(अ)अपूर्ण
संपूर्ण समाधान किंवा आनंदाची आशा मनुष्याने धरूच नये. किंबहुना त्याची पूर्णत्वाची अपेक्षाच सर्वतया निरर्थक म्हणता येईल. कितीही पैसा असला तरी त्याच्या खर्चाच्या मर्यादा समाजाच्या नैतिक नियमनासमोर उघड्या पडतात. जे भौतिकाला लागु तेच भावनांनाही. प्रेम या प्राथमिक भावनेचा अनुभव कित्येकांना आयुष्याच्या शेवटापर्यंत येत नाही. ज्यांना योग्य वेळी आला त्यांना तो पचवता येतोच असे नाही. दररोज भूक शमवणारं अन्न कधीतरीच, 'व्वा! आज काय मस्त जेवण झालं' असं व्यक्त व्हायला भाग पाडतं. म्हणजे रोजच्या पोटभर जेवणातही या 'मस्त'पणाचा अभाव असतोच! आपल्याला ते सवयीने अंगवळणी पडलंय इतकंच.