सिंधुदुर्ग कोस्टल ट्रेक : १ :
सिंधुदुर्ग कोस्टल ट्रेक : २ :
रात्र गाजवली ती दीड वर्षाच्या अर्णवने, थोडी झोप लागली की हा सप्तसुरात रडायला सुरु करी. त्याला झोपवे पर्यंत रात्रीचे दोन वाजले. अर्धा तास झोप लागली तर लगेच याने परत रडून सर्वांना उठवलं. त्याच्या रडण्याच्या नादात सकाळचा अलार्म पण लवकर वाजल्यासारखा वाटला. उठल्यावर पटापट तयारी करून निघालो - आजच खास आकर्षण - स्कूबा डायविंग>>>>>
सकाळी उठून पटापट आवरून सिंधुदुर्ग किल्ल्याला जायला निघालो. आधी स्कुबा डायविंग करून नंतर सिंधुदुर्ग किल्ला पाहायला जायचं होत.
किनाऱ्यावरून दिसणारा सिंधुदुर्ग किल्ला
बोट किनाऱ्यावर पार्क करताना
स्कुबाला जाण्याआधी मस्त स्वप्न रंगवली होती. जिंदगी मिलेगी ना दोबारा सारख स्कुबा प्रशिक्षक म्हणून सुंदर अशी एखादी कतरिना येईल, मला पाण्याखाली हात धरून नेईल, पाण्यात गेल्यावर आपला ऑक्सिजन मास्क काढून मला लावेल, निळाशार पाण्यात तिच्या आणि माझ्या भोवतीने लहान लहान मासे फिरताहेत पण कसच काय, तिकडे गेल्यावर हवेत उडणार माझ विमान धाडकन जमिनीवर कोसळलं.
मालवणी कम आगरी बोलणारे मुल होती. बोटीतून समुद्रात नेल्यावर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागच्या बाजूला म्हणजेच किनाऱ्याच्या बाजूला एका ठिकाणी बोट नांगरून उभी केली. आजूबाजूला आमच्या सारख्याच बऱ्याच बोटी नांगरून गोलाकार उभ्या केल्या होत्या.
आम्हा प्रत्येकासोबत एक मुलगा होता जो आम्हाला खाली समुद्र तळाशी नेणार होता. श्वास तोंडावाटे कसा घ्यायचा आणि तोंडानेच कसा सोडायचा, ओठ उघडायचे नाहीत नाहीतर खार पाणी तोंडात जाईल, हात पाय मारू नका, शेवाळाला लागून खरचटेल त्याने अशा सूचना देऊन चेहऱ्याला ऑक्सिजन मास्क लावला. दोन मिनिटे फक्त चेहरा खाली बुडवून सराव करायला सांगितला. मला पोहता येत नाही त्यामुळे खूप भीती वाटते अस मी त्याला सांगितलं. यावर "तुम्ही काही करू नका, मी तुम्हाला खाली घेऊन जाईन" अस त्याने सांगितलं. मग माझ्या ऑक्सिजन सिलेंडरला त्याने पकडून मला खाली नेले.
जमिनीशी संबंध तुटून पाण्याच्या राज्यात गेलो होतो. पाण्याची दुनिया. खाली जाताना त्याने नेलेला पाव छोटे तुकडे करून माझ्या आजू बाजूला टाकला त्यामुळे खूपशे छोटे मासे माझ्या अवती भवतीने फिरत होते. एखाद्या मोठ्या फिश tank मध्ये ठेवल्यासारखे वाटत होते. जितके रंगीबेरंगी मासे होते, तितकच शेवाळ रंगीत होत. माझ्याच श्वासाचा मला आवाज ऐकू येत होता. एकप्रकारची ध्यानधारणा, आपल पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर असत. पाण्यात गेल्यावर आपल्याला प्रत्येक श्वासाची किंमत कळते, फुकट मिळणाऱ्या हवेची किंमत कळते. पाण्याच्या त्या रंगबेरंगी मोहजालातून बाहेर यावस वाटत नव्हत पण माझी १५ मिनिटे संपल्यावर मला पाण्याच्यावर आणल.
