गाणी आणि आठवणी - भाग २
'हिरो' ची गाणी जशी मला मी लहानपणी घालविलेल्या निवांत दिवसांची आठवण करून देतात तशी काही गाणी खूप खास अशा ठेवणीतल्या आठवणी जागवतात. ती गाणी आपण आपल्या मनाच्या एका सुगंधी कोपर्यात नीट घडी घालून ठेवतो. भरजरी वस्त्रे जशी जुन्या काळी नीट घडी करून ट्रंकेच्या तळाशी ठेवली जात असत त्याप्रमाणे ही भरजरी गाणी आपण जपून ठेवतो; कधीतरीच बाहेर काढण्यासाठी आणि आठवणींची येथेच्छ आतषबाजी अनुभवून झाली की पुन्हा त्या सुगंधी कोपर्यात रचून ठेवण्यासाठी. माझ्या वाट्याला अशी भरजरी गाणी अंमळ कमीच आली. आणि जी गाणी मला भरजरी वाटतात ती खरच भरजरी आहेत की १५ दिवस वापरून न धुतलेल्या रुमालासारखी आहेत हे सांगणं जरा अवघड आहे. :-)
मी शाळेत असतांना 'साजन' ची गाणी खूप लोकप्रिय झाली होती. त्यातलं "देखा हैं पहली बार साजन की आँखों में प्यार..." हे गाणं अजूनही ऐकलं की मनात थोडी कालवाकालव होते. म्हणजे असं विशेष धमाकेदार काही नाही; मला आवडणारी एक मुलगी आमच्या घरापासून साधारण १० मिनिटांच्या अंतरावर राहत असे. मी बर्याचदा तिच्या घरावरून जात असे, केवळ ती बाहेर उभी असेल आणि आपल्याला दिसेल या वेड्या आशेपायी मी तिच्या घरावरून चक्कर टाकत असे. हे गाणं तेंव्हा वारंवार ऐकू यायचं. त्यामुळे हे गाणं आणि ती मुलगी हे समीकरण माझ्या मनात घट्ट रुजलेलं आहे. अजूनही हे गाणं ऐकलं की एका पाठोपाठ एक अशी गाणी आठवत जातात आणि सिनेमाची रीळे उलगडावीत तशी आठवणींची सुरेल भेंडोळी उलगडली जातात. लगेच 'सडक' मधलं "हम तेरे बिन कहीं रह नही पातें..." हे गाणं आठवतं आणि ती फटाक्-फटाक अशा चपला वाजवत मोठ्या तोर्यात शिकवणीला जातांना दिसते, "मेरा दिल भी कितना पागल हैं..." ऐकलं की ती मैत्रींणींसोबत दोन वेण्या झुलवत शाळेत जातांना दिसते, "आशिकी में हर आशिक हो जाता हैं मजबूर..." हे गाणं (दिल का क्या कसूर) ऐकलं की आत्ताच तिने आपल्याकडे चोरून पाहिले हे मनाला पटवून देण्यासाठी तिच्या नजरेमध्ये शोधलेला चोरटेपणा आठवतो... ही गाणी चांगली वाटतात. ती चांगली असोत किंवा नसोत पण मनावर आठवणींचा शिडकावा करून जातात.
आठवणींचं एक वैशिष्ट्य असतं; उसासा टाकून 'गेले ते दिवस' म्हणायला लावतात या आठवणी. 'कबके बिछडे हुए हम आज...' हे लावारिस मधलं गीत ऐकलं की माझं मन पुन्हा माझ्या गावांत जाऊन बसतं. प्रकाश टॉकीजला सिनेमा सुरू होण्या आधी हे गाणं वाजवायचे. आता प्रकाश टॉकीज मरणासन्न अवस्थेत आहे. एके काळी अमिताभचे सगळे हिट सिनेमे मी या टॉकीजमध्ये पाहिले. जेंव्हा टॉकीजला सरळ टॉकीज म्हणायचे त्या काळातली ही गोष्ट आहे. 'जाने कैसे कब कहाँ...' किंवा 'मुझे नवलक्खा मंगा दे रे...' किंवा 'ओ साथी रे, तेरे बिना भी क्या जीना...' ही गाणी ऐकली की प्रकाश टॉकीजचे ते रम्य दिवस आठवतात. एक काळ्पट पडदा, तट्ट्यांचे कुंपण आणि वाळू एवढेच काय ते असायचे या टॉकीजमध्ये. अंधार पडल्यानंतर सिनेमा सुरू व्हायचा. वाळूवर बसून अनिमिष नेत्रांनी तो पडद्यावरचा थरार अनुभवलाय आम्ही. आता मल्टिप्लेक्सच्या जमान्यात तो सिनेमा कुठेतरी हरवलाय असं वाटतं. आता सिनेमा बघायचा म्हणजे आगाऊ तिकिट आरक्षण करायचे, पार्किंग साठी १० रुपये मोजायचे, तिकिटाचे २०० रुपये मोजायचे, पॉपकॉर्ननामक लाह्यांचे २५ रुपये मोजायचे आणि रुमालाएवढ्या पडद्यावर पेप्सी किंवा कॉफी पीत-पीत पडद्यावर चाललेला खेळ बघायचा असा जमाना आलाय. आराम आला पण आत्मा गेला. आत्माच नाही तर आत्माराम कुठून मिळणार?
