मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भारतातील प्रवासात येणारे लॉजींगचे चित्र विचीत्र अनुभव

माहितगार · · भटकंती
पांघरुणातच गुरगुटून रहावं, उठूच नये असं वाटायला लावणारी छान थंडी पडलीये. मी अंथरुणात पडल्या पडल्या परिस्थितीचा आढावा घेतेय. संगमरवरी फरशी, बुरशी लागलेल्या भिंती, वाळवीने पोखरलेला दरवाजा, डाग आणि भोकं पडलेली चादर असा एकंदर थाट. ३-४ फील्डवर्क्सचा अनुभव गाठीशी असल्याने याहून वाईट परिस्थितीत राहण्याची सवय मला आहे. प्रत्यक्षात मात्र, याहून कैक पटींनी चांगल्या अशा दुसर्‍या एका ठिकाणी आमची व्यवस्था करण्यात आली होती. पण ..... संदर्भ: ... आणि माझी काशी झाली! (एका फील्डवर्कचा वृत्तांत) उपरोक्त उधृत केलेल्या वाक्यावर जाऊ नका, भाषाविज्ञानासंबधी वाराणशीतील मराठी भाषेचा अभ्यास करतानाच्या प्रवासा दरम्यानचा लेखिका राधिका यांचा ऐसी अ़क्षरेवरील वाचनीय वृत्तांत आहे. अर्थातच उपरोक्त वाक्य मी मिपावर वेगळ्या चर्चेसाठी आणि येथे अधिक चर्चा होऊ शकेल म्हणून घेतले आहे हे ओघाने आलेच.
असंख्य समस्या अशा असतात की ज्यांची आपण रोज दररोज चर्चा ही करत नाही. त्या स्विकारायच्या असतात असे समजून सोडून देण्या शिवाय खरेतर वेगळा पर्यायही रहात नाही. त्यातीलच एक म्हणजे भारतातील कोणत्याही प्रवासा दरम्यान येणारे लॉजींग आणि तत्सम प्रकारात येणारे चित्र विचीत्र अनुभव. रोजचं राहण पंचतारांकीत मध्ये परवडणार्‍या गटा पैकी तुम्ही नसाल किंवा प्रवासात हव तिथे पंचतारांकीत बुकींग मिळाले नाही तर तुमचा सर्व साधारण अनुभव कसा असतो ? एका मोठ्या कंपनीच्या मॅनेजींग डायरेक्टराने भारतातील तीन ते पंचतारांकीत हॉटेल्स तौलनीक दृष्ट्या कशी नफेखोरी करत अव्वाच्या सव्वा दर लावतात याची डॉलर रुपी कन्व्हर्शन आणि आंतरराष्ट्रीय हॉटेल दरांचा तौलनीक चार्ट समोर ठेवत माहिती दिली होती. अर्थात असे विषय क्वचीतच चर्चेत येतात आणि मग केव्हातरी विस्मरणात जातात. मला या पंचतारांकीत दरांची सध्याची तौलनीक स्थिती माहित नाही. अर्थात आपण प्रवासा दरम्यान आपल्याला अचानक कुठे मुक्काम करावा लागत असेल तर हॉटेल तीन किंवा पंचतारांकीत आहे हे बघण्याची संधी पण मिळत नाही. त्यात तुम्ही अपरात्री एखाद्या गावी पोहोचला असाल तर जे काही अकोमोडेशन उपलब्ध होईल ते पदरी आले आणि पवित्र झाले म्हणून स्विकारावे लागते. किंवा पेंगुळलेल्या अवस्ततेच चोखंदळपणा करत हे किंवा ते करत दोन तीन हॉटेलांपैकी एखाद्यात रुम बुक करून शरीरास काही आराम पडेल तर पहावे म्हणून काय असेल ते सकाळी पाहू म्हणून विचार करावा लागतो. त्यात तुम्ही कुणा रिक्षावाल्यांच्या तावडीत सापडले असाल तर तो तुम्हाला नेमके कसल्या दर्जाची हॉटेले दाखवेल ते विचारावयास नको. यातील छोट्या मोठ्या लॉजेसवर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस आणि कर आकारणी पुरते स्थानिक स्वराज्य संस्था काय ते लक्ष ठेवतात त्यांच्या सेवांच्या दर्जा बाबत तशी कोणती देखरेख असते असे कधी वाटले नाही. यातील छोट्या मोठ्या लॉजेसचेही दराचा वर्षातील ३०० दिवस जरी खोली भाड्याने गेली तर एकुण उत्पन्न तसे बरेच असते त्या मानाने सेवा सुविधा पाहिल्यास हाती काहीच लागत नाही. बाहेरून झकपक असलेल्या हॉटेलाच्या उंची सुट मध्ये विटलेले वासघाण जुने गालिचे पांढर्‍या शुभ्र चादरीतून अचानक येणारी झुरळे तर काही ठिकाणी चक्क ढेकुण हे वर्णन दिवसाचे ३५००/- दर असणार्‍या अहमदाबादेतील एका लॉजींगचा जवळपास चारेक वर्षापुर्वीचा अनुभव सांगतो आहे. माझा एक साएब प्रत्येक शहरातल उंची नव्हे तर नव्यातल नव लॉज कोणत त्याचीच माहिती ठेवायचा कारण तिथे रुम फर्नीचर इत्यादी जरा फ्रेश असतं. दुसरे मार्ग परिचया पैकी कुणाला चांगल लॉज माहित असल्यास विचारून ठेवणे. आपण स्वतः रहातो त्या शहरातील विशीष्ट लॉजची स्थिती काय असेल याची काही माहिती स्थानिकांनाही असेलच अशी स्थिती नसते. प्रत्येकवेळी प्रत्येकाला सर्व माहिती अ‍ॅडव्हान्स मधे मिळते असही नाही. त्यात तुम्ही परदेशी प्रवासी असाल तर रिक्षा, विक्रेते ते टूरगाईड सर्वजण लुटण्याचाच विचार करत असतात. प्रवासा दरम्यान शेजारचा एक इझ्राएली प्रवासी एकदा त्याच्या भारतातील प्रवासाच्या अनुभवा बद्दल म्हणाला, की मला उपलब्ध वेळेत तुमचा देश जास्तीत जास्त दूरवर फिरायचा आहे सर्व पैसा एकाच गावात खर्च करण्याची माझी इच्छा नाही पण माझे सर्व आर्थिक आडाखे इथे आल्या पासून चुकताहेत खुप सुविधा नको पण किमान टापटीप आणि स्वच्छ लॉजींग साठी मला अपेक्षेपेक्षा खूपच अधिक पैसे मोजावे लागताहेत, रिक्षा टॅक्सी यांच्याही परदेशी माणूस म्हटला की उकळा उकळी होते पाट्।ई मागे लागलेल्या दोनचार विक्रेत्यांकडून काही ना काही घ्यावेच लागते घेतले तर अजून विक्रेती मुले पाठी मागे लागतात नाही घेतले तर क्षणभर स्वस्थ बसूही देत नाहीत. हा एका परदेशी प्रवाशाचा किस्सा, असो. आपण मिपावर या समस्यांची चर्चा केल्याने समस्या कमी होतील असे नाही पण एकतर समस्या बोलून दाखवली की मन मोकळे होते, आणि मुख्यम्हणजे कुठे कोणते लॉजींग चांगले आहे आणि कोणते नाही याची थोडी फार कल्पना आल्यास आपापल्या अनुभवांचा सर्वांनाच फायदा होऊ शकेल.