माझ डायविंग झाल्यावर इतरांची होणारी गोची बघत मज्जा घेत होतो. बऱ्याच जणांना त्या मास्क मधून श्वास घ्यायला जमत नव्हत, काहीजण तर ४/५ वेळा प्रयत्न करून पण खाली जाऊ शकले नाही. त्यांना माहिती नाही की त्यांनी नेमक काय मिस केल ते. सर्वांच होई पर्यंत २ तास गेले. आता पाण्यात भिजल्यामुळे खूप भूक लागली होती. किनाऱ्यावर येऊन एका खानावळीत जेऊन पोटाला शांत केल.
गोलाकार उभ्या असलेल्या बोटी आणि स्कूबा प्रशिक्षक आणि मागे आपला सिंधुदुर्ग
मग आमची वरात सिंधुदुर्ग किल्ल्याला जायला निघाली. स्कूबा डायविंग केल त्याच्या नेमक विरुद्ध दिशेला किल्ल्याच मुख होत. इतर किल्ल्यांप्रमाणेच याही किल्ल्याचा दरवाजा "गोमुखी" पद्धतीचा आहे.
सिंधुदुर्ग : मालवणच्या समुद्रात असलेल्या ‘‘कुरटे‘‘ बेटावर शुध्द खडक, मोक्याची जागा व गोड्यापाण्याची सोय ह्या गोष्टी पाहून शिवाजी महाराजांनी आज्ञा केली;" या जागी बुलंद किल्ला बांधून वसवावा चौर्यांशी बंदरी ऐशी जागा नाही"! आणि "सिंधुदुर्ग" नावाची शिवलंका साकार झाली. सिंधुदुर्गच्या उभारणीने मराठ्यांच्या नौदलाला बळ मिळाले. इंग्रज, पोर्तुगीज, चाचे यांना वचक बसला. ‘‘चौर्याऎंशी बंदरात हा जंजिरा, अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला. सिंधुदुर्ग जंजिरा, जगी अस्मानी तारा जैसे मंदिराचे मंडन, श्रीतुलसी वृंदावन राज्यास भूषणप्रद अलंकार चतुर्दश महारत्नांपैकीच पंधरावे रत्न महाराजांस प्राप्त झाले‘‘ हा चित्रगुप्ताच्या बखरीतील मजकूर सिंधुदुर्ग किल्ल्याचे महत्व सांगून जातो.किल्ला बांधण्यासाठी ३ वर्षे लागली आणि रचना समजावून सांगण्यासाठी राजांनी लिहिलेली आज्ञापत्रे उपलब्ध आहेत. इंग्रजांनी किल्ला जिंकल्यावर त्याच नामकरण "फोर्ट ऑगस्टस" अस केल.
हनुमंत राया
महाद्वाराच्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वाराच्या आत आल्यावर डाव्या बाजूस असणार्या पायर्या चढून गेल्यावर दोन छोट्या घुमट्या दिसतात. त्यातील खालच्या घुमटीत महाराज्यांच्या डाव्या पायाचा ठसा व वरच्या घुमटीत उजव्या हाताचा ठसा आहे. किल्ल्याच्या बांधकामाची पाहाणी करतांना ओल्या चुन्यात महाराजांच्या हाताचा व पायाचा ठसा उमटला होता. त्यावर घुमट्या उभारण्यात आल्या.
थोड लांब चपला काढून त्या घुमट्या जवळ गेलो, राजांच्या हाताचा आणि पायाचा ठसा आहे हे माहिती असल्यामुळे सोबत फुले आणलेली फुले वाहिली आणि नतमस्तक झालो. नकळत डोळ्यातून पाणी वाहू लागले, डोळे पुसत असताना बायको कडे नजर गेली तर ती हसत उभी होती. विचारलं काय झाल तर म्हणाली मला माहित होत की अस होणार. रायगडावर राजांच्या सिंहासनारूढ मूर्ती समोर पाया पडताना देखील डोळे भरून आले होते. तेव्हा रडताना बघून तिने विचारलं होत की काय झाल रडतोस का. यावर तिला म्हटलं अग हे कृतज्ञतेचे, त्यांच्या बद्दलच्या प्रेमाचे, आपुलकीचे अश्रू आहेत. ते आपोआप आले न सांगता.
