रास झालेला दिसतो :-)
-- मिसळभोक्ता
In reply to मस्त लेख !!!!! by मिसळभोक्ता
डब्बल बॅरेल ने गोळी सुटली असावी काय :?
मराठी मुलुखाच्या बाहेर (आयुष्यभरासाठी) राहून मराठीपणा जपणार्याला मराठी/अमराठीचा वेगळा अनुभव येतो. महाराष्ट्रात राहाणार्यांपेक्षा खूपच वेगळा.
उदाहरणार्थ बेंगळुरात कामानिमित्त स्थलांतरित झालेल्यांना कन्नड शिकायचे असून शिकायला खूप त्रास होतो. मग कन्नड भूमिपुत्रवाद्यांचा जाच वाटू लागतो, आणि मग कुठला भूमिपुत्रवाद एकांगी असल्याचे मत बनते. (बेंगळूरु हे फक्त उदाहरण - भोचक हे हिंदी मुलुखात स्थायिक झालेले आहेत, असे त्यांच्या लिखाणावरून कळते.)
भोचक यांचा लेख या वेगळ्या दृष्टिकोनातून आलेला आहे, असे मला जाणवते. वेगळ्या दृष्टिकोनासाठी वाचनीय आहे. त्यांनी लिहू नये असे कोणाला प्रथमदर्शनी वाटले, तर त्यांनी लेखनाचा हा कंगोरा मुद्दामून पडताळावा.
मस्त लेख. :-)
पण 'राज जी' नाही हो राजसाहेब म्हणा!
बिका, प्रमोदकाका, अदिती, धनंजय, मिसळभोक्ता, कालिन्दी, चुचु, भेन्डीबाजार. तुमच्या प्रतिक्रिया आल्या नि जीव भांड्यात पडला. राजसमर्थकांच्या गर्दीत ते मलाच 'गर्दीत मिळवतात' की काय वाटले होते. हुश्श. तुम्ही म्हणता तसा लेख लांबलाय हे नक्की. तो आटोपशीर करता आला असता. असो.
बाकी मला विकृत, मनोरूग्ण, मानसिक आजार झालेल्या ठरविणार्यांनी किमान लेख वाचला याबद्दलही आभार. वास्तविक त्यांनी मला जी शेलकी विशेषणे दिली आहेत, त्याच विशेषणांनी मीही साधारणपणे आठवी-नववीत असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंविषयी असं काही लिहिणार्या, बोलणार्यांविरोधात प्रतिक्रिया देत असे, ते आठवलं. आता किंचित वय, थोडं वाचन आणि बरचसं फिरल्यामुळे आणि त्यातही परप्रांतातच राहिल्यामुळे मतं बदललीत इतकंच.
भोचक यांचा लेख या वेगळ्या दृष्टिकोनातून आलेला आहे, असे मला जाणवते. वेगळ्या दृष्टिकोनासाठी वाचनीय आहे. त्यांनी लिहू नये असे कोणाला प्रथमदर्शनी वाटले, तर त्यांनी लेखनाचा हा कंगोरा मुद्दामून पडताळावा.हे लिहिण्यामागेही एक कारण आहेच. तीही घडलेली घटना. इंदूरमध्ये आम्ही आधी रहात असलेल्या ठिकाणी माझ्या बायकोशी आजूबाजूच्या काही बायका गप्पा मारत होत्या. त्यावेळी राजचं आंदोलन उभं राहिलं होतं. त्यातल्या एका बाईनं अगदी निरागसपणे माझ्या बायकोला विचारलं, हमे तो साल में एक-दो बार शिरडी जाना पडता है. क्या हमें भी मराठी सिखना पडेगा? त्यावर बायकोला तिची समजूत घालता नाकी नऊ आले होते.
लेखकाला मानसिक आजार असण्याची दाट शक्यता असल्याने एवढेच म्हणेन.. ''लवकर बरे व्हा आणि माणसात..(ते ही मराठी माणसात) या''९६- मराठा साहेब काय आहे सध्या मी खरोखरच हिंदी भाषकांत रहातोय. त्यामुळे मराठी माणसात खरोखरच यायचंय हो. पण त्याला थोडा वेळ लागेल. आपण दाखवलेल्या आस्थेविषयी मी कृतज्ञ आहे. बाकी वैचारिक मतभेद मांडून त्याचा वाद-प्रतिवाद करण्याची शक्ती संपली की विकृत, मानसिक रूग्ण ठरविणे सुरू होते. अशीच मते असणार्यांनी मग माझा हाही लेख जरूर वाचावाच. (भोचक) तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
In reply to राजसमर्थक आणि मी by भोचक
मनावर घेऊ नका भोचकसाहेब! लेख चांगला आहे.
राजची चेष्टा करणे म्हणजे मराठीविरोधक असणे असे समीकरण पोरकटपणाचे आहे... त्याला कळत नकळत मान्यता देऊ नका.
जय महाराष्ट्र!
In reply to राजसमर्थक आणि मी by भोचक
वर दिलेली लिंक उघडत नसल्याचे कळले. ही ती लिंक.
न्यूनगंडाचे नवनिर्माण
(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
ही आहे आमची वृत्ती
In reply to राजसमर्थक आणि मी by भोचक
लिहीणार नव्हतो...पण सपांदकाची पुर्व-परवानगी लागेल....आहे का कोणी ,चतुरंग,बिका ,तात्या वगैरै???
बाकी काही लोकांना अकला येणार नाहीत हेच खरे,
जेव्हा एखादा पान खाउन थुंकणारा भैया,घरात घुसुन,आया-बहिणींची अब्रु काढेल, तेव्हा ह्या हुच्चभ्रु,चौकटीत जगणार्या,उस-रिटर्न,मराठी म्हणवणार्यांना अकला येतील जणु....