वाचने 46816 वाचनखूण प्रतिक्रिया 70

मदनबाण 14/11/2014 - 11:25
कुठल्याही लॉज मधे / हॉटेल मधे उतरल्यावर आधी टॉयलेट मधे पाणी आहे का ते पहावे ! नाही तर आयत्या वेळी पंचाइत व्हायची ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आप की कशिश सरफरोश है.... आप का नशा युह मदहोश है ;) {Aashiq Banaya Aapne }

In reply to by मदनबाण

माहितगार 14/11/2014 - 11:38
अगदी अगदी म्हणजे मी रुम चेक करताना आधी टॉयलेटची स्थितीच चेक करतो. प्रत्येक लॉजच्या प्रत्येक रुमचे प्रत्येक टॉयलेट एक नवा अनुभव (धक्का) घेऊन येणार असते. आणि सोबतीला ते मेडीमिक्सचे साबण असतातच !
एकदा एका लॉजवर रुममध्ये घाण वास येत आहे अशी दोन तीन वेळेस तक्रार केली.त्या खवचटाने मला दुसरी रुम दिली पण आख्खी रात्र ढेकणांनी जाग ठेवल. मला वाटत गाव सांगायची गरज नाही.

In reply to by जेपी

माहितगार 14/11/2014 - 11:36
मला वाटत गाव सांगायची गरज नाही.
खरयं, गावोगावी मातीच्याच चुली, बहुसंख्य ठिकाणी ह्या लॉजेसवर मालकवर्ग स्वतः नसतोच असला तरीही त्याला परिस्थिती बद्दल ना खंत ना खेद अशीस स्थिती असते.

माहितगार 14/11/2014 - 12:11
... आणि माझी काशी झाली! (भाग २) हाही भाग ऐसीवर टाकला गेला आहे. लेखिका राधिका यांच्या वाराणशीतील प्रत्यक्ष अनुभव म्हटले तर असे अनुभव भटकंती करणार्‍यांसाठी भारतात नेहमीचेच तरी पण त्यांच्या लेखनशैली मुळे नजारा डोळ्यापुढे जसाच्या तसा उभा रहातो.

विटेकर 14/11/2014 - 15:24
तुळजापुरातल्या लॉजेस अत्यन्त घाणेरड्या आणि काहीही दर असणार्या आहेत. एक आई तुळ्जाभवानीची मूर्ती सोडली तर त्या गावात काहीही नाही . बकाल आणि घाणेरडे गाव आहे तुळ्जापूर ! मंदिरातही पुजारि लोकांची अरेरावी आणि माज असतो. सरकारचा काहीही कन्त्रोल नाही. सकाळी सहा वाजता तुम्हाला अभिशेक करायचा असेल तर एका घणेरड्या हॉलमधे तास्भर बसवतात. मग दही -केळी मध ( काकवी?) साखर अश्या गोष्टिचा अभिशेक देवीला होत असतो, वास्तविक दही आणि केळी हे विरुद्ध अन्न आहे. ते दह्याची लोटी आणि ताट घेऊन पेन्गुळल्या डोळ्यांनी लोक रांगेत उभे असतात. तिथेच खिडकितून फुट्कळ गोष्टी विकणारे विक्रेते.... मग ती गाभार्‍यतील धकला धकली !!! सगळा कळस आहे. .. मात्र मूर्ती अत्यन्त लोभस .. नजर खिळून जाते ...ती या सार्या कोलाहलापसून कुठेतरी दूर आहे असे जाणवते ! त्या दोन अडीच क्षणासाठी मी सारा त्रास सहन करुन दरवर्षी नाईलाजाने तुळजापूरला जातो....आनी दरवेळी पुन्हा नाही ... असे थरवतो....

In reply to by विटेकर

माहितगार 14/11/2014 - 15:53
सकाळी कामे लवकर उरकता यावीत म्हणून छोट्या गावतील लॉजेस चांगली नसली तरी बर्‍याचदा उतरावे रहावे असे वाटते पण प्रत्यक्षात तुम्ही म्हणता ते खरे आहे. काही कार्यालयीन कामाने गेले असता तेथील लॉजेसचा माझा अनुभवही फारसा स्पृहणीय नसल्याचे आठवते. तेव्हा पासून सोलापुरला मुक्काम करून अपडाऊन असा प्रकार जास्त अवलंबला. सोलापुर ते पुणे रात्री एक पॅसेंजर आहे त्या पॅसेंजरने प्रवासही असाच दिव्य असल्याचे आठवते.

In reply to by विटेकर

पिलीयन रायडर 14/11/2014 - 16:52
तुळजापुर बद्दल सहमत... एक ती भवानीआईची मुर्ती सोडली तर भयानक घाण गाव आहे. आणि दर वेळेस तिथे गेले की ती घाण बघुन डोकं तर उठतच पण इतक्या सुंदर मुर्तीची लिंबु+दही+केळ ह्यानी अभिषेक करुन जी काही हानी चालवली आहे त्यानी जास्त त्रास होतो.. संग्रहालयात जतन करुन ठेवावी अशी ती मुर्ती आहे.. मी भाविक वगैरे पंथातली नसले तरी ही मुर्ती पहायला मिळेल यासाठीच दरवर्षी तु.पुर सहन करते...

In reply to by प्रचेतस

वल्लीदा मुळ मुर्ती लपवली गेली .फुटली ती डमी होती. तुळजापुर बद्दल काही सदस्यांचे मत वाचुन वाईट वाटल. तुळजापुर काय आहे हे माझ्या नजरेतुन लवकरच सांगेन.

In reply to by जेपी

प्रचेतस 14/11/2014 - 22:48
मूळ मूर्ती लपवली गेली हे माहित नव्हतं कदाचित रा. चिं. ढेरे यांच्या 'तुळजाभवानी' ह्या पुस्तकात अधिक माहिती मिळू शकेल.

In reply to by जेपी

hitesh 15/11/2014 - 10:42
कणाकणात ईश्वर आहे. मग ही काय अन ती काय सगळ्या मूर्थी देचाच्याच ना ? ... हाथ आओ तो बूत हाथ न आओ तो खुदा हो. तुम एक गोरखधंदा हो

In reply to by hitesh

जेपी 15/11/2014 - 11:02
हितेस भाय आस बोलु नये. आणी किती घेतलीय तु.हात बग किती थरथरतोय. आमचा नाना पण असच करायचा. एकदिवशी असाच मंदिरात गेला आणी गेला बिच्चा...रा

In reply to by hitesh

माहितगार 15/11/2014 - 11:16
कणाकणात ईश्वर आहे. मग ही काय अन ती काय सगळ्या मूर्थी देचाच्याच ना ?
होय तुम्ही म्हणता तेही बरोबर आहे. अर्थात इतिहास संशोधन हा माझ्या मते वल्लींचा फोकस असलेला एरीआ आहे. इतिहास संशोधनात जे आहे जस आहे तस स्विकारता आल पाहीजे मला वाटते या विषयावर माझा वेगळे धागे आहेत म्हणून या धाग्यात रिकाम जातं दळण्यात मलातरी रस नाही.

In reply to by मालोजीराव

बॅटमॅन 17/11/2014 - 15:14
अबे मग ते वाचलेलं खोटंच की काय? अर्थात त्या मार्गात येत नै म्हणा ते, पण अफजलखानाने देवीची मूर्ती फोडली इ. लिहिलेलं तरी आहेच. ते कुठल्या बखरीत नंतर घातलं असल्यास माहिती नाही, पाहिलं पाहिजे.

