स्कूप( Scoop,)
आता विसाव्याचे क्षण....
असे जरी असले तरी,
जो पर्यंत राम तोपर्यंत काम
असेच जगावे लागते.
डोक्याला खुराक हवा,हात पाय हलवायलाच हवे,पंचेंद्रियाचे लाड पुरवायला हवे. असो...
नेहमीप्रमाणेच वामकुक्षी आगोदर नेटफ्लिक्स उघडले.नवीन मालिका Scoop दोन दिवसांपूर्वी प्रकाशीत झाली होती.अमेझोन प्राईमने आगोदर सुचित केले होते.सहसा आंग्ल भाषेच्या वाटेला मी जात नाही मग तो चित्रपट असो किंवा पुस्तकं. टिचकी मारण्या आगोदर सारांश व कलाकारांची नावे वाचल्यावर कळाले की नाव जरी आंग्ल भाषेत असले तरी मालिका हिन्दीच आहे.
दिग्दर्शक-हंसल मेहता (स्कॅम १९९२ फेम)
कलाकार-करिश्मा तन्ना, संदेश कुलकर्णी, हरमन बावेजा,मोहम्मद झीशान अय्युब व इतर.
प्रकाशन तारीख- २ जून २०२३
कथानकाचा आधार,
प्रसिद्ध वरिष्ठ महिला पत्रकार जिग्ना व्होरा, यांनी स्वतःच्या आयुष्यात घडलेली दुर्दैवी घटना, Behind Bars in Byculla: My Days in Prison,(प्रकाशनाची तारीख १८ सप्टेंबर २०१९) या पुस्तकात लिहीली असून सहा भागाची ही छोटीसी मालिका याच पुस्तकावर आधारीत आहे.
सत्य घटना.....
२०११ मधे पत्रकार ज्योतिर्मय डे (जे डे) यांची मुंबईत हिरानंदानी, पवई येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली.या खुना मधे संशयित म्हणून जिग्ना व्होरा यांना मुबंई पोलीसांनी अटक केली.
कथानक
जागृती पाठक,महत्वाकांक्षी पत्रकार, वरीष्ठ पत्रकाराचा खुन व ऑर्गनाईझ्ड क्राईम मधे अडकते.यानंतर तीने व तीच्या नातेवाईक,मित्र,शुभचिंतकांनी केलेला संघर्ष,तुरूंगातले ते भयावह अनुभव,जटिल न्याय प्रक्रिया, क्लिष्ट सरकारी प्रणाली,अधिकाराचा गैरवापर,एक महिला पत्रकार,सिंगल मदर व त्यामुळेच येणाऱ्या मर्यादा, महिला म्हणून पुरूषप्रधान समाजा च्या वेगवेगळ्या आपेक्षा अशा अनेक बाजूं दाखवणारी मालिका प्रेक्षकांची उत्कंठा सुरवाती पासून शेवटपर्यंत कायम ठेवण्यात यशस्वी झाली आहे.MOCOCA आणि TADA चा कठोर वापर.अंडरवर्ल्ड,मीडिया आणि पोलिस यांच्यातील संबंध अशा व इतर संबधीत वरील सब॔धीत मुद्द्यांवर ही मालिका आरामात बोलते. मालिका तुम्हाला तथ्ये सादर करते.
तारांगण...
मुख्य भूमिकेत करिश्मा तन्ना हिचा शानदार अभिनय. ती मालिकेची हिरो आहे.करिश्मा तन्नाने पत्रकार जागृती पाठक या भूमिकेला पुरेपुर न्याय दिला आहे.हरमन बवेजा, संदेश कुलकर्णी, प्रोसेनजीत, मोहम्मद झीसान अयुब, तन्मय धनानिया आणि इतर सर्व कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय.
