खंजीर - भाग २
त्या पुराणवस्तूच्या दुकानमालकाची, चाचाची कहाणी पुढे चालू.
तर रणजीत क्रांतिकारक चळवळीत सामील झाला. वय लहान असले तरी आपल्या निष्ठेने आणि कर्तृत्त्वाने जास्त जास्त जोखमीची कामे तो करू लागला. एकदा त्याच्या म्होरक्याने एक मोठा कट आखला होता. सरकारी तिजोरीवर दरोडा घालण्याचा. गेले वर्ष दुष्काळ पडला असूनही ब्रिटिशांनी जुलमाने सगळा कर वसूल केला होता. अनेक शेतकरी देशोधडीला लागले होते. असा जुलमाने मिळवलेला पैसा का नाही लुटायचा? हा कट मोठा होता. वेगवेगळ्या गावात रहाणार्या विश्वासू लोकांना निरोप पोचवणे, सामग्री, पैसा मिळवणे आणि ह्या कानाचे त्या कानाला कळू न देणे. अशी असंख्य कामे होती. अशाच एका महत्त्वाच्या कामाकरता रणजीतला पाठवले होते. योगायोगाने त्या गावात त्याचा मामा एक बडी असामी होती. त्याच्या मामीच्या माहेरची नात्यातली एक मुलगी ह्याची "खास" आवडती होती. त्यामुळे त्या गावात जायची संधी मिळाल्यामुळे अगदी खूष होता. बरोबर एक साथीदारही होता. एक सांकेतिक भाषेत लिहिलेला मजकूर एका घरात पोचवायचा असे हे काम होते. ती चिठ्ठी रणजीतने अंगावरील कपड्यात बेमालूम लपवली होती. गावात पोचताच रणजीतने त्या साथीदाराला एका देवळात थांबायला सांगितले आणि थोड्या वेळात येतोच म्हणून तो मामाच्या घरी जायला निघाला. पण दुर्दैवाने एक ब्रिटिशांचा खबर्या ह्या दुक्कलीच्या मागे होता. एका निर्जन गल्लीत रणजीत पोचताच त्या खबर्याने त्याच्या डोक्यावर लाठीचा तडाखा मारून त्याला बेशुद्ध केले. जरा वेळाने रणजीत शुद्धीवर आला. कपडे चाचपडून पाहिले तर काय? चिठ्ठी गायब! देवळात येऊन पहातो तर साथीदारही गायब. नंतर कळले की त्याला पोलिसांनी पकडले. केवळ रणजीतचा मामा एक बडी असामी असल्यामुळे तो पकडला गेला नाही.
हे घडल्यामुळे सगळा कट उघडकीस आला. अनेक लोक पकडले गेले. कित्येक फासावर लटकवले गेले, कित्येकांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली.
रणजीत अगदी निराश झाला. भकास, उद्ध्वस्त अवस्थेत घरी गेला. आपल्यामुळे इतक्या लोकांना इतकी मोठी किंमत चुकवावी लागली ह्याचा जबरदस्त सल त्याच्या मनात निर्माण झाला. पुढे त्याने आपल्या बापाला ही हकीकत सांगितली. प्रतापभैय्यानेही रणजीतलाच दोष दिला. "तू असे वागूच कसे शकलास? इतके महत्त्वाचे काम आधी न करता मामाच्या घरी जायची काय गरज होती? आणि एकटा कशाला गेलास?" रणजीत काय उत्तर देणार?