सकाळी जळगांव आकाशवाणीवर 'आराधना' हा कार्यक्रम लागायचा. अजूनही लागतो. "अवचिता परिमळू..." किंवा "पांडुरंग कांती..." किंवा कविता कृष्णमूर्तीचे "तुझे नांव ईश्वर अल्ला..." किंवा माणिक वर्मा, रतिलाल भावसार, रामदास कामत, प्रल्हाद शिंदे, पं. भीमसेन जोशी आदी गायकोत्तमांची एकापेक्षा एक सरस गाणी ऐकली की पहाटेची रम्य वेळ आठवते. दर शुक्रवारी मोहम्मद हुसेन आणि अहमद हुसेन या बंधुंचे "खुदा से करता हूं मैं ये, दुआ मदीने में..." हे गाणं लावायचे या कार्यक्रमात. काय सुंदर वाटायचे. असं वाटायचं की खरच खुदा आशीर्वादाचा हात फिरवतोय डोक्यावरून. मी झपाटल्यासारखे हे गाणे तोंडपाठ केले होते. आता ही गावी गेलो की वडील सकाळी रेडिओ लावतात पण दुर्दैवाने काळाच्या ओघात सुटीच्या दिवशी देखील लवकर उठणे ही कल्पना असह्य व्हायला लागली आणि गावी जाऊन देखील हा खजिना लुटायचे राहून जाते.
गझल हा एक आणखी मनाचा पूर्णपणे कब्जा घेणारा प्रकार. शिक्षण (कसेबसे) संपवून जेंव्हा मी नोकरीसाठी वणवण (बोरूबहाद्दर अजून दुसरे काय करणार म्हणा! :-)) सुरू केली तेंव्हा गझल मला कडकडून भेटली. शाळेत भेटलेल्या सुंदर मुलीसारखी नोकरी पण हुलकावण्या देऊ लागली. तेंव्हाच गुलाम अलीच्या गझलांची एक कॅसेट गवसली. "आवारगी...", "हंगामा हैं क्यूं बरपा...", "चुपके चुपके..." या अप्रतिम गझलांचा मी फॅन झालो आणि (काहीच काम नसल्याने) वारंवार ऐकून अगदी मधल्या संगीतासकट मी त्या गझला पाठ करून टाकल्या. "चमकते चाँद को टुटा हुआ तारा बना डाला..." ऐकून ही आपलीच तर कहाणी नाही असे वाटून डोळ्याच्या कडा ओलावत असत. त्यातले "मैं इस दुनिया को अक्सर देखकर हैरान होता हूं, न मुझसे बन सका छोटासा घर, दिन्-रात रोता हू, खुदाया तुने कैसे ये जहाँ सारा बना डाला...चमकते चाँद को टुटा हुआ तारा बना डाला..." हे कडवे रात्रीच्या गडद अंधारात चटका लावायचे. नंतर पुढे एकदा नोकरीच्या शोधातच औरंगाबादला जायचा प्रसंग आला. माझ्याकडे एक जुना वॉकमन होता आणि तीच ती गुलाम अलीची कॅसेट होती. "चुपके चुपके..." ऐकून खूप वर्षांपूर्वी त्याच त्या शाळेत आवडणार्या मुलीला भेटायला मी औरंगाबादला गेलो होतो आणि तिने मला सेल्समनला झिडकारतात अशा पद्धतीने झिडकारले होते हे आठवले. मी पुन्हा पुन्हा 'चुपके चुपके...' ऐकले. आता कधीही ऐकले की औरंगाबाद आठवते. तिथली नोव्हेंबरची थंडी आठवते आणि नोकरीसाठी एका ठिकाणी जाऊन परत आलो होतो हे आठवते आणि लगेच त्या आधीची औरंगाबाद भेट आठवते. मजा येते, आता हसू येते. पण कुठेतरी "चुपके चुपके..." ती नशा अजूनही देते. परवा कुठेतरी गुलाम अलीचीच "अपनी तसवीर को आँखों से लगाता क्या हैं..." ऐकले आणि पुन्हा मी माझ्या गझलने भारलेल्या दिवसात रममाण झालो. पंकज उधासचं "तेरी निगाह से ऐसी शराब पी मैने..." हे गाणं म्हणजे आठवणींची मेजवानीच! मित्रांसोबत केलेल्या अगणित पार्टया आणि त्यात अगणित वेळा मी गायलेले हे (आणि इतर गाणी देखील) गाणे म्हणजे जीवाभावाच्या मिंत्रांसोबत घालविलेल्या खूप सुंदर अशा काळाची उजळणीच जणू. अजूनही हे गाणं ऐकलं की रात्री-अपरात्री ढाब्यावर बसून गाण्यांच्या जमवलेल्या मैफीली आठवतात; कठीण काळात मित्रांनी दिलेली साथ आठवते आणि मन भरून येते.