मालिकेच्या तांत्रिक बाजू सुद्धा पडद्यामागील कलाकारांनी बखुबी सांभाळल्या आहेत. हंसल मेहता हे दिग्दर्शक म्हणून सर्व कलाकारां कडून उत्कृष्ट काम करवून घेण्यात यशस्वी झाले आहे. कलाकारांनी सुद्धा जीव ओतून काम केले आहे. अंडरवर्ल्ड ट्रायल तुरूंगात कसे राहातात व त्यांच्या कुटुंबियांची कुतरओढ,इटंर पर्सनल,डिपार्टमेंटल दुश्मनी स्पर्धा याचे चित्रण खूप छान आहे. कथा प्रवाही आहे व प्रेक्षकवर्ग प्रवाहात बरोबर वाहात जातो.
अगर एक आदमी कहे कि बाहर बारिश हो रही है और दूसरा कहे कि बाहर धूप है.ऐसे में मीडियाका काम दोनों का पक्ष बताना नहीं,बल्कि खुद खिड़की के बाहर देखकर सच बताना है.
-जोनाथन फ्रेस्सर
हे कुणी ,केव्हा कुणाला,कुणाच्या साठी म्हणाले आहे हे बघण्यासाठी मालिका बघायला हवी. जोनाथन यांचे विचार आजची पत्रकारिता गंभीरपणे फाॅलो करते का असा एक विचार मनात डोकावून जातो.
एवढ्या हाय प्रोफाईल, हायली कनेक्टेड अंडर ट्रायल व्यक्तीची ही दुरावस्था तर दुर्दैवी गरीब,लाचार कुठल्याही प्रकारची मदत उपलब्ध नसणाऱ्या अंडर ट्रायल लोकांची काय अवस्था असेल या कल्पनेनेच अंगावर काटा येतो.
थोडे लेखिकेबद्दल..
मुबंई मधे रहाणारी ३७ वर्षिय सिंगल मदर,जिग्ना व्होरा,वरीष्ठ पत्रकार,फ्री प्रेस,मुबंई मिरर आणी मिड डे सारख्या प्रतिष्ठित वर्तमानपत्रा साठी गुन्हेगारी जगातील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून रकाने लिहीत होत्या. सुविद्य कायद्याची पदवी व पत्रकारिते मधे पदविका.आयुष्यात अनेक दुर्दैवी घटनांवर मात करत करियरच्या शिखरावर असताना एकदम खाली कोसळते. यमयातना झेलल्या नंतर तब्बल सात वर्षांनी २०१८ मधे या भयानक दुष्टचक्रातून मुक्त होते.
आकर्षक आणि चित्तवेधक अशी मालिका.
मला मालिका आवडली. पुस्तक सुद्धा मागवले आहे.
वाचने
4520
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
लेखा मधील मजकूर व्यवस्थित (justifed (ctrl-j)) कसा करायचा म्हणजे सादरीकरण सुदंर दिसेल.
कृपया प्रकाश टाका.
नेहमीप्रमाणेच वामकुक्षी आगोदर नेटफ्लिक्स उघडले.नवीन मालिका Scoop दोन दिवसांपूर्वी प्रकाशीत झाली होती.अमेझोन प्राईमने आगोदर सुचित केले होते.कळाले नाही. नेटफ्लिक्स वर कोणता शो येणार हे अॅमेझॉन प्राईम ने कसे काय सुचित केले ? यात त्यांचा काय फायदा ?
In reply to कळाले नाही by धर्मराजमुटके
हायला,तंत्रज्ञान लईच बेकार कधी धोका देईल समजत नाही.
अकुशल मागास वरागी,
क्षमस्व, तेव्हढ सोडून वाचा.
In reply to काही पेस्ट चा लोचा. by कर्नलतपस्वी
ऐवजी काॅपी वाचावे
पण ओटीटी वर जास्त नसल्याने माझा पास. कंटेंट इज द किंग असे म्हटले तरी कंटेंट इतका महामूर झालाय की श्वास घ्यायला फुरसत होणार नाही सगळे बघायचे म्ह्टले तर...
