मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कारुण्याशा

शरदिनी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कारुण्याशा... एक कारुण्यडगरीवरचा रौद्रभीषण चिपसेट मत्तदुर्दैवाच्या औक्षणधुंद करालदाढा कर्र कर्र कर्र कर्र सत्यवानाच्या तहवैभवाने टाकलेले सुन्नगारूड अन जवनिकेतून कर्णिकेकडे खळाळणारा रुधीरप्रवाह लब डब लब डब नयनांच्या दलदलीतला हलताडुलता वंचनदाह स्व-टाहोने लिंपून घेतलेला शारीर खुळखुळा खुळा रे खुळा, खुळा रे खुळा... एका स्वप्नपिंपळपानावरून पुनश्व हरि ओम पीतवल्लरींच्या अनुमानात कडाडबूम मेघवर्षा धो धो धो... अन मग सारंच शांत.. पुढच्या पिंपळपानापर्यंत... १६ मे २००९ , पुणे

वाचने 9608 वाचनखूण प्रतिक्रिया 37

विसोबा खेचर Sun, 05/17/2009 - 00:36
एक शब्द पण समजला नाय..! असो, म्होरल्या वेळेला जरा समजतील अश्या कविता येऊ द्या एवढीच विनंती..! कर्र कर्र कर्र..! (हे आपलं असंच बर्र का!) :) आपला, (खुळा रे खुळा!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अनंता Mon, 05/18/2009 - 14:55
अगम्यतेच्या पातळीवर काव्य नक्कीच उतरले आहे असे म्हणायला वाव आहे. बाकी मर्ढेकरप्रभृतींनी जेव्हा नवकवितेला अनोखा आयाम देण्याचा यत्न केला; तेव्हा तथाकथित -प्रस्थापित काव्यलेखन करणारांच्या उरात एकप्रकारची अशीच धडकी भरली होती. नवविचारांचे वारे पिऊन, जेव्हा प्रस्थापितांना शह देण्याचा प्रयत्न होतो तेव्हा अशाच प्रकारच्या स्पंदनाची अपेक्षा असते. वरकरणी दुर्बोधतेचं लेणं लेवून अशी ही कविता असली तरी सृजनतेच्या पातळीवर कविता, तिसर्‍या जगातली नसली तरी, आहे रे आणि नाही रे यातली सीमारेषा पुसट करण्याचे अतिशय मौलिक कार्य तरल मनाच्या कवयित्रीने केले आहे, हे एव्हाना मिपाकरांस कळून चुकले असेलच! एका विशिष्ट मर्यादेपलिकडे जाऊन या नवकाव्याकडे पाहावे असे माझे प्रामाणीक मत आहे. आता दोन शब्द कवयित्रीच्या काव्यशैलीबद्दल -तर त्यांनी आपली शैली मुळेच बदलू नये, प्रत्येक नव्या विचाराला त्या त्या काळात विरोध झालेला आपणांस अगदी कालपरवाच्या इतिहासात पाहायला मिळेल. अशा प्रकारच्या काव्याने हळूवारपणे लिखाण करणार्‍यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्यास, त्यासाठी नवविचारवादी विचारसरणीला जबाबदार धरता येत नाही, एवढे समजले तरी पुरे!! वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!

पाषाणभेद Sun, 05/17/2009 - 06:50
काहीतरी आहे तेथे. दुर्बोध कविता. पण काहीतरी गुढ समजले पण सांगता येत नाही. चांगला डोक्याला खुराक. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

विसोबा खेचर Sun, 05/17/2009 - 08:11
माझ्या अंदाजनुसार या कवितेचे रसग्रहण फक्त आमचा धनंजयच करू शकेल..! :) मी त्याच्या रसग्रहणाची वाट पाहात आहे.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सहज Sun, 05/17/2009 - 08:15
गुरुनाथ आबजींनी नवकविता लिहल्या असत्या तर त्यावरुन प्रेरणा म्हणून अश्या ???

प्राजु Sun, 05/17/2009 - 08:21
सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही!!!!!!!!! #o खर्र कट् खर्र कट्!! (कोणीतरी मोठ्ठ्यात मोठ्ठी बाम ची बाटली द्याल का?) ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मनीषा Sun, 05/17/2009 - 08:27
अतिशय प्रभावी शब्दयोजना --- कल्पना आणि त्या मांडण्यासाठी वापरलेली संरचना नाविन्यपूर्ण आहे थोडी क्लिष्ट्ता आणि दुर्बोधता कमी केली तर तुम्ही अतिशय सुरेख आणि आशयसंपन्न कविता लिहू शकाल शुभेच्छा !!!