राजांच्या पायाचा ठसा
राजांच्या हाताचा अस्पष्ट ठसा
डाव्या हाताला निसर्गाचा चमत्कार असलेला दोन फाटे फुटलेला माड होता, त्यावर वीज कोसळून जळून गेल्याने त्याचा सांगाडा शिल्लक आहे म्हणून तो पाहायला गेलो नाही. पुढे महाराष्ट्रातील एकमेव शिवाजी महाराजांचे मंदिर "श्री शिवराजेश्वर मंदिर" लागले. शिवरायांचे पुत्र राजाराम यांनी नावाड्याच्या वेशातील वीरासनात बसलेली शिवप्रतिमा येथे स्थापन केली आहे. मूर्तीची पूजाअर्चा संकपाळ घराण्याकडे आहे. मूर्तीला पूजेनंतर सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा व वस्त्र चढवतात. त्यामुळे मुळ मुर्ती दिसत नाही. देवळात असलेल्या फोटोवरच समाधान मानावे लागते.
तेथे असलेल्या पुजाऱ्यांनी सर्वांना शांत राहण्यास सांगितले आणि त्याबद्दलची अधिक माहिती सांगू लागले. पाया पडून बाहेर मंडपात दोन मिनिटे शांत बसलो. राजांच्या मूर्तीच्या परत एकदा पाया पडून पुढच्या फेरफटक्याला बाहेर पडलो.
शिवराजेश्वर मंदिराच्या मागे महादेवाच मंदिर आहे आणि त्यातच "ती" विहीर आहे. या विहिरीतून खणलेल्या भुयारी मार्गातून ओझर येथील ब्रह्मानंद स्वामींच्या समाधीच्या बाजूच्या गुहेतून बाहेर पडता येते. आता शासनाने विहिरीतून असलेला मार्ग दगड लावून बंद केला आहे.
त्याच्यापुढेच साखरबाव, दुधबाव आणि दहीबाव नावाच्या विहिरी आहेत. कोकणी भाषेत विहिरीला बाव म्हणतात. या विहिरींना अशी नावे कशी पडली याबद्दल बऱ्याच दंतकथा आहेत, कोणी म्हणे तीन वेगवेगळ्या जातींच्या लोकांना पाणी पिण्यासाठी तीन विहिरी आहेत पण राजे जात-पात मानत नसत त्यामुळे हे पटत नाही. चारही बाजूंनी समुद्र असून सुध्दा ह्या विहीरींचे पाणी गोड आहे. त्यामुळेच शिवरायांनी कुरटे बेटावर किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला.
दुधबाव
बुरुजाच्या मागच्या बाजूस थोडे चालत गेल्यावर तटबंदीत एक छोटा दरवाजा आहे. ह्या दरवाजातून बाहेर आल्यावर एक छोटीशी चंद्रकोरीच्या आकाराची पुळण लागते. ह्यास ‘‘राणीची वेळा‘‘ म्हणतात. ताराराणी ह्या ठिकाणी समुद्रस्नानास येत असत.पण चालायला कंटाळा आल्यामुळे गेलो नाही.
‘‘राणीची वेळा‘‘
पुढे गेल्यावर थोड्या उंचीवर एक बांधकाम दिसले, तेथून समुद्राचे आणि पूर्ण किल्ल्याचे सुंदर दर्शन होत होते. थोडी फोटोग्राफी करून तटबंदीवरून चालत पुढे गेलो. आता उन्हाचे चटके बसायला लागले होते म्हणून परत फिरलो, त्याचवेळेला दुसऱ्या एका ग्रुपने ललकारी दिली. "प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री शिव छत्रपति महाराज की जय" आम्ही सर्वांनी कोरस मध्ये दमदार आवाजात म्हटलेले जय ऐकून त्या ग्रुपने आम्हाला स्माईल दिली.
