कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ७
आधिचा भाग:
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ६
"ह्याठिकाणी असलेल्या एका दुकानात 'खारा' लिंबू सोडा पिऊन तरतरीत झाल्यावर 10 किमी वर असलेल्या 'बेतुल' ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशावरून बांधण्यात आलेल्या किल्ल्याच्या दिशेने प्रवास सुरु झाला..."
.
छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूंचे काही किल्ले जिंकले, काही किल्ल्यांची डागडूजी केली, तर काही किल्ले नव्याने बांधले. महाराष्ट्रात मोक्याची ठिकाणं पाहून महाराजांनी अनेक किल्ले बांधले आहेतच, पण गोव्यामध्ये देखील त्यांनी बरंच वर्चस्व निर्माण केले होते त्याचा साक्षीदार आहे 'बेतुल' हा छत्रपतींनी गोव्यामध्ये बांधलेला एकमेव किल्ला!.
दक्षिण गोव्यातील वेर्णे (Vernem) गावाजवळ उगम पावलेली साळ नदी (Sal River) सोळा किलोमीटरचा प्रवास करत बेतूल येथे अरबी समुद्रात विलीन होते. तिच्या नदीमुखावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून स्वराज्याचे पाईक असलेल्या बाल्ली (बाळ्ळी/Balli) च्या हवालदारांनी केपे (Quepem) तालुक्यातील बेतुल ह्या ठिकाणी १६७९ साली हा 'बेतूल' किल्ला बांधला.
.
साळ नदी हि एकप्रकारे पोर्तुगीज आणि मराठा साम्राज्यातली नैसर्गिक सीमारेषा होती, नदीच्या उत्तरेकडील काठापासून पोर्तुगीजांचे राज्य होते तर दक्षिणेकडील काठापासून मराठ्यांचे राज्य होते. हा किल्ला बांधण्यामागे महाराजांचा आपल्या सीमेचे रक्षण हा हेतू तर होताच पण त्याच बरोबर साळ नदीतून साष्टी (Salset) प्रांतात पोर्तुगिजांचा बराच व्यापार त्याकाळी चालत असे त्यावर ह्या मोक्याच्या ठिकाणी किल्ला बांधून महाराजांनी कर आकारणीहि सुरु केली होती.
पुढच्या काळात सोंधेकरांकडून १७६३ मध्ये हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात आला तो थेट १९६१ पर्यंत.
दुर्दैवाने आज ह्या किल्ल्याचा केवळ एक बुरुज आणि त्यावरील लांब पल्ल्याची एक तोफ वगळता बाकी काहीही बांधकाम दृष्टीस पडत नाही. पण असे असले तरी किल्ल्याचा परिसर, इथले ग्राम रक्षक राखणदेवाचे छोटेखानी 'खाणेश्वर' मंदिर आणि बुरुजावरून दिसणारी दृश्ये अतिशय प्रेक्षणीय आहेत.
बेतूल किल्ल्याचा बुरुज आणि परिसराचे काही फोटोज-
शाबूत असलेला किल्ल्याचा एकमेव बुरुज.
.
बुरुजावरची साळ नदीमुखाच्या दिशेने रोखलेली लांब पल्ल्याची तोफ.
.
.
बुरुजावरून समोर दिसणारा पांढऱ्या वाळूचा अतिशय सुंदर असा 'बेतूल बीच' (Betul Beach), बीचच्या उजवीकडे साळ नदी तर पुढ्यात आणि डावीकडे अरबी समुद्र.
.
किल्ल्या खालचा खडकाळ समुद्र किनारा.
.
.
किल्ल्याच्या उजवीकच्या टेकडीवर लांबवर दिसणारे दीपगृह, खाली दगडांवर पाण्यात गळ टाकून मासे पकडणारे स्थानिक.
.
दीपगृहाचा झूम करून काढलेला फोटो.
.
बुरुजावर उभी तीन भावंडे.
.
बुरुजा जवळचे खाणेश्वर मंदिर.
.
.
.