In reply to by मनीषा

>>अतिशय प्रभावी शब्दयोजना --- कल्पना आणि त्या मांडण्यासाठी वापरलेली संरचना नाविन्यपूर्ण आहे. मनातल्या प्रबळ भावनांचा, शब्दांचा उद्रेक म्हणजे कविता एवढेच त्याचे स्वरुप नसते, हे जरी खरे असले तरी, नव अनुभव व्यक्त करतांना, शब्दांची मांडणी करतांना, नित्यव्यवहारातील शब्दांमधून बोथट झालेल्या संवेदना मांडण्याऐवजी, काहीतरी वेगळा अनुभव मांडतांना, कवितेची अशी काही तरी मांडणी होते . पण कवितेतला अनुभव वाचकांनाही (कधीतरी )लुटता आला पाहिजे हेही खरं आहे. आपली कविता वाचतांना एका दुर्बोध आणि क्लिष्ट लिहिणा-या कवीची आठवण झाली. अर्थात अशा कविता लिहिणा-यांची जातकुळीच वेगळी असते नै का ! तेव्हा लिहित राहा, असेच म्हणेन. सारांश : कवितेची शैली आवडली. अनुभवाचा आनंद मात्र मिळत नाही. :( -दिलीप बिरुटे

In reply to by अवलिया

>>बिरुटे सरांच्या प्रतिसादाचे मराठीत भाषांतर कुणी करुन देईल काय ? आम्ही जशी कविता त्याच दर्जाचे प्रतिसाद लिहिण्याचा प्रयत्न करतो. :) अवांतर : क्लिष्ट आणि दुर्बोध लेखनाचा आणखी एक उत्तम नमुना इथे ! -दिलीप बिरुटे (क्लिष्ट, दुर्बोध, कविता वाचक )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सारांश : कवितेची शैली आवडली. अनुभवाचा आनंद मात्र मिळत नाही.
मला पण थोडं फार असंच वाटत आहे. मुळात कवितेतलं काही कळत नाही, त्यातून या प्रकारच्या कविता तर अजिबात नाही. पण कवयित्री काहीतरी मांडायचा प्रयत्न करत आहे असे राहून राहून वाटले. पण शब्दवैचित्र्याच्या हव्यासापोटी कविता (माझ्या पुरती) एकदम मजेशीर झाली आहे. :( बिपिन कार्यकर्ते

लिखाळ Sun, 05/17/2009 - 15:58
अन जवनिकेतून कर्णिकेकडे खळाळणारा रुधीरप्रवाह लब डब लब डब
हृदयाच्या स्पंदनांचा आवाज आवडला.. (लब डब हा आवाज स्पंदनांचा आहे असा माझा समज झाला.) कवितेतली शब्दचमत्कृती नेहमी प्रमाणेच लक्षवेधक आणि अर्थ दडवून ठेवणारी. हृदयाचा आकार आणि पिंपळपान यात काही साम्य आहे असे वाटले आणि त्याची मजा वाटली. कविता वाचून समजले काही नाही पण वाचून मजा आली :) -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

स्वप्नयोगी Sun, 05/17/2009 - 18:28
मी अजुनही विचार करण्याचा प्रयत्न करतोय पंखांना क्षितीज नसते, त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे आभाळ असते.

विंजिनेर Sun, 05/17/2009 - 18:42
एकदम आपल्या हुसेनमियाँचे घोडे असतात तशीच आहेत की तुमच्या कविता.. त्यांची ती चित्रं बघायला लई भारी वाटतात पण कळत काही नाही तसंच... विंजिनेर रविवर्मा मुपो म्हैसूर ---- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

धनंजय Sun, 05/17/2009 - 22:49
शरदिनी यांचे काव्य हे अतिशय विचारपूर्वक बांधलेले असते, असा माझा गेल्या काही कविता वाचतानाचा अनुभव आहे. यात त्यांच्या वैयक्तिक अनुभवातील संदर्भांची घट्ट वीण असते. ते संदर्भ सर्व वाचकांना लागतील असे नाही. उदाहरणार्थ पहिल्याच ओळीत - > एक कारुण्यडगरीवरचा रौद्रभीषण चिपसेट यात तद्भव मराठी तत्सम संस्कृत हिंदुस्तानी आणि इंग्रजी-तांत्रिक शब्दांची जोड आहे. ही सर्व अनुभवविश्वे वाचक म्हणून माझ्यासाठी एकाच वेळी मनात कधीच उपस्थित होत नाहीत. पण कवयित्रीच्या मनात उपस्थित झालेली आहेत, ती मलातरी प्रामाणिक स्थिती वाटते. मला मराठीत हृदयाच्या ठोक्यांचा आवाज "लब-डब" मुळीच ऐकू येत नाही - धकधक किंवा धडधड असा ऐकू येतो. पण इंग्रजी तांत्रिक पुस्तकामधून असा आवाज इथे उसना घेतला आहे. त्याने माझ्यासाठी रसभंग हू. पण मग वाटते - असा रसभंग व्हावा हेच कवयित्रीचे उद्दिष्ट्य आहे काय? अशाच प्रकारे, पूर्ण कविता मला कल्पक आणि स्वयंभू वाटते आहे. सांगितलेला अनुभव माझ्या मनाला भिडला नाही, ही वैयक्तिक बाब आहे. ही कविता शरदिनी यांच्याच "डुर्र डुर्र" कवितेच्या चौकटीत रचलेली आहे. ही रचना-चौकट पुन्हा वापरावेसे कवयित्रीला का वाटले असावे, याबद्दल कुतूहल आहे. दोन्ही कविता डोळ्यासमोर आणता, एक कविता दुसरीचे विडंबन आहे, अशी अंधुक कल्पना मनात येते. अशी कल्पना वाचकाच्या मनात तरळू द्यायचे कवयित्रीचे विचारपूर्वक उद्दिष्ट्य आहे काय?