बोटीने परत येउन गाडीत बसलो, अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या आणि हातात सर्वांच्या पाण्याच्या थंडगार बाटल्या होत्या. त्या बाटल्या पिण्या अगोदर सर्वजण चेहऱ्यावर लावून होते जेणेकरून थोडा थंडावा वाटेल. आजचा मुक्काम होता निवती गावात तिकडे मार्गस्थ झालो.वाटेत वेंगुर्ल्याला बनणारे विमानतळाचे काम दिसले. इतक्या मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे, दूरवर नजर जाईल तेथे काम चालू होते.
सततच्या प्रवासाने आंबलेल अंग निवती गावात पोचल्यावर लगेच बसच्या बाहेर झोकून दिल. वरती गडावर जात असताना आम्हाला सोबत म्हणून हे महाशय आले.
निवतीचा किल्ला : सिंधुदुर्ग किल्ला बांधल्यानंतरच्या काळात शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला. या किल्ल्याचा ताबा पुढे सावंतवाडीकर सावंतांकडे गेला. १७४८ साली पोर्तुगिजांच्या पदरी नोकरीस असलेल्या इस्माईल खानने निवतीवर हल्ला करुन तो जिंकून घेतला. १७८७ साली करवीरकर छत्रपती व सावंत यांच्यात झालेल्या लढाईत करवीरकरांनी किल्ला जिंकला. १८०३ मध्ये गडाचा ताबा परत सावंतांकडे आला. ४ फेब्रुवारी १८१८ रोजी इंग्रजांनी हा किल्ला जिंकून घेतला.
वरून दिसणारा नजारा अप्रतिम होता. गार हवा लागत होती, तिथे असलेल्या एका वाड्याच्या अवशेषात सर्वांनी बसकण मारली. मी तर सरळ जाऊन गवतावर झोपलो. १० मिनिटात झोपी गेलो, अर्ध्या तासाने उठून गडफेरी मारायला गेलो. गडावर जास्त अवशेष नाहीयेत. बुरुजा जवळून खालच्या बाजूस अप्रतिम भोगवे बिच व कर्ली खाडी पर्यंतचा परिसर दिसतो. क्यामेरा बाजूला ठेवून डोळ्यात ते दृश्य साठवायला लागलो. गडावरून दिसणारा सूर्यास्त नजरेचे पारणे फेडणारा होता.
खाली येऊन बीचवर नरम वाळूत बसलो होतो. ती पांढरी शुभ्र वाळू आणि अंधुक प्रकाश एकदम छान दृश्य तयार करत होत. आम्ही बसलो होतो त्याच्या पुढेच वाळूचा एक उंचवटा होता ज्यामुळे समुद्राच पाण्याने आमच्या बाजूला छोट तळ तयार झाल होत.
पायाखाली नरम, थोडी उबदार अशी वाळू, मागे नारळाची/माडाची झाडे आणि समोर अथांग पसरलेला सागर… वाह क्या बात हे. एकदम झकास वातावरण तयार झाल होत, बायकोला रोमांटीक होत चालूया का अस विचारलं आणि इतक्यात "दादा चल ना साखळी पाणी खेळूया, तू गडावर प्रॉमिस केल होतस." बायको गालातल्या गालात हसत होती. आता काय फिरायच्या प्लानवर पाणी फिरवल्याने खेळायला चालू केल. लहानपणी खेळत असताना जितकी मज्जा यायची तितकीच मज्जा खेळत असताना येत होती. नियमित क्रिकेट खेळण्यामुळे धावायची सवय होतीच पण माझ इतक धावण बघून सर्वांना आश्चर्य वाटत होत. ९० किलोचा देह असताना देखील सर्वात शेवटी आउट झाल्यामुळे सर्वांनी कौतुक केल आणि त्यामुळे मुठभर मांस अजून अंगावर चढल.
बीच जवळ असलेल्या एका घरात चहा सांगितला होता मग काय चहा आणि आपल पारले-जी बिस्कीट हाणल सर्वांनी. अमित दादा जो आमच्या या कोस्टल ट्रेक दरम्यान "आंबोलीच्या" पायलट ट्रेकला जाऊन आला होता त्याने रानडुकराची कवटी आणली होती. त्याला त्या जंगलात सापडली होती. त्याचे सुळे एकदम खतरनाक होते. तिथून निघून मुक्काम असलेल्या ठिकाणी हॉटेलात आलो. हॉटेल पण मोक्याच्या ठिकाणी बांधल होत, हॉटेलच्या आवारातून पायऱ्या उतरल्यावर मऊशार वाळू आणि समोर पसरलेला समुद्र.