कलंत्री 14/11/2014 - 16:08
एका खोलीत अंदाजे पाचजणांची कशीबशी केलेली सोय, एकच संडास / स्नानगृह त्यामूळे रात्रीपासुनच सकाळी कसे उरकावयाचे ही भिती, भिंतीला रंग नाही, खोलीत विचित्र असा कुबट वास इत्यादी इत्यादी. वरील धागा वाचल्यानंतर लक्षात आले की आपण किती सहन करीत असतो ना?

In reply to by कलंत्री

माहितगार 14/11/2014 - 16:28
गोवा टूरीझमच्या रिसोर्टचा एकदा चांगला अनुभव घेतलेला. वेबसाईटवरही एमटीडिसी वेबसाईट मस्त दिसते म्हणून महाबळेश्वरला एमटीडिसीच्या रोसोर्टमध्ये उतरलो, टॉयलेटची एकदम वाट लागलेली बाकी तुम्ही म्हणता तसाच अनुभव. रात्र आधीच झालेली म्हणून रात्री लगेच बदलले नाही दुसर्‍या दिवशी बाकी लॉजींग ज्याम प्याक होत आणि जे मिळाल त्यात अनुभव तुम्ही म्हणता तसाच. माझीच तब्येत संध्याकाळ पर्यंत बिघडली तशी परतीची वाट धरली.

बॅटमॅन 14/11/2014 - 16:26
लॉजचा विषय निघाला, त्यात तीर्थक्षेत्रीच्या लॉजबद्दल बोलणे झाले म्हणून एक अवांतर आठवण. कोलकात्यातील कालीघाटातले कालीमंदिर अतिशय गलिच्छ आहे. एखाद्या हॉटेलच्या किचनमध्ये असते तितके घाणेरडे. निर्माल्याचे ढीगही तिथेच, सर्व कचराही तिथेच. वर आणि पंडा लोकांची अरेरावी. हे दक्षिणेश्वरातही पाहिले होते, लै संताप आला होता. पण किमान तिथे स्वच्छता तरी आहे!!!! मुसलमान आणि ख्रिश्चनांना दररोज किलोभर शिव्या घालणार्‍या धर्माभिमान्यांना किमान आपली देवळे स्वच्छ ठेवावीत इतकीही अक्कल नसते. हे विशेषतः उत्तरेत बघावयास मिळते. महाराष्ट्रही तसाच! खिद्रापूरच्या देवळात मांजराने केलेला विधी पाहण्यात आलेला होता. दक्षिणेत मात्र असे नसते. चिंधी आकाराची देवळेही तुलनेने स्वच्छ असतात.

In reply to by बॅटमॅन

माहितगार 14/11/2014 - 16:34
कलकत्त्यात होतो तेव्हा कालीमंदिर बघण्याची इच्छा होती तसेही रांगा असलेली मंदीरे मला फारशी भावत नाहीत त्यामुळे प्रसिद्ध मंदीरे जमेल तेव्हा टाळत असतो. त्या पेक्षा रस्त्यावर छोटेखानी का असेना स्वच्छ शांत मंदीर असेल तेथे दोन मिनीटे मन शांत ठेवण्यासाठी वापरत असतो. गुरुद्वारे सुद्धा केवढे निर्मळ ठेवलेले असतात. क्वचित चर्चच्या शांत स्वच्छ प्रांगणातही वेळ घालवला आहे. मंदीरांना धर्मशाळा विभागही असतो पण मंदिरातली अस्वच्छता पाहून कधी त्याची साधी विचारना सुद्धा कधी करावी वाटलेली नाही.

In reply to by माहितगार

कालीघाटातले मंदिर आजिबात पाहू नका. दक्षिणेश्वर अन बेलूर मठ मात्र चुकूनही चुकवू नका. दक्षिणेश्वरच्या कालीमातेचे दर्शन आणि त्यानंतर बेलूर मठातली सायंकाळची पूजा, तिथला बत्तासेप्रसाद अन मग संध्याकाळी, नदीकाठच्या दिव्यांचा नजारा पाहत बेलूर मठ ते दक्षिणेश्वर हा होडीप्रवास म्हणजे निव्वळ स्वर्ग आहे.

In reply to by बॅटमॅन

माहितगार 14/11/2014 - 17:03
उत्तर कर्नाटकात बरीच छोटी मोठी खेडीपण फिरलोय पण बेलूरचा योग अद्याप आला नाही. पण निश्चित लक्षात ठेवेन.

In reply to by माहितगार

नंदन 14/11/2014 - 17:12
दादा, ते बळ्ळारी/बेल्लारी वायलं नि हे बेलूर वायलं. (जसं रेडी नि रेड्डी वायलं तसं) ही घ्या विकी (ज्योतीने तेजाची आरती :)) - http://en.wikipedia.org/wiki/Belur_Math

In reply to by नंदन

माहितगार 14/11/2014 - 17:17
ओके ओके प्रसिद्ध मंदीरे आणि मी एकमेकांपासून जरासे लांब असतो त्यामुळे सहाजिकच आमची अशी विकेट निघालीतर :) ज्योतीने तेजाची आरती - हि कॉमेंट आवड ब्वा :) आमच्या सामान्यज्ञानत भर घालण्यासाठी धन्यवाद -अनभिज्ञ माहितगार

नाखु 14/11/2014 - 17:06
तीव्र सहमतः धर्माभिमान्यांना किमान आपली देवळे स्वच्छ ठेवावीत इतकीही अक्कल नसते. हे विशेषतः उत्तरेत बघावयास मिळते. महाराष्ट्रही तसाच! खिद्रापूरच्या देवळात मांजराने केलेला विधी पाहण्यात आलेला होता. बेंगलूरात भर चोउकातील अगदी छोटेखानी मंदीर स्वच्छ आणि प्रसन्न अनुभवले आहे (नेट्कलप्पा सर्कल) वाराणशीत देव तिथून पळून का गेले नाहीत (बजबजपुरी/घान्/देवबाजार पाहून) याचा विचार करीतच काशी-गया-अयोद्धा प्रवास केला. अगदी जेजूरीलाही दक्षीण भारतीय मित्राला हे समस्त महाराष्ट्राचे कुलदैवत आहे, हे सांगताना (गाभार्यातील घाण्-पुजारी अरेरावी पाहून)खाली मान घालावी लागली आहे.

कंजूस 14/11/2014 - 19:34
प्रश्न/शोध फार व्यापक आहे. अ)तुम्ही कोण आहात एकटे का कुटुंब का मोठा गट ? ब)कोणत्या प्रकारच्या शहरात लॉजींग शोधता आहात? क)कोणत्या आर्थिक अथवा सोयीच्या पातळीतली 'रूम' हवी आहे ?हे ठळक फरक आहेत. त्याप्रमाणे अनुभव बदलतात. मला चार राज्यांतला पर्यटनानिमित्त चांगलाच अनुभव आला आहे.