अनेक दिवस तो मनात कुढत होता. एक दिवस त्याने निश्चय केला. घरात एक खंजीर होता. तो घेतला आणि निराशेच्या भरात त्याने तो त्वेषाने आपल्या छातीत खुपसला. त्यावेळी घरात कुणीच नव्हते किंबहुना त्याने तशीच वेळ निवडली. रक्ताची चिळकांडी उडाली. खूप रक्तस्राव झाला आणि रणजीतने प्राण सोडला. प्रतापभैय्याला जेव्हा हे कळले तेव्हा तो खूप दु:खी झाला पण त्याला दुसर्या बाजूला अभिमानही वाटला. आपल्या चुकीची त्याने योग्य किंमत दिली. राजपूताच्या घराण्याला बट्टा लागू दिला नाही. असे म्हटले तरी भैया मनाने खूप खचला होता. एकुलता एक मुलगा अकाली गेल्याचा त्याला खूप धक्का बसला. दोन-चार वर्षात तोही स्वर्गवासी झाला.
"तर अशी ही ह्या खंजीराच्या मागची हकीकत आहे", चाचा म्हणाला.
मी अवाक् झालो. ही वस्तू स्वातंत्र्याच्या लढ्यातील एक विस्मरणात गेलेल्या अध्यायाचा साक्षीदार होती. निव्वळ वस्तू म्हणून तर ती सुंदर, सुबक होतीच पण हा इतिहास ती आपल्या अंगावर बाळगते आहे हे कळल्यावर ती मिळवायची अपार इच्छा झाली. मी म्हटले, "चाचा, मी असल्या दुर्मिळ गोष्टींचा संग्राहक आहे. तुम्हीच म्हणालात की तुमच्या मुलाला असल्या गोष्टीत आजिबात स्वारस्य नाही. तुमच्या माघारी तो कदाचित हे दुकान विकून दुसरे काहीतरी बांधेल. मी तुम्हारा खात्रीपूर्वक सांगतो की हा खंजीर मला विकत दिलात तर देव्हार्यातील देवासारखा मी तो जपेन. अगदी त्याच्या इतिहासासकट तो माझ्याकडे सुरक्षित राहील." म्हातार्याला हळूहळू माझे बोलणे पटत होते. आणखी थोडी मनधरणी केली आणि बाराशे रुपयात सौदा पटला. मी तो खंजीर मिळवला. राजस्थानातील बाकी खरेदीपेक्षा ही खरेदी सगळ्यात जास्त संस्मरणीय होती.
दुसर्या दिवशी घरी आलो. तो खंजीर एका छानशा जागी स्थानापन्न केला गेला. बाकी वस्तुप्रमाणे ह्याच्या साफसफाईत मी कधी कुचराई केली नाही. अनेक पाहुणे, मित्र मंडळी त्याचे कौतुक करत. कंटाळा न करता मी इमानेइतबारे त्याची गोष्ट लोकांना सांगत असे. त्याने तर लोकांना ह्या वस्तुचे अधिकच कौतुक वाटे.
माझ्या ह्या ट्रिपला सहाएक महिने झाले असतील. एकदा माझ्या लक्षात आले की ह्या खंजिराची मूठ थोडी ढिली झाली होती. ती आणखी फिरवून बघितली तर चक्क बाहेर निघाली. आत पोकळी होती. म्हटले बघू आत काही कागदपत्र किंवा अजून काही लपवले आहे का. राजपूत घराण्याचा ऐवज आहे. आत काहीबाही असण्याची शक्यता आहे. पण तसे काही नव्हते. पण पात्याच्या मुळाशी काहीतरी मजकूर कोरलेला होता. मूठ लावल्यावर तो मजकूर झाकला जात होता आणि दिसत नव्हता. जरा मोठ्या प्रकाशात नेले आणि भिंगाने तो मजकूर वाचला. तर जबरदस्त धक्का बसला.
लिहिले होते, "मेड इन चायना २००३" !!!
हल्ली माझा जुन्या वस्तू जमवायचा छंद जवळपास नामशेष झाला आहे!
याद्या
4785
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
हा हा
हहहाहाहा..
आयला लय भारी..
मस्त लिहिले आहे.
हा हा हा !!
हा हा हा हा हा हा हा
ठो ...
हे हे हे..
लई भारी
मस्तच.
मस्त
मार डाला
शेवट
सुरक्षित
मस्तच!
अनपेक्षित...
मस्तच
हा हा हा!