मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

|| धर्मांतर ||

युयुत्सु · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
धर्मांतर हा माझ्या कुतुहलाचा विषय आहे. त्यात हिंदूचे धर्मांतर हा तर विशेष कुतुहलाचा विषय. हिदूंना वाटत असलेल्या धर्मांतराच्या चिंतेची मला नेहमीच गम्मत वाटत आली आहे. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ते गणेशोत्सवाचे दिवस होते. पुण्यातील एका मानाच्या गणपतीतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात एका विद्वानाचे "धर्मांतराची समस्या" या विषयावर प्रवचन होते. वर म्हटल्याप्रमाणे, हा कुतुहलाचा विषय असल्यामुळे मी या कार्यक्रमास उपस्थित राहिलो होतो. शुभ्र वेष, शुभ्र दाढी आणि तुळतुळीत टक्कल असलेले प्रमुख वक्ते पूर्वाश्रमीचे अमेरीकेत एमेस केलेले संगणक अभियंते होते. आता त्यांनी आपले आयुष्य धर्मप्रचारासाठी वाहून घेतले होते. त्या विद्वान महाशयानी आपल्या व्याख्यानाची सुरुवात चातुर्वण्याच्या "नव्या" व्याख्येपासून करायला घेतली. चातुर्वण्यातील प्रत्येक वर्णाचा नवा अर्थ उपस्थितांपुढे तल्लीन होऊन उगाळत असताना एका विघ्नामुळे या महाशयांची निरूपण समाधी भंग पावली. तो दिवस गणपती विसर्जानाचा होता. सदर कार्यक्रम ज्या ठिकाणी चालू होता तेथे बर्‍याच रहदारीचा एक रस्ता आहे. नेमकी त्यावेळी रस्त्यावरून एक मिरवणूक जाऊ लागली होती. ढोल-ताशांच्या गजरात प्रवचन-स्थळी लावण्यात आलेला ध्वनिक्षेपक निरूपयोगी ठरला आणि साहजिकच माननीय वक्त्यांची निरूपण-समाधी भंग पावली. त्यांच्यातला दूर्वास तत्क्षणी जागा झाला आणि चडफडत त्यांनी शापवाणी उच्चारली - "These all are real shudras!" एका विद्वानापुढे निर्माण झालेले विघ्न, तो विघ्नहर्ता पण दूर करू शकत नव्हता. त्या नव-शूद्रांना आपण कोणते पाप केले याचे भान नव्हते. मनातल्या मनात मी पण टिळकांवर चिडलो होतो. त्यांनी पुच्छविहीन माकडांच्या हाती दिलेले कोलित ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्यास उपयोगी पडले पण त्याने एक नवे शूद्रत्व निर्माण केले होते... हिंदूच्या धर्मांतराचा मुद्दा जेव्हा जेव्हा ऐरणीवर येतो तेव्हा तमाम हिंदूत्ववादी एक गोष्ट लक्षात घ्यायला विसरतात. हिंदूधर्माकडे आकर्षित होऊन तो स्वीकारणार्‍यांची संख्या किती आणि त्याचा तिरस्कार निर्माण होऊन तो सोडणार्‍यांची संख्या किती? या मूळ प्रश्नाला आणखी काही पदर आहेत. उदा. एखाद्या हिंदू नसलेल्या व्यक्तीने हिंदू व्हायचे ठरवले तर वर्णाश्रम व्यवस्थेत त्याचे नवे स्थान कोणते? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मला अजून तरी मिळाले नाही. असो. मला असं वाटतं, धर्माचं यश तो किती वर्षे टिकून आहे यापेक्षा तो किती पसरला आहे या निकषावर तपासायला हवं. धर्म टिकून राहतो तो त्याने निर्माण केलेल्या मानसिकतेच्या आणि दहशतीच्या जोरावर आणि तो वाढतो त्याने सोडवलेल्या प्रश्नांच्या जोरावर. काही दिवसांपूर्वी मी रिक्षातून जात होतो. रिक्षा, टेंपो किंवा ट्रकमध्ये जी वाङ्‌मय निर्मिती दिसते ती गुंफाचित्रांचा आधुनिक आविष्कार आहेत असे मला वाटते. मी ज्या रिक्षातून जात होतो ती येशूच्या वचनांनी आणि चित्रांनी सजवली होती. त्यामध्ये एका छोट्या चित्राकडे माझे लक्ष वेधले गेले. त्या चित्रात वधस्तंभावरील येशू रेखाटला होता. पण हा येशू आजवर बघितलेल्या येशूंपेक्षा निराळा होता. कारण त्याच्या अंगावर जे उत्तरीय होते ते मात्र भगव्या रंगाचे होते. पाव खाऊन हिंदू बाटले गेले पण भगवे उत्तरीय घेतलेला येशू मात्र न बाटता येशूच राहिला होता... स्रोत - http://rajeev-upadhye.blogspot.com/