In reply to by धनंजय

भडकमकर मास्तर Mon, 05/18/2009 - 00:18
धनंजय् एकदम अचाट भारी समीक्षा करतात... :) >>>डुर्र कवितेची चौकट पुन्हा वापरली आहे,... :) हा शब्दप्रयोग फार आवडला... ही कविता अधिक बरी वाटते आहे परंतु शब्दवैचित्र्याचा अट्टाहास कमी केलात तर वाचकाला समजायला बरे पडेल असे सूचित करावेसे वाटते, पण कवयित्री हेच स्वत:च्या शैलीचे बलस्थान समजते, त्यामुळे अशाच कविता वारंवार पहाव्या लागणार असे दिसते... अर्थात फुलापानाच्या कंटाळवाण्या त्याचत्याच कविता ( कळी उमलली, फुले फुलली,सृष्टी शालू, झाड पाय सोडून तळ्यात बसले,वारा आला-पडला,पाऊस गारवा,थंडी उरी शिरशिरी, ऋतू बदलला, ऊन वाढले, सुरवंट कोशात गेला,माणसाला घाम आला , गांडूळ पालींचा विणीचा हंगाम सुरू झाला.असले काही) वाचण्यापेक्षा मी शरदिनीबाईंच्या कवितांना प्राधान्य देइन हे नक्की...अर्थात हे वैयक्तिक मत झाले... त्यामुळे बिरुटे सरांसारखंच म्हणतो, लिहीत रहा... ( आम्हाला कधीतरी समजेल) _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

In reply to by भडकमकर मास्तर

अर्थात फुलापानाच्या कंटाळवाण्या त्याचत्याच कविता ( कळी उमलली, फुले फुलली,सृष्टी शालू, झाड पाय सोडून तळ्यात बसले,वारा आला-पडला,पाऊस गारवा,थंडी उरी शिरशिरी, ऋतू बदलला, ऊन वाढले, सुरवंट कोशात गेला,माणसाला घाम आला , गांडूळ पालींचा विणीचा हंगाम सुरू झाला.असले काही) वाचण्यापेक्षा मी शरदिनीबाईंच्या कवितांना प्राधान्य देइन हे नक्की सहमत आहे. तेच-तेच शब्द वापरुन कवींनी आशयाबरोबर चांगल्या कवितांचाही पार चोथा केलाय !

In reply to by शरदिनी

नितिन थत्ते Mon, 05/18/2009 - 07:48
अहो, तुम्हाला नक्की काय म्हणायचय या कवितेतून हे गद्यातून हितंच लिहा की आधी. खराटा (रंग माझा वेगळा)

आ हा हा हा आजचा दिवस सार्थकी लागला. उद्या लिहायला वाचायला शिकुन काय कमावले असे कोणी विचारले तर मी अभिमानानी सांगीन की मी शरदीनी ह्यांच्या कविता वाचल्या, त्यावर प्रतिक्रीया दिल्या. आपल्या कविता म्हणजे मत्त सागराच्या छातीवर डौलाने डोलणारे एखादे गलबतच. 'कारुण्याशा...' असे करुण आशा असलेले शिर्षक घेउन आलेली हि कवीता साडेसत्तावीस सेकंद माणसाल विचार करायला भाग पाडते आणी साडेबत्तीस सेकंद निशब्द करुन टाकते. त्यातुन आपण वापरलेले काही मराठी शब्द हे जणु आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत, त्याचा वापर बंद झाल आहे. जुन्यापान्या शब्दांना त्यांचे अढळ स्थान पुन्हा प्राप्त करुन द्यायचा आपला हा प्रयत्न निश्चीत कौतुकास्पद आहे. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

