Skip to main content

कल्पनेतील चव!

लेखक लई भारी यांनी शनिवार, 14/07/2018 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
'सेक्रेड गेम्स' खूप चर्चेत असली तरी मला खूप शिवराळ भाषा आणि विनाकारण असलेली काही दृश्ये यामुळे इतकी आवडली नाही. त्यात आपली जुनाट बॉलीवूडी विचारसरणी असल्यामुळे एका सीझन मध्ये सगळी गोष्ट संपली नाही की झेपत नाही! :) बाकी अभिनय, कथासूत्र, निर्मितीमूल्य वगैरे उत्तम आहेच. असो, तर लिहिण्याचा मुद्दा म्हणजे एक आवडलेला प्रसंग. एका प्रसंगात नवाजुद्दीन आपल्या बायको ला घेऊन बाहेर जेवायला जातो. महाराष्ट्रीयन थाळी असणारंच ठिकाण असत पण तिला ते सगळं नवीन असतं. जेवताना तिचा संकोच दिसतो. शेवटी 'खरवस' येतो स्वीट-डिश म्हणून. तिला आग्रह करतो आणि सांगतो कि छान असतं खा. पण ती खात नाही. नंतर एका समारंभात गेल्यावर ती १२ जिलेबी खाते. मग नंतर गाडीत तिला विचारतो तुला गोड इतकं आवडत तर 'खरवस' का नाही खाल्लास? तेव्हा ती सांगते की लहान असताना त्यांच्या घरी खरवस फक्त गणपतीला नैवेद्य म्हणून यायचा आणि तिला खायला मिळायचा नाही. घरात आल्या आल्या त्याच्या वासाने तिला कळायचं. खूप आवडायचा खरवस पण कधीच मिळाला नाही. त्यामुळे त्याची चव कशी असेल याची तिने एक कल्पना केलेली असते; खूप चांगली किंबहुना स्वर्गीय सुख देणारी चव तिने कल्पलेली असते. त्यामुळेच ती म्हणते की, मला असं वाटलं की प्रत्यक्षात ते खाल्ल्यावर ती चव त्या कल्पनेच्या जवळपास जाणार नाही कदाचित; म्हणून मग ती नाकारते. ती कल्पनेतली चवच तिला जास्त आनंददायी आहे. आयुष्यात बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत असंच होत, आणि एखाद्या मोठ्या गोष्टीकडून अपेक्षाभंग झाल्यावर वाटत की 'याचसाठी का केला होता अट्टाहास?' त्यामुळे कधी कधी अशा अपूर्णतेतच आनंद असतो असं वाटत!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6144
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

@जेम्स साहेब: खूप मोठा विचार सांगितलाय तुम्ही. मी हे नेहमी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. @ज्योति अलवनि : अगदी खर आहे! गीत रामायणासारखी दैवी कलाकृती पुन्हा होणे नाही! @सोमनाथ खांदवे @कुमार१: आवर्जून पोच दिल्याबद्दल धन्यवाद :)

एका सीझन मध्ये सगळी गोष्ट संपली नाही की झेपत नाही! इतके निराश होऊ नका. त्या सिरियन अतिरेक्याला पळूण जायची संधी दिली आहे. मला तर ही (हा पहिला रतिब यशस्वी ठरला तर) दुसर्‍या सिझनसाठी ठेवलेली पळवाट (हूक) दिसते आहे ! =))

काही गोष्टी अप्राप्यच छान वाटतात. हातात आल्यावर अगदीच निराशा नाही झाली तरी अपेक्षेएवढे समाधान मिळेलच असे नाही.

@डॉ. सुहास म्हात्रे: पुढच्या सीझन ची तयारी करून ठेवलीय खरी. मी कुठेतरी वाचल की हा सीझन म्हणजे पुस्तकाच्या साधारण २५ टक्केच आहे. त्यामुळे ४ सीझन ची निश्चिती दिसतेय. @पैलवान: अगदी खरंय.

आज सकाळीच हा भाग पाहीला. मला या सिरीजमधल्या भावलेले दोन प्रसंग म्हणजे एक हा आणि दुसरा काटेकर सरताजसोबत चौपाटीवर कुटुंबासमवेत गेलेला असताना कचऱ्याबद्दल जे भाष्य करतो...... खरंच जितेंद्र जोशीने कोणताही आव न आणता एखादा सामान्य माणूस त्याच्याही नकळत एखादा मोठा विचार कसा सांगून जातो ते खूप छान बोलला आहे. बाकी काही असलं तरी कथा वेगवान आणि अभिनय आवडले.

मला हे असा नेहमी पुस्तकांच्या बाबतीत वाटतं. एखादं पुस्तक वाचताना आपण त्यातील प्रत्येक व्यक्ती, जागा, प्रसंग यांचं मनात चित्रं उभारत असतो. ते आपल्या कल्पनेप्रमाणे असतं. आणि जेव्हा त्या पुस्तकावर चित्रपट निघतो तेव्हा आपण दिग्दर्शकाची कल्पना बघत असतो. आणि बरेचदा ती कल्पना आपल्याशी मॅच होत नाही. आणि हे खूप निराशादायक असतं. म्हणून मी खूपवेळा आधी पुस्तक वाचलं असेल तर चित्रपट पाहणेच टाळते. स्वामी हे पुस्तक माझं प्रचंड आवडतं आणि मनाच्या जवळचं पुस्तक आहे. पण म्हणूनच मी त्यावर आलेला रमा-माधव चित्रपट अजून पाहिला नाहीये. कारण मी ते पुस्तक पुन्हा वाचायला घेतलं तर माझ्या कल्पनेतल्या प्रतिमे बदलून त्यांची जागा आलोक -पर्ण घेतील.

@श्वेता२४ - मला पण तो प्रसंग आणि एकंदरीत जितेंद्र जोशीच पात्र आवडलं. @हर्मायनी - खर आहे. मला तर बऱ्याच वेळेला रिमेक चित्रपट सुद्धा त्यामुळेच पाहताना मजा नाही येत. आपण आधी पाहिलेल्या/कल्पिलेल्या चित्रापेक्षा वेगळं चित्र नाही भावत.