'भावसरगम' आणि 'आयुष्यावर बोलू काही' हे कार्यक्रम आणि त्यातली सुंदर गाणी म्हणजे माझ्यासाठी आठवणींचा ठेवा आहेत. "चांदण्यात फिरतांना..." किंवा "पूर्तता...माझ्या व्यथेची पूर्तता, माझिया मृत्युत व्हावी...पूर्तता..." किंवा "बडे बडे नैन दिये निर्धन को..." किंवा "सुन्या सुन्या मैफीलीत माझ्या..." ही गाणी ऐकली की पं. हृदयनाथ मंगेशकरांचा लवचिक आवाज आठवतो; मित्रांसोबत बसून पान चघळत ऐकलेली त्यांची गाणी आठवतात आणि त्यांच्या अफाट व्यक्तिमत्वाला एक हळूवार कुर्निसात जातो. पुन्हा जायला पाहिजे कार्यक्रमाला असे राहून्-राहून वाटते. संदीप खरे आणि सलील कुळकर्णी या जोडगोळीने अशीच भुरळ घातलेली आहे ७-८ वर्षांपासून. "एकटे जगू, एवढचं ना..." किंवा "चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही..." किंवा "नामंजूर..." किंवा "सरीवर सरी..." ऐकलं की मन सुखावतं. मी शिकागोमध्ये काही महिने असतांना बर्याचदा ही गाणी ऐकत असे. आता ही गाणी ऐकली की अगदी सुरुवातीला जेंव्हा ऐकली तो काळ तर आठवतोच पण शिकागोमधले एकट्याने घालवलेले दिवसही आठवतात आणि मग माझ्या प्रेमळ घरमालकाला एखादा ईमेल लिहिला जातो. अमृता खानविलकरचं 'गोलमाल' मधलं "ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा..." किंवा 'यंदा कर्तव्य आहे' मधलं "आभास हा..." ऐकलं की शिकागोचे दिवस जिवंत होऊन डोळ्यासमोर उभे राहतात. फार गंमत आहे ही सगळी.
"तुम मिले, दिल खिले, और जीने को क्या चाहिये..." हे 'क्रिमिनल' मधलं एम्.एम. क्रीमचं गाणं ऐकलं की मला फर्ग्युसन कॉलेजचे दिवस आठवतात. "क्या मौसम आया है..." हे 'अनाडी' मधलं गाणं ऐकलं की माझे ११ वी च्या निकालानंतरचे दिवस आठवतात. १२ वी सुरू झाल्यानंतरही मी हा सिनेमा नीलायमला दोनदा (कशासाठी हा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला? :-))पाहिला होता हे आठवतं आणि मग होस्टेलचे दिवस आठवतात. १९४२ अ लव्ह स्टोरी' ची गाणी ऐकल्यावर मला माझ्या १२वी चे दिवस आठवतात आणि फर्ग्युसनला असणार्या कायम फाड्-फाड इंग्रजी बोलणार्या असंख्य मुली आठवतात. माझ्याकडे आणि माझ्यासारख्या लहान गावातून, खेड्यातून डायरेक्ट फर्ग्युसनला शिकायला आलेल्या गावंढळ मुलांकडे या मुली तुच्छतेने बघत असत्... नव्हे ढुंकूनही बघत नसत. :-) त्यांच्याशी चुकून बोलायचं काम पडलं (हे कसे टळेल याचा विचार करण्यात आम्ही खूप वेळ घालवत असू) तर कसं बोलायचं याची जुळवाजुळव आठवते. माझा एक हुशार मित्र अगदी छोट्या वस्तीवरून फर्ग्युसनला शिकायला आला होता. आम्ही दोघांनी खूप वेळ एकत्र घालवला होता. त्याने एमबीबीएस पूर्ण केले आणि तो आता अमेरीकेत एमएस करतोय आणि अतिशय उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण होतोय. मी शिकागोला असतांना तो मला भेटायला आला आणि मग मनपाच्या पुलाजवळ नदीकाठी बसून गप्पा मारणारे आम्ही लेक मिशिगनच्या काठी मनसोक्त गप्पा मारत बसलो. हे सगळं आठवायला "पहला नशा, पहला खुमाँ..." ची एक छोटीशी लकेरही पुरेशी होते......
