अजुन एक प्रवास - भ्रमण
हुश्श्य ..... सुटलो बुवा!! एस. टी तुन उतरुन खिळखिळे झालेले अवयव आळोखे-पिळोखे देत जागेवर असल्याची खात्री करुन घेतली आणि बघतो तर काय, च्यामारी, हा हॉटेलवाला कुठे चालला? "ओ भाऊ, जरा चहा मिळेल का?"इति मी, "च्यॅक, बंद केलं म्या" त्याने हातभर मान हलवत नकार दिला, "आनि, तुमी कुठं चाल्ला हो, ह्या वक्ताला?, गडावर की काय?" म्हणत भुवया वाकड्या केल्या. आम्ही न बोलताच मान हलविली आणि गावात जायला निघालो.
धा-पाच पावले पुढे जाऊन, एका बाप्याला विचारले, "गडावर जायला रस्ता कोठुन?" प्रश्नासोबत, त्याच्याही चेहर्यावर आश्चर्य आणि मित्रांच्या चेहर्यावर आठ्या एकत्रितपणे जन्माला आल्या. त्याच्या आधी मित्रच, "काय रे *****च्या? तु आधी आला होता ना इथे?" बाप्याने चानस साधुन परस्पर सल्ला दिला, "रातच्याला र्हावा माझ्याकडं, मस्त कोंबडं कापु, मंग सकाळच्याला म्या येतु रस्ता दावायला", त्याला बहुतेक आमच्या कडील "विंग्लीश" पेयाचा वास लागला होता. मात्र आम्ही ठाम नकार देताच, तो तोंड वाकडं करीत म्हणाला "ह्यो रस्ता सोडु नका, गावाच्या बाहेर पडाल, म्हसणटीतुन, बांधाहुन, डाव्या हाताने डोंगुर चढुन वाकड्या आंब्याला ऊजवी घाला आनि सरळ जावा, धारेवर जाल, मंग ती धार पकडुन चालत र्हावा, २ तासात गडावर" किती लक्षात राहिले कोण जाणे, आम्ही बैलागत मान हलविली, रस्ता शोधणे आम्हाला नविन नव्हते.
पटकन सामान तपासलं गेल, घरनं घेतलेल्या पोळ्या-बटाटा, ब्रेड, उकडलेली अंडी, फरसाण, बाकरवडी, जॅमच्या बाटल्या आणि 'ते' सगळं सगळं सापडलं, पण सुक्काळीच्या विजेर्या गायब!! पौर्णिमा नुकतीच झाली असली तरी, चांदण्या यायला अवकाश होता, उमेशकडे असलेल्या पेन्सिल टॉर्चने आधार दिला आणि आम्ही निघालो. फार कष्ट न पडता डोंगरमाथ्यावर पोचलो, पण वाकडा आंबा हि काय भानगड ते कळेना, थोड्याश्या भटकंतीनंतर वाट मिळाली पण ती पिंपळाच्या बाजुने आंबा कुठे ते कळलेच नाही #:S धारेवरुन गड गाठणे काही फार अवघड नव्हते, वाट मळलेली असल्याने अंदाज घेत भरभर चालणे शक्य होते. बघता बघता पायथा आला, जरा विसावा घेऊन - तीर्थ प्राशन करुन आम्ही निघालो. १० वाजुन गेले असावेत थोडा चंद्रप्रकाश होता, काजवे तर सुरवातीपासुनच साथ देत होते. दर्दभर्या आवाजात किशोर, रफी खासकरुन देवानंद बाबाची मस्तीभरी गाणी, ऐकत एकेक टप्पा पार करीत होतो..
एका टप्प्यावर मी आणि उमेश चालता चालता डाव्या बाजुला गेलो, शॉर्टकट वाटुन बाजुनी चढायला लागलो, मातीचा ढीगारा असल्याने अंदाज येत नव्हता पण पुढे पुढे जात राहीलो, अचानक उमेशचा पाय सटकला, त्याने साष्टांग दडंवत घालत माती खाल्ली, त्याच्या मागेच मी असल्याने, त्याची लाथ मला लागली आणि मी घसरलो.. पटकन ऊमेशचा पाय हातात आला, माझ्या साबत तो पण घसरु लागला, २ मिलीसेकंदात डोळ्यांसमोर तारे चमकले, तेवढ्यात उमेशने कंबरेजवळ बांधलेला चाकु जमिनीत घट्ट रोवला, मी गुडघे जोरात दाबुन, खांद्यांवर शरीर उचलले, ४ पायांचा वापर करीत पुढे आलो. एवढा वेळ वरुन हसणार्या किरणला गांभीर्य कळले आणि त्याने रोप सोडला, तो पकडुन आम्ही दोघे वर आलो, बर्मुडा घातलेला असल्याने गुडघे सोलले गेले होते, तिथेच बसलो, पाणि प्याले, सुटकेचा निश्वास टाकला. पुण्या-मुंबईच्या शेलक्या शिव्यांची उजळणी झाली, ती ऐकुन काजव्यांच्या डोळ्यापुढेही अंधारी आली असेल. 8} 8} तिथे स्पष्टीकरणाला संधी नव्हती, चुक मान्य करुन आता रस्त्याचा नीट अंदाज घेत, हळुहळु रस्ता पार करू असे आश्वासन देत, पुढे निघालो.