बेतूल किल्ला पाहून आम्ही तिथून ३७ किमी. अंतरावरच्या श्री शांतादुर्गा मंदिराकडे जायला निघालो. वाटेत 'बोरी' (Borim) इथे रस्त्याच्या उजव्या बाजूला नव्याने बनलेले छानसे साईबाबा मंदिर दिसले. पश्चिम शिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. गाभाऱ्यात संगमरवरी सजावटीचे काम सुरु असले तरी मंदिर दर्शनासाठी खुले होते.
.
.
बोरीच्या साईबाबा मंदिरापासून ६ किमी अंतरावर असलेल्या श्री शांतादुर्गा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोचलो तर आमच्या स्वागताला उभा असलेला हा बोर्ड दिसला -
.
मंदिरातले सगळे पुजारी कोविड पॉजिटीव्ह झाल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मंदिराजवळील शीतपेय विक्रेत्या महिलेने दिली. अर्थात पर्यटकांना मंदिरात प्रवेशबंदी असली तरी स्थानिकांना ओळखपत्र दाखवून सकाळी ८ ते १२:३० आणि दुपारी २:३० ते ६:३० अशा वेळांत प्रवेश दिला जात होता. मग बाहेरूनच कळसाचे दर्शन घेऊन, मंदिराचे २-४ फोटो काढले.
.
.
.
मंदिराजवळच्या दुकानात शीतपेये पिऊन आम्ही पुढे फर्मागुडीचे 'श्री गोपाळ गणपती मंदिर' आणि त्याच्या समोरच असलेला 'छत्रपती शिवाजी महाराज किल्ला' (Ponda Fort / Farmagudi Fort) बघायला निघालो. फर्मागुढीला पोचलो तेव्हा किल्ला बंद व्हायची वेळ होत आली असल्याने उपलब्ध असलेल्या कमी वेळात आधी किल्ला पाहून नंतर मंदिरात जायचे ठरवले.
.
सोळाव्या शतकात विजापूरच्या आदिलशाहने बांधलेला 'फोंडा किल्ला' (Ponda Fort) हा 'फर्मागुढी किल्ला' (Farmagudi Fort) नावानेही प्रसिद्ध असला तरी आता 'छत्रपति शिवाजी महाराज किल्ला' म्हणून ओळखला जातो.
१६६४ साली शिवाजी महाराजांनी गोव्यावर आक्रमण केले तेव्हा फोंडा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला होता पण त्यात अपयश आले. पुन्हा १६७५ साली जोरदार आक्रमण करून महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील करून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर पोर्तुगीजांनी ह्या किल्ल्यावर ताबा मिळवला पण १६ व्या शतकाच्या अखेरीस छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा जिकून घेतला.
संभाजी राजांच्या शासन काळात येसाजी कंक फोंडा किल्ल्याचे किल्लेदार होते. पोर्तुगीजांनी ३००० सैन्यासह हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी केलेल्या आक्रमणात अवघ्या ३०० मावळ्यांसह लढताना येसाजी कंक जायबंदी झाले होते तर त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक हा धारातिर्थी पडला होता. पण किल्ला राखण्याचा पराक्रम त्यांनी केला होता.
अनेक घनघोर लढायांचा साक्षीदार असलेल्या ह्या किल्ल्याचे खंदक, तटबंदीचे प्राचीन अवशेष आता शिल्लक नाहीत आज जो किल्ला दिसतो त्याचे बहुतांश बांधकाम नव्याने केले आहे.
छत्रपति शिवाजी महाराज किल्ल्याचे काही फोटोज-
.
.
.
किल्ल्यावरुन दिसणारे 'श्री गोपाळ गणपती मंदिर'
.
.
.
.
हा किल्ला लहानसा असला तरी, त्याचा परिसर, महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि बगीचा प्रेक्षणीय आहे. अंधार पडायला सुरुवात झाली होती त्यावेळी किल्ल्यातून बाहेर पडून आम्ही समोरच्या 'श्री गोपाळ गणपती मंदिरात प्रवेश केला.
.
प्राचीन आणि अर्वाचीन हिंदू स्थापत्यशास्त्राचा संगम बघायला मिळणाऱ्या गोमंतकातील फारच थोड्या मंदिरांपैकी हे एक मंदिर असून ह्या सुंदरशा छोटेखानी मंदिराचे बांधकाम गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत श्री. दयानंद बांदोडकर ह्यांनी केले आणि त्यांच्याकडे असलेल्या पंचधातूच्या गणेशमूर्तीची २४ एप्रिल १९६६ रोजी ह्या नव्या मंदिरात स्थापना केली.