In reply to by कंजूस

माहितगार 14/11/2014 - 20:19
सेवांमध्ये सुधारणा होत आहेत नाही असे नाही. पण पुर्वतयारी शिवाय एखाद्या गावचा लॉज शोधणे आजही अनपेक्षीत धक्के देणारे ठरू शकते असे वाटते. अगदी मिडल लेव्हल शहरातही सर्वसामान्य बजेट मधील खोली ९००-१००० रुपयांच्या पेक्षा कमी मिळण्याची शक्यता कमीच असावी एक खोली २० दिवस जरी भाड्याने गेली तरी १२*१४ च्या रुमसाठी महिन्याचे २० हजार भाडे तेवढ्याच जागेसाठी मिळणार्‍या इतर कोणत्याही उत्पन्नाच्या मानाने खूप आहे. नफ्यासाठी व्यावसाय असतात तो जरूर कमवला पाहीजे. पण कुणी केवळ रु १०००/- खर्च करतो म्हणून दुय्यम दर्जाची सेवा हे व्हॅल्यू फॉर मनीच्या गणितात बसते असे वाटत नाही. बर्‍या पैकी रूमसाठी सध्या भारतातला सर्वसाधारण खर्च २५०० ते ४००० प्रती दिवस असावा असे वाटते. कुणालाही दहा दिवसांचा टूर काढावयाचा म्हटले तर ३० ते ४० हजाराचा खर्च केवळ लॉजींग बोर्डींगवर होतो. आणि या दरांच्या व्हॅल्यू फॉर मनी बद्दल साशंकता वाटते

सिरुसेरि 14/11/2014 - 20:01
लॉज / हॉटेल वरिल रूम मध्ये उतरल्यावर नळ , पाणी ( पिण्याचे / वापरण्याचे ), वॉटर हिटर , टेलिफोन , रुम मधले दिवे , मायक्रोवेव्ह ओव्हन , फ्रीज , बेडशीट , टीव्ही ह्या सर्व सुविधा योग्य स्थितीत आहेत हे तपासुन पाहावे .

रेवती 14/11/2014 - 20:42
अगदी महत्वाचा व उपयोगी धागा आहे. वेळ मिलेल तसे वाचत राहीन. माझे भारतातील अनुभव फार जुने असल्याने ती हाटेले आता नसण्याची शक्यता आहे, आठवत नाहीत फारशी पण बाहेरून चकाचक व फ्रंट डेस्कावर चांगली सर्व्हीस बघून, अधीच्या ऐकीव माहितीवर हैद्राबादेतील हाटेलात एकदा गेलो. खोल्या वाईट तर होत्याच पण वरताण म्हणते ते 'त्या' प्रकारातील हॉटेल होते. ज्यानी माहिती पुरवली त्याच्या नावाने फुल्या मोजल्या. भयंकर अपमानस्पद वाटलेले.नवर्याने लगेच दुसरे हॉटेल शोधले. त्यान्म्तर एक गोष्ट केली, ती म्हणजे जेंव्हा हॉटेलात खोली बुक करू तेंव्हाच त्याच्या जवळपास एखादे युथ होस्टेल आहे का हेही बघणे. आपली युथ होस्टेलच्या मेंबरशिपचॆ कार्डे जवळ बाळगणे. तिथे दरवेळी अवस्था चांगली असेल असे नाही याचा अनुभव क्यानडात आला पण निदान झोपायला स्वच्छ बिछाने मिळाले व नंतर दुसरे बुकींग मिळेपर्यंत तग धरता आली. याआधी आणखी एखादा अनुभव असेलही, आठवल्यास लिहिते. पण शक्य्तो रिव्ह्यूज वाचून, मित्रांना विचारूनच बुकिंग केल्याने बहुतेक ठिकाणी बरी व्यवस्था ते चांगली व्यवस्था झाली.

माहितगार 14/11/2014 - 20:46
आता बर्‍या पै़की माहिती देणारी टूरीस्ट वेबसाईट्सही उपलब्ध असतात मी मागे व्हर्च्यूअल टूरीस्ट डॉट कॉम नावाची वेबसाईट रेफर करत असे. विकिचे विकिव्हॉयेजही या कारणासाठी आहे परंतु या सुविधात मुख्यत्वे पाश्चिमात्य प्रवाशांचे लेखन आणि आपसूक त्यांच्या दृष्टीने विचार अधिक होतो असे वाटते.

माहितगार 14/11/2014 - 20:53
बर्‍याचदा हॉटेलच्या नावात वगैरे फरक पडत नाही पण बरीच हॉटेल्सची परस्पर खरेदी विक्री होत असते. समोर नेमप्लेट तीच असली तरी मॅनेजमेंट बदलल्याने कधी खूपच सुखद अनुभव येतात तर कधी आपण याच हॉटेल मध्ये आधी चांगला अनुभव घेतला आणि आता अवस्था अशी का असे धक्के बसण्याचेही प्रसंग उद्भवतात. शेवटी सेवा ही मनुष्य स्वभावावर निर्भर करते. पंचतांरांकीत खर्च करूनही हाती चांगलाच पदार्थ येईल का नाही याची खात्री नाही तसेच सेवांचेही होत असावे.

