लढा
सकाळी उठलो अन सहजच तारीख बघितली तर आज ३१ ऑगस्ट. हाच तो ऐतिहासिक दिवस. ५७ वर्षांपुर्वी याच दिवशी इंग्रजांनी केलेला कुप्रसिद्ध क्रिमिनल ट्राईब्ज अॅक्ट भारत सरकारने रद्दबातल केला अन शेकडो जमातींच्या लाखो भारतीयांना स्वतंत्र केले, भटक्या व विमुक्त जाती असे नाव देऊन अन देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी. हे एकदम लक्षात आले अन विचार आला, गेल्या सत्तावन्न वर्षांत या विमुक्त आणि भटके लोकांच्या आयुष्यात कितपत फरक पडलाय?
या प्रश्नाला पहिले उत्तर होते अजिबात नाही. पण विषय जसजसा डोक्यात घोळत राहिला तसतसे मी पाहिलेले अनेक भटके विमुक्त लोक डोळ्यासमोर तरळले. त्यातले कुणीच प्रसिद्ध वगैरे नाही, पण प्रत्येकाचीच एक सक्सेस स्टोरी आहे. अन ती फारशी चमकदार नसली, त्यांना मिळालेले यश दैदिप्यमान वगैरे नसले तरी त्या प्रत्येकाची सामाजिक, आर्थिक, कौटुम्बिक मर्यादा लक्षात घेता ते मोठेच आहे असेही लक्षात आले.
भटके/ विमुक्त म्हणले की माझ्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येते ते रखमाबाईचे कुटुंब. रखमाबाई स्वतः फासेपारधी समाजाची. तिचे कुटुंब म्हणजे तिचा नवरा (त्याचे नाव काहि केल्या आठवत नाही.), मुलगी पारुबाई, पारुबाईची मुलगी मंजुळा अन तिचे भाऊ आकाराम (सगळे त्याला आक्या म्हणायचे) अन राकेश (सर्वमान्य नाव राक्या).
ऐंशीच्या दशकात माझ्या वडिलांनी पुण्याच्या उपनगरात जागा विकत घेऊन बंगला बांधला अन आम्ही तिथे रहायला गेलो तेव्हा आमच्या घराजवळच रखमाबाईचं पाल होतं. टारपोलिनचा एक तंबु अन त्यात कुत्री, मांजरी, एक गाय, तिचे पाडस अन सगळी माणसे रहात. कुण्या जुन्या जमीनदाराने त्यांना ती जागा देवु केली होती.
रखमाबाई अन तिचा नवरा दोघेही म्हातारे, अगदी सुरकुतलेले. पण दोघेही रात्री परिसरात गस्त घालायचे अन मिळतील तेव्हढे पैसे लोकांकडुन घ्यायचे. सगळे मिळुन महिन्याला दोन्-पाचशे रुपये कमवायचे ते दोघे. पारुबाईनं नवर्याला टाकलेलं. ती दारु विकायची. तिच्या पालावर रोज दारुड्यांची वर्दळ अन पोलिसांची ये-जा. त्यामुळं त्या मध्यमवर्गीयांची वस्ती असलेल्या भागातले कुणी फारसे त्या घराशी संबंध ठेवायचे नाहीत. मंजुळेनं पंच्याण्णवच्या सुमाराला लग्न केलं पण नवर्याला थोड्या दिवसातच टाकलं अन आईकडे परत आलि. आक्क्या अन राक्या शाळेत होते.
असं हे कुटुंब कायम समाजात असुनपण समाजाबाहेरच. कुठं चोरी झाली की लोक कुजबुजत त्यांच्याकडे बोट दाखवायचे. पण सरळ बोलुन भांडणे अंगावर घ्यायची कुणाचीच हिंमत नव्हती. सातवी पास झाल्यावर आक्क्या अन राक्या दोघांनीही शाळा सोडली. रोज पारुच्या धंद्यावर राबता असलेल्या एका जमिनदारानं आक्क्याला त्याच्याकडे मजुर म्हणुन ठेवलं अन स्वतःचे शौकापाई खर्च होणारे पैसे वाचवले. एक दोन वर्षातच त्याच लग्न पण झालं. त्याआधी काही महिने आक्क्या गायब होता. घरचे म्हणत मामाकडे गेलाय पण चर्चा होती चोर्या करतोय म्हणुन.