विजुभाऊ Mon, 05/18/2009 - 15:44
लिहा हो बिंधास्त लिहा. ग्रेस ने " निळ्या आकाशाची जांभळी हाक" असे लिहिले तर ते ग्रेट वाटते कविता जेवढी वैयक्तीक होते तेव्हढी ती दुर्बोध होत जाते. सर्वस्पर्षी कविता पॉप्युलर होते कारण ती व्यापक अनुभवावर लिहिलेली असते "पिपात मेले ओल्या ऊंदीर" हे जेंव्हा लिहिले गेले होते तेंव्हा तेही दूर्बोध होते. भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही

धनंजय Mon, 05/18/2009 - 20:57
हे मला अजून तितकेसे भावले नाही. पण जृंभणश्वान यांच्याशी व्यनि-व्यवहार झाला, त्या नंतर हे ठीक आहे असे मानतो. काही म्हटले तरी विशिष्ट संदर्भ वापरणे हे कवयित्रीला स्वतःला प्रामाणिक वाटणे महत्त्वाचे. वाचक म्हणून मला शब्दांची निवड न पटणे किंवा पटणे गौण आहे.

In reply to by धनंजय

चतुरंग Mon, 05/18/2009 - 21:11
त्यानंतर प्रथम संधी सापडताच स्टेथोस्कोप कानाला लावून माझ्याच हृदयाचे ठोके निवांत ऐकले तेव्हा असाच ध्वनी आला. हृदयाच्या आकुंचन प्रसरणाबरोबर रक्ताचे फेकले जाणे आणि हृदयातल्या पातळ आणि चिवट पडद्यांची हालचाल ही ह्याच 'लबडब' शब्दाने जास्त चांगली ध्वनित होते हा माझा अनुभव आहे. ह्या ध्वनीत एकप्रकारची स्निग्धता आणि ओलावा आहे जो 'धडधड' किंवा तत्सम इतर शब्दात नाही! :) चतुरंग

In reply to by चतुरंग

धनंजय Mon, 05/18/2009 - 22:26
> दिल लब्डब लब्डब के कह रहा है आ भी जा... याच्या इतकेच > दिल धडक धडक के कह रहा है आ भी जा... ठीक वाटते, प्रेमळ वाटते. मराठीत (इतकेच काय कुठल्याही भारतीय भाषेत) तालाचे बोल "ल"अक्षराने बनणार नाही असे वाटते. मला वाटते एखादा तबलजी हृदयाचे ठोके तंतोतंत वाजवू शकेल - धा त्रकऽ धा त्रकऽ धा त्रकऽ (बहुतेक तरुण/स्वास्थपूर्ण लोकांत दुसरा आवाज असा दुभंगलेला ऐकू येतो, म्हणून 'त्रक') हृदयाचे ठोके बाळ आईच्या छातीवर ऐकते. प्रियकर, प्रेयसी, एकमेकांच्या छातीवर डोके ठेवतात तेव्हा ऐकतात. (अगदी स्टेथोस्कोपपेक्षा छान ऐकू येतो - स्टेथोस्कोप हा लोकलज्जा आणि सोयीसाठी वापरतात.) हा आवाज माणसाला अगदी उपजत जिव्हाळ्याचा आहे. प्रत्येक भाषेतल्या लोकांनी तो आपल्या भाषेत तितक्याच जिव्हाळ्याने शब्दबद्ध केला आहे. (भारतातील लोकांना तो योग्य ऐकू येतो, आणि इंग्रजी लोकांना योग्य ऐकू येत नाही, असे माझे म्हणणे नाही. पण प्रत्येक भाषेची काही लकब असते. इंग्रजीत मुलांची गोष्ट ऐकताना पक्ष्यांची 'ट्वीट-ट्वीट' गोडच वाटते. पण मराठी बोलताना आपला 'चिवचिवाट'/'किलबिलाट' ओळखीचा वाटतो.) बाकी प्रस्तुत कवितेतल्या > सत्यवानाच्या तहवैभवाने टाकलेले सुन्नगारूड > अन जवनिकेतून कर्णिकेकडे खळाळणारा रुधीरप्रवाह या संदर्भात स्निग्धता आणि ओलावा अपेक्षित भाव आहे का? "जवनिका", "कर्णिका" वगैरे मेडिकल डेटॉलचा वास येणारे शब्द आहेत, म्हणून आंग्ल-विद्या-विभूषित "लबडब" शब्द योग्य असावा, असे भासून मला तो थोडासा पटतो आहे.

बहुगुणी Fri, 05/15/2015 - 21:24
'शरदिनी' नाव खूप महिन्यांनी (वर्षांनी?) बोर्डावर पाहिलं म्हणून धागा उघडलं तर चक्क (ओरिजिनल) मास्तरांनीच धागा वरती आणलेला दिसला! शरदिनी बाईंच्या कविता येऊ द्यात पुन्हा एकदा!