कंजूस 14/11/2014 - 22:07
तुम्ही अधिक काळ राहणार असाल तर ती हॉटेले वेगळी असतात आणि मुख्य ठिकाणापासून दूर असतात. व्ह॰टु॰ फॉरनरच्या नजरेतून भारत आहे -बरोबर हॉलडिआइक्यू इकडची साइट आहे परंतू उघडपणे वाईट हॉटेलात राहिलो हे कबूल करणारे कमी आहेत. आगाउ बुकिंग नसेल तर कोणत्या मार्गाने शहरात येता (विमान राजधानी दुरांतो मेल इक्सप्रेस बस इ॰) यावर रिक्षावाले गंडवतात.
मला नोकरी आणि धंद्यानिमित्त भारतात बर्‍याचशा ठिकाणी फिरायचा योग आला. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, मध्य प्रदेश अशी काही राज्ये आणि शहरे. लॉजींग बोर्डींग मधे न राहिलेला माणूस कदाचित मिपावर नसेल किंवा असतील तरीही खालील लिखाण खास त्यांच्यासाठीच. (खालील लेखनाचा उपयोग नोकरी निमित्त फिरण्यार्‍या बाप्यांसाठी होऊ शकेल. बायामाणसांनी / कुटुबांनी माफी द्यावी.) टीप : जे तारांकित / लक्जुरीयस लॉजींगमधे राहत असतील त्यांनी इथूनपुढे नाही वाचले तरी चालेल किंवा वाचायचेच असेल तर केवळ टाईमपास म्हणून वाचावे. काही शब्दप्रयोग खोटे / अश्लील किंवा अतिशयोक्त किंवा यापै़की सर्व वाटू शकतील त्याबद्द्ल अगोदरच माफ करा. पण ही सर्व अनुभवाचे सत्यवचने आहेत. येथे कोणत्याही सेवेचा / अनुभवाचे सरसकटीकरण केलेले नाहीये. चांगले आणि वाईट अपवाद नेहमीच आढळतात. कोण म्हणत की भारत एकसंध राष्ट्र कधीच नव्हता ? सार्वजनिक वाहतूक, लॉज बघा मग अवघा भारत एकच आहे याची जाणिव तुम्हाला होईल. साधारण लॉज हे रेल्वे स्टेशन, बस स्टेशन वा वाहतुकीच्या मुख्य ठिकाणापासून जवळच असतात. मुख्य वाहतूक ठिकाणापासून अंतर जितके जवळ तितके भाव जास्त व सुविधांचा दर्जा कमी. बस / रेल्वे मधून उतरल्या उतरल्या जे रिक्षा / गाडीचालक स्टेशनच्या बाहेर उभे असतात व तुमच्या मागे लागतात त्यांच्याबरोबर शक्यतो व्यवहार करु नये. फसगत होण्याची शक्यता जास्तीत जास्त. यांचे लॉज मालकांबरोबर सेटींग असते व गिर्‍हाईक नेल्यावर त्यांना त्यांचे कमिशन मिळते. शिवाय १० रु. च्या जागी तुम्हाला ५० रु. ला कापतील. त्याऐवजी बाहेर लगतच्या रस्त्यावर या. रस्त्याने जाणारी मोकळे वाहन पकडा आणि आपले स्थळ गाठा. लॉजमधे वेगवेगळे प्रकार असतात. १. डॉर्मेटरी : ही एक मोठी खोली असते व तिच्यातच अनेक पलंग ठेवलेले असतात. पलंगाला खाली एका माणसाचे सामान राहू शकेल अशी पेटी असते व तिला कुलूप असते. तुम्ही तुमचे सामान तिथे ठेवून पलंंगावर आराम करु शकतात. ह्या प्रकारच्या व्यवस्थेत प्रायव्हसी अजीबातच नसते . आता बहुसंख्य ठिकाणी सीसीटीव्ही क्यामेरे लावलेले असतात त्यामुळे अशा प्रकारच्या खोलीमधे सामानाची सुरक्षितता तुलनात्मक दृष्ट्या बरी असते. इथे उतरलेल्या पब्लिकला सामाईक टॉईलेट व सामाईक बाथरुम आळीपाळीने वापरता येते. साधारण लो बजेट व कमी वेळासाठी / तासांसाठी हा विभाग उपयुक्त. ऑल ओव्हर इंडीया रेट रु. १०० ते रु. २५० या दरम्यान. सिंगल बेड व डबल बेड असलेली एसी अथवा नॉन एसी रुम : एक किंवा दोन किंवा तीन माणसांसाठी किंवा कुटुंबासाठी उपयुक्त. ऑल ओव्हर इंडीया रेट रु. ४०० ते रु. ४००० या दरम्यान. (मी तारांकित लॉजींग बोर्डींग यात धरलेली नाहीत.) आमच्या ठाणे स्टेशनलाच बघा ना. सरकारने एवढा छान रिक्षा थांबा व रांग लावण्याची उत्तम सोय करुन दिली आहे तरी बरेच महाभाग त्यांच्या मागे लागणार्‍या रिक्षावाल्यांच्या रिक्षात जाऊन बसतात. असे करुन ते रांगेतले १० मिनिट वाचवितात मात्र त्याबदल्यात खिशाला खार लावून घेतात. अशा मुर्खांना सांगावे वाटते की बाबा रे, जरा रांगत उभा रहा की. पण समाजाचे प्रबोधन करता करता आपलाच एक दिवस प्रबोधनकार होणार. ते असो. तुकाराम महाराजांच्या सांगण्याप्रमाणे "काय भुललासी वरलीया रंगा ! उस आहे डोंगा परी रस नव्हे डोंगा" हे तत्त्व अंमलात आणावे. लॉजवर जातानाच्या रस्त्याचे ढोबळमानाने निरिक्षण करावे. "आंबट" लॉज तिथे येणार्‍या पब्लीकवरुन सहज ओळखू येतात. सरकारने आखून दिलेल्या लॉजींग बोर्डींगमधे तुम्हाला सरकारी ओळखपत्र देणे अनिवार्य आहे. रजीस्टरमधे नीट नोंद करा. दिलेल्या पैशांची पावती न विसरता घ्या. पैसे देण्याअगोदर आपल्याला देण्यात येणार्‍या खोलीचे नीट निरिक्षण करावे. केवळ रिसेप्शन चकाचक आहे म्हणजे आतही तसेच असेल असे मुळीच समजू नये. तसेच जास्त पैसे मोजले की चांगल्या सुविधा उपलब्ध होतील किंवा स्वस्तातला लॉज आहे म्हणून तो कमी प्रतीचा असेल असेही समजू नये. सर्वप्रथम टॉयलेट, बाथरुममधे पाणी येते आहे का ते बघावे. काही ठिकाणी ठराविक वेळेतच पाणी येते. तसे असेल तर दोनदा विचारुन खात्री करुन घ्यावी. मात्र गरम पाण्याच्या बाबतीत जास्त काही करता येण्यासारखे नसते. कारण तुमच्या गरम पाण्याच्या आणी लॉजवाल्याच्या गरम पाण्याची व्याख्या बरेचदा वेगळी असते. नंतर आपल्याला ज्या बिछान्यावर झोपायचे आहे त्याचे नीट निरिक्षण करावे. हा बिछान्याच्या उदरात अनेक माणिकमोती दडलेले असतात. जसा बाहेरख्याली पुरुष आपल्या पत्नीला एडस सारख्या आजाराचे दान देतो तसेच लॉजींगमधे राहणारा माणूस आपल्या घरादाराला 'ढेकूण' या प्राण्याचे दान देउ शकतो. वर उल्लेखीलेल्या आजारावर आणि ढेकूण या प्राण्यावर जालीम उपाय अजून माझ्या पाहण्यात तरी नाही. हा प्राणी तुमची आणि कुटुंबाची उरलेली जिंदगी हराम करुन सोडतो. जर बिछान्यावर ठिकठिकाणी लाल काळे डाग पडले असतील, उशा, रुमचे कोपरे लाल काळे दिसत असतील तर तिथे नक्कीच ढेकूण आहेत. शहरातल्या माणसांना हा प्राणी माहीत नाही म्ह्णून यावर एवढे शब्द खर्च केले. याशिवाय "बह्मचर्य हेच जीवन" या उक्तीला न माननारे आणि एकपात्री किंवा द्वीपात्री प्रयोग करणार्‍या व्यक्ती बर्‍याचदा आपल्या अस्त्तीत्वाचे पुरावे तिथे सोडून गेलेले असतात. त्यामुळे शक्यतो घरुनच एखादे पातळ बेडशीट अथवा तत्सम वस्त्र बरोबर घेऊन जावे ज्याच्या अशा इमर्जन्सीत अंथरुण किंवा पांघरुण म्हणून उपयोग केला जाऊ शकतो. शक्यतो लॉजने दिलेला टॉवेल वापरु नका. स्वतःचा टॉवेल जवळ ठेवा. ज्या लॉजच्या कॉरीडॉरमधे शिरल्या शिरल्या दारु, सिगारेट सारख्या वासांचा भपकारा येईल तेथे सहकुटुंब राहणे टाळावे. धोका होऊ शकतो. आपली सामानाची ब्याग शक्यतो आपल्या नजरेसमोर राहील अशीच ठेवा. लॉजच्या बाहेर जाताना शक्यतो आपल्या रुमची चावी आपल्याबरोबरच ठेवा आणि पैसे आणि महत्वाच्या गोष्टी आपल्याबरोबरच ठेवा. बाहेर पडताना लॉजचे कार्ड आठवाणीने जवळ ठेवा. स्वतःच्या स्मरणशक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका. मी कधीही रिसेप्शनमधे चावी ठेवत नाही. लॉजमालक जर म्हणाला की मला रुम साफ करायचा आहे तर मी असल्यावरच साफ कर असे सांगावे. एकदा दोनदा तर मी अशा मालकांना भलती सलती उत्तरे दिली आहेत. वरील काही गोष्टी जरी तुम्ही बरोबर केल्या तरी तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली आहे. जेवणाखाण्याबद्द्ल मी सल्ला देऊ शकत नाही. लक्षात ठेवा : आपल्याला लुटणार्‍या सर्वांची की टू सक्सेस आहे घाई. आपण १०-१५ तास प्रवास करतो पण योग्य लॉज शोधायला, योग्य वाहन शोधायला १५ मिनिटे वेळ देत नाही. का ? घाई. आपल्याला सर्व सुविधा आपल्या बुडाखाली लागतात. का ? आळशीपणा. जाता जाता : १) आपला प्रिय भारत देश हा प्रेमळ आहे. जे काम आरडा ओरडा करुन होणार नाही ते प्रेमाने होते. लॉज मालकाला ५०० रु. दिले ना ? मनासारखा निवारा मिळाला काय ? नसेल मिळाला तर रुम सर्विस देणार्‍या पोर्‍याला प्रेमाने ५-५० रु. द्या, त्याचे नाव गाव विचारा, थोड्या गप्पा मारा मग बघा, जहन्नम ची जन्नत करण्यासाठी तो जास्तीत जास्त कष्ट घेईल. उगाच मी एवढे पैसे दिले आहेत नी तेवढे पैसे दिले आहेत असा आरडाओरडा करु नका. त्याने मालकांना काही फरक पडत नाहीत. अहो त्यांच्या लॉजया ढेकणांना सुध्दा ते दाद देत नाहीत तर तुम्ही कोण ? :) २) आपण भेट दिलेल्या लॉजची प्रसिद्धी / बदनामी करायला लाजू नका. पुढच्याच ठेच, मागचा शहाणा. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवितो. जय हिंद !