पण राक्या मात्र महत्वाकांक्षी. "भाऊ आपण तुम्हा लोकांसारखी कामं करणार. आपण इज्जतीनं जगणार," तो म्हणे. अन नेमके त्याच वेळी त्या भागात पेपर टाकुन शिकणार्या एका मुलाला नोकरी लागली. राक्यानं त्याच्या लाईनवर पेपर टाकणं सुरु केलं. `हा पारधी काय सकाळी उठुन पेपर टाकणार. जाईल पळुन दोन चार दिवसात," ही इतर पेपरविक्यांची प्रतिक्रिया. पण राक्या टिकला. एव्हढेच नव्हे वाढला. लवकरच त्याच्याकडे दीड दोनशे गिर्हाईके झाली. शिवाय त्यानं चौकात पेपर स्टॉल पण टाकला.
सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत पेपर टाकुन व्हायचे. राकेशन त्यानंतरच्या मोकळ्या वेळात वेगळा धंदा करण्याचं मनावर घेतलं. त्यानं धंदा निवडला फुल-हार विक्रीचा. संध्याकाळी जाऊन तो घाऊक बाजारातुन फुलं आणायचा. दिवसभर त्याच्या बहिणी हार, गजरे करायच्या अन ते सगळं पेपर बरोबरच विकले जायचे. तसेही आमच्या भागात फुलवाले नव्हते. सगळ्यांचीच सोय झाली. माणसांना पारध्यांचे वावडे असले तरी त्यांच्या घरच्या देवांना पारध्यांनी विकलेली फुलं चालायची अन बायकांना गजरे पण! मग हळुहळु पसारा वाढत गेला अन राक्या अन त्याचे कुटुंबिय फळं, भाज्या पण विकायला लागले. आक्क्या, त्याची बायको, मंजुळा पण राक्याला सामील झाले. पारुनं पण दारुचा धंदा बंद केला. काही वर्षांपुर्वी राक्यानं त्याच जागेवर पक्कं घर पण बांधलेय. आता आक्क्या, राक्याची मुलंपण शाळेत जातात अन त्यांचे आडनाव पवार असल्याने ते पारधी असल्याच कुणाच्या लक्षात येत नाही बहुधा. पण हल्ली त्या कुटुंबाबाबत कुणी कुजबुजत नाही.
***
राक्याचाच लांबचा मामा सणस. तो बहुधा राक्याची प्रेरणा असावा. सणस तसा जमातीत बर्यापैकी वजन राखुन अन अनेक पोलिस अधिकार्यांच्या जवळचा माणुस. माझ्या आणि त्याचा संबंध आला १९९३-९४ च्या सुमारास, पत्रकार झाल्यावर. अशीच कुणीतरी ओळख करुन दिली अन आम्ही मित्र झालो.
सणसचा पुर्वेतिहास मला माहिती नाही. पण मी बघतो तसा तो गुन्हेगारीत नव्हताच. किंबहुना तो जमातीच्या मागासलेपणाबद्दल तावातावाने बोलायचा. जमातीला दफनभुमी मिळावी मागणीचा पाठपुरावा पोटतिडिकीने करायचा. सणस पीएमटी डेपोत वॉचमन होता. कायम नाईट शिफ्ट असे अन दिवसभर इकडे तिकडे फिरे. पोरं फारशी शिकलेली नव्हती पण मजुरी करायची.
सणसची शोकांतिका झाली. त्याच्या मतिमंद नातीला जातीतल्याच कुणीतरी पळवलं. सणस म्हणे एव्हढे पोलिस संबंध ठेवुन होते पण कुणी मदतीला आलं नाही. फिर्याद पण घेतली नाही म्हणे. नात नंतर सापड्ली पण सणस हिरमुसलेलाच राहिला. त्यात नंतर त्याच्या मुलाचा जातीतल्याच कुणीतरी खून केला. सगळंच उफराट होत गेलं पण सणसनं गुन्हेगारीत पाऊल नाही ठेवलं.
***
भुतानसिंग (नाव बदललेले) शिकलगार समाजाचा. सणससारखाच पोलिस मित्र. त्याच्या आजुबाजुचे बरेच लोक, नातेवाईक गुन्हेगार पण भुतानसिंग मात्र सरळमार्गी राहिलेला. किरकोळ धंदे करता करता त्यानं टेंपो घेतला अन तो ट्रान्सपोर्ट व्यवसायात शिरला. मुलांना पण शिकवलं अन सगळ्यांना सरळमार्गे चालायला लावलं.