आता कोणतेही किडे न करता, पायवाट पकडुन अर्ध्यातासात पहील्या दरवाजापाशी आलो. पाण्याच्या दोन्ही टाक्या पार करुन, तोरणाई देवीच्या मंदीरापाशी आलो. जवळपास १२ वाजत आले होते. आधुनिकतेच्या खुणा आता दिसायला लागल्या होत्याच, दरवाज्यापाशी काँक्रीटच्या पायर्या, सोलर लाईट देवळावर आणि बाजुला असेच सोलर लाईट बघुन बरे वाटले. आता मंदीरात जाऊन जेवायचे आणि निवांत गप्पा ठोकत झोप काढायची अश्या विचारात दारापाशी आलो.
दाराला कुलुप नाही बघुन बरे वाटले, दार ढकलताच ते आतुन लावले आहे याची खात्री पटली आणि आतुन कापरा, घाबरलेला आवाज आला, "कोण आहे?" आत्ता गडावर कोणी नाही असे गावात कळले होते, मग आत कोण आहे? हाप्रश्न आम्हाला पडला.
पुन्हा आतुन आवाज आला, "कोण आहे?" तो पर्यंत उमेश, किरण मंदीराच्या बाजुने फेरीमारून सर्व दारे-खिडक्या वाजवुन आले होते. आतला आवाज रडायच्या बेतात आला असताना, दुसर्या कोणीतरी उसन्या अवसान आणुन दोन शिव्या देत, कोण आहे ते विचारले. शिव्या ऐकुन माझे टाळके सरकले, भसाड्या आवाजात उत्तरलो, "म्या कोन ते विचारतो ह्वय रे, मुर्दाडा.. बाप हाये तुझा, तुझ्या मायला ********, आता उघडतु का तोडु दरवाजा, रंभा म्हन्त्यात मला, रंभा!!" सोबत उमेशने डाव्या बाजुचे दार वाजवायला सुरवात केली. आता आतुन रडण्याचे आवाज यायला लागले, मगाचा आवाज परत बोलला "आम्ही लहान मुले आहोत, गड बघायला आलो होतो, अंधार झाला म्हणुन घाबरुन वरच राहीलो, आम्हाला मारु नका, आमच्याकडे काहीच नाही"
मस्करीची कुस्करी होताना पाहुन, कीरणपुढे आला, त्यांना समजावत म्हणाला, "घाबरु नका, आम्ही पण ट्रेकर्स आहोत, आत्ता गडावर आलोय, दरवाजा उघडु नका, पण खिडकी उघडुन तपासुन बघा" त्यावर ५ मिनिटाने कोणितरी खिडकीपाशी आले आणी हळुच खिडकी उघडुन बघितले. आपल्या सारखीच माणसे आहेत हे बघुन, त्याने दार उघडले आणी उमेश बाजुने ओरडत आत घुसला, त्या दार उघडणार्या पोराला चड्डीत मुतायला झाली.. आणि हसता हसता आम्ही जमिनीवर लोळण घेतली. बघता बघता बाकीची दोन मुले पण हसण्यात सामील झाली आणि चड्डीत मुतलेला पोरगा, बाहेर पळाला. नंतर कळले ते असे, की ती पोरं पुण्यात शिकायला आलेली होती, मोठं १२ वीची परीक्षा दिलेलं आणि छोटी ९ वीची परीक्षा दिलेली. सुट्टी म्हणुन तोरण्यावर फिरायला आली आणि गडावर रस्ता चुकली. रस्ता सापडता सापडता अंधार पडला मग देवळात येऊन झोपली. बिचारी ऊपाशीच होती. मग आमचीच आम्हाला शरम वाटली, त्या पोरांना सोबत घेऊन मस्त शेकोटी पेटवली, राउंडनी बसुन पोटभर जेवलो आणि शांत झोपलो. दुसर्या दिवशी त्यांना सोबर घेऊन पुर्ण गड फिरलो, मजा केली. निवांत ७ च्या गाडीला खाली उतरुन त्यांना स्वारगेटला सोडली आणि आम्ही आपापल्या घरी गेलो.
नेहमीप्रमाणे नाईट ट्रेक असुन, मधली पडझड आणि मुलांची मजा यामुळे हा चिरकाल स्मरणात राहीला.
याद्या
2676
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
तीर्थ प्राशन करुन
.
.
मस्त रे
सही..
मस्त रे..
च्यायला....