In reply to by धर्मराजमुटके

टवाळ कार्टा 15/11/2014 - 09:12
अतिशय सहमत
याशिवाय "बह्मचर्य हेच जीवन" या उक्तीला न माननारे आणि एकपात्री किंवा द्वीपात्री प्रयोग करणार्‍या व्यक्ती बर्‍याचदा आपल्या अस्त्तीत्वाचे पुरावे तिथे सोडून गेलेले असतात.
वाक्यरचनेला १ जोरदार सलाम .... =))

In reply to by टवाळ कार्टा

दुश्यन्त 16/11/2014 - 12:31
हाहा.. एक नंबर! मागच्या एका नोकरीत ४-५ वर्षापूर्वी बार्शी, लातूर, उस्मानाबाद भागात गेलो होतो. अश्या जागी तारांकित हॉटेल तेव्हा तरी नसावीत. जे काही त्यातल्या त्यात चांगल्यापैकी हॉटेल्स/लॉज असतात त्यांचा दर्जा/ ख्याती वर्ष सहा महिन्याला वर खाली होत असते. तेव्हा तिथला एकजण म्हणाला होता हॉटेल/ लॉज बघताना मी बाथरूम आणि नंतर बेड पाहतो. बेडवर कुणी 'कुस्ती' खेळली नाही ना हे आधी पाहतो. बाकी टीव्ही, एसी अगदी जेवणपण महत्वाच नसत. जेवण बाहेर करता येत त्याची आठवण आली.
मुख्य वाहतूक ठिकाणापासून अंतर जितके जवळ तितके भाव जास्त व सुविधांचा दर्जा कमी.+१११ याचा पुरेपूर अनुभव बेंगलूरात घेतला आहे.शेवटी कार्यालयतील स्थानीक माणसाला हाताशी धरून दोनच दिवसात निवास्-स्थान बदलले.त्याचा अ‍ॅड्मिनवाल्यांना राग आला त्या कडे दुर्लक्ष केले (हितसंबध गुंतलेले दुसरे काय?) आणि पुढील प्रत्येक मुक्कम याच ठिकाणी केला.

पिवळा डांबिस 15/11/2014 - 09:48
तुम्ही म्हणता तसा काही वाईट अनुभव अजून तरी भारतातल्या हॉटेलवाल्यांविषयी आलेला नाही. किंबहुना तुम्ही किती पैसे खर्च करण्याची तयारी दर्शवता यावर तुम्हाला कितपत सर्व्हिस द्यायची याची एक विलक्षण जाण मला भारतीय हॉटेल्वाल्यांमध्ये नेहमीच आढळत आलेली आहे. ती मला खुद्द पश्चिम युरोपातही आढळली नाही... आणि त्याबद्दल भारतीय हॉटेलवाल्यांबद्दल मला आदर आहे. त्याचबरोबर कमीत कमी पैसे खर्चून किंवा शक्यतो फुकटात सेवा पदरी पाडू इच्छिणार्‍या काही ग्राहकांशी होणारे त्यांंचे कोरडे वा अनादरणीय वर्तनही पहाण्यात आलेले आहे. शेवटी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री हा पैशाचा खेळ आहे.....

In reply to by पिवळा डांबिस

बॅटमॅन 15/11/2014 - 15:49
युरोप वगैरे माहिती नाही, परंतु पैसे व सर्व्हिस यांच्या लिंकेबद्दल सहमत आहे. कैक डीसेंट ३-स्टारमध्येही आजकाल लय आलिशान सोयी असतात.

In reply to by बॅटमॅन

पिवळा डांबिस 17/11/2014 - 11:45
युरोप वगैरे माहिती नाही,
आणि ती माहिती असावी अशी आमची सर्व मिपाकरांकडून अपेक्षाही नाही. आम्हाला पश्चिम युरोपात जो काही अनुभव आलाय त्याबद्दल आम्ही लिहिलंय!!!

hitesh 15/11/2014 - 10:58
क्म्प्नीच्या कामासठी कलकत्ता व बेम्गलोर येथे.राइलो होतो. चान अनुभव होते

In reply to by hitesh

माहितगार 15/11/2014 - 11:25
कलकत्ता बेंगलोर लॉजींगचे माझेही अनुभव चांगले आहेत, दुसरे तर दूरच्या मेट्रोपोलीतील बिझनेस ट्रिपस पुर्व नियोजीत असतात. लोकल स्टाफ अथवा डिलरचा सपोर्ट असेल तर लॉजींग प्रकरण तेवढे जड जात नाही. अर्थात कंपनीने जबर पैसा मोजलेला असतो त्यासाठी, त्यामुळे तेवढे वाटत नाही. पण हे सर्व खर्च दोनदा मोजले जातात एकदा स्वतःच्या कॉस्ट टू द कंपनी मध्ये आणि दुसर्‍यांदा एकुण कॉस्ट ऑफ ऑपरेशन मध्ये कॉस्ट ऑफ ऑपरेशनच जस्टीफिकेशन व्यवस्थापक मंडळींना करावे लागते.

होकाका 15/11/2014 - 11:58
पूर्वी दीपा पब्लिकेशनचं 'प्रवासी डायरी' म्हणून एक पुस्तक मिळायचं. त्यात स्वस्तात स्वस्त ते महाग अशा बर्‍याच लॉजेसची माहीती आणि दूरध्वनि क्रमांक असायचे. तसंच आयटीडीसी चं चर्चगेटजवळ एक ऑफीस आहे. तिथेसुद्धा भारतातल्या बहुतेक सगळ्या पर्यटन स्थळांबद्दल अशीच नेमकी आणि उपयुक्त माहीती असायची. म्हणजे राजस्थानमधल्या रु. २० पासून ते रु. १२००० पर्यंतच्या राहण्याच्या सोयींची माहीती बघितली होती. पण हे साधारण १५ वर्षांपूर्वी -- हल्लीचं माहीत नाही.