In reply to परीचय आवडला by राजेंद्र मेहेंदळे
सहमत.
दुपार खाली असते त्यामुळे घरबसल्या मनोरंजन.
म्हणून पत्रकारिता या विषयावर स्वतःचं मत मांडण्याचा मोह आवरत नाहीय.
तर निष्पक्ष पत्रकारीता नावाची गोष्ट असते का? माझ्या मते ती नसते. कारुण्य, सहानुभूती यामुळे बातमी आपोआप एका पक्षाच्या बाजूने लिहिली जाते आणि त्यात गैर असे काही नसते. अन्यथा “जिवाच्या भीतीनं श्वानाने केला कडकडून दंश” अशी पण बातमी देता येईल ना?
हल्लीच सकाळ हे वर्तमानपत्र डबल ढोलकी प्रकारचं वर्तन करतांना दिसतं. राजकीय पक्षांशी जवळीक असणं असे त्या मागचे कारण असू शकते. त्यांची व्यावसायिक गणितं पण असतील. परंतु त्यामुळे ते वर्तमानपत्र कुणालाच विश्वासार्ह वाटणार नाही हा धोका ते पत्करत आहेत. असो.
In reply to मालिकेचा विषय पत्रकारितेचा आहे by सर टोबी
पत्रकाराला स्वतःची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक मते असू शकतात. किंबहुना असावीच, कारण पत्रकारही या देशाचा नागरिक आहे. परंतु पत्रकारिता मात्र निष्पक्ष असावी. बातमीच्या नावाखाली आपली वैयक्तिक मते व पूर्वग्रह घुसडू नये.
पत्रकारिता हा इतर कोणत्याही व्यवसायासारखा व्यवसाय आहे. उद्या डॉक्टरांनी, मी अमक्या विचारसरणीच्या माणसावर उपचार करणार नाही किंवा चुकीचे उपचार करीन असे म्हटले तर ते चालेल काय? त्याचप्रमाणे पत्रकारांनी एका पक्षाची, धर्माची, विचारसरणीची बाजू घेऊन वटवागळेपणा करणे हा नैतिक अपराध आहे.
In reply to असहमत by चलत मुसाफिर
आजकाल ज्याला बघावं तो कुणा एकाचं तुणतूणं वाजवत असतो. खरं काय खोटं काय,काय की !
बाकी मिपाकर भारीच, रोज एक तरी नवीन शब्द कोषात येतो.
वटवागळेपणा
In reply to असहमत by चलत मुसाफिर
परंतु पत्रकारिता मात्र निष्पक्ष असावी. बातमीच्या नावाखाली आपली वैयक्तिक मते व पूर्वग्रह घुसडू नये.पत्रकार, पोलीस, वकील, डॉक्टर, लष्करी सेवा, निमलष्करी सेवा (आणि जर एखादे प्रोफेशन विसरलो असेल तर ते ही) ह्या पेशांचे दैवीकरण तत्काळ थांबवले पाहिजे हे मला वाटते. सर्व समाजाचा मोरल भार अतिशय मानव पण पेशाने सामाजिक परिघात वावरणाऱ्या लोकांवर लादणे मला त्यांच्याप्रती अमानुष वाटते. त्यांना बोलू द्यावे, जे त्यांना वाटते ते, मनमोकळे, त्यांची मते बहुमाताशी जुळत असतील तर ते टॅग अलोंग होतील, नसतील तर Irrelevant होतील आजच्या तारखेत कैक पत्रकार झालेत तसे. अरेच्या तुम्ही तर पत्रकार/पोलीस/वकील/डॉक्टर तुम्हीच असे अमुक तमुक बोलता असे म्हणणे, आपल्यासारख्या सामान्यजनांनी आपापली राजकीय मते "मग तुम्हीच सांगा डॉक्टर साहेब/ वकील साहेब/ इन्स्पेक्टर साहेब बरोबर का चूक मी म्हणतो ते ?" ह्यातून त्यांना ब्रेक द्यावा. लेट देम बी ह्युमन , अँड शुवरली देल बी ह्युमेन... हा माझा काही काही प्रसंगी आलेला अनुभव. शब्द समाप्ती ई. ई.