असंख्य गाणी आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या असंख्य आठवणी! कधी कधी असं वाटतं की आयुष्य म्हणजे आठवणींचं गाणं! आपण कोठे होतो आणि कोठे आलो याची तुलना करत प्रवास करणं म्हणजे आयुष्य! आठवणीतली गाणी म्हणजे आपले आयुष्यभराचे सोबती. कुठून आपल्या आठवणीतले गाणे ऐकू यावे आणि गतायुष्याचा पट आपल्यासमोर उघडून समोर बसावे आणि म्हणावे "घे टिपून तुझे आवडते क्षण, घे जगून पुन्हा एक रम्य आठवण!"
म्हणून गाण्यांचा संग्रह (आयपॉड, मोबाईल, एमपी३ प्लेयर, काँप्युटर, पेनड्राईव्ह या व अशा उपकरणांवर) या प्रकारावर माझा फारसा विश्वास नाही. माझ्याकडे अजूनही तोच जीर्ण वॉकमन आहे. सगळ्या कॅसेट्स् नी कधीच साथ सोडलेली आहे. वॉकमन अजूनही आहे कपाटात आणि मनाच्या कप्प्यात. सुंदर गाणं असच अवचित कुठूनतरी ऐकू यावं आणि चिंब करून जावं. त्याची खुमारीच काही और, नाही का? (समाप्त)
--समीर
वर्गीकरण
छान
In reply to छान by सहज
धन्यवाद
संदर
In reply to संदर by दिपक
होय
खुपच छान!!!
In reply to खुपच छान!!! by किट्टु
धन्यवाद
"आवारगी...",
In reply to "आवारगी...", by अनंत छंदी
मैंने कहा, आवारगी!
सुंदर
In reply to सुंदर by दशानन
धन्यवाद
मस्त लेख
सुंदर
समीरराव, दो
In reply to समीरराव, दो by विसोबा खेचर
धन्यवाद, तात्या!
होशवालों को खबर क्या...
In reply to होशवालों को खबर क्या... by एक
होय!
दोन्ही लेख उ त्त म..
In reply to दोन्ही लेख उ त्त म.. by ढ
सुंदर
माषाअल्लाह !
In reply to माषाअल्लाह ! by वाहीदा
खरं आहे, वाहीदा!
In reply to माषाअल्लाह ! by वाहीदा
वाह काय
In reply to माषाअल्लाह ! by वाहीदा
वाह मार
In reply to वाह मार by सखाराम_गटणे™
व्वा गटणे
In reply to माषाअल्लाह ! by वाहीदा
गझल अतिषय
In reply to माषाअल्लाह ! by वाहीदा
गझलेचा अर्थ
उत्तम लेख..
In reply to उत्तम लेख.. by आकाशस्थ
धन्यवाद, आकाश!
राह बनी
In reply to राह बनी by महेंद्र (verified= न पडताळणी केलेला)
धन्यवाद
मेहदी हसन
छान
In reply to छान by चित्रा
धन्य्वाद
अतिशय सुंदर लेखन..
In reply to अतिशय सुंदर लेखन.. by प्राजु
वा!
सुरेख लेख!
समीरसूर ,
In reply to समीरसूर , by रामदास
इक पगली....
In reply to समीरसूर , by रामदास
भाग्यवान आहात
सुन्दर लेख
In reply to सुन्दर लेख by trendi.pravin
होय
साला हा
आठवणीतील गाणी!
धन्यवाद
अप्रतिम