वाचने 3425 वाचनखूण प्रतिक्रिया 13

प्रकाश घाटपांडे 30/08/2009 - 17:45
नुसत हिंदु म्हणुन भागत नाही. हिंदु-... . इथे जात लिहिल्याशिवाय रकाना अपुरा होतो. तसे ख्रिश्चन किंवा मुस्लिम यांच्यात जरी कॆथोलिक/ प्रोटेस्टंट , शिया /सुन्नी असले तरी फारसे बिघडत नाही. हिंदु धर्मात सक्तीने/आमिषाने धर्मांतरे झाली नाहीत प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

बिपिन कार्यकर्ते 30/08/2009 - 18:17
तसे ख्रिश्चन किंवा मुस्लिम यांच्यात जरी कॆथोलिक/ प्रोटेस्टंट , शिया /सुन्नी असले तरी फारसे बिघडत नाही.
आर यु शुअर, प्रकाशराव? बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

प्रकाश घाटपांडे 30/08/2009 - 19:50
हिंदुत जस जात भरल्या शिवाय नुस्ता हिंदुला तसा अर्थ नाही. तस इतर धर्मात जात न सांगता नुसता धर्म सांगितला तरी पुरतो अशा लवचिक अर्थाने म्हणतोय मी. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

नाना बेरके 30/08/2009 - 18:56
धर्मांतर हा माझ्या कुतुहलाचा विषय आहे. त्यात हिंदूचे धर्मांतर हा तर विशेष कुतुहलाचा विषय. हिदूंना वाटत असलेल्या धर्मांतराच्या चिंतेची मला नेहमीच गम्मत वाटत आली आहे. - धर्म, जातपात, हिंदू, हिंदूत्व सारखे ह्यावरचेच लेख वाचून मलाही फार कुतुहल निर्माण झाले आहे. उदा. एखाद्या हिंदू नसलेल्या व्यक्तीने हिंदू व्हायचे ठरवले तर वर्णाश्रम व्यवस्थेत त्याचे नवे स्थान कोणते? खरंच सगळ्यांनी विचार करण्यासारखा प्रश्न आहे ? तसा मलाही एक प्रश्न पडला आहे कि, त्याला कुठले गोत्र बहाल केले जाईल ?

मदनबाण 30/08/2009 - 19:59
पृथ्वीवरचा सगळ्यात स्वार्थी प्राणी जर इश्वराने बनवला असेल तर तो म्हणजे माणुस !!! वरील विषयावर मला काहीच माहित नाही कारण धर्मांतर कसे करतात तेच मला कळत नाही !!! मला फक्त येवढेच कळते की स्वतःच्या स्वार्थासाठी माणुस कुठलाही धर्म,कुठलीही जात स्विकारण्यास तयार होईल... उदा. हवयं ??? मग हे घ्या... http://www.india-server.com/news/chand-mohammad-is-chander-mohan-again-9816.html बाकी चालुध्या... मदनबाण..... Stride 2009 :--- http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

अजिंक्य पोतदार 31/08/2009 - 01:43
हा प्रश्न हिंदूंचा प्रश्न नाही आहे पण भारतीय हिंदूंचा प्रश्न आहे, असे मला वाटते. कारण आहे इथल्या समजा ची घडण.. मी एका पश्चात्या देशात राहतो आणि इथे बरेचशे गोरे लोक हिंदू झलेले दिसतात. पण त्यांना जात पात वागरे काही ही नसते. ते फक्त हिंदू असतात. आणि त्यांना समजा मधे तेवढाच मान मिळतो.किंबहुना, कदाचित जरा जास्तच मिळत असेल !! दुसरा पॉइण्ट हा आहे की , जात पात हे समजा शी निगडीत आहे. असे वाटते. कारण आसे किती तरी मुस्लिम आणि क्रिस्चियन लोका आहेत जे अजुन ही अनुसूचित जाती मधे मोडले जातात. जर का हे समाज व्यवस्था तशी नसती तर हिंदू धर्मा सोडला की जात पात संपयला पाहिजे ..पण तसे झलेले दिसत नाही. पण हो जर का हिंदू धर्मा टिकवायचा असेल तर थोडा open व्हयवा लागेल ह्यात काही शंका नाही, आणि म्हणूंच त्या काळी छत्त्रपतींनी बजाजिरावांना हिंदू करून घेतला असेल, कदाचित !!