In reply to मालिकेचा विषय पत्रकारितेचा आहे by सर टोबी
मला सुद्धा तुमचे म्हणणे पटते.
मुळात, बरेच वृत्तलेखन हे सरकारी रिलीज, संस्थात्मक रिलीज ह्यांवर आधारित असते. ग्राउंड वर जाऊन, नवी माहिती मिळवून काही लिहिले असे लेख एकूण रतीबाच्या तुलनेत नगण्य असतात. मग जर ठोस रिलीज वर वृत्तांकन असेल तर मग दोन्ही बाजूने त्या रिलीज चे आकलन काय आहे हे समजणे वाचकाच्या दृष्टीने गरजेचेच आहे. त्यामुळे, आपले मत मांडण्यात काही गैर नाही.
खोटे बोलू नये, किंवा स्वतःस न पटणारे अप्रामाणिक आकलन छापू नये हे झालेच. Integrity असावी.
परीचय आवडला.
ही केस तेव्हा गाजली होती. जिग्ना व्होरा निर्दोष होती का? तस असेल तर तिला कोणी लटकावले? मी OTT वर नाही. पण जाणण्याची इच्छा आहे.
In reply to परीचय आवडला. by भागो
वाचून सांगतो.
In reply to परीचय आवडला. by भागो
Behind Bars in Byculla,My Days in Prison.
जिग्ना व्होरा यांनी आपली आत्मकथी सुंदर मुद्देसूद लिहीली आहे.
त्यात लिहील्या प्रमाणे तीला या केस मधे गोवले होते.कथेची सुरवात कमिशनर हिमांशू राॅय यांच्या आत्महत्येने होते.
पत्रकार,पोलीस,अंडरट्रायल महिला कैदी व त्यांचे नातेवाईक, मित्र यांच्या आयुष्यावर खुप चांगला प्रकाश टाकला आहे.
खुनाच्या सात वर्षानंतर जिग्नाची निर्दोष सुटका झाली. अपकमींग, हुशार क्राईम रिपोर्टरचे करियर धुळीस मिळाले.
न्यायप्रविष्ट असलेल्या खटल्यातील कैद्यांची कशी वाट लागते व दबंग कैदी तुरूंगात असूनही कसे सुख उपभोगतात याचे विस्तृत वर्णन आहे.गरिब,असाहाय्य,बेसहारा कैद्यांबरोबर न्याय कसा होईल, बेल व खटला किती लवकर निकालात काढता येईल यावर न्यायप्रणाली चे कर्ता धर्ता यांनी गंभीरतेने विचार केला पाहिजे.
नुकत्याच जेल मधील कैद्यांनी लिहीलेल्या कविता वाचल्या. मन खिन्न होते.
परिचय आवडला कर्नलसाहेब. ही मालिका अवश्य बघणार.
परिचय आवडला 👍 कदाचीत ही मालिका बघेनही!
अवांतरः
२०११ मधे पत्रकार ज्योतिर्मय डे (जे डे) यांची मुंबईत हिरानंदानी, पवई येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली.ह्या केस बद्दल तेव्हा वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने भरून बातम्या येत होत्या. पण हि घटना माझ्या लक्षात राहण्याचे कारण म्हणजे पवईतल्या हिरानंदानीत गार्डन्स मध्ये, आमच्या सौभाग्यवतींचे कार्यालय असलेल्या इमारतीपासून जवळच ही हत्या झाल्याने पुढे कित्येक दिवस ती ऑफिसला जायला घाबरत होती!
मदत