फ्रेश होऊन, जेवून घेतलं आणि जाऊन बसलो वाळूत. अमित दादाला म्हटलं या वाळूवर झोपायला काय मज्जा येईल ना तर त्याने गुगलीच टाकली, गेल्यावर्षी आम्ही येथेच झोपलो होतो. त्याला बोललो मग आता पण झोपूया ना. यावर त्याने नकारार्थी मान हलवली, आपण येथे झोपायचं नाही. मनातून थोडा खट्टू झालो आणि ते भाव लगेच चेहऱ्यावर दिसल्यावर तो हसत बोलला की अरे झोपायच नाही म्हणजे रात्री गप्पा मारायच्या, अंताक्षरी खेळायची. खुश होत लगेच स्लीपिंग ब्याग घेऊन आलो, अंथरली आणि लगेच पाट जमिनीला टेकवली. आकाशात तारे, समुद्राची एका लयीत ऐकू येणारी गाज, वाहणाऱ्या वाऱ्याचा सु सु आवाज. दोन मिनिटात तंद्री लागली तर लगेच सगळी भुतावळ आली आणि अंताक्षरी चालू केली. हळूहळू काही मेंबर गळायला लागले तर काही वाढले. शेवटी गाणी संपून गप्पा चालू झाल्या त्यातूनच आठवणार एखाद गान आणि त्याला सर्वांनी कोरस, मेहफिल तर आता कुठे रंगात आली होती आणि घड्याळात काटे फक्त २.३० वाजलेत अस दाखवत होते. उत्तरोतर गाणी रंगत गेली, हाताने टाळ्या वाजवत, टिचकी वाजवत गाण्यांना सोबत होत होती. सकाळी चार वाजता मग अमित दादाने सर्वांना जबरदस्तीने झोपायला सांगितले.
स्लीपिंग ब्यागेत शिरून उरलेल्या गप्पा मारता मारता कधी झोपलो ते कळलच नाही. सकाळी ६ ला जाग आली तीच रोहितच्या "हैप्पी होली" या आवाजाने. संस्था हि आपल्या कुटुंबासारखीच आणि आपण एकही सण एकत्र साजरा करत नाही मग का नाही आताच होऊन गेलेला होळीचा सण साजरा करायचा हा त्याचा विचार. मग काय होळी नसताना देखील सर्वजण वेगवेगळ्या रंगात रंगून गेले. मग सर्वांचा एकत्रित रंगबेरंगी चेहरा असलेला ग्रुप फोटो झाला. फ्रेश होऊन, चहा नाश्ता करून निघालो यशवंत गडाकडे.
यशवंतगड (रेडीचा किल्ला): महाराष्ट्र राज्याच्या सागरी किनार्यावरील शेवटचा किल्ला म्हणजे रेडीचा यशवंतगड. लोह, मँगेनीजच्या खाणी व स्वयंभू गणपती ह्यामुळे प्रसिध्द असलेले रेडी गाव प्राचिन काळी रेवती द्वीप म्हणून प्रसिध्द होते. या गावात समुद्रकिनारी असलेला हा अप्रतीम किल्ला प्रत्येकाने एकदा तरी पाहावा असा आहे. या किल्ल्याची बांधणी वैशिष्ट्यपूर्ण आहे. रेडीच्या खाडीच्या मुखावर बांधण्यात आलेल्या या किल्ल्याचा उपयोग समुद्रातून खाडीमार्गे होणार्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी केला गेला. या गडावर मोठ्या प्रमाणावर अवशेष आहेत. पहिल्या दरवाजात पोचलो, हा दरवाजा अजूनही सुस्थितीत आहे. गडावरून आत जात असताना बाजूला सुरक्षेसाठी खणलेले खंदक दिसतात.