ह्या ठिकाणी असलेल्या मूळ जुन्या मंदिराबाबत एक कहाणी सांगितली जाते ती अशी कि, बांदिवड्याचे राजे असलेल्या सौंधेकरांच्या पदरी चाकरीस असलेल्या 'हापो' नावाच्या गुराख्याला सुमारे १०० वर्षांपूर्वी माळरान असलेल्या ह्या पठारावर गाई चरायला घेऊन आला असताना ह्याठिकाणी फूटभर उंचीची श्री गणेशाची दगडी मूर्ती सापडली आणि त्याने नारळाच्या झावळ्यांपासून बनवलेल्या मंडपात तिची स्थापना केली होती. गोपालन करणारा गुराखी म्हणजे 'गोपाळ' आणि गोपाळाने स्थापन केलेला हा गणपती असल्याने त्याचे नाव 'गोपाळ गणपती'.
मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजवीकडे दीपमाळ आहे. मंदिर परिसर हिरवाईने नटलेला असून येथे दरवर्षी गणेश जयंती उत्सव भाविकांच्या लक्षणीय उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि भाविकांना देवस्थानतर्फे महाप्रसाद दिला जातो.. यादिवशी दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच रात्री भजन आणि अन्य कार्यक्रम होतात. अनंत चतुर्दशीला गुढी उभारण्याची ह्या मंदिरात प्रथा आहे.
याशिवाय संकष्टी, अंगारकी व विनायकी चतुर्थीला मंदिरावर रोषणाई केली जाते आणि भाविकांच्या श्रींचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या रांगा लागतात. आम्ही गेलो होतो त्यादिवशी संकष्टी चतुर्थी होती त्यामुळे आम्हाला श्रींचे दर्शनहि घडले आणि रोषणाईही पाहायला मिळाली तसेच त्या दिवशी संकष्टी चतुर्थी असूनही करोना पर्वातील निर्बन्धांमुळे फार गर्दीही नव्हती.
.
.
फर्मागुढीच्या या गोपाळ गणपतीच्या मंदिरात वर्षभर विविध उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या इमारतीत प्रशस्त अशी सभागृहे आहेत आणि त्यांचा वापर लग्न तसेच इतर मंगल कार्यासाठी केला जातो. फर्मागुढीचे पठारा राष्ट्रीय महामार्गावर असल्याने कायम या रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरू असते. गोपाळ गणपतीवर गोमंतकीयांची आणि हिंदू धर्मियांची श्रद्धा आहेच पण विदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने या मंदिराला आवर्जून भेट देतात. हे मंदिर किल्ल्याच्या समोरच असल्याने किल्ला पाहायला आलेल्या पर्यटकांना आपसूक देवदर्शनही घडते.
(गेल्यावर्षी मिपाच्या श्रीगणेश लेखमाला २०२१ मध्ये माझा 'श्री गोपाळ गणपती मंदिर (फर्मागुढी, गोवा)' हा लेख प्रकाशित झाला होता त्यामुळे काही वाचकांना हा किल्ला आणि ह्या मंदिराची माहिती आधी वाचल्यासारखे वाटणे स्वाभाविक आहे.)
