Skip to main content

काही ऐकलेल्या आठवणी

काही ऐकलेल्या आठवणी

Published on शुक्रवार, 23/10/2009 प्रकाशित मुखपृष्ठ
नमस्कार मित्रहो, कला क्षेत्रात अनेक महान व्यक्तिमत्व झाली.मग ते गायन , लेखन , अभिनय कोणतेही क्षेत्र असो त्या त्या क्षेत्रात पराकोटीची उंची गाठलेल्या व्यक्तींविषयी आपल्याला खचितच बोलायला , ऐकायला आवडतं. मला तरी नक्की आवडतं. या धाग्यावर मला अशा आठवणी सांगायला आणि आपणाकडूनही ऐकायला आवडतील. एक आठवण कविवर्य सुरेश भट यांच्याबद्दलची आहे. एकदा भट साहेब एका महाविद्यालयाच्या वार्षिक महोत्सवाला प्रमुख पाहुणे होते. गायनाचा कार्यक्रम सुरु होता . गायिकाही मन लावून गात होती . भटसाहेबही दिलखुलास दाद देत होते. त्या गायिकेने भट साहेबांचं गाजलेलं " आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी " गायला सुरुवात केली. गाणं संपलं. अचानक भट सहेब उठले . माईक घेतला आणि म्हणाले " मुली तु गायलीस छान फक्त हे गाणं आहे म्हणून मी मधेच बोलतोय की ' राधिके जरा जपून जा तुझ्या घरी ' या ओळीत तुझा भर जा तुझ्या घरी यावर होता. पण तसं व्हायला नको . त्याठिकाणी जरा जपून हे उठावदार व्हायला हवं. कारण ते घरी जाणं महत्वाचं नाही तर ते जपणं महत्वाचं आहे. दुसरी आठवण म्रुत्युंजयकार " श्री शिवाजी सावंत " यांच्याबद्दलची आहे. कोल्हापुरात एका संस्थेच्या वार्षिक कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात अलंकारिक भाषा यावर बोलत होते . भाषण झाल्यावर चहापानाच्या वेळेस संस्थेचे पदाधिकारी आणि ईतर काही मान्यवर (?) बसलेले होते . त्यातलेच एक अतिशहाणे शिवाजीरावांना म्हणाले की तुम्ही एव्हढं सगळं अलंकारिक भाषेबाबत सांगितलंत पण ती तुम्ही अशी लगोलग वापरु शकाल का ? त्यांना प्रश्नाचा रोख कळला नाही . त्यावर ते ग्रुहस्थ म्हणाले की मी सांगेन ते साधं वाक्य तुम्ही तुमच्या अलंकारिक भाषेत सांगा. शिवाजीराव म्हणाले 'बघू . प्रयत्न करतो ' विजयी मुद्रेनं सर्वांकडे बघत तो माणूस म्हणाला की " मुलाने झाडावरून आंबा पाडला " हे माझं वाक्य आहे. आता हे अलंकारिक करुन दाखवा. त्या माणसाच्या चेह-यावर कशी जिरवली असा भाव यायच्या आत शिवाजीरावांच्या मुखातून शब्द आले " मुलाची मति आंब्याची स्थिती आणि दगडाची गती . या तिघांची जेव्हा झाली युती तेव्हा झाली फलश्रुती " तर अशा ह्या सुंदर आठवणी. आपणाकडेही असतील. प्रत्यक्ष अनुभवल्या नसल्या तरी चालतील . तुम्ही कोणाकडून ऐकल्या असतील त्याही सांगा पण माझी खात्री आहे की सर्वांना त्या वाचायला नक्की आवडतील.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1881
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

बीहारी नेत्यांची मुजोर वृत्ती आणि महाराष्ट्रा शासनाची वृथा सहानभुती आणि मराठी भाषेचा आग्रह न बाळगण्याची बोटचेपी वृत्ती यामुळी झाली महाराष्ट्राची दुर्गती पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

व्वा विजुभौ . जळजळीत सत्य अलंकारिक होऊनही तितकंच भिडलं हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊंच्या प्रतिसादाची जागा चुकलेली दिसतेय....सामनाच्या अग्रलेखावरच्या ऐवजी इथे दिलेय असं वाटतंय. चुकुन चुकले...विजुभाऊ. :) कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!