पुढे गेल्यावर अजून एक दरवाजा लागला जो पहिल्या दरवाजाला एकदम काटकोनात होता. तिथून पुढे गेल्यावर मुख्य दरवाजा लागला, यावरून कळत की हा किती महत्वाचा किल्ला होता. शत्रूला बाहेर थोपवून धरण्यासाठी आणि त्याला आत येण्यास मज्जाव करण्यासाठी मुख्य दरवाजा आधी दोन दरवाजे बांधलेत. पुढे चालत गेल्यावर अजून एक दरवाजा लागला ज्यात पहारेकऱ्यासाठी देवड्या आहेत. याच्या बाजूने अंदाजे २० फुट उंच तटबंदी पूर्ण किल्ल्याला वेढते. या गडाच वैशिट्य म्हणजे तटबंदी वरून खाली उतरण्यासाठी पायऱ्या नसून घसरगुंडी सारखा सिमेंटचा उतार केला आहे. पोर्तुगीजांच्या अमलाखाली असताना तोफा तटबंदी वर चढवण्यासाठी केलेली ही खास सोय होती.
पहिला दरवाजा
दुसरा दरवाजा
मुख्य दरवाजा आणि पहारेकऱ्यासाठी देवड्या
तटबंदी
आत मध्ये असलेल्या दालनांच्या भिंतीत असलेल्या खाचा, पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरचे दरवाजे पाहून ही दालन दुमजली होती हे कळत. मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे भिंतीवर वाढलेल्या झाडांच्या मुळांपासून तयार झालेले वैशिट्यपूर्ण आकार.
दुमजली दालन

पुढे चालत गेल्यावर जुन्या काळातील २० x २० फुटांचा स्विमिंग पूल दिसला, त्याच्या बाजूला खांबांचे अवशेष पडले होते. तटाच्या आत छोटे छोटे चोर दरवाजे आहेत. त्या सर्व दालनांची रचना इतकी गुंतागुंतीची आहे की आपण कुठून जातो आणि कुठून बाहेर येतो हे कळत नाही. एका दालनात गेलो तर तिथे काही एका दगडावर लाल कुंकू लावलेलं लिंबू, फुलं, बांगड्या, सांडलेल तेल आढळल. ते बघून मागून येणाऱ्या सर्वांना दारातच थांबवून मागे वळायला सांगितलं.
गडावर बाकी पाण्याचे साठे काही दिसले नाहीत. स्विमिंग पुल असलेल्या दालनाच्या पुढे दारूकोठारा सारखी एक वास्तू दिसली पण तिथे परत काहीतरी विचित्र दिसेल म्हणून मग काढता पाय घेतला.
तटबंदीत असलेला चोर दरवाजा
गडावरून दिसणारा सुंदर नजारा
गडफेरी संपली होतीच, तिथून बाहेर पडून गाडीत बसल्यावर सर्वांना मी काय पाहिलं ते सांगितलं. सर्वांच्याच चेहऱ्यावर आश्चर्य कम उत्सुकता होती. गाडीत बसून रेल्वे स्टेशनची वाट धरली. सर्वांनी सिंधुदुर्गला आंब्यांच्या पेट्या खरेदी केल्या. ट्रेन मध्ये बसून लाडक्या कोकणाला बाय बाय करून ३ दिवसांनी परत मुंबईच्या धकाधकीच्या लाइफ मध्ये आलो.
टीप : माफ करा, स्कूबा डायविंग चे फोटो डिलीट झाल्यामुळे देऊ शकलो नाही.
धन्यवाद,
जगप्रवासी
वाचने
3995
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
खूप छान लिहिलंय.
यशवंतगड पाहिलात व्वा!
तो यशवंतगड का गोपाळगड?
In reply to यशवंतगड पाहिलात व्वा! by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
यशवंतगडच.
In reply to तो यशवंतगड का गोपाळगड? by प्रचेतस
हो बरोबर :)
In reply to यशवंतगडच. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
दोन्ही
In reply to हो बरोबर :) by प्रचेतस
नळदुर्गचा किल्ला सुध्दा
In reply to दोन्ही by स्वच्छंदी_मनोज
खूप छान लिहीलं आहे तुम्ही.
आवडलं वर्णन! सिंधुदूर्ग
छान ट्रेक. निवती-भोगवे
तिन्ही लेख खूप आवडले.
छान ......