कंजूस 15/11/2014 - 14:41
'कॉस्ट टू--'बद्दल गैरसमज झाला आहे परंतू अवांतर म्हणून सोडतो. हॉटेल मालक आपली जागा न सोडता रोज बारा गावचे पाणी पीत असतो. कोण एलटिए च्या विवंचनेत आहे (पक्के बिल), कोणाला खोटे बिल हवे आहे, उडती पाखरे कोण आहेत, याप्रमाणे तो रूम गळ्यात बांधतो. शिवाय आपला अवतारही बरेच काही सांगून जातो. काही ठिकाणी रूम रेट मोठ्या बोर्डावर लिहिलेले असतात तिथे स्वच्छता वगैरे चांगली असते. मी बऱ्याचवेळा रे स्टेशन बाहेर येऊन एखाद्या स्कुटर /टु व्हीलरवरच्या माणसाकडे चौकशी करतो "कोणत्या रस्त्यावर फैम्लीसाठी लॉज आहेत ?"हा बहुधा स्थानिक माणूस असतो आणि योग्य माहिती देतो.

रघुपती.राज 15/11/2014 - 23:57
धर्मराज मुटके यांनी फार सुंदर लिहिले आहे. धन्यवाद. काही मिपाकरांनी वर उल्लेख केला की सहल विषयक वेब साईटवर विदेशी पर्यटकांच्या दृष्टीने लिहिले जाते. पण याला आपण जबाबदार आहोत. अश्या वेबसाईट वर मी आणि माझी पत्नी विस्तृत रिव्यू लिहितो. लिहिताना सदर हॉटेल मध्ये कोण कोण (मी- पत्नी आणि ४ वर्षांची मुलगी) राहिले होते व कधी राहिले (वर्षातील कोणता महिना ) होते हे स्पष्ट लिहितो. रिव्यू लिहिताना मुलीला देखील काय आवडले किंवा काय आवडले नाही ते स्पष्ट विचारतो. लहान मुले बऱ्याचदा अत्यंत महत्वाच्या पण आपल्या नजरेतून सुटलेल्या बाबी समोर आणतात. अधिकाधिक भारतीय माणसे रिव्यू लिहितील तेव्हाच हे रिव्यू आपल्या उपयोगाला येतील. हॉटेल मध्ये आपल्याला काही चांगले कर्मचारी भेटले असतील तर त्यांचा नावानिशी जरूर उल्लेख करावा. तसेच त्या परिसरातील एखादा प्रामाणिक रिक्षावाला, घोडेवाला, गाईड यांचे देखील त्यांच्या मोबाईल सह (अर्थात त्यांच्या पूर्व परवानगीने ) नाव लिहावे. यामुळे प्रामाणिक, मेहनती माणसे पुढे येतात. तुम्हाला असा एखादा उल्लेख वाचनात आला असेल तर जेव्हा कधी त्या माणसाला भेटलं तेव्हा त्याला जरूर हे सांगा की त्याच्या एका जुन्या ग्राहकाने त्याच्या विषयी चांगला अभिप्राय लिहिल्याने तुम्ही त्याला भेटत आहात. जेव्हा प्रामाणिक व मेहनती माणसे पुढे येतील तेव्हाच गलिच्छ आणि चोर माणसे मागे पडतील. आम्ही एकाच ठिकाणी एका पेक्षाजास्त वेळा जातो. तरीही न कंटाळता आम्ही रिव्यू लिहितो. जागेत झालेले चांगले वाईट बदल आम्ही लिहितो. ट्रीप अडवायझरचा फायदा तुम्हाला तेव्ह्याच होईल जेव्हा तुम्ही आधी इतरांना तुमचे अनुभव धन देऊ कराल. मुटके साहेबाना पुन: धन्यवाद. टीप: येथे लिहिणे मला जमत नाही. त्यामुळे जीमेल मध्ये टाईप करून येथे चिकटवत आहे. शुद्ध लेखनाबद्दल माफी असावी. चूक भूल द्यावी घ्यावी

In reply to by रघुपती.राज

बहुगुणी 16/11/2014 - 06:33
जेव्हा प्रामाणिक व मेहनती माणसे पुढे येतील तेव्हाच गलिच्छ आणि चोर माणसे मागे पडतील. ..... न कंटाळता आम्ही रिव्यू लिहितो. जागेत झालेले चांगले वाईट बदल आम्ही लिहितो. ट्रीप अडवायझरचा फायदा तुम्हाला तेव्ह्याच होईल जेव्हा तुम्ही आधी इतरांना तुमचे अनुभव धन देऊ कराल. अगदी खरं आहे, कौतुकापद कामाबद्दल धन्यवाद! आपले रिव्ह्यूज कोणत्या संस्थ ळावर असतात तेही कळूद्यात. वाचायला आवडतील. धर्मराज मुटके यांनाही वाचनीय सूचनांबद्दल धन्यवाद.

कंजूस 16/11/2014 - 02:48
रघुपतिराज आपला प्रयत्न स्तुत्य आहे. टुअर कंपन्यांबरोबर जाणाऱ्यांनी पण लाजिंगचा अनुभव लिहिला पाहिजे. १)चेक आउट टाईम याची खात्री करावी अन्यथा एक दिवसाचे पैसे वाया जातात. २)रूममध्ये कार्पेट नसावा फार वाईट परिस्थिती असते. ३)सकाळी लवकर पाच ते सात मध्ये रूम सोडायची असल्यास रात्रीच खात्री करावी. ४)धार्मिक ठिकाणी देवळाच्या जवळ लॉज घेणे टाळावे. ५)पाच सहा कुटुंबे एकत्र गेल्यास एकाच ठिकाणी रूमस मिळवतांना बरीच शोधाशोध करावी लागते. शिवाय रेंटची घासाघिस करता येत नाही. ६)माउंट अबूला पक्के बिल नको असल्यास रेँट कमी करतात. ७)दुपारी चारनंतर रेँटची घासाघिस करता येत नाही. शिवाय दुसरीकडे हॉटेल शोधून नाही मिळाल्यास परत पहिल्याकडे आल्यास तो आता वाढवून सांगतो. ८)स्थान- काळवेळ पाहून एक दिवस कसातरी काढावा आणि दुसरे दिवशी सकाळी नवे लॉज शोधावे.

प्रभाकर पेठकर 16/11/2014 - 09:42
भारतात मच्छरं/डांस, ढेकूण ह्यांचे अनुभव घेतले आहेत. तरी, स्वच्छ्तेबाबत एकूण अनुभव अगदीच वाईट नाही. तसेही , माझे फिरणे, लॉजवर राहणे जास्त झालेले नाही. पण भारतात हॉटेलचे दर, सोयी सुविधांच्या तुलनेत, अव्वाच्या सव्वा असतात हे अनेकदा अनुभवले आहे. त्या मानाने युरोपातील मध्यम पातळीवरची निवासस्थानेही उत्तम प्रकारची असतात असा अनुभव आहे.