फर्मागुढीचा किल्ला आणि मंदिर पाहून सव्वा सात वाजता आम्ही १८ किमी अंतरावरच्या आमच्या मुक्कामस्थळी करमळीला जायला निघालो. भाऊजी घरी पोचल्याचा फोन येऊन गेला होता. त्यादिवशी चंद्रोदय लवकर म्हणजे रात्री ८:३६ ला असल्याने बहिणीला घरी परतल्यावर उपास सोडायला उशीर व्हायला नको म्हणून तो प्रेमळ नवरा सव्वा आठच्या सुमारास 'वरण भाताचा' कुकर लावून ठेवणार होता. दुपारचे जेवण स्किप झाल्याने तेवढ्याने माझे आणि भावाचे पोट भरणार नव्हते म्हणून त्याआधी थोडीशी पोटपूजा करण्यासाठी वाटेत जुन्या गोव्यातल्या (Old Goa) 'रसोडा' (Rasoda) ह्या ऑथेंटिक उत्तरभारतीय चवीचे पदार्थ मिळण्याचा दावा करणाऱ्या महागड्या राजस्थानी उपहारगृहात जाऊन बहिणीच्या शिफारशीवरून 'राज कचोरी' आणि 'सामोसा चाट' असे चविष्ट पदार्थ खाल्ले आणि घरी जेवणानंतर सर्वांसाठी म्हणून चार 'ड्राय फ्रुट मिल्क शेक' पार्सल घेतले. ह्या सहा नगांचे बीलच जवळपास १५०० रुपये मात्र झाले, पण आमच्यासाठी हि कॅसिनो कडून मिळालेली 'ट्रीट' असल्याने त्याचे काही विशेष वाटले नाही 😀
साडे आठच्या सुमारास रसोडा मधून निघून पाच-सात मिनिटांत मुक्कामी पोचल्यावर फ्रेश होऊन भाऊजींनी बनवलेला गोडं वरण भात मस्तपैकी तूप, मीठ, लिंबू पिळून बहिणीने तळलेल्या मिरगुंडां सोबत खाल्ला आणि थोडा वेळाने पार्सल आणलेले ड्राय फ्रुट मिल्कशेक चवीने रिचवल्यावर काहीवेळ गप्पागोष्टी आणि सव्वादहाच्या सुमारास उच्च शिक्षणासाठी कॅनडाला गेलेल्या ह्या बहिणीच्या मुलाशी व्हिडीओ कॉलवर सर्वांचे बोलणे झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठण्याची तशी काही घाई नव्हती पण अंधार लवकर पडत असल्याने शक्यतो लवकर निघून उत्तर गोव्यातले किल्ले पाहायला सुरुवात करायची असल्याने साडेदहा- पावणे आकाराच्या सुमारास झोपून गेलो.
पुढचा भागः
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ८
वाचने
8787
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा भागही सुंदरच.
उत्तम लेखन
ॲबसेंट माइंडेड ... | जेम्स वांड
In reply to उत्तम लेखन by जेम्स वांड
हा भाग पण भारीच.
फोटो बघून देवबाग बीच (मालवण)ची आठवण
In reply to हा भाग पण भारीच. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
छान!
फार्मागुडीच्या गणेश मंदिरा समोरच गोवा पर्यटन
In reply to छान! by Nitin Palkar
सुंदर आटोपते वर्णन.
कोणत्या क्याम्राचे? रात्रीचेही स्पष्ट छान
In reply to सुंदर आटोपते वर्णन. by कंजूस
हाहाहा.
In reply to कोणत्या क्याम्राचे? रात्रीचेही स्पष्ट छान by टर्मीनेटर
रोचक, रंजक. असेच तपशीलवार
@ गवि, ती तोफ अशी दगडात पुरुन एकाच दिशेत
In reply to रोचक, रंजक. असेच तपशीलवार by गवि
ही तोफ किल्ल्याचा जीर्णोद्धार
In reply to @ गवि, ती तोफ अशी दगडात पुरुन एकाच दिशेत by टर्मीनेटर
काय राव तुम्ही!
In reply to ही तोफ किल्ल्याचा जीर्णोद्धार by प्रचेतस
=))
In reply to काय राव तुम्ही! by टर्मीनेटर
हा भागही खूप आवडला, लेखन आणि
खाणेश्वराची मूर्ती एकदम आधुनिक आहे.
In reply to हा भागही खूप आवडला, लेखन आणि by प्रचेतस
तळकोकणात आणि गोव्यात हे
In reply to खाणेश्वराची मूर्ती एकदम आधुनिक आहे. by टर्मीनेटर
हा पण भाग आवडला
+१oo८२२
In reply to हा पण भाग आवडला by मुक्त विहारि
अर्रर्रर्र..... चुकी झाली +१००९२२ पायजे होतं
In reply to +१oo८२२ by रंगीला रतन
फोटो, वर्णन छानच! बेतुलचा समुद्र्किनारा
मुविकाका |अथांग आकाश
In reply to फोटो, वर्णन छानच! बेतुलचा समुद्र्किनारा by अथांग आकाश