भुतानसिंगची एकदा म्हणे गुन्हेगार नातेवाईकाशी भांडणे झाली अन त्या तिरिमिरीत त्यानं त्याच्या माहितीतल्या गुन्हेगारांच्या खबरा पोलिसांना द्यायला सुरुवात केली. अनेकदा भुतानसिंग वर हल्ले झाले. त्याच्या कुटुंबियांवर पण हल्ले झाले पण त्यानं पोलिसांना मदत करणं सोडलं नाही. त्याच्या मदतीनं पोलिसांनी अनेक अट्टल गुन्हेगारांना पकडलं. काही जण अजुनही तुरुंगात शिक्षा भोगताहेत अन त्यांची मुलं भुतानसिंगकडे ड्रायव्हर आहेत. भुतानसिंग अजुनही पोलिसांना मदत करतो अन बरेच पोलिस अधिकारी सांगतात की त्याच्यामुळेच त्यांचा शिकलगार सगळे गुन्हेगार हा समज दुर झाला.
***
बच्चुसिंग पण शिकलगारच. तरुण मुलगा. मी पहिल्यांदा भेटलो तेव्हा प्रॉव्हर्बियल टीनएजर होता. मुठा कॅनॉललगतच्या झोपडपट्टीत रहायचा. आजुबाजुला बरेच गुन्हेगार त्यातले काही नातेवाईकपण. पण बच्चुसिंग वेगळाच. कॅनॉलमधे आठवड्याला कुणीना कुणी बुडायचे. बच्चुसिंग पट्टीचा पोहोणारा. त्याच्या त्या कसबाचा वापर त्यान बुडणार्याना वाचवायला सुरु केला. हळुहळु पोलिसपण त्याला मदतीला बोलवायला लागले. गेल्या बारा एक वर्षात त्यानं अडीचशे तीनशे प्राण वाचवलेत. तश्या स्थानिक वृत्तपत्रात दोन तीन बातम्यापण आल्यात त्याच्यावर पण बाकी कुणाला फारसे माहिती नाही.
***
पालसिंग हा अजुन एक शिकलगार तरुण. बच्चुसिंग रहातो त्याच झोपडपट्टीत रहातो. घरचे लोक पारंपारिक तवे कढया बनवुन विकण्याच्या व्यवसायात आहेत. पण पालसिंग परत वेगळा. त्याच्या हातात जादु आहे. हुबेहुब, जिवंत वाटणारी चित्रे काढतो तो. रोज तासनतास चित्रकलेत रमतो. शेकडो चित्रे काढली आहेत त्याने. सुरुवातीला काही पेपरच्या ऑफिसात गेला चित्रे घेऊन. एका पत्रकारानं दोन्-चार ओळी लिहिल्या पण इतरानी हेटाळलेच. पण त्यानं चित्रकला नाही सोडली. त्याला बालगंधर्व मधे चित्रप्रदर्शन भरवायचेय. पैसे जमवतोय बरेच दिवस. "सब लोग समझते है सारे शिकलगार गुनाहगार होते है. लेकीन वह सच नही है. मै मेरे मिसाल से एक दिन यह साबित कर दुंगा," तो म्हणतो.
***
जे सगळे मी पाहिलेले लोक. हे लोक विमुक्त झालेले मी पाहिलेत. आज जेव्हा सगळा विचार केला तेव्हा हे सगळे माझ्या डोळ्यासमोर आले अन वाटले खरंच काळ्या ढगाची ही रुपेरी कड आहे. ही खरच जपायला पाहिजे. यातला प्रत्येकजण लढा देत आहे. असे इतरही अनेकजण असतील, मी न पाहिलेले अनाम वीर. त्यांच्यासाठी मी नाही लढा देवु शकत. तो त्यांनाच द्यायचा आहे अन ते तो देतीलही. जोवर ते आहेत, तोवर आशा जिवंत राहिल.
याद्या
4414
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
सकारात्मक
सकारात्मक चित्र !
In reply to सकारात्मक by श्रावण मोडक
आशादायक
सुनीलराव
धन्यवाद.
In reply to सुनीलराव by श्रावण मोडक
बरोबर आहे.
In reply to सुनीलराव by श्रावण मोडक
अतिशय
हेच
In reply to अतिशय by यशोधरा
हेलावून सोडले पुनेरीभाऊ
आशा
पम्या...
छान
मस्त लेख.
वाह!
+१
In reply to वाह! by सहज
प्रचंड प्रभावी
छान लेख...
फासेपारधी
उत्तम
लेख आवडला.
वा ! फार
सोलापुरात
खरंय
In reply to सोलापुरात by दादा कोंडके
सक्सेस