In reply to by अजिंक्य पोतदार

पक्या 31/08/2009 - 04:43
>>बजाजिरावांना हिंदू करून घेतला असेल, कोण बजाजीराव? खुलासा कराल काय?

In reply to by अजिंक्य पोतदार

सुनील 31/08/2009 - 05:46
जात पात हे समजा शी निगडीत आहे. असे वाटते. कारण आसे किती तरी मुस्लिम आणि क्रिस्चियन लोका आहेत जे अजुन ही अनुसूचित जाती मधे मोडले जातात. जर का हे समाज व्यवस्था तशी नसती तर हिंदू धर्मा सोडला की जात पात संपयला पाहिजे ..पण तसे झलेले दिसत नाही. जात-पात, धर्म इ. विषयांवर प्रतिसाद द्यायचे नाहीत असे ठरवले असतानादेखिल हा एक किंचित प्रतिसाद. वरील वाक्य अगदी खरे आहे. गोव्यात ब्राह्मण किरिस्ताव स्वतःला वेगळे समजतात (तसेच माजी मुख्यमंत्री डॉ विल्फ्रेड डिसूझाला "आपला" म्हणणारे काही नातेवाईकदेखिल आठवतात!) असो. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अजिंक्य पोतदार 31/08/2009 - 04:59
बजाजीराव निंबाळकर, हे पहा http://www.youtube.com/watch?v=obh0CATRN8s&feature=related

विजुभाऊ 31/08/2009 - 11:41
देव आणि धर्म ही एक मानवनिर्मीत संकल्पना आहे नदीतल्या पाण्याने सूर्याला अर्ध्य देण्याने ग्रहण सुटते अशा खुळचट कलपना जर धर्म लादत असेल तर त्याला धर्म कसे म्हणायचे? धर्म आणि रूढी वेगळ्यावेगळ्या आहेत असा एक युक्तीवाद केला जातो तसे असेल तर मग धर्म म्हणजे जगण्याची पद्धत्/धर्म म्हणजे संस्कृती हे म्हणणे चूकच आहे. नदी वाहती असेल तर त्यातले पाणी ताजे रहाते. अन्यथा ते एक डबके होते. धर्माचे ही तसेच असावें नव्या आचाराना/विचाराना सामावुन घेतले तर प्रवाह ताजा रहातो. धर्माचेच कशाला भाषेचेसुद्धा तसेच आहे नवे शब्द समाविष्ट झाले की भाषा समृद्ध होते. पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
ज्याने आधीच धर्मांतर केले आहे त्याला हे प्रश्न विचारले पाहिजेत, कारण त्याला याबद्दल थोडीतरी माहिती असेल. आमच्यासारख्या कायम हिंदू असलेल्यांना काय कळतंय? पण चातुवर्ण्य हा हिंदू धर्मातील एक वाईट भाग आहे. तो संपला पाहिजे हे खरे. पण वोटबँक पॉलिटिक्समुळे त्याला पुन्हा नवीन वरदान मिळाले आहे असे वाटते. आणखी एक गोष्ट! मला नीट यातला फरक माहीत नाहीं, पण इथे (इंडोनेशियात) "अहमदिया" ही मुस्लिम धर्मातली पोटजात (ही पोटजात आहे कीं नाहीं हे मला नीट माहीत नाहीं) बरेच सहन करून राहिली आहे. त्यांच्या प्रार्थनास्थळांना अलीकडेच आगी लावल्या गेल्या. ख्रिश्चनांमध्येही कॅथॉलिक, प्रोटेस्टंट, मेथॉडिस्ट, प्रेसबिटॅरियन अशा पोटजाती आहेत. थोडक्यात काय? The grass on the other side is also not all that green. सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

In reply to by सुधीर काळे

बिपिन कार्यकर्ते 31/08/2009 - 12:24
या जमातीबद्दल हे बघा. http://en.wikipedia.org/wiki/Ahmadiyya बिपिन कार्यकर्ते

In reply to by सुधीर काळे

मिसळभोक्ता 01/09/2009 - 01:20
ज्याने आधीच धर्मांतर केले आहे त्याला हे प्रश्न विचारले पाहिजेत, कारण त्याला याबद्दल थोडीतरी माहिती असेल. काका, येऊद्या एक फर्मास "धर्मांतर करणार्‍यांस अनावृत्त पत्र" ! -- मिसळभोक्ता