असो...
आमच्या मागच्या पिढीने शेपुट-घाल्या वृत्तीने सर्वांना स्विकारले,आता आमची पिढी त्याला विरोध करतेय तर आला ह्यांना उत.....
बाकी भोचकराव, बरे झाले मिपावर च लिहीले..महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी चुकुन ही बोलु नका हे......
सू हा स...
खरे पाहता आपल्याशी वाद घालण्याची माझी मुळीच इच्छा नाही कारण आपण आपली स्वतःची मते इथे प्रस्तुत केली आहेत आणि त्याचा प्रत्येकाला पुरेपूर अधिकार आहे.
आम्ही इथे सदस्य झालो आहोत ते केवळ आपल्या लोकांशी निखळ संवाद साधण्यासाठी.. वाद-प्रतिवाद करण्यासाठी नव्हे!
तसे पाहता आम्ही सध्या अमराठी भाषकांतच रहातोय.. पण आमचा मराठीपणा मात्र जिवापलीकडे जपलाय! आपणही जपला असाल ह्याची खात्री आहेच!!
महत्वाची गोष्ट म्हणजे 'मिपा' म्हणजे एखादे 'राजकीय व्यासपीठ' नव्हे, तेव्हा असले लेख 'इथी' लिहिण्यापूर्वी त्याचा सर्वांगाने विचार झाला असता तर बरे झाले असते, असे माझे स्वत:चे मत आहे..
ह्या धाग्यावरील हे माझे शेवटचे लिखाण असेल कारण 'मिपा'च्या घराला राजकारणाची वाळवी न लागलेलेच चांगले!
धन्यवाद.
-
कोकणी फणस
(अस्सल मिपाकर..)
लेखामागील उद्देश नीटसा कळला नाही. टोकाचे मुद्दे मांडून आंदोलनाच्या मुळ आशयाकडे काणाडोळा करायचा की लेख विनोदी आहे असे म्हणून सोडून द्यायचे ह्या संभ्रमात आहे.
शिवसेनेच्या अनुभवावरून सांगतो की राज ठाकरे देखिल फारसं काही करू शकणार नाहीत. सद्द्या जे काही सुरु आहे ते केवळ जम बसवण्यासाठी आहे इतकेच. एकेकाळी शिवसेनेनेही अशीच दहशत इतर भाषिकात बसवलेली होती; मराठी माणसाचा स्वाभिमान जागृत करून त्याच्यात एक जबरदस्त विश्वासही निर्माण केला होता हे देखिल तितकेच सत्त्य आहे...पण इतर भाषिकांकडून पैशाच्या थैल्या जसजशा मोकळ्या झाल्या तसतशी मग शिवसेना मराठी माणसाला विसरत गेली
श्री. प्रमोद देव ह्यांची वरील प्रतिक्रिया १००% पटणारी आहे.
मराठी भाषिकांनी महाराष्ट्राचे 'मराठीपण' स्वतःच्या हाताने, कर्माने गमावले आहे. श्री. राज ठाकरेंच्या आंदोलनाने मराठी माणसात 'मराठीपण' जागृत व्हावे, मराठी माणसाने आत्मपरिक्षण करावे आणि परप्रांतियांची व्यावसायिक कोंडी करावी. हे साध्य झाले तर राज ठाकरेंचा फोटो घराघरात लावायला हरकत नसावी. असो.
मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
भैय्यांनी इतकी घाण करूनही त्यांच्या विरूद्ध बोलणार्या राज ठाकरेंविषयी अशा प्रकारचा लेख एका मराठी माणसाने, मराठी संस्थाळावर लिहावा आणि संपादकांनी तो ठेवावा ह्याचे वैषम्य वाटले आसेच म्हनतो.
केवळ विनोदी म्हणून लेख तर नक्कीच चांगला आहे. थोड्या वैचारिक दुर्ष्टीकोनातून बघितल्यावर हि आवडला.
नुकताच हे एक लेख वाचला, आणि फार मौज वाटली: http://timesofindia.indiatimes.com/india/MNS-diktat-No-foreigners-as-item-girls-employ-local-talent/articleshow/5688290.cms
हा जो प्रकार आहे, तो "Xenophobia" चा आहे. तुम्ही मराठीच्या जागी, ऑस्ट्रेलिया टाका, आणि भैय्या च्या जागी भारतीय टाका, तरीसुद्धा तो तितकाच अप्लीकेबल आहे. आता तुम्ही तो एक Australian म्हणून वाचता कि भारतीय म्हणून, या वरून ठरेल तुम्हाला तो आवडला कि नाही.
माणस कुठलीच वाईट नसतात. बघण्याचा दृष्टीकोन त्यांना चांगला व वाईट बनवतात. (मला नाही वाटत, लादेन च्या मुलांसाठी लादेन वाईट बाबा असतील).
आपला तुक्या,
ता. क. मी राज समर्थक नाही. आणि माझा व्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास आहे.
तुम्ही हा लेख लिहण्यमागचा उद्देश एक नवीन लेख लिहुन स्पष्ट करावा म्हणजे सर्वांना तुम्हाला समजुन घेता येईल
*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........*****
*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........*****
एक वर्षानंतर या लेखाचे पुनरुत्थान झाले काय? कशासाठी?
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
Write to President: presidentofindia@rb.nic.in; Write to PM: pmosb@pmo.nic.in
हा लेख आवडला नाही .... X( X( X( X(
काही लोक