सुहास झेले 16/11/2014 - 10:35
सर्व्हिस इंडस्ट्री हळूहळू बदलत जातेय. येत्या काही वर्षात आपल्याकडे काऊचसर्फिग किंवा ऐअरबीएनबी सारख्या उपयुक्त कल्पना आल्यास नवल वाटणार नाही... ह्यामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी जाणार असाल तिथल्या स्थानिक लोकांनी ह्या वेबसाईटवर रजिस्टर केलेल्या जागेत तुम्हाला राहता येते. ९०-९५% ते त्यांचे स्वतःचे घर असते आणि एक पर्यायी उत्पन्न म्हणून याचा वापर केला जातो. सुरुवातीला वाटेल थोडी इनसिक्युरिटी, पण माझा मित्र पूर्ण युरोप ट्रीप कुठल्याही हॉटेलला न थांबता करून आलाय. त्यामुळे ह्या संकल्पनेबद्दल मी खूपच आशावादी आहे. भारतात हे काही मोजक्या जागीच उपलब्ध आहे. आशा आहे भारतात असे "अच्छे दिन" लवकर येवोत..

कंजूस 16/11/2014 - 12:14
जरा तुलनात्मक सांगा. समजा भारतातले एक कुटुंब पर्यटनासाठी भारतातच फिरले आणि त्यांचे एक महिन्याचे उत्पन्न (रुपये ५०हजार धरू)खर्च करायचे ठरवले तर त्यांना किती चांगल्या सोयी मिळतील ?हीच गोष्ट युअरोपातल्या कुटुंबाने त्यांचे मासिक उत्पन्न (साडेतीन हजार युअरो धरु)अथवा अमेरिकेत (पाच हजार डॉलर ) त्यांच्याच देशात खर्च करायचे ठरवले तर त्यांना किती चांगल्या प्रकारे सुखसेयींच्या हॉटेल अथवा लॉजमध्ये पाच सात दिवसतरी सुट्टी साजरी करता येईल ? रकम चुकेल पण मुद्दा लक्षात घ्या.

विटेकर 17/11/2014 - 11:31
कामानिमित्त भारतभर फिरणे होते आनि बहुतेक ठिकाणी उत्तम होटेल्स मध्ये व्यवस्था होते. तक्रारीला जागाच नाही अशी व्यवस्था ! तिथले काही अनुभव ! १. हे अतिशय देखणी पूर्ण स्वच्छ होटेल्स असतात २. पण एका रात्रीकरता अवाच्य सवा पैसे द्यावे लागतात. ३. पण १-२ दिवस ( खरे तर रात्रीच ) राहणार , त्यातील जिम , तरण तलाव याचा आपल्याला शून्य उपयोग ! ४. खोलीतील फ्रीज मध्ये असलेल्या वस्तू , चौपट दराने !! ( एकदा मी ५ स्टार खाल्ले आणि नन्तर किंंअत पाहिल्यावर रिप्लेस केले) ५. अशा होटेल मधे "लोकल फ्लेवर" अजिबात नसतो. ताज चन्दिगडमध्ये नाष्ट्याला इडली= वडा? तिथेच लोकल फ्लेवर म्ह्णून जर्मनच्या किटलीतून मसला चाय नावाचे फुळ्ळ्क पाणी!! बाहेर गाड्यावरचा चहा अफलातून ! ६. परिटघडीचे आदरातिथ्य आणि जबरदस्तीचे आगत्य ..सगळे आपले ठराविक साच्यात ! म्हणजे लहु हास्य करताना जीवणे किती इंच रुन्द करावी हे ही ठरलेले ! असला अनुभव भुवनेश्वरसारख्या ठिकाणी देखील आला. ७. कंपनी देत असली तरीही पैसा हा पैसा आहे , तो कुणाचाही असला तरी अपव्यय होऊ नये असे माझ्या भारतीय मनाला वाटते . हा अपव्यय झालेला पैसा कुठेतरी पुन्हा आप्ल्याच बोकांडी बसतो याचीही बोचरी जाणीव !! त्याच बरोबर खालील गावी आलेले अनुभव खतरनाक आहेत .. ते ही सवडीने लिहिन .. १. रामगुण्डम - आन्ध्र २. बारबील - ओरिसा ३. धनबाद - झारखंड ४. वैझाग - आन्ध्र ५. तिन्सुखिया - आसम ६. चन्द्रपूर - महाराष्ट्र ७. सिन्ग्रलि - मप्र ८. भतिन्डा- पन्जाब

In reply to by विटेकर

जिन्क्स 17/11/2014 - 14:10
बाकीचे अनुभव सवडीने लिहा पण धनबादचा अनुभव आधी येउ द्या..."गँग्स ऑफ वासेपूर" पाहिल्या पासुन ह्या शहरा बद्दल प्रचंड आकर्षण निर्माण झाले आहे.

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) 17/11/2014 - 12:07
आमच्या (मित्रांबरोबरच्या) औरंगाबाद सहलीच्या वेळचा अनुभव. एका ढाब्यावर जेवलो. जेवण मस्त होते. तिथल्याच एका माणसाला राहण्याची चांगली सोय कुठे होईल विचारले, त्याने एक लॉज सांगितले तिकडे निघालो (कारने) रस्ता माहित नव्हता म्हणुन मधे एका माणसाला त्या लॉजला कसे जायचे विचारले त्याने रस्ता सांगितला आणि जाता जाता म्हणाला xxx लॉज अजुन मस्त आहे तिकडे तुम्ही जात आहात त्या लॉजपेक्षा चांगल्या मुली इकडे मिळतील. आम्ही टरकलोच. शेवटी मित्राच्या मित्राचा मित्र अशी ओळख काढुन रात्री १०.३० ला एकाला फोन लावला आणि त्याने सांगितलेल्या एका लॉज वर गेलो. तिकडे जाउन बघितले तर बेड आणि कचर्‍याची बादली बघुन तिकडे आधी काय झाले असावे ते समजले. तसेच खाली आलो, जवळच्या रिक्षा स्टँडवर जाऊन दोघा-तिघांना लॉज कसे आहे विचारले. परत येताना अजुन एकाला विचारले, ते लोक ठिक आहे म्हणाले आणि मग गेलो. अर्थात घरच्यांसोबत प्रवास करताना अशी रिस्क मी तरी कधी घेत नाही. लॉज्/हॉटेल आधीच बूक करतो किंवा ठरवतो.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

दादा कोंडके 12/01/2019 - 17:04
ओयोरूम्स मध्ये सर्रास असे अनुभव येतात. शहरात संपुर्ण अपार्टमेंट ओयोरूम्स म्हणून देतात. मला वेगवेगळ्या शहरात तब्बल चार वेळेला असे अनुभव आले आहेत. तेंव्हापासून कानाला खडा. कोणतही रजिस्टर मेंटेन केलेलं नसतं. सहसा रिसेप्शनवर उत्तरभारतीय लोकं असतात. पोलिसांना मॅनेज केलेलं असततं. अतिशय गलिच्छ रूम्स आणि बहुतेक तरूण उत्तरभारतीय जोड्या रहात असतात.

माहितगार 12/01/2019 - 16:48
सहज तुनळी चाळताना एका विदेशी प्रवासी मुलीचा सहा सात महिन्या अनुभव ऐकण्याचा योग आला.

रविकिरण फडके 13/01/2019 - 18:19
आपल्या देशातील एकूण घाणेरडेपणा, बेपर्वाई, अनोळखी माणसांना लुबाडण्याची वृत्ती, सेवावृत्तीचा पूर्ण अभाव, अचूक व संपूर्ण माहितीचा त्याहूनही दुष्काळ (ह्याची सुरुवात विमानतळावर उतरल्यापासूनच होते), हे पाहता परदेशी पर्यटक भारतात येतात ही मोठीच आश्चर्याची गोष्ट म्हटली पाहिजे. ह्यात फाईव्ह स्टार प्रवासी धरायचे नाहीत.